मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तिळगूळ घ्या…अन…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “तिळगूळ घ्या…अन…” ☆ श्री मंगेश मधुकर

“तिळगूळ घ्या….”

“नमस्कार” हऱ्यानं हात जोडले.

“हाय” उजव्या हाताचा पंजा हलवत नाऱ्यानं प्रतिसाद दिला.  

“आज एकदम इंग्लिश”

“आपलं असंच असतं”

“रात्रीची उतरली नाही वाटतं”

“काहीही समज.फरक पडत नाही.”

“तिळगूळ घ्या ..”हऱ्या

“पुढचं नको”

“का?”

“मी नेहमीच गोड बोलतो.”

“ते माहितीये.आधी काय म्हणतोय ते ऐकून तर घे”

“बरं,बोल” 

“तिळगूळ घ्या अन खरं बोला.”

“हे अवघड आहे. त्यापेक्षा तिळगूळ परत घे .”

“सपशेल माघार”

“तुझी अपेक्षाच चुकीची आहे”

“काहीही काय”हऱ्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह?

“बाकी काहीही सांग पण खरं बोलायचं म्हणजे.. नको रे बाबा” 

“एवढं अवघड आहे.”

“अवघड नव्हे अशक्य”

“का?”

“खरं बोला.तुला सांगायला काय जातं पण बोललेलं समोरच्याला खरं वाटेल याची खात्री नाही आणि इथंच सगळा घोळयं. प्रत्येकजण सोयीनं बोलतो ”

“म्हणजे नाटकी.दिखाव्याची दुनिया..”हऱ्या

“कटू असलं तरी हेच वास्तव आहे”

“मग गोड बोला..”

“खरं सांगू.गोड बोलणाऱ्यांची तर भीतीच वाटते.कामापुरतं गोड बोलणार आणि नंतर….हम आपके हैं कौन ”

“खरा कोण?खोटा कोण?समजत नाही.”हऱ्या

“मी राजकारण्यांविषयी बोलत नाही.त्यांच्याशी आपल्याला काही देणं-घेणं नाही.आपण औट घटकेचे राजे.मत दिल्यावर आपली अवस्था टिश्यू पेपर सारखी.”

“पण याच लोकांच्या हातात आपलं भविष्य आहे ना.नक्की कोणावर विश्वास ठेवायचा.” हऱ्या

“कोणावरच नाही.नशिबावर सोडून द्यायचं.सब घोडे बारा टक्के.नेतेमंडळी म्हणजे एकापेक्षा एक नटसम्राट..त्यांच्या  खेळातली आपण प्यादी. त्यांच्याविषयी जास्त बोलायला नको. कधी,कोठे अन कोणाला राग येईल आणि भावना दुखावतील याचा नेम राहिलेला नाही.”

“विषय भरकटला ना राव.आपण खरं बोलण्याविषयी  चाललं होतं .” हऱ्या

“हो,सध्या अशी परिस्थिती आहे की,घरी दारी सगळीकडे मुखवटा लावलेला.सारखं मुखवट्याआड लपल्यानं खरा चेहरा लक्षात येत नाही.” 

“हंsssम ”

“एकूणच काय तर एकमेकांवरचा विश्वास कमी होतोय.”

“झपाट्यानं”

“आपल्या मनमोकळं बोलण्याचा गैरफायदा तर घेणार नाही ना ही भीती सतत वाटते.”

“असं का पण..”हऱ्या 

“मी,मला,माझं याला आलेलं महत्व आणि जगण्यातली वाढती अनिश्चितता त्यामुळे ठायी ठायी आलेला तात्पुरतेपणा”

“हे काय नवीन..”

“नवीन नाही जुनंच आहे.जरा बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल की सगळ्या गोष्टी उदा.आनंद,दु:ख,राग,संताप हे फार वरवर आणि उथळ झालंय तर ईगो स्ट्रॉंग आणि नाती भुसभुशीत झालीय.”

“त्यामुळचं माणसं सतत सैरभैर असतात.” हऱ्या

“कोणत्याच गोष्टीत जास्त वेळ रमत नाहीत.लगेच बोर होतात.कोणत्याही कारणानं रागवतात अन लगेच शांतही होतात.बऱ्याचदा विचार न करता रिऍक्ट होण्याचं प्रमाण फार वाढलंय.तासनतास चॅटिंग करतील पण समोरासमोर बोलणार नाहीत.”

“डिजिटल संवाद वाढला पण सुसंवाद हरवला” हऱ्या 

“आहाहाहा,काय तर बोलालास.एकदम पुस्तकी वाक्य ..”

“माणूस कितीही आधुनिक झाला तरी अजूनही भावना तशाच आहेत.परस्परांविषयी प्रेम,माया,ममत्व वाटतचं आणि त्यात कधीच बदल होणार नाही.वाईट एवढंच की व्यवहाराला महत्व दिल्यानं नात्याची घट्ट वीण उसवायला सुरवात झाली”

“हो याचा अनुभव घेतलाय.आईबापांना आपल्याच मुलांशी बोलायला भीती वाटते”

“नवीन जमान्याची नवीन दुखणी”

“असो…माणसानं स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे.”

 हऱ्या तिळाची वडी नाऱ्याच्या हातात ठेवत म्हणाला “आपण परंपरा मोडायची नाही. तिळगूळ घ्या…..”लगेच नाऱ्या ओरडला “अन  चांगलं बोला …. “

मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !! तिळगूळ घ्या .. छान छान वाचत रहा

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ केकी मूस — लेखक : श्री योगेश शुक्ल ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ केकी मूस — लेखक : श्री योगेश शुक्ल ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆

आज ३१ डिसेंबर कलामहर्षी केकी मूस यांचा स्मृतीदिन. केकी मूस या अवलियाची ही दुनिया! कलेशी तादात्म्य पावलेल्या या कलाकाराने आपले सारे आयुष्य तिच्या साधनेत घालवले. ‘केकी मूस’ हे नाव प्रथम ऐकणाऱ्याला गूढ-कुतूहलाचे वाटते. या नावामागे मोठे विश्व दडल्याची भावना होते. या व्यक्तिमत्त्वाचा शोध सुरू झाला, की मग या गूढ अंतरंगाची खोली किती खोल-रुंद आहे याचाही साक्षात्कार होतो. कलेच्या प्रांतातील या गंधर्वाचा शोध घेतच अनेकांची पावले चाळीसगाव रेल्वे स्टेशनलगतच्या त्या दगडी बंगलीत शिरतात आणि या दंतकथेचा भाग बनून जातात.कैकुश्रु माणेकजी ऊर्फ केकी मूस या अवलियाची ही दुनिया! मुंबईच्या मलबार हिल या उच्चभ्रूंच्या वस्तीत २ ऑक्टोबर १९१२ रोजी हा कलायोगी जन्माला आला.

 केकी मूस यांना त्यांचे निकटवर्तीय बाबुजी म्हणत असत. केकी मूस  हे पारशी समाजात जन्मले, ते तहहयात अविवाहित राहिले. त्यांची आई पिरोजाबाई सात्त्विक, प्रेमळ अन् दयाळू होत्या. वडील माणेकजी शांत, संयमी, सुशील व हिशोबीदेखील होते. केकी मूस यांचे बालपण  मुंबईतील उच्चभ्रू वसाहतीत मलबार हिल येथे त्यांच्या मामांच्या घरी गेले. मामा स्वातंत्र्यपूर्व काळातील नामवंत बिल्डर होते. छत्रपती शिवाजी टर्मिनस ही त्यांनी बांधलेली वास्तू आहे. त्यांचे नाव आर.सी. नरिमन. मुंबईतील समुद्रकाठच्या एका टोकाला त्यांचेच नाव देण्यात आले आहे – नरिमन पॉर्इंट. मामांनी केकींचे शिक्षण- प्राथमिकपासून तर महाविद्यालयापर्यंत मुंबईत केले. केकींनी १९३३ साली पदवी प्राप्त केली. त्याचे मामा अविवाहित होते. त्यांनी केकीला त्यांचा मुलगा मानले होते.

केकीने पदवी प्राप्त होताच लंडनला जाऊन कलाशिक्षण घेण्याची इच्छा प्रकट केली. परंतु मामाला त्यांचा उद्योग व्यवसाय केकीने सांभाळावा असे वाटत होते. केकी हट्टी होते. ते म्हणाले, “मामा कोठलेही ऐश्वर्य मला माझ्या निर्णयापासून दूर घेऊन जाऊ शकत नाही.” ते ऐकल्यावर मामा भडकले. त्यांनी केकींना त्यांच्या आईबाबांकडे पाठवून दिले. केकींनी त्यांची बॅग भरली व त्याच मिनिटाला मामांचा बंगला सोडला व रात्रीची कलकत्ता मेल धरली. केकींचे यांचे वडील, माणेकजी मूस हे १९३४ साली कालवश झाले. त्यांच्या आईचा आधार गेला. पण १९३३-१९३४ सालामध्ये केकींनी पाटणादेवी, तीर्थक्षेत्र बालझिरी, खुलताबाद, वेरूळ या ठिकाणी कित्येकदा जाऊन फोटोग्राफी केली, पेंटिंग्ज केली. केकींनाही वडिलांच्या निधनाने हादरा बसला. केकी त्यांच्या आईला तिच्या हॉटेल व्यवसायात मदत करू लागले. केकींनी लंडनला जाण्याचा विषय आईकडे कधीही काढला नाही.

कैकुश्रु माणेकजी मूस हे केकींचे नाव, परंतु पिरोजाबाई लाडाने त्यांना केकी म्हणू लागल्या. त्याच नावाने ते जगप्रसिद्ध झाले. केकींच्या मनातील घालमेल आईला कळली बहुधा, आई एक दिवस त्यांना म्हणाली, “केकी, बाळा, मी तुला उद्या पैसे देणार आहे, तू लंडनला जाण्याची तयारी कर!”. केकी त्यांच्या अखेरच्या प्रवासापर्यंत कधीही आईचे ते ‘देणे’ विसरू शकले नाहीत. आईची आठवण आल्यावर केकी देवालाही रागावायचे आणि म्हणायचे, ‘कसला देव बीव काय नाय! देव असता तर माज्या आईला त्याने नेला नसता.’ आईने परवानगी दिल्याने केकी जाम खूश झाले. केकींनी १९३५ ला लंडनला प्रयाण केले व तेथील ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’मध्ये प्रवेश घेतला. केकींनी चार वर्षांत त्यांचा ‘कमर्शियल आर्ट’चा डिप्लोमा पूर्ण केला. ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’ने फोटोग्राफीच्या जागतिक दर्ज्याच्या ज्या स्पर्धा त्या चार वर्षांत घेतल्या त्या स्पर्धांमध्ये केकींनी प्रथम येण्याचा बहुमान दोनदा मिळवला, अन् ते लंडनमध्ये असतानाच जगप्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून नावारूपाला आले. त्यांनी जगाच्या नकाशावर भारताचे नाव उज्ज्वल केले. लंडनचे नागरिक केकींना ‘गोल्ड मेडलिस्ट, गोल्डन मॅन केकी’ म्हणू लागले. केकींनी १९३८-१९३९ या वर्षभरात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जपान, ब्रिटन, इटली इत्यादी राष्ट्रांचा दौरा केला. केकींनी त्या त्या राष्ट्रातील कला जाणून घेतल्या. तेथील नामवंत प्रसिद्ध कलावंतांना सदिच्छा भेटी दिल्या.

केकी १९३९ च्या डिसेंबर महिन्यातील शेवटच्या हप्त्यात भारतभूमीवर उतरले. ते दिल्लीवरून मुंबई आणि मुंबईवरून सरळ चाळीसगावी त्यांच्या बंगल्यात आले आणि त्यानंतर तब्बल पन्नास वर्षें, त्यांनी त्यांच्या बंगल्यात स्वत:ला स्वेच्छेने आत्मकैद केले.  या चक्रावणाऱ्या आत्मकैदेत जगरहाटी विसरलेल्या या कलाकाराने निर्माण केलेली कलासृष्टी म्हणजेच चाळीसगावची ‘मूस आर्ट गॅलरी’! मूस यांना या विश्वात जी जी म्हणून कला आहे, त्या साऱ्यांची आस होती. रंगकाम, चित्रकाम, रेखाचित्र, छायाचित्रण, मूर्तिकला, कातरकाम, काष्ठशिल्प, ओरिगामी, सतारवादन..काय काय म्हणून नव्हते. यातूनच चाळीसगावातील पाच दशकांच्या वास्तव्यात त्यांनी आशयघन अशा शेकडो कलाकृती निर्माण केल्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरातच या सर्व कलाकृतींचे एक संग्रहालय थाटण्यात आले. एका सर्जनशील कलाकाराच्या या स्मृती जतन करण्याचे काम ‘कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान’तर्फे केले जात आहे.

रेम्ब्रा रीट्रीट! केकी मूस यांच्या ब्रिटिशकालीन बंगल्याचे हे नाव आत शिरताच कलेशी नाते जोडते. विश्वाविख्यात कलाकार रेम्ब्रा हा केकी मूस यांचा आदर्श! कलेच्या प्रांतातील त्याचे अर्धवट कार्य पूर्ण करण्यासाठीच जणू आपला जन्म झाला, ही मूस यांची धारणा होती. आत शिरताच भोवतीने सर्वत्र शिल्पं, चित्रे, छायाचित्रे आदी कलाकृती दिसू लागतात. चित्र आणि छायाचित्र ही केकी मूस यांची दोन मुख्य अंगे! या साऱ्या दालनात तीच अधिक भरून राहिलेली आहेत. हे सुंदर जग आणि चराचरात सामावलेले सौंदर्य चित्रातून रेखाटावे आणि छायाचित्रातून प्रकट करावे, या ध्यासातून त्यांनी आयुष्यभर त्यांचा कुंचला आणि कॅमेरा चालवला. या दोन प्रतिभांनीच मूस यांना जगविख्यात केले.

कल्पनाचित्रांचा खेळ असलेली ‘टेबल टॉप फोटोग्राफी’ हा त्यांचा एक अफलातून प्रकार! मनातले एखादे चित्र उपलब्ध वस्तूंच्या साहाय्याने उभे करावे, त्याला प्रकाशयोजना, त्रिमितीची उत्तम जोड द्यावी आणि या साऱ्या दृश्याचे छायाचित्र काढत अवघ्या विश्वाला फसवावे!

केवळ मीठ, भुसा, कापूस, वाळलेल्या काडय़ा यातून त्यांनी तो गोठवणारा हिवाळा उभा केला. या दृश्यावर एक धुरकट प्रकाश टाकला आणि छायाचित्र घेतले. झाले, भल्याभल्यांना या चित्रातून जागोजागीचा ‘विंटर’ दिसू लागला. यात खुद्द पंडित नेहरूदेखील होते. हे चित्र पाहिल्यावर नेहरू एवढेच म्हणाले, ‘धिस इज माय नेटिव्ह प्लेस. मि. मूस, टेल मी व्हेन यू हॅव व्हिजिटेड काश्मीर?’  ‘ऑफ डय़ूटी’ आणि ‘अ वेटिंग देअर टर्न विथ टेरर’ ही दोन छायाचित्रेही अशीच मूस यांच्यातील सर्जनशील मन दाखवणारी. ‘ऑफ डय़ूटी’मध्ये जवानाचा एक बूट दाखवला असून, त्याच्यात एक हसरी बाहुली खोचलेली आहे. बाहुलीतून जणू तो बूटच हसत आहे. दिवसभर त्या जवानाबरोबर ‘डय़ूटी’ करणाऱ्या त्या बुटालाही थोडा वेळ विश्रांती मिळाली की हायसे वाटते, आनंद होतो. पहिल्यात हा आनंद, तर दुसऱ्यात ती भीती! ‘मृत्यूचे भय’ दाखवणारे हे छायाचित्र! आजारी आईला मोसंबीचा ज्यूस देताना मूस यांना ही जाणीव स्पर्शून गेली. एक मोसंबी कापून त्याचा ज्यूस (अंत) होत असताना बाजूच्या मोसंब्यांच्या मनात काय भाव उमटत असतील, याचेच भय त्यांनी या फळांवर चित्रित केले. ..क्षुल्लक फळांमधून चराचरांतील प्रत्येकाच्या जीवन-मरणाचे दर्शन घडविणाऱ्या या छायाचित्राने मूस यांना पुढे जागतिक कीर्ती मिळवून दिली.

मूस यांच्या संग्रहालयात व्यक्तिचित्रेही आहेत. त्यांच्या स्टुडिओला भेट देणाऱ्या जवळपास प्रत्येक मान्यवराचे त्यांनी एक आगळे छायाचित्र काढलेले आहे. पंडित नेहरू, जयप्रकाश नारायण, शंकरराव देव, साने गुरुजी, पंडित महादेवशास्त्री जोशी, महर्षी धोंडो केशव कर्वे, ना. ह. आपटे, ना. सी. फडके, श्री. म. माटे, आचार्य अत्रे, वसंत देसाई, बाबा आमटे अशी इथे एक मोठी शंृखलाच उभी राहते. यात काही ‘असामान्य’ असे सामान्य चेहरेही आहेत. एका फासेपारधी स्त्रीचा चेहरा असाच सतत लक्ष वेधत असतो. या वृद्ध, कृश महिलेच्या चेहऱ्यात त्यांना साऱ्या जगाचे दु:ख जसे दिसले, तसेच त्या शेकडो सुरकुत्यांमधून जगण्याची दुर्दम्य इच्छाही जाणवली. या वृद्धेच्या काढलेल्या छायाचित्रांना पुढे जगभर प्रसिद्धी मिळाली.

मूस यांनी शिल्प, मूर्ती, माती, काष्ठशिल्प, ओरिगामी आदी कलाप्रकारही हाताळले. यांच्या असंख्य कलाकृती या संग्रहालयात आहेत.  मूस यांच्या नजरेत आलेल्या अनेक लाकूड-फांद्यांनाही त्यांनी व्यक्तिमत्त्व बहाल केले. त्यांच्या बंगल्याच्या आवारातील सुकलेल्या एका बोरीच्या खोडात त्यांना असाच एक चेहरा दिसला. मूळ खोडातून वर निघालेल्या या चार फांद्यांना त्यांनी हव्या त्या आकारात छाटले आणि त्यांच्यात साखळय़ा अडकवल्या; यातूनच तयार झाली ती ‘इटर्नल बाँडेज’ नावाची एक अफलातून कलाकृती! स्त्री-पुरुष ही एकाच सृष्टीची एकमेकांना बांधून ठेवणारी निर्मिती, इथपासून ते ‘त्या’ हातांकडून परमेश्वराच्या होणाऱ्या प्रार्थनेपर्यंत असे अनेक अर्थ या कलाकृतीतून ध्वनित होत गेले.  पंडित नेहरू या कलाकृतींच्या ओढीने इथपर्यंत आले आणि सारे कार्यक्रम रद्द करत दिवसभर रमले. तर इथे सतत येणारे बाबा आमटे जाताना ‘इथे मी माझा आत्मा ठेवून जात आहे’ असे म्हणाले. संग्रहालयाची इमारत असलेले मूस यांचे ब्रिटीशकालीन घर 109 वर्षांचे वृध्द झालेले आहे. 31 डिसेंबर 1989 रोजी कलामहर्षि केकी मूस यांनी या जगाचा निरोप घेतला.केकी मूस यांनी आयुष्यभर कलानिर्मितीशिवाय दुसरे काहीही केले नाही. त्यांची कला सातासमुद्रापार गेली. तिला अनेक मानसन्मानही मिळाले, पण या मान, सन्मान, पुरस्कार, नाव, प्रसिद्धी, पैसा आणि मुख्य म्हणजे बाजार या साऱ्यांपासून ते दूर राहिले. कुंचला आणि कॅमेऱ्यातून वेळ मिळताच ते सतारीवर बसायचे. या संवेदनशील कलाकाराचा सहवास सर्वानाच हवाहवासा वाटायचा. तिथल्या कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी देश-विदेशातून असंख्य कलाकारही रोज चाळीसगावचा पत्ता शोधत इथपर्यंत येतात. आजही आपल्या कलादालनाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती खान्देशातील या मातीला अधिक समृध्द करीत आहेत.

लेखक : श्री योगेश शुक्ला 

प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “प्रसाद” – लेखक : श्री अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “प्रसाद” – लेखक : श्री अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

एका छोट्याशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहापाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते.

गावातला तरुण म्हणाला, “थोडा वेळ आहे. भैरीच्या देवळात जाऊन येऊ ! माझ्या सोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते.

“फार जागृत स्थान आहे, सर ! सगळे गाव मानते.”  गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला.

देवळात गेलो. मी नमस्कार केला. गुरवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला.

मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला. मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरव म्हणाला, “बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते!

गुरुजी फार भला माणूस. सगळं गाव शानं केलं. कुठं अडू द्या-नडू द्या; देवासारखं गुरुजी पळत येनार. पण नशिबानं त्यांना न्याय दिला नाही!” गुरवाच्या या वाक्याने मी कान टवकारले.

गुरुजींचे जीवन समजून घेण्यासाठी गुरवाला एक-दोन प्रश्न विचारले. गुरुजींची जीवन कथा ऐकून मी स्तब्ध झालो. तरुण मुलगा अकाली गेला. लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला. मुलगी माहेरी आली.

बायकोला दोन्ही धक्क्यांनी वेड लागले. तिला सावरून, उभी करून गाडी रुळावर येत होती, तेव्हाच मुलीने जीव दिला. एकमेकांच्या आधाराने ते दोघे उभे राहिले. सारे गावच कुटुंब बनवले. गुरुजींनी केलेले कार्य मला माहीत होते, पण ही सारी दु:खभरली कहाणी माहीत नव्हती.

कार्यक्रम छान झाला.

निघताना मी आणि माझा मित्र गुरुजींचा निरोप घ्यायला मुद्दाम गेलो. मी निघताना गुरुजींना न राहवून विचारले, “हे सगळे कसे सहन केलेत?’’

गुरुजी म्हणाले, “आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही. चिरफाड नाही. चिडचिड नाही.

प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण? चवीचा विचार नाही करत. ताजे-शिळे म्हणत नाही. त्याला पेढा, मला गूळ का? म्हणत नाही. घेतो. खातो. धन्य होतो. हे कधी विसरलो नाही. प्रसाद देवाचा प्रतिसादच मानला !’ माझे डोळे भरून आले. मी वाकून नमस्कार केला. छान हसून माझा हात हातात घेतला. स्पर्श आणि हास्याचा जणू मला त्यांनी प्रसादच दिला !

गुरुजींशी झालेल्या संवादातून केवढा हितोपदेश मिळाला;  तोही सहजच ! प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले, तर जगणे किती सुंदर बनून जाते हे मला समजले.

मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा राहोच, चर्चाही करत नाही. कुणाला चार शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्तासा ! कुणाला काजूचा तुकडा असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱ्याचा लाभ होईल !

आपण प्रसाद घेतो, खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यातील प्रसंग !

जे वाट्याला आले ते आपल्या इष्टाचा प्रतिसाद  मानले की सारी घालमेलच संपते. गुरुजींशी झालेल्या मुक्त संवादाने मी आतून उजळून निघालो.

एकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली, तेव्हा सर्वांना प्रसादही दिला.

सारी आवराआवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी मिळेल?’’  सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली.

तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’ वृद्धेला आनंद झाला.

बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली,

“पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं !

परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’

मला तिचे पाय धरावेसे वाटले.

आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी ! मन प्रसन्न असेल ना; तर मनाने नाही, कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले.

परमार्थ वेगळे काय शिकवतो?

आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे ‘प्रासादि’क होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो, तसा कणाकणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो.

पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन… शेवटी ओंजळ रिक्तच राहते.

असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे.

एकदा ते मिळाले म्हणताना, आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळहातावर मिळालेला गोपाळकाला, स्वत:साठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो.

देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो.

परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोड्यातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे.

लेखक: अज्ञात

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्नेह आणि संवाद… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

☆ स्नेह आणि संवाद… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

मोबाईल तर अस्तित्वात नव्हतेच पण साधे फोनही सर्वांकडे नव्हते.

जानेवारी सुरु झाला कि रस्त्यावर कुठेतरी तुरळक दुकान दिसायची न स्टेशनरीच्या दुकानात कार्ड यायची.

मग छोट्या प्लास्टिक पिशव्यात तिळगुळ भरून मेणबत्तीने चिटकवून कार्डला स्टेपल करून पाकीट तयार करून पोस्टाने पाठवून द्यायची.

काही नुसती पाकीट यायची त्यात तिळगुळ आणि पत्र.

हाताने लिहिलेल्या शब्दांना स्पर्श असतो आणि सुगंध असतो, नुसता शाईचा नाहीतर लिहिणाऱ्या माणसांच्या भावनांचा.

पाकिटातून आलेले चारदोन दाणे जेव्हा हातावर पडायचे तेव्हा एखाद्या नव्याने लग्न करून सासरी नांदणाऱ्या मुलीचा भाऊ नाहीतर वडील पत्रात शेवटी ” काळजी घे ” म्हणायचे तेव्हा तिच्या नकळत हुंदका यायचा, डोळ्यात आठवणी दाटून पाणी तरळून जायचं.

त्या पत्रातल्या अक्षरावरून हात फिरवला तरी मायेच्या माणसांच्या हाताचा स्पर्श जाणवत असायचा.

कितीही चांगले टाईप वापरून , रंग ,फोटोशॉप वापरून तयार केलेले मेसेज ढिगानं येताहेत सोशल मिडीयावर पण त्या थरथरत्या हातानी लिहिलेल्या ” काळजी घ्या ” ची सर कशाला नाही.

आता अस पत्र हाताने कधी कुणाला लिहून पाठवल होत शेवटी हेही आठवत नाही. हाताने लिहिणं थांबलंय तर पत्र लांबची गोष्ट.

हा फोटो न शुभेच्छा मेसेजचा पूर कितीही आला तरी काहीसा कोरडा वाटतोय.

बदल होत राहतात , बदल होण एवढच फक्त चिरंतन आहे हेही कबूल पण असे दिवस काहीतरी जुन्या आठवणी चाळवून जातात न आतून सगळ ढवळून जातात.

तिळगुळ घ्या गोड बोला

संवाद असू द्या स्नेह असू द्या !! ……

लेखक : अज्ञात

प्रस्तुती.. सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

वैद्यकीय

  1.   रस्त्यावर असहायपणे पडलेल्या अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारचे उपचार देण्यात आले.
  2. ज्यांना अजिबातच ऐकायला येत नाही अशी अनेक वृद्ध मंडळी मला रस्त्यात भेटतात. रस्त्यावरून चालताना रस्ता ओलांडताना किंवा इतर अनेक वेळी ऐकूच न आल्यामुळे अपघात होतात त्यात बऱ्याच वेळा हात पाय मोडले जातात.

अशा सर्वांना एक एक करून मांडके हियरिंग सर्विसेस या प्रथितयश संस्थेतून कानाची तपासणी करून घेत आहोत आणि योग्य त्या व्यक्तींना कानाची मशीन देत आहोत. 

ऐकू यायला लागल्यानंतर ही माणसं छोटे छोटे आवाज सुद्धा कौतुकाने ऐकत राहतात. रस्त्यावरून चालणाऱ्या गाड्यांचा गोंगाट… हॉर्नचा कर्ण कर्कश्श आवाज… स्पीकरवर जोरजोरात लागलेली गाणी… एरव्ही कोणालाही या सर्वाचा त्रास होईल, परंतु त्यांना हे आवाज ऐकताना खूप आनंद होतो…! 

  1. ज्यांना दिसत नाही अशा अनेक वृद्धांना रासकर डोळ्यांचे हॉस्पिटल किंवा लेले हॉस्पिटल येथे घेऊन जाऊन त्यांच्या डोळ्यांच्या तपासण्या करत आहोत, चष्मे देत आहोत आणि मोतीबिंदू ऑपरेशन सुद्धा करून घेत आहोत.

दिसायला लागल्यानंतर यांना काय पाहू आणि काय नको असं होतं…

भिंतींचे रंग, गाड्यांचे रंग, आकाशाचा रंग, घातलेल्या कपड्याचे रंग… एरव्ही या गोष्टी सुध्दा कोणी इतक्या बारकाईने पाहत नाही परंतु याच गोष्टींचं त्यांना किती अप्रूप…! 

बरोबर आहे, ज्याच्याकडे जी गोष्ट आहे त्याला त्याची किंमत नसते… 

उपाशी असलेल्यालाच चतकोर भाकरीची किंमत जास्त कळते… 

शेवटी काय, आनंद आणि सुख याची खरी अनुभूती त्यालाच येते ज्याने या अगोदर दुःख पचवली आहेत…! 

  1. कुंडीतीलं झाड अतिशय सुरक्षित वातावरणात जगत असतं, पण ते कुणीतरी पाणी घालण्याची वाट पाहत असतं, परंतु जमिनीवर उगवलेलं झाड मात्र जमिनीतला ओलावा शोषून जगतं…!

अशीच जमिनीतला ओलावा घेवुन जगणारी… रस्त्यावर राहणारी वृद्ध माणसं… माझे मित्र श्री नितीन पाटील यांच्या सहकार्याने, त्यांच्या वाढदिवसानिमित्त, अतिशय उत्तम क्वालिटीची ब्लॅंकेट या सर्वांना देऊन त्यांच्या अंगावर मायेचं पांघरुण घालता आलं…

अन्नपूर्णा प्रकल्प

आमच्या अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही रस्त्यांवर नाईलाजाने जगत असलेल्या आई बाबा, भाऊ बहिण यांना किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या किमान २०० गोरगरीबांना, दररोज…. जेवणाचे डबे हातात देत आहोत. 

आयुष्याच्या वाटेवर भेटलेले, श्री अमोल शेरेकर, हे फक्त शरीरानेच दिव्यांग आहेत. बाकी आत्मविश्वास एखाद्या धडधाकट माणसाला सुद्धा लाजवेल. 

अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून या कुटुंबाला आपण व्यवसाय सुरू करून दिला आहे.

अमोल यांची पत्नी घरात जेवण तयार करते आणि श्री अमोल शेरेकर पॅकिंग करून रुग्णालयातील भुकेल्या गरिबांच्या हातात हे डबे नेवुन देतात. 

It’s our win-win situation

इकडे एका कुटुंबाला उत्पन्न मिळाले, जगण्यासाठी सहाय्य मिळाले आणि तिकडे भुकेने तडफडणाऱ्या लोकांना अन्न मिळाले.

खरंच जेवणाच्या एका घासाने किती जणांना जगवले…. !

खराटा पलटण

खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team ! 

अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत. 

या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे. 

आपण सर्वांनी सुद्धा कोणतीही गोष्ट “भीक” म्हणून देण्यापेक्षा त्यांना सन्मानानं “मजुरी” द्यावी अशी माझी आपणास विनंती आहे. 

आमच्या या सर्व महिला पुणे महानगरपालिकेच्या “स्वच्छता अभियान च्या ब्रँड अँबेसिडर” म्हणून सध्या चमकत आहेत. 

या संपूर्ण वर्षात कधी भंगारवाला झालो आणि उकिरड्यात टाकलेल्या वस्तू गोळा करून त्यांना जोडत गेलो… कधी पोस्टमन होऊन आपली मदत योग्य त्या पत्त्यावर पोहोचवली…. आणि वर्षभराचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडत गेलो…! 

उजाले मे मिल जाते हैं लाखों यहाँ…

अहसान उनका मानो जिन्होने अंधेरे मे साथ दिया…

आमच्या या धडपडीला तुमची साथ मिळाली… विनाअट विना अपेक्षा आपण कोणत्या न कोणत्या स्वरूपात आम्हाला मदत करत गेलात, ऋण कसं फेडावं तुमचं…??? 

काही वेळा मला असं वाटतं, की आपण एकाच घड्याळाचे काटे आहोत…. प्रत्येक काट्याची उंची वेगळी, गती वेगळी, रुप वेगळे, रंग वेगळा…. 

तरीही घड्याळाच्या मध्यबिंदूवर आपण एकमेकांशी घट्ट जोडले गेलो आहोत…. हा मध्यबिंदू आहे माणुसकीचा…!!!

आणि उंची, गती, रूप, रंग वेगळा असेलही परंतु, घड्याळाच्या या एका परिघात आपण एकत्र राहून एकाच दिशेने चाललो आहोत…

वर्षभरात नकळतपणे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्ही मनापासून माफी मागत आहोत… मोठ्या मनानं माफ करावं…. !

सरत्या वर्षाचे धन्यवाद, येणाऱ्या वर्षाला अभिवादन आणि आपणा सर्वांना प्रणाम. 

नवीन वर्षाच्या आपणास शुभेच्छा… !!! 

प्रणाम  !!!

– समाप्त – 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “वस्त्र” – लेखिका : सुश्री अश्विनी मुळे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “वस्त्र” – लेखिका : सुश्री अश्विनी मुळे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

त्या वैभवशाली, भव्य दरबारात ती एखाद्या भिंगरीसारखी गरगरत होती. हात जोडत होती, विनवण्या करत होती. ती तेजस्वी बुद्धीमती युक्तिवाद करत होती. पण सर्वांच्याच माना खाली होत्या. अखेर दु:शासनाने तिच्या केसांना पकडून तिला थांबवलं आणि तिच्या वस्त्राला हात घातला. एकच जळजळीत नजर  आपल्या महापराक्रमी पतींकडे टाकून तिने डोळे घट्ट मिटून घेतले. कृष्णाचा धावा सुरु केला. “तुझं बोट कापल्यावर मी बांधलेल्या चिंधीएवढं वस्त्रसुद्धा माझ्या अंगावर उरणार नाहीये आता. तू तरी काही करणार आहेस कां? की तूही बसणार आहेस मान खाली घालून?” पण हे काय? संपूर्ण शरीराला वस्त्राचा स्पर्श अजूनही कसा काय जाणवतोय? दुर्योधनाचं मन बदललं कां? तिने हलकेच डोळे उघडले. दु:शासन दात ओठ खात दरादरा वस्त्र ओढत होता आणि ते संपतच नव्हतं. एकाला जोडून दुसरं. दुसऱ्यात गुरफटलेलं तिसरं. शालू, शेले, अंशुकं, किंशुकं, पटाव. रेशमी, कशिदाकारीची, जरीबुट्टयांची वसनं. ओघ संपतच नव्हता. संपूर्ण राजसभा पुतळ्यासारखी स्तब्ध होऊन ते आश्चर्य बघत होती. दुर्योधनाचा मदोन्मत्त चेहरा भयचकित झाला होता. बलदंड दु:शासन घामाने नाहून निघाला होता. आणि एका क्षणी ते पृथ्वीमोलाचे पाटव प्रकटलं. त्याच्या सुवर्ण झळाळीने सर्वांचे डोळे दिपले. त्या वस्त्राला मात्र हात घालण्याची हिंमत दु:शासनात नव्हती. ते तेज असह्य होऊन तो खाली कोसळला. पितामह भीष्मांनी हात उंचावून इशारा केला आणि नि:शब्दपणे दरबार रिकामा झाला. उरले फक्त अग्निकुंडातल्या ज्वालेसारखी दिसणारी द्रौपदी आणि तिच्या पायाशी कोसळलेला दु:शासन. त्याच क्षणी अठरा दिवस चालणाऱ्या सर्वसंहारी महायुद्धाचं बीज रोवलं गेलं.

वस्त्राच्या हरणामुळे महाभारत झालं आणि हरणाच्या वस्त्रामुळे रामायण घडलं. एक पळही विचार न करता, राजवस्त्रांचा त्याग करून, वल्कलं लेऊन रामा पाठोपाठ वनाची वाट धरणाऱ्या राजसबाळी सीतेला सुवर्णमृगाच्या काचोळीचा मोह कसा काय पडला असेल? तो मोह इतका प्रभावी होता की रामाने परोपरीने सांगूनही तिने आपला हट्ट मागे घेऊ नये? तिची फक्त पाऊले पहिलेल्या लक्ष्मणावर तिने संशय घ्यावा? त्याने संरक्षणासाठी आखून दिलेली मर्यादा तिने ओलांडावी?

आपल्या तीन प्राथमिक गरजांमधे दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वस्त्रांची ही ताकद. ज्यांनी दोन अजरामर युद्धं घडवून आणली. समरभूमीवर अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्णाला वस्त्रच आठवलं. ‘वासांसी जीर्णानी यथा विहाय’.

‘एक नूर आदमी, दस नूर कपडा’. माणसाचं व्यक्तिमत्त्व खुलवणारी वस्त्रं. आत्मविश्वास वाढवणारी. ऊब देणारी. सन्मान करणारी. आदर, माया, प्रेम दर्शवणारी वस्त्रं. 

गेले तेरा दिवस एक वस्त्र लाखो लोकांना जोडून घेत होतं. रेशमी धाग्यांबरोबर अतूट श्रद्धा गुंफली  जात होती. लाखो हात ते विणत होते. लाखो पाय त्या वस्त्रापर्यंत पोचण्यासाठी आनंदाने तिष्ठत होते. प्रेम, श्रद्धा, भक्तीचा कशिदा त्यावर उमटत होता. राजवस्त्र हा शब्दसुद्धा अपुरा ठरेल त्या महावस्त्राला. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामासाठी विणल्या जाणाऱ्या वसनात आपले दोन धागे सोडताना लाखो मनं उचंबळत होती. अनघाताई घैसास, तुमचं कौतुक तरी किती करू? आपण मांडलेल्या या खेळात किती सहजपणे तुम्ही सर्वांना सामावून घेतलंत. रोज बारा बारा तास चालणारे पंधरा हातमाग आणि त्यात आम्ही दिलेलं दोन धाग्यांचं अर्घ्य. त्या दोन धाग्यांत तुम्ही आम्हाला श्रीरामापर्यंत पोचवलंत.  अयोध्येला कधी जाणं होईल, माहित नाही. कधी ते रामदर्शन होईल, माहित नाही. पण माझ्या हातचे दोन धागे आज ना उद्या रामचंद्राच्या पोशाखात असतील, ही भावनाच किती तोषवणारी आहे. रामाची मूर्ती घडवण्यासाठी आणलेल्या शिळेला स्पर्श करताना जे‌ समाधान मिळालं, त्याच तोडीचं धागे विणतानाचं समाधान होतं. त्या दोन धाग्यांनी प्रत्येकाचा सहभाग राममंदिराच्या उभारणीत नोंदला गेला. पुणे ते अयोध्या हे अंतर एका नाजुकशा धाग्यावर स्वार होऊन, आम्ही सहज पार केलं. जेव्हा प्रभू रामांचं प्रत्यक्ष दर्शन घेऊ तेव्हा आम्ही विणलेले धागे त्यांच्या वस्त्रातून आम्हाला ओळख देतील. हे भाग्य अनघाताई, तुम्ही आम्हाला दिलंत. 

लेखिका : अश्विनी मुळे

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ संबंध – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ संबंध – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

एके दिवशी मी माझ्या मित्राचा तात्काळ श्रेणीतील पासपोर्ट बनवण्यासाठी पासपोर्ट ऑफिसमध्ये गेलो होतो.

रांगेत उभा राहून आम्ही पासपोर्टचा तात्काळ फॉर्म घेतला. फॉर्म भरून आम्हाला बराच वेळ झाला होता. आता आम्हाला पासपोर्टची फक्त फी जमा करायची होती.

परंतु आमचा नंबर आल्याबरोबर क्लार्कने खिडकी बंद केली व सांगितले, “आजची वेळ संपली आहे, उद्या या.”

मी त्याला विनंती केली,  “आजचा संपूर्ण दिवस आम्ही इथे थांबलो आहोत आणि आता फक्त फी भरायची राहिली आहे, कृपया फी जमा करून घ्यावी.”

क्लार्क चिडून म्हणाला, “तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस इथं घालवला, याला मी जबाबदार आहे का? इथे सरकारने कामाकरता ज्यादा माणसे नेमली पाहिजेत. मी सकाळपासून इथे कामच तर करतोय ना.”

माझा मित्र खूपच निराश झाला, तो म्हणाला, “चल. आता उद्या परत येऊ.” मी त्याला थांबवले व म्हणालो, ” मी पुन्हा एकदा प्रयत्न करून बघतो, थांब जरा.”

क्लार्कने आपली पिशवी उचलली व तो चालू लागला. मी त्याला काही बोललो नाही, पण गुपचूप त्याच्या मागे मागे चालू लागलो. तो कॅन्टीनमध्ये गेला. त्याने आपल्या पिशवीतून जेवणाचा डबा काढला व एकटाच सावकाश जेवू लागला.

मी त्याच्या समोरच्या  बाकावर बसलो व त्याच्याशी बोलू लागलो. मी म्हणालो, “तुम्हाला तर खूप काम आहे. तुम्ही दररोज वेगवेगळ्या लोकांना भेटत असाल?” तो म्हणाला, “होय. मी तर मोठमोठ्या अधिकाऱ्यांना भेटतो. कित्येक आय. ए. एस., आय.पी.एस., आमदार रोज इथे येतात व माझ्या खुर्चीसमोर भेटण्याची वाट पाहत असतात.”

नंतर मी त्याला म्हणालो, “तुमच्या ताटलीतील एक पोळी मी खाऊ का?” तो “हो” म्हणाला. मी त्याच्या ताटलीतील एक पोळी उचलली व भाजीबरोबर खाऊ लागलो.

मी त्याच्या जेवणाचे कौतुक केले आणि म्हणालो, “तुमची पत्नी खूपच रुचकर जेवण बनवते.” त्याने फक्त माझ्याकडे पाहिलं व जेवण पुढे चालू ठेवलं.

मी त्याला म्हणालो,

” तुम्ही खूप महत्त्वाच्या पदावर आहात. खूप मोठी माणसं तुमच्याकडे येतात. तुम्ही आपल्या पदाचा (खुर्चीचा) मान राखता का? तुम्ही खूप भाग्यवान आहात की एवढी महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे आहे, पण तुम्ही तुमच्या पदाचा मान राखत नाही.”

तो मला म्हणाला, “तुम्ही असं कसं  म्हणू शकता ?”

मी म्हणालो, ” तुम्हाला तुमच्या कामाबद्दल आस्था असती, तर तुम्ही इतके कठोर वागला नसता.

बघा. तुम्हाला कोणी मित्रही नाहीत. ऑफिसच्या कँटीनमधे तुम्ही एकटेच जेवत बसला आहात. ऑफिसमधे पण आपल्या खुर्चीवर देखील तुम्ही उदास बसलेले असता. लोकांची कामं पूर्ण करण्याऐवजी तुम्ही अडथळा आणण्याचा प्रयत्न करता.

बाहेरगावाहून लोक येतात, सकाळपासून काम होण्याची वाट पाहून कंटाळलेले असतात. तुम्हाला ते पुन्हा पुन्हा विनंती करतात आणि तुम्ही त्यांना कठोरपणे म्हणता,’सरकारला सांगा, कामासाठी जादा माणसं नेमा.’

अरे! जादा माणसं नेमली तर तुमचे महत्त्व कमी नाही का होणार? कदाचित हे कामही काढून घेतले जाईल.

आपापसातील संबंध वाढविण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. पण तुमचं दुर्दैव की याचा फायदा घेण्याऐवजी तुम्ही संबंध बिघडवत आहात. मला काय, मी उद्या येईन, परवा येईन.

पण तुम्हाला चांगली संधी आली होती कुणावर तरी उपकार करण्याची… ती संधी तुम्ही घालवलीत.

मी म्हणालो, “तुम्ही पैसा तर भरपूर मिळवाल पण नातेसंबंध जपले नाहीत तर सगळं व्यर्थ आहे.

काय करणार पैशांचं ? तुमच्या रुक्ष वर्तनाने तुमची घरची माणसे पण दुरावतील आणि आधीच तुम्हाला मित्र पण नाहीत.”

माझ बोलणं ऐकल्यानंतर तो रडवेला झाला. तो म्हणाला, “साहेब, आपण खरं बोललात. खरोखरच मी एकटा आहे. बायको भांडण करून माहेरी गेलीय. मुलांनाही मी आवडत नाही. आई आहे, पण तीही माझ्याशी जास्त बोलत नाही. सकाळी ती चार पाच पोळ्या करून देते आणि मी एकटाच जेवण करतो. रात्री घरीसुद्धा जावसं वाटत नाही. समजत नाही की माझं कुठं चुकतंय?”

मी त्याला शांतपणे सांगितलं, “लोकांशी चांगले संबंध ठेवा. कोणाला मदत करता येत असेल तर करा. बघा. इथे मी माझ्या मित्राच्या पासपोर्टसाठी आलो आहे. माझ्याजवळ माझा पासपोर्ट आहे, पण माझ्या मित्राला मदत म्हणून मी तुम्हाला निरपेक्षपणे विनंती करतोय. त्याच्यासाठी धडपडतोय. म्हणून मला मित्र आहेत, तुम्हाला नाही.”

तो उठला व म्हणाला, “या माझ्या खिडकीसमोर. तुमचा फॉर्म मी आजच जमा करतो.” त्याने आमचे काम केले. नंतर त्याने माझा फोन नंबर मागितला, मीपण दिला.

मध्ये कित्येक वर्षे गेली….

अचानक रक्षाबंधनाच्या दिवशी एक फोन आला…

“साहेब, मी रविंद्रकुमार चौधरी बोलतोय. काही वर्षांपूर्वी तुम्ही तुमच्या मित्राच्या पासपोर्टसाठी आला होतात आणि माझ्या बरोबर जेवलापण होतात. त्यावेळी तुम्ही मला सांगितले होते की पैशांऐवजी नातेसंबंध जोडा. “

“हां हां ,चौधरी साहेब, आठवलं.बोला, कसे आहात तुम्ही?”

खुश होऊन तो म्हणाला, “साहेब, त्यादिवशी आपण निघून गेलात. मग मी खूप विचार केला. मला जाणवलं की खरोखर पैसे तर बरेच लोकं देऊन जातात, पण आपल्याबरोबर जेवणारा एखादाच भेटतो. दुसऱ्या दिवशी मी पत्नीच्या माहेरी गेलो व तिला आग्रह करून घरी घेऊन आलो. ती तयारच नव्हती. ती जेवायला बसली होती. तेव्हा मी तिच्या ताटातील एक पोळी उचलली व तिला म्हणालो,’ मला पण खाऊ घालशील का?’

ती चकित झाली, रडायला लागली. माझ्याबरोबर येण्यास तयार झाली. मुले पण आली.

साहेब, आता मी नुसता पैसे नाही कमवत..नाती जोडतो.

साहेब, आज तुम्हाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्याकरता फोन केला. कारण तुम्ही मला माणसं कशी जोडायची ते शिकवलं.

पुढच्या महिन्यात माझ्या मुलीचे लग्न आहे. तुम्हाला यावं लागेल, मुलीला आशीर्वाद द्यायला. आमच्याशी संबंध जोडलाय तुम्ही.”

तो बोलत राहिला, मी ऐकत राहिलो. मला वाटलं नव्हतं की त्याच्या जीवनात पैशांपेक्षा नातेसंबंधाना इतके महत्त्व प्राप्त होईल.

मित्रांनो, माणूस भावनेवर जगत असतो, नियमांवर नाही. नियमांवर तर मशीन चालतात.

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 253 ☆ श्रद्धा सुमन – रवि रतलामी :एक साथ ही हिंदी के तकनीकी कंप्यूटर दां, व्यंग्यकार और संपादक ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है आपका आलेख श्रद्धा सुमन – रवि रतलामी :एक साथ ही हिंदी के तकनीकी कंप्यूटर दां, व्यंग्यकार और संपादक )

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 254 ☆

? श्रद्धा सुमन – रवि रतलामी :एक साथ ही हिंदी के तकनीकी कंप्यूटर दां, व्यंग्यकार और संपादक  ?

स्व. रवि रतलामी

(जन्म ५ अगस्त १९५८, देहावसान ७ जनवरी २०२४)

वर्ष 2006 में ‘रवि रतलामी का हिन्‍दी ब्लॉग’ को माइक्रोसॉफ्ट भाषा इंडिया ने सर्वश्रेष्‍ठ हिन्‍दी ब्‍लॉग के रूप में सम्मानित किया था। यह समाचार मैंने टी वी पर देखा था। यह समय था जब हिन्दी ब्लागिंग अपने शैशव काल में थी। मैं मण्डला जैसे छोटे स्थान से बी एस एन एल के नेटवन फोन कनेक्शन से रात रात भर हिन्दी ब्लाग लिखा करता था, रात में इसलिये क्योंकि तब इंटरनेट की स्पीड कुछ बेहतर होती थी। स्वाभाविक था कि मेरा ध्यान भोपाल के इस माइक्रो साफ्ट से सम्मानित ब्लागर की ओर गया। इंटरनेट के जरिये उनका फोन ढ़ूंढ़ना सरल था, मैंने उन्हें फोन किया और हम ऐसे मित्र बन गये मानो बरसों से परस्पर परिचित हों। मैं तब विद्युत मण्डल में कार्यपालन अभियंता था, और रवि जी विद्युत मण्डल से स्वैच्छिक सेवानिवृति लेकर इंटरनेट में हिन्दी के क्षेत्र में भोपाल से फ्री लांस कार्य कर रहे थे। सरस्वती के पुजारियों की यह खासियत होती है कि वे पल भर में एक दूसरे से आत्मीयता के रिश्ते बना लेते हैं। मैं रवि जी से व्यक्तिगत रूप से बहुत अधिक नहीं मिला हूं पर हिन्दी ब्लागिंग के चलते हम ई संपर्क में बने रहे हैं। रवि जी रचनाकार नामक हिन्दी ब्लाग चलाते थे, जिसमें बाल कथा, लघुकथा, व्यंग्य, हास्य, कविता, आलेख, गजलें, नाटक, संस्मरण, उपन्यास, लोककथा, समीक्षा, कहानी, चुटकुले, ई बुक्स, विज्ञान कथा आदि शामिल होते थे। मेरी कुछ किताबें, नाटक, व्यंग्य, कवितायें, लेख, संस्मरण आदि रचनाकार में प्रकाशित हैं। प्रारंभ में रचनाकार में रवि जी ने यह व्यवस्था रखी थी की एक रचना जो नेट पर कहीं एक बार छपे उसका लिंक ही अन्य जगह दिया जाये बनिस्पत इसके कि अनेक जगह वही रचना बार बार प्रकाशित की जाये। पर बाद में इस द्वंद में माथा पच्ची करना बंद कर दिया गया था। रचनाकार का ट्रेफिक बढ़ाने के लिये हमने व्यंग्य लेखन को लेकर कुछ प्रतियोगितायें भी आयोजित कीं। पुरस्कार स्वरूप मेरी, मेरे पिताजी प्रो चित्र भूषण श्रीवास्तव जी की तथा अन्य लेखको की किताबें विजेताओ को प्रदान की गईं।

रवि जी ने कहीं लिखा है “जन्म से छत्तीसगढ़िया, कर्म से रतलामी. बीस साल तक विद्युत मंडल में सरकारी टेक्नोक्रेट के रुप में विशाल ट्रांसफ़ॉर्मरों में असफल लोड बैलेंसिंग और क्षेत्र में सफल वृहत् लोड शेडिंग करते रहने के दौरान किसी पल छुद्र अनुभूति हुई कि कुछ असरकारी काम किया जाए तो अपने आप को एक दिन कम्प्यूटर टर्मिनल के सामने फ्रीलांस तकनीकी-सलाहकार-लेखक और अनुवादक के ट्रांसफ़ॉर्म्ड रूप में पाया. इस बीच कंप्यूटर मॉनीटर के सामने ऊंघते रहने के अलावा यूँ कोई खास काम मैंने किया हो यह भान तो नहीं लेकिन जब डिजिट पत्रिका में पढ़ा कि केडीई, गनोम, एक्सएफ़सीई इत्यादि समेत लिनक्स तंत्र के सैकड़ों कम्प्यूटर अनुप्रयोगों के हिन्दी अनुवाद मैंने किए हैं तो घोर आश्चर्य से सोचता हूँ कि जब मैंने ऊँधते हुए इतना कुछ कर डाला तो मैं जागता होता तो पता नहीं क्या-क्या कर सकता था?”। वे स्वयं इतने सिद्ध कम्प्यूटर टेक्नोक्रेट थे कि उनका विकी पीडिया पेज तो सहज में होना ही चाहिये था, पर आत्म प्रशंसा और स्व केंद्रित व्यक्तित्व नहीं था उनका। वे सहज, सरल, और उदार व्यक्तित्व के सुलभ इंटेलेक्चुल मनुष्य थे। वे अचानक चले गये हैं, उनके साथ ही उनके मन में चल रहे ढ़ेरों कार्यो का भ्रूण पतन हो गया है। उनके अनेकानेक तकनीकी लेख भारत की प्रतिष्ठित अंग्रेज़ी पत्रिका आईटी तथा लिनक्स फॉर यू, नई दिल्ली, भारत (इंडिया) से प्रकाशित हो चुके हैं। हिंदी कविताएँ, ग़ज़ल, एवं व्यंग्य लेखन उनकी रुचि की विधायें थीं। उनकी रचनाएँ हिंदी पत्र-पत्रिकाओं दैनिक भास्कर, नई दुनिया, नवभारत, कादंबिनी, सरिता इत्यादि में प्रकाशित हो चुकी हैं। हिंदी दैनिक चेतना के पूर्व तकनीकी स्तंभ लेखक रह चुके हैं। वे अभिव्यक्ति पोर्टल के लिए विशेष रूप से ‘प्रौद्योगिकी’ स्तंभ लिखते रहे हैं। हिंदी की सर्वाधिक समृद्ध आनलाइन वर्गपहेली का सृजन भी उनका महत्वपूर्ण कार्य था।

आन लाइन सोशल मीडिया पर स्व संपादसित लेखन का सफर आरकुट, हिन्दी ब्लागिंग, फेसबुक, इंस्टाग्राम वगैरह वगैरह प्लेटफार्म से शिफ्ट होते हुये व्हाट्सअप तक आ पहुंचा है। पर बोलकर लिखने की सुविधा, यूनीकोड हिन्दी के अंतर्निहित तकनीकी पक्षो को जिन कुछ लोगों ने आकार दिया है उनमें रविशंकर श्रीवास्तव उर्फ रवि रतलामी का भी बड़ा योगदान रहा है। वे जितने योग्य तकनीकज्ञ थे उससे ज्यादा समर्थ संपादक भी थे, और कहीं ज्यादा बड़े व्यंग्यकार। रचनाकार में उन्होंने समकालीन अनेकानेक व्यंग्यकारो को समय समय पर प्रकाशित किया है। रचनाकार में प्रकाशित व्यंग्यकारो कि सूची में राकेश सोहम, हनुमान मुक्त, प्रदीप उपाध्याय, राम नरेश, अनीता यादव, राजीव पाण्डेय, सुरेश उरतृप्त, वीरेंद्र सरल, ओम वर्मा, विवेक रंजन श्रीवास्तव से लेकर नरेंद्र कोहली, यशवंत कोठारी, प्रेम जनमेजय तक कौन शामिल नहीं है। जहां तक रवि जी के व्यंग्य लेखन का प्रश्न है उन्होंने सक्षम व्यंग्यकार के रूप में अपनी छबि बनाई थी। उनकी किताब व्यंग्य की जुगलबंदी अमेजन किंडल पर उपलब्ध है। जिसमें शामिल कुछ व्यंग्य शीर्षक हैं ” आपका मोबाइल ही आपका परिचय है, बापू की लखटकिया लंगोटी, नोटबंदी, जीडीपी और आर्थिक विकास, बाबागिरी, तकनीक और हवापानी, असली अफवाह, गठबंधन की बाढ़, चीनी यात्री ट्रेनत्सांग की वर्ष 2000 की भारत यात्रा, जीएसटी बनाम, भारतीय खेती की असली कहानी, साहित्यिक खेती, टॉपरों से भयभीत, मानहानि के देश में, बिना शीर्षक, मेरा स्मार्टफोन कैसा हो? बिलकुल इसके जैसा हो…., कड़ी निंदा पर कुछ नोट शीट्स, लाल बत्ती में परकाया प्रवेश, ईवीएम में छेड़छाड़ के ये है पूरी आईटीयाना तरीके, लेखकीय और साहित्यकीय मूर्खता, आपने कभी गरमी खाई है ?, जम्बूद्वीप में सन् ३०५० के चुनाव के बाद, आधुनिक अभिव्यक्ति और एक व्यंग्य है “बुढ़ापे या बीमारी से नहीं मैं मरा अपनी शराफत से” सचमुच उनका दुखद देहावसान बुढ़ापे या बीमारी से नही अचानक हार्ट अरेस्ट से हो गया . रवि रतलामी जी के कार्यों का मूल्यांकन हिन्दी जगत को करना शेष ही रह गया और वे हमसे बिछड़ गये। उन्हें तकनीकी जगत, ब्लागिंग की दुनियां, व्यंग्य जगत और हिन्दी जगत के नमन।

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

सेवानिवृत मुख्य अभियंता

ए 233, ओल्ड मिनाल रेजीडेंसी भोपाल 462023

मोब 7000375798

ईमेल [email protected]; [email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणीतील संक्रांत… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

आठवणीतील संक्रांत… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

कार्तिक महिन्यातील दिवाळीला सुरू झालेली थंडी पौष महिन्यात अजूनच वाढायची.

ठिकठिकाणी पहाटे पहाटे शेकोट्या पेटायच्या.पावट्यांच्या मोहराचा अन शेंगांचा घमघमाट सगळ्या रानातून दरवळत असायचा.करड्याची लुसलूस रोपे टच्च भरलेल्या हरभऱ्याच्या डहाळ्याना सोबत करायचे.दाट धुक्यात शेते शिवारे गुडूप व्हायची,गव्हाची शेते हिरव्यागार ओंब्या डोक्यावर घेऊन आनंदात डोलायची,शाळूची हिरवीगार ताटे एका पानावर येऊन टपोरी कणसे प्रसवायच्या तयारीत असायची,आंब्याचे मोहोर मधमाशांना न् कीटकांना धुंद करायचे आणि या निसर्गाच्या आगळ्या वेगळ्या सोहळ्यात हळूच संक्रांत सामील व्हायची.

संक्रांतीला पंधरा तीन आठवडे  राहिले असताना कोकणपट्ट्यातून (बहुतेक)संक्रातीच्या(नव्या मडक्याच्या)बैलगाड्या भिलवडी नाक्यातून गावात प्रवेश करायच्या.भिलवडी नाक्यातच आमची शाळा असल्याने आम्हाला त्या येताना दिसायच्या आणि संक्रांत जवळ आल्याची जाणीव व्हायची. खूप खूप आनंद व्हायचा.

तीन -चार गाड्या शिगोशिग भरून त्यावर भाताचे काड आणि जाळी लावून हळू हळू चालत चालत त्या इतक्या लांब प्रवास करत.गाडीच्या उभ्या दांडीवर गाडीवान बसायचे,त्याच दांडीखाली कापडाची किंवा पोत्याची मोठी खोळ ,त्यात चार स्वैपाकाची भांडी असायची .बाजूला एक कंदील लटकवलेला असायचा आणि कधी पुढं तर कधी बरोबर  त्यांचे पाळीव कुत्रेही इतक्या लांबून चालत चालत यायचे. बैलांच्या गळ्यातील घुंगरू संथ चालीत खूळ खूळ नाद करत वाजायची. एक गाडी नाक्यातच मोकळ्या मैदानात उतरायची,एक आमच्या घरामागच्या मोकळ्या मैदानात आणि दोन गावात कुठेतरी थांबत असत.आम्ही लहान असल्याने त्यांचे नेमके ठिकाण माहीत नाही.वर्षानुवर्षे या गाड्या त्याच ठराविक ठिकाणी थांबायच्या; किती वर्षांपासून त्या येत होत्या माहीत नाही पण कळत्या वयापासून आम्ही त्या पहात होतो.

आमची शाळा सकाळ सत्रात असायची .शाळा सुटून घरी आलो की दप्तर टाकून गाडीजवळ जायचो.भाताच्या काडात अलवार  शिगोशिग भरलेल्या गाडीवर जाळे लावून करकचून बांधलेलं असायचं जेणेकरून मडक्यांना तडा जाऊ नये.इतक्या लांबून बिचारे जपून गाडी हळुवार चालवत येत असणार कारण वर्षभराचे पोटाचे साधन होते त्यांचे.सहा-सात महिने खपून,गाळलेला घाम होता तो.गाडी सोडून, बैल बांधून कुंभार विश्रांती घेई.गाडीशेजारीच कुत्रे धापा टाकत बसून असे.कुंभारासोबत अजून एखादे नातेवाईक असे.क्वचितच एखादे ७-८वर्षाचे पोर असे पण स्त्रिया कधीच येत नसत.एका गाडीबरोबर दोन किंवा तीन पुरुष असत.हडकुळी शरीरयष्टी ,पांढरा ढगळा अंगरखा,गुडघ्यापर्यंत घातलेली खाकी ढगळ चड्डी आणि पांढरी टोपी इतकाच वेष असायचा त्यांचा.

उन्ह कलतीला लागली की गाडीवरील जाळी हळुवार काढून काड बाजूला सारत एक एक मडके बाजूला काढून गाडीजवळ मांडून ठेवत.पाच पाच छोट्या मोठ्या संक्रांतीचे(मडक्यांचे)गट,तांबड्या मातीच्या,काळ्या मातीच्या चुली,उभट -गोल करंड्या ,बिश्या(पैसे साठवण्यासाठी मातीची वस्तू) अशी कितीतरी आकाराची वेगवेगळी मातीची भांडी त्यांनी आणलेली असत.मडक्यांची काळी सोनेरी झाग सगळ्या हाताला लागायची.मला उत्सुकता असायची ती बोळकी,बिशी आणि छोट्या पाणी भरायच्या कळशीची.

मडकी मांडून झाली की मग शेजारीच ते तीन दगडांची चूल मांडत.चिपाड,चगाळ घालून चूल पेटवत.गाडीला केलेल्या खोळीतून जर्मनची पातेली, ताटल्या,बाजूला काढून घेत ;मग चुलीवर चहा ठेवत.चहा  पिऊन त्याच चुलीवर एका पातेल्यात भात शिजत घालत आणि आसपासच्या चार घरातून कालवण मागून आणत. भातात ते कालवण कालवून खात आणि शेजारच्याच गोठ्यात झोप न विश्रांती घेत.

गाडी आलेली माहिती झाली की बायका खण (५मडक्यांचा समूह)ठरवायला यायच्या.खणाव्यतिरिक्तही बरेच काही घ्यायच्या.बेटकं घालायला उभट बरणी,बी बेवळा राखेत घालायला मोठं गाडगं, चूल जुनी झाली असेल तर चूल. गरजेनुसार वस्तूंची बेरीज व्हायची मग सौदा व्हायचा.हा सौदा पैशावर नसायचा तर ज्वारीवर असायचा,अडशिरी पासून पायली,दीड पायली,दोन पायली.वस्तूच्या संख्या व आकारावर हा सौदा असे.

हे लोक कधीच पैसे घेऊन खण किंवा इतर वस्तू विकत नसत.चुकूनच ज्यांच्याकडे ज्वारी मिळणार नाही अशांकडून पैसे स्वीकारत.जसजशी संक्रात जवळ येई तसतशी बायकांची खरेदीला लगबग सुरू व्हायची.

आठ दिवसांवर संक्रांत आली म्हणजे कासारीण बांगड्या विकायला गल्लोगल्ली फिरायची.संक्रातीला नवीन बांगड्या मिळायच्याच हमखास! त्याआधी कुठल्या आवडल्यात त्या हेरून ठेवायच्या आणि मग तिला बोलावून त्या आवडीच्या बांगड्या घ्यायच्या.

ववसायला नवी काकण पायजेतच! म्हणून बायका हातभर बांगडया चढवायच्याच.अगोदरच्या नवीन असल्या तर मग दोन रेशमी का होईना पण नवीन बांगड्या संक्रातीला चढवायच्याच .

संक्रात आली की शाळेतल्या पोरी आपापल्या मैत्रिणींना संक्रात भेट द्यायच्या.गंधांची गोल बाटली,प्लास्टिक टिकल्या,रंगीत चाप ,डिस्को रबर.ही देवाणघेवाण फक्त आपल्याला कुणी भेट दिली तरच तिला द्यायची, नाही दिली तर आपली भेट मग परत मागून घ्यायची! किती मजेशीर  शाळकरी दिवस होते ते!

संक्रांत दोन दिवसांवर येऊन ठेपायची.दुकानातून चार आणे किंवा आठ अण्यांची मेंदी आणायची मग लिंबू ,काथ घालून मेंदी भिजत घालायची आणि रात्री डाव्या हाताने उजव्या आणि उजव्याने डाव्या तळहातावर गुलाच्या काडीने मेंदीचे गोल गोल ठिपके द्यायचे.सकाळी उठल्यावर त्यातली निम्मिअर्धी सुकून पडलेली असायची.उरलेल्या मेंदीवर खोबरेल तेलाचे थेंब टाकून दोन्ही तळहात एकमेकांवर चोळून उरलेली मेंदी पण काढून टाकायची मग हात लालभडक दिसायचे.

भोगीच्या आदल्या दिवशी मग कुणाच्यात पावटा ,कुणाच्यातला हरभरा ,ऊस ,शेतातले तीळ,राळे,बोरे,गाजरे, कांदा-लसणाची पात एकमेकींना देवाणघेवाणवाण करायच्या.तिघी चौघी मिळून अंगणात गप्पा मारत पावटा ,हरभरा सोलत बसायच्या.शेतातून हरभऱ्याचे भारेच्या  भारे आणायचे आणि शेजारी पाजारी वाटायचे.आंबट गोड गोल गोल बोरे म्हणजे आमचे विक पॉईंट! बांधावरच्या बोरी सर्वांगावर बोरांचे भार वागवत झुकून जात.हिरवी -पिकली बोरे पाटीने असायची त्यातली पसा पसा बोरे आसपास सगळ्यांनाच मिळायची.शेतातल्या असल्या सगळ्या वस्तुंचीच देवाण घेवाण व्हायची.प्लास्टिक वस्तू आणि इतर गोष्टींचे वाण लुटायची पद्धत नैसर्गिक वस्तूंच्या  देवाणघेवाणीत कधी घुसली काय माहीत!

भोगी दिवशी मग पहाटे लवकर उठून सवाष्णी न्हाऊन एकमेकींच्या घरात जाऊन हळदी कुंकू लावून यायच्या आणि मग भोगीच्या कालवणाला चुलीवर फोडणी बसायची.बाजरीची भाकरी,भोगी आणि राळ्याचा भात खाऊन सुस्ती यायची.

ज्या दिवसाची वाट पहात असू तो संक्रांतीचा दिवस शेवटी यायचाच. पोळ्या करून,ठेवणीतली पातळ नेसून बायकांच्या झुंडीच्या झुंडी हातात एकावर एक मडकं घेऊन ववसायला गल्लीभर फिरायच्या .प्रत्तेकीच्या अंगणात  तुळशीपाशी जाऊन एकमेकींना ववसायच्या .तिळगुळाची देवाणघेवाण व्हायची .गुलालाने भांग भरून केस गुलाबी रंगात न्हाऊन निघायचे.

दिवसभर गल्लीत हिंडून संध्याकाळी खिशात तिळगुळाची डबी घेऊन सगळ्या बाई आणि गुरुजींची घरे पालथी घालून तिळगुळ देऊन मगच घरला यायचे.शाळेत मारणारे,ओरडणारे बाई -गुरुजी तिळगुळ द्यायला गेल्यावर मात्र गोड-मवाळ व्हायचे.

दुसऱ्या दिवशी वर्गातल्या मुलींना आणि उरल्यासुरल्या शिक्षकांना तिळगुळ देऊन राहिलेले तिळगुळ स्वाहा व्हायचे.सगळ्या वरांड्यात ,वर्गात इथंतिथं सांडलेले तिळगुळ संक्रात संपल्याची जाणीव करून देत.

संक्रांत झाली की मैदानात उतरलेली ती संक्रातीची गाडी आवराआवर करू लागायची.उरली सुरली,तडा गेलेली मडकी,जमा झालेली ज्वारीची पोती गाडीत घालून गाड्या परतीच्या प्रवासाला लागायच्या.

काळ बदलला.घरे आधुनिक झाली .चुली जाऊन गॅस आले.मडक्यांची उतरंड अडगळ होऊन हद्दपार झाली.पारंपरिक शेती संपली. चूल गेली ,राख नाही आणि मग उतरंडीतला राखेत ठेवलेला बी बेवळा पण इतिहास जमा झाला.

संक्रातीच्या गाड्या कधीपासून यायच्या बंद झाल्या काही कळलेच नाही.काकणांची दुकाने ठिकठिकाणी झाली,कासारणीकडून काकण घालून घ्यायची गरज उरली नाही.हातभर काकण भरायची पद्धत जुनी झाली आणि आपसूकच संक्रातीला नवीन बांगड्या भरायची पद्धतही जुनी झाली.

भोगीच्या वस्तूंचे बाजार भरू लागले,शेते आधुनिक झाली ,मने संकुचित झाली.शेजार पाजार आकसला. पावटा, हरभरा, ऊस ,बोरे,तीळ देवाण घेवाण बंद झाली. तीळ तर शेतात लावणेच बंद झाले !

प्लास्टिक वस्तू आणि तशीच छोटी स्टील भांडी वाण म्हणून दिली घेतली जाऊ लागली आणि संक्रातीच्या सणातला नैसर्गिक गुळाचा गोडवा जाऊन कृत्रिम साखरेच्या गोडीने प्रवेश केला.

” तिळगूळ घ्या ….गो ss ड बोला !”

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

आज 31 डिसेंबर 2023, उद्या एक जानेवारी 2024… दोन दिवसातलं अंतर फक्त 24 तासंच…. या दिवसापासून त्या दिवसाकडे पोहोचायला मात्र वर्षभर वाट पहावी लागली… ! 

शिखरावर जाऊन झेंडा रोवायचं काम फक्त एक मिनिटाचं… पण त्यासाठी जीव धोक्यात घालून अख्खा डोंगर चढायला लागतो, तसंच काहीसं हे…! 

झेंडा रोवण्यापेक्षा जीव धोक्यात घालून तुम्ही कसे चाललात हे जास्त महत्त्वाचं….! 

किनाऱ्याशी आल्यावर, किनारा आणि नाव यामध्ये अंतर फक्त एका पावलाचं असतं… पण त्या अगोदर अख्खी नदी पालथी घालताना; वल्ही मारून धाप लागलेली असताना, तुम्ही कसे तरलात हे जास्त महत्त्वाचं…!!

एखाद्या ठिकाणी पोचण्यापेक्षा, पोचण्यासाठी केलेला प्रवास, वाटेत आलेल्या अडचणींचा सामना म्हणजे आयुष्य…! 

आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? तर ज्ञान आणि भान… 

कोणत्या वेळी काय करावं, याचं “भान”म्हणजे “ज्ञान”…

आणि कोणत्या वेळी काय करू नये, याचं “ज्ञान” म्हणजे “भान”…! 

गाडी जोरात पळवायची असेल तर काय महत्त्वाचं ?एक्सीलेटर ??…मुळीच नाही…! 

गाडी जोरात पळवायची असेल, तर सर्वात महत्त्वाचा असतो तो ब्रेक…! 

निष्णात ड्रायव्हर, गाडी सुरू केल्यानंतर पहिल्यांदा चेक करतो तो ब्रेक…

थांबण्याची खात्री असेल, तरच त्या जोरात पळण्याला अर्थ आहे…  ब्रेकच नसेल तर पुढे जाऊन आदळणार हे नक्की…

गाडी चालवणं हे झालं “ज्ञान” आणि योग्य वेळी ब्रेक दाबून थांबणं हे झालं “भान”…! 

ज्ञान आणि भानाचं समीकरण एकदा कळलं की आयुष्यातलं गणित सोपं होवुन जातं….

ज्ञान असूनही भान हरवलेली किंवा भान असूनही ज्ञान नसलेली अनेक मंडळी या वर्षभरात मला भेटली… अनेक भले बुरे अनुभव आले आणि मी त्यातून समृद्ध होत गेलो. 

अनेक भल्या भुऱ्या गोष्टी या वर्षाने माझ्या झोळीत घेत गेलो….

डिसेंबर महिन्यात आपल्या साथीने घडलेल्या घटनांचा हा लेखाजोखा आपणास सविनय सादर…

भिक्षेकरी ते कष्टकरी

  1. थंडीसाठी स्वेटर विणायला घ्यावं आणि थंडी निघून गेली तरीही काही कारणानं ते अपूर्णच राहावं… अशी अनेक अपूर्ण आयुष्यं आजूबाजूला दिसतात…

अशीच एक प्रौढ महिला….

बालपण आणि तरुणपण काबाडकष्ट करून आई-वडिलांना जगवण्यात गेलं…. कालांतराने आई वडील गेले; पुढे हिला अपंगत्व आलं. 

कुणी नोकरी देईना आणि स्वतःचा व्यवसाय टाकण्यासाठी भांडवल नाही…. शेवटी नाईलाजाने जगण्यासाठी शनिवार वाडा परिसरात भीक मागायला सुरुवात केली. 

28 डिसेंबर रोजी छप्पर असलेली एक हातगाडी आणि विक्री योग्य सामान तिला घेऊन दिले आहे, ती आता त्या गाडीत बसून व्यवसाय करुन सन्मानानं जगते आहे. 

चला, बऱ्याच वर्षांपासून अपूर्ण राहिलेलं स्वेटर आज तुम्हा सर्वांच्या साथीने या थंडीत विणून पूर्ण झालं….! 

  1. चार अंध ताईं आणि एक दादा यांना या महिन्यात नवीन वर्षाचे कॅलेंडर विकायला दिले. यांचं”न्यू इयर”…” हॅप्पी” करण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न…!
  2. सध्या जातीवरून”राजकारण” सुरू आहे, आम्ही जातींचा उपयोग करुन”समाजकारण” करत आहोत…

चर्मकार समाजाचे एक आजोबा रस्त्यात भीक मागत आयुष्य जगत होते, त्यांना चप्पल विक्रीचा व्यवसाय टाकून दिला आहे…. 

नाभिक समाजाचे दुसरे आजोबा रस्त्यावर भीक मागत होते, त्यांना केश कर्तन आणि दाढी कटिंगचा व्यवसाय टाकून दिला आहे…. 

ज्या ठिकाणी हे लोक भीक मागतात…. शक्यतो त्याच ठिकाणी मी त्यांना व्यवसाय टाकून देतो…. 

ज्या मातीत हजारदा आयुष्याची कुस्ती हरलो…. त्याच मातीत, त्याच जागेवर जिंकण्याची नशा काही और असते…! 

जमिनीला पाठ लागली म्हणुन कुणी हरत नसतं… पडूनही न उठणं म्हणजे हरणं….! 

वरील आठही व्यक्तींच्या चेहऱ्यावरचं समाधान घेवून आम्ही 31 डिसेंबर साजरा करत आहोत. 

आयुष्यातलं आणखी एक वर्ष संपलं…. ???  संपू दे…. . पर्वा कुणाला….? 

आठ नवीन आयुष्यं उभी राहिली या नशेत आम्ही अजून झुलतो आहोत…! 

– क्रमशः भाग पहिला  

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares