मराठी साहित्य – विविधा ☆ ‘स्वामी विवेकानंद-ज्योतिर्मय आदर्श’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

‘स्वामी विवेकानंद-ज्योतिर्मय आदर्श’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार वाचकांनो!

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याचे निमित्य साधण्यासाठी हा लेख आहेच! पण या वर्षाच्या नूतन लेखासाठी माझे आदर्श स्वामी विवेकानंदांविषयी लिहिण्याची संधी मिळणे यापेक्षा दुसरे औचित्य कांहीच असू शकत नाही. आपण ‘स्वामी’ या नावाचा उच्चार करताक्षणी आपल्या डोळ्यासमोर भगव्या वस्त्रांकित, एकाकी जंगलात किंवा गुहेत कठोर तपश्चर्या करणारे एखादे व्यक्तिमत्व उभे राहते! जाणून बुजून स्वीकारलेल्या अशा विजनवासाचे कारण असते, या नश्वर जगातील मायेच्या मोहपाशातून मुक्ती शोधत ईश्वर प्राप्तीचे! 

पण मंडळी याला एक अपवाद स्मरतो, स्वामी विवेकानंद, हिंदू धर्माच्या समृद्ध संकल्पनेचे महान वैश्विक दूत! ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजेच संपूर्ण वसुधा किंवा विश्व हे एका कुटुंबासारखे आहे, हा मौलिक आणि अमूल्य संदेश जगाला देणारे खरे खुरे जागतिक नेते! मैत्रांनो, आजच्या पवित्र दिनी अर्थात, १२ जानेवारीला या महान वैश्विक नेत्याची जयंती आहे. १८६३ साली या तारखेला कोलकाता येथे जन्मलेल्या, ‘ईश्वराबद्दल पूर्ण अविश्वासी’ अशा अत्यंत जिज्ञासू नरेंद्रनाथ दत्त (स्वामीजींचे पूर्वीचे नाव) हे अनेक ज्ञानी लोकांना आणि संतांना प्रश्न विचारायचे, “तुम्ही ईश्वर पाहिलाय कां?” दक्षिणेश्वर मंदिरातील ‘काली माँ’ चे प्रखर, अनन्य भक्त, महान संत, स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्याकडून मात्र एकमेव ‘हो’ असे उत्तर आले आणि मग गुरू आणि शिष्याचा लौकिक अणि पारलौकिक असा ऐतिहासिक समांतर प्रवास सुरू झाला. यांत नरेंद्रला देवी माँ आणि त्याच्या परम गुरूंचे शुभाशीर्वाद आणि मोक्षप्राप्ती मिळती झाली.

स्वामीजी महान भारतीय संन्यासी आणि महान तत्वज्ञानी होते. १९ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथे जागतिक धर्माच्या संसदेत, विवेकानंदांचे सुप्रसिद्ध भाषण म्हणजे ‘हिंदू धर्म आणि आंतरधर्मीय संवादाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक आणि प्रभावशाली क्षण’ होता हे स्पष्टपणे दिसून आले. जेव्हां इतर सर्व धार्मिक नेते अत्यंत औपचारिकपणे ‘सभ्य स्त्री पुरुषहो!’ म्हणून उपस्थितांना संबोधित करत होते, तेव्हां ब्रिटिश भारताच्या या युवा आणि तेजस्वी प्रतिनिधीने उपस्थित ७००० हून अधिक प्रतिष्ठित सभाजनांना ‘माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो’ असे प्रेमभराने संबोधित केले. धर्म, वंश, जात अन पंथ ही सर्व बंधने झुगारून या अलौकिक बुद्धिमत्तेच्या स्वयंप्रकाशित तरुणाने मानवतेच्या समान धाग्याने सभागृहातील प्रत्येक व्यक्तीशी अनवट नातं जोडलं. त्यानंतर तीन मिनिटांहून अधिक काळ हे सर्वस्वी परके लोक त्याला टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद देते झाले यात नवल ते काय? म्हणून त्याला भाषणासाठी दिलेला अल्पावधी मोठ्या आनंदाने वाढवला गेला.या प्रथम दिव्य भाषणाचे अनोखे प्रतीक म्हणून ‘दि आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो’ मध्ये आजही हे ‘४७३ प्रकाशमय शब्द’ अभिमानाने प्रदर्शित केला जात आहेत. या एका भाषणाने जणू या तेजस्वी भारतपुत्राने अखिल जग पादाक्रांत केले आणि नंतर जगभरातील अनेक ठिकाणी त्याला अति सन्मानाने मार्गदर्शन वक्ता म्हणून आमंत्रित केले गेले.

अतीव आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या या पहिल्या भाषणात स्वामीजी म्हणाले होते, ‘धर्म हा भारताचा अग्रक्रम नाही, तर गरिबी आहे!’ आपल्या गरीब भारतीय बंधुबांधवांची हर तऱ्हेने उन्नती व्हावी हे त्यांचे मूलभूत लक्ष्य होते. याच सामाजिक कारणासाठी ‘रामकृष्ण मठ’ आणि ‘रामकृष्ण मिशन’ ची स्थापना करण्यात आली. हे मिशन जगातील २६५ केंद्रांद्वारे (२०२२ च्या आकडेवारीनुसार भारतात अशी १९८ केंद्रे आहेत) गरजू लोकांना सेवा पुरवते. धार्मिक प्रवचनांच्या पलीकडे जाऊन या संस्था बरेच कांही करतात. हे मिशन स्वामीजींचे स्वप्न पुढे नेण्यासाठी, तळागाळातील जनतेची सेवा करण्यासाठी नेहमीच अग्रस्थानी असते. स्वामीजी आणि त्यांच्या शिष्यांच्या विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या साहित्याद्वारे या उद्दिष्टांचा प्रचार आणि प्रसार करण्यात येतो. मिशनद्वारे चालवण्यात येणारी धर्मादाय रुग्णालये, फिरते दवाखाने आणि प्रसूतीकेंद्रे भारतभर विखुरलेली आहेत. तसेच मिशनची परिचारिकांसाठी प्रशिक्षण केंद्रे, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम देखील आहेत. हे सामाजिक कार्य ग्रामीण आणि आदिवासी कल्याण कार्यासोबत समन्वय साधीत अव्याहतपणे सुरु आहे. शाळांमध्ये शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश, अल्पाहार आणि पुस्तके दिली जातात.

मानवतेची मूर्तिमंत प्रतिमा, निस्वार्थी सामाजिक नेते आणि हिंदू धर्माचे कट्टर अनुयायी असलेल्या स्वामीजींनी प्रत्येक भारतीयात देव पाहिला. त्यांनी संपूर्ण देशाचा पायी प्रवास केला. जनतेशी जवळीक साधत त्यांनी भारतीयांचे प्रश्न समजावून घेतले, आत्मसात केले अन त्यांच्या या प्रश्नांचा गुंता सोडवण्यात आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. त्यांचे दिव्य प्रतिभासंपन्न गुरु परमहंस यांच्या सांगण्यावरून त्यांनी हा संपूर्ण भारत-प्रवास केला. परमहंसांनी स्वामीजींना बहुमोल सल्ला दिला होता, “हिमालयाच्या गुहांमध्ये ध्यान करीत केवळ स्वतःची मुक्ती साधण्यापेक्षा भारतातील सकल गरीब लोकांची सेवा कर.” आपल्या गुरूंची आज्ञा शिरोधार्य मानीत प्रकृती अस्वास्थ्य असतानाही विवेकानंदांचे हे सेवाव्रत सुरूच होते. स्वामीजी ४ जुलै १९०२ रोजी वयाच्या जेमतेम ३९ व्या वर्षी बेलूर मठ, हावडा येथे महा-समाधीत लीन झाले. 

मैत्रांनो, स्वामीजींच्या प्रेरणादायी उद्धरणांची वारंवार आवर्तने होता असतात. त्यांपैकीच माझ्या आवडीची त्यांची काही अनमोल वचने उद्धृत करते:

*परमेश्वराची लेकरे असल्याचा आत्मविश्वास

“तू सर्वशक्तिमान आहेस. तू कांहीही आणि सर्व काही करू शकतोस”

*आत्मचिंतन

“दिवसातून किमान एकदा स्वत:शी बोला, नाहीतर तुम्ही या जगातील एका बुद्धिमान व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल”

*अडथळे आणि प्रगती

“ज्या दिवशी तुम्हाला कोणतीही समस्या भेडसावत नाही, तेव्हा तुम्ही खात्री बाळगू शकता की, तुम्ही चुकीच्या मार्गाने प्रवास करत आहात”

प्रिय वाचकांनो, आजच्या या विशेष दिनी भारताचे महान सुपुत्र, प्रभावशाली तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि संपूर्ण जगाला वंदनीय असलेले वेदांताचे विश्व प्रचारक अशा स्वामी विवेकानंदांच्या स्मृती-चरणी विनम्र प्रणाम करून त्यांचे प्रेरणादायी तत्वज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करू या!

धन्यवाद🙏🌹

©  डॉ. मीना श्रीवास्तव

दिनांक-१२ जानेवारी २०२४

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ किरण शलाका… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ किरण शलाका… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

आज मलाही वाटलं  नभातून खाली उतरून यावे. तुझे चरण स्पर्शाने पवित्र व्हावे.. नेहमीच तुझ्या अवतीभवती असतो लता तरूंचा घनदाट काबिला,  श्वापदांच्या पदभाराने  त्या भुईवरची पिकली पानांचा नाद कुरकुरला..विविध रानफुलं नि पर्णांच्या  गंधाचा परिमळाचा अत्तराचा फाया कुंद हवेत दाटून बसला..पान झावळी अंधाराच्या कनातीत सुस्त पहुडलेला असतो धुक्याचा तंबू.. गगनाला भेदणारे इथे आहेत एकापेक्षा एक उंच च्या उंच बांबू.. विहंग आळवती सूर संगिताचे आपल्या मधूर कंठातून शाखा शाखा  पल्लवात दडून..दवबिंदुचे थेंब थेंब ओघळती टपटप नादाची साथ साधती  त्यासंगितातून…  तुझे ते वरचे शेंड्याचे टोक बघायला  रोजच मिळत असते मजला.. किती उंच असशील याचा अंदाज ना बाहेरून  समजला… नभ स्पर्श करण्याची तुझी ती महत्त्वकांक्षा पाहून मी देखील निश्चय केला आपणही जावे तुझ्या भेटीला आणि व्हावे नतमस्तक तुझ्या पुढे… सोनसळीच्या किरणाचे तुझ्या पायतळी घालावे सडे…अबब काय ही तुझी ताडमाड उंची..त्यावर काळाकुट्ट अंधाराची डोक्यावरची कुंची..किती थंडगार काळोखाचा अजगर वेटोळे घालूनी बसलाय तुला.अवतीभवती तुझ्या हिरव्या पिवळ्या पानांफुलाचा पडलाय पालापाचोळा.. कुठला दिवस नि कुठली रात्र याचे भान असे का तुला.जागं आणण्यासाठी रोजच यावे तुझ्या भेटीला  वाटे मजला.बघ चालेल का तुला? एक नवचैतन्य लाभेल मजमुळे तुजला..? प्रसन्नतेची हिरवाई हरखेल नि हसवेल तुझ्या भवतालाला.. पिटाळून लावेल तुझ्या उदासीपणाला.. मग बघ असा मी रोजच येत जाईन चालेल का तुला?.

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गानसरस्वती… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ गानसरस्वती… ☆ श्री विश्वास देशपांडे

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्याबद्दलचा एक किस्सा नुकताच वाचनात आला. बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुण्यातील एका सभागृहात किशोरीताईंचे गाणे सुरु होते. कार्यक्रम नुकताच सुरु झाला होता आणि साऊंड सिस्टीम बिघडली. संयोजकांनी बरेच प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. ताई स्टेजवरून उठून गेल्या. श्रोत्यांमध्ये कुजबुज सुरु झाली. आता काय होईल ? दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली. कोणी म्हणाले ताईंचा स्वभाव विचित्र आहे. कोणी म्हणाले त्या स्वतःला फार ग्रेट समजतात. ज्याला जे वाटले ते तो बोलू लागला. शेवटी कोणी तरी बराच प्रयत्न करून साऊंड सिस्टीम सुरु केली. ताई आतमध्ये होत्या. कोणीतरी भीतभीतच त्यांना सांगितले की साऊंड सिस्टीम सुरु झाली आहे.

ताई आल्या. त्यांनी गायला सुरुवात केली. हळूहळू मैफलीत रंग भरू लागला. उत्तरोत्तर मैफल अधिकाधिक गहिरी होत गेली. ताईंचा स्वर सप्तकातून सहज विहार करू लागला. जणू आपल्या गायनातून त्यांनी अनंताचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांची गानसमाधी लागली. त्यांच्याबरोबर श्रोते देखील स्वरांच्या पावसात चिंब झाले होते. ताईंच्या सुरात भक्तीभाव होता, बेहोशी होती, माधुर्य होते. आणि त्या सगळ्यांच्या पलीकडे जाणारे आणखी काहीतरी होते. अनंताची आराधना होती. सुरांच्या माध्यमातूनच त्या अनंताचा शोध घेत होत्या. त्यामागे त्यांची खडतर तपश्चर्या होती. आणि अशी खडतर साधना करणाऱ्या साधकाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो की ज्या क्षणी त्याचा आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो. मी आणि तू वेगळे नाहीतच. माझ्यातच तू आहेस आणि तुझ्यातच मी आहे असा साक्षात्कार साधकाला होतो. तशी ताईंची गानसमाधी लागली होती. पण आपल्यासवे त्या श्रोत्यांना देखील त्यांनी त्यात सामील करून घेतले होते.  त्यांचा ‘ स्व ‘ विश्वव्यापक झाला होता. हळूहळू त्या समेवर आल्या. श्रोते सुरसागरात डुंबत होते. पाच मिनिटांनी टाळ्यांचा कडकडाट झाला.

अशी ही गानसरस्वतीची गानसमाधी. मला त्यांचा हेवा वाटला. आणि माझेही मन नकळत त्यांच्या तपश्चर्येपुढे लीन झाले. मी त्यांना मनोमन प्रणाम केला. आपण जो काही जीवनमार्ग निवडला आहे त्याच्याप्रती केवढे हे उच्च प्रतीचे समर्पण ! पुन्हा त्यामध्ये स्वार्थाची भावना नाही, हाव नाही, कुठलीही अपेक्षा नाही. ताई कोणासाठी गात होत्या ? म्हटले तर सर्वांसाठी आणि म्हटले तर कोणासाठीच नाही ! त्या गात होत्या आनंदासाठी. आणि हा आनंद श्रोत्यांनाही त्यांनी भरभरून वाटला. त्या आनंदाचे झाड झाल्या. सुरांच्या कल्पवृक्षाला आनंदाची फळे लागली. वृक्ष फळभाराने झुकला. सप्तसुरांची मधुर फळे त्या वृक्षाला लागली. ज्याला हवे त्याने यावे आणि मधुर फळांची गोडी चाखावी.

गीतरामायणातले ग.दि.मांचे शब्द आणि बाबूजींचे स्वर नकळत कानात घुमू लागले.

          सात स्वरांच्या स्वर्गामधुनी

          नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी

          यज्ञ मंडपी आल्या उतरुनी

          संगमी श्रोतेजन नाहती.

असेच नाही का ताईंच्या मैफलीबद्दल म्हणता येणार ?

आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात असेच समर्पण आपल्याला करता आले तर …! आपले जीवन ही सुद्धा एक साधना होईल, एक तपश्चर्या होईल. आपल्या कामाचे समाधान, आपल्या कामाचा आनंद आपल्याला तर मिळेलच पण दुसऱ्यांनाही हा आनंदाचा ठेवा आपल्याला वाटता येईल.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रांगोळी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ रांगोळी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

सकाळी लवकर ऊठून अंगणात सडा टाकायचा मग त्यावर छानशी रांगोळी काढायची असा दिवस सुरू व्हायचा•••

तेव्हा आजीला विचारले “ का गं आजी सडा रांगोळी करायची? “ तेव्हा आजीने सांगितले••••

“ या कृतीतच संसाराचे सार दडलेलं आहे गं•••

आश्चर्याने मी विचारले “ ते कसं?”

तशी आजी म्हटली, “ ते मी सांगते. पण तू मला सांग, सडा रांगोळीचे अंगण पाहिले तर तुला काय वाटते?”

मी म्हटलं “ काय वाटणार? छान वाटते. प्रसन्न वाटते. अजून काय?”

आजी म्हटली, “ बरं आता मी सांगते बरं का ! सकाळी उठून जेव्हा बाई आधी अंगण झाडते ना••• तेव्हा कालची मनातली घाण रुसवे फुगवे कुरबुरी यांचा कचरा ती बाहेर फेकून देते. नंतर जेव्हा पाण्याने ती सडा टाकते ना•••• तेव्हा आपल्याच मनावर ती समजुतीची, सामंजस्याची शिंपण करीत असते आणि सगळी नकारात्मकता ती दाबून टाकत असते. मग जेव्हा ती या दाबलेल्या मनावर अर्थात सडा टाकलेल्या अंगणावर रांगोळी काढते ना? तेव्हा सगळी सकारात्मकता त्यात येते. माझे अंगण चांगले दिसावे, माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्याला मी सूख द्यावे याकडे तिचे चित्त जाते.  मग कोणासाठी काय काय करायचे कसे करायचे याचे नियोजन ती रांगोळी काढताना करते. .. मग असे सकारात्मक उर्जेने भरलेलं मन तिला दिवसभर सळसळतं ठेवतं. तिच्याकडून घरातील सदस्यांना सुखावण्याचा आटोकाट प्रयत्न करतं.  पर्यायाने तिच्या बाजूने घरातील शांतता प्रसन्नता टिकवण्याचा प्रयत्न होत असतो…. तसेच बाहेरून येणारी व्यक्ती जेव्हा सुंदर रांगोळी पहाते तेव्हा ती पण प्रसन्न होते. जरी वाईट विचार मनात घेऊन आली असेल तरी त्याचाही काही अंशी निचरा होतो. पर्यायाने त्याचा या घराला मोठा फायदाच होतो.”  

अशा प्रकारचा सकारात्मकतेचा एक स्त्रोत सध्याच्या काळात आपणच बंद केला आहे. सध्या अंगणच नाही तर त्यापुढे रांगोळी तरी कशी येणार?

पण असा विचार करण्यापेक्षा दारात जेवढी रिकामी जागा असेल तेवढ्या जागेतच छोटीशीच रांगोळी काढूया.  सगळी नकारात्मकता घालवून जेवढी सकारात्मकता घेता येईल तेवढी घेऊया. दिवसाची सुरुवात चला निर्मळतेने करू या…

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ✹ ३१ डिसेंबर ✹ इतिहासाचार्य वि. का. राजवाडे स्मृतिदिन — संकलन : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ✹ ३१ डिसेंबर ✹ इतिहासाचार्य वि. का. राजवाडे स्मृतिदिन — संकलन : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

जन्म – १२ जुलै १८६३ (वरसई,रायगड)

स्मृती – ३१ डिसेंबर १९२६ (धुळे)

इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील वरसई येथे झाला. ते मराठी इतिहास संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते. बीए पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले. १८९८ साली त्यांनी लिहिलेल्या ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. ७ जुलै १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली. राजवाडे म्हणायचे, “ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेला नाही.”।महाराष्ट्राच्या विचारविश्‍वात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा मोठा दरारा, दबदबा आणि धाक होता. राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते. राजवाडे यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार के.सी. ठाकरे, विठ्ठल रामजी शिंदे, जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले होते. नंतरही इतिहास संशोधक त्र्यं.शं. शेजवलकर यांनी राजवाडे यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. तथापि, या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरी राजवाडे यांचे वाक्‍य न्‌ वाक्य ब्रह्मवाक्‍य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच आणि विशेष म्हणजे मराठी विचारविश्‍वात याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे राजवाडे यांचे स्थान अबाधित राहिले. राजवाडे यांच्या नावावर स्वतंत्र असा एकही ग्रंथ नाही. त्यांनी नियतकालिकांमधून किरकोळ स्वरूपाचे लेख लिहिले. ‘महिकावतीची बखर’ आणि ‘राधामाधवविलास चंपू’ या प्राचीन ग्रंथांचं संपादन केले आणि मुख्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करून ती तब्बल बावीस खंडांमध्ये छापली. त्यांच्यापैकी काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या. राजवाडे संपादनांपेक्षा अधिक गाजले ते या प्रस्तावनांमुळे. ज्यांना या प्रस्तावना आवडल्या नाहीत, त्यांनाही राजवाडे यांनी अविश्रांत कष्ट घेऊन, प्रचंड भ्रमंती करून जमा केलेल्या इतिहासाच्या साधन सामग्रीसाठी त्यांच्या ऋणात राहण्यावाचून पर्यायच नव्हता. राजवाडे यांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण’ या पुस्तकाची प्रस्तावना मूळ पुस्तकापेक्षा अधिक वाचनीय आहे. असेच त्यांच्या बहुतेक पुस्तकां बद्दल म्हणता येईल. राजवाडे बुद्धिमान तर होतेच; पण त्यांना प्रतिभा शक्तीचीही देणगी लाभली होती. जबरदस्त आत्मविश्‍वास हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्यामुळं साधा अंदाज किंवा कयास सुद्धा ते अशा पद्धतीने व अशा आक्रमकपणाने मांडत, की जणू काही तो त्रिकालाबाधित सत्य असलेला महासिद्धान्तच आहे.

संकलन : श्री मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : विकिपीडिया

संग्रहिका –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माझा संसार व मी…… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

माझा संसार व मी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

माझ्या लग्नानंतर मला कळलेल्या व पटलेल्या आणि मनाला भिडलेल्या, बऱ्याच गोष्टी या लेखात मला वाचण्यास मिळाल्या, पहा वाचा तुम्हालाही कदाचित पटतील व विचार करण्यास भाग पाडतील…

आपल्या नवयुवकाना याची फार मदत होईल नक्की वाचा…

— संसार काय असतो हे नेमक्या आणि मोजक्या शब्दात येथे मांडलंय

कागदावर जुळलेली पत्रिका आणि काळजावर जुळलेली पत्रिका यात  अंतर राहतं…

लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ 

अशक्य आहे, हे मानूनच हा डाव मांडायचा असतो.

वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले  २ जीव, एकमेकांसारखे  असतीलच कसे?

सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे. सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. या न देण्याचंच ‘देणं’ स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.

निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं नाही, तर तुला मिळणारा ‘जीवन साथीदार’ अगदी तुला हवा तसा 

असणार कसा?. 

त्याचे – आपले, काही गुण जुळणारे नसणारच.. त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच, त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे, हे मान्य करणार असाल तरच संसारात पाऊल टाकावं.

—- अशा आशयाचं समुपदेशन ही आज काळाची गरज आहे.

कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा.. बघण्याच्या समारंभात गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा, 

श्रद्धा-अंधश्रद्धा असे तेलकट प्रश्न विचारा..  या प्रश्नांची उत्तर ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या 

सुंदर मुलींच्या भंपक उत्तरांसारखीच.

लग्नानंतर मग खरं काय ते एकमेकांना कळत जातं…..  

तेव्हा म्हणाली होती, ‘वाचनाचा छंद आहे’  पण नंतर साधं वर्तमानपत्र एकदाही उघडलं नाही बयेनं…

जाब विचारू शकतो आपण?

किंवा — 

तो म्हणाला होता – ‘प्रवासाची आवड आहे; जगप्रवास करावा, हिमालयात ट्रेकिंग करावं – असं स्वप्न आहे!’

पण – 

प्रत्यक्षात कळतं; कामावरून आला की जो सोफ्यावर लोळतो की गव्हाचं पोतं जसं. जेवायला वाढलंय.. 

हे ही चारदा सांगावं लागतं…

प्रवासाची आवड कसली? कामावर दादरला जाऊन घरी परत येतो ते नशीब… 

वर्षभर सांगतेय, माथेरानला जाऊ तर उत्तर म्हणून फक्त जांभया देतो…

कसले मेले ३२ गुण जुळले देव जाणे… उरलेले न जुळलेले ४ कुठले ते कळले असते तर…

मनापासून सांगतो, त्या न जुळलेल्या गुणांशीच खरं तर लग्न होत असतं आपलं.

तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं, तीच व्यक्ती टिकली… नाही जमलं की विस्कटली.

अन्याय -शोषण, सहन न करणं, हा पहिला भाग झाला… 

पण न जुळलेल्या गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता दोघांमध्ये हवी….. 

…. पण आज हे लग्नाळू मुला-मुलींना सांगितलंच जात नाहीये;

आपल्याला ‘हवी तशी’ व्यक्ती मिळणं हे एक परीकथेतील स्वप्न असेल; 

पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत आयुष्य जोडतं ठेवावं लागतं हेच खरं वास्तव आहे.

धुमसत राहणाऱ्या राखेत कसली फुलं फुलणार ?..‘ एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत, ते मी स्वीकारणार आहे का?’–या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वत:शी देऊन मगच संसार मांडायला हवा.

आपल्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या व्यक्तीचं वेगळेपण सहज स्विकारणं हे या वाटेवरच 

पहिलं पाऊल…

ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं की इतर सहा पावलं सहज पडत जातात.. 

आणि मग ती “सप्तपदी” – “तप्तपदी” होत नाही..

हेच संसाराचं खरं मर्म आहे.

हरीॐ

“मेड फॉर इच अदर” आपोआप होत नाहीत… होत जातात…

लेखक : अज्ञात

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “प्रवासी भारतीय दिन” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “प्रवासी भारतीय दिन” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

सध्याच्या युगात परदेशी प्रवास ही एक सहजासहजी शक्यप्राय गोष्ट झाली आहे.पूर्वी दळणवळणाच्या साधनांची कमतरता आणि आर्थिक दुर्बलता ह्यामुळे पंचक्रोशी ओलांडणे सुध्दा जिकीरीचे होते.हल्ली मात्र प्रगत तंत्रज्ञानामुळे उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना आपल्या उन्नतीसाठी विदेशी शिक्षणाची गरज भासू लागली.सरकारी नोक-यांमध्ये मिळणारे एल.टी.सी. आणि सेवानिवृत्ती नंतर हाती आलेल्या एकरकमी पैशामुळे विदेशात हौशीखातर फिरणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली.

9 जानेवारी,”प्रवासी भारतीय दिन”. 

ह्या दिवशी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून आपल्या देशात परत आलेत. ह्या दिवसाचे औचित्य साधून आपल्या भारताचे माजी पंतप्रधान मा.अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी 2003 सालापासून हा दिवस “प्रवासी भारतीय दिन”म्हणून साजरा करायला सुरवात केली.पहिला प्रवासी दिन भारताची राजधानी दिल्ली ला साजरा केल्या गेला.

आपली जिवाभावाची, जवळची व्यक्ती तिच्या उन्नतीसाठी परदेशात गेली तरी ती व्यक्ती परत कायम आपल्याजवळ येण्यासाठी आपण आतुरतेने वाट बघतो.आपल्या सगळ्यांच्या उत्कर्षाकरिता आपण तिचा विरह ही सहन करतो.पण ती व्यक्ती कायमची आपल्याकडे परत येण्याचा दिवस हा आपल्यासाठी “सोनियाचा दिवस”असतो.बस ह्याच सोनियाच्या दिवसाचे औचित्य साधून साजरा करण्यासाठी मा.अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या कडून ह्याचा श्रीगणेशा झाला.

2019 मध्ये हा सोहळा वाराणशीला तीन दिवसाच्या समारंभात साजरा झाला.मोठमोठे उद्योगपती आणि राजकीय संबंधित व्यक्ती ह्या सोहळ्यास आवर्जून हजर होते.ह्या सोहळ्यामुळे आपले जवळपास 110 देशांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतात ही दूरदृष्टी मा.अटलजींची होती.देशाच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी असे उपक्रम राबवून घेणे हे सच्च्या देशप्रेमीचेच लक्षण होय.

प्रवासावरून वीणा वर्ल्ड वाल्या वीणाताई आठवल्या. परवाच त्यांचा सिंप्लीफाय ॲप्लीफाय हा खुप छान लेख वाचनात आला. आइनस्टाइन कायम एकाच रंगाचा आणि त्याच प्रकारचा ड्रेस परिधान करायचे. दुसऱ्या वेशात त्यांना कधी कुणी बघितले नाही असं म्हणतात. त्याचं म्हणणं हया अशा गोष्टींवर आपला वेळ, पैसा आणि मेंदूला होणारा शिण हे टाळून आपण आपला फायदा, प्रगती करू शकतो. अर्थात अगदीं साधी राहणी, साधं जीवन जगणं, संग्रह न करणं ह्या गोष्टी आचरणात आणण्यास खूपच कठीण पण कायम लक्षात ठेवल्या तर कधीतरी अमलात आणण्याची पण शक्यता वाढते.

तर अशा ह्या प्रवासी जागतिक दिनाच्या आपल्या भारतवासियांना शुभेच्छा,.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शहाणपणाचं  वेडेपण… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

शहाणपणाचं  वेडेपण ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सायली भेटायला आली.

“नीता मावशी आईबद्दल तुझ्याशी जरा बोलायचं आहे…”

“अगं काय झालं मीनाला?”

“आई सध्या काहीतरी वेगळंच वागते आहे.”

“म्हणजे?”

” अचानकपणे तिच्या आत्ये बहिणीला भेटायला गेली .”

“पण मग त्यात काय झाल?”

“इतके दिवस ती  सहज अशी  कधीच गेली नाही. दारातली रांगोळी सकाळची कधी चुकली नाही …आता पेपर वाचत बसते मग  कधीतरी नऊला काढते …. पूर्वी खरेदीला मला घेऊन जायची. आता आपली आपण जाते… जे मनाला येईल ते घेऊन येते.. मध्ये चतुर्श्रुंगीला जाऊन आली …”

सायली एक एक सांगायला लागली….

“अशी का गं वागत असेल ?”

“तुम्हाला तिचा काही त्रास होतो आहे का ?तिची ती जाते तर जाऊ दे ना…”

“अग पण..असं कसं ..”

” घरात कशी असते?”

“अगदी नॉर्मल नेहमीसारखी..”

” बरं ती जाते तर तुमची काही अडचण होते का?”

“नाही काहीच नाही..”

“ मग झालं तर..”

“अग रविवारी अचानकच देहू आळंदीला गेली मैत्रिणींना घेऊन…….. म्हणाली जेवायचं काय ते तुम्ही तुमचं मॅनेज करा.. केलं आम्ही ते …..”

“अगं मग प्रॉब्लेम काय आहे?”

“अगं नीता मावशी हे सगळं अॅबनॉर्मलच  वाटतंय … मी आनंदशी बोलू का?  काही सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम तर नसेल ना …”

मी जरा स्तब्ध झाले..

म्हटलं “ तुला वाटत असेल तर तू जरूर बोल…”

“हो बोलतेच ..” .. असं म्हणून ती गेली.

मनात आलं…. 

… समाजाच्या घराच्या चौकटीत बाईने अगदी तसंच वागलं पाहिजे .. जरा कुठे वेगळं घडलं ..  मन इकडे तिकडे लावलं तर …कुठे बिघडलं ? ….पण नाही…लगेच ते खटकतं ..

मी मैत्रिणींना हे सांगितलं तर त्यांच्या प्रतिक्रिया ….

“मी पण माझ्या चुलत वहिनीला उद्या भेटायला जाते …खूप दिवस घोकते आहे…”

“मला कॅम्पात जरा एकटीने जाऊन यायचं आहे आता मी जातेच..”

“मला सारसबागेत गणपतीच्या सकाळच्या सातच्या आरतीला जायचं आहे उद्या जाऊन येते…

कितीतरी वर्ष मनात आहे पण असं उठून जावं हे काही कधी सुचलंच नाही बघ …”

एक मैत्रीण  म्हणाली..

 “नीता मला कॅफे कॉफी डे ची ती महागडी कॉफी एकदा प्यायचीच आहे. तुझ्या घराजवळच आहे . उद्या आपण जाऊया  ..कशी असते ती बघूया तरी…”

मैत्रिणी धडाधड सगळं मनातलं बोलायला लागल्या. 

सायलीचा फोन आला .

“आनंदशी बोलले. त्यांनी छान समजावून सांगितलं मला .” ती शांत झाली होती. वाटलं  तिला सांगावं …

“ अग त्यापेक्षा आईचं मन वाचलं असतंस तर…फार काही नसतात  ग बाईच्या अपेक्षा… साध्या साध्या गोष्टी तर आहेत ..करू दे की तिला .. इतके वर्ष तुमची सेवा केली, आता थोडं मनासारखं वागते आहे वागू दे की…” 

तुम्हाला एक  कानमंत्र देते..

वागावं थोडं मनासारखं …. निदान आता तरी …

ही अशीच वागते हे कळलं की ते आपोआप शहाणे होतील…

आता तुम्हाला अजून एक आतली गंमत सांगते बरं का …

मीनाने हे संकल्प मला सांगितले होते…

तिला म्हटलं, “अगं नवीन वर्षाची कशाला वाट बघतेस ? आत्ताच  सुरु कर की..” .

तिने मनासारख वागणं सुरू केलं आणि ही सगळी मज्जा सुरू झाली…..

मला काय म्हणायचं आहे ते आता तुम्हाला समजलच असेल..  फोड करून सांगत नाही… 

सख्यांनो  फार मोठी मागणी नसतेच हो आपल्या मनाची …  

वागा की थोडं मनासारखं…

मग कोणी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत तरीसुद्धा तुमचे दिवस आनंदाचे आणि सुखाचे जातील याची खात्री मी तुम्हाला देते….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ समाधी संजीवन… लेखिका : सुश्री विद्या हर्डीकर सप्रे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ समाधी संजीवन… लेखिका : सुश्री विद्या हर्डीकर सप्रे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

बराच वेळ नकाशातून वाट काढत काढत  मी आणि माझा नवरा  एका दफन भूमीच्या दारात पोहोचलो. मला पहाताच समोरची बाई चटपटीतपणे पुढे आली आणि हसतमुखाने विचारती  झाली, “Are you here for Dr Joshi?” मी चकितच झाले. “How do you know?” मी विचारले.. 

तिन सांगितलं की ,” तू भारतीय  दिसते आहेस. इथे खूप भारतीय येतात डॉ. जोशींच्या समाधीला भेट द्यायला.! खरं तर   या दफन भूमीत सर्वात  जास्त  भेट दिली जाणारी .. सर्वात लोकप्रिय समाधी आहे ही ! “ 

आणि आमच्या वॉकिंग टू र मध्ये आम्ही या समाधीचाही समावेश केलाआहे.” 

हे ऐकून मला अभिमानानं भरून आलं ! 

त्या स्वागतिकेन मला दफनभूमीचा नकाशा दिला. ‘कार्पेन्टर/ Eighmie लॉट’ कुठे आहे त्याची खूण  नकाशावर केली आणि तिथे जायचा मार्गही दाखवला. आमचे मिशन ‘ए २१६’ सुरु कझाले ! (Eighmie हे कार्पेन्टर मावशीच्या माहेरचे नाव.) 

मी  त्यांच्या नोंदणीपत्रकात मोठ्या अभिमानाने आमची नाव नोंदवली आणि आम्ही मार्गस्थ झालो. 

कार्पेन्टर लॉट तसा मोठा आहे. आता इतक्या सगळ्या थडग्यातून आनंदीबाईंची समाधी कशी शोधायची असा विचार करत आम्ही चालत होतो. तेवढ्यात मला’ ती’ दिसली.  मी समाधीचा फोटो पाहिला होता. त्यामुळे चटकन दिसली. “ भेटलीस ग बाय ..” असं म्हणत मी    उंचवटा चढून लहानशा   टेकाडावर गेले, ..काहीशा  अधीरपणे! 

समाधीच्या दगडाच्या एका बाजूला अक्षर अस्पष्ट होती. पण दुसऱ्या  बाजूला सुस्पष्ट अक्षरात 

“द फर्स्ट ब्राह्मण वुमन टू  लीव्ह इंडिया टू ऑबटेन  ऍन एज्युकेशन “  असे आनंदीबाईंबद्दल कोरून ठेवले आहे. 

माझ्या डोळ्यांसमोरून दीडशे वर्षांपूर्वीचा आनंदीबाईंच्या जीवनाचा  सगळा पट उलगडला होता…. कादंबऱ्या आणि चरित्रातून वाचलेला.. पण  मनावर त्याचा सुस्पष्ट अक्षरातला खोल ठसा उमटवून गेलेला. 

समोरून उतरत्या सूर्याची  किरणे समाधीवर पडली होती. बाजूला काही हिरवळ, काही पाचोळा होता. आम्ही ते सर्व बाजूला करून आमच्या बरोबर आणलेली फुले समाधीसमोर ठेवली.  काही फुले समाधीवर छान रचून ठेवली. कातर मनाने , भरल्या डोळ्यांनी मी तिला वाकून  नमस्कार केला… आणि मग  तिच्या जवळ थोडा वेळ निशब्द पणे बसून राहिले. मध्ये उलटलेल्या काळाचा वारा मनात सळसळत होता.  

किती वर्षे या भेटीची आस लागून राहिली होती ! 

मन काही वर्षे मागे गेले. .. १९९१ पर्यंत..मी फिलाडेल्फयाला  एका स्नेह्यांकडे गेले होते, तो दिवस आठवला.  त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी मलाही मुद्दाम बोलावले होते.  जवळच्याच एका लहान गावात रहाणारे अशोक आणि मनीषा गोरे आणि त्यांच्याबरोवर आलेल्या त्यांच्या नातेवाईक ‘अंजली कीर्तने !’  हे नाव मी ऐकलं होत. मला वाटत चेरी ब्लॉसम की  अशा काही नावाचं त्यांचं पुस्तक वाचलं होत. अंजलीताई मुद्दाम आल्या होत्या त्या आनंदीबाई जोशींवर संशोधन करायला. फिलाडेल्फियातल्या कॉलेज मध्ये आनंदीबाईंची डॉक्टर ची डिग्री झाली होती. तिथे  अंजलीताईना घेऊन जाऊन श्री. गोरे यांनी तिथल्या पुरातत्व विभागात कागदपत्रे शोधायला सुरवात केली होती. आजवर कधीच माहिती नव्हता तो माहितीचा खजिना तिथे मिळाला होता. त्यात एक पुस्तक हाती आलं. कॅरल डॉल ने लिहिलेलं आनंदीबाईंचं चरित्र !   त्यात एका वाक्याचा उल्लेख होता : आनंदीबाईंची अमेरिकेत  कार्पेन्टर मावशींकडे पाठवलेली रक्षा कुठे जतन केली जाणार आहे त्याचा. 

तेवढ्या धाग्यावरून ती समाधी शोधून काढण्याचा खटाटोप चालू होता.  गोपाळराव जोशी यांनी  आनंदीबाईंचा रक्षाकलश बोटीने अमेरिकेत पाठवल्याचे उल्लेख आहेत. पण त्याच पुढे काय झालं ते कोणाला माहिती नव्हतं. 

मी  अमेरिकेत आल्यावर त्यांची समाधी शोधून काढण्याचा विचारही  मी कधी केला नव्हता !  पण आपल्याला देवतेसारख्या वाटणाऱ्या आनंदीबाईंच्यासाठी चाललेल्या या  प्रकल्पाबद्दल आता मात्र मलाही उत्सुकता वाटायला लागली. 

गोरे पतिपत्नी आणि अंजलीताई यांची ओळख  नुकतीच झाली होती, पण पहिल्याच भेटीत  त्यांच्याशी कुठेतरी  सूर जुळले .त्यामुळे  न्यूयॉर्क राज्या मध्ये एका लहानशा गावात कुठेतरी असणारा तो   कार्पेन्टर लॉट शोधण्यात त्यांना कशी मदत करता येईल याचा विचार मी करु  लागले.  गुगल , विकिपीडिया आणि इंटरनेट  यांच्या आधीचे ते दिवस.  म्हणजे “आपल्या ओळखीचं कोण कोण आहे न्यूयॉर्क राज्यात” अशी आठवणींची साखळी बांधून माझी विचारांची साखळी सुरु झाली.    योगायोग असा की  कार्पेन्टर लॉटबद्दल चा उल्लेख  आहे त्या गावाच्या आसपास   माझे एक मित्र विराज आणि लीना सरदेसाई रहात होते, हे मला एकदम आठवलं.  

मी लगेच  विराज ला फोन केला.तोपर्यंत  विराजचा संदर्भ आणखी कोणीतरी सुद्धा  अंजलीताईना दिला. होता.    गावातल्या दफन भूमी विंचरून हा कार्पेन्टर लॉट शोधण्याची  आणि तिथेच रक्षाकलश असण्याचे पुरावे शोधण्याची जबाबदारी विराजने घेतली. पुष्कळ परिश्रम करून त्याने हे इतिहास संशोधन केलं. आणि अंजलीताईना तिथे पोहोचता आलं. मला त्यावेळी जण शक्य नव्हतं. पण अंजलीताईनी समाधीचा फोटो  आठवणीने मात्र पाठवला.( मी तो अजूनही जपून ठेवला आहे. )…. 

शंभर वर्षे उलटून गेल्यावरही आनंदीबाईंची समाधी तिथे होती .. वादळ वारे , हिमवर्षाव सहन करत होती. खोदलेली अक्षरे पुसट  झाली होती. त्यात खडू भरून त्या अक्षरांना उठाव देत कोरलेली वाक्ये वाचावी लागली. 

दफनभूमीवरील यादीत आनंदीबाईंचं नाव होत. पण बाकी माहिती कुणालाच नव्हती. ती अंजलीताईनी दिली आणि कागद प्रत्रातले रिकामे रकाने भरले गेले.  इतिहासाच्या अक्षरांना पुन्हा  उठाव मिळाला.

आनंदीबाई आली अमेरिकेत तेव्हा इथे कोणी नव्हतं.  पण आनंदीबाईनी इथे जात, धर्म, भाषा यांचे तट ओलांडत  कॅरल डॉलशी मैत्रीचे बंध  जुळवले. कार्पेन्टर मावशीनं तर तिला कुटुंबातच सामावून घेतलं आणि  माहेरच्या दफनभूमीत तिच्यासाठी खास जागा निर्माण केली. तिची समाधीशिळा उभारली. 

त्याकाळच्या मराठी बाईची चाकोरी माजघर, स्वयंपाकघर ते मागील आंगण एवढीच होती. ती ओलांडून आनंदीबाई वेगळ्या वाटेने चालल्या. .. ती वाट शिक्षणाची होती. अमेरिकेत जाऊन शिक्षण घेणे .. म्हणजे केवळ चाकोरीबाहेरची वाट चोखाळणे नव्हते, तर व पायवाट सुद्धा नव्हती तिथे राजमार्ग उभारणे होते.. पहिली  भारतीय डॉकटर स्त्री होण्याचा सन्मान घेताना आनंदीबाईंच्या या अलौकिक कार्याचं सार्थक झालं खरं; पण त्या राजमार्गावरून पुढे जाण्यापूर्वीच त्यांना  मृत्यूने कलाटणी दिली आणि त्यांच्या रक्षा या  न्यूयार्क  मधल्या आडगावात एका दफनभूमीत एकाकी होऊन पडून राहिल्या होत्या. नंतर इतके मराठी लोक आले, त्यांनाही याचा पत्ता  नव्हता. .. 

बाविसाव्या वर्षी पराक्रम करून गेलेल्या झाशीच्या राणीच्या समाधीस्थळी 

‘रे हिंद बांधवा थांब  या स्थळी  अश्रू दोन ढाळी …..” अशी भा रा तांबे यांनी घातलेली साद … 

तशी बाविसाव्या वर्षी  पराक्रम करून गेलेल्या आनंदीबाईच्या समाधीस्थळी अंजली कीर्तने , विराज , लीना सरदेसाई, अशोक, मनीषा गोरे यांनी घातलेली ही साद … 

मराठी, भारतीय  लोकांपर्यंत हळू हळू पोहोचली. आणि आता  इथे लोक दर्शनाला येऊ लागले. 

हे सगळं आठवत मी समाधीपाशी स्तब्ध झाले होते…

माझी ही  तीर्थ यात्रा पूर्ण झाली ती विराज आणि लीना यांच्या घरी जाऊनच.. लीना आणि विराज आता त्या गावात रहात नाहीत. ते आता दूरच्या एका गावात असतात.  मधल्या काळात  आमच्या भेटी झाल्या होत्या, काही प्रकल्पसुद्धा आम्ही एकत्रित पणे केले होते. 

पण तरीही समाधीदर्शनानंतर लगेच  त्यांना भेटल्याशिवाय तीर्थयात्रा पूर्ण होणार नव्हती. म्हणून आम्ही पुढे निघालो.  त्या दोघांनाही  आमच्या या विशेष भेटीचा  खूप आनंद झाला. .पुष्कळ जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तेव्हाच्या आठवणी विराजने सांगितल्या. संशोधनाचं आव्हान, समाधी सापडल्याचा आनंद, कितीतरी गोष्टी.! आम्ही ऐकताना भारावून गेलो होतो… 

समाधीच्या शिळेवरची अक्षर पुसट  झाली, ती महत्प्रयासाने परवानग्या काढून विराजने पुन्हा खोल करून घेतली. त्यामुळे एका बाजूला आता सुस्पष्ट खोदकाम दिसते.  हा ऐतिहासिक दुवा मला कळला. 

आनंदीबाईंवर अंजलीने पुस्तक लिहिले. लहान माहितीपट केला. लेख लिहिले. (अलीकडेच आनंदीबाई गोपाळरावांवर एक चित्रपटही निघाला)

या समाधी संशोधनानंतर अनेक लोकांनी  समाधीला भेट द्यावी अशी तिची इच्छा होती आणि आहे. तिच्या संशोधनाचे आणि धडपडीचे सार्थक झाले.  आज खरोखरच जास्तीत जास्त लोक येऊन या समाधीला भेट देतात…..  अमेरिकेत आलेल्या प्रत्येक भारतीय  डॉकटर ने विशेषतः: महिला डॉक्तरने समाधीला  भेट द्यावी असे मला मनोमन वाटते. त्यासाठी मी काही लेख लिहून समाधीचा पत्ता प्रसिद्ध केला. आमच्या दुसऱ्या पिढीच्या  मुलींनी ही  समाधी  पहावी  आणि काही प्रेरणा त्यांना मिळावी! कारण आनंदीबाईनी  चाकोरीचे आणि परंपरांचे अवघड घाट ओलांडून,  आमचे मार्ग सोपे केले. आम्ही आज इथे आहोत, ते त्यांच्यामुळे आणि आमच्या मुली आज मोठ्या मोठ्या भराऱ्या  घेत आहेत , त्या त्यांच्याचमुळे !  आम्ही आनंदीबाई जोशींच्या लेकी आहोत !   

तेव्हा आनंदीबाईनी विराज, लीना, अशोक, मनीषा , अंजली आणि मी यांचे बंध अनुबंध  जुळवले, ते आज तीस वर्षांनंतरही जुळलेले आहेत. आनंदीबाईंच्या संजीवन नामाने नामांकित झालेले आहेत !        

लेखिका : विद्या हर्डीकर सप्रे 

(समाधीस्थळ :  Poughkeepsie Rural Cemetery, 342 Sounth Ave, N.Y. 12602

दूरध्वनी: (845) 454-6020   https://poughkeepsieruralcemetery.com/

या दफनभूमीच्या वॉकिंग टूर मध्ये आनंदीबाईंच्या समाधीला असते.

Her ashes were sent to Theodicia Carpenter, who placed them in her family cemetery at the Poughkeepsie Rural Cemetery in Poughkeepsie, New York. The inscription states that Anandi Joshi was a Hindu Brahmin girl, the first Indian woman to receive education abroad and to obtain a medical degree). 

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

पुणे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी जर महाभारत काळात जन्माला आलो असतो तर… लेखक : श्री दीपक राऊत ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? वाचताना वेचलेले ?

🍃 मी जर महाभारत काळात जन्माला आलो असतो तर… लेखक : श्री दीपक राऊत ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

मी जर महाभारत काळात जन्माला आलो असतो तर माझा समावेश कौरवांच्या पार्टीतच झाला असता.

कारण ..

श्रीकृष्णाची कधी प्रत्यक्षात गाठ पडलीच तर मी त्याला एकमेव प्रश्न हा विचारेन की …

” देवाधिदेवा… भगवतगीता अर्जुनाला सांगण्याऐवजी , दुर्योधनाला आणी दु:शासनाला सांगितली असतीस् तर हे महाविनाशी युध्द टाळता आले असते ना ?

इतका मोठा संहार झाला नसता. तू असे का केले नाहीस ? 

भग्वद्गीतेचे  हे दिव्य ज्ञान कौरवांना झाले असते तर महाभारत हे , युद्धाच्या तत्त्वज्ञानाऐवजी बंधुभावाच्या, प्रेमाच्या तत्त्वज्ञानाची शिकवण देणारे झाले नसते का ?”

सध्यातरी कृष्णाने प्रत्यक्ष दर्शन देणे शक्य नव्हते. त्यामुळे  इंटरनेटच्या जंजाळात मी हा प्रश्न प्रसूत केला. बघताबघता हा प्रश्न प्रचंड व्हायरल झाला. फेसबुक, whatsapp, quora, युट्युब सगळीकडे या प्रश्नाने धुमाकूळ घातला. आणि अखेरीस ईतके ट्रॅफिक ओसंड्ल्यामुळे प्रत्यक्ष श्रीकृष्णाला त्याची दखल घ्यावी लागली. 

आणि …एके दिवशी मला श्रीकृष्णाचा video कॉल आला. 

अक्षयकुमार आणि परेश रावलचा OMG बघितलेला असल्यामुळे, श्रीकृष्ण अगदी साध्या वेशभूषेत येणार हे मला अगोदरच ठावूक होते. 

थेट स्वर्गातून , पृथ्वीवर कॉल लावलेला असल्यामुळे , खुप डेटा खर्च होत असणार, त्यामुळे श्रीकृष्णाने थेट मुद्द्याला हात घातला .

“ वत्सा , कशाला ईतके अवघड प्रश्न नेटवर टाकतोस ? सगळे ट्रॅफिक जाम झाले.”

“देवा , हा आखिल मानवजातीच्या मार्गदर्शक धर्मग्रंथाचा प्रश्न आहे. तुम्ही हे युद्ध टाळण्यासाठी हे ज्ञान कौरवांना दिले असते तर युध्दचं झाले नसते ..हा प्रश्न इंटरनेटच्या  ट्रॅफिकपेक्षा कितीतरी महत्वाचा नाही का ?”

“मला उपदेश करू नकोस ”   ………. श्रीकृष्णांचा एकदम बदललेला स्वर ऐकून मी भांबावलो.

“ देवा , माझी काय बिशाद तुम्हाला उपदेश करण्याची “ ….मी गयावया केली.

“ वत्सा …अरे तुला नाही म्हणालो.”

…मला हायसे वाटले.

“ मला उपदेश करू नका …असे दुर्योधन मला म्हणाला होता.

….तुला काय वाटते ? मी हे युध्द टाळण्यासाठी  दुर्योधनाकडे गेलो नसेन ? 

भग्वद्गीतेमधील न्याय अन्याय , नैतिकतेच्या गोष्टी त्याला सांगितल्या नसतील ?”

“ काय सांगताय देवा ? दुर्योधनाला प्रत्यक्ष तुम्ही गीतेचे ज्ञान सांगून देखील त्याला ते कळाले नाही ? तो सरळसरळ तुम्हाला उपदेश  करू नका म्हणाला ?”

“ वत्सा , अगदी असेच घडले बघ.

दुर्योधन म्हणाला …..मला चांगले वाईट, पाप पुण्य, नैतिक अनैतिक या सगळ्याचे ज्ञान आहे. सद्वर्तन आणी दु:वर्तन यातील फरकही मी जाणतो , त्याचा उपदेश मला करू नका “. 

“ वत्सा , पाप काय आहे हे दुर्योधनच काय तुम्ही सुद्धा जाणता ..पण त्यापासून दूर रहाणे तुम्हालाही जमत नाही. अनैतिकता म्हणजे काय हे दुर्योधन ही अन् तुम्ही ही ओळखता, पण टाळत नाही.

तुमच्यासाठी चांगले काय आहे आणि वाईट काय आहे हे तुम्ही जाणता , पण तुम्ही वाईटाचीच निवड करता. दुर्योधनाने स्वत:च्या वर्तनाची अगतिकता सांगून बदल नाकारला, त्याने स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ ढालीसारखा वापरला”.

.

.

आता मात्र मला दुर्योधनाच्या जागी माझा चेहरा दिसायला लागला .

.

.

“ मला उपदेश करू नका“……वडिलांना उद्देशून हे वाक्य मी शंभरवेळा उच्चारले असेन. 

मित्रांबरोबर उनाडक्या करणे , चुकीचे होते हे मला माहिती होते, पण मी त्याचीच निवड करीत होतो. आणि वडिलांना “ उपदेश करू नका” असे सांगत होतो. 

सकाळी लवकर उठून व्यायामाला जाणे माझ्या फायद्याचे होते हे मला ठावूक होते. पण अंथरुणात लोळत पडणे हे माझे वर्तन होते, आणी “लवकर उठत जा” असे सांगणाऱ्या  आईला , “ उपदेश करू नकोस” असे सांगणारा “दुर्योधन” मीचं होतो.

“तंबाखू खाऊ नका , दारू पिऊ नका , मांसाहार करू नका “ , हे उपदेश आम्हाला ऐकायचे नाहीत. त्यामुळे शरीराचे नुकसान होते हे आम्हाला ठाऊक आहेत, पण त्याची अंमलबजावणी आम्हाला करायची नाही . कारण आम्ही ‘दुर्योधन’ आहोत. आम्ही कौरव आहोत.

अर्जुन आणि दुर्योधनात हाच फरक होता की, दुर्योधनाने समजत असूनही स्वत: चे वर्तन बदलले नाही आणि अर्जुनाने स्वत:चे वर्तन श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून बदलले… 

संस्कार, प्रकृती, राग, श्रेय, प्रिय, प्रतिक्रिया, कर्म, विषय ….याबद्दलच्या संकल्पना जाणून घ्या .

कधीतरी स्वत: च्या आतल्या श्रीकृष्णाला प्रश्न विचारा ……तरच भग्वदगीता वर्तनात येईल…वाचण्याची इच्छा होईल.

इच्छा होईल तोच  सूर्योदय.

सध्यातरी मी कौरव नंबर “१०१” आहे ….

.तुम्ही? ….. 

लेखक : श्री दीपक  राऊत

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares