मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

तिची परंपरा

धोबी गल्लीतलं अगदी मध्यावरचं चार नंबरचं एक माडीचं घर म्हणजे ढग्यांचं घर. खरं म्हणजे त्या काळातलं ते एक स्वतंत्र कुटुंब असं म्हणायला काही हरकत नाही. संयुक्त कुटुंबाच्या तुलनेत लहानच परिवार असलेलं. म्हणजे आई वडील, पाच मुली आणि आजी असं आठ माणसांचं पण स्वतंत्र कुटुंब. कारण आजीला एकच मुलगा आणि त्याचाच हा संसार. तसं मराठमोळं, साधं, फारशी कठीण, कडक व्रतंवैकल्य न करणारं असलं तरी सांस्कृतिक परंपरा बऱ्यापैकी सांभाळणारं असं हे सुशिक्षित, सुसंस्कृत सभ्य कुटुंब आणि या कुटुंबाच्या केंद्रस्थानी होती ती पिकल्या केसांची, सुरकुत्या कायेची, गालावर एक ओघळता काळा मस असलेली, सावळी, ठेंगणी पण ताठ आणि चमकदार डोळ्यांची आजी.

काळाने अनेक बऱ्या, वाईट, कडू गोड प्रसंगाने तिला अक्षरश: झोडपून काढले होते. पण त्या वादळातही टिकून राहिलेली ती एक ठिणगी होती. प्रस्थापित रूढी, रिती, परंपरा यांच्याशी सतत वाद घालत तिने आयुष्या विषयीची एक स्वतःचीच प्रणाली स्थित केली होती आणि तीच तेव्हां आणि नंतरही त्या कुटुंबाची परंपराच ठरली. जुन्यातलं सकारात्मक तेवढं तिने टिकवलं मात्र नकारात्मक ते सपशेल नाकारले. जे जाचक, प्रगतीला खिळ आणणारे, निरर्थक, केवळ गतानुगतीक असलेलं परंपरावादी तिनं स्व सामर्थ्याने लोटून दिलं आणि त्याचा एक वस्तूपाठवच तिने कुटुंबासाठी ठेवला. म्हणून ढग्यांचं कुटुंब हे वेगळं होतं.

आचार विचार सगळ्याच बाबतीत.

ढग्यांच्या आजीला पाच नातीं वरून खूप जण खिजवायचे. “म्हातारे, तुझा वंश बुडालाच म्हणायचं की!”

आजी इतकी खमकी होती, म्हाणायची,

“ मेल्या! तुझा मुलगा नाक्या नाक्यावर उनाडक्या करत फिरतो तो काय रे तुझ्या वंशाचे दिवे पेटवणार? माझ्या पाच नाती माझे पाच पांडव आहेत. बघशीलच तू. ” नंतर तो कुणी एक जण आजीच्या वाटेला कधीच गेला नाही.

गल्लीतल्या मीनाच लग्न जमत नव्हतं. कारण तिच्या पत्रिकेत कडक मंगळ होता. त्यामुळे पत्रिका जुळवण्याच्या पहिल्याच पायरीवर, आलेल्या स्थळाची पाठ फिरायची. मीना सुंदर होती. गोरीपान, सडपातळ, लांब काळेभोर केस. पलीकडच्या गल्लीतल्या एका मुलाचं मन तिने केव्हाच जिंकलं होतं. दोघेही एकमेकात अडकले होते पण तो खालच्या जातीतला, मीना कायस्थ. शिवाय पत्रिकेचा रेटा होताच. दोन प्रेमी विवाह बंधनात अडकण्याची शक्यताच नव्हती. आजीला जेव्हा हे कळलं तेव्हा दोघांच्याही घरातल्या बुजुर्गांना तिने चांगलंच सुनावलं. “कसली जात पात नि कसल्या पत्रिका पाहता? लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात. जन्मभर मुलांना काय त्या परंपरेच्या बंधनात जखडून ठेवणार आहात का? एक पाऊल पुढे तर टाकून बघा. ”

आजीच्या बोलण्याने दोन्ही परिवारात मत परिवर्तन झालं की नाही माहीत नाही पण त्या दोन प्रेमिकांना मात्र धैर्य प्राप्त झाले आणि त्यांनी लग्नही केलं. त्यांच्या वेलीवर जेव्हा पहिलं फूल उमललं तेव्हां दोघंही प्रथम आजीचा आशीर्वाद घ्यायला घरी आले.

आजी तशी नास्तिक नव्हती. देवावर तिची श्रद्धा होती. घरातल्या खिडकीजवळच्या भिंतीवर एक सुंदर निळकंठाचा फोटो होता. घरातल्या प्रत्येक बाहेर जाणाऱ्या व्यक्तीने त्या फोटोला नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही हा तिचा शिरस्ता होता. मात्र कोणी कधी विसरले तर त्याच्या माघारी ती स्वतःच त्या फोटोला दहादा नमस्कार त्याच्या वतीने करायची. आणि पुटपुटायची,

“ देवा याला क्षमा कर, याचं रक्षण कर. ”

तसे तिचे आणखी काही संकेत होते. शनिवारी नवे कपडे घालायचे नाही. उंबरठ्यावर किंवा जेवताना शिंक आली तर डोक्यावर पाणी शिंपडायचं. ” “वदनी कवळ घेता” म्हटल्याशिवाय जेवायचं नाही, नेहमी हसत खेळत जेवायचं, ताटातलं संपवायचं, मनातला राग जेवणावर काढायचा नाही. वगैरे अनेक.

ढग्यांच्या घरात गौरी, गणपती, ईद, नाताळ सगळ्यांचं स्वागत असे. खंडोबाची तळी भरली जायची. गुढी उभारली जायची, राम जन्म, कृष्णाष्टमी सगळं साजरं केलं जायचं. तेव्हा ती म्हणायची, “ जास्त खोलात जाऊ नये. आनंद मिळेल इतपत कराव सगळं. ”

नैवेद्य दाखवला नाही म्हणून घरातल्या लहान मुलांना तिने कधीही उपाशी राहू दिलं नाही. घरात हळदी कुंकवाचा समारंभ असेल तर ओळखी मधल्या विधवा स्त्रियांना ती सुनेला आवर्जून बोलवायला सांगायची.

शरीपा नावाची एक मुस्लिम स्त्री त्यांच्यासमोर राहायची. तिलाही आमंत्रण असायचं. हा हिंदू हा मुस्लिम, हा जातीचा हा परजातीचा, असा भेदभाव तिने कधीच पाळला नाही. मानवतेची नाती जपली.

फक्त पितृपक्षापुरताच नव्हे तर ती रोजच जेवायच्या आधी कावळ्याचा घास कौलावर जाऊन ठेवायची. कुणी विचारलं तर म्हणायची, ” आपल्या घासात या पशु पक्षांचाही वाटा असतोच ना?”

गाईला घास भरवताना, “ती गोमाता, देवता समान” इतकीच भावना राखली नाही तर मूक, अश्राप प्राण्याची भूक भागवण्याचा तिने प्रयत्न केला. “तहानलेल्या जीवाला पाणी द्यावं भुकेल्याला अन्न द्यावं” मग त्यावेळी तिने स्पृश्य अस्पृश्य काहीही मानलं नाही. परंपरा जपलीही, परंपरा मोडलीही.

सलाग्र्यांच्या घरी सवती सुभा फार होता. एक दिवस सलाग्रे ताईवर तिचा सावत्र मुलगा मुसळ घेऊन तिच्यावर धावून गेला तेव्हा आजीने वरच्यावर त्याचा बलदंड हात पकडला आणि त्याला चांगलेच सुनावले,

“काय रे गधड्या दर शनिवारी मारुतीच्या डोक्यावर तेल घालायला हनुमान मंदिरात जातोस ते या कर्मासाठी का? सावत्र आई असली तरी आईच आहे ना? तिनेच वाढवलं ना तुम्हाला आणि एका स्त्रीवर हात उगारतोस? तेही तोळाभर सोन्यासाठी? उद्यापासून मंदिराची पायरी चढलास तर खबरदार. ढोंगी कुठला!”

अशी नित्य नियमित पूजाअर्चा, व्रतं वैकल्यं, कडक उपास तपास करणाऱ्या लोकांवर तिची बारीक नजर असे. खरोखरच्या देवभोळ्यांना ती म्हणायची, ” एक दिवस तुझा देव तुला पावेल बरं”

नाहीतर बाहेर एक आत एक अशा लोकांना ती थेट सांगायची, ” कशाला कष्टवतोस स्वतःला? तुझा देवही दगड आणि तू ही दगड. ” 

आजी कुणालाच घाबरायची नाही आणि ‘सत्याचा वाली परमेश्वर’ ही तिची श्रद्धा मात्र तिने कधीही सोडली नाही. ज्या हातात तिने बडगा घेतला त्याच हाताने तिने रंजल्या गांजल्यांना भरवले. प्रेमामृताचे घोट पाजले. सकारात्मक जपले आणि नकारात्मकतेला तिने पाठ फिरवली आणि आयुष्यभर तिने तिची ही वैचारिक परंपरा जपली. काळ मागे पडत असताना आणि काळ पुढे जात असतानाही..

आज ती नाही, तिचा लेक नाही, सून नाही. पण तिच्या नाती, पणत्या, पणतु, खापर पणत्या, खापर पणतु सारे आहेत आणि त्या सर्वांच्या जीवनात आजीच्या परंपरेचे अनेक थेंब तळी करून आहेत.

कुणी हे का? हे कसं? हे वेगळं आहे, असं म्हटलं तर त्यावर एकच उत्तर असतं, “हीच आमच्या आजीची परंपरा!”

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ MMM… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆

सुश्री सुनिता जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ MMM… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी

कॉलेजला जाईपर्यंत मला MMM म्हणजे मालाडचा MM मिठाईवाला एवढच माहीत होतं!

पुढे आयुष्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा परिसस्पर्श झाला..

आणि MMM म्हणजे “मदन मोहन मालवीय” हे मला तेव्हा कळले…

गमतीने जनता MMM म्हणजे Money Making Machine म्हणत असे…

बनारस हिंदू विश्वविद्यालय बांधताना जमिनीपासून निधी पर्यंत… पंडित मदन मोहन मालवीय यांनी गोळा केलेली साधनसंपत्ती बघितली तर, मनी मेकिंग मशीनचा अर्थ कळतो!

 

सुमारे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी, बनारस हिंदू विश्वविद्यालय उभे करण्यासाठी त्यांनी काही कोटीचा निधी अत्यंत प्रेमाने व कुशलतेने गोळा केला होता…

याच देणगीसाठी हैदराबादच्या निजामाला भेटले…

विश्वविद्यालयाच्या नावातील “हिंदू” हा शब्द नबाबाला खटकत होता…

पण निधीसाठी हिंदू या शब्दाशी तसूभरही तडजोड करायला पंडित मदन मोहन मालवीय तयार नव्हते.

समोर बसलेल्या पंडितजींकडे आपल्या पायावर घेतलेला पाय हलवत नवाब बोलत होता…

नबाबाच्या पायात मोजडी होती… एका अर्थी अप्रत्यक्षपणे नवाब पंडितजीना वहाण दाखवत होता.

पंडित जागेवरून उठले आणि अत्यंत नम्रतेने त्यांनी नबाबाच्या पायातली मोजडी काढून घेतली…

नबाबाने दुसरा पाय पुढे केला.. पंडितजीनी ती ही मोजडी काढून घेतली आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयासाठी आपल्याकडून हीच देणगी असे मी समजतो म्हणून बाहेर पडले…

 

आपण पंडितजीना जोडे दिले या आनंदात, नवाब खुशीत गाजरं खात होता…

आणि तो पर्यंत नबाबाच्या कानावर बातमी येऊन धडकली.

पंडित जी त्याच्या मोजड्यांचा हैदराबादच्या भर चौकात लिलाव करणार आहेत…

नबाबाच्या अब्रूचं खोबरं व्हायची वेळ आली होती…

आणि खरंच दुसऱ्या दिवशी सकाळी पंडितजी… नवाबाच्या मोजड्या घेऊन लिलावासाठी हैदराबादच्या भर चौकात उभे राहिले…

लिलावाची बोली सुरू झाली…

नबाबाचा खास माणूस प्रत्येक बोलीच्या वर आपली बोली लावू लागला…

पंडितजीचे जिवलग सहकारी गर्दीतून नबाबाच्या खास माणसाच्या बोली च्या वर प्रत्येक वेळी बोली लावत होते…

अर्थात तशी योजना खुद्द पंडितजीनीच केली होती…

पंडितजीची अपेक्षा होती तेवढी बोली नबाबाच्या खास माणसाने लावली…

बहुदा ती तीन-साडेतीन लाखाच्या आसपास असावी…

पंडितजींनी आपल्या जिवलग सहकाऱ्यांना डोळ्याने इशारा केला..

बोली थांबली…

लिलाव संपला…

आपल्याच मोजड्या… तीन साडेतीन लाख रुपये मोजून नवाबाने हैदराबादच्या भर चौकातून खरेदी केल्या… आणि हो हे शे-सव्वाशे वर्षापूर्वीचे तीन साडेतीन लाख रुपये…

जेव्हा ६४ पैशांचा रुपया होता आणि एका रुपयाला ३२ नारळ मिळत होता.

 

“हिंदू” या एका शब्दासाठी आपल्या बुद्धीमत्तेचे सगळे कसब पणाला लावणारा…

नबाबा ची सगळी गुर्मी मस्ती उतरवून त्याच्याच मोजड्या त्याच्याच गळ्यात मारणारा…

भारत मातेचा थोर सुपुत्र… MMM

देशाच्या स्वातंत्र्यासाठी तनमनधन करणारा हा आधुनिक महर्षी…

स्वातंत्र्यापूर्वी अवघे दहा महिने आधी स्वर्गवासी व्हावा हा काय दैवदुर्विलास…

पुण्यतिथीनिमित्त पंडितजींच्या चरणी कोटी कोटी वंदन !

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री सुनीता जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “है प्रीत जहाँकी रीत सदा !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

है प्रीत जहाँकी रीत सदा ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्याला फक्त एकच भाषा येत होती. आणि कामसुद्धा एकच माहीत होते…. जो पेशा स्वीकारला आहे त्या पेशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञा जशाच्या तशा पाळणे. त्याने त्याच्या देशासाठी सीमा भागात रस्ते बांधणीसाठी आवश्यक सर्वेक्षण करण्याचे काम इमानेइतबारे केले. त्याच्या देशाचे आणि शेजारच्या देशाचे युद्ध झाले आणि संपले सुद्धा. तो काही बंदूक चालवणारा सैनिक नव्हता. त्याचे सर्वेक्षणाचे काम मात्र सुरूच राहिले.

आपल्या तंबूच्या बाहेर असाच फेरफटका मारायला तो बाहेर पडला आणि रस्ता चुकला आणि शेजारच्या देशाच्या हद्दीत पोहोचला. अन्नपाण्यावाचून बर्फाळ डोंगरात वाट शोधून थकलेला तो रेडक्रॉसच्या या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या लोकांना आसाम मध्ये दिसला आणि त्यांनी त्याला शेजारच्या देशाच्या सैन्याच्या हवाली केले… अर्थात हा देश म्हणजे आपला भारत ! ‘जीते हैं किसीने देश तो क्या, हमने तो दिलों को जीता है… ‘ अशी धारणा असलेला देश.

देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न म्हणून भारतीय यंत्रणेने या चिनी सैनिकावर हेरगिरीचा आरोप ठेवला आणि त्याच्यावर रीतसर खटला चालला आणि त्याची रवानगी सात वर्षांच्या तुरुंगवासासाठी करण्यात आली! यानिमित्त तो देशातील काही तुरुंग फिरला. शिक्षा संपल्यानंतर मात्र याला कुठे पाठवायचे असा मोठा प्रश्न उभा राहिला. का कुणास ठाऊक मात्र याला चीनला पाठवण्याचे प्रयत्न झाले नाहीत. चीनकडूनही तशी काही चौकशी करण्यात आली नसावी, बहुदा.

भारतीय पोलिसांनी याला मध्यप्रदेशातील तिरोडी या दुर्गम गावात सोडून दिले. भाषेचा अडसर अजूनही होताच. तो फक्त आपले नाव सांगू शके.. वांग की! त्याच्या नावाचा एक अर्थ होता… वांग म्हणजे राजा आणि की म्हणजे एकमेवाद्वितीय! आणि योगायोगाचा भाग म्हणजे तिरोडीच्या गावकऱ्यांनी त्याचे नामकरण केले राज बहादूर. ते त्याला नेपाळी किंवा पूर्वोत्तर राज्यातील माणूस समजले असावेत!

या चिनी राजाने मग तिरोडी जवळच्याच पीठ गिरणीत दळणाचे काम केले. काही पैसे जमा झाल्यावर गावातच दूध विक्रीचे एक छोटे दुकान सुरू केले. एकूणच दिसणे, स्वभाव आणि बोलणे वेगळे असल्याने गावकरी त्याच्याशी तसे प्रेमाने वागत असत.

हळूहळू हा आपला (नसलेला) भाई हिंदीचा भाई झाला… त्याला मोडके तोडके हिंदी समजू लागले. त्याला चीनमधील त्याच्या घराचा पत्ता माहित होता.. त्याने कित्येक पत्रे पाठवलीसुद्धा. पण त्याच्या पत्राचे पहिले उत्तर मिळायला तीस वर्षे लागली.

मध्ये बराच कालावधी गेल्यामुळे आणि वांगकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने न घर का न घाट का अशी त्याची अवस्था झाली होती. त्याला आपले भाऊ आणि आईची खूप आठवण येत असे… पण त्याच्यापुढे पश्चातापाशिवाय काहीही नव्हते. वांगच्या आधी दोन चिनी सैनिक भारतातल्या मनोरुग्णालयात सुमारे पस्तीस वर्षे होते. त्यांना कालांतराने म्हणजे २००३ मध्ये चीनच्या हवाली करण्यात आले!

सर्वांशी अदबीने, प्रामाणिकपणे वागत असल्याने वांगबद्दल कुणाची काही तक्रार नव्हती. त्याचे वागणेही संशयास्पद नव्हते. त्याचा गावातले लोक सोडून इतर कुणाशी संबंध नव्हता. स्थानिक पोलिस त्याची अधून मधून खबर घेत असत आणि त्याला माराहाण सुद्धा होई.

कालांतराने वांग याने त्या गावातल्याच सुशीला नावाच्या अतिशय गरीब मजूर मुलीशी विवाह केला.. कित्येक वर्षे तो अत्यंत गरीबीत राहिला. त्यात त्याने दोन मुली आणि एका मुलाला जन्म दिला.

वांगची कथा तशी कित्येकवेळा समाज माध्यमातून प्रसिद्ध झाली होती पण त्याकडे त्यावेळी फारसे कुणी लक्ष दिले नाही. पण बीबीसी वर त्याची खबर आली आणि ती चीन पर्यंत पोहोचली. चीन सरकार आणि भारत सरकारमध्ये वांगबाबत बोलणे झाले आणि चीनने २०१३ मध्ये वांग, त्याचा मुलगा विष्णू, आणि सूनबाई नेहा आणि खनक नावाची नात यांना चीनचा पासपोर्ट दिला… पण वांग २०१७ मध्ये चीनमध्ये जाऊ शकला. अर्थातच त्याचे तेथे मोठे स्वागत झाले. याला कारणीभूत झाला तो सोशल मिडीया. त्याची पत्नी मात्र त्याच्या सोबत गेली नाही. मुलगा, सून आणि नात यांच्यासाठी चीनने प्रवासी विजा दिला होता. भारत सरकारने मात्र वांग याची इच्छा असल्यास त्याला भारतात परतण्याची परवानगी देऊ केली! पण तीनच महिन्यांत वांग त्याच्या आजारी पत्नीला भेटायला भारतात परतला. ऑक्टोबर २०१७ मध्ये सुशीला मृत्यू पावल्या. मग वांग पुन्हा चीनला परतला. आता त्याच्यापुढे दोन कुटुंबे होती.. चीनमध्ये त्याचे भाऊबंद आणि भारतात त्याचा मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे ! 

वांगने चिनी सैन्याकडे त्याच्या पेन्शनची मागणी केली. पण त्यांच्या कागदपत्रात वांग की ‘मयत’ दिसतो. आणि त्याच्याकडे आणखी कोणतीही कागदपत्रे नाहीत. मार्च २०२४ मध्ये वांग भारतात तीन महिन्याच्या प्रवासी वीजावर आला होता. त्यानंतर त्याची खबर किमान मिडीयात तरी आलेली नाही… बहुदा तो चीनला परतला असावा!

चिनी अर्थात चायनीज वस्तू त्यांच्या दर्जाबाबत भारतात तशा बदनाम आहेत! ‘चलेगा तो चांद तक नहीं तो शाम तक’ असेही गंमतीने म्हटले जाते. परंतू त्यात तथ्य असण्याची शक्यता खूप जास्त दिसते! असो. पण वांग हा चायनीज मात्र भारतात चक्क पन्नास वर्षे टिकला! इथल्या प्रेमळ माणसांनी या शत्रूला सांभाळून घेतले… हीच तर भारताची खासियत आहे. चीन आणि पाकिस्तानी लोकांबाबत मात्र असे म्हणता येत नही… आपले कितीतरी सैनिक त्यांच्या कैदेत खितपत पडले होते… आता तर ते या जगात असण्याची शक्यता अगदीच धूसर आहे… कारण भारत-चीन युद्धाला साठपेक्षा अधिक वर्षे उलटून गेलेली आहेत.

युद्धामुळे खूप नुकसान होते असे वयाची ऐंशीपेक्षा जास्त वर्षे उलटलेले वांग की म्हणत असतात.. त्यांनी कुटुंबाचा विरह खूप जास्त वर्षे सहन केला, त्यांची आणि आईची भेट शेवटपर्यंत झाली नाही ! 

पण चिनी कम आणि भारतीय जास्त असलेले वांग की उर्फ राज बहादूर वांग भारताबद्दल कृतज्ञ आहेत ! ‘ जीते हो किसीने देश तो क्या.. हमने तो दिलों को जीता है! ‘ असे आपण अभिमानाने म्हणू शकतो

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वागणुकीची इस्त्री ! – लेखक : श्री सचिन मेंडिस ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

वागणुकीची इस्त्री ! – लेखक : श्री सचिन मेंडिस ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

कधी कधी अगदी छोट्याशा चुका फार मोठं काही शिकवून जातात. मागच्या आठवड्यातील किस्सा घ्या. नवा कोरा, रेशमी कुर्ता इस्त्री करायला घेतला. मनात उत्सुकता होती, एकदम टापटीप दिसायला हवा. पण लक्षात आलं नाही की इस्त्री सुती कपड्यांसाठी तापवलेली होती. अतिशय उच्च तापमानावर. सरळ गरम इस्त्री कुर्त्याच्या छातीवर टेकवली आणि क्षणात… एक भला मोठा काळा डाग उमटला. थोडं सावरायच्या आतच एक अनपेक्षित, अक्राळ विक्राळ भगदाड. इस्त्रीची सेटिंग न पाहता सुती कपड्याचं उच्च तापमान रेशमी कपड्यावर लादण्याचा बेफिकीरपणा मला चांगलाच नडला होता.

ते भगदाड पाहून खूप वाईट वाटलं. पण त्या क्षणात एक वेगळाच विचार मनात चमकून गेला. आपण नात्यांमध्येही हेच करत नाही का? प्रत्येक माणूस वेगळ्या फॅब्रिकचा असतो. कुणी डेनिम, सहजपणे सगळं सोसून घेणारं. कुणी लिनन थोडं टोकदार पण व्यवस्थित सांभाळलं तर शिस्तीत बसणारं. आणि काही माणसं रेशमासारखी अतिशय नाजूक, हलकसं गरम तापमानही न झेलता येणारी.

पण आपण काय करतो? सगळ्यांना एकाच वागणुकीने हाताळायला जातो. आपल्या स्वभावाच्या तापमानात कुणी सहज बसतं, कुणी त्यात व्यवहार म्हणून सांभाळून घेतं, आणि काहीजण आपली रेशमी नाती सोडून कायमचे निघून जातात. आपण बोलतो, वागतो विचार न करता. आपल्या शब्दांची उष्णता समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या वस्त्रांना झेलता येईल का, याचा विचार करत नाही आणि मग जळालेले डाग पाहून आपल्यालाच वाईट वाटतं. खरं तर आपल्या स्वभावाच्या तापमानावर माणसं मोजायची नसतात, त्यांना त्यांच्या धाग्यांच्या ताकदीने समजून घ्यायचं असतं. प्रत्येक माणूस वेगळ्या फॅब्रिकचा असतो. त्याला समजून घेतलं तर नातं टिकतं, नाहीतर फक्त जळालेले ठसे उरतात.

काही नाती गरम इस्त्रीनेच नीट बसतात. थोडं स्पष्ट बोलावं लागतं, काही वेळा थोडं तापूनही घ्यावं लागतं. पण काही नाती मात्र फक्त गारवा ओळखतात. त्यांना उष्ण स्पर्श झेलताच येत नाही. बोलण्याच्या उष्णतेने जर नातं जळत असेल, तर समजून घ्या की तुम्ही योग्य तापमान ठरवलेलं नाही. आपण जर आपल्या संवेदनशीलतेचे तापमान व्यक्तीनुसार हाताळले, तर नाती सहज टिकतील, सुरकुत्या विरहित होतील आणि कुठेही न जळता सुंदर दिसतील.

पुढच्या वेळी इस्त्री हातात घेतली किंवा कुणासोबत संवाद साधला तेव्हा स्वतःला एकदा विचारून बघा, ही व्यक्ती सुती आहे की रेशमी? आणि त्यानुसार आपल्या वागणुकीचं तापमान ठरवा. सगळ्या नात्यांना सारखं तापमान लागू केलं की काही सुरकुत्याही नाहीशा होतात आणि काही नातीसुद्धा. जळलेला रेशमी कुर्ता एकवेळ शिवता येईल पण जळलेलं नातं पुन्हा विणता येईलचं असं नाही.

आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी काही ऋणानुबंध असतात.

निरपेक्ष प्रेमाने जवळ येणारी माणसं ओळखता आली पाहिजेत. कारण परमेश्र्वराने आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळावी म्हणून ती योजना केलेली असते पण आपण वारंवार त्यांना नाकारलं तर ते पुन्हा कधीही आपल्या जवळ येणार नाहीत. कारण सुसंधी वारंवार मिळत नाही.

लेखक – श्री सचिन मेंडीस

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ८ मार्च महिलादिन… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

🔅 विविधा 🔅

८ मार्च महिलादिन☆ सौ शालिनी जोशी

संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत महदंबा, संत सोयराबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई, संत वेणाबाई हे स्त्री संत सप्तक१३ व्या शतकापासून १७ शतकापर्यंतच्या चारशे वर्षाच्या काळात होऊन गेले. सर्वांची लौकिक जीवनातील पार्श्वभूमी खडतर होती. संत वेणाबाई व संत महादंबा या बाल विधवा होत्या. संत मुक्ताबाई व संत जनाबाई अविवाहित होत्या. संत बहिणाबाईंचा विषम विवाह होता. संत सोयराबाई शुद्र, अशिक्षित, तर संत कान्होपात्रा या गणिकेची मुलगी. पण या सर्वांचे नाम स्वातंत्र्य कोणालाही हिरावून घेता आले नाही. सर्वांनी पुरुष गुरु केले व परमार्थाची वाटचाल केली. परमार्थात जात, धर्म, स्त्री, पुरुष भेद नाही म्हणून मुक्ताबाईंना पुरुष शिष्यही करता आले (चांगदेव). संत कान्होपात्रेला कुणी गुरुपदेश केला नाही. असे प्रत्येकीचे जीवन वेगळे वेगळे.

या सर्वांच्या साहित्य निर्मितीला त्या काळातील समाजातील अनिष्ठ चाली कारणीभूत आहेत. संत मुक्ताबाई कुट रचनेकडे, संत जनाबाई विठ्ठलभक्ती कडे, संत महदंबा कृष्णभक्ती कडे, संत सोयराबाई विटाळाकडे, संत बहिणाबाई जीवनातील अनुभवाकडे व कान्होपात्रा तारणहार विठ्ठलाकडे, संत वेणाबाई रामलीलेकडे वळल्या. प्रत्येकीचे आयुष्य वेगळे पण भक्ती व विरक्ती एकच. ईश्वरी सामर्थ्याचा प्रत्यय हाच आधार. संसारिक घटकांना त्यांनी अध्यात्मिक अर्थ दिला. समाजाशी संघर्ष करत उच्च पातळीवरचे पारंपरिक जीवन जगल्या. देवाशी विठ्ठलाशी त्यांचा मनमोकळा संवाद. तोच सखा, सांगाती, माऊली. कुणीही पतीचे नाते विठ्ठलाची जोडले नाही हेच महाराष्ट्रातील या संत स्त्रियांचे वैशिष्ट्य. समाजाला सदाचाराचा सद्वविचाराचा मार्ग दाखवण्याचे त्यांचे कार्य मोलाचे आहे. पतनाकडे वाटचाल होत असलेल्या समाजाला नाम भक्तीचा सोपा मार्ग दाखविला. अभंग व ओव्या रूपाने आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठी साहित्यात मोलाची भर घातली. त्यामुळे स्त्रियांच्या स्वतंत्र विचाराला चालना मिळाली. समाजात स्त्रियांना स्थान मिळाले. धीटपणा मिळाला.

आजच्या सर्व क्षेत्रात उच्च स्थान मिळवणाऱ्या स्त्रियांच्या मागे या सर्वांचे पाठबळ नक्कीच आहे. कोणीतरी बीज पेरावे तेव्हा काही काळाने त्याचा वृक्ष होतो. आणि तो बहरतो. हेच खरे! सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ आणि असेच कार्य करणाऱ्या स्त्रिया या अलीकडच्या काळातील संतच. पूर्वीच्या स्त्रियांची परंपरा त्यानी चालवली आणि पुढेही चालू आहे. फक्त प्रत्येकीचे क्षेत्र वेगळे. महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीला सलाम!

 (काही स्त्री संतांविषयी सविस्तर माहिती देणारे लेख लवकरच प्रकाशित करत आहोत… संपादक)

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कर्तृत्वाचे डोही अभिमान तरंग” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? मनमंजुषेतून ?

“कर्तृत्वाचे डोही अभिमान तरंग” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

“काका, तुझ्याकडे मदर टेरेसांचं पुस्तक आहे का?” 

“का गं ?”

“मला गोष्ट सांगायची आहे. वुमन्स डे आहे ना. ”

“मदर टेरेसांची गोष्ट ?”

“हो.”

“कुणी सांगितलं हे नाव?”

“मिस् ने सांगितलं.”

“पण त्यांचीच गोष्ट का बरं ? दुसऱ्या कुणाची गोष्ट सांगितली तर चालणार नाही का ?”

“नाही.”

“का पण ?”

“त्यांनी सांगितलं, हीच गोष्ट सांगायची म्हणून.”

“हे बघ. आपण एक काम करू. मी तुला दोन गोष्टी सांगतो. मग त्यातली जी गोष्ट आवडेल ती तू सांग. चालेल का ?”

“चालेल. ”

मग मी तिला मदर टेरेसांविषयी माहिती सांगितली आणि पद्मश्री बछेंद्री पाल यांच्याविषयी माहिती सांगितली.

एव्हरेस्ट चा ट्रेक, बर्फातून चालत जाणं, जगात पाचव्या क्रमांकाची एव्हरेस्ट वीरांगना असणं, त्या ट्रेकिंग शिकवतात, जगभरातले लोक त्यांच्याकडे शिकण्यासाठी येतात, हे सगळं तिला फार आवडलं. थ्रिलिंग वाटलं. महिला दिनाच्या कार्यक्रमाला आणखी पाच दिवस होते. हीनं दुसऱ्या दिवशी तिच्या मिस् ना बछेंद्री पाल यांची गोष्ट सांगितली आणि हीच गोष्ट सांगणार आहे असं लोकमान्यांच्या बाण्यानं सांगितलं.

तिच्या मिस् नं गोष्ट ऐकून घेतली खरी, पण त्यांना त्यातून मोटिव्हेशनल असं काही दिसलं नाही म्हणे. त्यांनी सांगितलं, मदर टेरेसांचीच गोष्ट हवी.

ही पुन्हा माझ्याकडे हजर. काय काय घडलं ते तिनं मला सांगितलं. ‘मदर टेरेसांची गोष्ट सांगणार नसशील तर कुठलीच गोष्ट सांगू नकोस’ असं मिस् म्हणाल्या, हेही सांगितलं.

मी तिला विचारलं, “आईबाबा काय म्हणाले ?” 

ती म्हणाली, “तू मदर टेरेसांची गोष्ट सांग. काकाला यातलं काहीही सांगू नकोस. असं आई म्हणाली. ” 

“आणि बाबा ?”

“ह्या ट्रेकर आहेत ना त्या फक्त पद्मश्री आहेत. मदर टेरेसा तर भारतरत्न आहेत. म्हणजे त्या जास्त मोठ्या आहेत, त्यांचीच गोष्ट सांग. असं बाबा म्हणाले. ”

“बरं. चल. तुला अजून एक गोष्ट सांगतो. ती एकदम मोटिव्हेशनल स्टोरी आहे. ” 

“सांग. ”

मग मी तिला लता मंगेशकरांची गोष्ट सांगितली. त्यांचं लहानपण, त्यांनी केलेले कष्ट, सुरूवातीचे दिवस, अंगात खूप ताप असतानाही गाणं कसं गायलं हे सगळं तिला सांगितलं. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे तीनही पुरस्कार मिळाले आहेत, हेही आवर्जून सांगितलं.

कार्यक्रम तीन दिवसांवर आला होता. हीनं ठरवलं की, मी लता मंगेशकरांचीच गोष्ट सांगणार. दुसऱ्या दिवशी ऑनलाईन शाळेत तिनं तिचा निर्णय मिस् ना सांगितला. पुन्हा तोच प्रकार. मिस् म्हणाल्या, “स्टोरी साधीच तर आहे. यात मोटिव्हेशनल काय आहे?” ही पुन्हा हिरमुसली.

तिच्या मिस् म्हणजे “इतकी चुकीची माहिती इतक्या आत्मविश्वासानं दुसरं कोण देणार ?” या प्रकारच्या शिक्षिका आहेत, हे माझ्या लक्षात यायला फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. मी तिला सांगितलं, “जाऊ देत. तू उद्या मिस् ना सांग, मी कुठलीच गोष्ट सांगणार नाही. ”

तिनं दुसऱ्या दिवशी जसं च्या तसं मिस् ना सांगितलं. त्यांचं (जेवढं होतं तेवढं) धाबं दणाणलं असणार. त्यांनी दोन मिनिटांत तिला सांगितलं की, “तू लता मंगेशकरांची गोष्ट सांगितलीस तरी चालेल. ”

ठरल्याप्रमाणे ८ मार्च रोजी तिनं लता मंगेशकरांची गोष्ट सांगितली. सगळ्यांनी तिचं अभिनंदन केलं. काल ती सगळा वृत्तांत सांगायला घरी आली होती. मग मी तिला विचारलं की, “इंटरनॅशनल वुमन्स डे का सेलिब्रेट करतात, हे तुला माहिती आहे का?” 

ती म्हणाली, “नाही. ”

मग मी तिला १९०८ साली महिलांनी आंदोलन का केलं, १९०९ मध्ये अमेरिकन सोशलिस्ट पार्टीनं आंदोलन कसं केलं, क्लारा जेटकिन यांनी त्याला इंटरनॅशनल कसं केलं, का केलं, १९११ पासून हा दिवस इंटरनॅशन वुमन्स डे म्हणून साजरा कसा होतो, १९७५ पासून युनायटेड नेशन्सने हा दिवस सेलिब्रेट करायला सुरूवात केली, वगैरे सगळा इतिहास सांगितला.

अमेरिका, जर्मनी, रशिया, ब्रिटन, या देशांना महिला दिवस साजरा करण्याची गरज का पडली, हेही सांगितलं. १९१९ साली (म्हणजे महिला दिवस साजरा व्हायला लागून नऊ वर्षं उलटल्यानंतर) आपल्या देशात जालियनवाला बाग हत्याकांडात कितीतरी महिलांना जीव गमवावा लागला, ब्रिटीशांनी कितीतरी महिलांवर अत्याचार केले, हे ही सांगितलं. आपल्या देशात महिलांवर बेछूट अत्याचार करणारे हे लोक त्यांच्या देशात मात्र महिला दिवस साजरा करत होते, हेही सांगितलं.

१९१७ साली रशियामध्ये महिलांनी अन्न आणि शांततेसाठी चार दिवसांचं आंदोलन केलं. त्या चार दिवसांच्या आंदोलनामुळं त्यावेळच्या रशियन झार ला पायउतार व्हावं लागलं आणि रशियन सरकारनं महिलांना मतदानाचा अधिकारही दिला, याचीही माहिती सांगितली. तिला ही सगळी माहिती ऐकून आश्चर्य वाटलं.

ज्यांनी झाशीच्या राणीवर तलवार उगारली, तेच देश महिला दिवस साजरा करण्याची सुरूवात करतात आणि त्याला इंटरनॅशनल रूप कसं देतात, हा विरोधाभास तिच्या लक्षात आणून दिला. ज्यांनी आपल्या देशातली आंदोलनं माणसांना गोळ्या घालून, फाशी देऊन चिरडली, त्यांनी त्यांच्या देशातल्या महिलांच्या आंदोलनाचा सन्मान केला आणि वरून त्याला इंटरनॅशनल केलं, ह्या प्रकाराला काय म्हणावं? 

महिलांना जगभर प्रचलित असणारा सोशल मीडीया वापरू न देणारा ‘चीन’ महिला दिवस किती आनंदानं साजरा करतो, हे तिला सांगितल्यानंतरचा तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

देवीनं महिषासुराला मारलं तो महिला दिवस नाही का ? 

श्रीकृष्णानं द्रौपदीचं रक्षण केलं तो दिवस महिला दिवस नाही का?

प्रितीलता वडेद्दार, कल्पना दत्त, लक्ष्मी सहगल, भोगेश्वरी फुकनानी, बेगम हजरत अली, मातंगिनी हाजरा, कनकलता बरूआ यांनी देशासाठी आपले प्राण दिले, तो महिला दिवस नाही का ? 

भिकाजी कामा यांच्या कार्याकरिता आपण महिला दिवस साजरा करू शकत नाही का? 

आपण यांची केवळ आठवण ठेवून उपयोग नाही, यांचे उपकार न फिटण्यासारखे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई, बाबाराव सावरकरांच्या पत्नी यशोदाबाई आणि नारायण सावरकर यांच्या पत्नी शांताबाई यांना किती यातना भोगाव्या लागल्या, महिला दिवस साजरा करण्यात पुढाकार घेणाऱ्या ब्रिटीशांनीच त्यांचा किती छळ केला, त्यांची दयनीय अवस्था कशी झाली, हे सगळं विसरणं म्हणजे कृतघ्नपणाच आहे.

वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी भारत छोडो आंदोलनात गोळी लागून कनकलता बरूआ यांचा मृत्यू झाला. ब्रिटीशांनी गोळी मारली त्यांना. पण त्यांना आपण सगळेच विसरून गेलो. २१ व्या शतकात वयाच्या १७ व्या वर्षीच अंगावर गोळी झेलणाऱ्या मुलीला नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला.. ! आपणच आपल्या देशासाठी लढलेल्या सुकन्येला सन्मान देऊ शकलो नाही. त्यांचा फोटोच काय, पण नावही कुठल्या शाळेतून घेतलं जात नाही, पुरस्कार तर लांबच राहिला.

विसाव्या शतकाच्या सुरूवातीला १५ हजार महिलांनी आंदोलन केलं, तर ती एक कृती आज आंतरराष्ट्रीय रूप घेऊन जगभर साजरी केली जाते. पण आपल्या देशातल्या माणसांची, त्यांच्या अशा कर्तृत्वाची देशाच्या संसदेत राष्ट्रीय नेत्यांकडून चेष्टा होते, निंदानालस्ती होते आणि सगळं जग ते पाहतं. आपल्याला आपल्या गौरवगाथेविषयी अभिमान का नाही ? कारण, आपल्याला हे काही माहितीच नाही, कुणी सांगत नाही, कुणी बोलत नाही. ज्यांनी मुलामुलींना या कथा सांगितल्या पाहिजेत, त्यांनाच त्या माहिती नाहीत आणि माहित करून घेण्याची इच्छाही नाही. हेच तर मोठं दुर्दैव आहे.

“जगाला ह्यांचा परिचय करून देण्यात आपण कमी पडलो आहोत, हे नक्की. पण आता सुधारलं पाहिजे. चूक दुरूस्त केली पाहिजे. कर्तृत्वाचा सन्मान करायचा तर प्रत्येकाचाच झाला पाहिजे. कर्तृत्वाची प्रेरणा प्रत्येकातच आहे. तिचं कौतुक करता आलं नाही तरी चालेल, पण त्या कर्तृत्वाविषयी आदर मात्र बाळगलाच पाहिजे. समजलं का ?” मी तिला विचारलं.

“काका, तू मला ह्या सगळ्यांविषयीची आणखी माहिती देशील का? मी पुढच्या वर्षी यावरच प्रोजेक्ट करीन. ” ती.

“नक्की देईन. पण उन्हाळ्याच्या सुट्टीत… ! आता पळा.. परीक्षा आहे ना ? ती संपली की करूया प्रोजेक्ट.. !” मी.

ती आनंदानं गेली. अगदी अनाहूतपणे उघडलेला मनाचा कप्पा बंद करून मी पुन्हा माझ्या कामामध्ये गुंतून गेलो….. ! 

 

© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ

 संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “तंत्राधिष्ठित शिवनीती” – लेखक – श्री पंकज कणसे ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “तंत्राधिष्ठित शिवनीती” – लेखक – श्री पंकज कणसे ☆ श्री जगदीश काबरे ☆

छत्रपती शिवाजी महाराज हा इतिहासात उमटलेला सुवर्णठसा ठरतो. या सोनेरी इतिहासाचे विश्लेषण करताना असे लक्षात येईल की तंत्रज्ञानात्मक दृष्टिकोन हा महाराजांच्या राजकारणाचा कायमच पाया राहिला. भौतिक स्वरूपात प्रकट होणारे किल्ले उभारणी, आरमार निर्मितीसारखे तंत्रज्ञानात्मक आविष्कार हे केवळ हिमनगाच्या दृश्य स्वरूपासारखे आहेत, तर त्यामागील तांत्रिक विचार आणि तात्त्विक चौकट डोळ्याला न दिसणाऱ्या हिमनगासारखी गूढ आणि अदृश्य आहे जिने हा दृश्य डोलारा सांभाळला आहे. अस्तित्वात असणारी धार्मिक-सामाजिक परिस्थिती, भूगोलाचे प्रारूप, प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीचा अंदाज आणि उपलब्ध मनुष्यबळाचा कुशलतेने वापर या सगळ्यांचा मेळ घालून उपलब्ध स्राोतांचा कल्पक वापर करण्यासाठी भावनांशी सलगी सोडून तांत्रिक दृष्टिकोनाचा अंगीकार महाराजांनी आपल्या कार्यसिद्धीसाठी केला.

छत्रपती शिवरायांच्या महाराजांच्या युद्धतंत्र, किल्लेबांधणी आणि राज्यविस्तार या सर्वांचे मूळ आपणास भूगोलाच्या वैज्ञानिक विश्लेषणामध्ये दिसून येईल. जेव्हा समाज धार्मिक अंधश्रद्धांमुळे समुद्रगमन निषिद्ध मानत होता तेव्हा मुघल आणि इतर साम्राज्यांनी समकालीन समुद्रमार्गांना दुय्यम मानले होते. मात्र महाराजांनी बारकाईने विचार करून नाविक ताकदीचे महत्त्व ओळखले. भारतीय सत्ताधारी १०० वर्षांनंतरही आपापसांत भांडत असताना युरोपियन लोकांचे भारतात येण्याचे उद्दिष्ट केवळ व्यापार नाही हे त्यांनी ओळखले. त्यांनी स्वत:चे आरमार केवळ उभेच केले नाही तर समुद्री मार्गांवर वचक बसविला. हे करताना त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. देशी कारागिरांकडे जहाजबांधणीचे कौशल्य उपलब्ध नव्हते तेव्हा त्यांनी स्वत:च्या कमतरता ओळखून युरोपिअन लोकांना चाकरीस ठेवले. पोर्तुगीज आणि ब्रिटिश एक होऊन आव्हान देऊ लागले तेव्हा महाराजांनी फ्रेंचांकडून जहाजावरील प्रगत उपकरणे आणि शस्त्रास्त्रे विकत घेऊन आपली तांत्रिक बाजू वरचढ ठेवली.

शिवाजी महाराजांची तांत्रिक दूरदृष्टी त्यांच्या काळातील भू-राजनीतिक परिस्थितीवर मोठा प्रभाव टाकणारी होती, ज्यात तंत्रज्ञानाचा धोरणात्मक उपयोग दिसून येतो. दुर्गांची उभारणी करताना त्यांनी प्रत्येक किल्ल्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण केली. त्यामध्ये सिंधुदुर्गचा अनियमित आकार, रायगडाची भव्यता, राजगडाची अभेद्याता, प्रतापगडाची दुर्गमता या सर्वांचा समावेश होईल. प्रत्येक किल्ल्यावर पाण्याची मुबलक सोय करून कमी स्राोतांमध्ये किल्ल्यांची संघर्षशक्ती वाढवली. आलिशान सजावट, कलादालने वगैरे टाळून प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत असलेल्या कमतरतेची कायम जाणीव ठेवली. बिनीचे मार्ग, सागरी टापू, टेहळणीच्या जागा या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी किल्ल्यांची उभारणी अथवा डागडुजी केली. सिंधुदुर्गच्या उभारणीमध्ये समुद्रामध्ये पाण्याखाली अंदाजे १२२ मीटर लांब, तीन मीटर उंच आणि सात मीटर रुंद भिंत बांधल्याचे दाखले आहेत. त्यामुळे किल्ल्याकडे येणारी शत्रूची गलबते फुटून निकामी होत असत.

गनिमी कावा ही शिवाजी महाराजांनी विकसित केलेली एक युद्धनीती होती, ज्यात स्थानिक भूभागाचे ज्ञान आणि मोजक्या घोडदळाच्या जलद हालचालींचा वापर यातून शत्रूच्या रसद पुरवठ्याचे मार्ग कापून टाकले जायचे. गरजेनुसार कल्पकता अवलंबणे हेदेखील महाराजांचे एक वैशिष्ट्य! वाघनखांचा वापर ही त्याच कुशाग्र बुद्धिमतेची चुणूक. पुढे जाऊन त्यांनी ठिकठिकाणी दारूगोळ्याचे कारखाने काढण्यासाठी पुढाकार घेऊन तोफशास्त्र विकसित करण्याचा प्रयत्न केला.

शिवराय राज्यकर्ते म्हणून एकमेवाद्वितीय असले तरी त्यांचे वारसदार म्हणून आपण कुठे आहोत? भावना आणि अस्मितांच्या कोंडाळ्यात अडकून महाराजांचे दैवीकरण करून आपण चिकित्सेची दारे बंद करायला सुरुवात केली. वसंत कानेटकरांच्या शब्दात, महाराजांनी इथल्या सामान्य गवताच्या पात्याचे भाल्यात रूपांतर केले. आपण आपल्याच हातांनी त्या पात्याचे निर्माल्य करून घेण्याचे पातक करीत आहोत. ते भाले होण्याची प्रेरणा महाराजांनी युद्धशास्त्रपारंगता, वैज्ञानिक-तांत्रिक दृष्टिकोन, चिकित्सक वृत्ती आणि करारी व्यवहारवाद यांच्या मिलाफातून प्रसवलेली संजीवनी होती. ती पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी पुन्हा त्याच विज्ञान-तंत्रज्ञान केंद्रित वाटा धुंडाळण्याची वेळ आलेली आहे.

*

लेखक : श्री पंकज कणसे 

माहिती संग्राहक व प्रस्तुती : श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बाई म्हणून जगताना… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ बाई म्हणून जगताना… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

मार्च महिना आला की वेध लागतात ते आठ मार्च “जागतिक महिला दिनाचे “. ” पहाटे अंथरुणावरून उठल्यापासून शुभेच्छांचा वर्षाव सुरू होतो. जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा….. शुभेच्छा… शुभेच्छा. “

महिलांच्या यशाचा, कर्तृत्वाचा गौरव दिवस. या दिवशी आमच्या बाई म्हणून जगण्याला एक वेगळाच रूबाब येतो. बाई म्हणून जगण्याचा एक अभिमान मनाला स्पर्शून जातो. आणि मनात येते एक विचारधारा ” बाई म्हणून जगताना “

मुलगी लग्न होऊन सासरी येते आणि कु. ची सौ. होते. तिच्या नावातील हा सौ. चा बदल म्हणजे तिच्या आयुष्यातील एक नविन टप्पा असतो. स्वतःवर पडलेल्या अनेक नवीन जबाबदारीतून ती मुलगीची बाई कधी होते ते स्वतःला सुध्दा उमगत नाही. लग्नानंतर जुन्या नात्यांची आठवण आणि नवीन नात्यांचे आगमन याचा मेळ घालत ती आपले बाईपण जपू लागते. परक्या घरून आलेली एक मुलगी बाई म्हणून जगणं स्विकारताना

अंगणातील तुळशीपासून ते स्वयंपाकघरापर्यंत सासरकडील घराला केंव्हाच नव्याच्या नवलाईने आपले मानू लागते. हे बाईपण एकदा स्वीकारले की, सुरू होतो तिचा नवीन जीवनप्रवास. कधी आपल्या कष्टातून, कधी जबाबदारीतून, कधी संघर्षमय वाटचाल करत तर कधी कर्तृत्वातून ती स्वतःला सिद्ध करत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटते. घराची, कुटुंबाची जबाबदारी पार पाडता पाडता कालांतराने तिच्या जगण्याला अनेक फाटे फुटतात. अनेक नवनवीन नात्यांची भर पडते. म्हणजे बाई म्हणून जगता जगता काळानुसार तिच्या डोक्यावरचा भार वाढतच जातो. संसाररूपी भवसागरात अनेक व्यापांनी बाई वेढली जाते. आर्थिक जबाबदारी पार पाडताना बाईला घरातून बाहेर पडून बाहेरच्या अनेक वाटा गवसतात. खेड्यातील बाई असेल तर घरातून बाहेर पडून तिची पावले शेताकडे वळू लागतात. शहरात राहणारी बाई कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यास घरातून बाहेर पडून नोकरी करू लागते. आजच्या धावपळीत घर आणि रान किंवा घर आणि ऑफिस, नोकरी अशी दुय्यम जबाबदारी पार पाडत असताना बाईच्या वाट्याला येणारे कष्ट, यातना, मान-सन्मान, अपमान, अस्मितेचा प्रश्न, तिच्या अस्तित्वाची लढाई या सर्व गोष्टी तिच्या दैनंदिनीचा अविभाज्य भाग झाला आहे. इतका सगळा संघर्ष झेलण्यास आज ती स्वतः सज्ज आहे. आपल्या कर्तृत्वाचा ठळक ठसा तिने समाजमनावर उमटला आहेच. तिने गवसलेल्या या नव्या क्षितिजावर ती रममाण होते. संघर्षातून स्वनिर्मित केलेले अस्तित्व हा तिचा अधिकार आहे. आणि बाई म्हणून जगतानाचा स्वाभिमान सुध्दा आहे ” हा स्वाभिमान टिकवून ठेवण्यास ती सदैव तत्पर असते.

पुरुष माणसाचे काम हे एकमार्गी असते. कुटुंबासाठी पैसा निर्माण करणे. त्यासाठीची धडपड अशी एकच मुलभूत जबाबदारी त्यांनी स्विकारलेली असते. आपल्या एकमार्गी नेतृत्वातून पुरुष कुटुंबाप्रती आपली जबाबदारी पार पाडतात. पण बाईचे तसे नसते. तिचे हात अनेक कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांनी बांधलेले असतात. अनेक रूढी परंपरांचे साखळदंड तिच्या पायी जखडलेले असतात. काही तिने स्वतः बांधून घेतलेले तर काही समाजाने अडकवलेले. यात ती कितीही थकलीभागलेली असली तरी कर्तव्य आणि जबाबदारीतून ती मागे हाटत नाही. अगदी अंथरुणावर पडे पर्यंत. रात्री अंथरुणावर पडली तरी पुन्हा ऊठून दरवाजा नीट बंद केला आहे का हे पाहूनच ती पुन्हा निवांत झोपते. आपल्या कुटुंबावर ती नितांत प्रेम करत असते. आपले बाईपण जपताना खऱ्या कसोटीत उतरते तेंव्हा ती स्वतःचे भान हरपून जगते. अगदीच आजारी असताना अंथरुणावर पडून असेल तरी सुध्दा ती आपल्या आजारपणापेक्षा ती कुटुंबाचा जास्त विचार करते. थकल्या-भागल्या, खचल्या मनाला बाई नव्याने उभारी देवून कंबर कसून भक्कम उभी रहाते. आपले घर सावरताना अथवा निटनेटके ठेवताना बाई अंतर्मनातून कितीही विस्कटलेली असेल तरीही ती मोठ्या जुजबी हातोळीने ती आपला घरसंसार सावरते. पुरुष जेंव्हा बाहेरून कामावरून किंवा ऑफिसमधून घरी येतात तेंव्हा ते घरी येऊन आरामशीर बसू शकतात. घरातले बाईमाणूस त्यांची चहापान वगैरे विचारपूस करते. पण बाईच्या बाबतीत असे नसते ती बाहेरून कितीही थकूनभागून आलेली असेल तरीपण ती घरात येताच घरपण जपू लागते. म्हणूनच बाई म्हणून जगणं हे रूढी, परंपरा, कर्तव्य आणि जबाबदारीची जणू पेटती मशालच आहे. “आतून विस्कटलेल्या मनाला सावरणं आणि कुटुंबासाठी प्रसन्नतेचा मुखवटा चढवून चेहरा फुलवणं हे बाई म्हणून जगतानाचं ब्रीद आहे. “

प्राचीन इतिहासातून स्त्रीविषयक अनेक दंतकथा, कल्पक कथा चालत आल्या आहेत. आजही त्यांचा प्रभाव समाजमनावर आहेच. त्यामुळे आजही स्त्री ही पुरूषामागे दुय्यम स्थानी उभी असताना दिसते. पण कालानुरूप स्त्री ही या नवयुगाची रागिणी आहेती वीरांगना आहे. आकाशाला गवसणी घालणारी ती प्रगतीची उडान आहे. आजच्या स्त्रीस्वातंत्र्याला विस्तृत स्वरूप आले आहे. प्रत्येक बाई आपली व्यक्तिगत अस्मिता जपू लागली आहे. त्यासाठी तिची सदैव धडपड सुरू असते. आजची स्त्री आपल्यातील लुप्त शक्तीचा उद्रेक करून अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवताना दिसत आहे. आपल्या संकुचित स्वातंत्राचे एक विस्तृत अवकाश बाईने स्वतःच निर्माण केले आहे. बोचट रूढी परंपरा, दुःखाची शृंखला ढासळून ती आधुनिकतेची स्वीकृती झाली आहे. पण बाईचे असे पलटते रूप काही ठिकाणी पुरुषी अहंकाराला ठेच लागणारे ठरत आहे. म्हणूनच आज काळाची गरज म्हणून आदिमतेतून चालत आलेल्या या दंतकथा, कल्पक कथांना वेगळे वळण, वेगळे स्वरूप देणे. जरूरी आहे. स्त्री-पुरुष समानतेचा वारसा हक्क सांगणारे साहित्य निर्माण होऊन समाजात आणने गरजेचे आहे.

शेवटी बाई म्हणून तुम्ही काय आणि मी काय आपण सगळ्याचजणी या समाजव्यवस्थेच्या ढाच्यात चेपून, स्वतःला वरवरचे पाॅलिश चढवून, रूढी आणि परंपरेच्या धाग्यात विणून घेतलेले एकाच माळेचे मणी आहोत. प्रत्येकीच्या वाटा जीवनशैली, गाव-शहरीवस्ती हे काहीही वेगळेपण असो पण बाई म्हणून जगतानाचा एकंदरीत संघर्ष आहे तो प्रत्येकीच्या वाट्याला थोडाफार सारखाच आहेच हे सत्य नाकारता येणारे नाही. असो.

जीवन तिथे संघर्ष हा आलाच. पण पुरुषांच्या तुलनेत बाईच्या वाट्याला थोडाफार जास्तीचा भोग असतो. पहाटे उठल्यापासून ते रात्री अंथरुणावर पडेपर्यंत आपल्या कुटुंबाप्रती निगडीत दैनंदिनीत बाई व्यस्त असते. यामधून अधिक विचार केला तर शहरातील बाई पेक्षा खेड्यातील बाईची, बाई म्हणून जगण्याची धडपड आणि संघर्ष जास्त असतो. कारण खेड्यातील बाईवर फक्त कुटुंबाची जबाबदारी नसते तर तिची नाळ शेतबांधाशी सुध्दा जोडलेली असते. त्यामुळे गाववाड्यांवर रहाणार्‍या बाईवर जास्त कष्टाचा भार पडतो. पण आपली हुशारी आणि कौशल्यातून आपली जबाबदारी ती उत्तम पार पाडते. मोठ्या चातुर्याने ती पैला-पै जोडून ठेवते. कुटुंबाची आर्थिक घडी सुरळीत बसविण्यात यशस्वी होते. कष्ट, जबाबदारी, आर्थिक नियोजन यात खेड्यातील बाई सदैव सक्षम आहे. त्यामुळे कुटुंब ढासळण्याचे, विस्कळीत होण्याचे अथवा आर्थिक घडी विस्कटण्याचे शहराच्या तुलनेत खेड्यातून प्रमाण कमी आहे.

बाई म्हणून जगणे म्हणजे ना कुणी ज्योतिषाला अथवा ना कुणी शास्त्रज्ञाला थांग न लागणारे ‘जणू एक विराट भावविश्व आहे.’ मी स्वतः बाई असले तरी बाई मनाचे गुढ उकलण्यास मी असमर्थ आहे. त्यामुळे हा लेख म्हणजे बाई म्हणून जगतानाचा …… एक अनुभव समजावा.

एकंदरीत विचार केला तर बाईचे जगणं म्हणजे सुख-दुख, आनंद, समाधान, कष्ट, यातना, संघर्ष, त्रागा, ओढ, जिव्हाळा……. इत्यादी अनेक छोटे मोठे प्रवाह एकत्रीत येऊन संपुर्ण मानवजातीमधील विशिष्ट आणि महत्वपूर्ण धारा आहे. या धारेच्या किनाऱ्यावर ती थोडी का होईना विसावत असतेच ….

© सौ.वनिता संभाजी जांगळे (घागरे)

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा, जि. सांगली, दुरभाष्य क्रमांक- 9327282419

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मोलाचा संदेश देणारी छोटी घटना…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “मोलाचा संदेश देणारी छोटी घटना…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

माझी मलाच लाज वाटली. खजिल झालो.

आजूबाजूच्या छोट्या छोट्या घटना आपल्याला काही सुचवत असतात.

आज दक्षिण मुंबईतल्या एका रेस्टॉरंटमध्ये दुपारच्या जेवणासाठी गेलो असताना व सोबत कोणी नसल्यामुळे एक भाजी आणि दोन तंदूर रोटी ऑर्डर केल्या. मला पहिलेच कल्पना होती की भाजी खूप जास्त देण्यात येणार आहे त्यामुळे मी पहिलेच मन बनवलं होतं की आपण भाजी आणि एक जास्तीची तंदूर रोटी पार्सल म्हणून बांधून सोबत घेऊन गरजूला द्यायची.

माझं जेवण अर्ध्यात असतानाच एक उद्योजक अथवा व्यावसायिक असलेला तरुण माझ्या टेबलवर येऊन बसला. त्याने पण काही ऑर्डर केले. माझं जेवण संपण्याच्या आधी त्याची ऑर्डर आली त्यांनी आधी वेटरला बोलावून जेवण सुरू करण्याआधी त्यानी मागितलेल्या भाजीचा अर्धा भाग आधीच सोबत नेण्यासाठी पार्सल करण्यास सांगितले. सोबत माझ्यासारखेच त्यानी काही तंदुरी रोटी ऑर्डर करून त्यात भाजी सोबत द्यायला सांगितले. त्याने ऑर्डर केलेल्या भाजीचा अर्धा भाग पार्सल म्हणून पॅक झाल्यानंतरच त्याने जेवायला सुरुवात केली.

त्याच्या या कृतीमुळे व त्यामागच्या भावपूर्ण व्यवहारामुळे मला माझीच लाज वाटली. मी त्याला विचारले की हे पार्सल घरच्यांसाठी आहे का ? तो म्हणाला नाही कोणीतरी गरजूला मी जेवण झाल्यावर देइन. मी त्याला विचारले की पार्सल जेवण झाल्यानंतरही घेता आली असते. तो तरुण मला म्हणाला जेवण झाल्यानंतर पार्सल करून कुणाला दिल्याने आपण कोणावर तरी उपकार केल्याचा आणि अहंकाराचा भाव येतो आणि जेव्हा आपण जेवण सुरू करण्याआधीच शिल्लक राहणारे अन्न कोणासाठी पॅक करून घेतो त्यात मदत, समाधान, स्वाभिमानाचा भाव येतो. समोरचा माणूस पण स्वाभिमानी आहेच हा विचार करून आपण त्यालाही मदत केली पाहिजे आणि मी कुणालाही देताना हे आवर्जून सांगतो की हे मी जेवणापूर्वीच पॅक करून घेतले आहे असं जर मी सांगितलं नाही समोरच्यालाही संकोचल्यासारखे अपराध्यासारखे वाटते.

घटना छोटी आहे पण संदेश खूप मोलाचा आणि जीवनाकडे आपली पाहण्याची दृष्टी अधिक विकसित व संवेदनशील करण्याचा होता.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भूतां परस्परे जडो… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ भूतां परस्परे जडो… ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

माझ्या घरी काम करणारी प्रीति सांगत आली, “ काकू, आपल्या बागेत ते छोटे झाड आहे ना, त्यावर एक कबूतर मरून पडलंय आणि दुसरं अर्धवट जिवंत आहे. मला हात बी लावायची भीति वाटतीय.”

मी काहीतरी वाचत होते. म्हटलं “ थांब. बघून येते काय झालंय ते.”

घाई घाईने बागेत गेले. खरंच की. एक कबुतर मरून लोंबकळत होतं आणि बिचारं दुसरं फडफड करत पंख उडवून उडायचा प्रयत्न करत होतं. जवळ जाऊन बघितलं तर त्या दोघांचे पाय एका प्लास्टिकच्या पातळ दोरीत गुंतले होते आणि त्या दोरीचा गळ्याला फास लागून बिचारं एक गतप्राण झालं होतं. मला इतकं वाईट वाटलं सांगू… दुसरं जिवाच्या आकांताने फडफड करत होतं पण बिचाऱ्याच्या पायात गुंतलेली ती दोरी काही सुटत नव्हती.

मुलीला म्हटलं, ” जरा छोटी कात्री आण ग ”.. तिने कात्री आणून दिली. बिचाऱ्याच्या त्या नाजूक काडीसारख्या पायातून रक्त आलं होतं. मी हळूच कात्रीने ती निळी वायर अगदी अलगद हाताने थोडी कापली. इतक्या करकचून गाठीवर गाठी बसल्या होत्या की समजेचना नक्की कुठे कापावे. आपले पाय सोडवण्याच्या प्रयत्नात आणखी आणखीच निरगाठी बसल्या होत्या. करुण डोळ्यांनी ते माझ्याकडे बघत होतं.

माझ्याही नकळत मी त्याच्याशी बोलत होते, “ कसा रे बाळा अडकलास ?अशी कशी दोघांना एकदमच गाठ बसली रे? थांब हं. आपण मोकळं करू तुला हं.”

आमच्या झाडाला आधारासाठी दिलेली काठी मी हळूच बाजूला केली. ती फांदी वाकवली. जिथे ती निळी वायर दिसली तिथे अगदी नाजूक हातानी अगदी छोट्या कात्रीने कापत गेले. मला भीति वाटत होती, याच्या नाजूक पायाला कापताना दुखापत होणार नाही ना? शिवाय ते मेलेले कबूतर आणि हे, दोन्ही विचित्र तऱ्हेने असे गुंतले होते की मला दिसतच नव्हते नक्की कसे ते अडकले. मी हळूच निळी वायर कापत होते.

माझी मुलगी हळहळ करत मागे उभी होती. “आई, किती ग दुखत असेल त्याला. कोणी मुद्दाम बांधलंय का ग असं?खेळ म्हणून?” तिच्या डोळ्यात पाणी होतं.

मी अलगद हातांनी दिसेल तिथली गाठ मोकळी करत होते. आता त्याचा एक पाय मोकळा झाला. त्याची फडफड वाढली. मला दिसत होतं, याचा पाय चांगलाच दुखावलाय.

शेवटची गाठ सोडवली आणि त्या मृत कबुतरासकट हे जिवंत कबूतर धपदिशी फरशीवर पडलं. पटकन मी ते मेलेलं कबूतर हातात धरून त्याच्यात अडकलेले जिवंत कबूतर मोकळं केलं. त्याने पंखांची फडफड केली आणि पटकन खुरडत का होईना, बागेच्या वाफ्यात जाऊन बसलं… घाबरून त्याची छाती धपापत होती. पण जिवंत राहिलं ते.

लेकीने छोट्या भांड्यात पाणी ठेवलं. आम्हाला ते जगल्याचा अतिशय आनंद झाला. पण भिऊन ते आपल्या मेलेल्या जोडीदाराकडे बघत होतं. त्याला वाटत होतं का की आता हा आपला जोडीदार पण उठेल आणि आपण उडून जाऊ असं….

मग आला आमच्या बागेत काम करणारा मुलगा. चंदन. त्याला लेकीने सगळी हकीकत सांगितली.

तो म्हणाला, ” ताई, हे इथेच रात्रभर राहिलं तर मांजर खाऊन टाकील हो त्याला. ” 

ते बिचारं खुरडत बसलं होतं वाफ्यात. चंदनने थोडा विचार केला आणि म्हणाला, “ मी याला उचलतो आणि सुरक्षित जागी ठेवतो. ” 

दरम्यान मी कबुतराला थोडे शेंगदाणे जवळ टाकले. इकडेतिकडे बघत ते हळूच खाऊ लागलं. पुन्हा आम्हाला आनंद झाला.

मग चंदन म्हणाला, “ ताई, थांबा हं. मी हातावर घेतो त्याला. ”.. त्याने जवळ जाऊन त्याला उचलण्यासाठी हात लावताच कबूतर पंख फडफडवत शेजारच्या टाकीजवळ उडून बसलं. इतका आनंद झाला आम्हा सगळ्याना. मी कामासाठी बाहेर जाऊन आले तरी ते तिथेच बसून होतं.

चंदन म्हणाला, ” अहो, त्याला उडता येत असेल पण आपल्या जोडीदाराच्या उठण्याची वाट बघत ते बसलं होतं बिचारं. ”…. फार वाईट वाटलं आम्हाला.

पण हे प्रीतीने सांगितलं नसतं तर आमच्या लक्षात आलं नसतं आणि याचाही जीव नक्की गेला असता. आम्हाला फार आनंद झाला जेव्हा ते उडून गेलं आणि समोर जाऊन बसलं. , आता त्याचा दुखवलेला पाय हळूहळू बरा होईल. बिचारं खूप वेळ एकटं बसलं होतं टाकीवर. असंही मनात आलं की..

‘समजलं असेल का त्या मुक्या जिवाला, आपला जोडीदार आता आपल्याबरोबर कधीच उडणार नाही ते?’ 

असो. एक तरी मुका जीव वाचवल्याचा आम्हाला मनापासून आनंद झाला…

…. आणि अचानक आठवले वंदनीय ज्ञानेश्वर महाराज – – “ भूतां परस्परे जडो.. मैत्र जीवाचे “ – अगदी आत्मीयतेने सगळ्यांसाठी ही प्रार्थना करणारे….

…. आणि “ मैत्र “ शब्दातली भावना नेमकी उमगली.

©  डॉ. ज्योती गोडबोले 

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares