मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चित्रकाराचे भूत – भाग – २ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ चित्रकाराचे भूत – भाग – २ ☆ श्री सुनील काळे 

(रात्रीच्या ११ वाजल्यानंतर थोडा उशीरा गेलो तर गाड्यांची व माणसांची गर्दी देखील खूप कमी असते व निवांतपणे चित्र पुर्ण करता येईल हे माझ्या लक्षात आले) इथून पुढे

एक दिवस ठरवून माझे चित्रकलेचे स्टॅन्ड ( ईझल ), बसण्याची फोल्डींगची छोटी खुर्ची, कोणी ओळखू नये म्हणून डोक्यावर मोठी क्रिकेटची टोपी, व रंगकामाचे इतर सर्व साहित्य सॅकमध्ये घेऊन मी रात्रीच्या ११ वाजता मेनरोडवर रस्त्याच्या बाजूला निवांत बसलो व रेखाटनास सुरुवात केली. माझ्या डोक्यात फक्त हा रात्रीचा लाईट चित्रात कसा आणता येईल ? हाच विचार चालला होता व वेगळ्या विचारात मी चित्रकामात पूर्ण गुंग झालो होतो.

पाचगणी हे मुख्य शहर आहे व त्याच्या आजूबाजूला दांडेघर, आंब्रळ, खिंगर,  भिलार, राजपूरी, तायघाट अशी छोटी मोठी खेडेगाव आहेत. त्याठिकाणावरून दिवसभर दुकानात, हॉटेलात कामे करून परत त्यांच्या गावाला परतणारा मोठा कामगार व व्यापारीवर्ग आहे. आजही काही कामगार दांडेघर गावाकडे उशीरा निघाले होते. त्यातले काही कामगार थोडी फार नशापाणी करून जाणारेही असतात.

इकडे माझे  ११ वाजता सुरु झालेले चित्रकाम १२ वाजेपर्यंत रंगात आले होते. मी पूर्ण स्वतःचे  देहभान विसरून चित्रात मग्न झालो होतो.आणि अचानक समोरून येणाऱ्या दांडेघरच्या दोन माणसांचा मोठा आरडाओरडा ऐकू आला. 

“ भूत, भूत,चित्रकाराचे भूत……… चित्रकाराचे भूत…….पळा पळा “

असे घाबरून ओरडत ते माघारी पळू लागले हातातल्या पिशव्या सांभाळण्याचेही त्यानां भान राहिले नाही आणि ते वेगाने परत आल्या दिशेने पळू लागले, म्हणून त्यांच्या पाठीमागे येणारे आणखी दोनचार जण घाबरून तेही पळू लागले.

त्यांना असे पळताना पाहून मीही घाबरलो. कारण मला ओळखले तर शाळेत बोंबाबोंब होईल व मला जाब विचारला, तर रात्रीची चित्रे काढतो म्हणून कदाचित नोकरी देखील जाईल या विचाराने  पटापट सामान आवरून मी रस्त्याच्याजवळ एका मोठ्या वडाच्या पाठीमागे जाऊन लपून बसलो.

दांडेघरची ही माणसे आता  राम राम राम राम राम राम राम असे मोठ्यानेच म्हणत  म्हणत दबकत दबकत हळूहळू, दमादमाने सावधपणे येत होती. आणि बघतात तर तेथे कोणीच दिसेना. त्यातला एक प्यायलेलाच होता. तो छाती ठोकून आत्मविश्वासाने सर्वांना सांगत होता….. 

“ म्या इथंच बघितला ते भूत, मोठ्ठी टोपी घातली होती.”

दुसरा त्यात भर घालून म्हणाला.. 

“ अरं इंग्रजाचे होतं ते भूत “

“नाय,अरं बाबा ही पारशांची शाळा होती, म्हंजी भूत पारशीच असणार नव्ह.”

“अरं पारशी चित्रकाराचे भूत म्हंजी जालीम लेका, लई डेंजर असणार ‘

“लई कटकटी असत्यात पारशी लोकं, म्हंजी भूत भी कटकटी आन जालीम असलं तर सोडणार नाय, आपल्या मागंसुद्धा लई कटकट  लागलं. “ एकाने असा अनुभव सांगितला. 

“अरं तुला सांगतो एकदा का धरलं ना, तर आजिबात सोडत नाहीती ही भूत. मानगुटीवर बसत्यात, नाचत्यात, लई हाल हाल करत्यात.” 

मग एका सुरात सर्वजण राम राम राम राम राम राम राम राम राम असं मोठ्याने ओरडत एकमेकांचा हात पकडत त्यांनी जकात नाका पार केला. मी देखील झाडामागे अंधारात रोखून धरलेला श्वास सोडला. रात्रीचे चित्र काढणं एवढ काही सोप्प काम नाही हे माझ्या लक्षात आले व नंतर काही माझी चित्र पूर्ण करण्याची मानसिकता राहीली नाही. सगळा मूडच गेला आणि मी चित्राचे सामान घेऊन गूपचूप पणे परत शाळेत परतलो. 

दुसऱ्या दिवशी शाळेतला दांडेघरचा एक कामगार सर्व स्टाफला सांगू लागला, की रात्री शाळेच्या रस्त्यावर चित्रकाराचे भूत गावातल्या लोकांनी पाहिले….. 

…  भूत असा छोट्या खूर्चीवर बसला होता, लई मोठी हातभर लांब टोपी घातली होती. त्याचे पाय व हात खूप लाबंच्या लांब होते. ते पारशी भूत होते. लई जालीम, लई डेंजर. थोडक्यात वाचली मंडळी, नाहीतर मानगुटीवर बसला असता. 

लई डेंजर भूत होते. यापुढे रात्रीचे सावध रहा,असा सल्ला देखील त्याने दिला. मी देखील हो हो म्हणत  त्याच्याकडे दुर्लक्ष केले. भारी गंमत वाटली. माणसे एखादी घटना अव्वाच्या सव्वा करून कसे सांगतात ते मी अनुभवले.

त्यादिवसापासून आता मी रात्रीची चित्रे काढतो पण घरात बसूनच. रात्री चित्र काढायला कधी बाहेर ऑन दी स्पॉट जात नाही. पण एक नाईटस्केपचा चांगला विषय चित्रित करायचा राहिला याचे शल्य मनात मात्र राहूनच गेले.

आज मागचा विचार करताना जाणवते हे चित्रकाराचे भूत अजब असते. त्याने एकदा पकडले की ते कधीही आपल्याला सोडत नाही. आजही डोंगररांगा, शेतीची हिरवळ, समुद्र, बोटी, झाडे, इमारती, टेबललॅन्डची पठारे, वाईची मंदीरे, घाट, महाबळेश्वरचे  सृष्टीसौंदर्य पाहिले की  मनात परत परत चित्रे काढण्याची उर्मी नव्याने दाटून येते व आपण चित्रवेडाने पछाडलेलो आहोत याची पुन्हा खात्री होते. या  चित्रकाराच्या भूताने आपल्याला पछाडल्यामूळे, झपाटल्यामूळे कितीतरी असामान्य कलाकृती आपल्या हातून घडून गेल्या. 

कितीतरी मोठी माणसे अनपेक्षितपणे आपल्या जीवनात आली. आपली आर्थिक परिस्थिती पार बदलून गेली. चित्रकाराच्या भूतामूळे आपले जीवनच पालटले. हे भूत तुमची ध्येये सतत आठवण करून देते व कामाला जुंपते. नवनव्या गोष्टी, संशोधन, साधना करण्यास भाग पाडते. त्यामुळे माणूस सतत उत्साही व कार्यमग्न राहतो.

आपण आपल्या कलेने वेडे झाल्याशिवाय जग आपल्याला शहाणे म्हणत नाही हेच खरे. 

आपण कोणत्याही क्षेत्रात असलो उदा.  लेखन, चित्रकला, शिल्पकला, खेळ, गायन, वादन, संगीत, नाट्य, नृत्य,चित्रपट, शिक्षण, वकील, इंजिनियर्स, पत्रकारिता, डॉक्टर,सरकारी किंवा खाजगी नोकरीत असो किंवा स्वत:च्या उद्योग व्यापारक्षेत्रात असो.आपण कार्य करत असलेल्या त्या त्या क्षेत्रात स्वतःला झोकून पूर्णपणे आंतरबाह्य झपाटलो, पछाडलो तर काम उत्तम होते. 

हाती घेतलेले कार्य मनापासून,आनंदाने उत्साहाने पूर्ण करण्याची प्रक्रिया एन्जॉय करायला शिकलो,त्यातून सर्वांना आनंद घ्यायला व द्यायला शिकलो तर कार्यात सर्वांना यश हे १००% नक्की मिळणारच. 

म्हणून सर्वानांच ज्या त्या आवडत्या विषयातील भूताने पछाडलेच पाहिजे असे मला मनापासून वाटते. ज्यावेळी हे भूत आपल्याला पछाडते त्यावेळी आपली सर्व शक्ती वापरून खरोखर उत्तम कार्य करण्याची असामान्य प्रेरणा मिळते. स्वत:ला विसरून दिवसरात्र आवडीच्या क्षेत्रात यश संपादनासाठी झोकून घ्यावेसे वाटते.

त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

– समाप्त –

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ते सतरा दिवस – भाग -1 ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

? इंद्रधनुष्य ?

☆ ते सतरा दिवस… – भाग-1 ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

“लहानपणी माझी आई मला असंच कोंडून ठेवायची. द्वाड होतो ना मी ! तासनतास खोलीचं दार उघडायची नाही. अगोदर बरं वाटायचं.. खोलीत मी एकटा व भवताली अंधार. कोळशाची खोली होती ना ती ! चार बाय दोनची. मी त्यातही खेळायचो. महिनाभराचा कोळसा त्या खोलीत ओतला जायचा. तीन चार गोण्या तर खास, आंघोळीला व सैंपाकासाठी चूल त्यावरच चालायची. गॅस तर आता कुठे चार वर्षांपूर्वी आला घरात उज्ज्वला योजनेतून. आई फुंकणीने चूल पेटवायची व दोन खोल्यांचे घर धुराने भरून जायचे. आता आताशा तर धूराने आईला धापही लागत होती. गॅस आल्याने तेवढं बरं वाटतं तिला ! खरंतर त्या कोळशाच्या खोलीत कोंडले गेल्यावर मला बरं वाटायचं. खोड्या काढणं, उनाडक्या करणं याने मी गल्ली, मोहल्ल्यात बदनाम. रोज कुणी ना कुणी तक्रार घेऊन यायचंच घरी, आई कावली जायची. व शिक्षा म्हणून मी कोळशात. पण खरं सांगू का त्या उनाडक्या व त्या खोड्या मला जाम आवडायच्या.  कोणीतरी रागावून घरी येतंय आपल्यामुळे याचं समाधानही वाटायचं, मला शिक्षा झाली की सूड उगवल्याचं समाधान आरोप करणाऱ्याला होणार नाही इतकं मला व्हायचं. मग कोळशाने मी काळा ठिक्कर झालो तरी त्याचं काही वाटायचं नाही. काही वेळाने आईच मला बाहेर काढायची. मग रगरग रगडून आंघोळ घालायची. मला घालून पाडून बोलायची. कशाला एवढी मस्ती करतोस? आपण गरीब माणसं, इतकं द्वाड असू नये, तुझ्यामुळे मलाही बोलणी खावी लागतात. अपमान गिळावा लागतो.  त्या गल्लीत आम्हीच तेवढे गरीब, मग माझ्याने आमच्या गरिबीबद्दल बोललेलं मला सहन व्हायचं नाही. मी उट्टं काढण्याच्या प्रयत्नात. बाबा पैका कमवायला बंबईला गेले आणि आम्ही बिहारला पोरकेच. ” त्याने एक दीर्घ सुस्कारा टाकला. 

सगळे त्याचं म्हणणं कान टवकारून ऐकत होते. तेवढंच तर करता येत होतं. एकमेकांशी बोलत राहण्यावाचून पर्याय नव्हता. काहीच कळत नव्हतं, दिवस आहे की रात्र. नेमका काळ ओढवल्यासारखं वाटायचं. जीवाची घालमेल सारखी. सगळे कोंडाळे करून बोलत रहायचे. आजचा तिसरा दिवस बहुतेक. परवाच तर घटना घडलेली. तेव्हा उठलेले अंगावरचे शहारे अजूनही तसेच. कितीतरी वेळा जे घडलं तेच डोळ्यासमोर येत असलेलं सारखं. 

धडामधाडधाड करत दगड माती खाली आली. वाटलं डोंगरच कोसळला. डोक्यावर पडू नये तसे सगळे सावध होऊन पुढे पळाले तसा परतीचा मार्गच बंद झाल्याचे लक्षात आले. अरे देवा !! जो तो हळहळायला लागला. अगोदर तर धुरळाच उठलेला. सगळं अंधूक अंधूक दिसत असलेलं. नुसता आरडाओरडा बोगद्यात. अजूनही दगड खाली येत असलेले. पुढे धावताना कुणी ठेचकाळलं, पडलेही, मग एकमेकांचा आधार घेत हाताला हात धरून उभं राहणं झालं. नेमकं काय घडलंय याचा अंदाज यायलाच अर्धा तास लागला. ज्युनियर इंजिनिअरसाहेब बरोबर होते  ते ओरडले, “ लॅण्ड स्लाईड झालीय बोगद्यात. आपापल्या डोक्यावर हेल्मेट आहे ना ते पाहून घ्या, अजून डोंगर खाली येऊ शकतो. आपण चाळीसच्या वर होतो चमूत. तितकी डोकी आहेत ना शाबूत मोजून घ्या, कुणाला खरचटलं, लागलं तर नाही ना? हाडं वगैरे मोडली नाहीत ना? बांका प्रसंग आलाय. धीर धरा, बघू काय करता येतंय ते. ” धूरळा बसायला लागला तसं सगळ्यांना धीर आला. सगळेच तसे धूळीने माखलेले. अगदी नाकातोंडातही धूळ. कुणी अंग झटकतंय, कुणी खोकतोय. चलबिचल प्रत्येकाची. काय घडलंय याची स्पष्ट जाणीव होत असलेली हळुहळू व पुढे काय वाढून ठेवलंय याची धाकधूक. जीव तसा अधांतरीच प्रत्येकाचा. 

अचानकच घडलं एकदम. बोगदा खोलवर खोदत असताना मागच्या मागे डोंगराने दगड माती लोटून भिंतच उभारली. वाटलं असेल दोन चार फूट लांब पण इंजिनिअर साहेब म्हणाले शंभर दोनशे तीनशे मीटर लांब असू शकते. पहिल्यांदा तर आवाजाबरोबर काळोखच पसरलेला. मग बोगद्याच्या कडेने टाकलेल्या लाईनीतील ब्रॅकेटमधले दिवे पुन्हा लुकलुकायला लागले. जसजसं दिसायला लागलं थोडंफार तसं  ‘आहे रे ‘चा पुकारा सर्वजण करू लागले. सर्व मिळून एक्केचाळीस डोकी गणली गेली. इंजिनीयरसाहेब एका दगडावर उभे राहिले. त्यांचेही हातपाय लटलटत असलेले. बाकीचे सगळे मटकन् खाली बसले धुळीतच. अंधुकशा उजेडात साहेब गंभीर दिसत होते. डोक्यावरचं पिवळं हेल्मेट सावरत, दगडावरचा तोल आवरत ते ठामपणे उभे राहिले. खोलवर गेलेल्या आवाजाने बोलू लागले. “ माझ्या बांधवांनो, माझ्या आयुष्यातील हा पहिलाच कटोकटीचा प्रसंग उभा ठाकलाय. आपणा सर्वांसमोरच मोठं आव्हान आहे. आपण ज्येठ, कनिष्ठ, लहानमोठं कुणीही नाही. सर्व भारत मातेची लेकरं आहोत. आपण आत अडकलोय हे बाहेरच्यांना एव्हाना कळलं असेल. ते आपल्याला बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करतील, पण आतमधे एकमेकांना सांभाळून राहायची जबाबदारी आपलीच आहे. तेव्हा एकमेकांना सहकार्य करत हा प्रसंगही निभावून नेऊ. देवाची प्रार्थना करूयात. तो जगन्नियंता आपल्याला तारून नेईल यावर विश्वास ठेवा. आपापल्या चीजवस्तू कमीत कमी वापरा. विशेषतः मोबाईल व त्याची बॅटरी जपली पाहिजे. एका दोघांचेच चालू ठेवा, बाकीचे स्वीचऑफ करा, किमान तीन चार दिवस तरी त्यावर काढता येईल. निदान  वेळ व तारीख तरी कळेल. पिशव्यांमधे जे काही हाताशी शिल्लक असलेले धान्य, खुराक याचं रेशनिंग करूयात. आपल्याकडे दोन किलोमीटरचा पट्टा आहे. त्यात हिंडू फिरू शकतो. कमीतकमी हालचाल करूयात , म्हणजे दमणं होणार नाही. आपली ताकद जपूयात.  विश्रांती जास्तीत जास्त घेऊयात. यातूनही मार्ग निघेल, आपले देशबांधव आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाहीत याची खात्री आहे मला.  तेव्हा जय हो !! “

साहेबांच्या शब्दा शब्दागणिक जगण्याचा हुरूप वाढत गेला. निराश होता कामा नये हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला. सर्वांनी एका आवाजात साहेबांच्या शब्दांवर प्रतिध्वनी उमटवला, जय हो!! 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ – एक सुंदर पंचाक्षरी कविता… – कवि – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ – एक सुंदर पंचाक्षरी कविता… – कवि – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

  पाय जपावा

   वळण्याआधी

   तोल जपावा 

   ढळण्याआधी !

  

 अन्न जपावे

   विटण्याआधी

   नाते जपावे

   तुटण्याआधी !

   

शब्द जपावा

   बोलण्याआधी

   अर्थ जपावा

   मांडण्याआधी !

   

रंग जपावे

   उडण्याआधी

   मन जपावे

   मोडण्याआधी !

  

 वार जपावा

   जखमेआधी

   अश्रू जपावे

   हसण्याआधी !

  

 श्वास जपावा

   पळण्याआधी

   वस्त्र जपावे

   मळण्याआधी !

   

द्रव्य जपावे

   सांडण्याआधी

   हात जपावे

   मागण्याआधी !

   

भेद जपावा

   खुलण्याआधी

   राग जपावा

   भांडणाआधी !

  

 मित्र जपावा

   रुसण्याआधी

   मैत्री जपावी 

   तुटण्याआधी !!!

कवी : अज्ञात

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – अभिव्यक्ती स्वातंत्र्य… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – अभिव्यक्ती स्वातंत्र्य… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला गेलो होतो. जेव्हा प्रमुख वक्त्यांचे भाषण सुरु झाले तेव्हा त्यांनी मर्यादा सोडून बोलणाऱ्या आजच्या राजकारण्यांवर टीका केली. खरोखरच राजकीय नेते म्हणजे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. त्यांनी जबाबदारीने बोलायला हवे. पण त्याचे भान काही अपवाद सोडले तर आज कुठेही दिसत नाही. ते उपरोधिकपणे म्हणाले ‘ विद्या विनयेन शोभते ‘ असे एक संस्कृत सुभाषित आहे. पण बोलणाऱ्यानी एवढी खालची पातळी गाठली आहे की ते म्हणतील, ‘ ही कोण आणि कुठली विद्या ? कुठला विनय ? ‘ रोजच्या बातम्या पाहिल्या आणि त्यात राजकारण्यांनी केलेली विधाने पाहिली की याचे प्रत्यंतर येते. बातम्या सुद्धा बघू नये असे सुजाण नागरिकांना वाटत असल्यास नवल नाही.

याच व्यासपीठावरून आणखी एक वक्त्या बोलल्या. त्यांनी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एक विधान केले. त्या म्हणाल्या, ‘ सुरुवातीला मला सावरकरांबद्दल प्रचंड आदर होता पण आता तो कमी झाला आहे. ‘ त्याचे कारण त्यांनी सांगितले की राहुल गांधी जर सातत्याने सावरकरांवर टीका करत असतील, तर त्यांच्या हातात काहीतरी पुरावे असल्याखेरीज ते तसे बोलणार नाहीत.  आणखी एक वक्ते उभे राहिले ते म्हणाले की या बाई बोलल्या त्यात नक्कीच तथ्य आहे. आपल्याला सावरकरांच्या विरोधात कोणी बोललेलं आवडत नाही कारण तशा प्रकारची विधानं त्यांच्याबद्दल आपण ऐकलेली नसतात. पण म्हणून ते खोटं आहे असं मानायचं कारण नाही. महात्मा गांधींनी आपण केलेल्या चुकांची कबुली ‘ माझे सत्याचे प्रयोग ‘ या पुस्तकात दिली आहे. अशी कबुली देण्यासाठी फार मोठे मन लागते. याच व्यासपीठावरून मग दाभोलकर, पानसरे आणि गौरी लंकेश यांनी विरोधाची भूमिका घेतली म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का ? देश धार्मिक हुकूमशाहीकडे, फॅसिस्ट वादाकडे झुकतो आहे अशी विविध विधाने केली गेली.

दाभोळकर, पानसरे किंवा गौरी लंकेश यांच्या हत्येचे समर्थन कोणीच करणार नाही आणि करू नये. कोणी वेगळी भूमिका मांडली तर त्यांची हत्या करणे हे कधीच समर्थनीय ठरू शकत नाही. ती निषेधार्हच गोष्ट आहे.

विशेष म्हणजे सावरकरांबद्दल वरीलप्रमाणे विधाने करणाऱ्या  व्यक्ती या जेष्ठ साहित्यिक किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या होत्या. त्यांच्याकडून अशा प्रकारची विधाने ऐकणे हे आश्चर्यचकित करणारे आणि धक्कादायक वाटले. उथळ विधाने करणारी आणि सावरकरांच्या जीवनकार्याचा फारसा अभ्यास न करणारी एखादी व्यक्ती सावरकरांच्या विरोधात बोलते म्हणून तिचे म्हणणे खरे मानून सावरकरांचा त्याग, देशभक्ती या सगळ्याच गोष्टींवर बोळा फिरवायचा का याचा बोलणाऱ्यांनी विचार करायला हवा. महात्मा गांधींनी आपल्या ‘ माझे सत्याचे प्रयोग ‘ या आत्मचरित्रात आपण केलेल्या चुकांची कबुली दिली आहे म्हणून ते महान होत नाहीत किंवा सावरकरांनी स्वतःच्या चुकांबद्दल असे काही लिहिले नाही म्हणून ते लहान होत नाहीत. सावरकर,गांधी, नेहरू, सरदार पटेल, डॉ आंबेडकर, म. फुले  यांच्यासारख्या व्यक्ती मुळात महान आहेत. या सगळ्या महापुरुषांनी आपल्या जीवन कार्यातून काय संदेश दिला हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हल्ली कोणीही काहीही बोलावे असे झाले आहे. ज्यावेळी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात किंवा समारंभात आपण भाषण करतो, तेव्हा लोकांपुढे कोणता आदर्श ठेवायचा हा खरंतर ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ज्यावेळी आपण महापुरुषांबद्दल बोलतो, त्यावेळी त्यांचे दोषदिग्दर्शन न करता त्यांच्या गुणांवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे असे मला वाटते. गुणग्राहकता आपल्याजवळ असली पाहिजे. महापुरुष हे देखील शेवटी माणसेच असतात. त्या त्या परिस्थितीत निर्णय घेताना त्यांच्या हातून कदाचित काही चुका होऊ शकतात. पण म्हणून त्यांच्या महत्वाच्या कार्याकडे दुर्लक्ष करून त्यांचे दोष किंवा चुकाच आपण दाखवत राहायच्या हे कितपत योग्य आहे ? अलीकडे महापुरुषांच्या कार्याचे, गुणांचे गुणगान करण्यापेक्षा त्यांच्यातील दोष दाखवण्याचा जो पायंडा पडत चालला आहे, तो भविष्यकाळाच्या दृष्टीने घातक आहे. पुढच्या पिढ्यांसमोर आपण आदर्श ठेवायचा की दोष दिग्दर्शन करायचे ? स्वा. सावरकर असोत, गांधी किंवा नेहरू असोत या सगळ्या महापुरुषांनी देशासाठी प्रचंड त्याग केला आहे, अपार कष्ट, तुरुंगवास सोसला आहे. अमुक एका महापुरुषावर टीका केली म्हणजे तो लहान होत नाही किंवा त्याच्या कार्याचे महत्व कमी होत नाही.

पुलं हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. पुलंनी अवघ्या महाराष्ट्राला सुसंस्कृत विनोद कसा असतो हे दाखवून दिले. नाट्य, संगीत, अभिनय, दिग्दर्शन, लेखन इ कलेच्या विविध प्रांतात सहज संचार करणारा अवलिया म्हणजे पुलं. याच पुलंवर मध्यंतरी एक चित्रपट येऊन गेला. ‘ भाई -व्यक्ती आणि वल्ली ‘ या नावाचा. आपल्यापैकी बऱ्याच पुलं प्रेमींनी तो पाहिला असेल. पण या चित्रपटातून पुलंचे अष्टपैलू व्यक्तिमत्व समोर येण्याऐवजी सतत धूम्रपान करणारे, मद्यपान करणारे पुलं अशीच व्यक्तिरेखा डोळ्यासमोर येते. कदाचित वस्तुस्थिती तशी असेलही आणि दिग्दर्शकाला काय दाखवायचे याचे स्वातंत्र्यही नक्कीच आहे. पण इथे पुन्हा माझ्यातील शिक्षक जागृत होतो. समाजापुढे आपण काय ठेवतो आहोत याचा विचार नक्कीच करायला हवा असे मला तीव्रतेने वाटते. वाईट गोष्टी लगेच उचलल्या जातात. चांगल्या गोष्टी रुजवायला वेळ लागतो. उतारावरून गाडी वेगाने खाली येते. वर चढण्यासाठी कष्ट पडतात. आपल्याला समाजाची गाडी प्रगतीच्या दिशेने न्यायची असेल तर योग्यायोग्यतेचा विवेक ठेवायलाच हवा. अर्थात  माझे हे विचार आहेत. सगळ्यांनाच आवडतील असेही नाही याची जाणीव मला आहे. प्रत्येकाला  अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच !

पण जाता जाता आणखी एक सुदंर सुभाषित सांगून समारोप करू या. या सुभाषितात सुभाषितकार म्हणतो

 विद्या ददाति विनयं, विनयाद याति पात्रतां ।

 पात्रत्वात धनमाप्नोति, धनात धर्मं तत: सुखम ।।

ज्या व्यक्तीला खरोखरीच ज्ञानप्राप्ती झाली आहे, अशी व्यक्ती विनयशील म्हणजे नम्र असते. कुठे कसे वागावे हे अशा व्यक्तीला सांगावे लागत नाही. विनम्रतेतून योग्यता किंवा पात्रता अंगी येते. त्यातूनच मग धनाची प्राप्ती करण्यायोग्य व्यक्ती होत असते. धनाचा उपयोग करून मनुष्य धार्मिक कार्य संपन्न करू शकतो आणि त्यातूनच त्याला आनंद प्राप्त असतो. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. यात अर्थातच ज्ञानप्राप्तीचे आणि त्या खऱ्या ज्ञानप्राप्तीतून अंगी येणाऱ्या गुणांचे महत्व अधोरेखित केले आहे.

© श्री विश्वास देशपांडे,

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चित्रकाराचे भूत – भाग – १ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ चित्रकाराचे भूत – भाग – १ ☆ श्री सुनील काळे 

पाचगणी हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शैक्षणिक केन्द्र आहे. पण आज जी पाचगणीची खरी प्रगती  दिसत आहे ती खूप हळूहळू झाली आहे. उदा. पाण्याची सोय. ब्रिटीशांनी ज्यावेळी येथे शाळा बांधल्या, विद्यार्थी आणि पर्यटकांचे येण्याचे प्रमाण वाढू लागले तसतसे पाण्याचे संकटदेखील मोठे होत गेले. चाळीस पन्नासवर्षांपूर्वी पाचगणीत पाण्यासाठी फक्त विहिरींचाच वापर व्हायचा. गावात आणि खाजगी बंगल्यामध्ये आजही काहीजण विहिरीचे पाणी वापरतात पण त्यावेळी विहिरीनां दुसरा पर्यायच नव्हता. लाल दगडांमध्ये बांधलेल्या या विहिरींचे पाणी आयर्नयुक्त आणि चवदार असल्याने सर्वानां ते आवडायचे. वाईला धोमधरणाची निर्मिती झाली आणि नंतर धरणाचे पाणी पाचगणीला येवू लागले. सिडने पाईंटच्या तळमाळ्याजवळ पंपींग स्टेशन बांधले होते. तेथून पाणी प्रथम गार्डनच्या शेजारी शुद्धीकरणासाठी येई व नंतर  टेबललॅन्डच्या पायऱ्याजवळच्या टाकीतून संपूर्ण गावाला नळाने पाणीपुरवठा होई. पण हे सगळे प्रकार विजेच्या पुरवठ्यावर अवलंबून असायचे. कधी कधी वीजपुरवठा नसला की पाण्याचा तुटवठा व्हायचा व स्थानिक रहिवाशानां परत विहिरीवरुन पिण्याचे पाणी आणायला लागायचे व कपडे धुवायला टेबललॅन्डचे तळे किंवा गावविहीरीवर जावे लागत असे. (आता मात्र पाचगणीला महाबळेश्वरच्या वेण्णा लेक मधून पाणी पुरवठा होतो.)

माझ्या लहानपणी मोठे कुटूंब असल्याने कपडे धुण्यासाठी सगळे बहिणभाऊ गावविहिरीवर जायचो. तेथे भरपूर हुंदडायला मिळायचे म्हणून मदत करण्याचा, अभ्यास करण्याचा बहाणा करून कपड्यांच्या बादल्या घेऊन विहिरीवर जाणे हा माझा आवडता कार्यक्रम असायचा. एका रविवारी मी गावविहिरीच्या परिसरात दप्तर घेऊन मनसोक्त टाईमपास करत होतो.

गावविहारीचा पूर्वेकडेचा रस्ता चालत गेलो की रेशीम केन्द्र व ओक्स हायस्कूल लागायचे. या ओक्स हायस्कूलच्या बाजूचा उताराचा रस्ता जरा मस्त वाटला म्हणून मी सहज चालत गेलो तर तेथे एक पत्र्याचे शेड मारलेले होते. आणि त्यामध्ये लोखंडी बीडाच्या बारचे चौकोनी पिलर्स उभे केले होते.

त्या ठिकाणी मी पहिल्यांदाच जात होतो. हे ठिकाण स्मशानभूमीचे आहे हे लहान असल्यामूळे मला माहीतच नव्हते. कारण लहान असल्यामूळे मला कोणी नेले नव्हते.मी तेथे गेल्यावर मंत्रमुग्धच झालो. कारण त्या ठिकाणावरून समोर कमळगड, मांढरदेवीचा डोंगर व अफलातून दिसणारे कृष्णा व्हॅलीचे विहंगम दृश्य दिसत होते. त्या डोंगरावर नुकतीच पूर्वेकडचे सकाळची कोवळी उन्हे पडल्यामुळे डोंगराच्या रांगा व त्यावरील चढउतार, डोंगरांच्या सावल्या, घड्या,पाण्यात पडलेली प्रतिबिंबे. छोटी छोटी घरे, भाताची हिरवीगार शेती त्यातच चिखली व बारा वाड्यांचे खोरे, ती छोटी घरे पाहून मी परदेशातील स्वित्झर्लंडचा देखावा पाहतोय असे मला वाटू लागले व मी मनाने पूर्णपणे भारावूनच गेलो. हे दृश्य आपण कागदावर चित्तारायलाच पाहिजे असे मला खूप मनातूनच वाटू लागले. पाठीवरचे दफ्तर बाजूला ठेऊन त्यातील चित्रकलेची वही काढून त्या स्मशानभूमीच्या जाळण्याच्या लोखंडी चौकानावर बसून  पेन्सीलने चित्र काढण्याच्या कृतीत आणि त्या शांत वातावरणात मी इतका तल्लिन झालो की माझे दोन तास कसे गेले ते मला कळलेच नाहीत.

माझी चित्रसाधना अचानक झालेल्या नानांच्या आरडाओरड्यांमुळे भंग पावली. मी पाचगणीत एस.टी.स्टॅन्ड समोर जेथे राहायचो त्या इमारतीच्यावर लिंगाण्णा (नाना) पोतघंटे राहायचे, त्यांच्या एकत्र कुटुंबाचा शाळेचे कपडे धुण्याचा, इस्त्रीचा  ‘ दिपक ड्रायक्लिनर्स ‘ नावाचा व्यावसाय होता. पाण्याचा तुटवडा असल्याने ते स्मशानभूमीच्या डाव्या बाजूला असलेल्या एका जिवंत झऱ्याच्या घाटावर नेहमी कपडे धुवायला यायचे.मला स्मशानभुमीत चित्र काढताना पाहून ते आश्चर्यचकीत झाले व घाबरले देखील  त्यांच्या आरडाओरड्यामूळे मी तेथून पळ काढला व उशीरा घरी पोहचलो.

नानांनी घरी आईला तुमचा मुलगा मसणवट्यात चित्र काढत बसला होता ही घटना सांगितली आणि त्यामूळे सगळे वातावरण तंग झाले. अशा या तंग वातावरणात मी घराच्या पाठीमागच्या दरवाजातून हळुवारपणे घुसत असतानाच माझे जंगी स्वागत झाले. माझी आई अशिक्षित व अडाणी होती. ती मनातून खूप घाबरली होती,तीला पक्की खात्री झाली होती की कोणत्या तरी चित्रकाराच्या भूताने मला धरले असणार. ते भूत माझ्या अंगात घुसल्यामूळेच मी सतत भटकत सारखी सारखी  चित्र काढत असतो. त्यामूळे आईने घरात दरवाजात प्रवेश करण्यापूर्वीच थांबवले आणि मग माझ्या चेहर्‍यावरून भाकरीचा तुकडा,मीठ, मोहरी, मिरच्या ओवाळून ईश्वराला मोठ्याने साकडे घातले की इडापीडा टळो आणि चित्रकार भूताच्या तावडीतून माझ्या लेकाची सुटका होवो.

पण माझ्यावर काही फरक पडलाच नाही. या उलट दिवसेंदिवस वेळ मिळेल तसे कृष्णा व्हॅली, पांडवगड, कमळगड, नवरानवरीच्या डोंगरांच्या रांगा, चमकणारे धोम धरणाचे पाणी, यांची चित्रे काढण्याचे माझे प्रमाण वाढले. तासनतास त्या प्रदेशाची चित्रे काढणे त्या परिसरात फिरणे हा माझा आजही आवडीचा छंद आहे. एकंदर आईच्या दृष्टीने चित्रकाराच्या भूताने मला आंतरबाह्य पछाडलेले होते, झपाटले होते. मी एकदम वाया गेलो असे सर्वानां वाटायचे.

एकदा मात्र मोठ्ठीच गंमत झाली. ती कायम लक्षात राहण्याजोगी आहे म्हणून आज तुमच्याशी शेअर करतोय. पाचगणीत आर्ट गॅलरी करण्याचा माझा उद्देश होता,  त्या गॅलरीच्या दरवर्षी जागा बदलत असल्यामूळे  मी वेळोवेळी त्यात अपयशी ठरलो.सन २००० साली मी खूपच निराश झालो होतो कारण माझ्या  आयुष्याची वाताहात झाली होती. मोठी आर्थिक कुचंबणा झाली व नाईलाजाने मला पाचगणीच्या बिलिमोरीया  शाळेत कलाशिक्षकाची नोकरी पत्कारावी लागली. तेथे शाळेतच राहत होतो.

शाळेत शिकवत असलो तरी चित्रकाराचे भूत डोक्यातून जात नव्हतेच.बिलिमोरीया स्कूलचे लोकेशन  टेबललॅन्डच्या पायथ्याशी व सिडनेपॉईंटच्या (सध्याचे रविन हॉटेल )जवळ असल्याने मी जमेल तशी तेथून दिसणाऱ्या कृष्णा व्हॅलीची, शाळेच्या परिसराची, शाळेची मुख्य इमारत, डायनिंग हॉलची इमारत, प्राचार्यांचे, शाळेच्या मालकांचे निवासस्थान, रस्त्यांच्या वडांच्या झाडाची चित्रे रेखाटने सतत करत असायचो.

एकदा बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनाचा एक कॅटलॉग पोस्टाने आला होता. त्यात एका चित्राला जलरंगाचे पारितोषक मिळाले होते. त्या चित्रात रस्त्याच्या बाजूला एक खांबावरचा दिवा प्रकाशित होऊन छान पिवळा प्रकाश सर्वत्र पडला होता व त्या प्रकाशात इमारत, झाडे, माणसे खुपच छान दिसत होती.ते चित्र मला मनापासून खूपच आवडले. मग आपणही असे काही तरी रात्रीचा खांबावरून सुंदर पिवळा प्रकाश व सावल्या पडलेल्या आहेत, हा विषय घेऊन जबरदस्त ‘ नाईटस्केप ‘ करायचेच हा मी पक्का निर्धार केला व मग स्पॉटची पहाणी करत मी रात्रीचा फिरायला लागलो. त्यावेळी मी शाळेच्याच परिसरातच राहत होतो.अगदी कसून पहाणी केल्यानंतर माझ्या हे लक्षात आले की बिलीमोरिया शाळेच्या प्रवेश करण्याच्या मुख्य रस्त्यालगत असा  म्युनिसिपालीटीचाच एक उंच खांब आहे. तेथुन झाडांच्या रस्त्यावर पडलेल्या पिवळ्या प्रकाशामुळे छान सावल्या पडतात व तो परिसर चित्रित करण्याजोगा आहे. म्हणून मी त्याचा अभ्यास सुरु केला. रात्रीच्या ११ वाजल्यानंतर थोडा उशीरा गेलो तर गाड्यांची व माणसांची गर्दी देखील खूप कमी असते व निवांतपणे चित्र पुर्ण करता येईल हे माझ्या लक्षात आले.

– क्रमशः भाग पहिला

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आंदोलनं  झोक्याची–झेप फिनिक्सची –  भाग -2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

आंदोलनं  झोक्याची–झेप फिनिक्सची – भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(मागील भागात आपण पाहिले- माहेरचे लोक त्यांना “आता इकडेच रहा ” म्हणत होते. तेव्हा सीताबाईंनी निक्षून सांगितलं , “मुंबईचं माझं घर हक्काचं होतं , ते काळानं हिरावून नेलं .आता मी कोल्हापूरच्या घरात राहिले तर, सासर आणि माहेर अशी मला दोन घर मिळतील. दोन्हीकडे मी राहू शकेन. पण माहेरीच राहिले तर सासर तुटेल “. एक बुद्धिमान स्त्रीच इतका विचार करू शकेल. आता इथून पुढे )            

मौजमजेच माहेरपण आठ-दहा दिवसाच छान असतं. पण अशा अवस्थेतलं माहेरपण त्यांना नकोसं वाटायला लागलं . सीताबाईंचे सासरे केशवराव, आपल्या सुनेच्या अंगातली हुशारी कर्तबगारी ओळखून होते. अंबू त्यांची लाडकी नात होती . एके दिवशी घरात तसे सांगून, सुनेला आणि नातींना  माहेरून आणायला  ते स्वतःच गेले. सीताबाईंना यावेळी सासरी आल्यावरच बरं वाटलं. सासूबाई सावत्र. त्यांना मनापासून ही जबाबदारी नको होती. पण त्या काही बोलू शकत नव्हत्या. सीताबाईंवर अनेक बंधन आली. काळच तसा होता तो. स्वयंपाक सोळ्यातला . तेथेही त्यांना मज्जव. पाणी हवं असलं तरी पाण्याला शिवायचं नाही. मुलींकडून मागून पाणी घ्यायचं. कोणी आलं तरी तिने पुढे जायचं नाही.  केर- वारे,  चूल ,पोतेरे, दळण, कांडण , निवडण हीच काम त्यांनी करायची. 19 –20 वर्षांची , ऐन तारुण्यातली विधवा असा डाग लागला होता तिला. कोणीही सीताबाईंना तिरकस बोललेलं सासऱ्यांना मात्र आवडायचं नाही.

मुली कधी मोठ्या होणार ? या सतत पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर सीताबाईंना हळूहळू मिळायला लागलं. सगळेच दिवस सारखे नसतात. कोणी , कोणी मदतीसाठी, कोणाच्या बाळंतपणासाठी, कामासाठी सीताबाईंना बोलवायचे. पण सासरे स्पष्टपणे नकार द्यायचे. आता मुलीही थोड्या मोठ्या झाल्या. आजोबांच्या लाडक्या होत्या त्या. आता झोका हळूहळू दुरुस्त झाला. त्याला ऊर्जा मिळायला लागली . वेळ मिळेल त्यातून सीताबाई मुलींचा अभ्यास घ्यायला लागल्या. शिकविण्यातली आत्मीयता आणि मुलींची हुशारी सासऱ्यांच्या नजरेतून  सुटली नाही. एके दिवशी त्यांनी सीताबाईंना सांगितलं, ” फक्त काम काम आणि घर अशा कुंपणात राहून, तू तुझं आयुष्य खर्ची घालू नको. शेजारची आणखी चार-पाच मुलं आली तर त्यांनाही शिकव. आणि तसंच झालं. आणखी चार-पाच मुलांना शिकवणं सुरू झालं. आता झोक्याला आणखी ऊर्जा मिळायला लागली . सीताबाई मुलांना, अभ्यासाबरोबर स्तोत्रं, नैतिकतेचे धडे, सणांच महत्व, त्या सणांशी जोडल्या गेलेल्या आख्यायिका अगदी रंगवून रंगवून सांगायच्या. मुलांबरोबर पालकही खुश होते. त्यांच्या शिकवण्याची ख्याती सर्वत्र पसरायला लागली. मुलांची संख्या वाढायला लागली. सीताबाईंना शिकविताना हुरूप वाटायला लागला. शिकविताना त्या रंगून जायला लागल्या. दुःखातलं मन दुसरीकडे वळायला लागलं. सर्वजण त्यांना बाई ,बाई म्हणता म्हणता       ” शाळेच्या आई ” असंच म्हणायला लागले. आता त्या खऱ्या अर्थाने “शाळेच्या आई”, झाल्या. घरातल्या सोप्याचं  रुप पालटून त्याला शाळेत स्वरूप आलं. ” नूतन ज्ञानमंदिर “, अशी पाटी लागली. आता एक मदतनीसही त्यांनी घेतल्या. आता झोका उंच उंच जायला सुरुवात झाली . शिकवत असताना, सीताबाईंना नवनवीन कल्पना सुचायला लागल्या .संक्रांतीला मुलांना हातात तिळगुळ देण्यापेक्षा, अगदी दीड दोन इंचाच्या, वेगवेगळ्या आकाराच्या रंगीत रंगीत कापडी पिशव्या, कल्पकतेने शिवून, त्यातून मुलांना त्या पिशव्यातून तिळगुळ द्यावा, अशा कल्पनेला त्यांनी मूर्त स्वरूप दिलं. वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्या बघून मुलं ही खुष व्हायची. शाळेचं  गॅदरिंग म्हणजे पर्वणी असायची. पालक, विद्यार्थी उत्साहाने, आनंदाने भारून गेलेले असायचे. शिवणकाम , विणकाम , संगीत, काव्य लेखन,  नाट्य लेखन या सर्वांबरोबर कार्यक्रमाचे नियोजन, यात सीताबाईंचा हातखंडा होता. सीताबाई –शाळेच्या आई, स्वतः गाणी तयार करून, मुलांकडून बसवून घेत. स्वतःच्या गोड गळ्यातून म्हणत असत. मुलांना स्वतः सजवत असत. कृष्णाचा एक पोषाख तर त्यांनी कायमचा  शिवून ठेवला होता . ध्रुव बाळ, भरतभेट,  राधाकृष्ण,  हनुमान, राम सीता यांच्या नाटिका स्वतः लिहून, मुलांकडून उत्तम अभिनयासहित करून घ्यायच्या. “कृष्णा sss मजशी बोलू नको रे, घागर गेली फुटून”,असा नाच करताना  छान ठेका  धरला जायचा. ” बांधा उखळाला हो, बांधा उखळाला, या नंदाच्या कान्ह्याला बांधा उखळाला.” गाणं चालू झालं की मुलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून पालक आणि प्रेक्षक यांनाही आनंद व्हायचा . सगळं झालं की मुलांना खाऊ दिला जायचा. छोटी छोटी बक्षीस दिली जायची. हसत हसत मुलं घरी जायची . गोड स्वप्न बघत झोपी जायची. दुसरे दिवशी पालक, शाळेच्या आईंचं कौतुक करून खूप छान छान अभिप्राय द्यायचे. ते ऐकून सीताबाईंना आनंद आणि स्वतः विषयी अभिमान वाटायचा. नवनवीन कल्पनांचा उदय व्हायला लागला. झोक्याला ऊर्जा मिळायला लागली .आणि झोका उंच उंच जायला लागला. सुट्टी सुरू झाली की  त्या माहेरी जात. तेथेही आलेल्या भाचरांचं नाटक, गाणी , नाच तयार करून ,अगदी पडदे लावून, शेजार  पाजार्‍यांना बोलावून गॅदरिंग घ्यायच्या. वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन बक्षीस द्यायच्या . भाचरं आनंदात असायची. त्यांना आत्या हवीहवीशी वाटायची . कोणावरही येऊ नये असा प्रसंग सीताबाईंवर आला. आईचीच दोन बाळंतपणं त्यांना करावी लागली. एका तरुण विधवा मुलीला आईचे बाळंतपण करताना आणि आईला करून घेताना मनाला काय यातना झाल्या असतील त्या शब्दात सांगणे कठीण आहे.

बघता बघता सीताबाईंनी समाजकार्यालाही सुरुवात केली. प्रौढ शिक्षण, स्त्री शिक्षणाची आता पहाट व्हायला लागली होती . अनेक स्त्रियांना साक्षरतेचा आनंद त्यांनी मिळवून दिला. स्वदेशीचा पुरस्कार आणि परकीय कपड्यांवर बहिष्कार म्हणून टकळीवर सुतकताई त्यांनी सुरू केली.

सासर्‍यांचा भक्कम आधार, धाकट्या जावेची मदत, शाळेतल्या गोड चिमुकल्यांच्या सहवासाचा विरंगुळा आणि आनंद, स्वतःची ध्येयनिष्ठा आणि कष्ट , श्री अंबाबाईचा वरदहस्त आणि अखेर नियती या सर्वांच्या एकत्रित ऊर्जेने  झोक्याचे आंदोलन उंच उंच होत गेले . त्या उंच गेलेल्या झोक्याकडे सगळेजण आश्चर्याने पाहत राहिले. अरे वा ss वा, वा ss वा खूपच कौतुकास्पद ! सीताबाईंना आनंदाची आणि उत्साहाची ऊर्जा मिळाली. आणि त्या, ” घरात हसरे तारे असता sas, ”  या गाण्याचा चालीवर स्वतःच्या शब्दात  गाणे गुणगुणायला लागल्या.

मी पाहू कशाला कुणाकडे, मी पाहू कशाला जगाकडे.

घरात ज्ञान मंदिर असता, मी पाहू कशाला कुणाकडे.

    गोड चिमुकली गोजिरवाणी.

    हसती खेळती गाती गाणी.

     मला बिलगती आई म्हणुनी.

उंच माझा झोका पाहता, आनंदाचे उडती सडे.

मी पाहू कशाला कुणाकडे , मी पाहू कशाला जगाकडे.

– समाप्त –

(सत्य घटनेवर आधारित कथा)

  ©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ दिपवाळीचे लक्ष्मीपूजन… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ दिपवाळीचे लक्ष्मीपूजन… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ दिपवाळीचे लक्ष्मीपूजन… स्व. वि. दा. सावरकर ☆

लक्ष्मीपूजन करू घरोघर आम्ही जरी भावे

प्रसन्न पूजेने ना होता लक्ष्मी रागावे

आणि इंग्रज पूजी जरि ना लक्ष्मीची मूर्ती

राबे रिद्धिसिद्धी त्याच्या दाराशी तरि ती

काय बंधुंनो, कारण? रुसली भारतलक्ष्मी कां?

लाथाडुनि दे पूजा अमुची शतकांची देखा

कारण आम्ही सुमें अर्चितो परि ना सुमनानें

विनवू परि ना, विष्णुसम तिला जिंकु विक्रमाने

लक्ष्मीपूजन करावया जैं करितो स्नानाला

परका साबू, परकी तेलें लावू अंगाला

परदेशीचे रेशीम त्याचा मुकटा नेसोनी

देवघरी परदेशी रंगे रंगीत बैसोनी

विदेशातली साखर घालुनि नैवेद्या दावू

अशा पूजनें प्रसन्न होईल लक्ष्मी हे भावू

साबू नेई कोटी, कोटी तेल रुपाया ने

नेई लुटोनी विदेश कोटी अन्य उपायाने

विलायती जी साखर नैवेद्यासी लक्ष्मीच्या

आणियली ती नेत विदेशी कोटी रुपयांच्या

अशा रीतीने लक्ष्मी दवडुनि दाराबाहेरी

लक्ष्मीपूजन करीत बसतो आम्ही देवघरी

आणि विदेशी नळे, फटाके, फुलबाजा अंती

उडवुनि डिंडिम पिटू आपल्या मौर्ख्याचा जगती

अहो हिंदुंनों, कोटी कोटी रुपयांची या दिवशी

लक्ष्मी पूजावयासि लक्ष्मी धाडू विदेशासी

म्हणुनि आम्ही जरी पुजू घरोघर ही लक्ष्मी भावें

प्रसन्न पूजेने ना होता लक्ष्मी रागावे

तरी हिंदुंनों, घरात लक्ष्मी आधी आणावी

विदेशीसि ना शिवू शक्यतो वृत्ती बाणावी

देशी तेलें, देशी साबू, देशी वस्त्रानें

देशी साखर, देशी अस्त्रे, देशी शस्त्रानें

स्वदेशलक्ष्मी पूजू साधुनि जरी मंगलवेळ

गजान्तलक्ष्मी हिंदुहिंदुच्या दारी डोलेल

 – वि दा सावरकर

रसग्रहण

परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातल्याशिवाय या देशाची भरभराट होणार नाही; ही वस्तुस्थिती सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी स्वा. सावरकरांनी ही कविता १९२५ साली रचली. दिवाळीसारख्या सणांच्या वेळी सावरकरांनीच स्थापन केलेल्या हिंदुसभेचे कार्यकर्ते, मेळावे घेऊन, अशा कविता गाऊन, समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न करायचे. सर्वसामान्य जनतेला कळावी, पचावी, रुचावी म्हणून सावरकरांनी या कवितेत अगदी सोपी शब्दयोजना केलेली दिसते. तसेच लोकांना सहज पटतील असे दैनंदिन व्यवहारातील दाखले ते देतात. मात्र कितीही सोपी शब्दरचना केली तरी त्यांच्यातला शब्दप्रभू कुठेतरी डोकावतोच. उदा. ‘सुमनें’ वरचा श्लेष किंवा ‘मूर्खता’ साठी वापरलेला शब्द ‘मौर्ख्य’.

लक्ष्मीपूजनादिवशी घराचा दरवाजा उघडा ठेवला की लक्ष्मी घरात येते असा समज आहे. याचाच उपयोग करून कवी सांगतात की, परदेशी फटाके, तेल, साबण, साखर अशा वस्तू वापरून तुम्ही लक्ष्मीला केवळ दरवाजाबाहेरच नव्हे तर देशाबाहेर घालवीत आहात. आपलाच कच्चा माल कवडीमोलाने घेऊन, त्यांच्या देशात बनलेल्या वस्तू हे इंग्रज आपल्याला विकतात व कोट्यावधी रुपये भारतातून लुटून नेतात. अशा परिस्थितीत लक्ष्मी तुमच्या आमच्यावर कशी प्रसन्न होईल. ती रुसून परदेशीच निघून जाणार. याउप्पर आणि परदेशी फटाके वाजवून तुम्ही जणु आपल्या मूर्खतेचा डिंडोराच पिटता. म्हणून हे देशबंधूंनों, आधी देशाबाहेर  जाणाऱ्या लक्ष्मीला थांबवा म्हणजेच एका अर्थाने आधी लक्ष्मीला घरांत घेऊन या व मग तिची पूजा करा.

कविता संपता संपता का होईना पण ‘देशी साखर, देशी अस्त्रे, देशी शस्त्राने’ या ओवीत त्यांच्यातला क्रांतिकारक डोकावतो. ते म्हणतात, देशी वस्त्रे नेसून, देशी साखरेने नैवेद्य बनवून, देशी अस्त्राशस्त्रांने आपण स्वदेशलक्ष्मीची पूजा करू. म्हणजेच स्वातंत्र्यलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण सशस्त्र आंदोलन करू. देश स्वतंत्र झाल्यानंतरच हिंदुस्थानातील प्रत्येकाकडे गजान्तलक्ष्मी नांदेल, देशाची भरभराट होईल.

हे विचार जवळ जवळ १०० वर्षांनंतर, सद्यपरिस्थितीत देखिल अचूक लागू पडतात. आपण पहातो की दिवाळी आली की चिनी बनावटीच्या वस्तूंचा बहिष्कार  करण्याची टूम निघते पण विविध कारणांमुळे हे फारच कमी प्रमाणात  साधलं जातं. म्हणूनच महान, द्रष्ट्या कवींच्या कविता ह्या सार्वकालिक असतात असं म्हटलं जातं.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अंगाई… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

अंगाई… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

अंगाई हा शब्द कसा आला असेल? खूप विचार केला. अगदी आपल्या गुगल गुरूला पण विचारलं. काही पत्ता लागला नाही. मीच उत्तर मिळवायचा प्रयत्न केला. पूर्वी ‘ गायी गं गायी, माझ्या बाळाला दूध देई ‘ असं म्हणायचे. म्हणजे बाळाच्या परिचयाच्या दोन्ही गोष्टी असणार. गोठ्यात गाय असणार आणि दूध ती देते हे बाळानं पाहिलं असणार.  बाळ रडायला लागलं की त्याची समजूत या गाण्यानं काढली जात असेल व गायी बद्दल आदर लहानपणीच निर्माण होत असेल. नंतर हळू हळू गोठे, गायी काळाच्या उदरात गडप झाल्या. नंतर ते गाणं ‘ गाई  गं अंगाई ‘ असं झालं. त्याचा अर्थ असा लावला गेला असेल की बाळाला, गाई म्हणजे झोप, ती येण्यासाठी गायलं गेलेलं गाणं म्हणजे अंगाई! ही आपली मी माझी काढलेली भाबडी समजूत! पण हे नक्की की आई व्हायचं झालं तर त्या मुलीला अंगाई म्हणता आली पाहिजे असा अलिखित नियम होता. होता म्हणते आहे कारण आज काल आईच्या मदतीला मोबाईल नामक मैत्रीण येते. अंगाई म्हटलं की एक शांत, सौम्य, सोज्वळ गाणं लागतं. अजूनतरी हं ! पुढची पिढी कदाचित ‘ आवाज वाढव डी जे ‘ सारखी गाणी लावतील सुद्धा! कारण तोपर्यंत मुलांना नाजूक आवाजातली गाणी ऐकू येणं बंदही झालं असेल, त्यांनाही मोठ्ठया आवाजातली गाणीच आवडायला लागतील.

मुलांना झोपवताना गाणं म्हणायची पद्धत खूप जुनी असावी. जसं जात्यावर बसलं की ओवी सुचते. तसं बाळ मांडीवर आलं की अंगाई सुचते. ओवी गाण्यासाठी जसं चांगला आवाज किंवा संगीतातील ज्ञान असावं लागत नाही तसंच अंगाईलाही! आपल्याकडे अजून लहान मुलांना झोपताना ऐकवायच्या ट्यूनची खेळणी आली नव्हती, त्या काळात मी लंडनला मला नात झाली म्हणून गेले होते. नातीसाठी तशी म्युझिकवाली खेळणी आणली होती. पण ती रडायला लागली की एवढ्या मोठ्ठयांदा रडायची की त्या खेळण्याचा आवाज कुठे ऐकूच यायचा नाही. मग पारंपारिक मोठ्या आवाजात ‘ हात हात गं चिऊ, हात हात गं काऊ ‘ अशी गाणी किंवा ओरडावं  लागायचं. मला त्यावेळी वाटलं की इंग्रज लोकांच्यात अंगाई गाण्याची परंपराच नसावी. त्यामुळं हे संगीत ऐकवण्याची पद्धत पडली असावी. पण तसं नाही म्हणे! तिथे बाळ आई वडिलांजवळ झोपतच नाहीत. बाळ हे बाळ असल्यापासून त्याची बेडरूम वेगळी असते. त्यामुळं बाळ रडलं तरी आईने जवळ घेण्याचा किंवा अंगाई गाण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून ते म्युझिक!

आपल्याकडच्या परंपरा जरा माणसाच्या मानसिक गरजा बघून बनवल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. केवळ आपलंच कुटुंब नाही तर सगळा समाजच एकत्र बांधून ठेवणाऱ्या प्रथा आहेत.

स्पर्शात ओलावा असतो, तो शब्दात मिळणं सुध्दा अवघड आहे. स्पर्शात प्रेम असतं, आधार असतो, आता कशाचीही भिती नाही हा विश्वास असतो. हा विश्वास लहान बाळांना देण्यासाठी मांडी, कूस, पदर, बाळाशी केलेला संवाद यागोष्टी महत्त्वाच्या असतात. आपल्याकडे लहान बाळांना बोललेलं सगळं कळतं असं आपण समजतो. बाळ जन्माला आल्यावरच असं नाही तर अभिमन्यू  सारखे गर्भातही संस्कार होतात हा आपला विश्वास आहे. जिजाऊ यांनी तर शिवाजीला वीरश्रीने भरलेल्या गोष्टी ऐकवल्या, अंगाई ऐकवली आणि तो  शूरवीर झाला.    आपल्या सामान्य माणसांच्या अंगाई मध्ये चिऊ, काऊ, झाडं, चंदामामा अशी निसर्गाची ओळख असते.अंगाई वरून एक गम्मत आठवली. माझ्या दुसऱ्या मुलाला मुलगा झाला. तो जरा रडवाच होता. माझा मुलगा जरा जास्तच हळवा त्यामुळं तो रडायला लागला की हा कासावीस व्हायचा. त्याला तर  मराठी गाणी, अंगाई असं काही म्हणायला येत नव्हतं. हिंदी सिनेमातली गाणी यायची पण प्रेमाची नाहीतर विरहाची! ही सोडून एक गाणं त्याला यायचं, ते कुठलं सांगू?  ‘हमारीही मुठ्ठीमे आकाश सारा ‘ आणि तो हेच गाणं म्हणून मुलाला झोपावयाचा. मला खूप उत्सुकता आहे, तो नातू पुढे मोठ्ठा झाल्यावर कोण बनेल, कोणतं कर्तुत्व गाजवेल याचं!

आपल्याकडे एक जगावेगळी आई होऊन गेली, मदालसा! अंगाई चा विषय निघाल्यावर मदालसा चा उल्लेख व्हायलाच हवा. एकमेव आई जिने अंगाई तून मुलांना अध्यात्माचे धडे दिले. असं कां, हे कळण्यासाठी तिची गोष्ट थोडक्यात सांगावीच लागेल. ही ऋतूध्वज राजाची राणी ! पातालकेतू राक्षसाच्या मायावी कृत्यामुळे तिने मृत राजा पाहिला, आणि अग्निकाष्ठ भक्षण करून देह विसर्जित केला. राजा अतिशय दुःखी झाला. त्याला वैराग्य प्राप्त झाले. अजून राजाला मूलबाळ ही नव्हते, राज्यकारभार कोण पाहणार? मग कंबल व अश्र्वतल या नागऋषींनी शिवाराधना करून तशीच दुसरी मदालसा प्राप्त करून घेतली. ती शिवाचा अंश असल्यामुळे वैराग्यशील होती. अगदी नाईलाज म्हणून संसार यात्रा आक्रमू लागली. पहिल्या मुलाच्या नामकरणाच्या वेळी ती म्हणाली, नश्वर देहाला नाव कशाला ठेवायचे, मृत्तिका व शरीर दोघांची योग्यता सारखीच.राजाने तिला नामकरण व आत्मोन्नत्ती याची माहिती दिली, पण परिणाम उलटाच झाला. मुलांनी राज्यशकट हाकण्यापेक्षा आत्मोद्धार करावा म्हणून ती निवृत्ती विषयक, आध्यात्मपर अंगाई गात असे. त्याचा साधारण अर्थ असा – ‘सुबाहू उगा रडून शिणू नकोस, पूर्व जन्मीच्या संचितानेच या मायाजालात अडकलास, सावध हो, डोळे मिटून घे पण झोपू नकोस, दृष्टी प्रभुकडे ठेव, अज्ञानाने तू भवबंधनात अडकला आहेस, पण आत्मा मुक्त असतो, ही मायेची बंधने तुटणे कठीण आहे, सावध हो.’

या पुढे जाऊन ती विश्व निर्मितीची क्रिया, मायेचे पाच उद्गार, पंचतत्वे , पंचवायू, पंचेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच अवस्था, जड देह, लिंग देह, शरीर रचना, सर्व नाड्या व शटचक्रांची माहिती सांगते. पुढे नाडी जागृत करणे, आत्मज्योतीचे दर्शन, मोक्ष यांचीही माहिती देते. परिणामी सुबाहू, शत्रुमर्दन, शुभकिर्ती ही तिन्ही मुले राजवैभवाचा त्याग करून अरण्यात जातात. शेवटच्या  अलर्क या मुलाच्या वेळी राजा तिची मनधरणी करतो त्यामुळे ती अलर्क ला राजनीतीचे पाठ देते, पुढे तो अनेक वर्षे राज्य करतो. ज्यावेळी तो लढाईत हरतो त्यावेळी आईने जपून ठेवण्यासाठी दिलेले पत्र वाचतो, त्या पत्राप्रमाणे तो सह्याद्री पर्वतावर श्री दत्त प्रभुंच्याकडे जातो, त्यांचा अनुग्रह प्राप्त करून मुक्त होतो. मदालसाने ‘ माझ्या पोटातला गर्भ, कुण्या दुसऱ्या आईच्या पोटात जाणार नाही ‘ अशी प्रतिज्ञा केली होती. त्याप्रमाणे तिने तिन्ही मुलांना मुक्तीमार्ग दाखवला. ज्ञानेश्वरांनी लिहिलेले मदालसेचे अभंग म्हणजेच तिच्या अंगाईचे भाषांतर!

एकूण सांगायची गोष्ट अशी की हा आपला विश्वास आहे की अगदी लहानपणापासून आपण बाळांना जे सांगतो, जे शिकवतो ते ती आत्मसात करतात. त्यालाच आपण ‘ बाळकडू ‘ म्हणत असू.

आपण असं कितीही मानलं तरी याला कितीतरी अपवाद असल्याचं आपल्या लक्षात येतं. बाळ मोठ्ठं झाल्यावर कसं निपजेल हे सांगता येत नसलं तरी हे खरं आहे की आई आणि बाळ यांच्यात एक स्पर्शाचं नातं असतं, एक हळुवार नातं असतं, हे नाजूक बंध जास्त दृढ होतात, जेंव्हा आई त्याला आपल्या हाताने न्हाऊ, माखू घालते, चिऊ काऊ चे घास भरवते. मातृत्वाचं जे सुख असतं ते बाळाच्या बाललीलात, बालसंगोपनात ओतप्रोत भरलेलं असतं. हे संगोपन परक्याच्या हातात सोपवून, जन्माला आल्याबरोबर स्वतंत्र बेडवर, स्वतंत्र बेडरूम मध्ये झोपवून, आई या मातृसुखाला पारखी होत नसेल? कदाचित बाळ त्यामुळं धीट, स्वावलंबी आपल्या बाळापेक्षा लवकर होत असेल पण अशा बाळाला  जन्मदात्रीशी सांधणारा दुवा निर्माणच होत नसेल तर तो दुवा इतर कुठल्याही नात्याला सांधण्यासाठी निर्माण होणार नाही. त्यामुळं माणूस नुसता एकटा पडत नाही तर तो कोरडाही होतो. अर्थात ही आपल्या पिढीची मतं झाली. पुढच्या पिढ्या पाश्चिमात्य संस्करावर, विज्ञानातील प्रगतीवर  जोपासल्या जाणार आहेत. त्यामुळं जन्माला आल्यापासून मोबाईल किंवा त्याचं दुसरं एखादं व्हर्जन बघत बघत झोपतील, आईची किंवा अंगाईची गरज संपलेली असेल. असो, कालाय तस्मैनमः|

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ – दर्पणी पहाता रूप… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – दर्पणी पहाता रूप… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

बालपणापासून मी, अमक्यासारखी दिसते, तमक्यासारखी दिसते, असं अनेकांनी माझ्या दिसण्यावरून मला सांगितलं होतं. लांब केस असताना कुणी अभिनेत्री ‘नूतन’सारखी दिसते म्हणायचे, तर लांब चेहर्‍यामुळे अगदी ‘नर्गिस’ म्हणायचे. एखाद्या कार्यक्रमात सुनील दत्त साहेबांची भेट व्हायची, तेव्हा माझं गाणं ऐकताना ते बराच वेळ टक लावून पहायचे आणि  ‘छोट्या पद्मजाचे’ लाड, कौतुकही करायचे! 

माझे गुरु पं. हृदयनाथजी मंगेशकर तर मला पारशी म्हणतात. साक्षात् ‘भारतरत्न’ लतादीदी तर हृदयनाथजींना, माझ्या नावापेक्षाही, “बाळ, तुझी पारशी पोरगी काय म्हणते रे?” असं गंमतीनं विचारत. आमच्या घरची मंडळी माझ्या बालपणी, मुद्दाम मला चिडवण्यासाठी,  “ए, ही पारशाच्या जव्हेरी हॉस्पिटलमध्ये बदलून आली बरं का! चुकून पारशाचं पोर आई घरी घेऊन आली!” असं सारे जेव्हा म्हणत, तेव्हा मला खरंच वाटे आणि मी रडून थयथयाट करीत असे. (वास्तविक माझे वडील शंकरराव गोरेपान, तजेलदार चेहऱ्याचे आणि धारदार नाकाचे…. ते खरे पारसी दिसत!) 

नूतन आणि नर्गिसचा तर मला उगीचच राग येत असे. लेखक श्री. अशोक चिटणीस काका तर मला “तू एखादं ग्रीक स्कल्पचर असावं, अशी वाटतेस,” असं म्हणत. 

मात्र अलीकडेच, एका नाटकाच्या निमित्ताने माझी आणि एका महान कलावंत स्त्रीची माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण सेंटर या सभागृहात भेट झाली. मला त्यावेळी आठवण झाली, ती म्हणजे आमचे शेजारी थोर गायक आणि एचएमव्हीचे त्यावेळचे सर्वेसर्वा श्री. जी. एन. जोशी यांची! ते माझ्या बाबांचे परममित्र! ज्यांनी मला बालपणापासून खूप प्रोत्साहन दिलं, कोडकौतुक केलं. ते नेहमी म्हणत, “तू – अगदी या बाईंसारखी दिसतेस बरं का!”  खरंतर या बाईंविषयी मी, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनेक कलावंत घडवणाऱ्या कडक दरारा असणार्‍या गुरू, असं त्यांचं वर्णन ऐकून होते. त्यांना टीव्हीवर आणि फोटोतही पाहिलं होतं. मात्र भेट प्रथमच त्यादिवशी ग्रीन रूममध्ये झाली. कुणीतरी आमची ओळख करून दिली. आरशात आम्ही एकमेकींना पाहिलं आणि त्यांना मी म्हंटलं, “अनेकजण म्हणतात…. आपल्यात खूप साम्य आहे म्हणून.” त्यावर त्या गोड हसल्या आणि अगदी सहजपणे, जणू काही रोजच भेटत असल्यासारखे, माझा हात हाती घेऊन त्या म्हणाल्या, “बरोबर आहे पद्मजा…. Our soul is the same!!!”

त्यांचे हे आशीर्वादरूपी बोल ऐकून, माझ्या अंगातून आनंदाने वीज चमकून गेली. आनंदाला पारावार उरला नाही. कारण त्या होत्या, अनेक सुप्रसिद्ध कलावंतांच्या गुरू, अभिनेत्री, बुद्धिमान, प्रतिभावंत व कलेची उपासक स्त्री, तसंच बर्‍याच नाटकांना चैतन्य देणार्‍या महान दिग्दर्शिका – आदरणीय ‘विजयाबाई मेहता’! 

“त्यांच्या मते, कला म्हणजे चैतन्याची शोधप्रक्रिया… कोणताही कलाकार आपली कला सादर करताना, स्वतःच्या वास्तवापलीकडे जाऊन मूळ सत्याचा, चैतन्याचा, स्रोताचा शोध घेण्याचा अविरत प्रयत्न करत असतो. संगीत, नाट्य, नृत्य यांसारख्या कला सादर करताना कलाकार व्यासपीठाच्या रिकाम्या पोकळीत एकटा असतो, मात्र आपल्या आविष्काराने तो सभागृहाला भारून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. अभिजात कलेतील साधकाला आपल्या कलेत प्रभुत्त्व मिळवण्याची ओढ म्हणजे एखाद्या श्रेष्ठ कलाकाराला लागलेले एक व्यसनच असते..”

त्यांचे हे विचार, तो तेजस्वी चेहरा आणि हाताचा मृदु मुलायम स्पर्श, ‘तो आशीर्वाद’……‘दर्पणी पहाता रूप’ म्हणत माझ्या मनात आजही दरवळत आहे!

(४ डिसेंबर… विजयाबाई मेहता यांचा जन्मदिवस! त्यानिमित्त त्यांना अनेकोत्तम शुभेच्छा)

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आंदोलनं  झोक्याची–झेप फिनिक्सची –  भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

आंदोलनं  झोक्याची–झेप फिनिक्सची – भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

श्रावण महिना. नागपंचमीचे दिवस . छान गोड हिरवाईचा पसरलेला सुगंध, मोठ्या वडाच्या झाडाला ,एका मोठ्या फांदीला, एक मोठा झोका बांधलेला होता. मुली झोका खेळत होत्या. झोका उंच उंच चढवत होत्या.  झोका जास्त उंच जायला लागल्यावर मात्र बाजूला  उभ्या असलेल्या बघ्यांचा दंगा, आरडा ओरडा चालू व्हायचा. झोका खाली यायला लागल्यानंतर मात्र मुलींना पोटात खड्डा पडल्यासारखं व्हायचं. झोक्याबरोबर सगळेच छान रंगले होते . सगळं दृश्य मी गॅलरीत बसून पाहत होते. झोक्याची ती आंदोलनं पहात असताना, मला सीताबाई म्हणजे, पूर्वाश्रमीच्या ‘ हेमवती ‘ या एका कर्तबगार स्त्रीने , उंच झोक्याचे स्वप्न पाहिले होते, त्याची आठवण झाली . सांगलीची हेमवती ही भावंडाची सर्वात मोठी बहीण. तिच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करायला शब्द अपुरे पडावेत असं रूप ! चेहऱ्यावर एक प्रकारच्या टवटवीतपणाचं सौंदर्य, सुडौल बांधा , विपूल केश संभार, आत्मविश्वासू वृत्ती, आणि तडफदार भाषा असंच व्यक्तिमत्व होतं तिचं. मुलींनी जास्त शिक्षण घेणं , त्या काळातल्या समाजाला मान्य नव्हतं . काळच वेगळा होता तो.  हेमवतीच चौथीपर्यंतच शिक्षण झालं. आता शिक्षण भरपूर झालं ,पुरे आता शिक्षण, असा घरात विचार सुरू झाला. हेमवती अभ्यासू वृत्तीची,   हुशार, नवनवीन खाद्यपदार्थ शिकण्याची आवड, शिवणकाम, विणकाम, भरतकाम ,सगळ्या कला पुरेपूर अंगी बांणलेल्या होत्या.

हेमवती आता 13 -14 वर्षाची झाली . म्हणजे काळानुसार उपवर झाली . स्थळं बघायला सुरुवात झाली. कोणीतरी कोल्हापूरच्या मुलाचं सुयोग्य वर म्हणून स्थळ सुचवलं . मुलगा रामचंद्र  हा मुंबईला पोस्टात अधिकारी पदावर नोकरीला होता. कोल्हापूरला स्वतःचं घर, घरात सासू-सासरे , दीर, असं घर भरलेलं होतं  आणि सर्वात भावलं म्हणजे श्री अंबाबाईच्या वासाचं पवित्र तीर्थक्षेत्र — दक्षिणकाशी  अस कोल्हापूर.

दोन्हीकडूनही नकार देण्यासारखं काहीच नव्हतं. पसंता पसंती झाली.  लग्न ठरलं. आणि झालंही.  रामचंद्र यांनी आपल्या नावाशी अनुरूप असं पत्नीचं नाव ‘सीता ‘ असं ठेवलं.’ हेमवती’ आता ‘ सीताबाई ‘ झाल्या.

रामचंद्र आणि सीताबाईंचा मुंबईला आनंदाने संसार सुरू झाला. माहेरी दहा-बारा जणांच्या कुटुंबामध्ये राहिलेल्या, सीताबाईंना , मुंबईला प्रथम एकाकीपणा वाटायला लागला. पण नंतर त्या लवकरच छान रुळल्या . काही दिवसातच  पाळणा हलला आणि कन्यारत्न झाले .खरोखरच  ‘रत्न ‘ म्हणावी अशीच गोरीपान , सुंदर , घारे डोळे अगदी तिच्याकडे पहात रहावं असं रूप! सासरच्या घरातली पहिली नात. कोल्हापूरची म्हणून अंबाबाई असं नामकरण झालं. सर्वजण तिला अंबू म्हणत. सीताबाई अनेकदा कन्येच्या सौंदर्याकडे पहात रहात आणि माझीच नाही ना दृष्ट लागणार हिला , असं म्हणून तिच्या गालावरून हात फिरवून बोट मोडायच्या. अंबू साडेतीन वर्षाची झाली आणि सीताबाईंना बाळाची चाहूल लागली . आता बाळंतपणासाठी सासरी, कोल्हापूरला आल्या. दुसरी कन्या झाली . अंबुची बहीण म्हणून ही सिंधू ! दोघेही खूप विचारी होते. त्यामुळे दोघेही नाराज नव्हते. बाळाला तीन महिने होत आले. आता बाळ बाळंतिणीला मुंबईला घेऊन जावे, या विचाराने रामचंद्र कोल्हापूरला आले. दोन दिवसांनी निघायची तयारी झाली . सामानाची बांधाबांध झाली.

सगळ्या गोष्टी सरळपणान होऊन, त्यांना आनंद मिळू देणं नियतीला मान्य नव्हतं. सगळं उलटं पालटं झालं. रामचंद्रना हार्ट अटॅक आला . आणि त्यातच त्यांना देवाज्ञा झाली. सीताबाई खोल गर्तेत गेल्या. आभाळ कोसळलं त्यांच्यावर . घरदार दुःख सागरात बुडाले. कोणाला काहीच सुचेना. बाळाला तर वडील कळण्यापूर्वीच नियतीने हिरावून नेलं. वर चढलेला झोका खाली येणारच, पण खाली येताना पोटात खड्डा पडला. आणि झोका मोडूनच पडला.

दुःखद बातमी मुंबईच्या ऑफिसला कळवली गेली. तिकडे सामान आणायला जी व्यक्ती गेली , ती दोन-तीनच  वस्तू घेऊन आली. बाकी सामानाचं काय झालं , ही गोष्ट कोण कोणाला विचारणार! ती विचारण्याची वेळही नव्हती. आता पुढे काय? हे प्रश्नचिन्ह प्रत्येकासमोर उभे होते. दिवस वार झाल्यानंतर माहेरच्यांनी विचारणा करून , बदल म्हणून सीताबाईंना माहेरी घेऊन गेले. आपल्या मुलीला सावत्र सासूजवळ कशी वागणूक मिळेल याची काळजी होती. सीताबाई माहेरी दोन अडीच महिने राहिल्या. एरवी माहेरी जाण्यातला आणि रहाण्यातला आनंद वेगळा आणि आताचं माहेरपण म्हणजे,  नाराजीचे सूर आणि अश्रूंचा पूर , असं चित्र होतं. सतत कोणी ना कोणी समाचाराला यायचं. त्यांचे वेगवेगळे उपदेश ऐकायला लागायचे. सीताबाईंना कोणी, मुलीचा पायगुण म्हणायचे. मुलीची काय  चूक असं त्यांना वाटायचं. आणि डोळ्यातून अश्रू धारा वहायला लागायच्या. सीताबाई विचार करायच्या, -“त्या सीतामाईला वनवासात श्रीरामासारख्या पतीचा भक्कम आधार होता. पण मी ही सीता मात्र दोन लहान मुलींना घेऊन हाताशपणे उभी आहे. माझं काय चुकलं असेल बरं?  रामचंद्रना देवाने अशा आनंदातल्या संसारातून उचलून का नेलं असेल बरं? अनेक प्रश्न , अनेक विचार मनात गर्दी करायचे. पण त्या प्रश्नांना अजून उत्तर सापडत नव्हतं. माहेरचे लोक त्यांना “आता इकडेच रहा ” म्हणत होते. तेव्हा सीताबाईंनी निक्षून सांगितलं , “मुंबईचं माझं घर हक्काचं होतं , ते काळानं हिरावून नेलं .आता मी कोल्हापूरच्या घरात राहिले तर, सासर आणि माहेर अशी मला दोन घर मिळतील. दोन्हीकडे मी राहू शकेन. पण माहेरीच राहिले तर सासर तुटेल “. एक बुद्धिमान स्त्रीच इतका विचार करू शकेल.

– क्रमशः भाग पहिला 

 ©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares