मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पहिला प्रकाश – भाग-2 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ पहिला प्रकाश – भाग-2 ☆ श्री राजीव गजानन पुजारी 

(सायके मोहिमेने सुदूर अंतराळातून लेसरद्वारा पृथ्वीशी साधलेला दूरसंवाद )

६) विलंब (Latency) :-

अंतराळाशी दूर संवाद विनाविलंब होत नसतो. या दूर संवादाच्या वेगावर एक वैश्विक मर्यादा असते, ती म्हणजे प्रकाशाचा वेग जो १,८६,००० मैल प्रती सेकंद एवढा असतो. पृथ्वी समीप कक्षांमधील अंतराळ याने पृथ्वीशी माहितीची जी देवाण-घेवाण करतात त्यामध्ये होणारा विलंब नगण्य असतो. पण जसजसे आपण पृथ्वीपासून दूर जाऊ त्यावेळी होणारा विलंब हे एक आव्हान बनते. जेव्हा मंगळ पृथ्वीच्या अगदी जवळ असतो – साधारण ३५ दशलक्ष मैल- त्यावेळी होणारा विलंब चार मिनिटांचा असतो. ज्यावेळी मंगळ व पृथ्वी यांच्यातील अंतर जास्तीत जास्त असते – साधारण २५० दशलक्ष मैल- त्यावेळी होणारा विलंब २४ मिनिटांचा असतो. म्हणजेच अंतराळवीरांना पृथ्वीकडे पाठविलेला संदेश मिशन कंट्रोलला पोहोचायला ४ ते २४  मिनिटे वाट बघावी लागेल आणि आणखीन  ४ ते २४ मिनिटे मिशन कंट्रोलने त्यांना दिलेले उत्तर मिळण्यासाठी वाट बघावी लागेल. ज्यावेळी माणूस मंगळावर वसाहत करेल, त्यावेळी पृथ्वीशी त्यांनी केलेल्या संभाषणात, विलंब हा एक घटक आहे हे गृहीत धरून दूरसंवाद अभियंत्यांना दूरसंवाद प्रणालीचे नियोजन करावे लागेल.

७) अडथळा /हस्तक्षेप (Interferance) :-

आपण जसजसे अंतराळात दूर दूर जाऊ तसतशी अंतराळयानाने पाठविलेल्या विदेची व अंतराळयानाकडे पाठवलेल्या विदेची गुणवत्ता ढासळत जाते. त्यामुळे पाठविलेल्या संदेशांमध्ये चुका उत्पन्न होऊ शकतात. दुसऱ्या मोहिमांकडून व सूर्याकडून येणारी प्रारणे, तसेच आपण सूर्यमाले बाहेर गेल्यास अंतराळातील इतर गोलकांकडून (celestial bodies) येणारी प्रारणे यांचा संदेशाच्या गुणवत्तेमध्ये हस्तक्षेप होतो. मिशन ऑपरेशन व कंट्रोलला अचूक विदा प्राप्त व्हावी म्हणून अंतराळ संशोधन संस्था हस्तक्षेप पकडणे व तो दूर करणे यासाठी विविध उपाय योजतात. यांमध्ये कॉम्प्युटरला अशी आज्ञावली दिली जाते जेणेकरून तो हस्तक्षेप विरहित माहिती (वापरण्यायोग्य विदा) अभियंत्यांना देतो.

हॉलिवूड सिनेमांमध्ये परग्रहवासीय विनासायास पृथ्वीवासीयांशी संवाद साधू शकतात असे स्वप्नरंजन दाखविले जाते. नासा, इस्त्रो अशा अंतराळ संस्थांमधील अभियंते हे स्वप्न वास्तवात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातीलच एक टप्पा म्हणजे लेसर आधारित दूरसंभाषण होय.

नासाच्या सायके (psyche)अंतराळयानाने १४ नोव्हेंबर २०२३ च्या पहाटे पृथ्वीकडे १६ दशलक्ष किलोमीटर अंतरावरून यशस्वीरित्या लेसर संकेत पाठविला व अंतराळक्षेत्रात दूरसंभाषणाचे एक नवीन दालन उघडले. ५ऑक्टोबर २०२३ रोजी प्रक्षेपित केलेले सायके हे अंतराळयान मंगळ व गुरु या ग्रहांदरम्यान असणाऱ्या व  विविध खनिज द्रव्याने परिपूर्ण अशा सायके याच नावाच्या लघुग्रहाकडे प्रवास करीत आहे. या लघुग्रहाचा अभ्यास केल्याने पृथ्वीच्या लोहयुक्त गाभ्याविषयी अधिक माहिती मिळेल. हे अंतराळयान आणखी एक प्रयोग करणार आहे, यामुळे सुदूर अंतराळाच्या अन्वेषणास नवीन आयाम मिळणार आहे. या प्रयोगाअंतर्गत १४ नोव्हेंबर २०२३ रोजी यानाने पृथ्वीकडे लेसरद्वारे प्रायोगिक तत्त्वावर विदेचे प्रक्षेपण केले. सुदूर अंतराळातून अतिवेगाने प्रवास करत असताना अंतराळयान त्याने प्राप्त केलेला विदा कसा बरे पाठवीत असेल? पृथ्वीवर ज्याप्रमाणे आपण बिनतारी संदेश पाठितो, अंतराळयान विद्युत चुंबकीय वारंवारितेच्या विविध बॅन्डविथस् वर विदेचे सांकेतन करते. सध्याचा विचार केला तर बहुतेक सर्व अंतरिक्ष संदेशन रेडिओ लहरी वापरून केले जाते. विद्युत चुंबकीय वर्णपटात रेडिओ लहरींची तरंग लांबी सर्वात जास्त असते पण वारंवारिता सर्वात कमी असते. ज्यावेळी सर्व घटक समान असतात तेव्हा जास्त बँडविड्थ असणारा संकेत  घट्ट तरंगांमध्ये जास्त विदा सामावून एका सेकंदाला जास्त विदा वाहून नेतो. त्यामुळे वैज्ञानिक विदा पाठवण्यासाठी जास्त बँडविड्थ  वापराण्याला प्राधान्य देतात आणि हे काम आव्हानात्मक आहे. संप्रेषणासाठी इतर विद्युत चुंबकीय लहरींपेक्षा रेडियो लहरी जास्त करून वापरल्या जातात, कारण त्याचे सुयोग्य प्रसारण (propagation) होय. कोणत्याही हवामानात, झाडाझुडपांच्या अडथळ्यांमधून आणि जवळजवळ सर्व बांधकाम साहित्यातून अडथळ्यांना वळसा घालून त्या पुढे जातात. कमी तरंग लांबींच्या लहरी अडथळ्यांवर आपटून विखुरल्या जातात. विदेच्या वेगवान संप्रेक्षणासाठी अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन विषयक संस्थेने एक अनोखा प्रयोग करायचे ठरविले. याला सुदूर अंतरिक्ष प्रकाशीय संप्रेषण (Deep Space Optical Communication- DSOC) असे संबोधण्यात आले. यात अंतराळयानाशी संपर्क साधण्यासाठी आवरक्त समीप (near infrared) लेसर संकेतांचा वापर करण्यात आला आहे.

नासाच्या मते DSOC च्या वापरामुळे विदा संप्रेषणाचा वेग तेवढ्याच आकार व क्षमता असणाऱ्या रेडिओ संप्रेषण प्रणालीच्या वेगापेक्षा किमान दहापट वाढेल. त्यामुळे HD व्हिडिओंसह विदेचा मोठा साठा संप्रेषित करता येईल.

DSOC पारेषग्राही (transcevier) असणारे सायके हे पहिलेच अंतराळयान आहे. याचा वापर करून हे यान  पहिली दोन वर्षे पृथ्वीशी उच्चपट्टरुंदी (high band width) प्रकाशकीय दूरसंवाद साधेल.

कॅलिफोर्निया राज्यामधील राईटवूड जवळ असणाऱ्या नासाच्या टेबल माउंटन फॅसिलिटी येथील प्रकाशकीय संप्रेषण दुर्बीण प्रयोगशाळेतून (optical communications telescope laboratiry)१४ नोव्हेंबर २०२३ रोजी लेसर शलाके द्वारा प्रक्षेपित केलेला संकेत सायके वरील पारेषग्राहीने टिपला व या तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाने ‘प्रथम प्रकाश’ साध्य केला. उच्चपट्टरुंदीच्या प्रसारणाला असणाऱ्या मर्यादा लक्षात घेतल्या तर हे तंत्रज्ञान कसे काम करते हे समजून घेणे खूप मनोरंजक आहे. नासाच्या अहवालानुसार ‘अचूक वेध’ हे याचे उत्तर आहे. यानावर असणारा लेसर पारेषग्राही आणि जमिनीवरील लेसर प्रक्षेपक या दोघांनी अचूक वेध घेणे आवश्यक आहे. हे म्हणजे हलत्या डाईमचा (२सें.मि. आकाराचे एक नाणे) एक मैल अंतरावरून वेध घेण्यासारखे आहे. यानावरील पारेषग्राही यानाच्या कंपनांपासून विलग करणे, यान व पृथ्वी यांच्या सतत  बदलणाऱ्या स्थितीशी जमवून घेणे आणि कमकुवत लेसर संकेतांमधून विदा प्राप्त करणाऱ्या नवीन संकेत प्रक्रियेच्या तंत्रज्ञानामुळे हे साध्य झाले आहे. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांमध्ये या तंत्रज्ञानाचे पूर्वी प्रात्यक्षिक झाले आहे. पण DSOC मुळे सुदूर अंतराळात देखील हे तंत्रज्ञान वापरता येणे शक्य आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. चंद्रापेक्षाही सुदूर अंतराळात प्रवास करण्याची मानवाची महत्त्वकांक्षा आहे. त्यावेळी वेगवान दूरसंभाषण ही काळाची गरज आहे. नासाच्या अंतरिक्ष तंत्रज्ञान मोहिमेच्या निदेशालयाचे टूडी कोर्टीज म्हणतात, “‘पहिला प्रकाश’ मिळविणे हा DSOC च्या अनेक महत्वाच्या टप्प्यांपैकी एक आहे. मानवाच्या मंगळावर मानव पाठविणे या उत्तुंग  झेपेला पाठिंबा देणारी ही घटना आहे.”

संदर्भ :

१) nasa.gov/missions/tech-demonstration/space-communications 

२) Indian Express च्या १६.११.२०२३ च्या अंकातील लेख 

© श्री राजीव गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आनंद मानायला शिकूया…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “आनंद मानायला शिकूया…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

दोन तीन दिवसांपूर्वीच त्यांचं आमच्या घरी आगमन झालयं आणि जणू खूप तहान लागली असतांना समोर फक्त आणि फक्त अथांग समुद्र  असावा किंवा नुकतीच शुगर डिटेक्ट झाल्याबरोबर समोर पंचपक्वान्नाचे ताट यावे,असा फील आलाय. कारणं बँकेचे ऑडिट सुरू असल्याने बँक सोडून बाकी कशालाही जणू वेळच उरत नाही. अर्थातच बँकेचे काम हे नोकरी असल्याने माझ्यासाठी प्रायोरीटी मध्ये वरच्या क्रमांकावर.

परवा मस्त दिवाळीअंकाचा गठ्ठा घरी आला.समोर वाचण्यासाठी इतकी वाचनसंपदा पसरली आहे आणि आपली अतिव्यस्त दिनचर्येमुळे आपण त्याचा धडपणे आस्वाद घेऊ न शकल्याने मन खरचं व्यथित होतं.

खरचं बोटांवर मोजण्याइतक्या काही व्यक्ती असतात त्यांना आपल्या आवडीनिवडी आणि आपल्या जबाबदा-या ह्यांचा योग्य समतोल साधण्याचं कसबं असतं.नाहीतर बहुतेक ठिकाणी दात असले की चणे नसतात आणि चणे येतात तेव्हा दात गायब होतात.

सहसा आपण लोकं आधी पैसा मिळवणे, तो साठवणे ह्या मागे इतके हात धुवून लागतो की आपण आपल्याच साठी क्षणाचीही उसंत घेत नाही. प्रसंगी आपण आपल्या आवडींना फाटा देतो आणि आधी कर्तव्य बजावायला सज्ज होतो.हे करतांना स्वतःची मोठी स्वप्ने पूर्ण करण्याच्या ध्यासाने इतके कामात गुरफटतो की स्वतःच्या आवडीच्या छोट्या  छोट्या गोष्टींचाही आस्वाद घेण्यात वेळ घालवायचा विसरतो.आणि जेव्हा सगळ्या जबाबदा-या आटोपून आपण जरा हूश्श् करतो आणि आपल्या आवडींकडे वळू असे ठरवितो तेव्हा आपलेच शरीर आपल्याला साथ देत नाही.

सध्या आपण चार ओळी वाचायला वेळ काढत नाही आणि जेव्हा वेळच वेळ मिळतो तेव्हा वाचण्यासाठी आपली नजर,आपले डोळेच साथ देत नाहीत. हीच गोष्ट पर्यटनाच्या बाबतीत पण लागू पडते.कित्येकदा आपण परदेशी फिरण्याच्या स्वप्नापाई तरुणपणात नुसती ढोर मेहनत करतो. जेणेकरून सगळ्या जबाबदा-या उरकल्या की सहजतेने परदेशी फेरफटका मारता येईल. पण वस्तुस्थिती अशी येते की तेव्हा पैसा तर येतो पण परदेशी फिरण्याची शरीरात ताकदच नसते.ह्या परदेशी फिरण्याच्या ध्यासापायी आपण आपला भारत देश सुध्दा धड पूर्णपणे बघत नाही.

खरचं मला फार कौतुक वाटतं अशा लोकांच जे आयुष्यातील जबाबदा-या पार पाडतांना प्रत्येक पायरीवर काही क्षण का होईना विसावा घेतात,त्या विसाव्यातच आपल्या आधी लहान का होईना पण आवडी,ईच्छा पूर्ण करतात.नाहीतर काहीजणं भराभर पूर्ण जीना घाईघाईने चढायच्या नादात कधीकधी अजिबात विराम न घेता धावतपळत  ध्येय गाठण्यासाठी उरापोटावर जावून इच्छित स्थळी पोहोचतात तर खरं पण पोहोचेपर्यंत पार दमून गेल्यामुळे त्यातला आनंद, त्यातला रसच गमावलेला असतो.

त्यामुळे शरीराला आणि मनाला सुध्दां टप्प्याटप्प्यावर विश्रांतीची ,थकवणा-या मोठमोठ्या स्वप्नांमागे न धावता छोट्याछोट्या गोष्टीतही आनंद मानायला शिकण्याची सवय हवी हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तोच चंद्रमा नभात” ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

“तोच चंद्रमा नभात☆ श्री मनोज मेहता 

कधीकाळी बाबूजींची अन् माझी ओळख तरी होईल का, हेच माहीत नव्हतं, मैत्री तर दूरच ! आणि अचानक डॉ. पुणतांबेकर यांनी १८ एप्रिल २००० रोजी, फर्मान सोडलं, “मनोज, बाबूजींची छायाचित्रं तूच काढायचीत, आपल्याला उद्या त्यांच्या घरी जायचे आहे.” आणि त्याप्रमाणे आम्ही सकाळी १० वाजता बाबूजींच्या घरी पोचलो. सोसायटीच्या नामफलकावर एकच नाव मराठीत होतं, ते म्हणजे………… ‘सुधीर फडके’.

डॉक्टरांच्या मागून मी जरा घाबरतच घरात प्रवेश केला आणि, ज्यांनी करोडो मराठी रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले, त्यांचे मला साक्षात  दर्शन  झाले. लेंगा – झब्बा, बुटकी मूर्ती, प्रसन्न चेहरा! मी  भारावून काही क्षण पहातच राहिलो. त्यांनी “पाणी घ्या”, असं म्हटल्यावर, मी भानावर आलो.

डॉक्टर आणि बाबूजींचं बोलणं सुरू झालं. आणि माझं काम झपाझप सुरू झालं. आत्ताच्या भाषेत कँडीड छायाचित्रं… पूर्ण रोल संपला. त्यांच्या गप्पा संपल्या व डॉ. पुणतांबेकर म्हणाले, “मनोज आता आमची छायाचित्रे काढ”. 

मी लगेच म्हणालो, “माझी छायाचित्रे काढून झालीत”. 

मी असं म्हणताच डॉक्टर अचंबित होणे स्वाभाविक होते, पण बाबूजींनाही कुतूहल वाटले. गप्पांच्या ओघात त्यांचे माझ्या हालचालींकडे लक्षच नव्हते. आम्ही मग चहा घेऊन डोंबिवलीत परतलो. 

दुसऱ्या दिवशी मी रंगीत छायाचित्रे घरीच डेव्हलप केले आणि डॉक्टरांना फोन करून बाबूजींचा क्रमांक घेतला. बाबूजींशी दूरध्वनीवर बोललो. ते म्हणाले, “अहो, मीच तुमचा क्रमांक मागणार होतो. बरं झालं तुम्हीच दूरध्वनी केला. उद्या येताय का माझ्या घरी, वेळ आहे का तुम्हाला?”

“अहो बाबूजी, मी यासाठीच फोन केला होता, येतो नक्की”, असे सांगून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दादरला त्यांच्या घरी पोहचलो. त्यांना नमस्कार केला, तेव्हा ते म्हणाले, “नमस्कार आई-बाबांना करायचा”.

छायाचित्रे हातात दिल्यावर, कधी एकदा ते उघडुन पाहू, अशी एखाद्या लहान मुलासारखी उत्सुकता दर्शवणारी बाबूजींची गंमत मी पाहिली. सगळी छायाचित्रे पाहून झाल्यावर मला म्हणाले, “इकडे या हो”. 

मी त्यांच्याजवळ गेल्यावर, त्यांनी दोन्ही हात माझ्या खांद्याला पकडून, माझ्या दोन्ही गालांचे गालगुच्चे घेतले. त्या क्षणाला मला माझा ‘सर्वोच्च बहुमान’ झाला असे वाटले. ते म्हणाले, “अहो, इतकी वर्ष कुठे होतात?”

त्यानंतर डोंबिवलीचे शिवसेनेचे धड़ाडीचे कार्यकर्ते नितिन मटंगे ह्यांनीही, ‘मला बाबूजींच्या गाण्यांच्या सूचीचे पुस्तक करायचे आहे, तूच बाबूजींची छायाचित्रे काढायचे’, असे म्हणून मला त्यांच्या घरी नेले. मला पाहताक्षणी बाबूजी नितिनला म्हणाले, “तुमच्या पुस्तकात माझे झक्कास छायाचित्र येणार”. असे बाबूजींनी म्हणताच, नितिन व वसंतराव वाळुंजकर हे उडालेच ! 

तद्नंतर वारंवार बाबूजींचा आणि माझा कधी प्रत्यक्ष, कधी दूरध्वनीवरून संवाद होणे तर कधी त्यांच्या घरी गप्पांचा फड कसा रंगत गेला हे कळलेच नाही. असे आमचे मैत्रीचे धागे जुळत गेले. 

डोंबिवलीचे बाबूजी, म्हणजे विनायक जोशी, यांचा दिल्लीत महाराष्ट्र मंडळातर्फे कार्यक्रम होता. विनायकचा हट्ट होता छायाचित्रे मनोजनेच काढावीत. हा हट्ट विनायकचा काल, आज व उद्याही असणारच. त्याने इतके अचानकच ठरवले आणि बाबूजींनाही तिथे पुरस्कार दिला जाणार होता.

बाबूजींबरोबर जाण्यास, श्रीधरजींना वेळ नव्हता, म्हणून त्यांनी मला विचारले, “मनोज, तुम्ही याल का माझ्याबरोबर दिल्लीला?” त्यांना मी छायाचित्रे काढायला तिथे येणार हे माहीत नव्हते. माझा तर आनंदच गगनात मावेना! आणि दिल्लीत त्या संपूर्ण सोहळ्यात मी एकटाच छायाचित्रकार ! 

महाराष्ट्र मंडळाचे मुख्य संयोजक श्री. हेजिब यांनी ७ केंद्रीय मंत्र्यांसमोर, श्री. लालकृष्ण आडवाणी ह्यांच्या हस्ते माझा सत्कार केला, तेव्हा बाबूजी म्हणाले, “मनोज, कॅमेरा द्या, मी तुमचं छायाचित्र काढतो.” केवढा हा माझा सन्मान. मला तर गगणाला गवसणी घातल्यासारखे वाटू लागले.

लगेच दोन महिन्यांनी बाबूजींना कलकत्ता येथे पुरस्कार समारंभासाठी जायचे होते. तेव्हाही बाबूजींनी आग्रहाने मला बरोबर नेले. तेव्हा मी बाबूजींना म्हटलं, “बाबूजी, तुमच्यामुळे हा योग आला.” तेव्हा लगेच ते म्हणाले, “तुमचे काम छान आहे, म्हणून सगळे तुम्हालाच बोलवतात.” कुठेही ते स्वतःला मोठेपणा घेत नसत. अशा दिलखुलास, सदाबहार, प्रेमळ पितृतुल्य व्यक्तिमत्त्वाचा सहवास मला लाभला त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.

माझी व शंना नवरे काकांची ४५ वर्षांची मैत्री असूनही, शंना काकांनाही असूया वाटली. गमतीने म्हणाले, “मनोज, तुझी बाबूजींशी इतकी कशी रे मैत्री झाली ?”

बाबूजींना नतमस्तक होऊन म्हणावेसे वाटते,

“सूर गेले दूर आता, शब्द मागे राहीला, चंद्र होता साक्षीला… चंद्र होता साक्षीला….”

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पहिला प्रकाश – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ पहिला प्रकाश – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी 

(सायके मोहिमेने सुदूर अंतराळातून लेसरद्वारा पृथ्वीशी साधलेला दूरसंवाद )

काल्पनिक विज्ञानचित्रपट व टी.व्ही. सिरीयल्समध्ये परग्रहवासीय पृथ्वीवरील व्यक्तींशी दूरसंवाद साधताना दिसतात. त्यावेळी ते किती सोपे वाटते नाही! लक्षावधी प्रकाश वर्षे दूर असणाऱ्या दूरच्या ग्रहावरून हे परग्रहवासी पृथ्वीवासीयांशी व्हिडिओद्वारे जो दूर संवाद साधतात त्यातील चित्रांची व आवाजाची गुणवत्ता अप्रतिम असल्याचे जाणवते आणि या दूरसंवादात परग्रहवासीयांचे पृथ्वीवासीयांशी  बोलणे व दिसणे क्षणाचाही विलंब न होता झालेले दिसते. या काल्पनिक दूरसंवादाची क्षमता वास्तवाशी मेळ खाते का? तर मुळीच नाही!!

पृथ्वीवरून अंतराळाकडे व अंतराळातून पृथ्वीकडे करण्यात येणारा दूरसंवाद ही एक आव्हानात्मक गोष्ट आहे. सुदैवाने इस्त्रो, नासा व इतर अंतराळ संस्थांकडे अंतराळातून मिळालेला विदा पृथ्वीकडे आणण्याची क्षमता व कौशल्य आहे. इस्त्रोचे दुरमिती, अनुपथन आणि समादेश ( ISRO Telemetry, Tracking and Command – ISTRAC) नेटवर्क व भारतीय सुदूर अंतराळ संपर्क व्यवस्था ( Indian Deep Space Network – IDSN) तसेच नासाचा अंतराळ दूरसंवाद आणि दिक् चलन कार्यक्रम ( Space Communications and Navigation – SCaN) आणि सुदूर अंतरीक्ष संपर्क व्यवस्था ( Deep Space Network – DSN ) व इतर देशांच्याही याप्रकाराच्या प्रणाली यांमुळे चंद्रयान सारख्या मोहिमा, आंतरराष्ट्रीय अंतरीक्ष थांबा (international space station), चंद्र व मंगळावरील बग्ग्या (rovers) किंवा नासाची आर्टिमिस योजना यांचेबरोबर विदेचे अदानप्रदान करणे शक्य झाले आहे.

चला तर मग, अवकाशीय दूरसंवाद साधतांना येणारी आव्हाने व विविध देशांच्या अंतराळसंस्था या आव्हानांचा सामना करतांना सध्या कोणते तंत्रज्ञान वापरतात व भविष्यात कोणते तंत्रज्ञान वापरणार आहेत याचा आढावा घेऊया.

१) मूलभूत माहिती :-

अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर अवकाशीय दूरसंवाद दोन गोष्टींवर बेतला आहे. त्या म्हणजे प्रक्षेपक(transmeter) व ग्राहक किंवा प्राप्तकर्ता (receiver). प्रक्षेपक विद्युतचुंबकीय लहरींवर  मॉड्युलेटरच्या मदतीने संदेश (message) संकेतन (encode) करतो. संदेशानुसार किंवा पाठविल्या जाणाऱ्या विदेनुसार लहरींच्या गुणधर्मात बदल घडून येतो, ज्यामुळे पाठवल्या जाणाऱ्या विदेचा  मतितार्थ कळून येतो. या लहरी मग अंतराळातून प्राप्तकर्त्याकडे जातात. प्राप्तकर्ता मग या विद्युतचुंबकीय लहरींचे ग्रहण करून त्या  डिमॉड्युलेट करून संकेताचे उकलन किंवा विसंकेतन करतो. हे म्हणजे आपल्या घरातील वायफाय राऊटर व  त्याच्याशी संलग्न उपकरणांसारखे आहे. राऊटरला इंटरनेटद्वारे मिळालेला विदा तो प्रत्येक उपकरणांकडे प्रक्षेपित करतो. अवकाशीय दूरसंचार हा साधारण याच धर्तीवर घडवून आणला जातो. फक्त त्याचा आवाका मोठा व अंतर खूपच जास्त म्हणजे काही प्रकाश वर्षांइतके असू शकते.

२) दूरसंवाद उपकरणांचे जमिनीवरील जाळे :-

अंतराळाशी दूरसंवाद म्हणजे फक्त अंतराळयानाचा अँटीना जमिनीकडे रोखणे एव्हढेच नाही. नासाच्या दूरसंवाद अँटीनांचे जाळे जगभरात – सर्व सात खंडामध्ये- पसरलेले आहे. या अँटीना अंतराळयानांकडून येणारे प्रक्षेपण ग्रहण करतात. जमिनीवरील स्थानके आणि अंतराळयाने यांच्यातील दूरसंवादाची योजना नेटवर्क अभियंते काळजीपूर्वक आखतात. अंतराळयान अँटीनावरून जात असतांना अँटीना विदा ग्रहण करण्यासाठी सज्ज आहे याची ते खात्री करतात.

भूस्थित अँटीना विविध आकार व क्षमतेच्या असतात. अंतरीक्ष स्थानकला बॅकअप दूरसंवाद पुरविणाऱ्या अतिउच्च वारंवारीतेच्या लहान अँटीना ते ११ अब्ज मैल अंतरावर असणाऱ्या व्हॉयेजर अंतराळयांनांसारख्या सुदूर मोहिमांशी दूरसंवाद साधणाऱ्या २३० फुटी अँटीनांएवढ्या अजस्त्र!!

३) अंतराळ सहक्षेपक (space relays):-

थेट जमिनी बरोबर दूर संवाद साधण्याबरोबरच अनेक मोहिमा सहक्षेपक उपग्रहांद्वारा पृथ्वीशी संवाद साधतात. उदाहरणार्थ अंतराळस्थानक अनुपथन आणि विदासहक्षेपक उपग्रहांकडे  (Tracking and Data Relay Satellites – TDRS) विदा पाठविते. नंतर हे उपग्रह न्यू मेक्सिको व गुआम येथील भूस्थानकांकडे हा विदा सहक्षेपित करतात. चंद्रयान ३ चा लॅन्डर चंद्रयान दोनच्या ऑर्बिटर कडे विदा पाठवायचा, नंतर हा ऑर्बिटर पृथ्वीकडे विदा सहक्षेपित करायचा. सहक्षेपकांमुळे दूरसंवाद उपलब्धतेसाठी खास फायदा मिळतो. उदाहरणार्थ TDRS पृथ्वी भोवतालच्या अंतराळात तीन वेगवेगळ्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आले आहेत. त्यामुळे पृथ्वी समिप कक्षेतील अंतराळयाने आणि जमीन यांच्यातील संवाद अखंडित राहतो आणि आपणास पूर्ण पृथ्वीचा विदा प्राप्त होतो. अंतराळयान भूस्थीत स्थानकावरून जाण्याची वाट बघत बसण्यापेक्षा टीडीआरएस दिवसाचे २४ तास व आठवड्याचे सातही दिवस विदा सहक्षेपित करतात.

४) बँडविड्थ :-

नासा व इस्त्रो विद्युत चुंबकीय वारंवारितेच्या (frequency)विविध बँड्समध्ये विदा संकेतन करीत असतात. या वारंवारितांच्या श्रेणी म्हणजेच बँडविड्थ्सच्या वेगवेगळ्या क्षमता असतात. मोठ्या बँडविड्थ्स प्रत्येक सेकंदाला जास्त विदा वाहून नेतात, त्यामुळे अंतराळयान जमिनीकडे विदेचे प्रक्षेपण जास्त त्वरेने करू शकते. सध्या सर्वच अंतराळसंस्था दुरसंवादासाठी प्रामुख्याने रेडिओ तरंगांचा वापर करतात. पण आता नासा आवरक्त समीप लेसरचा वापर संप्रेषणासाठी करायचा प्रयोग करीत आहे. याविषयीची माहिती पुढे येईलच. या प्रकारच्या संप्रेषण पद्धतीमुळे – ज्याला प्रकाशकीय दूरसंवाद असे संबोधण्यात येते- पूर्वी कधीही मिळाला नव्हता एवढा विदा पाठवण्याचा वेग प्राप्त होणार आहे. लेसर दूरसंवाद सहक्षेपक प्रक्षेपण प्रात्यक्षिकांमुळे (Laser Communication Relay Demonstretion- LCRD) प्रकाशकीय दूरसंवादाचे फायदे समोर आलेच आहेत. या मोहिमेत कॅलिफोर्निया आणि हवाई स्थित भूस्थानकांमध्ये  प्रकाशकीय दुव्याद्वारे (optical link) पृथ्वीसमीप कक्षेतील उपग्रह वापरून विदेचे सहक्षेपण pकरण्यात आले. नासा लवकरच अंतराळ स्थानकावर प्रकाशिय अग्र (optical terminal) बसविणार आहे. यामुळे अंतराळस्थानक एलसीआरडी द्वारा जमिनीकडे विदा सहक्षेपित करू शकेल.

५) विदा पाठविण्याचा वेग :-

जास्त बँडविड्थ्स  म्हणजे मोहिमेसाठी विदेचा जास्त वेग. अपोलो ११ ज्यावेळी चंद्रावर उतरले त्यावेळी त्यांनी पाठविलेले व्हिडिओ कृष्णधवल रंगात व अस्पष्ट होते. तुमच्यापैकी जर कोणी ते बघितले तर तुम्हाला आढळेल की त्यात आपण ज्याला मुंग्या म्हणतो तशा दिसायच्या. अगदी नजीकच्या काळात आयोजिलेल्या आर्टीमिस-२ मोहिमेमध्ये यानावर प्रकाशीय अग्र असतील, त्यामुळे चंद्राच्या कक्षेतून मिळणारे व्हिडिओ ४ के अल्ट्रा हाय डेफिनेशनचे असतील. विदेच्या वेगवान देवाणघेवाणीसाठी बँड विड्थ हा एकमेव अडथळा नाही. विदेच्या वेगावर परिणाम करणाऱ्या इतर घटकांमध्ये प्रक्षेपक व प्राप्तकर्ता यांच्यातील अंतर, अँटिनाचा किंवा प्रकाशीय अग्र यांचा आकार, दोन्ही बाजूकडे उपलब्ध असणारी ऊर्जा क्षमता यांचा समावेश होतो. विविध  देशांच्या अंतरिक्ष संस्थांमधील अभियंत्यांना विदेचे वेगवान आदान प्रदान करण्यासाठी या सर्व गोष्टींचा समतोल साधावा लागेल.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री राजीव गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रश्नमंजुषा… अशीही… – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रश्नमंजुषा… अशीही… – अज्ञात  ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

प्रश्नमंजुषा… अशीही.

जराशी गम्मत ….. बघा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतात का?

१. पगाराला दोनने ‘गुणले’ तरी 

‘भागत’ का नाही ?

२. लग्नाची ‘बेडी’ नक्की 

कोणत्या गुन्ह्यासाठी ‘पडते’?

३. अक्कल ‘खाते’ 

कोणत्या बँकेत ‘उघडता’ येते?

४. ‘भाऊगर्दीत’ 

‘बहिणी’ नसतात का?

५. ‘बाबा’ गाडीत 

‘लहान बाळांना’ का बसवतात? 

६. ‘तळहातावरचा फोड’ 

किती मोठा होईपर्यंत ‘जपावा’?

७. मनाचे मांडे भाजायला

‘तवा’ का लागत नाही?

. ‘दुग्धशर्करा योग’ 

‘मधुमेहींना’ वर्ज असतो का? 

९. ‘आटपाट’ नगर 

कोणत्या ‘जिल्ह्यात’ येते? 

१०. ‘तिखट प्रतिक्रिया’ 

‘गोड’ मानून घेता येते का?

११. सतत ‘मान खाली’ घालायला लावणारा मित्र  ‘मोबाईल’ असावा कां? 

१२. ‘काहीही’ या पदार्थाची 

‘रेसिपी’ मिळेल का?

१३. ‘चोरकप्पा’ नक्की

‘कोणासाठी’ असतो? 

१४. ‘पालक’ ‘चुका’ दाखवून 

 मुलांना ‘माठ’ ठरवत असतात का?

१५. ‘पैशांचा पाऊस’ असेल

तर ‘छत्री’ उलटी धरावी का?

१६. ‘भिंतीला’ कान असतात

तर बाकीचे अवयव कुठे असतात?

(ज्यांना मराठीची मजा चाखता येते, त्यांच्यासाठी खास चेहरा खुलवणारी प्रश्नमंजुषा !)

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आपुलकीची पुस्तके ☆ श्री सुबोध अनंत जोशी ☆

श्री सुबोध अनंत जोशी

?  विविधा ?

☆ आपुलकीची पुस्तके ☆ श्री सुबोध अनंत जोशी ☆

तसं पाहिलं तर, पुस्तके ही निर्जीव भौतिक वस्तू आहे. मुद्रित  मजकूर असलेल्या कागदांची बांधणी करून तयार झालेली वस्तू म्हणजे पुस्तक.विविध आकारप्रकाराची निर्जीव वस्तू.ही वस्तू पुस्तकाच्या बाजारात विकली जाते, विकत घेतली जाते;दुकानातून, ग्रंथालयातून, स्टॉल मधून वितरित होते. त्याचा उपयोग संपल्यावर किंवा त्याचा उपयोग न केल्यावर  या वस्तूची रद्दी होते. काही पुस्तकाच्या जिवांवर वितरक, प्रकाशक  क्वचित् लेखक पैसे मिळवतात. पुस्तकांचे जिवावर मोठ-मोठी ग्रंथालये उभी राहतात. पुस्तकाच्या प्रदर्शनात कमाई करणारे प्रकाशक भेटतात;क्वचित् लेखकही असतात. हौशी लेखक प्रसिद्धीच्या आशेने, अपेक्षेने  अधिकाधिक पुस्तकांना प्रसवतात.अशा पुस्तकांचे गठ्ठे  ग्राहकांची वाट पाहत असतात. डिजिटल, ऑनलाइन पुस्तके, डमी पुस्तके, पीडीएफ आवृत्ती, कॉपीराईट  असे कितीतरी शब्दप्रयोग पुस्तकांच्या दुनियेत चलनी नाण्याप्रमाणे प्रचलित असतात.

 वरील मजकूर बव्हंशी तिरकस,तिरसट,सिनिकल दृष्टीने लिहिला गेला आहे.कारण पुस्तकाला निर्जीव मानलं गेलं तर असंच लिहिलं जाईल. पुस्तकाला सजीव तरी कसे म्हणता येईल? सजीवतेच्या व्याख्येत पुस्तक बसत नाही. ते कधी श्वास घेतं का? ते स्वतःहून इकडून तिकडे फिरते का?  पुस्तकाला पुनरुत्पादनाची शक्ती आहे का? पुस्तकाला पाच संवेदनापैकी एक तरी संवेदना आहे का? या सर्वांची उत्तरे नकारार्थी आहेत. असे असूनही पुस्तक असे काही आहे की ते आपल्या मनाला जिवंतपणा देते, पुस्तक असे आहे की ते स्वतः अलिप्त राहून अशी कांहीं प्रक्रिया घडवून आणते,की त्यामुळे पुस्तकवाचनाचा परिणाम संजीवनीसारखा होतो. या कारणामुळेच पुस्तके भौतिक निर्जीव वस्तू रहात नाही. पुस्तकविक्रेत्याला पुस्तक वस्तू वाटेल,परंतु पुस्तकप्रेमीला ती सजीव वाटेल.  पुस्तकप्रेमीच्या द्रृष्टीने पुस्तकातला मजकूर ही  अक्षरांचे एका मागून एक ठेवलेले डबे नसतात. पुस्तक हे अक्षरे, शब्द, वाक्य,त्यामधील अर्धविराम, पूर्णविराम,स्वल्पविराम या सर्वांसोबत सर्व  वाचकांच्या मनासमोर असे एक जिवंत काव्य, सळसळते विश्व निर्माण करते की त्यामुळे वाचकांचे मन तळापासून ढवळून निघते.ही प्रक्रिया कशी असते याचा उलगडा करण्याचा प्रयत्न कांहीं समीक्षकांनी आणि मानसशास्त्रज्ञांनी केला आहे.

 या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे वाचक प्रतिसाद सिद्धांत(Reader Response Theory) आणि वाचन ग्रहण सिद्धांत.पुस्तक म्हणजे संहिताच (Text) असते. ही संहिता  एक स्तरीय नसते; ते जाळेच असते आणि या जाळ्यात वाचक अडकतात किंवा अडकवून घेतात.  आयसरने प्रतिपादन केल्याप्रमाणे साहित्यकृतीच्या संहितेत काही रिकाम्या जागा असतात. अर्थात्, त्या वाचक आपल्या बुद्धीनुसार भरून टाकतो.आयसरच्या मते वाचनाचा प्रत्येक क्षण हा भूतकाळातील स्मृती आणि भविष्यकाळातील अपेक्षा यांच्यात  जे द्वंद्व   उभे राहते त्याच्या संबंधित असते.  आयसरने म्हटले आहे की  प्रत्यक्षात   या गोष्टी संहितेत नसतात.  वाचकाने त्या भरायच्या असतात.

जौशच्या  मते आपल्या काही कलाकृतीच्या संदर्भात काही अपेक्षा असतात.  ही अपेक्षांची क्षितिजे( Horizon of Expectations) नेहमी बदलत असतात. त्यामुळे प्रत्येक काळात वाचकांच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात.जौशच्या मते वाचकसमूह संहितेचा अर्थ लावतो.पॉल स्टिकर याने वाचनप्रक्रिया कशी विकसित होते याचे विवेचन केले आहे.वाचक हा वाचन करताना तीन अवस्थातून जातो.पहिल्या अवस्थेत वाचक संरचनात्मक संबंधाचा(Configuration) विचार करतो. दुसऱ्या अवस्थेत साहित्यकृतीच्या अर्थात्मक भागाचा (Recofiguration) विचार केला जातो. आणि तिसऱ्या अवस्थेत वाचकाला स्वतः विषयीचे ज्ञान,आत्मज्ञान(Self-understanding) यांचे आकलन होते.  अमेरिकन समीक्षक स्टॅनले फिश याने Is There a Text in This Class? या पुस्तकात वाचकवर्गाची  किंवा वाचक समूहाची   कल्पना मांडली.

या सर्व सिद्धांतानुसार असे दिसते की कांहीं समीक्षक वाचकाच्या वैयक्तिक प्रतिसादाला महत्त्व देतात;बहुसंख्य समीक्षक वाचकसमूहाला महत्त्व देतात.मराठी समीक्षक प्रा.रा.ग.जाधव यांनी साहित्याचे परिस्थिती विज्ञान(Ecology of Literature) ही संकल्पना मांडली.साहित्यकृती ही सजीव आहे आणि साहित्य ही समुदायवाचक कल्पना आहे असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

एक गोष्ट स्पष्ट आहे की वैयक्तिक वाचक असो किंवा वाचकसमूह असो, पुस्तकाला वाचक भेटल्यावर पुस्तक हे सजीवतेकडे वाटचाल करू लागते. यासंदर्भात अमेरिकन समीक्षकांनी म्हटले आहे की पुस्तकाला त्याचा वाचक मिळेपर्यंत कोणतेही पुस्तक हे अनेक पुस्तकांपैकी एक असते.पुस्तकाला वाचक भेटल्यावर मात्र वाचनातून सौंदर्यभाव निर्माण होतो आणि सौंदर्यभाव हा अत्यंत सुंदर असा चमत्कार आहे आणि त्याचे स्पष्टीकरण ना मानसशास्त्र करते,ना  कोणती समीक्षा करते.(  A book is a thing among things,a volume lost among the volumes that populate the indifferent universe until it meets its reader, the person destined for its symbols. What then occurs is that singular emotion called Beauty,that lovely mystery which neither psychology nor criticism can describe  ).वाचकाला जो सौदर्यानुभव येतो ते एक गूढ आहे असे म्हटले आहे आणि ते खरेही आहे.वाचकाला जो आनंद मिळतो त्यासंबंधी  प्लेटो,अॅरिस्टाॅटल,वर्डस्वर्थ,कोलरिज,टी एस.ईलियट,आय.ए.रिचर्ड तसेच संस्कृत वैय्याकरणी मम्मट  अशा अनेकांनी आपले सिद्धांत प्रतिपादन केले आहेत.त्या सर्वांचा हाच निष्कर्ष आहे की साहित्यवाचनातून असे काही मिळते की त्यामुळे वाचकांच्या मनाचे उन्नयन होते.पुन्हा एकदा हेच सिद्ध होते की पुस्तकाला वाचक भेटल्यावर पुस्तक निर्जीव राहत नाही.

यापुढे जाऊन असे म्हणता येईल की काही पुस्तके ही वाचकसमूहाला किंवा वैयक्तिक वाचकाला आपलीशी वाटतात. या आपलेपणाच्या कारणाचाही शोध घेता येईल. समाजशास्त्रात Kinship of  Spirit हा एक सिद्धांत आहे.या सिद्धांताप्रमाणे काही गोष्टी कॉमन असतील,तर  एखादे ठिकाण,व्यक्ती,वस्तू याकडे आपले मन ओढ घेते.(An inherent attraction and liking for a particular person, place or a thing, often based on some commonality).

लेखक आणि पुस्तक यांचाच विचार केला तर लेखकाला त्याच्या स्वतःच्या पुस्तकाबद्दल आपुलकी वाटणे हे अगदी नैसर्गिक आहे. नीराद चौधरी यासारखे लेखक अपवादात्मकच म्हणावे लागतील. याचे कारण असे की निराद चौधरींच्यामते लेखकाची पुस्तके ही त्याची  प्रौढ झालेली मुलेच(Grown up Children) असतात आणि एकदा पुस्तक लिहून झाले की त्या पुस्तकाचा आणि लेखकाचा संबंध तुटतो. असा विचार करणारा निराद  चौधरी हा एखादाच असेल. बहुतेक लेखक हे आपल्या पुस्तकांना आपली आवडती मुलेच मानत असणार यात शंका नाही.

वाचकाच्या बाबतीत बोलायचं झाले तर वाचकही सर्व पुस्तकांच्या बाबतीत तटस्थ राहू शकत नाही. काही पुस्तकांचेबाबतीत त्याला काहीच वाटणार नाही. काही पुस्तकांचेबाबतीत थोडे काही  वाटेल आणि काही पुस्तकांचेबाबतीत मात्र त्याला खरोखरीच आपलेपणा वाटेल आणि तीच पुस्तके त्या वाचकाची, सह्रदय वाचकाची आपुलकीची पुस्तके होतात.

पुस्तकातल्या अनुभवाशी आपल्या आयुष्यातील अनुभव काही वेळा जोडले जातात किंवा या उलट होऊ शकते.एक वाचक म्हणून आपण पुस्तकातल्या व्यक्ती, प्रसंग आपल्या आयुष्यातल्या व्यक्तींशी, प्रसंगाशी कळत नकळत जोडतो आणि या कारणामुळे ते पुस्तक आपलेसे होेते.कांही अनुभव खूप नाजूक असतात, दिसत नाहीत पण जाणवतात. एखादे पुस्तक वाचल्यावर मन ‘पर्युत्सुक’ होते,

ते का होते, कसे होते याची चिकित्सा नंतर करायची. कदाचित ‘जननान्तरसौह्रदानि” पूर्वजन्मसंस्काराची आठवण होत असेल का? या जन्मातली,सुदूर भूतकाळातील आठवण येत असेल का?

आयुष्याच्या सांदीकोपऱ्यात असंख्य सुखदुःखे, संकटे, अडचणी हा सगळा गोमकाला  जमलेला असतो.पुस्तक वाचताना, आपल्या आयुष्यातील त्या प्रसंगासारखे असणारे प्रसंग वाचनात आले तर आपण त्या पुस्तकाशीही जोडले जातो. ना.सी फडके यांचा ‘हरवली म्हणून सापडली’, या नावाचा एक लघुनिबंध आहे.किल्ली हरवली म्हणून ती शोधण्यासाठी लेखक फडके माळावर जातात आणि  तिथल्या अनेक वस्तू पाहून ते गतकाळातल्या आठवणीत रमून जातात. एखादे पुस्तक वाचताना आपल्या आयुष्यात हरविलेल्या गोष्टी आपल्याला सापडू शकतात. याबाबतीत  माझा वैयक्तिक अनुभव मी सांगू शकेन.

काही समीक्षकांनी वाचकसमूहाचा विचार केला असला तरी वाचन ही पूर्णपणे खाजगी बाब आहे असे मला वाटते. पुस्तकाचे सार्वजनिक  अभिवाचन असले तरी श्रवण हे खाजगीच आहे आणि आपल्या वाचनाची आवडनिवड आपल्याला जोखता येते आणि त्यातूनच आपली वाटणारी पुस्तके निवडता येतात.

माझ्या किशोरवयात कुमारवयात सुंदर पुस्तके वाचायला मिळाली.पाठ्यपुस्तके तर इतकी सुंदर की अजूनही ती डोळ्यासमोर येतात. चांदोबासारखी मासिके फेर धरून नाचतात. किशोरवयात वाचलेली साने गुरुजींची “सुंदर पत्रे”आठवतात.  महाविद्यालयात शिकत असताना राम गणेश गडकरी,केशवसुत, देवल इत्यादींच्या साहित्यकृती वाचलेल्या होत्या. प्रौढ वयात वाचलेले आरती प्रभू, कुसुमाग्रज,  तेंडुलकर,महेश एलकुंचवार,रवींद्र पिंगे,चिं.वि.जोशी असे कितीतरी साहित्यिक. हे सर्वच आवडते लेखक.परंतु आपुलकीची पुस्तके कोणती? असं विचारलं तर आवडता लेखक हाच निकष लावता येणार नाही.खरे तर आपुलकीचे असे निकष असतात का?असले तर कोणते?आपुलकीची पुस्तके पूर्वी वाचलेली आहेतच.ती परत एकदा वाचून या प्रश्र्नांची उत्तरे कदाचित देता येतील.

ले. सुबोध अनंत जोशी

सांगली

मो 9423661068.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुगंधित चिता… वीर हुतात्म्यांच्या !! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

☆ सुगंधित चिता… वीर हुतात्म्यांच्या !! ☆ श्री संभाजी बबन गायके 

कवी थॉमस मेकॉले यांनी १८४२ मध्ये लिहून ठेवलंय…. ‘मरण तर प्रत्येकाला येणारच आहे… कुणाला आधी तर कुणाला नंतर. परंतू भयावह विपरीत परिस्थितीशी दोन हात करतांना, आपल्या पित्याच्या राखेसाठी आणि मंदिरातल्या देवांसाठी झुंजत असताना येणारं मरण सर्वांगसुंदर!

आपली तरणीताठी पोरं अशीच मरणाला सामोरी जाताहेत. आजवरच्या सर्व मोठ्या युद्धांपेक्षा जास्त भयावह युद्ध आपले सैन्य आपल्याच सीमेमध्ये लढते आहे. आपलेच जंगल आहे मात्र त्यात परकी क्रूर श्वापदं शत्रूच्या मदतीने घुसून दबा धरून बसलेली आहेत. त्यांनी आपल्यावर झेपा टाकण्याआधी त्यांच्या अंगावर धावून जाणं हा एक धाडसी पण अपरिहार्य मार्ग उरला आहे आपल्या हाती. कारण ही जनावरं जर मुलुखात शिरली तर किती निरपराध माणसं मारतील ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्या पावलांचा माग काढीत काढीत त्यांच्या गुहांमध्ये शिरावंच लागतं. यात आपल्या जीवाला सर्वाधिक धोका आहे आणि हे प्रत्येकाला ठाऊक आहे… आणि तरीही आपली मुलं त्या अरण्यात शिरतात. कधी शिकार गवसते तरी कधी शिकार बनावं लागतं.

या जीवघेण्या खेळात जाणाऱ्या जीवांचा हिशेब ठेवण्यास कुणाला सवड असो नसो…. आईबापाला एकुलती एक असलेली, थोड्याच दिवसांत लग्नाच्या बोहल्यावर उभी राहण्याच्या तयारीत असलेली, सणासुदीला नाही निदान नंतर काही दिवस घरच्यांना, म्हाताऱ्या आईबापांना, कोवळ्या लेकरांना भेटायला जावं म्हणून तळमळणारी तरूण, धडधाकट, वाघाच्या काळजाची पोरं आपल्या जीवाचा हिशेब मांडत बसत नाहीत. ती लढताहेत ते आपल्या बापजाद्यांनी प्राणांची बाजी लावून जपलेल्या देशाच्या अखंडत्वासाठी, हृदयमंदिरातल्या देश नावाच्या देवासाठी. ही पोरं जर तिथं उभी राहिली नाहीत तर देश आणि देव यांना वाली कोण असेल?

पण भारतमातेचं सुदैव असं की, एक पडला तर दुसरा त्याच जागी पाय रोवून उभा राहतो… त्याच्या रक्ताचा प्रतिशोध घेण्यासाठी. जबर जखमी झालेलाही बरा झाल्यावर पुन्हा सीमेवर जाण्याची शपथ घेतो…..

देशवासियांनो…. सुखनैव रहा….. पोरं तिथं जागता पहारा देताहेत….. त्यांना जगण्याचा अर्थ कळाला आहे आणि मरण्याची रीत. हे जग सोडून निघून जाणाऱ्या हुतात्म्यांनो.. शुभास्ते पंथान: संतु! इकडे तुमचे देह मांडीवर घेऊन बसणाऱ्या चिता तुमच्या बलिदानाने सुगंधित झाल्या आहेत… सदगतीस प्राप्त व्हालच!

जय हिंद… `जय भारत !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शेवटचे चौदा मीटर… लेखक : श्री कपिल काळे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ शेवटचे चौदा मीटर… लेखक : श्री कपिल काळे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

उत्तराखंडमधील बारकोट ते सिलक्यारा ह्या बोगद्यात अडकलेले 41 कामगारांची सुटका होण्याकरिता आता फक्त 14 मीटर अंतर  खोदायचे राहिले आहे !

 12 नोव्हेंबर रोजी हे कामगार बोगदा कोसळल्याने अडकले त्यांना 10 दिवसात आता बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागला  आहे. शेवटचे 14 मीटर अंतर पार झाले की उद्यापर्यंत हे  सगळे सुखरूप बाहेर पडलेले असतील.

हा आहे नवा भारत!  तांत्रिक प्रगती आणि आत्मविश्वास ह्या बळावर हे साध्य झाले आहे.

चार धाम रस्ते प्रकल्पाअंतर्गत हा सिलक्यारा  बारकोट बोगदा  राष्ट्रीय महामार्ग 134 वरती यमुनोत्रीच्या बाजूला बनवला जात आहे.

काम सुरू असताना 12 नोव्हेंबर रोजी अचानक बोगद्यावरील जमीन माती कोसळून 41 कामगार आत अडकले. त्यानंतर सुरू झाला त्यांना सोडवण्याचा  प्रयत्न !

1.नॅशनल हायवे  इन्फ्रा  डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन,  

2.टीहरी हायड्रोइलेक्ट्रिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन,  3.सतलज जल विद्युत निगम, 

4.ओएनजीसी आणि 

5.रेल विद्युत निगम लिमिटेड 

.. ह्या पाच सरकारी कंपन्या ह्याच परिसरात काही ना काही काम करत आहेत. त्यांना ह्या सुटकेच्या कामासाठी पाचारण केले गेले.

याकरिता एक पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला गेला. ह्यातील प्रत्येक कंपनीला त्यातील एकेक जबाबदारी दिली गेली.

  1. ह्यात बोगद्याच्या सिलक्यारा बाजूकडून साधारण 80 मीटर लांबीचा आडवा, 900 मिमी व्यासाचा बोगदा तयार करून त्यातून 800 मिमी व्यासाचे लोखंडी पाईपटेलिस्कोपिक पद्धतीने घालणे.ह्या 800 मिमी व्यासाच्या पाइपलाइनमधून ह्या कामगारांना सोडवणे.
  2. बोगद्याच्या बारकोट बाजूने 480 मीटर लांबीचा आडवा बोगदा खोदणे.
  3. हा बोगदा ज्या टेकडी खालून जातो, तिच्या माथ्यावरून सुरुवात करून साधारण 90 मीटर खोलीचे विवर खोदून त्यातून कामगरापर्यंत पोचणे .
  4. बारकोट बाजूनेएक खोल विवर खोदणे.
  5. कामगारापर्यंतअन्नपाणी तसेच व्हिडिओ कॅमेरा पोचवण्याकरिता चार इंच पाईप लाईन बनवणे.

ह्या प्रत्येक कामगिरी वरील कंपन्यांना अनुक्रमे देण्यात आल्या.

ह्या कामाकरीता लागणारी अजस्त्र यंत्रसामग्री, खोदाई यंत्रे, युद्ध पातळीवर प्रयत्न करून परदेशातून मागवण्यात आली. 

भारतात  वेगवान  माल वाहतुकीकरिता  समर्पित रेल्वे परिवहन मार्ग बनवला गेला आहे. त्यावरून एक खास  मालगाडी चालवून गुजरातमधील करंबेली ते ऋषिकेशपर्यंत  सामग्री पोचवली गेली. ह्या मालगाडीने 1075 किमी अंतर 18 तासात पार केले. 

सर्व पाचही कंपन्यांनी त्यांना नेमून दिलेले काम एकाच वेळी सुरू केले. जो पहिल्यांदा पोचेल तिथून कामगारांना बाहेर काढायचे ठरवले. ह्यासाठी अजस्त्र मालवाहू ट्रक ट्रेलर जातील असे रस्ते बनवण्यात आले.

अडकून 6 दिवस झाल्याने आणि कोणताही संपर्क न झाल्याने, आतील कामगारांचे मनोधैर्य खचत चालले होते.  बोगद्याच्या ज्या भागात कामगार अडकले होते त्याची लांबी 2 किमीआहे आणि त्या भागात सिमेंट काँक्रिट चे छत सुद्धा पूर्ण झाले आहे. त्यामुळे कामगार सुरक्षित असण्याबाबत खात्री होती.  फक्त त्यांना बाहेर  काढण्याकरिता नवा भारत कामाला लागला. नवीन भारताची इच्छाशक्ती आणि तांत्रिक प्रगती कामाला लागली. 

18 नोव्हेंबर रोजी  रेल विद्युत निगमला चार इंची पाईप कामगारांपर्यंत पोचवण्यात यश आले. त्यातून व्हिडिओ कॅमेरा टाकून त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यात आला. कामगारांच्या नातेवाईकांना त्यांच्याशी बोलायला दिले गेले. कामगारांना सहा दिवसानंतर काही पहिल्यांदाच काहीतरी खायला मिळाले. ह्यात सुकामेवा चॉकलेट  पॉपकॉर्न असा आहार होता. एका मानसोपचार तज्ञ , योगा प्रशिक्षक ह्यांची नियुक्ती करून कामगारांचे मनोधैर्य  खचणार नाही ह्याची काळजी घेतली गेली

त्यानंतर ह्या चार इंची पाईप लाईन च्या जागी सहा इंची पाईपलाईन टाकण्यात आली.  त्यातून खिचडी दलिया असे गरम अन्न कामगारांना देण्यात आले अडकल्यानंतर 7 दिवसांनी असे गरम अन्न त्यांनी खाल्ले. तसेच कामगारांना टूथ ब्रश,  पेस्ट, टॉवेल,  कपडे,  अंडरगारमेंट,  साबण  असे अत्यावश्यक सामान सुद्धा ह्या नवीन पाइपलाइन द्वारे पोचवण्यात आले.

ह्यातील बरेच कामगार  तंबाखू खाणारे आहेत , त्यांनी गेले दहा दिवस तंबाखू खाल्ला नाही, त्यामुळे त्यांना withdrawl symptom येऊ नयेत त्यातून मानसिक विकार होऊ नयेत म्हणून त्यांना तंबाखू सुद्धा पोचवण्यात आला.

त्यांच्या कुटुंब तसेच इतर बाहेरील कामगारांनी त्यांना सतत बोलत ठेवले  जेणेकरून त्यांचे मनोधैर्य कायम राहील.

तारीख 19 नोव्हेंबर भारतीय वायू दलाने झारखंड येथील खाणीमधून काही महत्वाची यंत्रसामुग्री  मालवाहू विमानाने  आणली. तसेच अमेरिकेहून खास   खोदाई मशीन आणण्यात आली. त्याने बचाव कार्याला अजून जोर प्राप्त झाला.

हे सगळे बचाव कार्य National Disaster  Management Authority चे प्रमुख निवृत्त जनरल अता हसनैन ह्यांच्या नेतृत्वाखाली सुरू होते.

त्यांनी एक गोष्ट फार उत्तम केली, की कोणत्याही चॅनलवाल्यांना बोगद्याजवळ येऊन बातम्या चालविण्यास आणि बचाव कार्याचे व्हिडिओ काढून ब्रेकिंग न्युज चालविण्यास मज्जाव केला. भारताच्या पंतप्रधान कार्यालयाकडून रोज आढावा घेतला जात होता.

तारीख 20 नोव्हेंबर रोजी जिनिव्हा येथील International  Tunneling and Undergound Space Association चे प्रमुख अरनॉल्ड डिक्स ह्यांना सुद्धा बचाव कार्यासाठी आणण्यात आले. त्यांनी पंचसूत्री कार्यक्रमाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे बाचवपथकाला काही इजा झाल्यास किंवा तिथे जमीन खचल्यास , स्वतःच्या सुटकेचा कोणताही मार्ग नसल्याने काँक्रिट बॉक्स कल्वर्ट टाकून बचाव पथकाच्या सुटकेचा मार्ग प्रशस्त करण्यात आला. अरनॉल्ड  डिक्स ह्यांनी बारकोट टेकडीच्या माथ्यावर जाऊन तेथील विवर खोदणारे पथक( पंचसूत्री पैकी  तिसरा पर्याय) पहिल्यांदा कामगारांपर्यंत पोचेल असा अंदाज बांधला.

तारीख 21 नोव्हेंबर,   आज बोगद्याबाहेर 41 अँब्युलन्स 2 हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आली. कोविड करिता बनवलेले एक छोटे हॉस्पिटल  पुन्हा धुवून पुसून स्वच्छ करण्यात आले. तिथे  15 डॉक्टर ची एक टीम तयार ठेवली गेली.

काल परवा पासून पंचसूत्री पैकी पर्याय क्रमांक 1 म्हणजे सिल्क्यारा बाजूने आडवा बोगदा खोदणाऱ्या टीमला भलतेच यश मिळाले त्यांनी अमेरिकन ऑगर ड्रिलचा वापर करत दोन दिवसात जबरदस्त प्रगती केली आणि कामगारांपासून फक्त 14 मीटर अंतरापर्यंत येऊन त्यांचे ड्रिल एका कठीण वस्तूला आदळले.

हे ड्रिल मशीन पुन्हा बाहेर काढून त्याची दुरुस्ती करण्यात आली. आणि दुप्पट जोराने  खोदाईचे काम सुरू केले गेले.

चिली देशात असेच एका खाणीत अडकून पडलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात 69 दिवस लागले होते. तेव्हा देखील आंतरराष्ट्रीय समुदायाने प्रचंड मदत कार्य केले होते. थायलंड आणि म्यानमार सीमेवर एका गुहेत अडकून पडलेल्या मुलांना असेच दहा दिवसानंतर बाहेर काढण्यात आले होते.

हा लेख तुम्ही वाचेपर्यंत नॅशनल हायवे  इन्फ्रा  डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या चमूला 900 मिमी व्यासाची पाइपलाइन आडव्या स्थितीत ड्रिल मारून कामगारांपर्यंत पोचण्यात यश आले असेल आणि शेवटचे 14 मीटर  अंतर पार करून कामगार यशस्वी रित्या बाहेरदेखील आले असतील. ह्यामागे सर्वांची मेहनत फळाला येईलच !

हा आहे नवीन भारत, तांत्रिक प्रगती आणि इच्छाशक्तीच्या  बळावर हा भारत कोणत्याही आव्हानाला सामोरा जाण्यास सक्षम आहे.  ह्या बदलेल्या भारताचा मला अभिमान आहे!

लेखक : श्री कपिल काळे

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “उपोषण…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “उपोषण…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

उपोषण हे हत्यार आहे याची खात्री पटली. त्यातही आपला पोषणकर्ता उपोषण करत असेल तर आपल कुपोषण होण्याची भिती असते.

सध्या वातावरणात गारवा येत असतानाच आमच्या घरातल वातावरण मात्र तापत होत. कारण एकच होत. ऑफिसच्या धावपळीतून येणाऱ्या दिवाळीसाठी तयारी करायला त्यांना वेळ मिळत नव्हता.

तापलेल्या वातावरणाची धग मधे मधे भांड्यांच्या वाढणाऱ्या आवाजाने आणि तोंडाने होणाऱ्या भडिमाराने  जाणवत होती.

काय मेली मदत ती काडीची नाही. घर, ऑफिस सांभाळून सगळी मरमर करायची ती आपणच. आणि त्यात यांना कौतुक त्या वर्ल्डकप च. तो मिळायचा त्याला मिळेल. त्यांच काय?…. जाहिरातवाले सगळ त्यांच्या घरी वेळेअगोदर पाठवतील. यांच काय…… यांचे चहाचे कप मात्र वाढत चालले आहेत.

काही नाही….. हे चालणार नाही…. मी तुम्हाला काही वेगवेगळ्या दिवसांची मुदत देते. या दिवशी सांगितलेली सगळी कामं झाली तर ठिक…… नाहीतर उपोषण हे नक्की…..

हे अल्टिमेटमचे सगळे दिवस वेचून वेचून भारताची मॅच असणारेच होते.‌‌……

मी पण आपल मध्यस्थी करण्याच्या प्रयत्नात…… जरा दिवस तरी बदलता येतील का? सगळ्या दिवशी भारताचीच नाहीतर एक चांगली मॅच आहे……

म्हणूनच….. म्हणूनच हे दिवस…. कारण सगळेच तुमच्या सारखे टाळ्या वाजवत, नाहीतर कसं खेळायला पाहिजे होतं याची बडबड करत टी.व्ही. समोर बसतील. बाजारात गर्दी कमी असेल. तुमचा पार्किंग चा प्रश्न पण निकालात निघेल. आणि मॅच चांगली होईल का सांगता येत नाही, पण खरेदी चांगली होईल…… तिने थर्ड अंपायर ने निर्णय द्यावा तसा ठोस निर्णय सांगितला.

झाल…… अशा उपोषणाची चर्चा फोनवर मैत्रिणींशी झाली सुध्दा…… संध्याकाळी मैत्रीणी (वेळात वेळ काढून) बराचवेळ हजर. नुसत्या नाही. कोणी वेफर्स ची पाकिट, कोणी थंडपेयाची लहान खोकी, किंवा बाटल्या आणल्या. अगं उपोषण म्हटल्यावर कोणीतरी तुला पाहायला येतीलच. तु पाणी पिशील. पण त्यांना नको का काही…

दुसरी….  पाण्यावरून आठवल. तुला पण पाणी लागेलच. मी दहा बारा बाटल्या पाठवते. राहू दे. कामाला येतील. सारख तुला कोणाकडे पाणी मागायला नको. आणि परत येणाऱ्यांशी थोड बोलण होइलच. घशाला कोरड पडते. (दोन बायकांमध्ये ऐकण थोडच आणि बोलण जास्त असत हे यांना सांगावस वाटत होत. पण बोललो नाही….. नाहीतर उपोषण लगेच सुरू झाल असत. आणि उपोषण करणाऱ्यांची संख्या पण वाढली असती.)

अगं खरंच. माझ्याकडे पण ग्लुकोज पावडरचे डबे आहेत. कुठला ऑरेंज फ्लेवर पाठवू का?……. आणखीन एक आवाज.

आणि हो, आत्ता बोलायला नको, पण लागला तर सलाइन लावायचा स्टॅण्ड पण आहे माझ्या कडे…… सासूबाई आजारी असतांना त्यांनीच आणायला लावला होता. येवढा लगोलग आणला पण मोजून दोनदाच लागला त्यांना. आता घरात येताजाता तो पायालाच लागतो. सध्या हातरुमालच वाळत असतात त्यावर…….. एक आवाज…..

आणि हे काय?……बसणार कुठे?…. तु आपली हाॅलमधेच बैस. रिमोट मात्र तुझ्या हाताशी ठेव.  प्राईम व्हिडिओ, नाहीतर ते यु ट्यूब वरचे कार्यक्रम चांगssssssले पहात बैस. यात चांगले कार्यक्रम बराचवेळ असे दोन्ही भाव होते. परत एक आवाज…..

एक्स्टेन्शन बाॅक्स आहे का? नाहीतर तो पण आणते. फोन चार्ज करायला उठायला नको. आपल जवळ असलेला बरा. आणि मऊ उशा, शाल, आणि तक्या मात्र राहू दे जवळ. त्या शिवाय उपोषणाचा फिल येणार नाही.

आणि तु उपोषणाला बसलीस की कळव. म्हणजे येताना ती नवीन लागलेली आहे ना… तिला घेऊन येईन. अगं मोबाईल मधे काय मस्त शुटिंग करते ती. आणि बॅकग्राऊंडला समर्पक गाणीपण भरायला जमत तिला. यंग जनरेशन……. उपोषणावर गाणी आहेत का?….. नाहीतर सॅड म्युझिक टाकू.

यंग जनरेशन म्हणतांना त्यात कौतुक होत की आपल्याला जमत नाही याची खंत याचा सुगावा काही लागला नाही. पण शुटिंगची व्यवस्था होणार होती.

जमेल तसं आम्ही लंच ब्रेक मध्ये येऊच. नाहीतरी नंतर अर्धा तास गप्पांमध्येच जातो. त्या काय इथे सुध्दा होतील. आणि पाठिंबा सुद्धा मिळेल.

अशी उपोषणाच्या अगोदरची तयारी झाली.

सगळे गेल्यानंतर मी म्हटलं. मी दोन दिवस सुट्टी घेतो. काय हव ते सगळ आणू. आणि यावेळी तुला साडी ऐवजी पैठणी. आणि एक दागिना. चालेल…….. आणि या आश्वासनानंतर उपोषण स्थगित.

आता काय?…….. आज सुटीच्या दिवशी मी दिवाणावर….. मऊ तक्यासोबत. समोर ती आधीच कोणीतरी आणलेली थंडपेयाची बाटली……. आणि वेफर्सच पाकीट.

आणि हाॅलमधेच खाली बायको चिवड्यासाठी खोबऱ्याचे काप करतेय. आणि आम्ही दोघंही मॅच बघणार आहोत.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुळस” ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

परिचय 

पं. पिंपळखरे, पं.जितेंद्र अभिषेकी, पंडिता शोभा गुर्टू हे गायनातील गुरू.पंडिता रोहिणी भाटे यांना कथक नृत्याला २५ वर्षे गायन संगत.
ना. दा. ठाकरसी कन्याशाळेत संगीत शिक्षिका. ललित कला केंद्र आणि भारती विद्यापीठ येथे संगीत गुरू.

पुरस्कार

  • आदर्श शिक्षक,आचार्य अत्रे शिक्षकोत्तम पुरस्कार.
  • गुणवंत युवा कलाकार,
  • गुणीदास पुरस्कार
  • पंडिता रोहिणी भाटे स्मरणार्थ आदर्श संगतकार पुरस्कार
  • ह्रदयनाथ मंगेशकर करंडक

लेखन

  • बिंदादीन महाराजांच्या कारकिर्दीवर पुस्तक ” बिंदा कहे”
  • अस्तित्व,रानपाखरं एकांकिका पुरस्कार प्राप्त.
  • फलकलेखनावर पुस्तक बोलका फळा.

? मनमंजुषेतून ?

“तुळस” डॉ. माधुरी जोशी 

मी अनेकदा  अगदी मागून आणून,विकत आणून तुळस लावली.पण ती कधी रूजलीच नाही.तसं फेसबुकवर खूप लोक या संदर्भात सल्लाही मागत असतात… कारण अनेकांना  ही समस्या असते. म्हणजे ही ओढ अनेकांना आहे तर. मला तुळस आवडते फार…लावायची असते पण जगत नाही. आजवर उपाय शोधत राहिले… वाट पहात राहिले सुंदर, डौलदार  तुळशीची…

काही कामासाठी एकदा कोकणात गेले होते..बसची वाट पहात होते. बसथांब्यावर बसायची काहीच सोय नव्हती…पण बसथांब्याशेजारीच ग्रामपंचायतीची इमारत होती. मग तिथल्याच एका पायरीवर रुमाल पसरला आणि वाट पहात थांबले.जरा इकडेतिकडे पहात होते अन् ती दिसली. जराशी कोपऱ्यात.बऱ्यापैकी मोठी… हिरवट काळसर पानांनी रसरशीत फुललेली…असंख्य जांभळट छटेच्या मंजिऱ्यांनी डवरलेली….

ना कुणी तिची निगा घेत होतं…ना कसली कुंडी, ना बांधलेला पार…  ना तुळशी वृंदावन….पण ती खूष होती…अगदी तृप्त… समाधानानं डवरलेली… आनंदानं फुललेली… मी आश्चर्यचकित!! ही अशी माझ्याकडे  का नाही भेटतं… मी तर पाणी, उन्हं,औषधं, माया सगळं देते हिला….उत्तर मिळालं नाहीच… आणि बसही आली. मी परतीला निघाले…

काही दिवसांनी अशीच बहिणीच्या फार्म हाऊसवर गेले….दोन चार पायऱ्या चढून वर दार होतं घराचं….पायरीवर पाऊल ठेवलं आणि परत ती दिसली.त्या पायरीला जरा लहानसा तडा गेला होता.जरा मातीची फट झाली होती म्हणा ना…त्या चिरेत तुळशीचं चिमुकलं रोप डोलंत होतं…सतेज पानांचं …अगदी सात आठ इंचच  उंचीचं….जरा वाऱ्याची झुळूक आली की आनंदानं हासणारं ते रोप पाहून मला परत आश्चर्य वाटलं.कोण सांभाळतं याला?कोण पाणी देतं?काळजी घेतं….कोsssणी नाही….तरी ते घट्टमुट्टं उभं आहे…आपल्यातच रमलंय जसं काही…..मी तर थक्कंच…कारण मी किती धडपडत होते आणि माझी  तुळस काही जगंत नव्हती….आम्ही तिला पाहून काळजीनं पायरी चढलो होतो..पण मला वाटलं दुसऱ्या कुणाचा पाय पडू शकतो…आपण तिला तिथून हालवलं पाहिजे…त्या एवढ्याशा पायरीच्या फटीत ती अशी काही खोल घट्ट मुळं धरून रूजली होती ती सहज निघेना.मग उलथनं,खुरपं अलगद वापरून ती काढली आणि शेजारी रिकाम्या जमिनीत लावली…वाटलं ती आनंदेल, खूप खूष होईल,,,पण कसलं काय? तिनं संध्याकाळी मानंच टाकली…जणू पायरीच्या हक्काच्या, प्रेमाच्या तिच्या घरातून तिला बेघर केलं मी….

खूप अपराधी वाटलं.वाटलं बिच्चारी छान डोलत होती…वारा पीत होती…निरागस बाळासारखं हासत होती…. कशाला केलं मी हे?आम्ही परतलो . मनात सल राहिला.परत काही महिन्यांनी एका रविवारी गेलो.पायरीशी गेलो…त्या तुळशीची आठवण झाली…संकोचायला झालं… आणि क्षणात पुन्हा नवा आश्चर्याचा धक्का बसला….तिथे तसंच चिमुकलं,हासरं,सतेज तुळशीचं रोप डोलत होतं.मेव्हणे म्हणाले ते लावलेलं नाही ..ते आपोआप येतंच….मला निसर्गाचं आणि त्या रोपाचंही नवल वाटलं..ही काय जादू…परत तिथंच ही निर्मिती कशी? किती महान आहे निसर्ग यांची साक्षंच पटली…. आणि माझी खंत परत उफाळून आली.मला सुंदर तुळस हवी होती.सुदैवानं अंगण होतं.अगदी कावेच्या रंगाचं वृंदावन ..पणतीचा कोनाडा सगळे लाड केले असते तिचे.छोटा सुबक कट्टा केला असता.परवचा ,गप्पा गोष्टी रंगलं असतं.तिळाचं तेल कापसाची वात वृंदावनाच्या कोनाड्यात उजळलं असतं मंद,शांत,मंगल,पवित्र….शहरी झगमगाटापासून दूर…बालपणापासून ठसलेलं….पण ती माझ्या अंगणात रमतंच नव्हती….त्या ग्रामपंचायतीच्या अंगणातली नाही तर पायरीच्या फटीतली तुळस मला चिडवत होती जणू..

एवढं का हवं होतं मला तिचं अस्तित्व?….कारण तिच्या सान्निध्यातला श्वास प्राणवाचक…प्रसन्न…हवाहवासा….खरंतर ना तिला फूल ना रंगांची पखरण…

पण तिचा हिरवट काळसर पानांचा विस्तार आगळा सुगंधी…औषधी….थेट गाभाऱ्यात भेटणारी तुळस….तिचं रोप कुठेही भेटो नमस्काराला हात जुळणार अशी तिच्यावर श्रद्धा…. श्वासात शुद्ध गंध भरणारच तिचा..मनात आठव कृष्णसख्याचा, विठू माऊलीचा नाही तर सत्यनारायणाच्या पूजेच्या विष्णूसहस्रनामात वाहिल्या जाणाऱ्या तबकातल्या सहस्र तुळशीपत्रांचा….मनात विसावलंय सुवर्णतुलेतलं  ते तुळशीपत्र नाही तर दानावर त्यागाची मोहर उमटवणारं एक पान…निर्मळ,निर्मोही मनाचं रुपडं जणू… नाही तर द्रौपदीच्या अक्षयपात्राचा अन्नपूर्णेच्या थाळीचा दाखला… नाही तर अंतिम प्रवासात मुखावर ठेवलं जाणारं ते पान…

उदात्त विचार,अध्यात्म असो नाहीतर आजीबाईच्या बटव्यातलं बाळाचं औषध,काढा…सगळीकडे तुळशीचं अस्तित्व…सहज,सोप्पं पण अनमोल…म्हणून तर तिला अंगणात,पूजेत मान…केवढीही बाग फुलुदे,अनेक रंग,गंध,आकारांची उधळण होऊदे.‌..तुळशीचं महात्म्य,सौंदर्य,पूजन अ बा धि त!!!!

आणि ती रूजणार तिच्या मर्जीने,,,, तिच्या आनंदानं…. कारण तिला खात्री आहे किती ही माजलेलं तण,गवत उपटा… त्यात वाढलेलं तुळशीचं रोप उपटून फेकणार नाहीत… त्यांची काळजी घेणारंच…फारतर नव्या मातीत नव्या कुंडीत रुजवणार कारण तुळस आहेच मंगल,पवित्र, सात्विक म्हणून तर देवांची ही लाडकी….साधी पण जीव लावणारी , जीव जपणारी…रांगोळीनं साधी तिरकी रेषा काढा आणि तुळशीपत्र ठेवा शेजारी…मनात कृष्णसख्याची बासरी गुंजले आणि रांगोळीच्या रेषात कटीवर कर आणि गळ्यात तुळशीहार मांडा…टाळ मृदंगाच्या घोषात विठुमाऊलीची गळाभेट होईल जणू.. म्हणून तर शेतीची कामं संपवून…कपडे दोनचारंच पण टाळ,मृदंग, वीणा डोईवर तुळशीवृंदावन घेऊन या संतांना आणि विठुरायाला भेटवणारे वारकरी..त्यांची श्रद्धा,माया,प्रेम जाणून  या प्रवासात संगत करते आणि पंढरपुरात अधिक सुखानं, समाधानानं डवरते.,, विठुरायाला आलिंगन देणे…गाभारा तिच्या गंधाने कोंदतो …अशी साजिरी……तुळस !!!

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares