मराठी साहित्य – विविधा ☆ सर्व अंधश्रद्धांविरूद्ध लढणारा झुंजार योद्धा – जेम्स रँडी – भाग-१ – लेखक – डाॅ प्रदीप पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

🔆 विविधा 🔆

सर्व अंधश्रद्धांविरूद्ध लढणारा झुंजार योद्धा – जेम्स रँडी – भाग-१ – लेखक – डाॅ प्रदीप पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

युरी गेलर नावाच्या इस्त्रायल मधील तेल अविव गावच्या माणसाने 1973 मध्ये केवळ मनशक्तीने चमचा वाकविण्याचा चमत्कार अमेरिकेत केला आणि सगळीकडे अतिंद्रिय दाव्यांची सिद्धता मिळाल्याचे पडघम वाजू लागले! केवळ चमचाच नव्हे तर युरिने लोकांच्या घरातील घड्याळं बंद पाडली आणि जमिनीखालचे पाणी मनशक्तीने सांगण्याचा सपाटा लावला. मनो सामर्थ्य हा अतींद्रिय शक्ती चा प्रकार आजवर सिद्ध झालेला नव्हता. तो युरीने सिद्ध केला असे सांगत जगन्मान्य ‘नेचर’ मासिकात युरी वरील संशोधन प्रबंध ही प्रसिद्ध झाला. ‘सायंटिफिक अमेरिकन’, ‘टाईम’ इत्यादींनी त्याची गंभीर दखल घेतली आणि….

युरी गेलरचा अतिंद्रिय दाव्यांचा फुगलेला फुगा फोडला जेम्स रँडी ने. एक जादूगार. कॅनडातील टोरंटो येथे 1928 मध्ये जन्मलेल्या जेम्स रँडीने कॉलेजला जाऊन शिक्षण घेतले नाही की कोणती वैज्ञानिक संशोधनासाठी पीएचडी केली नाही.. आपल्याकडे असलेल्या गाडगेबाबांसारखेच आहे हे ! चलाखीने चमत्कार करण्यात अपूर्व हातखंडा असलेला रँडी जेव्हा अमेरिकेत पोहोचला तेव्हा तेथे दूरसंवेदन,( टेलीपथी ) पासून टीव्हीवरून ख्रिस्तोपदेशकांचे चमत्कार दाखविण्यापर्यंत ,ज्यांना एव्हांजेलिस्ट असे म्हणतात अशा सर्व अंधश्रद्धांचा सुळसुळाट चालूच होता. युरी गेलरच्या अतींद्रिय दाव्या मागील हातचलाखी दाखवून व बिंग फोडूनच जेम्स रँडी थांबला नाही तर गेलरचा संपूर्ण जीवन आलेख लोकांच्या समोर मांडून त्यातील फोलपणा  दाखवून दिला. टाईम मासिकाचे ज्येष्ठ संपादक लिओन जेराॅफ यांच्या उपस्थितीत रँडीने गेलरची चलाखी पहिल्यांदा स्पष्टपणे ओळखली. डॉ. अंडरिझा पुहारिश यांनी युरी चा शोध लावला आणि अमेरिकेतील स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूट मधील दोन वैज्ञानिक हेरॉल्ड पुटहाॅफ ( विशिष्ट प्रकारच्या लेसर चा शोधक ) आणि रसेल टर्ग ( मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी प्लाझमा ओसीलेटर चा शोधक)  हे यूरी गेलरच्या चमत्काराने प्रभावित का झाले याचा रँडीने शोध घेतला. पुटहाॅफ हा सायंटॉलॉजी नावाच्या स्वर्ग-सुपरपॉवर मानणार्या पंथात होता तर टर्ग हा गूढ पुस्तक विक्रेत्याचा मुलगा. टर्ग-पुटहाॅफ यांनी स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये गेलरची चाचणी घेऊन ऑक्टोबर 1974 च्या नेचर मध्ये प्रबंध प्रसिद्ध केला. परामानसशास्त्र किंवा ढोंगी मानसशास्त्रास ‘नेचर’ मध्ये स्थान नसताना तो छापला गेल्यावर गेलरची प्रचंड प्रसिद्धी झाली आणि त्याचा भरपूर प्रचार टर्ग-पुटहाॅफनी केला. तेव्हा रँडीने ‘नेचर’ च्या त्या अंकातील डेवीस यांच्या संपादकीयात अपुरा, अव्यवस्थित आणि ‘रॅगबॅग ऑफ पेपर’ हा शेरा उघडकीस  आणून  ‘नेचर’ ने हा प्रबंध प्रकाशित करण्याचा उद्देश फक्त आज परामानसशास्त्राच्या चाचण्या कशा घेतल्या जातात हे दाखविण्यासाठीच होता, हे रँडीने दाखवून दिले. ‘न्यू सायंटिस्ट’चे संपादक बर्नार्ड डिक्सन यांनीही त्यास दुजोरा दिला.

गेलरच्या हातचलाखीस टर्ग- पुटऑफ हेच वैज्ञानिक फसले होते असे नव्हे तर अनेक वैज्ञानिक फसले होते. लंडनच्या बायोफिजिकल लॅबोरेटरी मध्ये 1971 मध्ये जेंम्स  रँडी ने युरी गेलरच्या जादू दाखविल्या तेव्हा ‘न्यू सायंटिस्ट’ च्या जो हॉनलॉन  बरोबर होते नोबेल पारितोषिक विजेते डी.एन. ए. आराखड्याचे शोधकर्ते डॉक्टर मॉरीस विल्किंस. त्यांचीही दिशाभूल युरी गेलरमुळे झाली होती. ते जेम्स रँडीस म्हणाले, परामानसशास्त्राच्या किंवा पॅरासायकॉलॉजीच्या चाचणीसाठी वैज्ञानिकांची गरज असते हे चूक असून चांगल्या जादूगाराचीही तेवढीच गरज असते!

रँडीने हेच ठळकपणे समोर आणले. वैज्ञानिक हे वैज्ञानिक चाचण्यात मुरलेले असतात. त्यांना हातचलाखी, जादुगिरी याची भाषा अवगत नसते. त्याचा फायदा परामानसशास्त्रज्ञ-बुवा-महाराज घेतात. हे युरी गेलर प्रकरणात रँडी ने दाखवून दिले आणि रँडी ने वैज्ञानिक चाचण्या बरोबर जादुगिरी, चलाखी शोधणे अशी जोड देऊन अतींद्रिय शक्तीचे दावे, चमत्कार, आत्मे- भुते यांच्या अस्तित्वाचे दावे, छद्म विज्ञान किंवा स्युडोसायन्स इत्यादी गोष्टींचा भांडाफोड केला. आणि त्याने अनेक वैज्ञानिक व विज्ञान नियतकालिकांना जादूगाराची मदत घेणे हे कसे योग्य आहे हे समजावून सांगितले. त्याने मग अश्या गोष्टींच्या सायकिक टेस्ट करण्यासाठी चार नियम मांडले. साध्या चलाखीचा वापर करणे, फसवणूक हाच उद्देश, परिणामकारक चलाखीचे प्रदर्शन, संशय घेणाऱ्या व्यक्तींच्या उपस्थितीत चलाखी कोलमडणे, हे सायकिक असे 4 अवगुण उघडे करण्यासाठी रँडी ने एक नियमावली तयार केली. सुमारे 17 नियम असलेली ही नियमावली आजही सर्वच भ्रमांचा वेध घेण्यासाठी उपयुक्त ठरत आली आहे. वैज्ञानिक चाचणी बरोबर या चाचण्यांनाही तेवढेच महत्त्व प्राप्त करून देण्यात हॅरी हुदिनी या प्रख्यात जादूगाराच्याही दोन पावले पुढे जाऊन रँडी ने मोठे यश मिळविले. त्याहीपुढे जाऊन त्याने अतिंद्रिय शक्ती, खोटे मानसशास्त्र, गुढ-चमत्कारी गोष्टी सिद्ध करण्यासाठी दहा हजार डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले. जवळपास सहाशे पन्नास जणांनी हे आव्हान स्वीकारले. त्यापैकी फक्त 54 जणांनी टेस्ट दिल्या आणि आव्हान कुणीच जिंकू शकले नाहीत आजवर! आज त्याच्या नावाने स्थापन झालेल्या जेम्स रँडी एज्युकेशनल फाऊंडेशनने ही रक्कम एक लाख डॉलर्स केली आहे.

जादू आणि चलाखी यांच्या व्याख्या त्याने स्पष्ट केल्या. विशिष्ट मंत्र आणि तांत्रिक विधी यांनी चमत्कार करणे म्हणजे मॅजिक व कौशल्य वापरून चमत्कार करणे म्हणजे चलाखी किंवा कॉन्ज्युरिंग असे त्याने स्पष्ट केले.

या गदारोळात सोसायटी ऑफ अमेरिकन मॅजिशियन्स व इंटरनॅशनल ब्रदरहुड ऑफ मॅजिशियन्स इत्यादी संघटनांनी रँडीवर जादू उघडे करण्याचा आक्षेप घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या ‘मॅजिक’ या मासिकातून जेम्स रँडीच्या विरोधात सूर उमटू लागला..

त्यावर रँडीने म्हंटले,

‘जेव्हा वैज्ञानिक एखाद्या परामानसशास्त्रज्ञांची चलाखी ओळखू शकत नाहीत तेव्हा आपणच त्या विरोधात ठामपणे उभे राहायला हवे. कारण सामान्य जनांची फसवणूक आणि शोषण यांचा आपण विचार करायलाच हवा.. हाच मानवतावाद आहे.’

जेम्स रँडीने केलेल्या या कार्याची पावती म्हणून वैज्ञानिक वर्तुळात त्यास मानाचे स्थान प्राप्त झाले. कमिटी फॉर द सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ ऑफ द पॅरानॉर्मल या संस्थेचा तो सन्माननीय सदस्य बनला. या समितीत प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन, विज्ञान लेखक आयझॅक असीमोह,  रे हॅमन, रिचर्ड डॉकिन्स, मार्टिन गार्डनर अशी फेमस वैज्ञानिक मंडळी त्यावेळी होती. 

1988 मध्ये फ्रेंच होमिओपॅथ जॅकस बेनव्हेनिस्ते याने ‘नेचर’ मध्ये होमिओपॅथीच्या सिद्धतेचा पुरावा म्हणून शरीरातील पाण्यात होमिओपॅथिक औषधांची स्मृति राहते असा प्रबंध लिहिला. त्याची छाननी करण्यासाठी ‘नेचर’ तर्फे गेलेल्या त्या पॅनेलमध्ये संपादक जॉन मेडाॅक्स व इतरांबरोबर जेन्स रँडीही होता आणि या पॅनेलने होमिओपॅथी विषयी चा दावा फेटाळून लावला.

रँडीची ही वाटचाल जादूगिरीपासून वैज्ञानिक वृत्तीच्या विज्ञानवाद्यापर्यंत घडत गेली ती वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्या मुळेच. त्याचा परिणाम असा झालाकी जगभर हिंडत असताना अनेक अंधश्रद्धांचा, भ्रमांचा भेद त्याने कौशल्याने आणि पुराव्यासहित केला. थायलंडमधील कागदा आधारे बुवाबाजी करणाऱ्या विणकाम्याची जादू, सर आर्थर कॉनन डायलच्या फेअरी टेल्स मधील एल्सी आणि फ्रान्सिस यांच्या छोट्या छोट्या परी कन्या व राक्षस यांच्याबरोबरच्या फोटोतील बनवाबनवी, या परी कन्यांचे प्रिन्सेस मेरीज गिफ्ट बुक या पुस्तकांमधील हुबेहूब चित्रे शोधून दाखविलेले साम्य (ज्यावर ऑलिव्हर लॉज व विलियम कृक्स या वैज्ञानिकांचाही विश्वास होता ती ही बनवाबनवी), महर्षी महेश योगीच्या ‘महर्षी इफेक्ट’मुळे आयोवा व व इतर प्रांतातील ठिकाणी गुन्हेगारी कमी झालेल्या खोट्या रिपोर्ट चा समाचार… एरिक व्हॉन डॅनिकेन या स्विस लेखकाने चारियाटस् ऑफ गॉड्स व इतर चार पुस्तकातून परग्रहातून आलेल्या लोकांची छापलेली चित्रे ही कशी बनवाबनवी होती, या सर्व प्रकरणातील चलाखी व लबाडी त्याने पुराव्यासहित दाखवून दिली.

त्याच्या या कामाची दखल घेऊन त्याला मॅक आर्थर फाउंडेशनचा प्रतिष्ठित पुरस्कार व फेलोशिप जरी मिळाली तरी त्याचे वेगवेगळ्या चाचण्या व प्रयोग करणे काही थांबले नाही. बायोरिदम या खूळाच्या त्याने मजेशीर चाचण्या घेतल्या. सेक्रेटरीचा चार्ट एका बाईस देऊन नोंदी ठेवायला सांगितल्या आणि त्या बाईने तो तिचा चार्ट समजून ऍक्युरेट नोंदीचा निर्वाळा दिला !!

क्रमशः…

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अन्न सोहळा… लेखक : श्री सतीश बर्वे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? मनमंजुषेतून ?

☆ अन्न सोहळा… लेखक : श्री सतीश बर्वे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे 

त्या आडवाटेवर आमची गाडी अचानक बंद पडली होती. सूर्यास्त होण्याच्या मार्गावर होता. ड्रायव्हर निष्णात मेकॅनिक देखील होता त्यामुळे काळजीचं कारण नव्हतं. फक्त जास्त अंधार व्हायच्या आत आमचा पुढचा प्रवास सुरु होणं गरजेचं होतं.

दूरवर नजर टाकली तेव्हा तिथे  टपरीवजा छोटंसं हाॅटेल दिसलं  मला. बुडत्याला काडीचा आधार तसं उपासमार होणार नाही इतपत समाधान मला होते. ड्रायव्हरला सांगून मी आणि माझे दोन सहकारी टपरीच्या दिशेने चालायला लागलो.

टपरीवर पोहोचल्यावर वेगळंच दृश्य पाहायला मिळाले. दोन चार टेबलं आणि बाकडी ठेवली होती. त्यावर बसून गावातली माणसं डाळभात खात होती. त्यांच्या पोशाखावरून त्यांच्या कष्टकरी आयुष्याचा अंदाज येत होता. वाढलेला डाळभात खाऊन पत्रावळी उचलून रस्त्यालगत ठेवलेल्या मोठ्या डब्यात टाकून ती मंडळी टपरी बाहेर पडत होती. सगळं कसं शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होतं. ते बघून मला आश्चर्य वाटलं.

आम्हाला बघून एक मुलगा पुढे येत आम्हाला म्हणाला, “काय खाणार साहेब? भजी, मिसळपाव, वडापाव, भुर्जी पाव. गरमागरम मिळेल सगळं.” हे ऐकून माझ्या जीवात जीव आला.

साहेब तुम्ही तिथे टेबल खुर्ची ठेवली आहे तिथे बसा. त्याने बोटाने दाखवलेल्या ठिकाणी आम्ही बसलो. आधी दोन प्लेट मिक्स भजी मागवली. ती खाताना माझी नजर सारखी डाळभात खाणाऱ्या लोकांच्या टेबलावर जात होती. शेवटी न राहवून मी खुर्चीवरून उठून तिथे पोहोचलो.

“काय झालं साहेब?” तो मघाचाच मुलगा पुढे येत मला विचारु लागला. 

“ही डाळभात खाणारी माणसे कोण आहेत?” 

“ते माझा बा तुम्हाला सांगेल” असं म्हणून त्या मुलाने त्याच्या वडिलांना बोलावून घेतले आणि मी काय विचारतोय ते त्यांना सांगितले.

एक साधारण पन्नाशीच्या आसपासचा माणूस आमच्या जवळ आला आणि मला म्हणाला, “राम राम साहेब. तुम्हाला जे बघून आश्चर्य वाटलं तो अन्न सोहळा रोज इथे सकाळ संध्याकाळ सुरू असतो. 

“ ए आतून दोन तीन चांगल्या खुर्च्या आण बरं.” त्याने टपरीच्या दिशेने आवाज दिला. आतून आलेल्या खुर्चीवर आम्ही दोघे बसलो आणि तो माणूस सांगायला लागला.

” माझा जन्म इथूनच आत ४-५ किलोमीटर वर असलेल्या गावात झाला. माझे आई वडील कोण ते आठवत देखील नाही मला. उघड्यावरच जगायचो. कोणी चार घास दिले तर ते खायचो. नाहीतर पाणी पिऊन दिवस काढायचो. 

माझ्या बा ला ह्या टपरीवर कोणीतरी हाताशी पाहिजे होतं. त्याने मला गावातून उचलून इथे आणला. त्या दिवसापासून तो माझा बा झाला. पडेल ते काम मी करायचो. पुढे पुढे किचनचं काम शिकून घेतले. माझ्या हाताला चव होती. सुरवातीला फक्त भजी आणि चहा विकणारा आबा नंतर मिसळपाव, वडापाव, भुर्जी पाव, नेसकाॅफी ठेवायला लागला. 

इथे आसपास खाणीत आणि उसाच्या मळ्यात काम करणारे पुष्कळ कामगार आणि ट्रकवाले, ट्रॅक्टरवाले इथे यायला लागले. टपरी चोवीस तास उघडी असायची. 

बा ला नंतर चांगले दिवस दिसले. माझं लग्न लावून दिलं त्यानं. बाने खुप गरीबी आणि उपासमारी बघितली. चांगले दिवस आल्यावर त्याने हा अन्न सोहळा सुरू केला. रोज सकाळी आणि संध्याकाळी इथे गरिबांना डाळभात आणि लोणचं देतो आम्ही खायला. त्याचे पैसे घ्यायचे नाहीत असं बा ने शिकवलंय मला.

‘आपल्यातले चार घास उपाशी माणसाला द्यावे हे बा ने शिकवलं मला. असं केल्याने आपण काही मरत नाही पण दुसऱ्याला जगण्याची ताकद मिळते’ असं समजावून सांगायचा मला तो. तो आजारी झाल्यावर माझ्याकडून वचन घेतले त्यांनी हा अन्न सोहळा पुढे चालू ठेवण्याचं. 

आता मी आणि माझा मुलगा ही परंपरा पुढे चालवत आहोत.

बा म्हणायचा ‘नुसतं गोणीभर जमवून काही उपयोग नसतो. तर त्या पैशातून गरिबांना मदत करायला हवी आपण. देवाचं लक्ष्य असतं सगळ्यांकडे. आपण गरिबांना जमेल तेवढे सुखी ठेवलं की देव आपल्याला पण सुखी ठेवतो. एका हाताने दिलं की दुसऱ्या हाताने देव देऊन आपला तोल जाऊ देत नाही. नुसतं गोणी भरत गेलो की पैशाला पाय फुटतात आणि नको त्या रस्त्यावर आपण कधी जाऊन पोहोचतो ते आपल्याला कळत नाही. ज्या मातीशी आपण इमान राखत नाही त्याच मातीत आपलं जीवन आपण आपल्याच हाताने उद्ध्वस्त करतो.’ 

बा शिकला नव्हता. पण जगण्याच्या शाळेचा तो मास्तर मात्र होता. त्याने सुरू केलेला हा अन्न सोहळा जीवात जीव आहे तोपर्यंत मी चालू ठेवणार आणि माझ्या नंतर माझा मुलगा…. नंतर माझा नातू…..

गाडी दुरुस्त झाल्याचा निरोप आला. त्या माणसाचा निरोप घ्यायची वेळ आली. पाकिटातून हाताला लागल्या तेवढ्या नोटा काढून मी त्याच्या हातात ठेवल्या.

“साहेब हे काय?”

“अरे माझ्या कडून छोटीशी भेट तुझ्या अन्न सोहळ्याला. आज तु मला काहीतरी चांगलं शिकवून गेलास. जगण्याची किंमत त्यालाच जास्त चांगली माहीत असते ज्याला उद्या काय होणार ह्याची चिंता सतावत असते. 

हा सोहळा तुझ्या हातून अखंड सुरू राहो हीच देवा जवळ प्रार्थना मी दररोज करीन. हे माझं कार्ड आहे. चुकून कधीतरी समजा वेळ आलीच ह्या सोहळ्यात खंड पडण्याची तर मला अवश्य फोन कर. मी असेन तुझ्यासोबत जमेल तेवढा हातभार लावायला.”

त्याने पाया पडून माझा आशीर्वाद घेतला आणि मी माझ्या सहकाऱ्यांसोबत गाडीच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली.

लेखक : श्री सतीश बर्वे

लेखक – श्री संदीप काळे

मो. 9890098868

प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आपल्या हळदीसाठी लढाई करणारा मराठी शास्त्रज्ञ – लेखन व माहिती संकलन : रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ आपल्या हळदीसाठी लढाई करणारा मराठी शास्त्रज्ञ – लेखन व माहिती संकलन : रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

हळदीघाटमध्ये १८ जून १५७६ साली मेवारचे राजे महाराणा प्रतापसिंग प्रथम व दिल्लीचे सम्राट अकबर यांच्या सैन्यामध्ये जी लढाई झाली होती, ती लढाई हळदीघाटची लढाई या नावाने प्रसिध्द आहे. या घाटाचा भौगोलिक गुणधर्म म्हणजे त्याठिकाणी असलेली नरम पिवळी माती. या पिवळया मातीमुळेच या भागाला हळदीघाट असे नामाभिधान झाले आहे. जशी सोळाव्या शतकात हळदीघाटची लढाई दोन तुल्यबळ राजांनी आपसात केली होती, तशीच हळदीच्या पेटंटसाठी लढाई विसाव्या शतकात झाली होती. आणि ही लढाई आपल्या भारत देशातील एका शास्त्रज्ञाने अमेरिकेतील US पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिस विरुध्द केली होती.

डॉक्टर रघुनाथराव अनंत माशेलकर (आपल्या हळदीसाठी लढाई करणारा मराठी शास्त्रज्ञ)

त्याचे असे झाले. भारतीय वंशाचे दोन अमेरिकन संशोधक, मिसिसिपी युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी मेडिकल सेंटरचे सुमन के. दास आणि हरी हर पी. कोहली या दोघांनी हळदीचे बरे करण्याचे गुणधर्म शोधून काढल्याचा दावा US पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिसकडे केला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांना मार्च १९९५ मध्ये तुम्हाला आणि आमच्या आयुर्वेदाला शतकानुशतके माहीत असलेल्या गोष्टीसाठी पेटंट देण्यात आले. जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय भारतात पूर्वापार वापरला जातो आहे; असे असतांना, एक दिवस सकाळी पेपर वाचत असतांना, एका विचित्र बातमीकडे आपल्या जगप्रसिद्ध भारतीय डॉक्टर माशेलकरांचे लक्ष गेले. अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याचे त्या बातमीत म्हटले होते. थोडक्यात अमेरिकेने हळदीचे पेटंट घेतले होते. बातमी वाचताच माशेलकर बेचैन झाले. नुसते बेचैन न होता आता त्यांची चांगलीच सटकली. आपल्या भारतीयांकडे अनेक पिढया चालत आलेले हे ज्ञान, कोणीतरी स्वतःचे असल्याचा राजरोस दावा करतो आहे, हे योग्य नव्हे. यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करून आपले हक्क आपण राखले पाहिजेत, असा पक्का विचार करून डॉक्टर माशेलकर कामाला लागले. जोरदार न्यायालयीन लढाई झाली. हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रे जमा करून, त्या सर्वांचा रितसर अभ्यास करून, डॉक्टर माशेलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अमेरिकेविरुद्धची हळदीघाटची लढाई जिंकली. यातून दोन चांगले परिणाम झाले. एक तर आपल्या ज्ञानाचे हक्क आपल्याकडे राहिले आणि दुसरा दूरगामी फायदा झाला, तो असा की आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपल्याला आणि साऱ्या जगाला कळली. अमेरिकेसारख्या बलाढय राष्ट्राला भारतीय ज्ञानाचे महत्त्व कळले आणि आपण दुसऱ्यांच्या पेटंट नसलेल्या पारंपरिक ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही मिळाला. अमेरिकेसारख्या बलाढय राष्ट्रा विरुध्द हळदी साठी स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या शस्त्रासह एकाकी लढाई देणारे आपले डॉक्टर माशेलकर यांचे सपुर्ण नाव डॉक्टर रघुनाथराव अनंत माशेलकर. जन्म १ जानेवारी १९४३. मुळचे गोव्यातील माशेल येथील. माशेल सारख्या टुमदार गावात निसर्गरम्य खेडेगावात त्यांचे बालपण गेले. परंतु त्यांच्या वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले.आईने मोठ्या धीराने त्यांचे संगोपन व आणि पालनपोषण केले. त्यांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी त्यांच्या त्या माऊलीने माशेल सारख्या लहान खेडेगावातून सरळ मुबंईसारख्या मोठ्या शहरात येण्याचा निर्णय घेतला. आईने घेतलेला हा निर्णय रघुनाथरावांनी सार्थ ठरविला. मुबंईत ती दोघं खेतवाडीत डाँक्टर देशमुख गल्लीसमोरच्या चाळी मध्ये राहु लागली. त्यावेळेस त्यांची परिस्थिती अतिशय बिकट होती. सातवी इयत्ते पर्यंत त्यांचे शिक्षण मुबंईत पालिकेतील शाळेतच झाले. या शाळेतल्या शिक्षकांनी सुरुवातीस भरपुर सहकार्य केल्याने माशेलकरांचे आयुष्य घडले गेले.

७ वी इयत्ता यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, आता मुंबईच्या युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घेणार होते. मात्र, डाँक्टर माशेलकर यांच्या आईला प्रवेशासाठी २१ रुपयांची व्यवस्था करणे कठीण झाले होते. पण आईच्या ओळखीत असलेल्या एका मोलकरणी कडून कर्ज घेऊन अडथळे दूर केले गेले, त्या मोलकरणीने आपली संपूर्ण बचत उधार दिली जेणेकरून रघुनाथ शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट होऊ शकेल! युनियन हायस्कूलमध्ये, तरुण रघुनाथचे शिक्षक श्री. भावे यांनी त्यांची प्रतिभा केव्हाच ओळखली होती. आणि सूर्याची किरणे एकाग्र करू शकणार्‍या बहिर्गोल भिंगाचे उदाहरण वापरून त्यांना जीवनात लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त केले. याच उल्लेखनीय उदाहरणाने रघुनाथला शास्त्रज्ञ बनण्याची प्रेरणा दिली. त्या काळात घरात वीज नसल्यामुळेच रस्त्यावरील दिव्याच्या उजेडात अभ्यास करूनही त्यांनी बोर्डाच्या म्हणजेच शालान्त परीक्षेत उत्तीर्ण होताना महाराष्ट्रात ११ वा क्रमांक मिळवला!

तरुण रघुनाथच्या मनात जिज्ञासा इतकी अतृप्त होती की तो अनेकदा गिरगावच्या मॅजेस्टिक बुकस्टॉलबाहेर बसून नवीन पुस्तके वाचत असे आणि पटकन परत करत असे कारण त्याच्याकडे विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. डाँक्टर माशेलकर यांनी पुण्यातील पिंपरी येथील केलेल्या भाषणात म्हणाले.

‘‘बालवयापासूनच मला वाचनाची गोडी लागली. शालेय जीवनातही मी प्रचंड वाचन केले. त्याचा मला पुढील आयुष्यात मोठा फायदा झाला. आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी वाचत राहीन. तुलनेने लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. मात्र, सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी आयुष्याच्या शेवटापर्यंत साधना केली पाहिजे,’’

बोर्डाच्या परीक्षेनंतर त्यांनी आर्थिक अडचणींमुळे पुढील शिक्षण सोडण्याचा विचार केला पण माशेलकर यांच्या आई, हे त्यांचे प्रमुख प्रेरणास्थान होते. शिवणकाम किंवा मिळेल ते काम करून त्यांच्या आई काही कमाई करत असत. एकदा त्या गिरगावातल्या काँग्रेस भवनात काम मागण्या साठी गेल्या. संबंध दिवस तिथे उभे राहूनदेखील त्यांना काम दिले गेले नाही याचे कारण त्या कामासाठी तिसरी उतीर्ण असणं आवश्यक होते आणि माशेलकरांच्या आईंचे तेवढे शिक्षण नव्हते. खोटे बोलून त्यांना कदाचित ते काम मिळवता आले असतेही. पण तसे न करता, त्यांनी स्वतःच्याच मनाशी निर्धार केला – आज माझे शिक्षण नाही म्हणून मला काम मिळाले नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातले सर्वोच्च शिक्षण देईन. हा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले.

तथापि, त्यांच्या आईचे प्रोत्साहन आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या आर्थिक पाठिंब्यामुळे त्यांना मुबंईतील प्रतिष्ठित जय हिंद महाविद्यालयात प्रवेश मिळण्यास मदत झाली. नेहमीप्रमाणे, त्याने कठोर परिश्रम केले आणि आंतरराज्य परीक्षेत २ रे आले. म्हणूनच नंतर , २००३ साली जय हिंद कॉलेजने त्यांना सर्वात प्रतिष्ठित माजी विद्यार्थी म्हणून सन्मानित केले.

भारतातील रासायनिक उद्योगाच्या उज्ज्वल भविष्यामुळे प्रेरित होऊन, त्यांनी केमिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त करण्यासाठी मुंबईतील पूर्वीची UDCT व आताची रासायनिक तंत्रज्ञान संस्था ( ICT Institute of Chemical Technology) या संस्थेत प्रवेश घेतला. पदवी प्राप्त केल्यानंतर, त्याच्याकडे शिष्यवृत्तीसह पुढील पदव्युत्तर पदवी मिळविण्यासाठी परदेशात जाण्याचा पर्याय होता. त्याऐवजी, त्यांनी रासायनिक अभिक्रियांमध्ये ( Chemical engineering) मास ट्रान्सफरच्या क्षेत्रामध्ये प्रो. एम.एम. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर म्हणून UDCT मध्ये त्यांचे काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रो. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी पूर्ण केली आणि अवघ्या तीन वर्षांत त्यांचा प्रबंध पूर्ण केला. १९६९ साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या तत्कालीन संचालक प्रा. एम्‌. एम्‌ शर्मा या अत्यंत सृजनशील संचालकाच्या मार्गदर्शनाखाली, माशेलकरांनी आपली पी.एच.डी.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्टरल संशोधनही केले.

डॉ. माशेलकर यांनी २३व्या वर्षी पीएच.डी. मिळवून नॉन न्यूटोनियन, फ्लुइड मेकॅनिक्स, जेल विज्ञान आणि पॉलिमर अभिक्रिया अशा मूलभूत संशोधनांद्वारे वेगळी वाट चोखाळणाऱ्या माशेलकरांना ६० पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. जानेवारी २०१८पर्यंत ३८ डॉक्टरेट मिळाल्या आहेत, आणि ३९वी डॉक्टरेट फेब्रुवारी २०१८मध्ये मिळाली. ३८हून ही अधिक संस्थांच्या संचालक मंडळांवर त्यांची निवड झाली आहे. जेव्हा रघुनाथ माशेलकर हे सी.एस.आय.आर.चे प्रमुख झाले होते त्यावेळी सी.एस.आय.आर.मध्ये २८,००० लोक काम करत होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा वसवल्या होत्या. परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. माशेलकरांनी व्हिजन नावाची योजना आखली. चाळीस प्रयोगशाळांचे समांतर चालणे थांबवून, त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ट पद्धतीने बांधले आणि मग त्यातून भारतीय वैज्ञानिक संशोधनाचे एक अचाट पर्व निर्माण झाले.

२३५हून अधिक शोध निबंध, १८हून अधिक पुस्तके आणि २८हून अधिक पेटंटे त्यांच्या नावावर आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर, ते १९९८ मध्ये रॉयल सोसायटीचे फेलोशिप २००५ मध्ये नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्स (यूएसए) चे फॉरेन असोसिएट, २००३ मध्ये यूएस नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे फॉरेन फेलोशीप, रॉयल अकादमीचे फेलोशीप म्हणून निवडले गेले. १९९६ मध्ये ईजिंनिअरींग आणि २००० मध्ये वर्ल्ड ॲकॅडमी ऑफ आर्ट अँड सायन्स (यूएसए) चे फेलोशीप. १९९८ मध्ये जेआरडी टाटा कॉर्पोरेट लीडरशिप अवॉर्ड जिंकणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते आणि २००५ मध्ये बिझनेस वीक (यूएसए) स्टार ऑफ एशिया अवॉर्ड जिंकणारे पहिले आशियाई शास्त्रज्ञ होते, त्यांना हा पुरस्कार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश Snr यांच्याकडून मिळाला होता. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समित्यांच्या सदस्यत्वाद्वारे त्यांचे ज्ञान आणि कौशल्य देखील मोठ्या प्रमाणात सामायिक केले गेले आहे.

आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारे, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारे माशेलकर हे, पुढे इंग्लंडमध्ये ज्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्या आयझॅक न्यूटनने ज्या पुस्तकात सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय आहेत याचा आपणास नेहमीच गौरव वाटत राहील.

लेखन व माहिती संकलन : रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ न्यूट्रल थिंकिंग… लेखिका : डॉ. स्वाती गानू ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ न्यूट्रल थिंकिंग… लेखिका : डॉ. स्वाती गानू ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

‘There are always flowers who want to see them’ असं म्हणतात. आठ दिवसांपूर्वी जेव्हा बारा वर्षांचा सारंग खोली न आवरता, आलेल्या मित्रांशी बोलत होता तेव्हा त्याच्या अव्यवस्थितपणाचा आईला खूप राग आला होता.तो मात्र अनभिज्ञ होता यापासून. आपलं त्या विषयावरचं मत मुद्देसूदपणे पटवून देत होता मित्रांना.ती टक लावून त्याच्याकडे पाहत होती अगदी न्यूट्रल होऊन.जणू तो अनोळखी होता. तिला वाटलं आपल्या माणसाकडे असं न्यूट्रल होऊन पाहण्यात काही वेगळंच फीलिंग आहे.आपण नेहमी हक्काने ‘तुझं कसं चुकलंय,तू हे असं बोलायला हवं होतंस,अशा पद्धतीने करायला पाहिजे होतं,या प्रकारे वागायला हवं होतं,’ असं सहज बोलून जातो,अपेक्षा करतो.जजमेंटल होतो.लेबलिंग करुन मोकळं होतो.आज जेव्हा आईने आपल्याच मुलाबद्दल वेगळा विचार केला, तेव्हा तिला सारंगची चांगली बाजूही दिसली.असं न्यूट्रल होऊन बघण्यात एक वेगळीच मजा आली.ताटावर बसल्या क्षणी पहिल्याच घासाला ‘काय केलंय आज भाजीचं, बघू या’ म्हणणारे सासरे त्यांच्या असिस्टंटला पत्राचा मसुदा सांगताना आई परत न्यूट्रल झाली आणि ऐकू लागली. त्यांची कायद्यातील जाण,ज्ञान, त्यांचं ड्राफ्टिंग पाहून ती थक्कच झाली.मोठी मुलगी अरुणिमा, चहाचा मग तासनतास थंड करुन पिते आणि तो स्वयंपाकघरात आणायला विसरते,कधी कधीतर तो तिच्या कपाटात सापडतो.आईला भयंकर संताप येतो. संध्याकाळी ती जेव्हा चित्रा सिंगची गझल गात होती, तेव्हा तिच्या सुरातली आर्तता मनाला भिडून गेली.नवरोबा सलील त्याला ओपन डोअर सिन्ड्रोमच आहे.सगळ्या खोल्यांचे, कपाटाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवतो.याचं काय करावं?नुसती चिडचिड होते.त्याची ऑनलाईन काॅन्फरन्स सुरु होती.युरोपियन स्टुडंट्ससमोर बिहेवियरल थेरपीचं त्याचं विश्लेषण कमाल होतं.पुन्हा ती न्यूट्रल झाली. तिला ओपन डोअर सिन्ड्रोमचं हसू आलं.तिने आणलेल्या भाजीला नावं ठेवणा-या सासूबाईंचं कुठली भाजी आणल्यावर समाधान होईल, या विचाराने ती वैतागून जायची. पण गीतेचा भावार्थ समजावताना तिला त्या गार्गी,मैत्रेयीच वाटायच्या.आज हा नवाच खेळ ती आपल्या मनाशी खेळली.

आपल्या माणसांबरोबर आपण दिवस रात्र, चोवीस तास असतो,मित्रमैत्रिणींबरोबर ,नातेवाईकांबरोबर कधीकधी वेळ घालवतो.लक्ष बहुतेकवेळा निगेटिव्ह गोष्टी दोष,वीक एरियांजवर चटकन जातं.’घर की मुर्गी दाल बराबर ‘ या उक्ती प्रमाणे आपण घरच्यांबद्दल विचार करताना प्रेज्युडाईज अर्थात पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहत असतो.ते अगदी ऑबव्हियस आहे. कारण तुम्हाला रोज त्यांच्याशी डील करावं लागतं.पण न्यूट्रल होऊन या नात्यांकडे पाहिलं, तर नवं असं काही सापडायला लागतं.प्रत्येकात त्याचं स्वतःचं असं काही युनिक असतंच. फक्त ते आपल्याला शोधता यायला हवं.ही विजन जाणीवपूर्वक तयार करावी लागते.एखादी व्यक्ती आपल्याला खटकते, ते खरं म्हणजे त्या व्यक्तीबद्दलचा राग नसतो, तर त्या व्यक्तीच्या सवयी,वृत्ती,स्वभावाचा तो राग येत असतो. पण हे आपल्या लक्षात येत नाही.म्हणूनच न्यूट्रल होऊन माणसांकडे अधूनमधून पाहिलं, की ‘दूध का दूध और पानी का पानी ‘ दिसायला लागतं.हे परस्पेक्टिव्ह एक आणखी गोष्ट तयार करते ती म्हणजे स्वतःकडे पाहण्याचा न्यूट्रल दृष्टिकोन.तुम्हाला वाटतं की मी सर्वगुणसंपन्न. माझं कधी काही चुकतच नाही.पण हा न्यूट्रल गेम स्वतःशी खेळताना आपले आपणच सापडायला लागतो.ते ॲक्सेप्ट करणं, स्वतःकडे असं पाहता येणं हे जमायला हवं.स्वतःच्या गुणदोषांचा असा त्रयस्थ म्हणून विचार करता येणं हे विवेकाचं लक्षण आहे.

नाती गुंतागुंतीची असतात.ती सांभाळणं तारेवरची कसरत असते.अशावेळेस न्यूट्रल गेम  खेळलो म्हणजेच त्रयस्थ होऊन व्यक्ती, वस्तू,नाती,

परिस्थिती,प्रसंग यांच्याकडे पाहणं यातून आपलीच माणसं आपल्याला कळायला लागतात.शिवाय आपला दृष्टिकोनही बदलायला लागतो.आपण मॅच्युअर्ड होतो.माणूूस म्हणून समृद्ध होण्याची प्रक्रिया यातूनच पुढे जात असते.पॅाझिटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह थिंकिंग यासारखाच तिसरा प्रकार आहे न्यूट्रल थिंकिंग. जे असतं जजमेंटल फ्री, रॅशनल, चांगल्या गोष्टींवर फोकस करायला शिकवणारं .कोच हे प्लेअर्सकरता, बिझिनेसमन हे एम्प्लॉईजकरता वापरतात आणि त्यातून जर त्यांचा परफॅार्मन्स सुधारत असेल तर आपण हा प्रयत्न जरूर करुन पहायला मुळीच हरकत नाही.

I think one can enjoy this Neutral Thinking Game and understand other persons better!

लेखिका:डॉ. स्वाती गानू

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक सुंदर अनुभव – मनातल्या घरात –  श्री विकास शहा ☆ प्रस्तुती – सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

🔆 विविधा 🔆

☆ एक सुंदर अनुभव – मनातल्या घरात –  श्री विकास शहा ☆ प्रस्तुती – सौ. जयश्री पाटील ☆

मनातल्या घरात (Self – Introspection)

आपण मनातल्या घराला कधी भेट दिली आहे कां ??? 

एका ठिकाणी बसून करमत नाही. मग उगाच आपण, इथे तिथे फिरायला जातोच की !!! मग ती  पर्यटन स्थळ असतील किंवा कोणाच्या तरी घरी !!! याच्या त्याच्या घरी, या ना त्या कारणाने आपण पाहुणा म्हणून जातोच. मग मी ठरवले, कां नाही आपण आपल्याच मनाच्या घराचा पाहुणचार घेऊन यावा ???

हो, हो, चक्क स्वतःच्याच मनाच्या घरचा पाहुणचार !!! आपणच आपल्या मनाच्या  घराला भेट द्यावी म्हंटले, बघावे तरी काय आणि कसं ठेवलंय हे मनाचे घर !!! कोण, कोण रहातात तिथे ???  कसे स्वागत होत ते ???

ठरल्याप्रमाणे मनाच्या घराच्या दारापर्यंत पोहचलो. अगदी छोटेसे होते, पण छान होते !!! आत काय असेल, या उत्सुकतेने दार वाजवले, तर आतून आवाज आला, “कोण आहे ???? काय पाहिजे ????” असा प्रश्न आतून विचारला जाईल याची कल्पना नव्हती पण खरंच आपण कोण आहोत, हे त्याला सांगितल्या शिवाय तो आपल्याला आत तरी कसा घेणार ???

मी ही सांगितले, “मी *स्व  आहे रे !!! ज्याचे तू कध्धी ऐकत नाही. ज्याच्याशी तू सतत वाद घालत असतोस, ज्याच्याशी तू दिवस रात्र गप्पा मारत असतो तो मी !!!”

आतून आवाज आला, ” बरं…. बरं…उघडतो दार !!!” दार उघडल्या नंतर आत पाहिले, तर गडद अंधार होता. म्हणून मी विचारले, ” कां रे एवढा अंधार ???” तेव्हा तो म्हणाला, ” तुमच्याच कृपेने !!! मी म्हंटले, ” माझ्या कृपेने ??? तर तो म्हणाला, “हो !!! तुझ्याच कृपेने !!! कारण इथे उजेड तेव्हा पडेल, जेव्हा तू सकारात्मक विचारांचे दिवे लावशील.”

मी ही जरा ऐटीतच म्हणालो, “ठीक आहे… ठीक आहे !!! लावतो दिवे” म्हणत, पुढे सरकलो. थोडं पुढे चाचपडत गेलो तर काय !!! तिथं असंख्य खोल्या होत्या. अगदी कोंदट वातावरण होते. मी त्याला पुन्हा विचारले, “काय रे, त्या खोल्यात काय दडलंय ???”

तो पुन्हा म्हणाला, ” बघ की उघडून एक एक खोली, कळेल काय आहे ते.” मग मी हळूच एका खोलीचे दार उघडले.  आणि…फडफड करत अनेक रागीट चेहरे समोर आले. जणू काही ते मला गिळंकृतच करणार आहेत. मी पटकन दार लावले. तेव्हा तो म्हणाला, ” काय झालं ??? दार कां लावले ???” मी म्हंटले, ” कसले भयानक होते रे ते !!! ” तर तो पुन्हा हसत म्हणाला, ” तुम्हीच गोळा केले आहेत ते !!! तुम्ही ज्यांचा ज्यांचा तिरस्कार करता, ज्यांचा राग करता, त्यांची संख्या किती आहे ते कळलं कां ??? तुम्हीच केलेली मेगा भरती आहे ती !!!”

हुश्श…अरे बापरे !!! पुढचं दार उघडायचे धाडसच होईना, पण म्हंटले आता आलोच आहे तर उघडावे. तिथे ज्या काही घटना पहिल्या त्याने तर घामच फुटला. तो पुन्हा मिस्कीलपणे म्हणाला, ” काय, काय झालं…??? मी म्हंटले, “अरे बाबा, हे काय ??? तो पुन्हा म्हणाला, ” तू तुझ्या आयुष्यात सतत दुःखद आठवणीच गोळा करीत गेलास, त्याला मी तरी काय करणार ??? आता तर साठवून ठेवायला या खोल्यासुद्धा अपुऱ्या पडत आहेत.”

तिथं अशा किती तरी खोल्या होत्या, ज्यांना उघडायच धाडस माझं झालं नाही. मग त्याने त्या उघडून दाखवल्या, ही भीतीची खोली, ही द्वेष, ईर्षा, वाईट विचारांची, मतभेदांची, गैरसमजांची खोली अशा अनेक खोल्या पाहिल्या, सर्वच्या सर्व अंगावर येत होते.

आता मात्र माझं डोकं गरगरायला लागले, अस्वस्थता वाढली होती. किती भयावह होत ते सर्व !!! त्यामुळे पुढं काय आहे, हे बघण्याची इच्छाच होत नव्हती. हे सारं भयाण बघून अंगाला काटा आला होता. स्वतःचाच तिरस्कार वाटत होता.

मी त्याला म्हंटले, “मी जातो आता. मला काही बघायचं नाही आता.” तो म्हणाला, ” थोडं…थांब, आलाच आहेस तर हे पण बघून जा.”

थोडी हिंमत दाखवत आम्ही पुढच्या दिशेने निघालो….तिथं संपूर्ण जाळ लागलेला होता…मग थोडं पुढे गेलो आणि पाहिलं तर काय….आहा…..हा हा…स्वर्ग सुख मिळावं असं वातावरण होत, तिथं प्रेम होतं, तिथं माया होती, तिथं आनंद होता, उत्साह होता, नवीन नवीन कल्पनांचा बाजार होता. सुख, समाधान शांती ने भरलेले, अगदी नयन दिपून टाकेल असं सर्व काही होते.

मी म्हंटले, “काय रे हे इतकं सुंदर आहे, हे तू मला आधी कां नाही दाखवलं ???” तर तो मिस्कील पणे हसत म्हणाला, ” अहो, तुमचं मनातलं खरं घर तर हेच आहे.” मग मी म्हणालो, ” जे आधी पाहिलं, ते काय होतं ???” तो पुन्हा हसत म्हणाला, ” त्या…त्या…तुम्ही अतिक्रमण करत वाढविलेल्या खोल्या आहेत. तुम्ही केलेला राग, इर्षा, द्वेष, भीती, नावडती माणसं, नावडत्या आठवणी याची जी साठवणूक केली, ती या सुंदर घराच्या प्रवेशद्वारा पुढे पहारेकरी बनून बसले आहेत, जे तुम्हाला इथं पर्यंत येण्यास अडवत आहेत.”

आम्ही वर्तमान काळात सजग नसतो, त्या वेळी आमच्या स्वभावाची नशा असते, आणि नंतर कळते तेंव्हा पञ्चाताप झालेला असतो…

क्षणभर विचार केला, खरंच की आपणच आपल्या सुख, आनंदाच्या कडे जाणारा रस्ता, या नकारात्मक गोष्टींची साठवणूक करून अडवलेला आहे. मनाच्या घराचा पसारा आवरायला वेळ लागणार होता पण ठरवलं की, आता या अडथळा बनून बसलेल्या खोल्यांची साफसफाई करायची. तिथं सकारात्मक विचारांचे दिवे लावायचे आणि सुख समाधान, शांती कडे जाणारा मार्ग सोपा करायचा.

बरं झालं. आज मनाच्या घरात फिरून आलो, नाहीतर आपल्या मनावर नकारात्मक विचारांचे अतिक्रमण झालेले आहे हे कळलंच नसतं.

मनाच्या घरचा पाहुणचार खूप काही शिकवून गेला. आपल्या मनाचं घर, दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही. स्वतःच्या घराची साफसफाई स्वतःच करायची.

साफसफाई करायची म्हणजे काय तर स्व दर्शन म्हणजे ध्यानावर यावे लागेल त्यासाठी ध्यान करावे लागेल…

मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो.. तुम्ही तुमच्या मनाच्या घराला कधी भेट देत आहात ???

आपण सुरुवात छान केलेली आहे..

BE POSITIVE… BE HAPPY

सकारात्मक रहा.. आनंदी रहा..

पत्रकार श्री विकास शहा, तालुका प्रतिनिधी दैनिक लोकमत , शिराळा ( सांगली )

प्रस्तुती – सौ.जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्रत्यक्ष अनुभवलेले एक थरारनाट्य” ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ “प्रत्यक्ष अनुभवलेले एक थरारनाट्य” ☆  सुश्री सुलू साबणे जोशी

आपल्या घराघरात आणि मनामनात चंदनाला एक अढळपद आहे. आमच्या गृहसंकुलात आपोआप उगवून आलेली चंदनाची झाडे आहेत. या भागात पक्षी खूप आहेत, बहुधा त्यांच्या शिटातून हे बीजारोपण झाले असावे.

चंदन हे नेहमी मोठ्या वृक्षांच्या जवळच जोमाने वाढते, कारण त्याचे अंशिक परावलंबित्व ! हा अर्धपरोपजीवी वृक्ष समजला जातो, कारण हा वृक्ष स्वतःचे अन्न पूर्णपणे तयार करू शकत नाही. तेव्हा तो दुस-या वनस्पतींच्या मुळांतून आपल्या मुळांच्या सहाय्याने अन्नशोषण करतो. (उदा. त्याला डाळिंब, कढीलिंब, काळा कुडा, करंज, अशा काही यजमानवृक्षांची सोबत मानवते.)                                                                                                             

गेली वीस वर्षे अशा दोन चंदनवृक्षांचा सहवास आम्हाला लाभला. हे वृक्ष सदैव मण्याएवढ्या आकाराच्या फुला-फळांनी बहरलेले असतात. त्यावर सदैव मधमाशा असतात. ही फळे कोकीळ-कोकीळा, बुलबुल, फुलचुके, खारूताई आवडीने खातात. 

काल ११ ऑक्टोबर २०२३/ बुधवार, रात्री बाराचा सुमार – इथे प्रगाढ शांतता होती. एकाएकी खालून आलेल्या एका विचित्र कर्णकटू कर्कश्श आवाजाने एकदम धडकीच भरली. या बाजूला अधूनमधून गाड्यांचे अपघात होतात. अति वेगात येणारी दुचाकी घसरून घसटत जावी, असे काहीसे वाटले. भराभरा गच्चीचे दार उघडून खाली डोकावले आणि पायाखालची जमीनच सरकली. आवाज रस्त्यावरून नव्हे तर चक्क संकुलाच्या आतूनच येत होता – यांत्रिक करवतीने एका चंदनवृक्षाचा बुंधा कापण्याचे काम चार माणसे मन लावून करत होती. मी आत येऊन खिडकीकडे धाव घेतली आणि सुरक्षारक्षकाला हाका मारल्या, ‘चोर, चोर’ म्हणून पुकारा केला. तोवर घरातील सर्व मंडळी आणि संकुलातीलही सर्वजण या विचित्र आवाजाने जागे होऊन या आरड्याओरड्यात सामील झाले. भराभर ब-याच मंडळींनी खाली धाव घेतली. पण, त्यांनी इमारतीचे प्रवेशद्वार उघडून बाहेर येऊ नये म्हणून पाऊस पडावा तसा दगडगोट्यांचा मारा करायला सुरुवात केली. दहा मिनिटात झाडाचा बुंधा कापून खांद्यावर टाकून चौघेही शांतपणे चालत मागच्या बाजूला असलेल्या टेकडीवरून निघून गेले.

तशातही संकुलातील काही धाडसी तरूणांनी बाहेर धाव घेतली. टेकडीवरून दगडांचा मारा चालूच होता. तिथे चोरांचे चार-पाच साथीदार दडलेले असावेत. संकुलातील पाच-सहाजण दगडांच्या मा-याने रक्तबंबाळ झाले. सुरक्षारक्षकाने हाकेला ‘ओ ‘ का दिली नाही, तर त्याच्या गळ्याला सुरा लावून त्याला दोघा चोरांनी दाबून धरले होते आणि मारहाण करून जखमी केले होते. काही सदस्यांनी गाड्या काढून या सर्वांना तातडीने दवाखान्यात नेले. सुरक्षारक्षक आणि आणखी एकाला टाके घालावे लागले.   याचा अर्थ – ती  ८-१० चोरांची टोळी होती. त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे संकुलाची आणि झाडाच्या जागेची माहिती काढलेली होती.                                                    

हे एक मोठे बंगला-संकुल आहे. त्यात टेकडीच्या पायथ्याला आमच्यासारखी सदनिकांची संकुले आहेत. बंगलेवाल्यांनी टेकडीवर त्यांच्या बाजूपुरती आठ फूट उंचीची संरक्षक-भिंत घातली आहे. पण आम्हा सदनिकाधारकांच्या बाजूला फक्त दीड-दोन फूट उंचीची भिंत आहे, जी आरामात ढांग टाकून ओलांडता येईल. त्यावर काटेरी कुंपण आहे. पण ते कापून ये-जा करता येईल, अशी वाट चोरांनी काढली आणि मांजरपावलांनी संकुलात येऊन झाडापर्यंत पोहोचले. टेकडीवर चार चोर दगडगोटे, गलोल घेऊन दबून बसले होते, दोन चोरांनी सुरक्षारक्षकाची गठडी वळली होती आणि चारजण झाड कापून आरामात चालत निघून गेले. ८-१० जण एकूण नक्कीच होते.  

हा रस्ता उताराचा आहे, आणि उताराच्या टोकाला एका विद्यमान माननीय मंत्रीमहोदयांचा बंगला आहे. तिथे एक छोटीशी पोलिसांची छावणीच आहे. हे थरारनाट्य अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात संपले. आमचा हाकांचा सपाटा ऐकून पोलीस आले, तोवर चोरांचा कारभार संपला होता. मग येथील विभागीय पोलीस येऊन पहाणी करून त्यांनी तक्रार नोंदवून घेतली.  

या विषयाने आणि चर्चेने रात्री किती तरी वेळ झोप येईना. मृत्युमुखी पडलेल्या चंदनवृक्षाने जीवाला चांगलाच चटका लावला. तेव्हा जाणीव झाली की, हा परिसर आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि कुणीतरी विश्वासघाताने त्यातला एक भाग कापून काढला आहे.

थोर शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बसूंनी सप्रमाण सिद्ध केले होते की, वृक्षसंपदा सजीव आहे आणि  भावभावनांनी युक्त आहे. त्या वृक्षाच्या आणि अवतीभोवतीच्या त्याच्या सहचरांच्या मूक आक्रंदनाने मन विषण्ण होऊन गेले.  कालची काळरात्र संपली.  सकाळ झाली. नेहमीसारखे पक्ष्यांचे कलरव ऐकू येईनात. गच्चीकडे धाव घेतली – एक वेडी आशा की कालची घटना हे स्वप्न असावे. पण कुठले काय? त्या सुंदर हिरव्या विणीला भले मोठे भगदाड पडले होते आणि त्यातून भक्क आभाळ भगभगीत नजर वटारून थेट समोर ठाकले होते….

© सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पाळीव प्राण्यांना मिळते साप्ताहिक सुट्टी ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

पाळीव प्राण्यांना मिळते साप्ताहिक सुट्टी ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

आजही अशी अनेक क्षेत्रं आहेत, जिथे कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळत नाही. घरातले मदतनीस, सहाय्यक यांनाही आठवड्यातून एक दिवस सुट्टीची आवश्यकता असते, हे मान्य करणारे तर खूपच कमी आहेत.

या पार्श्वभूमीवर भारतातल्या झारखंड राज्यातल्या लाहेतर या गावातला एक प्रघात स्तुत्य आणि विचारप्रवृत्त करणारा आहे. हे गाव म्हणजे खरं तर छोटं खेडं. या गावात बहुतांश शेतकरी. त्यामुळे शेती आणि पाळीव प्राणी, हेच नागरिकांचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत समजले जातात. म्हणूनच या स्त्रोतांवर आपण मदतीसाठी अवलंबून आहोत, त्यांचा विचार माणुसकीच्या दृष्टिकोणातून करणं गरजेचं आहे, असे संस्कार गावकर्‍यांवर पिढीजात झालेले आहेत.

शंभर वर्षापूर्वी या गावात एका बैलाचा अति कष्टाने थकून मृत्यू झाला. त्याची बोच पिढ्यान् पिढ्या टिकून आहे. म्हणूनच प्राण्यांना विश्रांती मिळावी, त्यांचं आरोग्य उत्तम  राहावं, यासाठी आठवड्यातून एक दिवस पाळीव प्राण्यांना संपूर्ण आराम करू द्यायचा, असा नियम गावकर्‍यांनी केला. तेव्हापासून आजपर्यंत या नियमाचं पालन केलं जातय.

आठवडाभर काम केल्यानंतर एक दिवस सुट्टी मिळाली, तर माणूस जसा ताजातवाना होऊन नव्या ऊर्जेने कामाला लागतो, तसंच प्राण्यांच्या बाबतीतही घडत असल्याचं गावकरी सांगतात. या गावाच्या आजूबाजूच्या लोकांनाही ही संकल्पना आवडली आणि त्यांनी ती उचलून धरली. त्यामुळे या जिल्ह्यातील अनेक गावांमधल्या पाळीव प्राण्यांना आठवड्यातून एकदा हक्काची सुट्टी मिळते. कृषिप्रधान असणार्‍या आणि भूतदयेचा अंगीकार करणार्‍या आपल्या देशात, पुढील काळात आशा गावांची संख्या वाढणं आवश्यक आहे.

माहेर – सप्टेंबर २०२३ वरून (www.menakabooks.com)

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समज – गैरसमज… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

समज  गैरसमज… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम 

तहानभुकेने अगदी व्याकुळ,घामाने चिंब झालेले तुम्ही  बऱ्यापैकी सावली असलेलं  झाड शोधून आसपास कुठे पाणी मिळतंय का,हे बघताय तेवढ्यात समोरच्या बिल्डिंगमधल्या खिडकीत उभ्या असलेल्या व्यक्तीकडे तुमचं लक्ष जातं आणि ती व्यक्ती तुम्हाला ‘पाणी हवंय का?’ विचारते.

त्या क्षणी तुम्हाला काय वाटेल ? त्या व्यक्तीबद्दल तुमचं मत काय होईल ?

ती व्यक्ती मग  खिडकी बंद करून तुम्हाला बिल्डिंगच्या खाली यायचा इशारा करते, तुम्ही लगबगीने तिथे जाता पण नंतरची १५ मिनिटं तिथे कोणीही येत नाही !

आता तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल  काय वाटेल?

हे तुमचं दुसरं मत असणार आहे.

थोड्या वेळाने ती व्यक्ती तिथे येते आणि म्हणते, “सॉरी!मला जरा उशीर झाला; पण तुमची अवस्था बघून, मी तुम्हाला नुसत्याच  पाण्याऐवजी लिंबू पाणी आणलं आहे !”

आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल मत काय आहे ?

तुम्ही एक घोट सरबत घेता आणि तुमच्या लक्षात येतं की अरे, ह्यात साखर अजिबातच नाहीये !

आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत होईल?

तुमचा आंबट झालेला चेहरा पाहून ती व्यक्ती खिशातून हळूच एक साखरेचा छोटा पाऊच काढते आणि म्हणते

“तुम्हाला चालत असेल, नसेल आणि किती कमी- जास्त गोड आवडत असेल हा विचार करून मी मुद्दामच आधी साखर घातली नाहीये.”

आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत झालं आहे ?

मग विचार करा :अवघ्या १५ -२० मिनिटात तुम्हाला तुमची मतं , तुमचे आडाखे भरभर बदलावे लागतायत. अगदीच सामान्यातल्या सामान्य परिस्थितीत क्षणात आपले विचार, आपली मतं तद्दन चुकीची ठरू शकतात, तर मग कोणाबद्दल फारशी काहीच माहिती नसताना, ती व्यक्ती पुढे कशी वागणार आहे, हे माहीत नसताना, केवळ वरवर पाहून, त्याबद्दल चुकीची समजूत करून घेणं योग्य आहे का ? जर नाही, तर एखाद्या बद्दल गैरसमज करून घेण्यापेक्षा त्या व्यक्तीला समजून घेणं योग्य नाही का ?

असं आहे की जोपर्यंत कोणी तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागतंय तोपर्यंतच ते चांगले असतात, नाहीतर वाईट ? गैरसमज फार वाईट परिणाम करणारे ठरतात. तेव्हा एकमेकांना समजून घ्या.म्हणजे जीवनात समस्या निर्माण होणार नाहीत.

मत बनवताना घाई करु नये.

लेखक – अज्ञात 

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?... स्व. वि. दा. सावरकर ☆

पौर्वात्य खंड अवघें जित यत्प्रतापें

दारिद्रय आणि भय कांपति ज्या प्रतापें

नाशासि पारसिक तेहि पलांत गेले

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

 

तें जिंकी पारसिक, दे जगता दरातें

जें दिग्जयी बल तुझेंहि शिकंदरा, तें

ध्वंसीत रोम तव राजपुरीं रिघालें

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

 

साम्राज्य विस्तृत अनंत असेंचि साचें

त्याही महाप्रथित रोमपत्तनाचें

हूणें हणोनि घण चूर्णविचूर्ण केलें

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

 

हा उन्नती अवनतीस समुद्र जातो

भास्वान् रवीहि उदयास्त अखंड घेतो

उत्कर्ष आणि अपकर्ष समान ठेले

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

 

जे मत्त फारचि बलान्वित गर्ववाही

उद्विग्न- मानस उदासहि जे तयांहीं

हें पाहिजे स्वमनिं संतत चिंतियेलें

विश्वात आजवरि शाश्वत काय झालें?

     कवी – वि दा सावरकर

रसग्रहण

ही कविता ‘वसंततिलका’ या अक्षरगणवृत्ते बांधलेली आहे. एकवीस मात्रा व १४ अक्षरांच्या ओळी असणारे हे वृत्त वीर रस व शौर्य भावनेला पोषक आहे. प्रत्येक ओळीच्या शेवटी दोन गुरू (प्रत्येकी दोन मात्रांची दोन अक्षरे) येत असल्यामुळे कोणताही विचार, वाचक अथवा श्रोत्यांवर ठसविण्यासाठी ही वृत्तरचना उपयुक्त आहे. सावरकरांची ‘माझे मृत्युपत्र’ ही कवितादेखिल याच वृत्तात निबद्ध आहे. जाता जाता सावरकर निर्मित ‘वैनायक’ वृत्ताचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. त्यांनी अंदमानात असतांना रचलेल्या ‘निद्रे’, ‘सायंघंटा’, ‘मूर्ती दुजी ती’, ‘मरणोन्मुख शय्येवर’ यासारख्या कांही कविता तसेच ‘कमला’ व ‘गोमंतक’ (उत्तरार्ध) ही दीर्घ काव्ये त्यांनी स्वनिर्मित ‘वैनायक’ वृत्तांतच रचलेली आहेत. एखाद्याच्या प्रतिभेचा संचार किती विविध प्रांतात असावा! अलौकिक!!

प्रस्तुत कविता सावरकरांनी, पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना, १९०२ साली ‘आर्यन विकली’ साठी रचली. कालांतराने ती ‘काळ’ मध्येही प्रसिद्ध झाली. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं १९ वर्षांचं! खरं तर हे वय, निसर्गात भरून राहिलेल्या सौंदर्याचं वर्णन करणार्‍या कविता किंवा शृंगाररसाने युक्त प्रेमकविता करण्याचं! पण सावरकरांनी मातृभूमीलाच मन वाहिलेलं असल्यामुळे, तिच्या स्वातंत्र्या शिवाय दुसरा कोणताच विचार त्यांच्या मनात येत नसावा. प्रखर बुद्धीमत्ता घेऊन जन्माला आलेल्या या तरूणाने, आपलं तारुण्य स्वातंत्र्य देवतेच्या चरणी अर्पण केलं होतं. अफाट वाचन, चिंतन, मनन यामुळे त्यांच्या या बुद्धीमत्तेला तेज धार आलेली होती. त्यामुळेच कोवळ्या तरूण वयात ते शाश्वत/ अशाश्वत यासारख्या विषयावर भाष्य करू शकतात. ते म्हणतात या विश्वात कोणतीच गोष्ट शाश्वत नाही. मग ती चांगली असो वा वाईट, हवीशी असो वा नकोशी! याच्या पुष्ट्यर्थ ते निरनिराळी उदाहरणे देतात.

आपल्या पराक्रमाने ज्यांनी अवघ्या पौर्वात्य खंडावर राज्य केलं, ज्यांच्या राज्यात सुखशांती व सुबत्ता नांदत असे अशा पारसिक म्हणजेच पारशांचं साम्राज्य सिंकंदराने नष्ट केले. म्हणजेच त्यांना जिंकून, त्यांचं शिरकाण करून तसेच धर्मांतर करायला लावून आपलं मुस्लीम साम्राज्य स्थापन केलं. अशा जगज्जेत्या सिकंदराचं जे सत्ताकेंद्र होतं, त्या ग्रीसवर कालांतराने रोमन लोकांनी कब्जा केला. परंतु पुढे जाऊन हूणांच्या रानटी टोळ्यांनी या अजिंक्य समजल्या जाणाऱ्या रोमन साम्राज्याचे तुकडे तुकडे केले. अशा प्रकारे उन्नती पाठोपाठ अवनती येतेच. जे जे म्हणून निर्माण होते, ते ते कालांतराने नष्ट होतेच. जे उदयाला येते त्याचा अस्त होणार हे ठरलेलेच आहे. हे ठसविण्यासाठी ऐतिहासिक दाखल्यांपाठोपाठ कवी, समुद्राची भरती ओहोटी, सूर्याचा उदयास्त असे निसर्गातले परिचित दाखले देतात आणि विचारतात, या विश्वात काय चिरंतन राहिलं आहे? ही गोष्ट बलवान, गर्विष्ठ, उन्मत्त यांच्याप्रमाणेच उदास, उद्विग्न असणाऱ्यांनी देखिल लक्षात ठेवली पाहिजे. कोणतीच स्थिती वा परिस्थिती, मग ती ऐहिक असो वा भावनिक, कायम रहात नाही. ती बदलतेच.

या कवितेतून सर्व भारतीयांना कवी विश्वास देऊ इच्छित असावेत की, भारतमातेची ही दुःस्थिती बदलणार व स्वातंत्र्याचा सूर्योदय होणार हे निश्चित!

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ह्या वयातले चंद्र (मुखी) अभियान…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “त्या वयातले चंद्र(मुखी) अभियान…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

कसं आहे नं, आकाशातला चंद्र हा…. तो चंद्र असतो…….. पण भूतलावर आपल्याला आवडणारा चंद्र मात्र ती…… असते. त्याला चंद्रमूखी असंही म्हणतो……

भारतान आपल चंद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरवल आणि इतिहास रचला. आणि यामुळेच याच्याही आधीचा आमच्या त्या वयातल्या अनेक (फसलेल्या) चंद्र(मूखी) अभियानांचा इतिहास आठवला. हा इतिहास माझ्यासह अनेकांचा आणि आपला असू शकतो.

 म्हणूनच आमच्या अभियानाचा इतिहास असं म्हटलं. नाहीतर माझा इतिहास म्हटलं असतं.

चंद्रावर यान पाठवण्यासाठी इतर देशांनी जेवढे प्रयत्न केले असतील तितकेच, कदाचित त्यापेक्षा थोडे जास्तच प्रयत्न आम्ही आमच्या चंद्र अभियानासाठी केले असतील.

यात काही जणांच हे अभियान अगदी पहिल्या किंवा कमी प्रयत्नात यशस्वी झाल. काहींच्या अभियानाला (चंद्र) ग्रहण लागल. तर काहींना त्याच चंद्रमूखीच्या मुलांनी मामा…. मामा…. म्हणत त्यांच्या मनापासून केलेल्या अभियानाचा आणि त्यांचा अक्षरशः मामा केला.

भारताने ज्या चंद्रावर यान पाठवल त्याच चंद्रावर इतर देशांनी देखील आपल्या आधी आपल यान पाठवल आहे. काही पाठविण्याच्या तयारीत असतील. पण कोणीही हा चंद्र माझा….. असा हक्क सांगायचा प्रयत्न केला नाही. पण आमच्या या चंद्रमूखी अभियानात मात्र तो चंद्र (मिळाला तर‌‌……. ) माझाच राहिल असा हट्ट होता. कारण त्याच चंद्रासाठी इतरांच्या देखील मोहीम सुरू आहेत याची जाणीवच नाहीतर पक्की खात्री होती. आम्ही सोडून दुसऱ्यांच हे अभियान यशस्वी झाल तर मात्र आमचं ते अभियान तिथेच आणि लगेच थांबवाव लागत होत. एक मात्र होत………..

आकाशातला चंद्र एकच असल्याने आणि अजूनतरी कोणाचा त्यावर हक्क नसल्याने, देशांनी आखलेली चंद्र मोहीम सफल झाली नाही तरी दुसरी, तिसरी, किंवा पुढची प्रत्येक मोहीम ही त्याच चंद्रासाठी असते. आमच मात्र तस नव्हत. मोहीम अपयशी झाली तरीही आमचे पुढच्या मोहिमेसाठी अथक प्रयत्न सुरू असायचेच.. फक्त…….. या मोहिमेसाठी आम्ही चंद्रच बदलत होतो. कारण…. कारण दुसऱ्या चंद्राचे पर्याय होते.

सर सलामत तो पगडी पचास….. याच धर्तीवर “एक चंद्र मिळाला नाही तरी, होऊ नको हताश….. ” असा आशादायी कार्यक्रम होता.

कोणत्याही अभियानासाठी गरज असते ती मदतीची, आणि तिथल्या एकूण परिस्थितीच्या अभ्यासाची. मित्रांकडून मिळणारी मदत कमी नव्हती. तसच या बाबतीत आमचाही अभ्यास काही कमी नव्हता. किंबहुना याच अभ्यासाचा ध्यास होता.

या अभ्यासात आमच्या या चंद्राची भ्रमणवेळ, भ्रमणकालावधी, भ्रमण कक्षा यांची काटेकोर माहिती घेतली जात होती. तसेच त्या चंद्राच्या आजुबाजुला असणारी शक्ती स्थळ, परिणाम करणारे घटक (नातेवाईक, भाऊ, वडील), वातावरण यांचा योग्य तो अभ्यास झालेला असायचा. या त्याच्या भ्रमण काळात त्याच्या भ्रमण कक्षेत आमच यान (मित्राची काही वेळासाठी घेतलेली दुचाकी) साॅफ्ट लॅंडींग करु शकेल का? आणि चंद्राच्या जास्तीत जास्त जवळ जाता येइल का? याचाही अंदाज घेतला जात होता. यात बऱ्याचदा एक तर आमच यान वेळेच्या अगोदरच त्या कक्षेत प्रवेश करायच, आणि साॅफ्ट लॅंडींगच्या सुरक्षित जागेच्या शोधातच योग्य वेळ टळून गेलेली असायची. चंद्र आमच्या कक्षेच्या बाहेर गेलेला असायचा.

काही चंद्रांना याची जाणीव झाली असावी. कारण अचानक त्यांची भ्रमणवेळ, भ्रमण कक्षा, भ्रमण काळ बदलायचा. मग त्यांच्या भ्रमण मार्गाचा शोध घेतांना आमच्या यानातल इंधन (पेट्रोल) किंवा ठरलेली वेळ संपण्याच्या भितीने कक्षा सोडून परत फिराव लागायच.

चंद्राचे पर्याय असलेतरी काही चंद्र मात्र केव्हा, कुठे, आणि कितीवेळ दिसेल हे सांगता येत नव्हत. पण तो दिसलाच तर.. त्याची माहिती मात्र एकमेका साहाय्य करू…… या तत्वावर लगेच मिळत होती. किंवा दिली जात होती. अगदी त्या वेळी मोबाईल नसतांना सुध्दा. यात आपापसात स्पर्धा नव्हती.

अशा या चंद्र मोहिमेसाठी काहीवेळा गरज नसताना बाजारात गेलो. न आवडणाऱ्या कार्यक्रमांना सुध्दा हसत मुखाने हजेरी लावली. पण वेळ वाया गेल्याचच लक्षात आल. कारण नेमकं कोणीतरी मधे असायचं आणि चंद्र झाकला जायचा. आणि संपर्क करण्यात अडचण व्हायची. यासाठी गरज नसतांना लायब्ररी किंवा काॅलेजच्या रीडिंग रुम मध्ये मुक्काम ठोकला. आर्टस्, सायन्स, काॅमर्स अशा सगळ्या विभागातून फिरलो…….

आशी मोहीम काही काळ सुरुच होती. (आता ही मोहीम केव्हा थांबवली हे मात्र विचारु नका. पण ती केव्हाच आणि कायमची थांबली आहे हे खरं आहे. ) त्यातलेच काही चंद्र आता मात्र चंद्रकोर न राहता पौर्णिमेच्या चंद्रासारखे गोल गोल झाले आहेत. एखाद छान शिल्प किंवा चित्र ज्या बारकाईने पहाव तस ज्यांना पूर्वी बघत होतो तेच चंद्र आता पुस्तकाची पानं चाळल्यासारख (दिसले तरच) वर वर चाळले जातात. आता ते डोळ्यांना दिसले नाही तरी फरक पडत नाही. काही तर अमावस्येच्या चंद्रासारखे लुप्त झाले आहेत. पण त्यासाठी कोणतही अभियान नाही.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares