मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जीभ…” – लेखक : श्री चंद्रकांत जोशी ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “जीभ…” – लेखक : श्री चंद्रकांत जोशी काका ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

जेणे जिंकीली रसना ।

तृप्त जयाची वासना ।

जयास नाही कामना ।

तो सत्वगुण ।

…समर्थ रामदास

ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ ! रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय ! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्विकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची ! एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचे सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे जीभ.

एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना जिंकता येणे सहज शक्य आहे, असा एकमेवाद्वितीय अवयव म्हणजे जीभ.

सर्वात जास्त रक्तपुरवठा असणारा हा रसमय अवयव जीभ ! तोंडात आलेला घास घोळवत घोळवत, इकडे तिकडे फिरवत फिरवत, बत्तीशीच्या ताब्यात देत देत, त्यांच्याकडून बारीक पीठ करवून, तयार लगद्याला आतमध्ये ढकलण्याचे महत्त्वाचे काम करणारा अवयव म्हणजे जीभ.

प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेपणाने ओळखता येणारी, ही आगळीवेगळी जीभ. भातातून नजर चुकुवून येणारा दगड शोधून काढतेच, पण डोळ्यांना सहजपणे न दिसणारा, अगदी दाताच्या फटीत लपून बसलेला केसही शोधून काढते. ही सीआयडीची दृष्टी असलेला हा कलंदर अवयव म्हणजे जीभ !

सतत बत्तीस दातांच्या संरक्षणात फिरणारा, पण चुकून मनात आणलं तर चुकीच्या क्षणी, चुकीचा शब्द, चुकीच्या व्यक्तीसमोर बोलून, बत्तीसच्या बत्तीस दात हातात काढून दाखवण्याचे सामर्थ्य असलेला एक चमत्कारिक अवयव म्हणजे जीभ !

बेधुंदपणे अखंड बडबडण्याचे प्रमुख काम करणारा आणि अन्नाला फावल्या वेळात पाठीमागे ढकलण्याचे काम करणारा, पण हे “काम” करताना, कधीही न दिसणारा अवयव म्हणजे जीभ ! दिसतो तो फक्त “आऽऽ कर” असं म्हटल्यावर.थोडाच वेळ दर्शन देणारा अवयव म्हणजे जीभ ! काम करताना मात्र कधीही दिसत नाही, असा “कामानिराळा” राहणारा हा बिलंदर अवयव जीभ !

दाताशी युती करत तथदध, ओठाशी युती करत पफबभ, दंतमूलाशी युती करत चछजझ, टाळूशी युती करत टठडढ, अशा अनेक युत्या, युक्तीने करत ध्वनी निर्मितीत सहाय्य करणारा युतीबाज अवयव म्हणजे जीभ !

पोटात काय चाललंय, याची बित्तंबातमी बाहेर डॉक्टरांना दाखवणारा, तोंडात बसवलेला पण पोटाचा जणु काही सीसीटीव्हीच असलेला एक अवलिया अवयव म्हणजे जीभ!

ओठाबाहेरील जगाला वेडावून दाखवून, आपल्या आतल्या मनाचं, तात्पुरते का होईना, समाधान करून देणारा, हा एक हुश्शार अवयव म्हणजे जीभ !

ज्या एका अवयवाला ताब्यात ठेवले तर शंभर वर्षापर्यंत सहज जगता येईल, अशी दिव्य अनुभूती देणारा एक योगी अवयव म्हणजे जीभ !

आजारी पडेपर्यंत खाणाऱ्यांनी बरे होईपर्यंत उपवास करावा, असा संयम शिकणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ !

तिला जर भगवंताच्या नामात अडकवले तर नराचा नारायण करण्याची ताकद असणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ.

उगाच नाही म्हटलंय, जेणे जिंकिली रसना……

त्याची जिरोनी गेली वासना….

लेखक :श्री.चंद्रकांत जोशी काका, ठाणे

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फटाक्यांमागील भयानक वास्तव लेखक – पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

? विविधा ? 

☆ फटाक्यांमागील भयानक वास्तव लेखक – पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

सातवीत असतांना मी फटाक्याचा उद्योग सुरू केला. एवढासा मुलगा आणि एकदम लिस्ट वगैरे बनवून ‘श्री इंडस्ट्रीज’ या नावाने एकदम प्रोफेशनल पध्दतीने फटाक्यांचा व्यवसाय करतोय म्हटल्यावर ओळखीच्या लोकांनी माझ्याकडून फटाके घेऊन मला या व्यवसायात घट्ट उभं केलं. आज या फेसबूकवरही हे जाणणारे व मला मदत करणारे उपस्थित आहेत. माझा वैयक्तिक पातळीवरील हा पहिला “उद्योग-व्यवसाय”. याच व्यवसायाने मला खरतंर उद्योजक बनवलं.

सन १९९२ ते सन २००४ असं एक तप मी हा व्यवसाय केला. फटाक्याच्या या व्यवसायात पहिल्या वर्षी मला १८९२/- रूपये निव्वळ फायदा व उरलेले फटाके असा भरपूर फायदा झाला होता. सन २००४ साली शेवटच्या वर्षी याच धंद्यात मी ९, २०, ०००/- रूपयांचा निव्वळ नफा कमावला होता. झटपट फायदा मिळवून देणारा हा सिझनल धंदा खुप भारी वाटायचा. घरातील आर्थिक परिस्थिती मजबूत असल्यामुळे या फायद्यातील एकही रूपया कधीही आईबाबांनी घेतला नाही. करतोय धंदा तर करू दे फक्त हा विचार त्यांचा असायचा. त्यामुळे फटाका व्यवसाय याबाबत सर्व अधिकार माझेच होते.

सुरवातीला डंकन रोड (मुंबई), उल्हासनगर व शहापूर (ठाणे जिल्हा) येथील होलसेल दुकानातून फटाके घेता घेता सन २००४ सालापर्यंत मी फटाक्यांची पंढरी असलेल्या शिवकाशीहून (तामिळनाडू राज्य) थेट आयात करू लागलो होतो. वय वर्षे बारा ते वय वर्षे चोवीस या बारा वर्षात या धंद्यात इतकी भलीमोठी प्रगती झाली होती. असे असतानाही मी सन २००४ साली हा धंदा कायमस्वरूपी बंद केला.

गल्ली ते थेट तामिळनाडू राज्य असा प्रवास करत असताना व इतका फायदेशीर धंदा बंद करण्यामागचं कारण काय असावं?? काय घडलं असेल असं?? सर्वांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे.

फटाका इंडस्ट्री – दक्षिणेत गृह उद्योग ते मोठ्या कार्पोरेट लेव्हलवर फटाक्यांचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आपल्याकडे जसे स्त्रिया दोन पैसे मिळवण्यासाठी पापड लाटतात त्याच धर्तीवर तिथे फटाके वळले जातात. आपल्या येथील स्त्रियांच्या सुदैवाने पापड व्यवसायात कोणताही ज्वालाग्रही – केमिकल वा विषारी धोका नाही. फटाक्यांच्या व्यवसायात नेमकं उलट आहे.

तांबे, कॅडीनियम, शिसे, मॅग्नेशियम, जस्त, सोडीयम, सल्फर असे सर्वच विषारी घटक या उद्योगातील संबधित व्यक्तीला उघड्या हातांनी हाताळावे लागतात. त्याचे फार मोठे दुष्परिणाम होतात.

सगळ्यात भयानक बाब म्हणजे या उद्योगात ‘चाईल्ड ट्रॅफिकींग’ या गुन्हेगारी पध्दतीने देशभरातून लहान मुलं पळवून आणून जुंपली जातात. त्यांच्यावर काम करण्यासाठी अनन्वीत अत्याचार केले जातात. बहुतांश वेळा यातील मुली मोठ्या झाल्या की त्यांना वेश्याव्यवसायात विकले जाते. एकूणच फार मोठ्या प्रमाणावर चिमुकल्या जीवांचे आयुष्य बरबाद केले जाते.

हे झालं एक कारण..

दुसरं कारण म्हणजे या आधीच ज्वलनशील असलेल्या उद्योगाला मानवी हयगयीने व नैसर्गिक उष्णतेमुळे वारंवार लागत असलेल्या आगी व त्यात होरपळून मरणारे आपलेच निष्पाप बांधव.. कोणत्याही प्रकारची ॲन्टी फायर सिस्टम संबधित उद्योगात वापरली जात नाही. मोठे उद्योग केवळ शो म्हणून व कायद्यास दाखविण्यासाठी फायर इक्विमेंट ठेवतात. एखादा उद्योजक वगळता सर्वत्र ही सत्य परिस्थिती आहे. दरवर्षी या फटाक्यांच्या कंपन्यांना लागलेल्या आगीत अनेक जीव जातात. . काही होरपळून निघतात.

हे झालं दृष्य.. अर्थात दिसणारं.. तर न दिसणारं म्हणजे वर उल्लेख केलेल्या विषारी धातू व केमिकल्स नी हजारोंना विविध भयंकर आजार जडले आहेत. दुर्दैवाने यात महिला व मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याची अधिकृत आकडेवारी कधीही उपलब्ध होत नाही. सगळा प्रकार सर्वसामान्य फटाक्यांचे समर्थन करणारा विचारही करू शकत नाही इतके भयानक आहे.

दोष समर्थन करणारे यांचा नाही कारण ही भयानक वस्तुस्थिती त्यांना ज्ञातच नाही. ज्या दिवशी ही बाब फटाके समर्थक प्रत्यक्षात पहातील, समजून घेतील त्या दिवशी ते फटाक्यांचे समर्थन बंद करतील हे निश्चित. कोणताही हिंदू कधीही मेलेल्याच्या वा मरणार्‍याच्या टाळूवरील लोणी गोड असतं असं म्हणू शकत नाही.

सन २००४ सालातील डिसेंबरात मी पुढील वर्षाची ऑर्डर देण्यासाठी शिवकाशीस गेलो होतो. तोपर्यंत पत्रकारीता करू लागल्याने दुनियादारी समजायला लागली होती. आतापर्यंत समोर असूनही न दिसणारे सामाजिक प्रश्न समोर दिसायला, कळायला लागले होते. शिवकाशीतल्या त्या चार दिवसांनी फटाका इंडस्ट्री च्या काळ्या बाजू बद्दल खुप काही दाखवलं – शिकवलं. सर्वच सहनशक्तीच्या पलिकडचं होतं.

“जे आपल्या मनाला पटत नाही ते कधीही करायचं नाही. . मग काय वाट्टेल ते होऊ दे” हे धोरण माझं पहिल्यापासून फिक्स आहे.

“कायद्याचं काय हो ठरवलं तर अनेक मार्ग कायदा न मोडता अगदी कायदेशीररित्या काढता येतात. ” पण करायचाच नाही हा प्रकार. . शक्यच नाही ते. . तर विचारच का करा??

हा सर्व फटाक्यांचा फाटका प्रकार पाहिल्यावर खरंतर ताबडतोब हा सर्व प्रकार बंद करावा असे वाटले. वय लहान होतं. तितकी समज नव्हती. काहीतरी करायला हवं याने भडकलो होतो. दोन चार लोकांना ‘हे बंद करा’ वगैरे उपदेश – धमकी – बिमकी देऊन अखेर ऑर्डर न देताच घरी परतलो.

घरी बाबांनी मला समजावल्यावर मग आपल्या पुरता मी निर्णय घेतला आणि फटाक्यांचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद केला.

एकटा काय करू शकतो हा विचार न करता आपण वैयक्तिक दृष्ट्या खुप काही करू शकतो हेच खरं. तेच मी ही केलं.

जोवर सर्वंकष फटाक्यांच्या उत्पादनावर बंदी येत नाही तोवर हे असेच चालणार. दिवाळी हा आनंदाचा मोठा सण आहे हे निश्चित परंतु तो आनंद कोणाच्या जीवावर उठणारा नसावा इतकेच..

फटाकाबंदीला केवळ ध्वनी वा वायू प्रदूषण या बाबीवर नक्कीच समर्थन नाही. कारण असे प्रदूषण करणारे इतरही अनेक उद्योग व प्रकार आहेत. फटाकाबंदीच स्वागत आहे ते केवळ निष्पाप लहानमोठ्या जीवांच्या अकाली कोमजणार्‍या आयुष्यासाठी. . . . .

लेखक – श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या प्रिय लेकरा – भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

??

☆ माझ्या प्रिय लेकरा — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

माझ्या प्रिय लेकरा,

(मुलांच्या मनाच्या तीन वेगवेगळ्या अवस्था असतील तर पालकांनी तिन्ही अवस्थेत एकच प्रतिक्रिया देऊन कसे चालेल?) – इथून पुढे..

बाहेरच्या निष्ठुर जगात आई-बापाप्रमाणे मुलांला समजून घेणारे वा समजावून सांगणारे फारसे कुणी नसते. मुलांच्या चुकांना बाह्य जगात केवळ शिक्षा मिळतात. अशा शिक्षेनंतर मायेने फुंकर घालायलाही कुणी नसते. या शिक्षांमध्ये मायेचा ओलावा नसल्याने मुलांच्या मनात त्या प्रसंगांविषयी कायमस्वरूपीची कटुता निर्माण होते. पण हेच वय सर्वात जास्त संस्कारक्षम असल्याने याच वयात चांगल्या वाईटाचे धडे दिले गेलेच पाहिजेत. समाजाकडून मुलांना रुक्षपणे जगण्याचे धडे शिकायला मिळण्याऐवजी आई-बापाने कठोरपणावर मायेचा मुलामा देऊन ते मुलांना शिकवावेत. त्यामुळे मुलांच्या मनात कटुता निर्माण होत नाही. कधी चांगल्या कामाचे बक्षिस देवून, कधी समजावून सांगून आणि वेळप्रसंगी शामच्या आईसारखी मायेच्या ओलाव्याने शिक्षा करावी लागते.

श्याम म्हणजे साने गुरुजी. त्यांना लहानपणी पाण्याची फार भीती वाटे. पोहणे शिकणे का गरजेचे आहे हे आईने श्यामला समजावून सांगितले. पोहायला जायचे ठरल्यावर ऐनवेळी श्याम लपून बसला. समजावून सांगूनही शाम पोहायला जात नाही म्हटल्यावर श्यामच्या आईने त्याला फोकाने बडवून काढले. श्यामला मारताना श्यामसोबत आईच्याही डोळ्यामधून पाणी वाहत होते. पुढे कधी चुकून लेकरू पाण्यात पडलं तर जीवाला मुकेल या धास्तीने तिने ते सर्व केले होते. तसेच पाण्याच्या भीतीने पोहायाला न शिकलेल्या आपल्या मुलाला समाजात कुणी भित्रा समजू नये म्हणून आईने अडून बसलेल्या श्यामला शिक्षा करून पोहायला धाडले. माराच्या भीतीने श्याम शेवटी पोहायला गेला. पोहून घरी आल्यावर पाठीवरील वळ दाखवत श्याम आईवर रुसून बसला. मुलाच्या पाठीवरील वळ पाहून आईच्या डोळ्यात पाणी आले. जेवत असलेली आई भरल्या ताटावरून उठली आणि हात धुवून त्याच्या पाठीवरील वळांना तेल लावू लागली. रडवेल्या स्वरात तिने श्यामला पोहण्याचे महत्व परत समजावून सांगितले. आपल्याला मारून स्वतः रडणा-या आईला पाहून श्यामलाही गहिवरून आले. आईचे आपल्याला मारणे हे आपल्या हिताचेच होते याची ठाम जाणीव श्यामला झाली. या प्रसंगामुळे श्यामच्या मनात कुणाविषयीही कटूता निर्माण झाली नाही. उलट या घटनेतून आईचे श्यामवर असलेले प्रेमच अधोरेखीत झाले. आई आणि श्यामचे नाते अजून घट्ट झाले. श्यामला शिक्षा झाली. पण श्यामच्या मनावर कटूपणाचा ओरखडाही ओढला गेला नाही. श्यामला आयुष्यभरासाठीचा एक धडा मिळाला. या घटनेला साने गुरुजींनी आपल्या आयुष्यातील एक सकारात्मक घटना म्हणून लक्षात ठेवले. हे सर्व केवळ त्यांच्या आईच्या मायेमुळे शक्य झाले होते. आईच्या जागी बाहेरचे कोणी असते तर आपुलकीच्या आभावामुळे आणि भावनिक कोरडेपणामुळे हा प्रसंग साने गुरुजींच्या स्मृतीत दुःखदायक प्रसंग म्हणून नोंदला गेला असता.

पण अगदीच नाईलाज झाल्याशिवाय पालकांनी मुलांना शिक्षा करू नये. केवळ मुले कमजोर आहेत म्हणून त्यांना पालकांनी आपल्या आयुष्यातील फ्रस्ट्रेशन काढायची पंचींग बॕग करू नये. मुलांना शिक्षा केल्यावर पालकांना मुलांपेक्षा जास्त दुःख होत नसेल तर पालक त्या शिक्षेतून असुरी आनंद मिळवत आहेत असा अर्थ होतो. अशा पालकांना मानसिक समुपदेशनाची किंवा कदाचित मानसिक उपचारांची गरज आहे असे समजावे.

मुले पटकन मोठी होतात. मग ते ‘Teen’ या असुरक्षित वयात पोहचतात. आजवर अभ्यास, खेळ, कला इत्यादी क्षेत्रात त्यांनी काही ना काही यश मिळवलेले असते. आजवर केलेल्या कर्तुत्वाची एक ओळख मुलांच्या मनात निर्माण झालेली असते. मुलांच्या मनात स्वतःविषयीची प्रतिमा आकार घेत असते. मुलांच्या मनातील स्वतःच्या प्रतिमेच्या आकाराला अहं-आकार वा अहंकार असे म्हटले जाते. बारा-तेरा वर्षांपर्यंत मनात वेगवेगळे अहंकार तयार झालेले असतात. यशाच्या श्रेयावर पोसलेला अहंकार तसा मुलांसाठी आनंदाची जागा असतो. पण या अहंकाराचा एक प्रॉब्लेम असतो. अहंकारावर थोडीशी टीका झाली तरी अहंकार दुखावला जातो. एखाद्या चुकीसाठी बोल लागला वा  शिक्षा झाली तर त्या संदर्भातील अहंकार लगेच दुखावला जातो. अहंकार दुखावला की मनात राग उत्पन्न होतो. या त्रासदायक समस्येचे प्रामाणिक आत्मपरीक्षण केले तर स्वतःचा गाढवपणा स्वीकारावा लागतो. मग आत्मटीकेचे वाढीव दुःख पदरी पडते. आधीच अहंकार दुखावल्याने दुःखी झालेले मन हे नवीन दुःख स्वीकारायला तयार होत नाही. त्याऐवजी असे दुखावलेले मन अप्रामाणिकपणा स्विकारते आणि स्वतःच्या चुकांचे खापर जगावर फोडून मोकळे होते. त्याने मनाला तात्पुरता आराम मिळाला तरी अप्रामाणिक आत्मपरीक्षणामुळे समस्येची खरी  कारणे कधीही समोर येत नाहीत. त्यामुळे अशी समस्या कधीच सुटत नाही. अहंकारी मन एकाच चौकात, त्याच दगडाला वारंवार ठेचा खात राहते आणि त्याबाबत जगाला दोष देत राहते. या समस्येला मानसशास्त्रात “टिन एज आयडेंटिटी इशू” असे म्हणतात. या वयातील मुलांचा स्वभाव रगेल आणि विद्रोही झालेला असतो.

अशा वयात असलेल्या मुलांच्या पालकांनी त्यांच्या वागण्यावर टीका करून त्यांचा अहंकार दुखावला तर मुलांच्या वागण्यावर त्याचा विपरीत आणि बहुतेक वेळा विरुद्ध परिणाम होतो. मुलांना क्रिटीसाईज केले वा कधी शिक्षा केल्यास मुले पालकांच्या सांगण्याप्रमाणे वागण्याऐवजी हट्टाला पेटून पालकांच्या सांगण्याविरुद्ध वागतात. या वयातील मुलांच्या वागण्याला खरंच वळण द्यावयाचे असल्यास आई-बापाने आपला “पालक” हा अहंकार टाकून मुलांचे “मित्र” व्हावे. आपल्याकडे आजवरच्या अनुभवांनी जमा झालेले ज्ञान फक्त मुलांसमोर मांडून, त्यांना त्यांच्या समस्येचे आकलन करून घ्यायला मदत करावी. शेवटी केवळ मित्रत्वाचा सल्ला द्यावा. तसेही १२-१३ वर्षापुढील मुले त्यांच्या बुद्धीला पटेल तेच करतात. काही पालक मुलांचा अहंकार दुखवून त्यांना वाईट मार्गावर अजून दृढपणे चालण्यास भाग पाडतात. यात कुठलेही शहाणपण नाही.

मुली, तू आता सहाव्या वर्षात पाय ठेवला आहेस. परवा तू सतत हट्ट करत होतीस. तीन-चार वेळा मी तुला समजावून सांगितले. पण तू काही केल्या ऐकेनास. मग नाईलाजास्तव तुला शिक्षा करावी लागली. तुला शिक्षा करत असतांना आणि नंतर माझ्या मनाची काय अवस्था झाली हे केवळ मलाच ठावूक आहे. कोण कुणाला शिक्षा करत होते देव जाणे ! त्या दिवशी तू जितकी रडलीस ना त्याच्यापेक्षा जास्त माझे मन रडले. पण बापाला उघडपणे आसवे गाळायचीही मुभा नसते. परत अशी वागू नकोस गं. तुझा बाबू बापाच्या कर्तव्याने बांधला गेला आहे. कर्तव्य आणि त्याच्यासोबत येणारा मानसिक त्रास मला चुकवता येणार नाही. डंब सेल्फिशसारखी कधीच वागू नकोस ग पोरी. तसाही चाळीशी ओलांडलेला पुरूष रडताना बरा दिसत नाही.

तेव्हा कुठल्याही चुका न करता लवकर मोठी हो पोरी !

तुम्हाला शिक्षा केल्यावर आमच्याच काळजाला डागण्या लागतात गं ! लेकाच्या वेळी ते मी कसंतरी सहन केलं. पण तुझ्याबाबतीत ते सहन होईल असं वाटत नाही.

लवकर शहाणी आणि मोठी हो पोरी !

वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा..

. . . . तुझा गोपाल बाबू

– समाप्त –

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चला मिळवून आणू या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ चला मिळवून आणू या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

“करंजीच्या सारणात थोडी कणीक भाजून घालावी. म्हणजे मग सारण नीट मिळून येतं. नाहीतर करंजीचा खुळखुळा होतो. ” लहानपणी आईकडून हमखास ही टीप मिळायची. “पण कणीकच का? तांदळाचे पीठ का नाही?” तर त्यावर “अग, गव्हाच्या पिठाच्या अंगी सगळ्यांना धरून ठेवण्याचा गुणधर्म असतो. तसं तांदळाच्या पीठाचे नाही. ते अगदी सरसरीत असतं. “

“मग आपण खव्याच्या किंवा मटारच्या करंजीत का नाही घालत हे गव्हाचे पीठ?” माझा अजून एक आगाऊ प्रश्न. तर त्यावर “अग, मटार किंवा खव्याच्या सारणात मूळचा ओलावा असतो. त्याला मिळून आणण्यासाठी दुसऱ्या घटकाची आवश्यकता नसते”  – तितकेच शांत, पण तत्पर उत्तर.

अगदी सहजपणे माझ्या आईने  जीवनातल्या दोन गोष्टी मला समजावल्या.

१. अंगी ओलावा असेल, तर गोष्टी मिळून येतात.

२. ओलावा कमी असेल, तर मिळून आणणारा घटक आवश्यक ठरतो.

नंतर लग्न झाल्यावर वडे, कटलेट इत्यादी रेसिपी करताना binding factor चे महत्व पटत गेले. आणि आता दिवाळीसाठी करंज्या करत असताना एक गोष्ट लख्ख जाणवली.

नात्यांचंही असंच आहे. प्रत्येक नातेवाइकांच्या गोतावळ्यात असा एखादा binding factor असतो, जो सर्वाना धरून ठेवतो. मग ते असे मित्र/ मैत्रीण असतील, जे बऱ्याच वर्षांनी कारणपरत्वे दुरावलेल्या सगळ्यांना एकत्र आणतात.

व्हॉट्सॲप ग्रुप बनवतात आणि “contact मध्ये रहायचं हं” अशी प्रेमळ दमदाटीही करतात. कधीकधी असा binding factor आपल्या नात्यातील एखादी बुजुर्ग व्यक्ती असते, तर कधी आपल्या शेजारी पाजारीही अशी व्यक्ती सापडून जाते.

आजच्या virtual जगात सुद्धा असे binding factors दिसतात. आपण त्याना अनेकदा भेटलेलोही नसतो… पण ते मात्र आपली चौकशी करतात. काळजीही करतात.

अशा सगळ्या binding factors ना माझा मानाचा मुजरा. ते आहेत, म्हणून समाजातील माणूसपण टिकून आहे, अन्यथा समाजाचाही खुळखुळा व्हायला वेळ लागणार नाही.

मंडळी, आपण वयाने मोठे झालो, मिळवते झालो, चला तर – आता मिळवून आणणारे होऊ या.

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ गो माय ऽऽ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ गो माय ऽऽ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

 “आई आज असं अचानक तुला मला प्रेमानं जवळ घेऊन थोपटत का आहेत सगळे?… ते ओवळणं, हिरवा चारा खाऊ घालणं, अंगावर भरजरी शाल टाकणं!.. अगदी आपण देव असल्यासारखे पुजन का करताहेत?… नमस्कार तर कितीजण करताहेत… आज कुठला विषेश दिवस आहे वाटतं… आज अचानक आपल्या बद्दल त्यांना प्रेमाचा पान्हा फुटावा!.. सांग ना गं आई!.. “

“.. वासरा त्यांच्या या प्रेमाच्या दिखाव्याला भुलू नको बरं… अरे वर्षानुवर्ष चालत आलेली ती वसुबारसाची परंपरा  चालवताहेत झालं.. त्यांची दिवाळी सुरु होतेय ना आजपासून म्हणुन पहिला मान गोधनला देतात… आपणं भरपूर दुधदुभतं कायम देत राहावं असा मतलबी डाव असतो त्यांचा… वासरा पूर्वीचे आपले वंशज  प्रत्येक घराघरात गोठ्यात राहतं होते.. मोठ्या संख्येने.. मोठ्या घरात अविभक्त कुटुबाचा काबिला तसं गोठ्यात पण मोठ्ठ कुटुंब गाई, म्हशी, बैल, शेळ्या, कोंबड्या एकत्रित राहत होतो.. देखरेखीला चौविसतास माणसं असायची.. खाण्यापिण्याची तरतूद भरपूर, रानावनात भटकणे भरपूर, नदी तळ्यात मनसोक्त डुंबणं सारं सारं काही पाहिलं जात असे… मग ईतकी काळजी घेतल्याने आपणही संतत कासंड्या भरभरून फेसाळते दूध देत गेलो… वयोमानानुसार ज्यांची कास सुकत गेली, गाभण राहता येईना, दूध आटत गेले त्या भाकड गाईनां रेडा महणून पोसले गेले होते.. पण त्यांना कधीच गोठ्याबाहेर काढले गेले नाही.. दैववशात पंचत्त्व पावलेलीच घराचा गोठा कायमचा सोडून जात असे… अंगी धष्टपुष्टपणा आणि तजेलदारपणा असल्याने घरातली गोठ्यातले गोधनाची वाढती संख्या श्रीमंतीचं मापदंड ठरला जात असे… कडबा, वैरण, पेंड याने गोठ्यतला एक कोपरा कायम भरलेला असे… पाऊस भरपूर असल्याने कोरडा दुष्काळ कधी दिसलाच नाही… झाडं, डोंगर, कधी  छाटले नव्हते… आपल्यात देवत्त्वाचा अंश असल्याची त्यांची पुज्य भावना होती तेव्हा… पण पण हळूहळू  माणसांच्या प्रवृत्तीत बदल होत गेला.. आधुनिकतेचे वारे वाहू लागले.. गावात सुधारणेचा सोसट्याचे वादळ घुमले.. शिक्षणाचे फायदे दिसू लागले अन जुने संस्कार काटे होउन टोचू लागले.. भावकीत दरी पडली नि घरं दुभंगून मोडली.. शेताचा भार एकीकडे नि दुधाचा बाजार दुसरीकडे.. विभक्त कुटुंबाची घरचं टाचकी मग गोठ्यावर का न यावी टाच ती… हळूहळू एकेक गाई गुरं जनावरांच्या बाजारात गेली… दुधाच्या मिळकती पेक्षा वैरणीचा खर्च परवडेना, , माणसाच्या हातातलं घड्याळ देखभालीची वेळच दावेना.. काही गणित जुळेना म्हणून गाई गुरांना  ठेवले पांजरपोळच्या आश्रयाला.. तर काही हडखलेली, उताराला लागलेली कसायाने लाटली… शेण गोमुत्र सुद्धा आटले तिथे दुधाची काय कथा… मग आपल्याला पोसणार कोण?… कशाला बांधुन घेईल गळ्यात आपल्या फुकाची धोंड!… वासरा ! अरे हे माणसांचं जगचं मतलबी… इथे खायला कार नि भुईला भार होणारी त्यांना जड होतात ;अगदी वृद्ध असाह्य जन्मदात्या  माता पिता सुद्धा.. त्यांना देखिल त्या वयात वृद्धाश्रमाला पाठवतात तर तिथं तुमची आमची काय कथा… वर्षभर सांभाळताना, दुधाचा गल्ला वाढता राहताना, आखुडशिंगी, चारा कमी खाणारी नि शेणा गोमुत्राचा कमीत कमी उपद्रव देणारी गाई गुरं असतील तोवर आपला प्रतिपाळ करत राहणं फायद्याचं असतं.. यातलं एक जरी मागं हटलं कि लगेच त्याचं आपलं नातचं तुटलं… जोवरी हाती पैका तोवरी इथं बुड टैका हा जसा माणसाने माणसाला न्याय लावलेला असतो अगदी तसाच न्याय आपल्याला असतो… मग एक दिवस करतात आपली साग्रसंगीत  पुजा… वासरा आपल्यासाठी म्हणून ती काही पूजा नसतेच मुळी ती असते त्यांच्यासाठी… एक आदराची प्रेममय  कृतज्ञतेची दृष्टी असली आपल्यावर तरीही पुरेशी असते रे… कितीही झालं तरी ते माय लेकराचं नातं असते ते.. माय आपल्या लेकरावर माया लावणारी चिरतंन  असणारी.. मग ती माय कालची असो वा  आजची किंवा उद्याची असणारी… तिला कसही असलं तरी आपलं लेकरू कधी जड होत नसतं… पण हे लेकराला  कधीच कळत नसतं..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ — श्रीमद् भागवत पुराण कथा ज्ञानयज्ञ … ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

सुश्री प्रज्ञा मिरासदार

स्व-परिचय 

प्रज्ञा मिरासदार. मूळ गाव पंढरपूर. द.मा. मिरासदार हे माझे दीर. शिक्षण- मराठी विषयात पदवी. मी संस्कृत व इतरही विषयांच्या ट्यूशन्स घेत होते. गाण्याच्या परीक्षा दिल्या आहेत. शास्त्रीय संगीतावर आधारित भजनाचे क्लासेस चालविले. सध्या एकच क्लास चालविते. अनेक विषयांवर लेख लिहिले आहेत. कविता करते. अनेक काव्यसंमेलनात कविता सादर केल्या आहेत. पारितोषिके मिळाली आहेत. प्रत्येक सहलीची प्रवासवर्णने लिहिणे, हा माझा छंद आहे. अमेरिकेत जितक्या वेळा गेले त्या प्रत्येक वेळेची प्रवासवर्णने लिहिली आहेत.

? विविधा ? 

☆ — श्रीमद् भागवत पुराण कथा ज्ञानयज्ञ … ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

दि. २३ सप्टेंबरपासून यंदा श्रीमद्भागवत सप्ताह सुरू झाला. तो २९ सप्टेंबरपर्यंत चालला. अनेक मंदिरे, तीर्थक्षेत्रे, घरे, मठ इथे हा सप्ताह अत्यंत भक्तिभावाने साजरा होतो. तो ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात. खरोखरच या ग्रंथात प्रचंड प्रमाणात ज्ञान आणि विज्ञान भरलेले आहे. हे श्रीमद् भागवत मूळ संस्कृत भाषेतूनच सांगितले आहे. सर्वसामान्य जनांना संस्कृत भाषा आकलनास अवघड असते. म्हणून पुण्यातील एक विद्वान पंडित कै. प्रा. डॉ. प्रकाश जोशी ( एम्. ए. पी.एच्. डी. ) यांनी आमच्यासारख्या सामान्य जनांसाठी त्या श्रीमद् भागवताचा सारांश सांगणारी सात पुस्तके मराठी भाषेत लिहिली आहेत.

त्यामधे नुसताच अनुवाद नाही तर पूर्ण भागवत पुराणाचा भावार्थ, त्यातील तत्वज्ञान त्यांनी उलगडून सांगितले आहे. शिवाय भाषा सोपी आहे. सुमारे ९० पृष्ठांचा प्रत्येक भाग आहे. त्यामध्ये त्यांनी सुरवातीलाच ही पुस्तके लिहिण्याचा उद्देश सांगितला आहे.ते म्हणतात की, कलियुगात नामस्मरण आणि श्रीमद् भागवत पुराण कथा श्रवण हाच एकमेव उपाय आहे.असे महर्षि वेदव्यासांनी म्हटले आहे. अनेक पुराणे वेदव्यासांनी रचली. तरीही भगवंताच्या अवतार स्वरूपांचे वर्णन करणारे भक्तिरसपूर्ण असे श्रेष्ठ पुराण भागवत पुराण रचल्यानंतरच त्यांना अतीव समाधान प्राप्त झाले होते.

हा भागवताचा ज्ञानदीप प्रथम श्रीविष्णु भगवंतांनी ब्रह्मदेवांना दाखविला. नंतर नारदमुनींना आणि नारदांच्या रूपाने भगवंतानेच महर्षि वेदव्यासांना दाखविला. व्यासमुनींनी त्यांचे पुत्र शुकाचार्य मुनींना दाखविला,तर शुकाचार्यांनी मृत्यूच्या वाटेवर असणाऱ्या राजा परिक्षिताला तो दाखविला.

राजा परिक्षित हा पांडवांचा नातू.  अतिशय न्यायप्रिय होता. धर्मानुसार आचरण व राज्य करीत होता.तो शिकारीस गेला असताना तहानेने व्याकुळ होऊन शृंग ऋषींच्या आश्रमात गेला. तिथे ऋषी ध्यानस्थ बसले होते. त्यामुळे त्यांचे लक्ष राजाकडे गेले नाही. याचा राग आल्यामुळे राजाने जवळच एक मरून पडलेला साप ऋषींच्या गळ्यात अडकविला आणि तो तिथून निघून गेला. थोड्या वेळाने शृंग ऋषींचे पुत्र शौनक ऋषी आश्रमात आले. त्यांनी शापवाणी उच्चारली की, ज्याने हे कुकर्म केले आहे, त्याला आजपासून सात दिवसांच्या आत तक्षक नाग दंश करून मारून टाकील. ऋषींचा हा शाप खराच होणार होता. त्या सात दिवसांत प्रायोपवेशन म्हणून परिक्षित राजा गंगानदी तीरावर नैमिषारण्यात राहिला. तिथे महामुनी शुकाचार्य आले. त्यांना राजा अनेक प्रश्न विचारीत राहिला आणि मुनी शुकाचार्य राजाला श्रीमद् भागवत कथा कथन करते झाले.अशी ही प्रस्तावना आहे.

भाद्रपद शुद्ध नवमी (किंवा अष्टमी ) पासून ते प्रोष्ठपदी पौर्णिमेपर्यंत सात दिवस भागवत पुराण सप्ताह ऐकण्याची, ऐकविण्याची परंपरा भारत देशात हजारो वर्षांपासून अव्याहतपणे चालू आहे. तसे त्याचे पारायण केव्हाही केले तरी चालते. त्यासाठी डॉ. प्रकाश जोशी यांनी सर्वसामान्य जनांसाठी ही सात अत्यंत श्रवणीय, भागवताचे पूर्ण सार सामावलेली पुस्तके मराठी भाषेत लिहिली आहेत. चार ते पाच तासात एक पुस्तक वाचून होते.

दुर्दैवाने लेखक डॉ. प्रकाश जोशी वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी अकालीच निधन पावले. त्यांच्या मृत्यूनंतर गीताधर्म मंडळाने ही सात पुस्तके प्रकाशित केली आहेत. मी स्वतः प्रतिवर्षी ही पुस्तके वाचते. माझ्या घरी श्रीमद् भागवत सप्ताह साजरा होतो. अत्यंत साधेपणाने पण भक्तिभावाने आम्ही सगळे मिळून तो संपन्न करीत असतो.

ती पुस्तके वाचल्यानंतर श्रीमद् भागवत वाचनाचे, श्रवणाचे पूर्ण समाधान मिळते. या सात पुस्तकांचे संक्षिप्त वर्णन मी पुढे काही भागात करीत आहे. सर्वांना ते वर्णन आवडेल अशी आशा करते.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रस्ता…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “रस्ता…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

रस्ता…… एक निर्जीव असला तरी आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग. किती प्रकाराने, वेगवेगळ्या अर्थाने आपण याचा उल्लेख करतो.

रस्ता…… सरळ, वेडावाकडा, चढ उताराचा, डोंगरदरीतून जाणारा, छान, खड्डे असलेला, किंवा नसलेला, घाटाचा अशा अनेक प्रकाराने आपण त्याबद्दल बोलतो. तर कधी कधी खडतर, प्रगतीचा, साफ अस म्हणत आपल्या आयुष्याशी त्याचा संबंध लावत त्या बद्दल व्यक्त होतो‌.

रस्त्याने आपण सहज कधीच जात नाही. अगदी सहज म्हणून बाहेर पडलो, अस म्हटलं तरी वेळ घालवण हाच उद्देश त्यामागे असतो.

रस्त्याने जातायेता आपण काही गोष्टी बघतो, काही नजरेआड करतो, काही गोष्टींकडे आपल लक्ष वेधल जात, काही गोष्टी आपण टाळतो. अस बरच काही रस्त्यावर करतो.

कोणी येणार असेल तर ते येण्याच्या आधीपासूनच अधूनमधून आपण रस्त्यावर नजर टाकतो. तर कोणाला निरोप द्यायचा असेल तर ते दृष्टीआड होईपर्यंत आपली नजर रस्त्यावर खिळलेली असते.

रस्ता निर्जीव आहे अस म्हटल तरी प्रत्येक रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींचा, इमारतींचा, तिथल्या परिस्थितीचा प्रभाव रस्त्यावर आहे अस आपल्याला वाटत.

इस्पितळं असणाऱ्या रस्त्यावर एक प्रकारची शांतता, तणाव, काळजी, हुरहूर, किंवा सुटकेचा निःश्वास असल्याचं, तर शाळेच्या रस्त्यावर मुलांचा कलकलाट बागेतल्या पक्षांच्या चिवचिवाटा सारखा मुक्त वाटतो. महाविद्यालयाच्या रस्त्यावर तारुण्याची कारंजी उडत असतात. तर चित्रपटगृह, आणि उद्यानाच्या रस्त्यावर उत्साह.

बाजाराच्या रस्त्यावर भाजीपाला, फळं, फुलं यांची रेलचेल असते. तर मध्येच उपहारगृहातील पदार्थांचे वास आपल्याला नाक, जीभ, आणि पोट असल्याची जाणीव करून देतात. सोबत रसवंतीच्या घुंगरांचा नाद कानावर येतो. सराफ बाजारातील रस्त्यावर चकचकाट व लखलखाट असतो. तर धार्मिक ठिकाण असलेल्या रस्त्यावर प्रसन्नता जाणवते.

रस्त्यावर असलेल्या इमारतींचा, हालचालींचा, आणि वातावरणाचा संबंध आपण रस्त्याशी लावतो, तसच रस्त्यांच रुप सकाळ, दुपार, संध्याकाळ, आणि रात्र अशावेळी वेगवेगळ असत, आणि ते आपल्याला जाणवतं.

सकाळी लगबगीचा, दुपारी थोडा सुस्तावलेला, लोळत पडलेला, संध्याकाळी उत्साहाने वाहणारा, तर रात्री, दिवसभराच्या धावपळीने हळूवारपणे, हातात हात घेत रमतगमत पावलं टाकत जाणारा वाटतो.

उत्सवाच्या आधी आणि उत्सवाच्या वेळी असलेल रस्त्यावरच वातावरण उत्सव संपल्यावर बदलल्या सारख वाटत.

शहर, प्रांत, बोलीभाषा, राहण्याचे ठिकाण यावरून जसं माणसाच वेगळेपण लक्षात येत, तसच रस्त्यांच सुध्दा आहे. गावातला, शहरातला, कच्चा, पक्का, रुंद, दोन, चार पदरी, राष्ट्रीय अस वेगळेपण असत.

कितीतरी गाण्यांमध्ये सुध्दा रस्ता या शब्दाचा वापर केला आहे.  रस्ता…… तोच तसाच असतो. पण वेळ आणि प्रसंगानुसार आपण त्याचं वेगळेपण अनुभवत असतो. मिरवणूक, प्रचार, उपोषण, मोर्चा, वारी या सारख्या अनेक गोष्टींसाठी लागतो तो रस्ता…….

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काळी माय का विकली जातेय ?… लेखक : श्री संदीप काळे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? मनमंजुषेतून ?

☆ काळी माय का विकली जातेय ?… लेखक : श्री संदीप काळे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे 

मराठवाड्यातल्या धाराशिव, बीड, लातूर या रस्त्याने मी प्रवास करत होतो. त्या प्रवासादरम्यान एक विषय समोर येत होता. तो विषय म्हणजे रस्त्यावरच्या ‘ शेती विकणे आहे’ असे लिहिलेल्या खूप साऱ्या पाट्या. बऱ्याच अंतरावर मी माझी गाडी थांबवायला सांगितली. ‘ शेती विकणे आहे’ अशा एका पाटीसमोर गेलो. तिथे थांबून मी अंदाज बांधण्याचा प्रयत्न करीत होतो, इथून शहर खूप दूर आहे. इथं कुठली वस्ती होणं शक्य नाही. मग हा शेतकरी जमीन का विकतोय. आसपास पाहिलं तर कोणी नव्हतं.

आता मी तिथून परत निघणार, तितक्यात मला एका माणसाने आवाज दिला. तो माणूस तिकडं दूरवरून मला म्हणाला,  ‘ काय अडचण आहे, कोणाला भेटायचे आहे. शेती घेण्यासंदर्भात काही बोलायचे काय?’ मी म्हणालो, ‘तुम्हालाच भेटायचं आहे.’ तो अजून माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, ‘मी आपल्याला ओळखलं नाही.’ मी म्हणालो, ‘ओळखणार कसे काय? मी पहिल्यांदाच इथं आलोय. मी हा माहिती फलक वाचून थांबलोय. तुम्ही जमीन विकत आहात का?’ त्या माणसाने जमिनीकडे बघितलं आणि होकाराची मान हलवली. 

त्याला वाटलं मी शेतीचा भाव विचारतो, पैसे कसे द्यायचे, जमीन वादाची नाही ना असे विचारतो काय असे त्याला अपेक्षित होते. पण मी त्याला म्हणालो, ‘का विकता एवढी चांगली जमीन?’ त्यांनी माझ्याकडे निरखून पाहिलं, त्याच्या लक्षात आलं की मी जमीन घेण्यासाठी आलो नाही. तरी जमीन का विकतोय हे विचारण्यासाठी थांबलोय.

मी थांबलोय हे पाहून आजूबाजूचे तीन शेतकरी आले. त्या प्रत्येकाला उत्सुकता होती, ही जमीन काय भावाने जाणार, मी काय भाव म्हणतो. त्या सगळ्यांनी माझी चौकशी सुरू केली. मी कुठून आलोय. मी कोण आहे. मी माझी ओळख सांगितल्यावर त्यांना लक्षात आलं, की मी जमीन घ्यायला आलेलो नाही.

शहरापासून जवळच्या जमिनीवर ‘शेतजमीन विकणे आहे’ असे फलक लागतात, ते आपण समजू शकतो, पण शहरापासून खूप दूर दूर अंतरावर असणाऱ्या अनेक भागांमध्ये शेत विकणे आहे, या स्वरूपाचे फलक चारी बाजूला लागल्याचे पाहायला मिळत होते. एखादा माणूस अडचण आहे म्हणून जमीन विकत असेल तर ठीक आहे, पण सर्वांनाच अडचणी कशा, हा प्रश्न मला पडला होता. मी आजूबाजूला थांबलेल्या शेतकऱ्यांना माझी ओळख सांगितली आणि त्यांना बोलते केले. त्या प्रत्येकाची कहाणी वेगळी होती.

सचिन पाटील, मकरंद जाधव, समीर वानखेडे, प्रभू गायकवाड… ही सारी शेतकरी मंडळी. या सर्वांचा वडिलोपार्जित शेती हाच व्यवसाय. जमीन का विकली जात आहे आणि त्यामागे कारण काय, हे मी सारे समजून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. ‘ जमीन विकणे आहे’ या तीन शब्दांमागे खूप मोठी कारणे आणि लांबलचक इतिहास होता. तो सारा इतिहास त्यांच्या तोंडून ऐकताना मी चकित होत होतो. त्यांच्याशी बोलताना अनेक वेळा त्यांना काय उत्तर द्यावे मला काही सुचत नव्हते.

सचिन पाटील यांची साठ एकर जमीन, मागच्या तीन वर्षांपासून कधी पाऊस जास्त, तर कधी पाऊस नाही, या कात्रीमध्ये सचिन यांची शेती अडकली. दोन मुलींची लग्न केली. दर दिवसाचा मोठा खर्च, सततची नापिकी आणि मुलीच्या लग्नाचे कर्ज. त्या कर्जाच्या व्याजावर लागलेले व्याज, यातून मोकळा श्वास घ्यायचा असेल, तर शेती विकणे हाच पर्याय सचिनसमोर होता, असे तो सांगतो.

मी म्हणालो, ‘तुमचे आई- बाबा यासाठी परवानगी देतात का?’ सचिन थोडा वेळ शांत झाले आणि म्हणाले, ‘त्यांच्या परवानगीने तर शक्य नाही. मी इंजिनिअर आहे. बायकोही उच्च शिक्षित आहे. आम्ही रस्त्याची काही खासगी कामे घेऊन ती करायचो. एका प्रोजेक्टमध्ये आम्ही खूप अडचणीत आलो. तिथे आम्हाला दोन एकर जमीन विकावी लागली. हे आजारी असलेल्या माझ्या वडिलांना कळले आणि वडिलांनी तीन दिवसांत प्राण सोडला. वडील का गेले हे कुणालाच कळले नाही. तेरावे झाल्यावर आईने एकदम रडून आक्रोश करीत सांगितले, ‘ तू बापाच्या काळजाचा तुकडा असलेली काळी माय विकली म्हणून तुझ्या बापाने प्राण सोडला.’ आईचे मला हे ऐकून फार वाईट वाटले. बरेच दिवस मीच माझ्या बापाला मारले, असे मला वाटत होते. 

आमच्या मराठवाड्यात काहीही झाले तरी जमीन विकत नाहीत. ही जमीन, काळी आई म्हणजे आपल्या पूर्वजांची, वडिलांची आई आहे, असे समजले जाते. आता त्या माईला आपण विकले नाही तर स्वतः मरावे लागेल, अशी अवस्था आहे. त्याला कारणेही अनेक आहेत.

आता आई फार थकली आणि तितकेच माझे कर्जही थकले. आता कर्जमुक्त व्हायचे असेल, तर दहा एकर जमीन विकावी लागेल. नाहीतर दर वर्षी व्याजावर एक एकर जमीन विकावी लागेल. सचिन एकीकडे सांगत होता आणि दुसरीकडे डोळ्यात आलेले अश्रू पुसत होता. मी ज्या दुसऱ्या शेतकऱ्याशी बोलत होतो त्याचे नाव मकरंद जाधव. मकरंदची शेती सचिनच्या शेताजवळच आहे. मकरंद म्हणाला, ‘ माझ्याकडे तीस एकर जमीन आहे. पाण्याची कमी नाही, नापिकीचा फटका बसत नाही, कारण जमीन उंचावर आहे. सोने पिकावी अशी जमीन आहे, पण ती जमीन कशी कसायची, हा प्रश्न आहे. स्थानिक मजूर येत नाहीत. बाहेरचे मजूर येतात आणि चोरी करून पळून जातात. गेल्या दोन वर्षांपासून दहा एकर जमीन पडीक आहे. कुणी बटाईने पण करायला तयार नाही.’ मी म्हणालो, ‘तुम्ही इतरांपेक्षा मजुरी कमी देता का?’ मकरंद म्हणाले, ‘नाही, मजुरी योग्य तीच देतो. नेण्या-आणण्यासाठी वाहन आहे, पण मजूर येत नाहीत.’

सचिन, मकरंद, समीर, प्रभू सारे जण मजुराला घेऊन एक एक किस्से सांगत होते. ते मला जे सांगत होते ते माझ्यासाठी सारे काही नवीन होते. मजूर नाममात्र दरावर मिळणारे धान्य बाजारात नेऊन कसा रविवार साजरा करतात हेही ते मला सांगत होते. मी म्हणालो,  ‘ मग तुम्ही शेती कसायला कुणी भेटत नाही म्हणून शेती विकताय तर…, मग शेती विकून भेटलेल्या पैशांचे काय करणार ?  ’     मकरंद म्हणाले,  ‘ मला शेती विकून कर्जमुक्त व्हायचे आहे. मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवायचे आहे.  ’   मी म्हणालो,  ‘  मग परदेशात शिकून तो पुढे काय करेल. ’

मकरंद शांतपणे म्हणाले, ‘मी मुलाला सांगितले, बाबा, तिकडेच राहा. तिकडेच मोठा हो. इकडे नको येऊ. इकडे सारा गोंधळ आहे. कशाचा कशाला ताळमेळ नाही. मला माझ्या आई-बापाच्या मोहापायी घर सोडता आले नाही. तू घरी येऊन मोहात नको अडकू. आता गावातल्या मुलासोबत तो एक दिवस मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसला होता. मी तेव्हाच ठरवले, एकदा का तो तिकडे गेला की परत इकडे नकोच.’आम्ही बोलत बोलत सचिनच्या आखाड्यावर गेलो. तिथे सचिनच्या वडिलांची समाधी होती. त्या समाधीचे आम्ही सर्वांनी दर्शन घेतले.

सचिनचा सालगडी काम सोडून झोपला होता. सचिन म्हणाला, ‘पाहा, आपण सोबत असलो तर मजूर शेतात काम करतात. नाही तर झोपा घेतात. त्या सर्वांनी तो काळा चहा प्यायला. मी त्या विहिरीचे नितळ पाणी प्यायलो. मी पाणी पिताना सचिन म्हणाला, ‘माझ्या बापाने भर उन्हाळ्यात ही विहीर खंदली, बापाने जिवाचे रान केले, म्हणून या विहिरीचे पाणी इतके चवदार आहे.’ मी समीरशी बोलत होतो, समीर म्हणाला, ‘मला दहा एकर शेती आहे. मला कुणीतरी असा खमका माणूस पाहिजे जो माझी पूर्ण जमीन विकत घेईल. ’   मी म्हणालो, ‘काही भांडणे झाली का? काही वाद आहे का?’ समीर म्हणाले, ‘हो,’मी म्हणालो,‘भावा-भावाचा वाद आहे का? ’   समीर म्हणाले, ‘नाही नाही, माझा आणि माझ्या बहिणीचा वाद आहे. तिला माझी अर्धी जमीन पाहिजे. या वादातून पाच वर्षांपासून जमीन पेरली नाही. ’

मी म्हणालो, ‘आता बहिणीला हिस्सा कायद्याप्रमाणे द्यायचा आहे ना.’ तो म्हणाला,‘छे हो, कशाचा कायदा, आमच्या पूर्वजांनी जे ठरवले ते महत्त्वाचे आहे. बरं बहीण, मेव्हणे मोठ्या हुद्द्यावर आहेत. त्यांनाही चाळीस एकर शेती आहे.’ प्रभू यांचे जमीन विकायचे कारण वेगळे होते, प्रभू म्हणाला, ‘ माझी दोन मुले अपघातात वारली. खूप वर्षांनंतर मला मुलगा झाला. तो खूप लाडका असल्यामुळे शिकला नाही. मित्राच्या संगतीने पुण्याला गेला आणि वॉचमन झाला. त्याला आता दोन छोटी मुले आहेत. माझी बायको सारखी म्हणते, माझी वारलेली ती दोन्ही मुले पुन्हा जन्माला आली आहेत. मला आता मुलासोबत जाऊन पुण्याला राहायचे आहे. माझी पाच एकर जमीन आहे. मागच्या चार वर्षांत मी जे काही पेरले ते कधी उगवले नाही. जेव्हा उगवले तेव्हा बाजारात कवडीमोल विकले गेले. नापिकीत जमिनीच्या जमिनी मोजून नेल्या. नेते फोटो काढत शेतात आले आणि बँकेत जमा होणारे पैसे अजून जमा होतच आहेत. या सरकारवर आणि प्रशासकीय यंत्रणेवर माझा जराही विश्वास नाही.’ ते सारे जण एक एक करून आम्ही आमची जमीन का विकतोय याची कारणे सांगत होते.

गावकी, भावकी आणि निसर्गाचे सतत वाईट फिरणारे चक्र आणि या चक्राचे हे सारे झालेले शिकार. शेतीसंदर्भात असणारे चुकीचे कायदे, हे सारे यामागे आहे. या साऱ्यांची कहाणी एकदम वेगळी होती. ही कहाणी या चार जणांची नाही तर राज्यात, देशात काळ्या माईची सेवा करणाऱ्या त्या प्रत्येक माणसाची आहे. ज्याला आपल्या काळ्या मायचा तुकडा काळजाचा वाटतो, पण त्या काळजाच्या तुकड्याला विकल्याशिवाय पर्याय नाही. बरं, यात शंभर एकर आणि एक एकर जमीन असणाऱ्यांची गत सारखीच झालेली आहे.

लेखक – श्री संदीप काळे

मो. 9890098868

प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (दहावी माळ) – न केलेले ‘सीमोल्लंघन‘… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (दहावी माळ) – न केलेलेसीमोल्लंघन‘… ☆ श्री संभाजी बबन गायके 

“ राजा बोले अन दल हाले “ ही पहिल्यापासूनची रीतच म्हणायची. मानवी वर्चस्ववादाच्या संघर्षात एकमेकांचा नाश करणे अपरिहार्य झाले, तसे प्रत्येक समुदायाने स्वत:ची सैन्यदले उभारली. राजाने निश्चित केलेल्या शत्रूचा समाचार घेण्यासाठी त्याचा जीव घेणे आणि या प्रयत्नात स्वत:चा जीव देण्याची तयारी 

ठेवणे , हा रणबहाद्दरांचा स्थायीभाव बनून गेला. 

असंख्य राजे-रजवाड्यांचा आणि त्यांनी वेळोवेळी केलेल्या युद्धांचा देश..  ते आताचा स्वतंत्र, सार्वभौम लोकशाही गणराज्य असलेला देश ..  म्हणून आपल्या भारत देशाची जगाला ओळख आहे. 

स्वत:हून आक्रमण करायचं नाही असं तत्व उराशी बाळगून असलेला आणि ते तत्त्व हरत-हेची किंमत मोजून पालन करणारा देश म्हणून भारत उभ्या जगाला माहित आहे आणि आदर्शवतही आहे.

सैन्य पोटावर चालत असले तरी या चालणाऱ्या सैन्याला अतिशय सक्षम नेतृत्वाची अनिवार्य गरज असते. भारताच्या सुदैवाने सुमारे पंचेचाळीस वर्षांची दैदिप्यमान कारकीर्द गाजवणारा एक रणधुरंधर सेनापती स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतात निर्माण झाला….. गुजरात प्रांतातील वलसाड येथे वैद्यकीय व्यवसाय करीत असलेले  Hormizd Manekshaw हे आपली गरोदर असलेली पत्नी Hilla, née Mehta..  हीला मेहता यांना घेऊन त्यावेळच्या लाहौर येथे निघाले होते. तेथे वैद्यकीय व्यवसाय थाटावा असा त्यांचा मनसुबा होता. रेल्वेप्रवासात प्रकृती बिघडल्यामुळे हीला यांना पुढे प्रवास करणे अशक्य झाल्याने हे दाम्पत्य अमृतसर स्टेशनवरच उतरले. तेथील स्टेशनमास्टरच्या सल्ल्यानुसार हीला यांना हर्मिझ यांनी स्थानिक रूग्णालयात दाखल केले. तेथे त्या अगदी बऱ्या झाल्या. अगदी थोड्या दिवसांच्या वास्तव्यात ह्या माणेकशा दाम्पत्याला अमृतसर शहर खूप भावले आणि त्यांनी तेथेच कायम वास्तव्य करण्याचे ठरवले. डॉक्टरसाहेबांनी थोड्याच कालावधीत या नव्या शहरात वैद्यकीय व्यवसायात आपला जम बसवला. 

एका दशकाच्या अवधीत या पती-पत्नींनी सात अपत्यांना जन्म दिला. सॅम हे एकूणातले पाचवे अपत्य. दोघे भाऊ इंजिनियर व्हायला परदेशात गेले. साहेबांना डॉक्टर व्हायचं होतं, पण वडिलांनी ‘ हा खर्च झेपण्यासारखा नाही ‘ असं बजावलं. मग साहेब काहीसा बंडात्मक पवित्रा अनुसरून थेट सैन्यात भरती झाले. पाठचा भाऊ जॅम डॉक्टर बनून त्यावेळच्या हवाई दलात रुजू झाला. सॅम साहेब मात्र त्यावेळच्या ब्रिटिश सेनेत स्थिरावले. हिंदी, इंग्लिश, गुजराती, पंजाबी, उर्दू भाषांवर उत्तम पकड असल्याने त्यांना 

‘हायर स्टॅन्डर्ड आर्मी इंटरप्रीटर ‘ म्हणून जबाबदारी मिळाली होती. अत्यंत निर्भीड असलेल्या सॅम साहेबांनी त्यांना गोळ्या घालण्याची धमकी दिलेल्या पंजाबी सैनिकालाच आपल्या तंबूबाहेर रात्री पहाऱ्यावर नेमून इतर सैनिकांच्या मनात आदर निर्माण केला होता. सैनिकांची ते अत्यंत आस्थेने काळजी घेत.

जपान्यांशी लढताना एका मोहिमेत त्यांनी शौर्य गाजवले. मोहिम यशस्वी झाली खरी, पण मोहिम संपता संपता त्यांच्या पोटात सात गोळ्या लागून मूत्रपिंड,यकृत, फुप्फुस यांना गंभीर इजा होऊन ते कोसळले. ही लढाई पाहणाऱ्या मेजर जनरल कोवान यांनी त्यांना स्वत:ला मिळालेला मिलिट्री क्रॉस बॅज त्यांना बहाल केला….हा सन्मान प्रत्यक्षात स्वीकारायला ते काही जगणार नाहीत असे त्यांना वाटले होते. जखमी सॅम साहेबांना त्यांचे सहाय्यक मेहर सिंग यांनी चौदा किलोमीटर अंतर खांद्यावर वाहून नेऊन इस्पितळात पोहोचवले…. यांचा जीव वाचणे शक्य नाही असे म्हणून डॉक्टरांनी उपचारास नकार दिला होता….पण मेहर सिंग यांनी कडक पवित्रा घेतल्यावर डॉक्टर तयार झाले…त्यांनी साहेबांना विचारले तुम्हाला अशा जखमा कशा झाल्या.. त्यावर तशाही गंभीर परिस्थितीत सॅम मस्करीत उत्तरले….’ मला एका खेचराने ठोकरले ! ‘ उपचार मिळाले आणि सॅम बहादूर बचावले, हे पुढे स्वतंत्र भारतीय सैन्याचे नशीब म्हणावे लागेल. 

स्वतंत्र भारतात त्यांची कारकीर्द बहरली. मात्र सैन्याच्या कारभारात राजकारणी लोकांचा हस्तक्षेप त्यांना मान्य नसे. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांना सेनेतील नोकरी जवळजवळ सोडण्याची पाळी आली होती. त्यांच्याविरुद्ध लष्करी न्यायालयात खटला सुरू असतानाच १९६२ मध्ये चीनने आक्रमण केले. खटल्याचा निकाल न लागल्याने या युद्धात सॅम साहेबांना भाग घेता आला नाही. चीनकडून पराभव झाल्याने भारतीय सैनिकांचे मनोबल खच्ची झाले होते. अशा स्थितीत सॅम साहेबांकडे सैन्याचे नेतृत्व सोपवले गेले. त्यांनी सैन्याला आक्रमक होण्याचे आदेश दिल्याने सैन्याचे मनोबल उंचावले गेले. त्यांनी सैन्याच्या सुविधा वाढवण्यावर भर दिला. त्यामुळे भारतीय सैन्य हे केवळ प्रतिकार करणारे सैन्य नव्हे, तर प्रसंगी आक्रमण करू शकणारे सैन्य बनले. १९६४ मध्ये सॅम साहेबांना नागालॅन्ड भागात नेमण्यात आले. तेथे त्यांनी नागालॅन्डमधील बंडखोरी मोडून काढली..याबद्दल त्यांना पदमभूषण किताब प्रदान करण्यात आला.  

सन १९७१ मध्ये सीमांवर खूप धामधुम सुरू होती. परंतु या दरम्यान झालेल्या घटना सॅम माणेकशा यांचा करारी बाणा, निर्भीडता, निर्णयक्षमता आणखी ठळकपणे अधोरेखित करणा-या आहेत. 

त्यावेळच्या पाकिस्तानात घडलेल्या राजकीय, तसेच लष्करी घटनांमुळे लाखो निर्वासित भारतात घुसले होते. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. शेजारील देशातील अशांतता भारताला त्रासदायक ठरू पाहत होती. अशा परिस्थितीत देशाच्या नेतृत्वाने पाकिस्तानमधून फुटून स्वतंत्र बांगलादेश निर्माण करण्याच्या त्या लोकांच्या प्रयत्नांना सक्रीय पाठिंबा देण्याचे धोरण स्वीकारले होते. पण यातून भारताचे आणि पाकिस्तानचे जोरदार युद्ध सुरू होण्याची शक्यता होती. एप्रिल १९७१ मधल्या एका सकाळी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी या विषयावर एक तातडीची बैठक बोलावली. सॅम माणेकशा त्यावेळी लष्करप्रमुख म्हणून उपस्थित होते. बराच उहापोह झाल्यानंतर सॅम माणेकशा यांना “ तुम्ही युद्धास तयार आहात का? ” असा प्रश्न विचारण्यात आला. आणि अर्थातच राजकीय नेतृत्वाला सकारात्मक उत्तराची अपेक्षा होती. 

परंतु अनुभवी, बेधडक निर्णय घेण्यात वाकबगार असलेले आणि हाडाचे सैन्याधिकारी असलेले फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांनी अत्यंत स्वच्छ, स्पष्ट शब्दांत असे घाईघाईने सीमोल्लंघन करण्यास नकार दिला. या नकारामागे अत्यंत सूक्ष्म अभ्यास होता साहेबांचा. देशात सुगीचा हंगाम सुरू आहे. रेल्वेने धान्याची वाहतूक सुरू आहे. आपले सैन्य देशाच्या विविध भागांतून सीमेवर आणायला रेल्वेगाड्या लागतील आणि त्यामुळे धान्य वाहतुकीसाठी रेल्वे उपलब्ध राहणार नाहीत. देशात अन्नाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. पावसाळा फार दूर नाही. सीमेवर पावसामुळे दलदल, पूरस्थिती असेल, त्यात अडकून राहावे लागेल. साहेबांनी अभ्यासपूर्ण परिस्थिती स्पष्टपणे विशद केली. तरीही आग्रह धरला जाऊ लागताच त्यांनी स्पष्ट सांगितले की, ‘ आता आपण युद्धात उतरलो तर आपला पराभव शंभर टक्के निश्चित आहे.’  यावरून त्यांनी राजीनामाही देण्याची तयारी दाखवली होती… आणि अर्थातच ही सोपी गोष्ट नाही.

अगदी नेमकेपणाने परिस्थिती समजावून सांगितल्याने नेतृत्वाला सॅम साहेबांचे म्हणणे पटले. सॅम साहेबांनी पुढील योग्य काळात युद्ध केले जाईल आणि ते खात्रीने जिंकले जाईलच याची हमी दिली. नेतृत्वाचा आग्रह डावलून फिल्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशा साहेबांनी हे न केलेले सीमोल्लंघन पुढील विजयादशमीसाठी किती महत्त्वाचे ठरले, हा इतिहास आहे ! 

साहेबांनी अतिशय योजनाबद्धरित्या पावले उचलली. बंगाली स्वातंत्र्ययोद्ध्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. आपल्या सैन्याला सर्वांगाने सिद्ध केलं आणि तीन डिसेंबरला सुरू झालेलं युद्ध सोळा डिसेंबरला संपुष्टात आणून पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले.   

दुस-या महायुद्धात जपानने शरणागती पत्करल्यानंतर त्यांच्या साठ हजार युद्धकैद्यांची सारी व्यवस्था करण्याचे काम सॅम साहेबांनी अतिशय शिस्तबद्ध रीतीने पार पाडले. १९७१ मध्ये शरण आलेल्या सुमारे ब्याण्णव हजाराच्या आसपास पाकिस्तानी सैनिकांची व्यवस्था करताना त्यांना हा अनुभव कामी आला. शरणागतीच्या आधी त्यांनी पाकिस्तानी सैन्यासाठी एक रेडिओ संदेश प्रसारीत केला होता…. “ आमच्या सैन्याने तुम्हाला चारही बाजूंनी पुरते घेरले आहे. तुम्हाला कुठूनही मदत मिळणे अशक्य आहे. तुम्ही केलेल्या अनन्वित अत्याचारांचा बदला घेण्यासाठी मुक्ती वाहिनीचे लोक टपून बसलेले आहेत. तुमचे जीव कशाला वाया घालवता…तुम्हांला घरी जाऊन तुमच्या बायका-पोरांना भेटायचे नाहीये का? एका सैनिकाने एका सैनिकापुढे हत्यारे म्यान करण्यात काहीही कमीपणा नसतो. आम्ही तुम्हांला एका सैनिकाला द्यावी तशीच सन्मानाची वागणूक देऊ !” …. या संदेशाचा खूप मोठा प्रभाव पडला यात नवल नाही.

(फिल्ड मार्शल सॅम ‘बहादूर’ माणेकशा यांच्या आयुष्यावर बेतलेला एक हिंदी चित्रपट डिसेंबरात येऊ घातलेला आहे. या ख-याखु-या बहादूर सेनानीची माहिती नव्या पिढीला व्हावी असा विजयादशमीच्या निमित्ताने सुचलेल्या या लेखाचा उद्देश आहे. संदर्भ, माहिती अपुरी असण्याची शक्यता दाट आहे. दिलगीर आहे. परंतु सेनाधिका-यांचे योग्य निर्णय देशासाठी काय करू शकतात याचे उदाहरण म्हणजे सॅम साहेबांचे त्यावेळी ‘ न केलेले सीमोल्लंघन ‘ होय, असे म्हणता येईल.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पिंडी ते ब्रम्हांडी – ब्रम्ह ऊर्जा… भाग-१ ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆ पिंडी ते ब्रम्हांडी – ब्रम्ह ऊर्जा… भाग-१ ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

प्रोटॉन-न्युट्रॉनने बनलेले अणुकेंद्रक आणि सभोवताली वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन मिळून एक अणू (Atom) तयार होतो. जसे, सर्वात लहान अणुमध्ये म्हणजे हायड्रोजनमध्ये अणूच्या केंद्रकात एक   प्रोटॉन असतो आणि त्याच्याभोवती एक इलेक्ट्रॉन कक्षेमध्ये फिरत असतो. कुठलीही गोष्ट फिरवायला ऊर्जा लागते. म्हणजे प्रत्येक अणुमध्ये उर्जा असते. ही उर्जाच इलेक्ट्रॉन, न्युट्रॉन, प्रोटॉन वा स्वतः अणुचे वागणे (गुणधर्म) ठरवते. कुणाकडून काय कार्ये करून घ्यायची याबाबत ऊर्जेला ज्ञान असते. अशाप्रकारे प्रत्येक अणुमध्ये ठराविक ज्ञान साठवलेले असते. 

एकाच प्रकारचे अणू  एकत्र येवून एक पदार्थ बनतो. पदार्थाच्या घटक अणुमधील माहिती आणि ऊर्जेनुसार तो पदार्थ कसा वागेल हे ठरते. त्यानुसार त्या पदार्थाचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म ठरतात. वेगवेगळे अणू एकत्र येवून रेणू (Molecule) तयार होतात. एका प्रकारचे रेणु एकत्र येऊन जटिल पदार्थ तयार होतो. त्या जटिल पदार्थाचे गुणधर्मही त्यातील घटक रेणूमधील ऊर्जा ठरवते. 

वेगवेगळे अणु-रेणू एकत्र येवून पेशीचा एक अवयव बनतो. शरीराच्या प्रत्येक पेशीला केंद्रक (nucleus), रायबोझोम, लायझोझोम, मायटोकोन्ड्रीया असे वेगवेगळे अवयव असतात. पेशीच्या प्रत्येक अवयवाचे कार्य तिच्या घटक अणु-रेणुमध्ये साठवलेली ऊर्जाच करत असते. पेशीच्या अनेक अवयवापासून एक पुर्ण पेशी बनते. पेशीचे गुणधर्म आणि कार्य तिच्या घटक अवयवांमध्ये साठवलेली उर्जा ठरवते. 

अनेक पेशी एकत्र येवून समुद्रातील एखाद्या साध्या बहुपेशीय जीवाचे संपुर्ण शरीर तयार होते. वेगवेगळी कामे करणाऱ्या पेशी एकत्र येऊन उन्नत जीवाच्या शरीराचा एखादा अवयव तयार होतो. उदा- हृदय, फुफ्फुस, लिव्हर, किडनी, आतडे, इत्यादी. घटक पेशींच्या कार्यानुसार त्या अवयवाचे गुणधर्म आणि कार्य ठरलेले असते. उदा- हृदयाचे स्नायू आकुंचन प्रसरण पावून रक्त पंप करतात. त्यामुळे रक्ताभिसरणाचे कार्य घडते. फुफ्फुसांमध्ये हवेतील आणि रक्तातील आॕक्सिजन तसेच कार्बन डायऑक्साइड यातील आदलाबदल होण्याचे कार्य घडते. 

अनेक अवयव एकत्र येवून एक जटील शरीर संस्था निर्माण होते. शरीर संस्थेच्या अवयवांमधील घटक पेशींमध्ये असणाऱ्या अणुरेणुंमध्ये साठवलेल्या ऊर्जेच्या माध्यमातून होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांमुळे शरीर संस्था वेगवेगळे कार्य पार पाडत असते. उदा – तोंड, अन्न नलीका, जठर, लिव्हर, स्वादुपिंड, लहान आतडे, मोठे आतडे मिळून पचन संस्था तयार होते. पचनसंस्था अन्न पचनाचे कार्य करून शरीराला आवश्यक पोषणतत्वे शोषून घेते. 

अनेक शरीर संस्था एकत्र येऊन मानवी शरीरासारखे एक महाजटील शरीर तयार होते. विविध शरीर संस्थांच्या कार्यांत समन्वय निर्माण होत त्यानुसार शरीराचे कार्य चालते. मेंदूतील पेशींमध्ये चालू असलेल्या रासायनिक उर्जेच्या खेळातून विद्युत करंट (Action potential) निर्माण होतात. ते मेंदूच्या पेशींमधून ठराविक मार्गाने फिरले की ठराविक विचार निर्माण होतात. विचारांमधून मानवी मन तयार होते. मनाचे कार्य या विचारांवर अवलंबून असतात.

अणु-रेणु एकत्र येवून मानवी शरीरासारखी एक किचकट मशीन तयार होते. कुठलेही मशीन उर्जेवर चालते. ATP सारख्या अणुरेणूंमध्ये साठवलेल्या उर्जेवर शरीररूपी मशीन चालते. अणूपासून संपूर्ण शरीरापर्यंत प्रत्येक घटकामध्ये नेमके कुठले कार्य घडवून आणायचे याचे ज्ञान असलेली ऊर्जा कार्यरत आहे. ब्रह्म म्हणजे ज्ञान. ज्ञानाने संपन्न या जीवनउर्जेला ब्रम्हउर्जा असे म्हणता येईल. ही ब्रम्हऊर्जाच आपल्या अस्तित्वाचे मूळ कारण आहे. आपले अस्तित्व या ज्ञानउर्जेमुळेच शक्य झाले आहे. 

मानवी जीवनास कारणीभूत ठरणाऱ्या ब्रम्हउर्जेचे एक जटिल स्वरूप म्हणजेच अनुवंश. तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत होत असतो. मागील अनेक जन्मांपासून अनुवंश चालत आला आहे आणि पुढे अनेक जन्म तो चालत राहणार आहे. आता अनुवंश म्हणजे नक्की काय ते पाहू. मानवी शरीर ३७ लाख कोटी पेशींनी बनलेले आहे. प्रत्येक पेशीमध्ये एक केंद्रक (Nucleus) असते. या केंद्रकामध्ये ४६ गुणसुत्र म्हणजे chromosomes असतात. त्या ४६ गुणसुत्रांपैकी 23 गुणसुत्र आईकडून तर 23 वडिलांकडून आलेले असतात. हे गुणसुत्र म्हणजे दुसरे तिसरे काही नसून DNA चा एक बंडल असतो. हा DNA एक प्रकारचा दोरीसारखा लांब जटिल रेणू आहे. प्रत्येक मानवी पेशीमध्ये एकुण 2.2 मीटर लांबीचा DNA असतो. एवढा मोठा DNA सूक्ष्म पेशीच्या अतिसूक्ष्म केंद्रकात कसा मावणार? त्यासाठी DNA चा एक एक तुकडा स्वतःभोवती गुंडाळून गुंडाळून एका गुणसुत्राच्या रूपाने आकाराने अतिसूक्ष्म केला जातो. DNA चे ४६ बंडल म्हणजे आपले ४६ गुणसुत्र. ते इतकी कमी जागा व्यापतात की पेशीकेंद्रक या 10 micro meter इतक्या लहान जागेत सर्व ४६ गुणसुत्रे मावतात. 

DNA मध्ये अनुवांशिक माहिती जीन्सच्या स्वरूपात साठवलेली असते.  एक ठराविक प्रथिन (Protein) तयार करण्याची माहिती लांबलचक DNA च्या एका ठराविक तुकड्यात कोडच्या स्वरूपात साठवलेली असते.  ठराविक प्रथिनं तयार करणाऱ्या DNA च्या त्या ठराविक तुकड्याला एक जनुक वा जीन असे म्हणतात. प्रत्येक जनुकामधील कोडनुसार एक प्रथिन तयार होते. ते प्रथिन शरीरात ठराविक काम करते. आपले संपूर्ण शरीर आणि त्याला नियंत्रित करणाऱ्या यंत्रणा या मुख्यत्वे प्रथिनांपासून बनलेल्या असतात. अशा प्रकारे DNA मधील अनुवंशाचे  शरीर आणि मनाच्या कार्यावर पूर्ण नियंत्रण असते. मनुष्याचे दिसणे, विचार करणे, बोलणे, वागणे इत्यादी सर्व अनुवंशानुसार घडते. DNA पासून प्रथिने तयार होण्याची प्रक्रिया रसायनांमध्ये साठवलेल्या ब्रम्हउर्जेशिवाय शक्य नाही. पुढे प्रथिने ब्रम्हउर्जेचाच उपयोग करून शरीरातील विविध कार्य पार पाडतात. 

— क्रमशः भाग पहिला 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares