मराठी साहित्य – विविधा ☆ स्वदेशीचा जादू… भाग – ६ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ स्वदेशीचा जादू… भाग – ६ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

समृद्ध प्राचीन वारसा – ग्रामीण उद्योग

सोपानराव मुलांना आपल्या गावात फेरफटका मारून आणत होते. श्यामराव आणि श्यामलाताई सोबत होत्याच. रामू लोहाराचे काम पाहून ते खाली उतरत असताना श्यामराव गमतीने पिंकी आणि राजेशला म्हणाले, ‘ हे लोहाराचे काम पाहताना मला लहानपणी शिकलेल्या दोन म्हणी आठवल्या बरं का ? ‘

‘श्यामराव, आम्हाला पण जरा कळू द्या की तुम्हाला काय आठवलं ते ? हसत हसत सोपानराव म्हणाले.

‘अरे श्याम, आपल्या वर्गाला त्या भागवत बाई मराठी शिकवायच्या, त्या आठवतात का ? ‘

‘व्हय की. चांगल्या लक्षात हायेत त्या. मला शुद्धलेखन चुकले म्हणून त्यांनी दररोज दहा ओळी शुद्धलेखन लिहून आणायला सांगितलं होतं. आणि नाही लिहून आणलं तर त्या शिक्षा करायच्या. ‘

‘पण सोपान अजूनही भागवत बाई भेटल्या तर तुला शुद्धलेखनावरून शिक्षा करतील बरं ! ‘ श्यामरावांनी असं म्हणताच हास्याचा स्फोट झाला. सगळेच त्यात सामील झाले.

‘हां, तर मला आठवल्या त्या म्हणी त्यांनी सांगितलेल्या. भागवत बाई म्हणायच्या, ‘ संस्कार आणि परिस्थिती माणसाला घडवते. मुशीत जसे सोने उजळून निघते, तसाच परिस्थितीमुळे माणूस. रामू लोहाराच्या भट्टीत लोखंड जसं तावून सुलाखून निघालं. ‘ श्यामराव म्हणाले.

अरे वा, एकदम बरोबर. ‘ सोपानराव म्हणाले. आणि दुसरी म्हण कोणती आठवली बाबा तुला ? ‘

‘अरे सोपान, आपण कधी सोनाराकडे गेलो तर तो आपल्या छोट्याशा हातोडीचे फटके दागिने घडवताना मारताना आपल्याला दिसतो. पण आता पाहिले ना रामू लोहाराकडे. त्याच्याकडे मोठा घण आहे. सोनाराच्या हातोडीचे शंभर फटके आणि याचा एकच दणका बरोबर नाही का ? म्हणून सौ सुनार की और एक लोहार की ही म्हण आठवली. ‘

‘बरोबर आहे मित्रा ‘ सोपानराव म्हणाले.

‘बाबा, आम्हीही या म्हणी ऐकल्या होत्या पण त्याचा अर्थ आम्हाला आता स्पष्ट झाला. ‘ पिंकी म्हणाली.

सगळे रामूच्या ओट्यावरून खाली उतरले आणि पुढे निघाले. काही अंतरावर एक मुलगा आणि एक मुलगी हातात एक फिरकी आणि आकडा घेऊन एक लांबच लांब दोरी फिरवत होते. ती मुलं साधारणपणे राजेश आणि पिंकीच्याच वयाची होती.

राजेश म्हणाला, ‘ बाबा, ही मुलं काही खेळ खेळताहेत का ? ‘

सोपानरावांना हसू आले, ‘ अरे पोरांनो, हा खेळ नाही. त्यांना बिचाऱ्यांना आपलं पोट भरण्यासाठी हा उद्योग करावा लागतो. ही मुलं दोर तयार करत आहेत. दोरी, दोरखंड असं ते तयार करतात. मग त्यांचे आईवडील शेजारच्या गावांमध्ये ज्या दिवशी आठवडे बाजार असेल त्या दिवशी विक्रीसाठी घेऊन जातात. फार मेहनत आणि चिकाटी आहे त्यामागे. ‘

‘अच्छा काका. म्हणजे अशा प्रकारे दोर तयार करतात तर ! आम्ही कधी पाहिले नव्हते. कशापासून बनवतात ते दोर ? ‘ पिंकीनं विचारलं.

‘तसं तर अनेक वस्तूंपासून दोर तयार करतात. म्हणजे गवत, ताग, कपाशी, लव्हाळे, काथ्या यासारख्या वस्तू वापरल्या जातात. पण आमच्या इथे जवळच मोठं जंगल आहे शिवाय शेती आहे. शेतीच्या बांधावर आणि जंगलात घायपात नावाची वनस्पती उगवते. तिच्यापासून दोर करतात. घायपातला घायाळ, केकती अशी पण नावं आहेत. पण आता या बिचाऱ्यांचा व्यवसाय कमी झाला आहे. लोक त्यांच्याजवळून दोर विकत घेण्यापेक्षा शहरातील दुकानांमध्ये जाऊन माल विकत घेणे पसंत करतात. त्यामुळे असे दोरखंड तयार करणारे कारागीर आता ग्रामीण भागात फार कमी आहेत. ‘

‘काका, किती छान आणि नवीन माहिती मिळाली आम्हाला !’ राजेश म्हणाला.

‘चला, आता आपण जरा दुसरीकडे जाऊ. मी येथील कुंभार आळीत तुम्हाला नेतो. ‘ सोपानकाका म्हणाले. जवळच्या एका बोळातून ते सगळे मग कुंभार आळीत शिरले. त्या आळीत तीनचार कुंभारांची घरे होती. काही घरांच्या बाहेर माठ रचून ठेवले होते. काही ठिकाणी पाणी भरण्याचे मोठे रांजण होते. कुठे कुठे मातीच्या चुली दिसत होत्या. विविध प्रकारची मातीची भांडी होती. पोळ्यासाठी लागतील म्हणून मातीचे बैल तयार करून त्यांना रंग देणे काही ठिकाणी सुरु होते. एका ठिकाणी एक कुंभार बाबा एका चाकावर झाडांसाठी लागणाऱ्या मातीच्या कुंड्या तयार करताना दिसत होते. ‘

‘रामराम हरिभाऊ. पाहुण्यांना घेऊन आलो तुमच्याकडे. ‘ सोपानराव कुंभार बाबाना म्हणाले.

‘या की मग. पाव्हणं कुठलं म्हणायचं ? हरिभाऊ म्हणाले.

‘हरिभाऊ, हा माझा बालमित्र श्याम. या वहिनी आणि ही त्यांची मुलं पिंकी आणि राजेश. शहरातून आलेत आपला गाव पाहायला. ‘ सोपानराव म्हणाले. ‘ या मुलांना जरा तुमच्या कामाची माहिती सांगा. ‘

आपल्याला कोणीतरी काही विचारते आहे याचा आनंद होऊन हरिभाऊंची कळी खुलली. ते मोठ्या उत्साहाने सांगू लागले.

‘ बाळांनो, या कामासाठी आम्ही लई पारखून माती आणतो बरं का ! नदीकाठची किंवा तलावाकाठची माती लागते. त्या मातीला गाळून, वाळवून मग तिच्यात लीद, गवत, शेण, राख, धान्याची फोलपटे यासारख्या गोष्टी मिसळतो. मग ती चांगल्या प्रकारे मुरू देतो. त्यानंतर तिचे गोळे बनवून मग त्याच्या वस्तू घडवतो. हे चाक, यावर आम्ही वस्तुंना आकार देतो. आता तुम्ही ते पाहताच आहात. त्याशिवाय हा एक दगड आहे. त्याला आम्ही गंडा किंवा गुंडा म्हणतो. त्यामुळे वस्तूला गुळगुळीत आकार येतो. ही एक लाकडी थोपटणी, तिला आम्ही चोपणी म्हणतो. वस्तू तयार करताना तिला बाहेरून आम्ही याच्याने थोपटतो. तयार झालेल्या वस्तू आम्ही ज्या भट्टीत भाजतो, तिला आवा म्हणतात. ‘

‘ पोरांनो, आता आमचा धंदा पूर्वीसारखा राहिला नाही. मातीच्या वस्तू लोक कमी विकत घेतात. पण तुम्हाला म्हणून सांगतो. पूर्वी स्वयंपाकासाठी मातीचीच भांडी वापरली जायची. गोरगरिबांच्या घरात स्वयंपाक त्यांच्यावर व्हायचा. पण आता स्टील, अल्युमिनियम यांची भांडी आली. लोकं तीच घेत्यात पण आरोग्यासाठी मातीचीच भांडी चांगली. त्यात पोषक घटक बी असत्यात आन स्वयंपाकाला लई ब्येस चव येते बघा. आणि चुलीवरच्या जेवणाची टेस्ट बी लई न्यारी असतीया. ‘ हरिभाऊ उत्साहाने बोलत होते. बोलता बोलता एकीकडे त्यांचे कामही सुरु होते.

त्यांच्या हातातील ती कला पाहून राजेश आणि पिंकीला आश्चर्य वाटले. ती दोघेही बराच वेळ त्याचं निरीक्षण करत उभी राहिली. ‘ एकाच प्रकारच्या मातीतून माठ, रांजण, कुंड्या, पणत्या, चुली आदी वस्तू घडत होत्या. ओल्या मातीला हवा तसा आकार देता येतो. त्यातून काय निर्माण करायचे ते आपण ठरवायचे असते. मग भट्टीत भाजली की ती पक्की होतात. मानवी जीवनाला सुद्धा या गोष्टी किती चपखल लागू पडतात, नाही ? ‘ असे विचार श्यामरावांच्या मनात येऊन गेले. श्यामलाताई मनातल्या मनात ‘ फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार ‘ हे गाणं गुणगुणत होत्या. या विश्वाची निर्मिती करणारा परमेश्वरही जणू एक कुंभारच ! तो तर किती वेगवेगळ्या प्रकारे या जगाला आकार देतो, किती वेगवेगळ्या प्रकारचा निसर्ग, माणसे, प्राणी निर्माण करतो. असे विचार त्यांच्या मनात तरळून गेले.

पुढे गेल्यानंतर एका गल्लीत सुतार लोकांनी लाकडापासून केलेल्या काही वस्तू मुलांना बघायला मिळाल्या. अशा प्रकारे खेडेगावातील लोकांचे उद्योग प्रत्यक्ष कसे चालतात ते मुलांना बघायला मिळाले. मुले या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्याने बेहद्द खुश होती. आता संध्याकाळ झाली होती. सूर्यनारायण निरोप घेण्याच्या तयारीत होते. श्यामराव सोपानला म्हणाले, ‘ सोपानराव, आता आम्हाला निघण्याची परवानगी द्या. मुले पण थकली आहेत. घरी जाऊन विश्रांती घेऊ. ‘

परवानगी नाही अजिबात. आपण आता घरी जाऊ. निर्मलानं तुमच्यासाठी मस्तपैकी जेवण तयार केलं असणार. तुमी आता मस्त जेवण करायचं. खूप दिवसांनी आलायसा. रातभर ऱ्हावा. रातीला मस्तपैकी गप्पा मारू. आराम करायचा अन मंग सकाळी न्याहारी करून निघायचं. त्याबिगर मी सोडणार नाही तुम्हाला. ‘ सोपानराव म्हणाले.

श्यामराव हसले. ‘ तू असा सोडणार थोडाच आहेस बाबा आम्हाला. चला रे बाळांनो, आज सोपानकाकांकडे जेवण अन मुक्काम. ‘ राजेश आणि पिंकीनं आनंदाने टाळ्या वाजवल्या आणि सगळे सोपानरावांच्या घरी गेले.

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मी देशाला बांधिल आहे का? कसे?…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “मी देशाला बांधिल आहे का? कसे?…” ☆ सौ राधिका भांडारकर 

मी देशाला बांधिल आहे का? हा प्रश्न अंतर्मुख करणाराच आहे.  जेव्हां  मी माझं स्वतःचं जगणं तपासून पाहते तेव्हां या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मीच मला प्रश्न विचारते की देशासाठी मी नक्की काय करते?  काय करू शकते आणि आतापर्यंत काय केलं?

सीमेवर जाऊन हातात बंदूक घेऊन आपण देशाचे रक्षण तर करू शकत नाही पण एक सामान्य नागरिक म्हणून जगताना निदान एक चांगली नागरिक म्हणून तरी जगले का? नागरिकत्वाच्या जबाबदाऱ्या मी काटेकोरपणे पाळल्या का?  अशा विविध प्रश्नांचं एक काहीसं अस्पष्ट पण सकारात्मक उत्तर मला नक्कीच मिळतं की आपल्या वैविध्यपूर्ण समाजातील सलोख्याचे वातावरण निदान आपल्यामुळे बिघडणार नाही याची मी काळजी घेतली. घेत असते. 

देशाने माझ्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा मी देशासाठी काय करू शकते/ शकतो हा प्रश्न अधिक संयुक्तिक वाटतो आणि मग एका प्रातिनिधीक  स्वरूपामध्ये देश माझा मी देशाचा या संकल्पनेतून प्रत्येक भारतीयाची देशाप्रतीची बांधिलकी काय असायला हवी आणि कशी याचं एक व्यापक चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं.

सर्वात प्रथम म्हणजे हा देश माझा आहे,  मी या देशात जन्मलो आहे आणि या देशाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी विश्वाच्या नकाशावर एक परिपूर्ण, स्वावलंबी, लोकशाहीची खरी तत्त्वं बाळगणारा  समृद्ध देश, म्हणून स्थान मिळावे ही भावना रुजली पाहिजे.  

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही आपण अजून विकसनशील देशांच्या यादीतच आहोत. का?  याची अनेक कारणे आहेत.  अगदी वैज्ञानिक, तांत्रिक,  डिजिटल क्षेत्रात अविश्वसनीय प्रगती जरी केली असली तरी देशाच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्यांचं निवारण किती परसेंट झालं आहे हा एक भेडसावणारा प्रश्न आहे. भूकबळी, दारिद्र्य, निरक्षरता, अंधश्रद्धा, अज्ञान, गैरसमजुती, जातीयवाद, धर्मभेद,  स्त्रियांचा अनादर,  त्यांची असुरक्षितता,  त्यातूनच होणारे बलात्कारासारखे गुन्हे, हुंडाबळी, केवळ मतांचे, सत्तेसाठीचे राजकारण,  बेकारी, महागाई,कायदेपालनाच्या बाबतीतली उदासीनता, अशा अनेक भयानक भुजंग विळख्यात आजही आपला देश आवळलेला आहे.  उंच आकाशातली  एखादी भरारी आपण नवलाईने पाहतो त्याचवेळी आपल्या जमिनीवरच्या पायांना चावे घेणार्‍या विंचवांचे काय करायचे?  हा विचार मनात नको का यायला?

ज्यावेळी आपण आपल्या देशाच्या बांधिलकीबद्दल भाष्य करतो तेव्हा जमिनीवरच्या समस्यांचे निराकरण प्रथम झाले पाहिजे असे मला वाटते.  इतर विकसित देशांशी तुलना करताना त्यांचे लष्करी सामर्थ्य, पैसा, पायाभूत सुविधा याचा आपण विचार करतो पण त्या देशातल्या लोकांची मानसिकता आपण जाणून घेत नाही.  शासनाचे नियम ते पाळतात.  नियम मोडणाऱ्याला— मग तो पुढारी असो वा सेलिब्रिटी असो त्याला शिक्षा ही होतेच.  स्थानिक प्रशासनाने नियमांची जी चौकट घातली आहे, ते बंधन न मानता कर्तव्य मानून त्याचे पालन केले जाते. आपल्याकडे मात्र येथे शांतता राखा असे लिहिले असेल तेथे हमखास कलकलाट असतो.  येथे थुंकू नका—नेमके तिथेच पिचकार्‍यांची विचकट रांगोळी दिसते.  नो पार्किंग पाटीच्या ठिकाणीच वेड्यावाकड्या गाड्या लावलेल्या दिसतात.  कृपया रांगेची शिस्त पाळा या ठिकाणीच माणसांची झुंबड उडालेली दिसते.  स्वच्छता राखा तिथेच कचऱ्याचा डोंगर असतो.  यातून एकच मानसिकता झिरपते की नियम हे मोडण्यासाठीच असतात जणूं . तेव्हा भारतीय घटनेने  दिलेले अधिकार, स्वातंत्र्य आणि सुजाण नागरिक म्हणून जगतानाची कर्तव्ये या सगळ्यांचे संतुलन, एक जबाबदार नागरिक म्हणून ठेवणे म्हणजेच देशाशी बांधिलकी जपणे आहे.

राजकारण्यांना प्रश्न विचारण्यापूर्वी प्रत्येक नागरिकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.  गरज फक्त कडक कायद्यांची नव्हे तर गरज सदसद्विवेक बुद्धीची आहे.  कायदा व सुव्यवस्था राखणे ही जरी पोलिसांची जबाबदारी असली तरी नागरिक म्हणून जगताना आपणही पोलिसांचे कान आणि डोळे बनले पाहिजे. 

पर्यावरणाचा विचार करणे, सार्वजनिक स्वच्छतेची काळजी करणे, अन्नाची नासाडी न करणे, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे, ग्रामीण भागातील जनता, कष्टकरी बळीराजा, त्यांच्या समस्या जाणून, तळागाळातील लोकांशी संवाद साधून, एकसंध समाजाची वज्रमूठ— साखळी बांधणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि हीच देशभक्ती आहे.  देशा प्रतीची आपली बांधिलकी आहे.

निसर्गाचं वावर कसं मुक्त मोकळं असतं !  त्यात पेरलेलं, उगवलेलं यावर जसा किडे, मुंग्या, कीटक, पक्षी यांचाही अधिकार असतो तसंच आपण कमावलेलं फक्त आपलंच नसतं.  त्यातलं काही समाजाचं देणं म्हणून बाजूला ठेवावं लागतं, ही भावना वृद्धिंगत झाली पाहिजे.  मी, माझे कुटुंब, माझा समाज आणि माझा देश या स्तरांवर आपलं शांततापूर्ण जीवन अवलंबून असतं.

रस्त्यांवरचे अपघात, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, भूकंप, वादळे,  अवकाळी पाऊस, पिकांची नासाडी,  शेतकऱ्यांची आत्महत्या, दहशतवाद, राजकीय आयाराम गयारामांच्या बातम्या आपण मीडियावर ऐकतो, पाहतो. आणि हळूहळू अलिप्त होतो कारण आपली वैयक्तिक गुंतवणूक त्यात नसते.  कधी रंजकता, कधी  बेचैनी अस्वस्थता जाणवते पण ते अल्पकालीन असते.  सजगपणा, डोळसपणा आणि त्या विरुद्ध आवाज उठवण्याची मानसिकता असणे म्हणजेच देशाविषयीची बांधिलकी ठरते.  कोणीतरी करेल पेक्षा मी का नाही? ही मानसिकता तयार झाली पाहिजे. मी माझ्या देश बांधवांसाठी, उपेक्षित, वंचित घटकांसाठी काय करू शकतो /शकते हे माणुसकीचं भान जपणं म्हणजेच देशाविषयीची बांधिलकी जपणे आहे. 

देशासाठी जगतानाच्या अनेक व्याख्या आता बदलत चालल्या आहेत.  पूर्वी शाळेत तास सुरू होण्यापूर्वी प्रार्थना होत असे. शाळा सुटताना वंदे मातरम म्हटले जायचे. यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्या लोकांचा आदर याची शिकवण असायची.  या गोष्टी आता लुप्त होत चालल्यात असं जरी नसलं तरी त्यातली भावनिक, राष्ट्रीय गुंतवणूक जाणवत नाही.  १५ ऑगस्ट २६ जानेवारी हे राष्ट्रीय दिन असण्यापेक्षा सुट्टी साजरी करण्याचे, आनंदाचे, मजेचे दिवस ठरत आहेत याचं वाईट वाटतं.  देशाचा इतिहास समजून घेणे,  हुतात्म्यांचे बलिदान स्मरणं आणि त्यांचे बलिदान व्यर्थ होऊ नये म्हणून शपथ पूर्वक आपला देश प्रगतीपथावर कसा जाईल याचं धोरण  मनाशी आखणं ही देशाशी आपली बांधिलकी आहे.

या देशात आपण राहतो तिथे फक्त स्वतःपुरता विचार करून जगण्यापेक्षा मी केलेलं कोणतही काम या देशाचं अखंडत्व भंग करणारं नसेल याचं भान जपणं म्हणजेच देशाशी बांधील राहणं  ठरेल.

एक आठ नऊ वर्षाची भारतीय मुलगी दहा-बारा राष्ट्राच्या पंतप्रधानांना आमच्या पिढीसाठी पाणी आणि प्राणवायू ठेवा अशा मजकुराची पत्र पाठवते तेव्हा जाणवतं की  उगवत्या पिढीवर सामाजिक संस्कार करण्याची जबाबदारी मागच्या पिढीने पेलणे म्हणजेच देशाशी बांधिलकी जपणे आहे.

मला हा लेख का लिहावासा वाटला?” याचे उत्तर हे असू शकतं की देशाशी बांधिल राहताना मी देशासाठी काय करू शकते याची पुनश्च उजळणी व्हावी म्हणूनच …

🇮🇳 ।। वंदे मातरम् ।। 🇮🇳

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ न केलेल्या पापाचे धनी? – भाग-2 ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

न केलेल्या पापाचे धनी? – भाग – 2 ☆ श्री संदीप काळे ☆

(आई, वडील, बहीण या सगळ्यांना मी मुकलो होतो. आता असे वाटते, ही शिक्षा संपूच नाही. आपण इथेच संपून जावे. एवढे सारे कमावले होते, ते एका क्षणात संपवले.’’) – इथून पुढे. 

आपल्या कुटुंबाच्या आठवणी सांगत लक्ष्मण यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बाजूला बसलेली त्यांची दोन्ही मुले ही वाघासारख्या बापाला रडताना पाहून भावुक झाले होते. स्वतःला सावरत लक्ष्मण म्हणाले, ‘‘आम्हाला शिक्षा झाली, आम्ही जेलमध्ये आलो. तेव्हा आम्ही बदला घेण्याची भाषा करत होतो. जसजसे दिवस जायला लागले, तसतसे कळायला लागले की कुणाचा बदला घ्यायचा, कशासाठी, ही आपलीच माणसे. आपण लहान होऊ, मोठ्या मनाने पुढे जाऊ. 

हे सारे बळ इथल्या वातावरणाने दिले. आम्ही इथे नामस्मरणाला लागलो. ध्यान करतो, योगा करतो, ग्रंथ वाचतो, यातूनच माणसाकडे पाहण्याची नजर मिळाली.’’ गळ्यात रुद्राक्षाची माळ, कपाळावर अष्टगंध, अबीर-बुक्का, डोक्यावर टोपी आणि सतत चांगले बोलणे अशी लक्ष्मण यांची भावमुद्रा होती. बाप तशी मुलेही.

आमच्या बाजूला असलेले संतोष शेळके, अजय गव्हाणे, प्रमोद कांबळे हे तिघेजण विनयभंगाच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये होते. काय तर त्यांनी एका महिलेकडे पाहिले म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली. 

सोबत जे दोन पोलिस होते त्यामधले एकजण सांगत होते, विनयभंग आणि पोक्सो या दोन प्रकरणांमध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. 

आम्ही जेलमध्ये फेरफटका मारत कैद्यांशी बोलत होतो. एक जण ज्ञानेश्वरी वाचत बसले होते. आम्ही जाताच त्यांनी त्यांचे वाचन थांबवले. मला दोन्ही हात जोडत नमस्कार केला आणि म्हणाले, ‘‘बोला माऊली, काय म्हणताय.’’ आम्ही बसलो आणि एकमेकांशी बोलत होतो.   

माझ्यासोबतचे पोलिस सहकारी जांभया देत होते. ते ज्ञानेश्वरी वाचणारे म्हणाले, ‘‘काय माऊली, भूक लागली की काय?’’ 

ते पोलिस म्हणाले, ‘‘होय, आता जेवणाची वेळ झाली आहे ना?’’ 

जे ज्ञानेश्वरी वाचत होते. त्यांचे नाव सचिन सावंत. सचिन बीडचे, त्यांनी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी, तिन्ही मुलींना, पत्नीला खल्लास केले. स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात ते वाचले. मुलीच्या रूपाने असलेला वंशाचा दिवा तर विझलाच होता, पण आता सचिन यांना म्हातारपणात कोणी पाणी पाजायलाही शिल्लक उरले नव्हते. बीडमधले ते सोन्यासारखे वातावरण ते जेलपर्यंतचा सचिनचा सगळा प्रवास ऐकून माझ्या अंगावर काटे येत होते.

बोलता बोलता सचिन म्हणाले, ‘‘मी तुकाराम महाराज तेव्हाच वाचले असते, तर असा राग केला नसता.’’ सचिन आपल्या तिन्ही मुलींनी लावलेली माया, त्यांची आठवण करून हुंदके देत रडत होते.

अहंकाराला घेऊन तुकाराम महाराज काय सांगून गेले हे सचिन आम्हाला अभंगांच्या माध्यमातून सांगत होते. आता रडायचे कुणासाठी, कुणाला माया लावायची. जेलमधून बाहेर जायचे तर कुणासाठी जायचे हा प्रश्न सचिन यांच्यासमोर होता.

कोणालाही भेटा, कोणाशीही बोला, प्रत्येकाची एक वेगळी कहाणी होती. त्या कहाणीला दोन कंगोरे होते. एक म्हणजे, मला विनाकारण आतमध्ये टाकले. माझा दोष नसताना, माझे नाव केसमध्ये घेतले. दुसरे, होय मी गुन्हा केला, पण त्यावेळी तो गुन्हा रागातून आणि द्वेषातून झाला, आता मी सुधारलोय, असे सांगणारे अनेक कैदी होते. 

आम्ही बोलत होतो, तितक्यात ‘नमस्कार साहेब, नमस्कार साहेब’ असा आवाज आला. मी मागे वळून पाहतो तर काय, जाधव आमच्या दिशेने येत होते. अनेक जेलमध्ये जाधव यांनी अधिकारी म्हणून आपल्या सामाजिक कामाची छाप पाडलीय. 

आम्ही जाधव यांच्या कार्यालयाकडे निघालो. जाताना मी जाधव यांना म्हणालो, ‘‘किती गंभीर आहे हे सर्व.’’ 

जाधव म्हणाले, ‘‘तुम्हाला सर्वांनी तसे फार वरवरचे सांगितले असेल, पण परिस्थिती त्याहूनही वाईट आहे. रागाच्या भरात आणि द्वेषातून ही माणसे इथे आलेली आहेत. आपल्या राज्यामध्ये ५४ पेक्षा अधिक कारागृह आहेत. या कारागृहामध्ये ३२ हजारांहून अधिक कैदी आहेत. त्या प्रत्येकाची कहाणी अशीच आहे, इतकीच बिकट आहे.’’

आम्हाला सोडायला आलेले सचिन आकाशाकडे पाहत हात जोडून म्हणाले, ‘‘ही माणसे एक निमित्त आहेत. करणारा करता धरता तो वर बसला आहे.’’

कुणी आईला घेऊन भावनिक होते, तर कुणी बहिणी, मुलांना घेऊन. अनेकांनी आपल्या झालेल्या बाळाचे तोंडही पाहिले नव्हते. जाधव यांच्यासाठी हे नवीन नव्हते. माझ्यासाठी नक्कीच हे नवीन होते. 

मी जाधव यांच्यासमवेत अगदी जड पावलांनी त्यांच्या कार्यालयाकडे निघालो. मी जाधव यांना म्हणालो, ‘‘भाई, हे सर्व थांबणार कधी?’’

जाधव म्हणाले, ‘‘जोपर्यंत चंद्र, तारे, सूर्य आहे तोपर्यंत हे असेच राहणार आहे. फक्त यामध्ये प्रमाण कमी होऊ शकते. जर संस्कार चांगले असतील तर.”

मी जाधव यांना म्हणालो, “ज्यांचा दोष नाहीये, ते या जेलमध्ये आहेत, अनेक जणांनी पैसे भरले नाहीत, कागदपत्रे पूर्ण नाहीत म्हणून जेलमध्ये आहेत, त्यांना कोणी वाली नाही का?”

जाधव अगदी शांतपणे म्हणाले, ‘‘शासन, सामाजिक संस्था या लोकांना पाहिजे तशी मदत करतात, पण सगळ्यांपर्यंत ही मदत जाऊ शकत नाही. त्याला बराच अवधी लागेल.’’ 

मीही त्यांना प्रतिसादाची मान हलवली. मी तिथून निघालो, जेलमधल्या त्या सगळ्या घडलेल्या कहाण्या, त्या सर्व कैद्यांचे सुकलेले डोळे पाहून मीही अगदी उदास झालो होतो. काय बोलावे, कोणासमोर बोलावे आणि कशासाठी बोलावे हे प्रश्न माझे मलाच पडले होते. 

छोट्या छोट्या वादामध्ये माणसांच्या आयुष्याचा सत्यानाश कसा होतो याची अनेक उदाहरणे मी अनुभवून आलो होतो. जेव्हा एखाद्याच्या हातून चूक घडते, तेव्हा आपले कोणीही नसते. जेव्हा कुणाला मदतीची गरज लागते तेव्हा त्याला कोणीही मदत करत नाही. चूक झाल्यावर मोठ्या मनाने माफ करायलाही कोणी पुढे पुढाकार घेत नाही. अशा परिस्थितीत जगणारी माणसे जिवंत आहेत का मेलेली हेच कळत नाही. मागच्या जन्मीचे पाप, नशिबाचे भोग, आई-वडिलांनी केलेले पाप, अशा कितीतरी वेगवेगळ्या शब्दांनी या कैद्यांनी आपल्या मनाचे समाधान करून घेतले. काय माहित या कैद्यांच्या अंधाऱ्या आयुष्यामध्ये कधी प्रकाशाचे किरण दिसणार आहे की नाही?

– समाप्त – 

© श्री संदीप काळे

९८९००९८८६८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “स्वातंत्र्य दिनाचे चिंतन… प्रतिज्ञा व सत्य” 🇮🇳 ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “स्वातंत्र्य दिनाचे चिंतन… प्रतिज्ञा व सत्य… 🇮🇳” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

भारत माझा देश आहे

.. पण माझ्या देशात भारत आहे का ?

 

सारे भारतीय माझे बांधव आहेत

.. माझे सारे बांधव भारतीय आहेत का ?

 

माझ्या देशावर माझे प्रेम आहे।

.. माझ्या प्रेमाच्या यादीत देश कुठे आहे ?

 

माझ्या देशातल्या समृद्ध आणि .. विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।

,, देशाची समृद्धी कोणत्या चॅनलवर दाखवतात ?

.. परंपरांचा अपमान पदोपदी दिसतोच परंतू

.. अभिमानास्पद परंपरांची माहिती कुणाला आहे?

 

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।

.. पाईक होणे सोडा पण परंपरा झुगारण्यातच धन्यता मानणारी माणसेच हार घालून मिरवतात

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन

.. पालक, गुरुजन व वडिलधा-यांचा अपमान होणार नाही येवढेतरी घडते असे दिसते का ?

 

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।

.. सामान्य माणसाशी सौजन्याने कोण वागते हो ?

 

माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे।

.. निष्ठा या शब्दाच्या ख-या अर्थाशी किती जणांचा संबंध येतो ?

 

 त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे।

.. स्वत: व्यतिरिक्त कुणाचे कल्याण अथवा समृद्धी वा सौख्य यांचा विचार करणारे किती हो ?

बोले तैसा न चाले त्याची

सध्या वंदितो आम्ही पाऊले.

कराल विचार निदान आज ?

बनवायचा भारत महान ?

…. “१५ ऑगस्ट” – भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 🇮🇳

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ हिंदुनृसिंह…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसास्वाद – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆  हिंदुनृसिंह…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆  हिंदुनृसिंह…. स्व. वि. दा. सावरकर ☆

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा

हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा

हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना

करि अंतःकरण तुज, अभि – नंदना

तव चरणिं भक्तिच्या चर्ची। चंदना

गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 

हा भग्न तट असे गडागडाचा आजी

हा भग्न आज जयदुर्ग आसवांमाजी

ही भवानीची ह्या पुन्हा गंजली धारा

ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा

गड कोट जंजिरे सारे । भंगले

जाहली राजधान्यांची । जंगले

परदास्य – पराभवि सारी । मंगले

या जगती जगू, ही आज गमतसे लज्जा

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी

जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी

जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी

जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी

ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे

ती बुद्धि भाबड्या जिवां । लाहुं दे

ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे

दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थें तुज ज्या

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 –  कवी – वि. दा. सावरकर

☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

प्रस्तुत कविता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना १९२६ मधे लिहिली आहे. (ते शाळकरी असताना लिहिली असा कांही लोकांचा गैरसमज आहे.)

या कवितेत प्रखर बुद्धिमंत सावरकरांनी फारशा प्रचलित नसलेल्या पण चपखल अशा मराठी व संस्कृत शब्दांचा वापर केला आहे. उदा. संभूत, दिप्तितम, चर्ची, गूढाशा, शोणित इ. या कवितेची रचना भूपतिवैभव या मात्रावृत्तात केलेली आहे.

छत्रपती शिवाजीमहाराज हे भारतीयांचे स्फूर्तिस्थान आहेतच पण त्यांच्याविषयी सावरकरांसारखा प्रखर देशभक्त जेंव्हा स्फुर्तीगीत लिहितो तेंव्हा ते महाराजांच्या भवानी तलवारीसारखं तेजःपुंज व धारदार होतं. पं. हृदयनाथ मंगेशकर व गानकोकिळा लता मंगेशकर या द्वयीने हे गीत स्फूर्तिदायक व रोमांचक बनवण्यात मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांचे सूर व संगीत इतकं अर्थवाही आहे की गीत ऐकल्यानंतर कुणीही भारतीय रोमांचित झाल्याशिवाय रहात नाही. या तीन कडव्यांच्या गीताच्या पहिल्या कडव्यात महाराजांचं स्तुतीपर वर्णन करून त्यांना वंदन केलेलं आहे. दुसर्‍या कडव्यात हिंदुस्थानातील सद्यस्थितीचं (त्या काळातलं -१९२६ मधलं) वर्णन केलं आहे आणि तिसऱ्या कडव्यात महाराजांकडं मागणं मागितलेलं आहे. जेणेकरून आपला स्वातंत्र्य लढा यशस्वी होईल.

पहिल्या कडव्यात ते महाराजांचं वर्णन ” हिंदूंच्या शक्तीतून प्रकट झालेलं तेज, हिंदूंच्या वर्षानुवर्षांच्या तपस्येचं फलित म्हणून जन्मलेला तेजःपुंज ईश्वरी अवतार, हिंदुदेवतेचा सौभाग्यालंकार, नरसिंहाप्रमाणे दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी अवतरलेला प्रभूचा अवतार” असं केलं आहे. आणि ते म्हणतात हे हिंदुराष्ट्र तुला वंदन करीत आहे, चंदनाचा लेप लावून तुझं पूजन करीत आहे, अंतःकरणपूर्वक अभिनंदन करीत आहे. सावरकर म्हणतात, ” माझ्या मनात ज्या गूढ आशा आहेत त्या मी तुला कथन करू शकत नाही. तरी त्या ओळखून, हे नृसिंहाचा अवतार असणाऱ्या शिवाजीराजा माझ्या या इच्छा तू पूर्ण कर. ” ही कविता लिहिली तेंव्हा सावरकर स्थानबद्धतेत असल्यामुळे स्वातंत्रप्राप्तीची इच्छा प्रकट करू शकत नव्हते म्हणून ‘गूढाशा’ हा शब्द वापरला आहे.

दुसर्‍या कडव्यात परकीय आक्रमणामुळे देशाच्या झालेल्या दुरावस्थेचं वर्णन केलं आहे. महाराजांनी निर्माण केलेल्या, जतन केल्या गड किल्ल्यांची अवस्था सांगितली आहे. कुठे तट भंगले आहेत, गड, कोट, किल्ले, जंजिरे भग्न पावले आहेत, राजधान्यांची जंगले झाली आहेत, साऱ्या मंगलगोष्टी परदास्यामुळे पराभूत झाल्या आहेत. महाराजांसारखे वीरपुरूष नसल्यामुळे भवानी तलवारीची धार गंजली आहे. अशातच आई भवानीही आधार देत नाही. अशा या जगात जगणं अत्यंत लज्जास्पद झालं आहे.

तिसऱ्या कडव्यात सावरकर म्हणतात, ” ज्या शुद्ध हृदयाच्या राजाला रामदास स्वामींनी आपलंसं केलं होतं, ज्या बुद्धिमान राजाने विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही व वऱ्हाडची इमादशाही अशा पाच शाह्यांना ‘त्राहि भगवान’ करून सोडलं होतं, जो राजा कूटनीतीचा युक्तीने उपयोग करून, वेळप्रसंगी तह करून, बलवान शत्रुला गाफील ठेऊन पराभूत करीत असे ; त्या राजाची अंतःकरणाची शुद्धी आमच्या कृतीत उतरू दे. ती बुद्धी माझ्या भाबड्या देशबांधवांना लाभूदे. ती शक्ती आमच्या नसानसातून (रक्तातून) वाहू दे. हे राजा, जो स्वराज्याचा मूलमंत्र तुला समर्थ रामदास स्वामींनी दिला, तो मंत्र तू आम्हाला दे. म्हणजे त्या मंत्रसामर्थ्याने, ती शक्ती व युक्ती वापरून, त्या शुद्धी व बुद्धीच्या योगाने आम्ही हिंदुस्थानचे बांधव परकियांना येथून हुसकावून स्वातंत्र्यप्राप्ती करून घेऊ. “

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वदेशीचा जादू… भाग – ५ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ स्वदेशीचा जादू… भाग – ५ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

समृद्ध प्राचीन वारसा – ग्रामीण उद्योग

हेमाडपंती मंदिर पाहिल्यानंतर पिंकी आणि राजेश खुशीत होते. त्यातच खूप दिवसांनी उसाचा रस प्यायल्याने त्यांना आनंद झाला होता. गाडी घनदाट अशा अभयारण्यातून जात असल्याने प्रवासाची मजा काही औरच होती. एका ठिकाणी विश्रांतीसाठी जागा पाहून श्यामरावांनी गाडी थांबवली. ते ठिकाण डोंगरापासून अगदी जवळ होते. झाडांच्या गर्द सावलीत मध्यभागी मोकळी जागा होती. समोरच्या बाजूस असलेल्या भव्य डोंगररांगा लक्ष वेधून घेत होत्या. निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज कानावर पडत होते. मधूनच झाडांवर असलेली माकडे इकडून तिकडे मजेत उड्या मारीत होती. आपल्या छोट्या पिल्लाला छातीशी कवटाळून माकडिणी सुद्धा झाडांवर उड्या घेत होत्या. ते सगळे पाहून पिंकी आणि राजेशला खूपच गंमत वाटली. त्यांनी आपल्याजवळील बिस्किटे, घरून आणलेल्या नारळाच्या वड्या त्यांना खाण्यासाठी दिल्या.

मोकळी हवा, गर्द झाडी, प्रदूषणरहित आणि शांत वातावरण मन प्रसन्न करीत होते. श्यामरावांनी आपल्याजवळील कॅमेऱ्याने भोवतालच्या निसर्गाचे सुरेख चित्रीकरण केले. आता सगळ्यांनी झाडांच्या सावलीत असलेल्या मोकळ्या जागी सतरंजी टाकून जेवणाचा आस्वाद घ्यायचे ठरवले. सगळ्यांनाच भूक लागली होती. श्यामलाताईंनी घरून निघताना जेवणाची सगळीच तयारी करून घेतली होती. तांबड्या भोपळ्याच्या दशम्या, पोळ्या, वांग्याचं भरीत, शेंगदाण्याची चटणी, घरीच लावलेले मस्तपैकी दही, जोडीला नारळाच्या वड्या असा फर्मास बेत होता. रोज डायनिंग टेबलवर जेवण घेऊन कंटाळलेल्या मुलांना हे वनभोजन फारच आवडले.

श्यामराव म्हणाले, ‘ पिंकी आणि राजेश, जरा नीट ऐका मी काय म्हणतो ते ! आपण परत जाताना आलो त्याच रस्त्याने जायचं की जवळच एक छानसं खेडं आहे, त्या बाजूने जायचं ? तिथे माझा सोपान म्हणून एक मित्र राहतो. त्यालाही भेटता येईल. जाताना तुम्हाला रस्त्याने शेतं पण बघायला मिळतील. ‘ 

‘अहो बाबा, विचारताय काय ? आम्हाला तर ते खेडेगाव, शेती बघायला आवडेलच. आपण तिकडूनच जाऊ. ‘ पिंकी म्हणाली. राजेशने तर आज मज्जाच मज्जा म्हणून टाळ्या वाजवल्या. सगळे गाडीत जाऊन बसले. श्यामलाताईंनी आपल्या मोबाईलमध्ये जुनी गाणी लावली होती. त्यांना जुनी मराठी गाणी खूप आवडायची. ‘ ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊ दे…’ या गाण्याचा व्हिडीओ त्या पाहत होत्या. पिंकी आणि राजेश कुतूहलानं आई काय पाहतेय हे बघत होते. त्या गाण्यातील लोहाराचा भाता, ऐरण मुलं कौतुकानं बघत होती. गाणं संपलं. पिंकी म्हणाली, ‘ आई, हे गाणं किती छान आहे नाही. आणि गाण्यातली माणसं किती साधी आहेत ! ‘ आई म्हणाली , ‘ पिंकी, अग हे गाणं ज्या चित्रपटात आहे, त्या चित्रपटाचं नावसुद्धा ‘ साधी माणसं असंच आहे. ‘

‘अरे वा, किती छान ! ‘ पिंकी म्हणाली.

‘आई, हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं आहे ना ? ‘ राजेश म्हणाला.

‘हो, बरोबर आहे राजेश. पण आणखी एक गंमत आहे बरं का ! ‘

‘कोणती गंमत, आई ? सांग ना . ‘ राजेश म्हणाला.

‘अरे या गाण्याचं संगीत ऐकलंस ना ! किती छान आहे. हे संगीत कोणी दिलं माहिती आहे का ?

‘कोणी तरी प्रसिद्ध संगीतकार असतील त्या काळातले, ‘ पिंकी मध्येच म्हणाली.

‘बाळांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या गाण्याच्या संगीतकार लतादीदीच आहेत. त्यांनी ‘आनंदघन ‘ या नावाने काही चित्रपटांना संगीत दिलं होतं ‘ श्यामलाताई म्हणाल्या.

तेवढ्यात गाडीने एक वळण घेतले आणि दूरवर गावाच्या खुणा दिसायला लागल्या. थोडं अंतर गेल्यानंतर एका मोठ्या कमानीतून गाडी आत शिरली. एका मोठ्या चिंचेच्या झाडाखाली शयमरावांनी गाडी पार्क केली. या गावात श्यामरावांचा बालमित्र सोपान राहत होता. श्यामराव आल्याचं कळताच सोपान मोठ्या आनंदानं त्यांच्या स्वागतासाठी पुढे झाला. दोन्ही मित्रांची खूप दिवसांनी भेट होत होती. दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली.

श्यामराव म्हणाले, ‘ अरे सोपान, ही माझी मुलं. त्यांना एखादं खेडेगाव बघावं असं वाटत होतं. म्हणून  तुझ्याकडे हक्काने आणले त्यांना. त्यांना जरा गावातून फिरवून आणू या. ‘

‘अरे हो पण आधी आपण घरी जाऊ. तुम्ही सगळे फ्रेश व्हा. मग जाऊ की मुलांना गाव दाखवायला. ‘ सोपान म्हणाला.

सोपानच घर म्हणजे एक जुना वाडा होता. दगडी बांधकाम आणि लाकडाचं छत. घरात स्वच्छता, उजेड भरपूर होता. बाहेरच्या उन्हाचा अजिबात ताप जाणवत नव्हता. निर्मलावहिनींनी सगळ्यांना घर दाखवलं. निर्मलावहिनी सगळ्यांसाठी गूळ घातलेलं कैरीचं पन्हं घेऊन आल्या. सगळ्यांच्या छानपैकी गप्पा झाल्या. श्यामलाताई मुलांना म्हणाल्या, ‘ बाळांनो, सोपानकाकांचं घर नीट पाहिलंत का ? ‘

‘हो आई,’  पिंकी आणि राजेश म्हणाले.

‘बाळांनो, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का ? सोपानकाकांकडे फ्रिज नाही. ‘ श्यामलाताई म्हणाल्या. ‘ ‘ अग आई, खरंच की. ही गोष्ट लक्षातच आली नाही आमच्या. ‘ पिंकी म्हणाली.

बाळांनो, आता आपण कैरीचं पन्हं घेतलं. किती चवदार होतं ते ! थम्स अप, कोका कोला,पेप्सी यासारखी कृत्रिम शीतपेयं पिण्यापेक्षा घरीच बनवलेलं कैरीचं पन्हं, लिंबाचं सरबत, कोकम सरबत, यासारखी पेयं शतपटीनं आरोग्यदायी असतात. कृत्रिम शीतपेयात मोठ्या प्रमाणावर साखर आणि घातक रसायने असतात. शिवाय फ्रिजपेक्षा माठातील पाणी आरोग्याला अतिशय चांगले असते. ‘

‘व्हय व्हय पोरांनो, तुमची आई सांगते ते बरोबर आहे बरं का. आणि एक सांगतो. आमच्याकडे कोणीच चहा घेत नाही. गोठ्यात गाई आहेत. त्यांचे ताजे दूध असते. घरीच बनवलेलं ताक, दही आम्ही वापरतो. शेतातील ताज्या भाज्या, फळे आम्ही खातो. फ्रिजची गरजच नाही. ‘ श्यामराव हसत हसत म्हणाले, ‘ हे आमच्या सोपानरावांच्या उत्तम तब्येतीचं रहस्य आहे म्हणायचं. ‘

‘व्हय की. श्यामभाऊ आम्ही काही मोठा आजार असला तरच शहरात डॉक्टरकडे जातो. नाहीतर आम्हाला साधी गोळी बी म्हाईत नाय. ‘

मग सोपानकाका म्हणाले, ‘ चला रे मुलांनो. आमचं गाव दावतो तुम्हाला. तुमच्या शहरासारखं मोठं नाही बरं का ! बघा, आवडतं का तुम्हाला. ‘

श्यामराव म्हणाले, ‘ सोपान, अरे आम्ही पण येतो की. आपण सगळेच जाऊ. ‘

श्यामलाताई पण तयारच होत्या. सगळेच निघाले. गावात छोटी छोटी घरं होती. काही मातीची, काही सिमेंटची. काही घरे उंच अशा दगडी ओट्यावर होती. मुलांना मजा वाटत होती. गावाच्या एका कोपऱ्यात रामू लोहार राहत होता. एका उंच दगडी ओट्यावर त्याचे घर होते. मुले तिथे पोहोचली तेव्हा रामू कामच करीत होता. एका हाताने तिथे असलेला भाता खालीवर होत होता. त्याच्या हवेने भट्टीतील निखारे लालभडक फुलले होते. त्या भट्टीत त्याने काहीतरी लोखंडाची वस्तू ठेवली होती. ते सगळं पाहून मुलं काही काळ तिथं थबकली.

सोपानकाका म्हणाले, ‘ हे बघायचं का रे बाळांनो. ‘

पिंकी, राजेश दोघेही एकदम हो म्हणाले. शहरात त्यांना असं काही बघायला मिळत नव्हतं. पिंकीला आईने मघाशी लावलेलं गाणं आठवलं. ती म्हणाली, ‘ आई, आपण त्या गाण्यात पाहिलं, अगदी तसंच आहे ना इथे ! ‘

‘अगदी बरोबर आहे पिंकी. आता तू आणि राजेश बघा ते काका कसं काम करताहेत ते ! ‘ आई म्हणाली.

रामुकाकांनी मग भट्टीतील ती वस्तू बाहेर काढली. ती तापून चांगलीच लाल झाली होती. रामुकाकांनी एका मोठ्या सांडशीत पकडून ती ऐरणीवर ठेवली आणि आपल्याजवळ असलेल्या मोठ्या लोखंडी घणाने ते त्यावर घाव घालू लागले. तसतसा त्या वस्तूला आकार यायला लागला. कोणीतरी आज आपल्याकडे आपलं काम बघायला आलं आहे याचा रामुकाकांना कोण आनंद झाला होता. ‘ पोरांनो, वाईच बसा की. समदं नीट बघा. हेच आमच्या रोजीरोटीच साधन, ‘

‘काका, तुम्ही काय बनवताय ? ‘ राजेशनं विचारलं.

‘पोरा, आता शेतीचा हंगाम सुरु व्हईल. मंग वावरात कामासाठी निंदणीसाठी, कंपनीसाठी विळे, खुरपं लागत्यात. त्येच मी बनवतो आहे आता. शेतीसाठी, बैलगाडीसाठी लागणाऱ्या वस्तू बी बनवतो म्या.बैल, घोडे यांच्या पायामंदी नाल ठोकावी लागते. त्ये बी बनवतो. घरात लागणारी विळी, खलबत्ता, अडकित्ता आणि काय काय समदं बनवतो म्यां. पण आता आमचा धंदा लई कमी झालाय. लोकं मोठ्या गावात जाऊन वस्तू घेत्यात. ‘

मग रामूने आपण बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू मुलांना दाखवल्या. मुलं मोठ्या कौतुकानं ते पाहत होती. कारखान्यात बनणाऱ्या वस्तूपेक्षा एखादा कारागीर जेव्हा हाताने वस्तू तयार करतो, तेव्हा त्याला किती मेहनत घ्यावी लागते याची जाणीव मुलांना ते पाहून झाली. राजेश आणि पिंकीच्या मनात खूप सारे प्रश्न होते. श्यामलाताई म्हणाल्या, ‘ बाळांनो, आता सगळं व्यवस्थित बघून घ्या. मग जाताना मी तुम्हाला आणखी छान छान माहिती देणार ! ‘

आपल्या छोट्याशा बागेत काम करण्यासाठी मग श्यामरावांनी त्याच्याकडून एक कुदळ, एक फावडे आणि एक विळा विकत घेतला. रामूलाही खूप छान वाटले.

‘ मुलांनो, झालं का तुमचं समाधान ? आता आपण दुसरीकडे जाऊ. ‘ सोपानकाका म्हणाले.

मग सगळेच सोपानकाकाबरोबर पुढे निघाले. राजेश आणि पिंकीला आता सोपानकाका आणखी काय दाखवतात याची उत्सुकता होती. 

क्रमशः… 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फ्रेंडशिप बॅन्ड… ☆ डॉ. प्राप्ती गुणे ☆

डॉ. प्राप्ती गुणे

??

☆ फ्रेंडशिप बॅन्ड… ☆ डॉ. प्राप्ती गुणे ☆

लहान असतो तेव्हा इतकं अप्रूप असतं ना ‘फ्रेंडशिप डे’ चं…

फ्रेंडशिप बँड निवडताना माझी अमुक रंगाची लेस फिक्स म्हणजे फिक्स. सगळ्यांना कळायला हवं आणि लक्षात राहायला हवं की हा फ्रेंडशिप बँड मी बांधलाय. पण माझ्या बेस्ट फ्रेंडला मात्र हा स्पेशल बँड हां ! यात मणी आहेत, ह्यात तिचं नाव ओवून घेतलंय, तिच्यासाठी स्पेशल अंगठी घेतलीये, वगैरे वगैरे.

लहानपणीचे दिवस, नजरेसमोर आता बसलेल्या चिमणीने भुर्रकन उडून जावे, तसे पटकन निघून जातात. मोठे झाल्यावर बालपणीच्या मित्र-मैत्रिणींमध्ये आपण जणू लहानपणीच्या स्वतःलाच शोधत असतो. त्यांच्या डोळ्यात आपल्या लुकलुकणाऱ्या डोळ्यांचे प्रतिबिंब आपल्या आठवणींना उजाळा देत राहतं.

शाळेतून कॉलेजात, कॉलेजमधून ऑफिसमध्ये जाताना काही जणांची आपल्या आयुष्यात भर पडते, तर काहीजण नकळत वजा होतात. ही बेरीज वजाबाकी होता होता काही जण मात्र या हिशेबात नेहमी आपल्या सोबत राहतात. ही शिल्लक म्हणजेच आपली खरी मिळकत असते, बरं. हा आपला खजिना म्हणजेच आपले स्पेशल फ्रेंडशिप बँड्स !

… कधी आपण एकाकी बसल्यावर हलकेच पाठीवर हात ठेवणारे…

… आपण इतक्यात रडणारच की तितक्यात पांचट जोक मारून हसवणारे….

… एकाच गोष्टीवरची वारंवार चर्चा, थोडीशी नापसंतीने, पण हजार वेळा मन लावून ऐकणारे….

… टेन्शनमध्ये असलो की ‘ सब ठीक हो जाएगा ‘, ‘ ऑल इज वेल, जस्ट चील ‘, असे टिपिकल डायलॉग मारणारे….

… व्हाट्सअप वरच्या एका रिप्लाय वरून तुमचा मूड ओळखणारे….

… तुमचं दिखाऊ हसू आणि तुमचं खळखळणारं गडगडाटी हास्य तोंडपाठ असलेले….

… असे हे आयुष्यातले स्पेशल फ्रेंडशिप बँड्स !

मोठे झाल्यानंतर मैत्रीची परिभाषा बदलत जाते. कारण वयापरत्वे माणूस अधिक गुंतागुंतीचा होतो

पण जर कोणती गोष्ट तशीच राहत असेल तर ती असते ” भावना “!…

… प्रत्येक संकटात मित्रासोबत खंबीर उभं राहायची भावना….

… मित्राला काहीतरी दुखावत असेल तर त्या गोष्टीपासून मित्राला प्रोटेक्ट करायची भावना….

… मित्राला मनसोक्त व्यक्त होण्यासाठी त्याचा आधार बनायची भावना….

… मित्राचे सुखदुःख ऐकून त्याला ‘ एक्सपर्ट ॲडव्हाइस ‘ द्यायची भावना…

… मित्र जास्त हवेत उडायला लागला तर त्याला जमिनीवर आणायची आणि मित्र अंधारात असेल तर त्याला प्रकाशात खेचून आणायची भावना…..

… आणि ह्या भावनेलाच तर “मैत्री” म्हणतात.

… हा लेख माझ्या सगळ्या ‘ स्पेशल फ्रेंडशिप बँडस ‘ साठी समर्पित…

©  डॉ. प्राप्ती गुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कथा आमच्या मैत्रीची- मैत्रिणीची… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

कथा आमच्या मैत्रीची- मैत्रिणीची… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

जवळपास तीन वर्षे होत आली मीनाला भेटून ! मी आणि अलका तिला भेटून आलो आणि आठ दहा दिवसातच मीना गेल्याचे कळले आम्हाला! तिचे ते टपोरे डोळे डोळ्यासमोरून जाईनात! त्या डोळ्यात तेव्हा ना ओळखण्याची खूण होती, ना आमच्या अस्तित्वाची जाणीव! ना स्पर्शाची! तरीपण ती मनात कुठेतरी हलली असेल, तिला व्यक्त करता आलं नाही तरी!

मीना आमची लहानपणापासूनची जिवलग मैत्रीण! शोभा, अलका, मीना आणि मी! चौघींची खूप गट्टी होती. मीना आणि मी किती वर्ष शाळेत एका बाकावर बसत होतो. हसत – खिदळत होतो, भांडत होतो, आणि पुन्हा गळ्यात गळे घालत होतो. दुर्दैवाने आम्ही नववीत असतानाच तिचे वडील गेले आणि मीना आपल्या आईबरोबर पुण्याला आपल्या मोठ्या भावाकडे शिफ्ट झाली. मॅट्रिक झाल्यानंतर एस्. पी. कॉलेजला शिक्षण घेत असतानाच ती डेक्कन वर एका लायब्ररीत पार्ट टाइम जॉब करत होती. आहे त्या परिस्थितीत आनंदी राहण्याचा स्वभाव होता तिचा! त्या काळात ती आणि मी भेटत होतोच. ग्रॅज्युएशन नंतर दोघींचीही लग्न एकदमच ठरली. अगदी रुखवताची तयारी सुद्धा दोघींनी मिळूनच केली!

लग्न झाली आणि आम्ही आपापल्या संसारात गुरफटलो! कधीतरी खुशालीचे पत्र जाई एवढेच! तिला दोन मुलगे, मला एक मुलगा आणि एक मुलगी.. संसार गाडी रुळावरून चालू होती. आणि अचानक एक दिवस मीनाला ब्रेन ट्यूमर निघाल्याचे कळले. तिचे मोठे ऑपरेशन झाले. त्यातून ती सही सलामत बाहेर पडली! पण दुर्दैवाने तिच्या मिस्टरांना हार्ट अटॅक येऊन ते अकस्मात गेले. दोन लहान मुले घेऊन मीना पुण्यात सासरच्या घरी परत आली. हे सगळे कळल्यावर खूप वाईट वाटले. तिला आता स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे होते. म्हणून तिने मूकबधिर शिक्षणाचा कोर्स केला आणि नोकरीला सुरुवात केली. नोकरीचे ठिकाण लांब होते, पण सासू-सासर्‍यांच्या आधाराने तिने आपली नोकरी सुरू केली. यथावकाश मुलांची शिक्षणं झाली. नोकरीतून रिटायरमेंट घेऊन मुलांसह आनंदाने राहायची स्वप्ने मीना बघू लागली. मोठ्या मुलाचे लग्न झाले. त्याने सहकार नगर मध्ये फ्लॅट घेतला. आता सुखाचे दिवस आले होते. मध्यंतरीच्या काळात मी एकदा तिला भेटून आले.

धाकटा मुलगा इंजिनियर होऊन दिल्लीला नोकरीला लागला होता. मीना त्याच्याबरोबर दिल्लीला गेली. पण काय झाले कोण जाणे ?पुन्हा डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. ट्रीटमेंट चालू होती, पण आता तिला खूपच त्रास होत होता. म्हणून ती पुण्याला मोठ्या मुलाकडे आली, पण त्यानंतर तिने अंथरूणच धरले. मी आणि अलका तिला भेटायला गेलो. पण ती आता जाणीव नेणीवेच्या पलीकडे होती.

तिच्याकडे बघून खूप काही आठवत होते. ते शाळेचे दिवस, खूप खळखळून हसणे, बडबड करणे, दंगा करणे, हे सगळे आठवले, पण आता त्यातले काहीच नव्हते !ती आम्हाला ओळखत सुद्धा नव्हती. रत्नागिरीचे फाटक हायस्कूल ही आमची शाळा! लहानपणापासून आम्ही एका वर्गात, एका बाकावर! शाळेच्या स्नेहसंमेलनात प्रत्येक गोष्टीत भाग घ्यायचा उत्साह! खेळात, नाचात, नाटकात सगळीकडे भाग घ्यायचा. रत्नागिरी गाव लहान, त्यामुळे सगळेच एकमेकांच्या ओळखीचे !कुणाच्या बहिणीचा, मावशीचा, वहिनीचा कुठलाही कार्यक्रम असू दे आमची तिथे हजेरी असायची! विशेष करून मंगळागौर जागवायला आवडायची. रात्रभर जागायचं, पहाटे घरी यायचं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन रात्री किती मजा केली, याची चर्चा करायची. असे मजेचे दिवस होते ते!

आम्हा सर्व मैत्रिणींचे केस लांब होते. रत्नागिरीत फुले भरपूर !त्यामुळे रोज डोक्यात फुलांचा गजरा किंवा फुले असंतच! परीक्षेच्या दिवसात कैऱ्यांच्या फोडी तिखट मीठ लावून शाळेत आणायच्या आणि सगळ्यांनी त्या आंबट चिंबट गप्पा मारत खायच्या. मधल्या सुट्टीचा डबा तर वर्ग चालू असतानाच संपायचा! उन्हाळ्याच्या सुट्टीत रोज बंदरावर जाऊन भेळ खायची आणि सूर्यास्त झाला की घरी यायचे, असे फुलपाखरी दिवस होते ते!

मीना आमची जिवाभावाची मैत्रीण! रत्नागिरीत असेपर्यंत केलेल्या या गमती जमती ती पुण्याला गेली तरी आम्ही जेव्हा एकत्र भेटत असू तेव्हा चवी चवीने बोलल्या जायच्या! ती वर्षे मागे पडली. सगळ्या जणी बोहल्यावर चढलो आणि वेगवेगळ्या दिशेला, वेगवेगळ्या घरात नांदायला गेलो. मुले बाळे झाली. संसारात रमलो, पण ते लहानपणचे दिवस काही स्मरणातून गेले नव्हते! वेळ मिळेल तेव्हा आम्ही एकत्र येत होतो. तीच मीना आजारी आहे असं कळतात मी आणि अलका तिला भेटायला गेलो. तिच्याशी जरा बोलता येईल असे वाटत होते, पण कसचे काय, तिची अवस्था बघून अक्षरशः भडभडून आले! तिच्या सुनेने तिला आम्ही मैत्रिणी आलोय हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या डोळ्यात आम्हाला ती ओळख पटण्याची खूण दिसेना. खूप वाईट वाटले. तिला भेटून आल्यानंतर काही दिवसातच ती गेल्याचे कळले, पण डोळ्यासमोरून तिचे ते टपोरे डोळे जाईनात !आता तीन वर्षे होतील पण आज मीनाच्या आठवणीने मन भरून आले. नकळत डोळे पाणावले. “मैत्री” म्हणजे काय ते जाणवते आता! इतके वय झाले तरी हा रेशीम बंध तुटत नाही… हीच खरी मैत्री !

(वरील लेख लिहून काही वर्षे झाली, पण अजूनही “मैत्री” म्हंटले की ही माझी जिवाभावाची मैत्रीण आठवते. लहानपणीची ती मैत्री काळजातील असते हेच खरे)

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ न केलेल्या पापाचे धनी? – भाग-1 ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

न केलेल्या पापाचे धनी? – भाग – 1 ☆ श्री संदीप काळे ☆

माझे मित्र अजित जाधव यांची राज्यातल्या एका जिल्ह्यातील जेलमध्ये मोठे अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. ते नागपूर, मुंबई, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी असताना मला त्यांना भेटता आले नाही. म्हटले आता ते आपल्या जवळच आहेत तर भेटून घ्यावे. मी त्यांच्याशी संपर्क केला. माझा फोन आल्याने तेही आनंदीत झाले. ठरल्याप्रमाणे आम्ही भेटलो. मला भेटताच क्षणी त्यांनी कडाडून मिठी मारली.

त्या जेलमध्ये त्यांनी जे जे काम सुरू केले ते ते मला सांगितले. जेलमधला चांगुलपणा, चालणारे काम, नक्कीच वेगळे, चांगले होते. चित्रपटात जेलला घेऊन काहीही दाखवतात, असा माझा मनातल्या मनात विचार सुरू होता. बराच वेळ आमचे बोलणे झाल्यावर मी जाधव यांना म्हणालो, ‘‘भाई, मला जेलमध्ये काही कैद्यांशी बोलण्यासाठी जाता येईल का?’’ 

जाधव बराच वेळ काहीच बोलले नाहीत. थोड्या वेळाने ते म्हणाले, ‘‘बघू, काय करता येते ते, थांबा. ’’ ते आतमध्ये गेले.

थोड्या वेळाने जेलमध्ये असणारे पोलिस माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘‘तुम्हाला जाधव साहेबांनी आतमध्ये बोलावले आहे. ’’ मी आतमध्ये निघालो.

मी जेलचे सारे वातावरण अगदी डोळ्यात आणि मनात साठवून घेत होतो. जेलमध्ये असणारे जेव्हा बाहेर होते, तेव्हा त्यांना बाहेरच्या जगाविषयी फार कुतुहल वाटायचं नाही, पण आता ते सगळेजण आतमध्ये आहेत, तर त्यांना बाहेर काय चाललेय याचे फार कुतूहल वाटते. वर्तमानपत्रात असलेला शब्द न शब्द ते वाचून काढतात. मोठ-मोठी पुस्तके वाचून संपवतात. चांगले तेव्हढेच बोलायचे. मला हे सारे काही दिसत होते.

 जाधव यांनी काही कैद्यांशी माझी ओळख करून दिली. जाधव मला म्हणाले, ‘‘तुम्ही यांच्याशी बोला, मी जरा फेरफटका मारून येतो. ’’ 

एक एक करून मी अनेकांशी बोलत होतो. माझ्याशी फार कोणी बोलण्यासाठी उत्साह दाखवत नव्हते. काहींना शिक्षा झाली होती. काहींना शिक्षा होणे बाकी होते. काहींची सुटका झाली होती, पण अजूनही कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे ते तिथेच होते. काहींचे शासकीय रक्कम भरण्यावरून अडलेय, तर काहींना वकील लावायला कोणी पुढाकार घेत नाही. असे अनेक जण होते जे केव्हाच या जेलच्या चार भिंतींतून बाहेर पडले पाहिजे होते.

तिथे असणाऱ्या प्रत्येकाची कहाणी वेगळी होती. जसे आपण पिक्चरमध्ये पाहतो अगदी त्याहूनही भयंकर. बोलताना कैद्यांच्या डोळ्यात दिसत होते, तो गुन्हेगार नाही, त्यांच्या हावभावावरून ते लक्षात येत होते, हा चांगल्या घरचा आहे. पण अहंकार आणि रागामुळे त्याच्या हातून जे घडायला नाही पाहिजे होते ते घडून गेले.

जेलमध्ये कोण गरीब आणि कोण श्रीमंत, सगळे बिचारे सारखे. प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये एकच आग बघायला मिळत होती, ती म्हणजे ‘मला सोडवण्यासाठी कोणीतरी बाहेरून येईल आणि मला इथून घेऊन जाईल. ‘

अनेक निरक्षर असणाऱ्या कैद्यांना सतत कोर्टात जाऊन-येऊन कायदे एकदम पाठ होते. वकील चुकले कसे इथपासून ते पोलिसांच्या कागदपत्रांमुळे कसा गोंधळ झाला, इथपर्यंत ही सगळी गणिते, अनुमान या कैद्यांना माहिती होते. हे त्यांच्या बोलण्यावरून दिसत होते.

जाधव यांनी माझ्यासोबत दोन पोलिस दिले होते. ते दोघेही म्हणाले, ‘‘आम्ही पेपरमध्ये, पुस्तकातून तुम्हाला नेहमी वाचतो. ’’ जसेही ते दोन पोलिस मला बोलायला लागले, तसे माझ्यासमोर असलेल्या अनेक कैद्यांची माझ्यासोबत बोलण्याची भाषाच बदलली.

मी अनेक कैद्यांशी बोललो, बऱ्याच जणांनी बोलण्याचा समारोप अश्रूंनी केला होता. कुणी फसले, कुणाला फसवले गेले. अनेकांचा दोष नसताना ते तिथे होते. त्यांनी कधीही न केलेल्या पापाची शिक्षा ते भोगत होते, असे मला वाटत होते.

जेलमधली सगळी माणसे तशीच होती. ‘मला आयते खायला मिळते. मी इथे आरामात आयुष्यभर राहतो’ असे तिथे कुणालाही वाटत नव्हते. मी अनेकांशी बोलत होतो.

लक्ष्मण तुरेराव नगरचे. शेतीच्या वादामध्ये भावाचा खून त्यांच्या हातून झाला. त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलेही जन्मठेपेची शिक्षा भोगतात. लक्ष्मण म्हणाले, ‘‘आमचा मोठा परिवार. चार भाऊ, आई, वडील, आम्ही सगळेजण एकत्रित राहायचो. सर्वात लहान भावाच्या बायकोला वेगळे व्हायचे होते. तिथूनच आमच्या घराचे वासे फिरले. हळूहळू आमच्या घरात फूट पडत गेली. सगळे भाऊ वेगवेगळे झाले. एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असणारे भाऊ छोट्या-छोट्या वादावरून एकमेकांचा जीव घ्यायला लागले. शेतीच्या वाटणीवरून वाद झाले.

मधल्या भावांनी माझ्या जमिनीवर नांगर फिरवला. त्यावरून भांडण इतक्या टोकाला गेले की, भांडणामध्ये त्याच मधल्या भावाचा जीव गेला. रागात सगळे काही घडून गेले. शेतीचे सोडा, कोणाला तोंड दाखवायला आता जागा राहिली नाही.

तो माझ्यापेक्षा लहान होता. तो चुकला असला तरी त्याला समजून सांगायचे. नाही तर त्यांना जे पाहिजे ते देऊन टाकायचे ही भूमिका मी मोठा असल्यामुळे घ्यायला पाहिजे होती, पण तशी भूमिका घेतली गेली नाही. आई, वडील, बहीण या सगळ्यांना मी मुकलो होतो. आता असे वाटते, ही शिक्षा संपूच नाही. आपण इथेच संपून जावे. एवढे सारे कमावले होते, ते एका क्षणात संपवले.’’ 

– क्रमशः भाग पहिला

© श्री संदीप काळे

९८९००९८८६८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सगळ्यांना कशाला मिळायला हवा आहे शून्य? – ॲड. ऋचा मायी ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? वाचताना वेचलेले ?

सगळ्यांना कशाला मिळायला हवा आहे शून्य?ॲड. ऋचा मायी ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

‘मुलांना एका विशिष्ट उंचीवरून सुरूवात करता आली तर आकाशाला हात लावणं सोपं होईल का? आपण दिलेल्या सोयींचा, वस्तूंचा देतानाच जर महत्त्व समजावून दिले तर मुलं त्याचा गैरवापर करत नाहीत असं माझं मत. नक्की सांगा तुमचे अनुभव, तुमची मतं.

प्रत्येकानेच शून्यापासून सुरूवात केली तरच ते यशस्वी होतात हे पटतं का तुम्हाला? की मुलांनाही पालकांच्या कष्टाची जाणीव असते ?

नक्की सांगा काय वाटतं?’ 

 – ॲड. ऋचा मायी

सगळ्यांना कशाला मिळायला हवा आहे शून्य?

“बाबा मला बाईक हवी आहे. आजूबाजूला जायला बरी पडते, ऑटोमधे उगाच सारखे पैसे फार लागतात. ” कार्तिक बाबांना म्हणाला.

“अरे मग चाल की जरा, जवळपास जायला बाईक कशाला हवी? तुझे आजोबा दहा दहा मैल चालायचे रोज आणि तुझ्या बाबाला पण आम्ही बाईक दिली नव्हती, बसने जायचं किंवा सरळ चालत.

हे आजकाल नुसती चावी फिरवायची की निघायचं, ह्यामुळेच आजार वाढत चालले आहेत. तुम्ही आजकालची पिढी म्हणजे कठीण आहे. कॉलेजात पाय ठेवत नाही तर मागण्या सुरू. ” जुन्या काळात काटकसरीने, निगुतीने संसार केलेली आजी नातवाची कानउघाडणी करत होती.

“अगं आजी माझं कॉलेज बघ किती मोठं आहे! नुसतं हॉस्टेलपासून क्लासमधे जायचं तर भरपूर चाललं जातं. परत सुट्टीच्या दिवशी कुठे जायचं ठरतं मित्रांचं, मग सगळ्यांकडे वाहन असतं, फक्त माझ्याकडे नाही. मग ह्याला गळ घाल, त्याला गळ घाल करावं लागतं उगाच. बाबाला घेणं शक्य आहे म्हणूनच मागितली बाईक. ”

कार्तिक जरा वैतागला होता पण आजीशी आवाज वाढवून बोलायचा रिवाज नव्हता देशपांडेंकडे, थोडं ठसक्यात तो आपला मुद्दा सोडत नव्हता इतकंच.

“तुम्ही ते हायफाय कॉलेज निवडलं ना तेव्हाच खरं तर मला पटलं नव्हतं, मी बोलले पण होते बाबाला. आता सगळे चोचले पुरवावे लागतील देखादेखीमधे. आज बाईक, उद्या ब्रँडेड कपडे, परवा अजून काही, अभ्यास करायला गेला आहात एवढं ध्यानात ठेवा म्हणजे झालं. ” 

आजीच्या बोलण्यात नातवाबद्दल धाकधूक दिसत होती. आपण खर्चाला मोकळीक दिली म्हणजे मुलं बिघडतात, हा एक साधा हिशोब पिढ्यानुपिढ्या ऐकत आली होती ती.

नातवावर प्रचंड जीव होता, त्यामुळेच त्याचं पाऊल कुठेच घसरता कामा नये ह्यासाठी तिला काहीही विचारलेलं नसताना तिचे सल्ले सुरूच होते.

“मुलांना जितकं आपण तावून सुलाखून वाढवतो तितके ते तयार होतात, जितके जास्त त्यांचे नखरे पुरवाल तितके अंगाशी येईल महेश, अनुभवाचे बोल आहेत हे. नका त्यांच्या सवयी बिघडवू.

आजोबा जर करू शकतात मेहनत, बाप जर करू शकतो तर मुलगाही करूच शकतो ना?”

आजी जरा आता ताणते आहे हे दिसल्यावर कार्तिक ने तिथून मी क्रिकेट खेळायला जात आहे सांगून पळ काढला.

“आई, अगं हे सगळं त्याच्यासमोर बोलायची काय आवश्यकता होती? मी काही लगेच बाईक देणार नव्हतोच पण जरा त्याच्या कलाने घेऊन समजावलं असतं ना. सगळ्या मित्रांकडे आहे तर वाटतं मुलांना. ” बाबांनी कार्तिकची बाजू घेत म्हणलं.

“पालकांना आपलं मूल बरोबर माहित असतं, कार्तिक अत्यंत विचारी मुलगा आहे आणि त्याला मिळालेल्या प्रत्येक संधीच, सुखसोयींचं तो सोनंच करेल ह्या आजोबाचे पण अनुभवाचे बोल आहेत.

हजारो मुलं गेली आहेत डोळ्याखालून इतके वर्षाच्या शिक्षकी पेशात नजर तयार आहे माझी. वाहीयात मुलं एका नजरेत ओळखू येतात. “

“आजोबा थॅन्क यू” म्हणत क्रिकेट खेळून घरात शिरणाऱ्या कार्तिकने पळत येऊन आजोबांना मिठी मारली.

आजोबांनी दाखवलेल्या विश्वासामुळे बळ तर मिळालं होतं पण एक जबाबदारी पडली होती खांद्यावर, मेहनत करून शून्यापासून पन्नास पर्यंत पोहोचलेली देशपांड्यांची गादी लवकरात लवकर शंभरी पार न्यायची.

लाखाचे बारा हजार करणारी आमची पिढी नाही हे आता सिद्ध करायचं ठरवलं होतं त्याने.

बाबा म्हणाले, ”आई ऑफिसहून आली की जाऊ बाईक बघायला, मग पुण्याला पोहोचलास की तिथेच डिलीवरी मागवू. ”

आजीने बटव्यातून पैसे काढून नातवाच्या हातात ठेवत म्हणलं, ”बाईकच्या आधी हेलमेट घ्यायचं कार्तिक, त्याच्याशिवाय चालवली ना तर आजीशी गाठ आहे. ”

कार्तिकला आजीचा विरोध मावळलेला बघून मनापासून आनंद झाला होता. आता एक डगर आई आल्यावर लढावी लागणार होतीच. कारण बाईक म्हणलं की आईचा विरोध असणार होता. लाड म्हणून नसला तरी सुरक्षिततेसाठी नक्कीच असणार होता. पण आई घरी यायच्या आधी आजी तयार झाली असल्याने आईला मनवणे सोपे जाणार होतं आणि नाहीतर आजोबा होतेच, हुकमी एक्का!

लेखिका – सुश्री ऋचा मायी

दिल्ली

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares