माझे वडील संस्कृत चे माध्यमिक शिक्षक व गाढे अभ्यासक होते. जुन्या अकरावीचे संस्कृत व पी.टी. घेत. करवीर पीठात त्यांनी उत्तम अध्ययन केले. त्यांना पीठाचे शंकराचार्य पद स्वीकारा म्हणत होते पण घरच्या जबाबदाऱ्या मुळे त्यांनी ते स्वीकारले नाही. वृद्धत्वात ते थोडे विकलांग झाले नि ते पाहून मला ही कविता स्फुरली.
☆ स्वदेशीचा जादू… भाग – ४ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
समृद्ध प्राचीन वारसा
श्यामराव, श्यामलाताई , पिंकी आणि राजेश यांची जंगल सफारी मजेत सुरु होती. पिंकी आणि राजेश तर अतिशय खुश होते. बऱ्याच दिवसांनी आई बाबांबरोबर गाडीतून ते सहलीसाठी जात होते. तेथून जवळच एक प्राचीन हेमाडपंती शिवमंदिर होते. ते मुलांना दाखवावे म्हणून श्यामराव त्यांना तिथे घेऊन जात होते. सगळ्यांची वटवृक्षाखाली खाणं आणि थोडी विश्रांती झाली होती. त्यामुळे सगळ्यांचा मूड फ्रेश होता. गाडीत बाबांनी ‘ जय जय शिव शंकर ‘ गाणं लावलं होतं आणि त्या तालावर त्यांचं डोलणं आणि गुणगुणणं सुरु होतं. रस्त्यावर एके ठिकाणी प्राचीन शिवमंदिराकडे असा बोर्ड त्यांना लावलेला आढळला. मुख्य रस्त्याला सोडून गाडी आतमधील छोट्या कच्च्या रस्त्याकडे वळली. थोडेसे अंतर गेल्यानंतर लगेच शिवमंदिर होते. श्यामरावांनी एका लिंबाच्या झाडाच्या दाट सावलीत गाडी पार्क केली. सगळे खाली उतरले.
तिथे एका बाजूला काही माणसे फुले, हार, बेलपत्रे आदी विक्रीसाठी घेऊन बसली होती. शामलाताईंनी एका बाईजवळून बिल्वपत्रे विकत घेतली. दुरूनच शिवमंदिराची दगडी हेमाडपंती बांधणी लक्ष वेधून घेत होती. राजेशच्या मनात नेहमीप्रमाणेच काही प्रश्नांनी गर्दी केली होती. पण बाबा म्हणाले, ‘ बेटा, आपण आधी भोलेनाथांचं दर्शन घेऊ. मंदिरात दर्शन घेताना काही बोलू नये. मग निवांतपणे तू काहीही विचार. ‘ राजेश म्हणाला, ‘ हो, बाबा.
‘गाभाऱ्याच्या बाहेर एक सुंदर दगडी नंदी होता. सगळ्यांनी आधी त्याला नमस्कार केला. मंदिरात गेल्यानंतर श्यामलाताईंनी आपल्याजवळील बेल काहीतरी मंत्र म्हणत भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण केला. श्यामराव, राजेश, पिंकी यांनीही काही बेलाची पाने पिंडीवर वाहिली.
बाहेरचा दगडी सभामंडप खूपच छान होता. तेथील खांबांवर आणि बाजूच्या कमानीवर छानपैकी नक्षी, पौराणिक चित्रे आणि आकृत्या कोरलेल्या होत्या. आजूबाजूला असलेला उन्हाचा ताप तिथे जाणवत नव्हता. काही क्षण तिथे बसल्यानंतर सगळे बाहेर पडले. आता मंदिराच्या भोवतालचा परिसर ते न्याहाळत होते. राजेश म्हणाला, ‘ बाबा, तुम्ही मघापासून हे मंदिर हेमाडपंथी आहे असं म्हणत होता. हेमाडपंथी म्हणजे काय ? ‘
बाबा म्हणाले, ‘ अरे बाबा, हेमाडपंथी नाही, हेमाडपंती. बरेच लोक हेमाडपंथी असा चुकीचा उच्चार करतात. पण ही मंदिर बांधण्याची पद्धत किंवा शैली हेमाडपंत याने सुरु केली म्हणून हेमाडपंती मंदिर असे म्हटले जाते. अरे तेराव्या शतकात देवगिरीत यादव राजांचे राज्य होते. हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत हा यादवांचा प्रधान होता. तो फार बुद्धिमान होता. त्याने मंदिर बांधण्याची एक नवीन पद्धत विकसित केली. ‘ पिंकी, राजेश, या मंदिराची बांधणी तुम्ही पाहिली का ? ‘ पिंकी म्हणाली, ‘ हो बाबा, नुसते दगडावर दगड ठेवलेले दिसतात. ‘
बाबा म्हणाले अगदी बरोबर, ‘ त्यालाच हेमाडपंती शैली म्हणतात.आजकाल बांधकामासाठी आपण जसा सिमेंटचा वापर करतॊ, तसाच पूर्वी चुन्याचा वापर केला जायचा. पण या अशा मंदिरांमध्ये हेमाडपंत याने असा कोणत्याच पदार्थाचा वापर केला नाही. चौकोनी, त्रिकोणी, पंचकोनी या आकारात दगडी चिरे कापून त्यांच्या खाचा किंवा खुंट्या एकमेकात घट्ट बसतील अशा आकारात कापून या मंदिरांची उभारणी केली आहे. ती इतकी मजबूत झाली आहे की अनेक शतके झाली तरी ही मंदिरे आजही टिकून आहेत. त्याशिवाय कित्येक टन वजन असलेल्या शिळा पंचवीस फुटांपेक्षाही अधिक उंचीवर नेऊन हे बांधकाम करण्यात आले आहे. केवढे विकसित तंत्रज्ञान असेल त्या मंडळींजवळ ! ‘
‘कमालच आहे ना बाबा, सिमेंट, चुना न वापरता अशा प्रकारचे बांधकाम करणे म्हणजे आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ‘ राजेश म्हणाला.
‘हो, राजेश, आणि अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत बरं का ! वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर, औंढा नागनाथ येथील मंदिरे अशीच आहेत. चाळीसगावाजवळील पाटणादेवी येथे असेच शंकराचे हेमाडपंती मंदिर आहे. ‘
पिंकी म्हणाली, ‘ बाबा, किती छान माहिती मिळाली या मंदिराबद्दल ! शाळेत ही माहिती सांगून मी बाईंची शाबासकी मिळवणार. ‘
‘शाब्बास पिंकी. आणि तुम्ही काय करणार राजे ? ‘ बाबा राजेशकडे पाहत म्हणाले.
‘बाबा, आपण या मंदिराचा फोटो घेतला आहे ना ! मी या मंदिराचे चित्र काढून आमच्या चित्रकलेच्या शिक्षकांना दाखवेन. माझे मित्र सुद्धा ते पाहून खुश होतील. ‘ दॅट्स ग्रेट! ‘बाबा म्हणाले.
‘आई, मला तुला काही विचारायचे आहे. मघाशी आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर बेलाची पाने वाहिली. ती का वाहायची आणि तू काहीतरी मंत्र पुटपुटत होतीस तो पण सांग ना, ‘ राजेश म्हणाला.
‘राजेश, पिंकी, अरे बेलपत्र किंवा बेलाची पाने भोलेनाथांना अतिशय प्रिय बरं का ! श्रावणात तर दर सोमवारी भगवान शंकरांना बिल्वपत्रे अर्पण करतात. तुम्ही देव दानवांनी केलेल्या समुद्र मंथनाबद्दल ऐकले असेलच. त्यावेळी समुद्र मंथनातून निघालेले हलाहल शंकरांनी प्राशन करून आपल्या कंठात धारण केले. त्यांच्या सर्वांगाचा भयंकर दाह म्हणजे आग व्हायला लागली. तेव्हा त्यांच्या मस्तकावर बेलाचे पान ठेवण्यात आले. तेव्हापासून शंकराला बेलपत्र वाहण्याची प्रथा आहे. बेलाची तीन पाने सुद्धा अतिशय महत्वाची आहेत बाळांनो. तीन पाने म्हणजे भगवान शंकरांचे त्रिनेत्र, तशीच ही पाने म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच महादेव या तिन्ही देवांचे प्रतिनिधित्व करतात.’
‘अरे बापरे ! केवढे महत्व आहे बिल्वपत्राचे ! ‘ पिंकी म्हणाली. ‘ आई, तू कोणता मंत्र म्हणत होतीस बेल अर्पण करताना ? ‘
‘सांगते, ‘ आई म्हणाली. भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना, ‘त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रं च त्रिधायुतम | त्रीजन्मपापसंहारम बिल्वपत्रं शिवार्पणम ‘ या पौराणिक मंत्राचा जप करतात बरं का पिंकी. या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण, तीन डोळे, त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्मांचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव, तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे पान आम्ही अर्पण करतो. बेलाच्या पानांमध्ये विषनाशक गुणधर्म असतो. शिवाला बेल वाहताना आपल्या हातावरील विषाणू तर नष्ट होतातच पण त्या पानांचा एक प्रकारचा सुगंधही आपल्या हाताला येतो. ‘
‘आणि आणखी एक महत्वाची गोष्ट सांगते तुम्हाला. भगवान शंकरांना हे बेलपत्र इतके प्रिय आहे की आपल्याजवळ दुसरे काही नसेल आणि आपण भक्तिभावाने एखादे बिल्वपत्र जरी त्यांना अर्पण केले, तरी ते संतुष्ट होतात. म्हणूनच त्यांना ‘ आशुतोष ‘ म्हणतात. आशुतोष म्हणजे सहज संतुष्ट होणारा. भगवान शंकर आपल्याला जणू सांगतात की तुम्ही सुद्धा माझ्यासारखे सहज संतुष्ट, समाधानी असणारे व्हा. ‘
‘आई, आशुतोष या नावाचा किती सुंदर अर्थ सांगितलास. माझ्या वर्गात शेखरकाकांचा मुलगा आशुतोष आहे ना. तो माझा चांगला मित्र आहे. पण आता मला या नावाचा अर्थ कळला. ‘ राजेश आनंदाने म्हणाला.
खरंच आई, आपल्या देवांची नावं, हे बिल्वपत्राचं महत्व, आपल्या वनस्पती आणि एकूणच सगळ्या गोष्टी, परंपरा किती अर्थपूर्ण आहेत ! पण कोणी अशा त्या समजावून सांगत नाही. ‘
श्यामराव म्हणाले, ‘ अरे, पण बेलाच्या झाडाची माहिती तर तुम्हाला आईने सांगितलीच नाही. तुम्हाला ऐकायची आहे का ? ‘
‘हो बाबा, सांगा. मी आता एका वहीत आपल्या सगळ्या वृक्षांची माहिती लिहून काढणार आणि तिथे त्यांची चित्रे चिकटवून एक छान हस्तलिखित तयार करणार. ‘ राजेश म्हणाला.
‘शाब्बास बेटा ,’ बाबा म्हणाले, ‘ बेल हा एक देशी वृक्ष आहे. बेलाची झाडे आपल्या आशिया खंडात सर्वत्र आढळतात. त्याची पाने, फुले, फळे, खोड असे सगळेच भाग औषधी आहेत. अनेक आयुर्वेदिक औषधात बेलाचा वापर केला जातो. अगदी पोटदुखीपासून ते मधुमेहाच्या आजारापर्यंत या पानांचा उपयोग होतो. बेलाच्या झाडापासून मुरंबा, जॅम, सरबत आदी गोष्टी बनवल्या जातात. बेलाच्या झाडावर पक्षी आपली घरटी बांधतात. कीटक त्याच्या आश्रयाने राहतात. त्याच्या फुलांवर बसलेल्या मधमाशा, फुलपाखरांमुळे परागीभवन होते. बेलाचे लाकूड टणक आणि टिकाऊ असल्याने त्याचा वापर फर्निचरसाठी सुद्धा केला जातो. शेतकरी शेतीची अनेक औजारे तयार करतात. मी तुम्हाला मागच्या वेळी जी वड, पिंपळ यासारख्या वृक्षांची माहिती सांगितली, त्याबरोबरच हे झाडही महत्वाचे आहे बरं, त्याचीही लागवड आपण केली पाहिजे. केवळ धार्मिकच नव्हे तर पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा अशी झाडे खूप महत्वाची असतात. ‘
पिंकी म्हणाली, ‘ बाबा, तुम्ही आणि आईने आज खूप वेगवेगळ्या विषयांची नवीन माहिती दिली आम्हाला. आम्ही आता आमच्या वहीत ही सगळी माहिती लिहून काढू. ‘
समोरच एका ठिकाणी उसाच्या रसाची गाडी होती. सगळेच आता तहानलेले होते. राजेश म्हणाला, ‘ बाबा, उसाचा रस घेऊ या ना. ‘
‘चला, आपण सगळेच रस घेऊ या, ‘ सगळ्यांनी मस्त थंडगार आले, लिंबू घातलेल्या उसाच्या आस्वाद घेतला आणि गाडी मग पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.
जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म. हा कुणा व्यक्तीचा जन्म नाही. किंबहुना व्यक्तीच्या निमित्ताने नवाच एक विचार पुढे आला आहे. व्यक्ती काल्पनिकही असू शकेल. पण व्यक्तीपेक्षा तो विचार खरा आणि महत्त्वाचा आहे. त्याचे तत्वज्ञान आणि त्याचे चरित्र यातून हा विचार आपल्यापुढे मांडता येतो असे मी मानतो.
लहानपणी श्रीकृष्णाने इंद्राच्या पूजेला विरोध करून गोवर्धनाची पूजा, गाई वासरांची पूजा करण्याचा विचार मांडला. म्हणजेच परंपरा कितीही जुनी असली तरी जे जुने आहे ते पवित्रच आहे असे न समजता, कालमानपरत्वे जुन्या परंपरांचा विचार टाकून दिला पाहिजे. कालमानानुसार जे नवे विचार आहेत त्यांचा अंगीकार केला पाहिजे. ( वाचा ‘दोन शब्दात दोन संस्कृती’ — लेखक वि. दा. सावरकर) श्रीकृष्णाने गीता सांगितली, परंतु गीतेच्याद्वारे त्याने तत्वज्ञान सांगितले ते महत्त्वाचे.
‘मी सर्वकाही आहे, मी असे करतो, मी जगाचा आदि आहे, अंत ही आहे.’ असे तत्वज्ञान त्याने मांडले आहे असे वरकरणी वाटते. परंतु हे तत्त्वज्ञान म्हणजे ‘ मी-पणा ‘ नसून, ‘ मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार ‘ या प्रकारचे तत्त्वज्ञान मी मानतो. मी जो उपदेश करतो ते तत्वज्ञान मी स्वतः अंगिकारतो असे त्याचे म्हणणे आहे. मी म्हणजे कुणीही व्यक्ती. माझ्या दृष्टीने त्याचा अर्थ इतकाच की जेव्हा माझा जन्म झाला तेव्हाच या विश्वाची निर्मिती झाली. जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझ्या दृष्टीने या विश्वाचा अंत होणार आहे.
श्रीकृष्ण मानला जर विश्वाचा शासक, तर त्याचे असे म्हणणे की जो सर्वोच्च पदावर आहे तो तुम्हाला तुमच्या लढाईमध्ये कोणतीही सक्रिय मदत करणार नाही. तो फक्त तुम्हाला तत्वज्ञान सांगेल. कृष्ण म्हणतो ‘ न धरी शस्त्र करी मी, सांगेन युक्तीच्या गोष्टी चार ‘ म्हणजेच सर्वोच्च शासक हा तुम्हाला काही युक्तीच्या गोष्टी सांगेल परंतु तो स्वतः तुमच्या जीवनाच्या युद्धात तुमच्या बरोबर सामील होणार नाही. सक्रीय मदत करणार नाही. उलट त्याचे सैन्य हे तुमच्या विरोधात लढणार आहे. त्याच्या सैन्याला तुमच्या भल्याचं काहीही घेणं देणं नाही. हीच परिस्थिती आज आणि पूर्वीही दिसते आहे नाही का? शासन कोणतेही असो तुमच्या बाजूने लढणारे फक्त तुमचे चार पाच जण असतात जे खरे मनापासूनचे हितचिंतक आणि मित्र असतात. तेच फक्त तुम्हाला मदत करतील. पण लढणारे फक्त तुम्ही आहात. त्यामुळे सर्वोच्च शासकाने कोणत्याही प्रकारे सामान्य माणसाच्या कल्याणाचा विचार केला असला तरी प्रत्येकाला स्वतःची लढाई स्वतःच लढायची आहे. ती लढाई लढण्यासाठी अंधश्रद्धांची झापडे आणि परंपरांच्या कुबड्या उपयोगाच्या नाहीत.
सकारात्मक विचार, जपलेली नाती आणि आयुष्यासाठी लढण्याची जिद्द हीच फक्त उपयोगाची आहे. मला वाटते हेच जीवनाचे तत्त्वज्ञान आपण अनुभवत आहोत. म्हणून हा आजच्या काळातील जगण्याचा महत्त्वाचा विचार आहे असे मला वाटते.
… राम-कृष्ण चरित्रातून अजूनही बरेच विचार आपल्याला जगण्यामध्ये समजून घ्यावे लागतील.
“आई, मी उद्यापासून शाळेत जाणार नाही. सगळेजण मला ‘आंधळा, आंधळा’ असं चिडवतात”.
आईने कुशीत घेऊन भावेशला समजाविले की,’तू जग पाहू शकतोस की नाही याने काहीही फरक पडत नाही. मात्र तू असे काम करून दाखव की सारे जग तुझ्याकडे पाहू लागेल’
आईचा उपदेश हृदयावर कोरून छोट्याशा भावेशने जीवनात निश्चयपूर्वक वाटचाल चालू केली.
भावेश भाटिया यांना’रेटिना मस्क्युलर डिजनरेशन’या आजारामुळे बालपणीच दृष्टी गमवावी लागली. जिद्द, निश्चय व मेहनतीच्या बळावर त्यांनी स्वतः बनविलेल्या विविध आकाराच्या, आकर्षक, सुगंधी, रंगीत मेणबत्यांची विक्री महाबळेश्वर इथे एका हातगाडीवर सुरू केली . आज त्यांची ‘सनराइज कॅन्डल्स’ही कंपनी देश-विदेशात कोट्यावधी रुपयांची उलाढाल करीत आहे.
सुरवातीला भावेश यांचे वडील गोंदिया इथल्या सिमेंट वर्क्समध्ये अकाउंटंट म्हणून काम करीत होते. गोंदिया येथील गुजराती नॅशनल हायस्कूलमध्ये भावेश यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. आई वडिलांनी त्यांना सर्वसामान्य मुलाप्रमाणे वागविले. शाळेत फळ्यावरील काही दिसत नसल्याने आई त्यांना सर्व अभ्यास तसेच त्यांची आवडती कॉमिक्सची पुस्तके वाचून दाखवीत असे. कपडे धुणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे अशी दैनंदिन कामे शिकवून आईने त्यांना स्वयंपूर्ण केले. वडील त्यांना सिनेमाला नेत. सायकलवरून सर्व ठिकाणी फिरवून तिथली माहिती सांगत. वडिलांना शास्त्रीय संगीताची व गझल ऐकण्याची आवड होती. गझलमधील अनेक शब्द त्यांच्या विशेष भावार्थासह ते भावेशला समजावून सांगत. तीच आवड भावेश यांच्यामध्येही उतरली. भावेश यांनी घरातच त्यांनी जमविलेल्या कॉमिक्सची लायब्ररी सुरू केली. त्यामुळे अनेक मुलांबरोबर त्यांची छान मैत्री झाली. सिमेंट फॅक्टरीमधल्या वाळूमध्ये खेळणे, ओल्या वाळूतून वेगवेगळे प्राणी बनविणे, लाकडाच्या वखारीतून बांबू आणून ते तासून त्याच्या वस्तू बनविणे , झाडांवर चढणे ,शेतात भटकणे, निरनिराळ्या पक्ष्यांची किलबिल ऐकणे यात त्यांचं बालपण गेलं. फॅक्टरीमध्ये सिमेंटचे पाईप बनविताना त्याचे डाय कसे वापरले जातात हेही त्यांनी समजावून घेतलं.
भावेश यांचे मोठे भाऊ जतीन यांना कुत्रा चावल्यामुळे मृत्यू आला. त्यामुळे खचलेल्या आईला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी नातेवाईकांनी शिवणक्लासमध्ये घातलं. भावेश आईबरोबर तिथे जात. तिथे कला कौशल्याच्या वस्तूही बनवायला शिकवत. छोट्या भावेशने स्पर्शाच्या सहाय्याने अनेक आकार शिकून घेतले व कापडाची खूप खेळणी बनविली.
कॉलेजमध्ये असताना त्यांनी दोन मित्रांबरोबर सायकलवरून गोंदिया ते काठमांडू असा दोन हजार किलोमीटर्सचा प्रवास केला. त्यावेळी त्यांना आलेले अनुभव , मनुष्य स्वभावाचे अनेक नमुने, वाटेतील अडचणी या साऱ्यांना तोंड देऊन त्यांनी धाडसाने तो प्रवास कसा पूर्ण केला हे सर्व मुळातून वाचण्यासारखे आहे.
काही काळाने वडील महाबळेश्वरला कच्छी समाजाच्या आरोग्य भवन इथे व्यवस्थापक म्हणून काम करू लागले. तिथल्या आवारात त्यांना एक लहानशी खोली राहायला मिळाली.
आईच्या कॅन्सरच्या आजारात भावेश यांनी शर्थीने पैशांची जमवाजमव करून मुंबईला टाटा हॉस्पिटलमध्ये अनेक खेपा घातल्या. आईच्या मृत्यूनंतर त्यांना खऱ्या अर्थाने दृष्टिहीन झाल्यासारखे वाटले.
मुंबईला वरळी येथील नॅब(National association for blind) इथे त्यांना ब्रेल लिपी आणि इतर जीवनावश्यक गोष्टींचे शिक्षण मिळाले. तिथेच त्यांनी मेणबत्ती बनवण्याचे शिक्षणही घेतले.
अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी महाबळेश्वर येथे भाड्याने हातगाडी घेऊन सुंदर, सुगंधी, विविध आकारातील मेणबत्यांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला त्यावेळी भावेश अर्थशास्त्र घेऊन एम. ए. झाले होते.
सुट्टीसाठी म्हणून महाबळेश्वरला आलेल्या नीता, उत्स्फूर्तपणे भावेश यांना त्यांच्या मेणबत्ती विक्रीच्या कामात मदत करू लागल्या. मदतीचा हात देताना त्या , रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या भावेश यांच्या प्रेमात पडल्या. सुशिक्षित, धनाढ्य कुटुंबातील एकुलती एक मुलगी असलेल्या, बी.कॉम झालेल्या नीताच्या या ‘आंधळ्या प्रेमाला’ सहाजिकच घरच्यांचा विरोध होता. जेव्हा नीता यांनी भावेश यांच्यापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा ते अंतर्बाह्य थरारून गेले. पण भावेश यांना फक्त सहानुभूती नको होती . नीता तिच्या या विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयावर ठाम होती. घरच्यांचा विरोध असूनही फक्त आईच्या पाठिंब्यावर अगदी साधेपणाने हे लग्न झाले. भावेश यांची एकच अट होती की, नीताने माहेरचा एकही पैसा त्यांच्या घरात आणायचा नाही.
नीता यांनी भावेशना सर्वार्थाने डोळस साथ दिली. खरं म्हणजे नीताच्या रत्नपारखी नजरेने भावेश यांच्यामध्ये लपलेला लखलखणारा हिरा पाहिला आणि त्याला पैलू पाडून जगासमोर आणला. उत्तम पद्धतीने संसाराची घडी बसवली. अनेक मानसन्मानासहित नीताने स्वतःसह भावेश यांना खूप उंचीवर नेऊन ठेवले. ‘अंध व्यक्तीशी लग्न करण्याचा वेडेपणा करून तू आत्महत्या करीत आहेस’ या माहेरच्या मताला नीताने स्वकर्तृत्वाने उत्तर दिले. लग्नानंतर दोन वर्षांनी कुणाल या त्यांच्या अव्यंग, सुदृढ अपत्याच्या जन्म झाला .सासर माहेर एक झाले.
महाभारत काळात गांधारी आयुष्यभर डोळ्यांवर पट्टी बांधून वावरली हा फार मोठा त्याग समजला जातो. भावेश यांच्या मताप्रमाणे गांधारीने डोळ्यांवर पट्टी न बांधता, महाराज धृतराष्ट्रांचे डोळे बनून राहणं अधिक आवश्यक होतं. गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली नसती तर कदाचित महाभारताचे युद्धही झाले नसते. नीताने गांधारीपेक्षाही अनेक पटीने त्याग केला आहे. ती केवळ भावेश यांचे डोळे झाली नाही तर तिच्या तेजस्वी डोळ्यांनी तिने भावेश यांना सुंदर जगाचा परिचय करून दिला. उभयतांनी अनेक प्रदर्शनांमध्ये भाग घेऊन भावेश यांची कला जगासमोर आणली.
भावेश आणि नीता यांचा उद्देश केवळ स्वतःची प्रगती साधण्याचा नव्हता. इतर दृष्टिबाधित मित्रांना रोजगार मिळून ते स्वयंपूर्ण व्हावेत यासाठी दोघांनीही अथक प्रयत्न केले. महाबळेश्वर येथे राहत्या घराजवळ एक छोटी जागा भाड्याने घेऊन त्यात अंध मुला-मुलींच्या राहण्याची सोय केली. त्यांना मेणबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले आणि स्वतःच्या पायावर उभे केले. मेणबत्ती व्यवसाय शिकण्यासाठी वाढत्या संख्येने येणाऱ्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी त्यांनी महाबळेश्वर- सातारा रोडवर मोळेश्वर येथे एक जागा विकत घेतली आणि दीडशे मुला- मुलींचे वसतीगृह उभारले. जागा मिळविणे आणि वसतीगृह बांधणे यासाठी अनंत अडचणी उभ्या राहिल्या. त्यावेळी अनेक सुहृदांनी अनंत हस्ते त्यांच्या या सत्कार्याला मदत केली. प्रतीथयश व्यक्तींचे पूर्णाकृती पुतळे बनवून त्यांनी एक वॅक्स म्युझियमही उभारले आहे. अनेक लोक त्याला आवर्जून भेट देतात.
कॉम्प्युटर इंजिनियर झालेला कुणाल याचे या कामात खूप मोठे योगदान आहे. भारतातील अनेक प्रांतातील दृष्टिहीन मुला-मुलींना त्यांच्या घरीच मेणबत्त्या बनविणे, कागदी पिशव्या बनविणे व इतर उद्योग शिकण्यासाठी कुणालने अनेक ॲप्स विकसित केली आहेत. त्याचा भारतभरच्या अंध विद्यार्थ्यांना फायदा होतो. तसेच कुणाल परदेशी निर्यातीचे सर्व काम सांभाळतो.
भावेश यांनी त्यांची मैदानी खेळाची आवड जपली आणि नीताच्या सक्रिय सहाय्यामुळे वाढविली. गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, पॉवर लिफ्टिंग, फुटबॉल, कबड्डी, अशा स्पर्धांमध्ये राष्ट्रीय पॅरालिंपिक व इंडियन ब्लाइंड स्पोर्ट्स असोसिएशनची एकूण ११४ पदके त्यांनी जिंकली आहेत. त्यामध्ये ४० सुवर्ण पदके आहेत. ते अनेक वेळा प्रतापगड, सिंहगड चढून गेले आहेत. इतकेच नाही तर कळसुबाई शिखरावरही तीन वेळा गेले आहेत. डॉक्टर भावेश यांचे असे म्हणणे आहे की, खिलाडू वृत्ती आपल्याला परिपूर्ण बनवते, अंतर्बाह्य माणूस बनविते. शरीर सुदृढ असेल तर मेंदू आणि मन हे सुद्धा सुदृढ राहतात. यशस्वी उद्योजक आणि दृष्टिहीनांसाठी कार्यरत असलेल्या भावेश यांना तीन वेळा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कर्नाटक सरकारने चन्नमा विद्यापीठातर्फे भावेश यांना डॉक्टरेट ही पदवी दिली.
गुजराती समाजाच्या रक्तातच उद्योगधंद्याचं बाळकडू असतं. व्यापारासाठी जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची त्यांची तयारी असते. नीता यांचे बालपण पूर्व आफ्रिकेतील सोमालिया इथे गेले कारण वडील व्यापारासाठी तिथे गेले होते.
भावेश यांचे पहिले मेणबत्ती प्रदर्शन टिळक स्मारक मंदिर पुणे इथे यशस्वीपणे पार पडले . त्यासाठी महाबळेश्वर येथील ‘आनंदवन’ या सुप्रसिद्ध हॉटेलचे मालक वैद्य कुटुंबीय यांनी खूप मदत केली ,मेहनत घेतली. अनेक गुजराती व्यवसायिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि त्यानंतर या धडपडणाऱ्या व्यवसाय बंधूला गुजराती समाजातून फार मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. त्यांच्या उद्योगधंद्याची भरभराट होण्यासाठी, दृष्टिहीनांसाठी वसतीगृह उभारण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्यात आली .’एकमेका सहाय्य करू’ हा गुजराती लोकांचा विशेष गुण अनुकरणीय आहे.
आज डॉ .भावेश यांना त्यांचे अनुभव आणि विचार ऐकविण्यासाठी सन्मानाने झारखंड येथील ‘टाटा स्टील’ पासून इतर सर्व मोठ्या उद्योगधंद्यामध्ये आवर्जून बोलावलं जातं. हा सर्व प्रवास महाबळेश्वरपासून ते एकट्याने करतात. त्यांचे अनुभव सांगताना भावेश सांगतात की अंध, अपंग व्यक्तींबद्दल नुसती सहानुभूती,दया दाखवून त्यांना मदत करू नका. त्याऐवजी अंध अपंगांना सक्षम करण्यासाठी स्वतःच्या पायावर ते उभे राहतील अशा उद्योग धंद्यात मदत केलेली जास्त चांगली. अंध व्यक्तींची इतर ज्ञानेन्द्रिये अधिक प्रगल्भ असतात. अशा व्यक्ती अधिक संवेदनशील असतात. या त्यांच्या गुणांचा फायदा घेऊन त्यांचा आत्मविश्वास जागृत करावा व योग्य ती मदत जरूर करावी. ‘सर्व शिक्षा अभियानां’तर्गत आता पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणे अंधांनाही सहज शक्य आहे. ते स्वानुभावावरून सांगतात की अंध, अपंग विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या शाळा नकोत तर त्यांना इतर सर्वसामान्य मुलांबरोबर नेहमीच्या शाळेत शिक्षण मिळाले पाहिजे .
एखाद्या वाढदिवसानिमित्त किंवा काही कारणासाठी आपण अशा अंध, अपंग संस्थांमध्ये भोजन देणे, भेटवस्तू देणे असे करतो. भावेश यांना ते अजिबात पसंत नाही. कारण त्यामुळे या अंध, अपंगांना तुम्ही दुबळे करता, त्यांना घेण्याची सवय लावता असं ते अनुभवाने सांगतात.त्यांचं स्पष्ट मत असं आहे की अंध अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्थांपैकी फारच थोड्या संस्था तळमळीने काम करतात. इतर अनेक संस्थांमधील परिस्थिती भीषण असते. अंधांकडून काम करून घेतले जाते पण त्यांना पुरेसा आहार, पैसे दिले जात नाहीत. उलट संस्थाचालकंच ‘मोठे’ होत जातात. अंध निधीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा निधी गोळा केला जातो. प्रत्यक्षात त्यातील फार थोडा पैसा अंधांसाठी खर्च होतो. समाजाने जागृत होऊन योग्य ठिकाणी मदत केली पाहिजे. दृष्टीहीनांनी अभ्यासाबरोबर कौशल्य विकासाकडे लक्ष दिले पाहिजे असे ते सांगतात.
डॉक्टर भावेश यांच्या संस्थेतर्फे दृष्टीहीनांवर आधुनिक उपचार करून थोडे यश मिळत असेल तर तसा प्रयत्न केला जातो. लहान मोठी ऑपरेशन करण्यासाठी मदत केली जाते. समाजाने नेत्रदान चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला तर त्याचा अनेक दृष्टीहीनांना लाभ होईल असं डॉक्टर भावेश यांना वाटतं.
नीता या स्वतः दुर्गम भागात जाऊन दृष्टीबाधित भगिनींना भेटतात. घरातील सदस्यांना विश्वासात घेऊन, नीता त्या अंध भगिनींना प्लास्टिक हार, तोरणे, कागदी पिशव्या, डिटर्जंट बनविणे अशी अनेक कामे शिकवतात.
डॉक्टर भावेशजींसारखं व्यक्तिमत्व ज्यांचं संपूर्ण आयुष्य ऊर्जा व सकारात्मकतेने परिपूर्ण आहे ते आणि आपण इतर डोळस यांच्यात खऱ्या अर्थाने दृष्टिबाधित कोण आहे असा प्रश्न हे पुस्तक वाचताना नक्की पडतो .
डॉक्टर भावेश यांचे आयुष्य घडविणाऱ्या महत्त्वाच्या दोन व्यक्तींमधील एक अर्थातच त्यांची आई! आईने त्यांच्या मनातील न्यूनगंड काढून टाकून त्यांना आत्मविश्वासाने उभे केले आणि दुसरी व्यक्ती म्हणजे पत्नी नीता! नीता यांच्या ‘डोळस प्रेमाची’ एक छोटी गोष्ट सांगून थांबते.
एका आंतरराष्ट्रीय शर्यतीत भाग घेण्यासाठी भावेश यांना दररोज पंधरा-सोळा किलोमीटर धावण्याची प्रॅक्टिस करणे जरुरी होते. नीता यांनी काय करावे? आपल्या चार चाकी गाडीला कॅरियर बसून घेतले. त्याला पंधरा फुटांची एक लांब दोरी घट्ट बांधली. दोरीचे दुसरे टोक भावेश यांच्या हातात दिले आणि दररोज त्यांना पोलो ग्राउंडवर नेऊन धावण्याची प्रॅक्टिस करता येईल अशा पद्धतीने गाडी चालवून त्यांचा सराव करून घेतला. महाबळेश्वरला आलेले पर्यटक आणि पोलो ग्राउंडवर आलेले खेळाडू यांनी हे दृश्य डोळे भरून पाहिले.
गृहिणी सचिव सखी प्रिया… असलेल्या नीता यांना आदराने नमस्कार
झाडावरून गळून पडलेलं एक कोमेजलेलं, सुगंध मालवलेलं निस्तेज फूल हळुवार मातीवर पहुडलं.
मातीने त्याच्या नाजूक पाकळयांना जोजवत विचारलं, ” काही त्रास नाही ना झाला ?”
सुकून गेलेल्या फुलाने देठापासून देह हलवण्याचा यत्न केला आणि पाकळयांनीच नाही म्हणून खुणावलं.
… काही क्षण असेच गेले…
… आपल्या कुशीत घेण्यास आतुर झालेल्या मातीने पुन्हा कातर आवाजात विचारलं, ” झाडावरून गळून पडल्याचं खूप दुःख होतंय का ? फार वाईट असतं का हे सर्व ? “
म्लान पाकळ्यांवर मंद स्मित झळकलं.
… फुल म्हणालं, ” निमिषार्धासाठी वाईट वाटलं.. कारण झाडाशी, पानांशी, गुच्छातल्या सोबती फुलांशी, उमलत्या कळ्यांशी, ओबड धोबड फांद्यांशी आता ताटातूट होणार म्हणून वाईट वाटलं….
… पण पुढच्याच क्षणाला आनंदही वाटला. जितका काळ झाडावर होतो तेव्हा वारा येऊन कानात गुंजन करायचा, पाकळयांशी झटायचा, झोंबायचा…. कधी त्याचा राग यायचा तर कधी त्याच्यासोबत अल्लड होऊन उडत जावं असं वाटायचं.
… पण तेंव्हा मी झाडाचा एक भाग होतो, त्यामुळे माझा एकट्याचा निर्णय घेण्यास मी स्वतंत्र नव्हतो… “
” तू आता स्वतंत्र झालास खरा. पण आता तू क्षणाक्षणाला कोमेजत चाललायस …. आता काय करणार ?” – मातीचा प्रश्न.
दीर्घ उसासा टाकत फूल म्हणालं, ” आता हवा जिकडे नेईल तिकडे मी जाईन… वाऱ्यावर स्वार होऊन जीवात जीव असेतोवर जमेल तितके जग पाहून घेईन….. मग एकेक पाकळ्या झडतील, देठापासून तुटून पडेन…. पण जिथं अखेरचे श्वास घेईन तिथल्या मातीशी एकरूप होईन. त्या मातीचं एक अंग होऊन जाईन आणि तिच्या कुशीत येऊन पडणाऱ्या नव्या बीजासाठी खत होऊन जाईन. त्या बीजातून अंकुरलेल्या झाडावर कोवळ्या फुलांचा एक टवटवीत गुच्छ असेल, माझं कर्म चांगलं असेल तर मीही त्या गुच्छात असेनच !”
फुलाचं उत्तर ऐकून सदगदीत झालेल्या मातीने त्याच्या सुरकुतल्या पाकळयांचे हलकेच चुंबन घेतले.
काही वेळ निशब्द शांतता राहिली आणि पुढच्याच क्षणी मंद वाऱ्याची एक झुळूक आली आणि फुलाला त्याच्या अंतिम सफरीवर घेऊन गेली…
आपलं आयुष्यही असंच आहे.
… संसार, कुटुंब, आप्तेष्ट, मित्र, ही सगळी त्या झाडाची भिन्न अंगे. आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या की कुणी स्वखुशीने त्यातून बाहेर पडतो तर कुणा कमनशिबींना परागंदा व्हावं लागतं…
… मग सुरु होते एका जीवाची एकाकी सफर, जी आपल्याला आयुष्यातलं अंतिम सत्य दाखवून देते.
… आयुष्यातली सत्कर्माची शिदोरी मजबूत असली की हा प्रवास सुसह्य असतो, कारण इथं आपल्याला मदत करायला कुणी येत नसतं.
… नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं. आपणही असेच पंचतत्वात विलीन होतो आणि प्रारब्धात असलं तर जीवनाच्या पुष्पगुच्छात पुन्हा अवतीर्ण होतो !
संग्राहिका – सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कवी भूषण हे आधी राजा छत्रसाल व नंतर शिवाजी महाराजांच्या दरबारात कवी होते. कवी भूषण यांच्याविषयी फारशी ठोस माहिती उपलब्ध नाही. त्यांचा जन्म कानपूर जिल्ह्यातील त्रिविक्रमपूर येथे झाला. स्वाभिमानी भूषण लहान वयातच घर सोडून बाहेर पडले. अनेक रजपूत राजे तसेच औरंगजेब, कुमाऊँ राजे, छत्रसाल अशा अनेकांच्या दरबारी जाऊन त्यांच्यावर काव्यरचना केल्या. त्यांनी रचलेले भूषण हजारा, भूषण उल्हास व दूषण उल्हास सारखे अनेक ग्रंथ व काव्यरचना काळाच्या उदरात गडप झाल्या. मात्र त्यांनी शिवरायांच्या पराक्रमाने, व्यक्तिमत्त्वाने प्रेरित होऊन लिहिलेला ‘शिवभूषण’ हा काव्यग्रंथ उपलब्ध आहे.
छत्रपतींना भेटण्यासाठी ते उत्तर भारतातून रायगडावर १६७० साली आले. तेथील व्याडेश्वर मंदिरात त्यांची महाराजांबरोबर भेट झाली. पण त्यावेळी त्यांना हेच शिवाजी महाराज आहेत हे माहित नव्हते. महाराजांनी विचारणा केल्यावर भूषण यांनी खाली उद्धृत केलेला छंद खड्या आवाजात गायला. तो ऐकून सर्व मावळे रोमांचित झाले. त्यांनी भूषण यांना तो पुनःपुन्हा गायला लावला. तब्बल अठरा वेळा गायल्यानंतर मात्र भूषण यांना थकवा आला.
मग महाराजांनी आपली खरी ओळख दिली व राजकवी म्हणून त्यांची नियुक्ती केली. गाव, हत्ती वगैरे इनाम दिले. भूषण यांनी तीन वर्षे रायगडावर वास्तव्य केले. मराठ्यांच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास आपल्या वीररसपूर्ण, अलंकारिक काव्यात शब्दबद्ध करून तो ‘शिवभूषण’ काव्यग्रंथ १ जून १६७३ रोजी महाराजांना सादर केला. पं. विश्वनाथ प्रसाद मिश्र यांनी संपादित केलेल्या ‘भूषण ग्रंथावली’ या पुस्तकात कवी भूषण यांचे ५८६ छंद आहेत. त्यापैकी ४०७ शिवभूषणचे, ‘शिवबावनी’ चे ५२ ‘छत्रसाल दशक’ चे १० व इतर ११७ छंद आहेत. यात संभाजी महाराज, शाहू महाराज, थोरले बाजीराव पेशवे, मिर्झा जयसिंह यांच्यावर रचलेले छंद देखिल आहेत. एकूण त्यांच्या रचना वीररसपूर्ण आहेत. शृंगाररसयुक्त अशा फक्त ३९ रचना आहेत. त्यांनी औरंगजेबाची निंदा करणारे, मुघलांनी उद्ध्वस्त केलेली काशी, मथुरा इ. मंदिरे, तिथे उभ्या राहिलेल्या मशिदी यांचे व धार्मिक अत्याचारांचे वर्णन करणारे छंद देखिल रचले आहेत.
त्यांनी लिहिलेले ५८६ छंद प्रसिद्ध आहेत. त्यापैकी हा पुढील छंद, महाराजांवरील एका टी व्ही सिरीयलच्या शीर्षक गीतात वापरला गेल्यामुळे, अलीकडील काळात जास्त प्रसिद्ध झाला. हा पूर्ण छंद असं आहे —–
इंद्र जिमि जंभ पर,
बाड़व ज्यौं अंभ पर,
रावन सदंभ पर
रघुकुलराज है।
पौन बारिबाह पर,
संभु रतिनाह पर,
ज्यौं सहस्रबाहु पर
राम द्विजराज है।
दावा द्रुमदंड पर,
चीता मृगझुंड पर,
भूषन बितुंड पर
जैसे मृगराज है।
तेज तम-अंस पर,
कान्ह जिमि कंस पर,
यौंन म्लेंच्छ-बंस पर
सेर सिवराज है॥
— कवी भूषण
याचा थोडक्यात अर्थ असा :-
जसे इंद्राने जंभासुर दैत्यावर आक्रमण करून त्याचा वध केला.
जसा वडवानळ समुद्रात आग निर्माण करतो.
जसा रघुकुल शिरोमणी श्रीरामाने अहंकारी रावणाचा वध केला.
जसे जलवाहक मेघांवर पवनाचे प्रभुत्व असते.
जसे रतीचा पती कामदेवाची क्रोधित शिवाने जाळून राख केली.
जसे सहस्त्र बाहु असलेल्या कार्तवीर्य अर्जुनाला परशुधारी रामाने, म्हणजेच परशुरामांनी त्याचे हजार बाहु कापून टाकून त्याचा वध केला.
जसा जंगलातल्या मोठमोठ्या वृक्षांना दावानल भस्मसात करतो.
जसा हरणांच्या कळपावर चित्ता तुटून पडतो.
जसा जंगलाचे भूषण असलेल्या हत्तीवर सिंह झेप घेतो.
जसा सूर्याच्या तेजाने अंधाराचा विनाश होतो.
आक्रमक कंसावर जसा श्रीकृष्णाने विजय मिळवला —
— तद्वतच, नरसिंह असलेल्या शिवाजी महाराजांनी मुघल वंशाच्या शत्रुला सळो की पळो करून सोडलेलं आहे.
कोथरूडच्या रोटरी क्लब मध्ये ‘ब्लड डोनर्स’ ची लिस्ट तयार केलेली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना एक फोन येतो, ” एका मुलाचा accident झालाय. खूप bleeding झालंय. O- blood group असलेले कुणी डोनर असतील तर त्यांचे नाव व पत्ता मिळेल का? ” … लिस्ट चेक केली जाते व त्या व्यक्तिचे नाव व पत्ता त्या फोन करणाऱ्या व्यक्तिला दिला जातो. ते कार्यकर्ते गाडी घेऊन त्या पत्त्यावर जायला निघतात.
घराच्या जवळ गाडी येते. बघतात तर काय, एक गृहस्थ रस्त्यावर येऊन कुणाची तरी वाट बघत असल्यासारखे उभे असतात. ते गाडीला हात करून थांबवतात. “… हाँस्पिटल मधून आलात ना ?
मीच आहे डोनर. हे माझे कार्ड “. कार्यकर्ते झटकन गाडीचे दार उघडून त्यांना गाडीत घेतात. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्नचिन्ह असतं. काका खुलासा करतात..” मलाही फोन आला होता, काही कार्यकर्ते तुम्हाला न्यायला येतील म्हणून. तुम्हाला घर शोधायला अडचण येऊ नये म्हणून बाहेर रस्त्यावर येऊन थांबलो.”…
हाँस्पिटल येते. काका ब्लड डोनेट करतात. त्या जखमी मुलाला ते रक्त दिले जाते. त्याचा जीव वाचतो. कार्यकर्ते परत काकांना घरी सोडायला निघतात. त्यांच्या घराच्या गल्लीत गाडी वळते. लांबूनच काका म्हणतात, “ इथेच सोडा मला. जातो मी पुढे माझा माझा “. ती मुले गाडीतून बघत असतात काकांच्या घराकडे. ती म्हणतात,” काका, तुमच्या घरापुढे एव्हढी गर्दी कसली दिसतीये? काय झालंय? Anything serious? आम्ही येऊ का आत? “……
काका शांत होते. मग उत्तरले, ” आता सांगायला हरकत नाही. सकाळी तुम्ही आलात तेव्हा माझ्या एकुलत्या एक मुलाचे निधन झालेले होते. त्याचे पार्थिव घरात आणलेले होते. इतक्यात क्लबमधून रक्ताची गरज असल्याचा फोन आला. माझा रेअर ग्रूप आहे. मी एक क्षण विचार केला, माझा मुलगा आता काही केले तरी परत येणार नाही. पण कुणाच्या तरी मुलाचे प्राण मी वाचवू शकतो. मी निर्णय घेतला. पहिले ब्लड डोनेशन करून यायचे. मग अंत्यसंस्कार !. पण तुम्हाला हे समजलं असतं तर तुम्ही मला घेऊन गेला नसता. म्हणून मी घरापर्यंत तुम्हाला येऊच दिलं नाही व मी बाहेर रस्त्यावर येऊन थांबलो. पण आता शेवटी ते तुम्हाला समजलंच “…..
कार्यकर्ते सुन्न झाले. डोळे फाडून ते काकांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले. गाडी वळवायचे भान ही त्यांना राहिले नाही. नकळत त्यांचे हात जोडले गेले..
वंद्य वंदे मातरम्
राष्ट्रहित सर्वोपरी
संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ स्वदेशीचा जादू… भाग – ३ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे…
रेडिओवर तुकोबांचा अभंग लागला होता. लताबाई गात होत्या. त्या गाण्याच्या तालावर श्यामरावांनी ठेका धरला होता. तेही गुणगुणू लागले होते, ‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे…’ एवढ्यात राजेशने त्यांची तंद्री भंग केली.. ‘ बाबा, ऐका ना मी काय म्हणतोय ते…? ‘ श्यामराव आपल्या तंद्रीतून बाहेर येत म्हणाले, ‘ हं, बोला राजे. ‘ राजेश म्हणाला, ‘ बाबा, हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना ? ‘ श्यामराव राजेशच्या ज्ञानावर खुश होत म्हणाले, ‘ अगदी बरोबर. बेटा, तुला आवडला का हा अभंग ? लता मंगेशकरांनी फार सुंदर गायला आहे बरं .’ ‘ अहो बाबा, अभंग तर सुदंर आहेच. पण मला विचारायचे ते वेगळेच आहे. ‘ ‘ बोल बोल काय विचारायचे आहे तुला ? ‘ बाबा म्हणाले.. राजेश म्हणाला, ‘ बाबा, आता जसे शाळेत पर्यावरणाचे महत्व शिकवतात. झाडे लावा वगैरे सांगतात. तसे तुकाराम महाराजांच्या काळी पण सांगत असावेत का हो ? ‘ हा प्रश्न ऐकल्याबरोबर बाबांना हसू फुटले. तशी पिंकी मध्ये येत म्हणाली, ‘ बाबा, हा राजेश ना काय विचारेल काही सांगता येत नाही..’
‘ नाही नाही पिंके, अग आपल्या राजेशला पडलेला प्रश्न बरोबरच आहे. या प्रश्नाचे उत्तर मी सांगतो. पण त्याआधी तू एक काम कर. तू आईला आपल्या सगळ्यांसाठी मस्त गरमागरम पोहे करायला सांग. आणि पोहे झाले की तिला पण इकडे ये म्हणावं. ‘
‘ हो बाबा, आता सांगते आईला ‘ असं म्हणत पिंकी स्वयंपाकघराकडे पळाली. ती गेली तशी परतलीही.
राजेश म्हणाला, ‘ आता सांगा ना बाबा माझ्या प्रश्नाचे उत्तर. ‘
‘ हो सांगतो. त्याचं काय आहे राजेश, त्या वेळी आजच्यासारख्या शाळा वगैरे नव्हत्या. गुरुजी किंवा पंतोजी घरी येऊन शिकवायचे. काही ठिकाणी गुरुकुलासारखी पद्धतही होती. पण वृक्षांचे, पर्यावरणाचे महत्व वेगळे सांगावे लागत नव्हते. कारण त्याची जाण त्या काळातील लोकांना म्हणजेच आपल्या पूर्वजांना मुळातच होती. ते स्वतःच पर्यावरणाला जपायचे, त्याची काळजी घ्यायचे. त्याचे संस्कार आपोआपच त्या काळातील लहान मुलांवर व्हायचे. वृक्षांना पवित्र मानून त्यांची पूजा केली जायची. कामापुरतीच विशिष्ट झाडे तोडली जायची. जंगले शाबूत होती, घनदाट होती. त्यावर लोकांची उपजीविका चालायची. आणि तुकाराम महाराजांसारखे संत तर वनातच राहायचे. तिथेच त्यांची उपासना, ध्यान, जपतप इ. गोष्टी व्हायच्या. त्या वनातील वृक्ष, प्राणी हेच त्यांचे सखेसोबती असायचे. त्यांच्या संगतीत त्यांचा वनवासही सुखकर व्हायचा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या साधूसंतांना मुळातच पर्यावरणाची जाण होती, त्याचे महत्व कळले होते. समर्थ रामदासांच्या दासबोधात सुद्धा कितीतरी ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने वृक्षांचा उल्लेख त्यांनी केला आहे. ‘ बाबांनी सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला.
‘ बरोबर आहे बाबा तुमचं, ‘ पिंकी म्हणाली. आमच्या शाळेतल्या बाईंनी आम्हाला एक पुस्तक वाचायला सांगितलं आहे. अं, काय बरं त्याचं नाव ? हं , आठवलं. ‘ दास डोंगरी राहतो ‘ असं काहीतरी नाव आहे. म्हणजे समर्थ डोंगरातच राहत होते ना.. ?
‘ हो बरोबर आहे पिंकी,’ आई पोह्याच्या डिश ठेवत म्हणाली. ‘ अगं, गो नी दांडेकरांची आहे ती कादंबरी. आपल्याकडे आहे. मी देईन तुला काढून. ‘
‘ अहो, मी काय म्हणते ? उद्या रविवार आहे. आपण बऱ्याच दिवसात कुठे बाहेर गेलो नाही. आपण मुलांना घेऊन कुठेतरी जाऊ या का ? ‘
पिंकी, राजेश दोघांनी आनंदानं टाळ्या वाजवल्या. ‘ बाबा, जाऊ या ना मस्त कुठेतरी. ‘ पिंकी म्हणाली.
‘ बरं बरं आता तुम्ही सगळे म्हणताय तर जाऊ या. आपल्या गावाजवळ एक अभयारण्य आहे. तिथे शंकराचं एक हेमाडपंती देऊळ पण आहे. तुम्हाला मस्तपैकी झाडं, प्राणी सुद्धा बघायला मिळतील. ‘ श्यामराव म्हणाले. चला, जा आता. तुमचा गृहपाठ पूर्ण करा. मग थोडावेळ बाहेर खेळायला जा. ‘ मुलं आनंदानं तिथून निघून गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच श्यामराव, श्यामलाताई, राजेश, पिंकी आणि त्यांची पिंकी जंगल सफारीला निघाले. काही ठिकाणी रस्ता कच्चा होता. त्यामुळे प्रवासाला वेळ लागत होता. आता ऊन झाले होते आणि मुलांना भूक लागली होती. रस्त्यात एक विस्तीर्ण पसरलेले वडाचे झाड श्यामरावांना दिसले. त्यांनी तिथे गाडी थांबवली. सगळे गाडीतून खाली उतरले. श्यामलाताईंनी गाडीतून जेवणाचे डबे काढले. श्यामरावांनी राजेश आणि पिंकीला गाडीतील सतरंजी काढून खाली टाकायला सांगितली. आता सगळेच छानपैकी बसून जेवणाचा आस्वाद घेऊ लागले. राजेश म्हणाले, ‘ बाबा, इथे किती छान, फ्रेश आणि थंड वाटते आहे ! हवा पण छान आहे. ‘
‘ राजेश, हे कोणते झाड आहे माहिती आहे का ? ‘ बाबांनी विचारले. ‘बाबा, मी सांगू ? ‘ पिंकीने विचारले.
‘ हो सांग की ‘
‘ हे वडाचे झाड आहे. बाबा, बघाना याला पारंब्या किती फुटल्या आहेत ! पिंकी म्हणाली.
‘ अगदी बरोबर आहे पिंकी. वडाच्या झाडाला खूप पारंब्या फुटतात. त्या पुन्हा जमिनीत जाऊन वाढतात. हे झाड खूप मोठे वाढते. काही काही वटवृक्ष तर एवढे मोठे असतात की त्यांच्या छायेत एकाच वेळी पाच ते दहा हजार लोक सुद्धा बसू शकतात. प्राचीन काळामध्ये व्यापारी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी या झाडाच्या सावलीत थांबत असत म्हणून या झाडाला इंग्रजीमध्ये बनियन ट्री असेही म्हटले जाते. आणि ही झाडे दीर्घायुषी असतात बरं का राजेश. काही झाडे तर हजार वर्षांपर्यंत जगतात. ‘
‘ बापरे, आश्चर्यच आहे. माणसापेक्षा सुद्धा ही झाडे जास्त जगतात. ‘ राजेश उदगारला.
‘ हो राजेश, वड, पिंपळ यासारखी झाडे खूप वर्षे जगतात. हे अक्षय वृक्ष आहेत. यांना पवित्र मानून त्यांची पूजा केली जाते. ‘
राजेशची आई शाळेत विज्ञान विषय शिकवायची. ती म्हणाली, ‘ राजेश, पिंकी , तुम्हाला माहिती आहे का की वड, पिंपळ, औदुंबर, चिंच, कडुलिंब यासारखी झाडे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात आणि आपल्याला शुद्ध प्राणवायूचा पुरवठा करतात. पिंपळ वातावरणातील १००% कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतो तर वड आणि कडुलिंब अनुक्रमे ८० आणि ७५ टक्के कॉ डा ऑक्साईड शोषून घेतात. वातावरण शुद्ध करणाऱ्या या निसर्गाच्या गाळण्याच आहेत. ‘
‘ अगदी बरोबर आहे राजेश, ‘ बाबा म्हणाले. पण राजेश आणि पिंकी तुम्हाला सांगतो की ही सगळी आपली देशी झाडं बरं का ! पर्यावरण शुद्धीसाठी ही फार मदत करतात. पण गुलमोहर, निलगिरी यासारखी झाडे मात्र या दृष्टीने फारशी उपयोगाची नाहीत. या झाडांची सावली फारशी पडत नाहीत. या झाडांवर पशुपक्षीही घरटे करत नाहीत. पण जे पशुपक्षांना कळते, ते मानवाला मात्र कळत नाही. बाळांनो, तुम्ही थोडावेळ आईशी बोला. तोपर्यंत मी जवळपास आणखी काही बघण्यासारखे आहे का त्याचा तपास करतो. ‘ असं म्हणून श्यामराव तिथून निघाले.
श्यामलाताई म्हणाल्या, ‘ बाळांनो, वड, पिंपळ, कडुलिंब, औदुंबर आणि आपली सगळीच झाडे अतिशय औषधी आहेत बरं का ! ते आपल्याला ऑक्सिजन तर देतातच पण आपले अनेक आजारही बरे करतात. कडुलिंबाच्या काडीने नियमितपणे दात घासल्यास दातांना कीड लागत नाही. पिंपळाची पाने तर किती सुंदर असतात. हृदयाच्या आकाराची ! जेव्हा नवीन पालवी फुटते तेव्हा ते छान गुलाबी, तांबूस असतात. मग हिरवी होतात. त्यांची सळसळ, वाऱ्यावर डोलणं किती मनमोहक असतं. पिंपळाची पाने, साल आणि मुळे औषधी असतात. पोटाच्या आजारांवर त्यांचा उपयोग होतो. पिंपळ पानांचा काढा आपले शरीर डिटॉक्स करतो म्हणजे त्यातील दोष किंवा टॉक्सिन्स काढून टाकतो. पिंपळाची फळे पक्षांचे आवडते खाद्य आहे. या वृक्षाला अश्वत्थ वृक्ष असेही म्हटले जाते. याचा उल्लेख भगवद्गीतेत सुद्धा येतो. गौतम बुद्धानी याच वृक्षाखाली तप केले. त्यांना त्या ठिकाणी दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणून त्या वृक्षाला बोधिवृक्ष असेही म्हटले जाते. बिहारमधील बोधगया येथे हा वृक्ष आहे.
पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या मारुतीचे म्हणजे अश्वत्थ मारुतीचे दर्शन पुण्यप्रद मानले जाते. श्रावण महिन्यात तर दर शनिवारी पिंपळाची पूजा करतात. पिंपळ वृक्षाचे महत्व सांगणारा एक छान श्लोक आहे. तू आता मी तुम्हाला सांगते. तुम्ही लक्षात ठेवा आणि पाठ करा तो.
मूले ब्रह्मा, त्वचा विष्णू , शाखा शंकरमेवच
पत्रे पत्रे सर्वदेवायाम, वृक्ष रादन्यो नमोस्तुते.
म्हणजे ज्या वृक्षाच्या मुळांमध्ये ब्रह्मा, सालीमध्ये विष्णू, फांद्यांमध्ये भगवान शंकर आणि प्रत्येक पानात देवीदेवतांचा निवास असतो, अशा वृक्षराजाला ( पिंपळाला ) नमन असो. ‘
‘अरे वा, आई किती माहिती आहे ग तुला! आज तर आम्हाला खूप नवीन गोष्टी कळल्या. ‘ पिंकी म्हणाली.
राजेश म्हणाला, ‘ आई या वडाच्या झाडाभोवती नुसत्या फेऱ्या मारल्या तरी किती छान वाटते. ‘ श्यामलाताई हसल्या आणि म्हणाल्या, ‘ तुम्हाला माहिती आहे का की वटपौर्णिमेच्या दिवशी आम्ही याच झाडाची पूजा करतो. त्याला प्रदक्षिणा घालतो. ‘ पिंकी म्हणाली, ‘ आई, ते माहितीये, पण का पूजा करतात आणि प्रदक्षिणा का करतात ते सांग ना… ?’
श्यामलाताई म्हणाल्या, ‘ पिंकी तू सावित्री आणि सत्यवान यांची कथा ऐकली असशीलच. तरी मी सांगते. सावित्री ही पतिव्रता होती. यमाने सत्यवानाचे प्राण हरण केले होते. पण सावित्रीने आपल्या सामर्थ्याच्या आणि चातुर्याच्या बळावर यमाकडून त्याचे प्राण परत मागून घेतले. वटवृक्षाखालीच सत्यवानाचे प्राण पुन्हा परत आले. तेव्हापासून सवाष्ण स्त्रिया या वृक्षाची पूजा करतात. आपल्या पतीसाठी दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. त्याला प्रदक्षिणाही करतात. वडाचे झाड भरपूर ऑक्सिजन देणारे आहे. त्यामुळे त्याच्याभोवती प्रदक्षिणा केल्याने आपोआपच शुद्ध प्राणवायूचा आपल्या फुफ्फुसांना होऊन आपले आरोग्य सुधारण्यास मदत होते. शिवाय वडाची मुळे, साल, पाने औषधी असतात. सांधेदुखीवर त्यांचा चांगला उपयोग होतो.
तसेच केस वाढण्यासाठी वडाच्या झाडाचा उपयोग करून तेल बनवतात.
कडुलिंबाचे झाड सुद्धा असेच औषधी असते. त्याची सावली तर खूप थंड असते. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कडुलिंबाच्या कोवळ्या पानांपासून चटणी बनवतो. ती आरोग्यासाठी अतिशय चांगली असते, आपली प्रतिकारशक्ती वाढवणारी असते.
‘अबब ! किती उपयोगी असतात ही झाडे, नाही का ? पिंकी म्हणाली.
‘हो तर. म्हणून बाळांनो, आपल्याला नैसर्गिक आपत्तीपासून आणि ग्लोबल वार्मिंगपासून वाचायचे असेल, आपली वसुंधरा हिरवीगार ठेवायची असेल तर विदेशी झाडांचा मोह सोडून देऊन प्रत्येक १०० मीटर अंतरावर प्रत्येकी एक औदुंबर, वड, पिंपळ, कडुलिंब यासारखी झाडे लावली पाहिजेत. तसेच प्रत्येक घरासमोर, परसबागेत किंवा आपल्या गच्चीवर तुळस अवश्य लावावी. तुळस अत्यंत औषधी तर आहेच पण पण ती भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा करणारी वनस्पती आहे. ‘
‘आई, आता कळले की तुकाराम महाराज, ‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ‘ असं का म्हणत असावेत. ‘
एवढ्यात श्यामराव परत आले. ‘ अरे, मायलेकांच्या गप्पा अजून संपल्या नाहीत का ? चला, आपल्याला अजून बरेच काही पाहायचे आहे. ‘