मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ प्रतिमेच्या पलिकडले : तू छूपी है कहाँ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ प्रतिमेच्या पलिकडले : तू छूपी है कहाँ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

.. आजच्या विज्ञानाच्या चमत्काराने जग इतके जवळ आलयं.. टाचणी पॅरीसला आयफेल टाॅवर वरून खाली पडली तर त्याचा आवाज इथं लालबाग परळ च्या तेजुकाया मॅन्शन च्या अकरा नंबरच्या खोलीत असलेल्या टि. व्ही. त ऐकू येतो.. आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच हे असे कसे काय बुवा?.. अहो त्याचं काय आहे दिवसरात्र त्या अकरा नंबरच्या खोलीतला तो टि. व्ही चालूच असतो.. चौविस तास ढॅंण ढॅंण ढॅंण…तरूणाई करियर घडवायला आपल्या स्वप्नांची पूर्तता करायला जेष्ठांचा आर्शिवाद घेऊन घर सोडून गेलेली असते.. त्यांचीच छोट्या छोट्या प्रतिमा युवावस्थेत करिअर कोणतं नि कसं घडवावे याचा शोध घेण्यासाठी दिवसाचे चोविस तासापेक्षा जास्त वेळ घराबाहेरच असते, केअर टेकर जेष्ठांना लोणकढी थापा वर थापा मारून.. मग घरात जागं राहते त्या जेष्ठांची एकल तर कधी असलीच तर दुकल..कर्तव्याची इतिकर्तव्यता झालेली असते.. भविष्याकडे धुसर नजरेने पाहत भूतकाळातील कडू गोड आठवणींचा रिटेलिकास्ट मनाच्या पडद्यावर बघत बसणे हाच एकमेव उदयोग वर्तमानकाळात करत बसतात.. ना बोलायला कुणी घरी ,ना चालायला कुणी दारी.. अवतीभवतीची समवयस्क बऱ्यापैकी विकेट टाकून गेलेली .नाही तर गावाला पळालेली, एखादं दुसरे असलं तरी आजारालाच दत्तक घेऊन एक कॉट अडवून बसलेली.. मग अश्या परिस्थितीत हातपाय हलते नि तोंड व्यवस्थित चालते, थोडक्यात सर्व ठिकठाक, असणारे या जेष्ठांना घरात वाली कोण असणार.?.तरुणाईच्या पैश्याच्या पावसाने घराचे नंदनवन फुलते .. सगळ्या बाजारातल्या आधुनिक उपकरणांनी जागा जागा व्यापून गेलेली असते..घंटो का काम चुटकीमें . कामाचा डोंगर निपटणारे. पण तेच त्या तरुणाईच्या मनाच्या कोपऱ्यात एक इंचभर जागा त्यांना मिळू नये..साधी प्रेमाने केलेली विचारपूस किती मनाला आधार देऊन जाते… मनाला हवी असलेली प्रेमाची ऊब,नि आपुलकीची भुक मात्र हे नंदनवन भागवू शकत नाही..असंख्य चॅनेल्स ने खचाखच भरलेला तो टि. व्ही. आणि त्या सारखी उपकरणं, रंगीबेरंगी विविध शंख शिंपल्यासारखे ,समुद्ररूपी कार्यक्रमांच्या लाटावर लाटा आदळत असतात.. तो अखंड बडबडत नि दाखवत सुटतो.. पण कान बहिरे असल्याने ऐकून मात्र घेत नाही.. आणि जेष्ठांना तो जे जे दाखवेल ,ऐकवेल ते ते बघण्या शिवाय पर्याय नाही..त्या समोर बसून चार उलटे नि सहा सुलटे टाके घालून वुलनचा स्वेटर विणायला घेतला तर तो कधी पुरा होणार नसतो..कारण त्याच्या उबेचीच गरज नसतेच मुळी पण वेळ घालवायचा तो एक चाळा असतो त्यांचा..रिमोट हाती असून चालत नाही ना.. टि. व्ही. काही काळ बंद झाला तर.. अख्खी चाळ गोळा होईल ना !अरे अकरा नंबरचा आवाज बंद झाला!.. म्हणजे काही तरी गडबड झाली आहे..त्याने होणारी सतत दाराची उघडझाप आणि त्यांच्या प्रश्नांला उत्तरे देण्याची दमछाक.. इतकचं काय आपली म्हणणारी नातीगोती आपल्यालावरच रागवणार, का देताय आम्हाला उगीच मनस्ताप?. आहे कुठे सगळ्याला दयायला उत्तर आपल्याकडे!.. नाही नाही आता उत्तरचं नसतात त्यांच्या कडे.. असतो फक्त एकच प्रश्न सतत मनात घोळत.. अरे देवा! मला तू येथून कधी…. ? तू छूपी है कहाॅ म्हणत… 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – ३ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – ३ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

मागच्या आठवड्यात मला एक फोन आला.लाईट बिल भरले नाही.एम.एस. ई.बी.मधून बोलतो आहे असे सांगणारा.त्यांना बिल भरल्याचे सांगितले.त्यावर पलीकडून पत्ता,बिलाची रक्कम,कसे भरले आहे याचे डिटेल्स सांगण्यात आले.पण त्या ॲप मधून भरल्यामुळे बिल मिळाले नाही असे सांगितले.बिल आज भरले नाही तर वीज कट होईल सांगितले.मी ऑफीसमध्ये जाऊन बघते असे सांगितले.तर म्हणे आम्ही बिल अपडेट करून देतो.फक्त एक ॲप डाऊनलोड करा.आणि त्या वर येणारा ओ टी पी सांगा.बाकीचे आम्ही बघतो असे सांगितले. ओ टी पी पाठवा म्हंटल्यावर मी सावध झाले.डोक्यात धोक्याची घंटा वाजली.मी सांगितले माझे सगळे कॉल आपोआप रेकॉर्ड होतात.हा कॉल पोलिसांना ऐकवते आणि मग ठरवते.हे ऐकल्या बरोबर पलीकडून कॉल कट झाला.आणि मी बँक रिकामी होण्यापासून वाचले.नंतर असे बरेच किस्से समजले.म्हणून हे लिहावे वाटले.

सध्या नेट वरून फसवणुकीचे असे प्रकार खूप वाढले आहेत.आपल्याला घाबरवून अशी माहिती मागवतात आणि त्या आधारे पैसे लुबाडतात.

हे एक प्रकारचे सायबर फिशिंग असते.जसे मासेमारी साठी गळ टाकतात तसेच होते.यात एखादे ॲप किंवा लिंक गळ म्हणून वापरले जाते.ते ॲप डाऊनलोड केले.किंवा लिंक क्लिक केली की आपण त्यात अडकतो.आणि आपली सगळी माहिती गुन्हेगारांना मिळते.

कोणतीही सुविधा आली की त्याचे फायदे तोटे दोन्ही असते.कोणत्याही सुविधा किंवा आधुनिक तंत्रज्ञान वाईट नसते.गरज असते ती आपण पूर्ण माहिती घेऊन ते काळजी पूर्वक वापरण्याची.जसे सिगारेट पाकिटावर वैधानिक इशारा असतो.तसेच इशारे याच सोशल मीडिया वर वारंवार दिले जातात.पण आपण सोयीस्कर दुर्लक्ष करतो.आणि अशा सापळ्यात अडकतो.तरी सावध राहून व्यवहार करावेत.ते आपल्या सोयी साठीच असतात.

अजून एक सांगावेसे वाटते.आपण ज्या देवदेवतांच्या इमेज किंवा संदेश असलेल्या इमेज पाठवतो त्या मुद्दाम फोन मध्ये व्हायरस सोडण्यासाठी बनवलेल्या असतात.अगदी सगळ्याच तशा नसतात.पण आपण काळजी घ्यावी.आपल्याला सुद्धा चांगले विचार सुचतात की,ते टाईप करून पाठवावेत.आणि आलेल्या इमेज डाऊनलोड न करता डिलीट कराव्यात.

आपली थोडी सावधगिरी

नेट घेई भरारी…

अवघड कामे सहज करी

आपली वाचवे फेरी…

मीडिया धरू करी

वेळ श्रम वाचवू परोपरी

तंत्रज्ञानाची कास धरी

परी बाळगू सावधगिरी

© सुश्री विभावरी कुलकर्णी

१०/६/२०२३

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ॥ हरिनामाचा सरवा ॥ ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सुश्री विनिता तेलंग

? मनमंजुषेतून ?

॥ हरिनामाचा सरवा ॥ ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

(अगा वैकुंठीच्या राया …)  

विठ्ठल हा मालनीचा जिवलग .त्याला एकदा भेटून तिचं मन निवत नाही. पण संसाराची ,मुलालेकरांची, गायीगुरांची जबाबदारी तिच्यावर असते .ती जबाबदारी तिला दर वारीला जाऊ देत नाही .मग तिला वाटतं की आपण ‘बाईमाणूस’ म्हणून जाऊच नये .पंढरीच्या वाटेवरचं काहीही होऊन रहाणं तिला चालणार आहे .

किंवा कदाचित मनुष्यजन्म सरल्यावरही तिला त्याचा सहवास हवा आहे .तो कसा ? तर 

पंढरपुरीचाऽ           

मी का व्हयीन खराटा ऽऽ

इट्टलाच्या बाईऽ       

लोटंऽन चारी वाटा ऽऽ

पंढरपुरीची ऽ           

व्हयीन देवाची पायरी ऽऽ

ठेवील गऽ पाय ऽ      

सये येता जाता हरी ऽऽ

पंढरपुरीची ऽ           

मी गं व्हयीन परात ऽऽ

विठूच्या पंगतीला ऽ   

वाढीन साखरभात ऽऽ

याचा अर्थ कळण्याजोगा आहे ..पण याचा शेवट मोठा लोभस आहे ! 

पंढरपुरामंदी ऽ          

मी का व्हयीन ऽ पारवा ऽऽ

येचीन मंडपात ऽ        

हरिनामाचा सरवा 

तिला पारवा होऊन हरिनामाचा सरवा वेचायचा आहे !

किती विलक्षण प्रतिभा आहे या मालनीची ..

शेतातल्या पिकाची कापणी, मळणी करताना धान्याचे काही दाणे भुईवर सांडतात .तो सरवा .त्याला पाखरं टिपतात . पंढरपुरात मंदिरात जागोजागी हरिनामाचा गजर होतच असतो .नामसंकीर्तन ,भजन ,कीर्तन झाल्यानंतर भक्त बाहेर पडतात. त्यांच्या मुखातूनही तेच ऐकलेलं नाम बाहेर सांडत असतं .हा नामाचा सरवा तिथं मंदिराच्या सभामंडपात, प्रांगणात सांडून रहातो तो तिला वेचायचा आहे ! 

अशाच एका मालनीला वाटेवरचं गवत होऊन , वारकर्‍यांनाच विठू समजून त्यांचे पाय कुरवाळायचेत ! मातीचा डेरा होऊन त्यांचे पाय आपल्या आतल्या पाण्यानं, मायेनं भिजवायचेत .पण पुढं तिला बाभूळ, तुळस व्हावं वाटतं यामागे मात्र वारकर्‍याचं मोठं मन दिसून येतं .ती म्हणते ,‍

पंढरीच्या वाटं ऽ       

मी तं व्हयीन बाभूळ ऽ ऽ 

येतील मायबाप ऽ    

वर टाकीती ऽ  तांदूळ ऽ ऽ

पंढरीच्या वाटं ऽ     

मी  ग व्हयीन तूळस ऽ ऽ

य‍ेतील मायबाप ऽ   

पानी देतील मंजूळसं ऽ ऽ

वारीला जाताना वारकरी सोबत पीठमीठ घेतात ,तसे तांदूळही घेतात .आपल्यासोबत चालणारा, भेटणारा कुणीही उपाशी रहायला नको ,याकरता ते दक्ष असतात. एकांड्या साधू संन्याशाला ते तयार भाजी भाकरी देतात .कुणाला ते चालत नसलं तर त्याला शिधा म्हणजे तांदूळ देतात .चालताना बाभळीचं झाड आलं की पालवी दाट नसल्यानं त्यावरची पाखरं लगेच दिसतात .मग ते त्यांना तांदूळ टाकतात . पाखरांनाही दाणे फेकलेले दिसतात व खाली येऊन ती ते टिपू लागतात.

बाभळीच्या झाडोर्‍यासारखी ही मालन .तिच्याकडं काहीच साहित्य नाही .पण ही सार्‍यांची सेवा करते.  सामान वहाते, पाणी आणते, भाकर्‍या बडवू लागते ,पाय चेपून देते .ही वारीची लेक होते .मग मायबाप तिलाही दाणा घालतात ,जेवू घालतात .वारीत बाया डोईवर तुळस नेतात .तिला, किंवा वाटेतही तुळस दिसली की तिला पाणी द्यायची रीत आहे .वारकरी या तुळसाबाईलाही जवळचं पाणी देतील .पण ती पिईल कशात ? तर ओंजळीत हलकेच ओतलेलं मंजुळसं पाणी तिला मिळेल ! वारीला जाण्यामागं विठ्ठलाची ओढ तर आहेच पण कदाचित तिच्या रूक्ष, खडतर संसारात तिला न मिळणारी माया, आपलेपणा तिला वारीत मिळतो . रोजच्या कामच्या रगाड्यातून सुटका तर होतेच पण मुक्तपणाचा एक निर्भर आनंदही तिला हवाहवासा वाटत असणार .वारीत सारे सारखे … एकमेकांकडे सख्यभावानं, आत्मीय भावानं पहाणारे.  तिथल्या सार्‍या बंधूंना ती साधू म्हणते .तिथं ती सासुरवाशीण नाही. कपड्याचे, केसाचे -तिच्या संस्कृतीतल्या नियमांचे काच वारीत नसतात .मग तीही जरा सैलावते आणि निगुतीनं तेलपाणी करुन जपलेले आपले केस मोकळे सोडू शकते .वारीत उन्हापावसात चालणं ,कधी घामानं तर कधी पावसानं भिजणं, नदीत स्नान करणं ,यामुळंही ती कायम केस बांधत नाही .कितीतरी मालनी या साध्याशा सुखाबाबत भरभरून बोलतात ..

पंढरीला जातेऽ         

मोकळी माझी येनी 

साधूच्या बराबरी ऽ    

मी ग आखाड्या केला दोनी ऽ ऽ

पंढरीच्या वाटं ऽ       

मोकळा माझा जुडा ऽ ऽ

साधूच्या संगतीत      

मीळाला दूध पेढा ऽ ऽ

पंढरी मी गऽ जातेऽ    

मोकळं माझं क्यास ऽ ऽ

साधूच्या संगतीनं ऽ    

मला घडली एकादस ऽ ऽ 

हे एक प्रकारचं प्रबोधन, एक प्रथा मोडण्याचं इवलं धाडसच ती करते आहे .असे केस सोडले तरीही माझं काही वाईट तर झालं नाहीच ,उलट एकादशा -उपवास- दर्शन यानं मी पुण्यच जोडलं असं ती सांगते ..

पण या प्रतीकात्मक मुक्तीशी मालन थांबत नाही . तिचं सुखनिधानच इतकं उंचावर आहे की त्याच्या ओढीनं ती देहभोगांच्या पार जाते ! 

पंढरीच्या वाटं ऽ       

वाटंऽ पंढरी कीती दूरऽऽ

नादावला जीवऽ      

वाजंऽईना गऽ बिदीवर ऽ ऽ 

पंढरीची वाट, मुक्तीची वाट दूरची खरी .अती खडतर .पण त्या वाटेवर चालताना त्याच्या नामात स्मरणात त्याच्या ओढीत पावलं अशी दंग होतात की कसलंच भान रहात नाही. जीव नादावतो .बीदी म्हणजे वाट .त्या वाटेवर आता तिला नादही ऐकू येईना .ती वाट म्हणजे एकतारीची तार आणि तिची पावलं हाच त्याचा झणात्कार .तिचं चालणंच वीणेचं वाजणं झालंय .आता तिला ना देहाची जाणीव उरलीय ना चालीची .सारं एकच झालंय .सगळ्यातून एकच नाद उमटतोय ..

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ….. 

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका ‘भगोड्या’ ची गोष्ट – भाग-2— मूळ इंग्लिश – ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त) – मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆  एका ‘भगोड्या’ ची गोष्ट –  भाग-2 — मूळ इंग्लिश – ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त) – मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

(महिन्याभराने सामान घेण्यासाठी गुरबचन सिंग पुन्हा येईल त्यावेळी सापळा लावून त्याला पकडण्याचे आम्ही ठरवले.) इथून पुढे —

पुढच्या महिन्यात, नेहमीप्रमाणे गुरबचन सिंग युनिटमध्ये आला. रेशन व दारूचा कोटा घेतल्यानंतर तो माझ्याकडे आला तेंव्हा, EME सेंटरकडून समजलेल्या माहितीसंबंधी मी त्याला सांगितले. प्रथम त्याने साफ कानावर हात ठेवले. खरा ‘भगोडा’ तो स्वतः नसून, त्याचा जुळा भाऊ असल्याचा बनावही त्याने केला.

गुरबचन सिंगचे बोलणे ऐकल्यानंतर, आमच्या रेजिमेंटचे सुभेदार मेजर आणि हवालदार मेजर त्याला घेऊन काही काळ ऑफिसबाहेर गेले. त्या दोघांनी त्याला खास ‘मिलिटरी खाक्या’चा एक डोस दिला असणार. थोड्याच वेळात माझ्या ऑफिसात येऊन गुरबचन सिंगने, तो स्वतःच ‘भगोडा’ असल्याची कबुली दिली. 

लगेच, मेजर महंती यांनी माझ्यासह बसून, गुरबचन सिंगची चौकशी सुरु केली. त्याची इत्थंभूत कहाणी ऐकायला, आम्हा दोघांव्यतिरिक्त, CO साहेब व इतर अधिकारीही हजर होते. 

त्याने दिलेल्या जबानीप्रमाणे, २१ ऑक्टोबर १९६२ रोजी अचानक चिनी हल्ला येताच, आपल्या सैन्याच्या सर्व तुकड्या इतस्ततः पांगल्या. ज्याने-त्याने आपापल्यापुरते पाहावे अशी स्थिती होती. तश्या विचित्र परिस्थितीत, गुरबचन सिंग कसाबसा जीव वाचवून, प्रथम भूतानमध्ये पळाला आणि नंतर कलकत्त्यात पोहोचला. खोटे नाव धारण करून त्याने एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये नोकरी केली. 

आधी ट्रकचा क्लीनर, आणि नंतर ड्रायव्हर म्हणून, १९६३ ते १९६७ या काळात त्याने कलकत्ता-मुंबई मार्गावर अनेक फेऱ्या केल्या. अश्याच एका फेरीत, तो जमशेदपूर येथे थांबलेला असताना, त्याच्या एका मित्राने, टेल्कोमध्ये त्याची वर्णी लावून दिली.

अत्यंत निष्ठेने आणि उत्तम काम करीत असल्याने १९६८ पासून तो तेथेच नोकरीवर टिकला होता. मात्र, पाच वर्षांनंतर त्याच्या सर्व्हिस बुकाची पडताळणी करणे आवश्यक झाल्याने तो माझ्यापर्यंत पोहोचला होता.  

ही संपूर्ण कहाणी ऐकून, निवृत्त कर्नल ब्रार आणि टेल्कोचे इतर सर्व वरिष्ठ अधिकारी अक्षरशः स्तिमित झाले.   

गुरबचन सिंगला आर्मीच्या पद्धतीप्रमाणे रीतसर अटक झाली आणि EME सेंटरमधून आलेल्या आरक्षी दलासोबत त्याची त्रिमुलगेरीला रवानगी झाली. तेथे आर्मी कोर्टासमोर चाललेल्या खटल्यात त्याला १८ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेल्याचे समजले. 

इकडे माझ्या कानात मात्र, अनेक अधिकाऱ्यांनी धोक्याची घंटा वाजवली. गुरबचन सिंग ‘भगोडा’ असल्याची वस्तुस्थिती प्रथमतः मीच उघडकीला आणली होती. त्यामुळे, एखाद्या हस्तकाकरवी, अथवा तुरुंगातून सुटल्यावर स्वतःच, गुरबचन सिंग माझ्यावर निश्चित सूड उगवणार हे भाकीत अनेकांनी वर्तवले. 

मी जेमतेम २३ वर्षांचा आणि अननुभवी अधिकारी होतो. मला भीती वाटणे स्वाभाविक होते. अविचाराने, आणि निष्कारणच आपण या फंदात पडलो असेही मला वाटू लागले. शेवटी, ‘जे जे होईल ते ते पाहावे’ असे स्वतःशी म्हणून, मी ते सर्व विचार बाजूला सारले. 

या घटनेपाठोपाठ आमच्या CO साहेबांनी, म्हणजेच लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धेंनी, गुरबचन सिंग ज्यांचा ड्रायव्हर होता त्या कर्नल ब्रार यांना विनंती करून, त्यांच्यापाशी काही मागण्या केल्या. पहिली मागणी अशी की, शिक्षा संपताच गुरबचन सिंगला पुन्हा टेल्कोमध्ये कामावर रुजू करून घेतले जावे. दुसरे असे की, गुरबचन सिंगची पत्नी आणि मुलांना सध्या टेल्कोच्या आवारातील घरातच राहू द्यावे, त्याच्या मुलांना टेल्कोच्या शाळेतच शिकू द्यावे, आणि टेल्कोतर्फे त्यांना घरखर्चासाठी दरमहा थोडासा भत्ताही दिला जावा. 

CO साहेबांच्या विनंतीला मान देऊन, कर्नल ब्रार यांनी, या सर्व गोष्टी अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला. टेल्कोच्या वाहन परीक्षण विभागाचे प्रमुख, निवृत्त मेजर डी. एन. अगरवाल यांचीही या कामी अतिशय मोलाची मदत झाली. मुख्य म्हणजे, चीन युद्धामुळे उद्भवलेल्या विचित्र परिस्थितीचा बळी झालेल्या एक माजी सैनिकाचा, सहानुभूतीपूर्वक विचार केला गेला! एखाद्या कर्मचाऱ्याचे हित जपण्याचे टाटा समूहाचे धोरण आणि एकंदर उदार मनोवृत्ती, याचे हे द्योतकच मानले पाहिजे! 

त्याउपर, CO साहेबांनी आम्हाला आदेश दिला की, गुरबचन सिंगच्या परिवाराला दरमहा रेशन आणि जीवनावश्यक वस्तू आमच्या रेजिमेंटच्या कॅन्टीनमधून घरपोच दिल्या जाव्यात. अर्थातच, CO साहेबांच्या या आदेशाची कसून अंमलबजावणी करण्यात मी कमी पडलो नाही. 

या घटनेनंतर लगेच, म्हणजे ऑक्टोबर १९७३ मध्ये लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धेंची आमच्या युनिटमधून दुसरीकडे बदली झाली. पण, त्यांच्या जागी आलेल्या, लेफ्ट. कर्नल एस. के. अब्रोल या नवीन CO साहेबांनीही या आदेशात काडीचाही बदल केला नाही. ज्या पद्धतीने आम्ही हे संपूर्ण प्रकरण हाताळले त्याबद्दल टेल्को आणि टिस्कोच्या अधिकाऱ्यांनीही आमचे वारेमाप कौतुक केले. 

१९७४-७५ मध्ये केंव्हातरी, सक्तमजुरीची शिक्षा भोगून गुरबचन सिंग जमशेदपूरला परतला. मी अजूनही आमच्या युनिटचा Adjutant  होतो, आणि अविवाहित असल्याने ऑफिसर्स मेसमधील एका खोलीत राहत होतो. 

गुरबचन सिंग परतल्याची आणि तो लगोलग मला भेटायला येत असल्याची खबर, निवृत्त कर्नल ब्रार यांच्याकडून समजताच मी तयारीला लागलो. गुरबचन सिंग व त्याच्या पत्नीसाठी चहा-नाश्ता आणि मुलांसाठी चॉकलेट मागवून मी एक छोटेखानी मेजवानीच आयोजित केली. आल्या-आल्या गुरबचन सिंग अक्षरशः माझ्या पायावर कोसळला आणि मनसोक्त रडला. मलाही माझ्या भावना काबूत ठेवणे अवघड झाले. 

या सर्व प्रकरणात, लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धे आणि टाटा समूहाचे कर्नल ब्रार व मेजर अगरवाल यांच्याकडून मी नकळतच एक मोलाचा धडा शिकलो. कायदा व नियमांच्या चौकटीत राहूनच, पण सहानुभूति आणि माणुसकी न विसरता आपण काम केले, तर अक्षरशः जादूची कांडी फिरल्यागत अकल्पित परिणाम साधता येतो.    

गुरबचन सिंगने कर्नल सहस्रबुद्धेंचे आणि माझे शतशः आभार मानले. त्याने मला प्रांजळपणाने सांगितले की, त्याला पकडून देण्यास जरी मी जबाबदार होतो तरीही, ११ वर्षे त्याच्या मनात डाचत असलेल्या अपराधी भावनेचा निचरा होण्यासाठीही मीच कारणीभूत झालो होतो. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद झळकत होता. मुख्य म्हणजे, शिक्षा भोगून दोषमुक्त झाल्यावर, तो आता स्वच्छंदपणे आपले आयुष्य जगू शकणार होता ! 

– समाप्त – 

मूळ इंग्रजी अनुभवलेखन : ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त)

मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) 9422870294

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 90 ⇒ नौकर चाकर… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “नौकर चाकर”।)  

? अभी अभी # 90 ⇒ नौकर चाकर? श्री प्रदीप शर्मा  ? 

अमीरों, सरकारी अफसरों और राज नेताओं के यहां नौकर चाकरों की कमी नहीं होती। नौकरी, नौकरी होती है, लेकिन कहीं कहीं, नौकरी के साथ साथ चाकरी भी करनी पड़ती है। वेतन लेकर काम करने वाले को कर्मचारी कहते हैं,

घर गृहस्थी के कामों के लिए नियुक्त किए गए सेवक को भी नौकर ही कहते हैं। श्रम कानून में नौकरी का पारिश्रमिक यानी वेतन तो है, लेकिन चाकरी तो नौकरी के साथ मुफ्त और मजबूरी में ही की जाती है।

अंग्रेज एक शब्द लाए नौकर के लिए, सर्वेंट ! हमने बहुत जल्द उसे पकड़ लिया। एक सर्वेंट नौकर भी हो सकता है और सेवक भी। अगर एक अफसर नौकर है, तो वह सिविल सर्वेंट है, बाबू एक शासकीय कर्मचारी है और चपरासी भृत्य है। ।

लोकतंत्र में इन सबके ऊपर एक प्राणी है, जो नौकरी नहीं करता, फिर भी मानदेय लेता है, गाड़ी, भत्ते, और अन्य सुविधाओं के साथ नौकर चाकर भी रखता है, फिर भी सिर्फ जनता का सेवक कहलाता है। यह सेवक चाकरी नहीं करता, राज करता है।

सेवक के कई प्रकार हैं, जिसमें दास्य भाव है, वह भी सेवक है, और जिसमें सेवा का भाव है, वह भी सेवक ही है। एक नर्स मरीजों की सेवा करती है और परिचारिका कहलाती है, आजकल पुरुष नर्स भी देखे जा सकते हैं। ।

सेवक को दास भी कहा जाता है। हमारे राजाओं के महलों में कर्मचारियों के अलावा दास दासियां भी होती थी। दास तो भक्त रैदास भी थे और दासी तो राजा दशरथ के राज्य की दासी मंथरा भी थी। हम यहां देवदासी का जिक्र नहीं छेड़ रहे।

अपने नाम के साथ ही दास लगाना कभी भक्ति भाव की निशानी था। कवियों में कालिदास और भक्ति काल में तो तुलसीदास और सूरदास के अलावा पुष्टि मार्ग में भी कई दास हुए हैं। तानसेन के गुरु भी संत हरिदास ही तो थे।।

मीरा तो दासी मीरा लाल गिरधर भी थी और कृष्ण की चाकर भी। श्याम मोहे चाकर राखो जी। गीता प्रेस के रामसुखदास जी महाराज भी एक विरक्त संत ही थे। गांधीजी के भी एक सहयोगी घनश्यामदास बिड़ला ही तो थे।

बंगाल में तो बाबू मोशाय भी हैं और दास बाबू भी। एक विलक्षण गायक येसुदास भी हुए हैं। लेकिन ईश्वर के करीब तो वही है, जो सेवक है, दास है। आजकल सेवा का जमाना है, आप भी नौकरी चाकरी छोड़ें, सेवाकार्य करें। खेती किसानी भी देश की ही सेवा है। कहीं जमीन अटका लें। एक एनजीओ खोल लें, सेवा की सेवा और मेवा का मेवा।।

सेवक बनें! सेवा में कोई काम छोटा बड़ा नहीं होता। देश सेवा से बड़ी कोई सेवा नहीं। जनता के प्रतिनिधि बनकर सेवा करें। डिप्टी सी .एम., सी एम, और पी. एम . इंसान यूं ही नहीं बन जाता।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्यास पौर्णिमा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? विविधा ?

व्यास पौर्णिमा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

(नुकत्याच  झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त)

महर्षी व्यासांचा जन्म आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा असे म्हणतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे

      नाना कथा रुपे भारती

      प्रकटली असे त्रिजगती

      आविष्करौनी महामती

      व्यासाचिये

म्हणूनच आपण सगळे रोज त्यांना प्रातःवंदना देताना म्हणतो

      अश्वत्थामा बलिर्व्यासो

      हनुमानश्च बिभीषण:

      कृप: परशुरामश्च

      सप्तैते चिरंजीविन:

      सप्तैतान् स्मरेनित्यम्

      सर्वव्याधिविवर्जितम्

या सात चिरंजीवांचे स्मरण जो करेल तो निरोगी असेल. आचार्य किशोरजी व्यास म्हणतात “महर्षी व्यास हे जगातील साहित्यिकांचे मेरुमणी आहेत”. त्यांनी भरपूर ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यांचे मूळ नाव द्वैपायन .वेदांचा विस्तार केला म्हणून त्यांना वेद व्यास असे म्हणतात. पूर्वी एकच वेद होता. पण तो मोठा असल्यामुळे लोक वाचू शकत नव्हते. त्यातील ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावे या तळमळीने व्यासांनी त्याचे चार भाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, आणि सामवेद. एके दिवशी नैमिषारण्यात निमंत्रितांसाठी धर्मसभा भरली. धौम्य ऋषी म्हणाले, वेदांचा अमूल्य ज्ञाननिधी आता सुरक्षित झाला. द्वैपायनाच्या या कार्याचा आम्ही कृतज्ञतापूर्वक गौरव करतो. आणि आजपासून त्याला या युगाचा व्यास निर्धारित करतो. त्याचप्रमाणे ज्या पीठावरून त्याने सर्वांच्या शंकांचं समाधान केलं ते पीठ यापुढे “व्यासपीठ” म्हणून संबोधित करण्यात येईल. यापुढे महत्त्वाच्या सभांमध्ये देखील ज्ञानी वक्त्यांसाठी किंवा पारंपारिक विषयांच्या सभांमध्ये निर्माण केलेल्या पीठालाही व्यासपीठ हीच अधिकृत संज्ञा असेल. सामान्य विषयांच्या चर्चेसाठी उपयोगात आणले जाणारे पीठ मंच असतील. (उदाहरणार्थ, राजकीय मंच, काव्य मंच वगैरे ).आणि अभिनयासाठी असलेले ते रंगमंच. अशा भिन्नपीठांसाठी विविध संज्ञांचा प्रयोग करावा. ब्रम्हर्षी वशिष्ठ हे व्यासांचे पणजोबा. त्यांनी आपल्या पणतवाला हृदयाशी कवटाळले. आनंदाश्रूंचा अभिषेक केला.  त्यांच्या खांद्यावर व्यासपदाचा सन्मान असलेलं वस्त्र पांघरले.  द्वैपायन आता व्यास झाले. हा अनुपम सोहळा अनुभवताना सारे सभागृह आनंदाश्रूंनी न्हाऊन निघाले. ते मूळ व्यासपीठ म्हणजेच व्यास गद्दी नैमिषारण्यात अजूनही सुस्थितीत आहे.

पण वेदातील तत्त्वज्ञान सुद्धा लोकांना समजेना. अशा लोकांसाठी त्यांनी पुराणे लिहिली. सर्वांना कथा आवडतात .पुराणांमध्ये विश्वातल्या प्रत्येक विषयावर त्यांनी लिहिलं. त्यांनी अठरा पुराणे रचली. उपनिषदे लिहिली.

     परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम्

     अष्टादश पुराणानि व्यासस्य वचन द्वयं

त्यानंतर त्यांनी महाभारत रचले. त्यावेळी त्यांनी 18 पर्व आणि 18 अध्याय यांचा प्रयोग केला होता. महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले. या युद्धाच्या वेळी 18 औक्षहिणी सैन्य होते .दोन्ही बाजूंनी फक्त अठरा महारथी होते. जेव्हा महाभारत युद्ध संपले त्यावेळी सर्व लोक मारले गेले .फक्त 18 लोक शिल्लक होते. गीतेचे अध्याय देखील अठराच आहेत. महाभारताला पाचवा वेद असेही म्हणतात.

आपला अंध पुत्र धृतराष्ट्र याला महाभारत युद्ध पाहता यावे म्हणून संजयला दिव्यदृष्टी देऊन महर्षी व्यासांनी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद ऐकवला. तीच भगवद्गीता. विश्व साहित्यात तिचे निर्विवाद उच्च स्थान आहे. गीतेचा पाठ करण्यापूर्वी खालील श्लोक म्हणतात

     ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता

      नारायणेन स्वयम्,|

      व्यासेन प्रथितां पुराणमुनिना

      मध्ये महाभारतम् ||

      अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम्

      अष्टादशाध्यायिनीम्ब|

      त्वामनुसंदधामी भगवद्गीते

      भगवद्वेषिणीम्||

याचा अर्थ:- भगवान नारायणांनी स्वतः पार्थाला म्हणजे अर्जुनाला सांगितली होती आणि जी महाभारतात प्राचीन ऋषी व्यासांनी रचली होती, हे देवी माते, पुनर्जन्माचा नाश करणारी ,अद्वैताच्या अमृताचा वर्षाव करणारी आणि अठरा प्रवचनांनी युक्त अशा या गीतामाते,मी तुझ्यावर ध्यान करतो. आणि त्यानंतर महर्षी व्यासांना नमस्कार करण्यासाठी खालील श्लोक म्हणायचा असतो.

      नमोस्तुते व्यास विशालबुद्धे

      फुल्लारवींदयातपत्रनेत्र

      येन त्वया भारतातैलपूर्ण:

       प्रज्वलितो जनमय: प्रदीप:

याचा अर्थ :- हे व्यास, व्यापक बुद्धीच्या आणि फुललेल्या कमळाच्या पाकळ्यांसारख्या डोळ्यांनी ज्यांच्या हातून महाभारताच्या तेलाने भरलेला ज्ञानाचा दिवा प्रज्वलित झाला आहे अशा तुला नमस्कार असो.

“व्यासो$च्छिस्टं जगत्सर्वम्” असे म्हणतात.  व्यासांना सर्व विषयांचे ज्ञान होते. संपूर्ण जगात एकही गोष्ट अशी नाही की जिला व्यासांनी स्पर्श केलेला नाही. ते अलौकिक मानसशास्त्रज्ञ होते.

अखेर ते थकले. त्यांना मुक्त व्हावे असे वाटू लागले. ते गंगेच्या तिरावर आले. त्यांचे गुरु देवर्षी नारद मुनी त्यांना भेटायला आले. ते म्हणाले ,”मी भगवंताचा निरोप सांगण्यासाठी आलो आहे. तुमची स्थिती भगवंतांनी ओळखली. आता त्यांचा निरोप आहे. जोपर्यंत भगवंत आज्ञा देत नाहीत तोपर्यंत आपण पृथ्वीवरच राहावं.” महर्षी व्यास मनापासून हसले. ते म्हणाले, भगवंतांची आज्ञा शिरसावंद्य. मी इथेच राहीन. माझं एकच ध्येय आहे, लोककल्याण आणि भगवंतांचं सतत नामस्मरण.

        अचतुर्वदनो ब्रह्मा,द्विबाहूरपरो हरि:,

       अभाललोचन: शंभुर्भगवान् बादरायण:

त्यांना चार मुखे नाहीत पण ते ब्रह्मा आहेत. दोन बाहू असले तरी हरी आहेत. कपाळावर तिसरा डोळा नाही पण शंकर आहेत. असे हे बादरायण आहेत. अशा या वंदनीय महर्षी व्यासमुनी यांना कोटी कोटी नमन.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘‘आयडेंटिटी‘…’ ☆ सुश्री हर्षदा बोरकर ☆

सुश्री हर्षदा बोरकर

(आजची कथा सुश्री हर्षदा बोरकर यांची आहे. त्या लेखिका, नृत्य-नाट्य दिग्दर्शिका कीर्तनकार, समाजसेविका आहेत.)

? जीवनरंग ❤️

☆ ‘‘आयडेंटिटी ‘…’ ☆ सुश्री हर्षदा बोरकर

पुस्तक : गुंफियेला शेला – कथा ४ : आयडेंटिटी – सुश्री हर्षदा बोरकर

“आयडेंटिटी कार्ड प्लिज!?”

एअरपोर्टवरच्या बोर्डिंगपास देणाऱ्या कर्मचाऱ्यानी मागणी करताच हातात तयारच ठेवलेलं आयकार्ड नीट निरखून,हसून स्टेलानं पुढे केलं. तपासणी प्रक्रिया पूर्ण होऊन स्टेलाचा ‘प्रवास’ सुरू झाला……

नऊ वर्षापूर्वी आरशात पाहताना जेव्हा कपाळावर ,केसांजवळ पांढरा डाग दिसला तेव्हा हादरून गेलेली स्टेला आज निर्धास्तपणे विमानातल्या बिझनेस क्लासमधल्या खूर्चीवर सेफ्टीबेल्ट लावून   खिडकीबाहेरचं जग काचेतून न्याहाळत होती.

…..

“कोड…!”

….कपाळावरचा डाग जसा जसा पसरू लागला तसा स्टेलाचं तारुण्यसुलभ मन व्यापू लागला. गोऱ्यारंगाच्या त्या डागासोबत काळी काळजी तिच्या व्यक्तिमत्वाला घेरून टाकू लागली आणि स्वत:ला लपवू लागली स्टेला रंगबिरंगी दुनियेपासून.

पण जसा जसा तो पांढऱ्या रंगाचा डाग चेहराभर पसरला आणि स्वत:चच अर्धगोरं आणि अर्धकाळं शरीर तिला दिसलं तसा एक विलक्षण विचार तिच्या मनात चमकून गेला.

….
… मनमिळाऊ शाळकरी स्टेला स्मिथला जेव्हा मित्र-मैत्रिणी ,शेजारीपाजारी ब्लॅकस्मिथ म्हणून हिणवू लागले होते तेव्हा आपल्याच काळोख्या कोषात गुरफटून राहू लागली स्टेला. अत्यंत कुशाग्र   बुद्धीच्या, कुशल आणि महत्वाकांक्षी वृत्तीच्या स्टेलाला पदवी प्राप्त झाल्यावर नोकरी-व्यवसायात डावलले गेले होते ते केवळ ती कृष्णवर्णीय असल्यामुळेच..! कायमच क्षमता पातळीच्या खालच्या दर्जाची      कामे स्वीकारावी लागली तिला…

…..

आता मात्र, गोऱ्या रंगाचा डाग शरीरभर पसरत जात असताना एका अनोख्या नियोजनाचा पाठपुरावा करू लागली स्टेला. स्वत:ची छोटेखानी नोकरी सांभाळत, ह्या डागाळलेल्या नऊ वर्षात , तिने     अनेक अवघड परिक्षा प्रयत्नांनी व अक्कलहुशारीने पूर्ण करत नव्या पदव्या मिळवून स्वत:चा सीव्ही तगडा बनवला . रंगपरिवर्तन करणारं कोड तिने सकारात्मकतेनी पसरवून घेतलं अंगभर..!!

वकिलामार्फत ॲफेडेव्हीट नावाच्या कागदानी बदलून घेतलं स्वत:चं नाव आणि अस्तित्व! आता नव्या नावानी आणि नव्या रुपानी परदेशातील तिच्या गुणांलायक नोकरीसाठी अर्ज भरू लागली *’मेरी    फिनिक्स’*!!

शरीरभर पसरलेलं हे कोड स्टेलासाठी कात टाकणं होतं. वर्ण-रंगावरून माणूस जोखणाऱ्या जगाला स्वत:चा खरा रंग दाखवायला सज्ज झाली मेरी फिनिक्स!!

विमान आकाशात झेपावलं होतं कॅनडाच्या दिशेनी, जिथे नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी त्यांच्या नव्या प्रोजेक्ट मॅनेजरच्या स्वागतासाठी उत्सुक होती. पहाटेच्या वेळी विमानाच्या छोट्या खिडकीतून सूर्याची     कोवळी किरणं चराचर उजळवून टाकताना मेरी पहात होती, एअर होस्टेस अदबीनं विचारत होती,” विच कॉफी यू विल प्रिफर मॅम?”

मेरी हसून म्हणाली,”ब्लॅक, प्लिज!”

❤ ❤ ❤ ❤ ❤

टीप – कथा वाचून आणि चित्र पाहून वाचकांना जर त्या चित्रावर आधारित नवीन कथा, कविता, लेख वगैरे सुचलं, तर त्यांनी ई-अभिव्यक्ती आणि सुश्री सोनाली लोहार यांच्याशी संपर्क साधावा.

चित्र साभार – फेसबुक पेज

©️ सुश्री हर्षदा बोरकर

मो 9867380694

ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिंडी चालली, दिंडी चालली… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

दिंडी चालली, दिंडी चालली… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

काल पुण्यात पालखीचं आगमन झालं. वाहतूक काही वेळासाठी थांबली होती. लोक ती सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. मीही रहदारीचा अंदाज घेत होते. इतक्यात मला काही वारकरी लोकं गर्दीतून वाट काढत चालत जाताना दिसली. त्यांच्या सोबत हातात झेंडा घेतलेली दोन छोटी मुलंही होती. मोठ्या उत्साहात आणि आनंदात ती इतक्या गर्दीतूनही अनवाणी चालत होती. ते पाहून मला माझ्या शाळेतली दिंडी आठवली.

इयत्ता पहिली ते चौथी मी नवसह्याद्रीमधल्या ज्ञानदा प्रशालेत शिकत होते. त्यावेळीस आमच्या शाळेची दिंडी निघायची. शाळेपासून ते आजच्या राजारामपुलाच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात जायची. आजही निघतेच म्हणा. त्या दिंडीची आठवण झाली. आषाढी एकादशीला सकाळी सात वाजता आमच्या दिंडीला सुरुवात व्हायची. स्वच्छ धुतलेला गणवेश, हातात टाळ, झांजा, फुलं, तुळशीची रोपं, रामकृष्ण हरी असे लिहिलेले फलक असे आपल्याला हवं ते घेऊन दिंडीत सहभागी व्हायचो. शाळेत मोठ्या वर्गातल्या मुलांनी आणि शिक्षकांनी पालखी फुलांनी सजवून ठेवलेली असायची. त्यात ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतमंडळींचे फोटो असायचे. शाळेत छान रांगोळी काढली जायची. फुलांचा आणि उदबत्तीचा  मंद वास दरवळत असायचा. सगळे जमले की कोणी तरी शिक्षक जोरात म्हणायचे, “बोला पुंडलिक वर देव ! हारी विठ्ठल ! श्रीनामदेव तुकाराम ! पंढरीनाथ महाराज की जय ! टाळ, झांजा जोरात वाजू लागल्या की आम्ही चालायला सुरुवात करायचो. पावसाची रिपरिप, मधेच उन्हाची तिरीप आजूबाजूला आम्हा सर्वांचा हरिनामाचा गजर, मधूनच दरवळणारा मातीचा वास, झांजांचे, लेझीमचे खेळ, नाच सुरु व्हायचे. त्यावेळी आजच्या सारखा गाजावाजा करण्याची पद्धत नव्हती त्यामुळे शाळेच्या आसपासच्या लोकांना, विद्यार्थ्यांना आणि मंदिराच्या जवळच्या लोकांनाच या दिंडीची माहिती असायची. रस्त्यावरच्या गर्दीतून, वाहतूकीचा खोळंबा न करता वाजतगाजत ही दिंडी चालायची. मग अनवाणी चालताना मऊमऊ माती पायाला लागायची, तर कधी छोटे दगडही टोचायचे पण तेव्हा त्याचं काहीच वाटायचं नाही. रस्त्यावरून झेंडा फडकवत, टाळ, झांजा, लेझीमच्या गजरात ‘ज्ञानोबा माउली ज्ञानराज माउली तुकाराम’ असा गजर करत आम्ही अक्षरशः नाचत-गात जायचो.

मध्येच एखाद्या घरातून पालखीतल्या माउलींच औक्षण केलं जायचं. लोकं नमस्कार करायचे. आमच्या हातावर प्रसाद दिला जायचा. तहान लागली असेल म्हणून पाणी दिलं जायचं. तेव्हा बिसलेरी वैगरे प्रकार नव्हते आणि गरजही. अगदी गरज लागली तर ऐनवेळी आमच्यासाठी एखाद्या घरातलं स्वच्छतागृह देखील वापरायची सोय केली जायची. पण रस्त्यात कोठेही कसलाही कचरा किंवा घाण करायला सक्त मनाई असायची. आम्ही सारेजण ती शिस्त आवर्जून पाळायचो. एकमेकांचे हात हातात धरून एकसाथ एकसुरात विठ्ठल नामाचा गजर करताना एक वेगळाच उत्साह जाणवायचा. आम्हाला त्यावेळी ना विठ्ठल भक्तीची ओढ होती, ना कसलं मागणं होतं, ना या साऱ्यातलं काही कळत होतं. विठठलाच्या ताला-सुरात निरपेक्षपणे पावलं चालायची.

आता वाटतं तीच खरी भक्ती. जिथं काहीतरी मागायचं म्हणून सेवा नव्हती. केवळ आनंद होता एकमेकांसह चालण्याचा, गणवेशामुळं एक सारखे भासायचोच पण एकत्र चालणं, एकमुखानं गजर करणं, एकच अन्न वाटून खाणं आणि मुख्यत्वे दिंडीत जो कोणी सहभागी असेल त्याला आपला मानणं. लहानमुलं मोठ्या मुलाचं ऐकायचे, मोठी मुलं लहानांची काळजी घ्यायची. त्यांना चालताना, नाचताना मार्गदर्शनही करायची. कोणाला काही दुखलंखुपलं तर हे ताई-दादा काळजी घ्यायचे. अगदीच अडचण झाली तरच शिक्षक मध्ये पडायचे. ही एकी, हे प्रेम, हे नातं चार भिंतींपलीकडचं होतं. इथं जातपात, हुशारी, श्रेष्ठत्व काही काही नव्हतं. मला या दिंडीत सहभागी व्हायचं आहे हीच फक्त भावना होती आमचीही आणि आम्हाला साथ देणाऱ्या माणसांचीही.

आम्ही सगळे मंदिरात पोहोचलो की विठ्ठलाशी गाठभेट व्हायची मग आरती, भजन आणि प्रसाद असं भरगच्च कार्यक्रम असायचा आणि मग आम्ही आपापल्या घरी परतायचो ते विठठल विठ्ठल म्हणतंच. विठ्ठल देव आहे म्हणून नाही… तर आनंद मिळतो म्हणून… आमच्यासाठी विठ्ठल आहे तर दिंडी आहे… दिंडी आहे तर आजचा आनंदाचा दिवस आहे… हीच भावना मनात ठेवून…

आज या गोष्टींचा अर्थ वेगळाच वाटतो. आज विठ्ठलाचं स्मरण हेतुपूर्वक केलं जातं म्हणूनच कदाचित तो आनंद मिळत नसावा. विठ्ठलाची किंवा त्याहीपेक्षा म्हणा साध्यासाध्या गोष्टींतून आनंद मिळवण्याची वृत्ती आमच्यात रुजली ती मात्र या दिंडीमुळेच.

अलीकडची परिस्थिती पाहता असं वाटतं…

दोन्ही घरचा पाहुणा मी

राहिलो सदा उपाशी !

विठ्ठलाचे नाम जरी मुखाशी

प्रपंचाचा काटा रुते पायाशी !

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका ‘भगोड्या’ ची गोष्ट – भाग-1— मूळ इंग्लिश – ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त) – मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆  एका ‘भगोड्या’ ची गोष्ट –  भाग-1 — मूळ इंग्लिश – ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त) – मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

१९७१ च्या युद्धात कामगिरी बजावल्यानंतरही आम्ही बराच काळ पाकिस्तान सीमेवरच तैनात राहिलो होतो. आमचे तोफखाना दळाचे चौदावे फील्ड रेजिमेंट, जून १९७३ मध्ये जमशेदपूरला आले. Adjutant या पदावर मी अजून नवखा होतो. अत्यंत ‘कडक’ अशी ख्याती असलेले लेफ्टनंट कर्नल रामचंद्र परशुराम सहस्रबुद्धे हे आमचे कमांडिंग ऑफिसर (CO) होते. 

जमशेदपूरच्या टेल्को कंपनीमध्ये कामाला असलेला एक माजी सैनिक, गुरबचन सिंग, एके दिवशी सकाळी मला भेटायला आला. तसा तो आमच्या युनिटमध्ये वरचेवर येत असे. माजी सैनिक असल्याने, रेशन, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि दारूच्या बाटल्या आर्मी कॅन्टीनमधून विकत घेण्याचा हक्क त्याला होता. त्याकरिता आवश्यक ती कागदपत्रेही त्याच्याकडे होती. टेल्कोच्या सर्व माजी सैनिकांच्या वतीने त्यांचा कोटाही तोच घेऊन जात असे. 

पंजाब रेजिमेंटचे, कर्नल ब्रार नावाचे एक सेवानिवृत्त अधिकारी टेल्कोच्या प्रशासन आणि सुरक्षा विभागाचे जनरल मॅनेजर होते. गुरबचन सिंग हा त्यांचा ड्रायव्हर होता. टेल्को व टिस्कोच्या इतरही महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या मोटारीही तो क्वचित चालवीत असे. अर्थातच, एक निष्णात ड्रायव्हर असल्याने, टेल्को (टाटा मोटर्स) आणि टिस्को (टाटा स्टील) अश्या मातबर कंपन्यांसाठी तो एक मोलाचा कर्मचारी होता.  

आमच्या युनिटसोबत संलग्न असलेल्या, ‘इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनियर्स’ (EME) या विभागाच्या सर्व सैनिकांशी गुरबचन सिंगचा परिचय होता. तसेच, आमच्या रेजिमेंटचे नायब सुभेदार/सुभेदार पदावरील ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (JCO), आणि नाईक/हवालदार पदावरचे नॉन कमिशन्ड ऑफिसर (NCO), हे सगळेच त्याला ओळखत होते. 

एरवी त्याचा संबंध मुख्यतः आमच्या युनिटच्या क्वार्टर मास्टर (QM) सोबतच येत असल्याने, मी त्याला पूर्वी कधी पाहिलेले नव्हते. त्या दिवशी मात्र आमच्या QM ने गुरबचन सिंगला माझ्याकडे पाठवले, कारण त्याचे सर्व्हिस बुक एखाद्या सेनाधिकाऱ्याकडून सत्यापित करून घेणे आवश्यक झाले होते. 

गुरबचन सिंगची सर्व कागदपत्रे, आणि त्यालाही सोबत घेऊन आमचे हेडक्लार्क माझ्याकडे आले. माझ्या नावाचा व आमच्या युनिटचा शिक्का त्या कागदांवर छापणे आणि मी सही करणे, असे एखाद्या मिनिटात होण्यासारखे काम असल्याने, सर्व सज्जता करूनच हेडक्लार्क माझ्याकडे आले होते. परंतु, निव्वळ ‘सह्याजीराव’ बनून काम करणे मला मान्य नव्हते. 

मी गुरबचन सिंगच्या आर्मी सर्व्हिससंबंधी सखोल चौकशी केली. त्याने सांगितले की, तो पूर्वी EME मध्ये व्हेईकल मेकॅनिक (VM) होता. खात्री करून घेण्यासाठी, आमच्या लाईट रिपेअर वर्कशॉप (LRW) मधल्या VM ला बोलावून मी विचारले असता, त्यानेही मला सांगितले की प्रशिक्षणकाळात गुरबचन सिंग त्याचा बॅचमेट होता. 

ही सर्व चौकशी चालू असतानाच अचानक, CO साहेबांनी माझ्यासाठी बझर वाजवल्याने मला तातडीने त्यांच्याकडे जावे लागले.  

CO साहेबांच्या ऑफिसमधून परतल्यावर माझ्या मनात नेमके काय आले देव जाणे, पण मी गुरबचन सिंगच्या कागदांवर सही करण्यास नकार दिला. आमच्या युनिटचे सुभेदार मेजर आणि हेडक्लार्क हे दोघेही माझ्या निर्णयामुळे थोडेसे नाराज दिसले.

त्यानंतर मी हेडक्लार्कना आदेश दिला की, सिकंदराबादजवळील त्रिमुलगेरी येथे असलेल्या EME सेंटरमध्ये, गुरबचन सिंगची सर्व कागदपत्रे पाठवून, त्यांची खातरजमा करून घेण्यात यावी. हे ऐकल्यानंतर मात्र, माझे डोके चांगलेच फिरले आहे, याबद्दल बहुदा आमच्या हेडक्लार्कची खात्रीच पटली असणार! प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव जरी माझ्या गाठीशी असला तरीही, दैनंदिन कार्यालयीन कामात तसा मी नवखाच होतो. त्यामुळे, हे खबरदारीचे पाऊल उचलणे मला आवश्यक वाटले होते. 

“Adjutant साहेब सध्या व्यस्त आहेत पण यथावकाश तुझे काम होईल” असे काहीतरी गुरबचन सिंगला तात्पुरते सांगून हेडक्लार्कनी वेळ मारून नेली असावी. 

आमच्या युनिटकडून गेलेल्या पत्राला आठवड्याभरातच EME सेंटरमधून तारेने उत्तर आले. त्यामध्ये लिहिले होते, “चीन सीमेवरील धोला-थागला जवळील चौकीवर तैनात असताना, २१ ऑक्टोबर १९६२ रोजी, चिनी हल्ला होताच, गुरबचन सिंग हा शिपाई शत्रूसमोरून पळून गेला होता. नंतर त्याचा काहीच ठावठिकाणा न समजल्याने, त्याला ‘बेपत्ता किंवा मृत’ घोषित केले गेले होते. आता तुम्हाला तो जिवंत सापडलेला असल्याने, त्याला त्वरित ताब्यात घेऊन आम्हाला कळवावे. आम्ही आरक्षी दल पाठवून त्याला आमच्या ताब्यात घेऊ.”

सोप्या शब्दात सांगायचे तर, आर्मीच्या कायद्यानुसार तो एक पळपुटा किंवा ‘भगोडा’ शिपाई होता! आता त्याची रीतसर चौकशी होऊन त्याच्यावर यथोचित कायदेशीर कारवाई केली जाणार होती!

ती तार वाचून युनिटमधील आम्हा सर्वच अधिकाऱ्यांना धक्का बसला. आमचे CO, लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धे तर माझ्यावरच भडकले. त्यांना न विचारता, न सांगता, मी अश्या प्रकारचे पाऊल का आणि कसे उचलले याबद्दल CO साहेबांनी मला जाब विचारला. 

“सर, EME सेंटरकडे चौकशी करण्याची सणक सहजच माझ्या डोक्यात आली. तोपर्यंत तुम्ही ऑफिसमधून निघूनही गेला होतात. परंतु, तुम्ही दिलेली शिकवण माझ्या चांगली लक्षात होती की, ‘कोणत्याही कागदावर डोळे झाकून सही करू नये’.” 

माझे उत्तर CO साहेबांना नक्कीच आवडले असावे. कारण ते एकदम शांत झाले आणि त्यांनी आमच्या युनिटचे 2IC, मेजर कृष्णा आणि बॅटरी कमांडर, मेजर (पुढे निवृत्त मेजर जनरल) महंती या दोघांनाही बोलावून घेतले. आम्हा सर्वांच्या विचार-विनिमयानंतर, एकमताने असे ठरले की, आम्हाला मिळालेल्या माहितीबद्दल टेल्कोच्या अधिकाऱ्यांना, अगदी निवृत्त कर्नल ब्रार यांनाही, सध्या काहीच कळवायचे नाही. महिन्याभराने सामान घेण्यासाठी गुरबचन सिंग पुन्हा येईल त्यावेळी सापळा लावून त्याला पकडण्याचे आम्ही ठरवले.  

– क्रमशः भाग पहिला 

मूळ इंग्रजी अनुभवलेखन : ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त)

मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) 9422870294

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चंगळ… लेखिका – डाॅ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ चंगळ… लेखिका – डाॅ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

माधव आणि मधुरा घरी आल्यापासून एकदम चकित झाले होते. खरं तर न्यूझीलंडहून इन्नीअप्पांकडे हट्टानं येण्याचा निर्णय दोघांनी का घेतला होता? तर इन्नी आणि अप्पांना उतारवयात एकटं वाटू नये म्हणून! पण… इथे तर त्यांनाच एकटं पडण्याची पाळी आली होती. कशी? पाहा ना! इन्नी आणि अप्पांकडे त्या आधीच गोपाळराव आणि राधिकाबाई भिडे यांचा ठिय्या मुक्काम होता. “या राधिकाबाई भिडे. आपल्या कुटुंबसखी.” इन्नीनं ओळख करून दिली. “माझी ओळख नव्हती झाली कधी यांच्याशी.” माधव इन्नीला म्हणाला. “अरे, गेली सात वर्षे तुम्ही न्यूझीलंडला आहात. इथे आम्ही दोघं निवृत्त झाल्यावर आम्ही एक क्लब स्थापन केला. क्लबचं नावच मुळी ‘चंगळ’ क्लब. अटी तीन. एक- तुम्ही निवृत्त असायला हवेत; दोन- सुखवस्तू सांपत्तिक स्थिती असावी आणि तीन- मौज, उपभोग यात भरपूर रस असावा. तर तुला सांगते माधव, चंगळ क्लबचे नळ्याण्णव सदस्य झालेत. यात पंचेचाळीस जोड्या आहेत आणि नऊ सदस्य एकेकटे, लाईफ पार्टनर गमावलेले; पण तरीही आयुष्य आहे ते रडत जगण्यापेक्षा मजेने जगावं अशा इच्छेने आपल्यात सामील झालेले आहेत.” इन्नी म्हणाली. “मी जेव्हा इन्नींची ही जाहिरात केबल टीव्हीवर बघितली ना, तेव्हा लगेच फोन केला त्यांना. आम्ही दोघं ताबडतोब मेंबर झालो चंगळ क्लबचे. आमचा मुलगा देवर्षी अमेरिकेत आहे. कन्या सुप्रिया लग्न होऊन सध्या सिलोनला राहते. म्हणजे आपल्या आताच्या श्रीलंकेत! आम्ही दोघं अधूनमधून जातो मुलाकडे-मुलीकडे, पण करमत नाही परक्या देशात. इथेच बरं वाटतं. चंगळ क्लब सुरू झाल्यापास्नं तर इथेच उत्तम वाटतं बघ.” राधिकाबाई म्हणाल्या. माधवनं निरखून राधिकाबाई आणि आपली आई इन्नी यांच्याकडे बघितले. खरंच की, दोघी कशा तजेलदार आणि टुकटुकीत दिसत होत्या. निरामय आनंदी! समाधानी आणि संतुष्ट वाटत होत्या. “त्याचं काय आहे माधव, प्रत्येक वय हे मौजमजा एनकॅश करण्याचं असतं असं तुझ्या अप्पांचं आणि माझं स्पष्ट मत आहे. लोकलला लोंबकळून आम्ही मुलुंड ते सीएसटी तीस तीस वर्ष सर्व्हिस केली दोघांनी. पण त्यातही मजा होती. कारण दोघांनी कमावलं म्हणून तुला राजासारखं ठेवता आलं. बारावीला अपेक्षित पसेंटेज मिळाले नाही तरी प्रायव्हेटला डोनेशन देऊन शिकविता आलं. सो? नो रिग्रेट्स! पण निवृत्तीनंतर दोघांचं मस्त पेन्शन येतंय. घरदार आहेच! तू आर्थिकदृष्टीने स्वतंत्र झालायस. नो जबाबदारी! मग आता मौजच मौज का बरं करू नये? म्हणून केबलवर अँड दिली. आम्हाला ठाऊकच नव्हतं की नुसत्या मुलुंडमध्ये यवढी माणसं चंगळ’ करायला इच्छुक आहेत!” माधव आणि मधुरा यांना ते सारं ऐकून चकित व्हायला न झालं तरच नवल होतं! त्याचबरोबर इन्नी आणि अप्पांना एकटं वाटत असेल ही अपराधीपणाची टोचणीही कमी झाली होती. आपण उगाचच टेन्शनमध्ये आलो होतो हेही जाणवलं दोघांना. नंतर जेवणं फार सुखात झाली. “रोजच्या जेवणाला कुसाताई येतात स्वयंपाक करायला, पण चार माणसं येणार असली घरात की आम्ही त्यांना सांगून ठेवतो अगोदर. त्या मैनाताई म्हणून मदतनीस घेऊन येतात बरोबर. त्यांना आम्ही दिवसाचे शंभर एक्स्ट्रा देतो. खुशीनं येतात अगदी.” अप्पा सांगत होते. “आमचे मेंबर जसे वाढायला लागले तसे आम्ही ‘बिल्व’ नावाचे समविचारी लोकांचे ग्रुप तयार केले बरं का गं मधुरा. म्हणजे अगं कुणाला वाचायला आवडतं. कुणाला खादडायला आवडतं. कोणी पिक्चर, नाटक यांचं शौकीन असतं. कोणी रमीत रमतं तर कोणी मद्याचे घुटके घेत ‘एक जाम एक शाम’ करतं. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’. आम्ही काही माणसं भटकंतीवाली पण आहोत. ‘बिल्व’मध्ये समआवडींची तीनच कुटुंब एकत्र येतात. आपल्यात आम्ही, भिडे पतिपत्नी आणि शिंदे पतिपत्नी एकत्र आहेत. शिंदे सध्या बेंगलोरला मुलीच्या बाळंतपणास गेलेत दोघं. सेवेत मग्न! पण आमचे फोन चालू असतात.” इन्नीनं सांगितलं. “महिन्यातून एकदा आम्ही एकेकाकडे चार दिवस जमतो. रात्री झोपायला घरी. दिवसभर साथ साथ. आता ऑक्टोबरमध्ये आम्ही सहाही जणं कोकणात जाणारोत. डॉल्फिन शो बघायला. अगदी चंगळ आहे बघ!” अप्पा म्हणाले. “माझ्या मनात एक अभिनव कल्पना आहे.” श्रीयुत गोपाळराव भिडे म्हणाले. “हल्ली काऊन्सेलिंगचा बराच सुकाळ आहे. मॅरेजच्या आधी काऊन्सेलिंग, मरेजनंतरही प्रॉब्लेम येतात तेव्हा समुपदेशन… मुलांच्या समस्यांचं समुपदेशन, करियर कौन्सेलिंग! आता मी सुरू करतोय ‘निवृत्ती निरूपण’ यात आठ कलमी कार्यक्रम असेल. निवृत्तीआधी तीन कलम. एक – आपल्याला मिळणाऱ्या पैशांचा अंदाज घ्या. दोन- गुंतवणूक करण्यासाठी उत्कृष्ट सल्ला घ्या. तीन- आपला राहून गेलेला छंद तपासा. निवृत्तीनंतरची दोन पथ्ये- एक- घरातल्यांना न छळणे. दोन- आपल्या पार्टनरचे मन जपणे. आणि तीन गोष्टी आनंदाच्या. एक- आपल्या पैशाचा स्वतः उपभोग घ्या. दोन- समवयस्कांबरोबर ओळखी वाढवा आणि तीन- तिसरी घंटा वाजली मित्रांनो! आता मस्त चंगळ करा! चंगळ!… लाईफ इज टू शॉर्ट नाऊ!…” माधव आणि मधुरा, गोपाळराव भिडे यांच्या निवृत्ती निरूपणावर बेहद्द खूश झाले. माधव म्हणाला, “आम्हाला फार गिल्टी वाटत होतं. मी एकुलता मुलगा! इन्नी नि अप्पांना एकटं करून तिकडे दूर देशी राहतोय.” “आता काळजी करू नकोस तरुण मित्रा. चंगळ क्लब समर्थ आहे एकमेकांची काळजी घ्यायला.” भिडेकाका म्हणाले. तुम्हाला सुरू करायचा का आपल्या उपनगरात चंगळ क्लब? बघा बुवा! तिसरी घंटा वाजलीय… एन्जॉय नाऊ. ‘ऑर नेव्हर!’ म्हणायची वेळ कुणावर येऊ नये.

‘ तिसरी घंटा’ 

लेखिका – डाॅ. विजया वाड

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares