मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ || थोडं मनातलं – सलणारं, बोचणारं ||… लेखक – श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

|| थोडं मनातलं – सलणारं, बोचणारं ||लेखक – श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

दरवर्षी शिवराज्याभिषेकाच्या दिवशी आम्ही अनेक विद्यार्थी घेऊन रायगडी जातो अन् गडावरचा प्लॅस्टिकचा कचरा गोळा करुन खाली घेऊन येतो. या उपक्रमाचं हे सोळावं वर्ष होतं.. गेली पंधरा वर्षं हे व्रत आम्ही सगळे नित्यनेमाने करतो आहोत. माझे अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी यात आनंदानं सहभागी होत असतात. एक दीड महिना आधीपासूनच आमच्या या स्वच्छता अभियानाच्या तयारीची सुरुवात होते. मे महिन्यात आमच्यापैकी काहीजण गडावर येऊन नीट पाहणी करून जातात आणि मग अधिक कचरा जिथं जिथं असेल तिथून तो हलवण्याचं नियोजन सुरु होतं. सगळ्या नोंदी विद्यार्थ्यांचा गट करत असतो. मी फक्त निमित्तमात्र असतो. स्वच्छता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संस्कार याच वयात मुलांच्या व्यक्तिमत्वावर कोरला गेला तर त्याचे उत्तम परिणाम समाजात दिसून येतात. 

कोण आहेत ही मुलं मुली? ज्यांच्या पायाशी सगळी सुखं लोळण घेत आहेत, अशा कुटुंबातली ही मुलं. पण पुण्याहून निघून पायथ्यापासून ते वरच्या बालेकिल्ल्यापर्यंत प्लॅस्टिकच्या बाटल्या, त्यांची टोपणे, पिशव्या, फाटकी तुटकी पादत्राणे, प्लॅस्टिकचे चमचे, ग्लास, चहाचे कप, कागदी प्लेट्स, द्रोण, पत्रावळी अशा कितीतरी प्रकारचा कचरा गोळा करायचा, तो व्यवस्थित पॅक करून त्याची नोंद करायची आणि तो गडाखाली पाठवायचा हे काम तसं पहायला गेलं तर मुळीच सोपं नाही. “हे असलं काम मी का करु?” आणि “बाकी लोकं वाट्टेल तसे वागतात त्याचा कचरा मीच का उचलायचा?” असे प्रश्न मनात येऊ न देता काम करत रहायचं, हे किशोरवयीन गटासाठी कठीण असतं. दोन दिवस सफाई कामगाराच्या भूमिकेत राहण्यापेक्षा ॲडलॅब्स इमॅजिका’ला गेली असती तर कुणाला त्यात काहीही गैर वाटलं नसतं, अशा वयातली ही मुलं..! पण त्यांनी प्रेरित होऊन हे काम करावं, यातच खऱ्या महाराष्ट्रधर्माचं दर्शन घडतं..! 

रात्री पावणे दोन वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली आणि महादरवाजा ओलांडून पहिली प्लॅस्टिकची बाटली उचलली ती पहाटे चार वाजता.. तिथून आमचे हात कचरा उचलण्यात जे गुंतून गेले ते शेवटची बॅग दुपारी बारा वाजता भरेपर्यंत अखंड काम करत होते..! आम्ही नेलेल्या बॅग्ज आणि पुन्हा वरती घेतलेल्या काही जम्बो बॅग्ज असा मिळून जवळपास तीन ट्रक खचाखच भरतील इतका कचरा गोळा करण्याचं काम आम्ही केलं..!

आपल्याकडं हे एक भारी असतं बघा. कचरा करणाऱ्यांनाही कुणी विचारत नाही अन् कचरा गोळा करण्याचं काम करणाऱ्यांचीही दखल कुणी घेत नाही. हजारो लोक गडावर होते, कुणी हुल्लडबाजी करत होते, कुणी तलवारी घेऊन नाचत होते, कुणी पारंपरिक पद्धतीच्या पोशाखात सजूनधजून आले होते. हौशे नवशे गवशे सगळे होते. पण, “चला, मीही तुमच्यासोबत काम करतो” असं एकही जण म्हणाला नाही. उलट, अनेकांना खरोखरच आम्ही सफाई कामगार वाटलो. त्यांनी शिट्टी वाजवून आम्हाला बोलावलं अन् त्यांच्या उष्ट्या खरकट्या पत्रावळी उचलायला लावल्या..! आदल्या दिवशी गडावर कुणीतरी पॅक फूड वाटलं होतं. ते उष्टं, सडलेलं, माशा घोंगावणारं जेवण जागोजागी तसंच पडलेलं होतं. कुणीतरी एक गृहस्थ आम्हाला “अरे मुलांनो, ते खरकटं अन्न सुध्दा उचला रे” असं सांगत होते. त्यांच्या हातात बिस्किटांचा पुडा होता. आम्हाला सांगताना त्यांनी बिस्किटे खाल्ली अन् रिकामा प्लॅस्टिकचा कागद तिथंच टाकून निघून गेले…! 

दोन जण तटावर बसून दाढी करत होते. इतक्या उंचावर येऊन थंडगार हवेचा आनंद घेत घेत दाढी करणं म्हणजे सुख असणार.. दाढ्या आटोपल्यावर उभयतांनी आपापली रेझर्स तटावरून खालच्या दरीत फेकून दिली..! 

आर ओ’चा प्लांट होळीच्या माळावर बसवण्यात आला होता. काही महाभाग ते पाणी घेऊन आडोशाला जाऊन पोट रिकामं करण्यासाठी वापरत होते. चार-पाच जणांनी आर ओ’चं पाणी बादल्यांमध्ये भरुन घेतलं आणि हत्ती तलावापाशी जाऊन चक्क आंघोळी केल्या..! 

आपल्या समाजातल्या लोकांच्या बुद्धीची आभाळं अशी फाटलेली आहेत. कुठं कुठं आणि किती ठिगळं लावायची? 

“एक जमाना असा होता की, आम्हाला हीच कामं हे लोकं करायला लावत होते, आता यांच्यावर ही वेळ आली” असं म्हणून एकमेकांच्या हातांवर टाळ्या देऊन छद्मीपणानं हसणारं सुध्दा एक टोळकं आमच्या मागं होतं. मी फक्त ऐकत होतो. पण मागं वळून पाहत नव्हतो. सावरकर, टिळक, पेशवे अशा अनेक विशिष्ट लोकांविषयी येथेच्छ टिंगलटवाळी चालली होती. माझे डोळे लाल झाले होते, पाण्यानं भरले होते. “आज कचरा उचलायला लावलाय, उद्या नासवलं पाहिजे”, हे शब्द कानांवर पडले, मग मात्र मी मागं वळून त्यांच्याकडं बघितलं. डोळ्यांत डोळे घालून बघितलं. अठरा वीस वर्षं वयाची पोरं होती ती. माझा चेहरा बघूनच त्यांच्या पोटात कळ आली असावी. पुढच्या क्षणाला तिथून सगळे पळून गेले..! असो. 

यावेळी आमच्या गटानं केवळ गडाची स्वच्छताच केली असं नाही. गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या दहा कातकरी कुटुंबांसाठी आम्ही भरपूर साहित्य गोळा करुन आणलं होतं. कपडे, भांडी, खेळणी, धान्य, तेल, चहा- साखर, धान्य साठवण्यासाठी डबे, पाणी साठवण्यासाठीचे बॅरल असं पुष्कळ साहित्य तिथल्या परिवारांना दिलं. जवळपास दोनशे किलोहून अधिक धान्य दिलं. त्यात गहू, ज्वारी, तांदळाची पोती, तूर आणि मुगाची डाळ, तिखट, मीठ, हळद, जिरे, मोहरी असं सगळं सामान होतं. जवळपास पन्नास कुटुंबाकडून मुलांनी हे सगळं गोळा केलं होतं. कपड्यांमध्ये साड्या होत्या, पुरुषांसाठी शर्ट्स, पँट, जीन्स, टी शर्ट, रेनकोट, मोठ्यांसाठी स्वेटर्स, लहान मुलांसाठी कपडे आणि स्वेटर्स, बेडशीट्स, चादरी, ब्लँकेट्स, सतरंज्या असं सामान दिलं. हे गोळा करण्यासाठी मुलं घरोघरी फिरली. लोकांनीही मुलांना चांगला प्रतिसाद दिला. या सगळ्या मुलांच्या पालकांनी यात आर्थिक बाबतीत सक्रियता दाखवली. 

चाळीस-चाळीस वर्षं वीज नाही, पाणी नाही, रस्ता नाही अशा दुर्गम भागात ही कुटुंबं राहत आहेत. कुणाही राजकीय नेत्याला त्यांच्याकडं बघायला सवड नाही. आता ऑगस्ट महिन्यात या दहा कुटुंबांसाठी आम्ही सोलार दिवे घेऊन जाणार आहोत, असा संकल्प केला आहे. इच्छा तेथे मार्ग…! आमच्या या संकल्पाला नक्की यश येईल. 

आज रायगडाचे तट अन् खालचे कडे प्लॅस्टिकनं भरून गेले आहेत. प्रचंड कचरा पडला आहे. तो भारतीय नागरिकांनीच केला आहे, यात शंका नाही. मराठी साम्राज्याची राजधानी प्लॅस्टिकच्या विळख्यात अडकत चालली आहे. रायगडाचं पक्षीजीवन, वन्य प्राणीजीवन दिवसेंदिवस खराब होत चाललं आहे. कुणाचंच तिकडं लक्ष नाही. येणाऱ्या कुणालाही त्याविषयी आस्था नाही. (रायगडावर सावली देणाऱ्या झाडांची नितांत गरज आहे. पुरातत्व खात्याच्या नियमांनुसार कदाचित जमिनीत झाडं लावता येणार नाहीत. पण मोठमोठ्या आकाराच्या आकर्षक कुंड्यांमध्ये निश्चित लावता येतील. महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठांना सोबत घेऊन हा विषय उत्तम करता येईल. पण इच्छाशक्ती नाही.)  ‘भ’ आणि ‘मा’ च्या भाषेत बोलणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी नाही.  माणसांना ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी वावरण्याचं भान नसतं, हेच सत्य आहे. हा केवळ कपड्यांच्या बाबतीतल्या आचारसंहितेचा मुद्दा नाही. आपली वाणीसुध्दा नियंत्रित असणं आवश्यक आहे. पिण्याचं पाणी आणि वापरण्याचं पाणी यातला फरक आजही लोकांना कळत नसेल तर,आजवरचं सगळं औपचारिक शिक्षण निरुपयोगीच आहे,असं मान्य करावं लागेल. नियमांच्या पाट्या लावून उपयोग होत नाही, किंवा दंड करुन उपयोग होत नाही. “स्वयंशिस्त” आणि “तारतम्य” हे दोन गुण अविरतपणे शिकवत राहण्याची गरज आहे. महाराजांच्या गडकोटांची आजची परिस्थिती चिंताजनक असली तरीही, स्वतः छत्रपती शिवाजीमहाराजांच्या नीतीचं समग्र दर्शन घडवणारं आज्ञापत्र मात्र आजही उपलब्ध आहे. 

शिवाजीमहाराजांचं आज्ञापत्र हा केवळ ऐतिहासिक दस्तऐवज नाही. तो प्रत्यक्ष आचरण करण्याचा विषय आहे. आज्ञापत्र शाळांमधून मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. त्याचा अभ्यास मुलांनी केला पाहिजे. आज्ञापत्राचे प्रशिक्षण वर्ग, अभ्यास वर्ग झाले पाहिजेत. मुलांसाठी शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रावर आधारित ज्ञान परिक्षा महाराष्ट्रात सुरु व्हायला हवी. कारण, त्यातून शिकावं असं प्रचंड आहे. 

लिहिण्यासारखं खूप काही आहे. व्यक्त करण्यासारखे अनुभव खूप आहेत. पण व्यक्त होण्यालाही शेवटी चौकट असतेच. ज्याला बदल घडवून आणण्याची इच्छा आहे, त्यानं अखंड कृतिशील राहिलंच पाहिजे. 

“आचारशीळ विचारशीळ | दानशीळ धर्मशीळ | सर्वज्ञपणें सुशीळ | सकळां ठायीं ||” असं शिवाजीमहाराजांचं वर्णन आहे. त्याचंच आचरण करण्याची गरज आहे. 

|| अधिक काय लिहावें, सर्व सूज्ञ आहेति ||

|| मर्यादेयं विराजते ||

लेखक – श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

संग्राहक : श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गोष्ट यूझर मॅन्युअलची…… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

☆ गोष्ट यूझर मॅन्युअलची… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

अखेर तो धावपळीचा, उत्साहाचा दिवस उजाडतो. हातात असलेल्या कॅमेराची बॅग सांभाळत मी त्या स्टुडिओवजा रूममध्ये जाते. तिथे जणू सिनची तयारी सुरू असते. दिग्दर्शक आणि कथा लेखक त्या सीन लावणाऱ्यांना भरपूर सूचना करत असतात. त्यात बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून ठाकठूकचा आवाज, मध्येच कुठे पडदा जोराने झटकल्याचा, जोरात टेबल सरकवल्याचा आवाज हे वातावरण निर्मितीत मोलाची भर घालत असतात. या सगळ्या तालामध्ये मीही अगदी एकतानतेनं कॅमेराची बॅग उघडून तो सेट करायला लागते.

वर्षातून किमान तीन-चारदा तरी हे काम करावे लागत असल्याने सगळ्यांचे हात सरावलेले असतात. नजरसुद्धा हळूहळू सरावायला लागलेली असते. तर कॅमेराचा स्टॅन्ड, त्याची योग्य पोझिशन, त्याची निरनिराळी सेटिंग्ज इकडे माझं लक्ष केंद्रित झालेलं असतं. आणि मग एकदा मनासारखं सेटिंग झाल्यावर हळुवार हाताने त्या कुशनमधून अलगद कॅमेरा बाहेर काढला जातो. आणि मग स्टॅन्डवर त्याला स्थानापन्न करण्याचा सोहळा सुरू होतो. कॅमेरा जणू त्या दिवशी राजाच्या थाटात असतो. त्याचा रुबाब काय वर्णावा… खरंतर तो ही एक अप्रत्यक्ष दिग्दर्शकच आहे की आजचा. म्हणून त्याचाही मूड सांभाळावा लागतो. जरासा सुद्धा सेटिंग्ज मधला ढिलेपणा त्याला चालत नाही. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष एकदा माझ्याकडे आणि एकदा कॅमेराकडे लागलेलं असतं. कारण सीन मधला कॅमेरा सेट करणं हा आमच्यासाठी शेवटचा पण महत्त्वाचा भाग असतो.

सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आणि आम्हा दोघांच्या म्हणजे मी आणि कॅमेराच्या दृष्टिकोनातून ‘परफेक्ट व्ह्यू’ सेट झाला की मी जरा रिलॅक्स होते. आणि मग आपोआपच माझी नजर विंगेतून जणू लपूनछपून पाहणाऱ्या आजच्या विशेष कलाकारांकडे म्हणजेच पॅकिंगमधून हळूच वर डोकावणाऱ्या प्रॉडक्ट्सकडे जाते. दृष्ट लागण्यासारखं रुपडं असतं त्यांचं आज ! तुकतुकीत अंगकांती असलेल्या आणि आपल्या काळ्याकरड्या पोशाखात उठून दिसणाऱ्या या प्रॉंडक्टसवर आज विशेष पॉलिश्ड झळाळी असते. त्यांचा नवथरपणा जाणवत असतो.

आता प्रमुख दिग्दर्शक सगळी सूत्रं आपल्या हातात घेतो. त्यातल्या एकेका प्रॉंडक्टला हळूहळू त्याच्या त्याच्या नियोजित जागेवर सेट केलं जातं. ते करताना प्रत्येकाची एनर्जी लेवल चेक केली जाते. सगळी फंक्शन्स व्यवस्थित होतायत ना, जर त्या प्रॉंडक्टला अटॅचमेंट असतील तर त्यांचा शार्पनेस व्यवस्थित आहे ना. वगैरे वगैरे…… 

….. आणि मग ऑल ओके आहे हे सगळ्यांच्याच नजरेतून चेक केलं जातं. मग लाईटचा फोकस्ड अभिनय सुरू होतो. कधी मंद, कधी तीव्र, कधी वरून, कधी खालून आणि मग प्रत्येक सीननुसार योग्य असणारं त्याचं सेटिंग ठरवलं जातं. ते करताना रिफ्लेक्शन तर पडत नाहीये ना, शॅडो ओव्हरलॅप होतं नाहीयेना हे कळीचे मुद्दे विचारात घेतले जातात. आणि मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की अॅक्शन असं म्हणून फायनल कामाला म्हणजेच फोटोग्राफीला सुरुवात होते. जिच्यासाठी हा सगळा जामानिमा झालेला असतो आणि जी सलग काही तास चालते.

तर मंडळी, एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल की हे काही सिनेमा-नाटक इ.बाबतच वर्णन नाहीये… पण दिग्दर्शक, सिन, कथानक, कॅमेरा, स्टुडिओ हे शब्द तर आलेत. मग नक्की आहे तरी काय हे….. 

… तर मंडळी, ही आहे एका प्रोडक्टच्या यूझर मॅन्युअलच्या, म्हणजेच इन्स्ट्रक्शन मॅन्युअलच्या निर्मितीची तयारी… आपण एखादी छोटीशी वस्तू किंवा मशीन विकत घेतलं की त्याच्यासोबतच एक छोटीशी पुस्तिका आपल्याला मोफत मिळते. जर ती वस्तू महागाची असेल आणि वापरण्यासाठी आपल्याला सवयीची नसेल तर आपण ती उघडून बघतो. त्यात काही चित्रं दिलेली असतात. काही सूचना दिलेल्या असतात‌, त्या वाचतो आणि त्याप्रमाणे आपण ती वस्तू वापरायला सुरुवात करतो.  त्यात काही बिघाड झाले असतील तर काय करायचं, वस्तू वापरून झाल्यावर कशी ठेवायची, कुठे ठेवायची, वापरण्यासाठीसुद्धा ती कशा ठिकाणी ठेवली गेली पाहिजे, काय क्रमाने ती इन्स्टॉल (रचली) केली गेली पाहिजे. अशा अनेक गोष्टी त्यात सांगितलेल्या असतात. आपल्यासाठी तर या गोष्टी खिजगणतीतही नसतात.

पण हीच प्रॉडक्ट्स जेव्हा महत्त्वाच्या कामासाठी वापरली जाणार असतात, उदाहरणार्थ मेडिकल सर्जरी… तेव्हा त्यांच्या निर्मितीनंतर त्यांच्या वापरण्याबाबत काटेकोरपणे सूचना द्याव्या लागतात. आणि वापरणारे त्या पाळतातही.  म्हणूनच गरज असते निर्दोष आणि अचूक अशा युझर मॅन्युअलची. ही युझर मॅन्युअल्स उत्कृष्ट असणं हे देखील त्या प्रॉडक्ट्सचं एक वैशिष्ट्य असतं जे त्याला उत्कृष्ट निर्मितीचा दर्जा देण्यामध्ये सहाय्यभूत ठरतं.  अशी ही यूझर मॅन्युअल्स तयार करण्याचं काम  ग्राफिक डिझायनर म्हणून काही वर्षांपूर्वी मी अनेकदा केलं आहे. पण हे सगळं आज सांगण्याचं प्रयोजन काय… तर २७ एप्रिल हा आहे ‘वर्ल्ड ग्राफिक्स डे’!

आणि वर वर्णिलेल्या फोटोग्राफीपासून पुढे त्याचं युझर मॅन्युअलमध्ये रूपांतर होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ठरणारं काम म्हणजे ग्राफिक्स डिझाईन. याच्यासाठी ग्राफिक्स डिझायनर आपलं कौशल्य पणाला लावतो. तो या सगळ्या फोटोंवरून काही ठराविक फोटो निवडून क्रमवार पद्धतीने एक कथा तयार करतो जी दिग्दर्शकांच्या कथेशी मिळतीजुळती असते. त्यावरून वेगवेगळ्या ग्राफिक डिझाईनच्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने या सगळ्या फोटोंचं ग्राफिक्समध्ये रूपांतर करतो‌. आणि मग त्यात तज्ज्ञ व्यक्तींच्या योग्य सूचना, तसंच ते बनवणारे कुशल इंजिनियर्स यांच्याकडील माहिती एकत्रित करून पुढे एडिटिंग, प्रूफ रीडिंग इ. आणखीन बऱ्याच प्रक्रिया होऊन हे युझर मॅन्युअल / इन्स्ट्रक्शन मॅन्युअल तयार होतं‌. ज्याच्याकडे काही अपवाद वगळता जास्त गांभीर्याने पाहिलं जात नाही.

प्रत्येक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल असंच केलं जातं का… माहित नाही.  ते प्रॉडक्ट्सनुसार नक्कीच बदलतं.  आता तर आणखीन सॉफ्टवेअर्सही अपडेट झाल्यामुळे याचीही पद्धत बदललेली असू शकते. पण ग्राफिक्स, त्याचे डिझाईनिंग, त्यासाठी लागणारे विचार आणि इमॅजिनेशन या गोष्टी मात्र तशाच असतील. सुंदरता, उपयुक्तता, सुलभता आणि नाविन्यता या चार गोष्टी आज आपल्या जगण्यात महत्त्वाच्या ठरल्या आहेत. आणि हे सगळं सहज साध्य होत आहे त्यात एक वाटा ग्राफिक्स डिझाईनचाही आहे, हे महत्त्वाचं ! 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शेवटी अंतर तेवढंच राहिलं… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ शेवटी अंतर तेवढंच राहिलं… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

लहानपणी, लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितले की खूप वाटायचं… आपण ही खावं…, ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात, आपण नाहीं…

मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो, तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली…

— शेवटी अंतर तेवढंच राहिलं .

लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे…

मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले… सुती कपडे महाग झाले.

— शेवटी अंतर तेवढच राह्यलं.

लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची,… शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची…

मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले…

—  शेवटी अंतर तेवढच राह्यलं.

लहान होतो तेव्हा दूध नसल्यानं घरी गुळाचा, काळा चहा मिळायचा… अन् लोकांना साखरेचा पितांना बघायचो… वाटायचं आपणही प्यावा पण ?

आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोकं गुळाचा ब्लॅक टी पिताहेत.

—  शेवटी अंतर तेवढंच राह्यलं.

लहानपणी सायकल दामटायचो तेंव्हा लोक दुचाकी चार चाकीमधून फिरताना बघायचो, वाटायचं, आपणही फिरावं,

आता सकाळी सकाळी सर्वांना सायकल वरून व्यायाम करताना बघितले की वाटत…

— शेवटी अंतर तेवढंच राहीलं.

लहानपणी जेंव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेंव्हा लोकं पोळी, चपाती भात खाताना आपणही खावं असं वाटायचं…

आज तीच लोकं भाकरी खाण्यासाठी हॉटेलमध्ये पैसे मोजून रांगा लावतांना दिसतात.

— शेवटी अंतर सारखंच राहतं…

लहानपणी चाळीत राहायचो तेंव्हा बंगल्यात राहण्याऱ्याकडे बघून वाटायचं आपणही मोठ्या घरात राहावं, आज तीच माणसं मनशांती साठी दूर खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत (रिसॉर्ट / विपशना ) मध्ये राहतात तेंव्हा कळतं …

— शेवटी अंतर सारखंच राहतं…

आता कळलं…हे अंतर असंच कायम राहणार.  मग मनाशी पक्क केलं–  जसा आहे, तसाच राहाणार… कुणाचं पाहून बदलणार नाही…

म्हणून तर जगद्गुरु तुकोबारायांनी म्हटले होते ,

ठेविले अनंते तैसेचि राहावे,

चित्ती असू द्यावे समाधान ...

….. मित्रांनो खूश रहा, समाधानी राहा, वाट्याला आलेले जीवन खूप सुंदर आहे, त्याचा मनमुराद आनंद   उपभोगा…… आणि अर्थातच … कुणाचं पाहून आपल्या स्व-आनंदाची व्याख्या बदलवू नका.

संग्रहिका – सौ अंजली दिलीप गोखले 

मो 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ शतजन्मशोधितांना… वि. दा. सावरकर ☆ रसास्वाद : अज्ञात ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? काव्यानंद ?

☆ शतजन्मशोधितांना… वि. दा. सावरकर ☆ रसास्वाद : अज्ञात ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

शत जन्म शोधिताना ।

शत आर्ति व्यर्थ झाल्या ।

शत सूर्यमालिकांच्या ।

दीपावली विझाल्या ॥

तेव्हां पडे प्रियासी ।

क्षण एक आज गांठी ।

सुख साधना युगांची ।

सिद्धीस अंति गाठी ॥

हा हाय जो न जाई ।

मिठी घालू मी उठोनी ।

क्षण तो क्षणांत गेला ।

सखी हातचा सुटोनी ॥

“संन्यस्त खड्ग” ह्या संगीत नाटकांतील हे पद म्हणजे सावरकरांनी लिहिलेल्या अत्त्युच्च पदांमधील एक!! ह्या माणसाच्या प्रतिभेवर साक्षात सरस्वतीने भाळून जावे इतक्या विलक्षण प्रतिभेचा धनी, बौद्धिक संपदा अशी की चक्क कुबेराला आपली पारमार्थिक संपत्ती त्याच्यापुढे फिकी वाटावी, आणि राष्ट्रभक्ती तर अशी की भारतमातेने तिच्या ह्या पुत्राला झालेल्या यातनांनी आसवे गाळावीत तर तिचे अश्रूचं विनायक दामोदर सावरकर ह्या तेजपुंज व्यक्तिमत्वासमोर थिजून जावेत!! स्वातंत्र्यवीर/हिंदूहृदयसम्राट विनायक दामोदर सावरकर म्हणजे अग्निकुंड. अटलजी म्हणायचे तसे सावरकर म्हणजे तितीक्षा, सावरकर म्हणजे तिखट. अशा राष्ट्रपुरुषाला प्रेम काव्य सुचलं तर ते कसे असेल ह्याची दिव्यानुभूती म्हणजे वरील पद!! 

अंदमानातून सुटका झाल्यावर सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असतांना ”संन्यस्त खड्ग“ लिहिले. ह्या नाटकात पात्रे आहेत बुद्ध, विक्रमसिंग, वल्लभ आणि सुलोचना. सुलोचना ह्या पात्राच्या तोंडी हे गीत आहे. सुलोचना ही वल्लभची पत्नी. त्यांच्या लग्नाला जेमतेम काही दिवस झालेले असतात. नवीन-नवीन संसाराची आता कुठे वेल फुलायला लागली असते. एकेदिवशी त्यांचा प्रेमळ संवाद सुरु असतांना अचानक राज्यसभेचा निरोप येतो म्हणून वल्लभ तो प्रेमळ संवाद उमलायच्या आत अर्ध्यावरच सोडून तडक उठून राज्यसभेत निघून जातो. उशिरा केंव्हातरी सैनिक निरोप घेऊन सुलोचनेकडे येतो की सेनापती तर राज्यसभेतूनच थेट रणांगणावर युद्धासाठी गेले आहेत. तेंव्हा सुलोचनेच्या मनात आलेल्या ह्या भावना म्हणजे हे गीत.

आता गंमत बघा सुलोचना ही साधी स्त्री नाहीय. ती कर्तृत्ववान आहे. त्यामुळे ती फक्त प्रेमळ विरह गीत कसे गाईल?? सावरकरांची विलक्षण प्रतिभा बघा . प्रेम विरह गीतात देखील सुलोचनेच्या जाणिवा प्रगल्भ आहेत.तिचे विचार परिपक्व आहेत. अशी दमदार स्त्री जेंव्हा विरह गीत गात असेल ते देखील किती अत्त्युच्च असेल नाही??

शत जन्म शोधिताना ।

शत आर्ति व्यर्थ झाल्या ।

शत सूर्यमालिकांच्या ।

दीपावली विझाल्या ॥

सुलोचना म्हणते माझा प्रियकराचा शोध हा जन्मोजन्मांचा आहे. माझ्या ह्या शोधापुढे ‘शत’ आर्ति (दुःख, पीडा) व्यर्थ आहेत, आणि ह्यात सुलोचनेने कशाची आहुती दिली आहे तर शत सूर्य मालिकांच्या दीपावलीची.  म्हणजे सामान्य माणसांप्रमाणे सुलोचनेची दीपावलीची पणती ही मातीची नाहीय तर ती आहे शंभर सूर्यमालिकेची!! कल्पना देखील किती भव्य असावी??

तेव्हां पडे प्रियासी ।

क्षण एक आज गाठी ।

सुख साधना युगांची ।

सिद्धीस अंति गाठी ॥

प्रियकर मिलनाचे सायास तिला (सुलोचना) कष्टप्रद तपश्चर्येसारखे वाटत नाहीत.  तिच्यासाठी तर ही आनंदाने केलेली साधना आहे, जिची सिद्धी आता कुठे तिने ’गाठली’ आहे. सावरकरांची शब्दप्रभू संपन्नता बघा गांठी (गाठभेट) आणि गाठी (पोचणे किंवा गाठणे) काय भन्नाट यमक त्यांनी जुळविले आहे!!

हा हाय जो न जाई ।

मिठि घालु मी उठोनी ।

क्षण तो क्षणांत गेला ।

सखी हातचा सुटोनी ॥

पुढे सुलोचना म्हणते नुकतीच तर आमची भेट झाली आहे. त्याला (वल्लभाला) मिठी मारायला म्हणून मी उठले तर, तर तो क्षण एका क्षणात माझ्या हातून सुटून गेला, संपून गेला!! पु.ल.देशपांडे ह्यांनी म्हटल्याप्रमाणे ह्या एका ओळीसाठी सावरकरांना खरोखर साहित्यातील नोबेल पुरस्कार द्यायला हवा.

सावरकरांची अनेक रूपं मला आवडतात. विज्ञानाधिष्ठित सावरकर, शब्दप्रभू सावरकर, लढवय्ये सावरकर, कवी सावरकर, लेखक सावरकर, सामाजिक चळवळीचे प्रणेते सावरकर, ब्रिटिशांवर तुटून पडलेले सावरकर, धाडसी सावरकर, राष्ट्रासाठी आपल्या घराची राखरांगोळी केलेले सावरकर. एक मनुष्य त्याच्या सबंध आयुष्यात कदाचित परमेश्वरही घेण्यास धजावणार नाही इतकी जाज्वल्य रूपं घेऊ शकतो?? आणि ह्या प्रतिभावान आत्म्याला आपण करंटे भारतीय एका जातीत तोलून त्याला माफीवीर म्हणतो?? ह्याहून करंटा समाज कुठल्या तरी देशात असेल. सावरकरांच्या त्या जाज्वल्य आयुष्यातील धगधणाऱ्या अग्निकुंडातील एकतरी अग्निशिखा होण्याचे सौभाग्य मिळाले तरी एखाद्याचा जन्म सत्कारणी लागायचा. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांना शतशः नमन!!

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मैना खेर… अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ मैना खेर… अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

(महिना अखेर)

आमच्या लहानपणी मैना खेरने स्वत:चा असा दबदबा निर्माण केलेला होता. आम्हा भावंडांच्या कोणत्याही मागणीला आई बाबांचं एकच उत्तर यायचं, ” शू:$$, आता नाही हं! मैना खेर आहे.”

मग हळूहळू समजायला लागलं की, बाबांच्या पगाराच्या आधीच या मैना खेर मॅडम येतात. त्या फार कडक आहेत. त्या असल्या की पापडसुद्धा तळायची  परवानगी आईला नसते. मग भजी, वडे यांची बातच सोडा. कोणतंही वाणसामान आणायची मुभा नसते. अगदी खेळताना पडलो, धडपडलो तरी आईला आमच्या पडण्यापेक्षा मैना खेर असताना आम्ही का पडलो, याचंच दु:ख व्हायचं.

बाकी मैना खेर आहे म्हणून शाळा लवकर सुटण्याचं सुखही मिळायचं म्हणा.

मैना खेर आणि रद्दी, भंगारवाला यांचंही काहीतरी कनेक्शन होतं. हे लोक हमखास यावेळी चाळीत हजेरी लावायचे. घरोघरच्या होम मिनिस्टर कसोशीनं व्यवहार करायच्या. अगदी दहा-वीस पैसे मिळाले तरी केवढा आनंद झळकायचा त्यांच्या चेहऱ्यावर! 

महिन्याचा शेवटचा आठवडा हा मैना खेरबाईंच्या दहशतीचा असायचा.

कालांतराने पगाराची पेमेंटस् झाली. एक तारखेचा मुहूर्तही पेमेंटसाठी उरला नाही. घरातल्या चार माणसांचे पैसे महिन्याच्या वेगवेगळ्या आठवड्यात मिळायला लागले आणि मैनाबाई म्हाताऱ्या झाल्या.

व्यावसायिकांना तर त्यांचं काहीच वाटेनासं झालं.

माझ्या एका व्यावसायिक मित्राच्या यशाचा आनंद साजरा करायला आम्ही कुटुंबिय हाॅटेलमधे निघालो, ती तारीख सव्वीस होती. योगायोगाने माझी वृद्ध आई माझ्याकडे आलेली होती. तिलाही मी तयार व्हायला सांगितलं तर,

“अगं,काय ही उधळमाधळ? मैनाखेर असताना?” असं ती दहादा तरी कुरकुरली. असो.

आम्ही नाही तरी कोणी तरी आपल्याला अजून वचकून आहे या विचारानं मैनाबाईही गहिवरल्या असतील नक्कीच !!

या निमित्त काळाच्या ओघात अगदीच विस्मरणात गेलेल्या मैना खेरबाईंच्या आठवणी जागवल्या गेल्या. या बाई आपल्यातून केंव्हा निघून गेल्या हे कळलेच नाही. गेल्या काही दशकातील झालेल्या अनेक बऱ्यावाईट उलथापालथींपैकी ही एक घटना. 

बहुधा आजच्या तरुण मुलामुलींना या मैना खेरबाई भेटल्याही नसाव्यात किंवा दिवाळीला केले जाणारे फराळाचे पदार्थ, दिवाळीच्याच मुहूर्तावर केले जात होते, घरच्या सर्वांना वर्षातून एकदाच नवे कपडे घेतले जात होते, या गोष्टीची जाणीवसुद्धा होत नसेल.

लेखक – अज्ञात. 

प्रस्तुती : सुहास सोहोनी. 

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कृषिदिन निमित्त – “पोरीयातारा कृषीपुत्र वसंतराव नाईक” ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? इंद्रधनुष्य ?

☆ कृषिदिन निमित्त – “पोरीयातारा कृषीपुत्र वसंतराव नाईक” ☆ श्री कचरू चांभारे ☆

(आज १ जुलै – हा दिवसकृषिदिन‘ म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्त)

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदी राहिलेले महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शेती टिकली तरच देश टिकेल. शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा, असं आग्रहपूर्वक मांडणारे वसंतराव हे कृषीनिष्ठ कृषीपुत्र होते. महाराष्ट्राचा इतिहास एक यशवंत व दोन वसंत यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. ते तिघे नव महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. नाईक साहेबांनी शेती, उद्योग, विद्युतनिर्मिती, तलाव बांधणी, विहिरी खुदाई, रस्ते बांधकाम, सिडको वसाहत निर्मिती, पंचायतराज सत्ता विकेंद्रीकरण, अशा सर्वच क्षेत्रात क्रांतीकारी काम केलेले आहे. त्यांचा कोणताही एक पैलू घेतला तरी त्यावर खूप मोठे लिहिण्यासारखे आहे.

१ जुलै १९१३ रोजी वसंतरावांचा जन्म फुलसिंग नाईक व सौ. होनुबाई मातापित्याच्या पोटी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या छोट्या गावी झाला. गहुली हे गाव त्यांचे आजोबा चतुरसिंग राठोड (नाईक) यांनीच वसविले आहे. बंजारा समाजात नायकाला प्रतिष्ठेचे व मानाचे स्थान असते. मेहनत, जिद्द, व शिक्षण या जोरावर स्व-संस्कृती, रितीरिवाज जपूनही नागरी संस्कृतीला अंगीकारणारा बंजारा हा बहुधा एकमेव समाज असावा. संत सेवाभायांनी दिलेली शिकवण पाळली की राजयोग येतोच याचं उदाहरण म्हणजे नाईक घराणे होय. १९५२ पासून पुसद तालुक्यातील राजकारणावर नाईक घराण्याचे निर्विवाद वर्चस्व आहे. याच घरातून महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री, दोन मंत्री मिळालेले आहेत.

वसंतरावांचे प्राथमिक चौथीपर्यंतचे शिक्षण दरवर्षी वर्गासोबतच गावही बदलत झाले. प्राथमिक चौथीपर्यंतच्या शिक्षणासाठी त्यांना रोज चार पाच किमी पायपीट करावी लागत असे. माध्यमिक शिक्षण अमरावतीला व पुढे बीए, वकीलीचे शिक्षण नागपूरला झाले. कुशाग्र बुद्धिमत्ता, संवाद चातुर्य व उच्च शिक्षण यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले. शेतक-यांचे कैवारी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या थोर नेत्याच्या सोबत वकिली शिकताना, महात्मा फुलेंच्या विचाराचे पाईक असलेल्या वसंतरावांनी देशसेवेचे धडे गिरवले. इथूनच त्यांच्या राजकारणाची पायाभरणी झाली. चाळीसच्या दशकात त्यांनी राजकारणात पदार्पण केले व पहिल्याच प्रयत्नात ते पुसद नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष झाले. याच पुसद तालुक्याने त्यांना तब्बल पाचवेळा आमदार केले. तसेच पुढे सुधाकरराव नाईक व मनोहरराव नाईक यांच्या रूपाने पुसद तालुका कायम नाईक घराण्याशी बिलगून राहिला. पुसद तालुका मध्यप्रांतात असताना तिथेही वसंतराव उपमंत्री राहिले.

आज देशपातळीवर नावाजलेली म. न. रे. गा. म्हणजे नाईक साहेबांनी स्थापिलेली रोजगार हमी योजना होय. या योजनेमुळे महाराष्ट्रात अनेक तलाव, विहिरी बांधून झाल्या.

१९६३ ते १९७५ हा साहेबांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ तसा कसोटीचाच होता. अन्नधान्याचे संकट व दुष्काळाचे सावट राज्यावर होतेच. शिवाय पाकिस्तानसोबतचे  युद्धही याच काळातले. कोयना भूकंपही याच काळातला. मुख्यमंत्री म्हणून निवड झाली तेव्हा दुखावलेले काही  मातब्बर आमदारही सोबतीला होतेच. वसंताला ग्रीष्म करण्यासाठी. सरकारच्या बाहेर आचार्य अत्रे, सेनापती बापट, मृणालताई गोरे, जांबुवंतराव धोटे अशी मातब्बर मंडळी सामाजिक प्रश्नावर सरकारशी लढायला होतीच. पण अंगमेहनतीने चातुर्याने वसंत असा फुलला की मुख्यमंत्री निवासाचे नावच वर्षा झाले व ते आजही कायम आहे.

साहेब स्वतः शेतकरी होते. दौ-यावर असताना ते वाटेतल्या शेतक-यांना थेट बांधावरून उतरून शेतात जाऊन मार्गदर्शन करत असत. चार कृषी विद्यापीठे, कोराडी, पारस औष्णिक वीज प्रकल्प, ही साहेबांची देण आहे. एकाचवेळी राहुरी, परभणी, अकोला, दापोली या चार कृषी विद्यापीठांची निर्मिती ही देशपातळीवरची आजपर्यंतची एकमेव घटना आहे. सर्वसामान्य लोकांना वसंतरावांचे सरकार आपले वाटत होते, म्हणूनच १९६७ साली देशात काँग्रेस विरोधी लाटेत काँग्रेसची सरकारं कोसळत असताना, महाराष्ट्रात मात्र २०२ आमदारांसह नाईकसाहेब दुस-यांदा मुख्यमंत्री झाले. व पुन्हा १९७२ साली २२२ आमदारांसह तिस-यांदा मुख्यमंत्री झाले.

१९६६ च्या पुण्यातील शनिवार वाडा सभेत ते बोलताना म्हटले होते की, “ पुरोगामी महाराष्ट्र अन्नधान्यासाठी कुणापुढे हात पसरणार नाही. दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी जाहीरपणे फासावर जाईल. ” ही घोषणा काही निवडणुकीतल्या टाळ्यांसाठी नव्हती, तर ही घोषणा म्हणजे हरितक्रांतीची नांदी होती. भूदान चळवळीत योगदान देताना नाईक साहेबांनी लोकसहकार्याने तब्बल पाच हजार एकर जमीन भूदान चळवळीस मिळवून दिली. ते स्वतः एक जमीनदार असल्यामुळे त्यांना भूदानासाठी जमीनदारांचे मन वळविणे सोपे गेले.

अखिल भारतीय स्तरावर त्यांनी भटक्या बंजारा समाजाला संघटित करुन संमेलनही घेतले होते. शिवाजीराव मोघेसारख्या तरुणाला बळ देऊन आदिवासी संघटन मजबूत केले. हरिभाऊ राठोड, मोहन राठोड, राजाराम राठोड यासारख्या नवतरूणांना झेप घ्यायला भाग पाडलं. नाईक साहेब जन्मजातीने बंजारा होते, तरी त्यांचे कार्य पुरोगामी होते. शेती उद्धारक होते. सर्व जातीतील पुढाऱ्यांना व प्रादेशिक प्रांत अस्मिता जोपासणारांना हाताळून त्यांनी महाराष्ट्राला प्रगतीचे पंख दिले.

पंडित नेहरू यांनी हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्रीला बोलाविले म्हणून यशवंतराव दिल्लीला गेले. मारोतराव कन्नमराव राज्याचे मुख्यमंत्री झाले. जनतेशी नाळ असलेले, स्वातंत्र्य चळवळीतून पुढे आलेले मारोतराव कन्नमवार हे एक लोकप्रिय नेते होते. परंतु दुर्दैवाने अल्पकाळातच त्यांचे निधन झाले. नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी अनेक मातब्बर आमदार रांगेत होते. यशवंतरावांनी वसंतराव नाईकांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली. वसंतराव नाईक हे सर्वांना सोबत घेवून चालणारे नेते होते. मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले व नाईकांच्या मंत्रीमंडळात गृहमंत्री असलेले बाळासाहेब देसाई मुंबईतील गिरणी कामगार संबंधित एका घटनेनंतर राजीनामा देऊन पाटणला निघून गेले होते. त्यांच्या पाठिंब्याला समर्थन म्हणून आणखी दोघांनी राजीनामे दिले होते. नैसर्गिक व राजकीय परिस्थितीला धैर्याने तोंड द्यायची ती वेळ होती. अशातच कोयना भूकंप झाला. कोयना हे गाव बाळासाहेब देसाई यांच्या मतदारसंघात येत होते. बाळासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला होता. नाईक साहेबांनी मृदू आर्जवाने बाळासाहेबांचे मन वळविले व त्यांना महसूलमंत्री केले. कोयनेतील बेचिराख झालेली घरे उभी केल्याशिवाय आता मुंबई नाहीच, ही खुणगाठ बांधून बाळासाहेब कोयनेत ठाण मांडून बसले. वसंतराव बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. सत्तर हजार घरांचे पुनर्वसित बांधकाम झाल्यावरच बाळासाहेब देसाई मुंबईला परतले.

बंजारा समाजात संत सेवाभाया, पोहरादेवी व फुलसिंग नायकेर छोरा वसंतराव यांना परमोच्च स्थान आहे. या स्थानाची कारणं बंजारा समाजाच्या उत्कर्ष वाढीच्या प्रवासात दडलेली आहेत.

” पोरीयातारा “ या शब्दाचा अर्थ होतो उच्च मार्गदर्शक, अढळ तारा. वसंतरावांचे महाराष्ट्रातील स्थान पोरीयातारा असेच आहे. बुद्धी, परिश्रम, निष्ठा या बळावर ते दीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. आजन्म शेतीशी व शेतीव्यवस्थेशी  एकनिष्ठ असलेल्या कृषीपुत्राचा जन्मदिन ‘ कृषी दिन ‘  म्हणून साजरा व्हावा, ही घटना कृषी संस्कृतीला संजीवनी देणारी आहे.

अन्नदात्या नाईक साहेबांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.

© श्री कचरू चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अश्वारूढ योद्ध्यांची माल्टा मालिका” ☆ अनुवाद – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ “अश्वारूढ योद्ध्यांची माल्टा मालिका” ☆ अनुवाद – सुश्री सुलू साबणे जोशी 

जगभरातील प्रचलित नाण्यांत सर्वात वजनदार, एक किलो वजनाचे, हे चांदीचे नाणे चलनात आणले आहे – एका युरोपमधल्या चिमुकल्या देशाने – ज्याचे नाव आहे “ माल्टा “ 

‘अश्वारूढ योद्ध्यांच्या माल्टा मालिके’तील हे चांदीचे नाणे असून २००३ या वर्षी ते चलनात आणले गेले. भारतीयांसाठी ही अतिशय गौरवाची बाब आहे की, या नाण्यावर  राजा महाराणा प्रताप यांना स्थान मिळालेले आहे.

या नाण्याचे चलनी मूल्य ५००० लिरा आहे आणि वजन आहे १ किलो (चांदी). हे एक किलो वजनाचे नाणे जगात उपलब्ध असलेल्या नाण्यात आकारानेही सर्वात मोठे आहे. या नाण्याच्या एका बाजूला महाराणा प्रताप यांचे चित्र, त्यांच्या जीवनकालासह आहे, तर दुस-या बाजूस माल्टा देशाचे नाव व चिन्ह आहे. माल्टा सरकारने अशी १०० नाणी चलनात आणली आहेत.

सोळाव्या शतकातील एका हिंदू राजाची गौरवास्पद दखल, आपल्यापासून ६,५०० कि.मी. दूर असलेल्या एका लहानशा देशाने घ्यावी, याचा अर्थच असा होतो की, महाराणा प्रताप यांचे प्रभावशाली शौर्य जगविख्यात आहे.                                                                                                                       *                                                                          

या उलट, आपल्या देशांतील इतिहासात मात्र आक्रमक घुसखोरांची नोंद  ‘थोर’ अशी केली गेली आहे, याचे सखेद आश्चर्य वाटते.

अनुवाद : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

(मूळ इंग्रजीत असलेली ही गौरवास्पद माहिती आपल्या सर्वांपर्यन्त पोहोचावी या उद्देशाने सुश्री साबणे यांनी ती मराठीत अनुवादित केली आहे.) 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आषाढी वारी विशेष – “वारकरी संप्रदायाचे कार्य…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ आषाढी वारी विशेष – “वारकरी संप्रदायाचे कार्य…” ☆ सौ राधिका भांडारकर

उत्कट भक्ती, सदाचार, नीती यावर आधारलेला सरळ मार्गी  आचारधर्म म्हणजे वारकरी संप्रदाय.

विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांच्या संप्रदायाला वारकरी संप्रदाय म्हणतात. आणि या संप्रदायाचा आद्य प्रवर्तक भक्त पुंडलिक समजला जातो.

वारी म्हणजे एक सामुदायिक पदयात्रा.  विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपापल्या गावाहून वारकरी या पदयात्रेत भक्तिभावाने सामील होतात.

संत ज्ञानेश्वरांच्या घराण्यात वारकरी संप्रदायाची  परंपरा होती आणि संत नामदेव,  संत तुकाराम, संत एकनाथ, संत भानुदास यांनी हाच प्रवाह चालू ठेवला.

या वारीची प्रथा आजतागायत त्याच भावनेनेने टिकून आहे हेच खरे वारीचे महात्म्य.  भगवंतांचे नामस्मरण करणे हे या संप्रदायाचे मुख्य तत्व.  संसारातील बंधनातून,  मोहमायेतून हळूहळू दूर होऊन,  भजन कीर्तनाच्या माध्यमातून, नामस्मरण करून  पांडुरंगाशी  एकरूप व्हावे हा संप्रदायाचा साधा सोपा भक्ती मार्ग आहे.  वारकरी संप्रदाय म्हणजे एक संस्कारक्षम सांस्कृतिक केंद्र आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.

या संप्रदायाचे प्रवेशद्वार सर्व जाती पंथांच्या स्त्री-पुरुषांसाठी खुले आहे.  जातीय समता हा या संप्रदायाचा कार्य केंद्रबिंदू आहे.  येथे उच्च, नीच,  गरीब,  श्रीमंत असा भेदभाव नाही.  येथे सर्व समान.  सर्वांचे स्थान एकच.  शास्त्रप्रामण्याला, जातीव्यवस्थेला धक्का न लावता स्त्री व शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग या संप्रदायाने मोकळा करून दिला. स्वातंत्र्य व समतेचे वातावरण निर्माण केले.  भक्ती पंथांच्या साहाय्याने आध्यात्मिक उन्नती साधता येते, नैतिक सामर्थ्य वाढवून प्रापंचिक  दु:खावर मात करता येते असा विश्वास या वारकरी पंथाने लोकांप्रती निर्माण केला.

वारकरी संप्रदायात व्रत—वैकल्याचे स्तोम नाही.  कर्मठपणा नाही.  त्याग, भोग,  नैष्कर्म्य,  स्वधर्माचरण याचा मेळ घालण्याचा उपदेश यात आहे.  या संप्रदायाचे कार्य लोकाभिमुख आहे.  लोकांमध्ये राहून नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न यात आहे.  श्रद्धा व विवेक यांच्या एकात्मतेवर भर देण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.  प्रपंच व परमार्थ याचा समन्वय साधण्याची शिकवण हा संप्रदाय समाजाला  देतो.  त्यांचे एकच सांगणे असते की कर्तव्यनिष्ठेला व सामाजिक नीतिमत्तेला पोषक अशीच कर्मे करावीत.  एकनाथ महाराज, चोखामेळा, गोरा कुंभार, सावता माळी सारेच वारकरी संत गृहस्थाश्रमी व कुटुंब वत्सल होते.

।। आधी प्रपंच करावा नेटका।। ही शिकवण त्यांनी समाजाला दिली. स्त्रियांच्या आणि शूद्रांच्या जीवनातलं जडत्व नाहीसं करून त्यांच्या निरस जीवनाला आध्यात्मिक ज्ञानाची ओळख करवली.  आणि त्यांच्या सुप्त शक्तींची व भावनांची जाणीव त्यांना  करून दिली.

वारकरी संप्रदायाने मराठीचा अभिमान बाळगला.  बोलीभाषेला वाङमयीन प्रतिष्ठा मिळवून दिली.  वारकरी संतांनी बहुजन समाजासाठी प्रथम मराठीत लेखन केले.  फुगड्या, पिंगा, भारुडे, गवळणी, अभंग, ओव्या, कीर्तने यांच्या माध्यमातून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले. लोकांना रुचेल, समजेल,  त्यांच्या ओठावर राहील असेच लेखन त्यांनी केले.

। वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा।

। येरानी  वहावा भार माथा ।।

असे संत तुकाराम आत्मविश्वासाने समाजाला सांगतात.

थोडक्यात वारकरी संप्रदायाने सामाजिक समतेचा पाया रचला.  तुळशी माळ, बुक्का,  गोपीचंदन,  गेरूच्या रंगात बुडवून तयार केलेले जाड्या भरड्या कापडाचे,  विशिष्ट आकाराचे निशाण म्हणजे संप्रदायाची पताका ही वारीच्या उपासनेची साधने आहेत.  

संप्रदायाचे मुख्य दैवत श्री विठ्ठल.  आणि हे कृष्णाचे रूप आहे.

 राम कृष्ण हरी हा वारकऱ्यांचा महामंत्र.

आणि “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्रीगुरु  ज्ञानदेव तुकाराम” हे वारकरी संप्रदायाचे घोषवाक्य आहे.

टाळ मृदंगाच्या गजरात,  उन्हातान्हात,  पावसात,  थंडी वाऱ्यात,  ही वारी निघते आणि एकात्मतेची जागृती समाजात निर्माण करत भगवंत चरणी लीन होते.

।। राम कृष्ण हरी ।।

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– अपूर्व योग… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – अपूर्व योग… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

(गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी)

१ जून…..  शास्त्रीय संगीतातील विदुषी श्रीमती धोंडूताई कुलकर्णी यांचा स्मृतिदिन. त्यांची एक सुरम्य आठवण …… 

१८ ऑगस्ट २००० चा दिवस. टीव्हीवरील एका मराठी मालिकेचं छानसं गाणं मी मुंबई विद्यापीठाच्या ‘क्लबहाऊस’ या रेकॉर्डिंग स्टुडिओत रेकॉर्ड करत होते. इतक्यात तिथं एक ओळखीचा चेहरा समोर दिसला. ओळखीची खूण पटली. तरी नेहमीप्रमाणे नक्की नाव काय, ते आठवेना. बाई ठेंगणी ठुसकी, गोल चेहरा, गोल मोठं कुंकू. कुठं पाहिलंय बरं? नेहमीचंच कोडं ! पण आदरणीय किशोरीताईंच्या सोबत कुठं तरी नातं जुळतंय, एवढा मात्र धागा लागला. रेकॉर्डिंगचं मनावरचं दडपण अधिकच वाढलं. बाई समोरच्या रूममध्ये, खाली बसल्यानं, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव मला नंतर दिसेना. परंतु अस्तित्व जाणवत असल्याने आता मात्र लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक उत्तमच गायचं, अशी मनाशी खूणगाठ बांधून एका टेकमध्ये गाणं ओके करून, मी रेकॉर्डिस्टच्या रूममध्ये आले. गाणं कसं झालं असेल? या कुतूहलमिश्रित तणावामध्ये मी त्या खोलीत प्रवेश केला.  रेकार्डिस्टसह निर्माता, दिग्दर्शक, सर्वजण खुशीत दिसत होते. 

त्या बाईंनी अगदी आनंदानं माझं स्वागत केलं, अन् म्हणाल्या, “अगं, आज तुला अगदी आनंदाची बातमी द्यायची आहे. काय देशील तू मला? ” मीही अगदी थाटात म्हटलं, “ तुम्हाला जे आवडेल ते ! ” मीही त्यांचा हात हातात धरून त्यांचं नाव आठवायचा प्रयत्न करत होते.. त्या म्हणाल्या, “ संगीत क्षेत्रातल्या दिग्गज विदुषी, धोंडूताई कुलकर्णी यांनी मला परवाच सांगितलं, की ‘अगं शिल्पा, मला नं, त्या पद्मजा फेणाणी जोगळेकरचं गाणं अत्यंत मनापासून आवडतं.’ धोंडूताई कधी कुणाचं असं कौतुक करीत नाहीत. पण अगदी मनापासून त्या मला सांगत होत्या की, “आजच्या पिढीतली ‘पद्मजा’ म्हणजे माझी सर्वात आवडती गायिका ! तिला मी तानपुऱ्यावर केदार रागातली बंदिश  गाताना एन.सी.पी.ए.मध्ये प्रत्यक्ष ऐकलंय. काय तिचा आवाज, किती गोड नि लवचिक ! अगदी पाण्यासारखा सरसर वळतो. मला खूपच आवडते ती ! ‘ 

…. “पद्मजा तू त्यांना एकदा भेटून नमस्कार करून ये बरं…” 

हे सारं मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापक श्रीमती शिल्पा तेंडुलकर यांच्याकडून ऐकून तर मी गारच पडले ! धोंडूताई म्हणजे शास्त्रीय संगीतातील विशुद्ध शास्त्राचा परिपाक ! आणि त्यांनी माझ्याविषयी हे उद्गार काढावेत! सहसा, शास्त्रीय संगीतातील कलाकार इतर गायकांना कौतुकाच्या बाबतीत जरा दूरच ठेवतात. परंतु धोंडूताईंनी माझ्या शास्त्रीय गायनाचं मनापासून केलेलं कौतुक ऐकून, मला धन्य धन्य वाटलं ! त्या रात्री परमेश्वराचे, आईवडिलांचे व गुरूंचे आभार मानत मी एका वेगळ्याच तरल आनंदात झोपी गेले….!

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शैक्षणिक क्षेत्रातील महामेरू : डॉ. श्रीकांत जिचकर… ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? इंद्रधनुष्य ?

शैक्षणिक क्षेत्रातील महामेरू : डॉ. श्रीकांत जिचकर☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले

एकच माणूस डॉक्टर होता, तो वकीलही होता, तो आयपीएस अधिकारी तसंच आयएएस अधिकारी होता. याशिवाय तो पत्रकारही होता. इतकंच नाही तो कीर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता.

इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे “श्रीकांत जिचकर” होय.

“ शैक्षणिक क्षेत्रातील  महामेरू “ म्हणून संबोधता येईल असं नाव म्हणजे श्रीकांत जिचकर होय.

— अवघ्या ४९ वर्षांचं जीवन, ४२ विद्यापीठं, २० पदव्या आणि २८ सुवर्णपदकं — 

हा एवढा ज्ञानाचा खजिना या अवलियाने जिंकला. आयएएस असो वा आयपीएस, एलएलएम

असो वा एमबीबीएस, देशातील बहुतेक सर्वच पदव्या मिळवण्याचा विक्रम श्रीकांत जिचकर यांच्या नावावर जमा आहे.

जिचकरांनी मिळवलेल्या २० पदव्यांमध्ये एमबीबीएस आणि एमडी, एलएलबी, एलएलएम, डीबीएम आणि एमबीए, जर्नालिझम यांचा समावेश आहे. जिचकरांनी १० विषयांत एमए. केलं. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉपी, राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास-संस्कृती आणि पुरातत्व, मानसशास्त्र यांचा समावेश आहे. जिचकारांनी संस्कृतमध्ये मानाची डी.लिट ही पदवीही मिळवली.

जिचकरांनी मिळविलेल्या या बहुतेक पदव्या प्रथम श्रेणीतून मिळवल्या आहेत. श्रीकांत जिचकर यांची भारतातील सर्वात शिक्षीत व्यक्तींच्या पंक्तीत गणती होते. या ज्ञानयोगी चैतन्याच्या झऱ्याने, ज्ञानदेवता सरस्वतीलाही अक्षरश: मोहून टाकलं. त्यामुळेच आपल्या अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एकही वर्ष

वाया जाऊ न देता, बहुतेक सर्व पदव्यांवर नाव कोरलं. जिचकार यांनी १९७८ साली यूपीएससीची परीक्षा दिली. यामध्ये त्यांनी अपेक्षित यश मिळवून आयपीएस झाले. पुढे दोनच वर्षांत म्हणजे १९८० साली त्यांनी आयएएसची पदवी देखील घेऊन टाकली.

विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आयएएसचा राजीनामा दिला. या बुद्धिवंताने वयाच्या २५ व्या वर्षी पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि जिंकून दाखवली. जिचकर महाराष्ट्र विधानसभेमध्ये १९८० साली वयाच्या २५ व्या वर्षी निवडून गेले. महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेलेले ते सर्वांत तरुण आमदार होते.

जिचकरांनी १२ वर्षे विधानसभेमध्ये काम केले. एकेकाळी त्यांच्याकडे १४ खात्यांचा कारभार होता. 

यानंतर त्यांनी राज्यसभेवरही धडक मारली. १९९२ साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली. जिचकर १९९८ सालापर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. या काळामध्ये त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले. त्यांनी युनो आणि युनेस्को संघटनांसाठीही काम केले. 

जिचकर यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एका छोट्याशा गावात झाला. जगातील सर्वांत हुशार १० विद्यार्थ्यांमध्ये  (Brilliant स्टुडंट) “ पहिल्या क्रमांकामधे बुद्धिमान “ म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे. त्यांनी जगभर शिबिरे आयोजित करून  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ.जिचकर यांनी जगातले पहिले ‘ कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय ‘ रामटेक, नागपूर येथे सुरू करून जगभर आपल्या संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार केला. जिचकर यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये ५२,००० पुस्तकांचा संग्रह आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचा डॉ. श्रीकांत जिचकर नावाच्या या कर्मयोगी अवलीयास आदरपूर्वक सलाम…

संग्राहिका :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares