मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “देहाची कॅपिटल व्हॅल्यू” ☆ श्री राजेंद्र  वैशंपायन ☆

??

☆ “देहाची कॅपिटल व्हॅल्यू” ☆ श्री राजेंद्र  वैशंपायन 

नुकतीच एक गमतीशीर बातमी वाचली. अमेरिकेमध्ये दर वर्षी एक कोटी पन्नास लाख (१,५०,००,०००) इतक्या दातांच्या रूट कॅनालच्या केसेस होतात. प्रत्येक रूट कॅनाल चा सरासरी खर्च ८०० डॉलर्स इतका असतो. म्हणजे दरवर्षी अमेरिकेमध्ये १२ अब्ज डॉलर्स  (१२,००,००,००,०००) इतका खर्च केवळ दातांच्या रूट कॅनाल वर होतो. या सरासरी अंदाजित संख्या जरी धरल्या तरी १० अब्ज डॉलर तरी केवळ दातांच्या इलाजासाठी खर्च होतात असं नक्कीच म्हणता येईल. मी चक्रावलोच. रूट कॅनाल सारख्या साधारणतः सोप्या समजल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेचा जर हा खर्च असेल तर बाकीच्या अवयवांच्या त्या मानाने अधिक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचा खर्च तर माझ्या विचार करण्यापलीकडे गेला. म्हणजे अगदी पायांच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत प्रत्येक अवयवाची किंमत काढायचं ठरवलं तर एक मनुष्यदेह किती किमतीचा असेल? माझं कुतूहल अधिक चाळवलं गेलं आणि जरा अधिक माहितीसाठी गुगल महाराजांना विचारलं की केसाचं ट्रान्सप्लांट होतं त्यावेळा एक केस ट्रान्सप्लांट करण्याचा काय खर्च आहे? उत्तर आलं एका केसाला ३ डॉलर ते ९ डॉलर. त्याची सरासरी धरली तर उत्तर ६ डॉलर.  सामान्यपणे माणसाच्या डोक्यावर सरासरी दीड लाख(१,५०,०००) इतके केस असतात. म्हणजे याचाच अर्थ माणसाच्या डोक्यावरच्या केसांचीच किंमत साधारणपणे ९ लाख डॉलर इतकी आहे. मी अधिकच चक्रावलो. या संख्या डोळ्यासमोर आल्या आणि एकंदर मनुष्यदेहाची किंमत किती येईल हे गणितही माझ्याच्याने पूर्ण होईना.  

विचार करताना शरीराची सगळी आकृती समोर उभी राहिली.  हात, पाय, त्यांची बोटं, डोळे, कान, नाक, श्वासनलिका, अन्ननलिका, फुफुस, हाडांचा सापळा, हृदय, यकृत, प्लिहा, लहान आतडं मोठं आतडं, जननेंद्रिय, रक्त, इतर एन्झाइम्स आणि सर्वात महत्वाचा मेंदू… काय चमत्कार आहे शरीर म्हणजे. मी एका ठिकाणी वाचलं होतं की माणसाच्या शरीरात चालणाऱ्या ज्या सगळ्या व्यवस्था आहेत, यांची शरीरात चालणाऱ्या अचूकतेने प्रतिकृती करायची म्हटली तर कमीत कमी पाच एकर इतका मोठा आणि अतिशय क्लिष्ट यंत्रांनी बनलेला कारखाना निर्माण करावा लागेल. आणि हेच काम निसर्गाने म्हणा, ईश्वराने म्हणा सहा फूट लांब दीड फूट रुंद अशा मानवी देहात करून दाखवलं आहे. एका तज्ज्ञाने सांगितलेलं मी ऐकलं आहे की शरीरातील अवयव हे साधारणपणे 150 ते 200 वर्ष पर्यंतसुद्धा सक्षमपणे काम करू शकतात आणि म्हणूनच एका शरीरातून दान केलेले अवयव दुसऱ्या शरीरात पुन्हा व्यवस्थित आयुष्यभर काम करतात. माणसाच्या देहाची ही शक्ती आहे,  हा चमत्कारच नाही का? चमत्कार म्हणजे वेगळा अजून काय असू शकतो? 

मनात आलं, फुकट मिळाला म्हणून कसा देह वापरतो आपण. देहाचा प्रत्येक अवयव संपूर्ण आयुष्यभर माणसाने केलेल्या अत्याचाराचा भडीमार सहन करत करत शक्य होईल तितकी साथ देण्याचा प्रयत्न करतो आणि माणूस देहाला पायपोस असल्यासारखं का वागवतो? काहीही खातो, कधीही खातो, काहीही पितो कधीही पितो, कधीही झोपतो, कधीही उठतो. व्यसनं करतो आणि काय काय. का असं? ज्या परमेश्वराने हा चमत्कार प्रयेक मनुष्याला बहाल केला आहे त्याची किंमत आहे का आपल्याला? आपण ३००० रुपयाचा साधा चस्मा, त्याची किती काळजी घेतो त्याला नीट केसमध्ये ठेवतो पण तशी डोळ्यांची काळजी घेतो का? कॉन्टॅक्ट लेन्सेस अगदी काळजीपूर्वक दररोज रात्री सोलुशनमध्ये बुडवून ठेवतो पण डोळ्यांसाठी दिवसातून एकदातरी नेत्रस्नान करतो का? जसं डोळ्याचं तसंच इतर अवयवांचं. आपल्या संस्कृतीत अष्टांगयोग आणि आयुर्वेद हे दोन अमृतकुंभ या देह नावाच्या चमत्काराचा सांभाळ करण्यासाठीच दिले आहेत. शरीरात बिघाड होऊच नये म्हणून अष्टांगयोग आणि काही कारणांनी झालाच तर पुन्हा पूर्ववत शरीर करण्यासाठी आयुर्वेद. या दोघांचा किती सुंदर मेळ आपल्या संस्कृतीत घालून दिलेला आहे. किती भाग्यवान आहोत आपण की आयुष्यातील प्रत्येक गोष्ट अनुभवण्यासाठी शरीर नावाची सुंदर भेट आपल्याला ईश्वराने दिलेली आहे. त्याचा निदान योग्य तो सांभाळ करण्याची जबाबदारी आपली नाही का? 

मी लहानपणी एक प्रार्थना शिकलो की जी मी दररोज रात्री निजण्याअगोदर म्हणतो. ती प्रार्थना अशी; 

डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कानी, पदी चालतो ।

जिव्हेने रस चाखतो, मधुरसे वाचे आम्ही बोलतो।

हाताने बहुसाळ काम करितो, विश्रांतीही घ्यावया ।

घेतो झोप सुखे, फिरोन उठतो, ही ईश्वराची दया ।।

मी ही प्रार्थना हात जोडून म्हणतो. पण मला वाटतं या प्रार्थनेचं अधिक महत्व पटण्यासाठी आणि मनावर याचा गांभीर्याने परिणाम होण्यासाठी मी ही प्रार्थना खिशात हात घालून म्हटली पाहिजे. कारण तरच दररोज आठवण राहील की या देहाची एकूण कॅपिटल व्हॅल्यू किती! किती अमूल्य आहे हा देह. आणि खिशात हात घालून प्रार्थना केल्यामुळे याचीही आठवण राहील की माझ्या शरीराची मीच जर काळजी नाही घेतली तर त्याच खिशातून एकेक केस परत मिळवण्यासाठी सहा डॉलर बाहेर काढायला लागतील कधीतरी… 

© श्री राजेंद्र वैशंपायन 

मो. +91 93232 27277

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “असं का होत ? …” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ “असं का होत ? …” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

असं का होतं?

(Subconscious Mind)

– असं का होतं की ज्या गोष्टीची भीती वाटत असते, नेमकी तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणून हजर होते.”

– एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्याच विषयात का बरं नापास होतो?

– पैसे नाहीत, पैसे नाहीत, असे घोकणारा दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल का बरं होतो?

– आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसला तरी आर्थिक  फटका बसतोच बसतो,

– कष्ट नकोत, कष्ट नकोत, असं घोकणार्‍याच्या नशिबातच श्रम आणि राबणं असतं. असं का बरं असतं?

– का बरं एखादीला नको असलेलं गावचं ‘सासर’ म्हणून पदरात पडतं?

– का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतात? 

— तर ह्या सगळ्यांसाठी एकच कारण आहे, आणि ते कारण आहे. —- 

आकर्षणाचा सिद्धांत.— लॉ ऑफ अट्रॅक्शन

तुम्हाला माहिती आहे का ?… जगातील फक्त चार टक्के लोकांकडे एकूण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा केवळ योगायोग नाही मित्रांनो, हा आकर्षणाचा सिध्दांत नियम आहे. काय सांगतो हा नियम?—- 

तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट, घटना ही कळत नकळत तुमच्या विचारांनीच  आकर्षित केलेली  असते. जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तिक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं…सगळं….. जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो, आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खूप कपडे आहेत, तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालून जाईल ना?

…. अगदी तसंच, आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात, तीच परिस्थिती वास्तव बनून तुमच्या जीवनात समोर येते.

उदा. — माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस केवळ आणि केवळ कर्जावर जातो आणि त्यामुळे  तुमचं कर्ज वाढतं. 

— माझं वजन वाढतंय, वजन वाढतंय म्हटलं की वजन अजूनच वाढतं.

— माझे केस गळतायत म्हटलं की अजूनच जास्त केस गळतात.

— माझं लग्न जमत नाही म्हटलं की लग्न जमायला अजूनच उशीर होतो.

— कर्ज माझा जीव घेणार म्हटलं की अजून आर्थिक अडचणी निर्माण होतात….. वगैरे वगैरे…

ज्या गोष्टीवर मन अधिक लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट आपल्या Subconscious Mind म्हणजेच सुप्त मनाद्वारे अंमलात आणली जाते.

— म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळालंय अशी त्याच्या रंग, चव, आकार, गंध याच्यासह कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर दृढ विश्वास ठेवला, की हवं ते आपल्याला मिळतंच मिळतं.—- फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवून देता यायला हवं– म्हणजेच त्याप्रकारच्या संवेदना तयार करुन त्यात रंग भरून कल्पना करावी.  यालाच Creative Visualization अशी संज्ञा आहे.

— अगदी मरणाच्या दारात पोहोचलेली, डॉक्टरांनी आशा सोडून दिलेली, पण हे रहस्य जाणणारी, अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करुन, सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर दृढ विश्वास ठेवून पुन्हा ठणठणीत बरी झाली आहेत.

विश्वातील सर्वच थोर माणसांनी हा आकर्षणाचा सिद्धांत जाणला होता. आणि त्याची अंमलबजावणी केली, म्हणून तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले.

तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान हवं असल्यास, दररोज ठराविक वेळी, ठराविक स्थळी शांतचित्ताने प्राणायाम करुन चेहर्‍यावर समाधानाचे भाव ठेवून मनात ही वाक्ये पूर्ण संवेदना आणि भावनेसह म्हणा:…. 

१ )  स्वस्थ आणि आरोग्यपूर्ण जीवन मी जगत आहे.

–  ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

२ )  मी सुंदर आहे, तेजस्वी आहे, मी चिरतरूण आहे.

 – ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

३ ) मी धैर्यवान, बलवान, सुज्ञ आणि विवेकी आहे.

– ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

४ ) मी समृद्ध, समाधानी आणि आनंदी जीवन जगत आहे.

 – ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

५ ) माझ्या मनात प्रेम आणि परोपकार उत्पन्न होत आहे.

– ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

६ )  मला सर्वत्र अनुकूल परिस्थिती प्राप्त होत आहे.

– ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

७ ) तुझी माझ्यावर अखंड कृपा आहे. तुझ्या प्रेमाचा माझ्यावर अखंड वर्षांव होतो आहे.

– ईश्वरा मी तुझा खूप खूप आभारी आहे.

याला पॉझीटीव्ह अफर्मेशन्स म्हणजेच सकारात्मक स्वयंसूचना– Auto  Suggestions असे म्हणतात. यामुळे तुमच्या मानसिकतेत बदल होऊन दिवसभर एक आगळीवेगळी ऊर्जा तुमच्यामध्ये संचार करेल.

तुम्ही हे जर मनापासून, आणि तशाच संवेदना निर्माण करुन वारंवार  बोललात, आणि ते तुमच्या सुप्त मनापर्यंत म्हणजेच Subconscious Mind पर्यंत पोहोचलं, तर मित्रांनो तुमच्या नकळत ते तुमच्या सार्‍या आज्ञा पाळेल आणि खर्‍याही करुन दाखवेल.

यात अट एकच असेल ती म्हणजे तुम्ही घेत असलेल्या स्वयंसूचना या तुमच्या किंवा जगाच्या कल्याणासाठी असाव्यात. इतरांना नुकसान पोहोचविणारी स्वयंसूचना बुमरॅंगसारखी तुमचेच अपरिमित नुकसान करणारी ठरते.

— म्हणूनच आपल्या मनात उत्पन्न होणा-या प्रत्येक विचाराविषयी सजग रहा. कधीकधी वरवर सकारात्मक वाटणारा विचार नकारात्मक अर्थ निघणारा असतो. त्यामुळे विचारांची काळजी घेणं फार महत्त्वाचे असते.

— उदाहरणार्थ “मी कधीच आजारी पडणार नाही.” हे वाक्य वरकरणी सकारात्मक वाटत असले तरी त्या वाक्यात आजार हा नकारात्मक शब्द आहे. त्याच्या वारंवार उच्चाराने तशीच भावना मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी “मी आरोग्यपूर्ण जीवन जगत आहे” हे वाक्य अधिक सकारात्मक आहे.

इतक्या सूक्ष्म स्तरावर आपण आपल्या मनात निर्माण होणा-या विचारांची छाननी करणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे आपण आपल्या विचारांची छाननी केली की आपल्या मनात निर्माण होणारा प्रत्येक नकारात्मक शब्द आणि विचार हळूहळू कमी होतील आणि नव्यानेच आयुष्याचा अर्थ उमजेल, अनुभव येईल.

आपणही आपल्या आयुष्यात ही शुभ सुरुवात करावी आणि आपलं आयुष्य समृद्ध करावं ही शुभेच्छा !

— आणि हीच एका दृष्टीने “लॉ ऑफ अट्रॅक्शन” ची खरीखुरी सुरुवात असेल !

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवाशी संवाद … ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ देवाशी संवाद  ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆ 

माणूस :  देवा रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारु का ?

देव :  विचार ना .

माणूस :  देवा , माझा आजचा दिवस तू एकदम खराब केलास . असं का केलंस तू देवा ?

देव :  अरे काय झालं पण ?

माणूस :  सकाळी अलार्म वाजलाच नाही . मला उठायला खूप उशीर झाला .

देव :  बरं मग ?

माणूस :  मग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती . कशीबशी रिक्षा  मिळाली .

देव :  मग ?

माणूस  :  आज कँटीन पण बंद . बाहेर सँडविच खाल्लं . ते पण  बेकार होतं .

देव :  (नुसताच हसला )

माणूस :  मला एक महत्त्वाचा फोन आला होता . त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला .

देव :  बरं मग

माणूस  :  संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती . मी इतका थकलो होतो की ए . सी . लावून       झोपणार होतो . का तू असं केलंस देवा माझ्या बरोबर ?

 देव :  आता नीट ऐक —- आज तुझा मृत्यूयोग होता . मी माझ्या देवदूतांना पाठवून तो थांबवला . त्या गडबडीत अलार्म पण थांबला .तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरला अपघात होणार होता .कँटीनच्या जेवणातून तुला विषबाधा होणार होती . ते  सँडविच वर निभावलं .तुझा फोन मी बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात अडकवणार होता .संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्टसर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली .

माणूस :  देवा मला क्षमा कर .

देव :  क्षमा मागू नकोस . फक्त विश्वास ठेव . माझ्या योजनांविषयी कधीच शंका घेऊ नकोस . आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं त्याचा अर्थ फार उशीरा लागतो आपल्याला 

— आपण खरंच देवावर श्रद्धा आहे असं म्हणतो . मग श्रवणाच्या वेळी डुलक्या का येतात ? – तीन तासाच्या पिक्चरमध्ये जराही झोप येत नाही . …

— आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि  नको ते मेसेज फॉरवर्ड करतो …..

—  देवाशीच संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं

माणूस हा सवडीनुसार वागत असतो …! चहात माशी पडली तर चहा फेकून देतो , पण साजूक तूपात माशी पडली तर तो माशी फेकून देतो ..  तूप नाही .. अगदी तसच …आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही न बोलता ती पोटात घालतो, पण जर नावडत्याने केली तर आकांडतांडव करून बोभाटा करतो.  

—  ‘ माझं ‘ म्हणून नाही ” आपलं ” म्हणून जगता आलं पाहिजे …

—  जग खूप ‘ चांगलं ‘ आहे, फक्त चांगलं ” वागता ” आलं पाहिजे …

– सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।

— समुद्र आणि वाळवंट कितीही आथांग असले, तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही 

… देह सर्वांचा सारखाच।

           …… फरक फक्त विचारांचा।

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “संगीतातील शुक्रतारा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “संगीतातील शुक्रतारा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

संगीत, गाणी आणि आपण त्याचे दर्दी यामध्ये एक अनामिक बंध जुळल्या गेलेले असतात. कुठेही,कधीही,कुठल्याही भाषेतील संगीत, गाणी ऐकू आलं की ठेका हा धरलाच जातो. मला आठवतं आम्ही तेव्हा टिव्ही वर प्रादेशिक चित्रपट, प्रादेशिक गाणी,संगीत काही भाषा कळतं नसूनही आवडायची.पण खरं प्रेम ,लायकींग हे आपल्या मातृभाषेतील गाण्यांवर असतं हे ही खरेच.

प्रत्येकाच्या जीवनात आनंद मिळवून  देणाऱ्या गोष्टींपैकी सुमधुर संगीत,गाणी,कविता ह्यांच स्थान पहिल्या काही क्रमांकावरच असतं. सुमधुर संगीत, मनाला जाऊन भिडणारी अर्थपूर्ण गाणी,आशयघन कविता, काव्य हे आपल्या आयुष्यातील अविभाज्य अंगच बनले आहे.

मनाला आनंद मिळवून देणाऱ्या संगीताचे, काव्याचे अनेक प्रकार आहेत. भक्तिगीतं, कविता, भावगीतं, सुगमसंगीत ह्यांच्यामुळे  माणसाच्या जीवनात आलेलं एकटेपणं काही प्रमाणात दूर करण्याची किमया ह्या संगीतात आहे.

काही वेळी काही माणसं अश्या अजरामर कलाकृती घडवून जातात की ह्या कलाकृतीच जणू त्यांच्या नावासारखीच त्यांची ओळख बनवितात. असेच एक अवलिया म्हणजे “शुक्रतारा मंदवारा”वाले अरुणजी दाते. आतुन उत्स्फूर्त निघालेली अवीट गोडीची अर्थपूर्ण प्रेमगीत व भावगीतं ऐकावीत ती अरुणजींच्याच आवाजातील. 2010 पर्यंत “शुक्रतारा मंदवारा” ह्या कार्यक्रमाचे थोडेथोडके नव्हे तर तब्बल 2500 कार्यक्रम झालेत.    

मे महिन्यातील चार,पाच,सहा ह्या तारखा जणू कलाक्षेत्राशी संबंधित तारखा. 4 मे ही तारीख सुप्रसिद्ध गायक अरुणजी दाते ह्यांचा जन्मदिवस, 6 मे हा अरुणजींचा स्मृतीदिन व 5 मे ही तारीख बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे  ह्यांचा स्मृतीदिन.

अरुणजी दाते ह्यांना ओळखत नसलेली व्यक्ती विरळीच. अरुणजी हे सुप्रसिद्ध मराठी भावगीतं गायक. इंदूरचे सुप्रसिद्ध गायक रामुभैय्या दाते हे त्यांचे वडील. ह्यांचा जन्म 4 मे 1934 रोजी इंदूर येथे झाला. सुरवातीला इंदूर जवळील धार येथे कुमार गंधर्वांकडे ह्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. संगीताचे पुढील शिक्षण त्यांनी के.महावीर ह्यांच्याकडे घेतले. खरतरं दाते हे मुंबईत टेक्स्टाईल इंजिनिअर म्हणून नोकरी करीत  पण त्यांना त्यांचा आतला आवाज स्वस्थ बसू देत नव्हता.1955 मध्ये त्यांनी आकाशवाणी ला कार्यक्रम केला.1962 ला त्यांची पहिली ध्वनीमुद्रिका “शुक्रतारा मंदवारा”ह्या नावाने प्रकाशित झाली.खळेकाका ह्यांच्या आग्रहाखातर त्यांनी जाहीर कार्यक्रम घ्यायला सुरवात केली. मंगेश पाडगावकर, यशवंत देव,अरुण दाते ह्या त्रिकुटाने अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक, गायक असे मराठी भावगीतांचे लोकप्रिय कार्यक्रम सादर केलेत.  दातेंनी लता मंगेशकर, आशा भोसले,सुमन कल्याणपूर,कविता कृष्णमुर्ती ,सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल ह्यांच्या बरोबर अनेक लोकप्रिय द्वंद्वगिते गायलीत. त्यांना 2010 साली गजानन वाटवे पुरस्कार व 2016 साली राम कदम कलागौरव पुरस्कार मिळाला. त्यांची दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या गाण्यांपैकी “भातुकलीच्या खेळमधली”,””जपून चाल पोरी जपून चाल”,”स्वरगंगेच्या काठावरती”,”या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे”,”दिवस तुझे हे फुलायचे”,आणि “शुक्रतारा मंदवारा”ही काही सुप्रसिद्ध गाणी.

बीबीसी लंडनमधील स्टुडीयोत अगदी बोटावर मोजता येतील इतकीच  मराठी गाणी गायली गेली आहेत. त्यापैकीच ही दोन गीतं म्हणजे “शुक्रतारा मंदवारा”आणि” भातुकलीच्या खेळामधली”.

अरुणजी ब्रिटनमध्ये शुक्रताराचे कार्यक्रम करत होते. त्याकाळी विमानप्रवास आजच्या इतका सोपा आणि परवडणारा नव्हता. त्यामुळे तबल्यावर अरुणजीचे काका शामुभैया दाते, सूत्रसंचालक सुप्रसिद्ध लेखक व.पु. काळे आणि अरुणजी स्वतः असा ह्या  तिघांनीच कार्यक्रम केला. हार्मोनिअमवाल्याचा खर्च वाचावा म्हणून वपु स्वतः हार्मोनियम शिकले होते, त्यांनी साथ केली. केवळ या दोघांच्या जोडीने ब्रिटनमधील मैफिलीत अरुणजी हजारों श्रोत्यांना कसे मंत्रमुग्ध करतात हे बीबीसीच्या वार्ताहरांनी पाहिल्यावर अरुणजींना बीबीसी स्टुडीयोत आमंत्रित करून त्यांचे ध्वनीमुद्रण झाले.

अरुणजींची सगळीच भावगीतं म्हणजे अक्षरशः मंत्रमुग्ध करुन टाकणारी जणू मास्टरपीसच आहेत.” या जन्मावर या जगण्यावर”, “शुक्रतारा”, “जेव्हा तिची नी माझी” “भातुकलीच्या खेळामधली”, “स्वरगंगेच्या काठावरती”, “दिवस तुझे हे फुलायचे”, “मान वेळावुनी धुंद”, “जपून चाल पोरी जपून चाल”, “डोळे कशासाठी”, “काही बोलायाचे आहे”, “डोळ्यात सांजवेळी”, “सखी शेजारणी,”” धुके दाटलेले उदास उदास”,” भेट तुझी माझी स्मरते”, “सूर मागू तुला मी कसा”, लतादिदिंबरोबरचं संधीकाली ही आणि अशी कितीतरी उल्लेखनीय गीतं अरुणजी दाते ह्यांच नाव घेतल्याबरोबर डोळ्यासमोर येतात,आठवतात, धुंद करतात, तल्लीन करतात.

असं म्हणतात की “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे” ह्या त्यांच्या गीताने कित्येक नैराश्याने ग्रासलेल्या वैफल्यग्रस्त लोकांना आशेचा नवीन किरण सापडून त्यांचे भविष्य अगदी जणू तिमीराकडून तेजाकडे गेले.

परत एकदा ही मंत्रमुग्ध करणारी सगळी गाणी मनात घोळवत,ह्रदयात साठवत अरुणजींना अभिवादन करते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “वाचन माणसाला समृद्ध करते का?” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “वाचन माणसाला समृद्ध करते का?…” ☆ सौ राधिका भांडारकर

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.  एक वाचलेली पुस्तके आणि दोन, भेटलेली माणसे.

वाचन हे चांगलं व्यसन आहे.  ज्यामुळे माणसाचे मानसिक आरोग्य निरामय होऊ शकतं.  ज्या व्यक्तीला वाचनाची आवड असते त्या व्यक्तीचे  आयुष्य कधीही कंटाळवाणे  होऊ शकत नाही.  वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडत नाही.  एकटेपणा जाणवत नाही.  कारण पुस्तक हा असा मित्र आहे की जो आपली संगत कधीही सोडत नाही.  आपल्या सुखदुःखात तो, त्याच आनंदी, मार्गदर्शक चेहऱ्याने,  कळत नकळत सतत आपल्या सोबत असतो. 

एका इंग्रजी लेखकाने म्हटले आहे की,

“BOOKS ARE OUR COMPANIONS… THEY ELEVATE OUR SOULS…  ENLIGHTEN OUR IDEAS… AND ENABLE US TO THE GATES OF HEAVEN”

— कल्पनाशक्ती, ज्ञान आणि शब्दसंग्रह उन्नत करण्याचं एकमेव माध्यम म्हणजे वाचन.  कारण पुस्तके ही माहिती आणि ज्ञानाचा समृद्ध स्त्रोत आहेत. 

वयानुसार आपल्या वाचनाच्या आवडीनिवडी बदलत जातात. लहानपण चांदोबा, गोट्या,फास्टर फेणे, जातक कथा, बिरबलाच्या कथा वाचण्यात रमलं. कुमार वयात, तारुण्यात, नाथ माधव, खांडेकर, फडके यांच्या स्वप्नाळू साहसी, शृंगारिक, वातावरणात आकंठ बुडालो. शांताबाई, तांबे, बालकवी, इंदिरा संत, विंदा, पाडगावकर, यांनी तर कवितेच्या प्रांगणात मनाभोवती विचारांचे, संस्कारांचे  एक सुंदर रिंगणच आखलं.  धारप, मतकरी यांच्या गूढकथांनी तर जीवनापलीकडच्या अफाट, अकल्पित वातावरणात नेऊन सोडलं. ह. ना आपटे यांच्या “पण लक्षात कोण घेतो..” या कादंबरीने तर वैचारिक दृष्टिकोनच रुंदावला. त्यांची यमी आजही डोक्यातून जात नाही. श्रीमान योगी, ययाती, छावा, शिकस्त, पानीपत या कादंबऱ्यांनी इतिहासातला विचार  शिकवला.  आणि पु.लं. बद्दल तर काय बोलावं?  त्या कोट्याधीशाने तर आमच्या मरगळलेल्या जीवनात हास्याची अनंत कारंजी उसळवली.  जीवन कसं जगावं  हे शिकवलं. विसंगतीतून विनोदाची जाण दिली.  व्यक्ती आणि वल्लीच्या माध्यमातून त्यांनी माणसं वाचायला शिकवलं.  लक्ष्मीबाई टिळकांची स्मृती चित्रे …कितीही वेळा वाचा प्रत्येक वेळी निराळा संस्कार घडवतात…..   ही यादी अफाट आहे, न संपणारी आहे. यात अनेक आवडते परदेशी लेखकही आहेत.  साॅमरसेट माॅम,अँटन चेकाव, हँन्स अँडरसन, बर्नाड शाॅ, पर्ल बक,डॅफ्ने डी माॉरीअर,जेफ्री आर्चर,रॉबीन कुक.. असे कितीतरी.  ही सारी मंडळी मनाच्या गाभाऱ्यात चीरतरुण आहेत कारण त्यांच्या लेखनाने आपली वाचन संस्कृती, अभिरुची, अभिव्यक्ती तर विस्तारलीच,  पण जगण्याला एक सकारात्मक दिशा मिळाली. त्यांनी  आशावादही दिला, एक प्रेरणा दिली.  

वाचनाने  आमचे जीवन समृद्ध केले, निरोगी केले, आनंदी केले., कसे?  हे बघा असे.

विंदा म्हणतात,

“वेड्या पिशा ढगाकडून 

वेडे पिसे आकार घ्यावे

रक्तामधल्या प्रश्नांसाठी

पृथ्वीकडून होकार घ्यावे…”

कुसुमाग्रज म्हणतात,

” मोडून पडला संसार 

तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेवून 

फक्त लढ म्हणा…”

शेक्सपियर म्हणतात,

“प्रेम सर्वांवर करा, विश्वास थोड्यांवर ठेवा, पण द्वेष मात्र कोणाचाच करू नका.”

 किंवा,

“सुंदर फुले हळुवारपणे उमलत असतात, तर गवत झपाट्याने उगवते.” 

साने गुरुजींनी सांगितले,

“खरा तो एकची धर्म… जगाला प्रेम अर्पावे..”

हे सारंच विचारांचं  धन आहे.  अनमोल आहे ! अनंत, अफाट आहे आणि हे असं धन आहे की, जगण्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही स्वतःसाठी वापरा, दुसऱ्यांना द्या..  ते कमी होत नाही. वैचारिक धनासाठी डेबिट हे प्रमाणच नाही. ते सदैव तुमच्या क्रेडिट बॅलन्समध्येच राहतं. आणि फक्त आणि फक्त ते वाचनातूनच उपलब्ध असतं . म्हणूनच म्हणतात “वाचाल तर वाचाल”

वाचनाचे अनेक प्रकार असू शकतात. अध्यात्मिक ग्रंथ वाचन, चरित्रात्मक वाचन, कविता, ललित, कथा, कादंबरी,  रहस्यमय ,गूढ,  भयकारी, साहसी,  अद्भुत,  शृंगारिक, विनोदी,  नाट्य,  लोकवाङमय, प्रवास, संगीत, अगदी पाकशास्त्र सुद्धा.  अशा अनेक साहित्याच्या शाखा आहेत. आता तर डिजिटल वाङमयही  भरपूर आहे.  ज्याने त्याने आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार, आवडीनुसार स्वभावानुसार, वाचावे. पण वाचावे.नित्य वाचावे. 

वाचन हे माणसाला नक्कीच घडवतं.  प्रेरणा देतं. कल्पक, सावध ,जागरुक बनवतं. केसरी आणि मराठा वाचून अनेक क्रांतीकारी  निर्माण झाले. सावरकरांच्या कविता वाचताना आजही राष्ट्रभावना धारदार बनते.  

वाचन आणि कुठलीही आवड अथवा छंद याचं एक अदृश्य नातं आहे.  जसं आपण एखादं झाड वाढावं म्हणून खत घालतो आणि मग ते झाड बहरतं. तसेच वाचनाच्या खाद्याने आवडही बहरते. ती अधिक फुलते.  चारी अंगानी ती समृद्ध होत जाते. आवडीला आणि पर्यायाने व्यक्तीमत्वाला आकार येतो. 

मात्र जशा नाण्याला दोन बाजू असतात तशाच वाचनालाही आहेत. संगत  माणसाला घडवते नाही तर बिघडवते. वाचनातून अशी काही धोक्याची वळणं जीवनाला विळखा घालू शकतात.  पण हे व्यक्तीसापेक्ष  आहे.  ज्याचे त्याने  ठरवावे काय वाचावे. या नीरक्षीरतेची रेषा जर वाचकाला ओलांडता आली तर मात्र तो स्वतःची आणि इतरांची जीवनसमृद्धी घडवू शकतो.

कित्येक वेळा जाहिराती, रस्त्यावरच्या पाट्या, भिंतीवर लिहिलेले सुविचार, पानटपरीवरचे लेखन, ट्रकवर लिहिलेली वाक्येही तुम्हाला काहीबाही शिकवतातच. आणि वाचनाची आवड असणारा हे सारं सहजपणे वाचत असतो.आणि या विखुरलेल्या ज्ञानाची फुलेही परडीत गोळा करतो.

मला वयाची पंचाहत्तरी ओलांडली तरी बालवाङमय वाचायला आवडते.  मी आजही  परीकथेत रमते. रापुन्झेल, सिंड्रेला, हिमगौरी मला मैत्रिणी वाटतात. हळूच विचार डोकावतो, माझ्यासारख्या त्या मात्र वृद्ध होणार नाहीत. त्यापेक्षा त्या आहेत म्हणून माझेही शैशव अबाधित आहे. आजही मी बोधकथेत  गुंतते.

भाकरी का करपली?

घोडा का अडला?

चाक का गंजले?— या प्रश्नांना  बिरबलाने एकच उत्तर दिले  ” न फिरविल्याने “. 

हे वैचारिक चातुर्य बालसाहित्य वाचनातून मला आजही मिळतं. 

“तुपात पडली माशी चांदोबा राहिला उपाशी ” ..  या ओळीतला गोडवा माझ्या कष्टी मनाला आजही हसवतो.

बालवयात वाचलेल्या अनेक कविता नवे आशय घेऊन आता उतरतात. आणि पुन्हा पुन्हा मनाला घडवतात.

वाचनाचा हा  प्रवास न संपणारा आहे.  शेवटचा श्वास हेच त्याचे अंतिम स्थानक असणार आहे. बाकी सगळं तुम्ही ठेवून जाणार आहात इथेच.  कारण ते भौतिक आहे. पण वाचन हे आधिभौतिक आहे. पारलौकिक आहे.  हे धन, ही समृद्धी, हे विचारांचे माणिक–मोती,  तुमच्या बरोबर येणार, कारण ते तुमच्या आत्म्याचा भाग आहेत …

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “महानायक”… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “महानायक “… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

” राम ” आणि ” कृष्ण ” हे भारतीय इतिहासातील दोन अतुल्य महानायक आहेत. !! 

एकाने “अयोध्या ते रामेश्वर”, तर दुसऱ्याने “द्वारका ते आसाम” पर्यंतचा भूभाग आपल्या चरित्राद्वारे सांधत गेली हजारो वर्षे या भारतभूमीला संस्कारांच्या अनोख्या बंधनात बांधून ठेवले आहे.!

तसं पाहिलं तर दोघांच्या चरित्रात जन्मापासूनच किती विरोधाभास आहे. एकाचा जन्म रणरणत्या उन्हाळ्यात दुपारी, तर दुसऱ्याचा मुसळधार पावसाळ्यात मध्यरात्री !! 

एकाचा राजमहालात तर दुसऱ्याचा कारागृहात !!

साम्य म्हणावं तर दोघांच्याही हातून पहिले मारल्या गेल्या त्या राक्षसिणी….. त्राटिका आणि पुतना ! 

शबरीची बोरे आणि सुदाम्याचे पोहे त्यांच्या मनमिळाऊ मैत्रीपूर्ण स्वभावाचे उदाहरण म्हणून आजही सांगितले जातात. 

ज्यांच्यामुळे त्यांच्या चरित्राला वेगळे वळण लागले, त्या कैकेयी आणि गांधारी एकाच प्रांतातल्या…ह्या दोघी मातांच्या कटू शब्दांना वंद्य मानत त्यांनी स्वीकारले.!! 

एकाने सुग्रीवाला त्याचे राज्य मिळवून दिले, तर दुसऱ्याने युधिष्ठिराला !

एकाने लोकापवादाखातिर पत्नीचा त्याग केला, तर दुसऱ्याने लोकापवादाची चिंता न बाळगता सोळा सहस्त्र स्त्रियांचा स्वीकार केला.!! 

एकाने पुत्रधर्मासाठी कुटुंबीयांचा त्याग करत वनवास स्वीकारला, तर दुसऱ्याने क्षत्रिय धर्मासाठीच कुटुंबियांवर शस्त्र उगारण्यास देखील गैर मानले नाही.

एकाने जन्मभूमीला स्वर्गासम मानले, तर दुसऱ्याने कर्मभूमीला स्वर्ग बनवले.

एकाने अंगदाकरवी, तर दुसऱ्याने समक्ष शत्रूच्या दरबारी जात, शिष्टाई करत, युद्धहानी टाळण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत केला.

एकाने समुद्र ओलांडून सोन्याची लंकापुरी नष्ट केली, तर दुसऱ्याने समुद्र ओलांडून सोन्याची द्वारकापुरी उभारली.

एकाने झाडामागून बाण मारल्या गेलेल्या वालीच्या मुखातून झालेली निंदा स्वीकारली, तर दुसऱ्याने झाडामागुन बाण मारणाऱ्या व्याधाच्या हातून मृत्यू पत्करला.

एक Theory…. तर…दुसरा Practical !! 

दोन प्रचंड विरोधाभास असलेल्या ह्या व्यक्तीरेखा गेली हजारो वर्षे नाना विविध प्रक्षिप्त कथांचा स्वीकार करत, आपल्या चरित्राच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता, ह्या देशापुढे दीपस्तंभ बनून उभे आहेत आणि इथून पुढे देखील राहील.!!

जय श्रीराम … जय श्रीकृष्ण !!

इदं न मम …… 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 66 – उत्तरार्ध – रामकृष्ण संघाची स्थापना ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 66 – उत्तरार्ध – रामकृष्ण संघाची स्थापना ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

स्वामी विवेकानंद कलकत्त्यात होते, बंगालमध्ये उत्साहाचे वातावरण होते, योगायोगाने श्रीरामकृष्णांचा जन्मदिवस ७ मार्च ला होता. पश्चिमेकडून विवेकानंद नुकतेच आल्यामुळे हा दिवस मोठ्या प्रमाणात दक्षिणेश्वरच्या कालीमंदिरात साजरा करण्यात आला, प्रचंड गर्दी. गुरुबंधु बरोबर विवेकानंद कालीमातेचे दर्शन घेऊन  श्रीरामकृष्णांच्या खोलीकडे वळले, ते ११ वर्षानी या खोलीत पाऊल ठेवत होते. मनात विचारांचा कल्लोळ होता. १६ वर्षांपूर्वी येथे प्रथम आल्यापासून ते आज पर्यन्त गुरु श्रीरामकृष्णांबरोबर चे दिवस, घडलेल्या अनेक घटना, प्रसंग आणि मिळालेली प्रेरणा- ते, हिंदू धर्माची पताका जगात फडकवून मायदेशी परतलेला नरेंद्र आज त्याच खोलीत उभा होता. त्यांच्या डोळ्यांसमोरून या कालावधीचा चित्रपटच सरकून गेला.

या वास्तव्यात विवेकानंद यांना अनेकजण भेटायला येत होते. काही जण फक्त दर्शन घ्यायला येत. काहीजण प्रश्न विचारात, काही संवाद साधत. तर कोणी त्यांचा तत्वज्ञानावरचा अधिकार पारखून घ्यायला येत. एव्हढे सगळे घडत होते मात्र स्वामी विवेकानंद यांना आता खूप शीण झाला होता. थकले होते ते.परदेशातील अखंडपणे चाललेले काम आणि प्रवास ,धावपळ, तर भारतात आल्यावरही आगमनाचे सोहळे, भेटी, आनंद लोकांशी सतत बोलणे यामुळे स्वामीजींची प्रकृती थोडी ढासळली . त्याचा परिणाम म्हणजे मधुमेय विकार जडला. आता त्यांचे सर्व पुढचे कार्यक्रम रद्द केले. आणि केवळ विश्रांति साठी दार्जिलिंग येथे वास्तव्य झाले.   

त्यांना खरे तर विश्रांतीची गरज होती पण डोळ्यासमोरचे ध्येय गप्प बसू देत नव्हते. कडक पथ्यपाणी सांभाळले, शारीरिक विश्रांति मिळाली, पण मेंदूला विश्रांति नव्हतीच, त्यांच्या डोळ्यासमोर ठरवलेले नव्या स्वरूपाचे प्रचंड काम कोणावर सोपवून देणे शक्य नव्हते.

मात्र हिमालयाच्या निसर्गरम्य परिसरात साग, देवदारचे सुमारे दीडशे फुट उंचीचे वृक्ष, खोल दर्‍या, समोर दिसणारी बर्फाच्छादित २५ हजारांहून अधिक उंचीच्या डोंगरांची रांग, २८ हजार फुटांपेक्षा जास्त ऊंच असलेले कांचनगंगा शिखर, वातावरणातील नीरव शांतता, क्षणाक्षणाला बदलणारी आकाशातली लाल निळ्या जांभळ्या रंगांची उधळण, अशा मन उल्हसित आणि प्रसन्न करणार्‍या निसर्गाच्या सान्निध्यात स्वामीजी राहिल्यामुळे त्यांना मन:शान्ती मिळाली, आनंद मिळाला, बदल ही पण एक विश्रांतीच होती. एरव्ही पण आपण सामान्यपणे, “फार विचार करू नकोस, शांत रहा”, असे वाक्य एखाद्या त्रासलेल्याला समजवताना नेहमी म्हणतो. पण ही मनातल्या विचारांची प्रक्रिया थांबवणे शक्य नसते. शिवाय स्वामीजींसारख्या एखाद्या ध्येयाने झपाटलेल्या व्यक्तिला कुणीही थांबवू शकत नाही. त्यात स्वामीजींचे कार्य अजून कार्यान्वित व्हायचे होते. त्याचे चिंतन करण्यात त्यांनी मागची अनेक वर्षे घालवली होती. आता ते काम उभे करण्याची वेळ आली होती.

संस्था! एक नवी संस्था, ब्रम्हानंद आणि इतर दोन गुरुबंधु यांच्या बरोबर स्वामीजी संबंधीत विचार करून तपशील ठरवण्याच्या कामी लागले होते. येथे दार्जिलिंगच्या वास्तव्यात आपल्या संस्थेचे स्वरूप कसे असावे याचा आराखडा केला गेला. युगप्रवर्तक विवेकानंदांना आजच्या काळाला सुसंगत ठरणारी सेवाभावी, ज्ञानतत्पर, समाजहित वर्धक, शिस्त आणि अनुशासन असणारी अशी संन्याशांची संस्था नव्हे, ऑर्गनायझेशन बांधायची होती. त्याची योजना व विचार सतत त्यांच्या डोक्यात होते. ही एक क्रांतीच होती, कारण भारताला संन्यासाची हजारो वर्षांची परंपरा होती. आध्यात्मिक जीवनाचे आणि सर्वसंगपरित्याग करणार्‍या संन्याशाचे स्वरूप विवेकानंद यांना बदलून टाकायचे होते.

दार्जिलिंगहून १ मे १८९७ रोजी स्वामीजी कलकत्त्याला आले. तेथे त्यांनी श्रीरामकृष्णांचे संन्यासी शिष्य आणि गृहस्थाश्रमी भक्त यांची बैठक बोलवून संस्था उभी करण्याचा विचार सांगितला. पाश्चात्य देशातील संस्थांची माहिती व रचना सांगितली. आपण सर्व ज्यांच्या प्रेरणेने हे काम करीत आहोत त्या श्रीरामकृष्णांचे नाव संस्थेला असावे असा विचार मांडला. श्रीरामकृष्ण यांच्या महासमाधीला दहा वर्षे होऊन गेली होती. या काम करणार्‍या संस्थेचे नाव रामकृष्ण मिशन असे ठेवावे, आपण सारे याचे अनुयायी आहोत. हा त्यांचा विचार एकमताने सर्वांनी संमत केला.

पुढे संस्थेचे उद्दिष्ट्य, ध्येयधोरण ठरविण्यात आले.आवश्यक ते ठराव करण्यात आले, श्री रामकृष्णांनी आपल्या जीवनात ज्या मूल्यांचे आचरण केले, आणि मानव जातीच्या भौतिक आणि आध्यात्मिक कल्याणचा जो मार्ग दाखविला त्याचा प्रसार करणे हे संस्थेचे मुख्य ध्येय निश्चित करण्यात आले. संस्थेचे ध्येय व कार्यपद्धती आणि व्याप्ती निश्चित केल्यावर पदाधिकारी निवडण्यात आले. विवेकानंद,रामकृष्ण संघाचे पहिले अध्यक्ष निवडले गेले.आध्यात्मिक पायावर उभी असलेली एवभावी आणस्था म्हणून १९०९ मध्ये रीतसर कायद्याने नोंदणी केली गेली. विश्वस्त मंडळ स्थापन झाले. खूप काम वाढले, शाखा वाढल्या, शिक्षण, रुग्णसेवा ही कामे वाढली, १२ वर्षे काळ लोटला. आता थोडी रचना बदलण्यात आली. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारी ती ‘रामकृष्ण मठ’ आणि सेवाकार्य करणारी ती संस्था ‘रामकृष्ण मिशन’ अशी विभागणी झाली. या कामात तरुण संन्याशी बघून अनेक तरुण या कामाकडे आकर्षित होत होते, पण अजूनही तरुण कार्यकर्ते संन्यासी कामात येणे आवश्यक होते. नवे तरुण स्वामीजी घडवत होते. या संस्थेतील संन्याशाचा धर्म, आचरण, दिनचर्या, नियम, ध्यान धारणा, व्यायाम,शास्त्र ग्रंथाचे वाचन, त्या ग्रंथाचे रोज परीक्षण समाजवून सांगणे, तंबाखू किंवा कुठलाही मादक पदार्थ मठात आणू नये. अशा नियमांची सूची व बंधने घालण्यात आली. त्या शिवाय प्रार्थना, वर्षिक उत्सव, विविध कार्यक्रमांची योजना ,अशा सर्व नियमांची आजही काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते.     

स्वामी विवेकानंद यांच्या या संस्थेचे बोधवाक्य होते

|| ‘आत्मनो मोक्षार्थ जगद्धिताय च’ ||

आज शंभर वर्षे  आणि वर १४ वर्षे अशी ११४ वर्षे हे काम अखंडपणे सुरू आहे.  

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ अक्कलखातं – खूप मोठं – लेखक : डॉ शिरीष भावे ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

??

☆ अक्कलखातं – खूप मोठं – लेखक : डॉ शिरीष भावे ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

इयत्ता सहावीत असताना एके दिवशी मुख्याध्यापक वर्गात आले. “आज मधल्या सुट्टीत सगळ्यांनी शाळेच्या सभागृहात जमा. तुम्हाला आत्तापासून बचतीची सवय लागावी म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रचे दोन प्रतिनिधी तुम्हाला भेटायला येणार आहेत. नीट ऐकून घ्या ते काय सांगतात ते.”

बँकेचे प्रतिनिधी ठरल्याप्रमाणे आले. त्यांनी लहान मुलांसाठी अल्पबचत योजना म्हणजे काय, त्याचे फायदे वगैरे समजावून सांगितलं. वर्गातल्या माझ्यासकट बहुतेक सगळ्या मुलांनी त्या पुढच्या आठवड्यात आपली बचत खाती उघडली.

त्यानंतरच्या सहा महिन्यात खाऊचे पैसे, कुणी वाढदिवसाला दिलेली भेट या स्वरूपात जमा झालेली रक्कम त्या खात्यात मी भरत राहिलो. माझ्या हिशेबाने खात्यामध्ये 127 रुपये जमा असायला हवे होते. पण प्रत्यक्षात होते 125. लेखनिकाकडे त्या दोन रुपयाबद्दल विचारले असता तो म्हणाला,” नोंदीमध्ये काहीतरी चूक झाली असावी. दोनच तर रुपये कमी आहेत. जाऊ दे.विसरून जा. अक्कलखाती जमा करून टाक ” मला वाटलं बचत खात्याला संलग्न अशा विशेष अक्कलखात्याची सोय पण बँक देते. मी भाबडेपणे विचारलं,” त्या अक्कलखात्यावर किती व्याज देतात” माझा प्रश्न आजूबाजूच्या अनेकांनी ऐकला असावा कारण बँकेत हास्याची एकच लाट उसळली. लेखनिकाची विनोदबुद्धी कुशाग्र होती. तो म्हणाला, “अरे गेले ते. अक्कलखाती जमा म्हणजे झाला तुझा मामा!”

अक्कलखात्याची झालेली माझी ती आयुष्यातली पहिली ओळख. नंतरच्या आयुष्यात या खात्यातली जमा उत्तरोत्तर वाढतच गेली. रेल्वेचे तिकीट वेळेवर रद्द केलं नाही म्हणून झालेलं नुकसान, सहल आयत्यावेळी रद्द झाल्यामुळे हॉटेल बुकिंगमधील बरेचसे पैसे कापून मिळालेला परतावा, शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीत खाल्लेली आपटी, आदल्याच दिवशी नियम बदलल्यामुळे जागेच्या नोंदणी शुल्कामधे झालेली 2 टक्क्यांची भरघोस वाढ वगैरे वगैरे अनेक. सर्व काही अक्कलखाती जमा केलं म्हणून डोकं शाबूत राहीलं.

अक्कलखातं आपल्याला खूप काही शिकवून जातं. विसरणं अथवा विस्मरण हे मानव जातीला मिळालेलं वरदान आहे ही पहिली शिकवण. झालेलं नुकसान वेळीच अक्कलखाती जमा केलं नाही तर फक्त मनस्ताप नशिबी असतो. अतिशय दयाळू असलेलं हे खातं आपल्या पोटात पैशांबरोबर वस्तूंनाही सामावून घेतं. पेनं, रुमाल आणि छत्र्या मी किती अक्कलखाती जमा केल्या असतील याची काही ददातच नाही. ह्या तीनही वस्तूंचे उद्योगधंदे केवळ मानवी स्वभावाच्या विसरणे आणि हरवणे ह्या दोन गुणधर्मांवर जिवंत आहेत.

अक्कलखात्याची व्यापकता विस्तृत असते. आपल्या देशाचं अक्कलखातं तर इतकं मोठं आहे की त्यात इंग्रजांनी केलेली लूट आणि स्वातंत्र्यानंतर जमा झालेली पुंजी एकत्र केली तर आपल्या इतक्याच मोठ्या दुसऱ्या देशाची अर्थव्यवस्था आरामात चालवता येईल. पडलेले पूल, खणलेले रस्ते, आधी बांधून मग पाडून पुन्हा बांधलेले उड्डाणपूल, कागदावर उमटलेल्या आणि खर्च होऊनही प्रत्यक्षात उभ्या न राहिलेल्या असंख्य सरकारी आणि खाजगी योजना …. सर्व काही वर्षानुवर्ष अक्कलखाती जमा. देशाच्या अर्थसंकल्पात त्याची कुठेही नोंद नाही.आपल्या देशबांधवांच्या उदार आणि सहनशील मनाचं सर्वात मोठं प्रतिक.

लहानपणी खेळात पहिला डाव हरला की आम्ही म्हणत असू,” हा डाव देवाला”. गेली दीड-दोन वर्ष जागतिक महामारीमुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट लक्षात घेता अख्ख्या जगालाच” ही दोन वर्ष देवाला” असं म्हणून अक्कलखाती जमा करावी लागणार.

अक्कलखातं जसं आर्थिक आणि वस्तुरूपदृष्ट्या मोठं असावं लागतं, तसंच भावनांचं अक्कलखातं सहिष्णू असल्याशिवाय आयुष्यात तग धरणं अवघड. शाळा-कॉलेजमध्ये शिक्षकांकडून झालेली कानउघडणी आणि कधी कधी अपमानसुद्धा, भरवशाच्या व्यक्तीकडून झालेली फसवणूक, सामाजिक आणि व्यक्तिगत व्यवहारांमध्ये उडालेले खटके, ओढवलेले दुर्दैवी प्रसंग या सर्वांमधून वेळोवेळी होणारा मानसिक कल्लोळ पचवण्यासाठी भावनिक अक्कलखातं बक्कळ मोठं असावं लागतं. “जाऊ दे, विसरून जा” हे अक्कलखात्याच्या बँकेचं ब्रीदवाक्य आहे.

मागच्या आठवड्यातली गोष्ट. शेअर बाजारात पूर्वी जबरदस्त घाटा सहन केल्यामुळे मी डिमॅट अकाउंट बंद करून टाकलं होतं. एक शेअरमहर्षी सद्हेतूने मला भेटायला आला. डिमॅट अकाउंट पुन्हा उघडून देतो म्हणाला. त्याची थोडी गंमत करावी असा खट्याळ विचार मनात आला. ह्या मार्गाने पुन्हा जायचं नाही असा मी कानाला खडा लावला असल्याने त्याला म्हणालो,” जा, तुझ्या बँकेला विचारून ये. डिमॅट खात्याला जोडून एक अक्कलखातं पण देता का?  देत असतील आणि त्यावर चांगलं व्याज मिळत असेल तर लगेच उघडू.” इंग्रजी भाषेत शिकलेल्या त्या भिडूला “अक्कलखातं” ही संज्ञा माहित असण्याची अजिबात शक्यता नव्हती. निष्पापपणे तो म्हणाला,” चौकशी करतो सर”. नंतर परत त्याचा फोन आला नाही

वर्षातून एकदा मी अक्कलखात्याचं पासबुक मनातच भरतो. स्वतः वेळोवेळी प्रदर्शित केलेल्या अक्कलशून्यतेवर हसून विलक्षण मनोरंजन करून घेण्याचा तो खात्रीशीर मार्ग आहे. स्वतःवर हसलं की खूप मोकळं वाटतं मला. बचत खातं बंद करावं एक वेळ पण अक्कलखातं कधीच नको.

लेखक : डॉ शिरीष भावे

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “जागतिक हास्य दिन…” ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

अल्प परिचय

इतिहास, दुर्ग अभ्यासक, दरमहा गडकोट भटकंती. निसर्ग विषयक विपुल लेखन. अनेक मराठी ग्रंथाचे समिक्षण.

? विविधा ?

☆ “जागतिक हास्य दिन…” ☆ श्री कचरू चांभारे ☆

मे महिन्याचा पहिला रविवार जागतिक हास्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

जीवंत राहण्यासाठी आवश्यक ती  धडपड करण्याची शक्ती प्रत्येक सजीवास नैसर्गिकरित्याच लाभलेली आहे.भूक ,भय,तृप्ती या सजीवाच्या प्राथमिक भावना आहेत.सजीव  सृष्टीमध्ये मानव हा प्रचंड संकरित प्राणी  आहे.बुद्धीवादाच्या काही पैलूंनी संशोधनाचे नवीन   आयाम मांडले व मानवी जीवनात आमुलाग्र बदल झाला.इतर प्राणी व मानव यांची तुलना केली तर अनेक वैशिष्ट्यपूर्ण देणाग्यांमुळे मानव इतरांपेक्षा खूप वेगळा ठरला आहे.हास्य ही अशीच एक मानवाला लाभलेली अप्रतिम देणगी आहे.सूक्ष्मपणे विचार केला तर हास्य ही स्वतंत्र भावना नाही ,हास्य हे आनंदाचे ,समाधानाचे प्रगटीकरण आहे.हसणं , नाचणं ,रडणं हे तीनही भावाविष्कार मानवासाठी अप्रतिम गॉडगिफ्ट आहे.पण लाज नावाची आणखी एक भावना मानवास मिळालेली आहे.ही लाज नेहमीच हसणं ,रडणं व नाचणं यांचा कोंडमारा करत आली आहे.वाढत्या वयाप्रमाणे माणसाची सामाजिक समज अधिक प्रगल्भ होत जाते ,अन् माणूस वरील तीनही प्रकारच्या भावना प्रगटीकरणाला स्वतःच लगाम घालतो.

हसणं ही नैसर्गिक भावना आहे.ज्याच्या आयुष्यात हास्य आहे तो आनंदी ,उत्साही अन् प्रेमळही असतो.आनंद शोधणं ही एक कला आहे.ज्याला आनंद शोधता येतो,हास्य त्याची आनंदाने गुलामी करतं.कशातही आनंद शोधणारास हास्याचे झरे सापडतात.ज्याला हास्य सापडतं ,ती व्यक्ती प्रभावशाली असते.हास्य हा आपला अविभाज्य घटक असला तरी ज्याने हा घटक अधिक विकसित केला आहे त्यालाच त्याचा मनमुराद आनंद घेता येतो.आज गतिमान आयुष्यात निवांतपणा हरवून गेला आहे.मानवी सहजीवनाची सहजता गुंतागुंतीची झाली आहे.ताणतणाव व दगदग यां सोबत मैत्री करून माणूस आपला सूर्योदय-सूर्यास्त मोजत आहे.हास्य ही फक्त भावनाच आहे असे नाही तर ते एक प्रभावी औषध आहे.दहा मिनिटाच्या व्यायामाने हृदयाचा जेवढा व्यायाम होतो,तेवढाच व्यायाम एक मिनिटाच्या प्रसन्न हसण्याने होतो.हसल्यामुळे शरीरात सेटोटेटीन हे आनंदाचे हार्मोन्स तयार होतात.त्यामुळे भूक कमी लागते.’तुला पाहून मन भरलं ‘.असं जे आपण व्यवहारात बोलतो ना त्याचं मूळ इथं आहे.हसण्यामुळे एंडोर्फिस हे हार्मोन्स सुद्धा निर्माण होते.या हार्मोन्समुळे मनात फील गुडची भावना तयार होते.त्यामुळे दुःखावर हलकी फुंकर राज्य करते.

हास्याचेही अनेक प्रकार पडतात.स्मित हास्य हे सर्वश्रेष्ठ हास्य आहे.जिथं ओळख आहे ,तिथेच ते निर्माण होते.ओळखीच्या व्यक्तीच्या नजरानजरीची ओळख पटली की हृदय त्या ओळखीचा पुरावा स्वीकारते व चेह-यावर मंद प्रसन्न स्मित झळकते.स्मित हास्यात चेह-यावरचे स्नायू फार प्रसरण पावत नसले तरी अंतरीच्या खोलातून आलेली प्रसन्नता संपूर्ण चेह-यावर पसरते.हास्य हा कबुली जबाबाचा करारनामा म्हणून सुद्धा काम करते.एखाद्याची गोष्ट पटली तर हसून दाद दिल्यास ,दोन्ही पक्ष खूश होतात.गडगडाटी हास्य हा हास्याचा प्रकार सगळ्यांचच लक्ष वेधून घेतो पण पाहणारांची नाराजी झाल्यास ,हसणाराच्या मनात अपराधीभाव येतो.हसून काय पाप केलं ? याच्या उत्तरात तो गुंतून जातो.विनोदाला दाद हे ही हास्याचे एक रूप आहे.हास्याचे सगळेच प्रकार आनंद व्यक्त करणारे असतात.पण याला अपवाद आहे तो कुत्सित किंवा छद्मी हास्याचा.हास्याच्या प्रकारात कुत्सित हास्य हा अतिशय निकृष्ट प्रकार आहे.एकवेळ हास्य थांबलं तरी चालेल ,पण कुत्सित हास्याचा उगम कोठेच होऊ नये.हास्य ही माणसाला मिळालेली देणगी असली तरी आज आपल्यावर हास्य क्लब निर्माण करण्याची वेळ आली आहे.ही घटना म्हणजे नैसर्गिकतेचा अभाव अन् कृत्रिमतेचा प्रभाव सांगणारी आहे.

हास्य हे एक जादूई रसायन आहे.माधुरी दिक्षित  नेने झाली.हळुहळू पन्नाशीत गेली. तरी तिचं हसणं फिल्म इंडस्ट्रीतलं भूरळ आहे.पुढे हाच हास्य वारसा मुक्ता बर्वे ,अमृता खानविलकर या मराठी तारकांनी जपला आहे.हसताना गालावर पडली ,की ती खळी कितीतरी जणांसाठी वरदानच ठरते.लहान मुलांचं हसणं अतिशय लोभस अन् गोंडस.हसरं मूल दिसलं की त्याला उचलून घेण्याचा मोह आवरतच नाही.हसताना उघडलेल्या मुखात,सरळ दिसणारी दंतपंक्ती ,केसांची हालचाल हास्याचे सौंदर्य अधिकच खुलविते.हसण्याचं ठिकाण बदललं की त्याप्रमाणे भावही बदलत जातात.लहानमुलांसोबतच्या हास्यात दुःख विरघळविण्याची क्षमता असते.आई वडीलांसोबत हसताना विश्वास वाढतो.बायकोसोबत हसताना अनेक संमिश्र भावाच्या छटा असतात.कारण ती जबाबदार आयुष्याची भागीदार असते.ही जबाबदारी समर्थपणे पेलताना प्रतिपूर्तीचे अनेक क्षण हास्य जन्माला घालतात.मित्रा मित्रातले हास्याचे फवारे मानवी जगतापासून दूर गेलेल्या दुनियेतले असतात.तिथे फक्त मैत्री हीच दुनियादारी असते.प्रिय व्यक्तीच्या हसण्याचा आवाज ऐकण्याची आतुरता व त्याचं नेहमीचं चिरपरिचित हसणं ऐकून होणारी तृप्तता ; हे हास्य मात्र अवर्णनीय तृप्ती देणारं असतं.त्या हास्यासाठी दोन्ही मने सारखीच वेडावलेली असतात.

मानवानं या देणगीचं मोल समजून घ्यायलाच हवं.हसरी व्यक्ती नेहमीच त्याच्या उपस्थितीची दखल घ्यायला लावत असते.नव्हे नव्हे ,अशा व्यक्तीची दखल घेणं इतरांनाच खूप आवडत असतं.हसा आणि हसवा हा मार्ग दीर्घायुषी रस्त्याला समांतरपणे धावत असतो.म्हणून हसा ,हसत राहा,हसवत राहा.

जागतिक हास्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

© श्री कचरू चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “असाही एक उपास…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “असाही एक उपास…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

तारीख होती 2 मे. त्यामुळे बहुतेक सगळ्या वर्तमानपत्रांना सुट्टी होती. मग मनात विचार आला आपणही सुट्टी घेऊन बघूया कां ? मग ठरवलं आजच्या दिवशी लिखाणाला सुट्टी. आता कुणी ह्याला आळस म्हणू शकता किंवा कुणी रोजच्या रुटीन मध्ये केलेला हलकासा बदल. आज सोशलमिडीया मग व्हाटस्अँप वा फेसबुक ह्यावर पोस्ट लिहायला सुट्टी, त्यामुळे काल ह्यावर इतरांनी लिहीलेल्या  पोस्ट चं भरभरून वाचन केले. मस्त आलेल्या आँडीओ,व्हिडीओ क्लिप्स चा मस्त आस्वाद घेतला. काल सगळ्यांचे आलेले गुडमाँर्निंग वाफाळत्या आलं,गवतीचहा टाकून केलेल्या वाफाळत्या चहाबरोबर आस्वाद घेतला. काल अगदी समरसून ह्याचा स्वाद घेतांना जिभेवर स्वाद घोळवत तोंडून आपोआप उस्फुर्तपणे निघालं ,”वाह आज”.

काल मनोमन एक उपास करायचं ठरविले होते,खरतरं माझ्यासाठी अशक्यप्राय वाटणारा उपास होता,पण स्वतःवर श्रद्धा असली की उपास पण सहज निभावता येतो ही खात्री पटली.

त्यामुळे कालचा दिवस कुणालाही कोणतीही पोस्ट न पाठवणे ह्या निश्चयाने सुफळ संपूर्ण झाला. ह्याचा फायदा म्हणजे काल भरपूर वाचन करता आलं. आणि भरपूर लोकांनी पोस्ट नसल्याची दखल घेऊन मेसेजेस केले.त्यांच काळजी करणं,पोस्टची ओढ ही मला नक्कीच सुखावून गेली.असो

कालच्या सुट्टी मुळे असे सुखद अनुभव आले. ह्या सगळ्यांचे धन्यवाद मानून औपचारिकता दर्शविणार नाही आणि त्यांना परकंही करणार नाही.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares