मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ..आणि पदार्थ वाफाळू लागला भाग -1… शेफ शंकर विष्णू मनोहर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ ..आणि पदार्थ वाफाळू लागला भाग -1… शेफ शंकर विष्णू मनोहर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

एकीकडे रेसिपी सांभाळून, सगळं कसं छान आहे असंच शूटिंगच्या वेळी चेहऱ्यावर दाखवणारा शेफ एक उत्तम अभिनेताही असतो. भटारखाना म्हणजे ‘दृष्टीआड सृष्टी’ असते, ती म्हण रेसिपी शोज्ना तंतोतंत लागू पडते!  तिथे वेळ पडली तर काय काय करावं लागतं, हे सांगताहेत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर.

कोणत्याही भटारखान्यात डोकावून बघू नये.. दृष्टिआड सृष्टीच ठीक , असं म्हणतात पण ते काही फारसं खरं नाही. निदान माझ्याबाबतीत तर नाहीच नाही..माझ्या म्हणजे आमच्या ‘विष्णुजी की रसोई’ बाबतीत.. या ‘रसोई’च्या भटारखान्यात कोणीही जावं..खाण्याची इच्छा मरणार नाही तर तिथला खमंग दरवळ नक्कीच जठराग्नी प्रदीप्त करील!..रसोईचं ओपन किचन असतं..म्हणजे दृष्टी समोरच सृष्टी म्हणायला हरकत नाही! पण ही ‘दृष्टी आड सृष्टी’ असते ना ती म्हण रेसिपी शोज् ना तंतोतंत लागू पडते! तिथे वेळ पडली तर काय-काय करावं लागतं हे नंतर आठवलं तरी आमचं आम्हालाच आश्चर्य वाटतं!

गंमत म्हणून एक आठवण सांगतो, एका हिंदी सिनेमाच्या सेटवर गेलो होतो. मस्त झाडं-नदी वगरेचा सेट लावला होता. नदीत पाणीही होतं. शॉट ओके झाला. हिरो-हिरॉईन निघून गेले आणि मग मी माझ्या दिग्दर्शक मित्राबरोबर बोलत होतो. त्यालाही कोणी तरी बोलावलं म्हणून तोही गेला. इतक्या वेळ गजबजलेला सेट एकदम रिकामा झाला. तो सेट जवळून बघू या म्हणून मी गेलो, एका झाडाला हात लावला आणि ते झाड धाडकन खाली पडलं. माझं चांगलंच धाबं दणाणलं पण त्या सेटवाल्यांना स्वयं असावी. सेटवाला आला त्यानं खिळे वगरे ठोकून दोन मिनिटांत परत ते झाड होतं तसं उभं केलं. तेव्हा मला कुठे माहिती होतं की पुढे हे असं ‘चिटिंग’ आपल्यालाही करायचं आहे ते!

माझा पहिला अनुभव होता तो ‘क्रिम’ करण्याचा. सेटवर खूप लाइट्स, कॅमेरे असतात यामुळे वातावरणात उष्णता भरून राहिलेली असते. अशा वेळी एखाद्या पदार्थात जर क्रीमचा वापरायची वेळ आली तर ते वितळून जातं. मग प्रेक्षकांना दाखवणार काय? मग मी नकली क्रीम करायला शिकलो ते मदा, दूध, कॉर्नस्टार्च आणि तेलाचा वापर करून. पण एकदा तर क्रीम करण्यासाठी हे पदार्थच नव्हते. शूट झाल्यावर पुन्हा फोटोशूटही करायचं होतं म्हणजे क्रीमचा परिणाम फक्त शूटिंगपुरता साधला जाऊन उपयोगाचा नव्हता. आमचा फोटोग्राफर इतका हुशार निघाला की त्यानं क्रीम म्हणून चक्क फेव्हिकॉलचा वापर केला.

जाहिरातीमध्ये किंवा रेसिपी शोमध्ये छान वाफाळता पदार्थ दाखवतात. एकदा केलेला पदार्थ शॉट होईपर्यंत कसा वाफाळता राहील? मग त्यासाठी एक खास तंत्र असतं. टेबलावर मांडलेले पदार्थ असतील तर त्यात कापूस जळत ठेवतात किंवा एखाद्या पदार्थामध्ये कापसाचा जळता बोळा टाकतात. तुम्ही इडली किंवा वडा-सांबारची जाहिरात बघता ना त्या कशा मस्त फुगलेल्या वाफाळत्या असतात. त्या दोन इडल्यांमागे कापसाचा बोळा जळत असतो. पदार्थावर चकचकीतपणा आणण्यासाठी त्यावर ग्लिसरिन टाकतात. तांदळाची जाहिरात दाखवताना छान दाणेदार भात दाखवतात किंवा मग त्यांच्या भाज्या छान हिरव्यागार दिसतात..कोणत्याही गृहिणीला असा भात कसा करायचा? किंवा अशी हिरवीगार भाजी कशी ठेवायची, हा प्रश्न पडल्यावाचून राहत नसेल. पण या भात किंवा भाज्या पूर्ण शिजवलेल्या नसतात तर फक्त उकळत्या पाण्यात घालून बाहेर काढतात.

अशा अनेक गमतीजमती आमचा कार्यक्रम ‘मेजवानी’च्या शूटिंगच्या वेळीही घडतात. सेट लागलेला असतो, चार-चार कॅमेरा सेटअप असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसाला तीन/चार कधी कधी पाच एपिसोड पूर्ण करायचंही बंधन असतं. त्यामुळे सगळ्यांनाच खूप घाई असते. काय सामान हवंय याची मी आधीच यादी दिलेली असते. रेसिपी सांगितलेल्या असतात. तरीही आयत्या वेळी व्हायचा तो घोळ होतोच. चवीपुरतं मीठ घालू, असं मी बोलतो पण लक्षात येतं की तिथे मीठ ठेवलेलंच नाही. कॅमेरा तर ऑन आहे. आता जर शूट थांबवलं तर अर्धा तास वाया जाणार म्हणून मग मी काही तरी बोलत क्षण-दोन क्षण घालवतो आणि तितक्या वेळात त्या ओटय़ावर काय-काय पदार्थ आहेत त्यावर नजर टाकतो आणि मग मदा, तांदळाची पिठी जे काही हाती लागेल ते मीठ म्हणून घालतो. चाट मसाला, धणे-जिरे पावडर, तेल, तूप या पैकी कोणत्याही गोष्टी बाबत हे असं ‘चिट’ करावं लागतं. कधी कधी रेसिपी करताना ही ‘चिट’ करावं लागतं. दुधाची रबडी दाखवायची असेल तर दूध आटेपर्यंत थांबण्याइतका वेळ नसतो. मग दुधाला उकळी आली की भाजलेली कणिक दुधात भिजवून ती पेस्ट दुधाला लावतो. लगेच दूध रबडीसारखं दाट दिसू लागतं. थोडय़ा  वेळात खास शूटिंगसाठीची रबडी तयार! आता ही रेसिपी वाचून घरी प्रयोग करू नका! घरी करताना दूध आटवूनच रबडी किंवा बासुंदी करा.

एकदा हिरव्यागार मिरच्या फोडणीला टाकण्याचा शॉट होता. मी तेलात मिरच्या टाकल्या आणि जो खखाणा उठला त्यानं मला चांगलाच ठसका लागला. शॉट वाया गेला.  पुन्हा तेच घडलं. शेवटी मी लाँग शॉट घ्या म्हणून सुचवलं. पण दिग्दर्शकाला शॉटमध्ये धूरही हवा होता आणि मीही हवा होतो. आता हे दोन्ही साधायचं तर काही तरी युक्ती करायलाच हवी होती. मग सिमला मिरची बारीक चिरून घेतली. बियांसकट ती बारीक चिरलेली सिमला मिरची घातली. त्यामुळे दिग्र्शकाला हवा तसा शॉट मिळाला आणि मला ठसकाही आला नाही. ग्रेव्ही किंवा रश्शाला तेल सुटलेले दाखवण्यासाठी माझी नेहमीची युक्ती म्हणजे तेलात लाल तिखट कालवून, एक उकळी आली की ते वरून घालायचं! मस्त तेलाचा तवंग येतो.

कोणताही शेफ हा वैज्ञानिक आणि तंत्रज्ञसुद्धा असतो! तंत्रज्ञ कारण तो अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं सहजी हाताळतो आणि वैज्ञानिक कारण त्याला पदार्थाच्या रसायनाच्या अनेक युक्त्या माहिती असतात. तुम्हाला माहितेय का की बिटाच्या रसात हळद घातली की केशरी रंग येतो ते! अनेक शेफ ही युक्ती अनेकदा वापरतात. अशा अजूनही युक्त्या आहेत.. बिटाच्या रसात काजूची पेस्ट मिसळा, जांभळा रंग तयार! सोडय़ात हळद मिसळली की लाल रंग येतो. पदार्थाला छान रंग येण्यासाठी शूटिंगच्या वेळी कृत्रिम रंग सर्रास वापरले जातात. पण नंतर चॅनलनं कृत्रिम रंग वापरण्यावर बंदी आणली. माझ्या एका पदार्थासाठी केशराचा रंग हवा होता. आता चांगल्या प्रतीचं केशर आणता येईलच असं नाही. मग मी काही प्रयोग करून बघितले आणि त्यातला यशस्वी झालेला प्रयोग म्हणजे हळदीच्या पाण्यात लिंबू पिळून ते उकळलं आणि त्याचा अगदी केशरासारखा रंग आला. लिंबाचा विषय निघालाच आहे म्हणून एक गंमत आठवली. एकदा एका रेसिपीच्या वेळी मी वरून लिंबू पिळा असं म्हटलं आणि लिंबू पिळू लागलो तो पिळलंच जाईना. ते लिंबू कच्चं होतं. मग मी काय केलं त्या लिंबाच्या अर्ध्या भागावर पाणी घातलं आणि पिळल्याची अ‍ॅक्टिंग केली.. वेळ साधली गेली.

– क्रमशः भाग पहिला

लेखक : शेफ विष्णू मनोहर

संग्रहिका  : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ती चक्रधर आयुष्याच्या रथाची….! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

अल्प परिचय 

अभिनव विद्यालय हायस्कूल,मराठी माध्यम, कर्वे रस्ता,पुणे या शाळेत मराठी,इंग्रजी हे विषय शिकवतो. पूर्ण वेळ शाळा आणि उर्वरित वेळेत थोडेसे सामाजिक काम आणि लेखन असा दिनक्रम असतो.

? इंद्रधनुष्य ?

☆ “ती चक्रधर आयुष्याच्या रथाची….!” ☆ श्री संभाजी बबन गायके 

आयुष्य संपवण्याचा निश्चय केलेला तो.. तरूण शेतकरी गडी.. आणि त्याचे आयुष्य वाचवण्यासाठी कंबर कसून लढायला उभी असलेली ती!

त्याच्या शरीरात विष पसरत जाण्याचा वेग त्याच्या दवाखान्यात आणल्या जाण्याच्या वेगापेक्षा जास्त होता. त्याच्या खेड्यातल्या घरातून, खाच खळगे असलेल्या वाटेवरून या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याला आणायला झालेला उशीर त्याच्या जीवावर बेतू पाहतो आहे. अशाच एका खेड्यातून जिद्दीने शिकून, वैद्यकीय अभ्यासाचं शिवधनुष्य पेलून डॉक्टर झालेली ती…  दुपार ते रात्र अशा सेकंड शिफ्ट ड्युटीवर तैनात आहे. आणि हो, पाच महिन्यांची गर्भार सुद्धा ! खूप काळजी घ्यावी लागते पोटातल्या जीवाची. मानसिक ताण नको, जोराच्या हालचाली नको आणि धक्के बसतील असा प्रवास तर नकोच नको !

विष प्राशन करण्याचे भलते पाऊल उचलणाऱ्या त्या तरुणाचा देह आता तिच्या टेबलवर आहे. त्याची पत्नी आलीये त्याला घेऊन कशीबशी. तिने बहुदा आशा तशी सोडलीच आहे आणि त्याला तरी कुठे जगायचे होते?

नाशिकच्या ग्रामीण भागात असलेल्या म्हाळसाकोरे या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या सोयी त्याचा जीव वाचविण्याच्या कामात तशा अपुऱ्या पडतील, हे ड्यूटीवर असलेल्या तिला उमगले लगेच. त्याला प्राथमिक उपचार आणि त्याच्या बायकोला धीर देऊन तिने त्वरित निर्णय घेतला!

रुग्ण वेगाने आधुनिक सुविधा असलेल्या निफाडच्या रुग्णालयात पोहोचवता आला तर जीव वाचण्याची शक्यता अधिक! रुग्णवाहिका होती दारात, पण चालक रजेवर असल्याने उपलब्ध नव्हता आणि दुसरा चालक किंवा वाहन मिळवण्यात वेळ लागला असता. रात्रीचे आठ-साडे आठ वाजलेत. रुग्णालय पंधरा किलोमीटर्सच्या अंतरावर. इतर वाहनाने रुग्ण हलवणे जिकिरीचे आणि धोक्याचे होतेच.

तिला चार चाकी स्वयंचलित वाहन हाकता येत होतं, परवानाही होताच. पण रुग्णवाहिका कधीच नव्हती चालवलेली. हो, रूग्णालयाच्या मोकळ्या आवारात काहीवेळा रुग्णवाहिका चालवून थोडा हात साफ करून घेतला होता. तो साफ हात आता उपयोगात आणण्याची वेळ आली होती.

तिने पटकन सूचना दिल्या… आरोग्यसेवकाला सोबत घेतले. रूग्ण वाहनात घेतला आणि ती चक्रधर बनली ! पोटातलं बाळ सुध्दा जीव मुठीत धरून बसलं असावं. तिने स्टार्टर मारला… सायरनचा कान पिळताच त्याने आवाज घुमवायला आरंभ केला.

चार चाकं तिच्या हातातल्या चाकाच्या इशाऱ्यावर डावी उजवी, हळू, वेगात अशा खेळात रमली. सुदैवाने रस्ता उत्तम स्थितीत होता. जे असतील ते खड्डे आज तिला पाहून काहीसे उथळही झाले असावेत…. डॉक्टर रुग्णवाहिका चालवताहेत…. हे त्या खड्ड्यांनी, गतिरोधकांनी, रस्त्यावरच्या मैलांच्या दगडांनी, रात्रीच्या अंधारात चकाकणाऱ्या रिफ्लेक्टर्सनी आज बहुदा पहिल्यांदाच पाहिले असावे…..आज नागमोडी वळणं शहाण्यासारखी वागली… कुणीही मध्ये नाही आलं!….. हा एक प्रकाराचा ग्रीन कॉरीडॉरच.

सुमारे सत्तर किलोमीटर प्रति तास या वेगाने तिने गाडी हाकली. सफाईदारपणे रूग्णालयाच्या आवारात आणली… रुग्णाला व्हीलचेअरवरून वेगाने इमर्जन्सी रूममध्ये आणलं.. रुग्णाच्या श्र्वासांची मालिका समाप्त होण्याआधी त्याचे श्वास तज्ज्ञ डॉक्टर आणि यंत्रांच्या हवाली झाले होते…. रुग्ण वेळेपूर्वी रुग्णालयात पोहोचला होता ! त्याचा जीव बचावला होता…

डॉक्टर प्रियांका पवार यांनी गर्भारावस्थेत, धोका पत्करून, रुग्णाच्या जीवासाठी आपला आणि पोटातल्या तान्हुल्याचा जीव पणाला लावला होता.

प्रभु रामचंद्रांचे पितामह राज दशरथ यांच्या रथाची धुरा ऐन युद्धात तुटली…. राजा दशरथ देव-दानवांच्या युद्धात देवांच्या साहाय्यासाठी लढत होते… राणी कैकेयी सोबत होत्या… त्यांनी आपला हात रथाच्या धुरेत घातला आणि रथाचे चाक निखळू दिले नाही….. युद्ध संपेपर्यंत. अगदी या प्रसंगाची आठवण यावी असा डॉक्टर प्रियांका पवारांचा पराक्रम. कैकेयीने प्रभू रामचंद्रांना वनवासात पाठवले होते… या डॉक्टररूपी शूर स्त्रीने रूग्णाला मृत्यूच्या वनवासातून माघारी आणले !

डॉक्टर साहेबा पुन्हा तीच रूग्णवाहिका घेऊन ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र रूग्णालयातल्या आपल्या ड्यूटीसाठी परतही आल्या. एका कोपऱ्यात शांत, क्लांत उभी असलेली आणि आजवर शेकडो रूग्णांना इकडून तिकडे घेऊन जाण्याचा अनुभव असलेली ती रुग्णवाहिका या आपल्या नव्या चालकाकडे पाहून बहुदा गालातल्या गालत हसत असावी आणि डॉक्टर प्रियांका पवारांचं बाळ, आईनं किती छान राईड मारून आणली म्हणून भलतंच खुशही झालं असावं ! आपल्या आईने कर्तव्यपूर्तीसाठी किती मोठा धोका पत्करला होता हे त्या पिलाला कळलं नसावं… पण ते जेंव्हा जन्माला येऊन मोठं होईल ना तेंव्हा त्याला आपल्या आईचा अभिमान निश्चितच वाटेल… नाही का?

 © श्री संभाजी बबन गायके

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ झाकली मूठ सव्वालाखाची…अंबर कर्वे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ झाकली मूठ सव्वालाखाची…अंबर कर्वे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

एकदा एका मंदिरात पूजेला एक राजा येणार आहे असे त्या पुजार्‍याला कळले… त्याने सहा हजार रुपयांचे कर्ज काढले आणि देऊळ चांगले सजवले रंगवले.

*

राजा पूजेला आला आणि त्याने दक्षिणा म्हणून चार आणे ठेवले. पुजार्‍याला तिथेच घाम फुटला. आपण सहा हजार कर्ज काढून मंदीर रंगवले आणि राजाने फक्त चार आणे दक्षिणा ठेवली… आता या चवन्नी छाप राजाला अद्दल घडवायचीच.

*

पुजारी हुशार होता… राजा गेल्यावर पुजार्‍याने ते चार आणे मुठीत घेतले आणि सगळ्यांना सांगू लागला…

“राजाने मंदिरात दान केलेली एक वस्तू आहे. ती मला झेपणार नाही. म्हणून मी तिचा लिलाव करतोय. आपापली बोली लावा.”

आता राजाने वस्तू ठेवलीय म्हणल्यावर साधी ठेवली असेल का… ? पहिलीच बोली दहा हजार पासून… सुरु झाली. पुजारी डोके हालवूनच ‘नाही परवडत’ असे म्हणत होता. लिलावातील बोली वाढत वाढत पन्नास हजारावर पोचली.

*

तिकडे राजाला पहारेकरी म्हणाला, “महाराज, पुजाऱ्याने आपण मंदीरात दान केलेल्या वस्तूचा लिलाव सुरु केला आहे आणि ती वस्तू तो दाखवतही नाही आणि सांगतही नाही, मुठीत ठेवलीय…”

*

राजाला घाम फुटला. तो पळत पळत आला आणि पुजाऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला, “हे माझ्या बाप्पा, सव्वालाख देतो पण कुणाला ती वस्तू दाखवू नको….”

*

तेव्हा पासून ही म्हण रुजू झाली….

*….झाकली मूठ सव्वालाखाची….*

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वाघांची संख्या…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “वाघांची संख्या…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

ते आपल्या आजूबाजूला वर्तमानपत्र, लॅपटॉप, मोबाईल असा सगळा पसारा मांडून बसले होते. स्वतः काढलेली, आपल्यासाठी इतरांकडून (मुद्दाम) काढून घेतलेली, जूनी, नवीन अनेक (फक्त आणि फक्त वाघांची) छायाचित्रे देखील ते परत परत पहात होते. (सारखे सारखे पाहून त्यांच्या मानेला देखील रग लागली होती. म्हणून त्यांनी मानेचा पट्टा परत एकदा नीट केला.) पण त्यांच्या दृष्टीने त्यांच्याकडे (भागात) असलेले वाघ आणि जाहीर झालेली वाघांची संख्या याचा ताळमेळ काही बसत नव्हता. आपल्या मुलाच्या कॅमेऱ्यात काही (आपल्या) वाघांचे फोटो आहेत का? म्हणून त्यांनी मुलाला हाक मारली. पण तो आदि(च) कुठेतरी याच कामासाठी (नेहमीप्रमाणे) गेला होता.

मागच्या काही काळात यांना आकडेवारी गोळा करायची आणि आपणच सांगायची अशी सवय लागली होती. पण आज ते जाहीर झालेली आकडेवारी बघत होते. आकडेवारी नुसार वाघांची संख्या वाढली होती. पण मग हे वाढलेले वाघ नक्की कुठे आहेत? हाच प्रश्न त्यांना पडला होता. हे म्हणजे “बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी” प्रमाणे आपण प्रयत्न करुन देखील वाघांची संख्या आपल्या हद्दीत नाहीच वाघांचे ठाणे (घरोबा) दुसरीकडेच. अशीच परिस्थिती सध्या जाणवत होती.

यासाठी त्यांनी काटेकोरांना देखील कामाला लावले होते. पण कामाला लावण्या अगोदरच एखादे काम अंगावर घेण्याची सध्या त्यांना सवय लागली असल्याने काटेकोर अगोदरच कामाला लागले होते. काहीही करून हे काम वेळेच्या आधी संपवायचे असा त्यांचा विचार होता, त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने ते आपल्या घड्याळात बघत होते. पण काटेकोरांसमोर देखील नाना अडचणी होत्याच. आता मदतीसाठी नक्की कोणाचा हात घ्यावा यावर ते विचार करत होते, पण या समस्येवर  काही प्रकाश पडत नव्हता. त्यांना आकडेवारी लवकर हवी होती, त्यामुळे दूरदृष्टीचे संजय त्यांना सध्यातरी नको होते. काकांना विचारावे असे वाटल्याने त्यांनी काकांना फोन देखील केला. काका म्हणाले अरे वाघांचे काय घेऊन बसला आहेस‌.

दुपारी वाघ गुहेत आराम करत होते तेव्हा यांची (चार) माणसे विनाकारण वणवण फिरत कारण नसतांना वाघ शोधत होते. तेव्हा वाघ सुरक्षित व आपापल्या गुहेतच होते. आणि रात्री दमून भागून यांची माणसे आराम करत होती तेव्हा वाघ गुहेतून बाहेर पडले आणि भक्ष्य शोधण्याच्या नादात ते दुसऱ्या हद्दीत कधी आणि कसे पोहोचले ते लक्षात देखील आले नाही. आणि आता तिथेच त्या वाघांना सुरक्षित वाटत असेल तर ते सुरक्षित असेपर्यंत तिथेच थांबतील, परतणार नाही ना……. वाघ जरी असला तरी तो इतरांसाठी…… त्याला स्वतःला सुरक्षित वाटले पाहिजे की नाही……..

प्रश्न सगळ्या वाघांचा असेल तर एकत्रित दिलेली आकडेवारी जवळपास खरी असेल. पण प्रश्न फक्त आपल्याच भागातील (आपले) वाघ आणि त्यांची संख्या असा प्रश्न असेल तर ते प्रत्येकाने आपले आपणच पाहिलेले जास्त बरे असते. कारण वाघांचे देखील काही प्रश्न असतीलच ना….. नाहीतर तो असा भटकला किंवा भरकटला असता का?

ते उगाचच आपली हद्द सोडून कशाला जातील.‌….. दुसऱ्या हद्दीत जातांना त्यांना देखील भिती असतेच. तु याचा विचार करु नकोस. तुला दुसरे काही काम नसेल तर मी सांगतो काय करायचे ते. असे म्हणत काकांनी फोन ठेवला सुध्दा……..

आता काय? वाघ किती? आणि त्यापैकी आपले किती? यातही लहान वाघ आणि मोठे वाघ यांची खरी संख्या कळण्यासाठी सगळ्यांनाच काही काळ थांबणे भाग आहे. या काळात प्रत्येकजण आपापल्या भागातील वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करेलच…… बाकी वाघ समर्थ आहेच………….

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बा भिमा! तू माऊली माझी!… ☆ डॉ. स्वप्ना लांडे ☆

डॉ. स्वप्ना लांडे

परिचय 

पीएच.डी. – “महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निबंधांतील स्त्रीविषयक चिंतनाचा तौलनिक अभ्यास”

अधिव्याख्याता – य. च. मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र एल.आर.टी. कॉलेज अकोला

सचीव – महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था मंगरूळपीर,जि.वाशिम

स्थानिक तक्रार समिती अध्यक्षा – (कामाच्या ठिकाणी स्त्रियांची होणारी लैंगिक छळवणूक कायदा २०१३)

स्तंभलेखिका – दै.मातृभूमि २०१९-२०

विभागीय महिला संपर्क प्रमुख – (अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती)

लेखन- अनेक दिवाळी अंकांमध्ये तसेच शैक्षणिक मासिकांत लेखन, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘लढा ‘ हे मुखपत्र असलेल्या मासिकात एक वर्ष लेखन.  अकोला आकाशवाणीवर मुलाखती आणि व्याख्याने.स्त्री सक्षमीकरण,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावर व्याख्याने,गेल्या पाच वर्षांपासून ग्रंथोत्सवात वक्ता म्हणून सहभाग.महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्यावर प्रात्यक्षिकांसह व्याख्याने,अनेक वृत्तपत्रांत प्रासंगिक लेखन, मासिके यांत लेखन.

? मनमंजुषेतून ?

☆ बा भिमा! तू माऊली माझी!… ☆ डॉ. स्वप्ना लांडे ☆ 

“भिमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे”

असं वामनदादा कर्डक म्हणून गेलेत. दि. १४ एप्रिल १८९२ रोजी क्षितीजावरील लाली एक निराळाच संदेश घेऊन आली. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, राजनीतिज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, मानववंश शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, धर्मशास्त्रज्ञ, समाज क्रांतिकारक …. आणखी काय अन् किती सांगावं! 

या सर्वांसोबत आणखी महत्त्वाचं …. ‘ बा भिमा! तू समस्त स्त्री वर्गाची माऊली आहेस. इतकं उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या व्यक्तिमत्त्वानं इतक्या छोटया छोटया गोष्टींकडे लक्ष द्यावं लेकीच्या ! इतके सन्मानाचे जिणे  बहाल करावे ! सारं विस्मयकारकच … !  केवळ आईच करू शकते हे. जशी एखादी पुरोगामी आई लेकीला विचारांचे धन देते ना, छान समजाऊन पण सांगते, अगदी तस्सं बाबासाहेब सांगतात. बाबासाहेब लग्न झालेल्या आपल्या लेकींना सांगतात, ” लग्नानंतर पत्नी पुरुषाची समान अधिकारी असलेली गृहिणी असली पाहिजे, ती नवऱ्याची गुलाम असता कामा नये.”  लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण म्हणून त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावे. मात्र गुलामाप्रमाणे वागविल्यास तिने खंबीरपणे नकार द्यावा व समतेसाठी आग्रह धरावा. कोणत्याही कारणासाठी का होईना ज्यावेळी एखाद्या स्त्रीची मूल होऊ देण्याची इच्छा नसेल, त्यावेळी तिला ती गर्भधारणाच टाळता येण्याची शक्यता असली पाहिजे आणि संतती जन्माला घालणे, हे सर्वस्वी तिच्या इच्छेवर अवलंबून असले पाहिजे. गरोदरपणाचा, बाळंतपणाचा आणि मुलांच्या संगोपनाचा भार स्त्रीलाच होतो. तेव्हा मुले केव्हा आणि किती होऊ द्यावयाची हा निर्णय तिचाच असला पाहिजे. राष्ट्र संकल्पनेचे आधुनिक प्रारूप घडवायचे तर स्त्रियांनाही समान अधिकार, आर्थिक सक्षमता आणि वेळ आल्यास कुटुंब नावाची रचना जाचक ठरू लागल्यास विभक्त होण्याचे अधिकार असणे गरजेचे आहे, असे बाबासाहेब म्हणत. स्त्रियांच्या प्रगतीच्या आड त्यांची लग्ने येतात, हे बाबासाहेबांनी हेरले होते. म्हणूनच “मुलींची लग्ने लवकर करून वैवाहिक जीवन त्यांच्यावर लादू नका.” तसेच आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा मुलींना अधिकार असावा असे ते म्हणत.

भारतीय स्त्री हजारो वर्षे अज्ञान दारिद्र्य, देवभोळेपणा ,अंधश्रद्धा यांच्या दुष्टचक्रात अडकलेली होती. स्त्रीला माणूस म्हणून जगता यावं याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले आयुष्य पणाला लावले. मनुस्मृती नावाचे अधर्मशास्त्र जाळून, मनूने शिकविलेली वर्णाची आणि जातीची विषमता, त्याने शिकविलेला देव आणि दैववाद , त्याने शिकविलेली अंधश्रद्धा आणि परस्पर तुच्छता जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. गुलामांना गुलामगिरीची जाणीव झाली पाहिजे, म्हणजे मग ते आपोआप बंड करतील, या आंबेडकरांच्या विधानातील गृहीत हे सबंध मानवमुक्तीच्या सामाजिक परिवर्तनाचे मूलभूत तत्त्व होते. जोवर या देशातील प्रत्येक व्यक्ती ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा हक्क प्राप्त करू शकत नाही, तोवर या देशात एकात्मता निर्माण होऊ शकत नाही अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच या देशातील स्त्रीला तिच्या गुलामगिरीची जाणीव करून देऊन, देशाच्या विकासात तिचेही योगदान किती महत्त्वाचे आहे, हे भारतीयांच्या लक्षात आणून देण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. बाबासाहेब म्हणतात, “आईबाप मुलाला जन्म देतात कर्म देत नाहीत असे म्हणणे ठीक नाही. आईबाप मुलांच्या आयुष्याला वळण लावू शकतात. ही गोष्ट आपल्या लोकांच्या मनावर बिंबवून जर आपल्या मुलांच्या शिक्षणाबरोबर मुलींच्याही शिक्षणासाठी धडपड केली तर, आपल्या समाजाची प्रगती झपाट्याने होईल.

मनुस्मृतीने चातुर्वर्ण्याची निर्मिती करून माणसामाणसांमध्ये उच्च-नीचतेचे बीज पेरले. स्त्रियांच्या बाबतीत तर मनुस्मृतीने अतिशय कठोर कायदे केले होते. त्यामुळे तिला जगणेही असे झाले होते. मनुस्मृतीने स्त्रियांच्या बाबतीत घेतलेली भूमिका कमालीच्या असंस्कृतपणाची आहे. धर्म कोणताही असो पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रीच्या स्वातंत्र्याबद्दल आजही गैरसमज आहेत. परंतु स्त्रीच्या प्रगतीवर मानव जातीचे हित अवलंबून आहे, हे बाबासाहेबांना माहीत होते. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीमुक्तीचे रणसिंग फुंकले. रमाईंना पाठविलेल्या एका पत्रात ते म्हणतात, “स्त्रियांच्या उन्नती व मुक्तीसाठी लढणारा मी एक योद्धा आहे.” दिनांक २७ डिसेंबर १९२७च्या महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेस जवळजवळ पाच हजार स्त्रियांची सभा बाबासाहेबांनी घेतली होती. स्त्री व पुरुष यांनी मिळून समाजाच्या, संसाराच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत. पुरुषांनीच हे काम अंगावर घेतले तर ते पार पडण्यास त्यांना फार अवधी लागेल. तेच काम स्त्रियांनी जर अंगावर घेतले, तर त्यांना त्या कामात लवकर यश प्राप्त होईल. याच सभेत बाबासाहेबांनी दलित स्त्रियांच्या राहणीमानाबद्दल प्रबोधन केले. मुला-मुलींना शिक्षण देण्यास सांगितले. विशेषतः मुलींच्या शिक्षणावर भर दिला. दि. २० जुलै १९४२ साली नागपूरला दलित स्त्रियांची परिषद आयोजित करण्यात आली होती. या सभेत वीस पंचवीस हजार स्त्रिया उपस्थित पाहून बाबासाहेबांना आनंद झाला. ते म्हणाले “स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजत असतो.”

परंपरागत कायद्यांनी अमानुष परंपरांनी जखडलेली स्त्री बाबासाहेबांनी संविधानात विकासाचे स्थान दिल्याबरोबर शिक्षण क्षेत्रात नव्हे, तर आतापर्यंत केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेले प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करू लागली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी अभेद्य असे एक सुरक्षा कवच तयार केले. ते म्हणजे हिंदू कोड बिल. हिंदू कोड बिलाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, समाजातील वर्गावर्गातील असमानता, स्त्री-पुरुष यांच्यामधील असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करीत जाणे होय आणि शेणाच्या ढिगाऱ्यावर राजप्रासाद बांधल्यासारखे होय. हिंदू सहितेला मी हे महत्त्व देतो. बाबासाहेबांनी हे उद्गार हिंदू कोड बिलाच्या मसुद्यावरील सर्वसाधारण चर्चेच्या वेळी काढलेले आहेत. हिंदू कायद्याच्या संहितीकरणाविषयीच्या विधेयकाला बाबासाहेबांच्या लेखी अनन्यसाधारण महत्त्व होते. कारण त्यायोगे स्त्रियांच्या बाबतीत केल्या जाणाऱ्या भेदभावाला आळा बसून त्या अधिक सक्षम बनतील असा त्यांना विश्वास होता. या कायद्याला बराच विरोध झाल्याने बाबासाहेबांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. आज स्त्रीला घटस्फोटानंतर कायद्याने  स्त्रीधन वापस मिळते, वारसाहक्काने संपत्तीचा हिस्साही मिळतो. तिच्या जीवनाला एक प्रकारचे बाबासाहेबांनी स्थैर्य करुन दिले. पण बहुजन स्त्री काय करते? देवाच्या कृपेने माझं सर्व चांगलं झालं म्हणून, वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीचा काही भाग  देवाच्या पेटीत देणगी म्हणून टाकते. पण ज्या पित्याने  आपल्या प्रकृतीची चिंता न करता, आपल्या सर्व लेकींसाठी अहोरात्र झटून कायदा केला, प्रसंगी मनस्तापही सहन केला. हिंदू कोड बिल संपूर्ण मान्य केले नाही म्हणून आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्याचा बहुजन स्त्रीला विसर पडावा ह्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती ! आज जेव्हा मी स्त्रियांना आत्मविश्वासाने उभे पाहते, अनेकींचे संसार चांगल्या रीतीने फुललेले पाहते, तेव्हा बाबासाहेबांच्या विचारांनी डोळ्यांत अश्रू गर्दी करतात आणि नकळत मी नतमस्तक होते.”बा भिमा! कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळयांतले पाणी नव्याने वहावे.”

©  डॉ. स्वप्ना लांडे

अकोला. 

मो ७५०७५८११४४. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “रमा … कशी आहेस …?”… डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “रमा … कशी आहेस …?”… डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(दिनांक ३० डिसेंबर १९३० रोजी इंग्लंड वरून डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी रमाई यांना लिहिलेले पत्र आजही काळजाला पिळून टाकतं•••••)

रमा !

कशी आहेस रमा तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना, असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो. आणि आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळयासमोर उभे राहिले.

दुःखांच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत. या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो आहे रमा ! पण मी झुंज देतो आहे. माझी बौध्दिक शक्ती परमवीर झाली होती जणू ! खूप भावना मनात दाटून आल्या आहेत. खूपच हळवे झाले आहे मन. खूपच व्याकूळ झाले आहे मन! आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली. यशवंताची आठवण आली.

मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस. मी नको म्हणत होतो तरी तुझे मन तुला धरवले नाही. तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता. तू पाहत होतीस. तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेनं तू ओथंबून आली होतीस. तू शब्दांनी बोलत नव्हतीस; पण तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नसते तेही सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळ्यातील आवंढा तुझ्या ओठापर्यंत येऊन थडकत होता. ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळयातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती.

आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झाले आहे. जीवात कालवाकालव होत आहे. कशी आहेस रमा तू ! आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो तो? त्याचे संधीवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा ! आपली चार मुलं आपल्याला सोडून गेलीत. आता आहे फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्त्वाचा आधार आहे आता. त्याला आपण जपलं पाहिजे. यशवंताची काळजी घे रमा ! यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत. तोवर ते जागे राहत. मला ती शिस्तच त्यांनी लावली. मी उठलो, अभ्यास सुरु केला की ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई. त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला. याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे. माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत. त्यांनी रात्रीचा दिवस केला. अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळे आली. फार फार आनंद वाटतो रमा आज. रमा यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे.

रमा, वैभव, श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभोवती पाहते आहेसच. माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागे लागलेली असतात. त्यांची जीवनं जिथून सुरु होतात तिथच थांबलेली असतात. या लोकांची आयुष्ये जागा बदलीत नाहीत. आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्याजवळ दुःखांशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्रय, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकटे आपल्याला सोडीत नाहीत. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत

मागे अंधारच आहे. दुःखाचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे

आपणाला दुनिया नाही. आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपडयांची काळजी घे. त्याची समजूत घाल. त्याच्यात जिद्द जागव. मला तुझी सारखी आठवण येते. यशवंताची आठवण येते.

मला कळत नाही असं नाही रमा, मला कळतं की तू दुःखांच्या या वणव्यात स्वतः करपून जात आहेस. पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होते आहेस. पण रमा मी तरी काय करु ! एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्रय. दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा. वसा ज्ञानाचा !

मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचे यावेळी भान नाही; पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे. तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस. आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवीत आहेस म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे.

खरं सांगू रमा, मी निर्दय नाही. पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी सादही घातली, तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा ! मी कळवळतो. पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी ! म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुला, यशवंतालाही कधी झळा पोचतात. हे खरं आहे; पण यावेळी रमा मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेली आसवे पुसतो आहे. सुडक्याला सांभाळ रमा. त्याला मारु नको. मी त्याला असे मारले होते. त्याची आठवणही कधी त्याला करुन देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे.

माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना पार जाळून-पुरुन टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत

रमा ! तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळयात आसवं आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकूळ झाली आहेस.

रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर? तू मनःसाथी म्हणून मिळाली नसतीस तर? तर काय झालं असतं? केवळ संसारसुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गोवऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे, मुंबईत कोण पसंत करील. घराला ठिगळे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे, एवढयाच काडयाच्या पेटीत महिना निभला पाहिजे, एवढेच ध्यान्य, एवढेच तेलमीठ पुरले पाहिजे हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर? तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्या वेळी लगेच ओहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा ! माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता, सगळीच मोडतोड झाली असती. सगळाच मनःस्ताप झाला असता. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. जप स्वतःला जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेन काळजी करु नकोस.

सर्वांस कुशल सांग.

कळावे,

तुझा

भीमराव

लंडन

३० डिसेंबर १९३० 

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हिंमत असती तर…? — (फक्त जराशी गंमत हं —) ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ हिंमत असती तर…? — (फक्त जराशी गंमत हं —) 😎☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

बायको समोर स्पष्ट बोलण्याची हिंमत असती तर…?

 

१….दशरथानं कैकेयीला स्पष्टपणे

नकार देत सांगितलं असतं,

की मी काही रामाला

वनवासात पाठवणार नाही. 

तू दुसरा काहीतरी वर माग 

आणि जास्त हट्टीपणा

केलास तर लक्षात असू दे,

की मला अजून दोन बायका

आहेत, तर कदाचित रामायण

घडलंच नसतं…!!

 

२…रामानं देखील सीतेला 

स्पष्टपणे  नकार देत

सांगितलं असतं, की मी

काही हरणाच्या मागे

जाणार नाही ऊन खूप आहे. 

आज रविवार आहे 

आणि जंगलात कशाला हवंय 

तुला तेच हरीण. मला जमणार

नाही ..!! तरी देखील रामायण 

घडलं नसतं.

 

थोडक्यात तात्पर्य : 

बायकोला वेळीच नकार देणं.आवश्यक आहे

आणि हे ज्या दिवशी जमेल, त्यावेळी 

कुठलेही रामायण घडणार नाही

पण, प्रभू रामचंद्रांना जे जमलं

नाही, ते आपल्याला तरी कसं

शक्य होणार…??? 

 

असो. चालल॔य तसंच चालू द्या,

उगाच भांडण नको …..!!!!!

 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ वाचाल तर वाचाल… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ वाचाल तर वाचाल… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

जिकडे पाहावे तिकडे घरभर पुस्तकेच पुस्तकं पसरलेली असतात. अगदी दिवाणखान्यापासून, शयनकक्षापर्यंत, स्वंयपाकघरात टेबलावर इतकचं काय .. जाऊदे.. तुम्ही ओळखलं असालचं.. घरात इनमीन सहा माणसं सगळी मोठी नि पुस्तकाची वेडी.. घरात दूरदर्शन आहे पण सगळेच जण दुरुनच दर्शन घेत असतात. मीच कधी तरी हट्टाने कार्टून लावारे म्हणत असतो.. तेव्हढ्यापुरताच तो लागतो. मोठी छोटी पुस्तकं मात्र प्रत्येकाच्या हातात असतात.. एवढं काय असतं त्यात असं मी विचारलं तर मला म्हणतात, तू अजून लहान आहेस. मोठा झालास की, वाचायला लागलास की तुला कळेलचं काय असतं त्यात.. मलाही पुस्तकं हवयं असा कधी मधी मी पण हट्ट धरला कि मोठ्या मोठ्या चित्राची एक दोन पुस्तके माझ्या समोर ठेवतात.. हत्ती, घोडा, वाघ सिंह, विमान, मोटार, जहाज, पोपट, मैना, चिमणी, सगळे त्यात दिसतं ,मी पाहतो पाच मिनिटांत पुस्तकं वाचून? नव्हे पाहून हाता वेगळे होतं ..मग घरातल्यांचं तसं का होत नाही असा प्रश्न काही सुटत नाही..मग माझ्या पुस्तकाहून काही वेगळं त्यात नक्की काहीतरी असणार.. हळूच ती पुस्तकं हातात घेऊन बघण्याचा मोह अनावर होतो.. कधी कधी ती पुस्तकं इतरांच्या नकळत हाती घेऊन चाळत जातो.. शब्दांच्या ओळीवर ओळीने पानं पानं भरलेले असते.. अक्षर ओळख नुकतीच होत असल्याने एकेक शब्दाचा उच्चार करतो अर्थ आणि समज दोन्ही बाल बुद्धीच्या पलीकडे असल्याने पानं पलटलं जातं… नेमके काय असतं की ते इतकं खिळवून ठेवतं याचा शोध अजून चालूच आहे.. पण एक मात्र मला उमजलयं वेळ मात्र छानच जातो.. त्यातली अक्षरं चित्रं पाहून डोळे खिळतात आणि चेहऱ्यावर हास्य पसरतं.. मग घरातले कसे मौनात वाचता वाचता मंदस्मित करत करत मोठयानं हसू लागले दिसतात अगदी तसेच मी पण हसू लागतो… तो आवाज ऐकून आई धावत येते आणि आधी हातातलं पुस्तकं काढून घेते.. पुन्हा या पुस्तकांना हात लावू नको बरं.. नाहीतर तुला सगळे रागावतील.. मी खट्टू होतो आईवर रुसून बसतो..शहाणा माझा राजा उदया मोठा झालास कि वाचायची आहेतच हि पुस्तकं तुला.. आता जरा तुझी खेळणी घेशील खेळायला…माझं पुस्तक वाचन तिथचं संपतं.. 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वेळ… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ वेळ… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

“शब्दकळा लावती लळा”

आजचा शब्द आहे = वेळ = 

वेळ एक फ्री हिट

कोणतीही स्पर्धा आपण त्या स्पर्धेसाठी वेळ काढून बघत असतो आणि काही फ्रॅक्शन ऑफ सेकंदाच्या फरकाने कोणीतरी विजेता होतो. तेव्हा आपल्यालाही वेळेचे महत्व पटते .पण ती जिंकणार्‍याची जिंकण्याची वेळ असते तीच वेळ हरणार्‍याची हरण्याची वेळ असते. मग लक्षात येते की वेळ एकच असली तरी प्रत्येकाची वेळ वेगळी वेगळी असते.

मग वेळ लावून केलेल्या कामाला वेळ लागला म्हणायचं का वेळेत केले म्हणायचंअसं वेळेच्या बाबतीत वेळोवेळी काहीतरी वेगळेच मनात आले आणि मन वेळे बाबत विचार करू लागले.

वेळ शब्दाचा अर्थ २४ तासातील काही भाग असे म्हणता येईल. पण किती गंमत आहे पहा या वेळेची••••

वेळेच्या आधी क्रियापद लागून त्याची वेळ म्हटले तर अर्थ एक पण तेच क्रियापद नंतर लावले तर अर्थ वेगळा••••

बघा••• भरतीची वेळ,ओहोटीची वेळ,झोपेची वेळ, खायची वेळ, घ्यायची वेळ, द्यायची वेळ पण हेच उलटे केले तर?

वेळ भरली, वेळ ओसरली, वेळ झोपली, वेळ दिली/दिला ,वेळ घेतली/घेतला••••

मग विचार करताना असे लक्षात आले वेळेचा अभ्यास करण्यासाठी वेळ दिला तर डॉक्टरेट तर मिळेलच पण तरी सगळ्या प्रकारचा सगळ्या विषयाचा वेळ , यासाठी वेळच पुरणार नाही.

आपल्या मराठी भाषेत अनेक गमतीशीर शब्द आहेत त्यापैकी सगळ्यात मजेदार शब्द मला वेळ वाटतो.

कारण तुम्ही जसे फिराल तसा वेळ फिरत राहील तुम्हाला फिरवत ठेवील आणि तुम्ही त्याला शेकडो क्रियापदे जोडू शकता असा सर्वव्यापी सर्वसमावेशक असा शब्द आहे वेळ.

या वेळेला कितीही क्रियापदे लावून वाक्प्रचार केले ना तरी सगळे वाक्प्रचार वापरले असे म्हणताच येणार नाही. थोडे शब्द फिरवून त्या वेळेची छटा बदलता येऊ शकते.

वेळ••••• असते,नसते,पळते,पाळते,देते,घेते,येत,जाते,बघते,ओळखते,बदलते,घालवते,टळते,गाजवते,रेंगाळते,झोपते,साधते,बाधते काहीही करू शकते.

वेळ••••

पहाटेची, झुंजुमुंजूची, सकाळची, मध्यान्हाची, दुपारची, संध्याकाळची, रात्रीची, एकांताची, कातरवेळ, झांझरवेळ, साजणवेळा, धुंदवेळ, वाईट वेळ, चांगली वेळ, शिळोप्याची वेळ, अंतिमवेळ किंवा•••

उठायची, बसायची, नाष्त्याची, चहाची, विधी करण्याची, जेवायची, फिरायची, विश्रांतीची ऑफिसला जायची, झोपायची अशी कोणतीही असू शकते.

वेळापूरच्या वृद्धाश्रमात रहायची वेळ आलेले  वेळापुरे आजी आजोबा बोलत होते, आपले लग्न वेळेवर झाले म्हणून लेकरं बाळं वेळेत झाली. तेव्हा वेळेची तमा न बाळगता काम केले. वेळात वेळ काढून मजा केली वेळेवर उठण्यापासून ते वेळेवर झोपण्यापर्यंत वेळेचे वेळापत्रक आखून वेळेचे नियोजन केले. म्हणूनच वेळेचे गणित बसून आपण सगळीकडे वेळेवर हजर होत होतो. वेळेची चालढकल केलेली तुम्हाला चालायचीच नाही.वेळेचे पक्के होतात. तुमच्या हुषारीने कामाने तुम्ही कितीतरी वेळा ऑफिसची वेळ गाजवली होती.

आजोबा पण म्हटले हो ना तू पण  मी रागवायची वेळ येऊ नये म्हणून जीवाचा आटापिटा करून वेळेचे भान ठेवत माझी एकही वेळ चुकवू द्यायची नाहीस. वेळ महत्वाची असते आणि वेळेचे महत्व तुला होते त्यामुळे सगळे सहज सोपे वाटत होते.

वेळ वाया न घालवता तू सतत कामात वेळ घालवायचीस.खूप कष्टातही हसून तू म्हणायचीस अहो वेळ सांगून येत नसते. ही पण वेळ निघून जाईलच आणि वेळ बदलून चांगली वेळ येईल. या तुझ्या सकारात्मकतेने संसाराचा वेळ कापरासारखा उडून गेला.

खरचं वेळीच मुलांना शिक्षण दिले वेळेची कदर करीत मुलांनाही वेळेचा वेळेवर तुकडा पाडायचे भान दिले. वेळेचा अपव्यय न करता वेळेचा सदुपयोग करायला शिकवले. त्यामुळे आपल्या सुखी संसाराची वेळ जमून आली होती.

तसेच वेळ आल्यावर बघू अशा बेफिकिर वृत्तीत न रहाता वेळेची मर्यादा पाळून वेळकाढूपणा न करता वेळ कोणासाठी थांबत नसते हे जाणून वेळेनुसार दिलेली वेळ पाळत वेळेच्या बंधनात राहून  एकमेकांना सांभाळलं म्हणून या साथीत ५० वर्षाचा वेळ कसा गेला हे कळलच नाही.

वेळ वखत पाहून वागलं म्हणजे वेळ गेल्यावर हळहळावे नाही लागत. पण बाई वैर्‍यावर पण अशी वेळ येऊ नये. पण वेळ सांगून येत नाही.

अगदी खरे आहे हो. आता बघा ना एवढा वेळ मेहेरबान असताना आपल्यावर अशी वृद्धाश्रमात रहायची वेळ येईल असे वाटले तरी होते का?

आपली दोन्ही पोरं मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहेत म्हणून आपण भारावलो होतो. अचानक थोरल्याच्या मनात फॉरेनला जायचं खूळ आलं. नुकतीच तुमची रिटायरमेंट झाली होती. सुदैवाने मुबलक पैसा हाती होता. पण थोरल्याला लगेच फॉरेनला जायचे होते म्हणून त्याने वेळ साधून पैशाची मागणी केली. वेळ न दवडता त्याला मदत करणे वेळेत जमवायला पाहिजे होते. म्हणून वेळोवेळी केलेली गुंतवणूक , मिळालेले पैसे हे सगळे वेळेचा अभाव असल्याने हातची संधी जाउ नये वेळ गेला असे होउ नये म्हणून मी वेळीच घातलेल्या लगामाकडे दुर्लक्ष करून तुम्ही त्याला दिली.

ते बघून धाकट्याला झोंबलं. त्यानेही तोच मार्ग धरला आणि यावेळी थोडी वेळ निराळी आहे कारण वेगळ आहे पण पैशाची नड असल्याने तुम्ही दादाला दिले तर मलाही पाहिजेत म्हणून हट्टच धरला. त्याने वेळ पाहून खेळ मांडलेला मला कळत होतं . मी काही कारणे सांगून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला पण त्यावेळी तुम्ही वेळ वखत पाहून नाही वागला. थोरल्याला दिले म्हणून राहिलेले धाकल्याला देऊन मोकळे झालात.  तुम्ही वेळ बदलेल या विश्वासाने यावेळी आपण मदत केली तर पुढच्यावेळी ते आपली मदत करतील या भ्रमात होता. 

ते किती चुकीचे होते हे उशीरा कळले पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती. आपले होणारे हाल पाहून एका सद्गृहस्थाने आपल्याला या वृद्धाश्रमात आणले आणि आपल्याला डोक्याला हात लावून बसायची वेळ आली.

आजोबा म्हटले खरं आहे तुझं. वेळेमुळे कशाचे काय होईल काही सांगता येत नाही.  पण अजूनही वेळ गेलेली नाही. आता तर आपल्याकडे वेळच वेळ आहे. अशी वेळ कोणावर येऊ नये म्हणून आपण रिटायर्ड होणार्‍यांना सतर्क करण्याचे काम करू. त्यामुळे आपला वेळही सत्कारणी लागेल शिवाय कालची वेळ आज नसते हे शहाणपण आपणही घेऊन याच वृद्धाश्रमातील गरजूंची आपण मदत करूया. आता तर फक्त आपल्या दोघांसाठीच आपण जगणार असल्याने एकमेकांना भरपूर वेळ देऊ या. वेळ न वखत बसली खोकत अशी गत करून तेच तेच दु:ख उगाळत बसू नको. चल दोघांनी मिळून नवी सुरूवात करू. मागच्या वेळेची अनुभूती नकोच . वेळेचे गुलाम होणेही नको. आपण आपल्या वेळेनुसार वेळेला आपल्यापुढे वाकायला शिकवू. शेवटी वेळच आपला गुरू असल्याने त्याची विद्या त्यालाच देऊ. आणि हो , आता परत उदास सूर लावण्याची वेळ नको म्हणून वेळेची एक गंमत सांगतो.

तुला सांगतो हा वेळ आहे ना एक जादूगार आहे. केव्हा काय कोणत्याक्षणी बदलेल हे सांगता येत नाही.

आता हेच बघ ना पूर्वी क्रिकेट ५- ५ दिवस टेस्ट मॅचेस मधे खेळायचे. तेवढा वेळ बघणार्‍याकडे असायचा. मग नंतर ३ दिवसीय मॅचवर आला कारण लोकांचा वेळ कमी झाला. तो वेळ अजून कमी झाला आणि वन डे मॅच आली. आता २०-२० म्हणजे फक्त काही तासच.

पण मजा तेवढीच उत्सुकता तेवढीच आणि कौतूकही तेवढेच. वेळ कमी आहे म्हणून माणसाने आपली करमणूक नाही कमी केली.

अगं आता आपल्या जीवनातील ५० गेली अन ५ राहिली अशी गत असताना चल आपण वेळेशीच २०- २० खेळू.

आमच्यावेळी ५ दिवसाची होती तरी आमच्यावेळीच २०-२० पण आहे. यावेळी आपण जरा वेगळी मजा घेऊ.  वेळेचे चेंडू वेळेवर फ़टकावू, वेळेवर अडवू, वेळेवर झेलू . वेळेवर विकेट जाणारच आहे हे ध्यानात ठेऊन प्रत्येक वेळी मागच्या वेळपेक्षा वेगळ्या खेळाचे प्रदर्शन करू. वेळेला केळ आणि न्याहारीला सिताफळ खात

कोणत्याही वेळी टपकणारा वेळेचा चेंडू अवेळी विकेट न जाऊ देता चौकार षट्कार यांनी टोलवत राहू. वेळ बदलून क्षेत्ररक्षण करायचे तेव्हा दरवेळी चेंडू न आडवता फलंदाजालाच खेळते ठेऊ. वाटले तर तेथे थोडा वेळखाऊपणा पण करू. आपले मस्त वेळ घालवणे पाहून वेळेला रेंगाळायला लावू. आपल्याकडे थोडा वेळ आहे पण मॅच जिंकायचीच आहे म्हणून वेळेचे भान ठेवत ही वेळ पुन्हा येणार नाही म्हणून एक उनाडवेळ पुन्हा जगू या. वेळेचे भान हरपून आपण वेळेला चकवू या. वाढवेळ खेळात नसतो कधीतरी वेळ संपल्याचे वेळ सांगेलच पण त्यावेळी वेळेलाच नो बॉल म्हणून परत बॉल टाकायला लावू आणि मग त्या वेळेच्या चेंडूला फ्री हिट समजून सीमापार करू आणि नॉट आऊट राहून सामना जिंकू.

खरच वेळ एक फ्री हिट आहे त्याचा लाभ घेऊ.

हे पचवायला जरा वेळ लागेल पण वेळ बदलणे वेळेच्या हातात नाही तर तुमच्या हातात आहे हे पटवून देऊ. चल आपण वेळीच हा पायंडा पाडू.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ होंगे कामयाब … ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ होंगे कामयाब … ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆ 

सिंहगड एक्स्प्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनला प्रवास करत होतो. बहुधा रामनवमीची सार्वजनिक सुट्टी असल्याने, आज दादरनंतर गाडीला बऱ्यापैकी कमी गर्दी होती. दादर स्टेशनलाच समोरच्या सीटवर एक चाळीस पंचेचाळीस वर्षांचा माणूस येऊन बसला. त्याने माझ्याकडे बघून एक general स्मितहास्य केलं, मीही प्रत्युत्तर दिलं. 

सर्वसाधारण दिसणारा माणूस, पण थोडासा खंगल्यासारखा दिसणारा. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद थुईथुई नाचत होता. प्रचंड खुश दिसत होता तो. अर्थात संपूर्ण अनोळखी माणसाला आपण कसं विचारणार, “का हो, एवढे खुश का आहात ?”

तो, डोळे मिटून, स्वतःशीच गाणं गुणगुणत होता. आणि हळूहळू तो स्वतःच्याच भावविश्वात एवढा रममाण झाला की, त्याच्या नकळत, तो ते गाणे मोठ्याने म्हणू लागला. गाणं होतं – “होंगे कामयाब, हम होंगे कामयाब.”

आजूबाजूचे सगळे आधी आश्चर्याने – कुतूहलाने त्याच्याकडे पाहू लागले. मग कोणीतरी त्याच्या सुरात सूर मिसळला, मग आणखी एकाने, आणखी एकाने. आम्ही सगळे “होंगे कामयाब” म्हणत होतो. अंगावर शहारा येत होता. प्रत्येकालाच सगळ्या ओळी ठाऊक होत्या असं नाही. पण त्याला ते गाणं पूर्ण पाठ होतं. जणू अनेक वर्षे तो हे गाणं म्हणत होता. त्याने ओळ म्हणायला सुरुवात केली, की बाकीचेही त्याला साथ देत होते. वातावरण नुसतं भारावून गेलं होतं. 

गाडीची गती हळू हळू कमी होऊ लागली. स्टेशन येत होतं. गाणं संपलं. त्याने डोळे उघडले. आम्ही सगळे उभे राहून गाणं म्हणत होतो. गाणं संपल्यावर उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवत होतो.

तो अवघडला, संकोचला. मग तोही उठून उभा राहिला. रंगमंचावर, कलाकार अथवा जादूगार, प्रयोगानंतर जसा कुर्निसात करतात तसा त्याने सगळ्यांकडे बघत लवून कुर्निसात केला आणि म्हणाला, ” मी आज खूप खूश आहे. आत्ताच टाटा हॉस्पिटलमधून येत आहे. Today is my first cancer free day. आज माझा कॅन्सर पूर्णपणे निघून गेल्याचं, मी कॅन्सरवर मात केल्याचं डॉक्टरांनी मला सांगितलं आहे. आज मी माझ्या मुलाबाळांकडे, बायकोकडे गावाला परत जाणार आहे. Thank you all for joining in.”

गाण्यामागचं कारण समजल्यावर गाण्याची अर्थपूर्णता आणखीनच वाढली, त्यानं हेच गाणं का म्हटलं तेही कळलं. आमच्या टाळ्यांचा जोर वाढला, आणि कॅन्सरवर मात करणारा तो योध्दा ताठ मानेने गाडीतून उतरून निघून गेला. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares