मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ बाबू समझो ईशारे, हारन पुकारे पम पम… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ बाबू समझो ईशारे, हारन पुकारे पम पम… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… साठच्या दशकातील मुंबईचा हा ट्राम चा फोटो मला फेसबुकवर दिसला… मन भुतकाळात गेले… कितीतरी बालपणीच्या आठवणी त्या ट्रामशी निगडीत होत्या त्या एकेक मनचक्षूसमोर उभ्या राहत गेल्या…. मला आठवतंय ते किंग्ज सर्कल, आताचा माहेश्वरी उद्यान,ते काळा घोडा, आताचं जहांगीर आर्ट गॅलरीचा परिसर इतका तिचा प्रवासाचा पल्ला असे… हमरस्ताच्या मधोमध लोखंडी पट्ट्याच्या , रेल्वे लाईन सारख्या खाचा पडलेल्या मार्गिका होती. त्यात आठ चाकांची ट्राम खडखड करत येजा करत असे… ट्राम टर्मिनस (T.T.) म्हणून परेल टी. टी., दादर टी. टी. राणीबाग. टी. टी. सायन टी. टी. आणी फ्लोरा फाउंटन टी. टी. अशी मुख्य ठिकाणी ट्रामचा मोठा पसारा असे…ट्राम स्टेशनस होते… अधे मधे प्रत्येक नाका, चौकात, थिएटर जवळ, मार्केट जवळ स्टेशन असत…माळा असलेली, आणि नसलेली स्वरुपात ह्या ट्राम फिरत असत… दोन्ही टोकाकडे उतर दक्षिण चालक उभ्यानेच दोन्ही हातांने हॅंडल फिरवित असे.. बहुधा एक लिवरचा आणि दुसरा ब्रेकचा अशी ती हॅंडलची रचना असावी… शिवाय पायात एक नाॅब असे.. हॅन्ड गियर काम करत असे… चालक एकच आणि वाहक दोन असत… आताची लोकल आणि ट्राम जवळपास सारखी फक्त ट्राम ला डबे नव्हते… अगदी संथगतीने ट्राम धावत असे… चालत्या ट्राम मधून बऱ्याच वेळेला हवे तिथे धीराचे लोक चढ उतरतं करत असतं…मोठमोठाल्या खिडक्या, दारं, संपूर्ण लाकडाच्या बनावटीची अशी हि ट्राम एका लय पकडून धावत असे.. पाच पैसे तिकीट असताना मी प्रवास त्यातून केलेला मला चांगलाच आठवतो…रविवार सुट्टीच्या दिवशी तर दोन तास फेरफटका त्यातून केल्या शिवाय दिवस मावळत नसे.. खूप गंमतीशीर अनुभव येत असे.. हळूहळू मुंबईची वस्ती वाढू लागली आणि वाहतूकही वाढली.. रस्तावर गर्दी वाढत गेली.. रस्ते दुतर्फा वाढविण्यासाठी ट्रामची जागा बळकावली गेली आणि आणि सन 1966/67च्या आसपास ट्रामची घरघर बंद झाली…

आजही जुन्या हिंदी सिनेमात मुंबई दर्शन दिसताना ती धावणारी ट्रामची छबी पाहिली कि आठवणींची जिंगल बेल मनात कुठेतरी वाजत असते…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “कशाले काय म्हनू नये…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “कशाले काय म्हनू नये…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

कशाले काय म्हनू नये…

अशाच काहीशा नावाची आणि अर्थ असणारी बहिणाबाई यांची एक कविता शाळेत होती…

बिना कपाशीनं ऊले

त्याले बोंड म्हनू नये…..

               हरिनाम हि ना बोले

               त्याले तोंड म्हनू नये……

नाही वाऱ्याने हालंल

त्याले पान म्हनू नये…

असे बरेच कशाला काय म्हणू नये हे खास अहिराणी भाषेत पण सहज समजेल या शब्दांत त्यांनी सांगितले आहे. हे सगळे दोष आहेत. माणूस म्हणून कसे रहावे हेच सांगण्याचा हेतू त्यात होता. यात त्यांनी माणूसच नाही, तर वनस्पती, आणि निसर्ग यांच्यातील अपप्रवृत्ती किंवा नकारात्मक गोष्टी सहज ओघावत्या शब्दात सांगितल्या.

पण आता काळ बदलला. जगण्याचे तंत्र (आम्ही आमचेच) बदलले. नवीन तंत्रज्ञानात आम्ही आमचे वागण्याचे ताळतंत्र काही प्रमाणात सोडले. कारण आता आला मोबाईलचा जमाना. आणि या मोबाईलच्या जमान्यात आम्ही माणूस म्हणून जगायचेच विसरलो. इतकेच नाही तर काही अपप्रवृत्तींचे दर्शन आम्ही राजरोसपणे दाखवायला, करायला लागलो. (अर्थात सगळेच नाही. पण संख्या कमी देखील नाही.) याचे वाईट वाटणारे आहेत तसेच समर्थक देखील आहेत. (तो खुपच ॲक्टिव्ह असतो, मोबाईल वर गाणं बघतच जेवतो, शाळेत जात नाही अजून, पण मोबाइल बरोब्बर हाताळतो इ…)

आता मोबाईल त्यातले फेसबुक, व्हॉटस्ॲप, गुगल, यू ट्यूब, इनस्टा. ट्विटर, गेम या बद्दलच तरुणाईचे ट्विट असते. असे आणि इतरही बरेच काही यातच आम्ही स्वतःला हरवले आहे. आम्ही या मोबाईलच्या अधीन झालो आहोत. आणि अप्रत्यक्ष पणे त्यांचे समर्थन देखील करतो.  आम्ही कामाव्यतिरिक्त बराचसा वेळ मोबाईल मध्येच घालवून वेळ घालवत असतो.

आज सहजपणे या मोबाईल बद्दल खालील प्रमाणे म्हणतील का?……. कारण सततचा त्याचा वापर. आणि तो वापरण्याची अधीरता.

        नाही केले अपडेट…..

        त्याला स्टेटस् म्हणू नये..

नाही बदलले चित्र…..

त्याला डी.पी. म्हणू नये.

         नाही आला मेसेज……

         त्याला गृप म्हणू नये.

नाही काढले फोटो…….

त्याला सोहळा म्हणू नये.

          ज्याने केले नाही फॉरवर्ड……

          त्याला ॲक्टिव्ह म्हणू नये.

जो जागेवरच थांबला…….

त्याला नेट म्हणू नये.

         जो वेळेवर संपला…..

          त्याला नेटपॅक म्हणू नये.

ज्याने नाही झाला संपर्क…….

त्याला रेंज म्हणू नये.

          ज्याने दाखविला नाही रस्ता…….

          त्याला मॅप म्हणू नये.

जी लवकर डिस्चार्ज झाली……

तिला बॅटरी म्हणू नये.

              ज्याचे दिले नाही उत्तर……..

               त्याला गुगल म्हणू नये.

जी भरते लवकर……

 त्याला मेमरी म्हणू नये.

                    ज्यात नाही नवे ॲप……

                    त्याला प्ले स्टोअर म्हणू नये. जो होतो सतत हॅंग…….

त्याला मोबाईल म्हणू नये.

 

शेवटी तर असे म्हणावे लागेल की……

 

        ज्यांच्याकडे नाही मोबाईल……..

        त्याला माणूस म्हणून नये.

जिथे नाही वाय फाय……..

त्याला घर म्हणू नये.

कारण आम्ही बराचवेळ काही कारणाने किंवा कारणाशिवाय मोबाईल सोबतच असतो.

सगळ्या नवीन गोष्टी वाईटच असतात असे नाही. पण चांगले काय आहे? हे आपणच समजून घेत ते आणि तेवढेच वापरले पाहिजे. नेमके, वेचक घेऊन  ठराविक काळात वापरला तर मोबाईल देखील चांगलाच आहे.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फक्त चौकट काढा…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ फक्त चौकट काढा…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

“साहेब गाडीची डिलिव्हरी घ्यायला किती वाजता  येणार?”

“मॅडम येतील. त्यांचा नंबर फॉरवर्ड करतो. त्यांच्या वेळेबद्दल त्यांच्याशी बोलून घ्या.”

“पण साहेब गाडी मोठी आहे.”

“मग काय झालं? घेऊन येतील त्या. तुम्ही बोला त्यांच्याशी”

नवी कोरी गाडी घरी आणण्यासाठी विश्वासाने (बायकांच्या गाडी चालवण्याबद्दल अनेक पोस्ट , अनेक जोक्स  सोशल मीडियावर फिरत असतात) नवऱ्याने माझा नंबर डीलरला दिला …त्यादिवशीच खरं माझा महिला दिन साजरा झाला.

**************

इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात गेलेल्या दिरांनी सेल्समनला माझा नंबर लावून दिला आणि प्रॉडक्ट विषयी माहिती द्यायला सांगितले.

“या सगळ्या माहितीवरून तुच ठरव बाई कुठलं घ्यायचं ते आम्हाला त्यातलं काही कळत नाही.”

माझा त्या क्षेत्रातील शिक्षणाचा असाही सन्मान झाला…. त्याच वेळी खरं तर माझा महिला दिन साजरा झाला

****************

एका कार्यक्रमासाठी नातेवाईक घरी जमले होते. खूप प्रयत्न करूनही ऑफिसच्या कामामुळे घरी जायला उशीर झालाच. सचिंत मनाने घरी पोहोचले आणि पटकन आवरायला घेतलं.

बाहेरून सासूबाईंचा आवाज ऐकू आला

“मनु आईला हा एवढा चहा नेऊन दे. दमून आलीये ती. खूप काम असतं आताशा तिला ऑफिसमध्ये.”

सगळ्या नातेवाईकांसमोर जेव्हा एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीच्या कर्तुत्वाचा आदर केला… त्याच दिवशी माझा महिला दिन साजरा झाला.

****************

“काही अडचण आली ना तर तुझ्याशी बोललं की बरं वाटतं. आपोआप सोल्युशन्स मिळत जातात आणि सगळे प्रॉब्लेम चुटकीसरशी सुटतात.” जेव्हा  बहिणी, मित्र-मैत्रिणी अशी सुरुवात करून त्यांचा प्रॉब्लेम विश्वासाने सांगतात आणि माझ्यावर अवलंबून राहतात …त्याच दिवशी खरं तर माझा महिला दिन साजरा झाला

****************

लेकीच्या कॉलेजमधील माझ्या आयुष्यातील हिरो या विषयावरील भाषण स्पर्धेत  हिरो म्हणून तिने माझं नाव घेतलं आणि सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्यांनी सभागृह दणाणून सोडलं…

 खरंच सांगते त्या दिवशी माझा महिला दिन साजरा झाला

****************

“तुम्ही नक्की करू शकता हे काम. काहीच अवघड नाही. Pl. Go ahead. We believe in your capabilities” पुरुषांच्या बरोबरीने कामाची जबाबदारीही तितक्याच आश्वस्तपणे बॉसने खांद्यावर टाकली, आणि सफलेतही भागीदारी दिली.. त्याच दिवशी माझा महिला दिन साजरा झाला.

****************

“मुली आहेत म्हणून काय झालं? माझ्या मुली माझा आधार आहेत.. अभिमान आहेत” असं म्हणत वडिलांनी पुढे प्रॉपर्टीबरोबरच खांदा आणि अग्नी देण्याचा अधिकारही आम्हाला बहाल केला. त्यांचं हे मानस ऐकलं… आणि खरं सांगते त्याच दिवशी माझा महिला दिन साजरा झाला.

*****************

नेहमीप्रमाणे नवऱ्याने ऑफिसला जाताना जवळ घेऊन आज Love you न म्हणता ‘ आम्हाला तुझा अभिमान आहे ‘ असं म्हटलं आणि सकाळी सकाळीच खरं सांगते माझा महिला दिन साजरा झाला.

महिलादिन म्हणजे महिलांसाठी विविध कार्यक्रम… कुठेतरी सवलतीच्या दरात काहीतरी उपलब्ध करून देणे किंवा  वेगवेगळ्या  पुरस्कारांची लयलूट करणे नाही.   इतक्या क्षुल्लक गोष्टींतून कोणी स्त्रीच्या आयुष्यात आनंद आणू शकत नाही…

महिलांच्या सबलीकरणावर आतापर्यंत बऱ्याच महिलांनी तसेच त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या पुरुष सहकार्यांनी सुद्धा  विविध स्तरांवर अवलोकन केले आहे.

डॉ. शुभांगी कुलकर्णी यांची एक अतिशय सुंदर कविता वाचनात आली होती. 

“ती स्त्री आरशाला विचारते–  

कसा आहेस?

आरसा म्हणतो ठीकाय..

फक्त ती चौकट तेवढी काढून टाक.. गुदमरायला होतंय.

तिने चौकट काढली आणि तेव्हापासून तिचा उत्फुल्ल चेहरा आरशात कधी मावलाच नाही…”

 

लेखक : अज्ञात

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘झपताल…’ – कविवर्य – विंदा करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘झपताल…’ – कविवर्य – विंदा करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

ज्या काळी, म्हणजे साठ सत्तर वर्षापूर्वी, ” महिला दिन ” साजरा करून त्या दिवशी खोटी … औपचारिक कणव दाखवून महिला वर्गाला शुभेच्छा देण्याची प्रथा नव्हती, त्या वेळी नामवंत कवी विंदा करंदीकर यांनी  ‘ झपताल ‘ या नावाची किती सुरेख कविता लिहून तत्कालीन  स्त्रीचे  जीवन  रेखाटले होते ते दर्शविण्यासाठी ती कविता  खाली देत आहे. आता सर्रास इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या तरुण पिढीला  हे  कोण विंदा ? असा प्रश्न पडणे साहजिकच  आहे . पण घरातील कोणा शिकलेल्या  आजी … आजोबा  , काका…काकू ,मामा… मावशी ,आई …बाबा  याजकडून ते माहीत करून घ्यावे … 

विंदांच्या या ‘झपताल’ कवितेचं वैशिष्ट्य हे की ती कविता कोणी स्त्रीने लिहिलेली तक्रारवजा कविता नाही, तर त्या जुन्या काळांतल्या एका पुरुषाने, एका संवेदनशील पतीने आपल्या पत्नीचं केलेलं कौतुक आहे. 

आपल्याकडे महाराष्ट्रातल्या साधारणपणे मध्यम आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात सत्तरऐंशी वर्षांपूर्वी घरी चोवीस तास ‘आई’ किंवा ‘पत्नी’ म्हणून कामाच्या रगाड्यात भरडल्या जाणा-या आणि चाळीतल्या सव्वा-दीड खोलीत आयुष्य काढीत उभं आयुष्य फक्त सहन, सहन आणि सहन करीत करीत काढलेल्या महिलांची काय स्थिती होती, ते विंदांनी त्यांच्या ‘झपताल’ या कवितेत समर्पकपणे मांडलेलं आहे. 

आमच्या मागच्या पिढीतल्या नऊवारी लुगड्यातल्या कोणाही आजी, आई, मावशी, आत्या, काकू, मामी…. यांना स्वत:ची ‘मतं’ तर दूरच राहिली, स्वत:ची ‘पर्स’ही त्यांना माहीत नव्हती. तरी घटस्फोट न घेता, (ब्रेक-अप न करता) आणि कोणतंही ‘लोन’ न घेता, भांडततंडत का असेना, पटलं न पटलं तरी, पन्नास पन्नास, साठ साठ वर्ष चार, पाच, सहा मुलं वाढवून, पुढे त्यांना मार्गी लावून, ‘त्याचसाठी अट्टाहास करीत  ‘शेवटच्या दिसापर्यंत’ टुकीने संसार निभावले.   

विंदांची ही कविता हल्लीच्या तरुणींना समजेलच असं नाही, त्यात त्यांची चूकही नाही. कारण त्यांना हे मुळातच काही माहीतच नाही. त्यातल्या काही अस्सल ‘मराठी’ शब्दांचा अर्थही समजणार नाही, उदा. ओचें,  उभे नेसून,  पोतेरें,  मुतेली, बाळसे, चूल लाल होणे, मंमं, आणि संसाराची दहा फुटी खोली.. वगैरे. घरी एखादी आजी असलीच तर तिला त्यांनी या शब्दांचे अर्थ विचारावे. ते दिवस आणि तो काळ  ज्यांनी पाहिला आहे, भोगला आहे, त्यांनाच ही कविता चांगली समजेल, घरोघरच्या साठी-सत्तरी उलटून गेलेल्या केवळ महिलांनाच नव्हे तर घरोघरच्या संवेदनशील असलेल्या पुरूषांनाही समजेल. 

☆  झपताल

ओचें बांधून पहांटे उठते तेव्हांपासून झपाझपा वावरत असतेस

कुरकुरणा-या पाळण्यामधून दोन डोळे उमलूं लागतात 

आणि मग इवल्या इवल्या मोदकमुठीतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते …… 

 

उभे नेसून वावरत असतेस.. तुझ्या पोते-याने म्हातारी चूल पुन्हां एकदां लाल होते

आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील तीन मुतेली वाळवूं लागतो 

म्हणून तो तुला हवा असतो…… 

 

मधून मधून तुझ्या पायांमध्यें माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात 

त्यांची मान चिमटीत धरून तूं त्यांना बाजूला करतेस, 

तरी पण चिऊकाऊच्या मंमं मधील एक उरलेला घास त्यांनाही मिळतो …… 

 

तूं घरभर भिरभिरत असतेस, लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात 

स्वागतासाठी तूं ‘सुहासिनी’ असतेस..वाढतांना ‘यक्षिणी’ असतेस .. भरवतांना ‘पक्षिणी’ असतेस, 

सांठवतांना ‘संहिता’ असतेस .. भविष्याकरतां तूं ‘स्वप्नसती’ असतेस .. 

संसाराच्या दहा फुटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्रा चपखल बसवणारी …… 

 

… तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही.

कविवर्य – विंदा करंदीकर

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ताकद पुस्तकाची… लेखिका :सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ ताकद पुस्तकाची… लेखिका :सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

फेसबुकवर एका मित्राने प्रश्न विचारला होता, असं फक्त एक पुस्तक सांगा, ज्या पुस्तकामुळे तुमचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.

तो प्रश्न वाचला आणि माझं मन दहा वर्षं मागे धावलं.

मी गरोदर होते तेव्हाची गोष्ट. तिळी मुलं पोटात आहेत, हे कळल्यामुळे आधीच धाकधूक होत होती.

पहिले तीन महिने तर इस्पितळाच्या वाऱ्या करण्यातच निघून गेले होते.

 पाचव्या महिन्यात नुकतंच सगळं थोडं स्थिरस्थावर झालं होतं. सुटकेचा निःश्वास सोडते न सोडते तोच एका दुपारी अचानक पोटात खूप दुखायला लागलं.

डॉक्टरना फोन केला तर ते म्हणाले की लेबर पेन्स असू शकतात. ताबडतोब इस्पितळात भरती व्हा.

तसेच अंगावरच्या कपड्यानिशी इस्पितळात गेले. तपासणी करून डॉक्टर गंभीर चेहेऱ्याने म्हणाले, “प्री-टर्म लेबर पेन्स आहेत. पुढच्या चोवीस तासात कधीही बाळंतपण होऊ शकतं!”

लगोलग पोटातल्या बाळांच्या फुफ्फुसांची वाढ होण्याकरता Steroidsची इंजेक्शन्स देण्यात आली आणि वेदना कमी करण्यासाठी मला एक औषध ड्रीपवर लावलं.

ते औषध शिरेतून शरीरात जाताना तापता लाव्हा नसानसांत ओतल्यासारखं सर्वांग जळजळत होतं.

ते औषध एक Muscle Relaxant होतं. गर्भाशय हा एक मोठा स्नायू आहे, त्याच्या वेदना कमी करण्यासाठी दिलेलं. पण ते शरीरातले सगळेच स्नायू शिथिल पाडतं, अगदी हृदयाचे देखील. त्यामुळे सतत Heart Monitor वर राहावं लागायचं.

लघवीसाठी केथेटर. जेवण म्हणजे सलाईन आणि गळ्यापासून खाली जवळ जवळ Paralysis झाल्यासारखीच स्थिती. सगळ्या जाणीवा शाबूत, पण काहीही करता यायचं नाही स्वतःहून.

अशा परिस्थितीत असताना तिथल्या डॉक्टरनी तिथल्या कायद्याप्रमाणे दिलेली एकूण परिस्थितीची आकडेवारीसकट माहिती. ‘येत्या चोवीस तासात बाळं जन्माला आली तर त्यांची जिवंत राहण्याची शक्यता इतके टक्के, मतीमंद निपजण्याची इतके टक्के, रेटीनल आंधळेपणाची इतके टक्के, मेंदूला गंभीर इजा होण्याची इतके टक्के’.

हादरूनच गेलो होतो मी आणि नवरा दोघेही. आम्ही दोघंच इस्पितळात. मला तो आणि त्याला मी.

आई-बाबांना व्हिसा नाकारलेला. सासूबाई परत भारतात जाऊन आठवडा पण झाला नव्हता, त्यामुळे त्याही इतक्या लवकर परत येण्याची शक्यता नाही.

अशा वेळी धीर देणारं, पाठीवरून हात फिरवणारं एखादं वडिलधारं आपलं माणूस जवळ नाहीये, ही जाणीव किती भयानक असते, ते सांगून समजणार नाही.

त्यात औषधामुळे सुरु झालेल्या जबरदस्त हेल्यूसीनेशन्स!

बाहेर जर काही खुट्ट आवाज झाला की छातीत धडधडायला लागायचं.

टीव्ही बघायला लागले तर टीव्हीवरची बातम्या सांगणारी बाई आता बाहेर येऊन माझा गळा दाबणार, अशी अनावर भीती वाटायची.

नवरा दोन क्षण जरी खोलीबाहेर पडला, तरी सैरभैर व्हायचे मी. दहा-दहा मिलीग्रामच्या झोपेच्या गोळ्या घेऊनही जेमतेम तास-दोन तास झोप लागायची. बाळं इतक्या लवकर जन्माला आली तर त्यांचं काय होणार ही जीवघेणी भीती प्रत्येक क्षण सतावणारी. विचार करून करून अक्षरशः वेडी झाले होते मी.

नवरा सतत बरोबर होता. आई-बाबा, मोठे दोघे भाऊ, इतर नातेवाईक, मैत्रिणी सगळे फोनवरून धीर द्यायचे, पण काही सुचत नव्हतं. जगण्याची ऊर्मीच संपलेली होती. एखाद्या विकल क्षणी वाटून जायचं, सगळं संपवून टाकावं एकदाचं, खूप झोपेच्या गोळ्या एकदम घेऊन. मोठ्या निकराने तो विचार मागे ढकलायचे. पण चांगले विचार यायचेच नाहीत मनात. सारखी मनाला ग्रासून बसलेली भीती. केसाळ, कुरूप, हिंस्त्र!

अशाच एका काळ्याकुट्ट क्षणी नवऱ्याने हातात पुस्तक ठेवलं. रणजीत देसाई यांचं श्रीमान योगी. घरून त्याने ते मुद्दाम आणलं होतं. ‘वाच’, तो म्हणाला.

मला तर पुस्तकाचं पानही उलटवता येत नव्हतं स्वतःहून. पण नवऱ्याने डॉक्टरला सांगून एका स्टॅन्डवर ते पुस्तक ठेवलं आणि मी वाचायला लागले. आधी श्रीमान योगीची पारायणं केली होती. पण त्या दिवसांत मला जिजाऊ जशी भेटली, तशी ती आधी कधीच कळली नव्हती.

मी वाचत गेले, पानं नवरा उलटायचा किंवा नर्स.

त्या पुस्तकात एक प्रसंग असा आहे, शिवाजी महाराज पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजा जयसिंगच्या तंबूत पंचहजारी मनसबदारी स्वीकारायला जातात आणि अपमानाने विद्ध होऊन परत राजगडावर येतात. ते कुणाशीच बोलू इच्छित नाहीत.

शेवटी जिजाऊ स्वतः त्यांच्या महालात जातात, महाराजांना समजवायला. महाराज एकदम निराशपणे बोलत असतात. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करूनही ते ऐकत नाहीत. तेव्हा जिजाऊ एकदम संतापाने फुत्कारतात.

आता नेमके शब्द आठवत नाहीत, पण त्यांच्या संवादाचा साधारण आशय असा होता:

अपमानाच्या, कुणी वाली नसण्याच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका, राजे. परमुलखात, परक्याघरी, नवऱ्याने टाकलेल्या अवस्थेत मी तुम्हाला जन्म दिला. सासरमाहेरचा कुठलाच आधार नसताना. तुमच्या चिमण्या बोटाला धरून पुण्यात आले. ओसाड गावची जहागीरदारीण मी, नवरा हातातून सुटला, मोठा मुलगा कायमचा गमावला, तरी तुम्हाला कुठल्या बळावर मोठं केलं आम्ही?’

तो उतारा वाचला आणि अंगाला एकदम झिणझिण्याच आल्या! टेक्सास मधल्या इस्पितळातल्या त्या खिडकी नसलेल्या, तुरुंगासारख्या खोलीत, अंगात पाच-सहा नळ्या खुपसलेल्या अवस्थेत मी तो उतारा कमीत कमी पंचवीस वेळा तरी वाचून काढला असेल.

एकदम स्वतःची लाज वाटली. वाटलं, त्या माउलीने इतकं सगळं सोसून जगाला शिवाजी दिला आणि मी माझ्या पोटातल्या, माझ्या रक्तामांसाच्या गोजिरवाण्या बाळांसाठी एवढंही सहन करू शकत नव्हते?

पुस्तकातल्या जिजाउंचा एकेक करारी शब्द एखाद्या आसूडासारखा माझ्या देहा-मनावर फुटत होता, मला धिक्कारत होता, फटकारत होता आणि त्याच वेळी आईच्या डोळस मायेने मला परत उभं राहण्यासाठी गोंजारतही होता.

कडयाच्या टोकावर उभी होते मी तेव्हा. सभोवताली सगळा अंधारच होता. कुठूनही कसलाही आशेचा किरण दिसत नव्हता. तीन जिवांची जबाबदारी

डोक्यावर होती. त्यांचं पुढे काय होईल ही जीवघेणी भीती प्रत्येक क्षणी मनाला ग्रासून होती. त्या विलक्षण नाजुक मनःस्थितीत असताना श्रीमान योगीमधल्या त्या एका उताऱ्याने मला परत जगण्याची जिद्द दिली.

परिस्थितीशी लढण्याची ताकद दिली. खऱ्या अर्थाने माझा स्वतःकडे, माझ्या परिस्थितीकडे, माझ्या देहांत वाढत असलेल्या त्या तीन जिवांकडे बघायचा दृष्टीकोन पार बदलून गेला.

डॉक्टरांचे सर्व निष्कर्ष धाब्यावर बसवत मी पुढे जवळ जवळ नऊ आठवडे त्या इस्पितळात काढले. त्याच शरपंजरी अवस्थेत. त्या दिवसांत मी श्रीमान योगी कमीतकमी पाचवेळा तरी वाचून काढलं असेल.

मुलं जन्माला आली ती सातवा महिना संपल्यावरच. त्या नऊ आठवड्यांमध्ये त्यांना खऱ्या अर्थाने नवीन जीवन लाभलं होतं.

कदाचित गरोदर असताना श्रीमान योगी इतक्या वेळेला वाचल्यामुळे असेल, पण माझ्या मुलांना शिवाजी महाराजांच्या गोष्टींचं, त्यांच्या एकूणच चरित्राचं, त्यांचे किल्ले पाहण्याचं अनावर आकर्षण आहे!

योग्य वेळी हातात पडलेलं एखादं पुस्तक, एखाद्या प्रतिभावान लेखकाच्या लेखणीतून उतरलेले शब्द, एखाद्या डोंगराएवढ्या मोठ्या व्यक्तीचं चरित्र खरंच, आपलं आयुष्य पूर्ण बदलून टाकू शकतं!

खूपवेळा जीवनात आपल्याला कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते. आपली अडचण किंवा व्यथा कुणाला सांगावी कळत नाही अशा वेळेला पुस्तके साथ देतात….एका गुरूची भूमिका बजावत….आज काल वाचन म्हणजे फेसबुक, व्हाट्सअप्प वरील पोस्ट किंवा न्युजपेपर मधील ब्रेकिंग न्यूज….. याव्यतिरिक्त वाचन करायची आज काळाची गरज आहेयातूनच आपण घडतोआपले विचार प्रगल्भ बनतात….म्हणतात ना की अजून वर्षांनी आपण कोठे असणार आहोत, हे दोनच गोष्टी ठरवतात….एक म्हणजे आपण कोणत्या व्यक्तीसोबत उठबस करतो आणि दुसरे म्हणजे आपण आज काय वाचन करत आहोत….. .!!.

लेखिका :सुश्री शेफाली वैद्य

संग्राहिका :सुश्री शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ☆ “काळजी—घेणे आणि करणे…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “काळजी—घेणे आणि करणे…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल एक गौरगोपालदासजींची छोटीशीच पण भरपूर समज देणारी आँडीओक्लीप ऐकली.गौर गोपाल दास सांगतात, ‘प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे, पण तुम्ही दुःखावर लक्ष केंद्रित करता की सुखावर, यावर तुमचे भवितव्य अवलंबून असते. गौर गोपाल दास यांनी साधू संतांच्या बाबतीत म्हटले, की संसारी माणसालाच दुःख असते असे नाही, तर सन्यस्त माणसालाही दुःख आहेच. कारण जोवर आपण देहाने या जगात आहोत, तोवर राग, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्विकार चिकटलेले असणारच. तसेच जगण्यासाठी, पोटापाण्यासाठी पैसा लागणारच, शारीरिक व्याधी होणारच, थंडी, ऊन, वारा, पाऊस  यांचा जाच होणारच. मात्र या सगळ्या गोष्टी घडूनही आपण त्यातून स्वतःसाठी जर आनंद शोधायचा ठरवले तरच आनंदी राहू शकतो.

ही क्लीप ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपलं जितकं नुकसान येणाऱ्या संकटाने होतं त्याच्या कित्येक पट  जास्त नुकसान ते संकट प्रत्यक्ष यायच्या आधीच्या भितीने, कल्पनेने आपलं आँलरेडी होऊन जातं फक्त आपल्या ते लक्षात येत नाही वा जाणवत नाही. काही वेळा आपण करीत असलेल्या अवास्तव काळज्याचं आपले जास्त मानसिक खच्चीकरण करतात.

मानवी स्वभाव मोठा अनाकलनीय आहे. बरेच वेळा आपल्या स्वतःला “बाबापुता” करुन स्वतःच्या मनाला कुरवाळयला,सांत्वना द्यायला फार आवडायला लागतं,मग आपण ते सहाणेवर गंध उगाळल्यासारखं आपल्याच दुःखाचे, व्यथांचे वेटोळे ,फेरे स्वतःभोवती फिरवीत बसतो आणि इथेच आपला घात होतो.

स्वतःच्या मनाला कणखर बनवून संकटाला दटके सामना करायला फक्त आणि फक्त तुम्हीच शिकवू शकता.

..सद्यस्थितीत नैराश्याने ग्रासलेले लोक परदेशातच नाही तर भारतातही मोठ्या प्रमाणात आहेत. याचे कारण शोधायचे झाले तर लोक स्वमग्न होत आहेत. आपल्या विषयात अडकून राहिलो कि आपल्याला आपले प्रश्न मोठे वाटतात आणि आपण त्याचाच विचार करत बसतो. दर दिवशी नवीन आव्हाने, नवीन प्रश्न समोर येणारच आहेत, मात्र प्रश्नांनी समस्यांनी खचून न जाता आपण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधला तर आपणही आनंदी होऊ शकतो. म्हणजेच काय तर राग, दुःख, त्रास आपोआप येऊन आपल्याला चिकटणार आहेच, पण त्यातून आनंद आपल्याला जाणीवपूर्वक निवडावा लागेल.

…कुठल्याही संकटाचा कमी जास्त प्रकोप हा आपल्याला वाटणा-या भितीशी संलग्न असतो.नुकत्याच आलेल्या संकटाच्या लाटेनं हे आयुष्य किती क्षणभंगुर आहे ह्याची जाणीव करुन दिली.ह्या भितीचा उगम हा काळजी मधून होतो.काळजीचा अतिरेक झाला की त्याची जागा भिती घेऊ लागते आणि भीतीची का एकदा मनावर पकड बसली की संकटाचा उद्रेक सुरू होतो.

कुठलही नवीन संकट सामोरं येऊन उभं ठाकलं की त्याबद्दलची भिती मनात घर करुन बसते,नव्हे अगदी ठाणच मांडून बसते.त्या संकटाची तीव्रता ही परिस्थिती पेक्षाही आपल्या मनाच्या अवस्थेतील काळजी,भीती ह्यांनी वाढते.

पण ह्या मनाने लाऊन घेतलेल्या भितीलाही शेवटी कुठेतरी मर्यादा ही असतेच.कालांतराने ही भितीही आंगवळणी पडल्यासारखी मानगुटीवर चढूनच बसते.पण नंतर एकवेळ अशी अवस्था येते की ह्या काळजी,भिती ची कमाल मर्यादा ओल्यांडल्या जाते आणि मग त्या क्षणापासून त्यातील हवाच निघून जाते.मनात निर्माण झालेली भिती हीच परिस्थिती बिघडवण्यास जास्त कारणीभूत असते.नोकरी घरकाम, वाचन लेखन वा तत्सम आपल्या आवडत्या कला ह्या सारख्या सकारात्मक गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवलं तर मग परिस्थिती चुटकीसरशी सकारात्मक होते.

कदाचित काही वेळी परिस्थिती फारशी बदलली जरी नसली तरीही स्वतः मधील बदलांमुळे ह्या संकटातून बाहेर पडल्यासारखं वाटतं हे नक्की. त्यामुळे सभोवताली निरभ्र आकाश आणि घेतलेला मोकळा श्वास सुखावू लागतो.काळजी जरुर घ्यावी पण काळजी करीत बसू नये हे मात्र कोरोनानेच शिकविले

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दडपण — महिला दिनाचे !!… ☆ सुश्री अश्विनी अभ्यंकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ दडपण — महिला दिनाचे !!… ☆ सुश्री अश्विनी अभ्यंकर ☆

मला ‘महिला दिन’ आला की दडपण येते… महिला दिनी मला काय वाटले पाहिजे, मी काय केले पाहिजे, कसे वागले पाहिजे म्हणजे महिला दिनाचा आनंद मला आहे असे प्रतीत होईल, हे मला कळत नाही. एकाहून एक सुंदर आणि कलात्मक banners, भावनेला हात घालणारे संदेश, स्त्रीमुक्तीचा पुरस्कार करणारे लेख, ह्यांनी फोन भरून गेलेला असतो. ह्या दिवसाच्या निमित्ताने गोष्टींचा व्यापक आढावा घेणे, सिंहावलोकन करणे, हे कुठेच दिसत नाही. फक्त उत्सवी प्रक्षेपण दिसते. 

वास्तविक भारत हा खूप मोठा देश आहे आणि ज्याला जसा पाहिजे तसा तो त्याला दिसतो. म्हणजे देशातल्या सर्व महिला आपल्या सारख्याच आहेत, असा भाबडा समज होऊ शकतो. खरं तर आपला देश म्हणजे वीसेक युरोपीय देशांचा ऐवज होय. तर मग वीस प्रदेश, त्यांच्या भाषा, संस्कृती, समाजव्यवस्था – आणि ओघानेच तितक्याच प्रकारात मोडणाऱ्या महिला. त्यात भर म्हणून प्रत्येक प्रांतातले विविध स्तर – प्रिविलेज्ड क्लास, एन्टायटल्ड क्लास, अंडर प्रिव्हिलेज्ड क्लास, असे अनेक. शिवाय धर्म, जात इत्यादी वर्गीकरणं, ती तर आहेतच. ह्या व इतर प्रकारात मोडणाऱ्या महिला, त्यांच्या समस्या, कसोट्या, अडचणी एका सूत्रात बांधता येतील का? मग महिला दिन हा सगळ्यांसाठी एकच प्रकारात मोडेल का? मला जे वाटते तेच माझ्यापासून शंभर किलोमीटरवर राहणाऱ्या महिलेला वाटेल का? मग महिला दिन सामान्यकृत असू शकतो का?

काय केले किंवा कसे वागले म्हणजे आपण योग्य अर्थाने स्त्री म्हणून स्वाभिमानाने आणि आनंदाने जगू शकू? काय विचार केल्याने आपण खऱ्या अर्थाने मुक्त पण जबाबदारपणे आयुष्य जगू शकू? कुठल्या दिशेने आपल्याला ‘स्व’चा शोध होऊ शकेल? महिला म्हणून आपल्या स्वतःकडून काय अपेक्षा आहेत?  त्याचप्रमाणे महिला म्हणून इतरांनी आपल्याकडून काय अपेक्षा ठेवाव्यात?—- अनेक वर्षं शोषण व अन्याय सहन करणाऱ्या वर्गाच्या हातात अधिकाराचे बळ आले की तोच वर्ग तसेच शोषण आणि अन्याय करू लागतो हा अनुभव खरं तर बऱ्याचदा येणारा. मग आता स्त्रीच्या बाबतीतही ही अशीच व्याख्या होणार नाहीये ना? आपल्याला स्त्री म्हणून विशेषाधिकार हवा आहे का समानाधिकार? —– ह्या व अश्या अनेक गोष्टींचे विचार महिला दिनाच्या निमित्ताने दरवर्षी माझ्या डोक्यामध्ये येतात. त्यामधे एक भीती देखील वाटते….. स्त्रीची खरी अस्मिता आणि भावना या ‘ महिला दिना ‘च्या गलक्यात हरवत जात नाहीये ना? नाहीतर स्त्री समानता, स्त्रीमुक्ती, महिला सशक्तीकरण या चळवळी, फक्त दिसायला सुरेख असणाऱ्या banners आणि भाषिक सौंदर्य असणार्‍या संदेशापलीकडे जाऊच शकणार नाहीत !… असेही होऊ शकते की …

© सुश्री अश्विनी अभ्यंकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वैदिक मूर्तीकार श्रीमान अत्तार…लेखक – अप्पा पाध्ये गोळवलकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

वैदिक मूर्तीकार श्रीमान अत्तारलेखक – अप्पा पाध्ये गोळवलकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

आज एक वेगळाच विषय मांडतोय!! जिथे जिथे म्हणून हिंदु संस्कृती विस्तारली, फोफावली, विकसित झाली, अशा जगाच्या एका मोठ्या भूभागावर आजही त्या संस्कृतीच्या खुणा ठळकपणे दिसतात! मग ते आंगकोरवाटचे मंदिर असो वा अफगाणिस्तान मधील भव्य बुद्ध मंदिर असो. त्या त्या ठिकाणी हिंदुंच्या पूजा पद्धतीतील अनिवार्य अशा विविध देवांच्या मूर्ती आढळतात! भारतात खूप ठिकाणी संगमरवराची मंदिरे असतात आहेत. पण या प्राचीन मंदिरात श्रीमूर्ती मात्र काळ्या पाषाणाचीच असते !!

आमच्या गावात पुरातन गणेश मंदिर आहे. ते अगदी हायवेला नजीकच आहे. पण त्यात मूर्ती नव्हती. खूप वर्षे ! आमची पिढी अगदी गद्धेपंचविशीत होती तेव्हा आम्ही त्या देवळाचा जीर्णोद्धार केला अन् पंढरपूरहून संगमरवरी गणेशाची मूर्ती आणली ! आमच्या बुद्धीप्रमाणे त्या मूर्तीकाराला, मूर्तीला रंग देऊ नको असे सांगितले.कारण जर का मूर्ती कुठे भंग पावली असेल तर ती जाणवावी ! यथावकाश विधीवत अर्चा वगैरे होऊन नित्यपूजा सुरु झाली ! पूजेत वापरण्यात येणाऱ्या दूध, दही, साखर, तुप, मध वगैरे बाबी अन हवामानामुळे त्या मूर्तीवर जो पावडरचा थर त्या ‘जाणत्या’ मूर्तीकाराने दिला होता, तो निघून गेला; अन् एक भयानक वास्तव सामोरे आले !! त्या मूर्तीला पोटापासून कंबरेपर्यंत तडा होता हो !असो.

मग जाणत्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मूर्तीचा शोध सुरु झाला. अन नांव समोर आले ते बेळगांवचे प्रसिद्ध मूर्तीकार श्रीयुत अत्तार यांचे !!लगेचच आम्ही बेळगांवला गेलो अन अत्तारजींकडे पोहोचलो !नमस्कार चमत्कार झाल्यावर त्यांनी येण्याचे प्रयोजन विचारले. आम्ही सारं घटीत अघटित सांगितले. त्यावर ते उत्तरले की माझ्याकडून मूर्ती हवी असेल, तर किमान एक वर्ष तरी लागेल. आम्ही कबूल झालो !

त्यांनी विचारले की मूर्ती कशी हवी ?क्षणांत आम्ही म्हटले की, दगडुशेठ सारखी हवी! मग ते विचारते झाले की तुम्हाला मूर्तीकलेतील कितपत ज्ञान आहे? मग आमची बोलती बंद! मग त्यांनीच मूर्तीकलेबाबत सखोल माहिती दिली. ते स्वत: कर्नाटक विद्यापीठात, आयकॉनॉलॉजी विभागाचे (निवृत्त) मुख्य होते. अन महत्वाचे हे की त्यांचे घराणे म्हैसूर नरेश वाडीयार यांचे पिढीजात राज शिल्पी आहेत! ते म्हणाले की तुम्ही कोणतीही पुरातन देवालये पहा, ती वस्तीत नव्हती. तर कुठे जंगलात, डोंगरावर आहेत. याचे कारण ज्या देवाचा वास ज्या स्थळी आहे तिथेच ते देवालय बांधायचे असते. उदाहरणार्थ देवीचे मंदिर जर बांधायचे असेल तर एक विशिष्ट विधी करुन ठरवावे लागते की देवीचा वास कुठे जास्त आहे ते! मग तिथे एक विहिरसदृष्य खड्डा खणण्यात येतो. ठराविक खोलीवर त्या विहिरीला जिवंत झरा मिळतो. त्या झऱ्यावर सहा ते आठ इंच जाडीचा तांब्याचा पत्रा ठेवायचा. अन त्या पत्र्यातून तीनचार इंच जाडीचा ताम्ररज्जु जमिनीवर आणायचा. त्या तांब्याच्या दोराला ‘एनर्जी थ्रेड’ असे म्हणतात. मग त्या दोऱ्यातून सप्त धातुंचे सप्त कलष ओवायचे. त्या सप्तकलशात सप्तधान्य, सप्तनद्यांचे पाणी वगैरे पवित्र वस्तू भरत भरत ती विहिर बुजवायची. आणि त्या दोराचे जे वर आलेले टोक आहे तिथे मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. आणि मूर्तीच्या मूलाधार चक्राजवळ तो दोरा जोडून द्यायचा. म्हणजे  मग ती देवालये निरंतर टिकतात. त्यांची ख्याती होते वगैरे!

आणि मूर्ती कोणत्या दगडाची असावी हे सांगताना ते म्हणतात की मूर्ती ही कृष्णशीळेतच हवी !

भारतात साधारण तीन प्रकारचे दगड आढळतात. ते म्हणजे काळा दगड, संगमरवर आणि ग्रॅनाइट! यातील ग्रॅनाइट हा नपुंसक दगड आहे. संगमरवर हा स्टोअरेज कॅपॅसीटी नसणारा दगड आहे. तर कृष्णशीळा हा दगड, तुम्ही जे जे संस्कार त्या मूर्तीवर कराल ते साठवून ठेवण्याची क्षमता अन् योग्य वेळी भक्तांना फळ देण्याची शक्ती, कृष्णशीळेच्या मूर्तीत असते ! नंतर ते म्हणाले की मी वेदात जसे वर्णन आहे, तशीच मूर्ती घडवतो ! जर वेदपाठशाला असेल तर तिथे विद्यागणेशाची मूर्ती आवश्यक. नांदत्या घरात कधीही नटराजाची मूर्ती स्थापू नये कारण ती नाट्यदेवता आहे. घराचं नाट्यमंदिर व्हायला वेळ लागणार नाही ! तसेच गणेशाच्या मूर्तीच्या हातात परशु, पाश, लाडु/मोदक ह्या बाबी अत्यावश्यकच. प्रभावलय(प्रभावळ) हवेच. त्याचा किरीटही विशिष्ट असा हवा! प्रत्येक देवतेच्या मूर्तीला एक ताल असतो. जसे विष्णूची मूर्ती नवतालात, देवीची सप्ततालात तर गणेशाची मूर्ती पंचतालातच असावी! आता म्हणाल ‘ताल’ म्हणजे काय? तर मूर्तीच्या चेहऱ्याच्या पांचपट मूर्तीचे शरीर; म्हणजे पंचताल!  बघा विष्णुच्या मूर्ती ह्या उंच असतात अन् गणपतीची बैठी असते !

एवंच आम्हाला अत्तारसाहेबांनी ज्ञानी केले. मूर्ती घडवून दिली ती अगदी सुबक!

आता हे ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी लिहिलेय. आपल्या पूर्वसुरींनी आपल्यासाठी केव्हढे ज्ञानभांडार ठेवलंय याचीही कल्पना यावी. आपली संस्कृती किती प्रगल्भ आहे याची जाणीव असावी.

म्हणून हा लेखन प्रपंच!!

लेखक – अप्पा पाध्ये गोळवलकर

गोळवली, कोंकण, ९८९०८ ३९४९३

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पूर्णांगिनी… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

? मनमंजुषेतून ?

☆ पूर्णांगिनी… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

(अंतरराष्ट्रीय महिला दिन 2023)

नवरा बायको, दोन मुलं वा एक मूल अशी साधारण कुटुंबाची हल्ली रचना आढळते. संयुक्त कुटुंब पद्धती आता कमी होऊ लागली आहे. या आगोदर कोणत्याही कारणाने जोडीदाराचा मृत्यू झाला तर त्या बाईला आणि तिच्या मुलांना सर्वस्वी सासरच्या किंवा माहेरच्या लोकांवर अवलंबून राहावे लागत असे. एका बाजूला तिची ते त्यांच्या परीने जबाबदारी उचलताना दिसत होते. दूसऱ्या बाजूला तिला कुणाकडूनही मदत न मिळाल्याने तिची खूप वाईट अवस्था होत असे. आता ही काही ठिकाणी हे पाहावयास मिळत आहे. सावित्रीजोतीबांनी शाळेची सुरुवात केली त्या काळात जे स्त्रीयांचे हाल होते ते आता कमी झाले आहे. तेव्हा पेक्षा बराच बदल झालेला आहे. त्यावेळी मुलींचे शिक्षण खूपच कमी असायचे अगदी वाचायला येण्या इतपतच होते. हल्ली मुलींचे माध्यमिक तसेत उच्च माध्यमिक शिक्षणाचे प्रमाण चांगले आहे. त्यांचे स्वाभिमान, आत्मभान जागृत होताना दिसत आहे. अडथळे कमी झालेले नाहीत वा पुरुषसत्ताक/ पितृसत्ताक  व्यवस्थेत खूप काही अफलातून बदल झालेले दिसून येत नाहीत, तरीही शिक्षणाने इच्छाशक्ती व आत्मविश्वास वाढला आहे असे म्हणता येईल. सावित्रीजोतीबांच्या आणि बाबासाहेबांच्या योगदानाचे हे फलित आहे. हे विसरुन चालणार नाही. कुणावरही अवलंबून न राहता स्वावलंबी होण्याची इच्छा प्रबळ होताना दिसते आहे. त्या प्रबळ ईच्छाशक्तीला सहकार्याची जोड म्हणावी तशी मिळत नाही. सगळेच अलबेला आहे असे नाही पण जात्यापासून काॕम्पुटर, स्मार्ट फोन पर्यंतचा तिचा प्रवास अनेक अडथळ्यांच्या शर्यतीतही उठावदार झाला आहे.

बायका स्वबळावर कुणाचाही आधार नसताना खूप घडपडताना दिसतात. यात सुशिक्षित आणि अशिक्षित असा भेद होऊ शकत नाही. करुच नये. प्रत्येक स्त्री स्वतःच्या कौशल्याचा कुटुंबासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करीत आहे. 

जोडीदाराचा अचानक मृत्यू झाल्यावर अथवा शेतकरी कुटुंबात व इतर व्यवसायात जोडीदाराने अनेक अडचणींना तोंड देताना आलेल्या मानसिक तणावाने स्वतःचे जीवन संपवलेले असले तरी या महिला हिंमतीने जगणं उभे करताना दिसतात. कोविडच्या काळात अनेक जणींनी जोडीदार गमावला. अशा एकल स्त्रीया न खचता पुर्णांगीनी होऊन आई व बापाची भूमिका निभावताना दिसतात. अजूनही पुनर्रविवाह म्हणावे इतके होत नाही. शिवाय विधूर पुनर्विवाहासाठी कुमारीच शोधताना दिसतात. विधवांच्या पर्यायाचा विचार पुनर्विवाहासाठी विधूर करीत नसतील तर त्यांना त्या अगोदरच्या आपत्यासहित स्विकारणे तर दूरची गोष्ट. अगदीच अपवाद म्हणून कुठेतरी हाताच्या बोटावर मोजण्या इतके आपत्यासहित विधवेशी लग्न करणारे दिसतात. फुलेंनी त्यांच्या काळात सुरु केलेले विधवा पुनर्रविवाह अजूनही प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही. पण विधवा बायका स्वबळावर ताठ मानेने जगताना दिसतात. किंवा काही महिला लग्न न करता अथवा लग्न राहून गेलेल्या स्वतःच्या हिंमतीवर जगताना दिसतात. हे चित्र माणूस म्हणून आनंदादायी आहे. अशांनाच मला पूर्णांगिनी म्हणायचे आहे.

माझ्या मते कर्तव्यतत्पर, निस्पृह, निष्कपट, निःस्वार्थी, परोपकारी, धेय्याला समर्पित, जगण्याची आस असलेले, मृदू पण तितकेच कठोर आणि कणखर ते नेहमी सुंदर…! 

माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुंदर असलेल्या अशा अनेक स्त्रिया आहेत. यांचे जोडीदार तसे नावापुरतेच जोडीला होते. काही करकोळ गोष्टी सोडल्या तर मुलं जन्माला घालण्यातच जोडीदाराचा काय तो सहभाग. अन्यथा संसाराचा गाडा या माऊलींनीच पुढे ओढत नेला. जोडीदार सोडून गेल्यावरही कोणत्याही प्रसंगाला बळी न पडता, सामाजिक व्यवस्थेला शरण न जाता, प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ जगण्यावर त्यांनी मनापासून प्रेम केले. अतिशय कष्टाने, परिश्रमाने जीवनाची वाट चालत त्या जगण्यावर स्वार झाल्या. माणूस म्हणून अनेक प्रसंगाशी दोन हात करत स्वतःला जिंकत आल्या. अशा सखींचा मला खूप अभिमान आहे..! त्या खऱ्या अर्थाने पूर्णांगिनी आहेत. असे मला वाटते.

खरंतर शेतीचा शोध लावणारी, मातृत्व पेलणारी, संगोपन करणारी, समर्पणाने मानवी मुल्ये पेरणारी, शिवबा घडवणारी, वेळप्रसंगी युद्धात लढणारी, आणि युद्धापेक्षा बुद्ध मानणारी ती कधीच दुर्बल नव्हती. पण व्यवस्थेने तिला एकीकडे देवीचा दर्जा दिला त्याचवेळी तिला अबला, दुर्बल, दुय्यम ठरविले आणि तिच्यावर अन्याय होत गेला. सत्ता संपत्तीला खूप महत्त्व आले. क्रांती प्रतिक्रांती आणि परत क्रांती होत महिला सबलीकरण सुरु झाले. आता प्रत्येक जण महिलांना सक्षम करण्यात गर्क आहे. पण या सक्षम झालेल्या महिलांशी पुरुषांनी योग्य रीतीने वागावे यासाठी त्यांची मानसिकता घडविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. ही आजची खंत आहे. म्हणून पुरुष सबलिकरणाची गरज भासू लागली आहे. 

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री सक्षमपणे उभी आहे. तिच्या शिवाय जन्मच नाही. पण तिची तारेवरची कसरत चालू आहे. मदतीचा हात तिला कुणाकडून मिळत नाही. तिच्या मनात दाटलेले काळे ढग कुणाला दिसतील का? तिने पापण्यांपर्यंत आडविलेला पाऊस कुणाला जाणवेल का ? वादळातही मन सावरुन इतरांसाठी झटणारी ती कधी कुणाला उमगेल का ? आशा, आकांक्षा जपण्यासाठी तिला वेळीच साथ मिळेल का ? का तिने सोडून द्यावे त्याग, समर्पण सारे? मुक्त वावरावे अनिर्बध, स्वतःला शोधण्यासाठी?….. 

ती म्हणेल कधीतरी तळमळून “नकोच बाईपण, ओझ्याने थकलेले आईपण.” मग काय कराल ?  माणूसपणाच्या सागरात तिलाही डुंबायचे आहे. त्यामुळे वेळीच आवरा, माणूस म्हणून सावरा नाहीतर विपरीत घडेल ! आई, आईपण दोन्ही गोठून जाईल !

ग्रामीण भागातील सखी तर कुणी कितीही पसरो, ती मुकाट्याने आवरत असते. काबाड कष्ट करून मुलांना वाढवते. जगण्याच्या शोधात कामानिमित्त  रानोरान भटकते. अनेक संकटांना निमूटपणे सहन करते. मध्येच जोडीदाराचा साथ सुटला तरी हिंमतीनं पोटच्या मुलांसाठी झटते. मुलांच्या शिक्षणासाठी जीवाचं रान करताना दिसते. वेळप्रसंगी अनेकांच्या समोर पदर पसरते. पण हार मानत नाही. मनातली घुसमट कोंबून ठेवते. ठेच लागली तरी एकाचवेळी डोक्यावरील घागर आणि कडेवरचं तान्हुलं बाळ अलगद सावरताना दिसते. अनेक वेदना घेऊन हसणं जपून ठेवते. तिच्या समर्पणाची, कष्टाची, आणि सहनशीलतेची कला कुणाला कधीच जमणार नाही, असे मला वाटते. अशा माणसातील पूर्णांगिनी आईला मी मनापासून मनापासून सलाम् करते. शेवटी जाताजाता माझ्याच कवितेतून मला एवढेच म्हणावेसे वाटते की …… 

तू कोणाशी बरोबरी करु नकोस, 

तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!

 

तू जन्मदात्री, तू संगोपन करणारी

तू शेतीचा शोध लावणारी

त्यागाची परिभाषा तू

सती जाणारी ही तूच

युद्धापेक्षा बुद्ध मानणारी तू 

तू कोणाशी बरोबरी करु नको,

तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!

 

तू जिजाऊ, तू सावित्री 

तू झाशीची राणी, तू रणरागिणी

तू इंदिरा, तू कल्पना चावला,

अनेक रूपात, अनेक क्षेत्रात

पाय रोवून उभी आहेस तू,

तू कोणाशी बरोबरी करु नको,

तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!

 

तू सुंदर आहेस, कर्तृत्ववान आहेस 

चेहऱ्याला लेप लावून सजवू नकोस 

तू नितळ, निर्मळ, प्रेमळ, आहेस 

तू निधर्मी व विज्ञानवादी हो 

तू दैववादात अडकू नकोस,

प्रयत्नवाद कधी सोडू नकोस 

तूच कुटुंबाचा गाभा आहेस..

तू कोणाशी बरोबरी करु नको,

तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!

 

तुला कुणी विकू नये.

तुला कुणी विकत घेऊ नये..

अशी आईच्या हृदयाची माणसं

तूच घडवू शकतेस..

बलात्कार, अन्याय, अत्याचार तू 

स्वतःच थांबवू शकतेस…

तू सर्व सामर्थ्याने पेटून उठू शकतेस

तू कोणाशी बरोबरी करु नको,

तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!…. 

 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9767812692/9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “हुतात्मा मैनावती पेशवे : कर्तव्यकठोर लखलखीत रूप” लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “हुतात्मा मैनावती पेशवे : कर्तव्यकठोर लखलखीत रूप”… लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

नानासाहेब पेशवे यांची एकुलती एक मुलगी मैनावती. चौदा वर्षांचे वय, परंतु धाडसी वृत्तीमुळेच नानांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या बायका-मुलांना वाचवण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवली. त्याच दरम्यान ती इंग्रजांच्या तावडीत सापडली. नानासाहेबांचा ठावठिकाणा विचारण्यासाठी त्यांनी तिचा खूप छळ केला. पण तिने तोंड उघडले नाही ते नाहीच. तिला झाडाला बांधून पेटवून देण्यात आले. आणि या देशाच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून पंचत्त्वात विलीन झाली.

आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या या कर्तव्यकठोर स्त्रीचं, हे बहुआयामी लखलखीत रूप खास जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने.

१८५७ च्या बंडाचा काळ, बंडाचा वणवा उत्तर भारताइतक्या मोठय़ा प्रमाणात दक्षिण भारतात पेटला नव्हता. या बंडाचे नेतृत्व मात्र राणी लक्ष्मीबाई झाशीवाली, नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांनी केले. याच काळातील कर्तव्यकठोर, सहृदय मैनावतीची कथा.

मैनावतीबद्दल एक पानभर मजकूर एका हिंदी पुस्तकात वाचायला मिळाला होता. ते पुस्तक उत्तरेकडच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या माहितीचा कोश होता. त्यानंतर आणखी एका हिंदी भाषिक लेखिकेने तिच्याबद्दल थोडासा मजकूर लिहिलेला वाचनात आला. मराठय़ांच्या इतिहासाबद्दल अभ्यास असणाऱ्या अनेकांना मैनावतीबद्दल विचारले. पण कुणालाच अशी कुणी मुलगी/बाई १८५७ च्या वणव्यात विद्युल्लतेप्रमाणे कडाडून अमर झाल्याची माहिती मिळाली नाही. गेली ४/५ वर्षे माहिती मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. माझ्या मानगुटीवर स्त्री अभ्यासाचे भूत बसलेले आहे व ते मी बाजूला करावे व उतारवयात नाही ती म्हणजे नसलेली मढी उकरू नयेत, असा उपदेशवजा सल्ला मला मिळत राहिला. पण मैनावतीला मी माझ्या मनातून बाहेर काढू शकले नाही आणि अचानक तात्या टोपे यांचे नातू विनायकराव टोपे मु. बिठूर यांनी संपादित केलेली ‘क्रांती का संक्षिप्त परिचय’ ही पुस्तिका हाती आली. या पुस्तिकेत मैनावतीची कथा आहे. आशालता व्होरा यांनी आपल्या पुस्तकात केलेले उल्लेख, उत्तर भारतीय स्वातंत्र्यसैनिक चरित्रकोश व विनायकराव टोपे यांच्या पुस्तिकेतील मैनावतीची माहिती यांचे धागेदोरे विणत गेले व वाटले की टोपे कुटुंब हे पेशवे कुटुंबाशी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या जवळचे कुटुंब होते. त्यांच्याबरोबरच टोपे कुटुंब उत्तरेकडे आले होते. त्यामुळे विनायकराव टोप्यांची माहिती दंतकथेवर आधारलेली असण्याची शक्यता कमी आहे. कोश व टोपे यांच्या मजकुरावरून स्पष्ट दिसते की मैनावतीची कथा ही सत्यकथा आहे. त्यावर संशोधन करून भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात तिला तिचे मानाचे पान मिळायलाच हवे.

नानासाहेब पेशवे यांना एकुलती एक मुलगी होती. मुलीला आजीचे नाव मैनावती हे ठेवले. मैनावतीची आई लवकरच गेली व आजीतर त्यापूर्वीच गेली होती. मैनावतीला पेशवे घराण्याच्या रीतीप्रमाणे लिहिणे, वाचणे, पत्रे तयार करणे इत्यादी गोष्टी शिकवल्या असणारच. धार्मिक ग्रंथांची पारायणे ही गोष्ट त्यात आलीच. नानासाहेबांचे आपल्या मुलीवर जिवापाड प्रेम होते. आईविना मुलगी म्हणून तसे ते शक्य होतेच तसेच आपल्याला परक्याच्या घरी जाणाऱ्या या मुलीला वेळ देता येत नाही या विचारामुळेही अधिक होते. नानासाहेब पेशवे व इंग्रज यांचे सुरुवातीचे संबंध बरे होते (इति टोपे). त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांच्या बरोबर प्रसंगापरत्वे ऊठबस होत असावी. मैनावतीचेही इंग्रज मुलींच्या बरोबर संबंध होते. त्यामुळे त्यांच्या सहवासात तिला कामचलाऊ इंग्रजी समजू लागले व बोलताही येऊ लागल्याचे टोप्यांच्या माहितीवरून कळते.

मैनावतीची कथा सुरू होते ती पेशव्यांच्या कानपूर विजयापासून. शिपायांनी कानपूर लुटले. बिबिका घर, सतीचौरा ही ठिकाणे जाळली. इंग्रज बायका व मुले यांना कैद केले. हे कैदी नानासाहेब पेशव्यांसमोर हजर करावे की कानपूरच्या इतर इंग्रजांप्रमाणे त्यांनाही येशूकडे पाठवावे, असे शिपायांनी नानासाहेबांना विचारले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे इंग्रज मुलाबायकांचा निकाल लावायचा असे ठरवून शिपाई  नानासाहेबांच्या आज्ञेची वाट पाहू लागले. शिपायांचा मानस कळल्यावर नानासाहेबांना वाईट वाटले. मराठय़ांच्या इतिहासात शत्रूच्या बायका-मुलांची कत्तल कधीच झाली नव्हती. शिपायांचे असे वर्तन हे मराठय़ांना शोभणारे नाही. त्यामुळे ‘इंग्रज मुला-बायकांना सन्मानाने बिठूरला पोहोचवावे व त्यांची व्यवस्था आपण जातीने करू’ असा उलटा खलिता नानासाहेब पेशव्यांनी पाठविला. इंग्रजांचा कुटुंबकबिला त्यांनी मैनावतीच्या स्वाधीन केला. त्या सर्वाचा दोन दिवस पाहुणचार करून त्यांना इंग्रजांच्या फौजेत परत पाठविण्याचा आपला बेत त्यांनी मैनावतीला सांगितला. इतकेच नाही तर ते सर्व सुरक्षित पोहोचण्याची जबाबदारीही मैनावतीवर सोपवली. त्या करता त्या कबिल्याबरोबर मैनावतीला जातीने सोबत करावयास सांगितले. मैनावतीबरोबर असल्यामुळे त्यांचा प्रवास निर्धोक पार पडेल याचा नानासाहेबांना विश्वास होता. या प्रवासात पहिला इंग्रज फौजेचा जथ्था जिथे भेटेल तिथे इंग्रज बायका-मुले त्यांच्या स्वाधीन करून मैनावतीने परत फिरावे, असा आदेश मैनावतीला होता. मैनावतीच्या सोबतीमुळे इंग्रज कुटुंबे सुखरूप प्रवास करू शकली. रस्त्यातील दंग्याधोप्यांचा त्यांना त्रास झाला नाही. आपल्याला सुखरूपपणे आपल्या लोकांच्या हवाली केल्याबद्दल त्यांना मैनावतीबद्दल कृतज्ञता वाटली तर नवल नाही. मैनावती ही नानासाहेबांची मुलगी आहे हे त्या इंग्रज बायकांना माहीत होते की नव्हते, की त्यांना ही मैनावती सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी तिचे नाव गुप्त ठेवणे योग्य वाटले असावे हे कळायला मार्ग नाही.

मैनावती बिठूरला पोहोचण्यापूर्वी नानासाहेबांनी बिठूर सोडले होते. कारण शिपायांनी जिंकलेले कानपूर परत इंग्रजांनी हिसकावून घेतले होते व ते बिठूरच्या दिशेने निघाले होते. बिठूरला येऊन इंग्रजांनी पेशव्यांचा किल्लेवजा वाडा लुटला. पेशवे कुटुंबातील फक्त मैनावती व नोकर चाकर व आश्रयदाते वाडय़ात होते. मैनावती सोडून सर्व पळून गेले. वाडा बेचिराख करण्याकरता त्यावर तोफा डागण्याचा हुकूम दिला. तोफांची हलवाहलव मैनावतीच्या कानी पडली. ती तडक वाडय़ाच्या बाहेर येऊन उभी राहिली. तिला तिथं उभी पाहताच इंग्रज सेनापती थॉमसला आश्चर्य वाटले. कारण वाडा लुटताना तिथे चिटपाखरूही आढळले नव्हते. तिला पाहता क्षणीच थॉमसने तिला ओळखले. मैनावतीने त्याला इंग्रजीत पण नम्रपणे विचारले. ‘‘ज्या वाडय़ाला आपण बेचिराख करायला निघाला आहात त्या वाडय़ाने आपले काय वाकडे केले आहे? तो तर आश्रयदाता आहे. त्याने आपला असा कोणता अपराध केला आहे? ’’ थॉमसने उत्तर दिले, की वाडा न जाळण्याची परवानगी मला व्हाईस रॉयकडून तार करून मागवावी लागेल. त्यांनी परवानगी दिली तर वाडा जाळणार नाही. तार लंडनला पोहोचली. लॉर्ड सभेत चर्चा झाली. काही लॉर्डानी एक विचित्रच सूर लावला. थॉमसचे मैनावतीवर प्रेम बसले असावे म्हणून तो वाडा तोफांच्या साहाय्याने उडवायला हिचकीच करतो आहे. वाडा तर उद्ध्वस्त झालाच पाहिजे पण थॉमसच्या समोरच (मैनावतीकडून नानासाहेबांचा पत्ता विचारून) मैनावतीला जिवंत जाळली पाहिजे. लॉर्ड सभेचा हा अजबच न्याय होता!

मैनावतीने विद्रोही सैनिकांच्या पासून इंग्रज अधिकाऱ्यांच्या बायका-मुलांना वाचवले होते. त्यांना प्रथम वाडय़ात ठेवून घेऊन सुरक्षितपणे इंग्रजांच्या गोटात पोहोचवले होते. अशा मैनावतीला ही शिक्षा इंग्रज लॉर्डाची सभ्य संस्कृती किती बेगडी होती हे लक्षात येते. आठव्या शतकात हिंदुस्थानच्या उत्तर सीमेवर आलेल्या रानवट मुसलमानांच्या टोळ्यांनी केलेल्या कृत्याइतकेच ते भीषण होते. थॉमसची मुलगी मैनावतीची मैत्रीण होती. मैनावतीचे मोठेपण व तिने इंग्रज कुटुंबांना विद्रोही सैनिकापासून वाचविले ही गोष्ट म्हणजे इंग्रज अधिकाऱ्यांवर असलेले उपकारच आहेत असे ती परत परत ओरडून सांगत होती. मैनावतीच्या देखतच तिचे राहते घर तोफांच्या भक्ष्यस्थानी पडले. तिला कैद्यासारखी वागणूक देत कानपूरला इंग्रज कमिशनरसमोर उभे केले. नानासाहेबांचा ठावठिकाणा विचारण्यासाठी तिचा खूप छळ केला. मैनावतीने छळ सहन केला पण काहीही बोलण्यासाठी तोंड उघडले नाही ते नाहीच. मैनावतीचे वय त्यावेळी १४/१५ वर्षांचे असावे. मैनावतीचा छळ करूनही ती काहीच माहिती देत नाही याचा कानपूर कमिशनरला खूप संताप आला. त्यांनी तिला झाडाला बांधून पेटवून देण्याची आज्ञा दिली. हा भीषण प्रसंग बघण्याकरता कानपूर शहरवासीयांस मुद्दाम हजर राहण्यास सांगितले होते. दहशत बसविण्याचा तो एक मार्ग होता. मैनावती जळत होती. लोक अश्रू ढाळत होते. पण मैनावतीने तोंडाने जराही आवाज केला नाही आणि या देशाच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून पंचत्वात विलीन झाली.

मैनावतीला नानासाहेबांचे नाव न सांगितल्यामुळे जाळून मारली यात टोपे व आशालता व्होरा यांचे एकमत आहे. तपशिलात थोडा फरक आहे. टोपे यांच्या म्हणण्याप्रमाणे कानपूर मधून प्रसिद्ध होणाऱ्या ‘बखर’ नावाच्या वर्तमानपत्रात तत्कालीन इतिहासकार महादेव चिटणीस यांनी  नानासाहेबांच्या एकुलत्या एक कन्येच्या जिवंत जाळण्याची व तिने शांतपणे मरणाला कवटाळण्याची बातमी दिली होती. तिला शांतपणे जळताना पाहून हिंदवासीयांना ती देवतास्वरूपी वाटत होती. मैनावती ही हिंदी स्वातंत्र्याच्या लढय़ात आहुती देऊन अमर झाली.

एका स्त्रीचं हे कर्तव्यकठोर रूप. त्यासाठी आगीचा दाह सहन करण्याची सोशिकता, इंग्रजांच्या बायका-मुलांना सुखरूप पोहोचण्यामागची ममता, त्यासाठी संरक्षक कवच म्हणून जाण्यातलं साहस, पत्ता गुप्त ठेवण्यासाठीची कणखरता, मृत्यू कवटाळण्यातलं धाडस, एका स्त्रीचं हे बहुआयामी लखलखीत रूप, एक स्त्री काय करू शकते हे दाखवणारं…

लेखक : अज्ञात   

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares