मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “रांगोळीचा किस्सा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “रांगोळीचा किस्सा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

आजेसासूबाई आंघोळ उरकून, बाहेर तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढत होत्या. अनेक ठिपक्यांच्या रांगा आणि त्यांच्या सुरकुतलेल्या बोटांमधून भरभर पडणारी, न तुटणारी, ओल्या तांदूळ पिठाची ओळ. बघता बघता माझ्या डोळ्यांसमोर अनेक पाकळ्यांचं कमळ तयार झालं, तेही ओळ कुठेही न तुटता.

थोड्या वेळाने बेल वाजली. मी दार उघडलं. रोजचा भाजीवाला आला होता. त्याने आपली टोपली खाली ठेवली तर त्याचा तोल थोडा सुटून, रांगोळीच्या एका पाकळीवर ती पाटी घासली. अजून तांदूळ पिठाच्या ओळी सुकल्या नव्हत्या. त्यामुळे ती पाकळी साहजिकच विस्कटली. आजींनी इतका वेळ खपून काढलेली रांगोळी जेमतेम पंधरा मिनिटंसुद्धा टिकली नव्हती. मला खूप वाईट वाटलं.

मी त्या भाजीवाल्यावर ओरडणार, इतक्यात आजीच बाहेर आल्या.

त्यांनी भाजी घेतली, पैसे दिले आणि त्या परत आत निघून गेल्या. विस्कटलेल्या रांगोळीकडे त्यांनी पाहिलं, पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मी मात्र खूप वेळ हळहळत होते.

नंतर दुपारी जरा निवांत बसलो असता, मी आजींना विचारलं, इतकी खपून काढलेली सुरेख रांगोळी पंधरा मिनिटंसुद्धा टिकली नाही. तुम्हाला वाईट नाही वाटलं ?

त्या हसल्या. म्हणाल्या, रांगोळी काढीत होते तोवर ती माझी होती. ज्या क्षणी रांगोळी पूर्ण झाली, त्या क्षणी ती बघणाऱ्याची झाली. रांगोळी काढताना ज्या आनंदाची अनुभूती मला झाली होती, त्याच आनंदाची अनुभूती तुला रांगोळी बघताना झाली ना ? मग झाला रांगोळीचा उद्देश सफल !

इतकी मन लावून काढलेली सुरेख रांगोळी पूर्ण झाली, त्या क्षणी त्यांनी त्या रांगोळीतून स्वतःच्या भावना अलगद हलक्या हाताने सोडवून घेतल्या होत्या.

रांगोळीचा उद्देशच हा असतो. जीवन कितीही सुंदर असलं, तरी ते रांगोळीसारखंच क्षणभंगुर आहे, हे स्वतःला दररोज बजावून सांगण्याचा रांगोळी हा एक सुंदर मार्ग.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ योगी… कवयित्री – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण.. श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? काव्यानंद ?

☆ योगी… कवयित्री – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण.. श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

माणसाचा आणि निसर्गाचा काहीही संबंध नाही असे समजणारी माणसे समाजामध्ये आहेत. पण ती माणसे हे विसरुन जातात की माणूस हाच मुळी निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. आपला प्रत्येक सण, उत्सव किंबहुना आपली संस्कृतीच निसर्गावर आधारलेली आहे हे आपण जाणतोच. त्यामुळे कवी, कवयित्री, चित्रकार यासारख्या कलाकाराला स्वतःच्या आयुष्याकडे पाहतानाही निसर्ग हा आठवतोच! निसर्गातील प्रतीके वापरुन मानवी जीवनाचा अर्थ व्यक्त करणारी अनेक काव्ये, साहित्यकृती आपण वाचल्या आहेत. अशीच एक रुपकात्मक कविता वाचनात आली. ती म्हणजे कवयित्री सौ. राधिका भांडारकर यांची ‘ योगी ‘ ही कविता.

सौ राधिका भांडारकर

☆ योगी ☆

मातीतल्या बीजाला

अंकुर फुटतो

धरणीला आनंद होतो

पावसाचे शिंपण होते

अन् रोप उलगडते

हळुहळू त्याचा

वृक्ष होतो

तो बहरतो, फुलतो, फळतो

आनंदाची सर्वत्र पखरण करतो

 

मग आयुष्याचा तो क्षण येतो

पानगळीचा…

एक एक पान गळू लागते

फांदीला सोडून धरणीवर उतरते

त्याचवेळी आभाळाची ओढ सरते

ज्या मातीतून उगवले

तिथेच परतीची पाऊले

विलग पानांचा होतो पाचोळा

वार्‍यावर उडतो कचरा सोनसळा

वृक्ष होतो बोडका

तरी भासतो योग्यासारखा

गळणार्‍या पर्णांना निरोप देताना

उभा ताठ, ना खंत ना वेदना

कर्मयोगी निवृत्तनाथ

ऋतुचक्राशी असे बद्ध

एकाकी हा कातरवेळी

संवाद करी पानगळी

हा शिशिर सरेल

पुन्हा वसंत फुलेल

नव्या जन्मी नवी पालवी

हिरवाईने पुन्हा नटेल. .

~ राधिका भांडारकर

‘योगी’ ही एक रुपकात्मक कविता आहे. माणसाचं जगणं समजावून सांगण्यासाठी निसर्गातील वृक्षाचा रुपक म्हणून उपयोग करुन घेतला आहे. कविता जसजशी वाचत जावी तसतसं लक्षात येत की हे सगळं मानवी जीवनाला लागू होतय. सुरुवातीला कवयित्री म्हणते,

“मातीतल्या बीजाला

 अंकुर फुटतो

 धरणीला आनंद होतो

 पावसाचे शिंपण होते

 अन् रोप उलगडते

 हळुहळू त्याचा

 वृक्ष होतो

 तो बहरतो, फुलतो, फळतो

 आनंदाची सर्वत्र पखरण करतो”

बाळाला जन्म दिल्यावर मातेला होणारा आनंद आणि बीजाला अंकुर फुटल्यावर मातीला होणारा आनंद — मातेला होणारा असो किंवा मातीला होणारा आनंद असो — त्या आनंदाची अनुभूती एकाच प्रतीची नाही का ? सृजनशीलतेचा आनंद अगदी एकसारखाच आहे. पुढे पाऊस पडतो. पाणी मिळत जातं आणि रोप उलगडते. आई तरी याशिवाय वेगळं काय करते ? संगोपनाच्या मेघातून मायेचा वर्षाव होतो आणि मूल मोठं होत जातं, नाही का ? कवितेत पुढे म्हटल्याप्रमाणे रोपाचा जसा वृक्ष होतो तसे त्या बाळाचेही रुपांतर पूर्ण व्यक्तीमध्ये होते. वृक्षाने सर्वांगाने बहरावे त्याप्रमाणे माणूसही त्याच्यावर होणार -या संस्कारांमुळे पूर्ण विकसित होतो. त्याच्या कर्तृत्वाने फुलतो, कर्माची फळे मिळवत जातो आणि आनंदाची, सौख्याची पखरण करतो–एखाद्या वृक्षाप्रमाणेच!

निसर्गाचा जो नियम वृक्षाला लागू, तोच नियम माणसालाही लागू होतो. (कारण माणूस निसर्गापासून वेगळा नाहीच). यापुढील काव्यपंक्ती,

“मग आयुष्याचा तो क्षण येतो

 पानगळीचा. . .

 एक एक पान गळू लागते

 फांदीला सोडून धरणीवर उतरते

 त्याचवेळी आभाळाची ओढ

 सरते. “

या काव्यपंक्ती काय सुचवतात पहा. वृक्षांची पानगळ सुरु होते. पूर्ण बहरलेला वृक्ष एक एक पान गाळू लागतो आणि निष्पर्ण होऊ लागतो. त्याचे वैभव ओसरते. ही पानगळ असते त्या वृक्षाच्या आयुष्यातील उतरणीचा, संकटाचा काळ असतो. माणसाच्या आयुष्यातही संकटे येतात. माणूस काही काळ खचून जातो. वैभवाला, प्रगतीला उतरती कळा लागते. कवयित्रीने पुढे म्हटल्याप्रमाणे ” आभाळाची ओढ सरते “. म्हणजे नवीन काही करण्याची, पुढे जाण्याची, आभाळ कवेत घेण्याची उमेद रहात नाही. त्यापुढील काव्यपंक्ती

“ज्या मातीतून उगवले

 तिथेच परतीची पाऊले”

या ओळी हेच सांगतात की ज्या मातीतून पाने वर वर आली त्याच मातीत पानगळीच्या निमित्ताने ती पाचोळा होऊन खाली पडत आहेत, वृक्षापासून अलग होत आहेत. म्हणजे जिथे वैभव मिळाले तिथेच ते सोडून देण्याची वेळ येते. बघता बघता वृक्ष बोडका होतो. फक्त शुष्क फांद्या दिसू लागतात. पानगळ होत असताना तो निमुटपणे सहन करत एखाद्या कर्मयोग्यासारखा, खंत, खेदाच्या पलीकडे जाऊन ताठपणे उभा असतो. जी पाने गळून गेली त्याबद्दल दुःख नाही. उलट ऋतूचक्राशी असलेले नाते समजून घेऊन पानझडीचा शिशिर संपण्याची वाट पहात उभा असतो. कारण त्याला माहित असतं, पुढे वसंत येणार आहे. पालवी फुटणार आहे. नवी पाने येणार आहेत. पुन्हा हिरवाईने नटायचे आहे. आभाळाकडे झेप घ्यायची आहे.

मानवी जीवनाचे यापेक्षा वेगळे काय आहे ? संकटांचा ऋतू आला की सुखाची पानगळ सुरु होते. प्रगती थांबली की काय असे वाटू लागते. हे सगळं यश, वैभव इथेच सोडून जावं लागणार की काय ? अशीही भावना होऊ लागते. पण… पण तरीही माणूस डगमगत नाही. कारण त्यालाही जीवनचक्राचे नियम माहित होतात. दुःखाचे वादळ आले तरी त्याला वावटळ समजून अंगावर घेतले पाहिजे. कारण पुढे सुखाचा वसंत येणार आहे याची खात्री असते. हा विश्वास त्याला कुठून मिळतो ? निसर्गातूनच! असा एखादा वृक्ष दिसू लागतो पुनःपुन्हा बहरणारा आणि त्याच्या मनाच्या मातीतही उमेदीचे अंकुर फुटू लागतात. मानवी जीवन आणि निसर्ग यांच हे अतूट नातं कवयित्रिने अगदी अचूकपणे टिपले आहे.

कवितेत वापरलेले ‘कर्मयोगी निवृत्तीनाथ’ हे शब्द मला फार महत्त्वाचे वाटतात. कारण कर्म करुनही त्याचे फळ मिळाले नाही किंवा मिळालेले फळ निसटून गेले तरी मनाची शांती ढळू न देता जो निवृत्त होतो तोच खरा कर्मयोगी आणि निवृत्तीनाथ ! वृक्षाच्या प्रतिकातून मानवी जीवनावर सहजपणे भाष्य करताना कवितेला झालेल्या या आध्यात्मिक विचारांच्या स्पर्शामुळे कविता एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोचते. आयुष्यातील चढउतार पचवायची ताकद ख-या कर्मयोग्यातच असते. निवृत्त होऊनही नव्या जन्मीच्या हिरवाईची वाट पाहणारा जीवनाविषयीचा आशावाद, सकारात्मकता या कवितेतून दिसून येते.

“ज्या मातीतून उगवले

 तिथेच परतीची पाऊले”

या ओळी वाचताना “माती असशी, मातीत मिसळशी” किंवा “तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी, माती सांगे कुंभाराला” या काव्यपंक्तींची आठवण येतेच. एकच विचार प्रत्येक कवी आपल्या स्वतंत्र प्रतिभेने कशा पद्धतीने मांडत असतो हे अशा काव्यांतून स्पष्ट होते.

वृक्षाच्या अंगी असलेले कर्मयोगीत्व जर माणसाने अंगिकारले तर त्याचं जीवनही पुनःपुन्हा प्रगतीच्या, वैभवाच्या हिरवाईने बहरून येईल असा सुप्त संदेश देणारी ही कविता एक सुंदर निसर्ग काव्याचे रुप घेऊन आपल्यासमोर सादर केल्याबद्दल कवयित्री सौ. राधिका भांडारकर यांना मनःपूर्वक धन्यवाद!

रसग्रहण –  सुहास रघुनाथ पंडित

सांगली.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्राणायाम… एक वैज्ञानिक अभ्यास… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ प्राणायाम… एक वैज्ञानिक अभ्यास… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(पुरस्कार प्राप्त लेख)

नमस्ते प्राण प्राणते नमो अस्त्व

पानते/ पराची नाय ते नमः,

प्रतीचीनाय ते नमः, सर्वस्मैत इदं नमः//

” हे प्राणा, जीवनाच कार्य करणाऱ्या तुला नमस्कार असो. अपानाचे कार्य करणाऱ्या तुला नमस्कार असो. पुढे जाणाऱ्या आणि मागे सरणाऱ्या प्राणास नमस्कार असो. सर्व कार्य करणाऱ्या तुला माझा नमस्कार असो. “

रोजच्या प्रमाणे संध्याकाळी फिरायला निघाले. जाता जाता दवाखाने पाहिले. जवळजवळ 30-35 दवाखाने बरीच गर्दी असलेले दिसले. मनात विचार आला, खरंच इतके आजार का बरं वाढले असतील? इतके भौतिक प्रगती होऊनही आरोग्य नीट राखता येत नाही असं दिसतं. त्यासाठी जीवन पद्धती बदलायला हवी ; ही गोष्ट पाश्चा त्यांनाही कळल्याने ते लोक आता भारतीय अध्यात्म, आणि योग साधनेचा अभ्यास आणि अनुभव घेऊ लागले आहेत.

मानवाच्या कल्याणासाठी आदर्श आणि निरामय जीवन कसे जगावे, याबद्दल अनुभवातून, (इ. स. पूर्व 200 वर्षे) ऋषी पतंजलीनी शास्त्रीय दृष्ट्या अष्टांग योगाची रचना सांगितली आहे. उपनिषदे हे तत्त्वज्ञान (theory). आणि पतंजली योग ही साधना. (Practical) आहे. त्यांनी ‘योग म्हणजे चित्त वृत्तींचा निरोध’ अशी व्याख्या केली आहे. “तस्मिन्सती श्वास प्रश्‍वासयो: गतिविच्छेदः” म्हणजे प्राणायामात श्वासाची गती तुटणे. “त्यांनी सांगितलेले ज्ञान हे एक आचरण शास्त्र आहे. त्यांनी सांगितलेली अष्टांगे यापैकी बाह्यंगे— यम (सत्य, अहिंसा, अस्तेय,  ब्रह्मचर्य अपरिग्रह) नियम— (शुद्धी, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान). आसन— –शरीराची सुख स्थिती. प्राणायाम— प्राणाचे नियमन किंवा दिशा देणे. अंतरंगेप्रत्याहार –इंद्रियांची बाहेरची धाव बंद करणे. धारणा —- एखाद्या गोष्टींवर मन स्थिर करणे. ध्यान— धारणेशी एकता- नता. आणि शेवटी समाधी स्थिती. प्राणायाम हा प्रकार अंतरंग आणि बहिरंग यांना जोडणारा सेतू आहे असे म्हणायला हरकत नाही. सुदृढ शरीर, मन आणि आत्मा पवित्र करायचा असेल तर ते कार्य प्राणायामाद्वारे होऊ शकते. जवळ जवळ 80 टक्के व्याधी प्राणायामाच्या अर्ध्या तासाच्या नियमित सरावाने लवकर दूर होतात. तसेच ध्यान आणि समाधी ही ही सहज प्राप्त होते. ही एक पूर्ण वैज्ञानिक पद्धत आहे.

संपूर्ण ब्रह्मांडाचे निर्माण ज्या पंचतत्वांच्या योगाने झाले, त्याच्या मुळात एक तत्व जे सर्वत्र आहे ते म्हणजे ‘प्राणतत्व’. पंचप्राणांपैकी प्राणायाम कोष, चेतन करून, विश्वव्यापी प्राणातून प्राणतत्व आकर्षित केले जाऊ शकते. त्यामुळे योगशास्त्रात प्राणायामाचे खूप महत्त्व सांगितले आहे. प्राणायाम (प्राणाला दिशा देणं किंवा प्राणाचे नियंत्रण) म्हणजे केवळ श्वास घेणं आणि सोडणं इतकच नाही तर त्या प्राण किंवा परमशक्ती बरोबर (vital force) जोडून राहण याचा अभ्यास हाच प्राणायाम. स्थूलरुपाने

 श्वासोश्वासाची एक पद्धत आहे. श्वास आत घेणं (अभ्यंतर )म्हणजे तो पूरक. आत मध्ये रोखून धरण म्हणजे कुंभक. आणि बाहेर सोडणे म्हणजे रेचक. शरीरातील सर्व हालचालींचा वायू हा कारक असल्याने, पेशींच्या केंद्रकातील हालचाल चालू असते. त्या वायुचे नियमन म्हणजे चौथा सूक्ष्मतर प्राणायाम. विज्ञानानुसार छातीतील दोन्ही फुफ्फुसे श्वासाला शरीरात भरण्याची यंत्रे आहेत. नेहमीच्या श्वासात फुफ्फुसाचा एक चतुर्थांश भाग कार्य करतो. त्यामध्ये सात कोटी 30 लाख स्पंजासारखी कोष्टक किंवा वायुकोष असतात. पैकी दोन कोटी छिद्रातूनच प्राणवायूचा संचार होतो. प्रत्येक पेशी प्राणवायू घेते आणि CO2 (कार्बन डाय-ऑक्साइड) बाहेर टाकते. यालाच आजच्या विज्ञानात (celular tissue respiration )म्हणतात. पेशींची ही देवाणघेवाण रक्तामार्फत होत असते. विज्ञानाने बाह्य (external) आणि आंतर ((internal) असे म्हटले आहे. पण पतंजलींनी ‘स्तंभ ‘ हा तिसरा प्रकार सांगितला आहे. हवा रक्तात पुढे पेशीपर्यंत जाऊन, देवाणघेवाण होऊन, रक्ताचा दुसरा स्तंभच त्याला विज्ञान (column of blood) म्हणते. शरीरातील उत्सर्जक पदार्थ, (toxins) ही कान, नाक, डोळे, त्वचा, मलमूत्राद्वारे बाहेर पडतात. पण श्वास हा निरंतर चालत असल्याने टॉकसिन्स बाहेर पडण्याचे काम हे सतत चालू असते. श्वास घेताना जर दीर्घ श्वास घेतला, आणि रोखून धरला तर फुफ्फुसाचे कार्य 90 ते 95 टक्के पर्यंत होऊ शकते. आपोआपच श्वसन पेशींच्या माध्यमातून रक्तात येणारा प्राणवायू जास्त प्रमाणावर येतो. पुढे तो इंद्रियांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे बरेच आजार दूर होतात. आधुनिक संशोधनाने सिद्ध झाले आहे की, आजारांचे मूळ कारण, प्राणवायूची अल्प उपलब्धता हे आहे. प्राणाचा मनाशी संबंध असल्याने मनावर संयम ठेवल्याने मनही शक्तिमान होते. इतर इंद्रिये प्राणाच्या स्वाधीन होतात. योगासनांनी स्थूल शरीराच्या विकृती दूर होतात. तर प्राणायामाने सूक्ष्म शरीरावर (फुफ्फुसे, हृदय, मेंदू वगैरे) तसेच स्थूल शरीरावरही प्रभाव पडतो. त्यामुळे प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. षट्र् चक्रांचा अर्वाचीन उपचार विज्ञानाशी तुलनात्मक अभ्यास केला, तेव्हा असे लक्षात आले की, लोहचुंबक व त्याचे कार्यक्षेत्र (magnet) आणि (magnetic field )यांचा जो अन्योन्य संबंध आहे, तसाच काहीसा प्रकार (nerve plexuses ) षट्चक्रांचा आहे. मानवी शरीरात ७२ हजार पेक्षाही जास्त नाड्या आहेत. पैकी इडा (डावी चंद्रनाडी), पिंगला (उजवी सूर्य नाडी) या सक्रिय राहतात. इडेचा उगम डाव्या नासिका छिद्रातून होऊन प्रवाहित होणारा प्राणवायू लहान मेंदू (cerebellum )व ( medulla oblongata) मध्ये प्रवेश करत सुषुम्नेच्या (तिसरी नाडी )डाव्या बाजूस थांबते. याच्याच उलट पिंगला नाडीचे कार्य होते. नासिकेच्या वरील भागात दोन्ही छिद्र एकत्र येतात. तिथेच दोन्ही नाड्यांचे उगमस्थान असल्याने तेथेच शरीराचा प्रमुख जीवनीय बिंदू (vital spot) तयार होतो. येथेच इडा (parasympathetic) आणि पिंगला (sympathetic) एकत्र येऊन एक चक्र (plexus) तयार होते. तेच आज्ञाचक्र. (तिसरा डोळा). याच प्रमाणे शरीरात आणखीही चक्रे आहेत. त्याच्या स्थानाप्रमाणे त्याच्या आजूबाजूच्या इंद्रियांवर प्राणायामाद्वारे ध्यान करून संतुलित ठेवता येते. १) मूलाधार चक्र (pelvic plexus) शिवणी स्थान व reproductory संस्थेवर कार्य करते. २) स्वाधिष्ठान चक्र (hypogastric plexus) लिंगस्थान व excretory वर कार्य करते. ३) मणिपूर चक्र (solar plexus) नाभी स्थान. digestive संस्थेवर कार्य करते. ४)अनाहत चक्र (cardiac plexus) हृदय स्थान, circulatory संस्थेवर कार्य करते. ५) विशुद्ध चक्र (carotid plexus) स्थान कंठ. respiratory संस्थेवर कार्य. ६) आज्ञा चक्र (medullary plexus) स्थान भ्रूमध्य, nervous संस्थेवर कार्य) याला गंगा, यमुना, सरस्वती असा त्रिवेणी संगम म्हणतात. सर्व चक्रे मेरुदंडाच्या मुळापासून वरच्या भागापर्यंत असतात. प्राणायाम आणि ध्यानाने ती विकसित करून त्या त्या ठिकाणच्या व्याधी कमी होऊ शकतात.

 योगासन आणि प्राणायामाच्या द्वारा शरीरातून बाहेर पडणाऱ्या शक्तीला बांधून ठेवणे म्हणजे बंध होय. प्राणायामात हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. १) श्वास भरून, हनुवटी कंठाला स्पर्श करून रोखून धरणे तो जालंधर बंध. २) पोट मोकळे सोडून छाती वरच्या बाजूला उपटली की तो उड्डियान बंध. ३) गुद आत ओढून घेतला की, तो मूलाधार बंध. तीनही बंध एकदाच केले (महाबंध) की, तिन्हीचेही फायदे एकत्र मिळतात.

देश, काल आणि संख्येचा परिणामही प्राणायामावर घडतो. थंड प्रदेशात हालचाली कमी होत असल्याने प्राणशक्ती जास्त लागत नाही. याउलट उष्णता असताना हालचाली जास्त, त्यामुळे प्राणशक्तीही जास्त लागते. त्याच प्रमाणे दिवस रात्रीचाही परिणाम होतो. प्रत्येक प्राण्याचे आयुष्य त्याच्या श्वासक्रीयेवर, संख्येवर अवलंबून असते. धावपळ करताना श्वास जास्त घ्यावे लागतात. उदाः- ससा मिनिटला 38 वेळा व आयुष्य आठ वर्षे साधारण, घोडा सोळा वेळा आणि आयुष्य 35 वर्षे, कासव, सर्प पाच आणि आठ वेळा त्यांचे आयुष्यही भरपूर असते. मनुष्य बारा ते तेरा वेळा आणि आयुष्य 90 ते 100 असे धरले आहे. असा श्वासाचा खजिना जितक्या काळजीपूर्वक आपण खर्च करू तितके दीर्घायुषी होऊ. प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत

१) अनुलोम विलोम— मेंदू तंत्रातील द्रवामध्ये (cerebrospinal fluid)संदेश वहनाचे कार्य करणार्या अणूच्या तंत्रात (neuropeptide) शरीरातील सर्व क्रिया नियंत्रित होत असतात इतकेच नाही तर मेंदूत होणाऱ्या भावनात्मक क्रियानाही नियंत्रित करते.

जेव्हा द्रवाचा संचार उच्च पातळी गाठतो तेव्हा मेंदूचा डावा व उजवा भाग समान क्रियाशील होतो. हे अनुलोम विलोम प्राणायामाने होते. आणखी एक गोष्ट, मेंदूच्या माध्यमातून होणाऱ्या श्वसनक्रियेत, सूर्यकिरणापासूनच्या ऊर्जा, आणि प्राणवायूचा संचार शरीरात होऊ शकतो. मेंदू सुद्धा श्वसन आणि स्पंदनाची क्रिया करतो, असा आयुर्वेदात आणि अनेक देशांच्या दर्शनात उल्लेख आहे.

२)कपालभाती—- अंतः श्वसन आणि प्रयत्नपूर्वक उश्वास यामुळे रक्तदाब वाढवून हृदयात रक्त बळपूर्वक परत आल्याने तेथील अवरोध दूर होतो. किंवा अवरोध कधीच होत नाही. आधुनिक शास्त्रात ई. ई. सी. पी द्वारे पायाच्या खालच्या भागात मिनिटाला 60 वेळा (extrnal stroke)देऊन एन्जिओ प्लास्टीच्या रुपाने त्याच्या गतीला हृदयाच्या गतीशी समान केल्याने अवरोध दूर होतो. तसेच एस. एल. ई. सारख्या असाध्य आजारावर व पोट व छातीतील सर्व अवयवांना या प्राणायामाने फायदा मिळतो.

भस्त्रिका—- साधारण श्वसनचक्रात 500 एम एल वायूचा उपयोग करतो. दीर्घ श्वास घेऊन बलपुर्वक बाहेर टाकला तर 46500 एम एल ही असू शकतो. त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.

सूर्यभेदी, चंद्रभेदी प्राणायाम— हे प्राणायाम क्रमशः उन्हाळ्यात कमी व हिवाळ्यात कमी करावा. करताना जालंधर व मूलबंधाबरोबर करावेत. सित्कारी, शीतली, मूर्छा, प्रणव, उद्गिथ, उज्जयी, भ्रामरी असे अनेक प्राणायाम आहेत. सर्वांचेच पद्धत आणि फायदे येथे सांगणे अवघड आहे. पण एकूणच प्राणायामाने सर्वच अवयव ऊर्जावान व शरीर निरोगी होऊन प्रतिकारशक्ती वाढते. इतकेच नाही तर प्राणायाम करणारी व्यक्ती प्रेम, करूणा, धैर्य, शक्ती, पवित्रता अशा गुणांनी युक्त होते. वाढत्या हिंसा, चोऱ्या, भ्रष्टाचार, अत्याचार या सर्व अवगुणांवर उपाय म्हणजे प्राणायाम. आजच्या युगात याची नितांत गरज आहे.

प्राणायामाचे जितके फायदे आहेत तितकेच ते नियमानुसार केले नाहीतर ते त्रासदायकही होते.

प्राणायामाचे नियम—- प्राणायाम करताना पद्मासन किंवा वज्रासनात बसावे. ज्यायोगे पाठीचा कणा ताठ राहतो. शक्य नसेल तर खुर्चीवर बसून करावा. आसन स्वच्छ असावे शक्य असेल तर पाणी व तुपाचा दिवा जवळ असावा. ज्यायोगे प्रदूषण होणार नाही. श्वास नाकानेच घ्यावा. पंचेंद्रियांवर तणाव न ठेवता मन प्रसन्न ठेवावे.

(हॅलो एन एम टी) आहार सात्विक व शाकाहारी असावा. प्राणायाम सावकाशपणे व सावधानतेने करावा. प्रथम तीन वेळा ओंकार म्हणावा. प्राणायाम तज्ञ व्यक्तीकडूनच शिकावा. वाचून करू नये. प्राणायामैन युक्तेन सर्व रोग क्षय भवेत/ आयुक्ताभ्यास योगेन सर्व रोगस्य संभवः// ( हटयोग प्रदीपिका) प्राणायामाच्या बाबत वेद, उपनिषदे, पतंजली, मनू, दयानंद या सर्वांचेच एकमत आहे. खरंच प्राणायामाला एक किमयागार असं म्हणायला हरकत नाही.

मी स्वतः रोज दीड तास योग साधना करते. आज वयाच्या 77व्या वर्षीही शरीराने मन सुदृढ, निरोगी आणि आनंदी असल्याचा अनुभव मी घेत आहे. असाच सर्वांनी अनुभव घेऊन आपले आयुष्य निरामय व आनंदात घालवावे घालवावे.

“सर्वेपि सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः/ सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःख माप्नुयात// अशी सर्व जीवांसाठी प्रार्थना करुया. नमस्कार.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “’पाठ’ पुराण…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “’पाठ’ पुराण…” ☆ श्री जगदीश काबरे

शरीराच्या ‘पाठी’चा कणा ताठ असतो जेव्हा, मनाचा व्यवहार सुरळीत चालतो तेव्हा. खरे तर आपण म्हणजे ‘पाठ’च असतो. ‘पाठी’च्या कण्यावरच तर आपली शारीरिक, नैतिक आणि मानसिक भिस्त असते. त्या कण्याच्या जोरावरच आपले शरीर उभे रहाते. आणि त्याच्या ताठपणावरच आपले भावविश्व कधी झुकते, कधी खचते तर कधी उंच उभारी घेते.

शाबासकीची थाप ‘पाठी’वरच पडते. धपाटा वा रट्टाही ‘पाठी’वरच मिळतो. तसंच सहानुभूतीचा हात ‘पाठी’वरूनच फिरतो. आपल्याला उभारी देणारा अश्वासक हातही ‘पाठी’वरच ठेवला जातो. कघी संधीकडे, कधी आयुष्याकडे, तर कधी मोहाकडे माणसे ‘पाठ’ फिरवतात. कधीकधी वाऱ्याला ‘पाठ’ देत देत संकटाना तोंड देतात. ‘पाठी’ला ‘पाठ’ लावून आलेली भावंडे एकमेकांच्या ‘पाठी’त खंजीर खुपसतात. तर कधी मित्र म्हणवणारी माणसे ‘पाठी’शी खंबीरपणे उभी रहातात.

एखाद्या ध्येयाचा, प्रश्नाचा जन्मभर ‘पाठ’पुरावा करत माणसे चळवळी उभारतात आणि पोटात माया असलेली माणसे आसऱ्याला आलेल्यांची ‘पाठ’राखण करताना मिळणारी दूषणे ‘पाठी’वरच झेलतात. राजकारणी माणसे कधी एखाद्याला शिताफीने ‘पाठी’शी घालतात, तर कधी एखाद्याच्या ‘पाठी’मागे लपतात.

घोड्याच्या ‘पाठी’वर स्वार होतात तर गाढवाच्या ‘पाठी’वर ओझे लादले जाते. परिस्थितीवशात सुसरीबाईच्या खरखरीत ‘पाठी’लाही मऊ म्हटले जाते. आणि खारीच्या ‘पाठी’वर रामाची बोटेही दिसतात.

‘पाठी’चा कणा हा सर्वार्थाने आपल्या जगण्याचा आधार असतो. म्हणूनच शरीराचा अन मनाचा व्यवहार सुरळीत चालू रहातो. कसे?

©  श्री जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नदी आणि मी… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

??

☆ नदी आणि मी… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

अनादी अनंत तुझे ते अव्याहत वाहत जाणे ! तुझे कार्यच तसे, वाहणे ! काळाच्या कसोटीवर तुला, अनेकदा पाहिलं.. तुझं काम चोखच ! किती जणांची पापे तू धुतलीस ते तुलाच माहीत ! तुझ्या किनारी कितीतरी पिढ्यानपिढ्या गाणी गायली ! त्यांची सर्व दुःख वेदना पोटात घेऊन, तू परत स्वच्छच राहिलीस ! 

तुझ्या पोटातील घाण वेळोवेळी कचऱ्यासारखी बाहेर पण टाकलीस ! तो कचरा पण प्रवाहापासून अलग होऊन, दोन्ही किनार्ऱ्यांना बाजूला झाला ! 

तोच कचरा परत काही कालानी परत वेदना घेऊन तुझ्याच जवळ आला ! पापक्षालनासाठी ! असं अव्याहत वर्तुळ तू पूर्ण करण्यासाठीच तुझा जन्म झाला का ? 

नियतीने तुला त्यासाठीच जन्माला घातले का ? तुझ्याजवळ आला तरी तो पापी पुण्यच पदरी घेऊन गेला ! तू मात्र आहे तशीच राहिलीस ! तुझ्यात यत्किंचितही बदल झाला नाही ! हेच तुझे वैशिष्ट्य जगाला दिलेस ! तुझ्याशिवाय जन्मच हा अपुरा वाटतो, व ते तेवढंच सत्य आहे ! काळाच्या पडद्याआड कितीतरी गोष्टी लपल्या ! पण ते उघड गुपित … ते गुपितच ठेवून तुझा हा अखंड प्रवास चालूच आहे !

आजन्म तृषार्ताला तू नाही म्हटलं नाहीस ! प्रत्येकाची तृष्णा तू भागवून दमली नाहीस ! तुझे हे रूप चिरतरुणच राहिले ते तुझ्या स्वभावामुळे !

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “प्लूटो दिन…” – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “प्लूटो दिन”  – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

प्लूटो दिन दरवर्षी 18 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 1930 साली क्लाइड टॉमबॉग या खगोलशास्त्रज्ञाने प्लूटो ग्रहाचा शोध लावला आणि तो सौरमालेतील नववा ग्रह म्हणून ओळखला गेला. मात्र, 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेने (IAU) प्लूटोला “बटू ग्रह” (Dwarf Planet) म्हणून पुनर्वर्गीकृत केले.

या दिवसाचे महत्त्व म्हणजे खगोलशास्त्रातील मोठी शोधयात्रा आणि प्लूटोच्या प्रवासाचा इतिहास. नासाने पाठवलेल्या “न्यू होरायझन्स” या अंतराळयानाने प्लूटोचे विस्तृत फोटो आणि माहिती पृथ्वीपर्यंत पोहोचवली.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “थोडं अजून”… ते… “Unlimited” – लेखक : श्री क्षितिज दाते ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “थोडं अजून”… ते… “Unlimited” – लेखक : श्री क्षितिज दाते ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

Unlimited… ???…

Unlimited ही थोडीशी पुस्तकी संज्ञा आहे.. आणि तितकीच फसवी देखील…. जी नाही हे सिद्ध करणं theoretically कदाचित शक्य नसेल पण practically विचार केला तर या जगात मुळात “Unlimited” असं काही नसतंच….

Upper Limit मात्र कमी जास्त होऊ शकतं…. म्हणजे कुठलं ना कुठलं Limit हे असतंच… उदाहरणार्थ जेव्हा आपण Limited थाळी खायला जातो तेव्हा हॉटेल मालकांनी ठरवलेलं Limit असतं आणि Unlimited थाळी खायला जातो तेव्हा आपलं म्हणजे खाणाऱ्यांचं Limit असतं…. जे व्यक्तीपरत्वे कमी जास्त असू शकतं…. एरवी घरी २ पोळ्या खाणारा तिथे ५ खाईल, ८ खाईल… किंवा ५-६ च्या ऐवजी एकदम २१ गुलाबजाम सुद्धा खाईल…. त्यामुळे थाळी Unlimited असली तरी शेवटी Limit हे असतंच… आजकाल मिळणाऱ्या Unlimited data plan चं ही तसंच… कोणी 5 GB वापरेल तर कोणी 500 GB… तरी देखील Unlimited च्या या चक्रात आपण अडकतोच…

या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी आणि कुठून झाली असेल असा विचार करायला लागल्यावर एकदम डोळ्यासमोर आली ती बर्फाच्या गोळ्याची गाडी आणि आणि तिथे उभं राहून गोळा खाणारा लहानपणीचा मी…… गोळा खाताना 

“ भैय्या.. थोडा शरबत डालो… आणि…. भैय्या… थोडा बरफ डालो… असं म्हणत, एका गोळ्याच्या किमतीत जवळ जवळ दिड गोळा खाण्याचा आनंद काही वेगळाच असायचा…

तेव्हा लक्षात आलं की आपल्याला आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा नेहमी “थोडं अजून “ हवं असतं… ते मिळवण्यात जास्त आनंद असतो…. मग अशा “थोडा है.. थोडे की जरुरत है” प्रकारचे अनेक प्रसंग डोळ्यासमोर आले आणि ही गोष्ट सर्वव्यापी आहे हे पक्कं झालं…

दुधवाल्या काकांनी दुधात कितीही पाणी घातलं तरी ठरलेलं दूध दिल्यानंतर उगाच माप किटलीत घालून थोडसं extra दुध पातेल्यात ओतल्यावर चमकणारा गृहिणींचा चेहरा…

परीक्षा संपल्याची वेळ होऊन सुद्धा बाकीच्या विद्यार्थ्यांचे पेपर गोळा करेपर्यंत supervisor नी दिलेला बोनस वेळ मिळाल्यावर आनंदी होणारा विद्यार्थी…

भाजी घेतल्यावर भाजीवाल्यांनी उगाच बांधून दिलेली थोडीशी मिरची – कोथिंबीरिची पुडी घेताना खुश होणारे कुठलेसे आजोबा….

रात्रभर गाढ झोपूनही सकाळी अलार्म वाजल्यानंतर “ शेवटची ५ मिनिटं “ झोपण्यात खरं समाधान मिळतं हे कुणीही अमान्य करणार नाही..

शनिवार – रविवार सुट्टी मिळूनही जोडून सोमवारी एखादी सार्वजनिक सुट्टी आली तर तिचं स्वागतच असतं…

Due Date साठी मुबलक वेळ मिळूनही deadline नंतर मिळणारा १-२ दिवसाचा Grace period महत्वाचा वाटतो…

४ तासांची संगीत मैफिल ऐकूनही शेवटी फर्माईश म्हणून २ मिनिटांचा गायला जाणारा एखादा अंतरा हवाहवासा वाटतो…

पोटभर पाणीपुरी, शेवपुरी, भेळ खाऊन सुद्धा शेवटच्या “मसाला पुरीचा” पूर्णविराम मिळाल्याशिवाय मन तृप्त होत नाही…. ही आणि अशी अनेक उदाहरणं…

तेव्हा मनुष्य प्राण्याची हीच “ थोडं अजून “ असलेली मानसिकता हळूहळू व्यापारी वर्गानी, विक्रेत्यांनी En-cash केली… आणि यातून पुढे त्याच किमतीत १० % जास्त टूथपेस्ट किंवा पावडर दिली जाऊ लागली… पुढे पुढे फ्री चा जमाना आला… साबणावर पेन फ्री… चहा बरोबर बरणी फ्री ते अगदी Buy 3 get 1 फ्री… वगैरे वगैरे… वेगवेगळ्या वस्तूंसाठी, वेगवेगळ्या ग्राहक वर्गासाठी विविध ऑफरचं खतपाणी घालून हे “ थोडं अजून “ मानसिकतेचं झाड व्यवस्थित रुजवलं आणि पद्धतशीर वाढवलं… एवढंच काय तर याच “ थोडं अजून “ चा फायदा घेत एका प्रथितयश शीतपेय कंपनीनी आपल्या जाहिरातीत “ ये दिल मांगे मोअर “ अशी tagline च दिली आणि त्यातूनही बक्कळ नफा कमावला… काळानुरूप payment modes बदलले आणि digital युगात या “ थोडं अजून “ ची जागा घेतली ती आजकाल मिळणाऱ्या Reward Points आणि cash back नी… एकंदरीत काय तर या मानसिकतेला वय, जात, धर्म, भाषा, लिंग, आर्थिक स्तर असं कुठलाही बंधन नसतं….

ठराविक सेल च्या दिवशी mall मध्ये उसळणारी तुडुंब गर्दी, women’s day ला स्वस्तात मिळणारी पाणीपुरी खायला अलिशान कार मधून येऊन रांग लावणाऱ्या महिला.. happy hours साठी धडपडणारे पुरुष, Introductory Offer चा लाभ घेण्यासाठी Online उड्या मारणारी e तरुणाई.. हे सगळे यावर शिक्कामोर्तबच करतात..

अखेरीस या अशा सगळ्याचा परमोच्च बिंदू… ज्याच्या अजून पुढे जाणं केवळ अशक्य…. ते म्हणजे अर्थात हे Unlimited प्रकरण…….. आपण सगळे या Unlimited च्या जाळ्यात कळत नकळत इतके ओढले गेलोय की बरेचदा केवळ जास्त मिळतंय म्हणून आपण नको असताना देखील घेतो आणि आपला कसा फायदा झाला असं मानसिक समाधान मिळवतो… कोण्या एका IT तज्ञाचं एक छान वाक्य आहे… “If you want to sell your product But there is no need.. then first create the need” …. एखाद्या गोष्टीची गरज नसेल तर आधी ती गरज निर्माण करा… म्हणजे मग गरज निर्माण झाल्यावर लोक ती गोष्ट आपणहून घेतील… पूर्वी ट्रंककॉल असताना किंवा मोबाईल च्या सुरुवातीच्या काळात फोनवर बोलणं महाग होतं… तेव्हा आपण अगदी मोजकं, कामापुरतं बोलायचो… मग हळूहळू ते बोलणं स्वस्त केलं आणि आपल्याला कामाशिवाय किंवा बरेचदा वायफळ बोलण्याची सवय लागली… भलीमोठी बिलं यायला लागली आणि ते स्वस्त करण्यासाठी आता आपण Unlimited calling plan घ्यायला लागलो…. home delivery करणं, AC, Car ते अगदी smart Phone… आधी या कधीच गरजा नव्हत्या पण आता सभोवतालची परिस्थिती अशी काही आहे की या गोष्टी आता चैन नाही तर गरज झालीय आणि म्हणून आपण त्यासाठी पैसे मोजतो…. अर्थात हे सगळं बदलत्या काळाप्रमाणे प्रगती पथाच्या दिशेने जाणारं असल्याने त्यात वावगं काही नाही…. तर… तशीच आता आपल्याया Unlimited ची सवय झालीय… इतकं की आता amusement park च्या तिकिटात सुद्धा आपल्याला Unlimited rides हव्या असतात…

एकीकडे आपण गरज नसतानाही बरेचदा उपलब्ध आहे म्हणून गरजेपेक्षा जास्त घेतो तर काहीना गरजे पुरतं देखील मिळत नाही हे वास्तव आहे…. अशाच एका Food Outlet च्या बाहेर ठेवलेल्या कचरा पेटीतून काही भूकेली लहान मुलं, लोकांनी टाकलेल्या Dish मधून “उरलेलं अन्न” वेचून खात होती…. ज्यांच्याकडे शून्य आहे त्यांना शून्यापेक्षा “थोडं अजून“ मिळावं असं वाटणारच ना…. “मन हेलावून” टाकणाऱ्या त्या प्रसंगानी ही जाणीव मात्र करून दिली की आपल्याकडे Unlimited असूनही कधी कधी आपण असमाधानी असतो पण इतरांनी टाकलेलं Limited अन्न कोणासाठीतरी Unlimited थाळी सारखं असतं आणि तेवढ्याश्यानी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान… तेही Unlimited असतं…

आपला प्रवास मात्र “थोडं अजून“ पासून सुरु होऊन “व्हाया Unlimited ” पुन्हा “थोडं अजून“ वर येतो…

लेखक : श्री क्षितिज दाते

ठाणे 

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लोकलचा प्रवास आणि लग्न… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

लोकलचा प्रवास आणि लग्न… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

नोकरीनिमित्त उपनगरातून मुंबईला लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे विवाह हे सहजासहजी मोडत नाहीत, अशी माहिती नुकतीच एका सर्व्हेमुळे समोर आली. यामागची कारणे जाणून घेण्यासाठी आमच्या काही प्रतिनिधींनी सोमवार ते शुक्रवार असा सलग पाच दिवस सकाळी कल्याण ते दादर असा ‘वरून’ येणाऱ्या गाडीने व पुन्हा सायंकाळी ‘दादर ते कल्याण’ असा लोकलचा प्रवास चक्क पिक अवर्समध्ये केला व त्यांना आलेल्या अनुभवांवरून यामागची काही कारणे शोधण्यात आम्हाला यश आले आहे.

सकाळी घरून निघताना एखादी फास्ट गाडी मनात ठरवून स्टेशनला यावे, तर ती गाडी वरूनच खचाखच भरून आलेली. मुंगीलाही आत शिरायला जागा नाही. नाइलाजाने ती गाडी सोडून हताशपणे दूर जाताना तिच्याकडे पहात बसायचे. नंतर एक स्लो लोकल.. बऱ्यापैकी रिकामी.. पण तुम्हाला नकोशी. मग शेवटी काँप्रोमाईज करून एक सेमीफास्ट लोकल पकडायची. ह्या रोजच्या प्रकारामुळे एक तडजोडीचा गुण माणसात तयार होतो. त्याला आवडणारी मुलगी त्याला नाकारून दुसऱ्याबरोबर लग्न करते तर जी याच्याशी लग्नाला तयार असते.. याला पसंत नसते. शेवटी घरच्यांच्या इच्छेप्रमाणे एका ‘अनुरूप’ मुलीशी विवाह करण्याची तडजोड तो याच प्रवासात शिकलेला असतो.

बरे.. तडजोड करून पकडलेल्या ह्या सेमीफास्ट गाडीतही लगेच सीट मिळत नाहीच. पण हा जरा धावपळ करून खिडकीत समोरासमोर बसलेल्या दोन माणसांच्या पुढ्यात जाऊन उभा रहातो. हे दोघे तर लवकर उठत नाहीतच; पण येणाराजाणारा प्रत्येक जण आपली बॅग स

शेल्फवर ठेवण्यास वा काढण्यास यालाच सांगत रहातात व त्यालाही तेथे उभे राहिल्याने हसतमुखाने हे काम करत राहावे लागते. यातून आपला काही फायदा असो वा नसो.. न थकता शेवटपर्यंत, इच्छा असो वा नसो.. हसतमुखाने सासुरवाडीच्या नातेवाईकांची कामे करण्याचा गुण यांच्या अंगी बाणला जातो.

अशा माणसांना गाडीत चढल्या चढल्या चुकून कधी बसायला जागा मिळालीच तर नेमके त्याच डब्यात कोणीतरी वृद्ध अथवा आजारी व्यक्ती चढते व त्याच्या समोर उभे राहून आशाळभूतपणे बघू लागते. इतर प्रवाशांच्या चेहऱ्यावरही याने उठून त्यांना जागा द्यायलाच हवी, असे भाव असतात. मग नाईलाजाने तो उभा राहून त्या वृद्धास वा आजाऱ्यास जागा करून देतो. यातूनच सासुरवाडीच्या वृद्धांची व रुग्णांची सेवा करण्याचा गुण वृद्धिंगत होतो.

लोकलच्या लेडीज डब्याचे नियम तर फार कडक. चुकून त्यात पुरुष शिरला तर बायकांचे शिव्याशाप.. क्वचित मारही खावा लागतो. त्यातून घोर अपमान व पोलिसांच्या हवाली होणार ते वेगळेच. यामुळेच चार बायका एकत्र दिसल्या की तेथून दूर होण्याच्या गुणाची निर्मिती होते. त्यामुळेच घरी हॉलमधे किटी पार्टी, भिशी, हळदीकुंकू वगैरे सुरू असल्यास हा त्यात लुडबूड न करता बेडरुममध्ये शांत पडून राहतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लोकल प्रवासातून तयार होणारी प्रचंड सहनशक्ती. आपला चुकून धक्का लागला तरी खुन्नस देणाराच आपल्या शेजारी बसल्यावर मात्र पेपर वाचताना त्याचे कोपर पोटात खुपसतो.. समोरचा मोबाईल वाचता वाचता नाकात बोटं घालतो.. कुणाच्या घामाचा प्रचंड वास येत असतो.. एक ना अनेक नरकयातना या तासाभरात त्याच्या वाट्यास येत असतात व त्या शांतपणे भोगल्याने मनस्ताप सहन करण्याची प्रचंड ताकद यांच्यात तयार होते, जी संसारात पदोपदी उपयुक्त ठरते !

तसेच दिवसभर कितीही उंडारले तरी संध्याकाळी ठरलेल्या गाडीने ठरलेल्या वेळी घरी परत येणे, हाही एक वाखाणण्याजोगा गुण..

असे एक ना अनेक गुण आहेत जे पिक अवर्समधे प्रवास करणाऱ्यांच्यात निर्माण होतात, जे त्यांचे वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध करतात.

आमच्या प्रतिनिधींना आलेले हे अनुभव जेमतेम ५ दिवसांचे आहेत. पण आपण जर वर्षोनवर्षे असा प्रवास करत असाल व आपले याबाबत काही विशेष अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा !

लेखक : अज्ञात 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संध्याकाळ… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ संध्याकाळ ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

मी फिरत फिरत समुद्र किना-यावर गेले तांबूस पिवळा मावळता सूर्य मला नेहमीच भुरळ घालतो, लाटा आज जरा मोठ्याच होत्या जमेल तेवढी पुढे गेली, दगडांवर, भिंतीवर आपटणा-या लाटांचे तुषार छान पैकी उसळून अंगावर येत होते त्यांची खारट चव ओठांवर जाणवत होती. हलकेच पण बोचरा होऊ लागलेला सांजवारा.. पक्षांचे थवे घरट्याच्या ओढीने परतीला निघाले होते पण असं का वाटत होतं मला की आज सूर्य अस्ताला जायला उशिर करतोय… ?

आज संध्याकाळ जरा जास्तच रेंगाळली.. तिलाही कळलं मला तुझी आठवण आली.. ! स्वाभाविकच आहे म्हणा. अश्या रम्य वेळी त्याची आठवण येणारच की.. निसर्गच तो आपल्याला स्वत:त गुंतवतो हे मात्रं खरं.. समुद्र किना-यावरची संध्याकाळ आणि श्यामल काळे ढग जमा होता होता दूरवरून येणारा मातीचा सुगंध येऊ लागला कि आपसूकचं आठवणी जिवंत होऊ लागतात. पावसासोबत आमचं खूप प्रेमळ नातं आहे किंबहुना प्रत्येकाच तसं असतचं नाही का ? मग

ढगांनी केली सरींची पाठवण मग तो आला तर एकटा कसा येईल? त्याला सुद्धा आठवण करून देईल… ! आली असेल का त्याला माझी माझी आठवण ?

पाऊस पडायला लागला की सारं कसं मस्त, प्लेझंट, वेगळच हव हवंस वाटायला लागतं. पावसानं यावं, धुवांधार बरसावं आणि हो अशा वेळी नेमकी आपल्याकडेच छत्री असावी व त्यानं स्वतःची विसरून यावी.. ! किंवा याच्या उलट झालं तरी चालेल मग सर्वांच्या देखत, स्वतःच्या नकळत मला सावरत, भिजत घेउन जायचं, पुन्हा दुस-या दिवसासाठी त्याच ओढीनं एकमेकांकडे पहायचं… जसं.. धरणीच्या ओढीनं सरी येतात नी बरसतात.. केव्हा तरी परिस्थिती गडबड करते त्याच नसणं जास्त बोचरं भासतं.. एकटेपणाचं वाटतं मग माझ मन कशातच रमत नाही… उगीचच छातीत धडधडायला लागतं पण चेह-यावर ते न दाखवता काम करत रहायचं.. पण मनाचं काय ? ते तर केव्हाच ट्रांन्समध्ये गेलेलं असतं आठवणींच्या सरीत चिंब भिजत राहीलेलं असतं…. दोन्हीकडे तिचं परीस्थिती कुणी कुणाला समजावयच ? पण ते शक्य नसतं उरतं फक्त परस्परांसाठी झुरणं… कधी थेंब थेब अश्रुंचं झरणं..

चिंब पावसात आठवणींच्यात भिजायचं..

सवय लागते मग एकमेकांसाठी झुरण्याची.. !

पाऊस दरवर्षी येतच राहतो ॠतूचक्रा सोबत जीवनचक्र पण चालत रहातं आता एक छोटी छत्री सोबत आलेली असते मग पावसाची परीभाषा थोडीशी बदलते बोबडी होऊ लागते… पाऊस येतच राहतो… येतच राहतो 

मग येते अशीच एक सांज संध्याकाळ आयुष्याची… पुन्हा नवा भूतकाळ दुस-याला गोठवतो. आराम खुर्चीत बसून आठवणींचे झोके घेत रहातो डोळ्यांच्या कडा ओल्या होऊन सुकत जात असतात… आपोआप डुलकी लागते. शरीराच्या थकव्याने व मनाच्या एकटेपणाने.. मग सारी मरगळ दूर होते व त्या सोबतच परत एक संध्याकाळ स्मरू लागते आणि ती संध्याकाळ मनात रेंगाळत राहते..

 ©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – २९  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

पत्रिका

ताई आणि संध्या दोघीही कला शाखेत पदवीधर झाल्या. दोघींनी वेगवेगळ्या विषयात पदव्युत्तर शिक्षणही घेतले. संध्याला मुंबई विद्यापीठाची फेलोशिपही मिळाली. माझ्या आठवणीनुसार ताईने एम. ए. ला सोशिऑलॉजी हा विषय घेतला होता आणि त्यानंतर तिला सचिवालयात चांगली हुद्देवाली नोकरी मिळाली. त्याचवेळी उपवर कन्या ही सुद्धा जोड पदवी दोघींना प्राप्त झाली होती. परिणामी आमच्या जातीतल्याच काही इच्छुक आणि एलिजिबल बॅचलर्सच्या कुटुंबीयांकडून दोघींसाठी सतत विचारणा होऊ लागली. काय असेल ते असो पण ताई मात्र याबाबतीत फारशी उत्सुक वाटत नव्हती. काही विचारलं तर उडवाउडवीची उत्तर द्यायची शिवाय आमचं कुटुंब हे व्यक्ती स्वातंत्र्य जपणारं असल्यामुळे आमचे आई पप्पा याबाबतीत तसे शांतच होते. मात्र संध्याचे वडील ज्यांना आम्ही बंधू म्हणायचो ते मात्र “संध्याचे लग्न” याबाबतीत फारच टोकाचे बेचैन आणि अस्वस्थ होते. “ यावर्षी संध्याचं लग्न जमलंच पाहिजे. ” या विचारांनी त्यांना पुरेपूर घेरलं होतं. संध्याचं लग्न जमण्याबाबत काहीच नकारात्मक नव्हतं. सुंदर, सुसंस्कारित, सुविचारी, सुशिक्षित आणखी अनेक “सु” तिच्या व्यक्तिमत्त्वाभोवती दिमाखदारपणे जुळले होते. प्रश्न होता तो तिच्याकडून होणाऱ्या योग्य निवडीचाच. अशातच कोल्हापूरच्या नामवंत “मुळे” परिवारातर्फे संध्या आणि अरुणा या दोघींसाठी लग्नाचा प्रस्ताव आला. घरंदाज कुटुंबातील, अमेरिकेहून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला, भरगच्च अकॅडॅमिक्स असलेला, कलकत्ता स्थित, “युनियन कार्बाइड” मध्ये उच्च पदावर मोठ्या पगाराची नोकरी असणाऱ्या “अविनाश मुळे” या योग्य वराची लग्नासाठी विचारणा करणारा प्रस्ताव आल्यामुळे सारेच अतिशय आनंदित झाले.

रितसर कांदेपोहे कार्यक्रम भाईंकडेच (आजोबांकडे) संपन्न झाला. मुलगा, मुलाकडची माणसं मनमोकळी आणि तोलामोलाची होती. विवाह जमवताना “तोलामोलाचं असणं” हे खरोखरच फार महत्त्वाचं असावं आणि अर्थात ते तसं त्यावेळी होतं हे विशेष.

आतल्या खोलीत बंधूंनी पप्पांना सांगितलं की, ” मुलाच्या उंचीचा विचार केला तर या मुलासाठी संध्याच योग्य ठरते नाही का जना?” 

पप्पा काय समजायचं ते समजलेच होते. शिवाय त्यांना मूळातच अशा रेसमध्ये भाग घ्यायचा नव्हता. ते दिलखुलासपणे बंधूंना म्हणाले, ” अगदी बरोबर आहे, आपण संध्यासाठीच या मुलाचा विचार करूया आणि तसेही अरुला एवढ्यात लग्न करायचेही नाहीय. ”

बघण्याचा कार्यक्रम अतिशय सुंदर, आनंदात, खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. न बोलताच होकारात्मक संकेत मिळालेही होते. तरीही पत्रिका जमवण्याचा विषय निघाला. वराच्या माननीय आईने दोघींच्याही पत्रिका मागितल्या आणि या “पत्रिकेमधील कोणती जुळेल त्यावर आपण पुढची बोलणी करूया. ” असं त्या म्हणाल्या.

बंधूंचा चेहरा जरा उतरलाच असावा. पपांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. न बोलताच स्पर्शातूनच सांगितले, “काळजी करू नका. होईल सगळं तुमच्या मनासारखं. ”

मी त्यावेळी प्रतिक्रिया देणे हा कदाचित उद्धटपणा ठरलाच असेल पण तरीही मी म्हणालेच, ” इतकी वर्षं अमेरिकेत राहणारा मुलगाही पत्रिकेत कसा काय बांधला जाऊ शकतो किंवा आईच्या विरोधात जाण्याचं टाळत असेल का ? निर्णय क्षमतेत जरा कमीच वाटतोय मला. ” परंतु “अविनाश मुळे” हा मुलगा सर्वांनाच खूप आवडला. माझ्या त्यावेळच्या शंकेचंही निरसन कालांतराने झालंच. बाबासाहेब.. ज्यांना आम्ही संध्याच्या लग्नानंतर हे संबोधन दिले.. ते अतिशय उच्च प्रकारचं व्यक्तीमत्त्व होतं. त्यांचं आदरणीय स्थान माझ्या मनात कायमस्वरुपी आहे.

संध्याच्या चेहऱ्यावरचे त्यावेळचे अस्फुट, संदिग्ध भावही तिची पसंतीच सांगत होते. त्या काही दिवसांपुरता तरी “या सम हाच” हेच वातावरण आमच्या समस्त परिवारात होते. त्याच दरम्यान ताईने संध्याजवळ हळूच म्हटलेलं मी ऐकलंही, “तुझीच पत्रिका जुळूदे बाई! म्हणजे प्रश्नच मिटला. ”

पत्रिका संध्याचीच जुळली आणि घरात सगळा आनंदी आनंद झाला. लग्न कसं करायचं, कुठे करायचं, कपडे दागिने, खरेदी, जेवणाचा मेनु, पाहुण्यांचे स्वागत.. उत्साहाला उधाण आले होते. दरम्यान अविनाश दोन-तीन वेळा येऊन संध्याला वैयक्तिकपणे भेटलेही. एकंदर सूर आणि गुण दोन्ही छान जुळले. ताई मात्र प्रचंड आनंदात होती. नकारातही दडलेला हा तिचा खुला आनंद मला मात्र जरा विचार करायला लावणारा वाटला पण सध्या तो विषय नको. “संध्याचं लग्न” हाच आघाडीचा प्रमुख विषय नाही का? 

अवर्णनीय असा संध्याच्या लग्नाचा सोहळा होता तो! सनईच्या मंगल सुरांसोबत संध्या मनोभावे गौरीहर पूजत होती. बाहेर दोन्ही वर्‍हाडी मंडळीत गप्पागोष्टी, खानपान मजेत चालू होतं भेटीगाठी घडत होत्या, जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता, नव्याने काही नात्यांचं पुनर्मिलन होत होतं. करवल्या मिरवत होत्या. पैठण्या शालू नेसलेल्या, पारंपरिक दागिने घालून महिला ठुमकत होत्या. नवी वस्त्रं, नवी नाती, नवे हितसंबंध, नव्या भावना. याचवेळी पप्पा हळूच गौरीहर पुजणाऱ्या सौभाग्यकांक्षिणी संध्याजवळ प्रेमाने गेले. संध्या आमची सहावी बहीणच. “मावस” हे नुसतं नावाला. लेक चालली सासुरा या भावनेने पप्पांना दाटून आलं होतं. डोळे पाणावले होते. संध्याने पप्पांकडे साश्रू नयनाने पाहिले. तिच्या नजरेत, ” काय पप्पा?” हा प्रश्न होता.

“ बाबी! या डबीत एक ताईत आहे लग्नानंतर तू तो सतत जवळ ठेव, नाहीतर गळ्यात घाल. तुझ्या सौभाग्याचं हा ताईत सदैव रक्षण करेल. ”

त्या क्षणी संध्याच्या मनातला गोंधळ पप्पांना जाणवत होता. “ पप्पा तुम्ही हे सांगताय? हा प्रश्न तिच्या ओठावर आलाही असणार. पप्पा एव्हढंच म्हणाले, ” बाबी! नंतर बोलु. तुझ्या वैवाहिक जीवनासाठी या बापाचे खूप आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. ”

संध्याचा पपांवर निस्सीम विश्वास होता.

तर्काच्या पलिकडच्या असतात काही गोष्टी खरं म्हणजे! पप्पांचा ज्योतिष शास्त्रावरचा सखोल अभ्यास होता. ते स्वतःही जन्मपत्रिका मांडत. आमच्या, आमच्या मुलांच्या ही पत्रिका त्यांनीच अचूक मांडल्यात पण तरीही भविष्य सांगण्यावर आणि मानण्यावर त्यांचा कधीच भर नव्हता. एकाच वेळी ते “ज्योतिष” या शास्त्राला मानत असले तरी ते त्यावर विसंबून राहण्याबाबत फार विरोधात होते. पत्रिका जुळवून लग्न जमवणे, कुंडलीतले ग्रहयोग, त्यावरून ठोकताळ्याचं चांगलं -वाईट भविष्य अथवा चांगल्यासाठीची व्रत वैकल्यं, वाईट टळावं म्हणून शांती वगैरे संकल्पनांवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. Rule your stars.. असेच ते कुणालाही सांगायचे. मग अशा व्यक्तीकडून संध्याबाबतच्या या छोट्याशा घटनेचं कसं समर्थन करायचं? काय अर्थ लावायचा? 

त्याचं असं झालं.. डोंबिवलीच्या एका ज्योतिषांकडे( मला आता त्यांचं नाव आठवत नाही) “अविनाश मुळे” यांच्या पत्रिकेशी जुळतात का हे तपासण्यासाठी संध्या आणि अरुणाच्या पत्रिका आल्या होत्या. त्यांनी काही निर्णय देण्याआधीच बंधू त्यांना भेटले होते. गंमत अशी की हे डोंबिवलीचे सद् गृहस्थ आणि पप्पा बऱ्याच वेळा एकाच लोकल ट्रेनने व्ही. टी. पर्यंतचा आणि व्ही. टी. पासून चा (आताचे शिवाजी छत्रपती टर्मीनस) प्रवास करत. दोघांची चांगलीच मैत्री होती. त्या दिवशी पप्पांना गाडीत चढताना पाहून या सद्गृहस्थांनी पप्पांना जोरात हाक मारली, “ढगेसाहेब! या इकडे, इथे बसा. ” त्यांनी शेजारच्या सहप्रवाशाला चक्क उठवले आणि तिथे पप्पांना बसायला सांगितले.

“हं! बोला महाशय काय हुकूम?” पपांनी पुढचा संवाद सुरू केला.

“ अहो! हुकूम कसला? एक गुपित सांगायचंय. बरे झाले तुम्ही भेटलात. ”

मग त्यांनी विषयालाच हात घातला. “अविनाश मुळे” यांच्या पत्रिकेशी कुठलीच पत्रिका नाही जुळत हो! अरुणाची सहा गुण आणि संध्याची केवळ पाच गुण. पण श्रीयुत निर्गुडेंमुळे(बंधु) थोडा नाईलाज झाला. गृहस्थ फारच नाराज झाले होते. ”काहीतरी कराच” म्हणाले.

“ काय पंडितजी तुम्ही सुद्धा ? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. बरं मग पुढे काय आता. ?”

“निर्गुड्यांना मी काहीच सांगितलेले नाही. हे बघा. पत्रिकेत मृत्यूयोग आहे. लग्न झाल्यावर आठ वर्षानंतर काहीतरी भयानक घडणार आहे पण ही पनवती, हे गंडांतर जर टळले तर मात्र उभयतांचा पुढच्या आयुष्याचा प्रवास अत्यंत आनंददायी आहे हे निश्चित. ”

“ म्हणजे सत्यवान सावित्रीची कलियुगातील कथा असेच म्हणूया का आपण?”

पप्पांना गंभीर प्रसंगी विनोद कसे सुचत?

“ ढगे साहेब हसण्यावारी नेऊ नका. माझं ऐका. मी एक ताईत तुम्हाला देतो. तेवढा कन्या जेव्हा गौरीहर पुजायला बसेल ना तेव्हा तिच्या हाती सुपूर्द करा किंवा तिच्या गळ्यात तुम्ही स्वत: घाला. उद्या आपण याच संध्याकाळच्या सहा पाचच्या लोकलमध्ये नक्की भेटू. ?”

पप्पांनी फक्त त्या सद् गृहस्थांच म्हणणं ऐकलं आणि एका महत्त्वाच्या माध्यमाची भूमिका पार पाडली होती. त्यात त्यांची अंधश्रद्धा मुळीच नव्हती. होतं ते संध्यावरचं लेकी सारखं प्रेम आणि केवळ तिच्या सुखाचाच विचार. त्यात ते गुंतलेले नसले तरी कुठेतरी सतत एका अधांतरी भविष्याचा वेध मात्र ते घेत असावेत. बौद्धिक तर्काच्या रेषेपलिकडे जेव्हा काही घडतं ना तेव्हा त्यावर वाद आणि चर्चा करण्यापेक्षा त्या घटनांकडे तटस्थपणे पहावे नाही तर त्या जशाच्या तशा स्वीकाराव्यात हेच योग्य. फार तर “आयुष्यात आलेला असा एक अतिंद्रिय अनुभव “या सदरात समाविष्ट करावे.

संध्याचे लग्न झाले. बंगालच्या भूमीत एक महाराष्ट्रीयन संसार आनंदाने बहरू लागला. दिवस, महिने, वर्षं उलटत होती. आणि ते पनवतीचं आठवं वर्षं उगवलं. खरं म्हणजे पपांशिवाय कुणाच्याच मनात कसलीच भीती नव्हती. कारण सारेच अनभिज्ञ होते. पण आठव्या वर्षीच आमच्या परिवाराला प्रचंड दडपण देणारे ते घडलेच. बाबासाहेबांना अपघात झाला होता. संध्याचाच भाईंना फोन आला होता. तशी ती धीर गंभीर होती पण एकटी आणि घाबरलेली होती. ताबडतोब कलकत्त्याला जाण्याची तयारी झाली. प्रत्यक्ष भेटीनंतर बराच तणाव हलका णझाला. कारण

श्री. अविनाश मुळे हे केवळ योगायोगाने किंवा दैवी चमत्काराने किंवा पूर्व नियोजित अथवा पूर्व संचितामुळेच एका भयानक प्राणघातक अपघातातून सही सलामत वाचले. जणू काही त्यांचा पुनर्जन्मच झाला. आता तुम्ही काही म्हणा.

“ काळ आला होता पण वेळ आली नव्हती. ”

अथवा 

“आयुष्याची दोरी बळकट किंवा देव तारी त्याला कोण मारी.

पण यानंतरची पप्पांची प्रतिक्रिया फक्त मला आठवते. ओंजळभर प्राजक्ताची फुले त्यांनी देव्हाऱ्यातल्या कृष्णाच्या मूर्तीवर भक्तीभावाने वाहिली आणि ते म्हणाले,

 हे जगन्नाथा! कर्ताकरविता तुज नमो।

अजूनही माझ्या मनात एक प्रश्न आहे. डोंबीवलीच्या त्या होरापंडितांनी त्यावेळीचं गुपित बंधुंनाच का सांगितलं नाही आणि पपांनाच का सांगितलं? या मागचं गुपित काय असेल?

जाउदे! काही प्रश्नांची उत्तरं न मिळण्यातच आयुष्याची जडणघडण असते हेच खरं!

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares