☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – संत मुक्ताबाई… भाग – १ ☆ सौ शालिनी जोशी ☆
चौदाशे वर्षाच्या चांगदेवाना या बारा तेरा वर्षाच्या मुलीने ‘चांगदेव पासष्टीचा’ अर्थ उलगडून सांगितला. ‘चांगा कोरा तो कोराच’ अशा शब्दात चांगदेवांची थट्टा करणारी मुक्ताई चांगदेवांची गुरु झाली. यांनी तिचे शिष्यत्व पत्करून तिचा गौरवच केला. नामदेव तिच्याविषयी म्हणतात, ‘लहानगी मुक्ताबाई जशी सणकाडी। केले देशोधडी महान संत।’ते योग्यच आहे. हटयोगी, वयोवृद्ध, ज्ञाननिष्ठ चांगदेवांना ज्ञान देणारी मुक्ताई खरोखरच जगावेगळी. चांगदेवानी तिला आपली आई मानलं. बौद्धिक, ज्ञानमय, मनोमय मातृत्व मुक्ताबाईंनी चांगदेवाना दिले. चांगदेवाना उद्देशून रचलेल्या पाळण्यात त्या म्हणतात,
समाजाभिमुख व अर्थपूर्ण असे ४० अभंग मुक्ताबाईंनी लिहिले. त्यातील एक प्रसिद्ध अभंग,
मुंगी उडाली आकाशी, तिने गेलेले सूर्यासी।
थोर नवलावर झाला, वांझे पुत्र प्रसवला।
विंचू पाताळासी जाय, शेष वंदी त्याचे पाय।
माशी व्याली घार झाली, तेणे मुक्ताई हासली।
समाजातील तीन प्रवृत्तीच्या लोकांचे वर्णन करणारा हा अभंग. विद्वांनानाही विचार करायला लावणारी अशी ही गुढ रचना, लहान वयात मुक्ताबाईंनी केली. यातील पहिली ओळ त्यांचेच वर्णन वाटते.
संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतल्यानंतर सासवडला सोपानदेवानी समाधी घेतली. नंतर निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना घेऊन तिर्थ- यात्रा करत निघाले. १२ मे १२९७ रोजी तापी नदीच्या तीरावर अचानक वीज कडाडली. आदिमाता लुप्त झाली. मेहुण येथे त्यांची समाधी आहे. ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे रूप असणाऱ्या भावांची ही बहीण आदिमाया मुक्ताई. तिच्या समाधी प्रसंगाचे वर्णन नामदेवाने केले,
वीज कडाडली निरंजनी जेव्हा। मुक्ताई तेव्हा गुप्त झाली।
अशाप्रकारे अभिमान, अस्मिता, परखडपणा यांचे बरोबर मार्दव व हळूवारपणा यांचे रूप म्हणजे मुक्ताई. जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद तालुक्याला मुक्ताईनगर नाव दिले आहे.
स्त्री-पुरुष भेदाच्या पलीकडे गेलेली, तीन आत्मज्ञानी भावांची बहीण असुनही वेगळे व्यक्तिमत्व असणारी मुक्ताबाई अमर झाली. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील पहिली संत कवियत्री ठरली. नामस्मरणाने विदेही होण्याचा मार्ग त्यांनी स्त्रियांना तसेच सर्व लोकांना दाखवला. सदेह मुक्तीचा अनुभव त्यांनी घेतला होता. स्त्री पुरुष समानतेची त्या प्रचारक ठरतात.
☆ दिसतं असावं…… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
परवा दोन मुंजीना गेलो होतो मुंबईला. दगदग, धावपळ करून माणसं येतात, जमतात, लगेच गायब होतात. पहिल्यासारखं आधी चारपाच दिवस तयारी मग बोडण किंवा पूजेला थांबण्याचे दिवस इतिहासजमा झाले. वेळ नाही, जागाही कमी आणि उत्साह पण कमी झालाय एकूणच. प्रथा चालत आल्यात म्हणून पार पाडल्या जातात. संध्या कोण करतंय तसंही आता? मुंज झालेल्या मुलाने विचारलंच चुकून तर आधी वडिलांना यायला हवी ना. त्यामुळे तिची सुरवातच होत नाही. ती केली म्हणजे काय होतं, नाही केली म्हणून काय होतं याचा उहापोह नको. मी ही ती एकदाही केलेली नाही. पण संस्कार असतात, ते करायचे एवढं खरं. मुलगा आता शिकायला आश्रमात जाणार नाही, ब्रम्हचर्य पाळणं शक्य नाही लग्न होईस्तोवर, बरं, त्या काळासारखे बालविवाह झाले असते तर थांबायची गरजही नव्हती. पण एकूणच इतर बाबी, हेतू, कारणं बदलली तरी संस्कार चालू आहे अजून तरी तो.
धार्मिक गोष्टं बाजूला राहू दे, मी जातो कारण की तिथे सगळे भेटतात. आपल्या मुंजीत ज्यांनी लगबग केली त्या आत्या, काकू. मामा, माम्या आता थकलेल्या असतात. त्यांना भेटता येतं, म्हणून जायचं. हे सगळे म्हातारे लोक उठून दिसतात, वेगळे दिसतात त्या सगळ्या झगमगाटात. गळ्याशी कातडी लोंबत असते. हातात काठी, ती नसली तरी, आहे पण आणलेली नाहीये, हे कळतं. फार वेळ उभं रहावत नाही, बसूनही रहावत नाही. उकाड्याचा त्रास होत असतो. त्यांची बायकोही त्याच वयाची असते. म्हातारी नटून थटून आलेली असते. दिवस खराब म्हणून सोन्याचा दागिना घरात असतो. पण मोत्याचे चारपाच घालतीलच. कधीकाळी कमरेपर्यंत असलेल्या शेपटाची मानेवर टोचेल एवढी लांब बोन्साय वेणी असते किंवा मग अंबाडा घालून त्यावर गजरा गोल फिरवलेला असतो. ब्लाउजच्या हाताला घड्या असतात. म्हातारी बाहेर ब-याच दिवसात गेलेली नाहीये हे कळतं. हाताशी छोटीशी पर्स असते. कुणी आलंच बाळाला घेऊन भेटायला तर? म्हणून आत पन्नासाच्या नोटा असतात.
त्यांच्या वयाचे एकत्र छान कोंडाळं करून बसतात. गप्पा असतात त्या म्हणजे फक्त चौकश्या – तब्येतीच्या, अनुपस्थित माणसांच्या, कुणाचं तरी कळलं का – अशाच. कुणाकडे सुनेने, मुलीने मिरवताना अडचण नको म्हणून आणून दिलेलं वाह्यात पोर असतं. ते काही केल्या एका जागी बसत नाही आणि म्हातारीचा प्राण कंठाशी येतो. तरीपण ती त्याला सांभाळत असते आणि गप्पात भाग घेत असते. त्याच गावात असेल घर तर जास्त वेळ बसता येतं. पण जेवणं झाल्यावर लोकल, रिक्षा पकडून एसटी/रेल्वे पकडायची असेल तर तारांबळ उडते त्यांची. जाऊ ना वेळेत? या धास्तीपोटी लक्ष लागत नाही आणि मग ‘चला लवकर’चा धोशा एक कुणीतरी लावतो. कुणाचं अर्धांग घरीच असतं त्यामुळे लवकर जाणं गरजेचं असतं. धावपळ होते. निघावं लागतं. ब-याच वर्षांनंतर कुणाची तरी भेट होते. आठवणी निघतात. दाटून येतं. तो/ती पाया पडतात. म्हाता-यांना भरून येतं.
आता लोकांना आशीर्वाद तरी कुठे देता येत आहेत. ‘आयुष्यमान भव’ हे कानावर पडायला तर हवं ना. कुणीतरी अजून आशीर्वाद देतंय वाकल्यावर ह्यात पण अजून आपण म्हातारे नाही झालो असा छुपा आनंद आहे खरंतर. दरवेळेला कुठे जाणं झालं की सगळी माणसं बघून बरं वाटतं. दरवर्षी कार्य निघेलच असं नाही, एवढी संख्याही आता घराघरात नाही. त्यामुळे भेटी होणं अवघड होत जाणार यापुढे. म्हणून मी आपला वर्षातून एकदा फुलपुडी टाकल्यासारखा का होईना पण जाउन येतो.
गदिमांची आई पुलंना म्हणाली होती, ‘माणसाने दिसतं असावं रे’. खरंय, माणसाने दिसतं असावं, कोण कधी ‘नसतं’ होईल काय सांगावं?
☆ सैनिकांचा धर्म !!! – मूळ इंग्रजी लेखक : लेफ्टनंट कर्नल दिलबाग सिंग दबास (सेवानिवृत्त) ☆ मराठी अनुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆
इंद्रधनुष्य
२ ) “ सैनिकांचा धर्म “ इंग्रजी लेखक : लेफ्ट. कर्नल दिलबाग सिंग दबास मराठी अनुवाद : कर्नल आनंद बापट
१९३९ साली दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले तेंव्हा ‘४ राजपुताना रायफल्स बटालियन’चे सुभेदार रिछपाल राम दोन महिन्यांच्या रजेवर गावी आलेले होते. गुडगांव जिल्ह्यातल्या त्यांच्या बर्डा गावामध्ये, घरटी किमान एक तरी आजी-माजी सैनिक होताच. बर्डा गावाला ‘फौजियों का गांव’ म्हणूनच ओळखले जात असे.
युद्ध सुरु होताच, बर्डा गावातल्या जवानांना सुट्टी रद्द झाल्याच्या तारा येऊ लागल्या. एक-एक करून बहुतांश जवान आपापल्या पलटणीसोबत युद्धभूमीकडे रवाना होऊ लागले.
काही दिवस गेल्यानंतरही सुभेदार रिछपाल राम यांना त्यांच्या बटालियनकडून बोलावणे आलेले नसल्याने ते अस्वस्थ होते. अखेर एके दिवशी त्यांनी स्वतःच ठरवले की मी बटालियनमध्ये परतणार. त्यांची पत्नी जानकीने त्यांना तार येईपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला, पण ते ऐकेनात. त्यांचे म्हणणे होते की, एकतर पोस्टातून त्यांची तार गहाळ झाली असावी किंवा ती चुकीच्याच पत्त्यावर पाठवली गेली असावी.
त्यांचा हेका एकच होता – “पलटणीच्या आणि देशाच्या मिठाला जागण्याची वेळ आलेली असताना, नुसते वाट पाहत स्वस्थ बसणे हा सैनिकी धर्मच नव्हे!”
टांग्यात बसून पत्नीचा निरोप घेताना सुभेदार रिछपाल राम तिला म्हणाले, “मैं उल्टो आऊँगो, मोर्चो जीत के आऊँगो। और जे उल्टो ना आ पायो तो ऐसो कुछ कर जाऊँगो, के म्हारी पूरी बिरादरी तेरे पे गर्व करेगी।” (मी परत येईन आणि जिंकूनच येईन. पण जर मी परत नाही येऊ शकलो तर असं काहीतरी करेन, ज्यामुळे आपल्या सर्व समाजाला तुझा अभिमान वाटेल!”)
दुर्दैवाने, सुभेदार रिछपाल राम युद्धभूमीवरून कधीच परतले नाहीत. परंतु, स्वतःचे प्राण आपल्या पलटणीवरून आणि देशावरून ओवाळून टाकण्यापूर्वी, त्यांनी पत्नीला दिलेले वचनही पाळले होते. मरणोपरांत ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ देऊन त्यांच्या शौर्याचा सन्मान केला गेला.
साठ वर्षे लोटली आणि १९९९ साल उजाडले. जम्मू-काश्मीरमध्ये कारगिलवर युद्धाचे ढग दाटून येऊ लागले. ‘१७ जाट’ बटालियनचे काही जवान व अधिकारी रजेवर होते. आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसताच, बटालियनचे अडज्युटन्ट, मेजर एच. एस. मदान यांनी सगळ्यांना तारा पाठवून परत बोलवायला सुरुवात केली.
१७ जाट बटालियनच्या ‘डेल्टा’ कंपनीचे कमांडर, मेजर दीपक रामपाल हेदेखील दीर्घकालीन रजेवर होते. सप्टेंबर १९९९ मध्ये होणाऱ्या स्टाफ कॉलेज प्रवेश परीक्षेसाठी ते कसून तयारी करत होते. बटालियनचे सीओ, कर्नल यू. एस. बावा यांची अशी इच्छा होती की मेजर दीपकच्या अभ्यासामध्ये शक्यतो व्यत्यय येऊ नये. त्यांनी मेजर मदान यांना सांगितले, “दीपकला इतक्यात तार पाठवू नकोस. जरा चित्र स्पष्ट होऊ दे. गरज पडलीच तर आपण त्याला ऐनवेळी बोलावून घेऊ. “
एके दिवशी बटालियनच्या ‘ऑप्स रूम’मध्ये बसलेल्या कर्नल बावांना धक्काच बसला. पाठीवर रकसॅक घेतलेले मेजर दीपक रामपाल ‘ऑप्स रूम’मध्ये येऊन दाखल झाले.
“अरे दीपक, तुला आम्ही परत बोलावलं नव्हतं. तू कसा काय आलास?” असे सीओ साहेबांनी विचारताच मेजर रामपाल उत्तरले, “सर, पाकिस्तान्यांच्या घुसखोरीची बातमी मी रेडिओवर ऐकली. ‘४ जाट’चे मेजर सौरभ कालिया आणि त्याच्या गस्ती पथकाला पाक घुसखोरांनी हालहाल करून मारल्याचं वृत्तही मी वर्तमानपत्रात वाचलं. हुतात्मा सैनिकांच्या शवपेट्या त्यांच्या गावापर्यंत आल्याचं दृश्यही टीव्हीवर दिसलं. त्यानंतर मी काय करायला हवं होतं असं तुमचं म्हणणं आहे, सर?”
बटालियनमध्ये परतल्यानंतर दोन आठवड्याच्या आतच मेजर दीपक रामपाल आपल्या डेल्टा कंपनीसह अत्यंत दुर्गम अशा ‘व्हेल बॅक’ टेकडीवर चाल करून गेले. पाक घुसखोरांनी त्या टेकडीवर मजबूत पकड घेतलेली होती. एक रात्रभर चालेल्या हातघाईच्या लढाईनंतर मेजर दीपक आणि त्यांच्या शूरवीर जाटांनी ‘व्हेल बॅक’ टेकडी काबीज केली.
मेजर दीपक रामपाल यांच्या असाधारण शौर्य आणि असामान्य नेतृत्वाबद्दल त्यांना ‘वीर चक्र’ प्रदान करून सन्मानित केले गेले.
देशाला आपली खरी गरज असताना, हक्काच्या रजेसारख्या मामुली सवलतीचे महत्व ते काय? सुभेदार रिछपाल राम आणि मेजर दीपक रामपाल ही फक्त दोन नावेच आहेत. भारतीय सैन्यदलांमधल्या प्रत्येक जवानांचे जीवनसूत्र ‘राष्ट्र सर्वोपरि’ हेच असते. पलटणीच्या खाल्लेल्या मिठाला वेळप्रसंगी जागणे हाच खरा धर्म!
मूळ इंग्रजी लेखक : लेफ्टनंट कर्नल दिलबाग सिंग दबास (सेवानिवृत्त)
मराठी अनुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
मो 9422870294
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “पळा पळा कोण पुढे पळे तो…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
अरं पळा पळा.. त्यो राक्षस किंग कोहली मैदानावर आला… आपली काही खैर नाही आता… आता विमानतळाकडं पळत पळत जायला हवं… अन असेल त्या विमानात लपून बसायला पाहिजे… त्या पायलटला आपून पंधरा जण खेळणारं आनी बाहीर बसून नुसत्याच टाळ्या वाजिवनार दहा जनं मिळून वर्गणी काढूया आनि त्या इमान पायलटला सांगूया आधी इथनं इमान उडीव.. तुला लांब कुठं नेता येईल तिकडचं आमास्नी घेऊन जा… पण परत कराचीकडं इमान या जन्मात उतरवू नकोस.. घराची पन याद येनार नाही अश्या ठिकानी नेऊन सोडं.. काय तु मागशिल तेव्हढा पैका देतू हवा तरं… खेळायच्या मैदानात ते इंडियावालं काय पिऊन येतात कूणास ठावं… ती आय सी सी कुठलीबी मॅच भारत इरुध पाकिस्तान असू दे..जित भारताची ठरलेली असतीया.. थोडा थोडका न्हाई सात वेळेला मार खाल्ला आम्ही..तरीबी एक डावं बी जितायचं नाव न्हाई.. आमच्या देशात काय आम्हाला जीतं ठेवतं नाहीत..म्हणून आम्ही जितं राहाण्यासाठी परदेशात राहतुया…कुणाला न कळत…पन मॅचच्या वेळेला पीसीबी वालं आम्हालाचं हुडकून काढतात आनि घोड्यावर बसवतात…मनातनं आम्ही कवाचं हारलेलो असतो भारताच्या विरुद्ध खेळायचं म्हंजे…परवा बी खेळ सुरू झाला तवा आमचा डाव असा असा रंगात येऊ लागतो माशाल्ला असं वाटतं वारे गब्रू खेळावं तर असं अन समोरच्याला खेळवावं तर ते बी असं… जोरजोराने टाळ्या वाजवून नि आरोळ्या मारून लै दंग्याचा धुरळाच पाडत असतो स्टेडियम मधी … पण हे काय मधीच भलतं झालं.. खेळ सुरू झाला नाही तोवर इकडं इकेट बी पडाया लागल्या कशा.. अरं तू अंपायर कुनाच्या बाजून हायीस… आपलं काय ठरलेल्या हुतं त्यांच्या बॅंटींगच्या येळेला आम्ही तुला इचारनार अल्ला कुठं असतो.. तवा तू नसतं बोटं वर करून सांगायचं .. बाकीचं आम्ही सांभाळून घेतू… आणि आमच्या बॅंटींगच्या येळेला एकदा हात आडवा नि एकदा उभा असा व्यायामं करायचा.. पन गड्या तशी येळचं आली न्हाई… आता हैका जगाच्या पाठीवर कुठं बी गेलो तरी बी हुडकून ही जनावरं आपल्या मारणार आपल्याच देशात आपल्याला जगायची चोरी.. चोरी नव्हे फाशीच देनार त्ये… आवं तिथं साध्या चार वर्षांच्या पोराकडं एके असतीया खेळायला…त्याचं जो ऐकनार नाही आनी जो गेम मधी जिंतनार नाही त्याचा गेम केलाच म्हणून समजा त्यानं… व्हय रं त्या विराटलाच एकदा इचारून बघता काय… म्हनावं तुझ्याच देशात आम्हास्नी थारा देतोस काय.. हे काळं तोंड लपवाया… विराटच एक मानुस असा हायं त्येच्यात ख्योळ बी हायं नि मानुसकी बी… आपल्या इथं काय हायं.. रोजचं जगायचं इथं वांद असतात.. तिथं असला सपाटून मार खाल्यावर आमचं मढं तरी शिल्लाक ठुतील म्हनतासा… नाव नको… अरं पळा पळा ती राक्षसी सेना विराट कोहली वाली नव्हं तर आपलचं जातभाई यायला लागलेती… तवा धुम शेपुट घालून जोशात पळा… वाट फुटंल तसं पळा.. जी दिशा गावंल तिकडं पळा.. पण माघारी कराची कडं ढुंकूनही बघू नका…मागचं सगळं इसरा आणि येड्या वो ते क्रिकेट वगैरे ते बी इसरूनच जा… आपल्या बाच्यानं कधी जमायचं न्हाई ते.. आपून फक्त बाॅम्ब टाकायचे, गोळ्या घालायच्या, स्फोट करायचे… यातच आपण वर्ल्ड चॅम्पियन आहोत… तेच आपलं बेस हायं बघा…
☆ “International Day of Happiness, जागतिक आनंद दिन” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
नमस्कार नमस्कार,
20 मार्च.
हा दिवस आहे International Day of Happiness, जागतिक आनंद दिन.
जगामधल्या सगळ्यांनी सदैव आनंदी राहावं आणि आपल्या आजूबाजूला आनंद पसरवावा, ही या दिना मागची कल्पना आहे.
दरवर्षी या दिनाकरता वेगळी वेगळी थीम असते.
यावर्षीची थीम आहे care and share. ही थीम आपण कशी आचरणात आणायची ते बघूया –
आपल्या आसपास असणाऱ्यांची आणि ज्यांना गरज आहे अशांची नेहमी काळजी करणे, काळजी घेणे आणि आनंद पसरविणे. नेहमी सोशल मीडिया वरती सकारात्मक संदेश पाठवणे. लोकांची काळजी घेणाऱ्या सामाजिक संस्थांमध्ये सहभागी होणे किंवा त्यांना सहकार्य करणे आणि आनंद सगळीकडे पसरवणे.
हे सगळे करण्याकरता सगळ्यात महत्त्वाचे काय असेल तर आपण स्वतः आनंदी असणे आणि ते पण 24/7, हे फार महत्त्वाचे आहे.
आनंदी राहणे हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच, हे आपल्या सगळ्यांचच् ब्रीदवाक्य असायला पाहिजे. आनंदी राहायला आवडत नाही, अशी व्यक्ति शोधून पण सापडणार नाही; आणि कायम आनंदी आहे, अशी व्यक्ति पण शोधून सापडणार नाही. म्हणूनच म्हणतात, “आनंदी माणसाचा सदरा कुणाकडेच मिळू शकत नाही”. जेव्हा हा वाक्-प्रचार अस्तित्वात आला, तेव्हा सगळ्याच स्त्रिया कायम आनंदी असाव्यात; आणि म्हणूनच हा वाक्-प्रचार फक्त माणसाचा सदरा, या शब्दानी प्रचलित झाला असावा. जमाना बदलला, स्त्रियांनी शर्ट म्हणजे सदरा आणि पॅन्ट घालायला सुरुवात केली, आणि आता सरसकट सगळेच सदरा घालणारे, म्हणून हा वाक्-प्रचार आता सगळ्यांनाच लागू होतो आहे.
मन आनंदी ठेवण्याकरता आनंद कुठून पकडून आणावा लागत नाही, आणि तो पकडून आणता पण येत नाही. आनंद हा सगळीकडे असतोच. आपण आपले ताण – तणाव, रागीटपणा, चिडचिडेपणा, प्रत्येक गोष्टीत “मी आणि माझे”, हे जर आपण दूर करू शकलो, तर आनंद आपोआपच प्रकट होतो. अंधार आणि उजेड यांच्या सारखेच हे नाते आहे. अंधार कुठून पकडून आणता येत नाही. उजेडाचा अभाव झाला, तर आपोआपच अंधार होतो.
कसे जगावे, कसे आनंदी राहावे, हे शिकण्याकरता निसर्ग हा उत्तम गुरु आहे असे म्हणतात. मोठे वृक्ष आनंदानी डोलत असतात आणि छोटे गवत पण तेवढ्याच आनंदानी डोलत असते. काही झाडांची फुले देवाला आवडतात, म्हणून ती तोडून देवाला वाहतात, म्हणून ही झाडे आनंदी असतात. काही झाडांची फुले देवाला वहात नाहीत. आपली फुले कुणी तोडत नाहीत, म्हणून ही झाडे पण खुश असतात. काही झाडांना लाल फुले लागतात म्हणून ती खुश असतात, तर कुणाला पिवळी फुले लागतात, म्हणून ती खुश असतात. एकमेकांशी तुलना नाही, एकमेकांविषयी मत्सर नाही, एकमेकांचे पाय ओढणे नाही. फक्त आनंद आणि आनंद.
नारळाचे झाड सरळ वर वर जाते. सूर्याची उन्हे अंगावर घेणे हाच त्याचा आनंद असतो. समजा बाजूला एखादा मोठा वृक्ष असेल आणि त्याच्या फांद्या नारळाच्या वर येत असतील तर नारळाचा मार्ग खुंटणार आणि त्याचा आनंद संपणार. फांद्या बाजूला सारून वर जाणे आपल्याला शक्य नाही , हे नारळ ओळखून असतो. थांबला तो संपला, हे पण नारळाला माहित असते. अशावेळेस आपल्या झावळ्या आणि नारळ असा भला मोठा पसारा घेऊन झाड चक्क तिरपे होते आणि सूर्य प्रकाश घेण्याकरता जिथे वाट दिसेल तिकडे वळून पुन्हा सरळ वर जायला सुरुवात करते.
आनंदी राहायचेच, असे जर आपण ठरवले, तर आसपासच्यांना न दुखावता, थोडे ऍडजेस्ट करत करत, आपण आपले ध्येय नक्कीच पूर्ण करू शकतो, हेच नारळाकडून शिकायचे आहे. प्रत्येक झाडाकडून अशाच प्रॅक्टिकल टिप्स मिळू शकतात. म्हणूनच जाणकार सांगत असतात – निसर्गात रमा.
आपण बहुतेक जण आनंदी नसण्याचे आणखीन एक कारण म्हणजे, घरातल्यांनी किंवा इतर कुणी कसे रहावे, कसे वागावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, हे बऱ्याच जणांना समजत नसते. आणि यामुळे घरामधे आणि बाहेर, रोजच क्षुल्लक कारणांवरून अप्रिय परिस्थिती तयार होत असते. अप्रिय परिस्थिती आली, म्हणजे ताणतणाव सुरु होतात आणि आनंद गायब होतो. इतरांना बदलवण्यापेक्षा, स्वतःला थोडेसे बदलणे खूप सोपे असते. मी रस्त्यानी चाललो आहे आणि डोळ्यावर ऊन येते आहे. सूर्य लवकर हलणार नाही, हे आपल्याला माहित असते, तरीपण आपण उन्हाला शिव्या मोजतो, ग्लोबल वॉर्मिंग च्या नावानी तणतण करतो आणि दुःखी होतो. त्यापेक्षा आपला मार्ग आपण थोडा बदलला किंवा डोळ्यांवर गॉगल घातला, तरी आपले रस्त्यावर चालणे सुकर होऊ शकते. माझा आनंद मीच शोधणार आहे, आणि पर्याय उपलब्ध आहेत, हे समजणे महत्वाचे असते.
“आनंदी राहणे हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच ” असे जर आपण आजच्या शुभ दिवशी ठरवले आणि योग्य विचारसरणीने वाटचाल सुरू केली, तर आनंदी माणसाचा सदरा माझ्याकडे आहे, असे आपण खात्रीशीर रित्या म्हणू शकू. आणि आनंदी माणूस जिथे जिथे जातो तिथे तिथे आनंदी वातावरण निर्माण होते हे आपण जाणतोच.
आजच्या जागतिक आनंद दिनाच्या तुम्हाला, तुमच्या परिवार सदस्यांना आणि मित्रमंडळींना शुभेच्छा….
☆ एक पिल्लू, बारा अंडी… लेखिका : सुश्री भाग्यश्री बारलिंगे☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
एका पिल्लासमोर त्याच्याइतकीच निरागस दिसणारी बारा अंडी सुबकपणे एग कार्टन मध्ये ठेवली होती. पिल्लू माणसाचं होतं, अंडी कोंबडीची होती. पिल्लानं प्रथम काही वेळ ह्या नवीन खेळण्याकडे पाहिलं; नंतर आपल्या छोट्या बोटांनी त्यांना चाचपून बघितलं आणि ग्रीक तत्ववेत्त्याच्या अभिनिवेशानं एक अंडं जमिनीवर टाकलं. त्याचा आवाज, त्याचं फुटणं, त्यातला बलक जमिनीवर पसरणं ह्या सगळ्यांची नोंद घेतली गेली – अगदी क्लिनिकल डिटॅचमेंटने ! उरलेल्या अकरा अंड्याचं स्टॅटिस्टिकस होण्याच्या आत त्या प्रयोगात यशस्वी रित्या व्यत्यय आणण्यात आला आणि पिल्लू वाटी-चमच्यातून निर्माण होणाऱ्या संगीताचा अभ्यास करायला लागलं.
पिल्लाला माणसाच्या जमातीत जन्मल्यामुळे एक नांव ठेवण्यात आलं आणि त्याच्या गोंडस शरीरावर तऱ्हेतऱ्हेचे कपडे घालण्यात आले. स्वतःच्या नावातील ‘र’ म्हणता येण्याआधी पिल्लाला आपल्या अंगातले कपडे काढता यायला लागले. आणि खेळण्यांच्या पसाऱ्यात बसलेलं आणि स्वतःच्या कपड्यांनी जमीन पुसणारं बाळ बघून हसू, वैताग, लोभ अश्या मिश्र भावनांचे तरंग घरात उमटू लागले. घराच्या भिंतींमध्ये एक कोवळीक आली-वेलींची टेन्ड्रिल्स भिंतीचा आधार शोधत वरवर झेपावायला लागलीत की भिंती अश्याच कोवळ्या होत असतील का ?
घरात वाटी-चमच्याचं तर बागेत लॉरेलच्या खुळखुळणाऱ्या शेंगाचं संगीत ! राजानं हत्तीवर (!) बसून प्रजेची खबरबात घ्यावी तशी आजीच्या कडेवर बसून झाडांशी मूक संवाद करणं, हे एक आवडतं काम-आर्याचं आणि आजीचंही ! फुल ही एक स्वतंत्र, संपूर्ण चीज आहे हे कळायला वेळ लागला. पानं आणि पाकळ्या यात जास्त रस. कदाचित पाकळ्या, पानं, आकाशाकडे झेपावणारं बाकीचं झाड आणि त्यानंतर सुरु होणारं आकाश यातील भेद करणाऱ्या रेखा तिला दिसत नसाव्यात. त्याचं प्रतिबिंब तिच्या चित्रकलेत दिसायचं. रुक्ष नजरेच्या वडीलधाऱ्यांना ती गिचमिड दिसायची. हळूहळू ती रेषा आणि आकार काढायला लागली. ह्या रेषा बेदरकारपणे, प्रसिद्ध कलाकाराच्या आत्मविश्वासाने लेदर फर्निचरवर, भिंतींवर उमटायला लागल्या. आपल्या आईकडून भिंती रंगवण्याचं जीन तिनं मिळवलं असणार याची खात्री असल्यामुळे वॉशेबल क्रेयॉन्स आधीच आणून ठेवले होते. या आणि अश्या, फक्त आजी लोकात वावरणाऱ्या जमातीला प्राप्त होणाऱ्या शहाणपणामुळे एग कार्टनमधली अनेक अंडी वाचवली गेली.
ही प्रक्रिया आयुष्यात परत परत होत राहते का ? कुठल्याही नवीन जागी, नवीन देशात-प्रदेशात गेल्यावर प्रथम सगळी गिचमीडच असते आणि नंतर त्यातून आकार उमटायला लागतात. या गिचमिडीचा अर्थ लावायचा असेल तर त्याचा तटस्थपणे अभ्यास करावा लागतो; असा प्रोग्रॅम या पिल्लाच्या हार्ड ड्राइव्हवर आधीच टाकलेला आहे, अशी कौतुक-आश्चर्य मिश्रित जाणीव अनेकदा झाली.
(पण माझ्या हार्ड ड्राइव्हवर असलेल्या या प्रोग्रॅमचं काय झालं? काळाच्या वाळवीनं ग्रासला की काय?)
तटस्थपणा हा अभ्यासू नजरेचा भाग झाला; सतत काहीतरी नवीन शोधण्यासाठी धडपडणाऱ्या शरीराचा नव्हे, याची प्रचिती दिवसभरात अनेकदा यायला लागली. माणूस दोन पायांवर चालू लागेपर्यंत ज्या टप्प्यांमधून जातो त्या टप्प्यांमधून जाताना आर्याची आडनावं बदलत गेली – उदाहरणार्थ, झोपेश्वर, कडपालटे, पालथे, रांगणेकर, बैस, (उभं राहायला लागल्यावर) राजकारणे, आणि धावायला लागल्यावर -चोरे ! या सर्व स्थितीतून जाताना जमीन, पाय, डोळे, यांच्यात बेबनाव झाल्यामुळे डोक्याची आणि गुडघ्याची नारळं आपटून जे संगीत निर्माण झालं, ते ध्वनिमुद्रित करून संकलित केलं असतं तर वादनाचा एक नवीन प्रकार निर्माण झाला असता, यात शंका नाही. पडणे-दुखापती ह्यांचा मनावर व्रण उमटू नये अशी काही तरी पूर्वनिर्धारित योजना असावी; त्यांचे शिकवणारे, शहाणपण देणारे अनुभव झाले. त्यामुळे चालणं, धावणं थांबलं नाही.
ही वृत्ती जन्मभर माणसात टिकती तर कित्येक मनःस्वास्थ्याच्या समस्या उपजल्याच नसत्या.
मनात एक सतत वाहत असणारा, नवीन अनुभवासाठी पाटी सतत कोरी ठेवणारा चैतन्याचा धबधबा
असावा का? हा प्रवाह थांबला की अनुभवांचा ताजेपणा जातो, साचलेपण येऊन सर्व इन्द्रियातून जमा होणाऱ्या माहितीची पुटं जमत राहतात -शेवाळासारखी!
माणसाचं पिल्लू धडपड करत दोन पायावर चालायला लागलं की लगेच त्याच्या गतीत वाऱ्याची गती मिसळावी म्हणून घरातील लहान मुलाला त्याची पहिली सायकल घेऊन देण्यात येते; ही घटना सोन्याचा दागिना घेऊन देण्याइतकीच महत्त्वाची ! ही सायकल सगळं जग पादाक्रांत (चाकाक्रांत!) करू शकते. ही जादू सायकल चालवणाऱ्या मध्येच असते. अंगणाच्या एका टोकाला फीनिक्सच्या आजीचं ( खरं )घर असतं आणि दुसऱ्या टोकाला अहमदाबादच्या(हेमडाबॅडच्या) आजीचं ! मध्येच कुठेतरी डेकेयर (ढे खेय्य), सुपरमार्केट
(छुप्प मारक्के) ही ठिकाणं लागतात. रस्त्यावर दिसणाऱ्या (खरोखरीच्या) झाडांची फुलं तोडून (बुरुन) सायकलच्या बास्केटमध्ये टाकली जातात-आजी, फुयी (गुजरातीत आत्या) इत्यादी प्रेमाच्या लोकांना देण्यासाठी!
रस्त्यात पोलीस थांबवतो-वायुवेगानं सायकल चालवल्याबद्दल ! ( अमेरिकेत रेसिडेन्शिअल एरियातली स्पीड-लिमिट फॉल मध्ये (शरद ऋतूत) गळणाऱ्या पानांच्या गती इतकीच असावी असा अलिखित नियम आहे. ) डझनभर अंड्यांपैकी फक्त एक अंडं आतापर्यन्त फोडून बघितलेलं हे माणसाचं पिल्लू सहर्षपणे पोलिसाकडे पाहातं. बागेतील सर्व कळ्यांमध्ये असणारा निरागसपणा आणि वाऱ्याबरोबर डुलणाऱ्या फांद्यांमधला खेळकरपणा,
नियम तोडणाऱ्याच्या चेहेऱ्यावर ओसंडून वाहत असतो. ते पाहून पोलीस क्षणभर आपलं काम विसरतो. सायकलच्या घंटीचा आवाज ऐकून भानावर येत पोलीस म्हणतो, “मिस त्रिवेदी, तुम्ही खूप वेगानी सायकल चालवता आहात, म्हणून तुम्हाला पन्नास डॉलर्स पेनल्टी. ” गुन्हेगार गोड हसत (आपल्या आईसारखं)
“आय सी (छी)”असं म्हणतो आणि नसलेल्या खिशातले पैसे काढून पोलिसाला देतो. पोलीस पैसे मोजायला लागतो. गुन्हेगार म्हणतो, ” डू यू वॉण्ट मोअर ?” पोलीस अजून पैसेच मोजत असतो. तो नैतिकेतचा आदर्श असल्यामुळे मानेनं नकार दर्शवत “यू कॅन गो नाऊ” असं म्हणतो.
गुन्हेगार थोडा पुढे जातो आणि जाहीर करतो की आता तो टीचर आहे. क्षणात पोलिसाचं गुन्हेगारात रूपांतर होतं कारण त्यानी क्रेयॉन्स शेयर केलेले नसतात. त्याला “टाईम आउट” असं म्हणून कठोरपणे छोट्या छोट्या हातांनी एका कोपऱ्यात ढकललं जातं. पण टाईम आउट मध्ये असलेली व्यक्ती सकाळच्या चहाबरोबर घेतलेला नैतिकतेचा डोस विसरून थकलेल्या आणि चिडचिड करणाऱ्या टिचरला अॅपलची लाच देते आणि घरात नेते. थोडंसं अॅपल पोटात गेल्यावर टीचर हुंहू किंवा अहं किंवा हंहं असं म्हणताना मान कुठल्या दिशेने हलवली की त्याचा काय अर्थ होतो याचं गहन असं ज्ञान देते. तोपर्यंत तिच्या आईवडिलांची चाहूल तिला लागते, डोअर बेल वाजते, घरातला कुत्रा पोटतिडकीनं भुंकत दाराच्या दिशेनं पळायला लागतो. आर्या त्याच्यामागे वारा कानात गेल्यागत धावायला लागते आणि “आजही उरलेली अकरा अंडी कशी वाचवली” हा विचार मनात येऊन मी खुसूखुसू हसत त्यांच्यामागे दार उघडायला जाते. तेव्हा अंगणातली सायकल आणि वारा, झाडं आणि वेली, कळ्या आणि फुलं सगळेजण तिच्यावर मायेचे पाश टाकून “खेळायला परत ये, परत ये” असं गुणगुणत असतात.
…. ते सगळ्यांना ऐकू येतं.
लेखिका : सुश्री भाग्यश्री बारलिंगे
मेसा, ॲरिझोना
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२० ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
देवळांच्या नावांची गंमत…
श्रीजोगेश्वरी आईच्या अगदी समोरून रस्ता जातो ना, तो दातार व दीक्षित वाड्यावरून फरासखान्यापर्यंत पोहोचतो. पुढे एक सुंदर हौद होता तिथे शंकराची मूर्ती व शिवलिंग होत. मध्यभागी असलेली ऐटदार बाहुली तिच्या डोक्यावरचा डेरेदार घडा त्यातून उसळणार, चमचमणारं कारंज आणि हौदातले सूळकन सटकणारे मासे हे आम्हा मुलांचं प्रचंड आकर्षण होत. तिथेच आता दगडूशेठ गणपती विराजमान झाले आहेत. तसेच दगडूशेठ यांच्या नावाचं दत्त मंदिर बाबुगेनू चौकाजवळ आपल्याला दिसतं. अप्रतिम तेजस्वी अतिशय देखणे दत्तगुरु पाहतांना भान हरपून जात. गणपती शेजारी मजूर अड्डा, फरासखाना आणि हुतात्मा भास्कर दा. कर्णिक यांचा स्मृती स्तंभ अजूनही जुन्या स्मृती जागवत ठामपणे उभा आहे. पुढच्या बेलबाग चौकात सिटी पोस्ट, नगर वाचन मंदिर, कोपऱ्यावरचं स्वस्त आणि मस्त बायकांचं आकर्षण ठरलेल साड्यांचे दुकान ‘मूळचंद क्लाथ ‘अजूनही आपलं नांव राखून आहे. या चौकात आल्यावर पुण्याबाहेरच्या लोकांचे पाय फडणीसांच्या बेलबागे कडे हमखास वळतात. अजूनही पूर्वजांचा अभिमान बाळगणारे फडणीसांचे वंशज तिथे राहतात. श्रीविष्णू दर्शनाबरोबर मोरांची भुरळ लोकांना पडते. बाहुलीच्या हौदा कडून डावीकडच्या रस्त्याने शनिवार वाड्याचे बुरुज, पेशवे कालीन श्री गणेश देऊळ, आणि प्रचंड दरवाजाचा शनिवार वाडा पर्यटकांना साद घालतो. तिथलं विस्तीर्ण मोकळं पटांगण म्हणजे आमची सायकल प्रॅक्टिसची हमखास जागा होती. जोगेश्वरी जवळच्या ‘कुलकर्णी अँड सन्स’ मधून एक आणा तासाने भाड्याची सायकल घेऊन आम्ही सीटवर न बसता नुसती सायकल चालवत शनिवारवाडा गाठत होतो. आप्पा बळवंत चौकात फारशी गर्दी नसायची. पण प्रचंड भीतीमुळे पायडल वरचा पाय जमिनीवरच पडायचा. एकदा वसंत टॉकीजला ‘मेरी झाशी नही दूँगी’ हा सिनेमा बघितला. झाशीची राणी डोक्यात शिरली. बाहू स्फुरायला लागले, मग ठरवलं जोगेश्वरी पासून एकदम सीटवर बसूनच सायकलवर स्वार व्हायचं. झाशीच्या राणीचा प्रभाव दुसरं काय! ☺️जिद्दीने चंद्रबळ आणून वळण पार करून प्रभात टॉकीज जवळ आलो. समोर हेsss भल मोठ्ठ नवीन सिनेमाचं पोस्टर लागल होत, त्यात सायकल वरून बागेत फिरणारा नट्यांचा घोळका होता. पोस्टरवर आम्हीच असल्याचा भास झाला, आणि काय सांगू!ते स्वप्न रंगवताना आम्ही एका सायकल स्वाराला धडक दीली. एक सणसणीत शिवी आणि” मरायचंय का?” हे शब्द कानावर पडता क्षणी स्वप्न तुटलं ” घूम जाव” म्हणत चपळाईने मागे वळलो आणि काय सांगायचं तुम्हाला? अहो!नंतर कितीतरी दिवस सायकलिंग बंद पडलं. सासरी केल्यावर मात्र धुळ खात पडलेली सायकल चकचकीत केली. रेल्वे क्वार्टर गावाबाहेर असल्यामुळे मुलांना डबल सीट शाळेत सोडणं, महिन्याचा किराणा भाजी आणण हा पराक्रम सायकलवर बसून करता आला. कारण शनिवार वाड्यासमोरच्या मोकळ्या पटांगणातल्या बटाट्या मारुतीला लहानपणी नवस केला होता ना!नवल वाटलं नां नांव वाचून? हो बटाट्या मारुतीच होता तो. लोखंडी लांबलचक सळ्यांच्या भिंतीच ते छोटसं टुमदार मारुती मंदिर होत. भांग्या मारुती झाला, गावकोस मारुती झाला, आणि हो भाऊ महाराज बोळाजवळचा जिलब्या मारुती पण कळला. परमराम भक्त मारुतीराया तुला आमचा शिरसाष्टांग नमस्कार.
काही दिवसापूर्वी आम्ही दोघी मैत्रिणी कामासाठी बेळगावला सकाळी जाऊन संध्याकाळी परत आलो. जाताना लवकरच निघालो. स्टेशनवर जाऊन तिकीटे काढली समोरच जोधपूर बेंगलोर एक्सप्रेस लागलेली दिसली.
२-३ बोगीमध्ये चढून पाहिले भरपूर गर्दी. कोठेच बसायला जागा सापडेना. पुनः खाली उतरून दुसऱ्या बोगीत शोध! आमची धावपळ बघून इडल्या विकणाऱ्या भैयाने सांगितले, “बहेनजी, जल्दी बैठो कही भी गाडी छुटने वाली है। भीड तो है ही।” पटदिशी आम्ही चढलो. आत गच्च गर्दी. गर्दीतच सरको सरको म्हणत कशातरी टेकलो तोच गाडी सुटली.
हुश्य करून नजर फिरवली तर बापरे. सगळीकडे बिहारी बसलेले. त्यांचे ते अवतार, नजरा बघून सकाळच्या थंडीत घाम फुटला. महिलांसाठी सेपरेट जागा असते तशी ही बोगी पुरुषासाठी राखीव का आहे असेच वाटले. त्यांचे खोकणे शिंकणे पाहून आम्ही पर्स मधून मास्क काढून आमची सुरक्षा वाढवली.
लोकांची सारखी ये जा सुरु होती. कडेला बसल्यामुळे धक्के खावेच लागत होते तेवढ्यात ढोल घुंगरू वादन सुरुझाले. बरोबरची डोक्यावरून पदर लपेटलेल्या बाईने रामाचा धावा भसाड्या आवाजात सुरु केला. एक हात पुढे पसरून पैसे मागणे सुरु. नेमके आमच्याकडे सुटे पैसे सापडेना. दहाची नोट दिल्या शिवाय गत्यंतर नव्हते.
आम्ही दोघी शेजारी खेटून बसूनही बोलायला काही मिळेना. चहा वाले, इडली वडा यांची ये जा तर अखंड!
बाहेर हिरवीगार शेती डोळ्याला दिलासा देत होती. निसर्ग मुक्तपणे आपले सौंदर्य उधळत होता. ते पाहून मात्र मन प्रसन्न झाले. शेतात ऊस डोलत होता. हिरवीगार पालेभाजी मनाला तजेला मिळवून देत होती.
स्टेशनवर आणखीन प्रवासी चढतच होते उतरायचे मात्र कोणीच मनावर घेत नव्हते. कसे तरी अडीच तास गेले आणि बेळगावच्या खुणा दिसायला लागल्या. मनोमन हुश्य झाले पण हाय! मध्येच रेल्वे थांबली ते थांबलीच. का तेही समजेना. बिहारी चे आवाज वाढले. गप्पा वाढल्या. खाण्याचे डबे उघडून खाणे सुरु झाले आम्हाला तर हालताही येत नव्हते. कुणीकडून आज चाललोय प्रवासाला असेच वारंवार मनात येत होते.
अर्ध्या तासाने एकदाचा प्रवास पुनः सुरु झाला. गाडीच्या दोन्ही बाजूंना आता घरे सुरु झाली. इतकी जवळ घरे की आतले सगळे दिसत होते. लहान मुले हात वर करून खदा खदा हसत होती. बायका बाहेरच भांडी घासत होत्या. दोन्ही कडच्या घरांमधून गाडी सुसाट धावत होती.
अखेर एकदा बेळगाव स्टेशन आले. हुश्य करून खाली उतरलो. बेळगाव स्टेशन छान स्वच्छ आहे.
काम झाले की आम्हाला लगेचच परतायचे होते. पुढचा परतीच्या प्रवासाचीच धास्ती होती. आमचे तिथले काम अपेक्षेपेक्षा खूपच पटकन झाले. रेल्वे पकडायची म्हंटले तर ३-४ तास उगीचच थांबायला लागणार होते म्हणून एस. टी. चा प्रयत्न करायचे ठरवले.
कर्नाटक मध्ये आलोय म्हणजे डोसा तर खायलाच पाहिजे. म्हणून त्यावर ताव मारला आणि बेळगाव एस टी स्टँडवर आलो. अपेक्षेपेक्षा जास्त स्वच्छ आहे फार गर्दीपण नव्हती.
आता मात्र आमचे लक जबरदस्त होते. मिरजला जाणारी बस स्टँडवर तयारच होती. आम्ही पटकन चढलो. बसमध्ये बसायला छान जागा मिळाली.
पाच मिनीटांत बस सुटली. आम्ही महाराष्ट्री असल्यामुळे आम्हाला पूर्ण तिकीट काढावे लागले आणि पुढे खरी गम्मत सुरु झाली बस हायवे वरून जाणार नव्हती. छोट्या छोट्या गावांचे स्टॉप घेणार होती.
पहिला स्टॉप आल्या बरोबर कर्नाटकी महिलांची झुंड दारापाशी धावत आली आणि बसमध्ये मोर्चा आल्या सारख्या महिला अक्षरशः घुसल्या. टिपिकल साड्या, डोक्यात गजरा, नाकात चमकी. गळाभरून मोत्याच्या माळा, घसघशीत मंगळसूत्र आणि कन्नड बोलणे. बघता बघता बस खचाखच भरली. ड्रायव्हर कंडक्टर आणि जेमतेम सहा सात पुरुष प्रवासी. बाकी सगळ्या महिला. सगळ्याजणी कुठल्याशा यात्रेला चालल्या होत्या.
येताना रेल्वे मध्ये आम्ही दोनच महिला आणि आता कसे बसे बिचारे ७-८ पुरुष. तिकडे महिलांना बसप्रवास पूर्ण मोफत त्यामुळे ता आनंदात सगळ्या यात्रेला चालल्या होत्या. कंडक्टरचे काम पैसे घेऊन तिकीटं काढणे नाही तर त्यांचे आधारकार्ड तपासणे. तो आपले प्रत्येकीचे कार्ड नुसते बघूनच परत करत होता. बिचारा गर्दीमध्ये घामेघूम झाला होता.
पुढचे स्टॉप आले की बायका अजूनच येत होत्या. एक सिट कशीबशी रिकामी झाल्यावर दुसऱ्या बाईने पटकन बसकण मारली आणि झाले, खिडकी शेजारची बाई डोळे वटारून तिच्या दंडाला ढकलायला लागली. तोंडाने डब्यात दगड खडबडल्या सारखी बडबड सुरु होती. बसलेली बाई पण कमी नव्हती. तिचाही जोरजोराने बड बड करत हातवारे करून ड्रामा सुरु झाला. दोघीही थांबायला तयार नव्हत्या. दोघीचे आवाज टिपेला पोहोचले. ढकलाढकली सुरु झाली. कंडक्टरने बेल वाजवून बस थांबवली.
आता इतर बायकांचा गलका वाढला. कंडक्टर जोरात ओरडला. त्यातला पोलीस शब्द तेव्हढा कळाला. बापरे ! पुढे काय होणार म्हणून आमच्याच पोटात गोळा आला.
पण त्या वाक्याचा अर्थ कळाल्यामुळे बसमध्ये एकदम सन्नाटा पसरला आणि कंडक्टरने डबल बेल मारली. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.
छोटी छोटी गावं येत होती. चार महिला उतरल्या की दहा घुसत होत्या. गावाची नावपण आम्हाला समजत नहती कारण सगळी कन्नड मध्ये. थोड्या वेळाने एक मोठे गाव आले एका दुकानाच्या बोर्डवर इंग्रजी नाव दिसले : हुकेरी !
इथेही स्टॅडवर गर्दी ! दोन जाडजुड राजस्थानी लमाण्या वाटाव्या अशा महिला सगळ्याना ढकलत आत चढण्यात यशस्वी झाल्या. यानी आमच्या सारखेच फुल तिकीट काढले. त्या दोघीमुळे कंडक्टरलाच जागा राहिली नाही. बस इतकी गच्च भरली होती पण ड्रायव्हर सराईतासारखा जोरात गाडी हाणत होता.
कर्नाटकात बस फुकट शिवाय प्रत्येकीला २००० रु दर महिना मिळतात म्हणे त्यामुळे शेतात काम करायला कोणी तयार नाही. पुरुषांना घरी बसवून बायका सतत फिरत रहातात असे ऐकले.
पूर्वीचे घर, चूल आणि मूल हे या महिलांनी कधीच झिडकारलय. आता पुरुष बिच्चारे झालेत कारण त्यांना काम ही करावे लागते, पैसाही मिळवावा लागतो आणि अशा वांड बायकाना सांभाळत संसार करावा लागतो.
भावाना बहिणींचा फारच पुळका आलाय खरं पण पुढे काय वाढून ठेवलय परमेश्वर जाणे !
आमचा स्टॅण्ड आल्यावर हुश्य करून उतरलो आणि बेळगावच्या बसला टाटा करून घरची वाट धरली.