मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -1 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -1 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

बर्‍याच दिवसांनी आम्ही सख्ख्या मैत्रिणी एकत्र जमलो होतो. गप्पांना रंग चढला होता. किती बोलू आणि काय बोलू, असं प्रत्येकीला झालं होतं. बोलता बोलता विषय निघला, ‘आपल्यावर कुठल्या व्यक्तीचा विशेष प्रभाव पडलाय?’

मी एकदम म्हंटलं, ‘मला वाटतं, माझ्यावर माझ्या सासुबाईंचा प्रभाव आहे.’ सगळ्या जणी काहीशा चकित मुद्रेने माझ्याकडे बघू लागल्या. कारण सासू-सुनेचे भावबंध तसे जगजाहीरच. जुन्या बायकांनी तर ओव्या-बिव्यातून ते शीलालेखासारखे शाश्वत केलेले. गाऊन जगजाहीर केलेले. त्यांनी म्हणूनच ठेवलय, ‘माय म्हणता म्हणता ओठालागी ओठ मिळे’ इती वर्षा. ‘आणि सासू म्हणता म्हणता काय ग?’ शुभदाची तत्पर विचारणा. ‘सासू म्हणता म्हणता ओठातून जाई वारे.’ वर्षाचं प्रत्युत्तर.

त्यातून माझ्या सासूबाई जुन्या पिढीतल्या. सोवळ्या. दोन पिढ्यात असावं, तेवढं आमच्यात अंतर. त्यातही त्या श्रद्धाळू. अगदी अंधश्रद्ध म्हणाव्या, इतक्या पराकोटीच्या सश्रद्ध, तर मी आगदी पराकोटीची तर्कवादी. त्यामुळे मैत्रिणींना आश्चर्य वाटणं स्वाभाविक होतं. मग मी म्हणाले, ‘सासू’ जर ‘माय’ झाली, तर ओठाला ओठ जुळतीलच ना! आणि ओठाला ओठ जुळल्यावर मायेचे भावबंदही तसेच घट्ट होतील! मग भले तोंडाने ‘माय’ म्हणून हाक थोडीच मारली पाहिजे? माझं लग्नं झालं, तेव्हा हल्लीसारखी सासूला ‘आहो आई’ असं म्हणायची पद्धत नव्हती. पण ही पद्धत मात्र चांगली आहे. त्यामुळे भावनिकदृष्ट्या  सासू-सून जास्त जवळ येत असतील, असं वाटतं.

‘मला असं वाटतं, माझे विचार,व्यवहार, वर्तन, दृष्टिकोन यावर माझ्या सासुबाईंचा खूप प्रभाव आहे. माझ्या लेखनावरही आहे, असं म्हंटलं, तर चूक ठरणार नाही. कारण लेखकाला काही लिहिताना व्यक्तींना खूप समजून उमजून घ्यावं लागतं. मग त्या प्रत्यक्षातल्या असोत किंवा  मनाने सृजित केलेल्या असोत. व्यक्तीचं अंतरंग जाणून घेण्याची माझ्या सासुबाईंची शक्ती अजोड होती. अंतरंग जाणून त्यातील, ’सत्व ते घ्यावे, फोल टाकोनी द्यावे.’ या वृत्तीने त्या जागल्या, बोलल्या.

माझ्या सासुबाईंचं नाव लक्ष्मी. जुन्या पिढीतील थोर लेखिका लक्ष्मीबाई केळकर यांच्याशी नामसाम्य. माझ्या सासुबाईंनी लेखन केलं असतं, तर ‘माणुसकीचे गहिवर’ सारखं पुस्तक हातून लिहून झालं असतं.

‘ऐसी कळवळ्याची जाती । लाभावीण करी प्रीती।।’ या तुकोबांच्या वचनाचं मूर्त रूप म्हणजे माझ्या सासुबाई. त्यातही त्यांचा ‘प्रीती’ करण्याचा परीघ घरातल्या माणसांपुरता मर्यादित नव्हता. सगळे जवळचे, दूरचे नातेवाईक, परिचयातले, गावातले असा तो व्यापक होता.

माझं लग्न १२ मे १९६५ ला झालं. माझे पुतणे-पुतण्या सासुबाईंना आजी म्हणत. होता होता माझे दीर – जाऊबाई, यजमान सगळेच त्यांना आजी म्हणू लागले. मग मीपण त्यांना आजीच म्हणू लागले. नाही तरी त्यांची नात यमुताई, त्यांच्या मोठ्या मुलीची, अक्काची मुलगी माझ्यापेक्षाच नव्हे, तर यांच्यापेक्षाही मोठी होती. म्हणजे तसा विचार केला, तर आमच्यात दोन पिढ्यांचं अंतर होतं. म्हणजे नात्याने नसेना का, पण वयाच्या अंतराने मी त्यांच्या नातीसारखीच झाले होते आणि त्यांनीही तशीच माया माझ्यावर केली. त्यामुळे या पुढील लेखात मी काही वेळा त्यांचा उल्लेख सासुबाई असा न करता ‘आजी’ असाच केला आहे.

माझं लग्न झालं आणि मी माधवनगरला केळकरांच्या घरात आले, तेव्हा केळकरांचं खातं-पितं घर ‘सुशेगात’ नांदत होतं. पण कधी काळी, अल्पकाळ का होईना, या घराने दारिद्रयाचे चटके सोसले होते. विपत्तीचा अनुभव घेतला होता. सासुबाईंचे यजमान गेल्यावर त्यांना आणि त्यांच्या मुलांना  गरिबीत दिवस काढावे लागले होते.

माझ्या सासुबाईंना कुणी वय विचारलं की त्या सांगत , ‘साल तितकं वय’. माझे सासरे १९४१ साली निवर्तले. म्हणजे त्या अवघ्या ४१ वर्षाच्या होत्या तेव्हा. सासर्‍यांना घरात नाना म्हणत आणि ते गावात नारायणभट म्हणून ओळखले जात. ते गेले, तेव्हा सासुबाईंच्या पदरात तीन मुली आणि दोन मुले होती. मोठ्या मुलीचे म्हणजे आक्कांचे तेवढे लग्न झाले होते. त्यांचीही परिस्थिती म्हणजे ‘एकादशीच्या घरी शिवरात्र’ अशीच. नाना सांगली संस्थानच्या गणपती पंचायतनातील विष्णु मंदिराचे पुजारी होते. त्यांची भिक्षुकी वृत्ती ( व्यवसाय) होता.

नानांचे बिर्‍हाड सांगलीच्या गावभागातील तात्या केळकरांच्या वाड्यात होते. आता सात माणसांचे कुटुंब आणि आला-गेला सांभाळत असणार्‍या एखाद्या भिक्षुकाची मिळकत किती असणार? त्यात शिल्लक किती उरणार? आक्कांच्या पाठचे दादा. ते तेव्हा दहावीत शिकत होते. त्यानंतर सुशीला, कुसुम, उषा या बहिणी, नंतर माझे यजमान अनंत. त्यांना सगळे बाळू म्हणत. ते अवघे तीन वर्षाचे होते तेव्हा. आता पुढे काय? हा प्रश्न स्वाभाविकपणे पुढे आला. ‘ आता गंगाधराने (दादांनी) शिक्षण सोडून भिक्षुकी करावी,  असेच अनेकांचे म्हणणे पडले. माझ्या सासुबाईंनी मात्र, ‘मुलाला भिक्षुक करायचे नाही. सध्या या व्यवसायाला मान-प्रतिष्ठा राहिली नाही,’ असे ठामपणे सांगितले. तरीही १० वी आणि ११वी अशी दोन वर्षे शिकत असताना दादांनी दोन देवळातली पूजा केली. देवळातला प्रसाद म्हणून दोन ताटातून भरपूर जेवण घरी यायचे. घरच्यांची एक वेळच्या का होईना, पण जेवणाची सोय व्हायची. नानांनी थोडी जमीन घेतली होती आणि ती खंडाने दिली होती. खंडाचा धान्य घरी यायचं. त्यावेळच्या रीतीप्रमाणे सासुबाईंचं केशवपन झालं. त्याबद्दल मी पुढे केव्हा तरी दादांना विचारलं, ‘तुम्ही कसं होऊ दिलत केशवपन?’ त्यावर दादा म्हणाले, ‘ तो आजींचा स्वत:चा निर्णय होता.’ कदाचित त्यांच्यावर झालेले संस्कार, तो काळ, गावातलं वातावरण, सासरे करत असलेला व्यवसाय याचा तो एकत्रित परिणाम असेल.

‘कसं चाललं होतं तुमचं तेव्हा?’ मी एकदा आमच्या कुसुमवन्संना विचारलं होतं. ‘अपरंपार कष्ट आणि अपार काटकसर या दोन चाकांवर आमचा गाडा तेव्हा चालत होता.’ त्या म्हणाल्या.

त्यावेळी कुसुमताई दहा वर्षाच्या होत्या. सुशीताई बारा वर्षाच्या असतील. कुसुमवन्स पुढे म्हणाल्या होत्या,  ‘शेजार्‍या-पाजार्‍यांच्या रेशनचं धान्य आम्ही आणून देत असू. त्यांच्या रेशनवरची बाजारी आम्ही घेत असू. आमच्या रेशनवरची बाजरीही आम्ही घेत असू. बाजरी उष्ण. त्यामुळे घरात आम्ही कुणी ती खात नसू. आमचे चुलत भाऊ गणुदादा यांना आम्ही ती देत असू. त्या बाजरीवर ते रुपयाला दहा आणे कमिशन देत असत. इतरांचं शिवण शिवून शिलाईचे पैसेही आम्ही मिळवत असू. प्रत्येक फ्रॉकला चार आणे शिलाई मिळायची. संध्याकाळी बाजार उठायच्या वेळी आई बाजारात जाई. खंडून भाजी आणे. त्याचे वाटे घालत असू. शेजारी-पाजारी विकत देत असू. त्यातच आमची भाजी सुटायची. त्या काही वर्षात आम्ही तांदूळ घरात आणलाच नाही. रेशनवर कण्यांचं पोतं मिळे. कण्यांचाच भात घरात होई.’

क्रमशः …

© सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गौरव गाथा श्वानांची… भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ गौरव गाथा श्वानांची… भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

इंग्लंड मधील एका खेड्यातील घडलेली घटना. मध्यरात्री पोलीस गस्त घालत होते. बरोबर  ‘ एरडेल  टेरियर’, जातीचा ‘ ब्रूस ‘ हा  कुत्रा होता. अचानक थांबून तो गुरगुरायला लागला . हुकूम मिळताच, तो जवळच्या झुडूपात गडप झाला. काही क्षणातच, एक माणूस डोक्यावर हात घेऊन ‘ ब्रुस ‘च्या पुढे आला. चपळाईने त्या माणसाने, खिशातून पिस्तूल काढले . ‘ ब्रूसच्या ‘  धोका लक्षात आला. आणि त्याने पटकन, माणसाचा पिस्तूल धरलेला हात पकडला. पिस्तूल गळून पडले त्याच्या हातातून !.आणि अखेर तो पकडला गेला. घरफोडीची बरीच हत्यारे त्याच्याजवळ सापडली. आणि अनेक गुन्हेही उघडकीस आले. ‘ ब्रूस ‘चे सर्वांनी कौतुक केले.

ग्वाटेमालाला बऱ्याच वर्षांपूर्वी रात्रीच्या वेळी मोठा भूकंप झाला. दिवस उजाडताच, पडलेल्या घरांखालील माणसे शोधायला सुरुवात झाली. तेव्हा लक्षात आले की, गावातली सगळी कुत्री गावाबाहेर पळून गेली होती. ती नंतर परत आली . आणि कुत्र्यांनीच मृत आणि जिवंत माणसांना शोधून काढले. लोकांना समजेना की, सगळी कुत्री गावाबाहेर कशी गेली? कुत्र्यांना भूकंपाची जाणीव अगोदर होते .आणि  ती दूर दूर जाऊन भुंकत राहतात. नुकत्याच  सीरिया आणि तुर्कीच्या भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताने इतर मदतीबरोबरच डॉग स्काँडही पाठवले आहे.

दुसऱ्या महायुद्ध काळात, जर्मन विमाने लंडनवर बॉम्ब वर्षाव करीत होती. अनेकदा इमारती कोसळून अनेक जण त्याखाली गाडले जात होते. अशावेळी ‘ जेट ‘ नावाच्या कुत्र्याने अनेक जणांना वाचवले. एकदा एका ठिकाणी, ‘आता येथे कोणी सापडणार नाही’ असे म्हणून,’ जेटला ‘ घेऊन पोलीस परत निघाले. पण ‘जेट ‘ परत जायला तयार होईना. एका ठिकाणी उकरून भुंकायला लागला. पोलिसांनी तेथे जाऊन आणखी थोडे उकरून पाहिले तर, एका तुळईखाली बरेच जण बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार झाले .आणि सर्वजण शुद्धीवर आले .डोळ्यात पाणी आणून सर्वांनी ‘जेटचे ‘ खूप खूप कौतुक तर केलेच ,पण  त्याचे आभार कसे मानावेत, यासाठी त्यांना शब्द सुचेनात. ‘ जेट ‘ सर्वांचा प्राण दाता ठरला.

‘रॉक अँड रोल ‘, संगीताचा भारलेला काळ होता तो. ते संगीत म्हणजे अक्षरशः वेड लावणारे होते.  लंडनमध्ये सिनेमा पाहून झाल्यानंतर प्रेक्षक रस्त्यावर, मोठमोठ्याने ओरडून नाचत सुटले .जमाव बेभान झाला. जमावाने शोकेसेस आणि दुकाने फोडायला सुरुवात केली . स्कॉटलंड यार्डचे पोलीस कुत्र्यांना घेऊन आले. कुत्र्यांना  जमावाच्या अंगावर सोडणे शक्य नव्हते. पण केवळ कुत्र्यांना पाहताक्षणीच जमाव शांत झाला. केवळ  कुत्र्यांच्याच्या हजेरीने जमावावर केवढा परिणाम झाला पहा बरं ! किमयागार म्हणावे का त्याला?.

मुंबईच्या लोकलमध्ये, एका तरुण मुलीची, दागिन्यांसाठी हत्या झाली. कळवा स्टेशनवर गाडी थांबताच काही तरुण डब्यातून उतरून गेले. पोलिसांना पत्ता लागत नव्हता. कळवा स्टेशनवर एका झाडाखाली त्यांना एक चप्पल रोड दिसला. त्यावर खाऱ्या चिखलाचे थर होते. शोध आणि तपास घेण्यासाठी पुण्याहून ‘राणी ‘ या डॉबरमन कुत्रीला आणले. तिची मदत घेतली. कळवापासून जवळच दिवा गावाजवळ असा चिखल होता. पोलीस गावात चौकशी करू लागले. ‘राणी ‘ कुत्रीला पाहून तरुण आरोपी गडबडला. घाबरला. आरोपी हा पोलिसांपेक्षा कुत्र्याला जास्त घाबरतो. त्याप्रमाणे तो पकडला गेला. त्या मुलीचे दागिने त्याने घराच्या छपरात लपवून ठेवले होते. पुढे तो आणि त्याचे साथीदारही पकडले गेले .आणि त्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा झाल्या. राणी कर्मयोगी झाली म्हणायची ना!.

सहारा विमानतळावर हेरॉईन, अफू, ब्राऊन शुगर अशी मादक द्रव्ये प्रवासी लपवून आणतात. ज्या बॉक्समध्ये अशी द्रव्ये असतात , तो बॉक्स पाहताच  ‘हीरो’,  हा निष्णात कुत्रा पेटीकडे पाहून मोठमोठ्यांना भुंकायला लागायचा. अशा द्रव्यांचा वास त्याला कसा येतो ? ही गोष्ट कस्टम अधिकाऱ्यांनाही समजत नसे. त्याच्या आठ नऊ वर्षांच्या कारकिर्दीत ‘ हिरोने ‘, 200 कोटी रुपयांची मादक द्रव्ये शोधून काढून आपल्या  ‘ हिरो ‘ या नावाचे सार्थक करून दाखवले.

अगदी अलीकडची गोष्ट. अगदी अभिमान वाटावा अशी. जम्मू कश्मीरमधील, बारामुल्ला भागात आतंकवाद्यांना पकडण्यासाठी जवानांच्या बरोबर आणखी एक जवान  ( झूम नावाचा श्वान ) काम करीत होता. आतंकवादी एका घरात लपले होते . ‘ झूम ‘ च्या गळ्यातल्या पट्ट्यावर चीप बसविली होती. आतंकवाद्यांची माहिती घेण्यासाठी, प्रथम ‘ झूम ‘ला पाठवले गेले . जेणेकरुन ‘ झूम ‘ कोठे आहे ,हेही पट्ट्यावरील चीपमुळे कळणार होते. ‘ झूमने ‘ दोन आतंकवाद्यांना  बरोबर ओळखले .आणि त्यांच्यावर हल्ला केला . त्यांना अगदी जेरीस आणले. आतंकवादी पकडले गेले. पण प्रतिकार करताना ,एका आतंकवाद्याने  ‘ झूम ‘ वर गोळ्या झाडल्या . त्याला गोळ्या लागल्या. तरीही तो न हरता, आतंकवाद्यांशी झटतच राहिला. जखमी झाला. “. बचेंगे तो और भी लढेंगे ” असे जणू आपल्या कृतीने तो सांगत होता. त्याला श्रीनगरच्या व्हेटरनरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आठ दिवस तो उपचारांना हळुवार प्रतिसाद देत होता. पण अखेर एक ज्वलंत देशभक्त मृत्यूच्या स्वाधीन झाला. अनंतात विलीन झाला. शहिद झाला. त्याला सन्मानाने निरोप दिला.  

२६ नोव्हेंबर २००८च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात, अतिरेक्यांनी फेकून दिलेला जिवंत हॅन्ड ग्रेनेड पोलीस टीमने  “मॅक्स ” या कुत्र्याच्या साहाय्याने शोधून काढला .आणि हजारो लोकांचे प्राण वाचविले. २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी, त्याने बरीच थरारक कामे केली होती. हॉटेल ‘ताज ‘ च्या बाहेर तब्बल आठ किलो आरडीएक्सचा आणि २५ हँड ग्रेनेडचा शोध त्याने  घेतला होता. आणि अनेक नागरिकांचे प्राण वाचवले होते. ११ जुलै २०११ रोजी झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटादरम्यान झवेरी बाजार येथील जिवंत बॉम्ब शोधून  त्याने उल्लेखनीय असे कर्तव्य बजावले होते . सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या हस्ते ‘ मॅक्स ‘चा गौरव केला गेला. पोलीस दलातील प्रत्येकालाच ‘ मॅक्स ‘ चा लळा लागलेला होता. लाडक्या ‘ ‘मॅक्स ‘ च्या निधनाने पोलीस दलही खूप हळहळले .सर्वांनाच वाईट वाटले .

 —क्रमशः भाग पहिला

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ खोट्या गोष्टी… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ खोट्या गोष्टी… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

निरनिराळ्या लोकांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टी

१) जिवलग मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट- ती तुझ्याकडेच बघतेय.

२) बस कंडक्टर ने सांगितलेली खोटी गोष्ट- मागची गाडी रिकामी आहे, त्यात बसा.

३) आईबाबांनी सांगितलेली खोटी गोष्ट- फक्त दहावीपर्यंत अभ्यास कर, नंतर मज्जाच मज्जा.

४) सर्वांनीच सांगितलेली खोटी गोष्ट- घर, गाडी आपण एकदाच घेतो, त्यामुळे पैशाचा विचार करू नको.

६) नव्याने नोकरीला लागलेल्या मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट- पगार कमी आहे, पण शिकायला खूप मिळतं.

७) बॉसने प्रमोशन नाकारताना सांगितलेली खोटी गोष्ट- मी तुझ्यासाठी खूप भांडलो, पण काही उपयोग झाला नाही.

८) मुलगी बघायला गेल्यावर सासरच्यांनी सांगितलेली खोटी गोष्ट- आमची मुलगी खूप शांत स्वभावाची आहे.

९) मुलाने लग्नाआधी मुलीला सांगितलेली खोटी गोष्ट- मी Occasionally ड्रिंक्स घेतो.

१०) पारितोषिक वितरणाच्या वेळी परीक्षकांनी सांगितलेली खोटी गोष्ट- माझ्यासाठी सर्वच जण विजेते आहेत.

११) कपड्याच्या दुकानातील सेल्समनने सांगितलेली खोटी गोष्ट- हा रंग तुमच्यावर उठून दिसतो.

१२) “टेबल पार्टनर” ने सांगितलेली खोटी गोष्ट- बिअर म्हणजे दारू नव्हे.

आणि सर्वात कळस म्हणजे

१३) नवर्‍याने बायकोला सांगितलेली खोटी गोष्ट

– तू माहेरी गेलीस की मला मुळीच चैन पडत नाही.

सर्वच खोटं ..पण खरंय..

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बोलणे…”  ☆ श्री कौस्तुभ सुधाकर परांजपे ☆

श्री कौस्तुभ सुधाकर परांजपे

अल्प परिचय 

एका कंपनीत ३० वर्षे काम केल्यानंतर असीस्टंट मॅनेजर या पदावरून स्वेच्छानिवृत्ती.

शिक्षण – एम,काॅम पर्यंत.

विरंगुळा म्हणून लिहीणे. आज पर्यंत जवळपास ३५० हून अधिक पोस्ट.

दै. लोकमत, तरुण भारत जळगाव यात काही प्रकाशित. तसेच काही पोस्ट ऑडीओ बुक वर देखील घेतल्या होत्या.

? विविधा ?

☆ “बोलणे…”  ☆ श्री कौस्तुभ सुधाकर परांजपे 

नुकत्याच झालेल्या वर्धा येथील अ.भा.साहित्य संमेलनात सादर केलेली कविता:

बोलणे….कौस्तुभ परांजपे.

बोलणे……

बोलण्याबद्दल लिहिणे यातच एक गंमत आहे. किती प्रकारचे बोलणे असते….

बोबडे, गोड, लाडात, रागावून, गुळमुळीत, स्पष्ट, चांगले, वाईट, हळू, जोरात, कानात बोलणे इ… यातही बोलणे पण पाठीमागे बोलणे यावर बरेच बोलणे होत असावे. अशा या बोलण्यातल्या विविधता जवळपास प्रत्येकात आहेत.

आपले वय, अनुभव, अधिकार, जबाबदारी, प्रसंग, काळ या बरोबर बऱ्याचदा बोलणेही बदलते.

बोलण्या बाबत काहिंचा हातखंडा असतो. म्हणजे त्यांना फक्त बोलण्यासाठीच बोलावले जाते. आणि ते ऐकण्यासाठी लोक उत्सुक असतात. तर काहिंना आता गप्प बसायचं काय घेशील? असेही प्रेमाने विचारतात.

बोलणाऱ्याचा अभ्यास किती? यावरून देखील लोक बोलणाऱ्याची किंमत करत असतात. काय बोलतोय हे लक्ष देऊन ऐक, असे सांगतात. तर काही वेळा त्यांच्या बोलण्याकडे  लक्ष देण्याची गरज नाही. असेही बोलून दाखवतात. काही बोलणे कानावर येते, तर काही आपण मनावर घेतो.

काहिंच्या बोलण्या बद्दल लिहिले जाते, तर काहिंच्या लिहिण्याबद्दल बोलले जाते. बोलण्याने माणसे जवळ येतात, तशीच लांब देखील जातात. प्रेम आणि कटुता, आपलेपणा आणि परकेपणा बोलण्यातून जाणवतो.

राग, द्वेश, अहंकार, प्रेम, गर्व, अभिमान, कौतुक, भावना या गोष्टी वागण्या बरोबरच बोलण्यातून जाणवतात. बोलण्यात स्वाभिमान असतो, तसेच बोलण्यात नम्रता, ताठरपणा देखील असते. बोलतांना नकळत माणसाचे अंतरंग जाणवतात.

बोबडे बोलण्याच्या कौतुकापासून, आजकाल वयोमानाने त्यांचे बोलणे नीट समजत नाही या सगळ्या अवस्थेत आपण वेगवेगळ्या पध्दतीने बोलत असतो. काही बोलून मोकळे होतात, तर काही मोकळेपणाने बोलत असतात. बऱ्याचदा कुणी आपल्याशी बोलावं किंवा आपल्या बद्दल (चांगले) बोलावं अशी इच्छा असते.

बोलण्यात ताकद आहे,  “बोलणाऱ्याची माती देखील विकली जाते.” असे म्हणतात. त्याच बरोबर “बोले तैसा चाले…” असेही म्हणतात. “लेकी बोले सुने…”, किंवा “बोलायची कढी…” हे देखील सर्वश्रुत आहे. “तिळगुळ घ्या… गोड बोला… ” असे सांगत आम्ही सण देखील साजरे करतो.

बोलता बोलता बऱ्याचशा गोष्टी समजतात. तर बऱ्याच गोष्टी बोलता बोलता करायच्या राहून जातात.

काही (राजकारणी) नुसतेच बोलत असतात. तर काही बोलण्यातून राज आणि कारण दोन्ही शोधत असतात.

काही मोजके, मुद्याचे, नेमके, आणि वेळेवर बोलतात. तर काहींना मुद्यावर या, नमनाला घडाभर तेल कशाला? असे सांगावे लागते.

काही वेळा घरातील अबोला देखील बरेच काही बोलून जातो. नुसत्या डोळ्यांच्या हालचालीने देखील काय बोलायचे आहे याचा अंदाज येतो.

पण बोलणे हे होते आणि लागतेच. काही वेळा मंडळी ठरवून एकत्र येऊन बोलणी करतात‌. तर काही वेळा बोलणी ऐकून घ्यायला लागतात.

मोठ्यांना बोलण्याचा अधिकार असतो. तर लहान तोंडी मोठा घास हे देखील बोलण्याबाबतच असते.

असो, लिहिता लिहिता मनातले बरेच बोलून गेलो. मनातलं बोलण्यासाठी काही खास माणसं असतात. तर काही खास माणसं मनातलं बरोबर ओळखतात.

©  श्री कौस्तुभ परांजपे

जळगाव-महाराष्ट्र

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अण्णा उर्फ अरविन्द गजेंद्रगडकर – लेखक : डॉ केशव साठये ☆ सुश्री शुभा गोखले ☆

? मनमंजुषेतून ?

☆ अण्णा उर्फ अरविन्द गजेंद्रगडकर – लेखक : डॉ केशव साठये ☆ सुश्री शुभा गोखले ☆ 

आकाशवाणी, पुणे हा  मोठमोठ्या कलाकारांनी बहरलेला, लगडलेला एक  कल्पवृक्षच होता. बा.भ.बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, आनंद यादव अशा अनेक मंडळींनी इथे काम केले. हेही त्यापैकीच. निर्माता या पदावर  काम करणारे हे केवळ एक अधिकारी नव्हते, तर एक उत्कृष्ट कलावंत-वादक-लेखक-संवादक अशा बहुगुणांनी  नटलेले एक व्यक्तिमत्व होते . आकाशवाणीवर निर्माता म्हणून काम करताना अनेक दिग्गज संगीतकार आणि वादक त्यांच्या सहवासात आले. ते केवळ सरकारी बाबू नव्हते तर संगीताचे साधक आणि जाणकारही. त्यामुळे हरिप्रसाद चौरसिया असोत किंवा बेगम अख्तर, ही मंडळी यांच्या गुणग्राहकतेवर आणि संगीत साधनेवर खूश असायची. हरिप्रसाद यांना खूप मानायचे. धारवाड, नागपूर येथील आकाशवाणी केंद्रांवरची त्यांची कारकीर्दही  गाजली.

ते गोष्टी वेल्हाळ होते. गोष्ट कशी सांगायची हे त्यांच्याकडून शिकावं. हा अनोखा गुण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक लोभस पैलू  होता. हाडाचे शिक्षक होते ते. सायन्स पदवीधर. शिक्षण शास्त्राचाही रीतसर अभ्यास केलेले. माझे एक गृहितक आहे ते म्हणजे विज्ञान शाखेतील कोणत्याही विषयाचा अगदी साधा पदवीधर जरी असला तरी तो / ती वैचारिक दृष्ट्या एक विशिष्ट पातळी कधी सोडत नाहीत. वस्तुनिष्ठता हा गुण आणि no nonsense हा Approach त्यांचा वागणूकीचा भाग बनून जातो. अण्णाही त्या पठडीतले. संगीताचा गाढा अभ्यास ,व्यासंग इतका की केवळ संगीत साधना आणि वादन कौशल्य एवढ्यावर ते थांबले नाहीत. या क्षेत्रात चौफेर मुशाफिरी केली.

पन्नालाल घोषांची शागिर्दी केलेल्या अण्णांची बासरी वादनावर तर हुकमत होतीच. पण स्वरमंडळ सारखे फारसे प्रचलित नसलेले वाद्य त्यांनी आपल्या अदाकारीने झंकारत ठेवले. संगीतावर व्याख्याने दिली. संगीत परीक्षा सुलभ व्हाव्यात म्हणून मार्गदर्शनपर पुस्तकेही लिहिली. वेगवेगळ्या पट्टीत गाणाऱ्यांसाठी त्यांनी तानपुरा वादनाच्या ध्वनीफिती बनवल्या.  वर्तमानपत्रात लेख लिहिले. संगीतातल्या सर्वच क्षेत्रात अधिकार असलेले ते एक दुर्मीळ व्यक्तिमत्व होते. 

अण्णांची (अरविंद गजेंद्रगडकर ) माझी ओळख त्यांचा मुलगा निखील याच्यामुळे झाली. तो माझ्या वर्गात होता; पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या. पण खरं सांगू का, त्यांचे माझे सूर अधिक जमले आणि खूप लवकरही. मी मुंबई दूरदर्शनला असताना ते आमच्याकडे कार्यक्रम करायला येत असत. कधी वादनासाठी तर कधी मुलाखती घ्यायलाही. माझ्या माहिमच्या मठीवरही ते अनेक वेळा येऊन गेले. दादा म्हणजे जी.एन.जोशी यांच्याकडे मी पेइंग गेस्ट म्हणून राहात होतो. अण्णांना तर त्यांच्याबद्दल विशेष आदर. मला वाटते दादाना भेटण्याच्या ओढीने ते माझ्याकडे येत असावेत. कारण काहीही असो. ते प्रेमाने येत. त्यांनी मला संगीत विश्वातील सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, पण प्रत्यक्ष घडलेल्या अनेक कथा सांगितल्या.

मुंबईत त्यांचे वास्तव्य बोरीवली इथे होते. पण संचार मात्र शहरभर असायचा. कुठे चांगले ध्वनिमुद्रण असले, एखादा दुर्मीळ गाण्याचा कार्यक्रम असला की यांची उपस्थिती ठरलेली. मला एक दोनदा त्यांनी चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगलाही नेले होते . ‘माझा लवतोय डावा डोळा’.. शांताबाई यांच्या महानंदा चित्रपटातील लताबाई यांचे गाणे ध्वनिमुद्रित होताना मी यांच्याच सहवासात अनुभवले आहे . 

स्वतःवर ज्याला विनोद करता येतो किंवा स्वतःची फजिती ज्याला ग्रेसफुली सांगता येते तो माणूस निर्मळ मनाचा असतो. अण्णा असे अनेक किस्से सांगत. त्यातील हा एक अफलातून किस्सा — ते अनेक दिवाळी अंकांसाठी लिहित असत. पण मानधनाची मात्र वाट पाहावी लागे. अशाच एका अंकाचे मानधन आले नाही म्हणून ते त्यांच्या कार्यालायात सदाशिव पेठेत गेले. थोड्या इतर गप्पा मारुन त्यांनी मानधनाचा विषय काढला. संपादकाने नेहमीप्रमाणे रडगाणे गायले . शेवटी हे म्हणाले मग असे करा मला पाच अंक द्या. मानधन नको. त्यावर संपादक म्हणाले ते परवडणार नाही, त्यापेक्षा मानधन देतो. यावरुन मानधनाचा आकडा किती अशक्त होता हे कळले आणि आमची हसून हसून पुरेवाट झाली . 

१९८०च्या दशकात मुंबईत नुकतीच हॉटेलमध्ये लाईव्ह संगीत कार्यक्रमांची सुरुवात झाली होती. गायक, संगीतकार यांना हॉटेलमध्ये सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित करत. ३,४ तास गायन ,वादन यांच्या मैफिलींचा आनंद लुटत. ग्राहक खानपान सेवेचाही आस्वाद घेत असत. कलाकारांनाही उत्तम मानधन मिळे. वरळी व्हिलेज या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना करारावर आमंत्रित केले होते . या मंडळीना एक पाहुणा आणायला परवानगी होती. तो भाग्यवंत मीही एक दोनदा ठरलो . अण्णांची बासरी ऐकत , नयनरम्य माहोल असलेल्या त्या गार्डनमधल्या ओल्या संध्याकाळी कशा काय विसरता येतील ? 

मी पुण्यात आल्यावर तर ते आमचे हक्काचे आर्टीस्ट झाले. माझ्या अनेक जाहिरातींच्या जिंगल्सचे संगीत त्यांनी दिले. युनायटेड बँक, केप्र मसाले ,शतायुषी मासिक, एवढेच नव्हे तर माझ्या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या ‘न्याय’ या फिल्मलाही त्यांचाच संगीतसाज लाभला होता.

‘सृष्टी’ या प्रशांत कोठडियाच्या संस्थेचे ते नियमित कलाकार होते. तिथल्या अनेक मैफिली त्यांनी आपल्या शब्द सुरांनी उजागर केल्या. अनेक बड्या कलाकारांशी त्यांचा घरोबा असल्यामुळे आणि त्यांच्या कलांचे नेमके मर्म ठाऊक असल्यामुळे त्यांचे लेखन अतिशय मनोवेधक होत असे. कुमार गंधर्व आणि बेगम अख्तर यांच्यावरील त्यांचे लेख म्हणजे व्यक्तीचे आस्वादक आणि सखोल मूल्यमापन कसे करावे याचे उत्तम नमुने आहेत.

’अंतर्नाद’ हे मासिक अल्पावधीत गाजले. त्या लोकप्रियतेत यांचाही मोठा वाटा होता. आपली पंचाहत्तरी त्यांनी अनोख्या रीतीने साजरी केली होती. दोन दिवसांच्या कार्यक्रमात बासरीवर त्यांनी ७७ राग वाजवून आपल्या आयुष्यात बासरीच्या सुरांचे असलेले महत्व अधोरेखित केले होते. एक अतिशय रसिक ,चाणाक्ष , चांगल्या अर्थाने चोख व्यावसाईक, गुणग्राहक आणि जिंदादिल व्यक्तिमत्व असलेले अरविंद गजेन्द्रगडकर हे माझ्या स्मरणकुपीत ऐशआरामात कायमचे विराजमान झालेले आहेत. 

(जन्म ११ जानेवारी ,१९२८) त्यांच्या  जयंती निमित्त विनम्रतापूर्वक आदरांजली !

लेखक : डॉ केशव साठये 

[email protected]

प्रस्तुती : सुश्री शुभा गोखले. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मुंगीची गोष्ट… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ मुंगीची गोष्ट… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

एका रविवारी सकाळी, एक श्रीमंत माणूस त्याच्या बाल्कनीत कॉफी घेऊन सूर्यप्रकाशाचा आनंद घेत होता, तेव्हा एका छोट्या मुंगीने त्याचे लक्ष वेधून घेतले.  मुंगी तिच्या आकारापेक्षा कितीतरी पट मोठे पान घेऊन बाल्कनीतून चालली  होती.

त्या माणसाने तासाभराहून अधिक काळ ते पाहिलं.  त्याने पाहिले की मुंगीला तिच्या प्रवासात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला विराम घेतल. वळसा घेतला.

आणि मग ती आपल्या गंतव्याच्या दिशेने चालू लागली.

एका क्षणी या चिमुकल्या जीवालाअवघड जागग आडवी आली. फरशीला तडा गेला होता. मोठी भेग होती.ती थोडावेळ थांबली, विश्लेषण केले आणि मग मोठे पान त्या भेगेवर ठेवले, पानावरून चालली, पुढे जाऊन दुसऱ्या बाजूने पान उचलले आणि आपला प्रवास चालू ठेवला.

मुंगीच्या हुशारीने तो माणूस मोहित झाला.  त्या घटनेने माणूस घाबरून गेला आणि त्याला सृष्टीच्या चमत्काराने विचार करण्यास भाग पाडले.

त्याच्या डोळ्यांसमोर हा लहानसा प्राणी होता, जो आकाराने फार मोठा नसलेला, परंतु विश्लेषण, चिंतन, तर्क, शोध, शोध आणि मात करण्यासाठी मेंदूने सुसज्ज होता.

थोड्या वेळाने मनुष्याने पाहिले की प्राणी त्याच्या गंतव्य स्थानी पोहोचला आहे – जमिनीत एक लहान छिद्र होते, जे त्याच्या भूमीगत निवासस्थानाचे प्रवेशद्वार होते.

आणि याच टप्प्यावर मुंगीची कमतरता उघड झाली —- ते मोठे पान  मुंगी लहान छिद्रात कसे वाहून नेईल? 

— ते मोठे पान तिने काळजीपूर्वक गंतव्य स्थानावर आणले, पण हे आत नेणे तिला शक्य नाही ! 

तो छोटा प्राणी मुंगी — खूप कष्ट आणि मेहनत आणि उत्तम कौशल्याचा वापर करून, वाटेतल्या सर्व अडचणींवर मात करून, आणलेले मोठे पान मागे टाकून रिकाम्या हाताने गेली.

मुंगीने आपला आव्हानात्मक प्रवास सुरू करण्यापूर्वी शेवटचा विचार केला नव्हता आणि शेवटी मोठे पान हे तिच्यासाठी ओझ्याशिवाय दुसरे काही नव्हते.

त्या दिवशी त्या माणसाला खूप मोठा धडा मिळाला. हेच आपल्या आयुष्यातील सत्य आहे.

आपल्याला आपल्या कुटुंबाची चिंता आहे, आपल्याला आपल्या नोकरीची चिंता आहे, आपल्याला अधिक पैसे कसे कमवायचे याची चिंता आहे, आम्ही कोठे राहायचे, कोणते वाहन घ्यायचे, कोणते कपडे घालायचे, कोणते गॅझेट अपग्रेड करायचे, सगळ्याची चिंता आहे.

— फक्त सोडून देण्याची चिंता नाही. 

आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपल्याला हे कळत नाही की आपण हे फक्त ओझे वाहत आहोत.  आपण ते अत्यंत काळजीने वाहत आहोत. आपण ते आपल्यासोबत घेऊ शकत नाही….

कथा पुढे चालू ठेवत आहे…तुम्हाला याचा आनंद मिळेल…

तो श्रीमंत माणूस जरा अधीर झाला. अजून थोडा वेळ थांबला असता तर त्याने काहीतरी वेगळं पाहिलं असतं…

मुंगी मोठे पान बाहेर सोडून छिद्राच्या आत नाहीशी झाली. आणखी 20 मुंग्या घेऊन परतली. त्यांनी पानाचे छोटे तुकडे केले आणि ते सर्व आत नेले.

बोध:

१.  हार न मानता केलेले प्रयत्न वाया जात नाहीत !

२.  एक संघ म्हणून एकत्र, अशक्य काहीही नाही. 

३.  कमावलेली वस्तू तुमच्या भावांसोबत शेअर करा. 

४.  (सर्वात महत्त्वाचे!) तुम्ही जेवढे वापरता त्यापेक्षा जास्त घेऊन गेलात तर तुमच्यानंतर इतरांनाही त्याचा आनंद मिळेल.  तर तुम्ही कोणासाठी प्रयत्न करत आहात हे ठरवा.

—  मुंगीसारख्या लहानशा प्राण्यापासूनही आपण किती शिकू शकतो.

 

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बोलू कौतिके… अर्थात  Art of appreciation… ☆ सुश्री लीना सोहोनी ☆

??

☆ बोलू कौतिके… अर्थात  Art of appreciation… ☆ सुश्री लीना सोहोनी ☆

कौतुक, प्रशंसा, स्तुती हे एकाच वर्गातील पण जरा वेगवेगळ्या भावच्छटा असलेले शब्द आहेत. कौतुक हे मनापासून असतं, प्रशंसा लोकांसमोर, जरा वाजत गाजत करायची असते पण ती खरीच असते,  तर स्तुती ही केवळ समोरच्या व्यक्तीला प्रसन्न करण्यासाठी, त्या व्यक्तीच्या पुढे पुढे करण्यासाठी करण्यात येते व त्यामागे स्तुतिपाठकांचा बरेचदा सुप्त हेतू ( hidden agenda) असतो. पण आत्ता आपण केवळ कौतुकाविषयीच बोलणार आहोत. एखाद्याच्या achievement बद्दल मनापासून खरं खुरं कौतुक वाटणं आणि ते वाटत असल्याचं आपण शब्दातून किंवा कृतीतून त्या व्यक्तीपर्यंत पोचवणं. मग ते कौतुक शब्दात असेल, नजरेत असेल, कृतीत किंवा पाठीवर दिलेल्या शाबासकीत व्यक्त केलेलं असेल. पण ते व्यक्त होणं महत्वाचं! 

बरेच वेळा आपल्या परिचयातील एखाद्या व्यक्तीने काहीतरी वाखाणण्याजोगी कामगिरी करून दाखवलेली असते आणि ही गोष्ट इतकी सोपी नाही किंवा कदाचित ती आपल्यालासुद्धा जमणार नाही, ही गोष्ट आपल्याला मनातून खरंच पटलेली असते. पण तरीही आपण त्या व्यक्तीला मनापासून, भरभरून दाद देत नाही,  आपल्या तोंडून कौतुकाचे शब्द बाहेरच पडू शकत नाहीत.

असं का होत असावं? 

याचा जर नीट विचार केला, तर याचं उत्तर मनाच्या कोपऱ्यातच कुठेतरी दडून बसलेलं असतं. कदाचित आपण समवयस्क असू, नाहीतर मग समव्यावसायिक असू…कदाचित  ती व्यक्ती आपल्याहून वयाने, अनुभवाने लहान असेल आणि तिचं हे अनपेक्षित यश आपल्या अहंकाराला थोडासा धक्का देऊन गेलं असेल. पण मग आपण जर मनातून असं ठरवलं, की हा आपला अहंकार जरा वेळ बाजूलाच ठेवून द्यायचा आणि त्या व्यक्तीचं अगदी मनापासून, दिलखुलासपणे कौतुक करायचं..आणि आपण जर  खरोखर तसं केलं, तर त्याचा आपल्या आयुष्यावर फार मोठा, अगदी दूरगामी परिणाम दिसून येतो. 

पहिलं म्हणजे तुमच्याकडून अनपेक्षितपणे आलेल्या त्या  कौतुकाच्या शब्दांमुळे त्या व्यक्तीला अतिशय अप्रुप वाटतं, दोन मनं जवळ येतात आणि तुमच्यात व त्या व्यक्तीमध्ये एक अतूट नातं निर्माण होतं. दुसरं म्हणजे आपणच निर्मळ मनाने दुसऱ्या व्यक्तीचं जे appreciation केलेलं असतं त्यामुळे आपल्या मनाला आपलंच कौतुक वाटतं. आपण आपला अहंकार क्षणभर बाजूला ठेवू शकलो, दुसऱ्याच्या आनंदात निरामय वृत्तीने सामील होऊ शकलो, ह्याचा आनंद फार मोठा असतो. 

माझ्या मनोवृत्तीत बदल घडायला असाच एक प्रसंग घडला आणि मला त्यातून एक जिवाभावाची मैत्रीण मिळाली. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या ओळखीची एक होती. वयाने माझ्यापेक्षा तरुण, हुशार, स्मार्ट, कॉन्फिडन्ट, लोकप्रिय.. तिच्या सहवासात येणाऱ्या इतर स्त्रियांना नक्कीच न्यूनगंड निर्माण होईल, असंच तिचं व्यक्तिमत्व होतं. मीही त्या गोष्टीला अपवाद नव्हते. आमची दोघींची मैत्री होणं शक्यच नव्हतं. 

पण एक दिवस एक वेगळीच गोष्ट घडली.

तिने एका स्पर्धेत स्पर्धक म्हणून भाग घेतला होता, त्या स्पर्धेची मी नेमकी एकमेव परीक्षक होते.  परीक्षण गुप्तपणे करायचं असल्यामुळे तिला या गोष्टीची काही कल्पना नव्हती. अपेक्षेप्रमाणेच ती या स्पर्धेत पूर्ण तयारीनिशी उतरली होती. इतर स्पर्धकही तसे तुल्यबलच होते. थोडक्यात सांगायचं, तर मी त्या स्पर्धेत तिला डावलून दुसऱ्याची निवड केली असती, तरी या कानाचं त्या कानाला कळलं नसतं. स्पर्धेचा निकाल ऐकल्यावर तिचा तो कॉन्फिडन्स, तो नखरा किंचित उतरला असता, ते सुंदर धारदार नाक जरातरी खाली झालंच असतं. केवढी संधी माझ्याकडे आयती चालून आली होती.

काय करू? मीच परीक्षक असून तो मला माझ्या परीक्षेचा क्षण वाटला. मी स्वत:शी भांडले आणि अखेर माझ्या विवेकाने मला हरवलं. मी माझ्या सारासार विवेकाला म्हणाले, “ तुझं खरंय. आज मी जर नि:पक्षपातीपणाने निर्णय दिला नाही, तर मीच माझ्या मनातून उतरेन. मला माझ्या वागण्याची लाज वाटेल आणि मी स्वत:ला कधी माफ करू शकणार नाही. त्यामुळे आज मी तिचा जाहीर हिरमोड करण्याची ही संधी सोडून देते आणि तिला तिच्या पात्रतेनुसार या स्पर्धेत प्रथम क्रमांक देऊन टाकते. 

यथावकाश स्पर्धेचा निर्णय जाहीर झाला. तिने मोठ्या दिमाखात मला फोनवर ती बातमी कळवली. मी तिचं मोजक्या शब्दात अभिनंदन केलं. बक्षीस समारंभाला मी हजर राहू शकले नाही, म्हणून माझं मनोगत लिहून संयोजकांकडे पाठवून दिलं. अखेर त्या समारंभात तिला त्या स्पर्धेचं  परीक्षक कोण होतं ते समजलं. दुसऱ्या दिवशी तिचा परत माझे आभार मानायला फोन आला. मी म्हटलं, “माझे कशासाठी आभार? You deserved it, so you got it.” 

नंतर ती मला तिच्या बक्षिसाची पार्टी द्यायला रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेली. मीही तिला एक छानशी गिफ्ट घेऊन गेले. त्या स्पर्धेचा आणि परीक्षणाचा विषय निघालाच नाही, पण आमच्या चांगल्या ३-४ तास गप्पा रंगल्या. त्या दिवशी मला एक जिवाभावाची मैत्रीण मिळाली. आमची सुमारे वीस वर्षापूर्वी झालेली मैत्री अजूनही तेवढीच घट्ट आहे. तिची मुलगी माझी लाडकी भाची आहे आणि मी तिची  फेव्हरिट मावशी. एकमेकींच्या आयुष्यातील सुखदु:खांच्या क्षणाच्या आम्ही साक्षीदार झालो आहेत. 

आपल्या मनातल्या सतत वर डोकं काढू पाहाणाऱ्या  अहंकाराला जर आपण दडपून गप्प बसवू शकलो, तर आपल्याला जन्मभर पुरेल एवढी प्रेमाची, मैत्रीची शिदोरी प्राप्त होते, हा माझा अनुभव आहे. पुढील आयुष्यात असे अनेक प्रसंग आले, पण प्रत्येकवेळी मी मनातल्या अहंकाराला बाजूला ठेवून मनात उमटलेले  योग्य ते कौतुकाचे शब्द त्या त्या व्यक्तींपर्यंत पोचवू शकले.

गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमासाठी परगावी गेले असताना मला तिथे एक मैत्रीण म्हणाली, “ आमच्या इथल्या वर्तुळात खूप हेवेदावे, गटबाजी चालते. तुमच्या पुण्यात तसं काही आहे की नाही?”

त्यावर मी म्हटलं, “तसं पुण्यात आहे की नाही, याची मला खरं तर कल्पनाच नाही, कारण ना मला कुणाचा हेवा वाटतो, ना माझा कुणी हेवा करतं. आपला कुणी हेवा करावा असं  माझ्याकडे काहीच नाही आणि मला कुणाचा हेवा वाटावा, असं दुसऱ्या कुणाकडे नाही. ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’, हा सुखी जीवनाचा मंत्र मी अंगिकारलेला आहे.

जर एखाद्या व्यक्तीने खरंच स्पृहणीय कामगिरी केली असेल, तर आपण कौतुक करण्यात आखडता हात कशासाठी घ्यायचा? तुम्हाला काय वाटतं… ?

लेखिका : ## लीना सोहोनी

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आहारबोली… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ आहारबोली… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

माणसाच्या स्वभावाचा अंदाज घेण्याचे अनेक मार्ग आहेत . 

हस्ताक्षर,सही,दिसणे, काही लकबी वगैरे.पण कधीकधी असे वाटते की पंगतीत ताट वाढल्यावर जेवताना,जेवण्याच्या आधी / नंतर त्याची जी प्रतिक्रिया असते, त्यावरूनही त्याच्या स्वभावाचा थोडा अंदाज येऊ शकतो.

म्हणजे बघा …..

समोर जेवणाचे ताट वाढून झाले आहे आणि आता खायला सुरुवात करायची आहे, तेव्हा तो पहिला पदार्थही त्याच्या स्वभावाला अनुसरून उचलतो.जसे की पुरण किंवा त्याबरोबरचे गोड पदार्थ पहिल्यांदा उचलणारी माणसे स्वभावाने पण गोड असतात.

तळण,पापड उचलणाऱ्या माणसांचा पापड लवकर मोडतो.त्यांच्यात patience कमी असतो.

वरणभात पहिल्यांदा खाणारी माणसे त्याप्रमाणेच साधी सरळ असतात ,ती कुठेही, कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात.

भजी उचलणारी माणसे भज्यासारखीच कुरकुरीत,नर्मविनोदी आणि गप्पात प्रसन्नता आणणारी असतात.यांच्या सोबत असताना कधी कंटाळा येत नाही.

जेवणाची सुरुवात खिरीपासून आणि शेवट दहीभाताने करणारी नियम पाळणारी, आणि बऱ्यापैकी निरोगी असतात.

लोणचे कुठले आहे ? आंब्याचे, लिंबाचे का मिक्स हे पाहणारे आंबटशौकीन असतात.

काही लोक सगळ्या पदार्थाची थोडी थोडी चव घेऊन बघतात. ते लोक अतिचिकित्सक असतात.

यात आणखी दोन उपप्रवाह आहेत.

पहिला जेवणाच्या आधी काही reactions असणारे आणि दुसरा जेवणानंतरची reaction असणारे.

जेवणाच्या आधी ताटे ,भांडी घ्यायला सुरुवात झाली, की भांडे स्वच्छ आहे का नाही हे बघणार आणि ताट वाढून झाल्यावर किंवा आधी पाणी चांगले आहे का नाही, हे बघून त्याची चर्चा करणार.

हे लोक जेवणाचा आनंद घ्यायचा सोडून यावरून मूड बिघडवून घेतात .

अशी माणसे कटकट्या स्वभावाची आणि जुळवून न घेणारी असतात.अशांना मित्रमंडळी कमी किंवा नसतीलच. मित्र असलेच तर तेही याच catagory तील असतात.

पंगतीत ताटे वाढणे सुरु आहे,

अशा वेळेला समोरच्याच्या पानात अमुक आहे… माझ्या पानात नाही… आत्ताच हवे म्हणून लोक वाढप्याला (चार चार वेळेला) बोलावून वाढून घेतात ,भले त्यांना तो पदार्थ जाणार असो वा नसो. हे लोक jealous असतात.सतत त्यांना स्वतःची तुलना इतरांशी करायची सवय असते .

गोड पदार्थ वाढणारा मुख्य स्वयंपाकी ते वाढत असतानाच,”मी काय म्हणालोे, अहो बासुंदीच आहे ,म्हणजे 160 रुपये ताट, स्वस्त पडले,”असा डायलॉग मारणारे एकतर लग्नात मुलाकडचे असतात किंवा अत्यंत व्यवहारी , कंजूष मनोवृत्तीचे असतात.

जेवणाच्या आधी आणि जेवताना सुद्धा जे लोक

‘बाकी सगळे ठीक होते ,पण टॉयलेट काही नीट स्वच्छ नव्हते,”असं म्हणत राहतात, ते  अत्यंत निगेटिव्ह मनोवृत्तीचे असतात .

समोर चांगले ताट वाढले आहे, त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून असले काहीतरी फालतू विषय काढून ते स्वतःची जागा दाखवून देतात.

ताट वाढल्यावर त्यावर यथेच्छ ताव मारून मस्त ढेकर देणारे एकतर खवय्ये असतात किंवा स्वभावतःच आनंदी!

या सर्वांपलिकडे एक विशेष catagory आहे .

सगळे जेवण झाल्यावर

“ताक आहे का ?”

म्हणून विचारणार आणि नाही  म्हणल्यावर

” अरेरे! ताक असते ना, तर मजा आली असती “

असा शेरा मारणारे … किरकिरे.  

लेखक – अज्ञात 

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ हरवत चाललंय बालपण… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ हरवत चाललंय बालपण… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

सिग्नलचे हिरवे लाल पिवळे दिवे नियमाने बंद चालू होत या धावणाऱ्या जगाला शिस्त लावत उभे आहेत.आपल्याच तालात शहरं धावताहेत .सुसाट धावणाऱ्या शहरात पोटासाठी धावणारी माणसंही रस्त्यारस्त्यावर धावताहेत .जगणाऱ्या पोटाला भूक नावाची तडफ रस्त्यावर कधी भीक मागायला लावते तर कधी शरीर विकायला लावते.कितीतरी दुःख दर्द घेऊन शहरं धावताहेत.त्यात सिग्नलवरचं हे हरवत चाललेलं बालपण वाढत्या शहरात जिथं तिथं असं केविलवाण्या चेहऱ्यानं आणि अनवाणी पायांनी दिसू लागलंय .

जगण्याच्या शर्यतीतलं हे केविलवाणं दुश्य मनात अनेक प्रश्नांच मोहोळ होऊन भोवती घोंघावू लागलंय.तान्हुल्या लेकरांना पोटाशी धरून सिग्नल्सवर पाच दहा रुपयांची भिक मागत उन्हातान्हात होरपळत राहणाऱ्या माणसातल्याच या जमातीला येणारे जाणारे रोजच पाहताहेत .गाडीच्या बंद काचेवर टक टक करणाऱ्या बाई आणि लेकरांना कुणी भिक घालत असेलही कदाचित पण अशा वाढणाऱ्या संख्येवर कुणी काहीच का करू शकत नाही असा अनेकांना प्रश्नही पडत असेल.बदलेल्या जगात हा झपाट्याने बदलत जाणारा पुण्यामुंबई सारखा हा बदल आता सवयीचा बनू लागलाय असं प्रत्येकाला वाटत राहते .

शाळकरी वय असणारी कितीतरी बालकं आता सांगलीतही अशी सिग्नल्सवर काहीतरी विकत आशाळभूत नजरेने येणाऱ्या जाणाऱ्याकडे हात पसरून विनवण्या करताना दिसत आहेत .

आजही अशीच एक चिमुकली कॉलेज कोपऱ्याच्या सिग्नलवर हातात गुलाबी रंगाचे त्यावर Love लिहलेले फुगे  विकत असताना नजरेस पडते .मागच्या महिन्यात प्रजासत्ताक दिन साजरा झाला.आठवडाभर हिच मुलं बिल्ले,स्टिकर्स आणि झेंडे विकत होती. त्यानंतर पेन्स विकू लागली.आता व्हेलेंटाईन डे येतोय.प्रेमानं जग जिंकायला निघालेल्या तरुणाईच्या हातात हे गुलाबी फुगे आशाळभूत नजरेने विकताना या चिमुकल्यांच्या भवितव्याकडे खरंच कोण पाहील काय ?

धावणाऱ्या जगाला याचं काय सोयरसुतक ते आपल्याच तालात धावतंय.सांगली मिरज कुपवाड शहराच्या बाहेर अशी कितीतरी माणसं माळावर पालं ठोकून आनंदात नांदताहेत . मिरजेला जाताना सिनर्जी हॉस्पिटलच्या पुढं त्यांचं अख्खं गाव वसलंय .पोटासाठी शहरं बदलत जगणारी ही अख्खी पिढी भारतातल्या दारिद्रयाची अशी रंगीबेरंगी ठिगळं लावून भटकंती करतेय. त्यांचं जग निराळं ,राहणीमान निराळं आणि एकंदर जगणंही निराळंच .

शहराच्या पॉश फ्लॅटच्या दारोदारी भाकरी तुकडा मागत वणवण फिरणारी ,सिग्नल्सवर हात पसरणारी,जिथे तिथे लहान सहान वस्तू विकत भटकणारी आणि रस्त्यावर भिक मागत ही लहान लहान पोरं आपलं बालपण हरवत चाललीएत. ना शिक्षणाचा गंध,ना जगण्याची शाश्वती,ना कोणतं सोबत भविष्य. सोबत फक्त एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जगण्यासाठी धावण्याची कुतरओढ. त्यांचे पालकही असेच. विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेऊन जगणाऱ्या या वस्त्या अनेक प्रश्न घेऊन जगताहेत.आणि तिथे वाढणारी,भारताचं भविष्य असणारी बालकं अशी रस्त्यावर भटकत आपलं बालपण हरवत चाललीएत.सामाजिक आणि शैक्षणिक क्रांती नेमकी होतेय तरी कुठे ? खरंच कुणी सांगेल का ?

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “प्रेमाचा सप्ताह…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ 🌹 प्रेमाचा सप्ताह 🌹 ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

चौदा फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रेमाच्या सप्ताहातील शेवटचा पण सगळ्यात महत्वपूर्ण दिवस.व्हँलेंटाईन डे . हा दिवस सगळी मनाने आणि वयाने तरुण असणारी मंडळी कुणी उघडउघड तर कुणी मनोमन साजरा करतोच.

प्रेमात पडायला ना वयं लागतं ना रंगरुप. प्रेमात पडतेवेळी सगळीकडे ,सर्वत्र,चारोओर सदाबहार वातावरणच भासतं.तारुण्य हवचं असं काहीही नसतं,वयानं नसलं तरी मनानं चालतं.रंगरुपाची तर बातच सोडा कारण प्रेमात पडलेल्यांना सगळचं सुंदरच दिसतं.

प्रेम ह्या शब्दाची व्याप्तीच खूप मोठी हो. प्रेम शब्द उच्चारल्यावर लगेच भुवया उंचावल्या जाण्याचं सहसा आपल्याकडे वातावरण. पण प्रेमात पडणं म्हणजेच काय तर ज्या व्यक्तीवर, गोष्टीवर,वस्तुवर आपण मनापासून प्रेम करतो म्हणजे ती गोष्ट आपल्याला मनापासून आवडणं

जवळपास अवतीभवती सतत हवीहवीशी, वावरावीशी वाटणं,तिचं अस्तित्व कायम मनाच्या कप्प्यांमध्ये सुरक्षित असणं,कुठलाही निर्णय घेतांना सल्ल्यासाठी त्या व्यक्तीची हटकून आठवण येणं.पावलोपावली त्या व्यक्तीला आतल्या आवाजाने मनापासून पुकारणं अथवा आपल्या व्यक्तीने आवर्जून घातलेल्या सादेला अगदी समरसून प्रतिसाद देणं,इतकी साधीसोप्पी प्रेमाची परिभाषा असतांना आपणचं त्याला वेगळं वळणं देऊन जरा क्लिष्ट आणि आडवळणाचं बनवतो बघा.

प्रेम म्हणजे प्रेम असतं,

जरी तुमचं आमचं सेम असतं,

तरीही काहीतरी वेगळेपण त्यात असतचं ।।

 

प्रेम म्हणजे काहींच्या मते त्यागात,

तर काहींच्या मते उपभोगात असतं,

असं हे प्रत्येकाचचं वेगवेगळं गणित असतं.।।

 

प्रेम हे काहींच्या मते अपेक्षा करण्यात असतं,

तर काहींच्या मते ते अपेक्षा पुरविण्यात असतं,

हे करणं वा पुरवणं दोन्हीही तसं रास्तच असतं,

असं हे प्रेमाचं समीकरणचं वेगवेगळं असतं.।।

 

प्रेम हे रोजच्या देखभालीत असतं,

तसचं ते लांबून काळजी घेण्यातही असतचं,

देखभाल असो वा काळजी करणं हे

वेगवेगळ्या त-हेनं शेवटी जीव लावणचं असतं।

 

प्रेम हे काहींच्या मते जवळीकेत असतं,

कधी प्रेम दुरून अनुभवण्यात पण असतं,

प्रेम हे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या व्याख्येत बसतं।

 

काहींच्या मते प्रेम हे घेण्यात असतं,

तर काहींच्या मते मनापासून ते देण्यातच असतं,

अश्या ह्या देवाणघेवाणीचं तंत्रच वेगळं असतं.।

 

म्हणून खरचं प्रेम हे प्रेमच असतं,

जरी तुमचं आमचं सेम असतं,

तरीही प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून ते वेगवेगळं

भासतं, कधी वेगवेगळं पण भासतं।।

 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares