मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैत्रिणी… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ मैत्रिणी… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

मैत्रिणी हा श्वास  असतो ,

मैत्रिणी हा ध्यास  असतो

 

 एखादी चंचल असते ,

तर एखादी शांत असते ,एखादी बोलकी तर एखादी अबोल

 

 एखादीचं हास्य  स्मित असतं तर एखादीचं हास्य  खळखळून असतं

 

 एखादीला साडीच आवडते तर कोणाला ड्रेस, तर कोणाला Western Outfit

 

 एकत्रित  जेवायला जातील ,पण घरातील  सगळ्यांचं खाण्याचं करून निघतील .

 सगळ्याच एकमेकीस  सांगतील, “आज मी निवांत  ताव मारणार  आहे” ,

पण गप्पाटप्पांच्या नादात  थोडेच  खातील

 

कोणी धैर्यवान  असतात तर कोणी भागूबाई असतात

 

 कोणी नोकरीत,कोणी  व्यावसायिक.

 

कोणी छान  गृहिणी ,

कोणी तानसेन

तर कोणी कानसेन.

 

 आवड प्रत्येकाची वेगवेगळी

 

आनंद घेतात क्षणभर

अन दुःख विसरतात मणभर

 

जीवन रुपी प्रवासात गरज असते मैत्रिणींच्या कळपाची

कारण त्यांच्या सहवासात ऊब मिळते माहेरच्या माणसांची

 

संग्राहिका: सौ. शशी नाडकर्णी-नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – शकुनी महिला मंडळ ! – ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 🎲 शकुनी महिला मंडळ ! 💃☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

चाळीतले “शकुनी” महिला मंडळ सकाळची काम आटपून, रोजच्या प्रमाणे दुपारी जिन्या जवळच्या मोकळ्या चौकात, चाळगोष्टी करायला जमले होते.  प्रत्येकीच्या हातात काही ना काही निवड, टिपण, शिवण (स्वतःच्या घरचे) होतेच ! आता तुम्ही म्हणाल “शकुनी” महिला मंडळ म्हणजे ? शकुनी तर कपटी पुरुष होता आणि महिला मंडळाला “शकुनी” महिला मंडळ हे नांव कसे काय पडले ? मी तुम्हाला शकुनीच्या फाशांची शपथ घेवून सांगतो, की महिला मंडळाला हे असे नांव ठेवण्यात माझा फाशां प्रमाणे त्याच्या पटाचाही संबंध नाही ! पण तुमचा प्रश्न रास्तच आहे आणि त्याचे उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसण्याचा पण संभव आहे !  त्या महिला मंडळाला असे नांव सर्वानुमते त्यांच्याच मुला मुलींनी दिले होते, आता बोला !  त्या सगळ्यांनीच सध्या टीव्ही वर चालू असलेले महाभारत बघून त्यात दाखवलेल्या शकुनीच्या द्यूतामुळे महाभारताचे रामायण घडले, अशी आपल्या बाल मनांची समजूत करून घेतली असावी ! त्यामुळे चाळीत आपापल्या आयांमुळं, अगदी महाभारत होत नसले,  तरी कायम शीतयुद्ध सुरूच असते,  या समजुतीतून त्यांनी हे नांव महिला मंडळाला दिल्याची शक्यता नाकारता येत नाही !

तशी “शकुनी” महिला मंडळाची सभासद संख्या जरी जास्त असली, तरी यंग टर्क्सच्या मते त्यांच्या पैकी शहाणे, कुलकर्णी आणि निफाडकर काकू, चाळीतल्या आतल्या बातम्या काढण्यात जेम्स बॉण्डवर मात करतील अशा ! त्यामुळे त्या तिघींच्या आडनावाचे आद्याक्षर वापरून “शकुनी” हे नांव त्यांनी मंडळाला बहाल केले होते असे पण काही लोक म्हणतात !

आज जरा बऱ्या पैकी ऑडियन्स जमलेला बघून जोशीणीने पहिला फासा टाकला !  “तळ मजल्यावरची चितळ्यांची नलू बहुतेक पळून गेली वाटत !” हे ऐकताच सगळ्या महिला मंडळाचे हात, जे काही निवड,  टिपण करत होते, ते एकदमच कोणीतरी स्टॅचू केल्यागत थिजल्या सारखे झाले ! पण स्वतः जोशीण मात्र काहीच झालं नाही अशा अविर्भावात पुन्हा तांदूळ निवडायला लागली.  हा धक्का पचवायला सकल महिला मंडळाला साधारण सारखाच वेळ लागला आणि सगळ्यांनी एकदमच बोलायला सुरवात केली.  “काय सांगतेस काय? कुणाबरोबर गं?” “माझा तर बाई विश्वासच बसत नाहीये” “नेहमी खाली मान घालून जाणारी, साधी राहणारी असं काही…. ” “हो ना, तिच्या वयाच्या मुली नको नको ती फॅशन करत असतांना, ही अजून साडीत…. ” “म्हणजे अगदी खाली मुंडी पातळ धुंडी निघाली…. ” तो गलका ऐकून जोशी काकू म्हणाल्या “माझं जरा ऐका, मी म्हटलं ‘चितळ्यांची नलू बहुतेक पळून गेली !’ अजून तशी खात्रीलाय बातमी यायची…. ” तिला मधेच तोडत साने काकू म्हणाल्या “म्हणजे अजून तुला नक्की माहित नाही, तर कशाला उगाच तीच नांव खराब करतेस ? अशांन तीच लग्नतरी होईल का ?” यावर साठे काकूंनी पण जोशी काकुंवरचा आपला राग व्यक्त केला आणि म्हणाल्या “तुला ना त्या टीव्ही वरच्या बातम्या देणाऱ्यांसारखी घाई असते, बघा आमच्याच चॅनेलने ही बातमी प्रथम तुमच्या पर्यंत आणली….”  तेवढ्याच ठसक्यात जोशीण म्हणाली “अग बरेच दिवसात दिसली नाही म्हणून म्हटलं पळून गेली की काय, कारण तीच्या प्रेम

प्रकरणाची बातमी तूच तर  आम्हाला दिली होतीस !” हे ऐकताच साठे काकू परत खाली मान घालून गहू निवडायला लागल्या. ते बघून जोशीणीला मनोमन आनंद झाला आणि तिने आपला मोर्चा साने काकूंकडे वळवला “आणि साने काकू लग्न न व्हायला काय झालंय नलूच,  हिरा कितीही लपवला तरी चमकायचा राहतो का ?” हे ऐकताच सावंत काकू म्हणाल्या “आता ही हिरा कोण ?” त्यांच हे बोलण ऐकून मंडळात एक हास्याची लहर उठली.  सावंत काकूना काही कळेना, पण आपल्या प्रश्नाचे कोणीच उत्तर देत नाहीत हे बघितल्यावर त्या पुन्हा हातातली गोधडी शिवायला लागल्या.

त्या हास्य लहरीत वातावरण थोडं निवळत असतानांच, हातात दोन मेथीच्या जुड्या घेवून स्वतः चितळे काकू हजर ! त्यांना पाहताच जणू काहीच झाले नाही, या थाटात साने काकू त्यांना म्हणाल्या “छान दिसत्ये मेथी, कुठून आणलीस गं ?” “अग यांच्या ओळखीचा एक भाजीवाला आहे नाशिकचा, त्याच्या कडून हे घेवून आले !” “पुढच्या वेळेस मला पण दोन जुड्या सांग हं, आमच्यकडे पण मेथी फार आवडते सगळ्यांना.” “हो सांगीन ना, त्यात काय एवढं आणि हो आणखी कोणाकोणाला हवी असेल तर आत्ताच सांगा म्हणजे एकदम आणायला बरी.” मग प्रत्येकीनं आपआपली ऑर्डर दिली पण जोशीण काही बोलायला तयार नव्हती.

ते बघून साठीणीला पण चेव आला आणि ती मुद्दामच तिला म्हणते कशी “काय गं, तुला नको का नाशिकची मेथी ?” “नको हो, आमच्याकडे माझ्याशिवाय कोणीच खात नाही.  पण तुम्ही एक कामं करा, तुम्ही भाजी केलीत की द्या वाटीभर पाठवून, कडू असली तरी गोड मानून खाईन हो !” हे ऐकताच साठीणीचा चेहरा पाहण्या सारखा झाला.  पण ती खमकी तशी जोशीणीची पाठ सोडायला तयार नव्हती. वरकरणी हसत म्हणाली “हो देईन की त्यात काय एवढं !” पण मनांतून जोशीणीच्या बातमीची खात्री करायला, स्वतः चितळे काकू हजर असल्याचा फायदा घेण्याचे ठरवून, तिने जोशीणीकडे पहात चितळे काकूंना डायरेक्ट सवाल केला, “काय हो काकू, हल्ली तुमची नलू दिसली नाही बरेच दिवसात. तब्बेत वगैरे बरी आहे ना तिची ?” “हो अगदी मजेत आहे, तिला काय होतंय !” “तसं नाही पण जोशी काकू म्हणत होत्या….. ” साठीणीला मधेच थांबवत जोशीण म्हणाली “हो बरेच दिवसात दिसली नाही ना,  म्हणून जरा काळजी पोटी विचारत होते की नलूला कुणी बघितलीत का !” जोशी काकूंच्या या बोलण्यावर साठे काकूंनी बोलायला तोंड उघडले, पण त्या आधीच चितळीण बोलती झाली, “नाही तुमच सगळ्यांचे म्हणणे बरोबरच आहे, पण तिची तब्येत अगदी ठणठणीत आहे, काळजी करायच काहीच कारण नाही.” “ते चांगलंच आहे, पण चाळीत कुठे दिसली नाही…. ” “अहो साठे काकू ती घरात असेल तर दिसेल ना?” “म्हणजे मग आम्ही जे ऐकलं ते खरच…” “हो खरच आहे ते,  ती सध्या ओबेरॉय मध्ये  राहते आहे !” “म्हणजे ?” “अहो ती गेल्याच महिन्यात US वरून आली आणि सेल्फ क्वारंटाईन साठी म्हणून एअरपोर्ट वरून डायरेक्ट ओबेरॉयला अठ्ठावीस दिवसासाठी !”  चितळे काकूंचे बोलणे ऐकून तमाम महिला मंडळ जोशीणीकडे खाऊ का गिळू नजरेने बघायला लागले आणि जोशीण खाली मान घालून परत तांदूळ निवडायला लागली.  आणि एकीकडे  मंडळाच्या तीन आधारस्तंभानी म्हणजे शहाणे, कुलकर्णी आणि निफाडकर काकूंनी सुटकेचा निश्वास टाकला !

© श्री प्रमोद वामन वर्तक

१७-०१-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘व्हीलचेअर…’ – लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘व्हीलचेअर…’ – लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

विवियाना मॉलमध्ये रविवारी संध्याकाळची वेळ म्हणजे तरुणांची गर्दीची वेळ.. त्यांचा चिवचिवाट, भरलेले कॉफी हाऊसेस, सेल्फी टाईम.

अशा गर्दीच्या वातावरणात चटकन नजर गेली ती एका व्हीलचेअरवर एका आजीबाईंना प्रेमाने नेणारा एक माणूस आणि सोबत 12-13 वर्षाचा एक मुलगा.. मी आणि माझी मैत्रीण तिथे एका बाजूला बाकावर बसलो होतो. आम्ही बघत होतो.. व्हीलचेअर ढकलत तो माणूस त्या आजीबाईंना इकडून तिकडे नेत होता आणि त्याचा मुलगाही त्याच्या सोबत होता….  ५ मिनिटांतच तो माणूस त्या आजींची व्हीलचेअर आमच्या अगदी बाजूला आणून उभं करून त्या मुलाशी इंग्रजीत बोलत होता. ” मी ATM मधून पैसे काढून एकदोन कामे करून येतो, तू आजी जवळ थांब. ” असं सांगून निघून गेला.

त्या आजी आमच्याकडे बघून थोडं हसल्या.. दोन – तीन मिनिटं गेली आणि हिंदीत मला सांगू लागल्या.. ” हा माझा नातू. मुलाचा मुलगा. आणि तो गेला ना पैसे काढायला तो माझा मुलगा.. आम्ही ठाण्यातच राहतो.. आज ‘सुईधागा’ सिनेमा बघायला आम्ही आलो. सुनेला तिच्या कॉलेज ग्रुपबरोबर बाहेर जायचं होतं, मग माझ्या मुलांनी आमचा हा बेत जुळवून आणला..” नकळत माझ्या तोंडून “अरे वाह!”  निघून गेलं..

आजी पुढे सांगू लागल्या… “ माझं वय 73 आहे.. मला चालता येत नाही म्हणून ही खुर्ची आणि ही फोल्डिंग काठी.. सिनेमा, नाटक बघायला जायचं तर थिएटरमध्ये काळोख व्हायच्या आत आम्हाला आत शिरावं लागतं. म्हणून मी कुठे जायचं म्हणजे माझी वरातच असते.. पण मुलगा, सून ऐकत नाहीत.. अजून दोन मुलं आहेत मला.. पण ते मला सांभाळायला तयार नाहीत.. हा मुलगा सायकॉलॉजीचा प्राध्यापक आहे. तो मला आनंदाने सांभाळतो.. दुसरी भावंडे सांभाळत नाहीत, त्याबद्दल त्याचा आकस नाही. मला माझा मुलगा थिएटरमध्ये काळोख व्हायच्या आतच घेऊन येतो.

आज आम्ही बाहेर जेवून सिनेमाला गेलो.. आता मॉलमध्ये या खुर्चीतून मला फिरवतो.. मी नको म्हणत असताना त्याचं म्हणणं.. ‘बघ नं जग किती बदललंय. सुंदर गोष्टीही आहेतच. असं फिरलीस, चार माणसं बघितलीस की तुझं मन व शरीर ही फ्रेश होईल. मी मनाचा अभ्यास केलेला माणूस आहे म्हणूनच सांगतोय.'”

हे सांगत असताना त्यांचा मुलगा काम आटपून परत आला.. आजीबाई माझ्याशी बोलत असलेल्या बघून त्यांनी त्यांना हिंदीत मला निर्देश करून विचारलं, ” कौन है? किससे बात कर रही हो मम्मा..?”

आजीबाईंनी लगेच सांगितलं, ” यहीपे बैठी थी। ऐसे ही मैने बात की उससे।”

मला वाटलं, हा माणूस वैतागेल. कोण कुठली ही बाई ! पण त्यांनी चक्क हसून मला जे सांगितलं त्यावर मी थक्क झाले.

ते म्हणाले, “आम्ही आईला दर महिन्याला एकदा असं बाहेर फिरवून आणतो.. रोज आम्ही व्यस्त असतो. मग एक दिवस तिला असं बाहेर घेऊन येतो. माझे वडील असतांनाही आम्ही हेच करायचो. ते नाहीत आता.. आज माझी बायको नाही येऊ शकली, नाहीतर आम्ही तिघे येतो. एक दिवस तिला देतो. कधी सिनेमा, नाटक, ते नाही जमलं तर संध्याकाळी तरी काहीतरी प्लॅन करतो आणि तिला फ्रेश व्हायला मदत करतो. त्यामुळे तिची तब्येत चांगली राहायला मदतच होते ना.”

आम्हाला त्यांनी धन्यवाद म्हटलं, ” माझ्या आईला तुमची सोबतच झाली ” म्हणून ते तिघेही निघून गेले नि मी आणि माझी मैत्रीण सुन्न झालो. अरे किती नशीबवान या आजी..

 — कुठे ही परिस्थिती नी कुठे ‘आईवडील नकोत’ ही भावना जोपासणारी काही मुलं आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात..  समाजात एकाच परिस्थितीबाबत दोन भिन्न बाजू दिसल्या.

वय झालं आहे.. चालता येत नाही.. गर्दीत कुठे न्यायचं.. असा विचार न करता हा आजींचा मुलगा, सून आणि नातू ही यांच्या लेखी ‘आई म्हातारी झाली पण मी नेईन, तिला आनंद मिळावा’ ही भावना..

अशीही माणसं समाजात आहेत हे बघून आम्हा दोघींना खरंच खूप बरं वाटलं. आणि कितीतरी वेळ आम्ही शांतपणे त्या तिघांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे शांतपणे बघत होतो आणि डोळे कधी पाणावले कळलंच नाही…

लेखका : अज्ञात. 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतीय रुपयाची जागतिक भरारी भाग – 2 – लेखिका – प्रा.गौरी पिंगळे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतीय रुपयाची जागतिक भरारी भाग – 1 – लेखिका – प्रा.गौरी पिंगळे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

(पण जागतिक महासत्ता असलेल्या देशाच्या चलनाला डावलणे हा या युद्धाचा सगळ्यात मोठा परिणाम आहे.) इथून पुढे —- 

रशिया हा  इंधनाचा फार मोठा पुरवठादार आहे.  रशिया १० मिलियन barels प्रत्येक दिवशी crude oil उत्पादन करतो. पण अमेरिकेने निर्बंध लावल्यामुळे हा तेलाचा पुरवठा इतर तेलउत्पादक देशांना करावा लागेल अशी अपेक्षा होती. त्यात सौदी अरेबिया आणि UAE ने उत्पादन वाढवायला नकार दिला आणि रशियाने युरोपीय देशांना रुबलमधेच पेमेंट करायला सांगितले.

भारताने रशियाकडून crude oil  खरेदीचा करार रुपयामधे केला. Indian Oil Corporation ने रशियाकडून 3 मिलियन barrels crude oil खरेदीचा करार केला. भारताला हे crude oil 20$-25$ प्रत्येक barrel मागे discount मिळाला. तसेच भारताने रशियाशी हिरे खरेदीचा करार हा युरोमधे केला. चीनने सौदीबरोबर युआनमधे crude oil खरेदीचा व्यवहार केला. ( हे खूप महत्वाचं आहे कारण जर OPEC countries डॉलर्सशिवाय व्यवहार करायला लागल्या तर डॉलर्सची किंमत कमी होईल). इराणने  भारताला crude oil चा व्यवहार रुपया रिआलमधे करण्यासाठी प्रस्ताव दिला .

कोरोनाने जागतिकीकरणाच्या मर्यादा स्पष्ट केल्यानंतर ‘आत्मनिर्भर’ धोरण निश्चित करणारा भारत हा जागतिक पटलावर एक समर्थ, ताकदवान राष्ट्र म्हणून समोर आला. उद्योगधंद्यांपासून लसीकरणापर्यंत प्रत्येक बाबतीत भारताने स्वत:चे असे वैशिष्ट्यपूर्ण निर्णय घेतले. आणि युद्धानंतर बदललेल्या पार्श्वभूमीवर ट्रेड सेटलमेंटचे नवे धोरण रिझर्व बँकेने जुलै 2022 मधे जाहीर केले. या नवीन धोरणानुसार भारत इतर देशांशी रुपयामधे व्यवहार करेल. त्यामुळे डॉलर्स वाचतील. रशिया, इराण या देशांवर अमेरिकेने निर्बंध लादलेले आहेत. त्यामुळे ते देश रुपयात व्यवहार करत आहेतच. पण ज्या देशांकडे पुरेसे डॉलर्स नाहीत किंवा कमी आहेत ते देश रुपयामधे व्यवहार करतील.

या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी रिझर्व बँकेने जी नियमावली दिली आहे त्यात परकीय बँकांना वोस्ट्रो अकाउंट काढण्यासाठी निर्देश दिले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी नोस्ट्रो आणि वोस्ट्रो अशी अकाउंट वापरली जातात. यात एक ऑथोराइज्ड डिलर बँक असते आणि या बँकेमधे नोस्ट्रो आणि वोस्ट्रो अकाउंट परदेशी बँकांकडून काढले जातात. जेव्हा परदेशी बँक ऑथोराइज्ड डिलर बँकेत परदेशी चलनात व्यवहार करण्यासाठी अकाउंट उघडते, त्याला नोस्ट्रो अकाउंट म्हणतात. जेव्हा परदेशी बँक ऑथोराइज्ड डिलर बँकेत स्वदेशी  चलनात व्यवहार करण्यासाठी अकाउंट उघडते, त्याला  वोस्ट्रो अकाउंट म्हणतात. उदा. समजा भारताची ऑथोराइज्ड डिलर बँक एस बी आय आहे असं मानलं आणि भारतात एस बी आय मधे एखाद्या इराणच्या बँकेने परदेशी चलनात म्हणजे डॉलर, युरोमधे व्यवहार कारणासाठी अकाउंट उघडलं तर त्याला नोस्ट्रो अकाउंट म्हणतात. पण जेव्हा हीच इराणची बँक भारतातील एस बी आय मधे फक्त रुपयामधे व्यवहार करण्यासाठी अकाउंट उघडते तेव्हा त्याला वोस्ट्रो अकाउंट म्हणतात. —- रिझर्व बँकेच्या या नवीन धोरणानुसार भारतात वोस्ट्रो अकाउंट काढण्यासाठी निर्देश दिले आहेत. म्हणजेच आयात निर्यातीचे व्यवहार पूर्णपणे रुपयामधे करण्यावर भर दिला आहे. 

नोव्हेंबर 2022 मधे श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेने असं म्हटलं की ते आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी भारतीय रुपयाचा वापर करण्यासाठी श्रीलंकेची मध्यवर्ती बँक भारतीय रिझर्व बँकेच्या परवानगीची वाट पाहत आहेत. यात महत्वाचा मुद्दा असा आहे की श्रीलंकेने त्यांच्या Foreign Currency Basket मधे भारतीय रुपयाला प्रथम प्राधान्य देऊन अमेरिकन डॉलरला द्वितीय पसंती दिली आहे. श्रीलंकेने त्यांच्या नागरिकांना १००००डॉलर मूल्याचे भारतीय रुपये ठेवायला परवानगी दिली आहे. म्हणजे श्रीलंकन व्यापारी भारताशी रुपयात व्यवहार करतीलच, पण जे इतर देश भारतीय रुपयात व्यवहार करू इच्छितात, त्या देशांशीही भारतीय रुपयात व्यवहार करतील. आतापर्यंत भारतीय रिझर्व बँकेने रशियाबरोबर व्यापारासाठी १२ वोस्ट्रो अकाउंट, श्रीलंकेबरोबर व्यापारासाठी ५ वोस्ट्रो अकाउंट, तर मॉरिशसबरोबर व्यापारासाठी १ वोस्ट्रो अकाउंट उघडण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. काही आफ्रिकन देशही रुपयात व्यापार करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करत आहेत. त्याचबरोबर ताजिकिस्तान, क्यूबा, लक्ज़ेंबर्ग, सुदान हे देश भारतीय रुपयात व्यापार करण्यासाठी उत्सुक आहेत. येणाऱ्या काळात अजूनही बरेच देश रुपयात व्यापार करण्यासाठी पुढे येतील हे नक्की. आणि  याचं  कारण म्हणजे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली विश्वासार्हता.

याचा परिणाम असा होईल, की रुपयाची मागणी वाढल्यामुळे रुपया स्थिर आणि भक्कम होईल. भारताची परकीय गंगाजळी (फोरेक्स रिझर्व) वाचेल. डॉलरचं  महत्त्व कमी होऊन रुपयाचं महत्व वाढेल. आज जगात पाचव्या क्रमांकाची असलेली भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाईल.

— समाप्त —

लेखिका  – प्रा. गौरी पिंपळे

संग्राहक – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतीय रुपयाची जागतिक भरारी भाग – 1 – लेखिका – प्रा.गौरी पिंगळे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतीय रुपयाची जागतिक भरारी भाग – 1 – लेखिका – प्रा.गौरी पिंगळे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

अबुधाबी, युएई येथे नुकत्याच झालेल्या (डिसेंबर 2022) इंडिया ग्लोबल फोरमच्या व्यासपीठावर बोलताना भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांना विचारलं गेलं की ब्रेटनवूडस इन्स्टिट्यूशन्स बदलण्यासाठी प्रयत्न चालू आहेत असं दिसतंय. त्याला उत्तर देताना भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणाले की हे करायची गरज आहे. त्याच्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल. आता प्रश्न पडेल की ब्रेटनवूडस इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय ? तर दुसऱ्या महायद्धनंतर ब्रेटनवूडस येथे जगातील ४४ राष्ट्र एकत्र येऊन स्थापन झालेल्या संस्था म्हणजे जागतिक बँक (World Bank), आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International monetary fund) आणि जागतिक व्यापारी संघटना (पूर्वीचे GAAT आताचे WTO). या संस्थांनी अमेरिकेला महासत्ता होण्यास मदत होईल असे निर्णय घेतले. यात सर्वात महत्वाचा भाग असा की आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी डॉलरची केलेली निवड. कोणतीही व्यवस्था ही सदासर्वकाळ एकच असू शकत नाही. त्याचप्रमाणे डॉलरकेंद्री असलेली व्यवस्थाही कायम असू शकत नाही. यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करण्यासाठी जे देश प्रयत्नशील आहेत त्यात भारताचा वाटा मोठा आहे. 

परराष्ट्रमंत्री काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात –

Host: Did it seem to be some movement around the idea of reforming the Bretton woods Institutions (World bank ,IMF and dollarisation) ?

S.Jaishankar : Were you heartened by that? I would say it’s something needs to be done. Let me put politely…I think it’s a lot of hard work ahead of us.

१९९० ला जागतिकीकरणाचं वारं वाहू लागलं तरी याची पायाभरणी ५० च्या दशकात झाली होती. दुसऱ्या  महायुद्धानंतर बदललेल्या जागतिक राजकीय पार्श्वभूमीवर ज्या आंतरराष्ट्रीय संघटनांची स्थापना झाली, त्यांनी जी धोरणं निश्चित केली ती सगळ्या देशांसाठी सारखी होती – One Size fits All. यात  प्रत्येक देशाची स्वत:ची अशी वैशिष्टये आहेत—सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक, ऐतिहासिक. आणि त्या वैशिष्ट्यांप्रमाणे समाज व्यवस्था आणि त्या समाज व्यवस्थेवर आधारित अर्थव्यवस्था आहे, याचा ही धोरणे ठरवणाऱ्या अर्थतज्ज्ञांना विसर पडला आणि एक नवी जागतिक अर्थव्यवस्था उदयाला आली. ही नवी जागतिक अर्थव्यवस्था पाश्चिमात्य देशांना झुकतं माप देत होती- विशेषत: अमेरिकेला. जागतिक बँक आणि  आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थांमधे तर फक्त अमेरिकेला नकाराधिकार ( Veto) देण्यात आला. म्हणजे अर्थातच महासत्ता असलेला ( त्यावेळी होऊ घातलेला) हा देश स्वत:चा जास्तीत जास्त फायदा होईल असे निर्णय घेऊ लागला. त्याचा फटका इतर देशांना बसत असला आणि कळत असलं तरी डॉलरकेंद्रीत असलेल्या जागतिक आर्थिक  व्यवस्थेला कोणताही देश आव्हान देत नव्हता. ११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्याने अमेरिकेलाही कोणी आव्हान देऊ शकतो, हे जगाच्या लक्षात आलं. इथे महासत्तेच्या अहंला धक्का बसला. या दहशतवादी हल्ल्याने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही धक्का बसला. यातून सावरण्यासाठी क्रेडिट policies मधे बदल केले गेले. अमेरिकन लोकांच्या हातात जास्तीतजास्त डॉलर्स कसे जातील या अनुषंगाने धोरणं ठरवली गेली आणि याचा परिणाम २००८ च्या Great Financial Crisis मधे झाला. त्यावेळचे फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष असलेले Allen Greenspam यांनी सांगितलं की “आम्ही नोबेलविजेत्या अर्थतज्ञांचा (macroeconomists)  सल्ला घेऊन धोरणं आखली होती.”  मग चुकलं कुठे?

डॉलरकेंद्री अर्थव्यवस्था अस्तित्वात आणताना प्रत्येक देशाची ठराविक वैशिष्टये दुर्लक्षली गेली. आणि कोरोनानंतर संपूर्ण जग अशा एका ठिकाणी थांबलं की जागतिकीकरणातला फोलपणा जवळजवळ सगळ्या देशांच्या लक्षात आला आणि त्यानंतर झालेले जागतिक करार बघितले तर लक्षात येईल की सगळ्या देशांनी द्विपक्षीय करारावर भर दिला आणि यात आपापल्या स्थानिक चलनांना प्राधान्य दिलं. कोरोनानंतर हळूहळू जग पूर्वपदावर येत असताना रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं आणि अमेरिकेला आपलं आवडतं हत्यार मिळालं, ते म्हणजे आर्थिक निर्बंधांचं. अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध जाहीर केले. रशियाकडून तेल घेणार नाही. तसेच SWIFT या बॅंकिंग प्रणालीतूनही रशियाला वगळण्यात आले. पण रशिया काही कच्या गुरूचा चेला नव्हता. शीत युद्ध आणि त्यानंतर झालेल्या विभाजनाला अमेरिका कारणीभूत आहे असे रशियाचे म्हणणे आहे. ( पुतिन असे जाहीरपणे म्हणतात की अमेरिकेने जगाला फक्त वर्चस्व दिले ). त्यामुळे खनिज तेल, वायू ,सोने ,इतर खनिजे आणि शेती उत्पादने यात संपन्न असलेल्या रशियाला निर्बंधांचा विशेष फटका बसला नाही. रशियाने इतर देशांशी द्विपक्षीय करार करायला सुरुवात केली. 

रशिया युक्रेन युद्धाने geopolitics ची दिशा बदलली, तशी आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचीही दिशा बदलली. कोणत्याही युद्धाचे पडसाद हे आंतरराष्ट्रीय अर्थकारणावर होतच असतात. इंधनान्चे दर वाढण्ं,अन्नधान्य महागणं हे युद्धाचे परिणाम असतातच. पण जागतिक महासत्ता असलेल्या देशाच्या चलनाला डावलणे हा या युद्धाचा सगळ्यात मोठा परिणाम आहे.

– क्रमशः भाग पहिला.

लेखिका  – प्रा. गौरी पिंपळे

संग्राहक – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ऋषितुल्य वैज्ञानिक – डॅा.रघुनाथ माशेलकर… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ ऋषितुल्य वैज्ञानिक – डॅा.रघुनाथ माशेलकर… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

अमिताभ बच्चनजी ८० वर्षांचे झाले तरी अजूनही काम करतात, म्हणून बातमी होते. देव आनंदच्या चिरतरुण देहबोली वर मासिकांची कितीतरी पाने भरलेली असतात. हेमामालिनी या वयातही किती सुंदर दिसते, यावर जवळपास सगळी चॅनेल्स चर्चा करतात. रेखाच्या उतारवयातील देखणेपण जपण्यावर सोशल मिडियावर तुफान चर्चा होते.

आपण फिल्मी सिताऱ्यांत इतके गुरफटून गेलो आहोत की त्यापलीकडे बरेचदा बहुसंख्य लोकांना, इतर क्षेत्रात योगदान करणारे महर्षी दिसतच नाहीत. फार थोडे भारतीय अशा महान पण दुर्लक्षित लोकांची दखल घेतात हे लिहिण्यामागचे कारण म्हणजे डॅा.रघुनाथ माशेलकर.  १ जानेवारी २०२३ रोजी ते ८१ वर्षाचे झाले.

शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी लागणारी जुजबी फी भरण्याची ऐपत नसलेले माशेलकर महापालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करून दहावीला संपूर्ण महाराष्ट्रात दुसरे आले, तर बारावीला बोर्डात ११ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. बारावीपर्यंत अनवाणी चालणारा हा माणूस न्यूटनने सही केलेल्या रजिस्टरवर सही करणारा पहिला महाराष्ट्रीयन ठरला.

तब्बल ६० पेक्षा अधिक पुरस्कार, ३९ डॅाक्टरेट, २८ च्या आसपास पेटंटस्, २६५ शोध निबंध अशा अफाट बुध्दिसंपदेचा मालक असलेला हा महामानव.

हळद आणि तांदूळ यांची पेटंट लढाई जिंकून भारताला पेटंटविषयी नवी दिशा देणारा भारताचा सुपुत्र. २८००० तज्ञांसह ४० प्रयोगशाळा संचलित करणारी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) ही  आकारानेच एवढी मोठी असलेली संस्था यश व किर्तीरुपाला आणणारा हा कर्मयोगी.

२३ व्या वर्षी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पी एच डी मिळविणारे माशेलकर जेल रसायनशास्त्र, पॅालिमर रिअॅक्शन, फ्लुईड मेकॅनिक या विषयातील नावाजलेले तज्ञ आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे तीन पुरस्कार प्राप्त.म्हणजे फक्त भारतरत्न बाकी.

असा ऋषितुल्य भारतीय ८१ व्या वयात पदार्पण करताना अजूनही आपल्या क्षेत्रात कार्यरत आहे. याची दखल म्हणावी अशी कुणी घेत नाही हे भारतीयांचे करंटेपण म्हणावे लागेल असो.

या महान वैज्ञानिकाला ८१ व्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

लेखक :अज्ञात

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रिॲक्ट ॲन्ड रिसपाॅन्ड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

 

? विविधा ?

☆ “रिॲक्ट ॲन्ड रिसपाॅन्ड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एकदा प्रवासात असतांना रेल्वेत एक कोल्ड्रिंक बाँटल आणि एक बिसलरी बाँटल घेण्याचा प्रसंग आला तेव्हा मला एकदम गौरगोपालदासजींचा “रिअँक्ट आँर रिस्पाँड” ह्या  शिर्षकाची  नेहमीप्रमाणेच माँरल असलेली व्हिडीओ क्लिप आठवली.

गौरगोपालदासजींच्या छोट्या छोट्या व्हिडीओ क्लिप्स मध्येही मोठ्ठ तत्वज्ञान दडलेलं असत. त्यांच्या क्लिपमध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी समजावून दिल्या आहेत. पहिलं उदाहरण त्यांनी क्रिकेट ह्या खेळामधील दिले.प्रतिस्पर्धी खेळाडू कित्येकदा आपल्याला उकसवायला वा आपला ताबा गमावण्यासाठी शिव्यांचा वा गैरशब्दांचा वापर करतात जर त्याला बळी न पडता आपण आपला ताबा याने की कंट्रोल स्वतःजवळच ठेवला तर क्रिकेटमधील स्थितप्रज्ञ खेळाडू सचिन तेंडूलकर सारखे आपण होऊच शकू.

ह्या क्लिप मधील मला सगळ्यात आवडलेलं उदाहरण म्हणजे कोल्ड्रिंक आणि साध्या पाण्याचं .हे बघून माझ्याही मनात काही विचार आलेत ते पुढीलप्रमाणे.

खरंच आयुष्य वा जीवन हे साध्या पाण्यासारखं शांत,निर्मळ, समाधान देणारं तसंच स्थिर, खळखळाट नसलेलं,एका स्थितप्रज्ञासारखं असावं वा आपण घालवावं न की कोल्ड्रिंक्स सारख फसफसून वर उचंबळणार,खळखळाट असणारं,आतड्यांना इजा पोहोचवणारं आणि कधीच तृप्तता न देणार.

ह्या बाबतीत मला अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आपलं वागणं हे कायम आपल्या हातात असतं पण दुसऱ्याचे वागणे आपल्या  हातात अजिबात नसतं त्यामुळे आपण आपल्या जागी शांतपणे वागलं तर मग कुठल्याही अडचणींचा सामना आपण योग्य त-हेने करु शकतो.

थोडक्यात काय तर  गौरगोपालदासजींच्या ह्या क्लिप मधून इतकं मात्र शिकले माणसाने कोल्ड्रिंक्स  सारख न जगता पाण्यासारखं जगलं तर आयुष्य नक्कीच समाधानात, शांत व्यतीत होतं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ किंमत अन्नाची … सुश्री नीला  महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

??

☆ किंमत अन्नाची … सुश्री नीला  महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

यू  ट्युबला एका आहारतज्ञाचं भाषण ऐकण्यात आलं. त्यात त्यांनी योग्य आहार,सप्लिमेंट्स यांद्वारे  अनेक रुग्णांना विविध आजारांतून कसं बरं केलं ,ते प्रभावीरीत्या सांगितलं होतं..

काही महिन्यांपूर्वी  निघालेली B12 व D जीवनसत्त्वाची कमतरता व काही तब्येतीच्या तक्रारींमुळे मी  या 

आहारतज्ञांकडे फोन केला.फोन साहजिकच  रिसेप्शनिस्टने घेतला…. ” आमच्या मॅडम ऑन लाईन तुमच्याशी ३० ते ४० मिनिटे बोलून तुम्हाला सल्ला देतील. या सल्ल्याची फी रु. तीन हजार असेल. तुमची केस पाहून तुम्हाला आम्ही तीन महिन्यांसाठी एक डाएट प्लॅन देऊ. तो तुम्हाला फॉलो करावा लागेल.तुम्ही जर हा प्लॅन घेतलात तर 

तीन हजारमधील दोन हजार रुपये आम्ही परत करू.”

दोन हजार रुपये परत करणार म्हटल्यावर मला एकदम भारी वाटलं. डाएट प्लॅन घ्यायचाच ,असा पक्का निश्चय करून मी विचारलं, ” मॅडम, म्हणजे हा डाएट प्लॅन एक हजार रुपयात मला पडेल नं?”

” अहो मॅडम नाही नाही.डाएट प्लॅनची किंमत वेगळी पडणार.”

” किती आहे किंमत”  मी जरा नाराजीनेच विचारले.

” प्रत्येक पेशंटनुसार प्लॅन वेगळा असतो.त्यामुळे किंमतही वेगळी असते.”

” अहो पण रेंज असेल नं,कमीत कमी किंमत काय असेल ?”

“साठ हजार”. …. 

माझ्या हातातून  फोन खाली पडला. दोन दिवसांनी  माझ्या जवळच्या  मैत्रिणीच्या चित्राच्या घरी गेले होते.

तिला ही घटना ऐकवली. क्षणार्धात तिचा चेहरा रागाने लाल झाला. ती आत गेली. हातात अनेक बाटल्या,प्लास्टिकचे डबे आणि फाईल घेऊन बाहेर आली….. आठ महिन्यांपूर्वी चित्राला खूप अशक्तपणा वाटू लागला होता.काम होत नव्हते.चिडचिडेपणा आला होता.जगण्यात अर्थ वाटत नव्हता. ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिला तपासले.त्यांना काही विशेष आजार वाटला नाही. जीवनसत्त्व ,लोहासारखी खनिजं यांच्या कमतरतेमुळे असं होऊ शकतं. पौष्टिक, संतुलितआहाराने बरं वाटेल, असं  त्या जुन्या जाणत्या डॉक्टरांचं मत पडलं.

लक्ष्मी पाणी  भरत असलेल्या चित्राच्या घरात अन्नाची काही  कमी नव्हती. स्वयंपाकाच्या मावशी  दोन्ही वेळेला  प्रत्येकाच्या आवडीचं जेवण रांधत होत्या. पण चित्राला दाक्षिणात्य पदार्थ आवडत .ती बरेचदा  वैशाली, वाडेश्वरमधून  इडल्या,डोसेच मागवून खाई. इतर वेळी वरणभातावरच तिचं पोट भरत असे. आईस्क्रीम मात्रं तिला रोज लागायचेच. आणि चहा हे तिचं अमृत होतं. दिवसातून सात-आठदा तरी तिचा चहा होत असे. चित्राच्या लेकीचे चायनीजशिवाय पान हलत नसे. ती मैत्रिणींबरोबर चायनीज खाऊनच घरी येत असे. शिवाय डॉमिनोज ,पिझा हट, मॅकडी  ही तिची तीर्थस्थानं होती. घरची पोळी भाजी तिला बोअर होई. भात खाणं हे तर तिला पाप वाटे. पिझा,बर्गरनी  तिच्या व्यक्तीमत्त्वाला चांगलच वजनदार  केलं होतं.. मंदार ,चित्राचे यजमान त्यांच्या धंद्याच्या निमित्ताने  बरेचदा बाहेरच असत. सामिष जेवण त्यांचा जीव की प्राण…विविध गावांतील कोणत्या हॉटेलात फिश चांगला मिळतो, कुठे बिर्याणी लाजवाब असते, हे सांगताना  सरस्वती त्यांच्या जीभेवर नाचत असे. मटन,तांबडा-पांढरा खाण्यासाठी ते मित्रांबरोबर खास  कोल्हापुरला जात असत. त्यामुळे  चित्राच्या शाकाहारी घरी जेवणासाठी ते क्वचितच  असत.

चित्रावर त्यांचं खूप प्रेम होतं. म्हणूनच चित्रा आजारी पडल्यावर त्यांनी तिला लगेच डॉक्टरांकडे  नेलं. डॉक्टरांनी जेंव्हा जीवनसत्त्व, खनिजे, लोह यांची कमतरता सांगितली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. एवढ्या समृद्ध भरल्या घरात असं का व्हावं ते त्यांना समजेना. म्हणूनच शेवटी ते शहरातल्या  प्रसिद्ध व महागड्या आहारतज्ञांकडे चित्राला घेऊन गेले.

मी चित्राची फाईल पाहिली. फाईलमध्ये  तिच्या रक्ताच्या तपासण्यांचे रिपोर्ट्स होते. त्यात  अनेक जीवनसत्त्वे, खनिजे,लोह यांची कमतरता तिच्या रक्तात दिसत होती. त्या फाईलवर  मी चौकशी केलेल्या  क्लिनिकचेच नाव दिसत होते. निरनिराळ्या  व्हिटॅमिन्स, मिनरल्सच्या  गोळ्या असलेल्या बाटल्या  दिलेल्या होत्या. प्लॅस्टिकच्या डब्यातून  नाचणी,बाजरी वगैरेंची  कसली कसली पिठे दिसत होती. या सगळ्यांचे तिच्याकडून ऐंशी हजार रुपये घेतले होते.

दिलेल्या प्लॅननुसार  तिने  ही औषधे घेण्यास सुरुवात केली. जेवणाऐवजी  पिठे  शिजवून खाऊ लागली. दोन दिवस बरं वाटलं. तिसऱ्या दिवसापासून  जुलाब होऊ लागले. आहारतज्ञाला फोन केला. प्लॅननुसार सगळं सुरू ठेवा,असं उत्तर मिळालं. दोन  दिवसांनी  जुलाबांबरोबरच उलट्याही सुरू झाल्या. पुन्हा आहारतज्ञाला फोन गेला. मॅडम परदेशी गेल्याचं उत्तर मिळालं.

मैत्रीण उलट्या जुलाबांनी अंथरुणाला खिळली. चित्राच्या यजमानांना काय करावं ते समजेना. त्यांना  ज्या आत्यांनी  लहानाचं मोठं केलं होतं त्या आत्याला गाडी पाठवून गावाकडून  घरी आणलं. आत्यांनी वयाची ऐंशी वर्षं पार केलेली असली तरी पन्नाशीच्या चित्रापेक्षा त्या ठणठणीत दिसत होत्या. ऐंशी पावसाळे पाहिलेल्या आत्याबाईंच्या सारं लक्षात आलं….. त्यांनी आल्या दिवसापासून पदर खोचून स्वयंपाकघराचा ताबा घेतला. त्यांनी  तिच्यासाठी  लोणकढ्या तुपातले  मुगाचे,नाचणीचे, डिंकाचे  लाडू बनवले. चित्राचा चहा बंद करून  टाकला. उठल्याबरोबर कोमट पाणी, लिंबू नि मध तिला प्यायला देत असत. नाष्ट्याला  ताजा बनवलेला लाडू नि गरमागरम  भाताचे प्रकार.. गरम गरम भाताबरोबर कधी मेतकूट तूप लोणचं ,कधी कुळथाचं पिठलं, कधी लसणाची फोडणी दिलेलं मुगाचं वरण, कधी टोमॅटोचं तर कधी आमसुलाचं सार ! कधीतरी  मुगडाळीची खिचडी ,तूप ,पापड नि  मुरलेलं लिंबाचं लोणचं….. 

दुपारच्या जेवणात  गरम गरम पोळी, तूप, कधी  बाजरीची तर कधी नाचणीची भाकरी. तिच्यासोबत घरच्या ताज्या  लोण्याचा गोळा. पोळी-भाकरीसोबत  लिंबू पिळलेली, भरपूर कोथिंबीर घातलेली  रोज वेगळी कोशिंबीर, मोड आलेल्या कडधान्याची उसळ, रोज नवीन फळभाजी नि ओल्या खोबऱ्याची, कच्च्या टोमॅटोची ,कांद्याची, दोडक्याच्या किंवा दुधीच्या सालीची खमंग चटणी….. 

दुपारी  गरम गरम उपमा ,कधी पोह्याचा एखादा प्रकार ,कधी लाह्यापीठ ,कधी थालीपीठ, कधी मिश्र धान्यांचं गरमागरम  धिरडं ….. 

रात्रीच्या जेवणात मात्रं गरम गरम ज्वारीची  भाकरी, पालेभाजी नि जवस, खोबरं, कारळे, लसूण यांपैकी एकाची  चटणी. दिवसभरात  दोन मोसमी फळे  तिला खावीच  लागत..

आता  आत्याबाई  हे  एकटीला थोडच खाऊ घालणार ?

साऱ्या घराचाच हा डाएट प्लॅन झाला. आणि आत्यांना नाही म्हणण्याची किंवा विरोध करण्याची कुणाची बिशाद नव्हती.

चित्राला तिच्या न कळत  कधी  बरं वाटू  लागलं, ते कळलंच नाही. तिचा अशक्तपणा, निरुत्साह , निराशा सगळं सगळं पळालंच, पण चित्राच्या  यजमानांची रक्तातील वाढलेली साखरही पळाली. लेकीचं वाढलेलं वजन पळालं नि तिच्यामागे कॉलेजात  मुले लागू  लागली..

….. आजारपणाच्या  छायेनं वेढलेलं  घर  हसतं-खेळतं  झालं.

बाहेरून पिझा ,बर्गर, वडापाव, तेलकट चायनीज, तुपकट पंजाबी ,बेचव कॉंटिनेंटल मागवणं  बंद झालं नि पैशाची कल्पनेपलिकडे बचत होऊ लागली……. पण यासाठी  ऐंशी हजार रुपये अक्कलखाती  जमा करावे  लागले.

भाच्याच्या घरातील पोटं आणि  तब्येती मार्गी लावून आत्याबाई आपल्या गावी  निघाल्या.. चित्रा नि  तिच्या  यजमानांनी  आत्याला वाकून  नमस्कार केला . आत्याबाईंनी  डोक्यावर ठेवलेल्या आशीर्वादाचा हात हातात घेतला, नि त्या अन्नपूर्णेच्या हातात नवीन घडवून आणलेले  सोन्याचे  बिलवर चित्राने  घातले.

” अरे  पोरांनो, हे  एवढे महाग  जिन्नस  कशासाठी ?” … आत्याबाई  चक्रावून  बोलल्या..

” आत्या  तू  तुझ्या अन्नपूर्णेच्या हातांनी जे पौष्टिक अन्न आम्हाला करून वाढलंस त्यामुळे चित्रालाच काय, आम्हा सर्वांना पुनर्जन्म मिळाला. त्या अन्नाची किंमत होऊच शकत नाही. पण ही फूल ना फुलाची पाकळी. “…..

लेखिका : सुश्री नीला  महाबळ गोडबोले, सोलापूर

संग्राहिका : वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सिंधुदुर्गचे माणिकमोती … भास्कर पांडुरंग कर्णिक –  डॉ. बाळकृष्ण लळीत ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ सिंधुदुर्गचे माणिकमोती … भास्कर पांडुरंग कर्णिक –  डॉ. बाळकृष्ण लळीत ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

 कोल्हापूरहून कोकणात राधानगरीमार्गे जाताना फोंडाघाट लागतो. तो उतरल्यावर आपण फोंडा या गावी येतो. कविवर्य वसंत सावंत, वसंत आपटे, महेश केळुसकर हे याच परिसरातले…! पुढे प्रसिद्ध मराठी साहित्यिक व कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे गाव नि घर असलेले हे करूळ.

तेथील शाळा, ग्रंथालय, बॅ.नाथ पै प्रबोधनी हे सारे पहाण्यासारखे आहे. येथून पुढे कणकवलीकडे डावीकडे जाताना माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर.अंतुले यांच्या काळात कल्पकतेने साकार झालेले हुतात्मा स्मारक नजरेला पडते नि हात जोडले जातात.

     

कोण होते भास्कर पांडुरंग कर्णिक..?

– मी याविषयी माहिती घेऊ लागलो, तेव्हा माहितीच्या महाजालात त्यांच्याविषयी भरपूर माहिती उपलब्ध झाली, ती व अन्य एक दोन संदर्भ हाती आल्यावर या महान सिंधुरत्नावर संकलन-संपादन करून येथे लिहिले आहे.

     

तेव्हाच्या रत्नागिरी जिल्ह्यात करूळ या गावी भास्कर पांडुरंग कर्णिक यांचा जन्म ७ डिसेंबर १९१३ रोजी झाला.

आपल्या जिल्ह्यात जन्मलेल्या या महान भारतीय क्रांतिकारकांचे आपण सदैव स्मरण केले पाहिजे .

पुणे येथे एका दुर्दैवी क्षणी दि.३१ जानेवारी, इ.स. १९४३ रोजी त्यांनी बलिदान केले.

    

शिक्षण –

त्यांचे प्राथमिक शिक्षण करूळ गावी झाले. वयाच्या १०/१२ व्या वर्षी माध्यमिक शिक्षणासाठी कर्नाटकातील गुलबर्गा जावे लागले .

पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून त्यांनी बी.एस्‌सी. पदवी प्राप्त केली आणि १९४२ साली ते पुण्याजवळच्या देहूरोड येथील ॲम्युनिशन फॅक्टरीत नोकरीस लागले.

     

मोठे धाडस — क्रांतिकारक चळवळीत भाग असलेल्या भास्करना संदेश मिळाला…

“अर्धा ट्रक बॉम्ब संपादन करा.” ….. 

देहूरोड येथील एच. डेपोमध्ये असताना भास्कर कर्णिक यांनी तेथून बॉम्ब पळवायला सुरुवात केली. बाजूला काढून ठेवलेल्या बॉम्बच्या खोक्यांतला एक बॉम्ब रोज जेवणाच्या डब्यातून बाहेर आणला जाई. या पद्धतीने कर्णिक यांच्याकडे अर्धा ट्रक भरेल एवढे बॉम्ब जमा झाले होते.”

अशी माहिती मिळते की,…. ”या बॉम्बपैकी काही बॉम्ब पुढे पुणे कॅन्टॉन्मेन्टमधील कॅपिटॉल चित्रपटगृहात टाकण्यात आले. बॉम्ब टाकण्याच्या कटात सामील असलेले बापू साळवी, बाबूराव चव्हाण, एस.टी. कुलकर्णी, रामसिंग, दत्ता जोशी आणि हरिभाऊ लिमये असे सहा जण जेलमध्ये गेले, पैकी दत्ता जोशी जेलमध्येच वारले, बाकीचे काही काळानंतर सुटले.”

     

पुणे येथील फरासखान्यात मृत्यू –

कॅपिटॉलमध्ये सापडलेल्या बॉम्बच्या अवशेषांवरून हे बॉम्ब कोठून आले? याचा पोलिसांनी शोध घेतला आणि त्यांनी भास्कर पांडुरंग कर्णिक, भालचंद्र दामोदर बेंद्रे, अनंत आगाशे, वामन कुलकर्णी आणि रामचंद्र तेलंग या पाच जणांना पकडून पुण्याच्या फरासखाना पोलीस चौकीत आणले. तेव्हा पुढील सर्व घटनाक्रम त्यांच्या लक्षात आला.

भास्करराव कर्णिक लघुशंकेच्या निमित्ताने किंचित दूर गेले आणि त्यांनी खिशातली सायनाईडची पूड खाल्ली आणि काही सेकंदात त्यांचे निधन झाले. त्यांच्या या कृत्यामुळे ‘त्यांच्याकडून मोठी माहिती मिळेल’ असे वाटणार्‍या पोलिसांची निराशा झाली. कर्णिकांच्या बलिदानामुळे मोठ्या संख्येने क्रांतिकारक वाचले.

…. असे होते हे धाडसी करूळचे सुपुत्र हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक!

पुणे येथील स्मृतीस्तंभ –

पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराच्या अलिकडे मजूर अड्डयाजवळ हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या स्मृतीसाठी म्हणून एक स्मृतीस्तंभ उभारला आहे. स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणारे क्रांतिकारक हुतात्मा कर्णिक यांचा हा स्मृतीस्तंभ सध्या तसा दुर्लक्षितच आहे. या संदर्भात एका वृत्तपत्रांच्या पुरवणीत प्रसाद पवार यांनी लक्ष वेधले होते.

     

आपण सिंधुदुर्गवासियांनी दरवर्षी करूळला जाऊन मानवंदना द्यायला स्मारकावर गेले पाहिजे. शाळा, महाविद्यालय यांच्या शैक्षणिक सहली काढून त्यांच्या या असामान्य बलिदानाची यशोगाथा नव्या पिढीला विद्यार्थ्यांना सांगायला हवी.

म्हटले तर एक ‘लघुपट चित्रपट’ही काढता येईल. त्यांचे छोटेखानी चरित्र प्रसिद्ध करून जिल्हा परिषदेने शाळांमधून विद्यार्थ्यांना मोफत वाटायला हवे. दरवर्षी करूळ ग्रामस्थ व पंचक्रोशीतील जनता येथे मानवंदना देते. त्यात आपणही सहभागी व्हायला हवे.

     

लेखक : डॉ. बाळकृष्ण लळीत  

संग्राहक : सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मन… ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ मन… ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

मन

मन म्हणजे काय हो ? ,

त्याला कोणी पाहिलं नाही ,

कसं असते ते माहीत नाही,

पण त्याला खूप मानसन्मान असतो.

कधी ते लिक्विड असतं, 

“मन भरलं नाही” असं म्हणतो आपण,

कधी ते सॉलिड असतं, “मनावर खूप ओझं आहे”

कधी ते घर होतं, “मेरे मन में रहने वाली”,

कधी ते तहानलेल असतं,  “मेरा मन तेरा प्यासा” 

कोणी त्याला मोराची उपमा देतं, “मन मोराचा कसा पिसारा फुलला”

असं हे मन आयुष्यभर आपल्याला झुलवत ठेवतं ,

कधी स्वतःच्या मनाने तर कधी दुसऱ्याच्या मनाप्रमाणे आपण वागत असतो

हे “मन” कधीच स्थिर का बरं नसतं ?

ते कधी प्रेयसीच्या तोंडातून मंदिररूप धारण करतं

आणि ती म्हणते “मन में तुझे बिठाके …”

काही जण असतात की त्याच्या “मनात”काही रहात नाही तर काही “मनकवडे” असतात. 

मन दिसत तर नाही

… पण त्याने ठरवले तर ते हरवून टाकतं

तर कधी शक्ती नसताना जिंकून ही देतं.

“मनात आणलं तर काहीही होऊ शकतं ..”

जरी त्याला कोणी पाहिलेले नाही तरी ते जर चांगलं असेल तर आपण आनंदी राहतो ,

दुसऱ्याचं भलं करतो,  म्हणुन म्हटलं जातं, “मन चंगा तो ..”

कधी मन खूप डेंजर असतं ,

स्वतःकडे राग तिरस्कार साठवून ठेवतं आणि “मनातील” राग दुसऱ्याचं नुकसान करतं .

याचा वेग मोजण्याचं यंत्र अजून अस्तित्वात आलेलं नाही, 

तरी लोक म्हणतात,  “मनाचा ब्रेक , उत्तम ब्रेक”.

“मन” दिसत नसलं तरी तेच आपणाला घेऊन फिरत असतं , कधी घरी , कधी डोंगरदऱ्यांत, कधी आकाशात

पण ते निर्मळ असतं, पारदर्शक  असतं.

म्हणूनच आपण म्हणू शकतो की “मोरा मन दर्पण कहलाये.”

अशा या न  दिसणाऱ्या पण सर्वस्व असणाऱ्या  “मनाला” काबूत ठेवण्याचा अनेकजण प्रयत्न करतात !

पण “मनाप्रमाणे” जगता आलं नाही तर

त्याला काही अर्थ आहे का ?

मग …

“मनसोक्त” जगा ! ! आणि त्यासाठी ”मनापासून” शुभेच्छा!

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares