मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मराठी — लेखक – डाॅ. विनय काटे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

❤️ मनमंजुषेतून ❤️

☆ मराठी — लेखक – डाॅ. विनय काटे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆

माझा लय जीव हाय ह्या बाईवर. मस्त, मोकाट, उंडारल्या खोंडासारखी भाषा ! लावल तितके अर्थ कमी ! पंढरपूरच्या घाटापासून ते पुण्यातल्या पेठेपर्यंत किती कळा तिच्या अंगात !

नाकातून आवाज आला की लगेच कळतं की कोकणातून लेले किंवा नेने आलेत. “रांडेच्या” म्हणले की लगेच कोल्हापुरी पांढरा रस्सा आठवतो. ” का बे छिनालच्या ” म्हणलं की सोलापूरची शेंगा चटणी आणि “पोट्ट्या” म्हणलं  की नागपुरी सावजी जेवण. पोरीच्या तोंडून ” मी तिथे गेलो” आणि  “ऐकू आलं  म्हणलं  की सांगली !! “काय करून राहिला?” म्हणलं की नाशिक, “करूलाल?” म्हणलं की लातूर आणि ” विषय संपला ” म्हणलं की पुणे !! हेल काढून बोललेला नगरी किंवा बीडचा आणि “ळ” चा “ल” केला की कोकणी ! एका वाक्यात माणसाचं गाव कळतं.

हिंदी बोलताना तर मराठी माणूस लगेच कळतो. आमच्या इतकी हिंदीची चिंधी कुणीच केली नसेल. मराठी माणसाचे हिंदी आणि मुसलमान बागवान लोकांची मराठी म्हणजे विष विषाला मारते त्यातला प्रकार. ” हमारी अडवणूक हो रही है ” हे मराठी हिंदी, आणि ” वो पाटी जरा सरपे ठिवो ” ही बागवानी मराठी ऐकून मी लय खुश होतो राव ! मराठी खासदार आणि राजकारणी लोकांचं हिंदी ऐकून तर हिंदी पत्रकारांना घाम फुटत असावा.

एकाच गोष्टीला प्रतिशब्द तरी किती ? बायको, पत्नी, सौभाग्यवती, अर्धांगिनी, सौ, खटलं, कुटुंब, बारदान, बाई, गृहमंत्री, मंडळी—- इत्यादी सगळ्याचा अर्थ एकच– ! “इ” सारख्या आडवळणी शब्दापासून पण सुरु होणारे कितीतरी वेगवेगळे अर्थाचे शब्द… जसे की “इस्कोट”, “इरड करणे”, “इरल”, “इकनं”. — “ग्न” ने शेवट होणारे चार शब्द मराठीत आहेत … लग्न, मग्न, नग्न आणि भग्न. किती मस्त क्रम आहे ना? हे “ग्न” बाबत आमच्या मास्तरच ज्ञान !

इदुळा, येरवा, आवंदा, कडूस पडाय, झुंजूमुंजू, दोपार, सांच्याला, रातीला, तांबडं फुटायला— यातून जो वेळ कळतो त्याची मजा am, pm ला कधीच येणार नाही. कोरड्यास, आमटी, कट, शेरवा, तर्री, शॅम्पल यातला फरक कळायला महाराष्ट्र उभाआडवा बघावा लागतो. खेकडा कुठला आणि चिंबोरी कुठली? उंबर कुठलं आणि दोड्या कुठल्या? शाळू, ज्वारी आणि हायब्रीड यातला पोटभेद कळायला रानातली मराठी लागते. कडवाळ कुठलं न मका कुठला हे शेरातला शाना कदीबी सांगू शकत नाय !

खाण-पिणं असू द्या, जनावरं-जित्राब असू द्या, शिव्याशाप असू द्या, लाडाची नाव असू द्या, वेळ-काळाची गणित असू द्या, हुमान-कोडी असू द्या, ओव्या-अभंग असू द्या, अंगाई असू द्या, सणवार असू द्या, झाडाझुडुप असू द्या, शेतीची अवजारे असू द्या, कापडचोपड असू द्या नाहीतर अजून काही,—- मराठी प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. प्रत्येक गावात, शहरात, कामात, धंद्यात … सगळीकडे मराठीचा वेगळा बाज असतो, अंदाज असतो आणि लकब असते. दिवसातून ५ वेळा कपडे बदलणाऱ्या अवखळ, सुकुमार पोरीसारखी ही भाषा सगळीकडे नवनवे रंग उधळत असते.

माय मराठी… तुझ्यावर लय जीव आहे बाये !!! अशीच उंडारत राहा… वारं पिलेल्या खोंडासारखं !!

लेखक : डॉ. विनय काटे

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शेकोटी… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ शेकोटी… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

वातावरणाच्या हेराफेरीत हल्ली कधीपण पाऊस पडतो.सध्या हवेत इतकी उष्णता आहे की हा थंडीचा महिना आहे का ?असा प्रश्न निर्माण झालाय.हाही ग्लोबल वॉर्मिंगचा प्रसाद.या श्रुष्टीचे काय होणार ? ते श्रुष्टी निर्मात्यालाच माहीत!

सहजच मला आमच्या लहानपणीचे थंडीचे दिवस आठवले.ऑक्टोबरपासूनच थंडीची चाहूल लागायची.दिवाळीत कडाक्याची थंडी पडायची.सर्वत्र दाट धुके पडायला सुरुवात व्हायची.शेत शिवार धुक्यात नहायचे.झाडांच्या पानावरून दवाचे थेंब टपकायचे.हातापायाला  भेगा पडायच्या.ओठ फुटून रक्त यायचे,गालाची त्वचा फुटून खरबरीत काळे मिट्ट दिसायचे गाल.कोल्ड क्रीम वगैरे तसले काही प्रकार नसायचे,डोक्याला तेल लावताना तोच तेलाचा हात चेहऱ्यावर,हातावर,पायावर दररोज फिरवायचा.जाड जाड वाकळा अंगावर घेतल्या तरी झोपेत थोडीशी जरी हालचाल झाली की थंडी पांघरुणात शिरायची म्हणून उठल्या उठल्या पहिल्यांदा चुलीपुढं जाऊन बसायचं.

दिवाळीच्या अंघोळीला तर पहाटे उठूच वाटायचे नाही.तेल लावून कडक पाण्याचा तांब्या अंगावर ओतेपर्यंत अंग काकडून जायचे.अंघोळ केली की चुलीपुढं ऊबीला बसायचं थोडं फटफटायला लागलं की मग फटाके उडवायला  अंगणात जायचं.

शेतकरी पीक राखणीला शेतात जायचे.जागोजागी मग शेकोट्या पेटायच्या.अंगणात,रस्त्याच्या कडेला,शेतात आसपासचे चार पाच शेतकरी मिळून शेकोट्या करायचे आणि गप्पा मारत शेकोटीभोवती बसायचे.शेतात चगळाची कमी नसायची त्यामुळं शेकोटीच्या ज्वाला कमरेइतक्या ,डोक्याइतक्या उंच उंच जायच्या.रात्रभर असे आळीपाळीने जागून पहाटे पहाटे झोप घ्यायची,दिवस उगवला की घरला यायचे.

आम्हीही वाकळेतून उठून पहिले चुलीपुढं बसायला जागा धरायचो.चुलीपुढं गर्दी होऊ लागली की तिथून उठून अंगणात येऊन शेकोटी पेटवायचो.पूर्वी प्रत्येकाच्या परसात उकिरडा असायचा,त्यामुळं चगळाची कमतरता नसायची पण जो पण शेकोटीला येईल त्याने स्वतःचा चगाळ आणायचाच नाहीतर शेकोटीपासून हकलपट्टी व्हायची त्यामुळं नियम पाळलाच जायचा.चगाळ,पालापाचोळा ,चिपाड एखादं शेणकूट बारकी वाळलेली झुडुपे आमच्या शेकोटीला काही चालायचे.शेकोटी जसजशी रसरसायची तसा गप्पांचा फड रंगायचा.कधी कविता कधी पाढे ,नकला तर कधी सिनेमातली गाणी! प्रत्येकाची काहीतरी विशेषता असायचीच. बरेचदा गाण्यापेक्षा विडंबनच जास्त असायचे.

त्या त्या वेळच्या फेमस गाण्यात आपलं कायतर घुसडून जोडायच न त्याचं विडंबन करायचं.

मेहबुबा मेहबुबा  या गाण्यावर त्यावेळी वात्रट पोरांनी केलेलं खट्याळ विडम्बन असायचं-

मेहबुबा मेहबुबा

छ्ड्डीत शिरला नागोबा..आणि अशीच गाण्यांची, कवितांची विडंबन…

हातापायाला ऊब मिळेपर्यंत पाठ गार पडायची. मग शेकोटीकडे पाठ करून बसायचे.बऱ्याचदा तोंडाने फुंकर मारून जाळ पेटवताना एकदम ज्वाला भडकायची आणि पुढील केसांना हाय लागून तिथले केस प्लास्टिक जळल्यासारखे गोळा व्हायचे.दाताला तिथंच बसून राखुंडी लावायची ,ऊबीपासून दूर जावेच वाटायचं नाही .पाठीवर उन्ह येईपर्यंत शेकोटीची ऊब अंगावर घेत राहायचो.कधी शेंगा तर कधी हरभऱ्याचे ओले किंवा सुकलेले डहाळे विझत आलेल्या शेकोटीच्या आरात टाकायचे आणि भाजल्यावर राखेतून शोधून खायचो,ओठ,बोटे,गाल काळेमिट्ट व्हायचे पण ते आम्हाला महत्वाचे नव्हते, भाजलेला हावळा खाण्याचा आनंद अभाळाएव्हढा मोठ्ठा होता.

लहान मुलांच्या शेकोटीला मोठी माणसे कधी येत नसत,चुकून आलेच कुणीतरी आम्हाला खूप आनंद व्हायचा.किती मजेशीर आणि आनंदी होते जीवन! कुठली घाई नाही की जीवघेणी स्पर्धा नाही की कोणता ताण नाही! उन्ह चढू लागतील तसतशी एक एक मेंबर शेकोटीपासून काढता पाय घ्यायचे.कुणाला मधूनच हाक आल्यावर घरी जावे लागायचे.शेवटी जो थांबेल त्याने गरम राखेवर पाणी ओतायचे अन्यथा आसपासचा उकिरडा किंवा गंजी पेटण्याचा धोका असायचा म्हणून शेवटच्या सदस्याने पाणी ओतायचे किंवा माती टाकायची.

घरातले मोठे शेताभातात जायचे,म्हातारे कोतारे घर राखायला अन आम्ही शाळेला.शेकोटीची राख मात्र आम्ही पुन्हा यायची वाट पहात तिथेच बसायची.

आजही आम्ही तिथेच शेकोटीपुढं आहोत आणि शेकोटीच्या उबेत आहोत असे वाटतेय. काय नव्हतं त्या ऊबीत?सवंगड्यांचे अतूट स्नेहबंध,आसपासच्या शेजाऱ्यांची आपुलकी,मोठ्यांचा धाक,मुक्त ,निष्पाप ,समृद्ध बाल्य,अवतीभवतीचा संपन्न निसर्ग आणि बरेच काही जे काळाबरोबर वाहून गेलं.आमच्या मोकळ्या वेळेवर फक्त आमचाच अधिकार होता.

आज निसर्गचक्र बिघडलेय माणसाच्या चुकीमुळेच.शेकोटीच्या उबीची मजा अनुभवयाला ना हवामान तसे राहिले न माणसे!दिवस उगवायच्या आधीच मुलांना गरम पाण्यात बुचकळून स्कूल बसमध्ये बसावे लागते आणि बसच्या चाकाच्या गतीतच बाल्य सम्पते.कुठे असतो वेळ स्वतःच्या मनाप्रमाणे घालवायला किंवा निसर्गातील गमतीजमती अनुभवयाला?आणि ते न अनुभवल्यामुळेच निसर्गाची ओढ अन प्रेमही उत्पन्न होत नाहीय.

भिंतीतल्या शाळेसाठी भिंतीबाहेरची शाळा भिंतीबाहेरच रहाते.

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रोज एक टक्का सुधारणा — ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रोज एक टक्का सुधारणा — ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

रोज तुम्ही स्वतःमध्ये 1 टक्का जरी सुधारणा केलीत, तरी वर्षभरात तुमच्यामध्ये 365 टक्के सुधारणा झालेली असेल.

एअरपोर्टच्या जवळ लिहिलेले एक सुंदर वाक्य: आकाशात भरारी दररोज घ्या, पण संध्याकाळी खाली जमिनीवर या. कारण तुमच्या यशानंतर आपुलकीने टाळ्या वाजवणारे व मिठी मारणारे मित्र जमिनीवरच राहतात.

ओळखीमधून केलेली सेवा जास्त दिवस टिकून राहत नाही. पण सेवेमधून झालेली ओळख आयुष्यभर टिकून राहते!

आयुष्यात व्यवहार तर खूप  होतात; पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही.

आकाशात उंच भरारी घेणाऱ्या गरुडालाही पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावे लागते. परंतु खाली येणे, ही त्याची हार नसते,तर पुन्हा आकाशात झेप घेण्याची तयारी असते.

यशस्वी तर भरपूर जण असतात; परंतु समाधानी फार कमी जण असतात. यश हा जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो.

जीवनात उंची गाठण्यासाठी एखादी पदवी हवीच असते, असे काही नाही. मधुर वाणी आणि चांगली वागणूक एखाद्या सामान्य व्यक्तीलाही असामान्य बनवू शकते.

तुमच्यात पात्रता असूनही काही माणसं तुम्हांला पाठिंबा देत नाहीत. कारण, त्यांच्या मनामध्ये एकच भीती कायम असते. ती म्हणजे हा आपल्यापुढे निघून जाईल. नातं कोणतंही असू द्या… फक्त इमानदार असलं पाहीजे.

जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असते! साठवली जाते ती दौलत आणि जपली जातात ती माणसं!

माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो… परंतू सोन्याचा तसा उपयोग काय..? तिजोरी पुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं.. बस्स एवढंच ना…? परंतू मला वाटतं… माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं… जिथं जावं, त्याचं सोनं करून यावं..

प्रत्येक शब्द काळजाकडे पाठवण्यापेक्षा काही शब्दांना हसून उडवायला शिका, म्हणजे काळजाला बोचऱ्या शब्दांचा अतिरिक्त भार उचलावा लागणार नाही…!

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ अस्तित्व… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ अस्तित्व… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“.. अगं तारामती !चल चल लवकर पाय उचलत राहा… अजून तालूक्याचं गाव आलं नाही!.. पाच सहा मैलाची रपेट करायची आपल्याला… आपल्या कनवाळू  मायबाप सरकारने यंदाच्या दिवाळी साठी दुर्बल कुटुंबांना दिवाळीसामानाचं पॅकेट देणारं आहेत फक्त शंभर रुपयात….त्या स्वस्त शिधावाटप दुकानातून… आपल्याला तिथं जाऊन नंबर लावला पाहिजे तरच ते आपल्याला मिळेल…त्यासाठी आधी बॅंकेत जाऊन हया महिन्याची स्वातंत्र्य सेनानी पेंशन योजनेतील जमा झालेली पेंशन काढायला हवी… तुला एक खादीची साडी आणि मला जमला तर खादीचा सदरा घ्यायला हवा…गेली दोन अडीच वर्षे कोरोना मुळे फाटकेच कपडे तसेच वापरले गेले आणि आता तेही घालण्याच्या उपयोगी नाही ठरले… यावर्षीची दिवाळी आपली खास जोरदार दिवाळी होणार आहे बघ… एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो तेल, एक किलो डाळ, अंगाचा साबण, सुवासिक तेलाची बाटली हे सगळं त्या पॅकेट मधे असणार आहे… ते आपल्याला मिळाले कि दिवाळीचा सणाचा आनंद होणार आहे… अगं चल चल लवकर… तिकडे बॅकेत किती गर्दी असते तुला ठाऊक नाही का? . मग पैसे मिळाले की त्या रेशन दुकानावर किती गर्दी उसळली असेल काही सांगता येत नाही… “

…बॅकेत पोहचल्यावर त्यांना सांगण्यात आलं…स्वातंत्र्य सेनानीं ची पेंशन मध्ये वाढ द्यायची का नाही यावर शासनाचा निर्णय प्रलंबित असल्याने निर्णय झाल्यावरच पेंशन खात्यावर जमा होईल… तेव्हा पेंशन धारकानी बॅकेत वारंवार चौकशी करू नये… खादीची साडी नि सदरा, दिवाळीचं पॅकेट दुकानात वाट बघत राहिलं… अन पेपरला बातमी आली… सरकारी दिवाळी पॅकेज कडे लाभार्थींनी पाठ फिरवली त्यामुळे सगळी पॅकेटची खुल्या बाजारात  विक्री करण्यास अनुमती दिली आहे…

… रेशन दुकानाच्या पायरीवर ते दोघे थकून भागून बसले.. पिशवीतून आणलेल्या पाण्याच्या बाटलीतले चार घोट पाणी पिऊन तरतरीत झाले…आजही स्वतःच्या अस्तित्व टिकविण्याच्या धावपळीत  त्यांना पंचाहत्तर वर्षापूर्वीचा स्वातंत्र्य लढ्यात केलेल्या धावपळीचा भूतकाळ आठवला… तन,मन,धन वेचून देश स्वतंत्र व्हावा म्हणून त्यांनी योगदान दिले होते… देश स्वतंत्र झाला पण…पण  स्वतंत्र देशाच्या अनुशासनाचे आजही  ते गुलामच राहिले आहेत…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चव आणि चटक… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ चव आणि चटक… ☆ श्री अरविंद लिमये ☆

चव, लज्जत, गोडी, रुचि, खुमारी असे वेगवेगळ्या अर्थछटा असणारे शब्द म्हणजेच ‘स्वाद’ या शब्दाची अर्थरूपे आहेत. स्वाद काय किंवा त्या शब्दाचे हे विविध अर्थ काय थेट खाद्यपदार्थांशी जोडले गेलेले आहेत असे वाटणे स्वाभाविक आहे. कारण गोडी, रुचि म्हटलं की विविध चविष्ट पदार्थांच्या आठवणीनेच  तोंडाला पाणी सुटते. हे सगळेच शब्द ऐकतानाही स्वादिष्ट वाटावेत असेच! खरंतर विविध खाद्यपदार्थांच्या तितक्याच विविध चवी आणि त्यांचे वर्णन करणारी तशीच चविष्ट विशेषणे असा मोठा ऐवज स्वाद या अल्पाक्षरी शब्दात कसा सामावलेला आहे हे पहाणे अतिशय गंमतीचे ठरेल. त्यासाठी स्वाद या शब्दाचे आणि वर उल्लेख केलेल्या चव, रूचि आदी अर्थशब्दांचे मैत्रीपूर्ण धागे परस्परात  गुंफवत इतरही अनेक शब्द कसे आकाराला आलेले आहेत हे पहाणे अगत्याचे आहे. खमंग, चमचमीत,  झणझणीत,  चटकदार,  लज्जतदार,  मसालेदार,  चवदार,  खुमासदार,  मिष्ट, चविष्ट, खरपूस.. अशी अनेक विशेषणे त्या त्या पदार्थांच्या स्वादांचे असे कांही चपखल वर्णन करतात की ते पदार्थ न चाखताही त्यांचा आस्वाद घेतल्याचे (क्षणिक कां होईना) समाधान मनाला स्पर्शून जातेच.

खरंतर फक्त खाद्यपदार्थांनीच नव्हे तर अशा स्वादाधिष्ठीत असंख्य शब्दांनीही आपली खाद्यसंस्कृती समृद्ध केलेली आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

अशा अनेक शब्दांतून व्यक्त होणारा आणि त्या त्या पदार्थांमध्ये मुरलेला स्वाद चाखणे म्हणजेच त्या पदार्थांचा आस्वाद घेणे!

या ‘आस्वाद’ शब्दाला अंगभूत अशी एक शिस्त अपेक्षित आहे. आस्वाद घेणे म्हणजेच चवीने खाणे. आस्वादाला बेशिस्त वर्ज्य आहे. म्हणूनच मटकावणे,  ताव मारणे,  फडशा पाडणे, ओरपणे म्हणजेही खाणेच पण हे ‘चवीने खाणे’ नसल्याने  ‘आस्वाद’ म्हणता येणार नाही. कारण आस्वादाला जशी शिस्त तसाच आनंदही अपेक्षित आहे. ताव मारण्यात किंवा फडशा पाडण्यात जिथे आस्वाद नव्हे तर हव्यास मुरलेला आहे तिथे आस्वाद घेण्यातला आनंद कुठून असणार?

एखाद्या पदार्थाची अशा हव्यासाने चटक लागते. आणि एकदा का अशी चटक लागली की पोट भरलेले असूनही तो पदार्थ समोर आला की परिणामांची पर्वा न करता तो खायचा मोह होतोच. हे खाणे आस्वाद घेणे नव्हे तर जिभेचे चोचले पुरवणेच ठरते!

आस्वादाला, चवीने खाण्याला आरोग्यदायी आनंद अपेक्षित आहे आणि हव्यासाची परिणती ठरलेली चटक मात्र अनारोग्याला आमंत्रण देते!

आस्वाद या शब्दाची चवीशी जुळलेली ही नाळ खाद्य संस्कृतीइतकीच आपल्या संपूर्ण जगण्याशीही निगडित आहे. आस्वाद या शब्दाचा परीघ आपलं संपूर्ण जगणं व्यापून अंगुलीभर उरेल एवढा विस्तृत आहे. म्हणूनच जगण्यातला आनंद फक्त चांगल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद पुरताच मर्यादित स्वरूपाचा नाही तर विविध आनंददायी गोष्टींचा आस्वाद घेत आपले जगणे समृद्ध करता येते.

गीत, संगीत, चित्रपट, नृत्य, नाटक अशा विविध कला प्रकारांचा आस्वाद हे याचेच उदाहरण ! अशा कलाप्रकारांमधे रस असणारे त्यांचा रसिकतेने आस्वाद घेऊ शकतात! मग एखादे गाणे आस्वाद घेणाऱ्याचे मन प्रसन्न करते, नृत्य त्याला मंत्रमुग्ध करते, चित्रपट सुखावतो, नाटक उत्कट नाट्यानुभव देते. हे सगळे विशिष्ठ कला सादर करणारे ते ते कलाकार सादरीकरणाचा आनंद घेत तल्लीन होऊन ती सादर करत असतात आणि रसिक रसिकतेने त्या सादरीकरणाचा आस्वाद घेत असतात म्हणूनच शक्य होते.

जगण्याचेही तसेच. आनंदाने जगणे म्हणजे तरी काय? तर समोर येणारा प्रत्येक क्षण आनंदाने स्वीकारून जगण्याचाही आस्वाद घेत जगणे. मग ते क्षण सुखाचे असोत वा दुःखाचे,यशाचे असोत वा अपयशाचे.. ते तात्कालिक आहेत, क्षणभंगुर आहेत हे जे जाणतात, तेच त्या त्या क्षणांचा आस्वाद घेत जगू शकतात. आपल्याला गोड पदार्थ आवडतात म्हणून फक्त गोड पदार्थच खात राहून इतर विविध चवींचे पदार्थ वर्ज्य करून कसे चालेल? कारण वेगवेगळ्या रुचि,रस,आणि स्वादच खाण्यातील गोडी टिकवून ठेवत असतात जे आरोग्य आणि आनंदी जगण्यासाठी पूरक ठरत असते. जगणेही यश-अपयश, सुख-दुःख, ऊन-पाऊस यांच्यातील पाठशिवणीच्या खेळामुळेच एखाद्या चविष्ट पदार्थ सारखे खुमासदार बनत असते!

खाण्यातली असो वा जगण्यातली अशी खुमारी चाखण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने आस्वादक मात्र बनायला हवे !

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सरते शेवटी.. ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

? मनमंजुषेतून ?

☆ सरते शेवटी.. ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

पाहता पाहता २०२२ संपत आलं, नव्हे संपलंच. प्रत्येक नवीन वर्षात अनेक गोष्टी , अनेक घटना घडतात. काही खूप संवेदनशील असतात तर काही आयुष्यभर आनंद उत्साह निर्माण करणाऱ्या असतात. तर काही हे घडलं नसतं तर बर झालं असतं, असे मनाला वाटून जाणाऱ्या  असतात. काही आनंद हे दुःखाची झालर वा अस्तर लावून येतात. पण चेहऱ्यावर कधीच त्याच्या छटा दिसू दिलेल्या नसतात. पण असं का ?  खरं जगावं, सुखात आनंदी, दुःखात थोडं निराशा दाखवण्याचे स्वातंत्र्य नाही का आपल्याला…! खरं जगूया, खरं बोलूया ! एकमेकांच्या सोबत सुख दुःख वाटून घेऊ या..!

वेदनेचं गाणं करता यावं आणि संवेदनेने ते गात रहावं. आणि हो आनंदाचा उन्माद होऊ नये एवढं मात्र नक्की करावं

ग़म का ख़ज़ाना तेरा भी है, मेरा भी

ये अफ़साना तेरा भी है, मेरा भी

अपने ग़म को गीत बना कर गा लेना

राग़ पुराना तेरा भी है, मेरा भी

तू मुझको और मैं तुझको समझाऊं क्या

दिल दीवाना तेरा भी है, मेरा भी

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बाहुलीचा हौद — लेखक : अज्ञात☆ सुश्री शुभा गोखले ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ बाहुलीचा हौद — लेखक : अज्ञात☆ सुश्री शुभा गोखले ☆ 

 भाऊबीज… स्त्री पर्वात ‘सण’ म्हणून या दिवसाला खूप महत्त्व.

पण स्त्री इतिहासात या दिवसाला अजून एक महत्व आहे…

…आज ह्या दिवशी, म्हणजे या तिथीला… पुण्यनगरीत जवळपास १७५ वर्षापूर्वी या दिवशी एक खूप मोठी ऐतिहासिक गोष्ट घडली…ती म्हणजे… बाहुलीच्या हौदाचे लोकार्पण.

काय आहे हा बाहुलीचा हौद ? बाहुली कोण? या हौदाचे एवढे महत्व का ?… सांगते...

मी स्वतः इतिहासाची विद्यार्थिनी…

कॉलेजमधे असताना महात्मा फुले यांचे चरित्र अभ्यासताना, कुठेतरी वारंवार डॉक्टर विश्राम घोले यांचा उल्लेख यायचा. ते फार मोठे शल्यविशारद होते. ते माळी समाजातील बडे प्रस्थ. ते पुणे नगरपालिकेचे सदस्य आणि नंतर स्थायी समिती अध्यक्ष होते… ते महात्मा फुले यांचे सहकारी आणि फॅमिली डॉक्टर होते. आणि त्याहीपेक्षा मह्त्वाचे म्हणजे ते सुधारक होते.

महात्मा फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन  त्यांनी स्त्री शिक्षणाची पालखी आपल्या खांद्यावर घेतली.

सुरुवात आपल्या घरातून करण्यासाठी त्यांनी आपली लाडकी कन्या बाहुली… हिला शिकवण्यास सुरुवात केली.

बाहुली… खरोखरच नावाप्रमाणे बाहुली. वय अवघे ६-७. अतिशय हुशार कुशाग्र आणि चुणचुणीत… बाहुलीच्या शिकण्याला डॉक्टर घोले यांचे पाठबळ असले तरी घरातील जेष्ठ व्यक्ती, महिलाना त्यांची ही कृती पूर्ण नापसंत होती.  किंबहुना त्यांचा याला प्रखर विरोध होता.

अनेकदा डॉक्टर घोले यांना समजविण्याचा प्रयत्न जातीतील मान्यवरांनी केला. जातीतून बहिष्कृत करण्याची धमकी दिली. पण डॉक्टर घोले यांनी कुठल्याही अडचणीला भीक घातली नाही.

शेवटी ……. 

काही नतद्रष्ट नातेवाईक व्यक्तींनी … काचा कुटुन घातलेला लाडू बाहुलीस खावयास दिला… अश्राप पोर ती…काचांचा लाडू खाल्ल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन मृत्यूमुखी पडली… 

… बाहुलीचा मृत्यू झाला… स्त्री शिक्षणाचा हा पहिला ज्ञात बळी.

आपल्या लाडक्या लेकीच्या स्मरणार्थ डॉक्टर घोले यांनी बाहुलीचा हौद बांधला, आणि तो सर्व जातीधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला. त्याचा लोकार्पण सोहळा मातंग समाजातील थोर सुधारक दादा भुतकर यांच्या हस्ते भाऊबीजेच्या दिवशी ठेवल्याची नोंद आहे… पण  इतिहासात बाहुलीच्या जन्म मृत्युच्या तारखेची नोंद मात्र आढळत नाही.

काळ बदललाय. कालपटावरील आठवणी धूसर झाल्यात. डॉक्टर विश्राम घोले यांच्या नावाचा घोले रोड आता सतत वाहनांच्या वर्दळीने धावत पळत असतो. पूर्वी शांत निवांत असलेली बुधवार पेठ आज व्यापारी पेठ म्हणून गजबजून गेलीये. फरासखाना पोलीस चौकीसुध्दा आता कोपऱ्यात अंग मिटून बसलीये… आणि त्या फरासखाना पोलीस चौकीच्या एका कोपऱ्यात बाहुलीचा हौद…  इतिहासाचा मूक साक्षीदार….स्थितप्रज्ञाची वस्त्रे लेवून उभा आहे…

बाहुलीचा फोटो मला खूप शोध घेतल्यावर इतिहास संशोधक मंडळातील एका जीर्ण पुस्तकात साधारणपणे सहा वर्षापूर्वी सापडला…

… आज बाहुलीची आठवण … कारण आजचा तो दिवस …

तिच्या स्मरणार्थ बांधलेल्या हौदाचा आजच्या दिवशी लोकार्पण सोहळा झाला होता… स्त्री शिक्षणासाठी आत्माहुती देणाऱ्या बाहुलीच्या निरागस सुंदर स्मृतीस मनोभावे वंदन.

लेखक – अज्ञात

प्रस्तुती : सुश्री शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्त्री स्वतःच पूर्णरुप… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले  ?

☆ स्त्री स्वतःच पूर्णरुप… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

ज्या रात्री गौतम बुद्धांनी घर आणि पत्नीला सोडले, त्याच रात्री त्यांना पुत्रप्राप्ती झाली.

पुत्रप्राप्तीचा आनंद असतानाही पतीने घर सोडल्याची बातमी जेव्हा यशोधरेला समजली, तेव्हा ती उद्ध्वस्त झाली. पण तिने कुणाकडेही तक्रार केली नाही. जग ज्याच्याकडे अभिमानाने पाहील, अशा पद्धतीने मुलाला वाढविण्याचे तिने ठरवले. सोडून गेलेल्या पतीला विसरून तिने नवे आयुष्य सुरु करावे, असे तिला सर्वांनी सुचवले. दुसरे लग्न करण्याची गळ घातली. पण तिने त्यास नकार दिला.

आणि एका सुंदर सकाळी…

ते परत आले आणि तिच्या समोर उभे राहिले.

तिने शांतपणे त्यांना विचारले, “आता तुम्हाला लोक ‘बुद्ध’ म्हणून ओळखतात ना ?”

त्यांनीही तितक्याच शांतपणे उत्तर दिले, “होय. मी देखील तसे ऐकले आहे.”

तिने पुढे विचारले, “त्याचा अर्थ काय ?”

“जगण्याचा अर्थ कळला आहे, अशी व्यक्ती !” ते म्हणाले.

ती किंचितशी हसली आणि मग शांत बसली.

काही वेळाने ती म्हणाली, “आपण दोघेही काहीतरी नवे शिकलो आहोत, असे मला वाटते. तुम्ही जे शिकला आहात, त्यातून हे जग समृद्ध होईल;पण मी जे शिकले आहे, ते फारसे जगापुढे येणारच नाही.”

बुद्धांनी तिला विचारले, “तू काय धडा शिकलीस ?”

तिचे डोळे चमकले. डोळ्याच्या कडा पाणावल्या .

“तो धडा म्हणजे धैर्य! स्त्रीला उभी रहाण्यासाठी कुणाचीही गरज लागत नाही. तिचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व हे परिपूर्ण असते. ती न डगमगता कोणत्याही परिस्थितीतून खंबीरपणे मार्ग काढू शकते.”

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जरा विसावू या वळणावर….! ☆ श्री राहूल लाळे ☆

श्री राहूल लाळे

परिचय

शिक्षण –

  • B.E.:Electronics & telecommunications.
  • M.Sc.: Engineering Business Management.
  • इंग्लंडमधील  University of Warwik  विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त.

संप्रति –

  • भारत फोर्ज, पुणे येथे असोसिएटेड व्हाईस प्रेसिडेंट येथे कार्यरत.
  • भारत फोर्जच्या Machined component division चे  Head of Maintenance.
  • भारत फोर्ज तर्फे अनेक सेमिनार मध्ये प्रतिनिधित्व.
  • Association of Maintenance Management & Reliability forum चे क्रियाशील सभासद.
  • तसेच Corporate social responsibility अंतर्गत चालवल्या जाणा-या वृद्धाश्रमाशी निगडीत.
  • रोटेरियन, पुणे रोटरी क्लब.

अन्य – संगीत, गायन, वाचन, लेखन, काव्य, खेळ, पर्यटन, गिर्यारोहण अशा विविध कलांमध्ये रूची  आणि सहभाग .

?  विविधा ?

☆ जरा विसावू या वळणावर….! ☆ श्री राहूल लाळे ☆ 

लहानपणापासून…… रेडिओवर…”भले बुरे जे घडून गेले… विसरुनी जाऊ सारे क्षणभर”… हे गाणं अनेकदा कानावर पडत आलंय…!

जेव्हांही हे गाणं ऐकतो ..हळूहळू ते गाणं कानात झिरपतं आणि ऐकत रहावसं वाटतं…… अर्थपूर्ण कडवे…सुरेख चाल…! तेंव्हापासुन collection मधलं हे ही एक नितांत आवडीचं गाणं…!

खरंच आहे…आयुष्यात किती तरी वळणे येतात… कधी संकटातून.. वेदनेतून…कधी आनंदातून… ही वळणं येतातच येतात.. मग ते वळण कौटुंबिक स्तरातील असो अथवा नात्या समाजातलं, मित्रपरिवार असो… किंवा कामाच्या ऑफिसच्या ठिकाणी…! अगदी शाळा, कॉलेज, शैक्षणिक वयातलं सुद्धा… पुढचा प्रवास बदलणारा असतो… हेच वळण जे निर्विकार असतं.. एक वाट संपुन दुसरं सुरू होणार असल्याचं एक अंतराळ…अवकाश दाखवणारं असतं…! भलं बुरं.. घडामोडी घडून गेलेल्या असतात नि त्यामधला हा विसावा असतो …क्षणिक या वळणावर…!

खुप उन्हांनं बेजार झाल्यावर जसं पाऊस पडण्यापूर्वीचं आभाळ तयार होतं किंवा खूप पाऊस पडून कंटाळवाणं झाल्यावर पावसाने उघडीप दिल्यानंतर जसं स्वच्छ ऊन पडतं ना अगदी तसं..!

ह्याच वळणावर जरा आयुष्य संथ झालेलं असतं… मनाला वाटतं की घडामोडींना पूर्णविराम मिळालाय पण वास्तवात तो स्वल्पविराम असतो…… जसं एक वाक्य संपत असतं नी दुसरं वाक्य सुरू होण्याच्या बेतात असतं  तसंच जणू काही…!

पान उलटणार असतं नि माहिती नसतं पुढच्या पानावर काय ओळी लिहिल्यात ते…….! पुस्तक बंद करता येतं हो एकवेळ, पण आयुष्याचं पुस्तक शेवटच्या श्वासापर्यंत वाचावंचं लागतं…! नको असलेली पानं सोडून पुढं जाता येत नाही… अन हवी असलेली मागची पानं परत कधीतरी वाचताही येत नाहीत…! ती आपोआप पालटत असतात…! पलटवावीच लागतात…नवीन वाचावीच लागतात….! फक्त विसावा काय तेवढा आपला… बाकी वळणांचं नशिबावर सोपवुन आपण जीवन प्रवास करायचा…!

या वर्षाआधीच्या दोन वर्षांत आपण करोना – लॉक डाऊन – क्वारंटाईन यातून गेलो होतो. याच  कारणांमुळे अनेक दुःखद घटनांना सामोरेही गेलो  होतो.   आपल्या दैनंदिन आयुष्यात – कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक सर्वच क्षेत्रात अनेक अडचणीं ना सामोरे गेलो होतो  – आर्थिक दृष्टया फटका बसला होता.  पण या सरत्या वर्षानं  आपल्या सर्वांच्या जीवनप्रवासात  आलेल्या बिकट वाटेतही आशेचा किरण दाखवला. – आपल्या सर्वांची काळाने जरा जास्तंच  परीक्षा घेतली. पण त्यातही आपण तावून सुलाखून बाहेर आलो आहोत.

करोनाचं सावट आता परत येईल अशा बातम्या येत आहेत, पण  न्यू नॉर्मल का काय म्हणतात त्याची आपल्याला चांगलीच सवय झाली आहे – थोडीफार ती गेली असेल तर परत ती लावायला लागेल . अनेक बंधनं  कंटाळा न करता आपल्यावर घालून घेऊन संयमाने वागायला लागेल.

अशा वेळी रजनीगंधा चित्रपटातलं मधलं माझं एक आवडतं  गाणं मला आठवतं  – “कई  बार यूं भी देखा है – ये जो मन की सीमारेखा है – मन तोडने लगता है – अनजानी आंस के पीछे … मन दौडने  लगता है “

सिनेमात गाण्याचा संदर्भ वेगळा असला तरी –  रोज हेच व्हायला पाहिजे – असंच  व्हायला हवं या मर्यादा आपणच आपल्याला घालून घेतलेल्या असतात – अनेकदा इतरांनी आपल्याला घातलेल्या असतात – त्या अनेकदा आपण पाळतो – अनेकदा त्या तोडून अमर्याद जागून आनंद घेण्याचा प्रयत्न करतो –

आता या काळात सर्व प्रतिबंधात्मक उपाय ,काळजी घेत राहून आपण आपल्यावरच घालून ठेवलेल्या कामाच्या- काही वेळेच्या आणि  इतर काही मर्यादा ओलांडून आपण नक्कीच मोकळेपणाने   आनंद घेऊ शकतो हे मात्र कळाले.

लवकरच एक आयुष्यातलं अवघड पण लक्षात राहील असं वळण संपून नवीन सुरु होईल….

आणि असंख्य अडचणी – खडतर मार्ग येऊन गेले असले तरी  सर्वच काही निराशजनक नाहीये..

सूर्योदय -सूर्यास्त चालू आहे – ऑफिसची -व्यवसायाची दैनंदिन  व्यावहारिक -कौटुंबिक अगदी सामाजिक- सांस्कृतिकही कामं चालू आहेत. प्रेम-माया , कुटुंबासाठीचा वेळ, संवेदनशीलता कल्पकता, शिकण्याची प्रोसेस,गप्पा गोष्टी , लेखन-वाचन, नाती-गोती , भक्ती, व्यायाम-विश्रांती ,आनंदित राहणं याला लॉकडाऊन, स्लो डाऊन कोण करू शकतो? –

यावर्षी अगदी संक्रांती- पाडव्यापासून गणपती – दसरा -दिवाळी पर्यंत सगळे सण  जोशात साजरे झाले

स्लो डाऊन  कायमचं राहणारं नाही आणि  ” As long as life is there, there is a hope”  याची खात्री पटली.

 मरनेवालों के लिये मरा नहीं  जाता – 

उनकी यादे जरूर  रहती है –

जीवन का सफर चालू रहता है !

शेवटी

जीवन है चलने  का नाम !

चलते रहो सुबह-ओ-शाम !!

दोन पावलं मागं सरकलो होतो …आता चार पावलं परत पुढे आलोय – रोज पुढंच जायचंय- मोठा पल्ला गाठायचाय – नक्कीच गाठू.

बरंच  काही करायचंय – अनेक वाटा शोधायच्यात –

परिस्थिती नक्कीच बदलतीय – नवीन आव्हानं सामोरी येतील – – पुढच्या वेगवान प्रवासासाठी…

रिता जरी दिन वाटे

मन भरलेले ठेवू

धीर धरून सदा

आशा जागती ठेवू

भले बुरे ते विसरुनी जाऊ

धैर्य -आनंदाने पुढे जाऊ

येणाऱ्या नववर्ष २०२3च्या हार्दिक शुभेच्छा !!

© श्री राहुल लाळे

पुणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सरत्या वर्षाला निरोप… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ सरत्या वर्षाला निरोप… ☆ सौ राधिका भांडारकर

२०२२— वर्ष संपलं.

आज वर्षाचा शेवटचा दिवस.

उद्यापासून नवे वर्ष सुरू.

नवे पान, नवे पर्व, नवे संकल्प, येणाऱ्या नव्या वर्षाने निर्माण केलेली नवी आशा,  नवी स्वप्नं, उगवणारा नेहमीचाच सूर्यही जणू नवरंगांची किरणं घेऊन अवतरलाय, असा भास देणारा नव्या वर्षाचा पहिला दिवस!

मागे वळून पाहताना, जाणाऱ्या या वर्षाला निरोप देताना,  मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ आहे.  काळाच्या बारा पावलांची, कधी सरळ, कधी वळणावळणाची, कधी चढ उताराची, काट्यांची, फुलांची, दगड गोट्यांची, रंगीत व रंगहीन वाट, पुन्हा एकदा न्याहाळून पाहताना, सहज मनात येते.. वर्ष संपले म्हणजे नक्की काय झाले?

कालचक्र अव्याहत फिरत असते.  कालगणनेची गणितं मनुष्यनिर्मित आहेत.  बाकी खरं म्हणजे एक दिवस जाणारा आणि एक दिवस येणारा यापेक्षा नवे काय? फक्त काळाच्या बारा पावलांनंतर आज आणि उद्या मधल्या अंतरात काही क्षणांची विश्रांती, असं म्हणूया आपण. वर्षाच्या चार आकडी संख्येच्या एककामध्ये एकाने झालेली बेरीज. भिंतीवरच्या जुन्या कॅलेंडरला काढणे आणि त्या जागी नवे कोरे कॅलेंडर लटकवणे.  काय बदलतं?

कसे गेले हे वर्ष?

राजकीय, सामाजिक, वैयक्तिक बेरजा वजाबाक्या  यांचं गणित मांडताना उत्तराचा झालेला गोंधळ हाही काही वेगळा असतो का?कुठे मंगल तोरणे तर कुठे प्रिय जनांचा वियोग.कुठे बढती कुठे बेकारी.कुठे यश कुठे अपयश.वादळं,तुफान,भूकंप तर कधी हिरवळ..आंसु आणि हंसु..माणसाने वर्षे मोजली आणि नियती हसली..

त्याच त्याच राजकीय धुळवडी पाहिल्या. नवे भाष्य, नवी विधानं, आरोप प्रत्यारोप, धार्मिक अन्याय,भावनिक गळचेपी वगैरे वगैरे… सगळा खमंग गोंधळ कान टवकारुन आणि डोळे फाडून पाहिला— ऐकला.  काही आत गेले काही बाहेर आले. निवडणुका रंगल्या. कोणी हरले कोणी जिंकले.  गुलाल उधळले, ढोल वाजले. पण हे सारं पाहताना मनात एवढंच आलं यापेक्षा मागचं वर्ष चांगलं गेलं!

आंतरराष्ट्रीय परिषदा भरल्या. सगळेच गोलमाल.युद्धे चालूच आहेत.सत्तेपायी अमानुषता बोकाळलीय्.प्रचंड हिंसाचार.”थांबवा रे!मला शांती हवी आहे!” हे सूरच गोठलेत.

पर्यावरणाविषयी कळवळून मुद्दे मांडले गेले आणि प्रत्यक्ष मात्र आम्हाला डोंगर तोडणारे, झाडे तोडणारे हातच दिसले. वीज नाही, पाणी नाही म्हणत वणवणारी जनताच दिसली.  कव्हर पेजवर विकासाची गणित मांडणारे आलेख, हसणारे चेहरे, दाटलेली हिरवळ आणि आतल्या पानात खून, बलात्कार,अपघात, भूकबळी. मसल पाॅवर. असा रक्तबंबाळ माणूस.. पूर्ण विश्वातलाच.. पाहताना एवढंच वाटलं काय बदललं?

डाव्या हातातलं जाणारं वर्ष उजव्या हातातल्या येणाऱ्या नव्या कोऱ्या वर्षाला सांगते आहे,” बघ रे बाबा! तुला काही जमतय का? मी तर चाललो. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!”

जन्माला आलेलं हे दोन हजार तेवीस  नावाचं बाळ मात्र खूपच गोंडस भासतंय.  कुणा युगंधराचा अवतार असंच वाटतंय.  कायापालट घडवून आणेल हे बाळ! या क्षणी तरी  अनेक आशा, स्वप्नं,  सुख- शांती, समृद्धी घेउन अवतरले आहे , असं आतून जाणवत आहे. बघूया याच्याही कुंडलीतले नवग्रह योग!  विधात्यांनी मांडलेली २०२३ची ही पत्रिका अखिल विश्वासाठी फलदायी ठरो!इतकंच..

असावे सकारात्मक..

असावे आशादायी…

बाकी नम्रपणे वंदन—त्या कालचक्राला…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares