मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘नावात काय आहे?’ … व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘नावात काय आहे?’ … व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

‘नावात काय आहे?’ – हा प्रश्न तसा जगजाहीर.

नावात खरंच तसं काही नाही. ते नाव घेऊन तुम्ही कोणत्या गावात जन्म घेतला, ह्याला जास्त महत्त्व . तुम्हाला कोणते आईवडील लाभले, त्यावर बरंचसं अवलंबून. तुमचा बँकबँलन्स पण नजरेआड करता येणार नाही.

पण तरीही ह्या सगळ्या गोष्टी तराजूतल्या एका ताटलीतल्या. दुसरी ताटली तुमची स्वत:ची. ती आकाशाला शरण जाते की आपली माती वेगळीच म्हणत जमिनीकडे झुकते त्यावर सगळं अवलंबून.

लेखक – व. पु. काळे

संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावित्रीबाई फुले यांचे काव्यविश्व… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  विविधा ?

☆ सावित्रीबाई फुले यांचे काव्यविश्व… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆ 

आज ३ जानेवारी — क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना माझी ही काव्यरूपी वंदना —

वंदन सावित्रीबाईमातेला…

अज्ञानाच्या काळोखाला भेदून शिक्षणसूर्य तळपला

परंपरेच्या बेड्या तोडून नवसमाज तू निर्मिला…१

उठा बंधुंनो, अतिशुद्रांनो,– हाक घुमली खेडोपाडी

सनातनी किल्ल्यांचे बुरुज कोसळले अन क्रांतिपुष्प उमलले…२

समतेची ,मानवतेची, धैर्याची तू माऊली

लोकसेवेचे कंकण हाती, भारतवर्षाची तू सावली !

या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांचे काव्यविश्व माहिती करून घेऊ या. —

भारतीय समाजपरिवर्तनाच्या क्षितिजावरील एक तेजस्वीपणे तळपणारा तारा म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. भारतातील अग्रगण्य अशा पुणे येथील विद्यापीठास ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले.यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

मानवी स्वातंत्र्य,समता आणि ह्क्क, वैज्ञानिक दृष्टिकोन, तसेच स्त्रियांच्या सबलीकरणासाठी जीवनभर झटणाऱ्या, लोकभावनांचा  आदर करूनही धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य माणसाच्या शोषणाविरूध्द, अन्यायाविरुद्ध, दैववादाविरूध्द आवाज उठवणाऱ्या, मानवतेच्या उदात्त  तत्वांनी भारलेल्या आणि आवाज दडपल्या गेलेल्या, समाजाच्या तळाशी असलेल्या उपेक्षितांच्या जीवनात प्रबोधनाने जागृतीची ज्योत जागवणाऱ्या एक

समाजक्रांतिकारक !—-अशा अनेक पैलूंनी सावित्रीबाई ज्ञात आहेत. समाजासाठी आवश्यक पण अनेकदा न आवडणारे परिवर्तन करणाऱ्या समाजकार्याची त्यांची जातकुळी होती. त्यामुळे त्यांच्या कार्याला पाहिजे तेवढी प्रसिद्धी त्यावेळी मिळाली नाही.

सावित्रीबाई फुले या एक श्रेष्ठ साहित्यिक होत्या; हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील फारसा उजेडात न आलेला पैलू आहे. पुढील बाबींतून त्यांचे साहित्य क्षेत्रातील श्रेष्ठत्व स्पष्ट होते —

१. त्याकाळी अनेक समाजबंधने, कौटुंबिक रितीरिवाज आणि कुटुंबातील कामं यामुळे स्त्रियांमध्ये शिक्षण कमीच होतं. सावित्रीबाईही विवाहापर्यंत शिक्षणापासून दूर होत्या. मात्र लग्नानंतर पती जोतीराव फुले यांच्या सहाय्याने चिकाटी, जिद्द आणि तळमळीने त्या शिकल्या. आणि पुढे त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात जी भरारी घेतली त्यामुळे त्या आदराला पात्र झाल्या.

२. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘ काव्यफुले ‘ १८५४ मध्ये प्रकाशित झाला होता.

३. सावित्रीबाई आणि जोतीराव यांचे कौटुंबिक जीवन वादळी होते. समाजातील उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी,  त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी, त्यात अडसर असलेल्या धार्मिक शोषणाविरुद्ध ते आयुष्यभर लढले.आजच्या काळातही विस्मयकारक ठरेल अशा क्रांतिकारी जीवनाचा त्यांनी अंगीकार केला होता. (अर्थात त्याची किंमतही त्यांना मोजावी लागली होती).तरीही अशा अतिशय धावपळीच्या जीवनातही सावित्रीबाईंनी आपल्यातल्या लेखिकेला, कवयित्रीला फुलू दिले, हे त्यांचे असामान्यत्व होते.

४. ‘साहित्य हे समाजपरिवर्तनासाठी असावे ‘ या भूमिकेतून सावित्रीबाईंनी साहित्यनिर्मिती केली. सावित्रीबाईंनी समाजव्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी, समाजातील  शूद्रातिशूद्र यांच्या बरोबरीनेच अज्ञान आणि अन्यायाचे बळी ठरलेल्या, शिक्षणापासून वंचित राहिल्याने आपल्या दैन्याचीही जाणिव नसलेल्या, हतबल होऊन…हे सारे आपल्या नशिबाचे भोग आहेत म्हणून जगणाऱ्या, समाजातील साऱ्याच उपेक्षितांच्या जीवनात आत्मविश्वास जागविण्यासाठी अनेक पध्दतींचा उपयोग केला.लोकशिक्षण ही त्यापैकी एक महत्वपूर्ण पध्दत. आशयपूर्ण आणि लोकजीवनाचा ठाव घेऊन वास्तव चित्रण करणाऱ्या अनेक प्रभावी कवितांतून सावित्रीबाईंनी हे कार्य केले. म्हणूनच त्या कवितांचे मोल अधिक आहे— काव्य, गद्य, पत्रे …या साहित्याच्या क्षेत्रांत त्यांनी मुक्त संचार केला. साहित्य हे समाजशिक्षण आणि समाजपरिवर्तनाचे हत्यार आहे, या भूमिकेतून त्यांनी साहित्य विकासित केले; त्याचा प्रसार केला. सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न पाहणाऱ्या सावित्रीबाईंच्या  कवितेतील सामाजिक आशय धारदार होता. त्यातून समाजबदलाची कळकळ दिसून येते.

आत्तापर्यंत त्यांचे दोन काव्यसंग्रह उपलब्ध आहेत- (१) काव्यफुले. (२) बावन्नकशी सुबोध रत्नाकर.

काव्यफुले या काव्यसंग्रहात एकूण एक्केचाळीस कविता आहेत. यातील ‘श्रेष्ठ धन’ या कवितेतून शिक्षणाचे महत्त्व सांगताना त्या म्हणतात,

विद्या हे श्रेष्ठ धन आहे रे,श्रेष्ठ साऱ्या धनाहून ।

तिचा साठा जयापाशी, ज्ञानी तो मानती जन ।।

— शिक्षणाने युगायुगांची अज्ञानाची आणि दारिद्र्याची गुलामगिरी तोडून टाकण्याचे आवाहन करताना त्या म्हणतात,

“अज्ञानाची दारिद्र्याची गुलामगिरी ही तोडू चला

युगायुगाचे जीवन आपले फेकून देऊ चला चला”.

त्यांचा ‘ बावन्नकशी सुबोध रत्नाकर ‘ हा काव्यसंग्रह जोतीरावांच्या निधनानंतर (१८९२ मध्ये) प्रकाशित झाला होता.

त्यांचे हे सर्व साहित्य आवर्जून वाचावे असेच आहे.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माफीनामा… भाग – 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माफीनामा… भाग – 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(आज निसर्गाने पुन्हा हे नागडं…. म्हातारं पोर माझ्या ओंजळीत घातलं होतं…. मी पुन्हा बाप झालो…. पुन्हा बाप झालो यार….!!!) इथून पुढे —

शरमलेल्या बाबांना मी म्हणालो, “ बाबा लाजू नका, आपण आता मस्त आंघोळ करू….” 

तेवढ्यातूनही बाबा म्हणाले, “ माझ्या लोकांनी मला नागडं करून जेवढी लाज आणली, त्यापेक्षा ही लाज काहीच नाही बाळा …”

यानंतर बाजूच्या दुकानदारांकडून बादली, पाणी आणि मग आणून, फुटपाथवर सूर्यानं जिथं ऊन दिलं होतं, तिथं या उन्हामध्ये बाबांना बसवलं आणि साबणाने त्यांना आंघोळ घातली….डोक्यावर प्रत्येक वेळी पाण्याचा तांब्या मी उपडा केला की ते म्हणायचे ….”शंभो”…! — इथे मला जाणवलं, की मी कुण्या माणसाला आंघोळ घालत नाहीये…. तर मी अभिषेक करतोय…. !!!

निर्वस्त्र बसलेल्या त्या बाबांचा पाय मी धुवायला घेतला….  आणि सहज त्या निर्वस्त्र रूपातल्या बाबांकडे माझं लक्ष गेलं…. त्या क्षणी  मला वाटलं… आता मला कोणत्याही मंदिरात जाऊन साष्टांग नमस्कार घालण्याची गरज नाही… माझ्या हातात साक्षात पाय आहेत ! 

खरंतर आठ महिने अंघोळ नसताना, शौच वगैरे गोष्टी कपड्यातच घडत असल्यामुळे त्यांच्या अंगाला एक विचित्र असा वास येत होता…. खरंतर त्यांच्या आसपास, चार फुटाच्या परिसरात जाणेसुद्धा अतिशय क्लेशदायक होतं… 

याची जाणीव त्या बाबांना सुद्धा असावी…. प्रत्येक वेळी ते म्हणत होते, “ माझ्या जवळ येऊ नकोस, मी अत्यंत घाणेरडा झालो आहे… I am infected…!!!”

मी मनात हसत त्यांना म्हणालो, “ जाऊ दे बाबा , आमच्यापैकी सर्वच जण असे आहेत, तुम्ही ते कबूल करत आहात, आम्ही ते कबूल करत नाही, इतकाच काय तो फरक ! “

कडक टॉवेलने अंग पुसून, बाबांना पांढराशुभ्र सदरा आणि लेंगा घातला. मघाचे बाबा ते हेच काय ? असे वाटावे इतका कायापालट झाला होता. यानंतर कडेवर घेऊन मी त्यांना ॲम्बुलन्समधील स्ट्रेचरवर झोपवलं…. एका मिनिटात ते गाढ झोपी गेले…. लहानपणी सोहमला मी असाच अंघोळ घालून, कडेवर फिरवत कॉट वर ठेवायचो आणि तो गाढ झोपी जायचा…. !

का कोण जाणे, परंतु या बाबांमध्ये मला माझा मुलगा दिसत होता…. ! 

” एकरूप ” होणं हा भाव असेल, तर ” एकजीव ” होणं ही भक्ती आहे असं मला वाटतं… ! 

नकळतपणे मी या बाबांशी एकरूप नव्हे…. एकजीव झालो होतो ! 

मी हळूच झोपलेल्या बाबांच्या अंगावर चादर टाकली…. 

याचवेळी पलीकडच्या मशिदीतून आवाज आला…. कानावर अजान आली…. “अल्लाह हु अकबर”

— चला, बाबांच्या अंगावर  टाकलेली माझी चादर मंजूर झाली तर….! 

सोमवार १९ डिसेंबर रोजी या बाबांना आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे. 

बाबांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून मी परत निघालो, बाबा आता प्रसन्न हसत होते. जाताना मला म्हणाले, “ बाळा इतकं केलंस. आता आणखी एक शेवटचं कर… माझ्या घरातल्या लोकांशी संपर्क कर आणि त्यांना माझा निरोप दे, म्हणावं…. मी खुशाल आणि आनंदात आहे. माझ्या अडचणीच्या काळात तुम्ही जे वागलात, त्यात तुमचीही काहीतरी अडचण असेल, फक्त त्यावेळी मला ती समजली नाही इतकंच…. हरकत नाही, माझ्या मनात तुमच्याबद्दल कोणतीही अढी नाही. मी तुम्हाला माफ केलं आहे… त्यांना सांग, मी सर्वांना खरोखर मनापासून माफ केलं आहे “. 

— खूप मोठ्या मुश्किलीने शून्यात पहात नमस्कार करण्यासाठी त्यांनी हात जोडले….  नजरेच्या या शून्यात त्यांना त्यांच्या घरातले सर्वजण दिसत असावेत…

इतका वेळ शांत असणारा मी… त्यांची ही वाक्ये ऐकून मात्र चिडलो… रागाच्या भरात ओरडून, मी त्यांना म्हणालो,

 “ मी त्या तुमच्या लोकांशी कोणताही संपर्क करणार नाही…. तुमचा माफीनामा पोचवणार नाही… ज्यांनी तुम्हाला इतका त्रास दिला त्या लोकांची थोबाडं मला पाहायची नाहीत… मी काय रिकामा बसलो नाही तुमचा माफीनामा पोचवायला, बाकीची अजून शंभर कामं आहेत मला….”

माझा तोल सुटला होता… म्हाताऱ्या या माणसाला त्यांच्याच घरातल्या सर्वांनी इतकं अडचणीत टाकलं होतं ,  त्याचा राग मला येत होता आणि हे बाबा त्यांना माफ करायला निघाले होते, त्याचा दुप्पट राग मला आला होता … 

 यानंतर, तितक्याच शांतपणे हे बाबा मला म्हणाले, “ अरे बाळा चिडू नकोस…. माझ्या घरातल्या लोकांना मी प्रेम, माया, आनंद, सुख, समाधान, दया, क्षमा, शांती या पुस्तकातल्या सर्व शब्दांचा अर्थ आयुष्यभर समजावण्याचा प्रयत्न केला…. परंतु त्यांना हे अर्थ संपूर्ण आयुष्यात कधीही समजले नाहीत… या आजारपणात मी टिकेन की नाही याची खात्री तुलाही नाही आणि मलाही नाही… जिवंत असताना त्यांना कोणत्याही शब्दाचा अर्थ शिकवू शकलो नाही … आता मरताना  ” माफी ” या शब्दाचा अर्थ तरी मला त्यांना शिकवू दे बाळा….!!!  प्लीज बाळा …. प्लीज हा निरोप त्यांना दे … आयुष्याच्या उताराला, माफी हा शब्द तरी त्यांना शिकण्याची संधी देऊ आपण…! नाही म्हणू नकोस बाळा. माझा “माफीनामा” त्यांना पोचव…. “. 

आज मला पुन्हा एकदा पटलं…. सतारीवर दगड जरी मारला तरी तिच्यातून मधुर झंकारच बाहेर येतात…!!!

बाबांनी जे विचार मांडले, त्यात माझ्या खुजेपणाची मला जाणीव झाली…! डॉक्टर झालो …खूप शिकलो … सुशिक्षित सुद्धा झालो, परंतू या सर्व प्रवासात सुसंस्कृतपणा शिकायचं माझ्याकडून सुद्धा राहूनच गेलं यार….! 

रस्त्यावरच्या बाबांनी आज मला “ माफी “  या शब्दाचा अर्थ त्यांच्या वागण्यातून समजावून सांगितला…! 

बाबांनी पुन्हा हात जोडण्याचा प्रयत्न केला…. काही केल्या नमस्कारासाठी हात जुळत नव्हते…. मी ते दोन्ही हात माझ्या हाताने जुळवले…!

जुळवलेल्या या दोन्ही हातांना कपाळाशी लावून मी फक्त इतकंच म्हणालो, “ बाबा मला माफ करा…!!! “

माफी …. क्षमा ….  या पुस्तकात वाचलेल्या शब्दांचा अर्थ मी आज खऱ्या अर्थाने हृदयात घेऊन सुसंस्कृत झालो होतो…. बाबा माझा प्रणाम स्वीकार करा !!!

— समाप्त — 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ येळ अमावस्या—उत्सव हुरड्याचा – सुश्री नीला महाबळ गोडबोले  ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ येळ अमावस्या—उत्सव हुरड्याचा – सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

दिवाळीची धांदल मागे पडते.  हैराण करणाऱ्या उकाड्याला मागे सारून थंडीच्या गुलाबी पावलांनी सोलापुरात प्रवेश केलेला असतो….. डिसेंबरच्या धप्प्यानं  वर्षभर कपाटात नाहीतर माळ्यावर लपून बसलेले स्वेटर्स, मफलर, कानटोप्या बाहेर पडतात…

…. अन् त्यांच्याबरोबरच हृदयाच्या चोरकप्प्यात लपून राहिलेल्या  आठवणींच्या रेशमी लडीही  उलगडतात…

या सोनेरी आठवणी असतात धमाल हुरडापार्ट्यांच्या…… 

…. ” यंदा पाऊस आजिबात झाला नाही ” किंवा  ” अति पावसानं  ज्वारी आडवी झाली “…असा सोलापुरातल्या शेतकरीदादांनी कितीही आरडाओरडा  केला, तरी  निसर्ग आपल्या कर्तव्याला चुकत नाही….. सोलापुरातल्या काळ्याशार मातीत ज्वारीचं पीक डौलानं डोलू लागतं नि सोलापूरकरांना  हुरडापार्ट्यांची स्वप्नं पडू लागतात…

हुरडा म्हणजे  हिरवेगार,कोवळे ज्वारीचे दाणे….. ज्वारीनं  मोत्याचं रूप घेण्याआधीची  हिरवीकंच बाल्यावस्था म्हणजे हुरडा….. 

सहकुटुंब,सहपरिवार हुरड्यासाठी शेतात जाणं, निळ्याशार आकाशाखालील हिरव्यागार शेतात पाखरांसारखं बागडणं, किलबिलाट करत हुरड्यावर ताव मारणं नि  ही  मंतरलेली आठवण आयुष्यभर काळजात जपून ठेवणं …

… हा सोलापुरकरांसाठी केवळ एक आनंददायी अनुभव नसतो, तर तो असतो  एक समारंभ…  हिरव्यागार निसर्गाचा उत्सव… 

सोलापूरच्या संस्कृतीचा हा आनंदबिंदू…. या आनंदोत्सवाची सुरुवात ” येळ अमावस्या ”  या शुभदिनी होते…

मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस असतो ” येळ अमावस्येचा ” …. सोलापूरकरांची अन्नदायिनी “ज्वारी”

शेतांतून तरारून आलेली असते…. रसना  हुरड्यासाठी आसुसलेली असते….. पण या अन्नदेची पूजा केल्याशिवाय, ,परमतत्त्वाला नैवेद्य दाखवल्याविना  एकही दाणा तोंडात घालणं ही त्या शक्तीशी प्रतारणा…. म्हणूनच येळ अमावस्येच्या मुहूर्तावर हा नैवेद्याचा विधी संपन्न होतो..

” येळ अमावस्या ” हा  सोलापूरचा सण…. या दिवशी  कॉलेजे, शाळा, ऑफिसे ओस पडलेली असतात..

मायबाप सरकारने सुट्टी दिलेली नसली तरी सोलापूरकरांसाठी ती स्वयंघोषित असते…

या दिवशी प्रत्येक सोलापूरवासीयाला स्वत:च्या नाहीतर दुसऱ्याच्या शेतात जायचे असते… हा दिवस हुकला तर सारे वर्ष निष्फळ ठरते.

येळ अमावस्येच्या आदले दिवशीपासूनच कृषक कुटुंबातील गृहिणींची लगबग सुरू होते.. नातेवाईक,स्नेह्यांना  आमंत्रणे जातात..

हुरड्यासाठी लागणारे राजा-राणीही बनवले जातात… राजा-राणी म्हणजे काय समजलं नाही नं ?…..

हुरड्याबरोबर खाल्ल्या जाणाऱ्या कोरड्या तिखटगोड पदार्थांसाठी ” राजाराणी ” हा  प्रेमाचा  शब्द..

बारीक केलेला गूळ, ओल्या खोबर्ऱ्याचे तुकडे, साखरखोबरं, खारकांचे तुकडे हे गोड घास नाजूक राणीसाठी  नि खोबरं-लसणाची , शेंगादाण्याची, जवस-कारळ्याची चटणी, खारे किंवा मसाल्याचे शेंगदाणे, लसूणपातीचं काळं मीठ हे झणझणीत  पदार्थ रांगड्या राजासाठी…!! राजाराणी हे हुरड्याचे सवंगडी…

येळ अमावस्येदिवशी अगदी पहाटे उठून महिलावर्ग कामाला लागतो… शेंगाकूट, लसूण, कोथिंबीर, सोलापुरी काळा मसाला, लवंगपूड,  याचं मिश्रण भरून झणझणीत वांग्याची भाजी बनते…. 

शेंगाकूट, तीळ, गूळ, वेलची यांचं भरपूर सारण  भरून केलेल्या खमंग  शेंगापोळ्यांची चळत लागते…. 

तगडावर अतिशय पातळ-पातळ पुरणपोळ्या बनतात…. 

शेंगापोळ्या नि पुरण यासाठी चुलीवर घरच्या लोण्याचं  खमंग तूप कढवलं जातं….. 

हळद,मीठ  घातलेल्या नि तिळाने सजलेल्या  बाजरीच्या पातळ पातळ भाक-या  जन्म घेतात….. 

…. पण येळ अमावस्येचे मुख्य कलाकार असतात असतात  ” बाजरीचे उंडे नि भज्जे किंवा गरगट्टा “… 

बाजरीचं पीठ साध्या किंवा उकळत्या पाण्यात घालून त्यात मीठ, हळद ( तीळ, लसूण असा मसालाही घालू शकता..)  घालून भाकरीच्या पिठासारखं मळून त्याचे उंडे किंवा मुटके बनवले जातात. ते मोदकासारखे वाफवले जातात..हेच बाजरीचे उंडे….. या उंड्यांबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी बनवला जातो गरगट्टा किंवा भज्जे..

या दिवसांत भाज्या ,फळं, कोवळी पिकं तरारून आलेली असतात..

निसर्गानं दिलेल्या आहेराची निसर्गाला रिटर्न गिफ्ट द्यायला नको का? त्यासाठी हा ” भज्जे ” चा प्रपंच…

ताज्या-ताज्या, कोवळ्या पालक, चुका, मेथी,अंबाडी, हरबरा, चाकवत,चंदनबटवा या पालेभाज्या,

गाजर, घेवडा, वांगी, टोमॅटो, मटार ,ओले हरबरे, घेवड्याच्या बिया, शेंगादाणे या फळभाज्या, नि बोरं,पेरु यासांरखी फळे कुकरमधे उकडून ती एकजीव केली की त्यात तूर, मूग, मसूर, हरबरा अशा डाळी शिजवून घातल्या जातात. त्यावर  लसूण, मिरची, जिरे-मोहरीची चरचरीत फोडणी नि मीठ  घातलं की जबरदस्त चवीचा नि अतिशय पौष्टिक “गरगट्टा” तयार होतो…. हा गरगट्टा या मोसमात सात-आठवेळा खाल्ला की वर्षभराच्या जीवनसत्त्वांची नि क्षारांची बेगमी होते…

भाकरी म्हटली की ठेचा हवाच…. तोही बनतो..

घरच्या म्हशीच्या दुधाचं घट्ट दही आदले दिवशी विरजलेलं असतं… त्यातलं  डब्यात भरलं जातं.

नि उरलेल्या दह्याचं आलं, मिरची ,कोथिंबीर घालून खुमासदार ताक बनतं नि दुधाच्या बरण्यांत जाऊन बसतं …शेताकडे जाण्यासाठी…

हा  सारा जामानिमा होईपर्यंत सकाळचे  दहा वाजतात…शेताच्या ओढीने आमंत्रित पाहुणे हजर झालेले असतात…

गाड्या शेताकडे निघतात…. शेतातली सुबकशी पायवाट मोठ्या पिंपळ नाहीतर वटवृक्षाच्या पारापाशी  नेते..

पारावर  सतरंज्या अथरलेल्या असतात..

थोड्याशा विसाव्यानंतर देखण्या शेताचं दर्शन घेतलं जातं.

ताजा ऊस दातांनी सोलून चघळला जातो.

हिरवागार डहाळा म्हणजे ओला हरबरा हिशेब न ठेवता रिचवला जातो.

डायरेक्ट झाडावरून पोटात जाणारे पेरू,बोरं पुन्हा बालपणाची सफर घडवतात.

खोल विहीरीचं पाणी गूढतेचा अनुभव देतं .

निसर्गाच्या प्रत्ययकारी नि विशाल रुपांनी विभ्रमित होऊन वाचा बंद होते..

परत पारावर येईपर्यंत शेतातील भूमीपुत्राने  ज्वारीची पाच-सात  कणसं ताट्यांसहीत आणून काळ्या भूमातेवर उभी रचून ठेवलेली  असतात …. या कणसांच्या रुपानं निसर्गदेवता आज इथे अवतरलेली असते.

एरवी शहरात सलवार कमीज किंवा जीन कुर्तीत वावरणारी शेताची मालकीणबाई आज जरीच्या किंवा इरकली हिरव्या साडीत असते…. शेतातलं हे  हिरवं सौंदर्य पाहून शेताचा धनी हरकून गेलेला असतो….. नकळत त्याचे हात परमेश्वराला जोडले जातात..

डोक्यावर पदर घेतलेली लक्ष्मी नि स्वत:च्याच भाग्याचा हेवा करणारा नारायण जोडीनं शेतातील धनाची म्हणजे पिकांची साग्रसंगीत पूजा करतात…. घरात रांधून आणलेल्या सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवला जातो..

” सुजलाम-सुफलाम” असा आशीर्वाद निसर्गाकडून घेऊन  अभ्यागतांच्या खातीरदारीची तयारी सुरू होते..

आगट्या पेटतात …आग्रह करकरून आगटीत भाजलेला कोवळा हुरडा खायला घातला जातो. हुरड्यानंतरची तहान मस्त मसाला ताकाने शमवली जाते.

हुरडा महोत्सवाचा हा शुभारंभ असतो. जडावलेलं पोटं डोळ्यांना बंद होण्याचा आदेश देतं.. पारावरच विकेटी पडतात…. ” थोडी भाकरी घ्या खाऊन “… नाजूक आदेश येतो….

भाकरी-भाजी,उंडे,पुरणपोळ्या ,शेंगापोळ्या  दुधा -तुपासोबत रिचवल्या जातात…

अन्नदात्याला साहजिकच “सुखी भव ” असा पाहुण्यांकडून आशीर्वाद मिळतो..

पाहुणे  समाधानाने आपापल्या घरी परततात..

पुढचे दोन महिने सारं सोलापूर या  हुरड्याच्या  हिरव्या रंगात रंगून जातं……

लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले. 

सोलापूर

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Priority माणसांची ☆ प्रस्तुति – सुश्री दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ Priority माणसांची ☆ प्रस्तुति – सुश्री दीप्ती गौतम ☆

“मला नाही जमणार ग ह्यावेळी,”

… हे वाक्य आपण स्त्रिया किती वेळा निरनिराळ्या ठिकाणी वापरतो. काही वेळा ह्या वाक्यामागे खरं कारण असतं, तर काही वेळा ती गोष्ट टाळायची म्हणून घेतलेला हा stance असतो. असं का होतं, ह्याचा विचार केला तर लक्षात येते की आपल्या priorities ठरलेल्या असतात, त्यात जास्त फेरफार आपल्याला झेपत नाही.

माझी आई नेहेमी सांगायची की “बाकी कशाला सवड काढ, नाही तर काढू नकोस, पण आपल्या सणावारांना, देवासमोर निवांत दिवा लावण्यासाठी, मुलांच्या शाळेतील शिक्षक पालक मीटिंगला, कुटुंबीयांच्या वाढदिवसाला, स्वतःच्या तब्येतीसाठी, मैत्रिणींबरोबर मज्जा करण्यासाठी नक्की वेळ काढ.”

मला काही सगळं पटायचं नाही. मी म्हणायचे, “आई कामासाठी वेळ नको का?”
तर आई हसून सांगायची, “महिन्याचा पगार मिळेल, बढती मिळेल म्हणून तू रोजच अगदी नेटाने काम करतेस ग. पण नात्यांचे काय? आपल्या सांस्कृतिक विचारांचे काय? त्यासाठी वेळ काढावाच लागेल. नाहीतर आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा एकटी घरात असशील, तेव्हा कोण असणार आहे?”

नातेवाईकांकडे कधी गेली नाहीस, मैत्रिणींना कधी घरी बोलावले नाहीस, स्वतः गेली नाहीस, मग तुझ्या उतरत्या काळात त्या येतील, अशी अपेक्षा करु नकोस! आपण माणसे इतकी स्वार्थी असतो, की काही न देता आपल्याला समोरच्याकडून मात्र भरपूर अपेक्षा असतात आणि अपेक्षाभंग झाला तर वाईटही वाटते.”

आईला म्हटलं, “तू एवढी psychology कधी शिकलीस ग?” … ती हसली आणि म्हणाली, “आयुष्य जेवढं शिकवतं, तेवढं तुमच्या एमबीए मध्ये पण नाही शिकवत.. तेव्हा माणसांना आधी priority दे तरच आयुष्यात सुखी आणि समाधानी राहशील.”

संग्राहिका : सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – विधायक कार्य ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 😅 विधायक कार्य ! 🤠 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“गुडमॉर्निंग पंत”

“नमस्कार, नमस्कार. पण आज तुझ्या आवाजात उत्साह वाटत नाही.”

“पंत कसा असणार उत्साह ? बारा तेरा दिवस सारखं घरात बसून कंटाळणार नाही का माणूस ?”

“तू म्हणतोयस ते बरोबरच  आहे. अरे सारखं सारखं घरात बसून, मला पण मी US ला मुलाच्या घरी तर नाही ना, असं वाटायला लागलंय हल्ली ! पण मग तुझ्या घरातल्या कामांचे काय, सगळी कामं संपली की काय ?”

“पंत आता साऱ्या कामांची एवढी सवय झाल्ये की… “

“दोन तीन तासात तू मोकळा होत असशील ना रोज ? “

“हो ना, मग करायच काय हा प्रश्न आ वासून उभा राहतो.”

“अरे मग बायको बरोबर गप्पा मारायच्या !”

“आता लग्नाला दोन वर्ष होऊन गेली, सगळ्या गप्पा बिप्पा मारून संपल्या.”

“काय सांगतोस काय, दोन वर्षात गप्पा संपंल्या ? पण आमच्या लग्नाला चाळीस वर्ष झाली तरी आमच्या गप्पा अजून काही संपत नाहीत !”

“काय सांगता काय पंत, तुमच्या लग्नाला चाळीस वर्ष झाली तरी तुमच्या गप्पा अजून…. “

“अरे म्हणजे ही गप्पा मारते आणि मी गप्प राहून फक्त हुंकार देत त्या ऐकतो एव्हढेच ! ते सोड, गप्पा नाही तर नाही बायको बरोबर पत्ते बित्ते तरी…… “

“नाही पंत, ती पुण्याची असल्यामुळे तिला पत्त्यांचा तिटकाराच आहे, लहानपणा पासून.”

“मग काही वाचन…… “

“अहो पंत, वाचून वाचून वाचणार तरी किती आणि काय काय ? आणि दुसरं असं की वाचायला सुरवात केली,  की झोप अनावर होते आणि झोपून उठलं की पहिली पाच सात मिनिट कळतच नाही, की आपण दुपारचे झोपून उठतोय का रात्रीचे ?”

“पण मग टीव्ही आहे ना बघायला ?”

“अहो पंत त्यावर पण हल्ली सगळे जुने जुने एपिसोड दाखवतायत, काही ‘राम’ नाही उरला आता त्यात !”

“मग टीव्ही वरच्या बातम्या….”

“त्या करोना व्हायरस घालवायला चांगल्या आहेत !”

“म्हणजे, मी नाही समजलो.”

“पंत, म्हणजे त्या बातम्या करोना व्हायरसला दाखवल्या ना, तर तो त्या बघून स्वतःहून पळून जाईल चीनला !”

“काही तरीच असतं तुझ बोलण !  आता मला सांग, आज काय काम काढलेस माझ्याकडे ?”

“पंत, माझ्याप्रमाणेच आपल्या चाळीतले सगळे रहिवाशी बोअर झालेत आणि…. “

“चाळ कमिटीचा अध्यक्ष या नात्याने ते तुला मोबाईलवरून सारखे फोन करून यावर काहीतरी उपाय करा, टाइम पास कसा होईल ते सांगा, असे सतवत असतात, बरोबर ?”

“कस अगदी बरोबर ओळखत पंत !”

“अरे चाळीस वर्षांचा तजुरबा आहे मला चाळकऱ्यांचा, सगळ्यांची नस अन नस ओळखून आहे म्हटलं मी !”

“हो पंत, आपल्या चाळीतील तुम्हीच सर्वात जुने रहिवासी, त्यामुळे तुम्हाला… “

“मस्का बाजी पुरे, तुझा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय आणि त्यावर माझ्याकडे उपाय सुद्धा आहे !”

“सांगा सांगा पंत, तुमचा उपाय ऐकायला मी अगदी आतुर झालोय !”

“सांगतो, सांगतो, जरा धीर धरशील की नाही !”

“हो पंत, पण एक प्रॉब्लेम… “

“आता कसला प्रॉब्लेम?”

“अहो सध्या सगळेच कोरोनाच्या संकटामुळे आपापल्या घरी अडकलेत आणि एकमेकांना भेटू…”

“शकत नाहीत, माहित्ये मला.

खरच दुर्भाग्याची गोष्ट आहे ना ?”

“यात कसली दुर्भाग्याची गोष्ट, साऱ्या जगावरच संकट ओढवलं आहे त्याला… “

“अरे त्या बद्दल नाही बोलत मी.”

“मग कशा बद्दल बोलताय पंत ? “

“आता हेच बघ ना, गेल्या बारा तेरा दिवसात मुंबईची हवा, कसलेच पोल्युशन नसल्या मुळे कधी नव्हे इतकी शुद्ध झाली आहे आणि त्याचा आनंद घ्यायचे लोकांच्या नशिबातच नाही. उलट लोकांना मास्क लावून फिरायची पाळी आली आहे.”

“हो ना पंत, पण माझी बायको म्हणते मी अजिबात मास्क नाही लावणार.”

“का, ती पुण्याची आहे म्हणून का ?”

“म्हणजे ?”

“अरे जसा पूर्वी पुणेकरांचा हेल्मेटला विरोध होता तसा मला वाटलं मास्कला पण आहे की काय, म्हणून मी विचारलं.”

“तस नाही पंत, त्या मागे तीच वेगळेच लॉजिक आहे.”

“कसलं लॉजिक ?”

“ती म्हणते ‘मी मास्क लावला तर, मी रागावून गाल फुगवून बसल्ये हे तुम्हाला कस काय कळणार ?”

“खरच कठीण आहे रे तुझ !”

“ते जाऊ दे पंत, आता दोन वर्षात मला सवय झाल्ये त्याची.  पण आधी मला सांगा तुमच्याकडे टाइमपास साठी काय… “

“अरे नेहमीच टाइमपास न करता, सध्याच्या परिस्तिथीत थोडे विधायक कार्य पण करायला शिका ! एकदा का या संकटातून सुटका झाली की मग जन्मभर टाइमपासच करायचा आहे.”

“म्हणजे, मी नाही समजलो?”

“सांगतो, आता आपल्या चाळीत एका मजल्यावर पंधरा बिऱ्हाड आणि चार मजले मिळून साठ, बरोबर ?”

“बरोबर !”

“तर तू चाळ कमिटीचा अध्यक्ष या नात्याने सगळ्यांना सांग, येत्या रविवारी सगळ्यांनी घरटी दहा दहा पोळ्या आणि त्यांना पुरेल इतकी कुठलीही भाजी भरून ते डबे चाळ

कमिटीच्या ऑफिस मधे आणून द्यावेत.”

“आणि ?”

“तू आज एक काम करायचस,  आपल्या के ई एम हॉस्पिटल मधे जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना भेटून सांगायचं,  की येत्या रविवारी आमच्या अहमद सेलर चाळी तर्फे,  आम्ही जेवणाचे साठ डबे पाठवणार आहोत. ते आपल्या हॉस्पिटल मधे कार्यरत असणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्ड बॉईजना वाटायची व्यवस्था करा.”

“काय झकास आयडिया दिलीत पंत, त्या निमित्ताने सगळ्यांचा वेळ पण जाईल आणि काहीतरी विधायक कार्य हातून घडल्याचा आनंद पण मिळेल ! धन्यवाद पंत !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

०३-०२-२०२३

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 50 – स्वामीजी आणि मॅडम कॅल्व्हे ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 50 – स्वामीजी आणि मॅडम कॅल्व्हे ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

अमेरिका आणि युरोप खंडात प्रचंड लोकप्रियता मिळवलेली रंगभूमीवरील गायिका मॅडम एम्मा कॅल्व्हे एका मेट्रोपोलियन ऑपेरा कंपनीबरोबर युरोपातून अमेरिकेत आलेली. तिची रंगभूमीवरची भूमिका, गायन सर्व काही तिनं गाजवलेले. त्यामुळे अमाप संपत्ति आणि प्रचंड लोकप्रियता, प्रसिद्धी मिळाली तरी सुद्धा ती मात्र मनातून पुरती दु:खी होती. खचलेली होती. पैसा आणि प्रसिद्धीमुळेच की काय, कला क्षेत्रात अशी परिस्थिति उद्भवते. पुरुषांच्या दृष्टीकोणातून स्त्री ही भोगवादीच वस्तु असते याचे तिने अनुभव घेतले. उत्कट आणि निरपेक्ष प्रेम तिला मिळत नव्हतं. दोन जणांशी ब्रेक अप झालं. त्यामुळे ती उध्वस्त झाली होती. ही दुसर्‍यांदा घडलेली घटना ताजी असतानाच ती आपल्या लहान मुलीला घेऊन अमेरिकेत आली होती. रंगभूमीची सेवा मात्र चालूच होती . तिच्या जवळच्या काहींना तिनं यातून बाहेर पडावं असा वाटत होतं. शिकागोमध्ये ज्या ऑडिटोरीयममध्ये तिचे कार्यक्रम होत होते, त्या ओपेरा हाऊसचे व्यवस्थापक मिलवर्ड अॅडम्स यांच्याकडे त्यावेळी  विवेकानंद राहत होते आणि वेदांताचे वर्ग घेत होते. अॅडम्स यांनी कॅल्व्हेला “तू विवेकानंद यांना एकदा भेट” म्हणून सांगितलं.

अनेक वेळा सांगूनही तिच्या मनात नव्हते. मैत्रिणीने सुद्धा हेच सांगितले पण तिचेही ऐकले नाही. तिच्या मनात आत्महत्येचे विचार होते. ती या विचाराने बाहेर पडत असे .पण तिचे पाय आपोआप विवेकानंद राहत होते तिकडे  निवासस्थानाकडे वळत आणि आपण एका भयंकर स्वप्नातून जागे झाल्यासारखे वाटे. मग पुन्हा घरी येई. असे चार पाच वेळा झाले. शेवटी एका उद्विग्न क्षणी ती विवेकानंद यांना भेटायला गेली. नोकराने घराचे दार उघडले, कॅल्व्हे  बाहेर खुर्चीवर बसून राहिली. आपल्याच विचारात. थोड्या वेळाने आतून आवाज आला, “ये, मुली,ये ! कोणतीही भीती बाळगू नकोस”. कॅल्व्हे आत गेली आणि समोर विवेकानंद बसले होते त्यांच्याकडे बघत स्तब्ध झाली. कारण ध्यानअवस्थेत विवेकानंद बसले होते. त्यांची भगवी वस्त्रे, खाली नजर अशा अवस्थेतच ते तिच्याकडे न पाहता म्हणाले, “मुली किती विषण्ण आणि मन निराश करणारं, काळवंडून टाकणारं वातावरण तुझ्या भोवती आहे. मन शांत कर. ते फार आवश्यक आहे”. ती कोण? नाव काय? काहीही माहिती नसताना, तिच्याकडे न बघताच यांनी कशी आपल्या मनाची अवस्था ओळखली याचं तिला फार आश्चर्य वाटलं.

आपली परिस्थिति आणि समस्या केवळ आपल्यालाच माहिती आहेत तरीही हे एका अलिप्त आणि समाधान भावनेने आपल्याशी बोलत आहेत. यांना काय घडले ते कसं कळल असेल ? असं वाटून तिच्या लक्षात आलं की हे काहीतरी अद्भुत आहेत. ती विवेकानंद यांना म्हणाली, हे सारं तुम्हाला कसं माहिती? तुम्हाला कोणी बोललं आहे का ? स्वामीजी म्हणाले, “माझ्याजवळ कोणी काही बोलले नाही. तशी काही जरूर आहे असं मला वाटत नाही. एखादं उघडं पुस्तक वाचावं तसं तुझं मन मला स्पष्ट दिसतं आहे. तुला सारं काही विसरून गेलं पाहिजे. पुन्हा एकदा प्रसन्न आणि आनंदी वृत्ती धारण कर.तब्येत सुधार,दु:खाचा सतत विचार करत बसू नको. भावनांना कोणते तरी रूप देऊन व्यक्त हो. ही गोष्ट आध्यात्मिक दृष्टीने आवश्यक आहे. कलेला तर आवश्यक आहेच.

या शब्दांचा आणि स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा काल्व्हे वर सखोल परिणाम झाला. या प्रभावामुळे तर आपल्या डोक्याला ताप देणार्‍या सार्‍या कटकटीच्या  गोष्टी डोक्यातून काढून टाकून, त्याऐवजी स्वत:चे सुस्पष्ट व शांतिप्रद विचार मनात निर्माण केले होते असं काल्व्हे ला वाटलं.स्वामीजींच्या या समर्थशाली विचाराने तिचे मन पुन्हा उल्हसित झाले. आणि ती तिथून बाहेर पडली. हा काही संमोहन विद्येचा परिणाम नव्हता.विवेकानंदांच्या मनाची शुद्धता, त्यांचे सामर्थ्यशाली पवित्र आचरण यामुळे हा परिणाम झालेला होता. मन एकदम निश्चिंत झाले होते.

ही भेट होण्या आधी एक दु:खद प्रसंग घडला होता. तिचा कार्मेंनचा  प्रयोग चालू होता.तिचा अभिनय आणि गाणं ही उत्तम सादर होत होतं. पण मनातून ती वैफल्य ग्रस्त होती. आणि आता पुढच्या अंकात आपण काम करू शकणार नाहीत असं तिच्या मनाने घेतलं. अशाही अवस्थेत ती मनाचा निग्रह करून रंगभूमीवर गेली. तो अंक ही उत्तम झाला, पण दुसर्‍याच क्षणी आपण काम करू शकणार नाही मला बरे वाटत नाही असे सांगून टाकले.आणि पुढचा अंक होऊ शकत नाही असे दिलगिरी पूर्वक सांगा म्हणून सुचविले. परंतु प्रेक्षकांनी तर तिचे काम डोक्यावर घेतले होते.त्यामुळे व्यवस्थापकांनी तिला हर प्रकारे समजाऊन सांगत रंगभूमीवर जवळ जवळ ढकललंच. मग काय काल्व्हे कलेशी निष्ठावान होती तिने पाय ठेवतच सर्व बाजूला सारून आपली भूमिका सादर करू लागली.तिच्या आतल्या वैफल्याच्या भावनांमुळे तिच्या आवाजात आर्तता आणि उत्कटता होती.या वेळचे गाणे तर अत्यंत सुंदर झाले.श्रोत्यांनी प्रचंड दाद दिली होती.पण ती ते ऐकायला अजिबात उत्सुक नव्हती.तडक रंगमंचावरून आत गेली आणि कोचावर आडवी झाली आणि एक आश्चर्य वाटले की बाहेर एव्हढे लोक उभे आहेत मग या क्षणाला सारे निशब्द कसे?असा संशय येऊन ती दाराजवळ आली.तो समोर व्यवस्थापक आणि लोक गोळा होऊन बघताहेत.धीर करून व्यवस्थापकांनी सांगितलं,की “प्रयोग चालू असताना तुमच्या मुलीचा अपघाताने भाजून मृत्यू झाला आहे”. भयंकर धक्का होता तिला. या घटनेनंतर ती पार कोसळून गेली असणार . यातून बाहेर पडण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांमुळे तिची व  विवेकानंदांची भेट झाली होती त्यानंतर तीचं आयुष्य पुर्णपणे बदललं.

स्वामीजींच्या संपर्कात आल्यानंतर तिला अनेक विषय नव्याने कळले होते. त्यांच्याशी ती पटलेल्या न पटलेल्या गोष्टी व विषयांची चर्चा करू लागली होती. त्यांचे विचार ऐकून घेत होती. एकदा अमरत्व या विषयावर चर्चा सुरू होती.काल्व्हे या बद्दल म्हणाली, “मला ती कल्पनाच पटत नाही. मी माझ्या व्यक्तीत्वाला चिकटून राहणार.मग ते कितीही क्षुल्लक असेना. मला शाश्वत ऐक्यात मिसळून जाण्याची इच्छा नाही. तो नुसता विचारही मला भयंकर वाटतो”. त्यावर स्वामीजींनी उत्तर दिले. “एके दिवशी अथांग महासागरात पाण्याचा एक थेंब पडला. स्वत:ची ही स्थिति पाहून जलबिंदू रडत तक्रार करू लागला.जशी तुम्ही आता करताहात , महासागर जळबिंदुला हसला. त्याने जलबिंदुला विचारले, की, का रडतोस बाबा?तुझ्या रडण्याचं कारण मला नाही समजत. तू जेंव्हा मला येऊन मिळालास तेंव्हा तू आपल्या सर्व बंधुभागिनींना येऊन मिळालास. त्या इतर जलबिंदूनीच मी बनलो आहे.त्यामुळे तू ही साक्षात महासागररूप झालास. मला सोडून जाण्याची जर तुझी इच्छा असेल तर, एखाद्या सूर्यकिरणावर स्वार हो आणि एखाद्या ढगात जाऊन राहा की झाले. तेथून तू पुन्हा पिपासार्त पृथ्वीला आशीर्वादासारखा व वरासारखा होऊन एखाद्या जलबिन्दूच्या रूपाने खाली येऊ शकतोस.” 

स्वामीजी रूपकांच्या भाषेत बोलत असत असं काल्व्हे म्हणते. ती पुढे स्वामीजिंबरोबर, त्यांच्या स्नेही आणि शिष्यांसोबत तुर्कस्तान, इजिप्त, ग्रीस मध्ये सहलीला गेली होती.त्यांच्या बरोबर फादर लॉयसन,त्त्यांची पत्नी तसेच मिसेस मॅक्लाउड सहलीला होते. ती म्हणते या सहलीत, विज्ञान, तत्वज्ञान आणि इतिहास कोणतीच गुपिते स्वामीजिंपासून लपून राहिली नव्हती. त्यामुळे त्यांची जी विद्वत्तापूर्ण आणि ज्ञानपूर्ण चर्चा चाले ती मी लक्ष देऊन ऐकत असे. वादविवादात मी कधी भाग घेत नसे. पण विद्वान नामांकित असलेले फादर लॉयसन यांच्या बरोबर स्वामीजींची सर्व प्रकारची चर्चा चाले. धर्मासंबधी  चाललेल्या चर्चेत फादर यांना एखाद्या चर्च कौन्सिल ची तारीख खात्रीशीरपणे सांगता येत नसे, पण स्वामीजींना सांगता येई. स्वामीजी एखाद्या धार्मिक ग्रंथातील अवतरण सुद्धा अगदी बिनचूक सांगायचे .  

ग्रीसमध्ये इल्युसिसला भेट दिली तेंव्हा स्वामीजींनी त्याची सर्व रहस्ये समजाऊन सांगितली. तिथल्या सर्व मंदिरातून हिंडवले, जुन्या प्रार्थनांचे मंत्र हुबेहूब प्राचीन पद्धतीने म्हणून दाखवले. इजिप्त मधेही असाच तल्लिंनतेने ऐकण्याचा अनुभव सर्वांनी घेतला. सर्वजण शांतपणे मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत, एकदा तर, इतके की भान न राहिल्यामुळे तिथल्या स्टेशनवरील प्रतिक्षालयात स्वामीजींनी श्रोत्यांना आपल्या संभाषणाने खिळवून ठेवले होते. तेंव्हा गाडी निघून गेली तरी भान नव्हते. असे अनेक वेळा व्हायचे.

कॅल्व्हे या प्रवासातल्या आपल्या स्वामीजींच्या आठवणी सांगताना म्हणतात,  “कैरो मधला प्रसंग – कैरो मध्ये बोलता बोलता सर्वजण रस्ता चुकले आणि एका अत्यंत घाणेरड्या ओंगळ वाण्या रस्त्यावर येऊन पोहोचलो. आजूबाजूच्या घरांच्या खिडकीतून स्त्रिया स्वताचं अंग प्रदर्शन करीत होत्या. स्वामीजींचे याकडे लक्षच नव्हते. पण तेव्हाढ्यात बाहेर बसलेल्या, गलका करणार्‍या स्त्रिया स्वामीजींना खुणेने आपल्याकडे बोलावू लागल्या. इथून चटकन बाहेर पडावे म्हणून प्रयत्न केला पण  स्वामीजी अचानक त्या स्त्रियांपुढे जाऊन उभे राहिले.म्हणले, “ बिचार्‍या मुली, दुर्दैवी जीव, त्यांनी त्यांचे देवपण त्यांच्या सौंदर्यात निविष्ट केले आहे. पहा त्यांची आता काय दशा झाली आहे ती”. असे बोलून स्वामीजींच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. त्या सर्व अत्रीय एकदम गप्प झाल्या आणि संकोचल्या. एकीने पुढे वाकून स्वामीजींच्या कफनीच्या टोकाचे चुंबन घेतले.आणि स्पॅनिश भाषेत देवमाणूस! देवमाणूस! असे म्हणू लागल्या, दुसरीने हात तोंडावर ठेऊन चेहरा लपविला”. अशा या स्वामीजींबरोबर च्या आठवणी कॅल्व्हेच्या  शेवटच्या आठवणी ठरल्या होत्या. कारण यानंतर स्वामीजी थोड्याच दिवसात भारतात निघून गेले. आणि वर्षभरातच त्यांनी महासमाधी घेतल्याचे कळले.कॅल्व्हे यांनी म्हटलंय, “ एकही पृष्ठ नष्ट न करता त्यांनी आपला जीवनग्रंथ लिहिला”. त्यानंतर काही वर्षानी काल्व्हे भारतात आली तेंव्हा, अखेरचा श्वास जिथे घेतला त्या स्वामीजींच्या बेलूर मठाला तिने भेट दिली. त्यांच्या आईला भुवनेश्वरी देवी यांना भेटली. या माऊलीनेच कॅल्व्हेला या मठात नेले होते .                       

काल्व्हे यांनी आपल्या आत्मचरित्रात हे सर्व लिहून ठेवले आहे. कॅल्व्हे जानेवारी १९४२ ला  वयाच्या ८३ व्या वर्षी निधन पावली. तिच्या उर्वरित आयुष्यात स्वामीजींमुळे खूप मोठा बदल झाला होता. योग्य आध्यात्मिक विचारांची समज आली होती. आत्महत्येपासून परावृत्त करून एक चांगले जीवन जगण्याचा मार्ग स्वामीजींनी तिला दाखवला होता. असे भारताबाहेर अनेक जण स्वामीजींच्या सहवासात आले त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला. काहींनी त्यांना रामकृष्ण संघाच्या कामात मदत केली, काही स्वामीजींचे शिष्य झाले.

भारताबाहेरील लोकांना एका भारतीय माणसानेच योग्य दिशा दाखवली होती, आज भारतातच रंगभूमी  आणि चित्रपट क्षेत्रात प्रसिद्धी आणि जीवघेणी स्पर्धा आणि कोटीच्या कोटी पैशांची उड्डाणे आणि त्यामुळे तरुण कलाकारांची, आयुष्याची झालेली वाताहत, कुटुंबाचं उध्वस्तपण हे बघितलं की वाटत यावर अंमल ठेवणारी व्यवस्थाच नाही ? जिथे विवेकानंद यांच्या रूपात पाश्चिमात्य देशात लोकांना मार्गदर्शन मिळत होतं. त्याच विवेकानंद यांच्या भारतात आज काय स्थिति आहे? राजकारण, प्रशासन किंवा कुठल्याही व्यवस्थेत भ्रष्टपणे काम करणारी माणसे/व्यक्ती लहानपणा पासून कशी घडली आहेत? कोणाच्या संगतीत घडली आहेत? आई वडिलांनी काय शिकविले आहे, काय संस्कार केले आहेत? हे अत्यंत महत्वाचे ठरते. कारण नरेंद्रला घडविणारे त्याचे पालक भुवनेश्वरी देवी, विश्वनाथ बाबू आणि गुरु रामकृष्ण परमहंस होते .

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माफीनामा… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माफीनामा… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(खरा सुखी कोण ? आपल्याकडे सगळं काही असणारे आपण ?? की सर्वस्व गमावलेले ते ???) इथून पुढे —-

बाबांची अवस्था पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं…. 

गेले आठ महिने अंघोळ नाही, संडास लघवीवर कंट्रोल नाही आणि त्यामुळे ती कपड्यातच होते, बाबांच्या घरातल्या लोकांनी त्यांची जरी साथ सोडली तरी सुद्धा रस्त्यावरच्या किड्यांनी, माशांनी बाबांची साथ सोडली नव्हती…. ते त्यांच्या डोक्यात आणि हाता पायावर, चेहऱ्यावर मुक्तपणे फिरत होते…!

आम्ही तुमच्या सोबत आहोत बाबा, असं तर या कीड्या आणि माशांना सांगायचं नसेल ? 

…… अडचणीत साथ सोडणारे घरातले आपले ? की संकटाच्या काळात सोबत करणारे हे किडे आणि माशा आपले ?? आपण अडचणीत सापडलो की लोक हात पकडण्याऐवजी आपल्या चुका पकडतात हेच खरं…. ! 

ज्या दिवशी बाबा मला आठ महिन्यांपूर्वी शेवटचे भेटले होते, त्यानंतर त्यांना पॅरालिसिसचा आणखी एक झटका आला होता. ते आता जास्त हालचाल करू शकत नव्हते आणि म्हणून ते एकाच ठिकाणी पडून राहिले….

रस्त्यावर भेटलेल्या अनेकांना त्यांनी माझ्यापर्यंत हा निरोप पोहोचवा असे सांगितले, परंतू आठ महिन्यात एकाही माणसाने माझ्यापर्यंत हा निरोप पोहोचवला नाही….

रोजच्या रस्त्यावर ट्रॅफिक जॅम मध्ये मी अडकावं…. त्यानंतर मी रस्ता बदलावा…. तिथेही पुन्हा ट्रॅफिक मध्ये मी अडकावं…. मला हे बाबा दिसावेत…. ही निसर्गाची योजना होती ! 

बाबांशी बोलत होतो, परंतु डोक्यात विचारांची गर्दी झाली….

काय करता येईल या बाबांचे ?  यांचे आत्ता आधी हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेणे गरजेचे आहे… त्याआधी यांना संपूर्ण स्वच्छ करायला हवं… ! पुढे बघू नंतर जे सुचेल ते करू…

काही एक विचार करून, मी बाबांना म्हणालो, “ बाबा आज आत्ता शनिवारचा दुपारचा दीड वाजला आहे, मला उद्याचा दिवस द्या…. सोमवारी सकाळी दहा वाजता मी परत इथे येतो… ! “

खरंतर बाबा अतिशय गंभीर अवस्थेत होते…. त्यांना त्याच वेळी ऍडमिट करणे गरजेचे होते, परंतू कायद्याच्या चौकटीत राहून अनेक बाबी करणे अपरिहार्य असतं, आणि त्यासाठी मला थोडा वेळ हवा होता….!

बाबांना मी दोन पंप दिले … दर पंधरा मिनिटांनी ते पंप ओढायला सांगितले…. आठ महिने जगलात तसे आता सोमवार सकाळी दहा वाजेपर्यंत जिद्द सोडू नका, असं सांगून मी तिथून पुढल्या बाबी करण्यासाठी निघणार, इतक्यात बाबांनी मला खुणेने बोलावलं…. खूप मोठ्या मुश्किलीने ते बोलले…. “ काळजी करू नकोस , तू येईपर्यंत मी मरणार नाही…. अरे, डोळे मिटले म्हणून कोणाला मरण येत नाही…. चार चौघांनी आपल्याला खांद्यावरून खाली ठेवलं… बाजूला केलं की येतं ते मरण ! “ बाबांचा रोख त्यांच्या कुटुंबावर होता….! खरं होतं बाबांचं …. मी आता तिथून निघालो…  

शनिवार रविवार आवश्यक त्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्या… मनीषाने बाबांची पूर्ण बॅग भरली… साबण, टूथपेस्ट पासून अंडरपॅन्टपर्यंत तिने सर्व तयारी केली…न पाहिलेल्या बापाची ती मुलगी झाली होती…!  मी दाढी कटिंग चे सामान तयार ठेवले…. ‘मंगेश वाघमारे’, माझा सहकारी, याला आवश्यक त्या सर्व सूचना देऊन, सोमवारी सकाळी दहा वाजता स्पॉटवर येण्यास सांगितले…. 

रविवारची अख्खी रात्र तळमळण्यात गेली….अतिशय गंभीर अवस्थेत असलेले हे बाबा मी जाईपर्यंत जाणार नाहीत ना… ? ते असतील ना ? मी जाईपर्यंत राहतील ना ? या विचारात पहाटेचे साडेचार वाजले….

एखाद्याची जबाबदारी मनापासून घेतल्यानंतर… ती व्यक्ती पूर्णतः आपल्यावर विश्वास ठेवते… एखाद्याचा हा विश्वास जपण्यात जीवाची किती ओढाताण होते, हे मी शब्दात काय सांगू ??? 

आणि प्रश्न इथे एका बापाचा होता…. ! 

सोमवारी सकाळी लवकर सर्व तयारीनिशी मी गडबडीत निघालो,  लिफ्टमध्ये सर्व सामान घेऊन जाताना मनीषा म्हणाली, “ अरे अभिजीत गडबडीत तू बूट किंवा चप्पल घातलीच नाहीस…” – च्याआयला , गडबडीत खरंच मी पायात काही घातलं नव्हतं…

यानंतर मी पायात बूट अडकवला पण जाणीव झाली, ज्या बापासाठी चाललो आहे, त्या बापाच्या पायात सुध्दा काही नाही… मग जाताना यांना एक बूट घेतला ! हे सगळं करून स्पॉटवर जाईपर्यंत मला अकरा वाजले…. 

मी त्या स्पॉटवर पोहोचलो…. परंतु त्या स्पॉटवर कोणीही नव्हते… ज्या स्पॉट वर बाबा राहत होते तिथे मी पोहोचलो, तेव्हा मला फक्त त्यांचे रिकामे अंथरूण दिसले…. इतर काही साहित्य दिसले … पण बाबा दिसले नाहीत…!

 

हे सर्व पाहून माझं अवसान गळालं… सोमवार पर्यंत सुध्दा बाबा माझी वाट पाहू शकले नाहीत…. ते गेले, या विचाराने माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू यायला सुरुवात झाली…

 

आणि तितक्यात मला एक आवाज आला…” सर आम्ही इकडे आहोत…” . हा आवाज मंगेशचा होता…!

मी वळून पाहिलं…. आमच्या मंगेशने या बाबांना घाणीतून बाहेर काढून दुसऱ्या स्वच्छ ठिकाणी ठेवलं होतं , म्हणून मला ते जुन्या ठिकाणी दिसले नाहीत..!… क्या बात है…! 

मी सुखावलो होतो… मी येईपर्यंत जीव सोडू नका, असं मी माझ्या बापाला सांगून आलो होतो…. आज माझ्या बापानं माझा शब्द पाळला होता….मी खूप आनंदी होतो….

आज मी ऍम्ब्युलन्स आणली होती…. माझा बाप आज जिवंत आहे या आनंदात…. त्यांनी माझा शब्द पाळला या खुशीत,  मी मस्त राजेश खन्ना स्टाईलमध्ये गाडीतून टुणकन खाली उडी घेतली… रजनीकांत स्टाईलने मी गाडीची किल्ली माझ्या बोटाभोवती फिरवत, बच्चन स्टाईलने चालत बाबांजवळ पोहोचलो … ! 

हो…. माझ्या बापाने आज शब्द पाळला होता…. मी  येईपर्यंत तो जगलेला होता… ! निसर्गाने त्यांना जगवलं होतं….

मी लय खुश होतो राव …. इलेक्ट्रिकच्या खांबाच्या आधाराने या बाबांना बसवून आधी मी या बाबांची दाढी कटिंग केली… इलेक्ट्रिकचा खांब लाईट द्यायला नाही, परंतु कोणाच्या आयुष्यात प्रकाश पाडायला आज प्रथमच उपयोगी आला असावा….! 

माझ्या अंगावर ॲप्रन ….गळ्यात स्टेथोस्कोप आणि फुटपाथवर बसून मी रस्त्यावरच्या गलिच्छ दिसणाऱ्या माणसाची दाढी करतो आहे….

मला पाहणाऱ्या अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं…!  हा नेमका डॉक्टर आहे की न्हावी आहे  ??? 

मी मात्र डॉक्टर आणि न्हावी या दोन तीरांच्या मध्ये असलेल्या “माणूस” नावाच्या “पात्रात” डुंबून, न्हाऊन निघत होतो…. ! असो….

यानंतर संडास आणि लघवीने भरलेले कपडे काढून मी फेकून दिले…. बाबा आता पूर्ण उघडे – नागडे झाले रस्त्यावर…. ते थोडे शरमले…. ! नागड्या बाबांना पाहून, इथे मला माझ्या मुलाची, सोहमची आठवण झाली, जन्मला तेव्हा नर्सने तो असाच उघडा नागडा माझ्या ओंजळीत त्याला दिला होता…. !

आज निसर्गाने पुन्हा हे नागडं…. म्हातारं पोर माझ्या ओंजळीत घातलं होतं…. मी पुन्हा बाप झालो…. पुन्हा बाप झालो यार….!!! 

— क्रमशः भाग दुसरा

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नालंदा… ☆ प्रस्तुती – सुश्री अनिता पारसनीस ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ नालंदा… ☆ प्रस्तुती – सुश्री अनिता पारसनीस ☆

तुर्की शासक बख्तियार खिलजीने भारतावर आक्रमण केले. या दरम्यान खिलजी आजारी पडला. त्याच्या बरोबरच्या हकीमांचं औषध लागू पडेना. मग त्याला नालंदा विश्वविद्यालयातील आयुर्वेद विभागाचे प्रमुख आचार्य – राहुल श्रीभद्र यांचेकडून उपचार करून घ्यावेत, असा सल्ला मिळाला.                                                    

त्याने आचार्यांना बोलावून घेतले आणि दम भरला की, तो कोणतेही हिंदुस्थानी औषध घेणार नाही आणि ठराविक मुदतीत त्याचा आजार बरा झाला नाही तर तो आचार्यांचा वध करेल. आचार्यांनी त्याच्या सवयी जाणून घेतल्या. त्याचे नित्य पठणातील कुराण मागून घेतले आणि ते परत करतांना सांगितले की, खिलजीने रोज किमान एवढी पाने वाचलीच पाहिजेत. तसे केल्यावर खिलजी बरा झाला.                                                       *                                                                          

आचार्यांनी औषधींचा लेप त्या कुराणातील पानांच्या कोप-यात लावून ठेवला होता. खिलजी सवयीने तोंडात बोट घालून, थुंकीने ओले करून, कुराणाचे पान उलटत असे. जेवढी मात्रा पोटात जाणे अपेक्षित होते, तेवढ्याच पानांना लेप लावलेला होता.                                                        *                                                                    

पण या रानदांडग्याला हे कळल्यावर आपल्यापेक्षा हे हिंदु श्रेष्ठ कसे, या वैषम्याने त्याने सर्व गुरूवर्य आणि बौद्ध भिक्षूंची हत्या केली. संपूर्ण नालंदा विश्वविद्यालय जाळून टाकले. तिथले ग्रंथालय एवढे प्रचंड होते की, तीन महिने ते जळत राहिले होते. कृतघ्न खिलजीला प्राणदान मिळाल्याचा मोबदला त्याने असा चुकता केला.

आता आतापर्यंत तिथे मातीचे ढिगारे होते. भारतीय पुरातत्व खात्यातर्फे उत्खनन करायला सुरूवात केल्यावर त्याखाली दडलेले उध्वस्त अवशेष मिळून आले. तिथे गौतम बुद्धाची ८० फूट उंचीची मूर्ति होती, असे चिनी पर्यटक/विद्यार्थी ह्युएन त्संगने लिहून ठेवले होते.            

गुप्त वंशातील कुमारगुप्ताने याची निर्मिती केली. “ नालंदा “ या शब्दाचा अर्थ ->  ना + आलम् + दा :- “ न थांबणारा ज्ञानाचा प्रवाह“.

या अर्थाला जागणा-या आपल्या पंतप्रधानांनी  – श्री.नरेंद्र मोदीजींनी याला पुनर्प्रस्थापित केले. || नमो नमो ||

१९८७ साली कौटुंबिक सहलीदरम्यान तिथे जाण्याचा योग आला, तेव्हा हे सगळे अवशेष पहाण्यात आले होते. 

—जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी हा सूत्रधागा अवश्य पहावा. 👉 https://www.indiaolddays.com/naalanda-vishvavidyaalay-kisane-banavaaya-tha/?amp=1   

संग्रहिका : सुश्री अनिता पारसनीस 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नवी वाट चालताना” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ “नवी वाट चालताना” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

“नवी वाट चालताना”

एक जानेवारी तारीख उजाडली. नवीन वर्षाचा पहिला दिवस. २०२३ सालाने दिमाखात प्रवेश केला आहे. आता,

नवे वर्ष नव्या आशा

नव्या स्वप्नांना नवीन दिशा

मिळणार आहेत. या वर्षाच्या पोटात असंख्य गुपिते असणार आहेत. काही आनंदाचे क्षण, प्रगतीच्या, भरभराटीच्या संधी, काही मोठ्या स्वप्नांची परिपूर्ती, नवीन नात्यांची जुळणी असणार आहे. प्रत्येकासाठी काही ना काही आनंदाची भेट नक्की असणार आहे.

एखादं वर्ष म्हणजे दिनदर्शिकेच्या तारखेप्रमाणे दिवस आणि पानांप्रमाणे महिना उलटून ‘मागील पानावरून पुढे चालू’ अशी साधी सरळ प्रक्रिया नसते. तर ती असते प्रत्येकाच्या आयुष्यातील आठवणींची पुंजी, तर समाजाच्या, देशाच्या बाबतीत असंख्य चांगल्या वाईट घटनांचा ठेवा.

म्हणूनच सरत्या वर्षातल्या घटनांचा ताळेबंद मांडून उणे-अधिकाची गोळाबेरीज केली जाते. काही अप्रिय घटनांनी मनाची घालमेल होते. कारण काही नाती दुरावलेली असतात. त्याच वेळी काही नवीन नाती जोडलेलीही  असतात. काही गोष्टीत यशाला गवसणी घातलेली असते, तर आगामी नवीन आव्हाने आता खुणावत असतात. काही बेत यशस्वीरीत्या तडीस नेलेले असतात, तर येत्या काळासाठी नवीन बेतांची आखणी सुरू झालेली असते. अशा मनाच्या एका भारावलेल्या अवस्थेतच नवीन वर्षाचे आगमन होत असते. तेव्हा २०२३ सालाचे  आपण अतिशय उत्साहाने, आनंदाने स्वागत करू या.

मराठी वर्ष हे चैत्र प्रतिपदेपासून सुरू होते. तेव्हा शिशिराची पानगळ झालेली असते. नव्या कोंबातून कोवळी पोपटी चैत्र पालवी फुटते. ही लवलवणारी नाजूक पाने हळूहळू हिरवी होत झाड हिरवेगार होत झुलू लागते. पुढे नाजूक कळ्या, कोमल फुले, मधुर फळे असा बहर अनुभवत पुन्हा  शिशिराची पानगळ सुरू होते. जुन्या वर्षाची सांगता आणि नव्या वर्षाचे आगमन असे निसर्गाच्या अविष्कारातून साजरे होत असते.

पण जागतिक वर्षाचा कालखंड वेगळा आहे. त्याचे स्वागतही वेगळ्याच पद्धतीने होते. जागतिकीकरणाने या सर्व गोष्टी आता जगभर उत्साहात साजऱ्या केल्या जातात. हिवाळ्याच्या थंडीने शरीरं गारठलेलीअसली तरी नव्याच्या स्वागताच्या आनंदाने प्रफुल्लित मने मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करतात. जागोजागी त्यासाठी रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते.

यंदा नव्या वर्षात पदार्पण करताना काही खूप मोठ्या अनुभवांची पुंजी आपल्याकडे जमा झालेली आहे. कारण मागची दोन-तीन वर्षे सर्व जगाच्या दृष्टीने धास्तावणारी गेली. कोविड १९ च्या विषाणूने अख्ख्या जगाला वेठीला धरले होते. ‘न भूतो न भविष्यती’ अशी परिस्थिती ओढवली. अनेक जिवलगांचे हात हातातून अचानक सुटून गेले. मृत्यूचे हे भयानक दर्शन सर्वांनाच मुळापासून हादरवून गेले. हे संकट अनेक गोष्टी आपल्याला शिकवूनही गेले. अशावेळी पैसा, सत्ता, अधिकार काहीही कामाला येत नाही. चांगले शारीरिक, मानसिक आरोग्य या तडाख्यातून सही-सलामत बाहेर आले. माणसांची ओढ, नात्यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. पुन्हा नाती जवळ आली. पैशाचा, सत्तेचा, अधिकाराचा अती हव्यास न करता आपल्या मर्यादा, आपल्या गरजा ओळखून संयमी, विवेकी वाटचाल करायला हवी याची जाणीव अतिशय प्रखरतेने झाली.

रोजची एवढी धावाधाव करून पैसा मिळवायचा तो कशासाठी ? तो नक्की किती मिळवायचा ? आपल्या नेमक्या गरजा किती ? नक्की महत्व कशाला ? पैशाला का माणसाला ? अशा मूलभूत गोष्टींचा पुन्हा सर्वंकष विचार करायला सगळ्यांनाच हा मोठा विराम मिळाला होता. सर्वांच्या विचारात काही अंशी फरक पडलाही आहे. पण थोडक्यामधेच समाधान मानून, आपल्या माणसांना धरून राहायला हवे हे मात्र खरे, याची खूणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधली पाहिजे. अजूनही या संकटाचे सावट पूर्णपणे दूर झालेले नाही. त्यामुळे त्याच्यापासून संरक्षण मिळावे म्हणून योग्य ती खबरदारी प्रत्येकाने घेत राहिले पाहिजे. आरोग्यासाठी काही चांगल्या सवयी कायमस्वरूपी लावून घेतल्या पाहिजेत.

नव्या प्रगत तंत्रज्ञानात आपल्या देशाने आघाडी घेतलेली आहे. त्यात आता 5G सेवा ही उपलब्ध झालेली आहे. याद्वारे अनेक दैनंदिन व्यवहार सुकर होत आहेत‌. आपणही हे तंत्रज्ञान आत्मसात करून घेऊन नव्या प्रवाहात सामील होणे खूप गरजेचे आहे.

नवी सुगी नवं पीक

सुकाळाची आशा

नवं ज्ञान नवं ध्येय

उन्नतीची दिशा ||

आत्ता जागतिक वातावरण तणावपूर्ण आहे. अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. अशावेळी प्रत्येकाने प्राधान्याने देशहित जपले पाहिजे. अनावश्यक खर्च टाळणे, भ्रष्टाचार न करणे, स्वदेशी गोष्टींना प्राधान्य देणे, देशहिताला बाधा पोहोचवेल अशी कोणतीही कृती-उक्ती न करणे, आपली कुटुंब व्यवस्था नीट सांभाळणे अशा कितीतरी गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणारा आपला देश अनेक आघाड्यांवर प्रगतीची शिखरे गाठत आहे. त्याच्या उज्ज्वल वाटचालीत प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे.

घालू गवसणी नव्या यशाला

सदैव जपू या देशहिताला ||

नव्या वर्षात पदार्पण करताना या सर्व अनुभवातून आलेले शहाणपण, नवे भान यांचा आपल्याला निश्चितपणे चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे नव्या वर्षाचे आगमन प्रगतीची, आनंदाची, उत्तम आरोग्याची पर्वणी घेऊन येणारे ठरो हीच प्रार्थना आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares