मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ खरा आनंद, खरे सुख … ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ खरा आनंद, खरे सुख… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

१०० लोकांचा एक समूह, आयुष्यावर वक्तव्यकरणाऱ्या एका प्रख्यात वक्त्याचा सेमिनार अटेन्ड करीत होता …

त्या वक्त्याने प्रत्येकाकडे एकेक फुगा (balloon) दिला . प्रत्येकाने फुगा फुगवायचा आणि त्यावर आपले नाव टाकून हॉलमध्ये सोडायचा होता. सर्व लोक कामाला लागले. प्रत्येक जण आपण फुगवलेल्या फुग्यावर स्वतः चे नाव टाकीत होता. बघता बघता हॉल १०० फुग्यांनी भरून गेला…

नंतर त्या वक्त्याने सर्वांना ५ मिनिटांचा अवधी दिला आणि इतक्या साऱ्या फुग्यांतून स्वतः चे नाव असलेला फुगा शोधायला लावला.!! इतक्या भरगच्च फुग्यांतून स्वतः फुगवलेला फुगा शोधताना सर्वांची तारांबळ उडाली. ५ मिनिटे संपली तरीही कुणीही स्वतः च्या नावाचा फुगा शोधू शकला नाही !!

… नंतर त्या वक्त्याने प्रत्येकाला कुणाचेही नाव असलेला एक फुगा उचलायला सांगितले. प्रत्येकाने एकेक फुगा उचलला. वक्त्याने प्रत्येकाला सांगितले की आपल्याकडे ज्याच्या नावाचा फुगा आहे त्या माणसाला तो फुगा देऊन टाका…. अश्याप्रकारे प्रत्येकजण आपल्या हातातील फुग्यावर ज्याचे नाव आहे त्याला तो देऊ लागला आणि दोनच मिनिटांत प्रत्येकाकडे स्वतःच्या नावाचा फुगा आला.!! सगळे खूश झाले. 

यावर तो वक्ता बोलू लागला…… “आपल्या आयुष्याचेही असेच झाले आहे ! प्रत्येक जण आनंद, सुख, समाधान या गोष्टी शोधण्यासाठी जंग जंग पछाडतो आहे… परंतु खरा आनंद, खरे सुख कशात आहे याची कुणालाही कल्पना नाही… स्वतःचा खरा आनंद आणि खरे समाधान इतरांच्या आनंदात दडलेले असतात. इतरांना त्यांचा आनंद द्या आणि त्या बदल्यात तुम्हालाही नक्कीच आनंद आणि समाधान मिळेल. मानवी आयुष्याच्या यशाचे खरे गमक यातच आहे….”

….  हे ऐकून संपूर्ण हॉल नि:शब्द झाला….नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल..! माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय.. जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो.. पण मृत्यूचं येणं मात्र अकस्मात असतं .. कारण त्याला माहितीये …  माणूस सुखाची वाट पाहू शकतो, दु:ख येणार हे मात्र पचवू शकत नाही..

स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं !

विश्वास उडाला की आशा संपते !

काळजी घेणं सोडलं की प्रेम संपत !

म्हणून,…..  स्वप्न पाहा, विश्वास ठेवा, आणि काळजी घ्या !

आयुष्य खूप सुन्दर आहे.  त्याचा आनंद घ्या.

संग्राहिका: मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कौरव नंबर 101… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? विविधा ?

☆ कौरव नंबर 101…  🤔 … अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

मी जर महाभारत काळात जन्माला आलो असतो तर माझा समावेश कौरवांच्या पार्टीतच झाला असता.

कारण ..

श्रीकृष्णाची कधी प्रत्यक्षात गाठ पडलीच तर मी त्याला एकमेव प्रश्न हा विचारेन की ” देवाधिदेवा, भगवतगीता अर्जुनाला सांगण्याऐवजी, दुर्योधनाला आणि दु:शासनाला सांगितली असतीस तर हे महाविनाशी युध्द टाळता आले असते ना! इतका मोठा संहार झाला नसता. तू असे का केले नाहीस? भगवद्गीतेचे हे दिव्य ज्ञान कौरवांना झाले असते तर महाभारत हे युद्धाच्या तत्त्वज्ञानाऐवजी बंधुभावाच्या, प्रेमाच्या तत्त्वज्ञानाची शिकवण देणारे झाले नसते का?”

सध्यातरी कृष्णाने प्रत्यक्ष दर्शन देणे शक्य नव्हते. त्यामुळे  इंटरनेटच्या जंजाळात मी हा प्रश्न प्रसूत केला. बघताबघता हा प्रश्न प्रचंड व्हायरल झाला. फेसबुक, whatsapp, quora, युट्युब सगळीकडे या प्रश्नाने धुमाकूळ घातला आणि अखेरीस इतक्या ट्रॅफिकमुळे प्रत्यक्ष श्रीकृष्णाला त्याची दखल घ्यावी लागली.

आणि …एके दिवशी मला श्रीकृष्णाचा video कॉल आला.

अक्षयकुमार आणि परेश रावलचा OMG बघितलेला असल्यामुळे, श्रीकृष्ण अगदी साध्या वेशभूषेत येणार हे मला अगोदरच ठाऊक होते.

थेट स्वर्गातून, पृथ्वीवर कॉल लावलेला असल्यामुळे, खूप डेटा खर्च होत असणार, त्यामुळे श्रीकृष्णाने थेट मुद्द्याला हात घातला .

“ वत्सा, कशाला इतके अवघड प्रश्न नेटवर टाकतोस? सगळे ट्रॅफिक जाम झाले.”

“ देवा, हा अखिल मानवजातीच्या मार्गदर्शक धर्मग्रंथाचा प्रश्न आहे. तुम्ही हे युद्ध टाळण्यासाठी हे ज्ञान कौरवांना दिले असते तर युध्दचं झाले नसते … हा प्रश्न इंटरनेटच्या  ट्रॅफिकपेक्षा कितीतरी महत्वाचा नाही का?”

“मला उपदेश करू नकोस ” श्रीकृष्णांचा एकदम बदललेला स्वर ऐकून मी भांबावलो.

“ देवा, माझी काय बिशाद तुम्हाला उपदेश करण्याची” मी गयावया केली.

“ वत्सा …अरे तुला नाही म्हणालो.”

……..मला हायसे वाटले.

“ मला उपदेश करू नका …” असे दुर्योधन मला म्हणाला होता.

….तुला काय वाटते ? मी हे युध्द टाळण्यासाठी दुर्योधनाकडे गेलो नसेन? भग्वद्गीतेमधील न्याय अन्याय, नैतिकतेच्या गोष्टी त्याला सांगितल्या नसतील ?”

“ काय सांगताय देवा? दुर्योधनाला प्रत्यक्ष तुम्ही गीतेचे ज्ञान सांगून देखील त्याला ते कळाले नाही? तो सरळसरळ तुम्हाला उपदेश  करू नका म्हणाला?”

“ वत्सा, अगदी असेच घडले बघ.

दुर्योधन म्हणाला, .मला चांगले वाईट, पाप पुण्य, नैतिक अनैतिक सगळ्याचे ज्ञान आहे. सद्वर्तन आणि दुर्वर्तन यातील फरकही मी जाणतो. त्याचा उपदेश मला करू नका.”

“वत्सा, पाप काय आहे हे दुर्योधनच काय तुम्ही सुद्धा जाणता …पण त्यापासून दूर रहाणे तुम्हालाही जमत नाही. अनैतिकता म्हणजे काय हे दुर्योधनही अन् तुम्हीही ओळखता, पण टाळत नाही. तुमच्यासाठी चांगले काय आहे आणि वाईट काय आहे हे तुम्ही जाणता, पण तुम्ही वाईटाचीच निवड करता. दुर्योधनाने स्वत:च्या वर्तनाची अगतिकता सांगून बदल नाकारला, त्याने स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ ढालीसारखा वापरला”.

आता मात्र मला दुर्योधनाच्या जागी माझा चेहरा दिसायला लागला .

“मला उपदेश करू नका” वडिलांना उद्देशून हे वाक्य मी शंभर वेळा उच्चारले असेल. मित्रांबरोबर उनाडक्या करणे चुकीचे होते हे मला माहिती होते, पण मी त्याचीच निवड करीत होतो आणि वडिलांना “उपदेश करू नका” असे सांगत होतो.

सकाळी लवकर उठून व्यायामाला जाणे माझ्या फायद्याचे होते हे मला ठावूक होते. पण अंथरुणात लोळत पडणे हे माझे वर्तन होते, आणि “लवकर उठत जा” असे सांगणाऱ्या  आईला “उपदेश करू नकोस” असे सांगणारा “दुर्योधन” मीच होतो.

“तंबाखू खाऊ नका, दारू पिऊ नका, हे उपदेश आम्हाला ऐकायचे नाहीत. त्यामुळे शरीराचे नुकसान होते हे आम्हाला ठाऊक आहे पण त्याची अंमलबजावणी आम्हाला करायची नाही कारण आम्ही ‘दुर्योधन’ आहोत. आम्ही कौरव आहोत.

अर्जुन आणि दुर्योधनात हाच फरक होता की, दुर्योधनाने समजत असूनही स्वत:चे वर्तन बदलले नाही आणि अर्जुनाने स्वत:चे वर्तन श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून बदलले…

संस्कार, प्रकृती, राग, श्रेय, प्रिय, प्रतिक्रिया, कर्म याबद्दलच्या संकल्पना जाणून घ्या. कधीतरी स्वत:च्या आतल्या श्रीकृष्णाला प्रश्न विचारा …… तरच भगवद्गीता वर्तनात येईल… वाचण्याची इच्छा होईल.

इच्छा होईल तोच  सूर्योदय.

सध्यातरी मी कौरव नंबर “१०१” आहे ….

अन् तुम्ही?

रचना : अनामिक.

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘वंगण…’ – सौ विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘वंगण…’ – सौ विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

सकाळच्या गडबडीत नेमकी ट्रॉली बाहेर ओढताना अडकली…धड ना आत धड ना बाहेर…वैतागच…नेमके चहा साखरेचे डबे आत अडकले…! आतल्याआत चडफड नुसती…आता सुतार बोलवावा लागणार…एवढ्याशा कामाकरता तो आढेवेढे घेणार…नाहीतर बजेट वाढवून या कशा मोडीत काढायला झाल्यात याची गाथा वाचणार…आजकाल मौड्यूलर किचन कसं जोरात चाललय…माझी इकडे कामं आणि तिकडं कामं…सगळं क्षणात मनात आणि डोळ्यासमोरुन तरळूनच गेलं. जोर देऊन जरा ओढून बघितलं तर कड्कट् आवाज काढलाच तिने. लादी पुसायला आलेल्या मावशी म्हणाल्या, खोबरेल तेलाचं बोट फिरवा ताई..कडेच्या पट्टीवर…सरकेल…तात्पुरते तरी निभावेल…!चांगली आयडिया… मी पट्कन तेलाचं बोट फिरवलं…दोन मिनिटांनी ट्रॉली मवूसरपणे आतबाहेर डोकावली…कसलं भारी काम झालं एकदम ! मी एकदम आनंदाने तिला धन्यवाद देत म्हणलं..” बरं झालं बाई वेळेत आलीस….नाहीतर… चहा पावडर विकत आणावी लागली असती…” ती हसली…” वंगण लागतय ताई…थेंबभर पुरतं…पण लागतं कधीमधी…ते मिळालं की सगळं सुरळीत होऊन जातं बघा क्षणात !”

खरंच…वंगण लागतं…!

फक्त मशीन,वस्तूंनाच नाही तर माणसालाही… अगदी त्याच्या देहाइतकच मनालाही,अगदी नात्यांनाही वंगण 

आवश्यक आहे. चार चांगल्या शब्दांचं, आश्वासक स्पर्शाचं, सदिच्छांचं, विचार वाचनाचं, सूरमैफिलींच, श्रद्धा भक्तीचं, नजरेतल्या भावाचं, योगनिद्रेचं, कलाकल्पनेचं…!की जे मनाला मोडकळीस येण्यापासून वाचवतं. मरगळ येऊन कोरड्या ठक्क पडलेल्या वृत्तीवर हे वंगण पूर्ववत जगण्याकडे अलगद घेऊन जातं.

लहानपणी आजी सगळ्या नातवंडांना ओळीत बसवून चहाबरोबर एरंडेल पाजायची…प्यायचं म्हणजे प्यायचं …कितीही आदळापट केली तरी ती तिचा हेका सोडायची नाही. पोट आतड्याचं ते वंगणच आहे…महिना दोन महिन्याने एकदा घेतलं की पोटाचं काम निर्धोक चालू राहतं…आणि तुम्ही मग आबरचबर हादडायला मोकळे…कानात तेल, नाकात दोन थेंब तूप, डोक्यावर बुदलीभर कोमट तेल… शनिवारी रात्रीचा हमखास वंगणाचा कार्यक्रम कित्येक वर्षे आमच्या पिढीने खरं तर अनुभवला. रात्री झोपल्यावर कधीतरी काशाच्या वाटीने तळपाय घासून द्यायची…शरीरातल्या उष्णतेवरचं तिचं ते वंगण होतं.खरं तर जन्मापासून हे वंगण वेगवेगळ्या रुपात आपली सोबत करत राहतं…आपले शारीरिक, आर्थिक, मानसिक मार्ग निर्धोक करत राहतं. कारण स्निग्धता हा भाव ओतप्रोत या वंगणात भरलेला आहे.

जाईल तेथे मऊपण पेरणं, कोरडेपण, गंज मिटवणं आणि पूर्वस्थितीत आणून सोडणं…. हा (स्व) भावच आहे वंगणाचा !

क्षमा, सोडून देणं, माघार घेणं, प्रसंगानुरूप मदतीला जाणं, हळूवार फुंकर घालणं, स्वच्छ शुद्ध अंतःकरणाने समोरच्याशी शांतपणे बोलणं…हेही नाती जपण्यासाठी लागणारं एक प्रकारचं वंगणच आहे.

वंगण नसतं तर जगात फक्त खडखडाटच ऐकू आला असता, असं मला नेहमी वाटतं…जीवनातले स्निग्धांश संपले तर फक्त कोरडेपण उरेल…आणि कोरडेपण क्षणात भस्मसात होऊन जातं ! त्यामुळे जगण्यात येणारे हरएक प्रकारचे वंगण जपणे, प्रसंगी ते वापरणे फार आवश्यक आहे. निर्जीव मशीनसामग्रीला जिथं त्याचं महत्व समजतं, तिथं तुमच्या आमच्यासारख्या जीवांनी ते जाणलंच पाहिजे….त्याचं जतन केलंच पाहिजे…तर जगणं लयीत..सुसह्य…होत राहील ! हो ना…?

लेखिका : सौ विदुला जोगळेकर

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भावाचे माहेरपण… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ भावाचे माहेरपण… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

 “हे काय,चक्क स्वतःचा शर्ट स्वतः इस्त्री करतोयस, यावेळी इस्त्रीवाल्याला नाही का द्यायचा..?” अनुने पर्स टेबलावर ठेवत विचारलं आणि ती पाणी पिण्यासाठी किचनकडे वळली देखील,…

अभी जाम मूडमध्ये ओरडला, ” मै मायके चला जाऊंगा तुम देखती रहीयो,..” पाणी पिताना येणारं हसू दाबत..अनुने हातानेच खुणावलं,..आणि घोट गिळत विचारलं, ” नक्की बरा आहेस ना..?”– अभी अगदी फुल मूड मध्ये,..” हम तो चले परदेस,…हम परदेसी हो गये,..”

आता अनु त्याच्याजवळ जात त्याला दटावत म्हणाली,” अभ्या नाटकं नको हं, पटकन सांग काही दौरा आहे का कम्पनीचा,..?”

“ नाही मॅडम मी खरंच माहेरी चाललोय,..पुण्याला..” अनुने लाडाने त्याला पाठीत हलकी चापट देत म्हटलं,..

” ताईंकडे चाललास ना, मग असं सांग ना,.. हे काय नवीन,.. म्हणे माहेरी चाललो,..”

अभिने शर्टची घडी केली, इस्त्री बंद केली आणि तो वळला अनुकडे, तिचा हात हातात घेऊन म्हणाला..” म्हणू दे मला, हा शब्द छान वाटतोय,..यंदा तू माहेरी गेलीस दिवाळीत,.. मग तायडी आणि माझंच राज्य होतं,.. भाऊबीजेला ओवाळलं तिने मला आणि माझ्या हातात तिने हे तिकिटाचं पाकीट ठेवलं,..” मी म्हटलं, ” अग, मला ओवाळणी देतेस काय,.?”

तर ताई म्हणाली,..” ओवाळणी नाही रे, तुला माहेरपणाला बोलावतीये,..”

मी जोरजोरात हसायला लागलो,.. तसं तिने मला जवळ घेतलं..खूप रडली गळ्यात पडून. म्हणाली, ” आई बाबा गेले आणि तू किती मोठा होऊन गेलास अभ्या,..त्यांची उणीव आम्हाला भासू न देता आमचं माहेर जपत राहिलास,..तुझ्या बायकोचं श्रेय आहे त्यात. पण तिला माहेर तरी आहे,..तुला कुठे रे माहेर,..? कधीतरी मनात खोल दडलेल्या आपल्या लहानपणीच्या आठवणी आपण ज्याच्यासोबत जगलो, त्या उजळवण्याची जागा, माहेर असते,..आई बाबा गेले की पुरुषाची ती जागा नक्कीच हरवते ना..मग मला वाटलं आपण माहेरी जाऊन आलं की तुला माहेरी बोलवायचं- म्हणजे माझ्याकडे.. अनु आली की तू निघणार आहेस..तिकीट मुद्दाम बुक करून दिलंय म्हणजे उगाचच म्हणायला नको,..गाड्यांना गर्दी आहे,..मी वाट बघेन तुझी, “ एवढं सांगून तायडी गेली,..

“ आता मी चाललो माहेरी,.. जाऊ ना राणीसरकार,..?”

अनु म्हणाली, “आता मी तुला इमोशनल ब्लॅकमेल करते,..” नको जाऊस ना माहेरी,मला करमत नाही,..प्लिज, आपण मज्जा करू,..थांब ना,..” एवढं बोलून अनु खळखळून हसायला लागली,..तसं अभिने तिला जवळ ओढलं,.. कुजबुजत्या स्वरात म्हणाला, ” खरंच नको जाऊ का ग..?” अनु म्हणाली, ” जा बाबा जा, जिले तेरी जिंदगी,..तुलाही कळेल काय असतं क्षणभर तरी माहेरी जाणं,.. आपल्या विषयी फक्त प्रेम असणाऱ्या कुशीत शिरून येणं,.. मायेचा हात, आठवणींचा पाट सतत गप्पांमधून वाहणं… सगळी भौतिक सुख एकीकडे आणि हे अनमोल सुख एकीकडे असतं,..”

अभि म्हणाला, ” अस्सं….. मग येतोच हे सुख उपभोगून,..”

अनु त्याला बसमध्ये बसवून आली,.. तिला वाटलं, खरंच भारी कल्पना आहे ही, भावाला माहेरपण करायचं,….तिने लगेच स्वतःच्या भावाला फोन लावला,.. “ ये ना दोन दिवस, अभि गावाला गेलाय, मला सोबत होईल तुझी,..” दुसऱ्या दिवशी भाऊ हजर,..

दोन्हीकडे माहेरपण रंगलं,..बहिणीच्या मांडीवर डोकं ठेवून आठवणींच्या गप्पांना ऊत आला,..कधी झरझर डोळे वाहिले तर कधी खळखळाटाने डोळे गच्च भरून आले,..एक नातं घट्ट होतं, ते आणखी विश्वासाने घट्ट झालं,..भावाचं माहेरपण बहिणीच्या अंगणी फुलून आलं.

संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जगातील पहिले प्रेमपत्र… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

? विविधा ?

☆ जगातील पहिले प्रेमपत्र… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

आजकाल मोबाईलच्या वापरामुळे पत्रलेखन जवळपास थांबल्यासारखेच झाले आहे. पण काही वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीच्या पत्राची वाट पाहण्याचा काळ होता. पत्र लिहिणाऱ्याच्या भावना पत्रात उतरत आणि ते ज्याला लिहिले आहे त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचत. म्हणून तर प्रिय व्यक्तीची पत्रे जपून ठेवली जात. त्यांची पुन्हा पुन्हा पारायणे होत असत. हिंदी चित्रपटात तर या गोष्टीचा उपयोग करून गीतलेखकांनी अनेक गाणी लिहिली आहेत. आणि ती कमालीची लोकप्रिय होऊन लोकांच्या ओठांवर आली. नायिकेने नायकाला प्रेमपत्र लिहावे, पोस्टमन हा त्यांच्यामधला पत्र पोहोचवणारा दूत. कधी कधी नायिकेला पत्र लिहिता येत नाही. मग ती पोस्टमनलाच सांगते

खत लिख दे सावरियाके के नाम बाबू

कोरे कागज पे लिख दे सलाम बाबू

वो जान जायेंगे, पहचान जायेंगे.

त्या नायिकेला एवढा विश्वास आहे की आपले फक्त नाव असलेले पत्र त्या प्रियकराला मिळाले की बाकी सगळं तो समजून जाईल.

पण तुम्हाला माहित आहे का की रुख्मिणीने श्रीकृष्णाला लिहिलेले पत्र हे जगातील पहिले प्रेमपत्र असावे. किती बुद्धिमान म्हणावी रुख्मिणी ! आणि तिच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमीच. मी असे का म्हणतो त्याला कारण म्हणजे त्या वेळची परिस्थिती. रुख्मिणी ही विदर्भराजा भीमकाची सुंदर आणि बुद्धिमान कन्या. लहानपणापासूनच श्रीकृष्णाच्या पराक्रमाच्या कथा तिच्या कानावर आल्या होत्या. आणि त्या ‘ सावळ्या सुंदरास ‘ तिने मनानेच वरले होते. पण तिचा भाऊ रुख्मी हा श्रीकृष्णाचा द्वेष करणारा होता. त्याच्या मनात तिचा विवाह शिशुपालाशी व्हावा अशी इच्छा होती. शिशुपाल हा सुद्धा श्रीकृष्णाचा द्वेष करणारा होता. रुख्मीने आपल्या बहिणीवर म्हणजे रुख्मिणीवर अनेक बंधने लादली होती. ती तिच्या स्वतःच्या मर्जीने कोठेही जाऊ शकत नव्हती. अशा वेळी तिच्या हातात काहीही नव्हते. तिचे आईवडील सुद्धा रुख्मीपुढे हतबल झाले होते.

त्यामुळे अशा परिस्थितीत तिच्या डोक्यात श्रीकृष्णाला पत्र लिहिण्याचा विचार येणे ही गोष्टच तिच्या बुद्धिमत्तेची निदर्शक आहे. पत्र लिहिणे आणि ते श्रीकृष्णाला पाठवणे आणि नंतर त्याच्यासोबत पळून जाऊन विवाह करण्याचे धाडस दाखवणे या तिच्या कृतीचे, गुणांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

आपल्या पत्रात  ती श्रीकृष्णाला म्हणते

” हे भुवनसुंदरा, जेव्हापासून मी तुझे गुण ऐकले आहेत, तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडले आहे. आणि तुला समर्पित झाले आहे. तू माझे हरण करून घेऊन जा. तुझ्यासारख्या सिंहाचा भाग शिशुपालरूपी कोल्हा नेतो आहे असे कदापि होऊ नये.

साधना, संस्कार, प्रीती, भक्ती इत्यादि धन घेऊन मी येईन. मी सतत तुझी पूजा करून काही पुण्यकृत्ये केली आहेत, आणि मनाने तुला वरले आहे. आता प्रत्यक्षात माझा स्वीकार कर.

अंबेच्या देवळात मी गौरीपूजेसाठी जाईन, तेव्हा तू माझे मंदिरातून हरण कर. आणि पराक्रमाने शिशुपालादिकांना हरवून राक्षसविधीने माझे पाणिग्रहण कर.

तू आला नाहीस तर मी समजेन की माझ्या साधनेत काही कमतरता राहिली असेल. तू मला या जन्मी लाभला नाहीस तर मी प्राणत्याग करीन, पण जन्मोजन्मी तुझी वाट पाहीन, आणि अंती तुझीच होईन !!”

या पत्रातला मला आवडलेले वाक्य म्हणजे ती श्रीकृष्णाला म्हणते , ” साधना, संस्कार, प्रीती, भक्ती इ धन घेऊन मी येईन. ” किती सुंदर विचार. आणि लाख मोलाचे धन. पैसा नाही, हुंडा नाही, वस्तू नाही. तर साधना, संस्कार, प्रीती आणि भक्ती या सुंदर भावना हेच धन. आणि तेच ती घेऊन येते. आणि श्रीकृष्ण जिचा सखा आहे, पती आहे तिला आणखी काय हवे ? आणि त्या श्यामसुंदराला सुद्धा कशाची अपेक्षा असते ? तुमची साधना महत्वाची. संस्कार महत्वाचे. प्रीती आणि भक्ती महत्वाची. तुम्ही भक्तिभावाने आपले हृदय त्याला अर्पण करा, म्हणजे तो रुख्मिणीप्रमाणे तुमचेही हरण करील. तुम्ही त्याचे होऊन जाल. हाच तर या पत्रातला आपल्या सगळ्यांसाठी संदेश आहे,  नाही का?

©️ विश्वास देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भगवंताने हे जग तुम्हाला खेळायला दिलंय… श्री श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ भगवंताने हे जग तुम्हाला खेळायला दिलंय… श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

१९८७ साल असेल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु करून ३-४ वर्षं झाली होती. आम्हा तीन पार्टनरपैकी एक पार्टनर विलास भावे छोट्याश्या ऑपरेशनचे निमित्त होऊन गेला. मोठा धक्का होता. पण शो मस्ट गो ऑन. मी आणि माझा पार्टनर श्रीहरी ह्या धक्क्यातून सावरलो. एक वर्षात नवीन जागा घेतली आणि तिथे स्थलांतर करून व्यवसाय वाढवायला सुरवात केली. नव्या जागेत जाताना, आज विलास हवा होता ही खंत होतीच. पण परमेश्वरी इच्छा वेगळीच होती. व्यवसाय वाढत होता. कामगार आणि स्टाफ वाढला, १८-२० पर्यत गेला. संख्या वाढली तशी दर महिन्याच्या ओव्हरहेडचे गणित आणि बँकेचे हप्ते जुळवणे सुरु झाले. ऑर्डर होत्या, पण त्या वेळेत पूर्ण व्हाव्यात म्हणून व्यवसायाला शिस्त आणि सिस्टीम लावणे सुरु होते. आम्हा दोघांचे वय तिशीचे आणि बहुतांश नोकर आमच्यापेक्षा २-३ वर्षेच लहान. दोघे-तिघे तर वयाने मोठेच होते. कधी कधी ताण येत असे. त्या काळात फोनचा नंबर लागायला १०-१० वर्षे लागत. नव्या जागेत OYT special कॅटेगोरीत तब्बल १०हजार रुपये भरून फोन कनेक्शन घेतले. या दहा हजाराची जुळवाजुळव अनेक महिने चालू होती. एकंदर घडी बसत होती. कॉम्प्यूटर नव्याने येऊ लागले होते. त्यासाठी लागणारे UPS आम्ही बनवत होतो. डिमांड होती. डीलर नेटवर्क होते. महिना सधारण ४०-५० UPS विकले जात. इतरही काही प्रॉडक्ट होती. electronic product असल्याने आवश्यक components सहज मिळत नसत. इम्पोर्ट करण्यास बंदी असल्याने अनेक गोष्टी राजरोसपणे स्मगल करून येत. कोणास ठाऊक कसे? पण 

लघुउद्योगांना त्या मिळत. अर्थात विक्रेते सांगतील त्या किमतीत. सभोवताली उद्योगास अनुकूल असे कोणतेच वातावरण नव्हते. पण तरुण वय, काहीतरी करायची जिद्द त्यामुळे जाणवायचं नाही. उद्योग हा अशाच प्रतिकूलतेत करायचा असतो, अशीच ठाम धारणा. त्यामुळे ठीक चालले होते. कधी कधी ताण यायचा पण पुन्हा सर्व विसरून काम सुरू व्हायचे.

नव्या ऑफिसच्या केबिनमध्ये आम्हा दोघा पार्टनरांची टेबले शेजारी होती. दोन खुर्च्यांमध्ये एका स्टुलावर फोन असे. फोनचे मध्ये असणे ही दोघांची सोय होती. एक दिवस सकाळी १०चा सुमार असेल, मी फोनवर कोणाशी तरी बोलत होतो. माझे बोलणे काहीसे लांबत चालले होते. श्रीहरीला देखील कोणाशी तरी बोलायचे असल्याने माझे संपण्याची वाट बघत होता. तेवढ्यात समोर एक भगवी कफनी घातलेले साधारण पन्नाशीचे गृहस्थ येऊन उभे राहिले. ‘कुलकर्णी आहेत का?’ असे विचारते झाले. त्यांना मी हाताने खूण करून थोडे थांबण्यास सांगितले व फोनवरचे बोलणे सुरूच ठेवले. त्यांनी मला उलटी खूण केली- ‘तुमचे चालू द्यात, मी थांबतो. काही घाई नाही.’ कदाचित मी कुणावर तरी रागावलो होतो, आवाज जास्तच चढत होता. फोनवर एका सप्लायरवर उशिरा मटेरियल देण्याबद्दल बहुदा रेशन घेत होतो. बोलता बोलता ५ मिनिटे झाली, १० झाली, १५ मिनिटे झाली. आमची नजरानजर झाल्यावर गृहस्थ शांतपणे ‘असूद्या असूद्या तुमचं चालू द्यात’ अशी खूण करत. मी बोलता बोलता मनात विचार करत होतो- ‘भगवे कपडे घातलेले माझ्याकडे कशाला आले असतील? काही देणगी वगैरे मागायला असतील बहुदा. देणगी मागितली तर यांना कसे कटवता येईल?’ आत येताना त्यांनी माझे नाव घेतल्याने श्रीहरीनेदेखील त्यांना कशासाठी आलात? काही मदत करू का? असे विचारले नाही. त्याच्या डोक्यातही भगव्या कफनीमुळे असाच काहीसा संभ्रम झाला असावा. माझे बोलणे संपले. मी फोन ठेवला, तर श्रीहरीने झडप घालूनच उचलला कारण तो फोनसाठी फार काळ ताटकळला होता. फोनवर मी तावातावाने बोलताना का कुणास ठाऊक उगाचच उभा राहून बोलत होतो. माझा बोलणे झाले, तोच त्या गृहस्थांनी मलाच बसायला सुचवले. ‘माझ्याच केबिनमध्ये मला बसायला सांगणारे हे कोण?’ असा मनात मी विचार करत होतो. तोच ते म्हणाले “नमस्कार कुलकर्णी, शांत झालात का?” मी थोड्या गुर्मीतच “होय” असे म्हटले. त्यानंतर ते गृहस्थ म्हणाले.  “कुलकर्णी आपण व्यवसायाचं नंतर बोलूयात का? मी बराच वेळ तुम्हाला फोनवर कोणाशीतरी बोलताना ऐकतोय. तुम्हाला एक सांगू का? अहो गरज नाहीये एवढे रागावण्याची. तुम्ही कोणाशी बोलत होतात हे तुम्ही मला सांगू नका. त्याची गरजही नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, असा विचार करा की तुमच्या सभोवतालची सर्व माणसे तुम्हाला परमेश्वराने खेळायला दिली आहेत. खेळताना आपण रागावतो का? खेळताना आपण खिलाडूवृत्तीने खेळायचं. इतकं रागवायची गरज नसते.” मी एका सप्लायरबरोबर बोलत होतो, त्याने माल वेळेत न दिल्याने आमची डिलिव्हरी वेळेत होणार नव्हती. मी त्यांना म्हणालो “ अहो यांना Advance देऊनही  वेळेत माल देत नाहीत. मी कस्टमरला काय सांगू. तुम्ही माझ्या जागी असाल तर काय कराल.”

बाबा शांतपणे म्हणाले “ तुम्ही रागावलात. आता ते वेळेत माल देणार का?”

“अहो नाही ना. वेळेविषयी बोलतच नाहीत”…मी

“ हे बघा तुमच्या रागाने ते डिस्टर्ब झाले. त्याचीही काही मजबुरी असेल. तुमचा राग ते दुसऱ्यावर काढतील. बाकी वेगळे काय घडेल? मी तुम्हाला सांगतो. तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे खिलाडूवृत्तीने बघा. अहो हे तुमचे शेजारी बसलेले पार्टनर, बाहेर काम करत असलेला तुमचा स्टाफ, तुमची बायको, मुलं, आई-वडील, सप्लायर, कस्टमर, सरकारी अधिकारी, आता तुमच्याशी बोलत असलेला मी– हे सगळंसगळं खेळायला दिलंय अशा दृष्टीकोनातून जीवनाकडे बघा. बघा कशी मजा येते ते. या खेळात जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे भिडू मिळतील. गीता हेच सांगते. ”

महाराज बोलत होते त्यात तथ्य वाटत होते. कुठेतरी मी आतून हललो होतो. कुठेतरी प्रकाश पडत होता.  

“बरं आता मी माझ्या येण्याचे प्रयोजन सांगू का? मला माझ्या मुलासाठी एक UPS घ्यायचाय. मला तुमचे नाव श्री. अमुक यांनी सांगितले. ते म्हणाले कुलकर्णीचा UPS घ्या. मी २ वर्षे वापरतोय उत्तम आहे.”

“ बापरे, बसा ना. सर सॉरी मी तुम्हाला बसा देखील म्हटले नाही.” …मी. समोर उभे असलेले गृहस्थ देणगी मागायला आलेले साधू नसून माझे कस्टमर आहेत हे कळल्यावर माझी होणारी सहाजिक प्रतिक्रिया.

“ असू देत. मी माझी ओळख करून देतो. मी शितोळे. पुण्यातले प्रसिद्ध सरदार शितोळे तुम्हाला माहित असतील तर त्यांच्यापैकी. कसब्यात एकमेव उत्तम स्थितीत असलेला दगडी वाडा आमचाच. मोठे ऐतिहासिक घराणे आहे आमचे. पेशव्याचे सरदार होतो आम्ही. अर्थात आजची ती ओळख नाही. मी अमेरिकेत योग शिकवतो. गेली अनेक वर्षे देशात परदेशात योगाचा प्रसार करतो. माझे बहुतांशी वास्तव्य अमेरिकेत असते. या भगव्या कपड्यांवर जाऊ नका. तो माझा व्यावसायिक युनिफार्म आहे. तसा मी सांसारिक आहे. मुलाला कॉम्पुटर इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला, त्याच्या कॉम्पुटरसाठी UPS हवा, हे आपल्या भेटीचे प्रयोजन. मला घाई नाही. UPSची किंमत सांगा. तुमचे सर्व पैसे आत्ताच देऊन टाकतो. तुम्ही म्हणाल तेव्हा मुलगा येऊन UPS घेऊन जाईल. तुमच्या बोलण्यावरून थोडा उशीर होणार असे दिसतेच आहे. हरकत नाही. पण उत्तम वस्तू द्या.”

मी अवाक होऊन बघत होतो. माझ्यासमोर एक योगी गुरुस्वरूप होऊन उभा होता. माझ्या करंटेपणामुळे त्यांना ओळखले नाही. माझे हे गुरु जाताजाता मला मंत्र देऊन गेले “ कुलकर्णी भगवंताने हे सर्व जग तुम्हाला खेळायला दिलं आहे. अनेक भिडू तुम्हाला मिळतील, येतील आणि जातील सुद्धा. तुमचा डाव आहे तोपर्यंत खेळायचं. आणि आनंदी राहायचं, आनंद द्यायचा आणि घ्यायचा देखील. बघा जमतंय का? जमलं तर मिळणारा आनंद तुमचाच. कोणी हिरावून घेणार नाही.”

शितोळेगुरूंना मी नंतर आजतागायत भेटलो नाही.  पण “ कुलकर्णी, भगवंताने हे जग तुम्हाला खेळायला दिलंय ” 

हे शब्द मात्र कायम कानात घुमतात. आयुष्यातले अनेक प्रसंग मी ह्या मंत्राने निभावून नेले आहेत.  आज गुरुपौर्णिमेनिमित्त सहज या गुरूंची आठवण झाली म्हटलं लिहून काढावं. जगण्याचा साधा मंत्र आहे- सर्वाना सांगावा.  

लेखक : श्री श्रीकांत कुलकर्णी

९८५००३५०३७

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शोध स्वतःचा… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ शोध स्वतःचा… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

दोन माणसे प्रवासाला निघाली. दोघांचेही स्थान एकच असल्याने त्यांनी एकत्र प्रवास केला.

सात दिवसांनंतर त्यांना वेगळे होण्याची वेळ आली.

पहिला प्रवासी : “ भाऊ, आपण आठवडाभर एकत्र राहिलो. तुम्ही मला ओळखलंत का?”

दुसरा प्रवासी : “ नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, परंतु आपण एकत्रच प्रवासात होतो, एवढं मात्र खरं…”.

पहिला प्रवासी : “ सर, मी एक प्रसिद्ध ठग आहे पण तुम्ही नक्कीच महान ठग आहात… तुम्ही तर माझे गुरु   निघालात….!” 

दुसरा प्रवासी : “ कसे काय?” 

पहिला प्रवासी : “ काहीतरी चोरी होईल या आशेने मी सतत सात दिवस तुमच्या वस्तूंचा शोध घेतला, पण काहीच सापडले नाही. तुम्ही एवढ्या लांबच्या प्रवासाला निघालात आणि तुमच्याकडे काहीच नाही ! तुम्ही पूर्णपणे रिकाम्या हाताने आला होतात काय ?” 

दुसरा प्रवासी : “ माझ्याकडे एक मौल्यवान हिरा आणि काही सोन्याची नाणी आणि खर्चापाण्यासाठी काही पैसे होते.” 

पहिला प्रवासी : “ मग खूप प्रयत्न करूनही मला ते का सापडले नाहीत?” 

दुसरा प्रवासी : “ मी जेव्हा कधी बाहेर जायचो, तेव्हा मी हिरे, नाणी आणि पैसे तुमच्या पिशवीत ठेवत असे, इतके दिवस तुम्ही माझी पिशवी शोधत राहिलात ! तुम्ही  तुमचं स्वतःचं गाठोडं शोधण्याची तसदी घेतली नाही, तर मग तुम्हाला काहीही सापडेल, अशी अपेक्षा कशी करायची ?

तात्पर्य : ईश्वर नेहमी आपल्या झोळीत आनंद ठेवतो, पण आपल्या गाठोड्याकडं बघायला आपल्याला वेळच नाही !  ज्या दिवशी आपण इतरत्र सुख शोधणे बंद करू, तेव्हाच आपण आपले सर्व प्रश्न सोडवू.

जीवनातील सर्वात मोठा गूढ मंत्र म्हणजे स्वतःचा शोध घेणे आणि जीवनाच्या मार्गावर पुढे पुढे जाणे !

संग्राहक –  श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ सात सुरांची साथ नव्यांची… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ सात सुरांची साथ नव्यांची… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… तू जो मेरे सुर मे सुर मिलाके, संग गाले, तो  जिंदगी हो जाए सफल… सा रे ग म प ध..नी सा… ये म्हणा कि गं तुम्ही पण माझ्या बरोबर.सात सुरांची साथ नव्याची ऑडिशनला आपल्याला उदया जायचयं! आहेना लक्षात? आपल्या सातही जणींची  फायनला निवड पक्की होणारच.केशरबाई तू काळी दोन मधे सुरु करशील.पिवळाक्का तुम्ही काळी चार घ्या बरं. उदयाचा विठूचा गजर टिपेला न्या. तुम्ही दोघी करडू दिदी  यमनचा षड्ज द्रुतलयीत लावाल. मी आणि ग्रे ताई मालकंस नि भैरवी ने मंद्र सप्तकात सांगता करू.

…परिक्षक कोणी असले तरी आपण घाबरायचं नाही. घाबरायचं त्यांनी आपल्याला. एक सुरात म्याँव म्याँव करून त्यांना सळो कि पळो करु.पायात घुटमळत राहू.तोंड पुसत पुसत त्यांना आपली निवड करायला भाग पाडू.नाहीतर अंगावर फिस्कारुन येउ म्हणावं हि धमकी देऊ.आमच्या शिवाय स्पर्धा होणे नाही!आम्ही नसलो तर स्पर्धा उधळून लावू. इतकंच नाही तर विजेते आमच्यातलेच असतील.बाहेरचा कुणी दिसलाच तर स्पर्धेत फिक्सिंग झाले असण्याचा संशयाचा धुरळा मेडियात उडवू देउ अशी तंबीच त्यांना देउ या; आणि आपले सगळेच नंबर आले तर स्पर्धा खेळी मेळीत निकोप वातावरणात झाली,उदयाच्या नव्या गायकांना प्रोत्साहन प्रेरणा अश्या स्पर्धेतून मिळते,म्हणून अश्या स्पर्धा सतत होणं गरजेचे आहे असं मेडियाला मुलाखत देताना तोंड फुगवून सांगूया.यातूनच जे आयोजक, ठेकेदार यांचे उखळ कायम पांढरे होत जाईल. टीआरपी वाढला कि स्पर्धेचे एपिसोड वाढतील.चॅनेल वाल्यांची चांदी आणि नव्या गायकांची एक्सपोजरची नांदी होईल.तेव्हा उदया

“… सारे के सारे गा मा के लेकर गाते चले….”  कोरस हम साथ साथ मे म्हणू या… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक संवाद… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? मनमंजुषेतून ?

☆ एक संवाद… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

“अगं,अगं, किती ग त्रास देतीयेस ! अतीच करतीस बाई! तुला भूक लागलीय का? काय हवंय खायला? तुला भात आवडत नाही .पोळी आवडत नाही. सारखा खाऊ दे म्हणतीस, छोट्या छोट्या गोळ्या हो ना ? दूध दिलं तर नाटकं किती करतीस गं ! एकदम थंड असलं तरी चालत नाही. जरासं गरम असलं तरी चालत नाही. शिळं आवडत नाही. ताजंच हवं. तेही वारणा पिशवीचं असलं की मग कसं भराभर जातं बरं पोटात.

सकाळी, सकाळी उठल्याउठल्या तुला खेळायची हुक्की येते. माझी साडी धरून, ओढून खेळायला चल म्हणतीस. पण मला वेळ असतो का ग तेव्हा? आणि काय गं, तुला खेळायला दोन छोटे बॉल आणून दिले होते ना, एक पांढरा- एक लाल, ते कुठं घालवलेस बरं? नुसती माझ्याकडे बघत राहिलीयेस.

अगं तो रोज सकाळी गोरा, गोरा, गब्बू ,गब्बू राजकुमार येतो ना, त्यालाही भूक लागते. त्यालाही खाऊ हवा असतो म्हणून तो येतो. तुला तो आवडत का नाही बरं ?आणि त्याचा राग का येतो बरं? किती छान आहे दिसायला. आणि किती गरीब आहे ना ! घरात आला की, त्याला हाकलून लावतेस. तो पण मग म्हणतो, बाहेर ये- मग तुला दाखवतो बरोबर. अगं त्याची ताकद तुझ्यापेक्षा जास्त आहे ना ! बाहेर गेलीस की तुझ्याशी भांडतो ना ? मग कशी घाबरून घरात पळून येतीस गं.

तुझी झोपायची पण किती तंत्रं. गादीवर सुद्धा काहीतरी मऊ मऊ, म्हणजे माझी कॉटन साडी तुला लागते. मग महाराणी निवांत झोपणार. झोपायच्या अगोदर सगळ्यांच्याकडून “अंग चेपून द्या, लाड करा,” म्हणून मागे लागतेस, हो ना ? आणि मग घरातलं प्रत्येकजण तुझी कौतुकं करत बसतात. प्रत्येकजण तुला मांडीवर खांद्यावर घ्यायला बघतात. पण तुला ना, कोणी उचललेलंच आवडत नाही. कोणी पापे घेतलेले आवडत नाही. असं का ग ? किती गोड आहेस ग ! म्हणून तर तुझं नाव ‘ रंभा ‘ ठेवलंय ना ! तुला कपाळाला टिकली लावली की, किती सुंदर दिसतेस .अगदी तुझी दृष्ट काढावीशी वाटते बघ.

तुझी आई किती शांत आहे ना ! ती बाहेरून, दुसरीकडून आलेली, म्हणून ती घरातली सून. आणि तू तिची मुलगी. याच घरात जन्माला आलीस ना? तू नात म्हणून सगळ्यांची जरा जास्तच लाडूबाई. म्हणशील ते लाड पुरवतो आम्ही  सगळेजण. तरीपण जराही अंग धरत नाहीस. बारीक ती बारीकच राहिलीस बाई !.सारखी इकडून तिकडे धावत असतीस ना. चालताना सुद्धा, शांतपणे आणि सावकाशपणे चालणं कसं  ते तुला माहीतच नाही. मी तर तुला तुडतुडीच म्हणते.

अगं रंभा ,मी एकटीच बडबडत राहिलेय.  तू काहीच बोलत नाहीयेस. रागावलीस का ? कशी ग माझी मुलगी ! बोल ना काहीतरी .बोल की ग.  बोल. बोल.” — 

“ म्याव, म्याव,  मियाव  मियाव, म्याऊ, म्याऊ…….”  

(आमच्या घरातील तीन मांजरांपैकी एकीशी केलेला संवाद.) 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘Admiral’ कान्होजी राजे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘Admiral’ कान्होजी राजे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

काल, ट्विटर वर कोणीतरी पोस्ट केलं होतं की सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे नाव गुगल सर्च केल्यावर ‘Pirate’ म्हणजे ‘ समुद्री डाकू ‘ म्हणून येत आहे. याची शहानिशा करून घ्यावी म्हणून मी सुद्धा सर्च केलं आणि खरंच गुगल वर दुर्दैवाने सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या नावाच्या description खाली pirate लिहिलेले होते.

मुळात, या गोष्टीवर आक्षेप का घ्यावा, याचं संक्षिप्त रुपात उत्तर देतो. ज्या वेळेला पोर्तुगीज, ब्रिटीश, डच आणि इतर काही परकीय हल्लेखोर भारताच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या ठिकाणांवर हल्ला करीत होते, लुटत होते, तेव्हा कान्होजी राजांनी त्यांना चांगला ‘सडकवून’ काढला होता. 

कान्होजी राजांच्या भयामुळे अनेक हल्लेखोर त्यांच्या भागात यायचा विचार सुद्धा करत नव्हते ! कान्होजींच्या शौर्याच्या कथा खूप आहेत. कालांतराने, १९५१ साली मराठा नौदलाचे ‘Admiral’ कान्होजी राजे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘INS ANGRE’ या नावाने एका ‘Stone Frigate’ ला नाव देण्यात आले.

कान्होजी राजांचे योगदान अतुलनीय आहे ! पण दुर्भाग्य बघा, इतक्या शूर वीर नौका-नायकाला ‘Pirate’ म्हणून संबोधले गेले आहे ! ही गोष्ट वेळीच सुधारणे गरजेचे आहे. याकरिता आपण एक काम करू शकतो.

  1. गुगल वर जाऊन ‘कान्होजी आंग्रे’ सर्च करा !
  2. नावापुढे दिसणारे तीन डॉटवर क्लीक करून ‘send feedback’ वर क्लिक करा ! आणि ‘Pirate’ या शब्दाच्या बाजूच्या एडिट बटणावर क्लिक करा.
  3. नवीन Window Open झाल्यावर तिथे ‘Inappropriate’ किंवा ‘Incorrect’ वर क्लिक करून ‘फीडबॅक’ मध्ये ‘Maratha Navy Admiral’ असे लिहून सेंड करा !

जास्ती जास्त संख्येने ही गोष्ट करा ! आणि लोकांना देखील असे करण्यासाठी आव्हान करा ! कारण हा इतिहास लोकांना माहित असायलाच हवा. सन्मान क्वचित होतो, पण बदनामी मात्र सहज केली जाते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. 

लेखक : अज्ञात

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares