… आमच्या शरीरांना पेशन्स मंजूर होता; तुमच्या मनालाच तो नकोय….
… काय आहे बाळा, जमणं – न जमणं हे क्षमतेवर अवलंबून असतं. आणि क्षमता जाणीवपूर्वक डेव्हलप करायची असते..! …….. “
जगता आलं पाहिजे… मरता केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृव उजळता आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आली पाहिजे. यशानं माणूस उंच जातो तेव्हा पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसंही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे. ताठ काय कोणीही राहतं, पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला, पुन्हा चालता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग घेऊन, वेडं होता आलं पाहिजे. कशाला बळी न पडता, आनंदी जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूचा मिलाप करून. फक्त समाधानी राहता आलं पाहिजे…….
आयुष्य खूप सुंदर आहे… भरभरून जगता आले पाहिजे……
लेखक : अज्ञात
संग्रहिका : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पंढरपूर तीर्थक्षेत्र सर्वांना ज्ञात आहे. ते एक पवित्र धाम तर आहेच.पण ते शाश्वत धाम आहे. प्रलय कालात सुद्धा धाम नष्ट होत नाहीत. त्यापैकी पंढरपूर एक आहे.चंद्रभागा नदीला पूर्ण पंढरपूर बुडून जाईल इतके पूर अनेक वेळा आले.तरीही पंढरपूर होते तसेच आहे. आता उजनी धरणामुळे जास्तीचे पाणी रोखले जाते पण धरणात पाणी जास्त प्रमाणात असेल तर नदीपात्रात सोडले जाते.तेव्हा पंढरपूरला अजूनही वेढा पडतोच.
पंढरपूरचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण देवाचे चरणस्पर्श करू शकतो. ते अन्यत्र कुठेही नाही. कित्येक संतांना देवाने आलिंगन दिले होते यांचेही पुरावे अभंगात व इतर संतसाहित्यात आहेत. म्हणजे उराउरी भेट, आणि चरणस्पर्श फक्त श्री विठ्ठल रखुमाईलाच भक्त करू शकतात. मुख्य गाभाऱ्याच्या समोर गरूडखांब आहे. त्याला आलिंगन देण्याची प्रथा आजही आहे.
पंढरपूर जवळ पूर्वी दिंडीर नावाचा राक्षस मातला होता. देवाने त्याला ठार केलं. पण देवाच्या हातून मरण आले म्हणून स्वतःला धन्य समजून त्याने देवाला वरदान मागितले की या क्षेत्राला माझ्या नावाने ओळखले जावे. म्हणून पंढरपूर परिसर दिंडीरवन या नावाने प्रसिद्ध होता. देवावर रूसून रूक्मिणी माता याच दिंडीरवनात येऊन राहिली.अशा आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
रूक्मिणीच्या पाठोपाठ देव दिंडीरवनात आले. ( विठ्ठल हे श्रीकृष्णाचेच रूप मानले जाते.) इतर ठिकाणी भक्त भगवंताच्या भेटीला जातात. पण पंढरपूरला भगवंत भक्तांची वाट पहात विटेवर उभा राहिला आहे.कटीवरती हात आणि समचरण हे इथे देवाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्यक्ष संत नामदेव महाराजांना देवाने दृष्टांत दिला होता की मी इथे तुमच्यास्तव उभा आहे. आषाढी , कार्तिकी एकादशीला तरी मला भक्त भेटावेत.
इतर सर्वत्र देव अलंकारविभूषित व शस्त्रे धारण केलेले दिसतात.पण देवशयनी एकादशीला देव गोपवेषात असतात. विनाअलंकृत आणि तुळशीमाळा धारण केलेले देवाचे स्वरूप असते.
पंढरपुरातली ही विठ्ठल मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात की, जो ही मूर्ती घडविलेली आहे असे म्हणेल त्याला पाप लागेल. संत कधीच कुणाला दूषणे देत नाहीत. तरीही तुकाराम महाराज असे म्हणतात कारण ही मूर्ती खरोखरच स्वयंभू आहे.
त्या काळात लोक इतके गरीब होते की त्यांनाच खायला अन्न नसायचे. मग ते देवाला नैवेद्य कशाचा दाखविणार ? पंढरपुरात लोक ताकात पीठ कालवून तो नैवेद्य देवाला दाखवीत असत.अशी आख्यायिका आहे. पश्चिम द्वारा जवळ एका गल्लीत हे ताकपिठे विठोबा मंदिर आजही अस्तित्वात आहे. दहा वर्षापूर्वी सरकारी निकालानुसार बडवे आणि उत्पात यांचे देवाच्या पूजेचे व उत्पन्नाचे अधिकार काढून घेतले गेले. त्यानंतर पंढरपूरला बडवे मंडळींनी विठोबाचे एक मंदिर दुसऱ्या ठिकाणी बांधले आहे. तसेच उत्पात मंडळींनी रूक्मिणी मातेचे मंदिर बांधले आहे.
विठ्ठल हे श्रीकृष्णाचेच रूप मानले जाते कारण पंढरपूरला त्याच मंदिरात रूक्मिणी मातेचे मंदिर आहे. त्याच्या जवळच देवाच्या पत्नी राही, सत्यभामा यांच्या मूर्ती असलेले गाभारे देखील आहेत. श्रीविष्णूंनी वेंकटेश अवतार घेतला,ते वेंकटेश मंदिर ही मुख्य मंदिराच्या आवारात आहे.इतरही अनेक देव देवतांचे दर्शन तिथे घडते.
गोपाळपूर येथे दोन्ही वाऱ्या झाल्यानंतर गोपाळकाला होतो. तिथे श्रीकृष्ण मंदिर आहे. जवळच विष्णुपद मंदिर आहे. देव प्रथम पंढरपूरला आले, ते विष्णुपद मंदिर परिसरात आले. त्यांचे पाऊल इथे एका दगडावर उमटले आहे. चंद्रभागा नदीच्या पात्रात हे मंदिर आहे. दर मार्गशीर्ष महिन्यात देव इथेच येऊन राहतात,असे मानतात. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात लोक होडीतून किंवा चालत इकडे दर्शनासाठी आणि सहलीसाठी येतात.मार्गशीर्ष अमावस्येला पालखीतून मिरवणूकीने ,वाजत गाजत देवांच्या पादुका पुन्हा मुख्य मंदिरात आणल्या जातात.
चंद्रभागा नदी हीच गंगा नदी आहे .असे म्हटले जाते. विष्णुपदाजवळ चंद्रभागेला पुष्पावती नावाची नदी येऊन मिळते. तीच यमुना आहे असेही मानतात.
मातीची माती करणं थांबवशील का रे माणसा ? संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆
दररोजचं सकाळचं फिरणं आटपलं की पाच ते दहा मिनिटे काळ्या मातीत पडून शवासन करणे हा माझा शिरस्ता आहे. रोजच्याप्रमाणे शवासनात डोळे मिटून शांत पडलो होतो. तेवढ्यात कानात काहीतरी कुजबुज ऐकू आली. हळूच एक डोळा उघडून पाहिलं, भोवताली कुणीच नव्हतं. आवाज तर येतच होता. मग दोन्ही डोळे उघडून पाहिले, तरीही कोणी दिसत नव्हतं.आवाजाचा भास आहे असं समजून दुर्लक्ष करून पुन्हा डोळे मिटून पडणार एवढ्यात थोडा चढलेला स्त्री स्वर कानी पडला. “ अरे भोवताली काय बघतोस ? कानाजवळ बघ. मी माती बोलतेय. तुला निसर्गाची हाक ऐकू येते म्हणून तुझ्याशी बोलायचे आहे.”
… आणि ती पुढे बोलू लागली. मी फक्त ऐकत होतो.
“ जमिनीचा सर्वात वरचा थर म्हणजे माती. थोड्याशा जाडीचा आमचा थर तयार व्हायला हजारो वर्षे लागतात. पण आम्हाला नष्ट व्हायला तुफान पाऊस ,वादळीवारा पुरेसा आहे. ही संकटं कधीतरी येतात, त्यामुळे आम्हाला त्याची फारशी चिंता वाटत नाही. पण तुम्हा मानवाने सुरू केलेले पिकाऊ जमिनीत बांधकाम, सततचं उत्खनन व रासायनिक औषधी खतांचा अतिरेकी वापर यांमुळे जीव अगदी नकोसा झाला आहे. खरं तर मी बोलणारच नव्हते.
मीसुद्धा तुमच्या माणसातल्या स्त्री जातीसारखीच…
संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
😂 चं म त ग ! 😅 🥪 नवकोट नारायणाचे सँडविच ! 🥪 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
“घ्या पंत, तुम्हाला आवडत म्हणून कोपऱ्यावरच्या सँडविचवाल्या कडून मस्त बटर आणि चटणी जादा मारके असं सँडविच आणले आहे, घ्या खाऊन घ्या.”
“मी सँडविच सोडल आहे.”
“काय झालं, तुमच्या नात्यात कोणी गेल…. “
“काहीतरी बोलू नकोस. माझे सगळे नातेवाईक अगदी ठणठणीत आहेत.”
“नाही, तुम्ही सँडविच सोडल असं म्हणालात आणि कोणीतरी गेल्यावरच त्याच्या आवडीचा एक…… “
“तू मला अक्कल शिकवू नकोस. तुला एकदा सांगितले ना की माझे सगळे नातेवाईक ठणठणीत आहेत म्हणून.”
“मग सँडविच सोडल असं का म्हणालात आणि कधी पासून सोडलंत ?”
“आत्ता पासून.”
“पण मग सँडविच सोडायला काही वेगळे कारण घडले का ?”
“होय, अरे ती बातमी वाचली आणि मी या पुढे सँडविचला आजन्म हात लावणार नाही अशी बटर आणि चटणीच्या देखत शपथ घेतली.”
“कोणती बातमी ?”
“अरे भारतीय वंशाच्या एका नवकोट नारायणाने ज्या बँकेत तो काम करतो, त्याच बँकेच्या कॅन्टीन मधून सॅन्डविच चोरले आणि…. “
“काय सांगता काय पंत ? आणि नवकोट नारायण हे…. “
“त्याचे नांव अजिबात नाही. त्याला वर्षाला ती बँके नऊ कोटी वीस लाख रुपये पगार देत होती म्हणून मी त्याला नवकोट नारायण म्हटले. त्याचे खरे नांव…. “
“बापरे, काय सांगता काय पंत? ही बातमी तुम्हाला…. “
“कोणी दिली असच ना ? अरे नेट बिट बघतोस ना? मग तुला अजून ही बातमी कळली नाही म्हणजे नवलच आहे. अरे खरं तर तूच मला ही बातमी….. “
“अहो वाचलीच नाही तर काय सांगणार आणि तुम्ही त्याला पगार मिळायचा असं का म्हणालात …… “
“अरे बँकेने त्याला ताबडतोब निलंबित केले आहे म्हणून पगार मिळायचा असे मी म्हटले.”
“माझा अजूनही या बातमीवर विश्वास बसत नाहीये. पण तुम्ही म्हणता…. “
“मी म्हणतो म्हणजे काय? मी माझ्या मनांत येतील तशा बातम्या तयार करतो, असे तर तुला… “
“नाही पंत, पण तुम्ही मला खरं खरं अगदी मनापासून सांगा, तुमचा या बातमीवर, वाचल्या वाचल्या लगेच विश्वास बसला, का तुमच्या मनांत शंकेची पाल चुकचुकली ?”
“अरे सुरवातीला खरच वाटेना, पण बातमी नावानिशी, अगदी बँकेचे नांव, तो कुठल्या पदावर होता, आधी कुठल्या बँकेत किती वर्ष होता, हा सगळा तपशील वाचल्यावर मला…. “
“विश्वास ठेवणे भाग पडले, असच ना?”
“हो, नाहीतर त्या नवकोट नारायणाने अब्रुनुकसानीचा दावा नसता का ठोकला त्या बातमी देणाऱ्यावर ?”
“पंत, पण मी तुम्हाला सांगतो हा गडी त्या आरोपातून सहीसलामत सुटणार बघा.”
“हे कसं काय बुवा तू छातीठोकपणे सांगतोस ?”
“सांगतो, सांगतो. काही काही लोक खरच सज्जन असतात, पण त्यांना आपल्या मनांत नसतांना, उगीचच एखाद्या गोष्टीची चोरी करावी असे वाटते आणि ते आपल्याच नकळत ती चोरी करतात त्याला….. “
“क्लेप्टोमनिया म्हणतात हे मला ठाऊक आहे रे, पण अशी गोष्ट खरच अस्तित्वात आहे यावरच माझा विश्वास नाही, त्याचे काय ?”
“तुम्हाला मेगन फॉक्स ही हाँलिवुडची प्रसिद्ध नटी माहित्ये ?”
“इथे मला बॉलिवूडच्या नट नट्यांची नावे माहित नाहीत, तिथे तू हॉलिवूडच्या त्या मेगन का फेगन च्या काय गोष्टी करतोयस !”
“बर, बर कळलं. तर या मेगनला पण तिकडे अनेक वेळा असे हस्तलाघव करतांना कितीतरी मॉलमधे रंगे हात पकडले होते. एव्हढेच कशाला, वॉलमार्ट या जगप्रसिद्ध स्टोरने तर तिच्यावर आजन्म बंदी घातली आहे, आता बोला.”
“मी काय बोलणार, पण ही बंदी का आणि कशासाठी ?”
“अहो या अब्जाधीश बयेला त्या मार्ट मधे लीप ग्लॉसची चोरी करतांना पकडले, ज्याची किंमत होती फक्त सात डॉलर.”
“काय सांगतोस काय ?”
“अहो पंत खरे तेच सांगतोय. पण नंतर ती या रोगाची शिकार आहे असा बचाव तिच्या वकिलांनी कोर्टात केला होता तिच्या सुटकेसाठी.”
“कळलं, कळलं मला तुला काय म्हणायचे आहे ते. दे आता ते सँडविच मला. “
“पण पंत तुम्ही तर सँडविच सोडल…. “
“होत आत्ता आत्ता पर्यंत, पण आत्ताचे तुझे बोलणे ऐकून मी ते सँडविच कधी एकदा फस्त करतोय असे झाले आहे मला.”
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
‘सर्वधर्मपरिषद’ ही मानवजातीच्या धार्मिक इतिहासातली सर्वात महत्वाची घटना. ही परिषद म्हणजे आपल्याला वाटेल की नेहमी संस्थांच्या होतात तशीच काहीशी ही परिषद असणार. शिकागोला सुरूवातीलाच स्वामी विवेकानंद यांनी ज्या भव्य औद्योगिक प्रदर्शनला भेट दिली होती, ते प्रदर्शन एका महत्वाच्या निमित्तानं भरवलं गेलं होतं. त्याला पार्श्वभूमी आहे. कोलंबस अमेरिकेत उतरलेल्या घटनेला चारशे वर्ष पूर्ण झाली म्हणून अमेरिकेत प्रचंड मोठा महोत्सव होत होता. त्या निमित्ताने जागतिक पातळीवरील अनेक परिषदा आणि प्रदर्शने आयोजित केली गेली होती. हे औद्योगिक प्रदर्शन त्याचाच एक भाग होता. म्हणून यात मनुष्याच्या भौतिक क्षेत्रातली प्रगती आणि अमेरिकेबरोबरच जगातल्या सुधारलेल्या तसेच, अनेक रानटी समाजाचे दर्शन घडवणार्या माणसांचे पूर्ण पुतळे, त्यांचे पोशाख, त्यांची अवजारे व हत्यारे, त्यांची खाद्यसंस्कृती, याची माहितीपर मांडणी केली होती.
त्याचप्रमाणे मानवाने केलेली बौद्धिक ज्ञान शाखांची आणि विचारांची वाटचाल याचाही विचार व्हायला पाहिजे असे आयोजकांच्या लक्षात आले. म्हणून १५ ते २८ ऑक्टोबर १८९३ अशा पाच महिन्यांमध्ये वीस परिषदांचं नियोजन करण्यात आल होतं .त्यात अर्थशास्त्र, संगीत, वृत्तपत्रांचे कार्य, महिलांची प्रगती, औषधे आणि शस्त्रक्रिया, व्यापार आणि अर्थव्यवहार, राजव्यवहार आणि कायदा सुधारणा, यांच्या परिषदा झाल्या.
या परिषदेत जगातल्या त्या त्या विषयांचे तज्ञ सहभागी झाले होते. पण मानवाचे वैचारिक क्षेत्र याची उणीव राहिली असे आयोजकांना वाटून, त्यांनी धर्म आणि तत्वज्ञान या विषयांचे जगातले तज्ञ एका व्यासपीठावर येऊन वैचारिक देवाण घेवाण करतील तर ते तुलनेने व्यापक ठरेल.या दिशेने विचार सुरू झाला . प्रसिद्ध वकील, विचारवंत चार्ल्स कॅरोल बॉनी यांना ही कल्पना सुचली. सर्वांनी ती उचलून धरली.
यासाठी १८९० ला एक समिति स्थापन करण्यात आली. अध्यक्षपद अर्थातच बोनी यांच्याकडे आले. जगात असणारे धर्मपीठं, पंथ, संप्रदाय यांची माहिती गोळा करण्यात आली. सर्व प्रमुखांना पत्रे आणि पत्रके पाठवली. या अडीच वर्षांच्या काळात दहा हजार पत्र आणि चाळीस हजार परिपत्रके पाठवण्यात आली. जगभरात सल्लागार समित्या स्थापन करण्यात आल्या. त्याच तीन हजार समित्या होत्या. या आकडेवारीवरून आपल्याला ही परिषद किती मोठ्या प्रमाणावर होती ते लक्षात येत.
आपला भारत देश यात असणारच, होय होता. प्रचंड भारतातली विविधता, धर्म पंथ संप्रदाय पण कितीतरी. तरी भारताला एकच समिती होती. या समितीत सामाजिक सुधारणा पुरस्कर्ते आणि रूढी व परंपरांना विरोध करणारे, मद्रासच्या हिंदू वृत्तपत्राचे संपादक जी एस अय्यर, ब्राह्म समाजाचे मुंबईचे बी बी नगरकर व कलकत्त्याचे प्रतापचंद्र मुजूमदार हे होते. इथे हे लक्षात येते की एव्हढी मोठी धर्म परिषद पद्धतशिरपणे आखणी करून केलेली होती.
नियोजन करताना जगातल्या सर्व धर्माच्या प्रवक्त्यांना एकत्र आणणे,सर्व धर्मात मानी असलेली आणि शिकवली जाणारी समान तत्वे लक्षात घेऊन त्यावर अभ्यासकांची व्याख्याने ठेवणे, कोणत्या धर्माचे काय वैशिष्ट्य आहे त्याचा शोध घेणे, एका धर्म कडून दुसर्या धर्माला काय घेता येईल अशा गोष्टी शोधून आणि त्याच बरोबर शिक्षण ,श्रम, संपत्ति, दारिद्र्य मद्यपान निषेध अशा चालू असणार्या समस्या सोडवण्यासाठी मार्ग सुचविणे जगत शांतता नांदण्यासाठी ,राष्ट्रीय बंधुभावाच्या आधारे सर्वांना एकत्र आणणे या उद्देशाने ही परिषद भरवली जात होती. यामुळे परस्पर सामंजस्य वाढेल. समाज एकमेकांच्या जवळ येतील, असे त्यांना वाटत होते. खरच या परिषदेचा हेतु किती छान व उपयोगी होता. पण यावर उलट सुलट प्रतिक्रिया येत राहिल्या.
कोणाला वाटत होते, ही परिषद म्हणजे ख्रिस्त धर्मविरोधी कट आहे, तर कोणी म्हणे ख्रिस्त धर्माच्या तत्वांना हरताळ फासला जाईल, कोणी म्हणे जगात सर्वश्रेष्ठ धर्म ख्रिस्त धर्म आहे, मग इतर धर्मांबरोबर परिषद कशाला हवी? अशी अनेक मते होती. मात्र संयोजकांचा हेतु चांगलाच होता. जगातली जी जी राष्ट्र समृद्ध प्रगत आणि सामर्थ्यसंपन्न होती ती राष्ट्र ख्रिस्त धर्मियांची होती. पण धर्माचे श्रेष्ठत्व नुसते भौतिक प्रगतीवर आणि समृद्धीवर न ठरता माणसाच्या मनाचे सुसंस्कृत, सदाचरणाने व्यापक असलेले सामर्थ्य यावर पण असते, तेच त्याचे सामर्थ्य असते.असा विचार यामागे होता. त्यामुळे काही विरोध असतांनाही परिषद होऊ घातली होती.
ही सर्वधर्म परिषद शिकागो मधील आर्ट इंस्टिट्यूट च्या भव्य अशा इमारतीत भरली होती. कोलंबस आणि वॉशिंग्टन ही दोन भव्य सभागृह या इमारतीत होती. आजूबाजूला तीस लहान मोठ्या खोल्या होत्या. इथे सत्र दिवस परिषदेचे काम चालले होते. विषया नुसार गट पाडण्यात आले होते.कोलंबस सभगृहात चार हजार जण मावतील अशी आसन व्यवस्था होती. तर मोकळ्या जागेत एक हजार प्रेक्षक उभे राहू शकत होते एव्हढी जागा होती. याशिवाय उरलेले तेव्हढेच प्रेक्षक शेजारच्या वॉशिंग्टन सभागृहात बसून राहत आणि त्यांच्यासाठी तीन दिवसांनंतर कोलंबस मध्ये होणारा प्रत्येक कार्यक्रम पुन्हा होत असे.
११ सप्टेंबर १८९३ उजाडला. सकाळचे दहा वाजले. आर्ट इंस्टिट्यूट च्या आवारात भल्यामोठ्या घंटेचे दहा टोले वाजले. हे दहा टोले म्हणजे, जगातील दहा धर्माच्या वतीन दिले गेले होते. बोनी यांनी जगातल्या प्रमुख दहा धर्मांची निवड केली होती. हा घंटानाद झाला आणि जगातून आलेले सर्व धर्माचे प्रतींनिधी मिरवणुकीने सभागृहकडे निघाले. या मिरवणुकीत सर्वात पुढे अमेरिकेतील चर्चचे मुख्य पदाधिकारी कार्डिनल गिबन्स आणि परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स कॅरोल बॉनी, त्यामागे कोलंबियन एक्स्पोझिशन च्या महिला अध्यक्षा मिसेस पॉटर पामर व उपाध्यक्षा मिसेस चार्ल्स एच. हेंरोटीन आणि त्यामागे सर्व प्रतींनिधी या क्रमाने मिरवणुकीत सहभागी झाले होते. यातून जागतिक सर्वधर्माचे, अनेकरंगी विविधतेचे दर्शन होत होते.चार ते पाच हजार लोक उपस्थित होते तरी निस्तब्ध शांतता पसरली होती. सर्वांच लक्ष वेधून घेणारे ते दृश्य होतं. सर्वांच्या मनात कुतूहल आणि उत्कंठा होती. मिरवणूक सभागृहात प्रवेशली. सभागृहात पाश्चात्य आणि पौर्वात्य अशा दोन प्रमुख गटात प्रतींनिधींना बसण्याची व्यवस्था केली होती. हे व्यासपीठ पन्नास फुट लांबीचे आणि दहा फुट रुंदीचे होते.
भारतातून आलेले इतर प्रतींनिधी होते, बुद्धधर्माचे धर्मपाल,जैन धर्माचे विरचंद गांधी, ब्राह्म समाजाचे प्रतापचंद्र मुजूमदार व बी. बी. नगरकर, थिओसोफिकल सोसायटीच्या डॉ. अॅनी बेझंट व ज्ञानचंद्र चक्रवर्ती.
सर्वजण आसनास्थ झाले. सभागृहात ऑर्गनचे गंभीर सूर उमटले आणि सर्वांनी उभं राहून प्रार्थना व श्लोक म्हटले. एका सुरात जणू सर्वजण जगन्नियंत्याची प्रार्थना करत होते, हा ऐतिहासिक क्षण होता.
पहिला दिवस उद्घाटन कार्यक्रमाचा होता.सुरूवातीला सर्व धर्म प्रतींनिधींचे स्वागत करणारी भाषणे झाली. एमजी त्याला उत्तर देणारी प्रतिनिधींची आठ भाषणे झाली. विवेकानंद हे सारं वातावरण भारलेल्या मनाने पाहत होते अनुभवत होते. विशाल जंसमूह पद्धतशिरपणे आखलेला एक सुंदर कार्यक्रम त्यांना प्रथमच पाहायला मिळत होता. याचवेळी त्यांना आपल्यावरच्या जबाबदारीची जाणीव झाली होती. नाव पुकारल्या नंतर एकामागून एक वक्त्यांची भाषणे होत होती .उत्तम प्रतिसाद मिळत होता.
विवेकानंद पुरते गोंधळून गेले होते, आत्मविश्वास वाटेना, आपण बोलू शकू का? घसा कोरडा पडला . छाती धडधडत होती. शब्द फुटेना. कारण ते काहीच तयारी करून आले नव्हते. सर्वजण तयारीने आले होते . दोन तीन वेळा नाव पुकारले तर आता नको म्हणून ते उठले नव्हते. ते अनेक वेळा असे बोलले असतांनाही भीती वाटत होती कारण आताचा प्रेक्षक वेगळा होता,
शिकागो शहरातले उच्च विद्याविभूषित श्रोते समोर होते. ख्यातनाम विद्वान होते. विचारवंत होते, पत्रकार होते. सार्या जगातून आलेले प्रतींनिधी विद्वान प्रवक्ते तर होतेच, पण ते अधिकृत प्रतिनिधी होते. त्यांच्या मागे त्यांची संस्था उभी होती. आपल्या मागे तर कोणीच नाही. म्हणून विवेकानंद यांचा धीर सुटला होता एका क्षणी. पण अचानक उपनिषदातील ‘अहम ब्रह्मास्मि’ हे वचन मनात चमकले आणि त्याच क्षणी त्यांच्या हृदयात सामर्थ्य संचारले.
दुपारच्या सत्रात चार प्रतिनिधींची भाषणे झाली. आता पुन्हा विवेकानंदांचे नाव पुकारले गेले. तेंव्हा त्यांच्या शेजारी बसलेल्या फ्रेंच प्रतींनिधी जी.बॉनेट मॉवरी त्यांना म्हणाले, ‘आता थांबू नका, बोला! तेंव्हा विवेकानंद आसनावरून उठले, विद्येची देवता सरस्वतीचे मनोमन स्मरण केले. समोरील प्रेक्षकांवरुन दृष्टी फिरवली आणि म्हणाले,
“अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधुनो” या पाहिल्याच वाक्याला कंठाळ्या बसणारा टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेकांच्या भाषणाला टाळ्या पडल्या होत्या पण पाहिल्याच संबोधनाला असा प्रतिसाद नव्हता मिळाला, त्यांनाही आश्चर्य वाटले. टाळ्या थांबण्याची वाट पाहत विवेकानंद थांबले होते. शांतता झाल्यावर पुन्हा बोलायला सुरुवात केले. “सुंदर शब्दांमध्ये जे आपले स्वागत केले गेले आहे त्याबद्दलचा आनंद अवर्णनीय आहे. जगातील सर्वात प्राचीन असा हिंदू धर्म, त्यातील सर्वसंगपरित्यागी संन्याशांची परंपरा यांच्या वतीने मी जगातील सर्वात नवीन अशा अमेरिकन राष्ट्राला मन:पूर्वक धन्यवाद देतो”. त्यांनी परिषदेच्या आयोजकांचे आभार मानले. आधी बोललेल्या वक्त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. प्रत्येक मताबद्दलची सहिष्णुता आणि सर्व जगातील धर्म विचारांच्या बाबतीतली स्वीकारशीलता हे हिंदू धर्माचे वैशिष्ठ्य आहे असे सांगून, पारशी लोक आपल्या जन्मभूमीतून बाहेर फेकले गेल्यानंतर त्यांनी भारताचा आश्रय घेतला. त्यांना निश्चिंत पणे राहण्यासाठी आसरा मिळाला. ही ऐतिहासिक घटना सांगून, अशा देशातून आपण आलो आहोत आणि अशा धर्माचा मी प्रतींनिधी आहे याचा आपल्याला अभिमान वाटतो. सार्या जगातून इथे आलेल्या सर्व धर्म प्रतिनिधींच्या स्वागतासाठी आज सकाळी जी घंटा वाजवली गेली, ती सर्व प्रकारच्या धर्म वेडेपणाची मृत्युघंटा ठरेल, लेखणी किंवा तलवार यांच्या सहाय्याने केल्या जाणार्या मानवाच्या सर्व प्रकारच्या छळाच्या तो अंतिम क्षण असेल आणि आपआपल्या मार्गाने एकाच ध्येयाच्या दिशेने चाललेल्या मानवांपैकी कोणाविषयीही कोणाचाही कोणत्याही प्रकारचा अनुदार भाव यानंतर शिल्लक राहणार नाही. असा मला पूर्ण विश्वास आहे”. असे पाच मिनिटांचे आपले भाषण विवेकानंदांनी थांबवले. आणि पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.
हे छोट भाषण उत्स्फूर्त आविष्कार होता. विवेकानंदांनी परिषदेच्या उद्दिष्टालाच स्पर्श केला होता. स्वागतपर भाषणाला उत्तर म्हणून अशी चोवीस भाषणे झाली त्यात विवेकानंदांचे विसावे भाषण होते. अजून खरा विषय तर मांडला जायचा होता. ही परिषद सतरा दिवस चालू होती. रोजतीन तीन तासांची तीन सत्रे होत.
पहिल्याच दिवशीच्या प्रतिसादाने आणि एव्हढ्या अडचणी पार पाडून झालेल्या सहभागाने विवेकानंद खर तर शिणले होते पण रात्री अंथरुणावर पडल्यावर झोप न लागता डोळ्यासमोर समृद्ध अमेरिका आणि आपली दीन दरिद्री मातृभूमी यामधलं प्रचंड अंतर बघून आपल्या देशबांधवांच्या विषयी त्यांच्या मनात करुणा दाटून आली, अस्वस्थ होऊन डोळ्यातून अश्रु वाहू लागले. सकाळच्या यशानंतर पण ते हुरळून नाही गेले तर, जगन्मातेला त्यांनी म्हटले, “माझ्या देशबांधवांचं अपार दारिद्र्य दूर होणार नसेल तर हे नाव आणि किर्ती घेऊन मला काय करायचं आहे? कोण जाग आणेल भारतातल्या सर्व सामान्य जनतेला? जगन्माते कृपा कर, ते कसं करता येईल याचा मला काही मार्ग दाखव”.
☆ मेरा देश सहीमे बदल रहा है… लेखक – श्री हेमंत केळकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆
आज भुसावळ ते गोवा जातांना रेल्वे मध्ये आलेला सुखद अनुभव..
अचानक मित्राच्या 2 वर्षाच्या मुलाला ताप आला.. जवळ कसल्याही औषधी नाहीत.. डेस्टिनेशन मडगाव पोहचायला 7 तास अवधी.. विचार आला पुढच्या स्टेशन ला उतरू आणि एकदा डॉक्टरला दाखवू मग पुढचा प्रवास बाय रोड करू.. सहज म्हणून ट्रेन मध्ये सामान विकणाऱ्याला म्हटलं आम्हाला काही औषधी हव्या आहेत.. पुढच्या स्टेशन ला व्यवस्था करून दे, तुला खर्च पाण्याला 500 रुपये देतो.. तो विक्रेता म्हणाला काही गरज नाही TC ला भेटा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.. TC ला लगेच भेटलो.. सरकारी नोकरांची तत्परता उभ्या आयुष्यात मी इतकी कधीच अनुभवली नव्हती.. हातातलं काम सोडून त्याने समोर फोन लावला.. आमचा सीट नंबर आणि मेडिकल कंडिशन नोट केल्यात आणि आम्हाला सीट वर जायला सांगितलं… समाधानाची अपेक्षा नव्हती.. पुढच्या स्टेशन वर उतरून माझ्या मित्राच्या मुलाला दवाखान्यात दाखवून बाय रोड च आम्ही प्लॅन केलाच होता.. आम्हाला वाटल एखादा मुलगा येईल पेपर मध्ये गुंडाळून गोळ्या देईल..पण पुढच्या स्टेशन ला अक्षरशहा डॉक्टर त्यांचा असिस्टंट सोबत आमच्या सीट वर हजर.. सोबत TC सुद्धा होते.. तपासल्या नंतर लगेच त्यांनी Assistant ला आम्हाला काही सिरप च्या बॉटल द्यायला लावल्या.. कसं घ्यायचं हे सांगून लगेच TC ला सांगितलं कि ह्यांना पॅन्ट्री मधून मीठ पाठवा.. TC ने लगेच फोन लावला.. मिठाच्या पाण्याच्या पट्टी कपाळावर फिरवायला सांगितलं आणि निघून गेले.. आम्ही आवाज देऊन किती पैसे झाले म्हणून विचारलं तर हे सगळं विनामूल्य होतं..आश्चर्य च्या धक्क्यातच सीट वर पोहचलो तोपर्यंत पॅन्ट्री वाला मीठ घेऊन हजर..
मेरा देश सहीमे बदल रहा है..
काय करायचं राव — त्या पेट्रोलला काय पिऊन घ्यायचं का……
अशी होत असलेले सुधारणा हे मिडीया / पेपर वाले दाखवत नाही. बदल होत आहे.आपणसुद्धा आपल्या नातेवाईकांना व मित्रमंडळींना कळवावे. वेळ लागेल, पण आपण झालेला व होत असलेला बदल अनुभवत आहोत.
लेखक : हेमंत केळकर
संग्राहक : माधव केळकर.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ कापणे….एक इव्हेंट… भाग 2 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
(कारण डोक्यावरच जंगल कंगव्याने केस फिरवण्या इतकं वाढलं रे वाढलं, की लगेच “भावजाला” फर्मान जाई ! ) पुढे चालू…..
सिनेमाचा विषय निघाला म्हणून एक आठवण सांगण्या सारखी आहे, तेव्हढी सांगतो आणि पुढे जातो. “पुरश्या” नावाचा आमचा एक मामा होता. तो म्हसळा या गावी (श्रीवर्धन-दिवेअगार जवळ) शेती वाडी करत असे. त्याच्या सुपारीच्या बागा होत्या आणि तो आपला माल तेंव्हा मुंबईला “मार्केटात” पाठवत असे व त्याचे पैसे वसुल करायला दर सहा महिन्याने मुंबईला यायचा. अर्थात दोन चार दिवसाचा त्याचा मुक्काम आमच्या घरी ठरलेला. त्याच पैसे वसुलीच काम झालं की तो आमच्या आईला “बयो उद्या सकाळच्या एस्टीनं जातोय गं परत !” असं सांगायचा. मगं आम्ही मुलं त्याला “मामा उद्या तू परत गावी जाणार, मग आज रात्री ‘हिंदमाताला’ सिनेमाला जाऊया नां !” असा घोषा लावत असू. पण आमचा मामा पक्का बेरका होता. तोंडात कुड्याची पेटती विडी ठेवून म्हणायचा, “त्या सिनेमात बघण्यासारखं काय असत मला कळत नाही ! अरे बाहेर जे तुमच्या हिरो हिरोईनचे फोटो लावलेत नां, ते फक्त आत थेटरात पडद्यावर हलतात आणि बोलतात, एवढाच काय तो फरक ! त्यासाठी आपल्या दिडक्या कशास खर्च करायच्या म्हणतो मी ? त्यापेक्षा ही पाचाची नोट घ्या आणि आईस्क्रीम खा बघू सगळ्यांनी !” अस म्हणून आमच्या तोंडाला आईस्क्रीम पुसायचा, सॉरी पान पुसायचा !
आज वयाच्या सत्तरीत “डोक्याने” किंवा “डोक्याची” कामं करून म्हणा, अथवा अनूवांशीक जीन्समुळे म्हणा, आजमितीस मानेवर जी काय पांढऱ्या केसांची तुरळक झालर उरल्ये, ती वाढल्यावर कापायला सटी सामाशी “सलूनमधे” जायचा योग येतो, तोच काय तो ! पण आता पूर्वीसारखी “भावजा” समोर लहानपणी जशी मान तुकवावी लागत असे, तशी आता सलूनमध्ये तुकवावी लागत नाही, हेच काय ते त्यातल्या त्यात मनाला समाधान ! फक्त या बाबत एकच तक्रार मी मनातल्या मनांत स्वतःलाच करत असतो मंडळी. माझ्या मानेवरची केसांची पांढरी तुरळक झालर कापायलासुद्धा, एखाद्याच्या डोक्यावरील संपूर्ण जंगल कापण्या इतकेच पैसे द्यावे लागतात ! त्यामुळे वेगळ्या अर्थाने आपलं पाकीट किंवा खिसा कापला जातोय, याच नाही म्हटलं तरी माझ्या सारख्या पेन्शनराला आत कुठेतरी दुःख होतच !
खिसा आणि पाकीट कापण्यावरून आठवलं, साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वी ट्रेनच्या किंवा बेस्ट बसच्या प्रवासात ज्याच पाकीट किंवा खिसा कापला गेला नाही, असा चाकरमानी मिळणं विरळाच ! आणि कोणी फुशारकीने तसं म्हटलं तर त्याने त्यावेळच्या ट्रेनच्या “थर्ड क्लासने” गर्दीच्या वेळेस डोंबिवली किंवा विरार लोकल मधून, संध्याकाळच्या रश अवर मधे प्रवास केलेलाच नसावा, हे तुम्ही त्याला खात्रीपूर्वक सांगू शकता.
त्यावेळच्या ट्रेनमधल्या खिसा कापण्याच्या एक एक चमत्कारिक आणि सुरस कथा आज नुसत्या आठवल्या तरी खूपच मनोरंजन होतं. सध्या पाकीट आणि खिसा कापणाऱ्या टोळ्या अस्तित्वात आहेत की नाहीत, अशी शंका घेण्या इतपत सध्याची परिस्थिती आहे. कारण आत्ताच्या कलियुगी अशा चिल्लर चोऱ्या करण्यापेक्षा, आजकाल सगळ्यांनाच स्वतःच्या जिवापेक्षा प्यारा झालेल्या एखाद्या महागड्या “मोबाईलची” चोरी करण्यावर सांप्रत काळातील चोरांच्या नवीन पिढीने आपला मोर्चा वळवला आहे, हे आपण सुद्धा मान्य कराल. त्यामुळे पुन्हा एकदा मी “कालाय तस्मै नमः” म्हटलं, तर आपल्याला त्यात वावगं वाटणार नाही अशी आशा करतो !
एखाद्या वास्तूच उदघाटन त्याच्या दाराला लावलेल्या आडव्या “लाल फीतीला” कापून, कोणा मान्यवरच्या हाती करायची पद्धत आपल्याकडे कधी पासून आली, हा एक संशोधनाचा विषय ठरावा. कारण स्वातंत्र्यापुर्व काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा काही वर्ष मान्यवरांच्या हस्ते “दिप प्रज्वलनकरून” एखाद्या कार्यक्रमाची सुरवात व्हायची, हे आपल्याला आठवत असेलच. स्वातंत्र्यानंतरच्या काळात तेव्हांच्या स्वतःला फॉरवर्ड समजणाऱ्या उच्चभ्रू लोकांनी अशा समारंभात ही फीत कापायची पद्धत सुरु केली असावी, असा आपला माझा अंदाज ! अर्थात त्याचा उगम नक्कीच त्यांच्या डोक्यतून न हॊता, त्यांनी या बाबतीत सुद्धा इंग्रजांचेच अनुकरण करण्यातून झाला असावा, हे ही तितकंच खरं असण्याची शक्यता जास्त !
हल्ली गल्ली बोळात स्वतःला “नेता” म्हणवणाऱ्या लोकांना तोटा नाही आणि त्यांच्या निरुद्योगी अनुनायांचे तर “सगळं काही” फुकट मिळत असल्यामुळे मोहोळच उठलेलं आपल्याला पाहिला मिळतं. अशा या स्वयंभू नेत्यांना काही उत्साही लोकं आपल्या कुठल्याही “वास्तूची” उदघाटनाची फीत कापायला बोलवत असतात आणि हे नेतेही तेवढ्याच तत्परतेने, उत्साहाने असे समारंभ अगदी अगत्यपूर्वक अटेंड करत असतानां आपण पाहिले असेल. मी वर “कुठल्याही वास्तूची” उदघाटनाची फीत असं म्हटलं, कारण सध्या आधीच नावापुरत्या राहिलेल्या फुटपाथवर, एखाद्या नवीन बांधलेल्या “सार्वजनिक शौचालयाची” फीत कापून त्याच उदघाटन सुद्धा असे नेते करत असतात ! एवढच कशाला, त्या सार्वजनिक शौचालयावर स्वतःचा मोठा फोटो आपल्या नावासकट, मोठ्या आणि भडक रंगात रंगवला आहे की नाही याची आधी खात्री करून घेतात आणि मगच त्या शौचालयाचे फीत कापून उदघाटन करतात !
“सकल उत्पन्नाच्या मूलभूत गुंतवणूकीवर मुळापासून कर कापला जाईल !” हे एखाद्या कंपनीच्या गुंतवणूक विषयीच्या फॉर्मवरच्या सर्वात छोट्या फॉन्ट मधलं प्रिंट केलेलं वाक्य, शुद्ध मराठीत असलं तरी, वाचायला म्हणण्यापेक्षा “कळायला” बऱ्याच जणांना जरा जड जाईल ! म्हणून सोप्या भाषेत सांगायचं तर, “Tax will be deducted at source !” असं म्हणतो, म्हणजे 99% वाचकांचा जीव भांड्यात पडेल, याची मला खात्री आहे !
“अरे काय सांगू तुला, या वेळेस मी दीड लाखाचं फुल सेव्हिंग केलं, तरी पंचावन्न हजार टॅक्स भरायला लागला !”
“टॅक्स !” तुमच्या माझ्यासारख्या जगातल्या तमाम मध्यमवर्गीयांचा, अगदी कधीही, कुठेही आणि कोणाबरोबरही उगाच “फुकट” चर्चा करण्याचा जागतिक विषय ! आता या आधीच्या वाक्यात मी जो “फुकट” शब्द वापरला त्याला कारण म्हणजे, आपल्या सारख्या लोकांनी या विषयावर कितीही वायफळ चर्चा केली तरी, त्याचा सरकारवर दबाव पडून, सरकार टॅक्सच्या टक्केवारीच्या स्लॅबमधे बदल करेल ही शक्यता अजिबातच नसते. हे जरी आपल्या सारख्या लोकांना दरवर्षीच्या अनुभवावरून माहित असलं तरी, त्यावर चर्चासत्र किंवा परिसंवाद हे सगळ्याच बजेट नंतर झडतच असतात !
मंडळी, अजूनही कुठं कुठच्या “कापण्याचे इव्हेंट” होऊ शकतील असे अनेक प्रकार जे मला माहित आहेत, ते आपल्याला सुद्धा माहित असतील. पण एखाद्या लेखाची पण काही शब्दमर्यादा असते हे सुद्धा आपल्या सारख्या चाणाक्ष वाचकांना माहित असेलच ! त्यामुळे वरील लेख कोणी छापणार असेल तर, त्यांच्या “एडिटरकडून” मूळ लेखाची (मला) नको इतकी “काट छाट” होण्याआधीच लेख संपवतो !
☆ आठवणीतील सांस्कृतिक पुणे… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
सुमारे ३५-४० वर्षांपूर्वी, किंबहुना त्यापेक्षाही अगोदरपासूनच्या कालखंडात पुणे हे एक छोटेखानी पण टुमदार, आटोपशीर गाव होतं…” पुणे शहर ” झालेलं नव्हतं….
सदाशिव, शनिवार, नारायण, शुक्रवार वगैरे पेठांमध्ये वाडे एकमेकांना चिकटून, जणू एकमेकांच्या हातात हात घालून उभे होते. चोर-पोलीस खेळतांना सहज एका वाड्यातून दुसऱ्या वाड्यात जाता येत असे. किंबहुना शेजारच्यांच्या घरात घुसून बिनदिक्कत कॉटखाली वगैरे लपता येत असे. लाकडी जिन्यातून कुणी भरभर खाली उतरलं की अक्षरशः ढगांच्या गडगडाटाचा आवाज येत असे. चौकात संध्याकाळी डबडा ऐसपैसचा नाहीतर इस्टॉपाल्टीचा डाव रंगत असे. फार दमायला झालं, किंवा धो धो पाऊस पडला, तर कुठे तरी वाड्यात वळचणीला बसून गाण्यांच्या भेंड्या रंगत असत. मग एक तरी सुरेल गाणारी तिखट चिमुरडी “आ जा सनम मधुर चांदनीमें हम….” हे गाणं म्हणतच असे.
किंवा देशांच्या राजधान्या ओळखणे, चेरापुंजी कशासाठी प्रसिद्ध आहे?? वगैरे “जनरल नॉलेज” च्या गप्पा होत होत,
” तुला माहितीये का ?? पाकिस्तानकडे शंभर ऍटम बॉम्ब आहेत…” किंवा ” माझे बाबा एकदा अमावास्येला शनिवारवाड्याच्या जवळून रात्री येत होते, तेव्हा त्यांनी ‘ काका मला वाचवा….’ असा आवाज ऐकला होता ”
अशा स्वरूपाच्या दंतकथा रंगत. एखादा शी – शू विहार मधला गडी मग तिथेच रडू लागे. आणि मग
” ए … कशाला रडवता रे त्याला?? ” असा सज्जड दम एखादी आई देई.
शाळांच्या पटांगणात रात्री ” गीत रामायण,” “ जाणता राजा ” यासारख्या कार्यक्रमांची रेलचेल आणि मेजवानी असे. मग रात्री भारावलेल्या वातावरणात शांत झोपी गेलेले वाडे बघत बघत घरी पायी, नाही तर सायकलवर वाटचाल करायची. क्वचित थंडीत स्वेटर, शाल, चादर पांघरून कुडकुडत घरी जायचं….. गोदरेजचं कुलूप उघडून जाड लोखंडी साखळी असलेला दरवाजा उघडायचा….. काळ्या बटनावर लागणारा पिवळा साठचा बल्ब लावायचा…. कुणाकडे हातात सेलची बॅटरीही असायची….
पुण्याचं तेव्हाचं सांस्कृतिक केंद्र म्हणजे ” भरत नाट्य मंदिर “…. मध्यंतरात भजी खायची… चहा प्यायचा…. आणि अंधारात चाचपडत येऊन आपली सीट पकडायची….
भरत नाट्य बाहेर मधू आपटे हे ज्येष्ठ अभिनेते खुर्ची टाकून बसलेले असायचे…..
कुणी नाटकानंतरही “गुडलक” “पॅराडाईज” “रीगल” वगैरे इराणी हॉटेलात तळ देत…. किंवा वाड्याच्या दारातच मध्यरात्रीपर्यंत कुडकुडत गप्पा छाटायच्या……
तेव्हाचं पुणं मध्यमवर्गीय, साधं…..पेरूगेट, नु.म.वि., अहिल्यादेवी, विमलाबाई गरवारे, हुजूरपागा या संस्कारकेंद्रांभोवती विणलेलं….. “स्वामी”… “छावा”…. “नाझी भस्मासुराचा उदयास्त”…… इत्यादि साहित्यविश्वात रमणारं होतं…… भीमसेन जोशींना अगदी समोर बसून ऐकता येत होतं किंवा भेटता येत होतं…..
ना. ग. गोरे… एस. एम. जोशी अशी थोर नेतृत्वं होती…
खरोखरच तेव्हाचं पुणं हे त्यावेळच्या पहाटेच्या सुंदर धुक्यासारखं एक गोड सांस्कृतिक स्वप्न होतं…..
सुंदर स्वप्नातून जागं झाल्यावरही त्या स्वप्नाची आठवण दिवसभर मनात रेंगाळत रहावी, तसं हे तेव्हाचं सुंदर पुणं मनात सदैव रेंगाळत राहतं……….!!!
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मुलांकडे (थोडे) दुर्लक्ष करा… – लेखक : श्री शिवराज गोर्ले ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
मुलांना जबाबदार बनवायचं असेल, तर अर्थातच त्यांना काही गोष्टीचं स्वातंत्र्य द्यायला हवं. याचाच अर्थ त्यांच्याकडं जसं लक्ष द्यायला हवं, तसंच थोडं दुर्लक्षही करायला हवं. रेणू दांडेकर यांनी यासाठी ‘ हेल्दी निग्लिजन्स ‘ हा शब्द सुचवला आहे. त्या म्हणतात, ‘आजकाल घरात एकच मूल असतं. फार फार तर दोन. या ‘दोन बाय दोन’,च्या रचनेत मुलंच केंद्रस्थानी असतात. लक्ष्य असतात. त्यामुळंच कधी कधी आपलं नको इतकं लक्ष मुलांकडे असतं.
त्यांनी असं एक उदाहरणही दिलंआहे: माझी एक मैत्रीण मुलांच्या बाबतीत अत्यंत जागृत होती. तिनंच तिच्या मनानं मुलांच्या अभ्यासाच्या वेळा…जेवायच्या वेळा… आहार… कोणत्या वेळी कोणत्या विषयाचा अभ्यास, या सगळ्याचंच वेळापत्रक बनवलं होतं. सतत त्यानुसार ती आपल्या मुलांवर देखरेख ठेवायची. मुलं अगदी जखडून गेली, कंटाळली, हळूहळू ऐकेनाशी झाली.
आईची प्रतिक्रिया, ‘ मी मुलांचं इतकं करते,तरी मुलं अशी वागतात. यापेक्षा किती लक्ष द्यायचं? ‘
” तू जरा जास्तच लक्ष देते आहेस.” रेणूताईंनी म्हटलं ,” थोडं दुर्लक्ष कर .मुलांना त्यांचं स्वतःचं जगणं आहे. जर त्यांच्या प्रत्येक क्षणावर ताबा ठेवलास तर कसं चालेल? जरा ‘हेल्दी निग्लिजन्स’ करायला शिक.”
मुलांना मोकळेपणा, स्वातंत्र्य दिल्याशिवाय ती जबाबदार कशी होतील? फक्त एवढंच की ती स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करत आहेत ना, हे त्यांच्या नकळत पहायला हवं. लक्ष हवंच, पण न जाचणारं ! मूल पोहायला लागलं तरी आईनं त्याच्या पाठीवर डबा बांधला, त्याचा हात धरला तर ते तरंगणार कसं?हात पाय हलवणार कसं? ते आता पोहू शकतंय यावर विश्वास ठेवायला हवा. आपण ते बुडेल ही भीती सोडायला हवी. थोडं काठावर उभं राहता आलं पाहिजे, थोडं पाण्यातही भिजता आलं पाहिजे. पालक प्रशिक्षणातला हा एक धडा फार महत्त्वाचा आहे. शोभा भागवत म्हणतात त्याप्रमाणे, ‘मूल मोठं व्हावं, शहाणं व्हावं, असं तोंडानी बोलत, मनात ठेवत, प्रत्यक्षात आपण त्याला ‘लहान’च ठेवत असतो. तोंडी बोलण्यापलीकडं मूल आरपार आपल्याला पहात असतं. आपण ‘ मूल ‘ राहण्यातच पालकांना समाधान आहे, हेही ते जाणतं आणि तसं वागत राहतं.’
ते विश्वासानं शहाणं व्हायला हवं असेल, तर पालकांनी सतत पालक म्हणून वागायचं सोडून द्यायला हवं. पालकपणाचा (अधून मधून) राजीनामा द्यायला हवा.
लेखक : श्री शिवराज गोर्ले
प्रस्तुती : सुश्री सुनिता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ कापणे….एक इव्हेंट… भाग 1 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
कापणे – एक इव्हेंट ! 😂😢😟
माझ्या समवयस्क पिढीतील लोकांना लहानपणी हातात पडलेल्या पहिल्या “शिस पेन्सिलीच” त्या काळी, त्या वयात काय अप्रूप होतं ते नक्कीच आठवत असेल ! मला आज सत्तरीत आठवतंय त्याप्रमाणे तेंव्हा मराठी चौथीपर्यंत काळीशार दगडी पाटी आणि चुन्याची पांढरी षटकोनी किंवा चौकोनी पेन्सिल, यावरच ‘लिहित्या हाताच्या’ बोटांना आम्हां मुलांना समाधान मानावं लागत असे ! या वाक्यातील ‘लिहित्या हाताच्या’ या माझ्या शब्दप्रयोगावर आपली वाचनाची गाडी अडखळली असेल, तर त्याबद्दल आपलं समाधान होईल असा खुलासा आधी करतो, म्हणजे मग तुम्ही पुढचा लेख वाचायला आणि मी पुढे लिहायला मोकळा !
आपण म्हणालं आता हे काय तुमच नवीनच ? “लिहिता हात” म्हणजे काय ? तर त्याच कसं आहे मंडळी, जसं काही काही लोकं बोलतांना “खाता हात” आणि “धुता हात” असे शब्दप्रयोग करतात, तसा मी “लिहिता हात” असा शब्दप्रयोग केला तर कुठे बिघडलं ? कारण आपल्यापैकी बरेच जण डावरे (का डावखुरे?) असण्याची शक्यता गृहीत धरूनच मी या नवीन हाताचा “शोध” सॉरी, नवीन शब्दप्रयोगाचा शोध लावलाय ! दुसरं असं की समस्त डावऱ्यां मंडळींकडून, मी माझ्या सारख्या उजव्यांना उजवं माप देतोय, असा बिनबुडाचा आरोप कशाला ऐकून घेवू ? काय बरोबर ना मंडळी ?
हां, तर काय सांगत होतो मंडळी, हातात आलेल्या पहिल्या शिस पेन्सिलीच अप्रूप ! तर अशी ही शिस पेन्सिल आपल्या स्वतःच्या मालकीची म्हणून पाचवीत हाती येई पर्यंत, जर आपण कुतूहलापोटी आपल्या ताई किंवा दादाच्या शिस पेन्सिलीला नुसता हात जरी लावला असेल, तरी आपण तिचा किंवा त्याचा ओरडा त्याकाळी नक्कीच खाल्ला असेल. शिवाय एखाद्याचा दादा किंवा ताई जास्तच रागीष्ट असेल तर ? त्या ओरडयाबरोबर त्याची किंवा तिच्या हातची चापटपोळी खायचा प्रसंग पण आपल्यावर नक्कीच ओढवला असेल, बघा आठवून ! आपण म्हणालं, हे सगळं जरी काही प्रमाणात खरं असलं, तरी या सगळ्याचा आणि आजच्या लेखाच्या शीर्षकाचा संबंध काय ? सांगतो, सांगतो मंडळी, जरा सबुरीन घ्या !
तर पाचवीत पहिल्यांदाच हाती आलेल्या नव्या कोऱ्या “शिस पेन्सिलीला” टोक काढायला, त्याकाळी आजची “शार्प” लहान मुलांची पिढी जे “शार्पनर” वापरते, त्याचा शोध बहुतेक लागायचा होता म्हणा किंवा माझ्या सारख्या मध्यमवर्गातल्या मुलांना त्याकाळी ते विकत घेणं परवडत नव्हतं म्हणा, पण तेव्हा आम्ही मुलं शिस पेन्सिलीला टोक काढण्यासाठी एखाद जुनं अर्ध “भारत ब्लेड” वापरत असू. पण मंडळी, त्या शिस पेन्सिलीला अर्ध्या ब्लेडने टोक काढता काढता, पेन्सिलीतून तीच टोक बाहेर येण्या आधीच हाताच्या एखाद्या बोटातून हमखास लाल भडक रक्त बाहेर येई ! मग काय, अशावेळी माझी जी काय रडारड सुरु व्हायची त्याला तोड नसायची ! कारण त्या वयात असं एखाद “कठीण” काम, स्वतःच स्वतः अभिमानाने करतांना, आपल्याच हातून आपल्याच चुकीमुळे बोटातून रक्त आलेला, बहुदा तो आयुष्यातला पहिलाच प्रसंग असायचा. मग हे सगळं आईला कळताच तिची बोलणी खात खात, कधी त्या सोबत तिच्या हातचे धपाटे तोंडीलावण्यासारखे खाता खाता, तिने आठवणीने बरोबर आणलेला मातकट रंगाचा “रामबाण कापूस” ती मला बोटावर झालेल्या माझ्या जखमेवर लावी. तो लावता लावता तोंडाने, “साधी एका शिस पेन्सिलला टोक काढता येत नाही आणि म्हणे मला पेन्सिलचा अख्खा नवीन बॉक्स हवाय ! टोक काढतांना गाढवासारखं (?) स्वतःच बोट कापून घेतलंस, तरी त्या नावाखाली आज तुझी अभ्यासातून मुळीच सुटका नाही, कळलं?”
मंडळी, तेंव्हा जरी साने गुरुजींची “श्यामची आई” त्याकाळच्या आयांच्या कितीही आवडीची असली, तरी सगळ्याच मुलांच्या आया काही “श्यामच्या आईसारख्या” आपापल्या मुलांशी वागत नव्हत्या नां ! त्यामुळे माझ्या आईच्या तोंडातल्या वरच्या डायलॉगचा शेवट, माझ्या शरीराचा कुठला अवयव त्यातल्या त्यात तिच्या उजव्या हाताच्या जवळच्या टप्प्यात असेल, त्यावर त्याच हाताची एक सणसणीत बसूनच होत असे !
मंडळी, त्या औषधी “रामबाण कापसाची” एक खासियत होती. तो नुसता जखमेवर दाबून धरताच एका क्षणात जखमेतून येणार रक्त, रेड सिग्नल मिळाल्यावर पूर्वी जशा गाड्या थांबत तसं थांबत असे ! हल्ली रेड सिग्नल आणि त्याच्या जोडीला पोलिसाचा आडवा हात व त्याच्या जोडीला त्याच्या तोंडातली शिट्टी, याला सुद्धा कोणी जुमानत नाही हा भाग निराळा. दुसरं असं की आजच्या सारखा तो काही “वॉटरप्रूफ बँडेडचा” जमाना नव्हता. त्यामुळे औषधी “रामबाण कापसाच्या” फर्स्टएडवरच अशा जखमांची तेंव्हा बोळवण केली जायची. अशी “रामबाण कापसाची” त्या काळातली फर्स्टएड मलमपट्टी आपण सुद्धा कधीतरी अनुभवली असेल ! आजकाल कशातच “राम” उरला नाही, मग हा “रामबाण कापूस” तरी कसा उरेल, खरं की नाही ? असो ! कालाय तस्मै नमः !
“भावजा, रविवारी सकाळी ७ !” “भावजा, बुधवारी सकाळी ९ !” “भावजा,…. सकाळी………. !” असे निरनिराळे आदेश वजा सूचना, आमचा “भावजा” खाली रस्त्यावरून जातांना दिसला की त्याला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात, चाळी चाळीच्या कॉमन गॅलेरीतून ऐकायला येत.
मंडळी “भावजा” हे आमच्या आठ चाळीच्या मिळून वसलेल्या समूहातल्या, अंदाजे पाचशेपैकी चारशे खोल्यातील लहान लहान मुलं आणि त्या प्रत्येक खोलीतली वडील मंडळी, साधारण साठ वर्षांपूर्वी ज्याच्या समोर दर दोन ते तीन महिन्यांनी स्वतःच डोकं भादरून घ्यायला “नतमस्तक” होत त्या “नाभिकाचे” नांव !
तुम्ही म्हणालं, “भावजा” हे काय नांव आहे ? पण मंडळी मी तुम्हांला शपथेवर सांगतो, माझ्या जन्मापासूनच्या चाळीतल्या पन्नास वर्षाच्या वास्तव्यात मला कळायला लागल्या पासून तरी, त्याला आठही चाळीतले समस्त चाळकरी आणि पोरं टोरसुद्धा त्याच नावाने हाकमारीत असत. त्यामुळे त्याच्या खऱ्या नावाचा पत्ता, मी माझा चाळीतला पत्ता बदलेपर्यंत तरी मला लागला नाही. शिवाय त्याच खरं नांव जाणून घ्यावं असं त्याकाळी मलाच काय, इतर चाळकऱ्यांना सुद्धा कधी वाटलं नाही, हे ही तितकंच खरं ! तरी सुद्धा आज त्याच “भावजा” हे नांव आठवताच, त्याची वामन मूर्ती अजूनही इतक्या वर्षांनी माझ्या डोळ्यासमोर उभी राहते !
पांढरं स्वच्छ धोतर, त्यावर निळा ढगळ म्हणावा असा, समोर दोन मोठे खिसे असलेला आणि त्या दोन खिशांना बाहेरून बटनाने बंद करायला असलेले दोन फ्लॅप असलेला शर्ट, डोक्यावर काळी गोल टोपी, पायात कोल्हापुरी चपला आणि उजव्या हातात पत्र्याची, त्याला लागणाऱ्या सगळ्या आयुधांची पेटी ! अशा अवतारातली त्याची ठेंगणी ठुसकी वामन मूर्ती, आठही चाळीचे जिने चढता उतरतांना मी तेंव्हा अनेक वेळा बघितली आहे.
असा हा “भावजा” आपल्या डाव्या शर्टाच्या खिशात चांदीची साखळी असलेलं एक छोटेखानी गोल घड्याळ बाळगत असे. अर्थात त्या घडाळ्याचा उपयोग तो त्या वेळेस तरी, आजच्या भाषेत सांगायचं तर “शायनींग” मारण्यासाठीच करत असावा. कारण त्याला तुम्ही जरी एखाद्या दिवशी सकाळी सात वाजता बोलावलं असेल आणि त्यानं तसं तुमच्या नावासकट खिश्यातल्या छोट्या डायरीत लिहिलं असेल, तरी स्वारी त्या ठरलेल्या दिवशी दहाच्या आत उगवेल तर शपथ !
याला कारण पण तसंच होत. तेंव्हा आजच्या सारखी गल्ली बोळात उगवलेली, वेगवेगळ्या हेअर स्टाईल करणारी महागडी एसी “सलोन” तर सोडाच, पण साधी “शंकर केश कर्तनालय” सारखी “सलून” सुद्धा शहरातल्या ठराविक उच्चभ्रू वस्तीत हाताच्या बोटावर मोजण्या इतकी सुद्धा नव्हती ! आणि त्यावेळेस ती असली काय किंवा नसली काय, तेंव्हा त्याची पायरी चढून स्वतःच डोकं भादरण चाळीतल्या कोणालाच त्या वेळेस तरी परवडण्यासारखं नव्हतं ! किंबहुना त्या सलूनमधे जाऊन एका वेळच्या डोकं भादरायच्या खर्चात, “भावजा” पुढे अख्खी दोन वर्ष नतमस्तक होता आलं असतं, असा साधा सरळसोट मध्यमवर्गीय हिशेब त्यात होता, हे ही तितकंच खरं ! त्यामुळे “भावजाच्या” सकाळच्या सातच्या अपॉइंटमेंटसाठी चाळकऱ्यांना दहा दहा वाजेपर्यंत वाट पहात बसण्याशिवाय पर्याय नसायचा. कधी कधी त्याला जास्तच उशीर झाला, तर घरातली वडील मंडळी आम्हां पोरांना त्याची स्वारी कुठल्या चाळीत आपल्या हातातलं कसब दाखवत बसली आहे, याचा शोध घेण्यासाठी पाठवत असे. आता मी जरी “भावजाच्या” केस कापण्याला त्याच्या हातातलं कसब म्हटलं, तरी तेंव्हा बहुतेक “क्रू कटचा” शोध त्याच्याच “मशीन” मधूनच जन्माला आला असावा, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुढे आमच्या या “भावजाचा” तो “क्रू कट” त्यावेळच्या पोलीस शिपायांच्या माथी जाण्यामागे आमच्या “भावजाचाच” तर हात नाही ना ? इतपत शंका घेण्यास काही चाळकऱ्यांची मजल तेंव्हा गेली होती.
केस कापायला आपल्यापुढे कोण बसलंय, त्याच वय काय, त्याला कसे केस कापून हवेत अशा क्षुल्लक गोष्टींची चर्चा न करता, समोरच्या व्यक्तीच डोकं आपल्यापुढे त्याची मान दुखेपर्यंत जास्तीत जास्त वाकवून, दिसला केस काप करत, तो डोक्यावरील केसांची “कतले आम” त्याच्या पद्धतीने करत सुटे ! या त्याच्या केस कापण्याच्या स्वतःच्या स्टाईलमुळे एखाद्या सोमवारी, आठ चाळीतल्या समस्त आयांचा आपापली मुलं मागच्या बाजूने ओळखण्यात फारच गोंधळ उडे मंडळी. कारण केस कापल्यावर सगळी मुलं मागून थोडे दिवस तरी सारखीच दिसायची ! मग काही कारणाने एखाद्या मुलाला दुसऱ्याच आईचा फटका खायचा प्रसंग सुद्धा ओढवायचा !
त्या जमान्यात हिंदी सिनेमे पाहण्यापेक्षा लोकं मराठी संगीत नाटकं पहाणं जास्त पसंत करीत असतं. त्यामुळे हिंदी सिनेमांतल्या एखाद्या “कुमारा” सारखी आपण पण हेअरस्टाईल करावी असं कोणाला वाटत नसे. शिवाय तशी फॅशन पण तेंव्हाच्या तरुण मंडळीत फोफावली नव्हती आणि मराठी संगीत नाटकातल्या एखाद्या कळलाव्या नारदा सारखी हेअरस्टाईल (?) करायचा तर प्रश्नच नव्हता. कारण डोक्यावरच जंगल कंगव्याने केस फिरवण्या इतकं वाढलं रे वाढलं, की लगेच “भावजाला” फर्मान जाई !