मराठी साहित्य – विविधा ☆ सर्वपित्री अमावस्या… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?  विविधा  ?

☆ सर्वपित्री अमावस्या… ऋतू बरवा ☆ सौ राधिका भांडारकर  ☆

आपले सर्व ऊत्सव हे ऋतु चक्रावर अवलंबून असतात.

तसेच आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. साधारणपणे भाद्रपद महिन्यांत शेतीची कामे संपलेली असतात. पीकं तयार होत असतात. गणेशोत्सव संपला की पितृपक्ष सुरु होतो. भाद्रपद, कृष्णपक्षातील पंधरवडा हा पितृपक्ष मानला जातो.

कृतज्ञता पक्ष असेही म्हणायला हरकत नाही.

पूर्वजांचे स्मरण, त्यांच्याविषयीची प्रेमभावना, आदर कृतज्ञता श्रद्धेने व्यक्त करण्यासाठी हा पंधरवडा.

ज्या तिथीला त्यांना देवाज्ञा झाली त्या तिथीस श्रद्धायुक्त मनाने सर्व कुटुंबीय श्रद्धांजली वाहतात.

पूर्वजांना पितर असे संबोधले जाते. त्या दिवशी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून, केळीच्या पानात वाढले जातात व ते पान कावळ्याला खाऊ घालतात. दूध वडे खीर पुरण हे पदार्थ मुख्यत्वे बनवले जातात.

अशी समजूत आहे की, या दिवसात पितर भूलोकी येतात.

ऊत्तर आकाशात देवांचा वास असतो तर दक्षिण आकाशात पितर वास करतात. सूर्य दक्षिणायनात जात असतो.या खगोलशास्त्रीय स्थित्यंतराला दिलेला हा धार्मिक आणि श्रद्घेचा  दृष्टीकोन. परंतु आपल्या पूर्वजांची आठवण ,आज त्यांच्यामुळे आपण जन्मलो, त्यांनी आपल्याला वाढवलं,शिक्षण संस्कार दिले. जगण्याची वाट दाखवली.. त्यांच्या ऋणाची जाणीव ठेवण्यासाठीच हा पितरोत्सव!!

शिवाय या निमीत्ताने पक्षी प्राणी गोरगरिबाच्या मुखी घास घातला जातो. कुणी पूर्वजांच्या नावे धर्मादाय संस्थांना दान देतात ..देणग्या देतात.. या रीतीमागे अतिशय चांगला हेतु आहे. मृतात्म्यांची शांती तृप्ती व्हावी ही भावना आहे. आणि त्यांचा आशिर्वाद सदैव असावा अशी भावना आहे.

आज अनेक वर्षे, पिढ्यानु पिढ्या परंपरेने हा पितृपक्ष मानला जातो. काळाप्रमाणे काही बदल होत असतात.

पण इतकंच वाटतं की पूर्वजांचं ऋण न फिटणारं आहे, पंधरा दिवसांचा हा पितृपक्ष. अत्यंत श्रद्धेने तो साजरा झाला. आज अमावस्या. शेवटचा दिवस. आजच्या या दिवसाला सर्वपित्री अमावस्या म्हणतात. ज्यांना पूर्वजांची तिथी माहित नसते, किंवा वंशातल्या सर्व पूर्वजांना, इतकंच नव्हे तर ज्यांनीआपल्या आयुष्याला दिशा दिली, संस्कार केले, घडवले, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा, आजचा महत्वाचा दिवस !! मात्र एक सल मनात आहे.

आजच्या संवाद नाते संंबध हरवत चाललेल्या काळात जन्मदात्यांची अवहेलना त्यांच्या जीवंतपणी होऊ नये..

नाहीतर मरणानंतर केलेल्या अशा सोहळ्यांना काय अर्थ आहे……?

धन्यवाद!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वप्न… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? मनमंजुषेतून ?

☆ स्वप्न… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

“स्वप्नं” किती तरल, हळूवार, अलगद, नाजूक शब्द पण व्याप्ती किती मोठी. स्वप्ने जरूर बघावीत पण स्वप्नरंजन नको. स्वप्नांच्या मागे जरूर लागावे पण तेच अंतिम सुख आहे असे वाटणे नको. कधीकधी स्वप्नांमुळे उत्तुंग यशाचे शिखर गाठता येते, तर कधी ह्याच स्वप्नांच्या ध्यासामुळे आपण निराशेच्या गर्तेतही ढकलल्या जातो. स्वप्नांपेक्षाही वास्तवतेची कास धरा, सकारात्मक व्हा. जास्त अनुभव मिळतो .

मला स्वतःला जी लोकं उत्तुंग, आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने बघतात त्यांच्याबद्दल प्रचंड कौतुक, आदर वाटतो. पण मला स्वतःला स्वतःच्या बाबतीत म्हणाल तर लहान लहान स्वप्नं बघण्यात जास्त आनंद मिळतो.एकतर लहान स्वप्ने आवाक्यातील असतील तर लौकर पूर्ण होतात आणि अल्प गोष्टीतही समाधान, सुख,आनंद शोधण्याची सवयच लागून जाते कायमची. 

बरेचदा स्वप्ने बघतांना आपण पराकोटीची मेहनत करतो,ही चांगलीच गोष्ट आहे.परंतु ह्याचा दुष्परिणाम जर आपल्या प्रकृतीवर होत असेल तर तीच स्वप्नं आपल्याला महागात पण खूप पडतात. माझ्या मते स्वप्नं ही जिन्याच्या पाय-यांसारखी असतात. त्या एकेका पायरीवर क्षणभर विसावा घेऊन दुसरी पायरी चढावी, म्हणजेच दुसऱ्या स्वप्नाकडे वळावं. एका दमात पूर्ण जिना चढून जाण्याच्या प्रयत्नात ,सगळी स्वप्ने झटक्यात कवेत घ्यायच्या प्रयत्नात, शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचेस्तोवर आपला जोर, दम संपुष्टात येऊन त्याचा स्वाद घ्यायला ना आपल्यात जोर शिल्लक राहतो ना उत्साह. मोठ्या स्वप्नाच्या मागे लागतांना कदाचित आपण लहान लहान आनंदाला पण मुकून जातो.

स्वप्नांचे इमले चढवितांना ध्यास असावा पण हव्यास नको. स्वप्नांची पूर्तता करतांना माणसे तोडण्यापेक्षा जोडण्यालाच नेहमी प्राधान्य द्यावं. स्वप्ने पूर्ण व्हावीत ही इच्छा जरूर असावी पण अट्टाहास नको. शेवटी काय हो सगळ्या मानण्याच्याच गोष्टी. तुकडोजी महाराज म्हणतातच नं ,” राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, ह्या झोपडीत माझ्या.” जशीजशी समज येते,आणि प्रगतीची कास धरावी वाटू लागते तशीतशी माणसाला स्वप्ने बघायची सवय लागत असावी असं वाटतं. अर्थात माणसाला स्वतःची उन्नती करावयाची असेल तर नुसतं स्वप्नं बघून पण भागणार नाही. ती स्वप्नं पूर्णत्वास कशी जातील ह्याचा पण विचार करायला हवा.साधारणतः किशोरावस्था ते अख्खं तरुणपण हा काळ स्वप्नरंजनासाठीच असतो जणू. मग नंतर कुठे वास्तविकतेचं भान येऊन आणि अनुभवाचे टक्केटोणपे खाऊन सत्य परिस्थिती सामोरी आल्यावर खरं भान येते.

स्वप्न हा विषय काल एका गमतीनं सुचला. स्वप्नं बघणं आणि स्वप्नं दिसणं ह्या दोन भिन्न बाबी आहेत. झोपेत ब-याचश्या व्यक्तींना स्वप्नं दिसतात. साधारण आपण दिवसभरात ज्या गोष्टी बघतो, अनुभवतो त्याच्याशी निगडित स्वप्नं पडतात.  परवा एकदा टिव्हीवर बातम्या बघत असतांना एका बड्या व्यक्तीच्या घरं व प्रतिष्ठानांवर “ईडी”ची पडलेली धाड दाखवत होते.आजकाल नवीनच फँड आलंय. एकच बातमी आणि त्याच्याशी निगडीत फुटेज हे मेंदूवर हँमरींग केल्यासारखं वारंवार कित्येकदा दाखवलं जातं. दिवसभर ती ईडीची धाड बघितली. त्या को-या करकरीत नोटांच्या थप्प्यावर थप्प्या आणि सोने,चांदी, हिरे मोती,प्लँटीनम ह्यांचे घरातून निघालेले दागिने बघून मी बँकर असूनही मला चक्कर आल्यागत वाटलं. त्यानंतर होणारी ती झाडाझडती, ते आरोप, ते आपल्याच घरात चोरासारखं बसणं बघून वाटलं आपल्याकडे गरजेपुरतीच संपत्ती आहे हेच छान.

दिवसभर तेच बघितल्यामुळे असेल वा डोक्यात तेच बसल्यामुळे असेल मलाही रात्री माझ्या घरी धाड पडल्याचं स्वप्नात दिसलं. घरी दागिने, नोटांच्या थप्प्या काहीच नसल्याने मी स्वप्नातही नेहमीसारखीच निर्धास्त होते. पण स्वप्न आत्ता कुठे सुरू झालं होतं,आणि मस्त नाँनस्टाँप झोपेची सवय असल्यानं स्वप्नंही सुरुच राहणार होतं. त्या धाड टाकणा-या अधिका-यांनी सर्वप्रथम वाँर्डरोब कुठे आहे विचारले. दागिने, नोटांच्या थप्प्या नव्हत्याचं त्यामुळे त्या सापडण्याचा प्रश्नच नव्हता. त्या अधिका-याने सांगितले की ही ईडीने “साडी”  ला संपत्ती समजून टाकलेली  ” धाड” आहे. आता मात्र माझं धाबं दणाणलं. 

वाँर्डरोब उघडल्याबरोबर माझी ईस्टेट म्हणजे माझ्या साड्यांची गिनती चालू केली. त्या साड्यांच्या थप्प्या ते भराभर उलगडून मोजू लागले. तरी नशीब मला सरसकट बायकांना त्या साड्यांच्या घडीत नोटा ठेवायची सवय असते ती सवय अजिबात नव्हती. नाहीतर अजूनच आफत होती.

त्या एकएक साडीबरोबर त्यांच्या घड्यांसारख्या त्याच्याशी निगडीत एकेक आठवणींचे पदर उलगडायला लागलेत. साड्या हा बायकांचा विकपाँईंट. आईनं, बहीणीनं, वन्संनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी दिलेल्या साड्या मी त्यांना खुलासा म्हणून एक एक प्रसंग ,साडी देण्याचं निमीत्त असलेलं सबळ कारण सांगू लागले. मी सांगतांना थकतं नव्हते पण ते अधिकारी मात्र ऐकतांना घामाघूम होत होते. ते म्हणाले हे बायकांचे एकमेकींना साड्या गिफ्ट द्यायचे फंडे आम्हा माणसांच्या लक्षातच येत नाही. 

त्या अधिक-यांनी घामाघूम होत माझ्या साड्यांचे गठ्ठे मारले आणि एवढ्यात त्यांच्या कार्यालयात फँक्स आला म्हणे. साड्या हे अतिशय कष्टानं जमवलेलं, जीवापाड जपलेलं स्त्रीधन असल्याने त्यावर कुणीच कायद्यानं जप्ती आणूच शकत नाही. तेव्हा परत मनातल्या मनात स्वतःच्या नशीबाला दोष देत त्या अधिका-यांनी माझा जसा होता तसा साड्यांच्या व्यवस्थित घड्यांनी माझा वाँर्डरोब परत नीट लावून दिला.

तेवढ्यात फटफटल्यासारखं वाटलं आणि खडबडून जाग आली. सरावाने उठल्याबरोबर हात मोबाईलकडे वळला आणि बघते तो काय– वन्संनी माझ्यासाठी घेऊन ठेवलेले चार पाच साड्यांचे फोटो व्हाट्सएपवर माझ्याकडे बघून हसत होते. आणि मी सुद्धा परत एकदा वाँर्डरोब उघडून माझी संपत्ती डोळे भरून बघितली आणि रात्री पडलेलं हे एक दुःस्वप्नं होतं हे जाणून कामाला लागले.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लाल पेन… सुश्री उज्वला आंबेकर ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ लाल पेन… सुश्री उज्वला आंबेकर ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

लोकहो, लाल पेन हे काय शीर्षक झालं ?

हं…! तर या लाल पेनाचा आणि लिहिण्याचा काही म्हणता काही संबंध नाही बरं का ! काहीकाही जणं ना या लाल पेनाचा सतत वापर करत असतात, अगदी अक्षय साठा असतो म्हणा ना !

तुम्ही कौतुकाने यांना एखादी नवी खरेदी दाखवा ! ती कितीही उत्तम असली तरी हे नापास करणार ! याच्यापेक्षा त्या कंपनीचं, या मॉडेलपेक्षा दुसरं मॉडेल् कसं चांगलं आहे, त्याचे विविध फायदे सांगणार ! त्यात काही खोड नाही काढता आली तर किंमतीत काढणार ! ही वस्तू तुम्हाला किती/कशी महाग पडली हे पटवून तुमचा खरेदीचा आनंद कमी करणार !

कपडा असेल तर रंग, पोत, किंमत काहीतरी खोड काढून तो नापास करणार ! हीच साडी अमुक ठिकाणी इतक्या किमतीला मिळते. किंवा आपल्या कपड्याच्या किंमतीचा अंदाज कमीत कमी सांगून आपला कचरा करणार !….लाल पेन!

तुम्ही प्रेमाने खास रांधलेला पदार्थ यांच्यापुढे ठेवा….लाल पेन तयार ! त्यात काय कमी/जास्त आहे, त्यात काय घालायला हवं/नको, याचे परखड परीक्षण ऐकवून हताश करणार ! ही मंडळी स्वतः पाहुणचार करताना मात्र काटकसर बाईंना आवर्जून बोलावतात !

तुमचं काही चांगलं पाहिलं की माझ्याकडे याहीपेक्षा कसं आणि किती चांगलं आहे हे सांगण्यासाठी लगेच सरसावतात ही …लाल पेनं !

एखादी भारी वस्तू, साडी, कपडा प्रेमाने यांच्यासाठी भेट म्हणून आणला तर कशाला एवढा खर्च करायचा किंवा एवढी भारी वस्तू आणायची ? असे वारंवार प्रेमाने म्हत तुमची जागा– नव्हे लायकी दाखवणार !….लाल पेन!

माझ्या लेकाने त्याच्या मित्राच्या आईला खूप प्रेमाने सुंदर किमती ड्रेस मटेरियल भेट दिले काही निमित्ताने ! प्रेम (बहुधा आमच्याकडून) आणि जाणे येणे खूप होते. नुकतीच नोकरी लागली होती त्याला ! ” कशाला रे एवढे पैसे खर्च करायचे? तुझा पगार तो काय “…..लाल पेन !

Van heusen चा टी शर्ट भेट दिला तर एकावर एक फ्री घेतला ना विचारणार हे लाल पेनवाले !

आईच्या पहिल्या स्मृतिदिनी तिच्यावर मी लेख लिहिला. त्यावर खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या. माझी मैत्रीण असलेल्या आईच्या एका सहशिक्षिकेच्या मुलीनेही लेख वाचून, तिच्या आईच्या अशाच प्रवासाची आठवण काढीत सह- अनुभूतीचा फोन केला—- नंतर एक फोन आला. “अगं,माझ्या आईने पण फिरती करून, घर सांभाळून व्यवसाय केला. अमुक केलं तमुक केलं…ब्ला ब्ला ब्ला”…लाल पेन ! अहो तुम्ही लिहा ना मग तुमच्या आईवर !

कुणी छोटी चा फोटो पोस्ट केला, साऱ्यांनी तिचे कौतुक केले की लाल पेन त्यावर रेघ ओढणार ! “आता छान दिसतेय हां “. 

एखादी चांगली पोस्ट शेअर केली तर तिथेही ही लाल पेनं काहीतरी किडे टाकणार !

आमचे एक वयोवृद्ध जवळचे नातलग आम्ही आमच्यासाठी घेतलेल्या कुठल्याही वस्तूची आधी किंमत विचारणार ! किंमत ऐकून चेहरा आंबट करणार ! “अरे वा,बराच पैसा दिसतोय! “…वैषम्य..ओढली लाल पेनाने रेघ !

एक आजी संध्याकाळी ओट्यावर स्वेटर विणत असायच्या ! शेजारची नवोढा लगालगा आली. ” अय्या! आजी स्वेटर विणताय?मला पण येतं विणायला ! चाळीस स्वेटर विणलेत मी आज्जी चाळीस  !”… लाल पेन…वय एकवीस!

जुनी गोष्ट !एकदा खाऊ देताना प्लॅस्टिकच्या पिशवीमधे देत होते…. ” मी ना… आजिबा..त प्लास्टिकची पिशवी वापरत नाही !अगदी विरुद्ध आहे प्लॅस्टिकच्या “…… लाल पेन…ठासून बोलले ! आपल्या बुटिकमधे ड्रेसेस देताना बुटीकचे लोगो असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्याच वापरतो हे लाल पेन विसरले होते !

मला हे कधीच कळले नाही,अशा सतत लाल रेघा मारून काय मिळते या व्यक्तींना? तुमच्या असल्या/ नसलेल्या चुका लग्गेच दाखवून, काहीतरी किडे करून तुमच्यापेक्षा मी कशी/ कसा श्रेष्ठ हे दाखवायची गरज का पडते ? 

यातल्या काही व्यक्ती तर well offअसतात. म्हणजे त्यांना नाती,पैसा,स्वास्थ्य,कर्तुत्व,शिक्षण काही म्हणता काहीच कमी नसते. आपल्याकडे नसल्याच्या भावनेतून हे नाही घडत ! पण लाल पेनाचा दंश केल्याखेरीज यांना चैन पडत नाही !—स्वभाव म्हणावा का?

अशीच एक सधन व्यक्ती. घरी पाणी भरणारी लक्ष्मी ! त्यात या व्यक्तीचे कर्तुत्व काही नाही बरं का ! पण…..

त्या लक्ष्मीच्या जोरावर त्या व्यक्तीला नातेवाईक,साऱ्या मित्र मैत्रिणी, त्यांचे कुटुंबीय यांना फुकटचे ,समोरच्याला मूर्खात काढत आगाऊ सल्ले देण्याचा जणू अधिकार मिळालेला आहे. ‘ आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून.’.ही वृत्ती ! कुणाची मुलगी परदेशी हटके करियर करीत आहे !विशेष कामगिरीसाठी अभिनंदनाचा फोन करताना इथे भारतात काय नोकऱ्या नाहीत का अशी तिची अर्धा तास हजेरी घेणार,….हे लाल पेन ! कुणाच्या मुलाचे लग्न लांबले तर आता आधीच किती आणि कसा उशीर झालाय असे ओरखडे काढत ओळखीतली घटस्फोटित मुलगी सुचवीत, ती कशी आणि कित्ती चांगली आहे याचा इतिहास भूगोल सांगत डोके खाणार !… लाल पेन !

काही लाल पेनांच्या शब्दाशब्दातून अहंकार ठिपकत असतो. समोरच्याचे वरवरचे अतिशयोक्त कौतुक करीत लाल पेनाची खोल रेघ ओढून असे लोक आनंद मिळवतात— कुणाचे काही चांगले गुण, कर्तुत्व कळले की यांना ओवामिलची गरज पडणार ! म…ग….. तिथे ते लाल पेन खुबीने वापरतात– अमुकपेक्षा मी कसे वेगळे आणि जास्त चांगले केले आहे याचे ढोल बडवायचे. प्रत्यक्ष भेटले तरी यांची कर्कश्श जीभ लाल पेनाचे काम चराचरा करते ! मीच कसा/कशी हुशार, गुणी, सर्वगुणसंपन्न, धनिक असे सतत दाखवण्याची काही पेनांना खोड असते. असालही हो 

तुम्ही ! पण दुसरे कुणी तसेच किंवा त्यापेक्षा गुणी, लायक, धनिक असू शकते ना? आपला मोठेपणा, महत्त्व सिद्ध करायला दरवेळी लाल पेन वापरायची गरज आहे ?—-

——–तुम्हाला काय वाटतं मंडळी ?

ले.: उज्वला आंबेकर

संग्राहिका : बिल्वा अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सेल्फी फोटो… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

? विविधा ? 

☆ सेल्फी फोटो… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

तीसेक वर्षांपूर्वी नुकतेच मोबाईल फोन आले होते. पण आजच्या सारखे ज्याच्या त्याच्या हातात, खिशात मोबाईल नव्हते. ती काही लोकांचीच मक्तेदारी होती. इतरांना तो परवडायचाही नाही. मग त्यावर फोटो काढण्याची सोय झाली. निरनिराळ्या अॅप्स मधून, फीचर्समधून खूप झटपट सुधारणा झाल्या. आणि नंतर सेल्फीचा जमाना आला. पंधरा वर्षांपूर्वी पासून सेल्फी काढणे हे प्रेस्टिजचे लक्षण मानले जाऊ लागले. नंतरच्या काळात तर सेल्फींचा सुळसुळाट झाला.

विज्ञान तंत्रज्ञानांची प्रगती मानवाला सुखकारक ठरली. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून इतर कुठल्याही ठिकाणी संपर्क करणे सोपे झाले. तसेच फोटो पाठवणेही सोपे झाले. परदेशात असलेल्या जिवलगांचा दिनक्रमही त्यातून समजणे, प्रत्यक्ष पाहणे ही नित्याची गोष्ट झाली. याचे मुख्य कारण म्हणजे सेल्फी हेच होय.

सेल्फी स्टिक जवळ बाळगणे हेही कित्येकांना आवश्यक वाटू लागले. सहलीच्या वेळी आपल्याला हव्या त्या कोनातून फोटो सहज काढता येऊ लागले.  एवढ्या सगळ्या तंत्रज्ञान प्रगतीमध्ये ज्याने सेल्फीचा शोध लावला , त्याला खरोखरच सलाम !  बऱ्याच अंशी माणसाला त्याचा फायदाच जास्त होऊ लागला आहे. मलाही होतो. मी माझ्या परदेशात राहणाऱ्या मुलांना इतर कुटुंबीयांना सेल्फी द्वारा भेटू शकत नसले तरी भेटीचा आनंद आम्ही नक्कीच घेऊ शकतो.

पण जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो तेव्हा मात्र हे सेल्फी प्रकरण प्रसंगी जिवावर बेतू शकते. विशेषतः खोल पाण्यात, समुद्रात, धबधब्याखाली किंवा उंच डोंगरांवर, कठडे नसलेल्या गच्चीवर सेल्फी काढताना आजूबाजूचे भान बाळगणे अपरिहार्य असते. तसे ते न बाळगले तर सेल्फीच्या अट्टाहासाने अनेक लोक अपघातात बळी पडतात . पाण्यात बुडून, दगडावर आपटून, उंच कड्यावरून पाय घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यात तरूण मुले मुली ही जीव गमावून बसले आहेत.

जेव्हा प्रगती होते तेव्हा माणूस अशा दुर्घटनांची कधीच अपेक्षा करीत नसतो.किंबहुना विचारही करीत नसतो. पण आपल्याच क्षणैक सुखाच्या आभासी धुंदीत आपला मौल्यवान जीव गमावण्याची वेळ कुणावर येऊ नये. आपले आनंदाचे क्षण आपण आता क्षणोक्षणी सेल्फी घेऊन कायमचे स्मरणात ठेवू शकतो. फुरसतीच्या वेळी त्या क्षणांच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद घेऊ शकतो. त्यातही ते सेल्फी  इतरांना पाठवले तर त्यांना आनंद होऊन आपला आनंदही द्विगुणित होतो. त्यावर खूप लाईक्स, स्माईली, थंब्ज 👍 आले की आपला इगो सुखावतो 😀.

यामुळे आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की कॅमेरा घेऊनच फोटो काढणे, ते फोटो स्टुडिओ हे सगळं या सेल्फीमुळे कालबाह्य झाले आहे. फोटोग्राफर लोकांची गरज यामुळे संपली आहे. त्यांना वेगळे व्यवसाय मिळाले असतील. पण आता नव्या युगात कुणीही फोटो, सेल्फी सहज क्लिक करू शकतो.

सेल्फी घेणे, इतरांना पाठवणे, पुन: पुन्हा पाहून आनंद लुटणे, कायम स्मरणात ठेवणे यात काहीच गैर नाही. ही जगरहाटी झाली आहे. मीही काढते सेल्फी . सर्वांना पाठवते.  पण खबरदारी घेऊनच!! ज्यांना पाठवायचा सेल्फी ,त्यांनाही त्यातून आनंदच मिळावा. त्याला आपला सेल्फी पहायचा नसेल तर ते लक्षात आले की नका पाठवू!

काही ठिकाणी जेव्हा अजिबात खबरदारी घेतली जात नाही तेव्हा कधी कधी तिथल्या निसर्गाचे, पर्यावरणाचेही नुकसान होते निसर्ग चुरगळला जातो याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. तरूण वर्गामध्ये सेल्फी अधिक लोकप्रिय आहे. असू दे! पण त्याचवेळी इतर कर्तव्ये, जबाबदारी, खबरदारी विसरू नये. एकदा तर सेल्फीच्या नादात जलाशयात एक बोट बुडाली. त्यात बुडून मृत्युमुखी पडलेले लोक डॉक्टर होते. अशी एक बातमी होती. समाजातील या महत्त्वाच्या घटक असलेल्या सुशिक्षितांनी तरी यांचे भान ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी सेल्फीचा आनंद जरूर घ्यावा ,पण जबाबदारी आणि खबरदारी पाळावी हेच खरे !!!!

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आई कल्पतरू… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार ☆

सौ. कल्पना मंगेश कुंभार

? कवितेचा उत्सव ?

☆ आई कल्पतरू… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार ☆

आई– नुसता शब्द जरी उच्चारला तरी रोम रोम शहारते..उत्साहाची एक वेगळीच लहर संपूर्ण शरीरात तयार होते..निर्मात्याने जेव्हा ही जीवसृष्टी निर्माण केली तेव्हा प्रत्येक जीवाची काळजी घेणं त्याला शक्य नव्हतं, म्हणूनच की काय…त्याने प्रत्येक प्राणीमात्रासाठी आई निर्माण केली..जी  नवीन जीवाला फक्त जन्म देत नाही तर स्वतः च्या जीवाची पर्वा न करता त्याचे रक्षण करते..पालन करते..त्याला सुसंस्कारित करते..

मागे एकदा माझी लेक डिस्कव्हरी चॅनल पहात होती..सिंह शिकार करत होता अन् जिराफ आपल्या पिल्लाचं रक्षण करण्यासाठी त्या सिंहाचा प्रतिकार करत होते..ते पाहून लेक  मला म्हणाली, ” जिराफाला समजत नसेल का? सिंहापुढे आपलं काय चालणार नाही..निदान स्वतः चा तर जीव वाचवायचा..” मी फक्त एव्हढंच म्हणाले,” बाळा, आता ती फक्त आई आहे..जिला आपल्या पिल्लाला वाचवायचं आहे..” 

आई..मग ती कोणाचीही असो..जेव्हा तिच्या बाळावर एखादं संकट येतं तेव्हा ती सर्व शक्ती एकवटून प्रतिकार करते..फक्त आपल्या बाळासाठी..आई..ही शेवटच्या श्वासापर्यंत  आईच रहाते..पिल्लू मात्र आपल्या भूमिका बदलत जाते..माझी आईही अगदी अशीच आणि मीही भाग्यवान आहे आज मीही एक आई आहे..”आई म्हणायचीच, जेव्हा तू आई होशील ना तेव्हा समजेल आई काय असते “. खरंच …आईपण मिळणं हे भाग्यच..

माझ्या प्रत्येक कणावर—आयुष्यातील प्रत्येक क्षणावर— जिच्या संस्काराचा पगडा .. ती माझी आई..माझी सगळ्यात जवळची मैत्रीण..जिच्यामुळे मी आज माणूस  म्हणून आपल्या मातीशी एकरूप झाले आहे..ती माझी आई…विजया.

नावाप्रमाणेच आयुष्यातील प्रत्येक संकटाशी झगडत..त्या त्या क्षणी न डगमगता प्रत्येक संकटावर ती मात करत गेली अन् माणूस म्हणून आम्हाला घडवत गेली. मला अन् दादाला वाढवताना रोज कळतनकळत कधी गोष्टीतून तर कधी स्वतः च्या कामातून..कधी घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण करून..कधी इतिहासातून…  तिने आमच्यावर जे संस्कार केले..त्यामुळेच आज मी व माझा दादा जीवनाचा आनंद घेत आयुष्य कसे जगायचे? ..माणसं कशी जोडायची?..पैशापेक्षा माणूस का महत्वाचा?..हे शिकलो..आज माझा दादा उत्तम डॉक्टर आहे..मी प्राथमिक शिक्षिका आहे केवळ आईवडिलांच्यामुळे..

आजही जेव्हा वयाच्या ६६व्या वर्षीही तिच्यातील उत्साह..चैतन्य पाहिलं की वाटतं..कुठून येते तिच्यात ही एनर्जी ?? आणि खळखळून हसणाऱ्या तिला पाहिलं की वाटतं..तिच्यातील आत्मविश्वास..सकारात्मकता .. जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन..यामुळेच ती वेगळी आहे… अगदी वेगळी .. आयुष्यात इतकी संकटे आली..कित्येक वेळा अगदी एकटी पडली, पण तिच्यातला आत्मविश्वास व सकारात्मकता यामुळेच ती प्रत्येक संकटावर मात करू शकली ..फक्त तिचा चेहरा पाहिला तरी आजही मन प्रफुल्लित होतं..सगळी नकारात्मक भावना दूर पळते अन् मन तिच्या हास्यात आजही गुंतून जातं..आजही आठवतं भाकरी थापताना तिचं अभंग किंवा श्लोक म्हणणं.. स्वयंपाक करताकरता नकळत त्या  रुचकर जेवणात अमृत पेरणं  ..नवीन काही शिकवून जाणं..

माझी आई माध्यमिक शिक्षिका..गणित विषयात तिचा हातखंडा..पण लग्नानंतर शिक्षण घेताना एम .ए .ला इतिहास विषय ठेवल्यामुळे साहजिकच इतिहास विषय शिकवावा लागला..पण तरीही जे असेल ते अतिशय अभ्यासपूर्ण व मनापासून करणं हे तिचं तत्व, जे तिनं निवृत्त होईपर्यंत निभावलं..आज अभिमान वाटतो तिचा जेव्हा तिचे विद्यार्थी अगदी चाळीस /पन्नास वय असलेले, रस्त्यात वाकून नमस्कार करतात..तिची चौकशी करतात..आयुष्यात आणि दुसरं काय हवं..

आज मलाही या लेखातून  तिला सांगायचं आहे ..आज मी जी काही आहे ती फक्त तिच्यामुळेच …तिने दिलेल्या प्रत्येक क्षणासाठी मी कृतज्ञ आहे……. 

आई म्हणजे चैतन्याने सजलेलं अंगण..

आई म्हणजे देवापुढे शांत तेवणारं निरांजन..

आई असतो घराचा श्वास..

तिच्यामुळेच सगळीकडे देवत्वाचा भास..

लेकरासाठी हळवी,मायाळू, प्रसंगी चंडिकाही बनते ती..

घराला सावरताना कित्येक वार झेलते ती..

चुका पोटात घालून पडता पडता सावरते..

बाळासाठी कितीदा तरी दुःखाचे कढ आवरते..

आई …… आत्मारुपी ईश्वर..

तो ज्याला लाभला….. त्याचे जीवन अमृतमय निरंतर…… 

© सौ. कल्पना मंगेश कुंभार

शाळा : हुतात्मा बाबू गेनू विद्यामंदिर क्र 28, इचलकरंजी

मोबाईल : 9822038378

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रामाणिकपणे काम हेच सर्वोत्तम काम… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ प्रामाणिकपणे काम हेच सर्वोत्तम काम…  ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

निवृत्त होईपर्यंत प्रामाणिकपणे काम करणे, हेच सर्वोत्तम….

एक सुतार काम करणारा ६० वर्षांचा माणूस होता. तो आत्ता ज्या मालकाकडे काम करत होता तिथे त्याला ४० वर्षे झाले होते. ह्या ४० वर्षाच्या काळात त्याने हजारो घरे बनवली होती. पण आता त्याला संसाराला वेळ द्यायचा होता.

तो त्याच्या मालकाकडे जाऊन म्हणतो, मालक ४० वर्षे मी तुमच्याकडे इमाने इतबारे काम केले. पण आता मला माझ्या संसाराला वेळ द्यायचा आहे. माझ्या मुलांबरोबर, माझ्या मुलांच्या मुलांबरोबर वेळ घालवायचा आहे. मला निवृत्त व्हायचे आहे—- आता मालक तर मालक असतात, जाताजातासुद्धा आपल्या कामगारांकडून अजून थोडं काम कसं करून घ्यायचं हे त्यांना चांगलेच माहिती असते…

तेव्हा मालक त्या सुताराला म्हणतो, “ ठीक आहे. तुला निवृत्त व्हायचंय तर तू होऊ शकतोस. पण एक शेवटचे तीन महिन्यांचे काम आले आहे ते फक्त करून जा. ते काम झाल्यानंतर तुझा छानपैकी निरोप समारंभ करू आणि एकदम उत्साहात तुला निरोप देऊ.”  एवढे वर्ष मालकाने आपल्याला सांभाळून घेतलं, आपल्याला आधार दिला, हा विचार करून त्या सुताराने ते काम करायला होकार दिला.

पण आता त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आला होता. त्याने विचार केला होता की मस्त घरी बसून आराम करेन, पण अजून ३ महिने काम करावे लागणार होते. आतापर्यंत प्रत्येक काम मन लावून केले होते, पण आता कसेतरी करायचे म्हणून तो काम करत होता. ज्या सुताराने आपल्या पूर्ण आयुष्यात सगळ्यात सर्वोत्तम घरे बनवली, पण आता शेवटचे घर बनवताना त्याचे अजिबात मन लागत नव्हते. कसेतरी लाकडे कापायची, कसेतरी खिळे ठोकायचे, कसेतरी पॉलिशिंग करायचे असे करत करत तो घर बनवत होता. कसंबसं त्याने ते अर्धवट मनाने का होईना पण ३ महिन्यात घर पूर्ण केले. घर पूर्ण झाल्यानंतर तो सुटकेचा निश्वास सोडतो. झालं बाबा कसंतरी असा तो विचार करतो. तो मालकाला जाऊन सांगतो, मालक घर पूर्ण झालं आहे. तेव्हा मालक त्याच्याबरोबर घर बघायला निघतो. 

घर एकदम जवळ आलेले असताना तो मालक थांबतो, त्या सुताराचा हात पकडतो आणि त्याच्या हातात त्या घराच्या चाव्या देत म्हणतो, “ हे जे घर तू बनवलं आहेस ते तुला मी माझ्यातर्फे भेट म्हणून देत आहे. गेली ४० वर्षे तू माझ्याकडे जी मेहनत केलीस त्याचे फळ म्हणून हे घर मी तुला देत आहे. हे तुझे स्वतःचे घर होते जे तू बनवत होता.”

मित्रांनो विचार करा काय वाटले असेल त्या सुताराला…?? काय चालले असेल त्याच्या मनात…??—-

‘मला कोणी सांगितले असते की हे माझे घर आहे तर माझ्या आयुष्यातले सगळ्यात वाईट घर बनवण्याऐवजी मी सर्वोत्तम घर बनवले असते. अरे ! कोणी मला सांगितले का नाही की हे माझे घर आहे. सांगितले असते तर एक एक खिळा, एक एक लाकूड पॉलिश करताना मी हजार वेळा विचार केला असता आणि एक सर्वोत्तम घर बनवले असते. मी आता परत मागे सुद्धा जाऊ शकत नाही. का मी असे केले…?? ‘ 

“नोकरीचे असो नाहीतर इतर कुठलेही काम आपण स्वतःसाठीच करतोय असे समजून करा….. त्यामुळे 

आपल्यावर पश्चातापाची वेळ कधीच येणार नाही…आणि चांगले काम केल्याचा आनंद आपल्याला कायमचा मिळेल…!! “

सुंदर आहे ना कल्पना…!!  कुठेही काम करा प्रामाणिकपणे करा आणि चांगले काम करा. चांगले काम केल्याचे फळ नेहमीच चांगले मिळते.                  

लेखक …अज्ञात…

संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शब्दरंगी रंगताना… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ शब्दरंगी रंगताना… ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘शब्दरंगी रंगताना… साध्य आणि साधना’

शब्द हे भाषेचे अलंकार असतात.शब्द सूचक असतात.मार्गदर्शक असतात.ते अर्थपूर्णही असतात आणि कधीकधी फसवेही.शब्दांची अशी असंख्य रुपे असतात. शब्दांच्या या सगळ्या भाऊगर्दीत असा एक शब्द आहे जो त्याच्या वेगळेपणामुळे उठून दिसतो.तो ज्यांना हवं असेल त्यांना नेहमीच भरभरुन देतो आणि देताना गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, स्त्री-पुरुष, खेडवळ-शहरी असा कोणताही भेदभाव करीत नाही. त्याला आपलंसं करणाऱ्या कोणत्याही व्यक्तिमत्त्वाला तो आदर्शवत बनवू शकतो. या अर्थाने खूप वेगळा आणि म्हणूनच मला मोलाचा वाटणारा  हा शब्द म्हणजे ‘बिनचूक’!

बिनचूक हा शब्द ऐकताच तो फक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांच्याशी संबंधित आहे असेच वाटते. विद्यार्थीदशेत कोणत्याही प्रश्नाचे उत्तर बिनचूकच लिहिता यायला हवे या दडपणाखाली वाहिलेल्या अभ्यासाच्या ओझ्यामुळे  तो अभ्यास,त्या परीक्षा, प्रश्नपत्रिका,आणि या सर्वांच्या धास्तीमुळे निर्माण झालेली अस्वस्थ घुसमट हे सगळं ‘बिनचूक’ या शब्दाला इतकं घट्ट चिकटून बसलेलं आहे की हा शब्द फक्त प्रश्नोत्तरांशीच संबंधित आहे असंच कुणालाही वाटतं. पण ते तसं नाहीय.’बिनचूक’हा शब्द फक्त चूक आणि बरोबर या टीचभर परिघासाठी आकाराला आलेलाच नाहीय. त्याची नाळ थेट एकाग्रता, नीटनेटकेपणा, निर्णयक्षमता या सगळ्यांशीच अतिशय घट्ट जुळलेली आहे.

बिनचूक म्हणजे जसं असायला हवं तसंच.अचूक. अतिशय काटेकोर.नीट. व्यवस्थित.नि:संदिग्ध ! बिनचूक या शब्दाचे खात्रीचा,विश्वसनीय, भरवंशाचा.. असेही अर्थ आहेत. या सर्व अर्थछटांमधील सूक्ष्मतर धाग्यांची परस्परांमधील घट्ट वीणच एखाद्या व्यक्तीमत्त्वाचा गुणविशेष ठरणारा बिनचूक हा शब्द आकाराला आणते. यातील ‘खात्रीचा’,’विश्वसनीय’, ‘भरवंशाचा’ ही सगळी वैशिष्ट्ये त्या व्यक्तीची अचूक निर्णय घेण्याची क्षमता,कार्यपद्धतीतील पारदर्शकता,त्याची सर्वसमावेशक वृत्ती यामुळे सभोवतालच्या लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रतिमांची प्रतिबिंबेच म्हणता येतील. याउलट सतत चूका करणारी एखादी धांदरट व्यक्ती कुणालाच खात्रीची, भरवंशाची वाटत नाही. ती बेभरवंशाचीच वाटते. एखादे महत्त्वाचे अवघड काम एखाद्यावर तातडीने सोपवायची वेळ आली तर अशी धांदरट व्यक्ती ते काम बिनचूक पूर्ण करू शकेल याबद्दल कोणालाही विश्वास वाटणे शक्यच नसते. त्यामुळेच ती व्यक्ती जबाबदारीच्या, महत्त्वपूर्ण कामांसाठी अविश्वसनीयच ठरते.

अशा धांदरट व्यक्तींकडून होणाऱ्या चूका आणि कामचुकार माणसाने केलेल्या चूका यात अवगुणात्मक फरक नक्कीच आहे. धांदरट व्यक्ती आत्मविश्वासाच्या अभावी बिनचूकपणा पूर्णतः अंगी बाणवू शकणारही नाही कदाचित,पण आपल्यामुळे होणाऱ्या त्रासाची त्याला जाणीव असते. त्यामुळे स्वतःमधे सुधारणा घडवून आणण्यासाठी अशी व्यक्ती त्याच्यापरीने प्रयत्नशीलही असते. आळशी आणि कामचुकार व्यक्तींचं तसं नसतं. त्या वेड पांघरून पेडगावला निघालेले प्रवासीच असतात. कामं टाळायच्या वृत्तीमुळे आपल्या अंगाला तोशीस लावून घ्यायची त्यांची मुळात तयारीच नसते. येनकेन प्रकारेन त्यांचा कामे टाळण्याकडेच कल असतो.

अशा कामचुकार व्यक्तींना बिनचूकपणा अंगी बाणवणे हे अशक्यप्रायच वाटत असते. त्यामुळे ‘मी आहे हा असा आहे’ असं म्हणत स्वतःच लटकं समर्थन करीत रहाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे एकतर ते खऱ्या अर्थाने समाधानी नसतात आणि ते आयुष्याच्या परीक्षेतसुध्दा काठावरही पास होऊ शकत नाहीत.

याउलट बिनचूकपणा अंगी बाणवणे हे ज्यांच्यासाठी  जाणीवपूर्वक ठरवलेले ‘साध्य’ असते ते आवश्यक कष्ट, स्वयंशिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याद्वारे प्रत्येक काम अचूक, दोषरहित व्हावे यासाठी प्रयत्नशील असतात.त्यांच्यासाठी ही एक साधनाच असते.अर्थात ही साधना ते स्वखुशीने मनापासूनच करीत असल्याने त्यांच्यासाठी ती कधीच कष्टप्रद, त्रासदायक नसते तर हळूहळू अतिशय नैसर्गिकपणे ती त्यांच्या अंगवळणी पडत जाते. अशी माणसे कधीच चूका करीत नसतात असं नाही. त्यांच्या हातूनही अनवधानाने क्वचित कधी चूका होतातही. पण ते अशा चुकांमधून काही ना काही शिकत जातात. एकदा झालेल्या चुकीची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सजग रहातात. स्वतःची चूक मान्य करण्यात कधीही कमीपणा मानत नाहीत. आपली चूक मनापासून स्वीकारतात आणि नेमकं काय आणि कसं चुकलंय हे समजूनही घेतात.’बिनचूकपणा’ हे साध्य प्राप्त करण्यासाठीची ही त्यांची साधनाच असते !

हे सगळे कष्ट घ्यायची तयारी नसलेलेच कामचुकारपणा करायला प्रवृत्त होत असतात. त्याना परिपूर्णतेची आस कधी नसतेच.अशा लोकांसाठी बिनचूकपणा हा कोल्ह्याला आंबट वाटणाऱ्या द्राक्षांसारखाच असतो.अन्यथा बिनचूकपणा किंवा नीटनेटकं काम त्यांना अशक्यप्राय वाटलंच नसतं. याउलट परिपूर्णतेचा ध्यास घेतलेली माणसं साधी साधी कामेही मन लावून करतात. त्यातच त्यांचा आनंद आणि समाधान लपलेलं असतं. अनवधानाने झालेली चूकही त्यांना अस्वस्थ करीत असते आणि मग त्या चूकांमधून ते स्वतःत सुधारणा घडवून आणायला प्रवृत्त होतात. स्वतःच्या शिस्तप्रियतेमुळे अंगी बाणलेला हा बिनचूकपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी प्रमुख घटक ठरत असतो.

परिपूर्णतेचा,अचूकतेचा असा ध्यास घेणाऱ्या व्यक्तींचेही दोन प्रकार असतात. जी माणसे कामात अगदी शिस्तशीर,बिनचूक असतात त्यातील कांहीना  त्याबद्दल वाटणाऱ्या अभिमानाचे रुपांतर कधीकधी अहंकारात होत जाते. त्यामुळे  त्यांच्या वागण्याला एक काटेरी धार येऊ लागते जी इतरांना जातायेता सहज ओरखडे काढत जाते. त्यामुळे इतरांना त्यांच्या कामाबद्दल किंवा परफेक्शनबद्दल एरवी कितीही आदर वाटला तरी ते त्यांच्याजवळ जायला घाबरतात. त्यांच्यापासून थोडं अंतर राखूनच वागतात. हा दोष अर्थातच त्या व्यक्तींच्या अहंकाराचा.त्यांच्या बिनचूकपणाचा नव्हे. अशा अहंकारी व्यक्ती इतरांपेक्षा आपण कोणीतरी वेगळे,श्रेष्ठ आहोत या कल्पनेत सतत तरंगत असतात. आणि स्वतःचा जगण्यातला आनंद मात्र हरवून बसतात.

या उलट यातल्या दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींना त्यांच्या बिनचूकपणाचा कधीच दुराभिमान नसतो. सर्वांना सामावून घेण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे ते सगळ्यांना सोबत घेतात,त्यांना नेहमीच आपुलकीने समजावून सांगत स्वतःच्या कृतीने त्यांना कार्यप्रवृत्त करतात.जगणं असं कृतार्थ होण्यासाठी बिनचूक पणाचा अट्टाहास नव्हे तर असोशी आवश्यक असते!

विद्यार्थीदशेतील प्रत्येकाचीच वाटचाल ‘चूक की बरोबर?’ या प्रश्नाशीच बांधलेली असते. तिथे परीक्षेत येऊ शकणारे ‘अपेक्षित प्रश्न’ जसे सहज उपलब्ध होऊ शकतात, तशीच त्या प्रश्नांची बिनचूक उत्तरे इन्स्टंट पुरवणारी गाईडसही. आयुष्यातल्या जगण्याच्या वाटचालीत मात्र निर्माण होणारे असंख्य प्रश्न बऱ्याचदा अनपेक्षित असतात. त्या प्रश्नांचे नेमके आकलन आणि आपण शोधलेल्या त्या प्रश्नांच्या उत्तरांचा होऊ शकणारा दीर्घकालीन परिणाम याचा सारासार विचार करूनच त्या प्रश्नांची उत्तरे ठरवावी लागतात. अर्थातच ही उत्तरे निर्णयप्रक्रियेतूनच तयार होत असल्याने त्या उत्तरांची बिनचूकता हे ज्याच्या त्याच्या निर्णयक्षमतेच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. म्हणजेच बिनचूक निर्णय घेणे हेही कामातील बिनचूकपणा आणि प्रश्नांची बिनचूक उत्तरे देण्याइतकेच महत्त्वाचे असते. अचूक निर्णय घेण्याची निर्णयक्षमतासुध्दा ‘बिनचूक’ या शब्दाने अशी गृहित धरलेली आहे. निर्णयक्षमता वृद्धिंगत होण्यासाठी स्वयंशिस्त, परिस्थितीचे अचूक आकलन आणि प्रत्येक प्रश्नाकडे पहाण्याचा ति-हाईत दृष्टीकोन हे घटक महत्त्वाचे ठरतात.

प्रत्येकाच्या आयुष्यात पदोपदी या ना त्या कारणाने निर्णय घ्यायची वेळ येतच असते. अशा प्रत्येकवेळी दुसऱ्यावर अवलंबून न रहाता ते निर्णय ज्याचे त्यालाच घ्यावे लागतात. तत्काळ निर्णय घ्यायची अशी कसोटी पहाणारी वेळ अचानक पुढे येऊन ठेपण्याची शक्यता अपवादात्मक नसतेच. अशावेळी कोणताही निर्णय घेताना मनात चलबिचल असेल तर ती निर्णय प्रक्रियेसाठी घातक ठरु शकते. काहीवेळा सखोल विचार न करता आतयायीपणाने निर्णय घेतले जातात. असे निर्णय चुकीचे तर ठरतातच शिवाय ते नवे प्रश्न निर्माण करायला निमित्तही ठरत असतात.त्यासाठीच अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीचे नेमके आकलन आणि सारासार विचार हे घटक महत्त्वाचे ठरतात. कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य प्रयत्नपूर्वक सरावाने प्राप्त करणे मग फारसे अशक्य रहात नाही.

आपल्या आयुष्यात निर्माण होणारं दु:ख असो किंवा असमाधान हा बऱ्याचदा आपण स्वतःच त्या त्या वेळी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचाच परिपाक असतो.त्यामुळे अचूक निर्णयक्षमतेचं महत्त्व वेगळं सांगण्याची गरज नाही.

सारांश हाच की बिनचूकपणा अंगी बाणवणे हे मनापासून स्विकारलेले साध्य आणि त्यासाठी कष्ट, स्वयंशिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्न ही साधना जगणं आनंदी आणि कृतार्थ होण्यासाठी अपरिहार्यच ठरते !!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पुनर्जन्म –  भाग २ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ पुनर्जन्म –  भाग १ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

(‘‘डॉ. मी तुम्हाला ताई म्हणू का?”… तिने अगदी अनपेक्षितपणे विचारलं, आणि डॉ.स्नेहललाही का कोण जाणे, पण लगेच ‘हो’ म्हणावंसं वाटलं.) इथून पुढे —

‘‘ ताई, ती ताईजी मला इथे सोडायला आली होती. पण नंतर परत आलीच नाहीये अजून. ताईजी म्हणजे आम्ही जिथे रहातो, त्या घराची मालकीण. त्या घराला कोठा म्हणतात… मला आठवतंय् तेव्हापासून आम्ही दोघी बहिणी तिथेच रहातो. कारण माझे आईवडील… आमचं घर… यातलं काहीच मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. या ताईजीच्या कोठ्यात २-३ पुरूष माणसं सोडली, तर सगळ्या बायकाच बायका… सगळ्या आपल्याच तो-यात. तिथे एक म्हातारी बाई आहे… मावशी म्हणतात तिला… ती सगळ्यांचं जेवण बनवते. या मावशीचाच काय तो थोडा आधार असायचा आम्हाला… ती रोज आमची आंघोळ उरकायची आणि दोन वेळा मोजकंच् जेवायला द्यायची. बास्. मी थोडी मोठी झाल्यावर त्या कोठ्याच्या लहानशा खिडकीतून बाहेर बघत बसायची… तासन् तास… कारण दुसरं काय करणार ना ?… ना बोलायला कुणी, ना काही शिकवायला, ना खेळायला. शाळेत जाणा-या मुलांकडे मी रोज बघत रहायची. आपणही शाळेत जावं असं वाटायचं मला. एकदा मी ताईजीला तसं बोलूनही दाखवलं होतं… तर तिने मला कसली तरी शिवी दिली आणि इतकी जोरात थोबाडित मारली, की मी हेलपाटत खाली पडले. मग मला तिची जास्तच भिती वाटायला लागली. लहान होते तेव्हा निदान बहीण तरी माझ्याशी काही-बाही बोलायची, माझ्याजवळच झोपायची. पण ती जशी मोठी झाली, तसं तिचं वागणं खूप बदललं. तिथल्या इतर बायकांसारखं नटावं-थटावं असं बहुतेक तिला वाटायला लागलंय्, असं मला वाटायचं. आणि आता ती साडीही नेसायला लागली होती. पण हळूहळू तिचं वागणं विचित्र झालं– जास्तच बदलत गेलं. संध्याकाळ झाली की खूप घाबरल्यासारखी वाटायची. मग तिचं रात्री माझ्यासोबत झोपणं बंद झालं. त्यावेळी ती कुठे जायची, कुठे झोपायची, ते मला कळलंच् नाही तेव्हा. असंच एखाद-दीड वर्ष गेलं असेल… आणि अचानक ती आजारी पडली… सारख्या उलट्या व्हायच्या… जेवण जायचं नाही… पडूनच असायची सारखी. मग ती ताईजी इतकी दुष्टपणे वागायला लागली तिच्याशी… संध्याकाळ झाली की अक्षरश: फरपटत खोलीतून न्यायची तिला बाहेर… आणि मी घाबरून रात्रभर त्या खोलीच्या कोप-यात बसून रहायची. आणि अचानक एक दिवस सकाळी ताईजीने मला बोलावून थंडपणे सांगितलं, की ‘‘ तुझी बहीण ढगात गेली… आता तू तरी नीट वाग… मी सांगेन तसंच. नाहीतर…” – बहीण ढगात गेली म्हणजे आता ती मला कधीच दिसणारही नाही याचं दु:ख जास्त वाटत होतं, की त्या ताईजीची भिती जास्त वाटत होती हे माझं मलाच कळत नव्हतं…”

एव्हाना बेबीचे डोळे पाझरायला लागले होते. डॉ.स्नेहल तर हे सगळं ऐकून फारच हादरून गेली होती. पण कसंतरी स्वत:ला सावरत तिने बेबीला विचारलं… ‘‘ मग बहीण गेल्यावरही तू तिथेच रहातेस का अजून?”

‘‘ हो… जायचं म्हटलं तरी जाणार कुठे? पळून जायचा प्रयत्न केला होता एकदा… कारण मीही आता थोडी मोठी झाले होते. तो कोठा म्हणजे घर नाही आणि तिथे माझं म्हणावं असं एकही माणूस नाही हे माझ्या लक्षात यायला लागलं होतं. मरण्याआधीची बहिणीची अवस्था आठवत होती. आई कशाने मेली तेही कानावर पडलं होतं…”

‘‘ काय झालं होतं त्यांना? ”…

‘‘ एडस् का काय ते… आणि त्याच भीतीने बहिणीने जीव दिल्याचंही नंतर कधी तरी कळलं होतं. म्हणून तिथून पळ काढायचा होता मला. पण खाली दारावर चौकीदार बसलेलाच होता. म्हणजे नेहेमीच असायचा. त्याने अडवलं, आणि थेट ताईजीच्या समोर नेऊन उभं केलं. आता आपली अजिबात खैर नाही, आणि इथून सुटकाही नाही हे माझ्या चांगलंच् लक्षात आलं. त्या दुष्ट बाईने चार दिवस मला उपाशीपोटी कोंडून ठेवलं, मी रडरड रडले. पण तिथल्या भिंतींना कुठे कान होते? पाचव्या दिवशी खोलीचं दार उघडून ती मावशी आली. मी तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. पण ती त्या ताईजीचीच बहीण. तिने मला ढकलूनच दूर सारलं. अर्धा कप गारढोण चहा माझ्यासमोर आदळला, आणि निघून गेली. असेच दिवस चालले होते. काही दिवसांनी मीही वयात आले, आणि ताईजी अचानक माझ्याशी चांगलं वागायला लागली. त्याचं कारण जेव्हा मला कळलं तेव्हा मी फार घाबरून गेले. जीव द्यावासा वाटत होता. पण माझ्या बहिणीएवढी मी धीट नव्हते. माझ्या हातात एकच गोष्ट आहे, हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा माझ्या मनाचा दगड झाला जणू… मी थंडपणे संध्याकाळी नटून बसायला लागले… रोज नव्याने मरायला लागले. आणि अचानक एक दिवस मला दिवस गेल्याचं माझ्या लक्षात आलं.” 

‘‘ अरे बापरे… मग काय केलं त्या ताईजीने? ” आता डॉ.स्नेहल फारच अस्वस्थ झाली होती…

‘‘ अहो तिला हे कळलं असतं तर तिने काहीतरी केलं असतं ना? ”

‘‘ म्हणजे?”

‘‘ ताई, अहो एव्हाना मीही जरा शहाणी झाले होते. मी आपणहून कुणालाच काही सांगितलं नाही. आणि सुदैवाने मला फारसा त्रासही होत नव्हता. त्यात मी अशी हडकुळी… अशक्त… सहा महिने होईपर्यंत पोटच दिसत नव्हतं… कुणाला शंकाही आली नव्हती. संध्याकाळी नटून बसणंही मी मुद्दामच थांबवलं नाही. कारण मीही अशी मरतुकडी… फारसं कुणी बघायचंही नाही माझ्याकडे… कमी पैसे मोजू शकणारे जेमतेम तिघे-चौघेच आले असतील माझ्याजवळ… आणि त्यावरूनही ताईजीची मी कितीतरी बोलणी खात होते. पण आता तीच गोष्ट माझ्या पथ्यावर पडते आहे, अशी मी स्वत:ची समजूत घालत होते. सातवा महिना लागला आणि मग मात्र मला काही ना काही त्रास व्हायला लागला. सगळ्यांना खरं काय ते कळलं. ताईजीची धुसफूस-चिडचिड सुरू झाली. मला डॉक्टरकडे नेलं. पण आता मूल पाडता येणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं, आणि ताईजीचा नाईलाज झाला. आता नऊ महिने भरेपर्यंत तरी, माझी संध्याकाळ फक्त माझी असेल म्हणून मला आनंद वाटत होता— आणि ताईजी कितीही चडफडली  तरी माझ्याबाबतीत नाईलाजाने का होईना पण तिला गप्प बसावं लागत होतं, याचा तर फारच जास्त आनंद झाला होता. पण बघा ना… नशीबच फुटकं… सातवा संपायच्या आतच इथे यावं लागलं…पुढचं तर तुम्हाला माहितीच आहे.”

‘‘हो गं. किती वाईट अवस्था झाली होती तुझी… जगतेस का मरतेस अशी… पण वाचलीस बाई.”

– क्रमशः भाग दुसरा …

© मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अनमोल भाग्य…लेखक – श्री मिलिंद जोशी ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ अनमोल भाग्य…लेखक – श्री मिलिंद जोशी ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆ 

माझ्या वडिलांचे वय आता ८० च्या जवळपास आहे. त्यांना पार्किन्सनचा आजार आहे. त्यामुळे त्यांचे बोलणेही तोंडातल्या तोंडात येते. चालताना ही वॉकर लागतो. अनेकदा वळताना त्यांचा तोल जातो. कधी कधी ते वॉकर विसरून जातात आणि हळूहळू भिंतीच्या आधाराने चालतात. तोल गेला की पडतात. थोडेफार लागते. मग पुढील दोन तीन तास त्यांना धीर द्यावा लागतो. या गोष्टी खूप सामान्य आहेत हे त्यांच्या मनावर ठसवावे लागते. मनातील भीती कमी झाली की परत पूर्ववत होतात. पण यामुळे आम्हाला कायम त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागते. बरे आपल्याला कायम घरात राहणे शक्य नसते. त्यामुळे कधी कधी नाईलाजास्तव त्यांना घरात ठेवून बाहेरून कुलूप लावून दीड दोन तासांसाठी बाहेर जावे लागते. त्यावेळी त्यांना सगळे जवळ द्यायचे आणि आपण आपल्या कामाला जाऊन यायचे. 

काका ( मी वडिलांना ‘काका’ म्हणतो ) दुपारी टीव्ही लावतात आणि बसल्या बसल्या झोपून घेतात. त्यामुळे त्यांना रात्री लवकर झोप येत नाही. मग त्यावेळी आपण काम करताना एकीकडे जुने गाणे लावले की ते खुश. कधी कधी त्यांचे जुने किस्से सांगत बसतात. अनेकदा तर त्यांचे बोलणे आपल्याला समजत नाही. मग आपण फक्त होकार द्यायचा. आपल्या चेहऱ्यावरून त्यांना लगेच समजते, आपल्याला त्यांचे बोलणे काहीच कळलेले नाही. मग त्यांच्या चेहऱ्यावर हसू येते.

त्यांचा एक गुण मात्र घेण्यासारखा आहे. अजूनही ते त्यांना ज्या ज्या गोष्टी शक्य होतील ते सगळे काम करतात. रात्रीचे जेवण झाल्यावर ओट्यावर जितके कप असतील ते विसळून ठेवतात. काही निवडायचे असेल तर निवडत बसतात. ओटा आवरून घेतात. आम्ही त्यांना कितीही सांगितले तरी त्यांना त्याशिवाय होत नाही. आम्हीही मग ‘जे करायचे ते करा’ म्हणून मोकळे होतो. कारण ज्यावेळी ते काही काम करतात त्यावेळी खुश असतात. काहींना पटणार नाही पण अनेकदा घरातील वयस्कर व्यक्तींना आपण काम करू दिले नाही तर ते जास्त चिडचिड करतात असा माझा अनुभव आहे. कारण अनेकदा त्यांना असे वाटते की, त्यांचे घरातले महत्व कमी झाल्यामुळेच आपण त्यांना काम करू देत नाही. 

मध्यंतरी काकांना acidity चा त्रास होत होता. डॉक्टरांनी त्यासाठी गोळ्या दिल्या. इतक्या गोळ्या कशा घ्यायच्या म्हणून त्यांनी दोन दिवस पार्किन्सनच्या गोळ्या घेतल्या नाहीत. परिणाम असा झाला की त्यांना वेगवेगळे भास होऊ लागले. त्यांना कुणी बसलेले दिसायचे. किंवा खालून कुणी खिडकीवर दगड मारताहेत असे वाटायचे. ते दोन दिवस आम्ही जाम घाबरलो होतो. एक दिवस वैतागून मी त्यांना काहीतरी चिडून बोललो. मग काय… फुल झापून काढला त्यांनी मला. संध्याकाळी तायडीचा व्हिडिओ कॉल आला. त्यांनी लगेच तिलाही सांगितले, ‘मिलिंद आज माझ्यावर चिडला होता.’ मग काय विचारता, तायडीनेही हसत हसत मला कानपिचक्या दिल्या आणि काका खुश. 

एक मात्र अगदी खरे आहे, त्यांच्यासाठी जरी आम्हाला कुणाला तरी कायम घरात राहावे लागते, तरीही ते कधीच आम्हाला ‘जबाबदारी’ वाटत नाहीत. उलट आम्हाला त्यांचा “आधार”च वाटतो. याचे सगळे श्रेय फक्त आणि फक्त काकांनाच आहे. कारण त्यांनी त्यांचे आजारपण आणि त्यानंतरचे त्रास स्वीकारले आहेत. एकदा का माणसाने समोर येणाऱ्या घटनांचा स्वीकार केला की त्याला फारसा मानसिक त्रास होत नाही. ना त्यांची आमच्या बद्दल काही तक्रार आहे, ना जीवनाबद्दल. अनेकदा आम्ही एकमेकांची चेष्टा मस्करी करतो त्यावेळी शेजारच्यांना वाटते, माझे वडील भाग्यवान आहेत. पण मला वाटते, आम्ही मुलं जास्त भाग्यवान आहोत की आम्हाला असे आईवडील मिळाले, जे प्रत्येक गोष्ट समजून घेतात. जो पर्यंत आई होती, तिने कायम आम्हाला वागणुकीचे धडे दिले. आणि वडील अजूनही त्यांच्या वागण्यातून ‘सकारात्मक जीवन कसे जगावे’ याचे धडे देत आहेत. मला वाटते, भलेही आपल्याकडे पुरेशा सुविधा नसल्या तरी आपल्याला समजून घेणारे पालक आपल्या सोबत असतील तर त्यासारखे दुसरे भाग्य नाही.  

लेखिका : श्री मिलिंद जोशी, नाशिक

प्रस्तुती – श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) ची स्थापना ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) ची स्थापना –  संकलन मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो)  स्थापना : १५ ऑगस्ट १९६९

‘इसरो’— (Indian Space Research Organization (ISRO)) या संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट १९६९ रोजी करण्यात आली. याचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. “ मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान “ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. येथे मुख्यत: कृत्रिम उपग्रह तयार करण्यासाठी व त्यांचे प्रक्षेपण करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित केले जाते. 

आजपर्यंत इस्रोने अनेक उपग्रहांचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले आहे. स्वतंत्र भारताच्या यशस्वी कार्यक्रमांमध्ये इस्रोचे कार्य अग्रगण्य आहे.

भारताने अंतराळशास्त्रात केलेल्या प्रगतीचे राष्ट्रीय व सामाजिक विकासात मोठे योगदान आहे. दूरसंचार, दूरचित्रवाणी प्रसारण आणि हवामानशास्त्र सेवा, यासाठी INSAT व GSAT उपग्रह मालिका कार्यरत आहे. यामुळेच देशात सर्वत्र दूरचित्रवाणी, दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ शकली. याच मालिकेतील EDUSAT उपग्रह तर फक्त शिक्षणक्षेत्रासाठी वापरला जातो. 

देशातील नैसर्गिक संसाधनांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी IRS उपग्रह मालिका कार्यरत आहे.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : फेसबुक

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares