मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्ञानोबा तुकाराम  – भाग – 1 – लेखक – श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

ज्ञानोबा तुकाराम  – भाग – 1 – लेखक – श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

संप्रदाय म्हटले की दैवत आले. देवस्थान आले. क्षेत्र आले. तीर्थ आले. पथदर्शक श्रेष्ठी आले. संत आले.  वाड्मय आले. तत्वज्ञान आले. देवकर्म आले. नित्यपाठ आला. जप आला. शिष्य अथवा लोकसमुदाय आला. संप्रदायाचा मंत्र आला. मग तो कोणताही संप्रदाय असो. शैव असो वा वैष्णव. रामानुज असो वा निंबार्क. गाणपत्य असो वा कापालिक. राधा संप्रदाय असो वा स्वामी नारायण. 

मग वारकरी संप्रदाय तरी त्याला अपवाद कसा असणार. त्यालाही दैवत आहे. विग्रह आहे. देवस्थान आहे. क्षेत्र आहे. तीर्थ आहे. मार्ग दाखविणारे संत आहेत. देवाच्या अन् संतांच्याही लीला आहेत. देवकर्म आहे. ज्ञान आहे. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो म्हणत जगाला कवेत घेणारे तत्वज्ञान आहे. गाथा- भागवत- ज्ञानेश्वरीसारखे वाङ्मयीन ग्रंथ आहेत. वारीसारखा नियम आहे. तो निष्ठेने पाळणारे हजारो वारकरी आहेत. हरिपाठासारखा नित्यपाठ आहे. अन् रामकृष्णहरीसारखा उघडा मंत्रही आहे. 

कारण, उघडा मंत्र जाणा | रामकृष्णहरी म्हणा ।। असे संप्रदायामध्ये म्हटले जाते. तसेच रामकृष्णहरी विठ्ठल केशवा | मंत्र हा जपावा सर्वकाळ ।। असेही संतवचन आहे. म्हणजे “रामकृष्णहरी  ” हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. तोही उघडा आहे. पडद्याआड झाकून द्यायचा, कानात सांगावयाचा असा मंत्र नाही. 

हे सारे ठसठशीत उघड सत्य असताना मग सारे वारकरी अनेक कीर्तनात, भजनात, दिंडीत, अगदी आळंदीहून देहू- -हून येणाऱ्या पालखी सोहळ्यातही वा अन्य सोहोळ्यातही ” ज्ञानोबा तुकाराम ” हा मंत्रघोष का करतात? अन् त्याचेच भजन अविरत का करतात? असा प्रश्न मला एका वारकरी अभ्यासक मित्राने केला. अन् त्या मंत्रामागची सारी कथाच त्याला उलगडून सांगावी लागली. 

हा मंत्र का निर्माण झाला? 

त्याचा पहिला उच्चार कोणी केला? कोणी ऐकला? 

त्याने तो लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काय केले? 

वारकऱ्यांनी तो सहज स्वीकारला का? 

कारण वारकरी हा कोणतीही गोष्ट पारखून घेणारा आहे ना? ही प्रश्नाची मालिकाच त्याने मजपुढे उभी केली. अन् मग त्याला सारे बैजवार सांगावे लागले. 

तेच साऱ्या वारकरी बांधवांना ज्ञात आहे. पण इतर समाजालाही कळावे, नव्याने वाचन चिंतन अभ्यास करणाऱ्यांनाही कळावे, म्हणून हा कथा प्रपंच——

सूर्य बुडाला. सांज पडली. सर्वत्र सामसुम झाली. रातकिड्यांनी किर्र करीत कोपरे धरून आरडायला सुरुवात केली. अंधार अजून वाढला. रात्र पडायच्या आत गावी पोहोचायला हवं. म्हणूनच गाडीवानाने बैलं दामटली. बैलांना पराण्या टोचटोचून गाडीवान हैराण झाला होता. पण अंतरच एवढं होतं की बैलं  काय करणार ? कितीही पळून पळूनही  ते अंतर पार पडणार नव्हतं. बैल घामाने निथळत होते. तोंडाने फेस पडत होता.

आत बैलगाडीत बसलेले ग्रहस्त चिंतातुर होते. तोंडाने नामस्मरण चाललं होतं. चेहऱ्यावर काळजीचे भाव होते. गाडीवाटेचा रस्ता शेताशेतातून वळणे वळसे घेत दौडत होता. त्यात रात्रीचा अंधार होता म्हणून गाडीत लावलेला दिवा फुरफुरत होता. बैलाच्या गळ्यातल्या चंगाळ्या खुळखुळत होत्या. गाडीवानाचा ओरडाआरडा, बैलांच्या पायाचा  खडखडाट, दिव्याच्या फुरफुरण्याच्या आवाजात भर घालत होता. गाडीतल्या गृहस्थाची चिंता, तगमग वाढत होती. चिंता  प्रवासात रात्र झाल्याची, गाव अजून न आल्याची होतीच. पण त्याहून जास्त ती होती ते नित्यनेमाचं देवदर्शन आज बुडल्याची. आज पांडुरंग आपल्याला अंतरला याची.

भल्या पहाटे कामास्तव बाहेरगावी आलो. तेव्हा वाटलं की संध्याकाळी लवकर घरी परतू. नित्याचे देवदर्शन घडेल. देवदर्शनाच्या नियमाला अंतर पडणार नाही हा विचार होता. पण कामाच्या रामरगाड्यात दिवस कधी उलटला आणि सांज झाली ते कळलंच नाही. तरी गडबडीने आवराआवर करून निघेस्तोवर उशीर झालाच. आजपावेतो देवाचं नित्य दर्शन झाल्याशिवाय दिवस गेला नव्हता.आज मात्र दैवाने उशीर केला. गावी, घरी परतेपावेतो रात्र झाल्याने गर्दी ओसरलेली असेल,आरती होऊन मंदिर बंद होईल. काय करावं कळेनासं झालं. रात्रीच्या काळोखाबरोबर चिंता वाढत होती. गाडीवानाच्या आणि बैलांच्या गोंगाटाने त्यात भर पडत होती. चंगाळ्यांचा खुळखुळाट अन् गाडीच्या चाकाच्या धावांचा खडखडाट क्षणाक्षणाला त्यात वाढ करीत होता. तोंडाने सतत ” रामकृष्णहरि ” म्हणत देवाचा धावा चालूच होता.

अखेर गाव आलं. सगळीकडे एकदम चिडीचूप झालं होतं. वेशीवरचा तराळ एके हाती फुरफुरणारी मशाल अन् दुसरे हाती लखलखणारा भाला चमकवीत गाडीजवळ आला. त्याने पुसलं, ” कोण हायं? “

तशी आतली व्यक्ती बाहेर पडली.  त्यांनी जवळजवळ गाडीतून उडीच मारली. डोक्यावरचं पागोट, अंगरखा उपरण्याचं बोचकं काखेला लावून त्यानं देवाकडे, देवळाकडे पळायला सुरुवात केली. तराळानं ओळखून जोहार घातला खरा. पण त्याच्याकडे त्या व्यक्तीचं लक्ष नव्हतं. त्याचं चित्त होतं देवळाकडं, देवाकडे. 

धावत धावत रावळाच्या पायऱ्या मोठ्या मोठ्या ढांगा टाकत त्यांनी पार केल्या. सोबतच्या माणसाकडे पळता – पळता हातातले कापडे टाकून घरी द्यायला सांगितली. आणि ती व्यक्ती घराकडं गेली. गाडीवान गाडी घेऊन जागेला गेला.

क्रमशः …

लेखक : श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील. 

पंढरपूर ( फेसबुक वरून साभार ) 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 26 – परिव्राजक –४. हिमालयाच्या वाटेवर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 26 – परिव्राजक –४. हिमालयाच्या वाटेवर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

आज आपले ओळखपत्र/आय डी प्रुफ, सगळीकडे दाखवावे लागते. ती एक सिक्युरिटी चेक सिस्टिम आहे.यावरून तुम्ही कोण आहात? कुठले आहात? कुठून कुठे चालला आहात? असे कुठे विचारले तर राग यायचे काहीच कारण नाही. आपल्याच देशात आपल्याच सुरक्षिततेसाठी हे आहे. प्रवास करतांना किंवा पर्यटनाला जातांना आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड,ड्रायविंग लायसन्स नाहीतर अगदीच इलेक्ट्रिक बिल्ल इत्यादी आपल्याला दाखवावे लागते. पण अशी पद्धत आजची नवी नाही. स्वामी विवेकानंदांना अमेरिकेत शिकागोला गेले तेंव्हा ही परिचय पत्र न्यावे लागले होते बरोबर आणि ते भारतात सुद्धा फिरले तेंव्हाही व्यवस्थे साठी ज्यांच्या कडे जायचे त्यांना कोणाचे तरी ओळखपत्र घेऊन जावे लागत होते.

हिमालयात भ्रमणासाठी जातांना ते आधी हिमालय ते तिबेट असा प्रवास करणार होते. त्यामुळे नेपाळ मध्ये असलेल्या आपल्या मित्राचे रीतसर परिचय पत्र घेऊन जायचे म्हणजे तिबेट मध्ये प्रवेश मिळण्यात अडचण येणार नाही.कारण अखंडानंदांना तशी एकदा अडचण आली होती. पण काही कारणामुळे हा मार्ग  बदलून त्यांनी अल्मोरा मार्गाने जायचे ठरवले. पहिला मुक्काम भागलपूर मध्ये झाला.  

भागलपुर मध्ये पोहोचल्यावर थकले भागलेले स्वामीजी व अखंडांनंद गंगेच्या काठी उभे होते. शेजारीच राजा शिवचन्द्र यांचे निवास होते. तेजस्वी संन्याशांकडे तिथले एक प्रतिष्ठित कुमार नित्यानंद सिंग यांचे लक्ष गेले. त्यांनी ती रात्र दोघांना घरी ठेऊन घेतले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना बाबू मन्मथनाथ यांच्याकडे घेऊन गेले. त्यांना वाटले असतील कोणी साधूबैरागी त्यामुळे फार लक्ष दिलं नाही. आणि जेवणं झाल्यावर बौद्ध धर्मावरील इंग्रजीतल पुस्तक वाचत बसले. स्वामीजींनी विचारले की, कोणतं पुस्तक वाचताहात? मन्मथबाबूंनी नाव सांगून विचारलं तुम्हाला इंग्रजी येतं का? स्वामीजी म्हणाले थोडंफार येतं. यानंतर जो संवाद झाला त्यात स्वामीजींनी बौद्ध धर्मावर चर्चा करतांना अनेक इंग्रजी ग्रंथांचे संदर्भ दिले. मन्मथबाबू  चकित झाले. त्यांच्या लक्षात आलं हा तरुण संन्यासी आपल्यापेक्षा हजार पटींनी हुशार आहे.

आणखी एक दिवस, योगसाधनेवर चर्चा झाली. यावर स्वामीजींनी व्यक्त केलेले विचार मन्मथबाबूंनी यापूर्वी आर्य समाजाच्या स्वामी दयानन्द सरस्वतीं कडून ऐकलेल्या विचारांशी मिळतेजुळते होते. पण यावेळी अजूनही नवीन ऐकायला मिळाले त्यांना. त्यानंतर त्यांनी उपनिषदांचा विषय काढला. स्वत:जवळची उपनिषदावरची पुस्तके समोर ठेवली आणि त्यातील एकेक वचने काढून अर्थ विचारू लागले. स्वामीजींनी दिलेल्या उत्तरामुळे मन्मथबाबू चकितच झाले. स्वामीजींची तर याबाबत मोठी तपस्या आणि साधना होती हे त्यांना माहिती नव्हते.

एकदा स्वामीजी असेच गुणगुणत होते. बाबूंनी लगेच विचारलं तुम्हाला गाणं येतं का? स्वामीजी उत्तरले,” अगदी थोडंफार येतं.” बाबूंनी आग्रह केल्यामुळे स्वामीजींनी काही गीतं म्हटली. बाबू आश्चर्याने स्तिमित झाले. अरे या संन्याशाला जितकं गहन शास्त्राचं ज्ञान आहे तितकाच संगीतासारख्या कलेवर सुद्धा त्यांचं प्रभुत्व आहे . झालं दुसऱ्याच दिवशी मन्मथबाबूंनी भागलपुर मधल्या संगीतप्रेमींना घरी बोलवलं. त्यात काही संगीत उस्ताद पण होते. रात्री नऊ पर्यन्त कार्यक्रम संपेल असे त्यांना वाटले. पण संगीत श्रवणाच्या आनंदात कोणाला जेवणाखाण्याचे व वेळेचे भान नव्हते उरले. रात्री दोन वाजता कार्यक्रम संपला. सर्वजण तिथेच थांबले आणि दुसऱ्या दिवशी गेले. केवळ आठ दिवसाच्या वास्तव्यात स्वामीजींचे निरासक्त, निसंग, वैराग्यशीलता ,विनम्रता हे विशेष गुण आणि त्यांचे,चर्चांमधून, प्रतिक्रियातून आणि काही प्रसंगातून विविधरंगी आणि समृद्ध व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं.

एव्हढ्याशा काळातल्या अनुभवावरून मन्मथबाबूंच्या मनावर स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा खोलवर ठसा उमटला. खरं म्हणजे ते कट्टर ब्राह्मसमाजी होते. पण या काळात ते आतून बाहेरून पूर्ण बदलले आणि पुन्हा हिंदू धर्माचे चाहते झाले. एव्हढे की पुढे आयुष्यभर दोघांचाही खर्च स्वत: करून स्वामीजींच्या सहवासात वृंदावनला कायमचे राहण्यास तयार झाले. पण स्वामीजींनी त्याला नम्रतेने नकार दिला. इथल्या नाथनगरमध्ये असलेल्या जैन मंदिराला स्वामीजींनी भेट दिली. तिथल्या जैन आचार्यांशी जैन तत्वज्ञानवर चर्चा केली. मन्मथबाबूंकडे राहणारे मथुरानाथ सिन्हा म्हणतात की, ” धर्म आणि तत्वज्ञान यावर झालेल्या चर्चेतून ज्ञान आणि अध्यात्मिकता  हे जणू स्वामीजींचे श्वासोच्छवास आहेत आणि त्यांच्या सर्व विवेचनात उत्कट आणि नि:स्वार्थी देशप्रेमाची भावना आहे.

मन्मथबाबू आपल्याला सोडत नाहीत असे पाहून स्वामीजींनी ते घरात नसताना जाण्याचे ठरवले तेंव्हा, बाबू घरी आल्यावर ते पाहून अस्वस्थ झाले आणि लगेच त्यांच्या मागोमाग त्यांना गाठायला निघाले. पण स्वामीजी हिमालयात अल्मोऱ्या पर्यन्त गेले होते. हे ऐकून ते अल्मोऱ्या पर्यन्त गेले तरीही स्वामीजींना ते गाठू शकले नाहीत. शेवटी निराश होऊन मन्मथबाबू भागलपुरला परत आले. स्वामींजीच्या आठवड्याच्या सहवासातून मन्मथबाबूंसारख्या थोडी आध्यात्मिक संवेदनशीलता असलेल्या सुशिक्षित व्यक्तीवर केव्हढा प्रभाव पडला होता याच हे बोलकं उदाहरण आहे. जे स्वामीजींना भेटत ते त्यांचेच होऊन जात.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटरचा मामा…!! – भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटरचा मामा…!! – भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(“ खरं म्हणता काय ??? “ — तिच्या चेहऱ्यावर अविश्वास होता.) इथून पुढे —-

आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतक्या वेळा ती ओरबाडली गेली होती की, कोणताही ” मोबदला ” न देता कुणीतरी मदत करू शकतो, या गोष्टीवर आता तिचा विश्वासच नव्हता… 

“ होय ताई… खरं म्हणतोय …” 

तरीही या पार्श्वभूमीवर, तिचा माझ्यावर इतका सहजासहजी विश्वास बसणं शक्यच नव्हतं… !

ओरबाडणाऱ्या लोकांच्या यादीत तेव्हा तिने माझं नाव टाकलं असावं, हे तिच्या वागण्यावरून मला स्पष्ट जाणवत होतं….

यानंतरच्या प्रत्येक भेटीत चिऊताईने मलाच उलट सुलट आजमावण्याचा प्रयत्न केला…. 

यानंतरच्या प्रत्येक भेटीतून मी तिचा थोडा थोडा भाऊ होत गेलो…. आणि ती थोडी थोडी ताई होत गेली… !

मी ” भाऊच ” असल्याची जेव्हा “ तिची ” पूर्ण खात्री पटली, त्या दिवशी तिने तिच्या “चिमणीची” आणि माझी भेट घडवून आणली.

तो दिवस होता शनिवार… २ जुलै २०२२ !

माझ्यासाठी हा दिवस म्हणजे फक्त तारीख किंवा वार नाही…

माझ्यासाठी तो माझा जन्मदिवस होता…! माझा विजय दिन होता…!! 

कारण याच दिवशी तर चिऊताईच्या मनामध्ये भाऊ म्हणून माझा जन्म झाला होता…माझ्याबद्दल विश्वास निर्माण झाला होता…आणि म्हणून इतकी वर्षे लपवून ठेवलेल्या “चिमणीला” तिने माझ्यासमोर आणलं होतं …

 “ मामाच्या पाया पड…”  चिऊताई ने माझ्यामागून चिमणीसाठी बोललेले हे “तीन” शब्द…! 

तिच्या या तीन शब्दांनी ” तीनही जगाचा स्वामी ” या शब्दाचा खरा अर्थ मला तेव्हा कळला….

चिमणी खरोखरीच गोड मुलगी होती…. ! चिखलातच कमळ फुलतं हेच खरं…. !

यानंतर सर्व चक्र भराभर चालवून, अक्षरशः सोमवारी 4 जुलै रोजी या चिमणीचं, पुण्यातील नामांकित कॉलेजात वर्षाची संपूर्ण फी भरून ” बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन ” (BBA) साठी  ऍडमिशन पक्कं केलं…

यात माझा सहकारी मंगेश वाघमारे याचे योगदान फार मोलाचं आहे….! 

चिमणीच्या नकळत… चिऊताईच्या कानात म्हणालो, “ हे भीक मागणं सोड आता, एखादा व्यवसाय कर घरबसल्या….. मी टाकून देतो….कारण आता येत्या तीन वर्षात एका बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटरची तू आई होणार आहेस…. भीक मागणं शोभत नाही तुला…. त्यापेक्षा एखादा बिझनेस टाक…”

चिऊताई सुखावली….! ‘ व्हय, ‘ म्हणत तिनं डोळ्याला पदर लावला होता…. ! 

इकडे ऍडमिशन पक्कं झाल्यानंतर…चिमणी, ऍडमिशन पक्कं झाल्याचा कागद माझ्या तोंडापुढे फडफडवत म्हणाली, “ बघ मामा, मी आता BBA होणार… आहेस कुठं?” – ती उड्या मारत होती…. 

मी पण मग उड्या मारत तिला म्हणालो, “ गप ए शाने, मी पण आता “बिजनेस ऍडमिनिस्ट्रेटर” चा मामा होणार… आहेस कुठं….???”

यानंतर चिमणी रडत… भावुक होत, माझ्या उजव्या खांद्याशी येऊन उभी राहिली….माझा सहकारी मंगेश याने लगेच मोबाईलचा कॅमेरा चालू करून हा क्षण टिपण्याचा प्रयत्न केला….

तेवढ्यात तिकडून चिमणीच्या आईचा, म्हणजे चिऊताईचा हसत आवाज आला….

“मंगेशा…थांब रं बाबा … काटी अन् घोंगडं घिवून द्या की रं…. मला बी जत्रला यीवून द्या की रं … !”

चिऊताई मग माझ्या डाव्या खांद्याशी बिलगली…. ! मंगेशने काढलेल्या फोटोचा “क्लिक” असा आवाज आला… आणि त्याबरोबर हा क्षण माझ्या मनात अजरामर झाला…! 

आमची “जत्रा” झाली होती…. ! फोटो काढताना चिमणी माझ्या कानाशी येऊन म्हणाली, “ मामा आता आम्हाला सोडून कुठे जाऊ नकोस बरं का ..” 

मी तिला म्हणालो, “ मी कुठे जाणार नाही… पण तूच सोडून जाशील आम्हाला … !” 

“ मी का जाईन तुला आणि आईला सोडून ?” तिच्या भाबड्या चेहऱ्यावरचा, भाबडा प्रश्न…. ओठांचा चंबू करून तिने मला बाळबोधपणे  विचारला…

“ अगं म्हशी…. लगीन करशील का नाही ? तेव्हा कन्यादान मलाच करावं लागणार आहे ना…. ? 

तू तेव्हा खूप मोठी झालेली असशील…. पण तेव्हा या “गरीब मामाला” आणि तुझ्या “आईला” विसरू नकोस बरं…!! “

यावर या चिमणीने रडत… मला घट्ट मिठी मारत… म्हटलं , “ माझा मामा गरीब नाही…..खूप “श्रीमंत” आहे “. 

तिच्या या वाक्यानं माझ्यासारखा  ” भिकारी डॉक्टर ” एका क्षणात ” श्रीमंत ” झाला…! 

पलिकडे चिऊताईने तिच्या डोळ्याला पदर लावला होता…. 

आणि मी ” बिझनेस / मॅनेजमेंट ऍडमिनिस्ट्रेटरचा ” मामा असून सुद्धा… डोळ्यातल्या वाहणाऱ्या अश्रूंना ” मॅनेज ” करू शकलो नाही…. !

काही गोष्टी मॅनेज करणं कुठं आपल्या हाती असतं ….??? 

— समाप्त —

© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग – 3 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग -3 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

तारा आपला पती वालीच्या पराक्रमावर लुब्ध होती. त्याच्या पराक्रमाचा सार्थ अभिमान होता तिला. परंतू त्याच्या  अत्याचारी, आततायी, अत्यंत क्रोधीत असलेल्या स्वभावाबद्दल ती सदैव कुंठीत असायची. त्याच्या अशा स्वभावाला आवर घालण्याचा सतत प्रयत्न करीत असे. परोपरीने, अनेक प्रकारे त्याला समजावीत असे. परंतू तो अहंकार, गर्वाने चूर असल्यामूळे तिचे तळमळीचे सांगणे धुडकावून लावत असे. त्यामुळे ती सतत मनोमन दुःखी राहत असे.

वास्तविक सुषेन राजाची कन्या तारा अत्यंत बुध्दीमान असून तिला अनेक विषयांचे सूक्ष्म ज्ञान होते. निसर्ग व मानवी जीवनांत भविष्यात होणारे अनेक उत्पात, येणारी संकटे याची पूर्व चाहुल तिला नेहमीच लागत असे. तिच्यातील आंतरीक शक्तीच्या या चिन्हांची ओळख ठेवण्यात ती अतिशय निपुण होती. परंतू तिच्यातील या अलौकीक गुणांची वालीने कधीच कदर ठेवली नाही. तो स्वतःच्याच मस्तीत जगत होता. दुसर्‍यांना तुच्छ लेखण्यातच धन्यता मानत होता.

मतंगत्रृषींची शापवाणी ऐकून वालीचे सर्व मित्र त्या आश्रमांतुन भिऊन काष्किंधनगरीत पळून आले. वाली व ताराने भिऊन पळून येण्याचे कारण  विचारल्यावर त्यांनी तिथे घडलेली सर्व सविस्तर हकीकत सांगितली.

वाली चिंतामग्न झाला. तारा तर फारच दुःखी व चिंतामग्न झाली. ती वालीला म्हणाली, “स्वामी! आपण फार मोठा पराक्रम केला खरा! पण अविचाराने ही जी घटना घडली ती अशुभसूचक वाटत आहे. मतंग त्रृषीसारख्या श्रेष्ठ व महान तपस्याकडून हा शाप मिळणे म्हणजे आपल्यावर आलेली फार मोठी इष्टापत्ती आहे.” ताराला दुःख अनिवार होऊन अगदी ओक्साबोक्सी रडू लागली.

ताराच्या सांगण्याचा परिणाम की, भविष्यात घडणार्‍या भिषण घटनेच्या नांदीची कल्पना आली असेल म्हणून असेल, वाली स्वतः मतंगत्रृषीकडे क्षमा मागण्यासाठी गेला.पण त्याचे दैवच फिरले असल्याने की काय, मतंगत्रृषींनी त्याच्याकडे ढुंकुनही न पाहतांच पाठ फिरवून आश्रमाकडे निघून गेले.

वाली हताश होऊन निराश मनाने परतला. तारा मात्र भविष्यात येणार्‍या भीषण, अनिष्ट संकटाच्या भितीने फार उदास झाली.

दुदुंभीचा मुलगा मायावी राक्षस वडीलांच्या वधामुळे सूडाने पेटून उठला. वडीलांचा सूड घेण्यासाठी मायावी एका मध्यरात्री किष्किंधा नगरीच्या दाराशी येऊन मोठमोठ्याने ओरडत वालीला युध्दासाठी आव्हान करु लागला. साहसी व पराक्रमी वालीने मायावीचे आव्हान स्विकारले.

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आईचे दूध बाळाच्या हक्काचे ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ आईचे दूध बाळाच्या हक्काचे ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

अनेक संतांनी, जवळ जवळ सर्वच संतांनी म्हटले तरी चालेल, पशुपक्षी, प्राणी, वनस्पती या सर्वांवर प्रेम करायला त्यांनी शिकविले. प्रत्येक प्राण्याला भुके पासून मुक्त करण्याचा संदेश दिला. माणसाची असो वा प्राणी-पक्ष्यांची, आई ही आईच असते. तिची जागा नाही कोणी घेऊ शकत. आपल्या बाळा प्रति कोणत्याही संकटांना सामोरे जायला तयार असते.

सातारा शहरातील घटना. “ॲनिमल राहत” या प्राणी कल्याणकारी संस्थेचे कार्यकर्ते शहरातून फेरफटका मारत असताना त्यांना एक हृदयद्रावक चित्र दिसले. एक गाय आपल्या वासराला दूध पाजण्याचा प्रयत्न करत होती. प्रेमाने पुन्हापुन्हा त्याला चाटत होती. तिला पान्हा फुटला होता. भुकेने वासरू ही दूध पिण्याचा प्रयत्न करत होते. पण  ती त्याला बाजूला सारत होती. वासरू पुन्हापुन्हा आचळ पकडण्यासाठी धडपडत होते. ती त्याला पुन्हा पुन्हा चाटत  होती. पण  ती त्याला बाजूला सारत होती. हा काय प्रकार आहे? म्हणून  “राहत”  चे कार्यकर्ते त्यांच्याजवळ गेले. पहातो तो राग आणि चीड येण्यासारखा प्रकार होता. गाईचे दूध  वासराने पिऊ नये, आपल्यालाच मिळावे म्हणून मालकाने वासराच्या तोंडावर एक टोकदार खिळ्यांनी बनविलेला एक पट्टा बांधल्याचे दिसून आले. वासरू दूध पिण्यासाठी जवळ गेले की त्याच्या तोंडाजवळ बांधलेल्या पट्टया वरचे टोकदार खिळे तिच्या स्तनांना टोचत होते. आणि तिला वेदना होत होत्या. “राहत” च्या कार्यकर्त्यांनी गाईच्या मालकाचा शोध घेतला. आणि त्याची चांगलीच कानउघडणी केली . वासराच्या तोंडावरचा पट्टा काढला. वासरू लगेच आईला जाऊन बिलगले. गाय भुकेल्या बाळाला मायेने चाटत होती. तिला पान्हा फुटला होता. वासरूही चक् चक् करून  स्तनपान करत होते. भूक शमवत होते. किती छान चित्र!

आपण गाय वासराची पूजा करतो. खर तर गाईच्या दुधावर वासराचाच अधिकार ! प्राण्यांना प्रेम देणं, हीच त्यांची खऱ्या अर्थाने पूजा होईल. अशी अन्यायकारक घटना कोठेही दिसली तर, त्याला वाचा फोडणे हे प्रत्येकानेच आपले कर्तव्य म्हणून करायला काय हरकत आहे?

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मृदंग शैलेश्वरी मंदिर – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ मृदंग शैलेश्वरी मंदिर – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆ 

भारतात चोरीमुळे प्रसिद्ध झालेले एक प्राचीन मंदिर आहे. अलीकडच्या इतिहासात चार वेळा चोरांनी मंदिराची मूर्ति चोरली, पण ती परत केली. कारण ते त्यासोबत फार दूर जाऊ शकत नव्हते.

त्यांनी दिलेल्या कारणांमुळे कथा आणखीनच वेधक बनते.

मृदंग शैलेश्वरी मंदिर हे केरळ राज्याच्या दक्षिणेकडील मुझाकुन्नू – कन्नूर जिल्ह्यातस्थित एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर परशुराम ऋषींनी स्थापन केलेल्या 108 मंदिरांपैकी एक आहे.

मंदिराला “मृदंग सैलेश्वरी” असे नाव पडण्यामागे एक कथा आहे.

मृदंग हे प्राचीन भारतातील तालवाद्य आहे. प्राचीन हिंदू शिल्पकलेमध्ये, मृदंग हे अनेकदा गणेश आणि नंदी, शिवाचे वाहन आणि अनुयायी या हिंदू देवतांच्या निवडीचे साधन म्हणून चित्रित केले जाते. मृदंग हे देववाद्य किंवा देवांचे वाद्य म्हणूनही ओळखले जाते. असे मानले जाते की या ठिकाणी स्वर्गातून मृदंगाच्या आकारातील खडकाचा तुकडा, कदाचित एक उल्का पडली आणि ऋषी परशुरामांनी देवीचे अस्तित्व जाणवून तिला खडकात बोलावले आणि तिच्यासाठी मंदिराची स्थापना केली.

मृदंग शैलेश्वरी मंदिर हे दक्षिण भारतीय शास्त्रीय नृत्य कथकलीचे जन्मस्थान मानले जाते. या मंदिरात देवीशक्ती काली, सरस्वती आणि लक्ष्मी या तीन रूपात विराजमान आहे.

काही वर्षांपूर्वी केरळ राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक श्री. अलेक्झांडर जेकब यांनी मागील काही वर्षांत या मंदिरात झालेल्या चार दरोड्यांच्या कथा सार्वजनिक केल्या. मंदिरातील मूर्तीची अंदाजे किंमत सुमारे दीड कोटी आहे. मंदिराभोवती कोणतीही सुरक्षा नसल्याने ते चोरांचे सोपे लक्ष्य होते.

मंदिरातील पहिली फोड १९७९ मध्ये झाली. चोरट्यांनी मंदिरातून मूर्ति नेली, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरापासून काही मीटर अंतरावर मूर्ति टाकून दिल्याचे आढळून आले. पोलिसांना गुन्हेगार शोधता आले नाहीत. विधीनुसार मूर्तीचे पुनर्वसन करण्यात आले. हा विधी ४१ दिवस चालतो आणि त्यासाठी विशिष्ट मंत्रांचे ४१ लाख वेळा पठण करावे लागते .

काही वर्षांनी कथेची पुनरावृत्ती झाली. मात्र यावेळी पोलिसांना मूर्ति सापडली नाही आणि कोणताही सुगावा न लागल्याने तपास रखडला. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी “अष्टमंगला देवप्रश्न ” विचारण्याचा निर्णय घेतला. कारणे शोधण्यासाठी आणि उपचारात्मक कृतींचे नियोजन करण्यासाठी अष्टमंगला देवप्रश्न केले जाते.

देवप्रश्नाने, मूर्ति तामिळनाडूच्या दिशेने प्रवास करत होती, परंतू देवीची शक्तिशाली मूर्ति तिच्या स्वतःच्या दैवी सामर्थ्याने तिच्या निवासस्थानी परत येईल, अशी गणना केली गेली.

अंदाजानुसार, 42 व्या दिवशी, पोलिसांना तामिळनाडूजवळील पलकत येथे एका महामार्गाजवळ एक बेबंद मूर्तीची माहिती मिळाली, ज्यामध्ये एक चिठ्ठी शिल्लक आहे. चिठ्ठीत लिहिले होते – “ मूर्ति मृदंग शैलेश्वरी मंदिरातील आहे, आम्ही ती पुढे नेण्यास सक्षम नाही. कृपया ती मंदिरात परत करा.” 41 दिवस चालणार्‍या धार्मिक विधींसह मागील वेळेप्रमाणे पुन्हा मूर्तीचे पुनर्संचय करण्यात आले. मात्र यावेळीही पोलिसांना चोरट्यांचा माग काढता आला नाही.

ही दुसरी वेळ असल्याने तेथे पोलिस पहारा देऊन मंदिराची सुरक्षा वाढवण्याची सूचना पोलिसांनी केली. परंतू देवी स्वतःचे रक्षण करू शकते असे सांगून मंदिर प्रशासनाने हा प्रस्ताव नाकारला.

लवकरच चोरांनी तिसऱ्यांदा धडक दिली– यावेळी कर्नाटक राज्यातील टोळी. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्यांनी वायनाडच्या जंगलातून कर्नाटककडे जाण्याचा मार्ग आखला. पुढचे तीन दिवस पोलिसांना सुगावा लागला नाही, पण या वेळी, मंदिराचे अधिकारी आणि स्थानिक लोक या दोघांनाही विश्वास होता की देवी परतीचा मार्ग शोधेल, जरी पोलिस दोषींना शोधण्यात अपयशी ठरले तरीही .

तिसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास, केरळमधील वायनाडमधील कलपट्टा येथील एका लॉजमधून पोलिसांना एक निनावी कॉल आला. फोन करणार्‍याने टोळीतील एक सदस्य म्हणून स्वतःची ओळख करून दिली आणि मूर्तीच्या स्थानाची माहिती दिली. त्यांना मूर्ती सोबत नेणे शक्य नसल्याचे कारण देत त्यांनी पोलिसांना मूर्ती मंदिरात परत करण्याची विनंती केली. पोलिसांना लॉजवर मूर्ती सापडली, फुलं वाहिलेली, आणि मूर्तीजवळ दिवा लावलेला होता. नेहमीच्या विधीनंतर मूर्ती पुन्हा अभिषिक्त करण्यात आली.

दुसऱ्या एका दरोड्याच्या प्रयत्नात पोलिसांनी अकस्मात यश मिळवले. तामिळनाडूतील मूर्तिचोरांची टोळी कोचीनमधील दुसऱ्या मंदिरातून मूर्ती चोरण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आली. त्यांनी काही वर्षांपूर्वी मृदंग शैलेश्वरीची मूर्ति चोरल्याची कबुली दिली होती. त्याच प्रकारे, तिसऱ्या दरोड्याच्या प्रयत्नामागील लोकदेखील केरळमधील कासारगोड येथील मंदिरातून मूर्ति चोरण्याचा प्रयत्न करताना चुकून पकडले गेले. त्यांनी मृदंग शैलेश्वरी मंदिरावरील तिसऱ्या दरोड्यातील आपला सहभाग कबूल केला.

साहजिकच, चोरांनी मृदंग शैलेश्वरी मूर्ति अर्ध्यावर सोडून देण्यामागचे कारण पोलिसांनाही जाणून घ्यायचे कुतूहल होते, दोन्ही टोळ्यांनी एकच कारण सांगितल्याने पोलीस चक्रावून गेले.

जेव्हा त्यांनी मूर्तीला स्पर्श केला, तेव्हा त्यांनी दिशा समजण्याची शक्ती गमावली आणि प्रत्येकाने गोंधळलेल्या मनःस्थितीत प्रवेश केला आणि दिशांचे सर्व भान गमावले आणि त्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत आणि त्यांना अर्ध्यातच मूर्तीचा त्याग करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

तीन अयशस्वी प्रयत्नांनंतरही मूर्ती चोरण्याचा मोह चोरांच्या टोळीला आवरला नाही. यावेळी ही टोळी केरळ राज्यातील अल्पसंख्याक समाजातील अनुभवी चोरांची टोळी होती. मूर्तीच्या अलौकिक शक्तींवर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांनीही मूर्तीचा त्याग केला. नंतर पकडले असता त्यांनी मूर्ती सोडून देण्याचे तेच कारण सांगितले.

आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा आपण आपल्या बुद्धिमत्तेने आणि आपल्या वैज्ञानिक ज्ञानाने तर्क करू शकत नाही.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटरचा मामा…!! – भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटरचा मामा…!! – भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

एक आटपाट नगर होतं … या नगरात एक चिऊताई राहायची.

गरीब घरातल्या या चिऊताईचं एका कावळ्याशी लग्न झालं …

चिऊताईने कावळ्याशी आनंदाने संसार मांडला…काडी काडी जमवून घरटं बांधलं …. यानंतर काही दिवसांनी चिऊताई आणि कावळ्याला एक मुलगी झाली, त्यांनी तिचं नाव “चिमणी” ठेवलं…. !

पण काळा कावळाच तो…. काही दिवसांनी चिऊताईला आणि या छोट्या चिमणीला सोडून तो पळून गेला… त्याने नावाप्रमाणे तोंड काळं केलं…! 

चिऊताईला कळेना, की छोट्या बाळाला…या माझ्या चिमणीला आता खाऊ काय घालायचं ?

बिन बापाच्या या चिमणीला कुणाचा आधार नव्हता…. चिऊताईने तिच्या या बाळाच्या डोक्यावर आपले पंख धरले…. पण तिचे इवलेसे ते पंख अपुरे होते….

छोट्या चिमणीसाठी अन्न शोधायला….चिऊताई काम शोधायला निघाली… वाटेत खूप गिधाडं भेटली…. त्यांनी चिऊताईला हवं तसं “ओरबाडून” घेतलं …! काम कोणीच दिलं नाही आणि केलेल्या कामाचे पैसे सुद्धा  !

तिच्या कडून मात्र “मोबदला”  घेतला.

सगळे पर्याय संपल्यावर, चिऊताईला भीक मागणे हा पर्याय सोपा वाटला… भीक मागून तान्ह्या चिमणीला तिने वाढवलं …. चिऊताई स्वतः निरक्षर होती…. परंतु शिक्षणाचे महत्त्व जाणून होती…भीक मागून चिऊताईने तिच्या छोट्या चिमणीला शिकवलं… पहिली… दुसरी… तिसरी …. चौथी नव्हे, तर तब्बल बारावी कॉमर्स पर्यंत शिकवलं…

नोकरी / जॉब असणारे … सिक्युअर्ड पगार असून सुद्धा मुलांना शिकवताना कितीतरी पालकांची तारांबळ उडते….

अशा परिस्थितीत भीक मागून, अनिश्चिततेच्या वातावरणात राहून, या चिऊताईने तिच्या चिमणीला बारावी कॉमर्स पर्यंत शिकवलं…. 

——महाराजांच्या गडावरील हिरकणीचं आधुनिक रूप होतं हे…. ! 

तर…. ही छोटी चिमणी आता बारावीपर्यंत पोहोचली…. स्वतंत्र विचार करू लागली….

आईला ती एके दिवशी म्हणाली, “ इतकं शिकवलं आहेस तू…. पण आता मला इथून पुढे ” बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन ” मध्ये जायचं आहे…” बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन” (BBA) हा बारावी नंतरचा ग्रॅज्युएशनचा कोर्स करायचा आहे मला…”

निरक्षर चिऊताईला तर हे शब्द म्हणतासुद्धा येत नव्हते…

पण चिऊताईला हे जाणवलं…. आपल्या चिमणीची स्वप्नं फार मोठी आहेत…. ! 

या छोट्या चिमणीला माहीतच नव्हतं, की आपली आई भीक मागून आपल्याला शिकवते आहे….चिऊताईने आपल्या या छोट्या चिमणीला असं कधी जाणवूच  दिलं नव्हतं … 

चिऊताई च्या मातृत्वाला माझा सलाम ! चिऊताईने स्वतः भीक मागितली….पण मुलीला ते कळूही दिलं नाही…

हीच चिऊताई स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकून, पोटच्या पोरीला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द देत होती…. तिच्या पंखात बळ भरत होती…

—-आई… आई …. म्हणतात ती हीच असेल का ?

पण …. पोरीला ” बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन कोर्स ” करायचा आहे, हे ऐकून चिऊताई हबकली….

एका वर्षाचा खर्च साधारण ३५००० रुपये…. अशी तीन वर्षे….???

कुठनं आणायचे हे पैसे ?

चिमणीचं मन तरी कसं मोडायचं ??

चिमणी आता शिकणार… की… की आपल्यासारखीच भीक मागणार ????

चिऊताईचा रात्र रात्र डोळा लागत नव्हता… नेमकं काय करावं ? चिऊताई चिंतेत होती…. पण चिमणी निश्चिंत होती…. ! आई सर्व काही व्यवस्थित करेल यावर तिचा विश्वास होता…. आईच्या पदराखाली ती सुरक्षित होती….

आईच्या पदराला खिसा नसतो. परंतू जगायला बळकटी  देण्याचं सामर्थ्य याच जीर्ण पदरात असतं… जगातील सर्व संपत्ती इथेच दडलेली असते….!!!

तर, चिऊताई चिंतेत होती….

आणि नेमकी याच काळात माझी आणि या चिऊताईची भेट व्हावी…. हा कोणता संकेत असेल ? 

चिऊताई एकदा भीक मागताना मला दिसली… तरुण बाई भीक मागते…

माझ्या स्वभावाप्रमाणे मी तिला टोकलं… खोदत गेलो, खणत गेलो ..!  यानंतर रडत तिने वरची कहाणी मला सांगितली…. !

मी म्हणालो, “ मी जर तुझ्या चिमणीचं सर्व शिक्षण पूर्ण केलं तर चालेल का तुला ? “

माझ्या या वाक्यानंतर…. शॉक लागावा तशी ती माझ्यापासून दूर झाली ….साशंक चेहऱ्याने आणि कावऱ्या बावऱ्या नजरेने म्हणाली, “ पन या बदल्यात मला  तुमाला काय द्यायला लागंल ? “

मी हसत म्हणालो, “ फक्त एक राखी….! “ 

तिचा विश्वास बसेना… 

“ खरं म्हणता काय ??? “ तिच्या चेहऱ्यावर अविश्वास होता. 

क्रमशः…

© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग -2 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग -2 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

दुदुंभी राक्षसाच्या उत्पातामुळे हिमवान त्रस्त झाले. तरीही शांतब्रम्ह्य अविचल राहिले. त्यांनी मानसिक शांतता ढासळू दिली नाही. निळसर पांढर्‍याशुभ्र ढगांच्या आकारांत प्रसन्नपणे हिमवान त्या राक्षसासमोर येऊन अत्यंत सौम्यपणे विचारले, “हे राक्षसा! कां त्रास देतोस मला..?”

त्यावर दुदुंभी म्हणाला, “मी असे ऐकले की, तुला आपल्या बळाची, सामर्थ्याचे फार घमेंड आहे, म्हणुन तुला युध्दाचे आव्हान देण्यास आलो आहे.”

हिमवान स्मित करीत म्हणाले, “तू चुकीच्या ठिकाणी आला आहे. मी काही युध्दकुशल, युध्दनिपुण नाही, युध्द करणे हा माझा मनोधर्मच नाही. उगीच शिलावर्षाव करुन कां मला त्रस्त करतो आहेस? अरे! मी हिमालय म्हणजे शांतीचे वसतिस्थान. तपस्यांचे माहेर आहे. तपश्चर्येचे निजधाम आहे. इथे पुण्यवंतांचे पुण्य फुलते. तुला एवढीच युध्दाची हौस आली असेल तर किष्किंधा नगरीत महापराक्रमी, महाप्रतापी वानरराज वाली राज्य करीत आहे. तोच तुझ्याशी युध्द करण्यास समर्थ आहे.”

हिमवानाचे भाषण ऐकुन दुदुंभी आणखीनच चढला. हातातील गदा सांभाळीत  किष्किंधा नगरीत प्रविष्ट झाला. जोरजोरांत डरकाळ्या फोडत वालीला युध्दासाठी पुकारु लागला. पराक्रमी वालीने आव्हान स्विकारले. दोघांमधे घनघोर युध्द सुरु झाले. हळुहळू दुदुंभीची शक्ती क्षीण होऊ लागली व  वालीची शक्ती वाढू लागली. अखेर वालीने त्याला ठार केले. अजस्र राक्षस चेतनाहीन होऊन खाली कोसळला.

वाली एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने अविचाराने दुदुंभीचे प्रेत उचलुन गरागरा फिरवले व एक योजनाभर  लांब भिरकावुन दिले.

दूदुंभीचे प्रेत मतंगत्रृषींच्या आश्रमावरुन पलीकडे फेकल्या गेले. त्यावेळी त्याच्या मुखातुन अंगातुन जे रक्ताचे थेंब उडाले ते सबंध आश्रमावर पडले. स्वतः मतंगत्रृषी एका शिलेवर तपश्चर्या करीत असतांना त्यांच्याही अंगावर अंगावर त्या रक्तांचे थेंब पडले.

मतंगत्रृषींची तपश्चर्या भंग पावल्याने त्यांनी डोळे उघडुन पाहिले, तर काय! त्यांच्या सर्वांगावर रक्ताचे थेंब पडले होतेच. शिवाय आश्रमभर सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. ते पाहुन त्यांचा अतिशय संताप झाला. त्यांनी सर्वत्र शोध घेतला असतां, आश्रमाच्या पलीकडे त्रृध्यमूक पर्वताच्या पलीकडे एका अवाढव्य असूराचे प्रेत पडलेले दिसले.

त्रृषींनी अंतर्दृष्टीने पाहिले असतां ही सारी करामत वालीची आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्याची सहनशक्ती नष्ट झाली. त्यांनी वालीला शाप दिला, “त्या दुर्बुध्दी वालीने या राक्षसाच्या रक्ताने हा आश्रम अपवित्र केला, हा पर्वत दूषित केला. जर कां त्याने या पर्वतावर पाय ठेवला तर त्याला तात्काळ मरण येईल, त्याचे जे मित्र इथे असतील त्यांनी ताबडतोब हा पर्वत सोडावा, अन्यथा त्यांना मरण पत्करावे लागेल. उद्या जो कोणी वालीचा मित्र इथे दृष्टीस पडला तर त्याचे रूपांतर होईल.”

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हरवलेला मधुचंद्र… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर

? मनमंजुषेतून ?

☆ हरवलेला मधुचंद्र.. ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर ☆

मी तीस वर्षांनंतर पुन्हा महाबळेश्वरला चाललो होतो. मी गाडी चालवत होतो व माझ्या शेजारी  प्रतिमा बसलेली होती. कात्रजचा घाट सुरु झाला होता.. घाटातील प्रत्येक वळणावर, मला तीस वर्षांपूर्वीचा आमचा मोटरसायकलवरचा पहिला प्रवास आठवू लागला..

मी खेड्यातून शहरात येऊन शिक्षण घेतले. पुणे विद्यार्थी गृहात आश्रमवासी म्हणून राहून ते पूर्ण केले. तेथीलच प्रिंटींग टेक्नाॅलाॅजीचा अभ्यासक्रम पूर्ण करुन डिप्लोमा घेतला. माझ्या सरांच्या ओळखीने मला एका प्रेसमध्ये नोकरी मिळाली.  दोन वर्षांतच माझं प्रिंटींगमधलं कौशल्य पाहून प्रेसच्या मालकांनी मला स्वतंत्र प्रेस थाटून दिला. माझ्याकडे दोन ट्रेडल मशीन होती. मी रात्रंदिवस काम करुन या व्यवसायात यश प्राप्त केले..

मालकांशी माझे कौटुंबिक संबंध होते. सणावाराला ते मला घरी बोलवायचे. त्यांना प्रतिमा नावाची एकुलती एक मुलगी होती. तिचं काॅलेजचं शिक्षण चालू होतं..

पाच वर्षातच मालकांनी देऊ केलेल्या प्रेसची सर्व रक्कम मी आलेल्या कमाईतून फेडून टाकली. आता याच व्यवसायात मला उत्तुंग यश मिळविण्याची महत्त्वाकांक्षा होती.

एके दिवशी मला मालकांनी घरी बोलावलं. मी गेल्यावर दोघा उभयतांनी मला लग्नाबद्दल विचारलं. मी अजून तसा विचारच केला नव्हता. त्यांनी, आमच्या प्रतिमाशी तू लग्न करशील का? असं विचारल्यावर मी तर निशब्दच झालो.. खरं तर प्रतिमाला पाहिल्यापासून, मी तिच्या प्रेमातच पडलो होतो मात्र मालकांना काय वाटेल, या विचाराने शांत राहिलो.. आज तर त्यांनीच तिच्याविषयी विचारुन मला आनंदाच्या लाटेवरच ढकलून दिलं होतं.. 

महिन्याभरातच आमचं लग्न झालं. मी नुकतीच नवीन मोटरसायकल घेतलेली होती. त्यावरुनच आम्ही मधुचंद्रासाठी महाबळेश्वरला जायचं ठरवलं.. 

कात्रज घाटातून जाताना प्रत्येक वळणावर प्रतिमा घाबरुन मला घट्ट बिलगत होती.. आणि मी रोमांचित होत होतो.. रमत गमत आम्ही चार तासांनी महाबळेश्वरला पोहोचलो.. तिथं हाॅटेल मिळवून देणारी काही माणसं आमच्या मागे लागली. त्यातील एका बारा चौदा वर्षांच्या मुलाला मी जवळ बोलावून तुझं हाॅटेल कुठं  आहे हे विचारलं. ते बाजारपेठेतच असल्याने तिथंच उतरायचं मी नक्की केलं.. हाॅटेलच्या काऊंटरमागे एक पारशी मालक बसला होता. हाॅटेलमधील रुम ताब्यात घेतली व सामान ठेऊन फ्रेश झालो.. त्या मुलाच्या हातावर पाच रुपये ठेवल्यावर तो खुष झाला.. 

त्याला नाव विचारल्यावर त्यानं ‘सलीम’ असं सांगितलं.. तो गाईडचंही काम करीत होता.. मी त्याच्यासोबत महाबळेश्वरमधील सर्व पाॅईंट्स व प्रेक्षणीय ठिकाणं पहाण्याचा निर्णय घेतला.. साडेचार वाजले होते, आम्ही सनसेट पाॅईंटला जायचं ठरवलं..

तिथं पोहोचल्यावर पाहिलं, तर पर्यटकांची गर्दी हळूहळू वाढू लागली होती.. आम्ही दोघांनीही घोड्यावरुन रपेट मारण्याचा आनंद घेतला..

प्रतिमा एका उंच टेकाडावर, लाल टोपी घालून बसलेली होती. मी तिचे क्लिक थ्री कॅमेऱ्याने फोटो काढत होतो.. तेवढ्यात एक स्केचिंग करणारा चित्रकार माझ्याजवळ आला व म्हणाला, ‘तुमची हरकत नसेल तर मी यांचं एक स्केच करु का?’ मी होकार देऊन, तो स्केच कसे काढतो ते पाहू लागलो.. अवघ्या दहा मिनिटात त्याने लाल टोपी घातलेल्या प्रतिमाचे व समोर पसरलेल्या निसर्गाचे अप्रतिम स्केच, कलर पेन्सिलीने पूर्ण केले.. 

प्रतिमा तर ते चित्र पाहून बेहद खुष झाली. तिनं न राहवून त्याला विचारलं, ‘हे चित्र, तुम्ही मला द्याल का?’ तो कलाकार फारच संवेदनशील होता, त्याने त्यावर ‘शुभेच्छा’ लिहिले व खाली सही करुन तिच्या हातात दिले. मी त्या दोघांचा, एक आठवण म्हणून फोटो काढला…

सनसेट डोळ्यात साठवून आम्ही परतलो.. ते चार दिवस आम्ही खूप भटकलो. तेथील काही ठिकाणं हिंदी चित्रपटातील गाण्यांतून अनेकदा पाहिलेली होती.. जुनं महाबळेश्वर पाहिलं.. बाजारपेठेत खरेदी केली. त्या चार दिवसांत हाॅटेलच्या, पारशी मालकाशी माझी चांगलीच ओळख झाली होती.. 

महाबळेश्वरहून आम्ही स्वर्गीय आनंद उपभोगून, परतताना हाॅटेल मालकाचा निरोप घेतला. त्यांनी पुन्हा कधीही आलात तर इथेच या असं आम्हाला आपुलकीनं सांगितलं…

आम्ही दोघेही संध्याकाळी घरी पोहोचलो. आमचा संसार सुरु झाला.  मी पुन्हा प्रेसच्या कामात गुंतलो.. कामं वाढली होती. नवीन प्रिंटींगची मशीनरी घेतली. स्टाफ वाढला. आम्हाला मुलगा झाला. त्याचं सगळं करण्यात प्रतिमा गुंतून गेली..

वीस वर्षे हा हा म्हणता निघून गेली. मुलांचं शिक्षण पूर्ण झालं. माझा प्रेस हा शहरातील सर्वोत्तम प्रिंटींगची सेवा देणारा म्हणून सर्वांना परिचित झाला.. 

बंगला, कार, बॅंक बॅलन्स सर्व काही प्राप्त झालं. मुलाचं लग्न झालं. त्यांचा संसार सुरु झाला. आता आम्ही जबाबदारीतून मुक्त झालो होतो.. 

इतक्या वर्षांत आम्हा दोघांना बाहेर पडता आलं नव्हतं, म्हणूनच पुन्हा एकदा महाबळेश्वरला निघालो होतो.. खेडशिवापूरला जिथं तीस वर्षांपूर्वी ‘कैलास भेळ’ नावाची साधी शेड होती, तिथं आता मोठी पाॅश इमारत उभी होती. महाराष्ट्रीयन व दाक्षिणात्य पदार्थांसाठी प्रवाशांनी गर्दी होती. आम्ही तिथं मिसळचा आस्वाद घेतला व पुढे निघालो..

सुमारे तीन तासांनी आम्ही महाबळेश्वरला पोहोचलो. महाबळेश्वर ओळखू न येण्याइतपत बदलून गेलेलं होतं.. आम्ही पूर्वीचं हाॅटेल शोधत होतो.. तेवढ्यात एक चाळीशीतला तरुण माझ्याकडे निरखून पाहू लागला.. मी सलीम पुटपुटताच त्यानं मला ओळखलं.. माझ्या रुपेरी केसांमुळे तो साशंक होता.. त्याने ते पूर्वीचं हाॅटेल दाखवलं.. हाॅटेलचं काऊंटर आता फर्निश्ड होतं. मालक मागील बाजूस हार लावलेल्या फोटोमध्ये गेले होते.. त्यांचा मुलगा काऊंटरवर होता.. आम्ही गेल्या वेळचीच रुम त्याला मागितली.. 

फ्रेश होऊन आम्ही दोघेही बाहेर पडलो. सनसेट पाॅईंटला गेलो. पाॅईंटवर गर्दी भरपूर होती. घोडेवाले  फिरत होते, मी प्रतिमाला विचारलं, ‘मी रपेट मारु का?’ तिनं मला हात जोडले.. सनसेट पाहून आम्ही परतलो.. वाटेतच जेवण केलं. चार दिवसांचा प्लॅन करुनही दोन दिवसांतच दोघेही कंटाळून गेलो. प्रत्येक ठिकाणं पुन्हा पहाताना दोघांनाही भूतकाळ आठवत होता.. पूर्वीचा निसर्ग आता आधुनिकीकरणामुळे राहिलेला नव्हता.. बाजारपेठ आता शहरासारखीच गजबजलेली होती. रात्री मुलानं व्हिडिओ काॅल करुन चौकशी केली. इकडची काळजी करु नका, आणखी दोन दिवस रहा.. असं म्हणाला..

रात्री मी विचार करीत होतो, तीस वर्षांपूर्वी जो आनंद मिळाला.. तसा आता मिळत नाही.. तेव्हा जी स्वप्नं पाहिली, ती आज सत्यात अनुभवतो आहे.. काळ हा कधीच थांबत नाही.. आज मी तोच आहे, मात्र सभोवतालचं जग बदललं आहे.. हा बदल मान्य करायलाच हवा… प्रतिमाला गाढ झोप लागली होती.. मी तिच्या अंगावर ब्लॅंकेट घातले व झोपी गेलो…

सकाळी आवरुन आम्ही निघालो.. हाॅटेलचं बिल पेड केलं.. गाडी स्टार्ट केली.. तेवढ्यात सलीम पुढे आला, प्रतिमानं त्याला बक्षिसी दिली व आम्ही रस्त्याला लागलो.. या तीस वर्षांत जग जरी बदललं असलं तरी एक गोष्ट अजिबात बदलली नव्हती.. ती म्हणजे प्रतिमा !! आज या प्रतिमेमुळेच जनमानसात माझी  ‘प्रतिमा’ उंचावलेली आहे…

© सुरेश नावडकर

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग -1 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग -1 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

हनुमानाने राम-लक्ष्मणाला त्रृष्यमुख पर्वतावर सुग्रीवाची भेट घालुन दिल्यावर रामाने सुग्रीवाला स्वतःचे राज्य असतांना निर्वासीत कां झालास म्हणुन विचारले असतां, सुग्रीवाने रामाला, आपला भाऊ, वाली आणि त्याच्यात दोघांमध्ये गैरसमजुतीने निर्माण झालेली दुःखद कथा कथन केली.

वालीचा जन्म अरुणी  आणि इंद्रापासुन तर सुग्रीवाचा जन्म अरुणी आणि सुर्यापासुन झाला. दोघांनाही गौतमत्रृषी व अहिल्येकडे ठेवले होते. गौतम अहिल्येला अंजना नांवाची मुलगी होती. अहिल्येला भ्रष्टकरण्याकरिता इंद्र आला ही गोष्ट तिने तिचे वडील गौतमांना सांगीतले म्हणून अहिल्येने तिला वानरी होण्याचा आणि मुलांनी ही बातमी सांगीतली नाही म्हणुन गौतमांनी मुलांना वानर होण्याचा  व अहिल्येला एकांतवासांत पाषाणवत होण्याचा शाप दिला.

गौतमत्रृषींना आईविना पोरक्या  मुलांचे रुपांतर झालेल्या वानरांबद्दल फार वाईट वाटले. एकदा तोंडातुन निघालेली शापवाणी माघारी पण घेता येत नव्हती. म्हणून त्यांनी त्या तिन्ही वानरांना किंष्किंधेच्या निपुत्रीक वानर राज रिक्षवांनाकडे सोपवले. तिथे त्यांचे शिक्षण झाले. विवाहयोग्य झाल्यावर अंजनाचा विवाह केशरीशी, वालीचा विवाह वानरप्रमुख सुषेनची कन्या ताराशी आणि सुग्रीवाचा विवाह रुमाशी झाला.

रिक्षराजांचे मुलांवर निरतिशय प्रेम होते. मृत्यूपूर्वी त्यांनी वाली व सुग्रीवला आपल्या राज्याचे वारस केले. किंष्किंधेत सर्व सुरळीत व कुशल सुरु असतांना दुंदुभी नांवाचा एक राक्षस जो नेहमी रेड्याच्या रुपांत वावरत असे,तो भल्यामोठ्या पर्वतासारखा अवाढव्य दिसत असे. त्याच्या अंगात हत्तीचं बळ होते. त्याला देवाचे वरदान प्राप्त असल्यामुळे अत्यंत उन्मत्त बनला होता.

दुदुंभी राक्षलाला आपल्या शक्तीचा फार गर्व झाला होता. तो फिरत फिरत जलनिधी समुद्राकडे आला असता समुद्राच्या पर्वतासारख्या लाटा एका पाठोपाठ एक अशा उसळत होत्या. लाटांच्या धीरगंभीर आवाजाने सारे अंतराळ भरुन गेले होते. सागराच्या लाटांचा जोर पाहुन व गर्जना ऐकुन दुदुंभी राक्षस संतापला. त्या राक्षसाने मोठमोठ्याने गर्जना करुन सागराला युध्दासाठी आव्हान देऊ लागला. राक्षसाचे आव्हान ऐकुन समुद्र देव पाण्यातुन बाहेर येऊन राक्षसाला म्हणाले, “मी तुझ्याशी युध्द करण्यास असमर्थ आहे. तूं पर्वतराज हिमालयाकडे जाऊन त्याच्याशी युध्द कर! गिरिराज तुझ्याशी युध्द करण्यास समर्थ आहे.”

दुदुंभी राक्षस जास्तच उन्मत्त व गर्विष्ठ बनला. तो हिमालय पर्वताकडे गेला. गिरीराज हिमालय अपल्या पांढर्‍या उंच उंच शिखरांनी तळपत होता. पर्वतांचा परिसरांत शांत, पवित्र वातावरण होते. ती निस्तब्धता, ती शांतता, ते पावित्र्य, मांगल्य पाहुन राक्षसाला खूप संताप, राग आला.त्या शांत वातावरणाचा भंग करण्यासाठीच जणू तो मोठमोठ्या शिळा उचलुन हिमालयाच्या शिखरावर फेकु लागला.

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares