मराठी साहित्य – विविधा ☆ गणेशोत्सव काल आणि आज … ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ गणेशोत्सव काल आणि आज… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सर्वांच्या जिव्हाळ्याचा, आनंदाचा, उत्साहाचा सण म्हणजे गणेशोत्सव ! तो कधीपासून सुरु झाला याची नोंद इतिहासात असणार, पण गणपती मळाचा की चिखलाचा ? आख्यायिकाही वेगवेगळ्या आहेत. कुणी पुराणात जाऊन पाहिलंय ? नाही, तेही कल्पनेनेच लिहिले. त्यामागे तत्कालीन परीस्थिती, भौगोलिक, आर्थिक सामाजिक वैज्ञानिक ही असेल कदाचीत पण ते प्रमाण मानत आपण पाळत आलो, कदाचित त्या काळी काळाशी सुसंगत असेल ही ! 

ब्रिटिशांविरुद्ध समाजात एकी निर्माण करण्यासाठी टिळकांनी घरातला गणपती चौकात ठेवला की जेणेकरून लोक एकत्र येतील मग त्यांना समजावणे, सांगणे सोपे जाईल आणि नंतरच्या काळात त्याला सार्वजनिक रूप आले. टिळकांचा मूळ उद्देश जनजागृती व लोकांना एकत्र येणे हे सफल झाले असतीलच, पण पुढे ही प्रथा तशीच राहिली अन मंडळे वेगवेगळ्या कल्पना लढवून कल्पकता अन सामाजिक प्रबोधन करू लागली. मनोरंजनाच्या विविधरंगी कार्यक्रमानी उत्सव बहरू आणि भारु लागले. एक चैतन्य संचारले या उत्सवात नियमितच्या रुटीनमधून लोकांचे मनोरंजन होऊ लागले, विरंगुळा मिळू लागला. लोक शिकले, शिक्षित झाले, उत्सवात बदल झाले, लोकसंख्या वाढली, आता खरे तर काळानुसार बदल व्हायला हवे होते पण उलटेच घडले. भरमसाठ मंडळे एकमेकांवर ईर्षा, भांडणे अन जबरदस्तीच्या देणग्या, उंचच उंच मुर्त्या, डॉल्बी, बीभत्स गाणी यांनी उत्सवाचे सात्विक रूप जाऊन हिडीस रूप आले. प्रसादाच्या नावाखाली जेवणावेळी अन अन्नाचा अपव्यय होऊ लागला. रस्त्यावरची गर्दी, डॉल्बीचे शरीरावरील घातक परिणाम, पाणी प्रदूषण, ट्रॅफिक जॅम अन सामाजिक वातावरण गढूळ केलंय या सार्वजनिक उत्सवाने !आचार विचारात काळानुसार बदल होऊन सुसंस्कृतपणा यायच्या ऐवजी त्याची दिशा भरकटली अन दशा दशा झाली की हे आवरायला गणेशालाच बोलवावे वाटतेय.

सामाजिक वातावरण पर्यावरण यांचा विचार आम्ही करत नसू तर मग कायदाच का करत नाहीत एक छोटे गाव एक गणपती, मोठे शहर एक गल्ली एक गणपती ? मोठ्या मूर्ती बनवणे कायद्याने बंद का केले जात नाही ? पर्यावरण पुरकच मूर्ती तयार करा म्हणून कायदा का होत नाही ? घरगुती, सार्वजनिक मूर्तींना ठराविक उंचीचे प्रमाण का दिले जात नाही ?कारण या सर्वांना खतपाणी घालायला राजकारणी मंडळी कारणीभूत आहेत. उत्सव जवळ येताच मंडळांना शर्ट, भरमसाठ देणगी दिली जाते अन ऐतखाऊ, चंगळवादी पिढ्याना सवय झालीय की उत्सव आला की राजकारण्यांकडे भीक मागून जगायचे, टोकाच्या अस्मिता अन श्रद्धाही ! सामाजिक जागृती अशा विचित्र, ओंगळ वळणावर आलीय, करोडो रु चा चुरा पाच ते सात दिवसात होतोय. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच मंडळे सामाजिक बांधिलकी, सलोखा अन विधायक उपक्रम राबवतात, बाकी सर्व तेच ते जेवणावेळी, रोषणाई अन डॉल्बी !

खरे तर भारत हा कृषिप्रधान देश आहे  म्हणून सर्व सण उत्सव हे शेतकरी जीवनाशी निगडित होते.

देवाचा प्रसाद अन फुले फळे ही त्या त्या ऋतूनुसार ! चिखलाचे देव पाण्यात विसर्जित करायचे म्हणजे पुन्हा ते निसर्गात मिसळावेत. जसे मनुष्य जन्मास येतो अन शेवटी मातीत मिसळून एकरूप होतो ! तसेच या देवांच्या मूर्तीचे देखील ! बघा, नागोबा, बैल, मातीचेच अन गणपती ही मातीचाच ! बारा बलुतेदारांना वेगवेगळ्या सणाला महत्त्व होते अन त्यांचा चरितार्थ यातून होत असे म्हणून हे सण अन औपचारिक गोष्टींचे चक्र त्या गावगाड्याच्या गरजेनुसार फिरत असे ! आता ते सर्व सम्पले, शेती सम्पली, कृषिप्रधान देश व्यापार प्रधान अन नोकरीप्रधान झाला अन सगळे सण व्यापारी गणिते करू लागले ! शेतातून, परसातून फुले, पत्री, दुर्वा न मिळता थेट बाजारातून मिळू लागली, पाना फुलांचा, फांद्यांचा बाजार बसू लागला अन कसल्याही परस्थितीत ते केलेच पाहिजे ही मानसिकता वाढली.

अमुक सण अमुक स्पेसॅलिटी याचे स्तोम वाढले शेतात पिकापेक्षा तनकट फोपावल्यासारखे !

मला आठवतो माझ्या बालपणीचा गणेशोत्सव ! श्रावणातल्या झडीने अन भादव्याच्या उन्हाने पिकं तरारून यायची सोबत गवत तणही फोपवायचे पिकांशी स्पर्धा करत, रस्त्याच्या दुतर्फा तरवड, गवतफुल फुललेली असायची, परसदारी विविधरंगी गौरी फुलायच्या   रंगीबेरंगी फुलपाखरे सगळीकडे आनंदाने भिरभरायची, ज्वारी, मका कम्बरेला लागलेली असायची, मूग, काळा श्रावण, चवळीच्या शेंगा अंगणात ऊन खात पडायच्या, मुगातल्या लाल अळ्या अन  चवळीच्या पांढऱ्या अळ्या शेंगेतून बाहेर पडून वाट दिसेल तिकडं धवायच्या, उन्हात टरफल फुटून शेंगा चट चट आवाज करत फुटायच्या अन कडधान्य बाजूला पडायची, चिमण्या दिवसभर या आळ्या गट्टम करण्यात व्यस्त अन शेतकरीन धान्याची उगा निगा करण्यात ! इकडे शेतीच्या पिकांची लगबग अन सण चौकटीत ! पटपट ही काम आवरून सणाच्या तयारीला लागायची ! घराघरात देवळीला सोनेरी बेगड लावून मखर करून गणपती विराजमान व्हायचा क्वचितच तो टेबल किंवा तत्सम वस्तूवर स्थानापन्न व्हायचा. शेतात दुर्वा दव बिंदूंचे मुकुट परिधान करून पावसाची नव्हाळी लेऊन हिरव्या कंच लुसलुशीत पेहरावात मुबलकपणे हवेवर डुलायच्या, आघाडा रस्त्याच्या कडेला कुंपणात आपली डोकी उंचावत अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडायचा ! उदबत्ती, निरांजन, कागदाच्या झुरमुळ्या, दरवर्षी याच सणाला राखून ठेवलेले नवीन रंगीबेरंगी कापड टेबल वर बस्स इतकीच घरगुती गणपतीची आरास ! फार फार तर कागदाची  एखादी प्रभावळ ! पेढे, पेरू, केळ, चुरमुरे बत्तासे, शिरा, मोदक प्रसाद इतकाच माफक !

सार्वजनिक मंडळ गल्लीत एकच साधी मूर्ती, छोटासा मंडप, विद्युत रोषणाई स्टेरीओवर तेव्हढाच गल्लीपुरता गाण्यांचा आवाज घुमायचा अन मनात आनंदी आनंद भरायचा. आमची गल्ली गावाच्या एका टोकाला, खूप मोठी ! जणू छोटेसे एक गावच ! गल्लीतल्याच नाटक कंपनीचं एखादं नाटक किंवा विविध गुण दर्शन बस इतकेच मनोरंजन ! गावात वेगवेगळ्या पेठांचे वैशिष्ट्य पूर्ण आरास, देखावे कधी जिवंत देखावे अन तीच स्टेरिओवरील गाणी त्या त्या काळातील मराठी हिंदी चित्रपटातील ! वातावरण आनंदान भरून  जायचं ! वेगळं काही वाटत नव्हतं किंवा देव आणि गाणी यांचा काही संबंध असावा हे ध्यानी येत नव्हतं ! कुठेही धावपळ, ताण किंवा बोजा नसायचा. पाच दिवस घरोघरी विराजमान होऊन पुरणपोळी खाऊन, सार्वजनिक गणपती शिरा खाऊन त्यांच्या गावी जायचे मन हुरहूरते ठेऊन अन शेतकरी पुढील शेताच्या कामाच्या लगबगीत !

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नासाची आर्टिमिस योजना – भाग-3 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ नासाची आर्टिमिस योजना – भाग-3 ☆ श्री राजीव ग पुजारी 

(या दलाने SLS च्या २१२ फूट उंचीच्या मुख्य टप्प्याच्या प्रतिकृतीचे (याचे नाव पाथ फाईंडर ठेवले आहे ) कंटेनर मधून उतरविणे, हाताळणे आणि जुळणी करणे यांचाही अभ्यास केला होता.) इथून पुढे —–

SLS प्रक्षेपक मानवरहित ओरियन अंतराळयानाला पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करेल. तेथून अंतरिम क्रायोजिनिक प्रणोदन टप्प्याच्या सहाय्याने यान चंद्राच्या रेट्रोग्रेड कक्षेत जायला सज्ज होईल. गुरुत्वाकर्षणीय सहाय्याने (gravity assist) ते चंद्राच्या सुदूर रेट्रोग्रेड कक्षेत जाईल. रेट्रोग्रेड म्हणजे, चंद्र स्वतःभोवती ज्या दिशेने फिरतो, त्याच्या विरुद्ध दिशेने यान चंद्राभोवती प्रदक्षिणा घालेल. या कक्षेत यान सहा  दिवस राहील. नंतर परत गुरुत्वाकर्षणीय सहाय्याने यान पृथ्वीकडे झेपावेल. एकूण मोहीम २६ दिवसांची असेल. मोहिमेची पूर्तता यान ताशी २४,५०० मैल किंवा मॅक ३२ या अतिप्रचंड वेगाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करुन पॅसिफिक महासागरात विसावण्याने होणार आहे. तत्पूर्वी त्याने  त्याच्या संपूर्ण प्रवासाचा विदा ( डेटा ) गोळा केलेला असेल. गुरुत्वाकर्षणीय सहाय्याने यानाचा परत प्रवेश ही या मोहिमेची प्राथमिकता आहे. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतांना यानाच्या उष्णतारोधक कवचाचे तपमान ५००० डिग्री फॅरनहिट एव्हढे असणार आहे. या तपमानाला हे कवच टिकते का याचेही परीक्षण या निमित्ताने होईल.

या मोहिमेमध्ये अंतराळवीरांना आवश्यक असणाऱ्या उपकरणांऐवजी वैज्ञानिक आणि तांत्रिक माहिती गोळा करणारी उपकरणे असतील. समानव मोहिमेच्यावेळी कॉकपीट समोर असणारे दर्शक, नियंत्रक व जीवसंरक्षक उपकरणांऐवजी यानाच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी आवश्यक अशा विदा ( डेटा ) गोळा करणाऱ्या उपकरणांचा समावेश असेल. यामुळे यानाच्या कामगिरीचे उड्डाणापूर्वी तयार केलेले अंदाजी प्रारूप व प्रत्यक्ष विदेवरून मिळालेली माहिती यांचा तौलनिक अभ्यास केला जाईल. या चार ते सहा आठवड्यांच्या मोहिमेमध्ये यान चौदा लाख मैलांपेक्षा जास्त प्रवास करेल. यामुळे मानवांसाठी तयार केलेल्या यानाचा पृथ्वीपासून सुदूर प्रवासाचा अपोलो १३ ने केलेला उच्चांक मोडला जाईल. या मोहिमेशी अनेक विश्वविद्यालये, आंतरराष्ट्रीय सहयोगी व खाजगी कंपन्या जोडल्या गेल्या आहेत. त्यांची संख्या पूर्वीच्या चांद्रमोहिमेशी जोडल्या गेलेल्या संस्थांपेक्षा जास्त आहे. आर्टिमिस-१ मोहिमेमध्ये १३ लघुउपग्रह सुद्धा सुदूर आंतरिक्षात सोडले जातील, त्यामुळे आपल्या सुदूर अंतरिक्षाच्या वातावरणाविषयीच्या ज्ञानात भर पडेल. हे उपग्रह नवीन वैज्ञानिक अन्वेषण करतील आणि नवीन तांत्रिक प्रत्यक्षिके देखील करतील.

आर्टिमिस-२:- ही स्पेस लॉंच सिस्टीम व ओरियन अंतराळयान यांची पहिलीच समानव मोहीम आहे. या मोहिमेद्वारा चार अंतराळवीरांना पन्नास वर्षांनंतर प्रथमच चंद्राच्या वातावरणात पाठविण्यात येणार आहे. ‘आर्टिमिस पिढी’ चा हा ‘अपोलो ८’ क्षण आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण अपोलो ८ यानाद्वारा इतिहासात प्रथमच मानव चंद्राच्या वातावरणात पोचला होता. यावेळी ओरियन यानातील अंतराळवीर पृथ्वीच्या पार्श्वभूमीवर चंद्राचा फोटो काढतील.

    आर्टिमिस १ च्या यशामुळे तसेच हजारो तास केलेल्या तयारी व तालमींमुळे मिळालेला आत्मविश्वास घेऊन हे अंतराळवीर SLS च्या टोकावर असलेल्या ओरियनमध्ये आरूढ होतील. ही मोहीम दहा दिवसांची असेल. या मोहिमेद्वारा चंद्राच्या विरुद्ध बाजूला जास्तीतजास्त लांब जाण्याचा व असंकरीत मुक्त प्रत्यागमन विक्षेपमार्गाने (hybrid free return trajectory) परत येण्याचा समानव यानाचा विक्रम प्रस्थापित होईल.        

आर्टिमिस ३:- आर्टिमिस-२ प्रमाणेच आर्टिमिस-३ मोहिमेमध्ये देखील चार अंतराळवीर असतील. पण यावेळी पहिल्यांदा एक स्त्री व नंतर एक पुरुष चंद्रभूमीवर पाऊल ठेवतील. आर्टिमिस-३ मोहिमेपूर्वी चंद्राभोवती अंतराळस्थानक उभे करण्याचा प्रयत्न आहे. त्याला गेट वे म्हणून संबोधले जाईल. ओरियन अंतराळयान या स्थानकाशी जोडले जाईल. अंतराळवीर या स्थानकावर उतरतील. नंतर ह्यूमन लँडिंग सिस्टीम (HLS) द्वारे ते चंद्रावर उतरतील. चंद्रावरील काम संपल्यावर HLS च्या मदतीने ते पुन्हा स्थानकावर येतील. या स्थानकाचा उपयोग फार महत्वाचा आहे. कारण एकाच चंद्रमोहिमेत अंतराळवीर अनेकदा चंद्रावर उतरून काम करू शकतील. जर आर्टिमिस-३ मोहिमेपर्यंत स्थानकाचे काम पूर्ण झाले नाही तर आर्टिमिस योजनेच्या पुढील मोहिमांसाठी याचा वापर केला जाईल. या अंतराळ स्थानकासारखेच भविष्यात मंगळाभोवती देखील अंतराळ स्थानक उभारण्यात येईल. या स्थानकात अंतराळवीर थांबून अनेकवेळा ते मंगळावर उतरून काम करू शकतील. म्हणजेच चंद्राभोवतीचे अंतराळ स्थानक म्हणजे मंगळावर मनुष्य भविष्यात कशा पद्धतीने काम करू शकेल याची रंगीत तालीमच म्हणायची!!

जर अंतराळ स्थानक आर्टिमिस-३ मोहिमेपर्यंत पूर्ण झाले नाही तर, अंतराळवीर ह्यूमन लँडिंग सिस्टिम वापरून चंद्रावर उतरतील. या परिस्थितीत चंद्रकक्षेतच अंतराळवीर ओरियन मधून HLS मध्ये स्थलांतरित होतील. चंद्रावरील त्यांचे काम संपल्यावर HLS मध्ये बसून पुन्हा ते चंद्रकक्षेत येतील, तेथेच ते पुन्हा ओरियन यानात स्थलांतरित होतील. नंतर ओरियन यान अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीवर परतेल.

क्रमशः …

© श्री राजीव  गजानन पुजारी 

फोन -9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वाडगेभर निर्जीव अन्न… वैद्य रूपाली पानसे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? विविधा ?

☆ वाडगेभर निर्जीव अन्न… वैद्य रूपाली पानसे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

वाडगेभर निर्जीव अन्न : आजची फॅशन “🍲🍜🍚

“अ बाउल ऑफ डेड फूड” या माझ्या wordpress च्या ब्लॉगबद्दल खूप सकारात्मक प्रतिक्रिया आणि आभार वाचकांनी कळवले. काही वाचकांनी ही पोस्ट अजून विस्तृत करून मराठीमध्ये लिहिली तर  जास्त लोकांपर्यंत पोचून लिखाणाचे ध्येय साध्य होईल, असे वारंवार सुचवले. ही पोस्ट त्या वाचकांना समर्पित !

आज आहारशास्त्रात , पाकविधीशास्त्रात थोडक्यात फूड इंडस्ट्रीमध्ये अफाट, आमूलाग्र technical क्रांती झाली आहे. गमतीने आपण म्हणतो, काही धंदा चालो ना चालो पण वडापावची गाडी आणि खाण्याचे दुकान याला मरण नाही. किती खरे आहे हे.आज सर्वात जास्त नफा फूड इंडस्ट्री, हॉटेल आणि फूड manufacture सेक्टर कमावतंय. उद्याही हेच चित्र असेल किंबहुना अजून विस्तार वाढला असेल.

ज्या वेगात हा ‘रेडी टू ईट’ पदार्थांचा उद्योग फोफावतोय, त्याच वेगात lifestyle disorders औषधी आणि आरोग्यसेवा क्षेत्रातही वाढ होतेय. याचा अर्थ असा तर नाही ना की, फूड इंडस्ट्री औषधी मार्केटसाठी कस्टमर तयार करतेय? दुर्दैवाने काही अंशी ते खरेही आहे. काही घरात ‘रेडी टू ईट’ पदार्थ हे अगदी रोज, खूप प्रमाणात खाल्ले जातात. अगदी लहान मुलांनाही दिले जातात. (हो, कारण जाहिरातीत टार्गेट ऑडियन्स लहान मुले व त्यांच्या आयाच असतात )

‘रेडी टू ईट’ पदार्थांची यादी भली मोठी आहे. आज उदाहरणादाखल आपण घेऊ ….

कॉर्न फ्लेक्स, ओट मिल, चॉकोस, मुसेली इत्यादि :

अति उच्च तापमानात, अति दाबाखाली मूळ धान्यातील पाण्याचा अंश काढून हे पदार्थ तयार होतात. उष्णता, अति दाब यामुळे यातील नैसर्गिक पोषणमूल्ये जवळजवळ नष्ट होतात. राहतो तो निर्जीव पोषणमूल्यरहित चोथा! आता हा चोथा कोण खाणार म्हणून मग त्यात टाका कृत्रिम व्हिटॅमिन, कॅल्शिअम,  लोह इत्यादि, जे शरीरात नीट शोषले जाईल याची काही शाश्वती नाही.

किती गम्मत आहे नाही? आधी त्या धान्याचा जीव घ्या आणि मग त्यात परत जीव आणण्याचा प्रयत्न करा. या सगळ्यात मूळ पदार्थांपेक्षा processing कॉस्ट वाढलेली असते तसेच टिकवणे, चव वाढवणे,  दिसायला आकर्षक असावे या गोष्टीतून त्यात वेगवेगळी रासायनिक preservatives, रंग, मीठ, साखर आणि फ्लेवरची भर पडते. काही ब्रॅण्ड्समध्ये तर वाळवलेल्या भाज्या, फळेही असतात. समस्त पिरॅमिड रिटर्न mummy, मृत शाक, फल, धान्य संमेलनच जणु !

असे पदार्थ वारंवार खाण्यात असणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा आणि असे पदार्थ न खाणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा अभ्यास केला असता, हे पदार्थ खाणाऱ्या स्त्रियांमध्ये स्थूलता, अतिउच्चरक्तदाब, तसेच मधुमेहाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. कमालच आहे! पण जाहिरातीत तर सुडौल कमरेची बाई हे ३ आठवडे खा आणि वजन कमी होईल असे सांगत असते. वरून टाकलेल्या मीठ,  साखरेचे परिमाण दुसरे काय. आयुर्वेदानुसार असे निर्जीव, अति उष्णतेचा संस्कार झालेले, कोरडे अन्न हे वात दोष वाढवून शरीरात अनेक व्याधी उत्पन्न करण्याचे एक मुख्य कारण मानले जाते.

ओट हे तर अतिशय निकृष्ट धान्य वर्गात गणले जावे, इतके याचे पोषणमूल्य कमी आहे. ओटचा ग्लायसिमीक इंडेक्स (म्हणजे हे पचवताना रक्तातील वाढलेली साखरेची पातळी) ही जास्त असते. मी प्रत्यक्षात मात्र खूप मधुमेही रुग्णांना, “डॉक्टर, म्हणजे मी अगदी नियमित ओट मिल घेते, unhealthy असे काहीच खात नाही हो.” असे भक्तिभावाने सांगताना पाहते. बसतोय ना धक्का एक एक वाचून. असो !

ओट meal नियमित घेणाऱ्या व्यक्तींमध्ये कुपोषणाचे सगळी लक्षणे आढळून येतात, ज्यामुळे हाडे, सांधेदुखी, थकवा, पचनाच्या तक्रारी,  मलबद्धता, अहो, इतकीच नाही ही गोष्ट! अगदी आतड्यामध्ये मार्गावरोध होणे (intestinal obstruction, जी सिरिअस स्थिती असते) इतपत आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. याला डेटा,  research, सगळ्याचा आधार  आहे. गुगल करा.

मूळ म्हणजे पोषणरहित अन्न खाऊन शरीराचे हाल करा, वजन आपोआप कमी होईल ही विचारसरणीच किती भयानक आहे. सत्य आहे – आजच्या मनी ओरिएंटेड सोसायटीचे ! दुसरे काय?

‘रोज रोज ताजा नाश्ता बनवणे शक्य नसते हो’, ‘खूप सवय झाली या पदार्थांची, आता मुले ऐकत नाहीत’, ‘असे कसे चालते मार्केटमध्ये, जर एवढे दुष्परिणाम असतील तर?’

 – या सगळ्याला एकच उत्तर आहे, ‘ब्रॅण्डिंग’! 

‘ब्रॅण्डिंग’ची माया जी मला, तुम्हाला,आपल्या मुलांना बरोबर जाळ्यात ओढते. जाहिरात, सुंदर सुंदर मॉडेल आणि भ्रम निर्माण करणारे मोठे मोठे दावे! यात अगदी आयुर्वेदिक, आयुर्वेदिक म्हणून झेंडा फडकवणारे शांतंजली किंवा इतर हर्बल कॉर्न फ्लेक, मुसेलीवाले पण येतात बरं का!

आयुर्वेद वेगळा, स्वदेशी वेगळे, गल्लत नको.

अरे हो हल्ली ‘रेडी टू ईट व मेक’ पोहे, खिचडी, सांजा अशीही पाकीटे  मिळतात बरं का! तेही याच गटातले आहेत, विसरू नका.

अगदी क्वचित कधीतरी, पर्याय नाही, म्हणून हे पदार्थ खाणे समजू शकते.  परंतु अगदी वारंवार, खूप प्रमाणात आणि सगळ्यात महत्वाचे घरातील लहान मुले व वृद्ध व्यक्तीस हे खाण्यास देत असाल तर, नक्की परत विचार करा.

आपल्या आजूबाजू सहज मिळणाऱ्या ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, साळीच्या लाह्या ह्या वरील पदार्थाना उत्तम पर्याय ठरू शकतात. बाकी, ताज्या नाश्त्याच्या पदार्थांबाबत मी मागेच एक पोस्ट सविस्तर लिहिली आहे.

आपण राहतो त्या भौगोलिक परिस्थितीला, शरीराला उपकारक व अनुसरून आपले पारंपरिक पदार्थ असतात. आळीपाळीने असे पारंपरिक व ताजे पदार्थ खाण्यात ठेवणे कधीही उत्तम.

ताजे खा, साधे खा, निरोगी राहा.

लेखिका – वैद्य रुपाली पानसे –

मो 9623448798 ईमेल [email protected]

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शब्द व्हावे सारथी… भाग-1 लेखिका – डॉ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ 📘शब्द व्हावे सारथी… भाग-1 लेखिका – डॉ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

‘‘लंगडीच राह्य़चंय का तुला आयुष्यभर?’’ डॉ. बेडेकर मला विचारीत होते.

‘‘आयुष्यभर म्हणजे?’’ मी विचारलं.

‘‘आईएवढी, माझ्याएवढी झालीस तरी!’’

‘‘नाही नाही. मला धावायचंय, पळायचंय. सायकल चालवायचीय.’’

‘‘मग साठ इंजेक्शने घ्यावी लागतील न रडता. मुंगी चावल्यागत वाटेल.’’

माझे वय साडेपाच वर्षांचे होते. आधी वर्षभर माझ्या पायात मांडीपासून टाचेपर्यंत बूट होता. आईने वाचायला शिकविले होते नि मला न हसणारे, न चिडवणारे दोस्त आणून दिले होते- पुस्तकं! तेव्हापासून मला साथ देणारे माझे जिवाभावाचे सोबती.

‘‘मी घेईन. न रडता घेईन.’’

अशी साठ इंजेक्शने या बारक्या, काटकुळ्या पोरीने शूरपणे घेतली, न रडता आणि ती दोन पायांवर उभी राहिली. आईचा हात धरून सातव्या वर्षी एकदम दुसरीच्या वर्गात बसली नि ‘हुश्शार’ म्हणून गोडांबेबाईंची लाडुकली झाली. ती मी. विजया नरसिंह दातीर. माझे बाबा वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी गेले. मी केवळ अकरा वर्षांची होते. बाबा पुण्याचे सिटी मॅजिस्ट्रेट होते. डॉ. अमीन कलेक्टर होते. ते म्हणाले, ‘‘मिसेस दातीर, तुम्हाला पाच मुलं. गृहिणी आहात. दातीरांना पेन्शन बसणार नाही. मी दोन्ही मुलांना नोकरी लावून देतो. घर स्वाभिमानाने चालेल.’’

असे दादा, नाना, बाबांचं तेरावं करून नोकरीवर रुजू झाले. दादाला जेलर म्हणून येरवडय़ाला क्वार्टर्स मिळाल्या. दोन्ही बहिणींनी लग्ने केली सहा महिन्यांत. नाना राहुरीस होता. घर फक्त तिघांचं. मी, दादा, आई. माझ्यात नि भावंडांत फार अंतर होते. आठ, नऊ, तेरा वर्षांचे; पण दादा माझा बाप झाला नि माझे जीवन त्याच्यामुळे फार सुकर झाले.

‘‘कोणी विचारले, बाबा काय करतात तर रडायचे नाही. सांगायचे, जेलर आहेत.’’ इतुके प्रेम-इतुकी माया. माझे बीएस्सीपर्यंतचे शिक्षण, लग्न, बाळंतपण सारे सारे दादा, नाना यांनी केले. आक्काही जबाबदारी उचले.

पण तेव्हा ना, अतिमध्यम परिस्थितीचे काही वाटायचे नाही. आई मला कॉलेजात जाताना स्कर्ट घालू देई, पण घरी आल्यावर साडीच! केमिस्ट्री प्रॅक्टिकल्सला कपडय़ांना भोके पडतात म्हणून स्कर्ट हो! के.जे. सोमैय्यांतून मी बीएस्सी होता होता टेबल टेनिस, बुद्धीबळ या स्पर्धात आंतरकॉलेज स्पर्धात नि बुद्धीबळमध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. मला ‘बेस्ट गर्ल स्टुडंट’चा गौरव ज्युनिअर बीएस्सीला मिळाला; पण या नादात माझा फर्स्ट क्लास गेला. ‘‘आता लग्न करा.’’ आईने आदेश दिला. मी रेल्वे क्लबवर  ‘टे टे’ खेळायला जायची. तिथला माझा मित्र दोन दिवस मला घरी सोडायला आला. तेव्हा आईने त्याला दम भरला, ‘‘मी रोज गणपतीला जाते. मला कोणी घरी पोचवायला येत नाही. कळलं का? विजूला सोडायला यायचं नाही. ती फक्त लग्न ज्याच्याशी करेल.. त्याच्याबरोबरच येईल- जाईल.’’ तो इतका घाबरला. मला दुसऱ्या दिवशी म्हणाला, ‘‘बाप रे! तुझा भाऊ जेलर नि आई जगदंबा.’’ पण मला त्याच्याबद्दल काही मृदू वाटत होते. आमचे पासपोर्ट साइज फोटो आम्ही एकमेकांस दिले होते, पण बस्! त्या कोवळिकीचे अ‍ॅबॉर्शन हो! रेल्वे क्लब बंद.. बंद!

लग्न ठरले. कॅप्टन विजयकुमार वाडांना मी म्हटलं.. ‘‘असं प्रेम जडलं होतं.’’

‘‘आता नाही ना?’’

‘‘छे हो!’’

‘‘अगं, काफ लव्ह ते. तो फोटो टाकून दे. माझा ठेव.’’

संपलं. ओझंच उतरलं.

मला एका गोष्टीचे फार दु:ख होई, की माझा नवरा मला बॉर्डरवर नेत नाही. ‘‘मला पीस पोस्टिंग नाही. फिल्ड पोस्टिंगला कसे नेणार?’’ या उत्तराने माझे कधीही समाधान झाले नाही; पण मग दोघी मुलींनी जन्म घेतला चौदा महिन्यांच्या अंतराने आणि मी आयुष्यातला सर्वोच्च आनंद उपभोगला. मुली बापासारख्या नाकेल्या नि सुरेख निपजल्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे  ‘मुलगा हवा’ असे ना सासू-सासऱ्यांनी म्हटले ना पतीने. मला पंचविशीत करियर करायची होती, शिकायचे होते, लिहायचे होते. निशूच्या (निशिगंधा वाड) जन्मासोबत माझी पहिली कादंबरी ‘मेनका प्रकाशन’ने प्रकाशित केली होती. ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’ नि रविवार पुरवण्या यांत माझे लेख जसे येऊ लागले तसे ‘विजया वाड’ या नावाला लोक ओळखू लागले.

अनेक वर्तमानपत्रांच्या संपादकांनी मला सातत्याने लिहायला दिले. लेखन प्रसिद्ध केले. एका वर्तमानपत्रात तर सलग साडेपाच वर्षे मी लिहीत होते. ‘आकाशवाणी’वर मी तेरा तेरा भागांच्या पंधरा बालमालिका लिहिल्या, तर ‘दूरदर्शन’वर आबा देशपांडे यांच्याकडे शालेय चित्रवाणी सतत अकरा वर्षे नि ‘ज्ञानदीप’चे कार्यक्रम खूप केले. एक दिवस अशोक (‘डिंपल प्रकाशन’चा) माझ्याकडे दिलीप वामन काळे यांना घेऊन आला नि सुरू झाला दर चार-पाच महिन्यांनी एका पुस्तकाचा सिलसिला. दिलीपने माझी ३१ पुस्तके दहा-बारा वर्षांत काढली. १२४ पुस्तकांची आई आहे. अजूनही लिहितेच आहे..

क्रमशः…

लेखिका – डॉ. विजया वाड 

संग्राहिका –  सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नासाची आर्टिमिस योजना – भाग-2 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆`

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ नासाची आर्टिमिस योजना – भाग-2 ☆ श्री राजीव ग पुजारी 

(तसेच अंतरिक्षयान परत आल्यावर अंतराळवीरांना सुखरूपपणे यानातून बाहेर काढले जाते.) इथून पुढे —–

४) गेट वे :- हे चंद्राभोवती भूस्थिर कक्षेत फिरणारे एक अंतराळ स्थानक असून येणाऱ्या भविष्यात त्याची उभारणी केली जाईल. भविष्यातील आर्टिमिस मोहिमांतील अंतराळवीर ओरियन यानातून या स्थानकावर येतील. येथून ते आवश्यक सामान घेऊन ह्युमन लॅंडींग सिस्टिममध्ये(HLS) जातील. त्यांना घेऊन HLS चंद्रावर उतरेल. अंतराळवीर चंद्रावर त्यांना सोपवलेली कामगिरी बाजावून HLS मध्ये बसून गेट वे वर येतील. तेथून ओरियन यानाद्वारे ते पृथ्वीवर परततील. यात फायदा हा आहे की एकाच चंद्रमोहिमेमध्ये अंतराळवीर एकापेक्षा जास्त वेळा चंद्रावर उतरून काम करू शकतात अथवा चंद्राभोवतीच्या कक्षेत विविध प्रयोग करू शकतात. हा गेट वे एका दशकाहून जास्त काळ कार्यरत असेल. 

५) ह्युमन लॅंडींग सिस्टम (HLS):- ही चंद्रमोहिमेमधील अंतिम वाहतूक प्रणाली आहे. याद्वारे चंद्राच्या कक्षेतून अंतराळवीरांना चंद्रावर उतरविले जाईल व काम संपल्यावर पुनः त्यांना चंद्रकक्षेत नेले जाईल. 

६) आर्टिमिस बेस कॅम्प :- अंतराळवीरांना चंद्रावर राहणे व काम करणे यासाठी याची निर्मिती केली जाईल. यामध्ये आधुनिक चांद्रकार्यकक्ष(Cabin), एक बग्गी(Rover) व एक फिरते घर (Mobile home) असणार आहे.

आता आपण आर्टिमिस योजनेच्या पहिल्या तीन मोहिमांविषयी माहिती घेऊ :

आर्टिमिस १ :-आर्टिमिस १ द्वारा मानवरहित ओरियन यानाला चंद्राच्या ४०,००० मैल पलीकडे किंवा पृथ्वीपासून २,८०,००० मैलाच्या कक्षेत पाठविण्यात येईल. ही मोहीम म्हणजे SLS, ओरियन व एक्सप्लोरेशन ग्राऊंड सिस्टिम (EGS) यांचे समानव मोहिमेआगोदरचे एकत्रित परीक्षण आहे. 

SLS प्रक्षेपकाची चार RS-25 इंजिन्स, दोन अनुवर्धि प्रक्षेपक व अंतरिम क्रायोजिनिक प्रणोदन टप्पा या सर्वांचे वेगवेगळे व संयुक्त परीक्षण झालेले आहे, पण त्याचे अंतराळातील हे पहिलेच उड्डाण आहे. त्यामुळे या मोहिमेद्वारा त्याच्या कामगिरीचे परीक्षण केले जाईल. 

ओरियन यानाचे साडेचार तासांचे प्रत्यक्ष उड्डाण परीक्षण ५ डिसेंबर २०१४ ला झाले आहे. याद्वारे या यानाने ते पृथ्वीच्या सुदूर कक्षेत अंतराळ उड्डाणयोग्य आहे हे सिद्ध केले आहे. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतांना त्याच्या उष्णताप्रतिबंधक कवचाचे थोड्या प्रमाणात का होईना परीक्षण झाले आहे. यान समुद्रात उतरल्यावर त्याच्या कोषाला (capsule) यशस्वीरीत्या बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिकही झाले आहे. ओरियन यानाच्या या प्रत्यक्ष उड्डाण परीक्षणाला एक्सप्लोरेशन फ्लाइट टेस्ट-१ असे संबोधण्यात आले आहे. हे परीक्षण मानवरहित होते.

नासाने ओरियनच्या पॅरेशूट्सचे परीक्षण सप्टेंबर २०१८ ला यशस्वीरीत्या पर पाडले. या प्रणालीत ११ पॅरेशूट्स असणार आहेत. यान समुद्रसपाटीपासून ५ मैल आल्यावर ती उघडली जातील.

२०१९ ला नासाने असेंट अबॉर्ट -२ परीक्षण पार पाडले, त्याद्वारे उड्डाणाच्यावेळी ओरियन यानाच्या टोकावर असणारी  संकटकालीन यंत्रणा व्यवस्थित काम करत आहे याची खात्री करण्यात आली. उड्डाणाच्या वेळी  काही अनपेक्षित घडलेच, तर ही यंत्रणा ओरियन यानाला आतील अंतराळवीरांसह प्रक्षेपकापासून बाजूला काढेल व अटलांटिक समुद्रात त्याला उतरविण्यात येईल. 

ओरियन यानाचा दल विभाग (crew module) हा युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) ने बनविलेल्या सेवा विभागाशी (service module) पूर्णपणे जोडला आहे. हा सेवा विभाग दल विभागाला लागणारे जास्तीत जास्त प्रणोदन (propulsion), ऊर्जा आणि शीतकरण (cooling) पुरविणार आहे. मोहिमेदरम्यान अंतराळवीर दल विभागात राहतील व काम करतील. जगातील सर्वांत मोठ्या निर्वात खोलीत व टोकाचे विद्युतचुंबकीय क्षेत्र व तपमान (-२५० ते २०० डिग्री फॅरनहिट) असणाऱ्या परिस्थितीत यानाचे परीक्षण करण्यात आले आहे. अशी परिस्थिति अंतराळात असते म्हणून हे परीक्षण करण्यात आले. 

नासाच्या भू प्रणाली विभागाने (ground system team) पायाभूत सुविधांमध्ये (infrastructure) व भू समर्थन उपकरणांमध्ये (ground support equipments) योग्य ते बदल केले, जेणेकरून आर्टिमिस मोहिमेचे उड्डाण व ओरियन यानाचे अवतरण यांना मदत होईल. वाहन जुळणी इमारतीत (vehicle assembly building) तसेच नवीन पुनर्निर्मित 39-B प्रक्षेपण तळावर फिरत्या लॉंचरचे परीक्षण करण्यात आले व सुविधा प्रणाली (facility system) व भू प्रणाली (ground system) यांचेशी तो उड्डाणाच्यावेळी संवाद साधू शकेल याची खात्री करण्यात आली. 

एक्सप्लोरेशन ग्राऊंड सिस्टिम दल (EGS team) हा विभाग उड्डाणाची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी जबाबदार असतो. या दलाच्या सदस्यांनी फायरिंग रूम -१ मध्ये उड्डाणाचे प्रारूप निर्माण करुन अभ्यास केला आणि शिक्कामोर्तब केले की, हे दल उड्डाणसज्ज आहे आणि प्रत्यक्षात उड्डाणाच्यावेळी येणाऱ्या कोणत्याही अडचणींना तोंड देण्यास समर्थ आहे. या दलाने SLS च्या २१२ फूट उंचीच्या मुख्य टप्प्याच्या प्रतिकृतीचे (याचे नाव पाथ फाईंडर ठेवले आहे ) कंटेनर मधून उतरविणे, हाताळणे आणि जुळणी करणे यांचाही अभ्यास केला होता.

क्रमशः …

© श्री राजीव  गजानन पुजारी 

फोन -9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सद्गुरू कशासाठी हवा? ☆ संकलन – श्री मनोज लिंग्रस ☆

? विविधा ?

☆ सद्गुरू कशासाठी हवा? ☆ संकलन – श्री मनोज लिंग्रस ☆

सद्गुरू कशासाठी हवा ?

महाभारतातलीच एक कथा आहे.

द्रौपदी स्वयंवरात सर्व राजे, युवराज आपापलं कौशल्य पणाला लावून मत्स्यभेद करण्याची पराकाष्ठा करीत होते.

पणही विलक्षणच होता!

उंच छताला एक चक्र फिरत राहणार. त्याच्या एका आरीवर लाकडी मासा बांधलेला. ते चक्र फिरत असतांना नेम साधून त्या माशाच्या डोळ्याचा भेद करायचा.

उ:! एवढंच?

नाही! ते तर कुणीही करेल! इथे तर एकाहून एक निष्णात धनुर्धर उपस्थित होते!

अन् स्वयंवर साक्षात याज्ञसेनीचं! सर्वच प्रतिस्पर्धी इरेस पेटलेले!

पऱंतु खरी मेख पुढेच होती!!

नेम सरळ माशाकडे बघून धरायचा नव्हता. खाली भलंमोठं तसराळं पाणी भरून ठेवलं होतं. वर मासा लावलेलं चक्र फिरत असतांना खाली तसराळ्यात बघून नेम धरायचा होता अन् माशाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा होता!

इथेच सर्वांचा हिरमोड झाला होता. नीट नेम धरणारे भले भले पाण्याच्या तरंगांमुळे चक्क पराभूत झाले होते. एकेक धुरंधर हताश होऊन परतलेत.

लक्ष्यभेद करायला अर्जुन पुढे सरसावला. एक क्षण त्याने कृष्णाकडे बघितलं.

कृष्णानी खूण करून त्याला निकट बोलावलं.

सूचना केली,

“हे बघ, मन शांत ठेव.

नीट वीरासन घाल. धनुष्यावर बाण चढव, प्रत्यंचा ओढल्यावर हात स्थिर ठेव. पापणी सुध्दा लवू देऊ नकोस! नेमक्या क्षणी तीर सोड – बाकी मी पाहून घेईन.”

अर्जुन हासला.

“काय झालं? कां हसलास?”

“कृष्णा, वीरासन मी घालणार, नेम मी धरणार, तीर पण मीच सोडणार. तुला करायला बाकी उरलं काय रे?”

आता स्वत: कृष्ण हसलेत.

“पार्थ, हे सर्व तुलाच करायचंय. मी फक्त तेवढंच करणारे जे तुला नाही जमणार.”

“हु:! अन् ते काय असणारे?”

“सांगू? जमेल तुला?”

“सांग बघु…”

“त्या तसराळ्यातलं पाणी स्थीर ठेवण्याचं काम माझं”

एक क्षण विचार केल्याबरोब्बर अर्जुन शहारला! सावध झाला!

दुस-याच क्षणी डोळे मिटले. मनोमन कृष्णाला वंदन करून पण जिंकायला आत्मविश्वासाने पुढे सरसावला. पुढे काय झालं सर्वांनाच माहितीये!

हरिकृपेचा महिमाच असा असतो! त्याची सोबत होती म्हणुन पाचांच्या केसालाही धक्का लागला नाही. अन् त्याचीच सोबत नव्हती, तर शंभरातला एकही वाचला नाही…………

संकलन – मनोज लिंग्रस

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डाळ वांगं – लेखिका – सुश्री कस्तुरी ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆

? मनमंजुषेतून ?

☆ डाळ वांगं – लेखिका – सुश्री कस्तुरी ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

“उद्या डाळ वांगं खाणार का? “–हा प्रश्न किमान ५ व्यांदा आईने विचारला. मी नेहमीप्रमाणे चिडून बोलण्यापेक्षा फक्त हो म्हणणं पसंत केलं.

परवा भेंडी खाणार का हा प्रश्न सकाळी ३ एक वेळा तरी तिने विचारला त्यावर मी वसकन बोलल्यावर अर्थात वातावरण तापलं.

‘नाही रहात आमच्या लक्षात, त्यात काय एवढं ? म्हणायचं तू– खायची आहे म्हणून ‘ इतकं साधं तिचं argument होतं.

त्याच्यावरून धडा घेऊन आज प्रत्येक वेळी मी ‘ हो हो हो ‘असंच उत्तर दिलं. मग माझ्या लक्षात आलं तिला माझ्याकडून फक्त response हवा आहे. तिची बोलण्याची भूक आहे. तिला संवाद कायम सुरू रहावा असं वाटतं  पण दुर्दैवाने ते होत नाही. असं नाही की संवाद नसतो. पण बऱ्याचदा एक तर मी बाहेर असते आणि घरात आल्यावर मोबाईलमध्ये अथवा माझ्या विचारात किंवा लिखाण, डान्स, or साधना. ती तुटके दुवे सांधण्याचा प्रयत्न चालू ठेवते.

भेंडी खाणार का, डाळ करू का? भात खाणार का?भाकरी टाकू का? आज काय करणार आहे? आज कोर्टात काय आहे? डान्स क्लासला जाणार का? हे आणि असे तेच तेच  प्रश्न १०० वेळा जरी आले तरी त्याला न चुकता हो म्हणायला शिकलं पाहिजे हे मला कळून चुकलंय.

संपूर्ण आयुष्य बोलण्यात गेलेल्या मागच्या पिढीला मोबाईलमध्ये रुतून बसलेली नव्या पिढीची शांतता नाही सोसवत. ते त्रागा करत राहतात. त्यांना चीड येते. त्यांना संवाद हवा असतो.  तो unfortunately तुमच्या माझ्याकडून जास्त घडत नाही. मुद्दामून आपण करत नाही तरीही दरी पडतेच. यावर विचार झाला पाहिजे.

तुमच्या आईने, वडिलांनी एकच प्रश्न १० वेळा विचारला तरी प्लीज त्यांच्यावर वसकन बोलू नका. नाहीतर नंतर या आठवणींची  आठवण कायम आपल्याला रक्तबंबाळ करत राहील. आणि तिथे अश्रू पुसायला कोणीही येणार नाही !

ले.  कस्तुरी 

संग्राहिका : हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नासाची आर्टिमिस योजना – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆`

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ नासाची आर्टिमिस योजना – भाग-1 ☆ श्री राजीव ग पुजारी 

२९ ऑगस्ट२०२२ला आपण एका नव्या युगात प्रवेश करणार आहोत. या युगाचे नाव आहे ‘आर्टिमिस युग. 

या योजनेद्वारा १९७२ नंतर प्रथमच नासा चंद्रावर मानव उतरविणार आहे, पण यावेळी चंद्रावर मानवाचे वास्तव्य दीर्घकाळ असेल आणि चंद्रावरील वास्तव्याचा अनुभव घेऊन या योजनेतील पुढील मोहिमांमध्ये मानव मंगळावर पाऊल ठेवणार आहे. 

या योजनेची कांही उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत:

१) दीर्घकालीन अन्वेषणांसाठी लागणाऱ्या पाणी व इतरही कांही महत्वाच्या संसाधनांचा चंद्रावर शोध घेणे व त्यांचा   वापर करणे.

२) चंद्राविषयीच्या कांही न उलगडलेल्या रहस्यांचा छडा लावणे आणि आपल्या नैसर्गिक उपग्रहाविषयीच्या आणि विश्वाविषयीच्या आपल्या ज्ञानात  भर घालणे. 

३) फक्त तीन दिवसांच्या अंतरावर असलेल्या चंद्र नामक खगोलीय पिंडावर राहणे आणि वावरणे यांचा अभ्यास करणे; या अभ्यासाचा उपयोग जेव्हा मानव मंगळावर वसाहत करण्यासाठी जाईल त्यावेळी होईल. 

४) ज्या मंगळमोहिमेवर जाऊन येण्यासाठी तीन वर्षे लागतात, अशा सुदूर मोहिमांसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची चाचणी घेणे. 

वरील उद्देश साध्य करण्यासाठी नासाने “आर्टिमिस  ही दीर्घकालीन योजना आखली आहे. १९६०-७० च्या दशकांत  नासाने यशस्वीपणे राबविलेल्या चांद्रयोजनेचे नाव अपोलो होते. यावेळच्या योजनेचे नाव आर्टिमिस आहे. ग्रीक पुराणांनुसार आर्टिमिस ही अपोलोची जुळी बहीण असून तिला चंद्राची देवी म्हणून ओळखले जाते. या योजनेद्वारा नासा प्रथमच एक महिला व एक पुरुष सन २०२५ मध्ये चंद्रावर उतरविणार आहे. 

ही योजना तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. आर्टिमिस-१ ही  मानवरहित अंतराळमोहीम असून यामध्ये ओरियन हे अंतराळयान चंद्राभोवती फेरी मारून परत येईल. याद्वारे ‘स्पेस लॉन्च सिस्टिम (SLS)’ या अवाढव्य प्रक्षेपकाची प्रथमच प्रत्यक्ष अंतराळ मोहिमेसाठी चाचणी घेण्यात येईल. तसेच केवळ एकदाच अंतराळप्रवास केलेल्या ओरियन या यानाचीही चाचणी घेतली जाईल. ही मोहीम ऑगस्ट २०२२  मध्ये आखण्यात आली आहे. आर्टिमिस-२ ही स्पेस लॉन्च सिस्टिम व ओरियन अंतराळयान  यांची पहिलीच समानव अंतराळ मोहीम आहे. या मोहिमेद्वारा चार अंतराळवीरांना  ५० वर्षांनंतर प्रथमच चंद्राच्या वातावरणात पाठविण्यात येणार आहे. या मोहिमेत ओरियन यान चंद्राभोवती फेरी मारून परत येईल. ही मोहीम २०२४ मध्ये राबविण्यात येईल. पृथ्वीच्या निम्न  कक्षेपलीकडील  (Low earth orbit) अपोलो-१७ नंतरची ही पहिलीच समानव मोहीम आहे. आर्टिमिस- ३ ही समानव मोहीम असून त्याचे नियोजन २०२५ साली करण्यात आले  आहे.  या मोहिमेपूर्वी चंद्राभोवती ‘गेटवे’ नावाचे अंतरिक्ष स्थानक प्रस्थापित केले जाईल. ओरियन अंतरिक्ष यान या स्थानकाला जोडले जाईल . नंतर ‘मानव अवतरण प्रणाली (Human Landing System)’ द्वारा अंतराळवीर चंद्रावर उतरतील व चंद्राच्या पृष्ठभागावर त्यांना नेमून दिलेली कामे करतील. कामे संपल्यावर पुन्हा अंतरिक्ष स्थानकावर येऊन पृथ्वीकडे प्रयाण करतील. आता आपण या आर्टिमिस योजनेविषयी विस्ताराने माहिती घेऊ.

 प्रथम आपण आर्टिमिस योजनेच्या विविध घटकांविषयी जाणून घेऊ. या योजनेत खालील घटकांचा समावेश होतो:

१) स्पेस लॉंच सिस्टिम (Space Launch System):- स्पेस लॉंच सिस्टिम हा नासाने आजपर्यंत तयार केलेला सर्वात शक्तिशाली प्रक्षेपक आहे. हा खास करुन अमेरिकेच्या सुदूरच्या अंतराळ मोहिमांमध्ये(Deep Space Missions) वापरण्यात येणार आहे. ओरियन यान,अंतराळवीर आणि मोहिमेसाठी लागणारे सामान हे सर्व एकाच खेपेत चंद्रावर नेऊ शकेल असा हा एकमेव प्रक्षेपक आहे. याची रचना वैविध्यपूर्ण आहे. अमेरिकेच्या भविष्यातील सुदूर अंतराळ मोहिमांसाठी SLS अधिकाधिक शक्तिशाली व वेगवेगळ्या सुधारित आवृत्यांमध्ये तयार करण्यात येत आहे.पहिल्या तीन चांद्रमोहिमांसाठी ब्लॉक-१ ही आवृत्ती वापरण्यात येणार आहे. ही आवृत्ती २७ मेट्रिक टनांपेक्षा जास्त वजनाचे सामान चंद्राच्या सुदूर कक्षेमध्ये प्रक्षेपित करू शकते. या आवृत्तीत  द्रवरूप इंधन असणारी चार S-25 एंजिन्स, घन इंधन असणारे दोन अनुवर्धि प्रक्षेपक (Rocket Boosters) व अंतरिम क्रायोजिनिक प्रणोदन टप्पा ( Interim cryogenic propulsion stage-ICPS) असे भाग आहेत. SLS प्रक्षेपक व ओरियन यान यांची संयुक्त ऊंची ३२२ फूट आणि वजन ५.७५ दशलक्ष पौंड आहे. उड्डाण आणि आरोहण यांवेळी SLS ८.८ दशलक्ष पौंड एव्हढा जोर निर्माण करेल, हा जोर सॅटर्न -५ प्रक्षेपकाने निर्माण केलेल्या जोरापेक्षा १५% जास्त आहे.

२) ओरियन अंतराळयान:-ओरियन अंतराळयान नासाच्या सुदूर अंतराळ मोहिमांसाठी विकसित केले आहे. या यानामध्ये अंतराळ प्रवासादरम्यान अंतराळवीरांना अनुकूल वातावरण आहे, आणीबाणीच्या प्रसंगास तोंड देण्यासाठी ते सज्ज आहे आणि सुदूर अंतराळप्रवासाहून पृथ्वीच्या वातावरणात येताना निर्माण होणाऱ्या प्रचंड वेग आणि  उष्णतेला सक्षमपणे हाताळून सुखरूपपणे अवतरण करण्यासाठी ते सक्षम आहे.

3) एक्सप्लोरेशन ग्राऊंड सिस्टिम (EGS):- ही नासाच्या फ्लोरिडास्थित केनेडी स्पेस सेंटर मधील प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे प्रक्षेपक व अंतराळयान यांची जोडणी, वाहतूक आणि प्रक्षेपण यांना मदत केली जाते. तसेच अंतरिक्षयान परत आल्यावर अंतराळवीरांना सुखरूपपणे यानातून बाहेर काढले जाते.

क्रमशः …

© श्री राजीव  गजानन पुजारी 

फोन -9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ शालन, मालन आणि मोरू ! (भाग 2) ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

😅 शालन, मालन आणि मोरू ! (भाग 2) 😂 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

तर मंडळी, आपला मोरू पंतांचा बायकोला नवीन साडी घेण्याचा कानमंत्र घेवून, अगदी आनंदाने आपल्या खोलीकडे निघाला. त्या आनंदाच्या भरात समोरून येणाऱ्या दोन तीन चाळकऱ्यांना त्याने धडका पण दिल्या आणि त्या सगळ्यांना सॉरी म्हणत म्हणतच तो आपल्या खोलीकडे मार्गक्रमण करू लागला. कधी एकदा शालनला नवीन साडी घ्यायला जाऊया हे सांगतोय, असं त्याला होऊन गेलं होतं.

तेवढ्यात, आपल्याच विचाराच्या तंद्रित चालत असलेला मोरू आणि समोरून येणाऱ्या लेले काकूंची इतक्या जोरात धडक झाली, की काकूंच्या डोक्यावरची पाण्याची कळशी पूर्ण रिकामी होऊन, मोऱ्याला जेंव्हा नखशिखान्त अंघोळ झाली, तेंव्हा कुठे तो भानावर आला.  “मोऱ्या काय केलंस हे ?” “सॉरी काकू !” असं बोलून तो कपडे झटकत झटकत खोलीकडे जाऊ लागणार तेवढयात लेले काकूंनी त्याच्या बकोटीस धरून, “अरे लक्ष कुठे होतं तुझं? का सकाळी सकाळी श्रावणी सोमवारची भोले नाथाची भांग चढवून आलायस ?” असं रागात विचारलं. “काही तरीच काय काकू ? मी म्हटलं ना तुम्हांला सॉरी” असं म्हणून मोऱ्या परत जायला लागला तेंव्हा लेले काकू त्याला म्हणाल्या, “मोऱ्या गधडया आज श्रवणातला शेवटचा सोमवार.” “बरं मग ?” “अरे मग, काय मग ? आज माझा कडक उपवास असतो आणि मी स्वतः पाच कळशा पाणी डोक्यावर वाहून, आपल्या चाळीतल्या शंकराच्या देवळात त्या भोळ्याला स्नान घालते, गेली कित्येक वर्ष, कळलं ?” “अरे व्वा काकू, छानच करता तुम्ही हे. आता तो भोळा शंकर तुमची ही सेवा मान्य करून तुम्हांला नक्कीच प्रसन्न होऊन, एखादा चांगलासा वर देईल बघा.” असं उपरोधीक स्वरात मोऱ्या लेले काकूंना म्हणाला. पण त्याच्या असल्या बोलण्याकडे काकूंनी काणा डोळा करीत त्याला म्हटलं “अरे तो काय देईल अथवा न देईल यात मला काडीचा इंटरेस्ट नाही.” त्यांच हे बोलणं ऐकून मोऱ्या म्हणाला, “मग बरंच झालं की काकू!  माणसाने असंच निस्वार्थी मनाने आपलं कर्म करीत जावं, फळाची अपेक्षा कधी करू नये.”

काकूंच्या कळशीतल्या थंडगार पाण्यात भिजल्यामुळे मोऱ्याला आता बऱ्यापैकी थंडी वाजू लागली होती. शिवाय शालनला कधी एकदा साडी शॉपिंगची बातमी सांगतोय असं त्याला होऊन गेलं होतं. म्हणून तो धीर करून लेले काकूंना म्हणाला “बरं येतो आता काकू, आधीच उशीर झालाय.” असं म्हणून तो पुन्हा वळणार तोच लेले काकूंनी त्याची वाट परत अडवली !

“आता आणखी काय काकू ? अहो, मी आता हे ओले कपडे बदलले नाहीत ना, तर मला नक्कीच न्यूमोनिया होईल बघा !” “मोऱ्या मला सांग, अंघोळ करतोस तू ?” “म्हणजे काय काकू, रोजच करतो मी अंघोळ.” “मी रोजच विचारत नाहीये, आज केलीस कां अंघोळ ?” असं जरा काकूंनी आवाज चढवून विचारल्यावर मजल्यावरचे शेजारी पाजारी काकूंचा तो सुपरिचित आवाज ऐकून त्या दोघां भोवती लगेच गोळा झाले. चाळकरी गोळा झालेले बघून, नाही म्हटलं तरी मोऱ्या थोडा घाबरला. या चाळकऱ्यांना सक्काळी सक्काळी घरातली कामं नसतात कां ? असा सुद्धा एक प्रश्न त्याच्या मनांत डोकावून गेला. पण तो प्रश्न त्याने लगेच झटकून, आता लेले काकूंच्या तावडीतून आपली लवकरात लवकर सुटका करून घेण्यासाठी, त्याने परत सॉरी म्हणण्यासाठी तोंड उघडले, पण त्याला पुढे बोलू न देता लेले काकू कडाडल्या “मोऱ्या काय विचारत्ये मी ? अरे आज अंघोळ केल्येस कां नाही ?” “नाही काकू, अजून माझी अंघोळ व्हायची आहे. त्याच काय झालं, आपल्या पिकनिक…” त्याला मधेच तोडत लेले काकू म्हणाल्या “मग बरंच झालं !” लेले काकूंच ते बोलणं ऐकून मोऱ्या आश्चर्याने म्हणाला, “काय बरं काय झालं काकू ?”  “अरे तू अजून अंघोळ केली नाहीस ते बरंच झालं असं म्हणत्ये मी !” “कां काकू ?” त्यावर लेले काकू मोऱ्याला समजावणीच्या सुरात म्हणाल्या “मोऱ्या माझ्या डोक्यावरची कळशी तुझ्या डोक्यावर पूर्ण रिकामी झाल्यामुळे आता तुझी अंघोळ झाल्यातच जमा आहे. तेंव्हा आता एक काम कर.” लेले काकूंच्या तोंडातून ‘एक काम कर’ हे शब्द ऐकून मोऱ्याचा चेहरा पडला. त्याने नाईलाजाने काकूंना विचारलं  “कसलं काम काकू ?” “आता या ओल्या कपड्यानिशी मला एक एक करून  नळावरून पाच कळशा पाणी आणून दे, भोळ्या शंकराच्या अभिषेकसाठी. मी तुझी खाली देवळाजवळ वाट बघत्ये, जा पळ लवकर !” असं बोलून मोऱ्याला तोंडातून एक अवाक्षर सुद्धा काढायची संधी न देता, लेले काकूंनी खाली पडलेली आपली कळशी मोऱ्याच्या हातात जबरदस्तीने ठेवली आणि त्या मागे वळून न बघता जिन्याच्या पायऱ्या उतरून तरातरा जाऊ लागल्या.

लेले काकूंच्या या वागण्याचा मोऱ्याला इतका राग आला, पण त्याचा नाईलाज होता. चूक त्याचीच होती. त्याने आजूबाजूला हसणाऱ्या चाळकऱ्यांकडे एकदा रागाने पाहिले आणि तो हातातली कळशी घेवून गपचूप पाणी आणण्यासाठी वळला.

काकूंच्या या पाच कळशा पाणी पाहोचविण्याच्या कामात अडकल्यामुळे आणि नळावर पाणी भरण्यासाठी गर्दी असल्यामुळे, मोऱ्याचे आणखी पुढचे दोन तास खर्ची पडले.  एकदाची मोऱ्याची ती कामगिरी फत्ते झाल्यावर, दमला भागला मोरू आपल्या खोलीकडे वळला आणि खोलीत शिरता शिरता आनंदाने म्हणाला, “अगं ऐकलंस का शालन, आज संध्याकाळी की नाही आपण दोघं….” आणि पुढचे शब्द त्याच्या तोंडातून बाहेरच आले नाहीत मंडळी. तो घरात शिरला आणि त्याच लक्ष चहा पीत खुर्चीवर बसलेल्या एका तरुणीकडे गेलं. शालन तिच्या बाजूला उभी होती आणि त्या दोघींच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. त्यानं त्या तरुणीला या आधी कधीच पाहिलं नव्हतं, म्हणून त्याने आत येत येत शालनला विचारलं “या कोण शालन ?” “अहो ही माझी शाळेतली मैत्रीण मालन !” असं म्हणून शालन आणि मालन दोघीही हसायला लागल्या. पण शालनच्या तोंडातून ‘मालन’ हे नांव ऐकल्या ऐकल्या मोऱ्याच अवसान पार गळालं.  त्यावर शालन त्याला म्हणते कशी “अहो पंतांनी माझ्या आणि हिच्या नावाची केलेली गफलत परवा बोलता बोलता मी सहज मालनला सांगितली आणि….” शालनला पुढे बोलू न देता मालन मोऱ्याला म्हणाली “अहो भावजी, पंतांच्या या गफलतिचा फायदा घेवून मीच शालनला म्हटलं, आपण जरा भावजींची गंम्मत करू या का ?” “आणि मी सुद्धा या गोष्टीला तयार झाले आणि तुमची जरा…..” आता शालनला थांबवत मोऱ्या म्हणाला, “काय मस्त ऍक्टिंग केलीस गं तू शालन.  मला पिकनिकला जायला आत्ताच्या आत्ता १,५००/- रुपये द्या नाहीतर घटस्फोट द्या. मला अजिबातच संशय आला नाही तुझा, तू ऍक्टिंग करत्येस म्हणून ! बरं पण तुम्ही दोघी मैत्रिणी बसा गप्पा मारत, मी आलोच अंघोळ करून.” असं म्हणून मोऱ्या आत वळला आणि खो खो करून हसतच सुटला.

मंडळी, आता तुम्ही म्हणाल यात मोऱ्याला खो खो हसण्यासारखं काय झालं असेल ? तर त्याच उत्तर असं आहे, की शालन आणि मालनच्या या गंम्मतीच गुपित त्याला आता कळल्यामुळे, तो शालनला घेणार असलेल्या नवीन साडीचे दोन तीन हजार वाचले नाही का ? अहो, तुम्ही पण मोऱ्याच्या जागी असतात तर असेच खूष होऊन हसला असतात नां ? मग !

© प्रमोद वामन वर्तक

२६-०८-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्मृतीगंध…लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ स्मृतीगंध… लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

मला आठवतंय,…

खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो ! 

सगळंच स्वस्त होतं तेव्हा, बालपण सुद्धा !– भरपूर उपभोगलं त्यामुळे. उन्हापावसात, मातीत, दगडात, घराच्या अंगणात, गावाबाहेरच्या मैदानात… कुठेही गेलं तरी बालपणाची हरित तृणांची मखमल सर्वत्र पसरलेली असायची…

आता तसं नाही……. लहानपणीच खूप मोठी होतात मुलं ! — खूप महाग झालंय बालपण !

पूर्वी आईसुद्धा खूप स्वस्त होती. —-फुल टाईम ‘आईच’ असायची तेव्हा ती !

आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री कुशीत घेऊन झोपवण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची.

आता ‘मम्मी’ थोडी महाग झालीय —-जॉबला जाते ती हल्ली. फक्त संडेलाच अव्हेलेबल असते ! 

मामाचे गाव तर राहिलंच नाही ….मामाने सर्वाना मामाच बनवलं ….प्रेमळ मामा आणि मामी आता राहिलेच नाहीत पूर्वीसारखे….आधी मामा भाच्यांची वाट पहायचे ….आता सर्वाना कोणी नकोसे झालेत …..हा परिस्थितीचा दोष आहे …

मित्र सुद्धा खूप स्वस्त होते तेव्हा ! हाताची दोन बोटं त्याच्या बोटांवर टेकवून नुसतं बट्टी म्हटलं की कायमची दोस्ती होऊन जायची. शाळेच्या चड्डीत खोचलेला पांढरा सदरा बाहेर काढून त्यात ऑरेंज गोळी गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्टी ! 

आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते —–” डोन्ट शेअर युअर टिफिन हं !”— मैत्री बरीच महाग झालीय आता. 

हेल्थला आरोग्य म्हणण्याचे दिवस होते ते ! सायकलचा फाटका टायर आणि बांबूची हातभर काठी एवढ्या भांडवलावर अख्ख्या गावाला धावत फेरी घालताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होत होती. 

घट्ट कापडी बॉलने आप्पाधाप्पी खेळताना पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशीही परिस्थिती आली तरी कधी वाकली नाही ही पाठ ! इम्युनिटी बूस्टर औषधं हल्ली खूपच महाग झालीत म्हणे !

ज्ञान, शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतं—– फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावलं की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं निम्म्या किंमतीत मिळून जायची. वह्यांची उरलेली कोरी पानं काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची. 

आता मात्र पाटीची जागा टॅबने घेतलीय – ऑनलाईन शिक्षणही परवडत नाही आज !

एवढंच काय, तेव्हाचे आमचे संसार सुद्धा किती स्वस्तात पार पडले. शंभर रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनघोर व्हायचो. सकाळी फोडणीचाभात किंवा पोळी आणि मस्त चहा असा नाष्टा करून ऑफिसमध्ये जायचं, जेवणाच्या सुट्टीत (तेव्हा लंच ब्रेक नव्हता) डब्यातली भेंडी/बटाटा/गवारीची कोरडी भाजी, पोळी आणि फार तर एक लोणच्याची फोड ! रात्री गरम खिचडी, की झाला संसार— ना बायको कधी काही मागायची ना पोरं तोंड उघडायची हिंमत करायची. 

आज सगळंच विचित्र दिसतंय भोवतीनं ! 

Live-in पासून ते Divorce, Suicide पर्यंत बातम्या बघतोय– मुलं बोर्डिंगमधेच वाढतायत— सगळं जगणंच महाग झालेलं ! 

कालपरवापर्यंत मरण तरी स्वस्त होतं. पण आता तेही आठ दहा लाखांचं बिल झाल्याशिवाय येईनासं झालंय.

——म्हणून म्हणतोय आहोत तोवर आठवत रहायचं. नाहीतर आठवणीत ठेवायलाही कोणी नसणार, ही जाणीव पण झाली तर रडत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल……म्हणून जमेल तेवढे नातेवाईक किंवा मित्र गोळा करून ठेवा ….आणि हो — फक्त आपली जीभ हीच माणसे जोडू शकते हे ही लक्षात ठेवा …….. 

नाहीतरी ह्या स्मृतीगंधाशिवाय आहे काय आपल्याजवळ !

नवीन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती – श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares