मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सखी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

☆ सखी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

‘पुन्हा कधी भेटशील गं? नक्की ये, खूप कंटाळा येतोय गं हॉस्पिटलमध्ये !’ हेच तिचं माझ्याशी शेवटचं बोलणं ठरलं! माझी जिवाभावाची मैत्रीण, कॉलेजमध्ये एकत्र एका डिपार्टमेंटला शिकलो. अतिशय हळुवार, कवी मनाची होती ती!

माझं एम ए पूर्ण झाल्यावर  लगेचच माझे लग्न झाले आणि मी संसारात गुरफटले ! एम ए पूर्ण करून ती तिच्या गावी एका कॉलेजला प्राध्यापिका म्हणून नोकरीला लागली . ती कॉलेजमध्ये आणि मी माझ्या संसारात रमून गेले. दिवस पळत होते. प्रत्येक जण आपापल्या विश्वात बिझी होतो. प्रथम काही काळ पत्रव्यवहार होई. हळूहळू त्याचाही वेग मंदावला.तेव्हा फोन फारसे कुठे नव्हते आणि मोबाईल तर नव्हताच! तिचे लेख, कविता वाचायला मिळतं. त्यातून तिचे निराश, दु:खी मन प्रकट होई. तिच्या मनात काहीतरी खोलवर दुःख होतं ते जाणवत राही! पण त्यावर फारसे कधी बोलणे झालेच नाही !

अशीच वर्षे जात होती. अधून मधून भेटी होत असत. ती साहित्य संमेलनं, वाड्मय चर्चा मंडळ, कॉलेजचे इतर कार्यक्रम यात गुंतलेली होती, तर मी संसारात मिस्टरांच्या बदली निमित्ताने वेगवेगळ्या गावी फिरत होते. परत पाच सहा वर्षानंतर आम्ही आमच्या मूळ गावी परत आलो. यांची नोकरीही तिथेच स्थिरावली. घर बांधलं. मुलगी मोठी झाली आणि अचानकपणे मुलीच्या गायन स्पर्धा निमित्ताने सखीच्या गावी जाणे झाले.  त्यादिवशी गायन स्पर्धेपेक्षा मला जिची ओढ होती ती सखी नेमकी परगावी गेली होती.

त्यानंतरच्या बातम्या ज्या कळल्या त्या फारशा चांगल्या नव्हत्या. तिला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला होता. आणि एका ब्रेस्टचे ऑपरेशनही झाले. या सगळ्यावर मात करून तिचे आयुष्य पुढे चालले होते. युनिव्हर्सिटीतील  प्रोफेसर वर्गाशी तिचा चांगला संपर्क होता. लेखनामुळे चांगली प्रसिद्धी मिळाली होती. अशाच एका कार्यक्रमासाठी ती आमच्या गावात आली असता माझी तिची भेट झाली. तिलाही खूप आनंद झाला. मी तिला घरी बोलावले, त्याप्रमाणे ती घरी आली. खूप आनंद झाला मला ! ‘काय देऊ भेट तुला मी?’ प्रथमच भेटतेस इतक्या वर्षांनी ! डोळ्यात टचकन पाणी आले तिच्या ! ‘ माझं काय गं, किती आयुष्य आहे देव जाणे! आपण भेटलो हीच मोठी भेट !’असं म्हणून रडली.  तेव्हा मी तिला ड्रेसवर घालायचे जॅकीट दिले. ती खुश झाली.

एक दिवस अचानक तिचा कोणाबरोबर तरी दिलेला निरोप मला मिळाला. निरोप होता की, ‘ मी  हॉस्पिटल मध्ये आहे, मला भेटून जा.’ मी तेव्हा मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होते, तरीपण एक दिवस दुपारच्या वेळात आम्ही दवाखान्यात गेलो. आजारपणामुळे ती खूप थकली होती. कॅन्सरने पुन्हा आपले अस्तित्व दाखवले होते. अगदी बघवत नव्हते  तिच्याकडे! त्यातूनही हसून तिने मला जवळ बोलावले. तिच्या कवितांचे पुस्तक माझ्यासाठी तिने आणून ठेवले होते. त्या हळव्या कविता वाचून मन आणखीच दुःखी झालं ! तिथून पाय निघत नव्हता. ‘ पुन्हा वेळ काढून नक्की 

येते ‘ असं तिला म्हंटलं खरं, पण मला पुन्हा लग्नाच्या गडबडीत जायला झाले नाही. साधारण महिन्याभरातच ती गेल्याचे कळले. खूप खूप हळहळ वाटली. आपण तिला परत नाही भेटू शकलो, ही रुखरुख कायम मनाशी राहिली. तेव्हापासून मनाशी ठरवलं की, अशा भेटी पुढे ढकलायच्या नाहीत. त्या आवर्जून वेळेत करायच्या ! तिच्या ‘सारंगा तेरी याद में….’ गाण्याचे स्वर ते गाणं लागलं की अजूनही कानात घुमत राहतात !  सखीची बाॅबकट केलेली, काळीसावळी, हसतमुख मूर्ती डोळ्यासमोर येते. काळाने हे सुकुमार पुष्प आपल्यातून फार लवकर खुडून नेले, नाहीतर तिच्याकडून आणखी खूप काही चांगले लेखन आपल्याला मिळाले असते. तिच्या दु:खासह ती अकाली गेली. पण अजूनही जून महिन्याच्या दरम्यान ती गेली ही आठवण मनात रहाते .वीस वर्ष झाली. आठवणींच्या माळेतील हा सुंदर मणी आज गुंफला गेला !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “तिनं काय करायचं?” ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ “तिनं काय करायचं?” ☆ सौ. अमृता देशपांडे 

तिचा स्वभाव मुळातच थोडा अस्थिर. बहिणी ,भाऊ आणि  आई यांच्या नजरेत आणि प्रेमात मोठं झालं हे शेवटचं अपत्य.

लग्न करुन दिलेला परिवार ही  मोठाच. कोल्हापूर जवळचं खेडेगाव. ही घरची सर्वात मोठी सून. मिस्टरांचे नोकरी निमित्ताने मुंबईत वास्तव्य. त्यांचा स्वभाव ” संत माणूस “. आपलं काम, अणि योगी, ऋषी,  संत, अध्यात्म यात सदैव मग्न.

लग्नानंतर ती पण मुंबईत गेली. आर्थिक परिस्थिती त्यावेळी 40 -43 वर्षापूर्वी सर्वांचीच जेमतेम. तिने मशीन वर शिलाई करुन, साड्या फॉल पिको करुन आर्थिक बाजू आपल्या परीने उचलून धरली. मुंबई सारख्या

मायापूरीत छोटेसे घर घेणे शक्य करुन दाखवले.पुढे तर एकावर एक 1 +2 इमले उभे केले.दोन मुले मोठी झाली.उच्च शिक्षित झाली.यथावकाश लग्ने झाली. दोघानाही 2-2 मुले झाली. तिचे मिस्टर 60 व्या वर्षी निवृत्त झाले. मुले, सुना, नोकरी करणा-या . नातवंडे आज्जीजवळ. आज्जी निगुतिनं सगळं करत होती. दोन्ही मुलांनी आपले संसार थाटले. हिचं स्वयंपाकघर मोठ्या सुनेनं ताब्यात घेतलं. धाकट्यानं  जवळच घर घेतलं. आज्जिची विभागणी झाली. तिनं ही साठी ओलांडलीच की. शरीर आणि मन यांची सांगड घालताना तिची

घालमेल होऊ लागली आणि इथेच तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं. आता तिचा कामा पुरताच उपयोग राहिला. काम होत नाही तर सहवास ही नकोसा झाला होता.

त्यातच गावाकडे तिचे सासरे निवर्तले. खेडेगाव च्या पद्धतीप्रमाणे सासुबाईचे लेणे काढण्यात आले.हिला त्यांचे  भुंडे हात बघवले नाहीत. पठ्ठीन आपल्या हातातल्या पाटल्या ( ज्या तिच्या  आईन तिला लग्नात घातल्या होत्या) सासूच्या हातात चढवल्या.

🤦🏻‍♀️ हे कळताच नवरा, मुले, सुना तिच्यावर इतक्या नाराज झाल्या की तिच्याशी बोलणेच बंद केले. मोबाइल चालू ठेवायला ही पैसे देत नाहीत.

आता ना तिच्या हातात पैसा, ना कुणाचा शब्द!

आयुष्यभर तिने पार पाडलेल्या जबाबदा-या, खस्ता, कष्ट, पतीला दिलेली साथ, प्रेमाने एकत्र बांधून ठेवलेला परिवार, सुनाना वेळोवेळी  केलेली मदत, नातवंडांचं प्रेम हे सगळं इतक्या सहजतेनं संपतं?

काय चुकलं तिचं?

काय करायचं तिनं?

ती साधी?

ती भोळी?

ती बावळट?

की ती खुळी?

 

मला तरी या प्रश्नांनी  भंडावून सोडलय…..

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शोध आनंदाचा…भाग – 3 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆

सुश्री शुभदा जोशी

? मनमंजुषेतून ?

 ☆ शोध आनंदाचा…भाग – 3 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆ 

आनंद म्हणजे झुळूक! सहज अलगद स्पर्शून जातो पण पकडून ठेवता येत नाही मुठीत! काही क्षणच किंचित बरं वाटतं… आणि भुर्रकन उडून जातो तो. पुन्हा आपलं जैसे थे! 

कशामुळे सुखावते मी? सगळ्यात जास्त वेळा… कुणी माझ्याबद्दल चांगलं  बोललं की… तोंड देखली स्तुती किंवा भारावून जाऊन केलेली स्तुती समजते, त्याबद्दल नाही बोलत मी पण माझ्या प्रयत्नांचे आवर्जून कुणीतरी कौतुक केले, खरंतर दखल घेतली गेली माझ्या असण्याची, कामाची की बरं वाटतं. 

त्यातही हे कौतुक किती मनापासून आहे, कितपत  खरं आहे, नेमकं आहे का अशा अनेक बाबींवर त्या आनंदाची तीव्रता अवलंबून असते.

याचा अर्थ इतरांवर अवलंबून आहे का माझा आनंद? माझ्या हातात नाही का? नाही नाही अगदी असं नाही म्हणता येणार! त्या वेळची माझी मनस्थितीदेखील पूरक असायला हवी ना? तर घेता येईल मला ते कौतुक! पण काहीही म्हणा, appreciation हा बऱ्यापैकी खात्रीचा मार्ग आनंदापर्यंत पोचण्याचा हे मात्र मानावे लागेल. 

अनेकदा सोशल मेडियामध्ये मी तुम्हाला चांगले म्हणते, तुम्ही मला म्हणा असा खेळ चाललेला जाणवतो. हे म्हणजे ‘fishing for the compliments’ झाले.

असला ओढून ताणून आनंद नको बाबा आपल्याला!

माझ्या मनात जर सभोवतालच्या लोकांबद्दल प्रेमाची आणि आस्थेची ज्योत तेवत असेल तर आपसूकच माझ्या असण्यातून, वागण्यातून आनंदाची सुखद झुळूक लोकांना अनुभवायला मिळते नि साहजिकच ती परतून माझ्यापर्यंतही पोचते. खरंतर ती आपली आपल्याला देखील जाणवत रहाते…   

हृदयातली प्रेमाची ज्योत जेव्हा अलगद सुलगते…त्यात कोणतीही अपेक्षा नसते, संपूर्ण स्वीकार असतो, आपलं मानलेलं असते. कुणासाठी तरी खूप आस्था, प्रेम वाटतं, काही तरी करावसं वाटतं… अगदी स्वतः त्रास सोसून देखील… ही भावना किती सुरेल असते! 

मनातल्या अस्वस्थतेला, असाहायतेला, निराशेला पार करण्याचं बळ लाभतं त्यातून… मात्र तिथवर  पोचण्यात किती अडचणी? निखळ प्रेम आणि स्वीकार येतच नाही अनुभवाला. किती तरी ‘पण…’ असतात मध्ये. तक्रारी, जुने अपेक्षाभंग, आरोप अशा अनेक गोष्टी त्या प्रेमाच्या ज्योतीला जीवच धरू देत नाहीत. त्यासाठी भूतकाळात त्या त्या क्षणात शिरून गोष्टी resolve कराव्या लागतात, पाहिल्यांदा स्वतःच्या मनात आणि नंतर त्या व्यक्तीपर्यंत पोचून देखील! आपला दृष्टिकोन बदलला असेल तर सकारात्मक प्रतिसाद निश्चित मिळणार… 

अगदी जवळच्या आणि प्राथमिक – जैविक नात्यातल्या माणसांबरोबर जगताना आजवर झालेल्या जखमा, ओरखडे आपण जर वागवत राहिलो बरोबर तर ते नाते आणखी आणखी कडवट बनत जाते. ते नाते heal व्हायला हवे तर त्यासाठी जखमा बऱ्या व्हायला हव्यात. ही वाट चालून जाण्यासाठी आपल्याला उर्मी आणि बळ लाभो.

©  सुश्री शुभदा जोशी  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समिधा..!! ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ समिधा..!! 🔥 ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एका वळणावर दोन गुरुजी स्कूटरवरून माझ्या शेजारून गेले. तर… त्यातले एक गुरुजी दुसऱ्या गुरुजींना म्हणत होते, “अरे समिधांची काय एव्हढी काळजी करतोस? त्यांचं काम फक्त अग्नीला अर्पण केलेल्या वस्तू अग्नीपर्यंत पोचवायचं…!”

बस्स एवढंच? 

ह्या पलीकडे त्या ‘समिधां’च्या जळून जाण्याला काहीच महत्व नाही ? 

खरं तर ह्या अशा अनेक ‘समिधा’ आहेत ज्यांनी मूकपणे जळून जाऊन अनेक यज्ञ यशस्वी केलेत —-!

विचारांच्या वावटळीवर स्वार होऊन मन प्रवासाला निघालं—-

पहिलीच आठवली ती उर्मिला. 

लक्ष्मण तर गेला निघून भावामागून चौदा वर्षं वनवासाला… रामसीतेच्या बरोबरीनं लक्ष्मणाचं कौतुक झालं, भरताचंही झालं—- पण अयोध्येत राहूनसुद्धा चौदा वर्षं वनवास, तोही एकटीनं भोगणाऱ्या, उर्मिलेच्या आयुष्याच्या आहुतीची दखल वाल्मीकींनीही घेतली नाही—-मला नेहमी वाटतं की त्या उर्मिलेला कुणीतरी बोलतं करायला हवं. रामराज्याच्या आदर्शवादी यज्ञात ह्या एका ‘समिधेची आहुती अशीच पडून गेली.

मग आठवतात त्या… काशीबाई, सकवारबाई आणि इतर तिघी—शिवाजी महाराजांच्या आठ राण्यांपैकी तीन—

सईबाई, सोयराबाई व पुतळाबाई या आपल्याला माहीत असतात. त्यांच्याबद्दलच्या खऱ्याखोट्या गोष्टीही 

आपण ऐकलेल्या असतात—पण बाकीच्या पाच…? केवळ राजकीय कारणासाठी जिजाबाईंनी ह्या पाचजणींबरोबर महाराजांचा विवाह लावला. पण नंतर? —-‘अफझलखान येतोय,’ म्हटल्यावर ह्या पाचजणींना चिंता वाटली नसेल? आपला नवरा औरंगजेबाच्या कैदेत अडकलाय म्हटल्यावर यांचाही जीव सैरभैर झाला नसेल ? निश्चितच झाला असणार ! पण स्वराज्याच्या यज्ञात ह्या पाच ‘समिधा’ तशाच जळून गेल्या!

बहुतेक सर्व ‘समिधा’ या  स्त्रियाच ! —-

 कारण हे निमूटपणे जळून जाणं त्यांच्या अंगवळणीच पडलेलं असतं जणू! 

गोपाळराव जोशांसारखा एखादा अपवाद की आपल्या पत्नीला- आनंदीबाईला

डॉक्टर करण्यासाठी स्वतः ‘समिधा’ झाला !

काही थोड्याफार ‘समिधा, कस्तुरबा म्हणा, सावित्रीबाई फुले म्हणा—

स्वकर्तृत्वाने उजळूनही गेल्या ! पण बाकीच्या…?

टिळकांनी, सावरकरांनी मांडलेल्या स्वराज्याच्या यज्ञात पहिली आहुती सौ. टिळकांची व सौ. सावरकरांची पडली. 

या आणि अशा अनेक…!!!

विचारांच्या चक्रात घरी आलो. आमच्या घरच्या ‘समिधे’नं दार उघडलं. 

मुलाचा अभ्यास आणि नवऱ्याचं करीअर यासाठी स्वतःचं आयुष्य पूर्णपणे झोकून देणाऱ्या त्या ‘समिधे’ला पाहून 

मला एकदम भरून आलं!

घरोघरी अशा ‘समिधा’ रोज आहुती देत असतात. घर उभं करत असतात, सावरत असतात. माझं घरही याला काही अपवाद नाही.

मात्र यापुढे या ‘समिधां’ची आहुती दुर्लक्षित जाऊ न देणं गरजेचं आहे !

या नव्या कठीण काळात, सर्व आव्हानांना भिडण्याची तयारी करतांना, जी आनंदाने स्वतःची आहुती देऊन 

आपल्याला ऊर्जा देणार आहे, त्या आपल्या प्रत्येकाच्या घरच्या ‘समिधे’ला… मनापासून नमस्कार..

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आवरा ही प्रदर्शने… ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

? मनमंजुषेतून ?

☆ आवरा ही प्रदर्शने… ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

खरं तर, कार्यक्रम, सभा, संमेलने या खेरीज ध्वनिप्रदूषण करणा-या कर्णे, भोंगे आदि गोष्टींचा वापर सगळ्यांनीच शहाणपणाने टाळायला हवा. आरत्या, नमाज, बांग हे ईशस्तवन असेल, तर ते ठाणठाण बोंबलल्याशिवाय देवाला कळत नाही, असा गैरसमज आहे का? की, आपली भक्ति ही प्रदर्शनाची बाब आहे, असा समज आहे?                                               

मला दुसरी शक्यता जास्त बरोबर वाटते. ही सगळी प्रदर्शने ओंगळ व्हायला लागली आहेत आणि धूर्त राजकारण्यांची शक्ति-प्रदर्शने ठरू लागली आहेत. गोंगाट, गलका हे किती त्रासदायक होतात, हे एखाद्या शांत, निरव ठिकाणी जाऊन आल्यावर कळतं. सांगीतिक श्रेणीतील किती तरी नादमधुर आवाजांना आपण मुकतो – पक्ष्यांच्या शीळा, झाडांची सळसळ, ही तर उदाहरणे आहेतच, पण वा-याच्या झुळकेला किंवा झोतालाही नाद असतो, समुद्राची गाजेची रात्रीची जाणीव थरारक असते, रातकिड्यांची किरकिर, बेडकांचं डरांव डरांव हे रात्रीच्या झोपेसाठी पार्श्वसंगीताचं काम करतं. निसर्गाची चाहूल असते ती. हे सगळं आपण गोंगाटांत हरवून चाललो आहोत, असं नाही का वाटत?                                               

मला आठवतंय ->                                                          

मी अगदी पाऊल न वाजवता पाळण्याशी जाऊन उभी राहिले तरी माझ्या दिशेला वळलेले तान्हुल्याचे डोळे!

लोणावळ्याला रायवुड पार्क हा जंगलसदृश भाग होता. त्या दिशेने जात असतांना दिवसाउजेडी तिथं रातकिड्यांची चाललेली सामूहिक कर्कश्श किरकिर – त्या झाडांच्या समूहाच्या मध्यभागी जाऊन उभं राहिल्यावर क्षणांत थांबली. आपला श्वास आपल्याला ऐकू येईल, इतकी शांतता क्षणात पसरली. असं वाटत होतं की लक्षावधी अदृश्य डोळे आपला वेध घेताहेत, आपल्याला जाणून घेताहेत. तो परिसर सोडला मात्र, ताबडतोब त्यांचं समूहगान सुरू झालं.                                                                               

झाडावर खारीचं कर्कश्श चिरकणं सुरू झालं की समजायचं, आपली मांजर घराकडे यायला निघालीय.

लिलीचं फूल उमलतांना अतिकोमल असा फट् आवाज करतं आणि सगळ्या पाकळ्या बाहेर फेकल्यासारख्या एकदम  उलगडतात.                                          

परदेशांत जन्मलेल्या आणि वाढलेल्या आपल्या भारतीय मुलांचे इथं – भारतात पाय ठेवताक्षणी इथल्या असह्य आवाजांनी गांगरलेले चेहरे, झाकून घेतलेले कान, हे न सांगता काही सुचवत असतं, जे आपल्याला ऐकू येत नाही, समजत नाही.                                                                                      

मोठमोठ्या आवाजातील बोलणं, गाड्यांचे कर्णकटु भोंगे, दुचाक्यांचे फर्रर्र आवाज, गजबज ह्या अनैसर्गिक – मानवनिर्मित प्रदूषणात आता भर पडली आहे ही या डीजे, डॉल्बीवर वाजणा-या ठणाण गाण्यांची ! आश्चर्य वाटतं, हे सगळं चवीने उपभोगणा-यांचे!                                                                                                                     

सगळेच काही जंगलात वा हिमालयात जाऊ शकत नाहीत. गंमत म्हणजे तिथला निसर्गही आता या ध्वनिप्रदूषणापासून स्वतःला वाचवू शकत नाही. बहिरं असण्याचं दुःख मला माहीत आहे, पण आता बहिरं होण्यात आनंद शोधावा लागेल का?  ——

© सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 22 – मठातली साधना ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 22 – मठातली साधना ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

वराहनगर मठात श्री रामकृष्ण संघाचं काम सर्व शिष्य नरेंद्रनाथांच्या मार्गदर्शनाखाली करत होते. उत्तर भारतातले आखाड्यातले साधू बैरागी, वैष्णव पंथातले साधू समाजाला परिचित होते. पण शंकराचार्यांच्या परंपरेतल्या संन्याशांची फार माहिती नव्हती. त्यामुळे वराहनगर मठातल्या तरुण संन्याशांबद्दल समाजाची उपेक्षित वृत्ती होती. चांगले शिकले सवरलेले असून सुद्धा काही उद्योगधंदा न करता, संन्यास घेऊन हे तरुण लौकिक उन्नतीचा मार्ग दूर ठेवत आहेत, हे पाहून लोक खेद करत, उपेक्षा करत, कधी अपमान करत. तिरस्कार करत. कधी कधी कणव येई, तर कधी टिंगल होई.

पण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काही करायचे म्हणजे असेच सर्व गोष्टींना सामोरे जावे लागते. समाजाने स्वीकारे पर्यन्त, बदल होण्याची वाट बघत हळूहळू पुढे जावे लागते. तसे सर्व शिष्यांमधे हा वाट पाहण्याचा संयम होता. दूरदर्शीपणा होता. कारण तसे ध्येय ठरवूनच त्यांनी घरादारचा त्याग केला होता आणि संन्यस्त वृत्ती स्वीकारली होती. हे तरुण यात्रिक अध्यात्म मार्गावरचे एकेक पाऊल पुढे टाकत चालले होते. भारताच्या आध्यात्मिक जीवनात संन्यस्त जीवनाचा सामूहिक प्रयोग नवा होता.

“आपल्याला सार्‍या मानवजातीला आध्यात्मिक प्रेरणा द्यायची आहे, तेंव्हा आपला भर तत्वांचा, मूल्यांचा,आणि विचारांचा प्रसार करण्यावर हवा. संन्यास घेतलेल्यांनी किरकोळ कर्मकांडात गुंतू  नये”. असे मत नरेंद्रनाथांचे होते. या मठातलं जीवन, साधनेला वाहिलेलं होतं.

शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास, संस्कृत ग्रंथ व धर्म आणि अध्यात्म संबंधित ग्रंथांचे वाचन होत असे. हिंदूधर्म याबरोबर ख्रिस्तधर्म आणि बुद्धधर्म यांचाही अभ्यास केला जात होता. या धर्मांचा तुलनात्मक अभ्यास व्हायचा. इथे धर्मभेदाला पहिल्यापासूनच थारा नव्हता असे दिसते. शंकराचार्य आणि कांट यांच्या तत्वज्ञानाचा तौलनिक अभ्यास पण इथे होत होता. हे सर्व अनुभवास आल्यानंतर जाणकारांची उपेक्षा जरा कमी झाली आणि जिज्ञासा वाढली.

कधी ख्रिस्त धर्माचे प्रचारक मिशनरी येत त्यांच्या बरोबर चर्चेत हिंदू धर्माच्या तुलनेत ख्रिस्त धर्म कसा उणा आहे ते चातुर्याने आणि प्रभावी युक्तिवादाने नरेंद्र पटवून देत असत. ख्रिस्ताचे खरे मोठेपण कशात आहे तेही समजाऊन सांगत. हे विवेचन ऐकून धर्मोपदेशक सुद्धा थक्क होऊन जात.

हिंदू धर्मातील इतर पंथांचाही इथे अभ्यास चाले. तत्वज्ञानाच्या आधुनिक विचारवंतांनाही इथे स्थान होते. जडवादी आणि निरीश्वरवादी विचारसरणीचा परिचय करून घेतला जात होता. फ्रेंच राज्यक्रांतीचं महत्व सुद्धा नरेंद्रनाथ समजाऊन सांगत असत. साधनेच्या जोडीला अभ्यास हे वराहनगरच्या मठाचं वैशिष्ठ्य होतं. श्री रामकृष्ण यांच्या गृहस्थाश्रमी शिष्यांना एकत्र यायला हा मठ एक स्थान झालं होत. हळूहळू लोकांच्या मनातील दुरावा कमी झाला होता.

तीर्थयात्रा ही आपली पूर्वापार चालत आलेली परंपरा आणि धार्मिक जीवनाचा एक भाग पण. शिवाय श्रीरामकृष्ण यांनीही एकदा संगितले होते, की, “संन्याशाने एका जागी स्थिर राहू नये. वाहते पाणी जसे स्वच्छ राहते, तसे फिरत राहणारा संन्यासी आध्यात्मिक दृष्ट्या स्थिर आणि निर्मळ राहतो”.

या मठातील गुरुबंधूंना तीर्थयात्रेची उर्मी येत असे. त्याप्रमाणे नरेंद्रनाथांना पण एका क्षणी वाटले की, आपणच नाही तर सर्व गुरुबंधूंनी पण परिभ्रमण करावे. अनुभव घ्यावेत, त्यातून शिकावे. त्यामुळे प्रत्येकाच्या आंतरिक शक्तींचा विकास होईल. वराहनगर मठ हा एक मध्यवर्ती केंद्र म्हणून असेल, कोणी कुठे ही गेलं तरी सर्वांनी या केंद्राशी संपर्कात राहावं. शशी यांनी हा मठ सांभाळण्याची जबाबदारी घेतली. दोन वर्षानी १८८८ मध्ये नरेंद्रने वराहनगर मठ अर्थात कलकत्ता सोडले आणि त्यांच्या परिव्राजक पर्वाचा प्रारंभ झाला.

सुरूवातीला ते वाराणशीला आले. प्रवासात ते आपली ओळख फक्त एक संन्यासी म्हणून देत. अंगावर भगवी वस्त्रे, हातात दंड व कमंडलू, खांद्यावरील झोळीत एकदोन वस्त्रे, एखादे पांघरुण एव्हढेच सामान घेऊन भ्रमण करत. शिवाय बरोबर ‘भगवद्गीता’ आणि ‘द इमिटेशन ऑफ ख्राईस्ट’ ही दोन पुस्तके असायची. रोख पैशांना स्पर्श करायचा नाही, कोणाकडे काही मागायचे नाही हे त्यांचे व्रत होते.

सर्व गुरुबंधुना पण ते प्रोत्साहित करू लागले की, भारत देश बघावा लागेल, समजावा लागेल. लक्षावधी माणसांच्या जीवनातील विभिन्न थरांमध्ये काय वेदना आहेत, त्यांच्या आकांक्षा पूर्ण न होण्याची कारणे काय आहेत ते शोधावे लागेल. हे ध्येय समोर ठेऊन ,भारतीय मनुष्याच्या कल्याणाचे व्रत घेऊन स्वामी विवेकानंद यांचे हिंदुस्थानात भ्रमण सुरू झाले.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवाचे लेकरू— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ देवाचे लेकरू— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

माझ्या हॉस्पिटलमध्ये अनेक  प्रकारच्या रुग्ण मी बघत असायची. काहीवेळा, श्रीमंत लोक अत्यंत  विचित्र वागताना मी बघितलेत. तर काहीवेळा,अत्यंत निम्न स्तरातले लोक फार मोठ्या मनाचे आढळून आलेलेही बघितले.

माझ्याकडे सरला बाळंतपणासाठी आली. त्याकाळी सोनोग्राफी भारतात आलेली नव्हती. तेव्हाची ही गोष्ट.

आधीच्या दोन मुलीच होत्या सरलाला. यावेळी मुलाच्या आशेने तिसरा चान्स घेतला होता खरा. 

पण मग मात्र operation नक्की करायचे ठरवले होते तिने. योग्य वेळी सरला प्रसूत झाली. मी  प्रसूती पार पाडून बाळाकडे वळले. मुलगी होती ती. पण दुर्दैवाची गोष्ट, मुलीला डावा हात कोपरापासून नव्हता.

कोपरालाच बोटासारखे दोन विचित्र कोंब होते. मला, आमच्या सर्व स्टाफला अतिशय वाईट वाटले.

सरलाने उत्सुकतेने विचारले, “ बाई काय झाले मला,सांगा ना “

मी म्हटले, “ सरला, सगळे उत्तम आहे. तू आता छान विश्रांती घे हं.उद्या बाळ देणारच आहोत तुझ्या जवळ. “ 

सरलाने निराशेने मान फिरवली.

दुसऱ्या दिवशी राऊंड घेत असताना सरलाच्या कॉटजवळ गेले तर ती धाय मोकलून रडत होती.

“ अहो डॉक्टर,आता मी काय करू. ही असली अपंग मुलगी कशी सांभाळू मी. देव तरी बघा कसा. देऊन द्यायची ती मुलगी,आणि वर असली अपंग.” 

मी तिची खूप समजूत काढली. “ सरला,देवाचीच इच्छा म्हणायचे ग. तू हिलाच आता नीट वाढवायला हवेस.

नशीब समज, ती बाकी ठीक आहे. आणखी कोणते व्यंग नाहीये नशिबाने. अग, फारसे नाही अडणार ग तिचे.

शिकव ना तू तिला सगळे. “ 

सरला गप्प बसली आणि पाचव्या दिवशी घरी निघून गेली. तिचा नवरा बिचारा खरच समजूतदार होता.

म्हणाला, “ बाई,देवाचे लेकरू म्हणून आम्ही  सांभाळू हिला.काय करणार.” 

सरलाने मुलीला खंबीरपणे वाढवायचे ठरवले. 

तिचे  ना कोणी बारसे केले, ना  कसला समारंभ. पहिल्या दोघी रुपाली दीपाली म्हणून ही वैशाली. हेही बहिणीच म्हणू लागल्याम्हणून पडले नाव. बहिणी  म्हणाल्या,” आई हिला आमच्या शाळेत नको हं घालू . सगळ्या चेष्टा करतील आमची.” 

सरलाने चौकशी केली आणि तिला मिशनच्या फुकट असलेल्या शाळेत घातले. निदान तिथे तरी तिला कोणी हसणार नाही, तिच्या व्यंगावर बोट ठेवणार नाही,अशी आशा वाटली सरलाला.

 मुलगी चांगली वाढत होती. बुद्धी सुद्धा छान होती तिची. मिशन स्कूलमध्ये उलट ती छान शिकत होती.

इंग्लिश माध्यम असल्याने तिला फायदाच होत होता. 

सरला घेऊन  यायची तिला माझ्याकडे–कधी औषधासाठी, कधी काही विचारायचे असेल तर–

एकदा मला म्हणाली,” बाई हिला कृत्रिम हात नाही का बसवता येणार हो ?”

 मी तिला आमच्या बालरोग तज्ञांकडे पाठवले. ते म्हणाले, “अजून ही खूप लहान आहे. जरा मोठी झाली की करूया आपण प्रयत्न.” 

दिवस भरभर पळत होते. मोठ्या बहिणी  डिग्री घेऊन लग्न करून गेल्या. त्यांचीही माया होतीच वैशालीवर. 

तिला कोणी हसू नये, कुचेष्टा करू नये म्हणून त्याही दक्ष असायच्या. वैशाली समजूतदार होती. आपल्यात काहीतरी कमी आहे, हे त्या लेकराला जणू जन्मापासून माहीत होते.

वैशालीचे त्या हातामुळे कुठेही अडत नव्हते. ती लाटणे हातात धरून छान पोळ्या करायची. त्या बोटासारख्या कोंबाचा उपयोग करून शिवणसुद्धा शिवायची. खरे तर मोठ्या बहिणींपेक्षा वैशाली दिसायलाही खरंच चांगली होती.

वैशाली 10 वी झाली, तेव्हा सरला म्हणाली,” आपण तुला कृत्रिम हात बसवूया का “. 

 वैशाली म्हणाली, “ नको आई. मी आहे ही अशी आहे। माझे काहीही अडत नाही ग. नको मला तो हात.” 

वैशाली बी.कॉम. झाली. सरकारच्या अनुकम्पा तत्वावर तिला सरकारी बँकेत नोकरीही लागली.  छान साडी  नेसून,डाव्या हातावर पदर घेतलेली वैशाली बघितली की मला कौतुक वाटे तिचे. लक्षात सुद्धा येत नसे की हिला डावा हात पुरा नाहीये. ती भराभर बँकेत काम करत असायची. 

नंतर  बँकेत कॉम्प्युटर आले. वैशालीला बँकेने training साठी पाठवले. हसतमुख वैशाली,सगळ्या बँकेची लाडकी झाली. क्लायंट पण ती नसली की विचारायचे,`आज वैशाली ताई दिसत नाहीत. मग उद्याच येतो,त्या आल्या की.`

सरलाने वैशालीचे नाव विवाह मंडळात घातले. वैशाली म्हणाली, “ आई मला निर्व्यंग मुलगा नको. व्यंग असलेलाच नवरा बघ, जो मला समजून घेईल, स्वतः जो या भोगातून गेलाय, त्याच्याशीच मी लग्न करीन. नाही मिळाला तर राहीन की अशीच. आई, तुला सांगितले नाही ग कधी, पण शाळेतही खूप भोगलय मी. डबा खायला मुले बोलवायची नाहीत

मला उजव्याच हाताने पाण्याचा ग्लास उचलावा लागतो म्हणून चेष्टा करायची मुले. खरकटे हात लावते मी म्हणून.

माझे पाठांतर किती छान आहे. पण टीचरने मला स्पर्धेत कधीही निवडले नाही. .म्हणूनच जो या सर्वातून गेलाय,असाच जोडीदार मला हवा। “ 

सरलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 

“ किती ग सोसलस माझ्या बाळा. पण मिळेल हो असा समजूतदार मुलगा तुला. देव असतो ग  वैशू.” 

वैशू खिन्न हसली. म्हणाली, “असता तर त्याला माझा  पूर्ण हात का नाही देता आला त्याला “. सरला निरुत्तर झाली.

बँकेत एक दिवस एक आजोबा आले. या मुलीला ते खूप दिवस बघत होते. तिला म्हणाले,” जरा बोलायचे आहे तुझ्याशी. येतेस का लंचअवर मध्ये ? हे बघ,मी तुला गेले खूप महिने बघतोय. तुला अवघड वाटणार नसेल तर

एक विचारू का? माझा नातू खूप हुशार आहे. इंजिनीअर आहे, छान नोकरी आहे त्याला. तो तुला  बँकेत येऊन बघून गेलाय. त्याला तू मनापासून आवडली आहेस. हे बघ, या गुणी मुलाला लहान असताना पोलिओ झाला दुर्दैवाने.

वेळीच उपचार केले म्हणून सावरला, पण तरीही, तो एका पायाने लंगडतो. त्याचे काहीही अडत नाही. कार चालवतो, चांगली नोकरीही आहे त्याला. आमची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. बघ भेट त्याला. तुमच्यावर कोणतीही बळजबरी नाही.” 

वैशालीने आईला हे सांगितले. सरलाला तर स्वर्ग ठेंगणा झाला. पुढच्या आठवड्यात आजोबा आणि नातू मनीष वैशालीच्या घरी आले. दोघे अनेक वेळा भेटले बोलले. सहा महिने एकमेकांना भेटल्यावर मगच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. अगदी साधे, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत वैशाली मनीषचे लग्न झाले.

आज वैशाली एका गोंडस मुलीची आई आहे. एकाच मुलीवर तिने ऑपरेशन करून घेतलंय.  मुलगी एकदम 

अव्यंग, हुशार आणि छान आहे.

आता सांगा,—

 देव लग्नगाठी स्वर्गात बांधतो , आणि एक दार बंद असेल तर तो दुसरे उघडतो हे किती खरे आहे न..

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ काल्या आणि पंडी… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? विविधा ? 

☆ काल्या आणि पंडी… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

काल्या म्हणजे आमच्या घरादाराचं रक्षण करणारा आमचा लाडका ईमानी कुत्रा..अगदी काळ्या कुट्ट रंगाचा… 

म्हणून त्याला आम्ही सगळे काल्याच म्हणतो…काही वर्षापूर्वी गावात उंट घेऊन आलेल्या भटक्या कुटूंबासोबत काल्या आला होता.उंटवाले गेले पण काल्या मागे राहिला.घरातल्या भाकरी तुकड्यावर मोठा झाला आणि घरातला रक्षक सदस्यच बनून राहीला..

तशीच आमची मनी माऊ पंडी…घरभर फिरून पायात लुडबूड करणारी आमची मनी तिला आम्ही सगळेच पंडी म्हणतो. काल्या आणि पंडी दोघांची जाम मैत्री…दोघेही आपल्या आपल्या तोऱ्यात अंगणभर वावरत असतात.

आम्ही गावी गेलो की काल्याला खूप आनंद होतो. काल्या अंगावर झेप घेत कडकडून भेटायला हमखास अंगणात असतोच.त्याचं काळं नूळनूळीत शरीर आणि तशीच वळवणारी शेपटी सारखी हलत असते…आणि पंडी तर म्याऊ म्याऊ करत पायात घुटमळत येत असते.. रात्री आणि दिवसभर कोणीही अनोळखी दिसला तर काल्या गुरगुरला म्हणून समजाच…. रस्त्यावर,अंगणात, झाडाखाली आणि शेडमध्ये ऐटीत बसून जागरूक राहणारा काल्या..तर  अंगणात आणि झाडावर फिरून भक्ष पकडून घरभर मिरवत मट्ट करणारी पंडी…!

सगळ्यांची जेवणावळ बसली की पंडी ताटाभोवती लुडबुडत राहते आणि काल्या दारात शेपटी हलवत जिभळ्या चाटत केविलवाण्या चेहर्‍याने बसलेला असतो.संध्याकाळी अंगणात जागरूक असलेला काल्या आणि शांत झोपलेलं घर असतं.पंडी मात्र पायात घरघरत मस्त झोप घेत राहते…. अंगणातल्या शेळ्या,गाई आणि कोंबड्यांच्या रखवालीची जबाबदारी काल्या घेतो.आणि पंडी घरातली जबाबदारी पार पाडते..कधी कधी चोरून दुध गट्ट्म करताना आईच्या हातचा फटका बसतो तिला.मग दूर जाऊन पाय आणि तोंड जिभेने साफ करत बसलेली असते पंडी….. मोकळ्या वेळात आरामात लोळण घेत पडलेली निरागस वाटते पंडी..पण तशी ती नसते.. पंडी आणि काल्या कधी कधी मजेत खेळत असतात… त्यांच्यातल्या अनोख्या मैत्रीने अंगण खेळकर बनून राहते.पहाटे आम्ही बच्चे कंपनी खडीवर भटकायला निघालो की काल्या आमच्या पुढे असतोच..त्याच्या शिवाय भटकंतीला मजा येत नाही. लहानपणी ‘पदी ‘नावाची कुत्री पण अशीच आठवण ठेवून गेलेली.

अशा मुक्या प्राण्यांनी आणि पक्षांनी गावचे घर अंगण असं सजून नेहमी किलबिलत असतं…सगळेजण घरादाराशी दिवस रात्र गप्पा मारत राहतात.मुक्या प्राण्यांची अशी बोलकी प्रीत काळजात जपून ठेवावी अशीच असते….अशी ही आमची मैत्री गावाकडे गेलो की हमखास एकमेंकांच्या स्वागतासाठी सज्ज असते…!

चित्र – प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

‘काळजातला बाप ‘कार..

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ते रवी, मी साधा चंद्र… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर

? मनमंजुषेतून ?

☆ ते रवी, मी साधा चंद्र.. ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर ☆

(दिग्गज ज्येष्ठ आणि श्रेष्ठ चित्रकार श्री. रवी परांजपे यांचे दि. ११/६/२२ रोजी दुःखद निधन झाले. त्यांना वाहिलेली ही शब्द – सुमनांजली) 

साहित्य, कला, संस्कृतीचं माहेरघर असलेल्या महाराष्ट्राला, अनेक थोर चित्रकार लाभले आहेत.. एस.एम. पंडित, रघुवीर मुळगावकर, दीनानाथ दलाल, एम.आर. आचरेकर, इत्यादींनी सप्तरंगांवर हुकूमत गाजवून कलाजगतात प्रसिद्धी मिळविली.. या थोर चित्रकारांच्याच पिढीतील ज्येष्ठ चित्रकार, रवी परांजपे यांनी काल आपले ‘ब्रश मायलेज’ गाठले..

मला लहानपणापासूनच चित्रकलेचे आकर्षण आहे. किराणा मालाच्या दुकानातून आणलेल्या सामानाच्या कागदी पिशवीवर एखादे चांगले चित्र दिसले, तर ती पिशवी पाण्यात बुडवून खळ निघून गेल्यावर तो कागद सुकवून जपून ठेवलेली चित्रं, अजूनही माझ्या संग्रही आहेत.. अशाच छंदातून मुळगावकर व दलाल यांची चित्रे, कॅलेंडर्स जमविली. त्याकाळी टाईम्स ऑफ इंडियाच्या धर्मयुग, इलस्ट्रेटेड विकली अशा पाक्षिकात रवी परांजपे सरांची रंगीत कथाचित्रे, पाहिल्याची आठवतात.. 

काही वर्षांनंतर त्यांची चित्रे असलेली ग्रिटींग्ज कार्ड्स पाहिली. काही कॅलेंडर्स, सरांच्या वेगळ्या शैलीमुळे लगेच ओळखू यायची.. वर्तमानपत्रातील व रीडर्स डायजेस्ट या इंग्रजी मासिकातील सरांच्या जाहिराती पाहिल्या की, सरांच्या शैलीचं कौतुक वाटायचं.. अशा ज्येष्ठ चित्रकाराशी कधी संपर्क येईल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.. तरीही, तो आला…

माझ्या मोठ्या भावाने, रमेशने अभिनव कला महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राध्यापक मारुती पाटील सरांच्या शिफारशीवरुन, मुंबईला रवी परांजपे सरांकडे कलाक्षेत्राचा अनुभव घेण्यासाठी जाण्याचे ठरविले.. 

सरांचा स्टुडिओ दादर येथील काॅलेज गल्लीतील, मनाली बिल्डींगमध्ये होता. त्यावेळी सर बिल्डर्सना लागणारी माऊंट साईजमधील बिल्डींगची कलरफुल पर्स्पेक्टिव्ह ड्राॅईंग्ज काढून देत असत. सरांकडे रमेशसारखेच चार असिस्टंट काम करीत असत. 

त्यावेळी परांजपे सरांना भेटायला कधी अभिनेत्री स्मिता पाटील तर कधी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे येत असत. मी दोन वेळा रमेशला भेटायला म्हणून, स्टुडिओत गेलो होतो. सर मितभाषी होते. याच दरम्यान सरांकडे काम करणाऱ्या, दिपक गावडे या चित्रकार मित्राशी मैत्री झाली.. जी आजही अबाधित आहे.. 

सहा महिन्यांनंतर रमेशने, सरांकडचा अनुभव घेऊन मुंबई सोडली. १९९० साली, सर पुण्यात आल्यानंतर आम्ही दोघेही सरांना भेटत होतो. सरांची अनेक प्रदर्शने पाहिली. कधी सरांचं प्रदर्शन मुंबईत जहांगीरला असेल तर तेही जाऊन पाहिलं..

वर्तमानपत्रातून आलेले सरांचे लेख वाचत होतो. मोठमोठ्या सांस्कृतिक समारंभांना  सरांची उपस्थिती हमखास असायची. तिथे भेट होत असे..

आठवड्यापूर्वी ज्येष्ठ चित्रकार अनिल उपळेकर यांचा मेसेज आला.. ‘काही दिवसांपूर्वी सर घरात पडले, घोले रस्त्यावरील हाॅस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं आहे. आयसीयू मध्ये आहेत..’ हे वाचून मला धक्काच बसला.. 

..काल दुपारी परांजपे सरांच्या कलाप्रवासाने पूर्णविराम गाठला.. दिग्गज चित्रकारांमधील जो एक शेवटचा दुवा होता, तोही निखळला.. दीनानाथ दलालांना, केतकर सर गुरुस्थानी होते.. रघुवीर मुळगावकरांनी, एस.एम. पंडितांना गुरुस्थानी मानलं होतं.. एम.आर. आचरेकरांकडे शिकलेले विद्यार्थी आज यशस्वी चित्रकार झालेले आहेत.. रवी परांजपे सरांची चित्रशैली ही इतरांपेक्षा खूप वेगळी होती.. अशी ही चालती बोलती विद्यापीठं काळाच्या ओघात नाहीशी झाली.. वास्तव चित्रशैली जपणारी पिढी, हळूहळू नामशेष होत आहे.. नवीन पिढीचा कल, हा वास्तव पेक्षा अमूर्त कलेकडे अधिक आहे.. यातूनही वास्तव कला टिकवायची असेल तर, जुन्या पिढीतल्या पंडित, दलाल, मुळगावकर, परांजपे सरांना कदापिही विसरुन चालणार नाही..

सूर्य म्हणजेच रवी, हा स्वयंप्रकाशी व तेजस्वी ग्रह आहे.. तारांगणातील माझ्यासारखे असंख्य ग्रह, हे चंद्रासारखे परप्रकाशी आहेत.. अशा रवीचे थोडे जरी प्रकाशकिरण ज्याच्या अंगावर पडले, तो धन्य झाला.. मीही असाच एक…

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे सरांना, ही शब्दफुलांची भावपूर्ण श्रद्धांजली!!! 

© सुरेश नावडकर

१२-६-२२

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पंचांग – टिळक की दाते की – भाग – 2 ☆ श्री मंदार दातार ☆

श्री मंदार दातार 
? इंद्रधनुष्य ?

☆ पंचांग – टिळक की दाते की – भाग – 2 ☆ श्री मंदार दातार ☆

(या प्रमुख सुधारणा होत्या व त्यामुळे सण आणि उत्सव यांच्या तारखांमध्ये फरक पडणार होता ! ) इथून पुढे —-

केरोपंत यांनी इतर अनेक सुधारणाही सुचवल्या. त्यांतील शेवटची, झीटा अक्षराची सुधारणा वगळता बाकी सर्व पुढील काळात स्वीकारल्या गेल्या. पंचांग करणारे सर्वजण आधुनिक गणित शिकलेले नव्हते. त्यांना गणित आधुनिक प्रमाणे (मानके) वापरून करता यावे यासाठी केरोपंतांनी ‘ग्रहलाघवा’च्या धर्तीवर ‘ग्रहगणिताची कोष्टके’ हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळक हे केरोपंतांचे शिष्य; त्याचप्रमाणे ते गणित, संस्कृत आणि पौर्वात्य विज्ञानाचे अभ्यासक व जाणकार. त्यांनी त्या सुधारणा पंचांगात झाल्याच पाहिजेत आणि ‘आमची पंचांगे फ्रेंच नाविक पंचांगांच्या तोडीची असलीच पाहिजेत’ असा आग्रह धरला व तशा  प्रेरणेने पंचांग सुधारणा घडवून आणल्या. त्या सुधारणा करणे हे सांगली येथे लोकमान्यांच्या अध्यक्षतेखाली 1920 मध्ये झालेल्या परिषदेत सर्वमान्य झाले.

पुढील काळात पंचांग गणित हे आधुनिक साधने वापरून केले जाऊ लागले. गेली काही वर्षे तर संपूर्ण पंचांग हे संगणकाच्या मदतीने मांडले जाते. त्यासाठी लागणारे खगोलीय स्थिरांक आणि गणितीय पद्धती भारत सरकारतर्फे कोलकाता येथील ‘पोझिशनल अॅस्ट्रॉनॉमी’ ही संस्था प्रकाशित करते. त्यामुळे सर्व पंचांगांत एकवाक्यता आढळते. या सगळ्या सुधारणा पंचांगकर्ते हळुहळू स्वीकारू लागले आहेत आणि सर्व पंचांगे गणितीय व खगोलीय दृष्ट्या अचूक आहेत. लोकमान्यांचे ते स्वप्न सत्यात उतरले आहे. त्या अर्थाने प्रसिद्ध होणारी सर्वच पंचांगे ही एका अर्थी ‘टिळक पंचांगे’ आहेत. पंचांगात दर्शवलेल्या तिथी, नक्षत्र, ग्रहांच्या स्थिती, गती; तसेच, सूर्य-चंद्र ग्रहणांच्या वेळा या वास्तविक असून त्यात कोणताही फरक राहिलेला नाही.

मग प्रश्न असा उरतो, की केरोपंत छत्रे यांनी सुचवलेल्या सर्व सुधारणा अंमलात आल्या पण नक्षत्र चक्र आरंभ हा रेवती नक्षत्रातील झीटा ताऱ्यापासून करावा ही सूचना काही सर्वमान्य झाली नाही. लोकमान्य असतानादेखील त्या सूचनेस लोकांचा विरोध होता आणि तो पुढे तसाच राहिला. त्याचे कारण म्हणजे त्या सूचनेचा स्वीकार केला असता तर, ‘अधिक’ महिने मोजण्याच्या पद्धतीत फरक येईल आणि त्यामुळे लोक नवीन कोणत्याच सुधारणा पंचांगात स्वीकारणार नाहीत. त्यामुळे सर्वजण ती सूचना वगळून बाकी सुधारणा करण्यास तयार झाले. त्यांतील अग्रणी म्हणजे व्यंकटेश बापुजी केतकर.

व्यंकटेश बापुजी केतकर यांनी एक आकाशीय बिंदू कल्पिला. तो बिंदू जुन्या सूर्य सिद्धांत नक्षत्र चक्र आरंभाजवळ आहे. चित्रा नक्षत्रातील स्पायका ताऱ्यापासून 180 अंशांवर येतो. त्यामुळे त्या पद्धतीला चित्रा पक्ष असे म्हणतात. त्यामुळे व्यवहारात कोणताच नजरेत भरणारा फरक पडणार नव्हता, त्यामुळेच ती पद्धत सर्वांना मान्य झाली. पुढील काळात रेवती पक्ष आणि चित्रा पक्ष या दोन्ही पक्षांच्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या पक्षांच्या समर्थनार्थ अनेक पुरावे सादर केले. त्यांचा मुख्य उद्देश पूर्वी झालेल्या वराहमिहीर, आर्यभट्ट; तसेच, इतर सिद्धांत ग्रंथकारांना कोणता नक्षत्र चक्र आरंभ अपेक्षित होता हे सांगणे. परंतु ते पुरावे नि:संदिग्ध नसल्याने कोणताच दावा पूर्णपणे मान्य होऊ शकला नाही. शेवटी, भारत सरकारने स्थापन केलेल्या कॅलेंडर रिफॉर्म कमिटीने चित्रा पक्षास मान्यता देऊन त्या वादावर पडदा टाकला.

असे असूनसुद्धा रेवती पक्षाचे अभिमानी त्यावर आधारित टिळक पंचांग वापरतात. त्या पंचांगानुसार ‘अधिक’ मास, ‘क्षय’ मास यात फरक पडतो आणि त्यामुळे सर्वच नाही पण काही वर्षांत टिळक पंचांगाच्या आणि चित्रा पक्ष पंचांगांच्या सणांच्या तारखांमध्ये फरक पडतो. तो फरक अधिक महिन्याच्या गणनेमुळे पडतो. त्यामुळे काही वर्षी (उदा. सन 2012) टिळक पंचांगानुसार गणपती ऑगस्ट मध्ये बसले आणि दाते पंचांगानुसार सप्टेंबरमध्ये ! तोच प्रकार दिवाळीच्या बाबतीत घडताना दिसतो. मग स्वाभाविक प्रश्‍न हा पडतो की नक्‍की खरे पंचांग कोणते, टिळक की दाते? वास्तविक, दोन्ही योग्यच. आपण मोजण्यास सुरुवात कोठून करतो यावर ते अवलंबून आहे. त्यामुळे गणितीय दृष्टिकोनातून पाहता दोघांत फरक काही नाही. पण पंचांग हे नुसते ग्रहताऱ्यांचे गणित नसून ते धर्मशास्त्राशी जोडलेले आहे. त्यामुळे त्या दृष्टीने अशा विसंगती लोकांमध्ये भ्रम निर्माण करतात. तेव्हा वाद विसरून सर्वांनी एकच प्रमाण मानून धार्मिक आचरण करणे योग्य.

– समाप्त

लेखक : श्री मंदार दातार 

मो. नं.  9422615876

मो  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares