मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्ञानोबा तुकाराम –भाग– 2–लेखक– श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

ज्ञानोबा तुकाराम  – भाग – 1 – लेखक – श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

( आणि ती व्यक्ती घराकडं गेली. गाडीवान गाडी घेऊन जागेला गेला.) इथून पुढे —-

देवळात अंधारच होता. कुठेतरी बारीक ठाणवई, एखादी पणती मिणमिणत होती. सारं काही सुमसाम झालं होतं . मंडपात माणसं घोरत पडली होती. त्या कोणत्याही गोष्टीकडे न पाहता मंडप पार करत अंधारातून ठेचकाळत एक एक अडथळे पार करून ती व्यक्ती देवाच्या गाभाऱ्यापर्यंत गेली. दाराशी आली. पळत आली. तर दाराला भलं मोठं कुलूप घातलं होतं.

आता हुरहूर जीव घेणारी ठरली. हुरहूर होती आज देवदर्शन मुकले याची. तसंच तगमगत दारासमोर साष्टांग दंडवत घातला. तिथेच नामस्मरण करत मांडी ठोकली. 

सगळीकडे शांतता होती. तेवढ्यात काही अस्पष्ट अस्पष्ट आवाज ऐकू यायला लागला. त्या व्यक्तीने इकडे तिकडे पाहिलं तर कुणीच नाही. मग आवाज कसला येतोय. बारीक बारीक किण किण करणारा पैंजणांचा आवाज. त्याचबरोबर चिपळ्यांचा स्वर. काही पुटपुटल्याचा आवाज. पैंजण वाजताहेत म्हणून बाई म्हणावं तर सोबत चिपळ्या वाजताहेत? स्वर ही पुरूषी येतोय?

कुठून स्वर येतोय? 

पैंजण कसले वाजताहेत? 

चिपळ्या कोठून वाजताहेत? 

आवाज कसला येतोय? 

याचा शोध सुरू झाला तर आवाजाची दिशा गाभाऱ्याकडे चालली. 

त्या व्यक्तीला वाटलं गाभाऱ्यात कोणी भक्त, भाविक, वारकरी अडकला असावा. चुकून कोंडला गेला असावा. रात्रीच्या गडबडीत राहिला असेल. आता रात्रभर बिचारा अडकेल. आणखी जरा पहावं म्हणून गाभाऱ्याचे दाराला असलेल्या छिद्रातून त्या व्यक्तीने आत दृष्टी टाकली, इकडे तिकडे शोधक नजरेने ठाव घेतला. कोणी दिसेना. येणारा आवाज मात्र गडद झाला. तेवढ्यात लक्ष सिंहासनाकडे गेलं तर आसनावर देव नाहीत. केवळ सिंहासन होते. समोर मात्र सर्वत्र प्रभा फाकणारा हिरेजडित सोन्याचा देवकिरिट सिंहासनावर ठेवलेला होता. मगाचची भक्त अडकल्याची चिंता कुठल्या कुठे पळाली. आता देव कुठे आहे? याची चिंता सुरू झाली. कोणते विघ्न तर आले नाही ना?  कोणीही मोगली यवन सरदार अवचित आला नाही, तरीही देव कसे जागा सोडून गेले? आतून आवाज येतोय? काय करावे? कसे शोधावे? कोणाला चौकशी करावी? रात्र पडली,  काहीच कळेना. 

तेवढ्यात एका खांबाआडून एक दिव्य देहधारी मानवाकृती बाहेर पडल्यासारखी दिसली. निरखून पाहतो तो खांद्यावर जरतारी रेशमी शेला, गळ्यात वैजयंती माळा, नर्तनाच्या पदलालित्यावर डोलत होत्या, डोईचे कुळकुळीत केस खांद्यावर रूळत आहेत. कमरेचा पितांबर हालतोय. दोन्ही हाती वाजत चिपळ्या होत्या. पायातले रत्नजडित तोडर बारिक बारिक वाजत होते. नेत्रकमल मिटलेले होते. नर्तन करीत करीत तोंडातून स्वर बाहेर येत होते —-

” ज्ञानोबा – तुकाराम “. 

” ज्ञानोबा – तुकाराम ” 

ती कोणी वारकरी व्यक्ती नव्हती.  ती व्यक्ती कोणी सामान्य दिसत नव्हती. तर प्रत्यक्ष परमात्मा पांडुरंग बेभान होऊन गाभाऱ्यात नाचत होता आणि तोंडाने म्हणत होता ” ज्ञानोबा – तुकाराम ”  ” ज्ञानोबा – तुकाराम “.

 मघापर्यंत चिंतातूर असणाऱ्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे भाव बदलले. चिंता बदलली. क्षणात आश्चर्य, क्षणात आनंद , क्षणात गंमत आलटून पालटून बदलत होती. आश्चर्य होते आपण काही अद्भूत पाहत आहोत याचे. दिसतेय ते काही विलक्षण आहे याचे. आनंद होता तो परमात्म्याचे आगळ्यावेगळ्या दर्शनाचा. दिव्य दर्शनाचा. आतापर्यंत परमात्मा असा भक्त-नाम गात नाचल्याचे वाचले वा ऐकले नव्हते. जो यति, योगी, तपी, ताडसी, यांना जपतपादी साधने वापरूनही सहज साध्य होत नाही, तो आपल्या दिठीसमोर नाचत असल्याचे पाहून गंमत वाटत होती. आनंद होत होता. तो परमात्मा केवळ दिव्यदृष्टी धारण करूनच दिसू शकतो असे ज्ञात होते. कारण महाभारतात त्याचं तेज दृष्टीला सहन न झाल्याने तो प्रत्यक्ष समोर असून अनेकांनी डोळे मिटले होते. तेज सहन न झाल्याने ते मिटावे लागले होते. डोळे मिटून घेवूनही त्याचे तेज डोळ्यांना सोसत नव्हते. तो दिव्य प्रकाशधारी, नव्हे शतसूर्य– नव्हे नव्हे कोटी भास्कराचे तेज ज्याचेपासून उगम पावते असा परमात्मा आपल्यासमोर नर्तन करतोय याची गंमत वाटत होती. आनंद वाटत होता. आश्चर्य वाटत होते. अनेकांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा हा परमात्मा, हे परब्रह्म, त्या व्यक्तीच्या दृष्टीसमोर स्वतः एका वेगळ्या तालावर नाचत होते. अगदी देहभान हरपून. अन् तोंडाने बोलत होते–”ज्ञानोबा-तुकाराम”

आजपर्यंत पुराणात वाचलं होतं, ऐकलं होतं की, एकदा भगवंताचे गृही नारद आले. सेवक बोलले देव देवपूजा करत आहेत. देवर्षी नारद आश्चर्यचकित झाले.. ते म्हणाले देव कोणाची पूजा करतात पाहू या. म्हणून ते देवघरात हलकेच प्रवेशले. तो देवपाटावर एक एक देव मांडले होते. आणि देव पूजनात दंग होते. ते देव म्हणजे आपल्यासारख्या  देवप्रतिमा नव्हत्या. होत्या भक्त प्रतिमा. भक्त उद्धव, भक्त अक्रूर, भक्त नारद, भक्त हनुमान. आश्चर्यमुग्ध महर्षी नारदाचा भाव त्या महान व्यक्तीच्या मुखावर आता प्रगटला होता. 

क्रमशः …

लेखक : श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील. 

पंढरपूर ( फेसबुक वरून साभार ) 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महानैवेद्य — पंढरपूरच्या “श्री विठ्ठल रुक्मिणीचा!”… भाग – 1 – श्री मंदार केसरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ महानैवेद्य — पंढरपूरच्या “श्री विठ्ठल रुक्मिणीचा!”… भाग – 1 – श्री मंदार केसरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

घरात पहिल्यापासून कोणताही गोडाधोडाचा म्हणा किंवा बिगर कांद्यालसणाचा स्पेशल पदार्थ असो… तो तयार झाला की, एखाद्या वाटीत घालून आज्जी म्हणायची..

“मनू… देवापुढं नैवेद्य ठेव … मग खाऊन चव सांग… कसा झालाय ते..”

तसा प्रत्यक्ष माझ्या तोंडात पहिला पदार्थ गेला असला, तरी…. देवापुढं पहिल्यांदा ठेवल्यामुळं घरातला मी second taster…पहिल्यांदा ‘देवच’…! त्यामुळे…

“पाहे प्रसादाची वाट…द्यावे धावोनिया ताट…

शेष घेउनि जाईन…तुमचें जालिया भोजन…”

—अशी जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाप्रमाणे माझी लहानपणापासून अवस्था…!

“आज्जी… तुझं काहीतरीच असतं बघ.. देव कुठं खात असतो का..?” …. असले ‘डावे’ प्रश्न सुरुवातीला विचारले… पण… माझ्या प्रश्नाला संतश्रेष्ठ नामदेवांच्या लहानपणीची कथा सांगत…… .. 

“ प्रत्यक्ष भगवंताला जेवण्याचा हट्ट करून शेवटी कंटाळून “नामदेवराय” भोवळ येऊन पडायला लागल्यावर…   मग… पांडुरंग जेवला बघ..” असे म्हणून …… 

” ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला…. नैवेद्य जेविला… नामयाचा …।” — या अभंगानंतर, ” उजव्या ” हाताने ठेव बरं…वाटी..” अशा संभाषणाने ” नामदेवरायांच्या ” कथेचा शेवट झाल्यावर मगच ” प्रसाद ” तोंडात पडायचा…!

रोजच्या देवपूजेनंतर दूधसाखरेबरोबर… कधी एखादा रवा-बेसन-लाडू, करंजी … उपवास असेल तर राजगिरा-शेंगदाण्याचा लाडू… खजूर… गूळ-खोबरं.. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून केलेलं ताजं लोणी-साखर.. एखादं केळ.. असं काहीही असायचं.

सणावाराला मात्र पक्वांनांनी भरलेलं ताट ‘नैवेद्याला’ असायचं..! पण प्रत्यक्ष देवळात… ” काय नैवेद्य असेल…?” अशी उत्सुकता बोलून दाखवल्यावर… ” आपण “महानैवेद्य” आणू बरं का.. ” असं म्हणून वडील तसा निरोप द्यायचे. 

त्यावेळच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातील अनेक “बडवे-उत्पात” मंडळी चांगल्या घरोब्याची… काही जवळच्या नात्यातली असल्यानं ” महानैवेद्य ” घरी आणण्यासाठी जास्त खटाटोप करावा लागला नाही. दोनचार दिवस आधी निरोप दिला तरी ” महानैवेद्य ” घरपोच यायचा.

ज्या दिवशी ” महानैवेद्य ” घरी यायचा, त्यादिवशी स्वयंपाकघरात चहापाण्याशिवाय जास्त काही करायची गरज नसायची… एखादा भाताचा डबा लावला तरी पुष्कळ व्हायचं….! दुपारी “नैवैद्या”चं जेवणार असल्यानं… आई-आजी सकाळी… “दूध, फळं, चिवडा”… अशा कोरड्या पदार्थाशिवाय काही खाऊ द्यायची नाही. “प्रसादिक” अन्न पोटात जायच्या आधी पोटात दुसरं शिळं-पाकं अन्न असू नये हा एक प्रांजळ हेतू… “त्याला काय होतंय…?..” अशी उद्धट बोलण्याची कधी हिंमत झाली नाही.

दुपारी साधारण साडेबारा नंतर…. परातीयेवढ्या मोठ्ठया आकाराच्या लखलखीत चांदीच्या ताटावर लाल रेशमी कापड झाकून… त्यावर चांदीचं पळी-पंचपात्र अन मुखशुद्धीसाठी पानाचा विडा घेऊन… कडक सोवळ्यात “बडवे-उत्पातांच्या” परिवारातील एखादा काका-मामा ‘ते’ वजनदार ताट दोन्ही हातांनी एका खांद्यावर घेऊन..”महानैवेद्य” आणायचा. प्रथम तो “नैवेद्य” घरातील देवासमोरील पाटावर ठेवून घरच्या देवाला .. “नैवेद्यम्‌ समर्पयामि…” म्हणून पळीने पाणी फिरवून दाखवला जायचा. ‘नैवेद्य’ घेऊन येणाऱ्या व्यक्तीस त्याच्या वयाकडे न बघता त्याच्या हाती दक्षिणा देऊन घरच्या सगळ्यांनी नमस्कार करण्याचा “आज्जीचा” शिरस्ता असायचा.

त्या अवाढव्य ताटावरील कापड बाजूला सारून ते भरगच्च ताट बघण्याची उत्सुकता मोठेपणीपर्यंत तशीच कायम राहिली… कारण ते नैवेद्याचं ताट… असायचंच तेवढं… “देखणं”… आणि पाच-सात व्यक्तींना भरपेट पुरेल एवढं “पूर्णब्रह्म”…! ताटाच्या मधोमध मोठ्या चांदीच्या वाडग्यात खचाखच शिग लावून भरलेला उत्तम प्रतीच्या वासाच्या तांदळाचा भात… त्यावर नुसता पांढरा भात नसावा म्हणून शास्त्रासाठी पिवळं धम्मक डावभर वरण…त्या भाताच्या शिगेवर अस्सल लोणकढी तुपाची वाटी खोचलेली…. त्याच्या शेजारी थोड्या छोट्या वाडग्यात तसाच शिग लावलेला केशरी रंगाचा अस्सल तुपातला “साखरभात”… त्यावर मस्तपैकी काजू, बदाम, बेदाणे, लवंग, वेलदोडे अन चार दोन केशराच्या काड्यानी सजावट केलेली…! त्या भाताच्या भांड्याच्या खालच्या बाजूला घसघशीत आकाराच्या पातळ पदर सुटलेल्या… वेलदोडा.. जायफळाच्या सुवासाने मोहित करणाऱ्या पिवळसर रंगाच्या तुपाने माखलेल्या “पुरणपोळ्या”…. तशाच पातळ साध्या “पोळ्या”… त्यावर पुरणाचा गोळा.. त्या गोळ्यावर वरच्यावर पापुद्रा काढता येणाऱ्या… चवीला नकळत मिठाळ लागणाऱ्या, वरून थोडं तूप टाकलेल्या पातळ “पुऱ्या”….! त्याच्या डाव्या बाजूला एका हाताच्या ओंजळीत बसतील एवढ्या आकाराचे तुपात खरपूस भाजलेले… टाळ्याला न चिकटणारे तुपाळलेले दोन “बेसन लाडू”…!

त्या लाडवाशेजारील एका वाटीत दह्यात मीठ- साखर- लालतिखट- दाण्याचं कूट घालून कालवलेली… वरून जिरे-मोहरीची फोडणी दिलेली.. आंबट-गोड-तिखट मिश्र चवींची “शेंगादाण्याची चटणी”… तर दुसऱ्या वाटीत बारीक खिसलेल्या काकडीची… मीठ- साखर- दही घालून कालवलेली आंबट-तुरट चवीची “कोशिंबीर”…! त्याच्या शेजारील अजून एका वाटीत त्या ऋतूत उपलब्ध असेल त्या पद्धतीने कधी पीठ पेरलेली “मेथीची”… अथवा मीठ- मिरची- साखर घालून.. वरून लिंबू पिळुन… बारीक किसलेलं खोबरं-कोथिंबिरीनं सजवलेली “बटाट्याची” सुकी भाजी असे….. त्याच वाटीत वर दोन लिंबाच्या फोडी असत….! ताटाची डावी बाजू झाल्यावर उजव्या बाजूच्या एका तांब्यात हरभऱ्याची डाळ, मेथ्या, शेंगादाणे, खोबऱ्याचे बारीक काप, मिरच्यांचे तुकडे घालून… चिंचगुळाचा कोळ घालून केलेली “आळू-चुक्याची” पातळ भाजी असे…

कधी शेंगदाण्याचं कूट… चिंचगुळ.. हिरव्या मिरच्या.. हिंग- मोहरी- जिरे- कढीपाल्याची फोडणी घातलेलं… चटकदार “मिरच्यांच पंचामृत”…! तर दुसऱ्या तांब्यात… खास पुरण करताना बाजूला काढून ठेवलेल्या कटाची अन थोड्या पुरणाचा गोळा एकत्र केलेल्याची… कढीपाल्याच्या फोडणीची… वरून कोथिंबीर.. खोबऱ्याचा खिस तेलावर तरंगताना दिसणारी चिंचगुळाचा कोळ घातलेली थोडी झणझणीत- आंबट- गोड चवीची “कटाची आमटी”… असायची. ज्या “कटाच्या” आमटीच्या एका ‘भुरक्यात’… तोंडं- घसा- नाक- कान- डोकं … हे सगळे अवयव refresh करायची ताकद आहे, ज्या आमटीच्या “भुरक्यात” … बेसनाचा लाडू अन साखरभाताने तुपाळलेला घसा… पूर्ववत करण्याची किमया आहे… ती कटाची आमटी..! त्या आमटीच्या बाजूलाच कधी एका गंजात (गंज – एक भांड्याचा प्रकार) दुधापासून आटवलेली.. जायफळाची चव खाताना जाणवणारी घट्ट “बासुंदी” असे… तर कधी आंबटगोड जायफळ-केशर घातलेलं घट्ट “श्रीखंड” … तर कधी उच्च प्रतीच्या आंब्याचा रस असे…!

– क्रमशः…

लेखक – श्री मंदार मार्तंड केसकर

पंढरपूर, मो. 9422380146

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग – 4 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग – 4 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

युध्दाचे आव्हान वालीने स्विकारले ती  अपवित्र व अशुभ रात्रीची वेळ! वाली युध्दासाठी निघालेला पाहून तारा समोर येऊन म्हणाली, “स्वामी! ही वेळ युध्दासाठी योग्य व चांगली नाही. ही रात्र मायावी आहे. अशा अशुभवेळी न जाता उद्या सकाळी  युध्दासाठी निघणे योग्य होईल.”

परंतु वालीने  तिचे म्हणणे धुडकावून लावले. संघर्षासाठी तो पेटला असल्यामुळे आता तो थांबू शकत नव्हता. हट्टी वालीला ताराने हरतर्‍हेने खंप समजावले, पण व्यर्थ!

अखेर धाकटा भाऊ सुग्रीवला युध्दासाठी सोबत घेऊन वाली युध्दभूमीकडे निघाला. वाली व राक्षस मायावी यांच्यामध्ये घनघोर तुंबळ युध्द झाले. वालीचे पारडे जड होताहेसे पाहुन तो भिऊन पळुन गेला. वाली व सुग्रीवने त्याचा पाठलाग केला. मायावी राक्षस दूर जंगलांतील एका गुहेत शिरुन नाहीसा झाला

वाली आणि सुग्रीव गुहेजवळ  येऊन गुहेचे निरिक्षण केले. सुग्रीवाला दारावर थांबण्यास सांगुन वाली गुहेत शिरला. सुग्रीव बाहेर अनेक महिने वाट पाहात थांबला. एके दिवशी गुहेतुन मोठमोठे आवाज येऊ लागला. थोड्याच वेळात रक्ताचे पाट वाहत असतांना त्याला दिसले. आपला भाऊ वालीचा वध झाला असावा असे समजुन गुहेचे तोंड बंद करण्यासाठी  गुहेच्या तोंडाशी भली मोठी शिळा ठेवुन गुहेचे दार बंद केले आणि अत्यंत दुःखी अंतःकरणाने सुग्रीव राजधानीत परतला.

सुग्रीवाने तिथे घडलेले सारे वृत्तांत ताराला कथन केल्यावर तिच्यावर तर वज्राघातच झाला. डोक्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. तिला अतोनात दुःख झाले.

एके दिवशी अचानक एक घटना घडली. वाली परत आला… वालीने मायावी राक्षसाचा वध करुन गुहेबाहेर येण्यासाठी गुहेजवळ आला असतां, गुहेचे तोंड बंद असल्याचे त्याला आढळले. त्याला वाटले सुग्रीवाने मुद्दाम कपट करुन गुहेचे दार बंद करुन वालीला मरण्यासाठी गुहेत कोंडले. वालीला अतिशय संताप आला. मन उद्गिन्न झाले. खुप प्रयत्न करुन गुहेचे दार  मोकळे केले व तो बाहेर आला. राज्यात आल्यावर पाहतो तो काय…. सुग्रीव राजा झालेला!

जेव्हा सुग्रीवाने येऊन वालीचा वध झाल्याचे सांगीतले, त्यावेळी तर ती दुःखाने वेडी झाली होती, पण ! लवकरच सावध होऊन आपले दुःख बाजुला सारुन, शेवटी ती राज्याची महाराणी होती ना!  राज्याचे हित लक्षात घेऊन व गादी जास्त दिवस रिकामी राहु नये, या उद्देशाने , तारा व सर्व प्रमुख वानर मंत्रीगणांनी मिळुन सुग्रीवास राज्यावर बसविले होते. सुग्रीव वानरांचा राजा व त्याची पत्नि रुमा राणी झाली होती. यांत सुग्रीवाचा कांहीही दोष नव्हता.

परंतु कोपिष्ट व क्रोधी वालीला वाटले, आपले राज्य हडप करण्यासाठीच सुग्रीवाने मुद्दामच  मरण्यासाठी गुहेत बंद करण्याचे कपट केले. अशा आततायी समजुतीने, सुग्रीवाचा काटा काढण्याच्या उद्देशाने त्याला ठार मारण्यासाठी त्याच्या मागे लागला. भयभीत होऊन सुग्रीवाने तिथून पळ काढून, वालीच्या शापाचे मतंगवनच सुग्रीवाने आपले आश्रयस्थान बनवले. वाली शापग्रस्त असल्यामुळे तिथे तो जाऊ शकत नव्हता. शेवटी परत येऊन वालीने राज्याचा ताबा घेतला. आणि सुग्रीव पत्नी रुमाला आपल्या अंतःपुरांत ठेवुन घेतले.

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परतफेड… अज्ञात ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ परतफेड… अज्ञात ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

“ कसे आहात..?”

एवढा एकच प्रश्न त्यांनी विचारला.., आणि रोज दिसणाऱ्या पण जास्त परिचय नसणाऱ्या त्या व्यक्तीसमोर मी मनसोक्त रडलो..

तो म्हणाला.. ” भरपूर रडून घ्या.. मला वेळ आहे. आजच रडायचं आणि नंतर कधीसुध्दा डोळ्यांतून पाणी काढायचं नाही..”

त्यानंतर त्याने जे काही सांगितलं.. त्यामुळे माझा अंतरबाह्य असा  कायापालट झाला..!

त्याने काय सांगितलं..??—-

तो शांतपणे म्हणाला की, “ आपण हा जो मनुष्यजन्म घेतलाय, तो आपल्या अपेक्षांपूर्तींकरिता नाही, किंवा नसावा.. कारण  आयुष्यात आपण नेहमी दुसऱ्यांकडूनच अपेक्षा ठेवत असतो आणि बऱ्याचदा त्या पूर्ण होत नाहीत.. त्या मुळे उरतात त्या फक्त जाळणाऱ्या व्यथा..!

माझ्या मते हा जन्म आपल्या अपेक्षांपूर्तींकरिता नाहीच आहे, तर हा आहे कुठे तरी, केव्हा तरी राहून गेलेल्या दुसऱ्यांच्या परतफेडीसाठी…

जसं तुमचा आयुष्यातला जोडीदार अचानक हे जग सोडून गेला, तुम्ही त्याचा संसार पूर्ण केलात, तुम्ही त्याचा संसार पूर्ण करण्याकरिता हा जन्म घेतला, ह्याचा अर्थ कोणत्यातरी एका जन्माची परतफेड तुमच्याकडून झाली.. तो अकाउंट तुमचा संपला..! आता ह्याच दृष्टिकोनातून आयुष्यातील सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा..,

मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत किंवा आपल्या लाडक्या लेकीने तुमच्या मनाविरुद्ध जाऊन परस्पर लग्न केले– ही सुध्दा तुम्ही कोणतीतरी परतफेड करत आहात.. परतफेडीचा हा हिशोब ह्या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हाला मरण नाही… तेव्हा मनातल्या मनातसुद्धा परमेश्वराला उद्देशून ” तू मला का जगवलंस..?” हा प्रश्न विचारू नका…. जे झाले ते चांगले झाले, जे होईल ते चांगले होईल असा दृष्टिकोन ठेवून सकारात्मक जीवन जगा व इतरांना प्रेरणा द्या.

कुठलीही व्यक्ती असो, ती तुमच्याशी विचित्र वागली.. तुमचा अपमान केला.. तुमच्याकडे दुर्लक्ष केलं.. तुमच्या उपकारांचं कोणाला विस्मरण झालं.. तेव्हा एकेक अकाउंट पूर्ण झाला असे समजा, आणि तसं आजपासून स्वतःला सांगायला लागा..

बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर,  ‘Account Closed..’ असा शिक्का मारतात ना…,  त्याप्रमाणे जेव्हा एकांत मिळेल तेव्हा आपले किती ‘Account Closed’ झाले, ह्याचा विचार करा आणि पासबुकं जाळून टाका.. परतफेडीचा एकही क्षण टाळू नका…

कदाचित सुरुवातीला तुम्हाला जड जाईल.. पण आपलं मन जेवढं बलदंड असतं ना, तेवढंच ते लवचिक पण असतं..

तेव्हा मनाला सांगा.. ” बाबा रे.. आयुष्यभर तुझं ऐकलं.. तुझ्या हुकमात राहिलो.. आता तुझी गुलामी मी सोडून देत आहे.. आजपासून तुला मी मुक्त केलं..!”

हा प्रयोग करा…  आणि किती खाती पटापट बंद होताहेत ह्याची प्रचिती घ्या.. मी सुद्धा उद्या तुम्हांला ओळख दाखवली नाही.. तर तुमच्या पासबुकात माझी एकच entry होती असं समजा..

परमेश्वराला दोष देण्यापेक्षा फक्त.. ” परतफेड आणि परतफेड ” हा एकच मंत्र ध्यानात ठेवा आणि बघा तुम्हाला तुमचे आयुष्य किती सुंदर वाटेल, तुमच्या आयुष्यातुन निगेटीव्हीटी कायमची निघुन जाईल…..”

आणि “ मी येतो… “ असं म्हणत तो निघून गेला..

—– आज ही मुक्ती मिळून पाच वर्षं झाली.. मी आयुष्य खूपच मस्त जगत आहे.. तृप्त आहे…. तुम्ही ‘ सहन करतो, सहन करतो.. ‘ हे इतक्या वेळा सांगितलंत, ह्याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाहीत.. तुम्ही फक्त दुःख वाटत असता…. 

जो सहन करतो ना.. तो कधी बोलत नाही..!

—— चला तर मित्रांनो, आजपासून आपणसुध्दा आपल्या आयुष्यात कोणाकडून अपेक्षाभंग करुन घेण्याऐवजी 

–फक्त ” परतफेडीचं ” आयुष्य जगायला सुरुवात करून आयुष्य मजेत घालवू या…… 

लेखक : अज्ञात 

संग्राहक : सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्ञानोबा तुकाराम  – भाग – 1 – लेखक – श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

ज्ञानोबा तुकाराम  – भाग – 1 – लेखक – श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

संप्रदाय म्हटले की दैवत आले. देवस्थान आले. क्षेत्र आले. तीर्थ आले. पथदर्शक श्रेष्ठी आले. संत आले.  वाड्मय आले. तत्वज्ञान आले. देवकर्म आले. नित्यपाठ आला. जप आला. शिष्य अथवा लोकसमुदाय आला. संप्रदायाचा मंत्र आला. मग तो कोणताही संप्रदाय असो. शैव असो वा वैष्णव. रामानुज असो वा निंबार्क. गाणपत्य असो वा कापालिक. राधा संप्रदाय असो वा स्वामी नारायण. 

मग वारकरी संप्रदाय तरी त्याला अपवाद कसा असणार. त्यालाही दैवत आहे. विग्रह आहे. देवस्थान आहे. क्षेत्र आहे. तीर्थ आहे. मार्ग दाखविणारे संत आहेत. देवाच्या अन् संतांच्याही लीला आहेत. देवकर्म आहे. ज्ञान आहे. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो म्हणत जगाला कवेत घेणारे तत्वज्ञान आहे. गाथा- भागवत- ज्ञानेश्वरीसारखे वाङ्मयीन ग्रंथ आहेत. वारीसारखा नियम आहे. तो निष्ठेने पाळणारे हजारो वारकरी आहेत. हरिपाठासारखा नित्यपाठ आहे. अन् रामकृष्णहरीसारखा उघडा मंत्रही आहे. 

कारण, उघडा मंत्र जाणा | रामकृष्णहरी म्हणा ।। असे संप्रदायामध्ये म्हटले जाते. तसेच रामकृष्णहरी विठ्ठल केशवा | मंत्र हा जपावा सर्वकाळ ।। असेही संतवचन आहे. म्हणजे “रामकृष्णहरी  ” हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. तोही उघडा आहे. पडद्याआड झाकून द्यायचा, कानात सांगावयाचा असा मंत्र नाही. 

हे सारे ठसठशीत उघड सत्य असताना मग सारे वारकरी अनेक कीर्तनात, भजनात, दिंडीत, अगदी आळंदीहून देहू- -हून येणाऱ्या पालखी सोहळ्यातही वा अन्य सोहोळ्यातही ” ज्ञानोबा तुकाराम ” हा मंत्रघोष का करतात? अन् त्याचेच भजन अविरत का करतात? असा प्रश्न मला एका वारकरी अभ्यासक मित्राने केला. अन् त्या मंत्रामागची सारी कथाच त्याला उलगडून सांगावी लागली. 

हा मंत्र का निर्माण झाला? 

त्याचा पहिला उच्चार कोणी केला? कोणी ऐकला? 

त्याने तो लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काय केले? 

वारकऱ्यांनी तो सहज स्वीकारला का? 

कारण वारकरी हा कोणतीही गोष्ट पारखून घेणारा आहे ना? ही प्रश्नाची मालिकाच त्याने मजपुढे उभी केली. अन् मग त्याला सारे बैजवार सांगावे लागले. 

तेच साऱ्या वारकरी बांधवांना ज्ञात आहे. पण इतर समाजालाही कळावे, नव्याने वाचन चिंतन अभ्यास करणाऱ्यांनाही कळावे, म्हणून हा कथा प्रपंच——

सूर्य बुडाला. सांज पडली. सर्वत्र सामसुम झाली. रातकिड्यांनी किर्र करीत कोपरे धरून आरडायला सुरुवात केली. अंधार अजून वाढला. रात्र पडायच्या आत गावी पोहोचायला हवं. म्हणूनच गाडीवानाने बैलं दामटली. बैलांना पराण्या टोचटोचून गाडीवान हैराण झाला होता. पण अंतरच एवढं होतं की बैलं  काय करणार ? कितीही पळून पळूनही  ते अंतर पार पडणार नव्हतं. बैल घामाने निथळत होते. तोंडाने फेस पडत होता.

आत बैलगाडीत बसलेले ग्रहस्त चिंतातुर होते. तोंडाने नामस्मरण चाललं होतं. चेहऱ्यावर काळजीचे भाव होते. गाडीवाटेचा रस्ता शेताशेतातून वळणे वळसे घेत दौडत होता. त्यात रात्रीचा अंधार होता म्हणून गाडीत लावलेला दिवा फुरफुरत होता. बैलाच्या गळ्यातल्या चंगाळ्या खुळखुळत होत्या. गाडीवानाचा ओरडाआरडा, बैलांच्या पायाचा  खडखडाट, दिव्याच्या फुरफुरण्याच्या आवाजात भर घालत होता. गाडीतल्या गृहस्थाची चिंता, तगमग वाढत होती. चिंता  प्रवासात रात्र झाल्याची, गाव अजून न आल्याची होतीच. पण त्याहून जास्त ती होती ते नित्यनेमाचं देवदर्शन आज बुडल्याची. आज पांडुरंग आपल्याला अंतरला याची.

भल्या पहाटे कामास्तव बाहेरगावी आलो. तेव्हा वाटलं की संध्याकाळी लवकर घरी परतू. नित्याचे देवदर्शन घडेल. देवदर्शनाच्या नियमाला अंतर पडणार नाही हा विचार होता. पण कामाच्या रामरगाड्यात दिवस कधी उलटला आणि सांज झाली ते कळलंच नाही. तरी गडबडीने आवराआवर करून निघेस्तोवर उशीर झालाच. आजपावेतो देवाचं नित्य दर्शन झाल्याशिवाय दिवस गेला नव्हता.आज मात्र दैवाने उशीर केला. गावी, घरी परतेपावेतो रात्र झाल्याने गर्दी ओसरलेली असेल,आरती होऊन मंदिर बंद होईल. काय करावं कळेनासं झालं. रात्रीच्या काळोखाबरोबर चिंता वाढत होती. गाडीवानाच्या आणि बैलांच्या गोंगाटाने त्यात भर पडत होती. चंगाळ्यांचा खुळखुळाट अन् गाडीच्या चाकाच्या धावांचा खडखडाट क्षणाक्षणाला त्यात वाढ करीत होता. तोंडाने सतत ” रामकृष्णहरि ” म्हणत देवाचा धावा चालूच होता.

अखेर गाव आलं. सगळीकडे एकदम चिडीचूप झालं होतं. वेशीवरचा तराळ एके हाती फुरफुरणारी मशाल अन् दुसरे हाती लखलखणारा भाला चमकवीत गाडीजवळ आला. त्याने पुसलं, ” कोण हायं? “

तशी आतली व्यक्ती बाहेर पडली.  त्यांनी जवळजवळ गाडीतून उडीच मारली. डोक्यावरचं पागोट, अंगरखा उपरण्याचं बोचकं काखेला लावून त्यानं देवाकडे, देवळाकडे पळायला सुरुवात केली. तराळानं ओळखून जोहार घातला खरा. पण त्याच्याकडे त्या व्यक्तीचं लक्ष नव्हतं. त्याचं चित्त होतं देवळाकडं, देवाकडे. 

धावत धावत रावळाच्या पायऱ्या मोठ्या मोठ्या ढांगा टाकत त्यांनी पार केल्या. सोबतच्या माणसाकडे पळता – पळता हातातले कापडे टाकून घरी द्यायला सांगितली. आणि ती व्यक्ती घराकडं गेली. गाडीवान गाडी घेऊन जागेला गेला.

क्रमशः …

लेखक : श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील. 

पंढरपूर ( फेसबुक वरून साभार ) 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 26 – परिव्राजक –४. हिमालयाच्या वाटेवर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 26 – परिव्राजक –४. हिमालयाच्या वाटेवर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

आज आपले ओळखपत्र/आय डी प्रुफ, सगळीकडे दाखवावे लागते. ती एक सिक्युरिटी चेक सिस्टिम आहे.यावरून तुम्ही कोण आहात? कुठले आहात? कुठून कुठे चालला आहात? असे कुठे विचारले तर राग यायचे काहीच कारण नाही. आपल्याच देशात आपल्याच सुरक्षिततेसाठी हे आहे. प्रवास करतांना किंवा पर्यटनाला जातांना आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड,ड्रायविंग लायसन्स नाहीतर अगदीच इलेक्ट्रिक बिल्ल इत्यादी आपल्याला दाखवावे लागते. पण अशी पद्धत आजची नवी नाही. स्वामी विवेकानंदांना अमेरिकेत शिकागोला गेले तेंव्हा ही परिचय पत्र न्यावे लागले होते बरोबर आणि ते भारतात सुद्धा फिरले तेंव्हाही व्यवस्थे साठी ज्यांच्या कडे जायचे त्यांना कोणाचे तरी ओळखपत्र घेऊन जावे लागत होते.

हिमालयात भ्रमणासाठी जातांना ते आधी हिमालय ते तिबेट असा प्रवास करणार होते. त्यामुळे नेपाळ मध्ये असलेल्या आपल्या मित्राचे रीतसर परिचय पत्र घेऊन जायचे म्हणजे तिबेट मध्ये प्रवेश मिळण्यात अडचण येणार नाही.कारण अखंडानंदांना तशी एकदा अडचण आली होती. पण काही कारणामुळे हा मार्ग  बदलून त्यांनी अल्मोरा मार्गाने जायचे ठरवले. पहिला मुक्काम भागलपूर मध्ये झाला.  

भागलपुर मध्ये पोहोचल्यावर थकले भागलेले स्वामीजी व अखंडांनंद गंगेच्या काठी उभे होते. शेजारीच राजा शिवचन्द्र यांचे निवास होते. तेजस्वी संन्याशांकडे तिथले एक प्रतिष्ठित कुमार नित्यानंद सिंग यांचे लक्ष गेले. त्यांनी ती रात्र दोघांना घरी ठेऊन घेतले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना बाबू मन्मथनाथ यांच्याकडे घेऊन गेले. त्यांना वाटले असतील कोणी साधूबैरागी त्यामुळे फार लक्ष दिलं नाही. आणि जेवणं झाल्यावर बौद्ध धर्मावरील इंग्रजीतल पुस्तक वाचत बसले. स्वामीजींनी विचारले की, कोणतं पुस्तक वाचताहात? मन्मथबाबूंनी नाव सांगून विचारलं तुम्हाला इंग्रजी येतं का? स्वामीजी म्हणाले थोडंफार येतं. यानंतर जो संवाद झाला त्यात स्वामीजींनी बौद्ध धर्मावर चर्चा करतांना अनेक इंग्रजी ग्रंथांचे संदर्भ दिले. मन्मथबाबू  चकित झाले. त्यांच्या लक्षात आलं हा तरुण संन्यासी आपल्यापेक्षा हजार पटींनी हुशार आहे.

आणखी एक दिवस, योगसाधनेवर चर्चा झाली. यावर स्वामीजींनी व्यक्त केलेले विचार मन्मथबाबूंनी यापूर्वी आर्य समाजाच्या स्वामी दयानन्द सरस्वतीं कडून ऐकलेल्या विचारांशी मिळतेजुळते होते. पण यावेळी अजूनही नवीन ऐकायला मिळाले त्यांना. त्यानंतर त्यांनी उपनिषदांचा विषय काढला. स्वत:जवळची उपनिषदावरची पुस्तके समोर ठेवली आणि त्यातील एकेक वचने काढून अर्थ विचारू लागले. स्वामीजींनी दिलेल्या उत्तरामुळे मन्मथबाबू चकितच झाले. स्वामीजींची तर याबाबत मोठी तपस्या आणि साधना होती हे त्यांना माहिती नव्हते.

एकदा स्वामीजी असेच गुणगुणत होते. बाबूंनी लगेच विचारलं तुम्हाला गाणं येतं का? स्वामीजी उत्तरले,” अगदी थोडंफार येतं.” बाबूंनी आग्रह केल्यामुळे स्वामीजींनी काही गीतं म्हटली. बाबू आश्चर्याने स्तिमित झाले. अरे या संन्याशाला जितकं गहन शास्त्राचं ज्ञान आहे तितकाच संगीतासारख्या कलेवर सुद्धा त्यांचं प्रभुत्व आहे . झालं दुसऱ्याच दिवशी मन्मथबाबूंनी भागलपुर मधल्या संगीतप्रेमींना घरी बोलवलं. त्यात काही संगीत उस्ताद पण होते. रात्री नऊ पर्यन्त कार्यक्रम संपेल असे त्यांना वाटले. पण संगीत श्रवणाच्या आनंदात कोणाला जेवणाखाण्याचे व वेळेचे भान नव्हते उरले. रात्री दोन वाजता कार्यक्रम संपला. सर्वजण तिथेच थांबले आणि दुसऱ्या दिवशी गेले. केवळ आठ दिवसाच्या वास्तव्यात स्वामीजींचे निरासक्त, निसंग, वैराग्यशीलता ,विनम्रता हे विशेष गुण आणि त्यांचे,चर्चांमधून, प्रतिक्रियातून आणि काही प्रसंगातून विविधरंगी आणि समृद्ध व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं.

एव्हढ्याशा काळातल्या अनुभवावरून मन्मथबाबूंच्या मनावर स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा खोलवर ठसा उमटला. खरं म्हणजे ते कट्टर ब्राह्मसमाजी होते. पण या काळात ते आतून बाहेरून पूर्ण बदलले आणि पुन्हा हिंदू धर्माचे चाहते झाले. एव्हढे की पुढे आयुष्यभर दोघांचाही खर्च स्वत: करून स्वामीजींच्या सहवासात वृंदावनला कायमचे राहण्यास तयार झाले. पण स्वामीजींनी त्याला नम्रतेने नकार दिला. इथल्या नाथनगरमध्ये असलेल्या जैन मंदिराला स्वामीजींनी भेट दिली. तिथल्या जैन आचार्यांशी जैन तत्वज्ञानवर चर्चा केली. मन्मथबाबूंकडे राहणारे मथुरानाथ सिन्हा म्हणतात की, ” धर्म आणि तत्वज्ञान यावर झालेल्या चर्चेतून ज्ञान आणि अध्यात्मिकता  हे जणू स्वामीजींचे श्वासोच्छवास आहेत आणि त्यांच्या सर्व विवेचनात उत्कट आणि नि:स्वार्थी देशप्रेमाची भावना आहे.

मन्मथबाबू आपल्याला सोडत नाहीत असे पाहून स्वामीजींनी ते घरात नसताना जाण्याचे ठरवले तेंव्हा, बाबू घरी आल्यावर ते पाहून अस्वस्थ झाले आणि लगेच त्यांच्या मागोमाग त्यांना गाठायला निघाले. पण स्वामीजी हिमालयात अल्मोऱ्या पर्यन्त गेले होते. हे ऐकून ते अल्मोऱ्या पर्यन्त गेले तरीही स्वामीजींना ते गाठू शकले नाहीत. शेवटी निराश होऊन मन्मथबाबू भागलपुरला परत आले. स्वामींजीच्या आठवड्याच्या सहवासातून मन्मथबाबूंसारख्या थोडी आध्यात्मिक संवेदनशीलता असलेल्या सुशिक्षित व्यक्तीवर केव्हढा प्रभाव पडला होता याच हे बोलकं उदाहरण आहे. जे स्वामीजींना भेटत ते त्यांचेच होऊन जात.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटरचा मामा…!! – भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटरचा मामा…!! – भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(“ खरं म्हणता काय ??? “ — तिच्या चेहऱ्यावर अविश्वास होता.) इथून पुढे —-

आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतक्या वेळा ती ओरबाडली गेली होती की, कोणताही ” मोबदला ” न देता कुणीतरी मदत करू शकतो, या गोष्टीवर आता तिचा विश्वासच नव्हता… 

“ होय ताई… खरं म्हणतोय …” 

तरीही या पार्श्वभूमीवर, तिचा माझ्यावर इतका सहजासहजी विश्वास बसणं शक्यच नव्हतं… !

ओरबाडणाऱ्या लोकांच्या यादीत तेव्हा तिने माझं नाव टाकलं असावं, हे तिच्या वागण्यावरून मला स्पष्ट जाणवत होतं….

यानंतरच्या प्रत्येक भेटीत चिऊताईने मलाच उलट सुलट आजमावण्याचा प्रयत्न केला…. 

यानंतरच्या प्रत्येक भेटीतून मी तिचा थोडा थोडा भाऊ होत गेलो…. आणि ती थोडी थोडी ताई होत गेली… !

मी ” भाऊच ” असल्याची जेव्हा “ तिची ” पूर्ण खात्री पटली, त्या दिवशी तिने तिच्या “चिमणीची” आणि माझी भेट घडवून आणली.

तो दिवस होता शनिवार… २ जुलै २०२२ !

माझ्यासाठी हा दिवस म्हणजे फक्त तारीख किंवा वार नाही…

माझ्यासाठी तो माझा जन्मदिवस होता…! माझा विजय दिन होता…!! 

कारण याच दिवशी तर चिऊताईच्या मनामध्ये भाऊ म्हणून माझा जन्म झाला होता…माझ्याबद्दल विश्वास निर्माण झाला होता…आणि म्हणून इतकी वर्षे लपवून ठेवलेल्या “चिमणीला” तिने माझ्यासमोर आणलं होतं …

 “ मामाच्या पाया पड…”  चिऊताई ने माझ्यामागून चिमणीसाठी बोललेले हे “तीन” शब्द…! 

तिच्या या तीन शब्दांनी ” तीनही जगाचा स्वामी ” या शब्दाचा खरा अर्थ मला तेव्हा कळला….

चिमणी खरोखरीच गोड मुलगी होती…. ! चिखलातच कमळ फुलतं हेच खरं…. !

यानंतर सर्व चक्र भराभर चालवून, अक्षरशः सोमवारी 4 जुलै रोजी या चिमणीचं, पुण्यातील नामांकित कॉलेजात वर्षाची संपूर्ण फी भरून ” बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन ” (BBA) साठी  ऍडमिशन पक्कं केलं…

यात माझा सहकारी मंगेश वाघमारे याचे योगदान फार मोलाचं आहे….! 

चिमणीच्या नकळत… चिऊताईच्या कानात म्हणालो, “ हे भीक मागणं सोड आता, एखादा व्यवसाय कर घरबसल्या….. मी टाकून देतो….कारण आता येत्या तीन वर्षात एका बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटरची तू आई होणार आहेस…. भीक मागणं शोभत नाही तुला…. त्यापेक्षा एखादा बिझनेस टाक…”

चिऊताई सुखावली….! ‘ व्हय, ‘ म्हणत तिनं डोळ्याला पदर लावला होता…. ! 

इकडे ऍडमिशन पक्कं झाल्यानंतर…चिमणी, ऍडमिशन पक्कं झाल्याचा कागद माझ्या तोंडापुढे फडफडवत म्हणाली, “ बघ मामा, मी आता BBA होणार… आहेस कुठं?” – ती उड्या मारत होती…. 

मी पण मग उड्या मारत तिला म्हणालो, “ गप ए शाने, मी पण आता “बिजनेस ऍडमिनिस्ट्रेटर” चा मामा होणार… आहेस कुठं….???”

यानंतर चिमणी रडत… भावुक होत, माझ्या उजव्या खांद्याशी येऊन उभी राहिली….माझा सहकारी मंगेश याने लगेच मोबाईलचा कॅमेरा चालू करून हा क्षण टिपण्याचा प्रयत्न केला….

तेवढ्यात तिकडून चिमणीच्या आईचा, म्हणजे चिऊताईचा हसत आवाज आला….

“मंगेशा…थांब रं बाबा … काटी अन् घोंगडं घिवून द्या की रं…. मला बी जत्रला यीवून द्या की रं … !”

चिऊताई मग माझ्या डाव्या खांद्याशी बिलगली…. ! मंगेशने काढलेल्या फोटोचा “क्लिक” असा आवाज आला… आणि त्याबरोबर हा क्षण माझ्या मनात अजरामर झाला…! 

आमची “जत्रा” झाली होती…. ! फोटो काढताना चिमणी माझ्या कानाशी येऊन म्हणाली, “ मामा आता आम्हाला सोडून कुठे जाऊ नकोस बरं का ..” 

मी तिला म्हणालो, “ मी कुठे जाणार नाही… पण तूच सोडून जाशील आम्हाला … !” 

“ मी का जाईन तुला आणि आईला सोडून ?” तिच्या भाबड्या चेहऱ्यावरचा, भाबडा प्रश्न…. ओठांचा चंबू करून तिने मला बाळबोधपणे  विचारला…

“ अगं म्हशी…. लगीन करशील का नाही ? तेव्हा कन्यादान मलाच करावं लागणार आहे ना…. ? 

तू तेव्हा खूप मोठी झालेली असशील…. पण तेव्हा या “गरीब मामाला” आणि तुझ्या “आईला” विसरू नकोस बरं…!! “

यावर या चिमणीने रडत… मला घट्ट मिठी मारत… म्हटलं , “ माझा मामा गरीब नाही…..खूप “श्रीमंत” आहे “. 

तिच्या या वाक्यानं माझ्यासारखा  ” भिकारी डॉक्टर ” एका क्षणात ” श्रीमंत ” झाला…! 

पलिकडे चिऊताईने तिच्या डोळ्याला पदर लावला होता…. 

आणि मी ” बिझनेस / मॅनेजमेंट ऍडमिनिस्ट्रेटरचा ” मामा असून सुद्धा… डोळ्यातल्या वाहणाऱ्या अश्रूंना ” मॅनेज ” करू शकलो नाही…. !

काही गोष्टी मॅनेज करणं कुठं आपल्या हाती असतं ….??? 

— समाप्त —

© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग – 3 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग -3 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

तारा आपला पती वालीच्या पराक्रमावर लुब्ध होती. त्याच्या पराक्रमाचा सार्थ अभिमान होता तिला. परंतू त्याच्या  अत्याचारी, आततायी, अत्यंत क्रोधीत असलेल्या स्वभावाबद्दल ती सदैव कुंठीत असायची. त्याच्या अशा स्वभावाला आवर घालण्याचा सतत प्रयत्न करीत असे. परोपरीने, अनेक प्रकारे त्याला समजावीत असे. परंतू तो अहंकार, गर्वाने चूर असल्यामूळे तिचे तळमळीचे सांगणे धुडकावून लावत असे. त्यामुळे ती सतत मनोमन दुःखी राहत असे.

वास्तविक सुषेन राजाची कन्या तारा अत्यंत बुध्दीमान असून तिला अनेक विषयांचे सूक्ष्म ज्ञान होते. निसर्ग व मानवी जीवनांत भविष्यात होणारे अनेक उत्पात, येणारी संकटे याची पूर्व चाहुल तिला नेहमीच लागत असे. तिच्यातील आंतरीक शक्तीच्या या चिन्हांची ओळख ठेवण्यात ती अतिशय निपुण होती. परंतू तिच्यातील या अलौकीक गुणांची वालीने कधीच कदर ठेवली नाही. तो स्वतःच्याच मस्तीत जगत होता. दुसर्‍यांना तुच्छ लेखण्यातच धन्यता मानत होता.

मतंगत्रृषींची शापवाणी ऐकून वालीचे सर्व मित्र त्या आश्रमांतुन भिऊन काष्किंधनगरीत पळून आले. वाली व ताराने भिऊन पळून येण्याचे कारण  विचारल्यावर त्यांनी तिथे घडलेली सर्व सविस्तर हकीकत सांगितली.

वाली चिंतामग्न झाला. तारा तर फारच दुःखी व चिंतामग्न झाली. ती वालीला म्हणाली, “स्वामी! आपण फार मोठा पराक्रम केला खरा! पण अविचाराने ही जी घटना घडली ती अशुभसूचक वाटत आहे. मतंग त्रृषीसारख्या श्रेष्ठ व महान तपस्याकडून हा शाप मिळणे म्हणजे आपल्यावर आलेली फार मोठी इष्टापत्ती आहे.” ताराला दुःख अनिवार होऊन अगदी ओक्साबोक्सी रडू लागली.

ताराच्या सांगण्याचा परिणाम की, भविष्यात घडणार्‍या भिषण घटनेच्या नांदीची कल्पना आली असेल म्हणून असेल, वाली स्वतः मतंगत्रृषीकडे क्षमा मागण्यासाठी गेला.पण त्याचे दैवच फिरले असल्याने की काय, मतंगत्रृषींनी त्याच्याकडे ढुंकुनही न पाहतांच पाठ फिरवून आश्रमाकडे निघून गेले.

वाली हताश होऊन निराश मनाने परतला. तारा मात्र भविष्यात येणार्‍या भीषण, अनिष्ट संकटाच्या भितीने फार उदास झाली.

दुदुंभीचा मुलगा मायावी राक्षस वडीलांच्या वधामुळे सूडाने पेटून उठला. वडीलांचा सूड घेण्यासाठी मायावी एका मध्यरात्री किष्किंधा नगरीच्या दाराशी येऊन मोठमोठ्याने ओरडत वालीला युध्दासाठी आव्हान करु लागला. साहसी व पराक्रमी वालीने मायावीचे आव्हान स्विकारले.

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आईचे दूध बाळाच्या हक्काचे ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ आईचे दूध बाळाच्या हक्काचे ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

अनेक संतांनी, जवळ जवळ सर्वच संतांनी म्हटले तरी चालेल, पशुपक्षी, प्राणी, वनस्पती या सर्वांवर प्रेम करायला त्यांनी शिकविले. प्रत्येक प्राण्याला भुके पासून मुक्त करण्याचा संदेश दिला. माणसाची असो वा प्राणी-पक्ष्यांची, आई ही आईच असते. तिची जागा नाही कोणी घेऊ शकत. आपल्या बाळा प्रति कोणत्याही संकटांना सामोरे जायला तयार असते.

सातारा शहरातील घटना. “ॲनिमल राहत” या प्राणी कल्याणकारी संस्थेचे कार्यकर्ते शहरातून फेरफटका मारत असताना त्यांना एक हृदयद्रावक चित्र दिसले. एक गाय आपल्या वासराला दूध पाजण्याचा प्रयत्न करत होती. प्रेमाने पुन्हापुन्हा त्याला चाटत होती. तिला पान्हा फुटला होता. भुकेने वासरू ही दूध पिण्याचा प्रयत्न करत होते. पण  ती त्याला बाजूला सारत होती. वासरू पुन्हापुन्हा आचळ पकडण्यासाठी धडपडत होते. ती त्याला पुन्हा पुन्हा चाटत  होती. पण  ती त्याला बाजूला सारत होती. हा काय प्रकार आहे? म्हणून  “राहत”  चे कार्यकर्ते त्यांच्याजवळ गेले. पहातो तो राग आणि चीड येण्यासारखा प्रकार होता. गाईचे दूध  वासराने पिऊ नये, आपल्यालाच मिळावे म्हणून मालकाने वासराच्या तोंडावर एक टोकदार खिळ्यांनी बनविलेला एक पट्टा बांधल्याचे दिसून आले. वासरू दूध पिण्यासाठी जवळ गेले की त्याच्या तोंडाजवळ बांधलेल्या पट्टया वरचे टोकदार खिळे तिच्या स्तनांना टोचत होते. आणि तिला वेदना होत होत्या. “राहत” च्या कार्यकर्त्यांनी गाईच्या मालकाचा शोध घेतला. आणि त्याची चांगलीच कानउघडणी केली . वासराच्या तोंडावरचा पट्टा काढला. वासरू लगेच आईला जाऊन बिलगले. गाय भुकेल्या बाळाला मायेने चाटत होती. तिला पान्हा फुटला होता. वासरूही चक् चक् करून  स्तनपान करत होते. भूक शमवत होते. किती छान चित्र!

आपण गाय वासराची पूजा करतो. खर तर गाईच्या दुधावर वासराचाच अधिकार ! प्राण्यांना प्रेम देणं, हीच त्यांची खऱ्या अर्थाने पूजा होईल. अशी अन्यायकारक घटना कोठेही दिसली तर, त्याला वाचा फोडणे हे प्रत्येकानेच आपले कर्तव्य म्हणून करायला काय हरकत आहे?

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मृदंग शैलेश्वरी मंदिर – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ मृदंग शैलेश्वरी मंदिर – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆ 

भारतात चोरीमुळे प्रसिद्ध झालेले एक प्राचीन मंदिर आहे. अलीकडच्या इतिहासात चार वेळा चोरांनी मंदिराची मूर्ति चोरली, पण ती परत केली. कारण ते त्यासोबत फार दूर जाऊ शकत नव्हते.

त्यांनी दिलेल्या कारणांमुळे कथा आणखीनच वेधक बनते.

मृदंग शैलेश्वरी मंदिर हे केरळ राज्याच्या दक्षिणेकडील मुझाकुन्नू – कन्नूर जिल्ह्यातस्थित एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर परशुराम ऋषींनी स्थापन केलेल्या 108 मंदिरांपैकी एक आहे.

मंदिराला “मृदंग सैलेश्वरी” असे नाव पडण्यामागे एक कथा आहे.

मृदंग हे प्राचीन भारतातील तालवाद्य आहे. प्राचीन हिंदू शिल्पकलेमध्ये, मृदंग हे अनेकदा गणेश आणि नंदी, शिवाचे वाहन आणि अनुयायी या हिंदू देवतांच्या निवडीचे साधन म्हणून चित्रित केले जाते. मृदंग हे देववाद्य किंवा देवांचे वाद्य म्हणूनही ओळखले जाते. असे मानले जाते की या ठिकाणी स्वर्गातून मृदंगाच्या आकारातील खडकाचा तुकडा, कदाचित एक उल्का पडली आणि ऋषी परशुरामांनी देवीचे अस्तित्व जाणवून तिला खडकात बोलावले आणि तिच्यासाठी मंदिराची स्थापना केली.

मृदंग शैलेश्वरी मंदिर हे दक्षिण भारतीय शास्त्रीय नृत्य कथकलीचे जन्मस्थान मानले जाते. या मंदिरात देवीशक्ती काली, सरस्वती आणि लक्ष्मी या तीन रूपात विराजमान आहे.

काही वर्षांपूर्वी केरळ राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक श्री. अलेक्झांडर जेकब यांनी मागील काही वर्षांत या मंदिरात झालेल्या चार दरोड्यांच्या कथा सार्वजनिक केल्या. मंदिरातील मूर्तीची अंदाजे किंमत सुमारे दीड कोटी आहे. मंदिराभोवती कोणतीही सुरक्षा नसल्याने ते चोरांचे सोपे लक्ष्य होते.

मंदिरातील पहिली फोड १९७९ मध्ये झाली. चोरट्यांनी मंदिरातून मूर्ति नेली, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरापासून काही मीटर अंतरावर मूर्ति टाकून दिल्याचे आढळून आले. पोलिसांना गुन्हेगार शोधता आले नाहीत. विधीनुसार मूर्तीचे पुनर्वसन करण्यात आले. हा विधी ४१ दिवस चालतो आणि त्यासाठी विशिष्ट मंत्रांचे ४१ लाख वेळा पठण करावे लागते .

काही वर्षांनी कथेची पुनरावृत्ती झाली. मात्र यावेळी पोलिसांना मूर्ति सापडली नाही आणि कोणताही सुगावा न लागल्याने तपास रखडला. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी “अष्टमंगला देवप्रश्न ” विचारण्याचा निर्णय घेतला. कारणे शोधण्यासाठी आणि उपचारात्मक कृतींचे नियोजन करण्यासाठी अष्टमंगला देवप्रश्न केले जाते.

देवप्रश्नाने, मूर्ति तामिळनाडूच्या दिशेने प्रवास करत होती, परंतू देवीची शक्तिशाली मूर्ति तिच्या स्वतःच्या दैवी सामर्थ्याने तिच्या निवासस्थानी परत येईल, अशी गणना केली गेली.

अंदाजानुसार, 42 व्या दिवशी, पोलिसांना तामिळनाडूजवळील पलकत येथे एका महामार्गाजवळ एक बेबंद मूर्तीची माहिती मिळाली, ज्यामध्ये एक चिठ्ठी शिल्लक आहे. चिठ्ठीत लिहिले होते – “ मूर्ति मृदंग शैलेश्वरी मंदिरातील आहे, आम्ही ती पुढे नेण्यास सक्षम नाही. कृपया ती मंदिरात परत करा.” 41 दिवस चालणार्‍या धार्मिक विधींसह मागील वेळेप्रमाणे पुन्हा मूर्तीचे पुनर्संचय करण्यात आले. मात्र यावेळीही पोलिसांना चोरट्यांचा माग काढता आला नाही.

ही दुसरी वेळ असल्याने तेथे पोलिस पहारा देऊन मंदिराची सुरक्षा वाढवण्याची सूचना पोलिसांनी केली. परंतू देवी स्वतःचे रक्षण करू शकते असे सांगून मंदिर प्रशासनाने हा प्रस्ताव नाकारला.

लवकरच चोरांनी तिसऱ्यांदा धडक दिली– यावेळी कर्नाटक राज्यातील टोळी. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्यांनी वायनाडच्या जंगलातून कर्नाटककडे जाण्याचा मार्ग आखला. पुढचे तीन दिवस पोलिसांना सुगावा लागला नाही, पण या वेळी, मंदिराचे अधिकारी आणि स्थानिक लोक या दोघांनाही विश्वास होता की देवी परतीचा मार्ग शोधेल, जरी पोलिस दोषींना शोधण्यात अपयशी ठरले तरीही .

तिसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास, केरळमधील वायनाडमधील कलपट्टा येथील एका लॉजमधून पोलिसांना एक निनावी कॉल आला. फोन करणार्‍याने टोळीतील एक सदस्य म्हणून स्वतःची ओळख करून दिली आणि मूर्तीच्या स्थानाची माहिती दिली. त्यांना मूर्ती सोबत नेणे शक्य नसल्याचे कारण देत त्यांनी पोलिसांना मूर्ती मंदिरात परत करण्याची विनंती केली. पोलिसांना लॉजवर मूर्ती सापडली, फुलं वाहिलेली, आणि मूर्तीजवळ दिवा लावलेला होता. नेहमीच्या विधीनंतर मूर्ती पुन्हा अभिषिक्त करण्यात आली.

दुसऱ्या एका दरोड्याच्या प्रयत्नात पोलिसांनी अकस्मात यश मिळवले. तामिळनाडूतील मूर्तिचोरांची टोळी कोचीनमधील दुसऱ्या मंदिरातून मूर्ती चोरण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आली. त्यांनी काही वर्षांपूर्वी मृदंग शैलेश्वरीची मूर्ति चोरल्याची कबुली दिली होती. त्याच प्रकारे, तिसऱ्या दरोड्याच्या प्रयत्नामागील लोकदेखील केरळमधील कासारगोड येथील मंदिरातून मूर्ति चोरण्याचा प्रयत्न करताना चुकून पकडले गेले. त्यांनी मृदंग शैलेश्वरी मंदिरावरील तिसऱ्या दरोड्यातील आपला सहभाग कबूल केला.

साहजिकच, चोरांनी मृदंग शैलेश्वरी मूर्ति अर्ध्यावर सोडून देण्यामागचे कारण पोलिसांनाही जाणून घ्यायचे कुतूहल होते, दोन्ही टोळ्यांनी एकच कारण सांगितल्याने पोलीस चक्रावून गेले.

जेव्हा त्यांनी मूर्तीला स्पर्श केला, तेव्हा त्यांनी दिशा समजण्याची शक्ती गमावली आणि प्रत्येकाने गोंधळलेल्या मनःस्थितीत प्रवेश केला आणि दिशांचे सर्व भान गमावले आणि त्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत आणि त्यांना अर्ध्यातच मूर्तीचा त्याग करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

तीन अयशस्वी प्रयत्नांनंतरही मूर्ती चोरण्याचा मोह चोरांच्या टोळीला आवरला नाही. यावेळी ही टोळी केरळ राज्यातील अल्पसंख्याक समाजातील अनुभवी चोरांची टोळी होती. मूर्तीच्या अलौकिक शक्तींवर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांनीही मूर्तीचा त्याग केला. नंतर पकडले असता त्यांनी मूर्ती सोडून देण्याचे तेच कारण सांगितले.

आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा आपण आपल्या बुद्धिमत्तेने आणि आपल्या वैज्ञानिक ज्ञानाने तर्क करू शकत नाही.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares