मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्याचं ‘व्यवस्थापन’… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

 

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ आयुष्याचं ‘व्यवस्थापन’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं

हे कळलं तर, आयुष्य ‘भावगीत’ आहे.

*

किती ताणायचं आणि कधी नमतं घ्यायचं

हे उमजलं तर आयुष्य ‘निसर्ग’ आहे.

*

किती आठवायचं आणि काय विसरायचं,

हे जाणलं तर आयुष्य ‘इंद्रधनूष्य’ आहे.

*

किती रुसायचं आणि केव्हा हसायचं…

हे ओळखलं तर आयुष्य ‘तारांगण’ आहे.

*

कसं सतर्क रहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं,

हे जाणवलं तर आयुष्य ‘नंदनवन’ आहे.

*

कुठे? कधी? किती? काय? केव्हा? कसं?

याचा समतोल साधता आला तर, आयुष्य खूप सुंदर आहे.

*

त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं,

अधिकार असूनही नम्र राहणं, राग असूनही शांत राहणं,

– – – यालाच आयुष्याचं ‘व्यवस्थापन’ म्हणतात.

 

कवी : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४० ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- लिलाताईचा हा श्रीदत्तदर्शनाचा नित्यनेम पुढे प्रदीर्घ काळ उलटून गेल्यानंतर माझ्या संसारात अचानक निर्माण होणाऱ्या दुःखाच्या झंझावातात त्या दुःखावर हळुवार फुंकर घालणार आहे याची पुसटशी कल्पनाही मला तेव्हा नव्हती.)

आम्ही कोल्हापूरला रहात होतो तेव्हाची गोष्ट. १९७९ साल. आमच्या संसारात झालेलं समीरबाळाचं आगमन सुखाचं शिंपण करणारंच तर होतं. बाळाला घेऊन आरती माहेरहून घरी आली तेव्हाचं नजरेत साठवलेलं त्याचं रुप आजही माझ्या आठवणीत जिवंत आहे. समीरबाळाचं छान गोंडस बाळसं,.. लख्ख गोरा गुलाबी रंग.. काळेभोर टपोरे डोळे.. दाट जावळ.. एवढीशी लांबसडक बोटं.. सगळंच कसं सुंदर आणि लोभसवाणं!

समीर माझ्या सहवासात येऊन मोजके दिवसच झाले होते. माझ्या नजरेत नजर घालून ओळख पटल्याचं छानसं कोवळं हसू समीर अजून हसलाही नव्हता त्यापूर्वीच कधी कल्पनाही केली नव्हती अशा त्या अरिष्टाची सुरुवात झाली. समीरला ट्रिपलपोलिओचा डोस द्यायचा होता. डॉ. देवधर यांच्या हॉस्पिटलमधे मी न् आरती त्याला घेऊन गेलो तर तिथे ट्रिपलपोलिओसाठी आधीपासूनचीच लांबलचक रांग. दुसऱ्या मजल्यावरील हाॅस्पिटलपासून सुरू झालेली ती रांग दोन जिने उतरून महाद्वार रोडच्या एका बाजूने वाढत चाललेली. पावसाळ्याचे दिवस. आभाळ गच्च भरलेलं. कुठल्याही क्षणी पाऊस सुरु होईल असं वातावरण. आम्ही रांगेत ताटकळत उभे. त्यात समीर किरकिरु लागलेला. काल रात्रीपासून हवापाण्याच्या बदलामुळं असेल त्याचं पोट थोडं बिघडलेलं होतं. रांग हलायची शक्यता दिसेना तसे पाऊस सुरु होण्यापूर्वी घरी जाऊ आणि नंतर कधीतरी आधी अपॉइंटमेंट घेऊन येऊ असं ठरवून आम्ही तिथून निघालो. आमचं घर जवळच्या ताराबाई रोडवरुन पुढं आलं की चालत दहा मिनिटांच्या अंतरावर. ताराबाई रोडवर येताच माझं लक्ष सहजच उजव्या बाजूच्या एका दवाखान्याच्या बोर्डकडे गेलं.

डाॅ. जी. एन्. जोशी. बालरोगतज्ञ बोर्ड वाचून मी थबकलो.

” इथं ट्रिपल पोलिओ डोस देतात कां विचारूया?” मी म्हंटलं. तिने नको म्हणायचा प्रश्नच नव्हता. आजच्या आज डोस देऊन होतोय हेच महत्त्वाचं होतं. आम्ही जिना चढून डॉ. जोशींच्या क्लिनिकमधे गेलो. मी स्वतःची ओळख करून दिली. आमच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. समीरचं किरकिरणं सुरूच होतं. त्यात त्याने दुपटं घाण केलं. डाॅ. नी नर्सला बोलावलं. आरती समीरला घेऊन तिच्याबरोबर आत गेली. त्याला स्वच्छ करून बाहेर घेऊन आली. ट्रिपल पोलिओचा डोस देऊन झाला. तेवढ्यांत त्याला पुन्हा लूज मोशन झाली. चिंताग्रस्त चेहऱ्याने डॉक्टर माझ्याकडेच पहात होते.

“बाळाचं पोट बिघडलंय कां? कधीपासून?” त्यांनी विचारलं.

“काल रात्री त्याला एक दोनदा त्रास झाला होता. आणि आज सकाळी इकडे येण्यापूर्वीसुध्दा एकदा. पाणी बदललंय म्हणून असेल कदाचित. पण तोवर छान मजेत असायचा. कधीच कांही तक्रार नव्हती त्याची. “

“ठीक आहे. एकदा तपासून बघतो. वाटलंच तसं तर औषध देतो. ” डॉक्टर म्हणाले.

त्यांनी समीरला तपासलं. त्याची नाडीही पाहिली. ते कांहीसे गंभीर झाले.

” बाळाला एक-दोन दिवसासाठी अॅडमिट करावं लागेल “

” अॅडमिट?कां? कशासाठी ?”

” तसं घाबरण्यासारखं काही नाहीय. पण इन्फेक्शन आटोक्यांत आणण्यासाठी तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. एक-दोन दिवस सलाईन लावावं लागेल. पुढे एखादा दिवस ऑब्झर्वेशनखाली राहील. “

घरी आम्ही दोघेच होतो. आई मोठ्या भावाकडे सातारला गेली होती. पुढच्या आठवड्यात आरतीची मॅटर्निटी लिव्ह संपणार होती. त्यापूर्वी आई येणार होतीच. आत्ता लगेच अॅडमिट करायचं तर तिला लगोलग इकडे बोलावून घेणे आवश्यक होऊन बसेल. मला ते योग्य वाटेना.

“डॉक्टर, घरी आम्ही दोघेच आहोत. आम्हा दोघांच्या पेरेंट्सना आम्ही आधी बोलावून घेतो. तोवर त्याला तात्पुरतं औषध द्याल का कांही? तरीही बरं वाटलं नाही तर मात्र वाट न बघता आम्ही त्याला अॅडमिट करू. “

“अॅज यू विश. मी औषध लिहून देतो. दिवसातून तीन वेळा एक एक चमचा त्याला द्या. तरीही मोशन्स थांबल्या नाहीत तर मात्र रिस्क न घेता ताबडतोब अॅडमिट करा.”

त्यांनी औषध लिहून दिलं. जवळच्याच मेडिकल स्टोअरमधून आम्ही ते घेतलं. यात बराच वेळ गेला होता. मला बँकेत पोहोचायला उशीरच होणार होता. मी समोरून येणारी रिक्षा थांबवली. दोघांना घरी पोचवलं. दोन घास कसेबसे खाऊन माझा डबा भरून घेतला आणि बँकेत जाण्यासाठी बाहेर आलो. आरती बाळाला मांडीवर घेऊन बसलेली होती.

“त्याला औषध दिलंयस कां?”

“पेंगुळला होता हो तो. आत्ताच डोळा लागलाय त्याचा. थोडा वेळ झोपू दे. तोवर मी पाणी गरम करून ठेवते. जागा झाला की लगेच देते. ” ती म्हणाली.

तो शनिवार होता.

“आज हाफ डे आहे. मी शक्यतो लवकर येतो. कांही लागलं तर मला बॅंकेत फोन कर लगेच. काळजी घे ” मी तिला धीर दिला न् घाईघाईने बाहेर पडलो.

त्याकाळी क्वचित एखाद्या घरीच फोन असायचा. त्यामुळे फोन करायचा म्हणजे तिला कोपऱ्यावरच्या पोस्टात जाऊनच करायला लागणार. बाळाला घेऊन कशी जाईल ती?

हाफ डे असला तरी बॅंकेतून बाहेर पडायला संध्याकाळ उलटून गेलीच. त्यात बाहेर धुवांधार पाऊस. घरी पोचेपर्यंत अंधारुन तर आलं होतंच शिवाय मी निम्माशिम्मा भिजलेलो. आत जाऊन कपडे बदलून आधी गरम चहा घ्यावा असं वाटलं पण तेवढीही उसंत मला मिळणार नव्हती. कारण बेल वाजवण्यापूर्वीच दार किलकिलं असल्याचं लक्षात आलं. दार ढकलताच अजून लाईट लावलेले नसल्यामुळे आत अंधारच होता. पण त्या अंधूक प्रकाशातही समोर भिंतीला टेकून आरती समीरला मांडीवर घेऊन थोपटत बसली असल्याचं दिसलं.

“अगं लाईट नाही कां लावायचे? अंधारात काय बसलीयस?” मी विचारलं आणि लाईटचं बटन ऑन केलं. समोरचं दृश्य बघून चरकलोच. समीर मलूल होऊन तिच्या मांडीवर केविलवाणा होऊन पडलेला. निस्तेज डोळे तसेच उघडे. ऐकू येईल न येईल अशी म्लान कुरकूर फक्त.

“काय झालं?अशी का बसलीयस?”

“सांगते. आधी तुम्ही पाय धुवून या न् याला घ्या बरं थोडावेळ. पाय खूप अवघडलेत हो माझे. “

मनातली चहाची तल्लफ विरुन गेली. मी पाय धुऊन घाईघाईने कपडे बदलले आणि समीरला उचलून मांडीवर घेऊन बसलो. त्याचा केविलवाणा चेहरा मला पहावेना.

“जा. तू फ्रेश होऊन ये, मग बोलू आपण. ” मी आरतीला म्हंटलं. पण ती आत न जाता तिथंच खुर्चीवर टेकली. तिचे डोळे भरुन आले एकदम.

“तुम्ही ऑफिसला गेल्यापासून फक्त एक दोन वेळाच दूध दिलंय त्याला पण तेही पोटात ठरत नाहीय हो. आत्तापर्यंत चार दुपटी बदललीयत. काय करावं तेच कळत नाहीय. किती उशीर केलात हो तुम्ही यायला.. “

“तू फोन करायचा नाहीस का? मी रोजची सगळी कामं आवरत बसलो. त्यात हा पाऊस. म्हणून उशीर झाला. तू औषध कां नाही दिलंस?”

“दिलंय तर. दोन डोस देऊन झालेत. तिसरा रात्री झोपताना द्यायचाय. पण औषध देऊनही त्रास थांबलाय कुठं? उलट जास्तच वाढलाय. मला काळजी वाटतेय खूsप. काय करायचं?”

डाॅ. जोशी म्हणालेच होते. त्रास वाढला तर रिस्क घेऊ नका म्हणून. आम्हा दोघानाही या कशाचाच अनुभव नव्हता. अॅडमिट करण्यावाचून पर्यायही नव्हता. कुणा डाॅक्टरांच्या ओळखी नव्हत्या. समीरला डाॅक्टरांकडे न नेता रात्रभर घरीच ठेवायचीही भीती वाटत होती. माझी मोठी बहिण आणि मेहुणे सुदैवाने कोल्हापुरातच रहात होते. त्यांना समक्ष भेटून त्यांच्याशी बोलणं आवश्यक होतं. मी कपडे बदलून जवळचे सगळे पैसे घेतले न् बाहेर आलो.

” कुठे निघालात?”

“ताईकडे. त्या दोघांना सांगतो सगळं. त्यांनाही सोबत घेऊ. तू आवरुन ठेव. मी रिक्षा घेऊनच येतो. जोशी डाॅक्टरांकडे अॅडमिट करायच्या तयारीनेच जाऊ. बघू काय म्हणतायत ते. “

मी ताईकडे गेलो. सगळं सांगितलं.

“जोशी डाॅक्टर? पार्वती टाॅकीजजवळ हाॅस्पिटल आहे तेच का?” मेव्हण्यांनी विचारलं.

मी सकाळी डाॅक्टरांनी आम्हाला दिलेलं त्यांचं व्हिजिटिंग कार्ड खिशातून काढलं. पाहिलं तर हाॅस्पिटलचा पत्ता तोच होता.

” हो. तेच. त्यांचं ताराबाई रोडवर क्लिनिक आहे आणि हॉस्पिटल पार्वती टॉकीजजवळ. तुमच्या माहितीतले आहेत कां?”

” नाही. पण नाव ऐकून होतो. तरीही कोल्हापुरात डॉ. देवधर हेच प्रसिद्ध पेडिट्रेशियन आहेत. आधी त्यांना दाखवू या का? “

 ” चालेल. पण असं ऐनवेळी जाऊन भेटतील कां ते?नाही भेट झाली तर? सकाळी खूप गर्दी होती आम्ही ट्रिपलपोलिओ डोससाठी गेलो तेव्हा, म्हणून म्हटलं”

” ठिकाय. तू म्हणतोस तेही बरोबरच आहे. चल. “

आम्ही रिक्षातूनच घरी गेलो. आरती दोघांचं आवरून आमचीच वाट पहात होती. पावसाचा जोर संध्याकाळपासून ओसरला नव्हताच. समीरबाळाचं डोकं काळजीपूर्वक झाकून घेत ती कशीबशी रिक्षात बसली. मी रिक्षावाल्याला पार्वती टाॅकीजजवळच्या डाॅ. जोशी हाॅस्पिटलला न्यायला सांगितलं. रिक्षा सुरु झाली न् माझा जीव भांड्यात पडला. आत्तापर्यंत ठरवल्याप्रमाणे सगळं सुरळीत सुरू होतं असं वाटलं खरं पण ते तसं नव्हतं यांचा प्रत्यय लगेचच आला. एकतर पावसामुळे रिक्षा सावकाश जात होती. रस्त्यात खड्डेही होतेच. आपण कुठून कसे जातोय हेही चटकन् समजत नव्हतं. तेवढ्यांत रिक्षा थांबली.

” चला. आलं हॉस्पिटल. ” रिक्षावाला म्हणाला. उतरतानाच माझ्या लक्षांत आलं की आपण महाद्वार रोडवरच आहोत. त्या अस्वस्थ मन:स्थितीत मला त्या रिक्षावाल्याची तिडीकच आली एकदम.

“मी पार्वती टॉकीजजवळ डॉ. जोशी असं सांगितलं होतं ना तुम्हाला? इथं उतरुन काय करू?”

 त्यांने चमकून माझ्याकडं पाहिलं. थोडासा वरमला. मी पुन्हा रिक्षात बसलो.

“इथं कोल्हापुरात लहान वयाच्या पेशंटना देवधर डाकतरकडंच आणत्यात समदी. रोज चारपाच फेऱ्या हुत्यात बघा माज्या रिक्षाच्या. सवयीने त्येंच्या दवाखान्याम्होरं थांबलो बगा.. ” तो चूक कबूल करत म्हणाला. पण….. ?

पण ती त्याची अनवधानाने झालेली चूक म्हणजे पुढील अरिष्टापासून समीरबाळाला वाचवण्याचा नियतीचाच एक केविलवाणा प्रयत्न होता हे सगळं हातातून निसटून गेल्यानंतर आमच्या लक्षात येणार होतं… !!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आनंदाचे डोही… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ आनंदाचे डोही…  ☆ श्री सुनील देशपांडे

सध्या वयाच्या पंचाहत्तरी मधून मार्गक्रमण चालू आहे. ७५ नंतर पूर्वी वानप्रस्थाश्रम असे म्हणत. हळूहळू व्यावहारिक जगतापासून दूर होणे जमले पाहिजे. किंबहुना जीवनातील व्यवहारांपासून दूर होता आले पाहिजे असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.

‘आता उरलो उपकारापुरता’ असे पूर्वी म्हणत पण आता म्हणावेसे वाटते ‘आता उरलो समाजापुरता. ’ मृत्यूनंतर हळूहळू सगळे आपल्याला विसरतातच. परंतु या वयापासून जिवंतपणी सुद्धा माणसे विसरू लागतात.

माझे सासरे एकदा मला म्हणाले ‘ मी मेल्यावर तुम्ही माझ्याविषयी चार चांगले शब्द बोलाल. माझ्यावर कविता कराल. पण ती ऐकायला मी कुठे असेन ? त्याचा काय उपयोग? माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटते याबद्दल माझ्यावर एक कविता जिवंतपणी करून मला ऐकवा तेवढी माझी शेवटची इच्छा समजा’ खरोखरच मी दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर कविता लिहून त्यांना ऐकवली. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद पाहणे हा एक स्वर्गीय अनुभव होता.

मला आता सर्वच परिचितांना सांगावेसे वाटते. ज्यांना प्रेमापोटी नाती जपायची आवड व इच्छा असेल त्यांनी मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी कधीतरी येऊन जावे.

‘सुनील गेला’ असा फोन येईल तेव्हा तुम्ही ‘ताबडतोब निघतोच आहे’ असे म्हणून गडबडीने यावयास निघाल हे मला नको आहे. मुळातच मी देहदानाची इच्छा व्यक्त केलेली असल्यामुळे मृत्यूनंतर कोणी भेटायला यावे इतका वेळ असणारच नाही. दुसरे म्हणजे मृत्यूनंतर ‘भेटणे’ शक्यच नाही. त्याला आपण पारंपरिक भाषेत दर्शन म्हणतो. हे कसले दर्शन? माणसाचे जिवंतपणी दर्शन न घेता मृत्यूनंतर दर्शन घेणे हे विडंबन आहे असे मला वाटते. मृत्यूनंतर सहा तासाच्या आत देहदान करावयाचे असते. त्यामुळे अगदीच जवळचे चार नातेवाईक किंवा मित्र यांनी ती इच्छा पूर्ण करण्यासाठी यावे याशिवाय त्यात दुसरे काही साध्य नाही.

माझ्या एका मित्राच्या सासर्‍यांनी जिवंतपणी श्राद्धविधी अर्थात ‘साक्षात स्वर्ग दर्शन’ या नावाचा विधी त्यांचे गावी केला. सगळ्यांच्या गाठीभेटी गळाभेटी आणि सहभोजन असा मस्त समारंभ करण्यात आला. हीच आपली अंतिम भेट म्हणून सर्वांचा निरोप घेतला. त्यानंतर काही वर्षांनी त्यांचा प्रत्यक्ष मृत्यू झाला आणि देहदान सुद्धा झाले. ही संकल्पना मला खूप भावली.

परंतु एखादा दिवस ठरवून त्या दिवशी सर्वांना बोलावणे हा इतरांच्या सोयी गैरसोयीचा भाग असतो. बऱ्याच वेळा इच्छा असून सुद्धा तो दिवस सोयीचा नसतो. तसेच खूप जास्त माणसे एका वेळेला जमली की कुणाशीच नीट संवाद होत नाही.

म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते…. 

… वर्षामध्ये जेव्हा केव्हा जमेल, शक्य होईल तेव्हा येऊन भेटावे.

अर्थात त्यात औपचारिकता नको. जुळलेले भावबंध असतील तरच भेटीत आनंद असतो.

सोशल मीडियावर मेसेज टाकून मी जिवंत असल्याची खबरबात सातत्याने देत असतोच.

अर्थात मृत्यू कधी कोणाला सांगून येत नसतो. कोणत्या क्षणाला तो येईल कुणी सांगावे? म्हणूनच  मी गुणगुणत असतो…..

… ‘ न जाने कौनसा पल मौत की अमानत हो, हर एक पल की खुशी को गले लगाते चलो ’.

त्यामुळे प्रत्येक क्षणाक्षणाचं सुख मी उपभोगत असतो. कुणाच्या येण्याने त्या सुखाला आणखी एक आनंदाची झालर लाभेल.

….. जे काही आयुष्याचे क्षण शिल्लक असतील त्या क्षणांमध्ये अधिकाधिक आनंद जोडता यावा आणि जिवंतपणीच स्वर्ग सुखाचा अनुभव घेता यावा ही मनापासून इच्छा.

‘ जीवन है अगर जहर तो पीना ही पडेगा ’.. या अनुभवापासून दूर होत.

आता फक्त अनुभूती हवी आहे… 

… ‘आनंदाचे डोही आनंद तरंग…’

© श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भोजन आणि संगीत… लेखक : डॉ. अनिल वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ भोजन आणि संगीत… लेखक : डॉ. अनिल वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

… एक अभ्यासपूर्ण लेख – 

🎼 🎤🎻🎹 🎷🥁

रविवारी पुणे ओपीडी मधे कोणत्या रुग्णाला सांगितले नक्की आठवत नाही.

काय सांगितले ते आठवत आहे.

स्वयंपाक करत असताना, भोजन करत असताना आणि भोजन झाल्यानंतर १ तास ‘मंद स्वरातील’ संगीत घरी लावत जा.

 

इथे आपल्याला म्युझिक, डीजे, मॅश अप नको आहे. भावगीत, भक्तीगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, वाद्यांचा शांत आवाज पुरेसे आहे.

त्याने काय होईल ?? रुग्णाचा प्रश्न! 

दोन महिने न चुकता करा आणि मला तुम्हीच सांगा… माझे उत्तर! 

संगीत – स्वर यांचा आणि आपल्या शरीरातील दोष स्थितीचा ‘थेट’ संबंध आहे.. त्या विषयी….

शरीरातील दोषांची साम्यावस्था आणि शरीराचा बाहेरच्या घटनांना मिळणारा प्रतिसाद यात पंचज्ञानेंद्रिय पैकी कानाशी बराच जवळचा संबंध असतो.

प्रकाश आणि आवाज याचा वेग प्रचंड असतो.

कित्येक मैल दूर वीज पडली तर आपला जीव घाबरा होतो.

चार रस्ते सोडून कोठे करकचून ब्रेक कोणी मारला तर आपण काळजी करतो.

घरी कोणी मोठ्याने बोलले तर नाजूक मनाच्या लोकांना चक्कर येते… इत्यादी! 

पूर्वी जेव्हा लग्न हा संस्कार असायचा, इव्हेन्ट नसायचा तेव्हा बिस्मिल्ला साहेबांची सनई आपले स्वागत करायची.

आता योयो किंवा बादशाह, डीजे किंवा ढोल पथक आपले वेलकम करते.

संस्कारापेक्षा भपका जास्त.

शांती पेक्षा गोंगाट जास्त.

याने काय होते ? मूळ हेतुकडे दुर्लक्ष होऊन विनाकारण हृदयात धडधड वाढते.

पुढील वर्ग पहा – 

१. जेवण बनवत असताना फोनवर बोलणारे.

२. जेवण करत असताना फोन वर बोलणे – व्हिडीओ पाहणे – टीव्ही पाहणे – इमेल्स पाहणे इत्यादी.

३. जेवण करत असताना भांडणे / मोठ्याने बोलणे, समोर असलेल्या प्रदार्थाबद्दल वाईट बोलणे.

४. गप्पा मारत जेवणे.

५. जेवण झाल्यावर ऑफिस चे काम / घरकाम / बाहेर जाणे इत्यादी.

या पाच प्रकारात आपण कोठे ना कोठे बसत असतो. अगदी रोज.

चार घास खायला मर मर करायची आणि चार घास युद्धभूमीवर बसून खायचे..

डोकं शांत नाही. जेवणाकडे लक्ष नाही. जिभेवर नियंत्रण नाही. ही अनारोग्य निर्माण करणारी तिकडी! 

संगीत हे नादावर आधारलेले आहे.

अग्नी आणि वायू यांच्या योगाने उत्पन्न होणाऱ्या ध्वनीला ‘नाद ‘ म्हणतात.

आपल्या हृदयात २२ नाडी आहेत असं मानले जाते. या क्रियाशील नाड्यानी हृदय आणि शरीर याचे संचलन होते.

याच आधारावर संगीतात २२ श्रुती मानल्या आहेत. या एका पेक्षा एक वरच्या पट्टीत आहेत.

बावीस श्रुती मधून बारा स्वर.

हिंदुस्थानी संगीतातील सात मुख्य स्वरांपैकी षड्ज आणि पंचम हे स्वर अचल असतात. ऋषभ, गांधार, धैवत आणि निषाद हे स्वर शुद्ध आणि कोमल या दोन चल स्वरूपांत व्यक्त होतात, तर मध्यम हा स्वर शुद्ध आणि तीव्र असा स्पष्ट होतो. याप्रमाणे हिंदुस्थानी संगीतातील पायाभूत सप्तक पुढीलप्रमाणे :

– षड्ज (सा),

– कोमल ऋषभ (रे),

– शुद्ध ऋषभ (रे),

– कोमल गांधार (ग),

– शुद्ध गांधार (ग),

– शुद्ध मध्यम (म),

– तीव्र मध्यम (म),

– पंचम (प),

– कोमल धैवत (ध),

– शुद्ध धैवत (ध),

– कोमल निषाद (नी),

– शुद्ध निषाद (नी) 

– आणि षड्ज (सा).

यातील षड्ज म्हणजे सहा स्वरांना जन्म देणारा सूर्य.

श्रवणेंद्रिय मार्फत ऐकलेले जे ब्रह्मरंध्र पर्यंत पोहोचून त्या नादाचे विविध प्रकार होतात त्यांना श्रुती म्हणतात.

तीन सप्तक – 

१. मंद सप्तक – हृदयातून निघणारा आवाज 

२. मध्य सप्तक – कंठातून निघणारा आवाज 

३. तार सप्तक – नाभी पासून निघून ब्रह्म रंध्र पर्यंत जाणारा आवाज.

आपल्या दोषांची स्थिती दिवसभरात बदलत असते. सकाळी कफ वाढतो. दुपारी पित्त आणि रात्री वात वाढतो.

रागवर्गीकरणाची आणखी एक पद्धत म्हणजे समयाश्रित राग ही होय.

हिंदुस्थानी संगीतात परंपरेनुसार अमुक एक राग अमुक वेळेला प्रस्तुत करावा, असा संकेत आहे. याकरिता रागांचे तीन वर्ग मानले आहेत : रे, ध, शुद्ध असणारे राग रे, ध कोमल असणारे राग आणि ग, नी कोमल असणारे राग.

यात शुद्ध मध्यम व तीव्र मध्यम या स्वरांना समयानुसार मिळवून, पहाटे ४ ते ७ व दुपारी ४ ते ७ अशावेळी संधिप्रकाशसमयी सामान्यतः रे कोमल व ध शुद्ध घेणारे राग गाइले जातात.

सकाळी ७ ते १० व 

रात्री ७ ते १० असे दुसरे समयाचे विभाजन असून,

रात्री १० ते ४ व 

दुपारी १० ते ४ असे तिसरे विभाजन आहे. शरीरातील दोषांचे संतुलन करायची क्षमता या रागात, संगीतात आहे.. ! 

आपल्याला कायम उद्दीपित करणारे संगीत ऐकायची सवय झाली आहे.

बेशरम रंग असेल किंवा काटा लगा व्हाया बदनाम मुन्नी ते शीला ची जवानी.. स्पोटिफाय वर हेच ऐकणे सुरु असते.

मी संगीतातील तज्ज्ञ नाही. मी संगीत शिकलेलो नाही.

ठराविक आवाजाला शरीर प्रतिक्रिया देते हे सत्य आहे.

स्वयंपाक करत असताना कानावर भिगे होठ तेरे पडत असेल तर सात्विक मेनू पण तामसिक गुणांचा होतो.

जेवण करत असताना कानावर रडकी गाणी पडत असतील तर राजसिक वाढ होते.

आपण काय खातोय यापेक्षा आपण कोणत्या वातावरणात खातोय हे महत्वाचे असते! 

वर उल्लेख केलेले संगीत आपल्या वृत्ती स्थिर करतात.

आपण जे काम करत आहोत त्यात एकाग्र करण्यास मदत करतात.

आपण जे खाल्ले आहे ते पचवायला मदत करतात… !

क्राईम पेट्रोल बघत जेवण करणारे कालांतराने आक्रमक होतात असे माझे निरीक्षण आहे! 

कोणाला यावर विश्वास बसत नसेल तर दोन महिने हे करून बघावे.

मी स्वतः स्वयंपाक करत असताना, जेवताना, रुग्ण तपासणी करत असताना गीत रामायण, मनाचे श्लोक, क्लासिकल इत्यादी ऐकत असतो.

आपल्याला कोठे ‘कुंडी ना खडकाओ राजा सीधे अंदर आओ राजा’ असे स्टंट करायचे आहेत.

आजूबाजूचे वातावरण सात्विक असेल तरच खाल्लेले अन्न सात्विक गुणाचे होते.

नाहीतर फक्त सलाड चरून कायम शिंग मारायची खुमखुमी असलेले मेंढे आपल्या आजूबाजूला शेकड्याने आहेतच की..

🎼 🎤 🎼

लेखक : डॉ. अनिल वैद्य

 …. एक संगीत प्रेमी…

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ब्रेडची टोपली… – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? वाचताना वेचलेले ?

☆ ब्रेडची टोपली… – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

काल दुपारी मी परत तिच्या घराबाहेर ब्रेडच्या टोपल्या बघितल्या. शेजारी पाटी लिहिली होती, “ज्यांना खरोखर जरूर आहे, त्यांनीच फक्त हवे तेवढे ब्रेडचे लोफ घ्यावेत. आज मी एवढेच देऊ शकते. संपले असतील तर दार वाजवून अजून आहेत का विचारू नये. ”

दोन मोठ्या टोपल्यात साधारण २५-३० ब्रेडचे लोफ होते. मी गेले कित्येक महिने चालायला जाताना त्या ब्रेडच्या टोपल्या बघत होते. मला हे नक्की काय चाललंय हे जाणून घेण्याची फार इच्छा होती, म्हणून मी तिचं दार वाजवलं. बराच वेळ कुणी दार उघडलं नाही. मी परत जायला निघाले.. तेवढ्यात त्या घराच्या खिडकीतून आवाज आला, “काय हवंय?”

मी म्हणाले, “या ब्रेडबद्दल कुतूहल होतं. बाकी काही नाही. मला ब्रेडची जरूर नाही. ”

तिनं दार उघडलं. साधारण पन्नाशीतली एक बाई नर्सच्या पोशाखात दारात दिसली. “तू पत्रकार आहेस का? कुठल्या वर्तमानपत्रासाठी लिहिणार असशील, तर मला बोलायचं नाही. ”

“नाही नाही.. मी पत्रकार नाही. मी नेहमी चालायला येते या रस्त्यावर. ही ब्रेडची टोपली तुम्ही ठेवता? कुणासाठी? मी काही मदत करू शकते का?” मी म्हणाले.

ती म्हणाली, ”मी जवळच्या हॅास्पिटलमधे नर्स म्हणून काम करते. काही वर्षांपूर्वी एक पेशंट ॲडमिट झाला. तो लहान असताना त्याच्या घरची अत्यंत गरीबी होती. वडील पाव, बिस्कीटं तयार करणारे बेकर होते. त्यामुळे तो पण ब्रेड, पेस्ट्री उत्तम बनवत असे. वडील गेल्यावर, १५-१६ वर्षांचा असल्यापासून तो एका टोपलीत ब्रेड भरून गावात हिंडून विकत असे. त्यातून बरा पैसा मिळू लागल्यावर पै पै जमवून त्याने स्वत:ची बेकरी सुरू केली. हळूहळू सर्वांनाच या बेकरीचे पदार्थ खूप आवडू लागले. त्याच्या हातात चार पैसे आले. खाण्याची मारामार संपली. घरही घेतलं. गाड्या घेतल्या.

या गावानं आपल्याला खूप काही दिलं, या भावनेनं त्यानं गरजूंसाठी ताजे ब्रेडचे लोफ दर रविवारी दोन तीन टोपल्या भरून घराबाहेर ठेवायला सुरूवात केली. तासाभरात ते लोफ गरजू लोकांनी नेलेले असत. काही लोक टोपलीत चार पैसे टाकत, एखादी थॅंक्यू नोट टाकत, तर कधी बाहेर ब्रेडला जेवढे पैसे पडतात तेवढे टाकत. एकदा कुणीतरी एक चांदीची बांगडी सुध्दा टाकली होती.

त्याचा संसार सुखाने चालला होता. मुलंबाळं चांगली निघाली. या टोपलीतील ब्रेड नेणाऱ्यांच्या दुव्यांमुळे आपलं दारिद्र्य संपलं, भरभराट झाली असं त्याला वाटायचं. काही संकटं आली, पण ती दूर झाली. वयाच्या ७६ वर्षी तो अल्पशा आजाराने गेला. त्याची बायको पण वर्षात गेली. त्याने ICU मधे असताना मला विचारले, ”मी तुझ्या नावाने काही पैसे ठेवत आहे. दर आठवड्याला गरजू लोकांसाठी तू ब्रेडची टोपली ठेवशील का? मला एके काळी ब्रेडचा एक तुकडा मिळायची मारामार होती. ते इतरांच्या नशिबी येऊ नये, म्हणून मी हे आयुष्यभर करत आलो आहे. माझी मुलं म्हणतात की याची जरूर नाही. म्हणून तुला विचारत आहे.. मुलांना समजत नाही की देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही. ”

मी ‘हो’ म्हणाले. कुठेही त्याच्या नावाचा उल्लेख नसावा आणि वर्तमानपत्रात बातमी, फोटो काही नसावेत, एवढीच त्याची अट होती. त्यानं दिलेले पैसे वापरून मी दर रविवारी दाराबाहेर ब्रेड ठेवू लागले. गेल्या वर्षी त्यानं दिलेले पैसे संपले. मी माझ्या पैशांनी कधी पाच, दहा, पंधरा ब्रेड ठेवू लागले. लोकं ब्रेड घेतात व जमेल ते आणि भरपूर प्रेम या टोपलीत टाकतात. मलाही हे लोकांचं प्रेम आवडू लागलं. मागच्या वर्षीच्या वादळात जेव्हा माझ्या घरावर मोठं झाडं पडलं, तेव्हा पाच पन्नास लोक आले व त्यांनी सर्व सफाई करून माझं घर पूर्ववत करून दिलं. माझ्या अडचणी पण कमी होत गेल्या. कारण देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही. ”

मला खूप कौतुक वाटलं. ती म्हणाली, “त्यानं ही प्रथा सुरू केली आहे ती आपण चालू ठेवू. मला काही देऊ नको, पण तुझ्या घराबाहेर एक ब्रेडची बास्केट ठेव, म्हणजे त्याच्या आत्म्याला शांती लाभेल आणि तुला जेव्हा एखादा असा माणूस भेटेल, जो न चुकता ही प्रथा चालवेल, फक्त त्यालाच ही गोष्ट करायला सांग. कुणाला सांगायचे हे तुझं तुला कळेल, जसं मला तुझ्याशी बोलताना कळलं. ”

मी काही ब्रेडचे लोफ विकत घेतले व माझ्या घराबाहेर एका बास्केटमधे ठेवले. केवळ देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही म्हणून नाही.. पण त्या निनावी व्यक्तीने मरणानंतरही कुणाला ब्रेडचा एक तुकडा मिळण्याची भ्रांत पडू नये ही इच्छा व्यक्त केली म्हणून!

पैशाचा प्रश्नच नाही. कारण..

…देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही.

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी.

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शब्द, शब्द आणि शब्द… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

🌺 विविधा 🌺

☆ शब्द शब्द आणि शब्द… 🤔 ☆ श्री सुहास सोहोनी ☆

थारेपालट की थालेपारट ??

परोक्ष की अपरोक्ष ??

व्यस्त की व्यग्र ??

चपल की अचपल ??

व्यासपीठ की मंच ??

असे अनेक शब्द आहेत ना, जे चुकीच्या जागी – चुकीच्या अर्थाने सर्रासपणे वापरले जातात ! एक म्हणजे अर्थ नीट माहीत नसतो किंवा चुकीचा शब्द वापरायची रूढी किंवा परंपरा असते.

वरीलपैकी पहिलाच शब्द बघा ना. थारेचा मूळ शब्द थारा म्हणजे जागा किंवा आश्रय. पालट म्हणजे बदलणे. जसे कायापालट, खांदेपालट. म्हणून थारेपालट हा योग्य शब्द. म्हणजे जागा बदलणे. पण थालेपारट हा शब्द सुद्धा अनेक ठिकाणी चुकीने वापरला जातो.

 

परोक्ष आणि अपरोक्ष मध्ये तर घोळ ठरलेलाच. परोक्ष म्हणजे नजरेआड आणि अपरोक्ष म्हणजे नजरेसमोर. पण सर्रासपणे हे शब्द उलट अर्थी वापरले जातात.

 

“मी कामात व्यस्त होतो. ” असं म्हणणं खरं तर चुकीचं आहे. “मी कामांत व्यग्र होतो. ” हे बरोबर. अस्त-व्यस्त म्हणजे सुलट व उलट. त्याचे रूप बदलून नित्य वापराचा शब्द झाला अस्ताव्यस्त. म्हणजे पसरलेलं, बेशिस्त, पसारा. सम आणि व्यस्त हे विरोधाभासी शब्द तर आपण नेहमीच वापरतो. त्यामुळे “मी कामात व्यग्र आहे” हे बरोबर. तथापि व्यस्त या शब्दाला सुद्धा अलीकडे कामात गुंतलेला असणे, कामात बुडालेला असणे, हे अर्थ प्राप्त झाले आहेत आणि त्याला लोकमान्यता मिळाली आहे.

 

आपण चपल-अचपल हे शब्द चुकीच्या रुढीमुळे चुकीच्या पद्धतीने वापरले जातात. “अचपल मन माझे नावरे आवरिता” चपल या अर्थाने अचपल हा शब्द श्री रामदास स्वामींनी देखील वापरला आहे.

 

महाविद्वान, बुद्धिवंत अशा व्यासमुनींनी ज्या आसनावर किंवा पीठावर बसून महाभारत सांगितले, त्या आसनाला व्यासपीठ असं म्हणतात. हे आसन किंवा पीठ पवित्र समजले जाते. आध्यात्मिक, धार्मिक ज्ञानप्रबोधनाची प्रवचने ज्या आसनावरून दिली जातात ते व्यासपीठ.

एक किंवा अनेक वक्ते ज्या स्थानावरून राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांवर आधारलेली भाषणे देतात, त्या स्थानाला मंच असे म्हणतात.

ज्या स्थानावरून मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे – नाटके, गायन, नृत्य, तमाशा वगैरे सादरीकरण केले जाते, त्या स्थानाला रंगमंच असे म्हणतात. म्हणजेच व्यासपीठ, मंच व रंगमंच असे तीन प्रकार या स्थानांचे आहेत.

🌺

अशा स्वरूपाचे, चुकीच्या अर्थाने वापरले जाणारे, इतर अनेक शब्द सुद्धा प्रचलित आहेत.

☘️

©  श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सुखांचे शाॅटस्…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “सुखांचे शाॅटस्…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

रोजच्यासारखी सकाळी शारदा कामाला आली. आल्या आल्या म्हणाली,

“वहिनी हे बघा पैंजण.. शंभर रुपयांना घेतले. काल दारावर एक माणूस आला होता विकायला”

 तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लोभसवाणा होता… आज एकदम खुषीत होती.

“अगं किती छान आहेत.. थांब शारदा फोटो काढते.. “

“नको नको”.. ती लाजून म्हणाली

“अग तुझा नाही.. पैंजणाचा काढते मग तर झालं…. “

फोटो काढला… फोटो काढताना ती हसत होती.

पैंजणावरून प्रेमानी हात फिरवून शारदा कामाला लागली…

तिच्या पैंजणांचा छुमछुम नाद तिच्याबरोबर मलाही सुखावत होता…

दिवसभर अनेक घरात कामं करूनही ती नेहमी आनंदात असते…

माझ्याही दिवसाची छान सुरुवात झाली…

 

देवाची पूजा करताना बाप्पाला गुलाब अर्पण केला… सरूची आठवण आली…

काळी सावळी तरतरीत सरू मी गेले की ” या काकू” म्हणते. मी नेहमी तिच्याकडूनच देवासाठी फुलं घेते. काल फुलं घेतली तर एक टपोरा गुलाब देऊन म्हणाली

” काकू हा घ्या तुमच्या देवाला “

.. मनात आलं किती गोड निरागस मन आहे पोरीचं…. देवाला हात जोडले त्याला मनोमन प्रार्थना केली..

“ पहाटे पासून दिवसभर कष्ट करणाऱ्या सरूला सुखी आणि आनंदी ठेव बाबा.. “

 

साहिलच्या म्हणजे नातवाच्या शाळेत फन फेअर होतं. तिथे त्यांचा पाणीपुरीचा स्टॉल होता. तो बघायला निघाले होते. रिक्षा बघत उभी होते…

काल साहिलने सांगितले होते.. “आजी आम्ही” चीझ रगडापुरी” करणार आहोत”

“अरे पण असं कसं? रगडापुरी वर चीझ?…. असं कुठे कोणी कधी केलं नसेल… कशी चव लागेल रे “

“नसेल केलं… पण आमचं तसंच ठरलं आहे… आणि पाणीपुरीवर नेहमीचं चिंचेचे पाणी नाही तर आम्ही त्यात थम्सअप, फॅन्टा, किंवा स्प्राईट घालणार आहोत… त्याला आम्ही “पाणीपुरी शॉटस् “असं नाव दिले आहे”

मी म्हटलं, “अरे हे कसलं कॉम्बिनेशन? कोणी तरी खाईल का?”

“अगं टीचर म्हणाल्या तुम्हाला करावसं वाटतंय ना करून बघा…. शिवाय आम्ही चिंचेचं पाणी पण घेऊन जाणार आहोत. लोकांना नाही आवडलं तर ते घालून नेहमीची पाणीपुरी करणार. “

 

काय झालं असेल… मी विचार करत होते तेवढ्यात..

“नीता. “.. अशी हाक आली

मैत्रीण दुकानात आईस्क्रीम घेत होती. बाईसाहेबांनी स्वेटर घातला होता आणि घेत होती आईस्क्रीम…

विचारलं तर म्हणाली.. “थंडीतच आईस्क्रीम खायला मजा येते.. ही घे तुला एक कॅंन्डी जाताना खा”

” अग आत्ता.. नको नको. नातवाच्या शाळेत चालले आहे “

तर डोळा मारून म्हणाली, ” घे ग.. वन फाॅर द रोड…. एन्जॉय इट.. कोणी…. तुझ्याकडे बघत नाही…. “

.. आयुष्यात प्रथमच रिक्षात बसून आईस कँन्डी खाताना मला गंमत वाटत होती….

 

फन फेअरला शाळेत पोचले तर तिथे खूपच मज्जा चालली होती… 

नातवाच्या स्टॉलवर गर्दी उसळली होती. लोक धमाल करत होते. पाणीपुरी शॉटस् हिट झाली होती…

आई, बाबा, आजी, आजोबा, पोरं… सगळे हसत होते. ट्राय करून बघत होते…

साहिलचे मित्र मैत्रिणी चीझ रगडा पुरी, पाणीपुरी शाॅटस बनवत होते. ते पण लोक आवडीने खात होते…

“कसली भारी आयडिया आहे ना… वाॅव….. मला अजून एक दे रे… एक्सलंट.. ए तु पण ट्राय कर रे… ” वगैरे चाललं होतं…

इतकी गर्दी होती की नातवाला आमच्याकडे बघायलाही वेळ नव्हता. काही वेळाने हे आणि सुनबाईचे आई-वडील पण आले. आम्ही चौघेही गप्पा मारत बसलो.

.. खूप वेळानंतर साहिल सांगायला आला,

” बघ आजी तुला काळजी वाटत होती ना पण… सगळ्यांना खूप आवडलं… आमचं एकुणएक सगळं संपलं. “

“हो रे.. आम्ही तुला बघीतलं तुमची गडबड चालली होती “

” अग पण तुम्हाला शॉट्स नाही मिळाले.. आता उद्या घरी करू.. तेव्हा तू ट्राय कर… “

“चालेल रे…. ” त्याला सांगितले.

पोरं अगदी खुष होती.

मनात म्हणाले…. “ नाही रे राजा…. उलट आज मला सुखांचे शॉट्स मिळाले.. ते कसे घ्यायचे हे समजले

.. त्याची चव दुय्यम होती.. मुलांचा आनंद महत्त्वाचा होता “ 

 

खरंच अशा छोट्या छोट्या शॉट्सनीच जीवनाची मजा घ्यायला शिकू… सारखं मोठं काहीतरी होईल मग मी सुखी.. आनंदी होईन असं म्हणत बसलं की हे छोटे शॉटस् हातातून निसटून जातात… हे समाधानाचे असे क्षण मनात भरून घ्यायचे… आणि मुख्य म्हणजे नेमके समाधान कशात मानायचे हे आपले आपण ठरवायचे मग असे क्षण सापडतात…

 

खरं म्हणजे ते असतातच आसपास… बघायचे ठरवले तर दिसतात..

बघायचे…. हळूहळू येईल ती दृष्टी…. मग दिसतील…. आपले आपले सुखांचे असे शॉटस्

 

मग ठरलं तर…

अशा शॉट्सची मजा घेत जगायचं.. आनंदाने… हसत हसत..

…. मग पुढचे दिवस, महिने आणि वर्षही नक्कीच आनंदात जातील.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प्रसंगावधान… ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

☆ प्रसंगावधान… ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – डाॅ.भारती माटे

आदिती प्रधान, पुण्यात राहणारी एक उच्चशिक्षित, सुंदर २३ वर्षीय तरूणी. आदिती एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत टेक्नॉलॉजी अॅनालिस्ट आहे. सध्या ती एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असल्याने घरी जायला बर्‍याचदा उशीर होतो. पण आज क्लायंट सोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मुळे रात्रीचे अकरा कसे वाजले तिला कळंलं देखील नाही.

आदितीने बॅग उचलली, ड्रॉवर उघडून मोबाइल बाहेर काढला. आईचे ५ मिसकॉल दिसत होते. फोन करून आईला तिने तासाभरांत घरी पोहचते असे सांगून मोबाइल वर कंपनीचे कॅब बुकिंग अॅप उघडले आणि कॅब बुक केली. ती बाहेर पडत असतानाच कॅब समोरून येताना दिसली. दार उघडून ती आत बसली. ड्राइवर शिवाय कॅबमधे कोणीही नव्हते. आज तिला फारच उशीर झाला होता. ड्रायव्हर सुद्धा ओळखीचा वाटत नव्हता. कंपनीतील महिला कॅबमधे एकटी असल्यास किंवा तिचा शेवटचा स्टॉप असल्यास सेक्युरीटी गार्ड बरोबर घेण्याची सुविधा होती पण आदिती सहसा गार्ड बरोबर घेण्याचे टाळत असे.

हिंजेवडी फेज वन वरून गाडी बाहेर पडली आणि मुंबई बेंगलोर रस्त्याला लागली. पाच दहा मिनिटं झाली असतील ड्रायव्हरने समोर ठेवलेला त्याचा मोबाईल उचलून स्विच अॉफ केला. तिने कारण विचारल्यावर “मोबाइल डिस्चार्ज होतो आहे आणि थोडय़ा वेळाने महत्त्वाचा कॉल करायचा आहे. म्हणून बंद केला. ” असे त्याने सांगितले. पण त्याच्या उत्तराने आदितीचे समाधान झाले नाही. कंपनीच्या कॅब बुकिंग अॅपला त्याचे लोकेशन ट्रॅक करता येऊ नाही म्हणून त्याने मोबाइल बंद केला हे तिच्या लक्षात आले.

तिच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजू लागली. तेव्हढ्यात ड्रायव्हरने गाडीचा स्पीड वाढवला. आणखी थोड्या वेळात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाजवळ गाडी येऊन थांबली आणि तो माणूस ड्रायव्हर शेजारचे दार उघडून गाडीत येऊन बसला. पेहरावावरून आणि चेहर्‍यावरून तो माणूस काही सभ्य वाटत नव्हता. दोघांच्या हेतूची तिला पूर्ण कल्पना आली आणि तिची खात्री झाली कि ती फार मोठ्या संकटात सापडली आहे.

थंडीचे दिवस असूनही आदितीला घाम फुटला. घशाला कोरड पडली. मोठ्या प्रयत्नाने तिने स्वतःवर ताबा मिळवला आणि शांत डोक्याने विचार करण्याचा प्रयत्न करू लागली. अचानक तिला आठवले काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर आलेली एक पोस्ट वाचून तिने 112India अॅप डाउनलोड करून मोबाइलवर इन्स्टॉल करून घेतले होते आणि त्याला टेस्टही केले होते. थरथरत्या हाताने तिने पर्समधून मोबाइल बाहेर काढला. पिन टाकून सुरू करून होमस्क्रीन वरचे 112India अॅप ओपन केले आणि पोलिसांच्या मदतीसाठीचे बटन दाबले. आत्ताच्या परिस्थितीत या अॅपमुळे आपल्याला काही मदत मिळते की नाही या बाबतीत अादिती साशंक होती.

एव्हाना गाडीचा वेग कमी होऊन गाडी एका सुनसान रस्त्यावरून धावत होती. ड्रायव्हर शेजारी बसलेला माणूस मागे वळून घाणेरड्या नजरेने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत होता. तिने पुन्हा एकदा 112India अॅपवरचे पोलिस आणि अदर्स हे दोन्ही बटन्स एकामागोमाग एक दाबले. दुसरी कुठलीही मदत मिळेपर्यंत तिला स्वतःच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे भाग होते. ड्रायव्हरजवळ बसलेल्या माणसाला ती मोबाइलवर कोणाची तरी मदत मिळवण्याचा प्रयत्न करते आहे, याचा संशय आला होता. त्याने मागच्या सीटवर झुकून तिचा मोबाइल काढून घेण्याचा प्रयत्न केला. आदितीने मोबाइल पटकन पर्समधे टाकला आणि चालत्या गाडीचे दार उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. पण गाडी आतून लॉक होती.

गाडी एका निर्मनुष्य जागी येऊन थांबली. ड्रायव्हर आणि त्याच्याजवळ बसलेला माणूस दोघेही दार उघडून मागे आले. दोघेही गाडीची मागची दोन्ही दारं उघडून तिला घेरून उभे राहिले. क्षणाचाही विलंब न करता अादिती उजव्या बाजूच्या दारातून ड्रायव्हरला ढकलून बाहेर पडली आणि रस्त्याच्या दिशेने धावत सुटली.

अॅपवरून पोलिसांना सूचना देऊनही दहा मिनिटे उलटली होती. ती जीवाच्या आकांताने पळत होती. त्याचबरोबर पोलिसव्हॅनच्या सायरनचा आवाज येतो का हे ऐकण्याचा प्रयत्न करत होती. दोघेही तिचा पाठलाग करत होते. दोन तीन मिनिटांतच त्यांनी तिला सहज गाठलं असतं.

तेवढ्यातच पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज तिला एेकू आला. तिच्या जीवात जीव आला आणि ती अधिकच जोरात रस्त्याच्या दिशेने धावू लागली. थोड्याच वेळात पोलिस व्हॅन तिच्या दृष्टीस पडली. पाच पोलीस व्हॅनमधून उतरले. त्यात एक महिला पोलीस देखील होती. तिने धावण्याचा वेग कमी केला आणि मागे वळून पाहिले. दोघंही नराधम पोलिसांना पाहून पळून गेले होते.

आदिती पोलीस व्हॅनजवळ आली. तिने सगळी घटना पोलीसांना सांगितली. पोलीसांनी आसपासचा परीसर पिंजून काढला पण दोघंही सापडले नाही. पोलीसांनी व्हॅनमधून आदितीला घरी सोडले.

आज भारत सरकारनी सुरू केलेल्या 112India अॅपमुळे आदिती एका मोठ्या संकटातून सहीसलामत बाहेर पडली होती.

आदितीने दोघा नराधमांविरुद्ध एफआयआर दाखल केला. तिने सांगितलेल्या गाडीच्या आणि दोघांच्या वर्णनावरून तसेच कंपनीजवळ असलेल्या ड्राइव्हरच्या कॉन्ट्रॅक्ट पेपर्सवरून पोलीसांनी सातारजवळच्या एका गावातून दोघांनाही ताब्यात घेतले.

112India अॅप डाउनलोड करून इंस्टॉल केल्यावर, नाव, जन्मतारीख आणि फोन नंबर दिल्यावर ओटीपी येतो. अॅपला कॉन्टॅक्ट्स, लोकेशन, फोनकॉल्स वगैरे ची परवानगी द्यावी लागते. ह्या माहितीशिवाय इच्छित काम करणे 112India ला अशक्य असते. लगेच स्क्रीनवर अॅप लोकेशन दाखवू लागते. पोलीस, आग, मेडिकल व इतर अशी चार बटन्स दिसायला लागतात.

भारत सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये 112 हा नंबर कुठल्याही प्रकारच्या इमर्जंसी मध्ये वापरण्यासाठी खुला केला आहे. आजपर्यंत २२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना कार्यान्वित झालेली आहे, इतर राज्यातही होत आहे.

पोलीस (१००), आग (१०१), आरोग्य (१०८) आणि स्त्री सुरक्षा (१०९०) हे चार नंबर ११२ नंबराखाली आणलेले आहेत. सध्या सगळ्यांजवळ स्मार्टफोन आहेत त्यामुळे अँड्रॉइड व आयफोनसाठी अॅप विकसित केलेले आहे. अॅपवर ४ पॅनिक बटन्स दिलेली आहेत – पोलीस, आग, मेडिकल व इतर. आपल्या गरजेप्रमाणे बटन दाबले तर योग्य ती मदत ६ ते १० मिनिटांत मिळू शकते.

आपली क्षमता व इच्छा असल्यास आपण स्वयंसेवक म्हणून स्वतःची नोंद करू शकतो. आपल्या भागात कुणी मदतीची याचना केल्यास ती आपल्यापर्यंतही पोचून आपण तिथे धाव घेऊन मदत करू शकतो.

बर्‍याचदा घरात फक्त वृद्ध व्यक्ती असतात. कुणा एकाच्या बाबतीत मेडिकल इमर्जन्सी उद्भवली तर दुसऱ्याला काय करावे सुचत नाही, हाक मारून बोलावण्याच्या अंतरावर कुणी नसते, मुले दूरदेशी असतात. अशा वेळी हे अॅप वापरून तात्काळ मदत मिळवता येईल. अमेरिकेतील ९११ सारखा याचा वापर व उपयोग व्हावा ही सरकारची अपेक्षा आहे. ही योजना केंद्र सरकारने निर्भया फंडमार्फत सुरू केलेली आहे. एपचा वापर करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न करणे हे तर नक्कीच आपल्या हातात आहे.

आपल्या जवळच्या व्यक्तीपर्यंत हि स्टोरी तुम्हीच पोहचवा… शेअर करा..

माहिती संकलन व प्रस्तुती : डॉ. भारती माटे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बीज… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

बीज ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

बीज हा शब्द माहित नसेल असा मनुष्य शोधून सुद्धा सापडणार नाही. सर्वसाधारणपणे कोणत्याही वनस्पतीच्या बी ला बीज असे म्हटले जाते. इंग्रजी माध्यमात शिकलेली मुलं फार तर Seed अस म्हणतील, पण त्यामागील मर्म मात्र सर्वांना ठाऊक आहे.

आपला देश कृषिप्रधान आहे. पूर्वी “उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी” असे सूत्र समाजात प्रचलित होते. स्वाभाविकच शेती करणाऱ्याला समाजात खूप मोठा आणि खराखुरा मान होता. दुष्काळ काय सध्याच पडायला लागले असे नाही, ते याआधीही कमी अधिक प्रमाणात होतेच. त्याकाळात शेतकरी जरी पारंपारिक पद्धतीने शेती केली जात होती. शेतकरी आपल्या बियाण्याची पुरेशी काळजी घेत असत. शेती नैसर्गिक पद्धतीने केली जायची, श्रद्धेनी केली जायची. रासायनिक शेती नव्हतीच. आपली शेती तेव्हा पूर्णपणे गोवंशावर आधारित होती. त्यामुळे तेव्हा जे काही कमी अधिक अन्नधान्य शेतकऱ्याला मिळायचं ते *’सकस’*असायचे, ते पचविण्यासाठी आणिक हाजमोला खाण्याची गरज पडत नव्हती. एका अर्थाने मागील पिढ्या धष्ठपुष्ट होत्या. शिवकाळातील कोणत्याही सरदाराचा पुतळा किंवा छायाचित्र बघितले तर ते आपल्या सहज लक्षात येईल.

कोणत्याही कर्माचे फळ हे त्या कर्माच्या हेतूवर अवलंबून असते. शरीरावर शस्त्रक्रिया करणारा तज्ञ मनुष्याचे पोट फाडतो, आणि एखादा खुनी मनुष्यही पोट फाडतो. दुर्दैवाने शस्त्रक्रिया करताना रुग्णास मृत्यू आला तर त्या तज्ञास शिक्षा होत नाही, पण खून करणाऱ्यास शिक्षा होण्याची शक्यता जास्त असते. पूर्वीच्या काळी बलुतेदार पद्धती असल्यामुळे शेतकरी धान्य फक्त स्वतःसाठी, अधिकाधिक फायद्यासाठी न पिकवता संपूर्ण गावासाठी पिकवायचा आणि तेही देवाचे स्मरण राखून. आपली समाज रचना धर्माधिष्ठित होती. इथे ‘धर्म’ हा धर्म आहे, आजचा ‘धर्म’ (religion) नाही. धर्म म्हणजे विहीत कर्तव्य. समाजातील प्रत्येक घटक आपापले काम ‘विहीत कर्तव्य’ म्हणून

करायचा. त्यामुळे त्याकाळी प्रत्येक काम चांगले व्हायचे कारण एका अर्थाने तिथे भगवंताचे अधिष्ठान असायचे.

मधल्या काळात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले. देश स्वतंत्र झाला. विकासाची नविन परिमाणे अस्तित्वात आली आणि ती कायमची समाजमनात ठसली किंवा जाणीवपूर्वक ठसवली गेली. जूनं ते जुनं (टाकाऊ) आणि नवीन तितके चांगले असा समज समाजात जाणीवपूर्वक दृढ करण्यात आला. भारतीय विचार तेवढा मागासलेला आणि पाश्चिमात्य विचार मात्र पुरोगामी (प्रागतिक) असा विश्वास समाजात जागविला गेला. विकासाचा पाश्चात्य विचार स्वीकारल्याचे दुष्परिणाम आज आपण सर्वजण कमीअधिक प्रमाणात अनुभवत आहोत. अधिकाधिक धान्य उत्पादन करण्याच्या नादात रासायनिक खतांचा बेसुमार वापर करून आणि गोकेंद्रित शेती न करता आपण इंधन तेलावर आधारित परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च करणारी ‘श्रीमंत’ शेती करू लागलो आणि वसुंधरेचे नुसते आपण नुसते दोहन केले नाही तर तिला ओरबाडून खायला सुरुवात केली. त्यामुळे पुढील पिढीला जागतिक तापमान वाढ, वातावरणातील बदल, आर्थिक विषमता आणि भूगर्भातील पाण्याचा तुटवडा अशा कितीतरी भयानक गोष्टी भेट म्हणून जन्मताच वारसाहक्काने दिल्या असे म्हटले तर वावगे होऊ नये. ह्यातून आज तरी कोणाची सुटका नाही.

ह्या सर्व गोंधळात आपण बीज टिकविण्याचे सोयीस्कररित्या विसरलो. जिथे बीजच खराब तिथे पीक चांगले येईल अशी अपेक्षा करणे हा मूर्खपणाच ठरणार, नाही का? “शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी ।।” असे संतांनी सांगितले असताना आपण ते ‘संतांनी’ सांगितले आहे म्हणून दुर्लक्ष केले आणि हीच आपली घोडचूक झाली असे म्हणता येईल. आपल्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आली असेलच. खराब झालेले बीज फक्त शेतातील बियाण्याचे नाही तर आज प्रत्येक क्षेत्रात आपल्याला त्याची प्रचिती येते.

समाजातील सज्जनशक्तीबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून असे म्हणावेसे वाटते की खूप शिक्षक पुष्कळ आहेत पण चांगला शिक्षक शोधावा लागतो, शाळा भरपूर आहेत पण चांगली शाळा शोधावी लागते, डॉक्टर भरपूर आहेत पण चांगला डॉक्टर शोधावा लागतोय, वकील पुष्कळ आहेत पण चांगला वकील शोधावा लागतोय, अभियंते भरपूर आहेत पण चांगला अभियंता शोधावा लागतोय. आज ही परिस्थिती समाजपुरुषाच्या प्रत्येक घटकास कमीअधिक प्रमाणात लागू आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. हे चित्र बदलण्याचे कार्य आज आपणा सर्वांना करायचे आहे. कारण संकट अगदी आपल्या घरापर्यंत येऊन पोहचले आहे. हे सर्व ऐकायला, पहायला, स्वीकारायला कटू आहे पण सत्य आहे. आपण आपल्या घरात कोणते बीज जपून ठेवत आहोत किंवा घरात असलेले ‘बीज’ खरेचं सात्विक आहे की त्यावरील फक्त वेष्टन (टरफल) सात्विक आहे याचीही काळजी घेण्याची सध्या गरज आहे. वरवर दिसणारे साधे पाश्चात्य शिष्ठाचार आपल्या संस्कृतीचा बेमालूमपणे ऱ्हास करीत आहेत. शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा आणि आपल्या घरात शिवाजीचा मावळा सुद्धा जन्मास येऊ नये असे जोपर्यंत आईला वाटेल तो पर्यंत यात काहीही फरक पडणार नाही.

संत ज्ञानेश्वरांच्या काळात देखील असेच अस्मानी आणि सुलतानी संकट होते. राष्ट्राचा विचार करताना दोनचारशे वर्षांचा काळ हा फार छोटा कालखंड ठरतो. माऊलींपासून सुरु झालेली भागवत धर्माची पर्यायाने समाज प्रबोधनाची चळवळ थेट संत तुकारामांपर्यंत चालू राहिली. ह्या सर्व पिढ्यानी सात्विकता आणि शक्तीचे बीज टिकवून ठेवले त्यामुळे त्यातूनच शिवाजी राजांसारखा हिंदू सिंहासन निर्माण करणारा स्वयंभू छत्रपती निर्माण झाला. “बहुता सुकृताची जोडी । म्हणोनि विठ्ठलीं आवडी।।” म्हणणारे तुकोबाराय सुद्धा हेच सूत्र (शुद्ध बीज टिकविले पाहिजे) वेगळ्या भाषेत समजावून सांगत आहेत. समर्थांच्या कुळातील मागील कित्येक पिढ्या रामाची उपासना करीत होत्या, म्हणून त्या पावनकुळात समर्थ जन्मास आले. कष्टाशिवाय फळ नाही, नुसते कष्ट नाही तर अखंड साधना, अविचल निष्ठा, तितिक्षा, संयम, धैर्य अशा विविध गुणांचा संचय करावा लागतो तेव्हा कुठे ‘ज्ञानेश्वर’, ‘तुकाराम’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘सावरकर’, ‘भगतसिंग’, डॉ. हेडगेवार जन्मास येत असतात.

मृग नक्षत्र लागले की आपल्याकडे पाऊस सुद्धा कमी अधिक प्रमाणात सुरु होतो. शेतकऱ्यांची बियाणे पेरायची झुंबड उडते. शेतकरी आपले काम श्रद्धेनी आणि सेवावृत्तीने करीत असतात. आपणही त्यात आपला खारीचा वाटा घ्यायला हवा. आपल्याला देशभक्तीचे, माणुसकीचे, मांगल्याचे, पावित्र्याचे, राष्ट्रीय चारित्र्याचे, सांस्कृतिक स्वातंत्र्याचे, तसेच समाजसेवेचे बीज पेरायला हवे आहे आणि त्याची सुरुवात स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासून करायची आहे.

विकासाच्या सर्व कल्पना मनुष्यकेंद्रीत आहेत आणि ती असावयासच हवी. पण सध्या फक्त बाह्यप्रगती किंवा भौतिक प्रगतीचा विचार केला जात आहे. पण जोपर्यंत मनुष्याचा आत्मिक विकास होणार नाही तोपर्यंत भौतिक विकासाचा अपेक्षित परिणाम आपल्याला दिसणार नाहीत. मागील शतकात लॉर्ड मेकॉले नावाचा एक ब्रिटिश अधिकारी भारतात येऊन गेला. संपूर्ण भारतात तो फिरला. नंतर त्याने ब्रिटिश संसदेत आपला अहवाल सादर केला. त्यात तो स्वच्छपणे सांगतो की संपूर्ण भारतात मला एकही वेडा आणि भिकारी मनुष्य दिसला नाही. सर्व जनता सुखी आहे. आणि ह्याला एकच कारण आहे ते म्हणजे इथली विशिष्ठ कुटुंब रचना आणि कुटुंबातील जेष्ठांचा आदर करण्याची पद्धत (‘एकचालकानुवर्तीत्व’).

आज आपल्याकडे काय परिस्थिती आहे हे वेगळे सांगण्याची गरजच नाही, वृद्धाश्रमांच्या संख्येवरूनच ते आपल्या लक्षात येईल. हे एक उदाहरण झाले. अश्या बऱ्याच गोष्टीत आपण पाश्चात्य लोकांस मागे टाकले आहे.

एक छान वाक्य आहे. “लहानपणी आपण मुलांना मंदिरात घेऊन गेलो तर तीच मुलं म्हातारपणी आपल्या तीर्थयात्रा घडवतात”.

‘मुलं एखादवेळेस ऐकणार नाहीत पण अनुकरण मात्र नक्की करतील हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. मुलांनी अनुकरण करावे असे वातावरण आपण आपल्या नविन पिढीला देऊ शकलो तर हे खूप मोठे राष्ट्रीय कार्य होईल. त्यासाठी समाजात नवीन आदर्श प्रयत्नपूर्वक निर्माण करावे लागतील आणि असलेल्या आदर्शाना समाजासमोर प्रस्तुत करावे लागेल. आपल्या मुलांकडून माणुसकीची अपेक्षा करण्याआधी आपण त्यांना आपल्या आचरणातून माणुसकी शिकवावी लागेल. आपल्याकडे विवाहसंस्कार सुप्रजा निर्माण करण्यासाठी आहे. तो फक्त ‘सुख’ घेण्यासाठी नक्कीच नाही, पण याचा विचार विवाहप्रसंगी किती कुटुंबात केला जातो ?, मुख्य ‘संस्कार’ सोडून बाकी सर्व गोष्टी दिमाखात पार पाडल्या जातात, पण विवाह संस्था आणि गृहस्थाश्रम म्हणजे काय हे कोणी सांगत नाही. ते शिकविणारी व्यवस्था आज नव्याने निर्माण करावी लागेल.

हिंदू संस्कृती पुरातन आहे. जशी आपली ‘गुणसूत्रे’ आपण आपल्या पुढील पिढीस सुपूर्द करीत असतो तसेच ‘नीतीसूत्रे’ही पुढील पिढीस देण्याची निकड आहे. अर्थात नितीसुत्रे देताना मात्र आचरणातून अर्थात ‘आधी केले मग सांगितले’ या बोधवचनाचे स्मरण ठेऊन द्यावी लागतील आणि हा महान वारसा जपण्याची प्रेरणा सुद्धा. आपल्या पुढील पिढीला आपल्या वडिलांची कीर्ती सांगावीशी वाटेल असे आपण जगायचा प्रयत्न करायला हवा. पाऊस पडल्यावर सर्व वसुंधरेस चैतन्य प्राप्त होते, बहुप्रसवा असलेली वसुंधरा हिरवा शालू पांघरते, या सृजनातून सर्व प्राणीमात्रांना वर्षभर पुरेल इतके अन्नधान्य प्राप्त होत असते. या आल्हाददायी वातावरणाचा मानवी मनावरदेखील सुखद परिणाम होत असतो.

या आल्हाददायी, मंगलमयी वातावरणामुळे आपल्या विचारांनासुद्धा नवसंजीवनी प्राप्त व्हावी आणि ‘सुसंस्कारांचे, सात्विकतेचे बीज संवर्धित आणि सुफलीत’ करण्याचे कार्य आपणा सर्वांकडून घडावे अशी श्रीरामचरणी प्रार्थना करतो.

भारत माता कि जय।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

पसारा

आमच्या घरी रविवार हा विशेष दिवस असायचा. म्हणजे तसा तो सगळ्यांकडेच असावा कारण एकतर सुट्टीचा वार आणि सगळे घरात. थोडा निवांतपणा, रोजच्या दिनक्रमापेक्षा वेगळा पण मला एक मात्र आठवतंय की, ” चला रविवार आहे म्हणून गादीत पांघरूण घेऊन उशिरापर्यंत लोळत राहूया. ” हे मात्र नव्हतं. या उलट कधीकधी तर पप्पा शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी सगळ्यांना सांगून ठेवायचे, ” उद्या प्रत्येकाने पहाटे चार वाजता उठायचे. आपल्याला कशेळीच्या पुलावर जायचे आहे आणि तिथून हजारो वर्षांनी प्रकटलेल्या एका धूमकेतूचे दर्शन घ्यायचे आहे. निसर्गातले दुर्लभ देखावे पाहण्यातली मजा काही औरच असते. ”

आणि आम्ही सारे पहाटेच्या अंधारात चालत कशेळीच्या पुलावर जात असू आणि तिथून आकाश दर्शनाचा महानंद घेत असू. अशा अनेक सुंदर पहाटा (पहाटचे अनेक वचन) आम्ही अनुभवलेल्या आहेत. निसर्गाच्या तत्त्वाशी झालेली तादात्म्यता किती सुखाची असते हे जरी तेव्हा कळत नसलं तरी जाणवलं होतं. मोकळ्या आभाळाखाली उभे राहून अंधारात चमचमणारं आकाश दर्शन किती सुंदर असतं हे केवळ शब्दांच्या पलिकडे आहे.

आज जेव्हा मी घराच्या गच्चीतून कधीतरी पहाटे आकाश निरखण्याचा प्रयत्न करते तेव्हा काहीसं गढुळ, धुरकट, बिनताऱ्यांचंं आकाश बघताना कुठेतरी मन द्रवतं. माणूस निसर्गापासून दूर जात चालला आहे का?” हा प्रश्न वेदनादायी वाटतो.

असो!

तर आमचे अनेक रविवार अशा रितीने सुरू व्हायचे. जेवणाच्या मेनू पासून सारंच विशेष असायचं. संध्याकाळी सेंट्रल मैदानात मस्त रमतगमत फिरायला जायचं. तिथल्या खुरट्या पण गारवा देणाऱ्या गवतावर रिंगण करून बसायचं. सोबत खाण्यासाठी उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा किंवा ओवा, मीठ घालून उकळलेल्या चवळीच्या शेंगा नाहीतर वाफवलेल्या शिंगाड्यांचा आस्वाद घ्यायचा. पप्पांकडून अनेक गमतीदार किस्से ऐकायचे. एकेकांच्या मस्त नकला करून ते आम्हाला हसवायचे. काही गल्लीतले सवंगडीही बरोबर असायचे. मग त्यांच्यासोबत लंगडी, रिंग नाहीतर कांदाफोडी सारखे मजेदार खेळही रंगायचे. कधी गाणी तर कधी भेंड्या. मज्जाच मज्जा. त्यावेळी मॉल नव्हते. टाईम झोन सारखे ढॅण ढॅण, कानठळ्या बसणारे कर्कश्श नादमय बंदिस्त क्रीडा विभाग नसायचे. बर्गर, पास्ता, पिझ्झा यांची तोंडओळख ही नव्हती पण सेंट्रल मैदानातला रविवारचा तो हल्लाबोल मात्र विलक्षण असायचा. जडणघडणीतला एक महत्त्वाचा भाग होता तो! संध्याकाळ उलटल्यानंतर सोबतीला आकाशातली आकाशगंगा असायची. सप्तर्षी, व्याध, ध्रुवतारा, कृत्तिका, अनुराधा आमच्याबरोबर जणू काही फेर धरायच्या. आजही माझ्या नातींना मी आकाशात नथीच्या आकड्यासारखा दिसणारा कृत्तिकेचा तारकापुंज दाखवण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्यांना मजा वाटत नाही असे नाही पण त्या त्यात गुंतत नाहीत हे मात्र खरं. शिवाय आता त्यांच्यासाठी प्लॅनेटोरियम्स आहेतच. बायन्याक्युलर्स, टेलिस्कोप सारखी आधुनिक उपकरणे आहेत पण दोन डोळ्यांनी अथांग आभाळ पाहण्याचे सुख काय असतं हे त्यांना कसं सांगू?

रविवारची दुपार मात्र थोडी वेगळी असायची. तरीही त्या दुपारींना मी सुस्त दुपार असे विशेषण लावणार नाही. त्याचे कारण म्हणजे माझी आई. आई अतिशय व्यवस्थित. स्वच्छता, टापटीप याविषयी अत्यंत जागरूक, सतत आवराआवरी करणारी एक शिस्तप्रिय व्यक्ती होती. त्या बाबतीत पप्पा मात्र थोडे शिथिल होते म्हणजे ते व्यवस्थित नव्हते असं मी मुळीच म्हणणार नाही पण त्यांचा व्यवस्थितपणा आणि आईचा व्यवस्थितपणा यांच्या व्याख्याच वेगळ्या होत्या आणि त्या एकमेकांना छेद देणाऱ्या होत्या. पप्पांची पुस्तके, लेखनाचा पसारा म्हणजे कागद, पेन, पेन्सिली वगैरे …त्यांचे संदर्भ ग्रंथ, फाइल्स, वाचकांची पत्रे अशा अनेक गोष्टी घरभर पसरलेल्या असत. पप्पांची विद्वत्ता, त्यांचा लौकिक, लोकप्रियता, व्यासंग, अभ्यास हे सगळं मनोमन मान्य करूनही आईला हा सगळा पप्पांचा पसारा वाटायचा. ती अनेकदा तळमळीने तो आवरूनही ठेवायची. कशा पद्धतीने तो ठेवला गेला पाहिजे यावर पप्पांची शिकवणी घ्यायची. त्यावरून त्यांचे वादही व्हायचे. पप्पांचे एकच म्हणणे असायचे, ” मला हवी ती, हवी तेव्हा कुठलीही वस्तू या जंजाळातच सापडते. तू कशाला आवरतेस?”

आम्ही कुणीही कुणाचीच बाजू घ्यायचो नाही पण एखाद्या रविवारी दुपारी पप्पाच फर्मान काढायचे, ” चला ग पोरींनो! आज आपण हे भलं मोठं काचेचं पुस्तकांचं कपाट आवरूया. जरा नीटनेटकं लावूया. ”

हे कपाट आवरणं म्हणजे एक उपक्रम होता म्हणण्यापेक्षा एक महान सोहळाच होता असं मी म्हणेन. पप्पांचा पुस्तक संग्रह विशाल होता. कितीतरी जुनी क्लासिक मराठी, इंग्रजी, संस्कृत भाषेमधील अनेक विषयांची पुस्तके त्यात होती. एकेक पुस्तक हातात घेतल्यावर ते म्हणायचे, “पाहिलं? हे कालिदासाचे मेघदूत. काव्यानंद आणि काव्यभावाचा उच्चांक म्हणजेच हे मेघदूत. मग भर दुपारी आमच्या त्या अरुंद घरात साक्षात अलकापुरी अवतारायची. कुबेर, यक्ष आमच्या दारात उभे राहायचे. प्रेमिकेसाठी व्याकुळ झालेला यक्ष, आषाढातला पाऊस आणि त्या मेघदूताचे दर्शन आम्हाला तेव्हाच घडायचे. हातात कालिदासाचे मेघदूत आणि पप्पांच्या मुखातून आलेले सहजोद्गार..

 नीत्वा मासान्कनकवलय भ्रंशरिक्त प्रकोष्ठ

आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं

वप्रक्रीडापरिणत गजप्रेक्षणीयं ददर्श।।

आम्ही ऐकत बसायचो. कपाटातून एका मागून एक पुस्तकं निघायची. शाकुंतल, मालविकाग्नीमित्र, चक्रधर, भवभूती, मोरोपंत …एकेकांना पप्पा रांगेत अत्यंत मानाने जमिनीवर पसरलेल्या चादरीवर ठेवत. मध्येच मृच्छकटिक नाटकाची गोष्टही ते सांगायचे. आर्या वृत्तातल्या केकावल्या रंगायच्या.

।। सुश्लोक वामनाचा

 अभंगवाणी तुकयाची 

ओवी ज्ञानेशाची 

आर्या मयुरपंतांची।।

मोरोपंतांचीच एक मिश्कील काव्यरचना त्यांनी आम्हाला वाचून दाखवली.

स्वस्त्री घरात नसता कंडु शमनार्थ रंडीरा खावी।

तीही घरात नसता स्वहस्ते चिबुल्ली दाबावी।।

वाचकहो! हे फालतु काव्य नाही बरंका?

अहो मोरोपंतच ते.. त्यांचं काव्य अस्सलच.

कंडु म्हणजे घशातली खवखव.

रंडीरा म्हणजे खडीसाखर.

चिबुल्ली म्हणजे पडजीभ.

या ओळींचा अर्थ एव्हढाच की घरांत कुणी नसताना खोकल्याची उबळ आली तर खडीसाखर खावी, तीही नसेल तर मग स्वत:च्या हाताने पडजीभेवर दाब द्यावा.

पपांच्या तोंडून हे सारं ऐकताना आम्ही खरोखरच रमून जायचो.

मग कपाट आवरणं दूरच रहायचं.

पप्पा त्या कपाटातून बाहेर आलेल्या पुस्तकांच्या गराड्यातत पार रंगून गेलेले असायचे. एकेकीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणायचे. ” हे पहा! हे बर्नाड शॉचे पिग्मॅलियन नाटक. त्याची कल्पकता तर पहा! एका ग्रीक दंतकथेवरून सुचलेलं हे सुंदर विनोदी अंगाने जाणारं पण प्रेमाविष्काराचं सुरेख नाटक. एक उत्कृष्ट शिल्पकार त्याच्या स्वतःच्याच निर्मितीच्या प्रेमात कसा पडतो ते सांगणारी ही एक ग्रीक दंतकथा आणि या कथेचा आधार घेऊन एका प्रोफेसर आणि ग्रामीण फुलराणीची ही अप्रतिम प्रेमकहाणी म्हणजेच हे बर्नार्ड शाॅचे पिग्मॅलियन नाटक.

भर दुपारी ही कथा इतकी रंगायची की आम्ही कपाट आवरण्याविषयी पूर्णपणे विसरलेलेच असायचो.

शेक्सपियरची जुलिएट, डेस्डेमोना, हॅम्लेट, ते काल्पनिक भूत, ऑथेल्लो, ब्रूटस सारेच आमच्या या सोहळ्यात हळूहळू सहभागी व्हायचे.

मध्येच पपा मला म्हणायचे, ” लंडनला राणीच्या देशात जाऊ आणि शेक्सपियरच्या स्ट्रॅटफॉर्डला नक्की भेट देऊ बरं का बाबी!

मग मी म्हणायचे!” काय पप्पा आधी कबूल केल्याप्रमाणे बेळगावला तर न्या. मध्येच हे लंडन कुठून आलं?”

“अगं जाऊ की! आणि समजा मी नसलो तरी तुम्ही जालच आयुष्यात कधीतरी. त्यावेळी एक वेडा वाचक म्हणून त्याच्याशी माझी ओळख करून द्या. ” पप्पांची भविष्यवाणी खरी ठरली पण आमच्या धोबी गल्लीतल्या घरातलं पप्पांमुळे निर्माण झालेलं ते स्ट्रॅटफोर्ड मला आजही आठवतं आणि तेच खरं वाटतं.

अँटन चेकाव हा एक पप्पांचा आवडता लेखक. त्याची “नेकलेस” ही कथा ते इतकी रंगवून सांगायचे की आकाशातून ऐकणारा तो प्रत्यक्ष लेखकही सुखावत असेल.

WHEN ALL AT ONCE I SAW A CROWD

A HOST OF GOLDEN DAFFODILS

BESIDE THE LAKE BENEATH THE TREES

FLUTTERING AND DANCING 

 IN THE BREEZE.

वर्ड्सवर्थची “डॅफोडील” ही अशीच अलगद कपाटातून बाहेर यायची. त्यासोबत बालकवींची फुलराणी असायची.

 आईच्या बाळा ठावे

 प्रेमाच्या गावा जावे

 मग ऐकावे या बोला

राजहंस माझा निजला… ही गोविंदाग्रजांची कविता म्हणून दाखवताना पप्पांच्या डोळ्यातून अक्षरशः पाण्याचा पूर व्हायचा.

जे कृष्णमूर्ती म्हणजे चैतन्यवादी तत्त्वचिंतक. पप्पांच्या विचारांवर त्यांच्या विचारांचा पगडा होता. त्यांची तत्त्वचिंतनपर लिहिलेली अनेक पुस्तके पप्पांनी संग्रही ठेवली होती. काही पुस्तकांचे मराठी अनुवादही पप्पांनी केले होते. अनेक लेख त्यांचे मासिकातून प्रसिद्ध झाले होते. या सर्वांची कात्रणे पपांनी जपून ठेवलेली होती. कपाट लावण्याच्या निमित्ताने तीही बाहेर आली आणि काही काळ आम्ही “जे कृष्णमूर्ती” यांच्या विचार प्रवाहात नकळत गुंतून गेलो.

शैक्षणिक पुस्तकांच्या राशीत छुंदाला गोखले यांचं अंकगणित हे पुस्तक दिसलं. ते बघताच पपा तिला म्हणाले,

“बाजूलाच ठेव ते. उद्यापासून रोज यातली पाच गणितं तरी सोडवायचीच.

कपाट आवरणं फक्त निमित्त! त्या काही वेळात आमच्या घरात जणू काही विश्व साहित्य संमेलन भरलेलं असायचं. तमाम, गाजलेले, देश विदेशातले मृत अथवा जिवंत लेखक- लेखिका त्यांच्या साहित्यांचा एक सुंदर मेळावाच तिथे भरलेला असायचा. त्या साहित्य गंगेच्या प्रवाहात आम्ही आनंदे विहार करायचो.

तिथे फक्त पुस्तकंच नसायची तर अनेक जपून ठेवलेले आठवणींचे कागदही असायचे. त्यात उषाने अगदी लहान असताना काढलेल्या प्रमाणबद्ध रेषांची चित्रं असायची, छुंदाने सोडवलेल्या एखाद्या कठीण गणिताचा वहीतला कागद असायचा, ” मला फक्त सुखात राहायचे आहे” अशी मी कधीतरी लिहिलेली कागदावरची ओळही जपलेली असायची. कपाट आवरताना एका कागदावर स्थिर झालेली पप्पांची नजर मला दिसली आणि मी विचारले, ” काय बघता एवढं त्या कागदावर?”

“बाबी! हे माझ्या बापाचं हस्ताक्षर आहे. मी चार महिन्यांचा असताना त्यांनी हे जग सोडले. मी माझा बाप पाहिला नाही अनुभवला नाही. या हस्ताक्षरात मी माझा बाप अनुभवतो. ”

काळजात चुकलेला तो ठोका आजही माझ्या आठवणीत तसाच्या तसाच आहे.

आई म्हणायची, ” पसारा आवरा तो. ” कसला पसारा आणि कसा आवरायचा? मुळातच याला पसारा का म्हणायचं? 

संध्याकाळ झालेली असायची. भराभर आम्ही सारी पुस्तकं कपाटात ठेवून द्यायचो. खरं म्हणजे पूर्वीपेक्षाही ते कपाट आता अधिकच भरलेलं दिसायचं पण आम्हाला ते तसंच नीटनेटकं वाटायचं.

आज हे सारं काही आठवून लिहिताना जाणवतं, मनाच्या बंद तिजोरीत ही मौल्यवान संस्कार भूषणं अजूनही तशीच आहेत. ज्यांनी आमच्या जगण्यातला आनंद वाढवला, टिकवला.

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares