मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सत्वगुण लक्षण – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ मनमंजुषेतून ☆ सत्वगुण लक्षण – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

आज काळ इतका बदलला आहे की, समर्थांच्या काळानुरूप त्यांना अपेक्षित असणाऱ्या सत्वगुणांच्या कसोट्या आता तंतोतंत वापरता येणं शक्य नाही,  असंच म्हणावं लागेल.  समाजमनाची धारणा, माणसाची जीवन-पध्दती, जीवनमूल्ये, आयुष्याकडे बघण्याची आणि विचारांची दिशा — सगळंच खूप बदललं आहे. त्यामुळे समर्थांच्या काळानुरूप तेव्हा अपेक्षित असणाऱ्या  सत्वगुणांनुसार  प्रत्यक्ष आचरण करता येणे आता खरोखरच अवघड आहे असं  नाईलाजाने म्हणावे लागेल. पण तरीही “भक्ती निकट अंतरंगे”असा जो सत्वगुणाचा एक सर्वोत्तम निकष समर्थांनी सांगितला आहे, तो मात्र त्रिकालाबाधित असा आहे— काळ कितीही बदलला तरीही आचरणात आणण्यासारखा आहे. कारण ”अंतरंगाशी निकट असणारी भक्ती”ही परमेशाप्रती असावी, असा याचा शब्दशः अर्थ असला, तरी आजचा काळ लक्षात घेता,  याचा अभिप्रेत अर्थ मात्र आता नक्कीच अधिक व्यापक असायला हवा. पण म्हणजे कसा? तर तो असा असायला हवा असे मला वाटते. —-सत्वगुण अंगी बाळगण्याचा मुख्य हेतू मनात कमालीची भक्तिभावना निर्माण करणे — म्हणजे त्यासाठी ध्यास घेणे –मग तो स्वतःतच वसणाऱ्या परमेशाची ओळख पटवून देणाऱ्या कुठल्याही गोष्टीचा ध्यास असू शकतो—- उत्तम विचारांचा- उत्तम आचारांचा ध्यास — उत्तम ते शिकण्याचा ध्यास — इतरांशी वागतांना,  त्यांच्या जातीधर्मानुसार, त्यांच्या कामानुसार, त्यांच्या शारीरिक,  बौद्धिक किंवा आर्थिक क्षमतेनुसार भेदभाव न करता, सगळ्यांशी सारख्याच सौहार्दाने, प्रेमाने, आपलेपणाने वागण्याचा ध्यास — इतरांना निरपेक्ष वृत्तीने जमेल तितकी मदत करत रहाण्याचा ध्यास … इथे मी नुकतंच वाचलेलं एक छान वाक्य मला आठवतंय, जे आजच्या व्यावहारिक जगाशी नातं सांगणारं, त्याच भाषेतलं असलं, तरी समर्थांच्या उपदेशाच्याच थेट जवळ जाणारं आहे —–”वाणी,  वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे— आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च किंमत मिळेल.” वाहवा. —-. आज वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर,  माणसाला  क्षणोक्षणी अस्थिरतेच्या, अनिश्चिततेच्या स्वैर झोक्यावर, हतबल होऊन बसायला भाग पाडणाऱ्या अनिर्बंध परिस्थितीत, कितीही विपरीत परिस्थिती ओढवली तरी श्रध्येय देवतेवरचा आणि मुख्यतः स्वतःवरचा विश्वास ढळू न देता, मन शांत व स्थिरच कसे राहील यासाठी आवर्जून आणि अभ्यासपूर्ण प्रयत्न करण्याचाही ध्यासच घेणे गरजेचे झालेले आहे.

“देव आहे‘– आणि माझ्यातही नक्कीच ईश्वरी अंश आहे” अशी जाणीव मनापासून व्हावी, असे अनेक प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात. पण प्रत्येकजण हे सत्य जाणवण्याइतका सजग नसतो. मग तसे सतत सजग रहाण्याचा ध्यास घेणे, हाही महत्वाचा सत्वगुणच — ज्याला काळाचे बंधन नाही. मग, “माझ्यात जसा ईश्वरी अंश आहे, तसाच तो इतर प्रत्येक सजीवातही नक्कीच असणार“ हे मान्य करता येणे अवघड मुळीच नाही आणि तसे एकदा खात्रीपूर्वक मान्य केले,  की मग समर्थांना अपेक्षित असणारा सत्वगुण उच्च कोटीवर पोहोचायला कितीसा वेळ लागणार?

“देवा– सोडव रे बाबा आता लवकर” असं हताशपणे म्हणतांना आपण अनेकांना ऐकतो. पण “सोडव” म्हणजे “मरण दे”हा एकच अर्थ त्यात अभिप्रेत असतो का? तर अजिबातच नाही. “सोडव”म्हणजे ‘आयुष्यातल्या कटकटींपासून, समस्यांपासून, मनाचा गुंतवळ करून टाकणाऱ्या परिस्थितीपासून तू सोडव‘ अशी खरंतर ती भीक मागितलेली असते. पण देवाकडे अशी भीक मागण्याची माणसाला गरजच नाही, असेच समर्थांचे ठाम म्हणणे असावे, असे दासबोध वाचतांना प्रकर्षाने जाणवते. कारण आत्मरक्षणासाठी सतत सज्ज असलेल्या सशक्त सत्वगुणांना आवर्जून, प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक, आणि मनापासून पाचारण केले, त्यांना मनापासून आपले मानले, तर देव स्वतः वेगवेगळ्या रूपात माणसाला भेटायला येईल– फक्त  ‘तो मला ओळखता यायलाच हवा” असा ध्यास मात्र मनात बाळगला पाहिजे. मग जगण्याचा कुठलाही मार्ग, अगदी नाईलाज म्हणून जरी निवडावा लागला तरीही, त्या मार्गावर परमशक्तीवरच्या विश्वासाच्या, श्रद्धेच्या आणि भक्तीच्या पायघड्या घालून, त्यावर फक्त सत्वगुणांचीच फुले उधळत जाण्याचा निश्चय केला, की मग कुठल्याही मार्गाने गेले तरी अंती तो जगन्नियंता, परमेशाचे आपल्यासाठी श्रध्येय असणारे स्वरूप घेऊन, आपल्या रक्षणासाठी, आणि त्याही पुढे जाऊन, मानवजन्माचे अंतिम उद्दिष्ट साध्य करून देण्यासाठी सज्ज असणारच.

——— सध्याच्या परिस्थितीला अनुरूप असा हाच बोध समर्थांनाही अपेक्षित असावा असे मनापासून म्हणावेसे वाटते.

{ समाप्त }

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वप्नातलं सत्य… ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ स्वप्नातलं सत्य…. ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

आजवर मला कधीच एखादं अद्भुत, चमत्कारिक, उत्कंठावर्धक, अगदी आठवणीत राहावं असं, दुसऱ्याचं मनोरंजन होईल असं किंवा ज्या स्वप्नापासून काही बोध घेता येईल असं स्वप्न पडलं नाही.

माणसाचा स्थायीभाव असलेले हे स्वप्न मला सहसा पडतच नाही. वर्गात मैत्रिणी जेव्हा रंगवून त्यांना पडलेली स्वप्न सांगत आणि त्यात रंगून जात, तेेंव्हा माझ्या चेहऱ्याचा रंग फिका पडे. किती बेमालूम थापा मारतात या? मलाही थापा मारायचा मोह होई.

मी आईला नेहमी विचारी, “आई मला स्वप्न का पडत नाहीत ?” “उत्तर नसलेले प्रश्न विचारायची भारी वाईट सवय आहे या मुलीला, जा.. दिवास्वप्न तरी बघ!” आईचं उत्तर असायचं. पुन्हा माझा नवीन प्रश्न तयार ‘दिवास्वप्न?.’.. ते काय असतं? ते तरी कधीच पाहिलं नाही.

देवा शप्पथ खरं सांगते खोटं सांगणार नाही. कधी नव्हे ते काल मला खरंच स्वप्न पडलं आणि ते सांगावसं वाटलं…….

त्याचं काय झालं…….

अंधार भुडुक झाला होता. डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नव्हतं. प्रकाशाचा एक कवडसा नव्हे एक बिंदू ही शोधून सापडंत नव्हता. क्षणभर आपण दृष्टिहीन झालो आहोत का? अशी शंका यावी इतका काळोख…. अंगावर शहारा आला. भीतीने गाळण उडाली होती.

मला दरदरून घाम फुटला, तो दार ठोठावण्याच्या आवाजानं…. खरंच कोणी ठोठावत होतं का दार? की भास होता नुसता? बसल्या जागेवरून उठून दार उघडण्याची हिम्मत माझ्यात नव्हती. म्हणून तिथूनच “कोण आहे रे तिकडं?” असं मी विचारलं. अर्थात अपेक्षित उत्तर आलंच नाही.

बऱ्याच वेळा माझं मन मला योग्य ते सल्ले देतं कारण त्याच्याशिवाय मला आहेच तरी कोण म्हणा?….

“अजिबात दार उघडू नकोस. बाहेर करोना उभा आहे.” ते म्हणालं. दरदरून घाम आलेलं माझं शरीर गारठलं.” कोण आहे म्हणून काय विचारतेस? ‘गो करोना’ ‘गो करोना’ असं म्हण…. माझ्या तोंडातून शब्द फुटेनात……

मला आठवले ते फक्त आठवले. रामदास रचित ‘भीमरूपी महारुद्रा’ ‘मारुतीराया बलभीमा’ सगळं सगळं म्हणून झालं पण मारुतीरायाला काही सवड झाली नाही यायला. एव्हाना दार खिळंखिळं झालं होतं. क्षणार्धात ते उघडलं…..

समोर एक प्रसन्न मुद्रेची, सालंकृत, लक्ष्मीस्वरूप दुर्गावतारातील नारी वाघावर स्वार होऊन माझ्यासमोर उभी ठाकली. ‘देवी पावली’ असं म्हणून मी नतमस्तक झाले.

“अगं, माझ्या काय नमस्कार करतेस तू? मी तर ‘करोना मर्दिनी” करोना शब्दानं माझी गाळण उडाली. नाकाभोवती चादर घट्ट गुंडाळून मी मुटकुळं करून खाली मटकन् बसले. वाघ माझ्याकडं डोळे विस्फारून बघत होता. वाघ पार्किंग लाॅट मध्ये उभा असल्यागत उभा होता.

‘करोना मर्दिनी’ या नावातच संहार जाणवला मला. मन म्हणालं, “अगं हिच्यामुळेच सौख्य शांती निर्माण होणार आहे. चटकन नमस्कार कर” मनावर विश्वास ठेवून मी सकारात्मक पवित्रा घेतला आणि पुनःश्च नमन केलं.

ती हसली. “अगं मी तुझी सेविका!” असं म्हणून तिनं आपल्या दहा हातातल्या दहा गोष्टी खाली ठेवल्या. कोणता जादूचा दिवा मी घासला आणि ही देवी अवतरली? असा मी विचार करत होते.

“लसेंद्र बाहुबली, या इकडे.” तिच्या सांगण्यावरून वाघानं रुबाबात पावलं उचलली. त्याचं नावही त्याला साजेसं रुबाबदार असंच होतं. तो तिच्यापाशी आला. तिच्या इशारा शिवाय तो काहीच करत नव्हता याची मला आता मनोमन खात्री पटली पण शेवटी वाघ म्हणा की वाघोबा…. भीती तर वाटतेच ना हो?

मला भेदरलेलं पाहून ती म्हणाली, “अगं तो काही करत नाही.आपलाच आहे तो..” या तिच्या वाक्यानं मला तमाम कुत्र्यांच्या मालकांची आठवण झाली.

“तुझ्या सुरक्षेसाठी ही भारतीय बनावटीची लस घेऊन आले आहे. ती घेण्याचा पहिला मान तुला मिळतोय.” ती म्हणाली. मी रडवेल्या चेहऱ्याने हसले. वाघ ही स्मितहास्य करत होता असे जाणवले मला…

करोनाशी दोन हात करायची ताकद असलेली ही सिरम इन्स्टिट्यूट ची ही लस! याशिवाय आपल्या देशाची लोकसंख्या जास्त असल्यानं मी इतर देशांतून आयात केलेल्या सर्व लशी सोबत आणल्या आहेत, जेणेकरून तुटवडा होऊ नये.” असे म्हणून तिने आयुधांकडं बोट दाखवलं.

ज्या गोष्टीसाठी गेले वर्षभर मी उतावळी होते ती गोष्ट माझ्यासमोर होती. तीही वाघावर बसून आली होती. नशिबवानच म्हणायची मी!

करोना मर्दिनी म्हणाली, “वाघावर बैस म्हणजे मला लस टोचायला सोयीचे जाईल. माझ्या काळजात धसस् झालं. करोना पेक्षाही वाघावर बसून लस घेणे हे भीतीदायक होतं.

श्रीकृष्णानं देखील संभ्रमावस्थेत असलेल्या अर्जुनाला दुर्गा स्तोत्र म्हणायला लावलं होतं. मीही तेच म्हटलं. क्षणभर इतकं मोठं आसन आपल्याला कोणीतरी देऊ करतय याचा आनंदही झाला. माझ्यासमोर लसेंद्र चक्क झुकला… मी त्याच्यावर आसनस्थ झाले.

दुर्गा झाल्याची चमक माझ्या डोळ्यात होती पण भीतीने माझं सर्वांग थरथरत होतं. दातावर दात कडकडा वाजत होते. घशाला कोरड पडली होती. तशातही मी करोना मर्दिनीला विनंती केली,” ताई लस टोचत असतानाचा माझा एक फोटो घ्याल प्लीज?”

“हो! हो! आम्ही तो घेतोच कारण सगळ्यांची तशी मागणी आहे. त्यातून तुझा चेहरा अगदी ‘लसोजेनिक’ आहे. आमच्या लसेंद्र बाहुबलीला आम्ही सेल्फी घेण्यात ट्रेन केलेलं आहे. दे तुझा मोबाईल त्याच्या पंजात”

रेडी ????चीज….. क्लिक!!!

वाघानं  डरकाळी  फोडली. लसीकरणाची नुसतीच पोझिशन घेऊन वाघानं सेल्फी काढला.

पुढच्याच क्षणी इन्जेक्शन टोचलं जाणार होतं…….

“अजिबात घाबरू नकोस. लस घेतल्यावर तुझा चेहरा ‘लसलशीत’ होईल. शिवाय लस घेतल्याचं धाडस केल्याबद्दल तुला मी ‘लसवंती जोशी’ या नावानं सर्टिफिकेट हि देईन….” मी तिच्या ‘लसकोषा’ वर फिदा झाले होते.

सर्टिफिकेट मिळणार या आनंदात मी माझ्या दंडावर शड्डू ठोकला आणि सामोरी गेले……

“आई गंऽऽ” अशी किंकाळी मारत मी उठले तर, दंडाचा चावा एका मुंगीनं घेतला होता……

स्वप्न लगेचच सत्यात उतरलं….

‘लसेंद्र बाहुबली’ वर आरुढ झालेली करोना मर्दिनी ‘लस मोहीम’ फत्ते करण्यात ‘लशस्वी’ झाली हे सुज्ञास सांगणे न लगे!!!

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सत्वगुण लक्षण – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ मनमंजुषेतून ☆ सत्वगुण लक्षण – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

माणसाचा दुर्मिळ जन्म मिळूनही, त्याचा अंतिम उद्देश ज्यांच्या अजिबात लक्षात येत नाही, अशा सर्वसामान्यांसाठी श्री समर्थ रामदासांना “श्री दासबोध” हा ग्रंथ लिहावासा वाटला असावा, असे या ग्रंथाच्या पानोपानी जाणवते. माणसाची दिनचर्या कशी असावी, त्याने राहावे कसे, बोलावे कसे, वागावे कसे, चांगले म्हणजे काय, वाईट म्हणजे काय, इतक्या सगळ्या रोजच्या आचरणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींपासून सुरुवात करून, अखेर, एकमेव शाश्वत असे जे परब्रह्म, ते जाणून घेण्यासाठी आवश्यक अशा आत्मज्ञानाच्या खुणा अंगात कशा बाणवायच्या,  या समजण्यास अतिशय अवघड गोष्टीपर्यंतचे सर्व ज्ञान सामान्यांना यातून मिळावे हा या ग्रंथाचा स्पष्ट हेतू असावा. अर्थात सामान्य माणसाला या पायरीपर्यंत पोहोचायला एक मानव जन्म पुरणारच नाही हेही समर्थ नक्कीच जाणून होते. आणि म्हणूनच  कोणते सद्गुण,  म्हणजेच सत्वगुण अंगी बाणवले तर अखेर “त्या जगन्नियंत्या परब्रम्हाचे दर्शन होणे” या मानव-जन्माच्या अंतिम उद्दिष्टाच्या दिशेने निदान वाटचाल तरी सुरु करणे मानवाला शक्य होईल, हेच या ग्रंथात वेगवेगळ्या प्रकारे सांगितले असावे असे वाटते. अंगी सत्वगुण बाळगणे हा यासाठीचा त्यातल्या त्यात शॉर्टकट असावा असेच पूर्ण वेळ वाटत रहावे, इतका हा मुद्दा या ग्रंथाच्या केंद्रस्थानी असल्याचेही जाणवत रहाते  —-  आणि मग आजच्या काळानुरूप सत्वगुण म्हणजे नेमके काय अपेक्षित असावे, हा प्रश्न पडतो —- त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

मानवी स्वभावातले ‘सत्व- रज – तम‘ हे ठळकपणे दिसणारे तीनही गुण सारखेच शक्तिशाली असतात. आणि कुठलीही शक्ती कशी वापरली जाते, यावर तिचा परिणाम अवलंबून असतो.  रज आणि तम हे गुण स्वतःभोवती, प्रपंचाभोवती, आणि परिणामतः ऐहिक गोष्टींभोवती फिरत राहणारे, तर सत्वगुण सतत स्वतःमधून स्वतःला बाहेर काढणारा, आणि सतत त्या परमशक्तीकडे आकर्षित करणारा. त्यामुळेच, “जग माझ्यासाठी आहे“ ही भावना रज-तम गुणांमुळे निर्माण होते.  तर “ मी जगासाठी आहे “ ही भावना वारंवार जागृत करतात ते सत्वगुण –अशी थोडक्यात व्याख्या करता येईल.  हे सत्वगुण “परमदुर्लभ“ असं समर्थांनी अगदी सार्थपणे म्हटलं आहे. कारण असं असावं की, मुळातच सगळ्या सजीवांबद्दल, “ते खऱ्या अर्थाने  स्वजातीय  आहेत, माझे स्वकीय आहेत“, अशी आपलेपणाची, जवळकीची भावना मनात उपजतच असणं अत्यंत अवघड असतं. पण निश्चयपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक सत्वगुण अंगिकारले तर ते सहजसाध्य होऊ शकतं, हा विश्वास समर्थ देतात. “मी जगासाठी आहे“ अशी मनाची ठाम धारणा झाली की, हळूहळू इतर प्रत्येक माणसाबद्दल प्रेमभावना वाटू लागते. ती वागण्यातही दिसू लागते. आप-पर भाव नकळत पुसट-पुसट व्हायला लागतो. मग आपोआपच मोह-क्रोध-मत्सरादी षड्रिपूंचा मनातला धुमाकूळ हळूहळू आणि स्वतःच्याही नकळत कमी व्हायला लागतो आणि मनही नकळत शांत- समाधानी होऊ लागतं. अर्थात “ठरवलं आणि झालं“ असा साधा- सरळ मामला नसतोच हा. यासाठी जाणीवपूर्वक सातत्याने प्रयत्न करावे लागतात. हळूहळू तो जेव्हा जगण्याचाच भाग होऊन जातो, प्रत्येक सजीवात परमात्म्याचा अंश आहे ही भावना मनात पक्की रुजते, तेव्हा मग परमात्मास्वरूप असणाऱ्या स्वतःच्या आवडत्या देवरूपाकडे,  सद्गुरुंकडे मन ओढ घ्यायला लागतं — कारण तो जागोजागी असल्याचं अंतर्मनाला जाणवायला लागतं. आणि नकळतपणे  मनातून “मी“ हद्दपार होऊ लागतो. मग स्वतःवर दुःख कोसळले, किंवा सुखे हात जोडून समोर उभी राहिली, तरी या कशानेच मन विचलित होत नाही. ते अधिकाधिक विशाल होत जातं –वृत्तीचा संकुचितपणा आपोआप कमी होत जातो. इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो, आणखी सकारात्मक होतो आणि रज – तमापेक्षा सत्वगुण अत्यंत आनंददायक, शांतीदायक, सुखदायक असल्याची खात्री पटू लागते. प्रपंचात राहूनही परमार्थ साधण्याचा मार्ग उघडपणे समोर दिसू लागणे, ही याची पुढची पायरी. मग इतर कशाहीपेक्षा ईश्वराबद्दल सर्वाधिक ओढ, प्रेम वाटू लागते. स्वतःच्या दुःखांची बोच नगण्य वाटायला लागते. आणि इतरांची दुःखे कमी करण्यासाठी हात आपोआपच पुढे होतात. संत ज्ञानेश्वर – तुकाराम यांच्यासारखे अनेक संत म्हणजे  सत्वगुणांची मूर्तिमंत उदाहरणे.  सत्वगुण म्हणजे काय, कोणत्या कृतीमध्ये  ते ठळकपणे  दिसून येतात, हे श्री समर्थांनी दासबोधाच्या दुसऱ्या दशकातल्या  सातव्या  समासात विस्तृतपणे सांगितले आहे.

 क्रमशः….

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवधन गड आणि नाणेघाट…भाग 1 ☆ श्री विनय माधव गोखले

 ☆ विविधा ☆ जीवधन गड आणि नाणेघाट…भाग 1 ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

३० जानेवारी २०२१ रोजी मी रात्री १०:३० वाजता ‘गिरीदर्शन’ च्या ‘जीवधन’ गड ट्रेक साठी ‘व्याडेश्वर’ समोर पोहोचलो. परंतु नेहमीची बस आलेली नव्हती आणि त्याऐवजीची ठरवलेली बस उशिरा येत आहे असे शुभवर्तमान कळले. पुढे जवळजवळ तासभर मागील ट्रेकच्या एकमेकांच्या रंजक गप्पा मारण्यात / ऐकण्यात वेळ कसा गेला ते मात्र कळले नाही. बदली बस मात्र छोटी होती त्यामुळे सर्वजण सामानासह जेमतेमच मावले. नारायणगाव येथे रात्री १:३० ला चहा घ्यायला थांबली तेवढीच नंतर एकदम पायथ्याच्या घाटघर गावातील मुक्कामाच्या घरीच थांबली.

घराबाहेर हवेतून एक “चर्र चर्र” असा आवाज ऐकू येत होता तो कुठून येतोय हे कळेना.  परंतु तेव्हा पहाटेचे ३:३० वाजलेले असल्याने आधी मिळेल तेवढी झोप घ्यावी आणि आवाजाचे कोडे सकाळी सोडवूयात असे ठरवून पथारी पसरल्या. पण थोड्याच वेळात मी जिथे झोपलो होतो त्याशेजारील बंद दरवाजाच्या फटीतून थंड हवा झुळुझुळू यायला सुरुवात होऊन थंडी वाजायला लागली. सकाळी तारवटलेल्या चेहेर्‍याने उठलो पण खिडकी उघडल्याउघडल्या ‘गुलाबी’ सूर्यदर्शन झाले आणि थकवा पार पळून गेला.  गरमागरम पोहे आणि काळा चहा प्यायल्यावर सर्व तेवीस जण ट्रेकसाठी सुसज्ज होऊन निघालो. त्याआधी थोडे जीवधन गडाबद्दल…

सातवाहन काळात म्हणजे इ. स. पू. पहिले शतक ते तिसरे शतक ह्या काळात बांधलेला हा एक अतिप्राचीन गड आहे. ह्यांच्या काळातच ‘नाणे घाट’ हा व्यापारी मार्ग बांधून काढण्यात आला. घाटाच्या माथ्याशी गुहा असून त्यात ब्राह्मी लिपीत मजकूर कोरला आहे. गुंफेत काही प्रतिमाही होत्या ज्यांचे आज फक्त पायच पहायला मिळतात. जीवधन हा ह्या नाणेघाटचा संरक्षक दुर्ग! चला तर पुढे… बघूयात वर्तमान काळात काय काय पाहायला मिळतंय जीवधन गडावर!

आमच्या आजच्या चमूमध्ये एक मनाने तरुण, गड-इतिहास-प्रेमी तसेच मोडी लिपी तज्ञ असे लळींगकर काका खास नवी मुंबईहून ट्रेकसाठी आले होते. मुक्कामच्या ठिकाणाहून गडाच्या पायथ्याजवळ बस आम्हाला घेऊन निघाली तेव्हापासूनच त्यांनी उत्साहाने आजूबाजूला दिसणार्‍या गडांची माहिती द्यायला सुरुवात केली होती.

त्यांनी बोट दाखवलेल्या दिशेला पहिले तर आम्हाला ‘नवरा-नवरी-करवली-भटोबा’ सुळके दिसले आणि त्यामागे काही ‘वराती’ सुळके दिसले. ह्या सगळ्यांना मिळून  ‘वर्‍हाडी  डोंगर’ असे गमतीशीर नाव आहे.

जंगलातील चढाई सुरुवातीला वाटली तितकी सोपी नव्हती. दगड घट्ट नसल्याने व उंच असल्याने त्यावर पाय जपून ठेवावे लागत होते. तरी बर्‍याच ठिकाणी दगडांवर पाय ठेवायला लोखंडी जाळ्या लावलेल्या दिसल्या.

साधारण ८० टक्के चढाई झाल्यावर श्वास चांगलाच फुलला होता. हयामागे कोरोना लोकडाऊन पोटी घ्यावी लागलेली अनेक महिन्यांची ‘सक्तीची विश्रांती’ कारणीभूत होती. पुढील २० टक्के वाटचालीत दगडी पायर्‍या चढून जाणे होते तसेच एका प्रस्तरावरून पुरातत्वखात्याने टाकलेली शिडी चढून जाण्याचा रोमांचक अनुभवही सर्वांना मिळाला.

साधारण अडीच तासात वर चढून आल्यावर उजव्या हातास थोडे खालच्या अंगास लपलेली धान्याची एक दगडी कोठी दिसते. आतमध्ये पायर्‍या उतरून जवळजवळ चार खोल्या असलेले अंधारे कोठार बघायला तुम्हाला टॉर्चच्या प्रकाशाचा आधार घ्यावाच लागतो. आत पायाला सर्वत्र मऊ माती लागते. कोरलेले  दरवाजे आणि कोनाडे असलेले व प्रवेशद्वाराच्या उंबरठावजा पायरीखालून पाण्याची पन्हाळ असलेली ही जागा “पूर्वी एखादे मंदीर असावे का?” अशी एक शंका मनात आल्यावाचून रहात नाही.

क्रमशः ….

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – खेळताना रंग बाई होळीचा होळीचा… ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

☆ विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – खेळताना रंग बाई होळीचा होळीचा … ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

होळी म्हणजे रंगाचा सण.एक रंगोत्सव..भारतात सर्वत्र उत्साहाने साजरा होणारा लोकोत्सव.. होळी सणाची अनेक नावे… होलिकादहन, शिमगा, हुताशनी महोत्सव, फाल्गुनोत्सव तसेच दुसर्‍याच दिवसापासून वसंत ऋतुचे आगमन होते म्हणून वसंतागमनोस्तव किंवा वसंतोत्सव!!

खरं म्हणजे या रंगोत्सवाशी लहानपणापासूनचं केवळ गमतीचं नातं.!! सुकलेला झाडाचा एखादा बुंधा खड्डा खणून रोवायचा. सुकी लाकडं, पेंढा, पालापाचोळा गोळा करुन बांधायचा… आजुबाजुवाल्यांकडून वर्गणी गोळा करायची.. होळी पेटवायची.. ऊसळणार्‍या ज्वाला, तडतडणार्‍या ठिणग्या, कलशातून पाणी ओतत, अग्नीला अर्पण केलेले नारळ अन् नैवेद्य.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मारलेल्या बोंबा… दुसर्‍या दिवशी धूळवड… ऊधळलेला गुलाल, रंगीत पाण्याच्या पिचकार्‍या,होळीतून काढलेला भाजका नारळअन् होळीच्या धगीवर तापवलेल्या पाण्याने केलेली आंघोळ.. या सामुहिक आनंदाचा मनसोक्त आनंद आम्ही लहान थोरांनी मिळून ऊपभोगला… मनात तेव्हा. नव्हता विचार पर्यावरणाचा.. तेव्हा नव्हते रासायनिक हानीकारक रंग… नव्हतं राजकारण, गुंडागर्दी लुटमार वर्गणीच्या नावाखाली… एकमेकांवर रंग ऊडवण्याचा एक फक्त मैत्रीचा, स्नेहाचा मनमोकळा मजेचा खेळ असायचा.. राधाकृष्णाच्या रासक्रीडेची प्रचलित गाणी निष्ठेनी गायली जायची… पण कुठलाच फिल्मीपणा नव्हता…. होता फक्त आनंद, गंमत सोहळा….. पण आता मनात विचार येतात. का हे सण साजरे करायचे?.

काय महत्व यांचं? कसे साजरे करायला हवेत, कसे नकोत.. वगेरे वगैरे.. पण आपल्या अनेक पारंपारिक सणांमधे, पूजनाबरोबर दहन, ताडन, मर्दन, नादवर्धन असते. दसर्‍याला रावण जाळतो, बलीप्रदेला काठी आपटत ईड जावो पीड जावो.. अ से ऊच्चारण असते.. चिराटं चिरडून नरकासुराचे प्रतिकात्मक मर्दन असते… शंख घंटा ढोल ताशे सारखे नाद असतात.. आणि एक पारंपारिक काहीशी मनोरंजक,फँटसी असलेली ऊद्बोधक कहाणी असते.

फाल्गुन पौर्णीमेला साजरा केल्या जाण्यार्‍या होळी ला होलिका दहन असते.. हिरण्यकश्यपु नावाचा आसुर, त्याची बहीण होलिका जिला अग्नी जाळू शकणार नाही याचे वरदान मिळालेले.. आणि त्याचा विष्णुभक्तपुत्र प्रल्हाद.. विष्णुभक्तीचा अनादर असलेला हिरण्यकश्यपु प्रल्हादाचे भस्म करण्यासाठी, त्याला होलिकेच्या स्वाधीन करतो. पण घडते निराळेच.. अग्नी प्रल्हादाचे रक्षण करतो अन् होलीकेचेच दहन होते.

म्हणून होळी पौर्णिमेला आपण प्रतिकात्मक होलिकादहन करतो.. खरं म्हणजे हा सत्वाचा तामसावरचा विजय आहे!! या निमीत्ताने मनोविकार जाळून टाकायचे. भस्म करायचे.. वाईटाची होळी आणि चांगल्याची पुनर्गुंफण…. बोंबा मारायच्या.. शिव्याही द्यायच्या.. का? हे असभ्य असंस्कृत अमान्य तरीही…?? यामधे मनोविश्लेषणाचे कारण आहे… मनांत खूप कोंडलेलं असतं.. प्रतिष्ठेच्या नावाखाली… समाजाच्या भीतीने.  हे जे काही कुलुपात बंद असते, त्याला या माध्यमाने मुक्त करायचे.. तशी या दिवशी परवानगी  असते… थोडक्यात ही एक थेरेपी आहे… मनातले ओंगळ बाहेर काढण्यासाठी.

शिवाय निसर्ग तर प्रत्येक सणाच्या केंद्रस्थानी असतोच.

शिशीर ऋतुची शुश्कता संपून वसंताचे आगमन होणार आहे… जुनं गळून नवं अंकुरणार… यौवन फुलणार.. सृष्टीच्या प्रणयाचे रसरंग फवारणार.. म्हणून हा रंगोत्सव… वसंतोत्सव… करुया साजरा… कोरोनाच्या कृष्णछायेतील बंधने पाळून या हर्षोत्सवात सामील होवूया… सुकलेली शुष्क चेतना नसलेली काष्ठे वापरु..त्यासाठी वृक्षतोड नको…रासायनिक रंग नाही ऊडवायचे… बोंबा मारु शिव्या देऊ पण केवळ गंमत… कुठलाही हिंसक प्रकार नसेल…. आणि कुणा गलगले मास्तरांनी नाहीच दिली वर्गणी तरीही त्यांना होळीत भाजलेल्या नारळाचा प्रसाद मात्र नक्की देऊ..

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – आमचा शिमगा …. ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

 ☆ विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – आमचा शिमगा ….? ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

(जून्या लेख/ चारोळींची  काही बदलांसह संग्रहित आहुती ?)

होळी म्हणले की ‘ बोंबलणे ‘ आणि ‘ टिमकी ‘ वाजवणे ( या दिवशी स्वत:ची सोडून)  याचे बाळकडू आम्हाला घाटावरच (सांगली) मिळाले. मात्र मुंबईत आल्यावर या दोन्ही गोष्टींना मुकलो. दरवर्षी सोसयटीच्या आवारात अगदी पारंपारिक पध्दतीने होळी साजरी होते मात्र या दोन्ही गोष्टी बघायला ( करायला ) मिळत नाहीत.

मात्र या वर्षी होळी पेटली की ठरवलय ,प्रसादाचा नारळ होळीत सोडायचा आणि मग होळी भोवती प्रदक्षिणा मारत बोंब ठोकायची. ‘ (हा काय करतोय येड्यासासारखा ? ‘? असे सोसायटीतील लोकाना वाटले तरी चालेल .)

वर्ष भरात ज्या गोष्टींमुळे त्रास झाला/ होतो त्यांचा उध्दार करायचाच म्हणून यादी तयार करायला घेतली ती अशी…..

१) पहिली फेरी करोना विषाणूच्या  नावे – ६ वर्षानंतर संधी आलेली बाहेर जायची. साडेसातीचा परिणाम …. ?

२) पर्यावरणवादी – या(ना) लायकांना फक्त होळी आणि दसरा या दिवशीच झाडे, पर्यावरण -हास यांची आठवण होते. ?

३) मुंबईकर – मराठी अस्मितेचा अभिमान बाळगत धुळवडीच्याच दिवशी रंगमंचमी साजरी करणा-या मुंबईकरांसाठी ( आणि यात आता सुसंस्कृत पुणेकर ही आले) तिसरी फेरी.

४) खास ‘ती’ च्या साठी – ती हो आमची , ८.२१ ची  – ठाणे लोकल. एक दिवस जरी वेळेवर आली तर शप्पथ…। ?

५) आम्हाला खोट्या प्रकरणात अडकवून पोलीस चौकीची फेरी घडवून आणणाऱ्यांच्या नावे ?

६) समुहात राजकारणाच्या पोस्ट नको असा ‘शिमगा’ करुन इतरांच्या मजेशीर पोस्टवर स्वत: बोंब मारणाऱ्यांच्या नावे एक फेरी

७) गाण्यातील सूरांसह,  लेखनाची ही वाट लावणाऱ्या सर्व आमच्या सारख्या फ्यूजन कलाकारांच्या नावेही एक फेरी

बास ! बास ! दमलो, याच्या पुढे फे-या मारता येणार नाहीत ( आणि जास्त बोंबलूनही उपयोग नाही ?)

अरे हो सोशल मिडिया सोडायचा असा सल्ला देणाऱ्यांसाठी? विसरलोच की.

नाही नाही हा मात्र सल्ला आपल्याला आवडला. आणि हा सल्ला यांच्यापर्यंतही पोहोचला , लगेच तयारीतच आल्या

नो व्हॅाट्स अप, नो फेसबुक

साजरी करू या होळी….

शब्दांना सोबत घेऊन लगेच

आल्या चार ओळी ?….बोंबला सौख्य भरे❗?

बोंब मारायची ही झाली माझी कारणे

काय तुमची टार्गेट्स तयार  आहेत का ?

कळूदे आम्हाला ही ?

( टीपः वरील यादीत बुडणाऱ्या बँका, ऑफीस , महागाई , भ्रष्टाचार, ट्रॅफिक  जाम यांना मुद्दाम स्थान दिले नाही. यांच्या नावाचा शिमगा रोजचाच आहे. त्यांच्या बद्दल बोंबलणे जाऊ दे त्यांच्या करामतीने आमची बोबडी वळु नये हीच ‘ होळी’ चरणी प्रार्थना  ?)

? अमोल केळकर ?❗

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – कोकण – रत्नागिरी ची होळी.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे 

 

☆ विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – कोकण – रत्नागिरी ची होळी.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 होळीचे दिवस, परीक्षांचे दिवस आणि कैऱ्यांचे दिवस या तिन्ही गोष्टी रत्नागिरीच्या आठवणींशी निगडीत आहेत. लहानपणी मार्च महिना आला की अभ्यासाचे पडघम वाजायला घरात सुरुवात व्हायची आणि अभ्यासाबरोबर कैरीचे तुकडे तिखट मीठ घालून खाण्याची आमची सुरुवात असायची! कोकणात होळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्यामुळे मुंबईचे चाकरमानी या दिवसात सुट्टी घेऊन कोकणात यायचे. मग खरी  होळीच्या उत्सवाची मजा सुरू व्हायची! रोज रात्री अंगणात ‘खेळे’ यायचे!’खेळे’ म्हणजे वेगवेगळे  गाण्याच्या तालावर नाच करणारी ठराविक लोकं असायची. पारंपारिक गाण्याबरोबरच नवीन नवीन सिनेमाच्या गाण्यांवर नाचत केले जायचे. ते काही शास्त्रशुद्ध नाच नसायचे, पण त्यात उत्साह, जोश इतका असायचा की ते बघायला वाड्यातील सर्व लोक उत्सुकतेने, उत्साहाने गोळा व्हायचे.तेव्हा टीव्ही नव्हता, त्यामुळे ही जिवंत, उत्साहाची करमणूक सर्वांना फार आवडायची! या सगळ्या सांस्कृतिक  होळीच्या काळात पुरणाची पोळी लज्जत आणत असे ती वेगळीच!

होळीचा खुंट म्हणजे होळी उभी करायची जागा ठरलेली असते. दरवर्षी एखाद्याच्या बागेतील सुरमाड होळीसाठी निवडला जाई.सुरमाडाला नारळ येत नाहीत. तो सुरमाड तोडून त्या ठिकाणाहून वाजत गाजत होळीच्या ठिकाणी आणला जाई. मुख्य म्हणजे ते झाड माणसे वाहून आणत. त्यासाठी चार पाच तास लागत असत. आमच्या घरापासून जवळच होळीचा खुंट असल्याने आम्ही दुपारपासून ते बघण्यात दंग असायचो! एकदा का होळी उभी राहिली की पाच दिवस तिथे जत्राच असे. तसेच देवीची पालखी ही तिथे आणली जाई.जुगाई देवीच्या मंदिरापासून मिरवणुकीने देवीची पालखी येत असे. तेव्हा खूपच गर्दी उसळत असे.रोज दुपारी आणि रात्री वाजत गाजत देवीची पालखी मंदिरापासून खुंटा पर्यंत येते. कोकणात सगळीकडे होळीचा उत्सव थोड्याबहुत प्रमाणात असाच असतो. काही ठिकाणी होळी लहान असते पण उत्साह तेवढा जास्तच असतो.

देवीच्या पालखी चे पाच दिवस असत पण देवीची पालखी उठली तरी होळी पंधरा दिवस उभी असे. पाडव्याला होळी उतरवतात.होळी उतरवतात म्हणजे उभा केलेला सुरमाड खाली पाडून त्याचे तुकडे करून बाजूला ठेवतात. खुंटावर होळी जाळण्याची पध्दत तेथे नाही. लोकांनी नवसाचे म्हणून बांधलेले अगणित नारळ असतात. होळी खाली आली की ते प्रसादाचे नारळ घेण्यासाठी झुंबड उडते. दरवर्षी लोक श्रद्धेने देवीकडे मागणे मागत असतात. तिचा कौल मिळाला की ते काम होते असे लोकांना मनापासून वाटत असते. मग पुढच्या वर्षी नारळाची तोरणे नवस पुरा करण्यासाठी बांधली जातात.

होळी च्या पाचव्या दिवशी रंगपंचमी येते. मुलांच्या आवडीचा हा सण विविध रंगाचे पाणी उडवून साजरा होतो. पुढे येणाऱ्या उन्हाळ्याला तोंड देण्यासाठी ही सगळी तयारी असते. थंड पन्हं, कैरीची डाळ यांचे स्वाद येऊ लागतात. देशावर धुळवड साजरी केली जाते पण कोकणात मात्र रंगपंचमीची जास्त असते. परीक्षा तोंडावर आलेली असते पण अभ्यासाबरोबरच हे रंगीबेरंगी दिवसही मनाला खूप आनंद देतात. रत्नागिरीची, कोकणातील होळी माझ्या डोळ्यासमोर अशीच येते. इतकी वर्षे झाली, काळ बदलला पण सणवार, प्रथा आहे तशाच आहेत. काळानुसार त्यात थोडे बदल झाले असतीलही, पण ती पालखी, होळीचा खुंट, तो लोकांचा उत्साह हे सगळं तसंच असणार आहे. पुन्हा एकदा मनाने मी रत्नागिरी फिरून आले. तेथील होळीचा सण अनुभवायचा योग पुन्हा कधी येतो पाहू या!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ होलिकोत्सव विशेष – सूरसंगत (भाग – २३) – ‘सुर संग रंग’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत ☆ होलिकोत्सव विशेष – सूरसंगत (भाग – २३) – ‘सुर संग रंग’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

दुपारी उज्वलाताईंचा फोन आला कि, उद्या होळी आहे तर तू उद्याचा लेख ‘होरी’ वर लिही आणि मला पटकन सुरेश भट साहेबांनी लिहिलेलं आपलं एक मराठी भावगीत आठवलं

‘आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी!’ मग जुन्या अभ्यासाच्या वह्या बाहेर काढल्या, वाचनातून मेंदूतल्या ‘होरी’च्या फोल्डरमधे असलेले संदर्भ गोळा करण्यासाठी स्मरणशक्तीला ताण दिला. सगळ्याचा मागोवा घेताना अगदी औरंगजेबाच्या संगीतप्रेमासहित बराच खजिना हाती लागला त्याविषयी पुढं लिहीनच, मात्र मगाचच्या गीताचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे सगळ्या माहितीतला एक समान धागा त्या एका ओळीतून दिसतो.

‘होरी’च्या एखाद्या प्रकारानुसार त्याची गायनशैली बदलत जाते मात्र त्यातल्या गीताचे शब्द हे होळीच्या उत्सवाचं वर्णन करणारेच असतात… अर्थातच ही गीतं ह्याच कारणास्तव ‘होरी’ किंवा ‘होरीगीत’ म्हणून ओळखली जाऊ लागली. वरील भावगीताचा विचार केला तर वर्णन वृंदावनातल्या होलिकोत्सवाचेच आहे मात्र ह्यातले काव्य वृत्तबद्ध आहे, भटसाहेबांचं शब्दलावण्यही संपूर्ण रचनेत दिसून येतं… कारण विषय ‘होरी’चाच आहे मात्र काव्याला केंद्रबिंदू मानून त्याची रचना झाली आहे. म्हणूनच हे गीतप्रकाराच्या दृष्टीने हे भावगीत आहे, होरी नाही. पारंपारिक होरीगीतांचा विचार करता एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते कि, होळीचे वर्णन असणे इतपतच तिथं साहित्याला/ काव्याला महत्व आहे. मात्र त्याला दर्जेदार साहित्य, उत्कृष्ट काव्य म्हणता येईल असे बहुतांशी नाहीच.

‘होरी’चं मूळ शोधताना पूर्वीच्या लोकसंगीतातच हा प्रकार मोडत असल्याचे दिसून येते. समूहानं रंग खेळत असताना ही गीतं गायली जात. अर्थातच त्यावेळी एखाद्या गायनशैलीशी ही गीतं जोडली गेलेली नसावीतच. फक्त तो उत्सव साजरा करतानाचा आनंद समर्पक पण बोलीभाषेतील शब्दांच्या आधारे सहजस्फूर्त सुरावटींत व्यक्त करणे हेच इतर लोकसंगीतप्रकारांप्रमाणे घडत असावं. त्यामुळं ‘काव्य’ म्हणून ते लिहिणं, त्याचा साहित्यिक दर्जा ह्या गोष्टींचा विचारच तिथं अपेक्षित नाही.

पूर्वीच्या ‘ब्रज’ प्रदेशातील म्हणजे आजच्या मथुरा-वृंदावन व आजूबाजूच्या बऱ्याचशा प्रदेशातील होलिकोत्सव’ देशभर प्रसिद्ध आहे. असं वाटतं कि, तिथल्या ह्या होलिकोत्सवाला मोहक वलय द्वापारयुगात जसं कृष्णाशी ह्या उत्सवाचं नातं जोडलं गेलं तेव्हांपासून प्राप्त झालं असावं आणि ते साहजिकही आहे. साक्षात मनमोहनासोबत रंग खेळून होळी साजरी करण्यापेक्षा देखणा उत्सव कोणता असू शकतो! परंपरागतपणे त्या प्रदेशात पुढंही धामधुमीत हा उत्सव साजरा होत राहिल्यानं त्याचं वर्णन सर्वदूर पोहोचून तो प्रसिद्ध झाला असेल. त्याच काळापासून कदाचित ‘होरी’गीतांमधे बहुतांशी कृष्णासोबत साजऱ्या होणाऱ्या होळीचं वर्णन येऊ लागलं असावं. शिवाय पारंपारिक होरीगीतं ही ‘ब्रज’ भाषेतच आढळतात. त्याआधीच्या ‘लोकसंगीतातील’ होरीगीतं कशी होती हे माझ्या वाचनात आलेले नाही, मात्र त्यात कृष्ण-गोपिकांत रंगलेल्या होळीची वर्णनं असण्याची शक्यता नसणारच!.. अर्थात हा सगळा माझा ह्याबाबतीतला ‘होरा’ आहे!

पुढं कागदोपत्री ‘होरीगीतां’बाबत जे उल्लेख आढळतात ते फार रंजक आहेत. लोकसंगीतातूनच शास्त्रीय संगीत निर्माण झाले. अर्थातच पुढं ह्या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनाही मूळ लोकसंगीताने भुरळ घातली नसती तरच नवल होतं. त्यामुळं झालं असं कि लोकसंगीतातल्या ज्या काही उत्तम संगीतधुनी शास्त्रीय संगीताच्या आधारे सुंदर सजवून त्या गायनशैलीच्या निदान एका उपप्रवाहात आणता येतील त्या ‘उपशास्त्रीय’ ह्या प्रकारात अभ्यासू कलाकारांकडूनच सामावून घेतल्या गेल्या. विचार करता सहज लक्षात येईल होरी, चैती, झूला, कजरी इत्यादि आजच्या उपशास्त्रीय संगीतातील कित्येक प्रकार आपल्याला थेट लोकसंगीताच्या पाऊलवाटेशी नेऊन सोडतात.

ह्यापैकी ‘होरी’ गीतांबाबत विचार करायचा झाला तर धृपदशैली प्रचारात असताना त्या शैलीनुसार दुगुन, चौगुन, बोलतान, गमकाचा गीतविस्तारासाठी वापर करून ‘धमार’ ह्या चौदा मात्रांच्या विशिष्ट तालात जी गीतं गायली जाऊ लागली ती ‘धमार’ ह्याच नावानं ओळखली गेली. मात्र ह्या गीतांचे शब्द होलिकोत्सवाचे वर्णन करणारे असायचे. ‘धमार’ गाताना रागाची चौकट पाळूनच गायन केले जाते त्यामुळं शास्त्रोक्त पद्धतीनं धृपदशैली शिकलेल्यांनाच चांगल्याप्रकारे धमार गाता येतो. आजही धृपदगायकच उत्तमप्रकारे ‘धमार’ गाताना आढळून येतात. तर ‘धमार/धमारी/धमाली’ (प्रचारातील नांव ‘धमार’च!) हा एक होरीगीतांतलाच प्रकार आणि ह्या प्रकाराला ‘पक्की होरी’ असं म्हटलं जातं. याशिवाय धमार तालात फक्त काही वैष्णव संतांनी भक्तिरचना केलेल्या व त्यांनाही ‘धमार’ असेच संबोधले गेल्याचे व आजही त्यांचे अनुवंशी कीर्तनकार त्याला धमारच म्हणत असल्याचे आढळते. पुढं यवनकाळात आश्रयदात्या राजांविषयी स्तुतीपर शब्द काही बंदिशींच्या गीतांत रचण्याचा प्रकार सुरू झाला त्याला धमारही अपवाद नव्हते. फक्त धमारात होलिकोत्सवाविषयीच्याच काव्यात खुबीनं असे शब्द गुंफले जात. त्याविषयी माहिती पुढं येईलच.

‘कच्ची होरी’ ह्या प्रकारांतर्गत पुढील प्रकार येतात.

ख्यालगायनशैलीचा बराचसा प्रभाव असणारा उपशास्त्रीय संगीतातील ‘ठुमरी’ हा जो प्रकार आहे त्यापद्धतीने जी होरीगीतं गायली जातात त्यांना ‘होरी-ठुमरी’ असं म्हणतात. खरंतर ही ठुमरीच, फक्त त्यातलेही काव्य होलिकोत्सवात रंगलेले असते. ही गीतं दीपचंदी, तीनताल, जतताल इ. ठुमरीसाठी वापरल्या जाणाऱ्या तालांतच गायली जातात. ह्या प्रकारांत मात्र रागाची चौकट पाळण्याचे बंधन नसते. ह्या गीताच्या विस्तारक्षेत्रात अनेक रागांना सामावून घेतले जाऊ शकते.

अशा प्रकारची काही होरीगीतं अगदी रागाच्या बंदिशीसारखी असतात. त्यांचा विस्तार रागाचे नियम पाळून बंदिशीप्रमाणेच केला जातो. रागानुसार काहीवेळा विस्तारढंग बदलतो… तो ठुमरीकडे जास्त झुकणारा असेल तर ती गीतं ‘बंदिश की ठुमरी’ ह्या प्रकारांतर्गतही धरली जातात. इतर होरीगीतं जी साधारण ‘दादरा’ ह्या उपशास्त्रीय गीतप्रकारानुसार गायली जातात त्यांना ‘होरी’ ह्याच नावानं ओळखलं जातं. ती दादरा किंवा केहरवा तालात निबद्ध असतात. ह्यांच्या विस्तारात रागनियम पाळण्याचे बंधन नसते.

संगीताविषयी विशेष रुची नसलेल्या व्यक्तीवर सहजपणे ‘हा संगीतातला औरंगजेब आहे’ अशी टिप्पणी केली जाते. औरंगजेबाच्या संगीतद्वेषाच्या कित्येक कथा प्रसिद्ध आहेत. मात्र लिखितस्वरूपात औरंगजेबाच्या संगीतप्रेमाविषयी जे स्पष्ट उल्लेख आढळतात त्यात ‘होरी’ला किंबहुना ‘धमार/धमारी’ला स्थान आहे. औरंगजेब मंगलामुखींसोबत (गणिका) अगदी उत्साहाने, जोशपूर्ण रीतीने होळी खेळायचा आणि त्यावेळी त्या गातगात अशी प्रार्थना करायच्या कि, ‘शहेनशहा औरंगजेबाचे आयुष्यमान लोमश ऋषींसारखे असावे आणि त्यांनी नेहमी आपल्यासोबत अशीच जोशपूर्ण होळी खेळत राहावे!’ पूर्वी अकबर, शहेनशहा ह्या कलाश्रयी राजांची प्रशंसा काही बंदिशींतून दरबारगायक करत असत. त्याचप्रमाणे ती औरंगजेबाच्या काळी त्याच्याबाबतही केली गेली. औरंगजेब हा संगीतातला मर्मज्ञ होता, त्याला संगीताची कदर होती, मात्र काही ‘राजनैतिक’ कारणांमुळं त्यानं आपल्या दरबारातून संगीताला बहिष्कृत केले होते असाही उल्लेख आढळतो. तर ‘धमारा’ची रंगीन धूमधाम ही फक्त लोकजीवनात व वैष्णवांच्या मंदिरांपुरतीच मर्यादित न राहाता पार औरंगजेबाच्या अंत:पुरापर्यंत पोहोचली होती असं म्हणायला हरकत नाही.

अकबराच्या काळच्या एका धमाराचा अर्थ भारी गंमतशीर आहे. एकीकडे नायिकेच्या सख्या त्यांच्या मैत्रिणीला म्हणतात, ‘असं रुसून बसून काही साधणार नाही, होळी खेळलीस तरच तुझी मनोकामना पूर्ण होईल’ आणि दुसरीकडे अकबराला म्हणतात, ‘हिची समजूत इतकी सहजी पटणार नाही. शाह जल्लालुद्दीन तुम्ही ‘फगुआ’ (फाल्गुनात दिली जाणारी भेटवस्तू) द्या, म्हणजे आपोआप ती तुम्हाला वश होईल.’  त्या धमाराचे शब्द आहेत-

होरी खेलेई बनैगी, रूसै अब न बनैगी।

मेरो कहो तू मानि नवैली, जब वा रंग में सनैगी॥

कैई बेरि आई-गई तू, नाही मानत ऊंची करि ठोडी भौहें तनैगी।

साहि जलालदीन फगुआ दीजै, आपुतें-आप मनैगी॥

ख्यालगायनशैलीला जनमानसांत स्थान मिळवून देणाऱ्या मोहम्मदशाह रंगीलेच्या दरबारातील सदारंग, अदारंग व महारंग ह्या त्रिमूर्तींपैकी ‘सदारंगांनी’ रागांच्या अनेक बंदिशींप्रमाणेच काही धमारांमधेही मोहम्म्दशाहचे नाव गुंफल्याचे दिसून येते. पुढं सदारंगांचे पुत्र मनरंग ह्यांच्याही ‘धमार’रचना आढळतात. तसेच नूररंग ह्यांनीही ‘धमारी’ रचल्याचे आढळून येते. मात्र ह्या सर्वांनीच धमाराचं कृष्णाच्या लीलांशी असलेलं नातं जपून त्यानुसारच रचनांचं लेखन केल्याचं दिसून येतं.

जाताजाता, आपणां सर्वांना होलिकोत्सवाच्या अनेकरंगी शुभेच्छा!

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अनुकंपा…सहृदयतेतून उमटलेला हुंकार…!!☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ अनुकंपा…सहृदयतेतून उमटलेला हुंकार…!! ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

‘परदु:ख शितल असतं’ असं म्हणतात.सर्वसाधारण अनुभवांती यात तथ्य आहे हे मान्य करावं लागतंच. तरीही या वास्तवाला छेद देणारे अपवादही आहेत आणि म्हणूनच त्या अपवादांच्या सत्कृत्यांच्या पायावरच हवेतीलच नव्हे, तर वैचारिक पातळीवरील प्रदूषणापश्चातही जग अजून अस्तित्त्वात आहे आणि जगणं आनंदी होण्यासाठीचा आशावाद सुध्दा..! हा आशावाद जागता ठेवलाय तो मानवी मनातल्या अनुकंपेने..!!

दुसऱ्याचं दु:ख, वेदना पहाताच स्वतः सुरक्षित अंतरावर न थांबता एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखी तात्काळ मदतीला धावून जाण्याची मनात निर्माण होणारी असोशी ही अनुकंपेची जन्मदात्री..! त्या असोशीतून निर्माण झालेल्या सहवेदनेतूनच पाझरत रहाते तीच अनुकंपा! अशा सहवेदनेच्या स्पर्शानेच परदु:ख परकं न रहाता ते स्वतःचंच होऊन जातं. ते शितल नसतंच. चटके देणारं, कासावीस करणारच असतं. त्या कंपनांमधून परदु:खाला कवटाळण्याची जी ऊर्मी झेपावते तीच अनुकंपा..!

या अनुकंपेला त्या त्या वेळी,त्या त्या परदु:खाच्या तीव्रतेनुरुप पहाणाऱ्याच्या सहृदयतेतूनच अनेक वेगवेगळ्या भावना निर्माण होतात, ज्या करूणा, कळवळा, आस्था, कणव, कळकळ, अशा कोणत्याही रंगरुपाच्या असल्या, तरी सहानुभूती हा या सर्व भावनांमधला समान धागा असतो. कृपा, किंव, दया, या सारख्या तत्कालिक भावनांमधेही उपकाराची भावना ध्वनित झाली, तरी मूलत: असते ती सद्भभावनाच..!

अनुकंपा जगणं आणि जगवणं दोन्हीला पूरक असते. विध्वंसक विकृतीला परस्पर छेद देणारी अनुकंपा हा जगाच्या अस्तित्वाचाच मूलभूत भक्कम पाया असते. लहानपणा पासून कौटुंबिक पातळीवरुन होणारे संस्कार आणि शैक्षणिक पातळीवरील मूल्यशिक्षणातून अशा अनेक मूल्यांचे बिजारोपण होत असे आणि ती बिजं माती ओली असल्यामुळे खोलवर रुजतही असत.पण कालानुरुप वेग वाढवत सुरु असणाऱ्या कुटुंबसंस्थाच नव्हे तर शिक्षण आणि सामाजिक पार्श्वभूमीवरील सर्वदूर पडझडीमुळे खिळखिळी होत चाललेली मूल्यव्यवस्था पुन्हा पूर्ववत करणं ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यासाठी आवश्यक आहे ती थोडी जागरुकता आणि जाणवायलाच हवी अशी निकड!

अनुकंपेसारख्या सहवेदनांच्या हुंकाराला आवर्जून प्रतिसाद द्यायची सजगता ही आता काळाची गरज आहे एवढं खरं!!

© श्री अरविंद लिमये 

सांगली

९७२३७३८२८८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ कविवर्य ग्रेस ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ क्षण सृजनचा ☆ कविवर्य ग्रेस ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

Grace IMG 1263.jpeg

जन्म नाव – स्व माणिक सीताराम गोडघाटे टोपणनाव – ग्रेस

(जन्म – १० मे, १९३७ नागपूर   मृत्यु – २६ मार्च, २०१२ पुणे)

झाली म्हणजे किती पटकन प्रसन्न होते.नाहीतर एकदा का रूसली की रूसलीच. कवितेच हे असच आहे.

26 मार्च. म्हणजे कविवर्य ग्रेस यांचा स्मृतिदिन. त्यांच्यावर आलेले लेख,व्हिडिओ पाहणे चालू होते. काही नवीन माहितीही मिळाली त्यांच्याबद्दल.  वाचणे चालू होतेच. पण त्यांच्या गूढगर्भात्मक कवितांच्या ओळी मनातून जात नव्हत्या. जे लेख वाचले त्यातही गूढता, दुःख यांचा उल्लेख होताच. आणि तरीही त्या कविता वाचू नयेत अस कोणालाच वाटत नव्हतं. अगम्यतेच आकर्षण. समजो न समजो, पुन्हा वाचाव्यात अशा कविता. नकळतपणे आपण गुंतत जातो त्यांच्यात. वाचलेल्या कविता, त्यांची झालेली गीते, सगळं कानाना ऐकू येऊ लागल आणि नकळतपणे मनात गुणगुणलो,

गूढ तुझ्या शब्दांची जादू

मनात माझ्या अशी उतरते…

आणि पुढचं कसं  सुचत गेलं, मलाही ठाऊक नाही. ती ही कविता, तुम्हांसाठी सादर.

☆ कविवर्य ग्रेस ☆

गूढ तुझ्या शब्दांची जादू

मनात माझ्या अशी उतरते

चांद्रनील किरणांच्या संगे

संध्येची जशी रजनी होते

 

कळू न येतो अर्थ जरी,पण

दुःखकाजळी पसरे क्षणभर

खोल मनाच्या डोहावरती

कशी होतसे अस्फुट थरथर

 

सोसत नाही असले काही

तरी वाचतो पुनः नव्याने

डोलत असते मन धुंदीने

हलते रान जसे वार्याने

 

ग्रेस,तुझ्या त्या काव्यप्रदेशी

माझे जेव्हा येणे झाले

जखम न होता कुठे कधीही

घायाळ कसे , मन हे झाले

 

संपत नाही जरी इथले भय

शब्दचांदणे उदंड आहे

त्या गीतांच्या स्मरणा संगे

दुःख सहज हे सरते आहे

साभार चित्र  – माणिक सीताराम गोडघाटे – विकिपीडिया (wikipedia.org)

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print