मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆  शिवथर घळ ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆  शिवथर घळ ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆ 

सह्याद्रीच्या डोंगररांगात अनेक घळी आहेत, अनेक घळींना इतिहास आहे आणि त्या प्रसिद्ध ही आहेत पण सर्वात प्रसिद्धीला आली ती श्री रामदास स्वामींची शिवथरघळ!

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात, वरंधा घाटाच्या कुशीत ही घळ विराजमान झालेली आहे. ही घळ चारी बाजूंनी हिरव्यागार झाडांनी झाकून गेली आहे. सतराव्या शतकात श्री.रामदासांनी निबीड अरण्यात, निसर्गसंपन्न स्थळी असलेल्या ह्या घळीची ध्यान धारणेसाठी निवड केली. समर्थांनी बावीस वर्षे इथं वास्तव्य केले आणि ह्या घळीतच दासबोधा सारख्या आध्यात्मिक ग्रंथाची निर्मिती झाली. श्री. कल्याणस्वामी नी हा ग्रंथ अक्षरबंद केला. ह्या ग्रंथाद्वारे रामदासस्वामींनी सर्व जाती,पंथ, धर्माच्या स्त्री पुरुषांना उपदेश केला आणि सकारात्मक दृष्टिकोन दिला.शिवराय आणि समर्थ रामदासांची पहिली भेट  ह्याच घळीत झाली.

या घळीत रहाण्या मागचा रामदासांचा ग्रंथनिर्मिती हा एकमेव हेतू नव्हता तर त्यांचा महत्त्वाचा हेतू होता की शिवरायांना स्वराज्य बांधणीत मदत करणे. डोई जड झालेले जावळीचे चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांची खबर विजापूरला कळवतात, हे ध्यानात येताच समर्थांनी मठा मंदिरा द्वारे जावळी खोऱ्याची संबंध प्रस्थापित केले. तेथील आम जनतेला स्वराज्याच्या बाजुला ओढून घेतले. पुढे शिवाजी महाराजांनी मोर्‍यांचा निपात केला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी हे दोन्ही हिरे शिवाजी महाराजांना गवसले.

अफजलखान  विजापूरहून निघाला त्यावेळी याच घळीतून रामदासांनी शिवबांना निरोप धाडला “केसरी गुहेसमीप मस्तीत चालला”.

“एकांती विवेक करुनी इष्ट योजना करावी.”

समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी म्हणजे शिवथर घळ.

समर्थानंतर तब्बल अडीचशे वर्षे कुणालाच या घळीची माहिती नव्हती. “रामदास गोसाव्याची गुहा” असं या घळीला म्हटले जायचे. समर्थ साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक धुळ्याचे शंकरराव देव यांनी काही कागदपत्रांच्या आधारे एकोणीशे तीस साली या घळीचा शोध लावला. नंतर एकोणीसशे पन्नास साली समर्थ सेवा मंडळाची स्थापना झाली. त्यांच्या पुढाकाराने या संपूर्ण जागेचे नूतनीकरण करण्यात आले, पर्यटकांना चढण्यास सोपे जावे म्हणून पायऱ्या बांधून दोन्ही बाजूला लोखंडी रॉड लावले गेले. पायथ्यापासून शंभर पायऱ्या चढून आल्यावर घळीपाशी पोचता येते. घळीत समोरच समर्थांच्या बसण्याची जागा आहे. सुमारे एक हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या घळीत दगड आणि माती यांचं बांधकाम केलेल्या तीन भिंती आहेत. हवा खेळती राहावी म्हणून खिडकी सारख्या पोकळ्या ठेवल्या आहेत. या घळीच्या  बाजूला असलेला धबधबा 100 फुटावरून खाली पडतो, उन्हाळा व हिवाळ्यात या धबधब्याचे पाणी शांत व मनोहरी दिसते. पण पावसाळ्यात हेच पाणी तांडव नृत्य करणाऱ्या शंकराचे रूप घेते.  घळीत आजही शांतता आणि गारवा जाणवतो निसर्गाचा हा गारवा यांत्रिक एअर कंडिशनिंग पेक्षा जास्त गार आहे. या घळीत रामदास स्वामी दासबोध सांगताहेत आणि कल्याण स्वामी लिहून घेत आहेत अशा दोन मूर्ती पहावयास मिळतात.

शिवथर घळ येथे सेवा समितीच्या इमारतीमध्ये राहण्याची सोय होऊ शकते.

समर्थांनी या घळीला “सुंदर मठ असे म्हटले आहे.”

ही जागा अशी आहे की एक वेगळीच मनशांती इथे लाभते. अशी मनशांती मिळण्याचे भाग्य आम्ही सहलीला  गेलो तेव्हा मला लाभली. अशी ही अद्भुत घळ आपणही पहावी म्हणून हा सारा खटाटोप.

।।जय जय रघुवीर समर्थ.।।

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ जगू नव्याने… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ क्षण सृजनाचे ☆ जगू नव्याने… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

काही दिवसांपूर्वी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या व्हाट्सअप ग्रुपवर एक व्हिडिओ आला. तो पाहून त्यावर कोणाला काय सुचते ते कवितेच्या स्वरूपात लिहा,असा मेसेज दिला होता.

जवळपास ७५ वर्षानंतर भेटणाऱ्या दोन वृद्ध मैत्रिणी. त्यांचे वय असेल ८०-८५ च्या घरात. शाळेत बालपणी एकत्र खेळल्या, बागडलेल्या मैत्रिणी. इतक्या वर्षांनी भेटल्यावर ‘काय करू अन् काय नको ‘ असे त्यांना झालेले. पण पाठीची कमान झालेली, हातात काठी, तोंडाची बोळकी. उत्साहाने भरभरून आनंद व्यक्त करायला तेवढी शारीरिक क्षमता नाही. पण सतत तोंड भरून हसत हसत पुन्हा पुन्हा हातात हात धरणाऱ्या ‘त्या ‘ मैत्रिणीं ची सगळी देहबोली आनंदाने फुलूनआली होती.

हे चित्र पाहिल्यावर झटकन मन पन्नास-पंचावन्न वर्षे मागे गेले.आठवले ते शाळेतले सुंदर, फुलपाखरी दिवस. शाळेची ती छोटीशी टुमदार इमारत. तिच्या पुढे- मागे मोठी मैदाने. त्यावर खेळणाऱ्या, धावणाऱ्या, चिवचिवणाऱ्या अनेक मैत्रिणी. वेगवेगळे खेळ,वेडी गुपिते, रुसवेफुगवे, मनधरणी आठवून हसू आले.त्यावेळच्या सगळ्या गोड, रम्य आठवणींनी  मनात फेर धरला आणि मनाच्या आतल्या खोल कप्प्यातून शब्दांची लड झरझर उलगडत गेली.व्हिडिओतल्या ‘ त्या ‘ दोन वृद्ध जीवांना जणू नवसंजीवनी मिळाली आणि ते पाहून त्या  निष्पाप निरागस मैत्रीने शब्द रूप घेतले.

☆ जगू नव्याने… ☆

बालपणीच्या दोन सख्या

कित्येक वर्षांनी भेटल्या

एकमेकींना बघताच

खळाळून हसत सुटल्या ||

 

डोईवरी रूपेरी कापूस

तोंडाची झाली बोळकी

हसत हसतच दोघींनी

एकमेकींना दिली टाळी ||

 

ओळखलंच नाही बघ

किती बाई बदललीस!

मला म्हणतेस बयो,

तू कुठं पहिली राहिलीस ?

 

कशा होतो ग आपण

नाजुकश्या कळ्या सुंदर !

एकेक पाकळ्या गळत गेल्या

आयुष्य आहे मोठं बिलंदर ||

 

किती खेळलो भांडलो

रोज नवीनच खोडी !

अजूनही आठवते बघ

चिमणीच्या दातांची गोडी ||

 

कमा, सुमा, नंदू, रंजू

पुन्हा कोणी भेटलेच नाही !

प्रत्येकीची कहाणी वेगळी

ढाचा मात्र एकच राही ||

 

फुलपाखरापरी स्वच्छंदी

माहेरघरात वावरलो !

सासरची रीतच न्यारी

प्रत्येक गोष्टीत बावरलो||

 

भलेबुरे अनुभव घेतले

दुसर्‍यांसाठीच धावलो !

अजूनही झोळी रिकामीच

आधारावरच राहिलो ||

 

जाऊ दे सये,विसर सारं

पुन्हा नव्यानेच भेटूयात !

होय ग बयो,दोघी मिळून

संध्या गीत गाऊयात ||

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १३ ) – राग~ संपन्न भैरव कूळ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगीत राग गायन (भाग १३ ) – राग~ संपन्न भैरव कूळ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

सूर संगत~संपन्न भैरव कूळ

प्राचीन काळी संगीतांतील उत्पत्ती देव देवतांपासून झाल्याचे मानले गेले. पंचमहाभुतांना देवता मानून त्यांची स्तुती आणि प्रार्थना मुख्यतः संगीताद्वारे केली जात असे. अशा संगीतात काही रागस्वरूपे देव देवतांच्या नावानेच अस्तित्वात आली.पुढे त्या त्या रागांना देव~देवतांची वर्णने लावण्यांत आली. अशा प्रकारच्या रागांमध्ये भैरव हा प्रमूख आहे. भैरव म्हणजेच शिव शंकर, शंभू महादेव!

हा भैरव थाटजन्य राग. रिषभ व धैवत कोमल. वादी~संवादी अनुक्रमे धैवत व रिषभ.सात स्वरांचा संपूर्ण जातीचा हा राग प्रातःकाळी गायला जातो. “जागो मोहन प्यारे” ह्या गाण्याच्या ओळी कानांवर पडल्या की भैरव रागाचे दर्शन घडते. यशोदा मैय्या तिच्या नंदलालाला प्रातःकाळी उठविते, “उठी उठी नंदकिशोरे”, “प्रातसमय भई भानूदय भयो, ग्वाल बाल सब भूपति थाडे” अशा वर्णनाच्या बंदीशी ह्या भैरव रागांत ऐकायला मिळतात. पहाटेच्या वेळी चित्त प्रसन्न होते.

सा (रे) ग म प (ध) नी सां

सां नी (ध)प म ग (रे) सा असे ह्याचे सरळ आरोह अवरोह असले तरी सादर करतांना वक्र स्वरूपांत आढळतो, जसे रिषभाला मध्यमाचा स्पर्ष”ग म(रे) सा, धैवताला ग म नी(ध), नी(ध)प असा निषादाचा स्पर्ष हे भैरवाचे खास वैशिष्ठ्य आहे. गायन/वादन रंजक करण्यासाठी पूर्वांगांत सा ग म प ग म(रे)सा, आणि उत्तरांगांत ग म नी(ध)सां अशी वक्र स्वररचना करतात. शांत रस हा या रागाचा आत्मा म्हणता येईल.

अकबराच्या दरबारांतील  तानसेनाने या रागाविषयी “कहे मिया तानसेन सुनो शाह अकबर। सब रागनमे प्रथम राग भैरव।” असे म्हटले आहे. संगीत मार्तंड पं. जसराजजी यांच्या संगीत शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचे शिक्षण भैरव रागानेच सुरू होते हे बर्‍याचजणांना माहीत असेलच.

अतिशय संपन्न असे हे भैरव कूळ आहे. अनेक वर्षांपूर्वी कुमार गंधर्वांनी ‘भैरव के प्रकार’ अशी एक मैफील केली होती. ह्या मैफीलीत भैरवाबरोबरच सादरीकरणांत थोडेफार फेरफार करून अहीर भैरव, शिवमत भैरव, भवमत भैरव, बीहड भैरव, बैरागी भैरव, बंगाल भैरव, प्रभात भैरव, धुलिया भैरव, आनंद भैरव नटभैरव, भैरव बहार असे भैरवाचे अनेक प्रकार सादर करून श्रोत्यांना भैरवाचे वैभव दाखवून दिले होते.

“नवयूग चूमे नैन तुम्हारे” हे सलील चौधरींनी संगीतबद्ध केलेले भैरवातील गीत रात्रीकडून पहाटेकडे नेते. “जागो मोहन प्यारे” ह्या पारंपारिक बंदीशीत काही वेगळे शब्द आणि सूर चपखल बसवून लतादिदींच्या आवाजांत ऐकतांना वेगळाच आनंद मिळतो. खेड्यांतून शहरांत आलेला एक तरूणराज कपूरपाण्यासाठी वणवण फिरतो, पहाट होते, प्राचीवर सूर्यबिंब उगवते, पण पाणी न मिळाल्यामुळे त्रासलेल्या त्याला एक सामान्य पाणी भरणारी स्त्रीनर्गीसत्याच्या ओंजळीत घागरीने पाणी घालते. भैरवाच्या सुरांनी भरलेली ती पहाट~चित्रपट संपतो पण भैरव कायम मनांत रेंगाळतो.

कालिंगडा, रामकली,जोगिया ही भैरवाचीच रूपे! “मोहे भूल गये सांवरिया” हे बैजू बावरांतील गीत, सामनामधील “तुम्हावरी केली मी मर्जी बहाल”, जाळीमंदी पिकली करवंद”ह्या लावण्या म्हणजे भैरवाचे चंचल रूप कालिंगडा.

रामकलीतून भैरवाचे मृदू स्वरूप दिसते.भीमसेन जोशी “सगरी रैन मै जागी”ह्या बंदीशीने सवाई गंधर्व उत्सवाची सांगता करीत असत.

जोगिया म्हणजे करूण रसांत भिजलेला भैरव!”पिया मिलनकी आस”ही ठुमरी ऐकतांना डोळे न पाणावणारा श्रोता विरळाच.सौभद्र नाटकांतील”माझ्या मनीचे हितगूज सारे ठाऊक कृष्णाला”हे बाल गंधर्वांनी अजरामर केलेले पद.गीत रामायणातील परित्यक्ता सीतेच्या तोंडी असलेले “मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे”हे गीत श्रोत्यांना देहभान विसरावयास लावते.

असे हे सूर संपन्न भैरव खानदान! हे जाणून घेतल्याशिवाय संगीत शिक्षण अधूरे आहे.

क्रमशः ….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

“वैजू सारखं वागायला जमत नाही ग आपल्याला. ती कशी कुणी चौकस भेटलं की तिच्या लेकीच्या उत्तम करिअरबद्दल कौतुकाने बोलत सुटते. विचारणार्याची कोरडी काळजी ओठावर यायला संधीच देत नाही.” उषाने त्यांच्या मैत्रिणीचा वैजूचा दाखला देत म्हटलं.

“हो ना! वैजू म्हणते की, ‘लोकांना सतत काहीतरी चघळायला हवं असतं. आपण कशाला त्यांचं च्युइन्गम व्हायचं? आपल्या काळजातलं कुसळ दाखवायचं?”

“बरोबरच आहे तिचं. पण….” म्हणत दोघी  गप्पच बसल्या.  आपापल्या विचारात मग्न झाल्या आणि मग निमूट घरी निघाल्या

* * *

लॅच् की ने दरवाजा उघडल्याचा आवाज आल्यावर उषाने घाईघाईने पुढ्यातली भाजी आवरायला घेतली.

“शी! काय पसारा केलायस आई माझ्या खोलीत.” पर्स ठेवता ठेवता मानसीने शेरा मारलाच.

“हे मॅच बघताहेत आमच्या रूम मध्ये. म्हणून मालिका बघायला मी इथे बसले भाजी निवडत.” उषाने खालच्या मानेने म्हटलं.

“आवर ते सगळं लवकर” मानसीच्या आवाजातून बासगिरी डोकावलीच.

काल मॉलमधून आणलेले ड्रेस घालून बघताना मानसीने खोलीभर टाकलेला पिशव्या, हँगर्स, पिनान्चा पसारा उषाने आज सकाळीच आवरला होता. मुकाट्याने भाजीचा पसारा आवरताना तिने डोळ्यातलं पाणीसुद्धा आवरलं…..

समाप्त

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 91 ☆ आठवणी – जाहल्या काही चुका ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 91 ☆

 ☆ आठवणी – जाहल्या काही चुका  ☆ 

काही चूका शेअर केल्याने हलक्या होतात असं मला वाटतं,

मी माझी ऑक्टोबर 2020 मधली चूक सांगणार आहे. ती चूक कबूल करणं म्हणजे confession Box जवळ जाऊन पापांगिकार करण्याइतकी गंभीर बाब आहे असे मला वाटते.

गेले काही वर्षे माझ्या पायाला मुंग्या येत होत्या, डाॅक्टर्स,घरगुती उपाय करून झाले, पण मागच्या वर्षी मी बाहेर चालत जाताना पाय जड झाला आणि मला चालता येईना, ऑर्थोपेडीक,फिजिओ थेरपी सर्व झाले तरी बरं वाटेना, स्पाईन स्पेशालिस्ट ला दाखवलं,एम आर आय काढला, मणक्याची नस दबली गेली ऑपरेशन करावं लागेल असं डाॅक्टर नी सांगितलं, मार्च/एप्रिल मध्ये ऑपरेशन करायचं ठरलं, पण बाबीस मार्च ला लाॅकडाऊन झालं, कामवाली बंद, माझी सून लाॅकडाऊन च्या काळात आमच्या मदतीसाठी आली घरची आघाडी तिनं उत्तम सांभाळली! तीन महिन्यानंतर ती परत तिच्या फ्लॅटवर गेली……

माझ्या पायाच्या तक्रारी होत्याच ऊठत बसत स्वयंपाक करत होते, नव-याने घरकामात खुप मदत केली, माझी सून आणि नवरा यांना खुपच कष्ट पडले.

एक मैत्रीण म्हणाली मणक्याचं ऑपरेशन टळू शकतं मी स्पाईन क्लिनीक ची ट्रिटमेन्ट घेतेय मला बरं वाटतंय, तिथे जायचं धाडस केलं कारण कोरोना च्या काळात मी मला मधुमेह असल्यामुळे कुठेच बाहेर जात नव्हते कुणाकडे जात नव्हतो,कुणाला घरी येऊ देत नव्हतो!पण दोन  महिने माझा नवरा मला स्पाईन क्लिनीक मध्ये फिजिओ साठी घेऊन जात होता.घरी आल्यावर आम्ही अंघोळ करून वाफ घेत होतो, पण माझं दुखणं कमी होईना, शेवटी ऑपरेशन ला पर्याय नाही हे समजलं सेकंड ओपिनिअन घ्यायचं म्हणून डाॅ भणगेंची रूबी हाॅलची वेळ घेतली तिथे दोन अडीच तास वाट पाहिली डॉक्टरांची! मला तिथे निवर्तलेले आप्तेष्ट आठवले खुप अस्वस्थ झालं, नव-याला म्हटलं आपण उगाच इथे आलो…माझी मानसिकता समजणं शक्य नव्हतं त्याला..मग  भांडण झाल्यामुळे डॉक्टरांना न भेटता घरी ! काही काळ अबोला, मी पुन्हा पहिल्या डॉक्टरांना फोन केला त्यांनी चार वाजता बोलवलं व पाच दिवसांनी दीनानाथ मध्ये ऑपरेशन करायचं ठरलं, सर्व टेस्ट झाल्या, दीनानाथ ची भीती वाटत होती, माझी पुतणी म्हणाली काकी वॅक्सिन घेतल्यानंतर ऑपरेशन कर,दीनानाथ मध्ये जाऊ नको,कामवाली पण म्हणाली, “आई रूबी लाच ऑपरेशन करा!” मला ऑपरेशन ची भीती वाटत होती पण त्या काळात कोरोना ची भीती  वाटली नाही, माझं ऑपरेशन म्हणून सून आणि नातू आमच्याकडे सोमवार पेठेत रहायला आले, कोरोना ची तीव्रता कमी झाल्यामुळे कामवालीला  परत बोलवलं होतं, ऑपरेशन करणा-या डॉक्टरांनी “दीनानाथ मध्ये आता अजिबात भीती नाही, नाहीतर मी तुम्हाला सांगितलं नसतं तिथे ऑपरेशन करायला ” अशी ग्वाही दिली! गुरुवारी ऑपरेशन झाले,हॉस्पिटल मध्ये माझ्याजवळ “हे” राहिले. आम्ही सोमवारी घरी आलो, आमची सून कार घेऊन  आम्हाला न्यायला आली हॉस्पिटल मध्ये,  घरी आल्यावर नातू म्हणाला “आजी मला तुला hug करावंसं वाटतंय पण तुझं ऑपरेशन झालंय!”……..

माझे दीर आणि जाऊबाई मला भेटायला आले त्याचदिवशी!

……..आणि चार नोव्हेंबर नंतर आमचं सर्व कुटुंब “पाॅझिटीव” एक दोन दिवसांच्या अंतराने गोळविलकर लॅबचे रिपोर्ट….. मी, हे, दीर, जाऊ केईएम ला एडमिट, सूननातू घरीच होते होम क्वारंटाईन पण सुनेला ताप येऊ लागला, म्हणून ती आणि नातू मंत्री हॉस्पिटल मधे एडमिट झाली, ऐन दिवाळीत आम्ही कोरोनाशी लढा देत होतो…….

या सर्वाचा मला प्रचंड मानसिक त्रास झाला. असं वाटलं  हे सगळं होण्यापेक्षा मी मरून गेले असते तर बरं झालं असतं, ऑपरेशनला तयार झाले ही माझी चूक, रूबी हाॅल मधून परत आले ही पण चूकच ! संपूर्ण कुटुंबाला माझ्या ऑपरेशन च्या निर्णयाने बाधा झाली, मला सतत रडू येत होतं, सारखी देवाची प्रार्थना करत होते…..आपण कुणीतरी शापीत, कलंकित आहोत असं वाटत होतं! आयुष्यभराची सर्व दुःख या घटनेपुढे फिकी वाटायला लागली, सर्वजण बरे होऊन सुखरूप घरी आलो ही देवाची कृपा! मुलगा म्हणाला “आई तू स्वतःला दोष देऊ नकोस, ही Destiny आहे,”

पण हे शल्य सतत काळजात रहाणारच!

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रिय कवितेस.. ☆ श्री मुबारक उमराणी

श्री मुबारक उमराणी

☆ विविधा ☆ प्रिय कवितेस.. ☆ श्री मुबारक उमराणी ☆

प्रिय कवितेस,

सप्रेम नमस्कार

अलीकडे आधुनिकीकरणामुळे पत्र म्हणजे दुर्मिळ. म्हणून मी ठरवलं मेसेज वगैरे कारण्यापेक्षा सरळ पत्र पाठवावे!  आणि हे पत्र पहिलचं आहे. मला जसं जमलं समजलं तसं लिहिलं, चुकलं तर माफी असावी. शारदेच्या पदकमली रममाण होणा-या विणेच्या झंकारातून शब्द बद्ध होणा-या, कधी आसवातून बरसणा-या, कधी हास्यातून फुलणा-या, कधी मुक्त विहार करणा-या, कधी कारण नसतांना निराशेच्या गर्द खाईत नेणा-या  शब्दात तूच लपलिस. तू कशी आहेस माहित नाहीस, हवेततरंगणाऱ्या, सळसळणा-या झाडांच्या पानात तूचआहेस, वेळूच्या बेटात मस्तपैकी शिळ घालत कान्हांच्या बासरीतून मंत्रमुग्ध विहार करणा-या वनराईच्या गाईच्या गळ्यातील घुंगुर माळांच्या नादमयी सुरात, मेंढपाळ्यांच्या काळ्या गर्द घोंगडीत त्याच्या दिडक्या चालीत आणि त्या रानभर चरणा- या मेंढरांच्या आवाजातील नाद मोहून टाकतो. सुंबरान मांडताना ढोलाच्या, टाळांच्या, कैताळाच्या नादमयी पायातील हालचाल, अंग अंग हेलकावे खाणारे त्यांचे देह पटक्याचा  सोगा वा-यावर भूरभूरताना अबीर गुलालात माळून गेलेल्या चेह-यावरील हास-या भावात तूच आहेस.

सकाळच्या काकडं आरतीत गाव सारं जागं करतांना अंग अंग प्रत्येकाच्या मनात देवत्वाचा भास तूच निर्माण करून, दिवसभरात काम करणा-याची उमेद, जि्द्द त्यातून निर्माण होणारी स्नेहरूपी वात्सल्यातही तूच आहेस. घमानं चिंब निजलेला हमाल पाठीवर असह्य वजन असतांना चालताना त्यांच्या तोंडी “जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणांचा वाजतो” म्हणता असह्य वजन कुठल्या कुठे पळून जाते अन् तो हवेत तरंगल्यासारखा चालायला, पळायला,हसायला लागतो. हे सर्व कविते, तुझ्यामूळेचं नाही का?

पण कधी कधी सुन्न करणा-या घटना घडतात तेंव्हा “रक्ताळले शरीर भडका जीवात झाला आईस सोडवाया येणार कोण बोला”.अशी आर्त हाक मारणारी तूच असतेस. तूच असतेसं होनाजी बाळा, आण्णाभाऊ साठे, बहिणाई, पी.सावळाराम, पठ्ठे बापूराव, ज्ञानेश्वर, मुक्ताई, जनाई, संत नामदेव, तुकारामाची गाथा, एकनाथांचे भारूड शाहिरांची ललकारी,  केशवसुतांची तुतारी, कवीच्या कवितेत, लेखकांच्या लेखनित तुच,फक्त आम्ही नाममात्र असतो.

आभाळभर गरजणा-या काळ्या ढगातील वीज तूच असतेस ढगांना बोलके करणारा “मेघदूत” आम्ही कसे विसरेन? काळ्याकुट्ट अंधारात. रात किड्यांच्या रातभर गुजंन करण्यात तूच सूरमयी होतीस. चंद्राचा प्रकाश शितलतेचा स्पर्श करतांना होणारी शितलतेची जाणीवात तूच नाही का असतेस. सकाळी  क्षितीज फुटते तांबडे तेंव्हा आभाळभर पसरून प्रकाश गीत गायेस, किती रूपे!  हळूवार रंग बेरंगी फुलणा-या पाखरांच्या चिवचिवाटात तूच जन्म घेऊन जगण्याची खुद्द देतेस. तुझे कितीही कसेही वर्णन केले तरी अपूर्णच! !

हिरव्यागार माळरानात रानफुलांच्या रंगात रंगून दवबिंदूच्या मोत्यांची रास रचून सर्वाचं परिसर मोतीमय करतेस. पतंग उडविणा-या निरागस मुलांत, वा-यावर उडणा-या पतंगाच्या मांज्यात आगळाच स्वर तूच निर्माण करतेस. माळभर आनंदाची उधळण होते. त्यातून गीत निर्माण होतात हे माणसाला, निसर्गाला जगण्याची जिद्द, प्रेरणा, उमेद अन् माणसाला गीत गात गात जगण्याचे शास्त्र शिकवतेस, सागराच्या तळापासून ते आकाशाच्या अनंता पर्यत फक्त तूझेचं गीत घुमत असते.

ज्यांनी ज्यांनी तुझी सेवा केली त्यांना तू अजरामर करून सोडलेस किती हे कार्य माणसांच्या पदी भरभरून देतेस, जो गातो तो तरतो, गानकोकिळा लता पासून आजच्या सोनू निगम पर्यताच्या मुखातून लयबद्ध. होऊन त्यांना प्रसिद्धिच्या अती उच्च पदी नेऊन त्यांचा उध्दार करतेस.

गौतमबुध्द, भगवान महावीर, मं. पैंगबर, गुरू नामक, प्रभू येशू, यांच्या मधूर वाणीतून धर्माची शिकवण देणारी तूचं होतीस.

देश भक्ताच्या, सैनिकांच्या, शेतक-याच्या कामगार, साधू संताच्या, कबिराच्या भक्तीत, मीरेच्या तल्लीनतेत, सुरदासच्या भक्तिभावात सा-या, सा-यात तुझाचं जयजयकार होतो.

किती वर्णावे तुज पहाडाच्या गिरीशिखरावर स्थैर्याची,सागर गार्भियांची, नदी, झरे चैतन्य पुष्प जीवनाला सुगंधित बनविण्याची प्रेरणा तूच दिलीस. पक्षी प्राणी यांच्या कंठातून येणा-या आवाजातून सप्तस्वरांची निर्मिती करायला लावलीस. मोरापासून षड्ज, बैलापासून ऋषभ, बोकडापासून गंधार, करकोच्या पासून मध्यम, कोकिळ पंचम, घोडा धैवत, हत्ती निषाद, या सारख्या स्वरांची निर्मिती तुच करून आपलं आगळवेगळ अस्तित्व दाखवलीस या स्वरांना भारतीयांचं दैवत म्हणून आळवतो.

सा- सांब सरस्वती, रे- रघुपति राघव, ग- गणपती, म- महादेव महेश्वर,प- परमेश्वर पशुपतीनाथ, ध- धनेश्वर, नि- निराकार नीळकंठेश्वर आणि संगीत ही मन प्रसंन्न करणारी अद्भूत जादू तुझ्यामुळेचं ऐकतोय आणि या निसर्गातील रंगसंगतीत अधिकचं खुलून दिसतेस. षड्ज होतो कमळासारखा, ऋषभ हिरवा मिश्रित पिवळा, गंधार सोन्यासारखा पिवळा, मध्यम कंद फुला सारखा, पंचम काळी, धैवत पिवळा तर निशाद ठिपक्यांची टिपक्याचा सगळा निसर्गचक्रांत तुझ्यासोबत मग काय कमी आहे बावीस रागांची रचना तर बघा प्राण्यांच्या पायाशी तुलना, धरती मातेला त्या पायांचा स्पर्श, चालताना होणारा एक नांदमय आवाज व्हावा  ऐकावा आणि सारे आयुष्य मंगलमय व्हावे म्हणूनचं असेल मोर दोन पाय, बैल चार, बोकड चार, करकोचा दोन, कोकिळ दोन घोडा चार, हत्ती चार असे बावीस रागांची निर्मिती म्हणूनच कविता तू कोणत्याही भाषेत ये तुला नाद, लय, ताल, स्वर, झंकार आहेचं सारी वाद्ये तुझा नाद मधुर करण्यासाठी स्वतःला शिक्षा करून घेत आहेत. त्या वेळीस संगीताच्या बरोबरीत आम्ही सारे वेडे होतो. थयथय नाचतो. कशाचे भान उरत नाही तू आहेस म्हणूनचं जगण्याला अर्थ आलाय!

आकाशाचा कागद समुद्राची शाई, झाडांची लेखणी  केली तरी तुझे गोडवे लेखन करता येणार नाही ते अपूर्णच राहील आणि अपूर्णतेतचं खरं जगणं आहे नाही का? कळत न कळत काही लिहायचे राहून गेलंतर राग मानू नकोस, समजून घे, मला तुझी सेवा करण्याची प्रेरणा दे!

हिचं इच्छा! तुझ्याकडे  काही मागणार नाही कारण न मागता तू नेहमीचं मला भरभरून देतेस, हा ओघ असाचं राहो हीच मनोमन कामना!

पुन्हा एकदा त्रिवार वंदन करतो. तुझा जयजयकार सा-या आसमंतात घुमो!

मी सदैव तुझाचं ऋणी राहीन हे ऋण मी कसे फेडू!

तुझाचं सेवक

© श्री मुबारक उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘ताळतंत्र’..सुखी जीवनाचा मूलमंत्र! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ ‘ताळतंत्र’..सुखी जीवनाचा मूलमंत्र! ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

‘ताल’ आणि ‘ताळ’ हे सख्खी भावंडं शोभावेत असे दोन शब्द. यांच्यात अक्षरसाध्यर्म तर आहेच आणि अर्थसाध्यर्मही. ‘ताल’म्हणजे लय. उदाहरणार्थ द्रूत, मध्य, विलंबित, किंवा एकताल, झुमरा, दादरा यासारख्या संगीताशी संबंधित अर्थाचा हा ताल आहेच.

शिवाय ताल या शब्दाचे ‘तट’ ‘बांध’ असेही अर्थ आहेत. ताल हा असा नियमबद्धता,नियमितपणा यांच्याशी संबंधित शब्द. म्हणूनच त्याची तालबद्ध तालशुद्ध अशी इतर बारकावे ध्वनित करणारी रूपे सुद्धा आहेतच.

‘ताळ’ या शब्दाच्या विविध अर्थांमध्ये ‘ताल’या शब्दार्थातला नियमितपणा ध्वनित होतोच.ताल आणि ताळ यांना मी सख्खी भावंडे म्हणतो ते यासाठीच.

‘ताळ’हा मेळ,मिलाप, सुसंगती, एकवाक्यता,नियंत्रण, मर्यादा अशा विविध रंगछटांचे अर्थ ध्वनित करणारा शब्द! ताळमेळ, ताळातोळा, ताळतंत्र हे सगळे ‘ताळ’ या शब्दाचेच सगेसोयरे.

पूर्वी गणिताचा पाया पक्का करणारे पाढे, पावकी, दिडकी, नेमकी,अडीचकी अशा आकड्यांच्या अनेकपटींची घोकंपट्टी हा शाळापूर्व अभ्यासाचा घरगुती रिवाजच असायचा. त्या काळात मूल सात वर्षाचं होऊन पहिलीसाठी प्रवेशयोग्य होईपर्यंत हा पाया घरीच अतिशय भक्कम करून घेतला जात असे. विविध शोध लावून सोईस्कर, सहजसोपे मार्ग शोधता शोधता हे सगळे हिशोब चुटकीसरशी करु शकणारा ‘कॅलक्युलेटर’ हाताशी आला आणि सगळे चित्रच पालटले. पालटलेच नाही फक्त तर ते चित्र काहीसे ‘विचित्र’ च होऊन बसले. हे सगळं ‘ताळ’या शब्दाचं विवेचन सुरु असताना आठवायचं कारण म्हणजे आमच्या बालवयात  सोडवलेली गणिताची उत्तरे अचूक आहेत का याची शहानिशा करून घेण्यासाठी गणित सोडवून झाले की त्याचा ताळा म्हणजे उलटा हिशोब करून पाहायला आम्हाला शिकवलं जायचं. ताळ म्हणजे जुळणी. त्याप्रमाणे गणितातला हा ताळा म्हणजे, आलेल्या उत्तराशी जुळणी करुन पहाणेच असे. हल्ली हे सगळं कालबाह्य झालंय हे खरं. त्यामुळे हा गणितातला ताळा आता अस्तित्वातच नाहीये.

हिशोबासाठी आलेल्या कॅल्क्युलेटरचा वापर सोपा वाटतो खरा पण हे वाटणं एक भासच ठरतं कधीकधी. कारण यामुळे ‘तोंडी हिशोब’ ही संकल्पना कालबाह्य झालेली आहेच शिवाय कॅल्क्युलेटर वापरताना आकडे किंवा चिन्हे प्रेस करण्यासाठी बोटे वापरावी लागतातच. आणि त्याचा कितीही सराव झाला, तरीसुद्धा बटणं प्रेस करण्यात कणभर जरी चूक झाली, तरी लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागत नाही. आणि ताळा करुन पहाण्याची सोय नसल्याने ती चूक चटकन् लक्षातही येत नाही. यंत्राचा असा सोयीसाठी उपयोग करता करता आपण त्याच्या किती अधीन होत होत परस्वाधीनही झालो आहोत याचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण! जगण्यातलं ताळतंत्र हरवून बसायला निमित्त ठरणारी कॅल्क्युलेटरच्याच मोबाईल, टीव्ही यासारख्या इतर भाऊबंदांची अशी अनेक उदाहरणेही देता येतील.

काळानुसार बदल अपरिहार्य असले तरी ते किती आणि कसे स्वीकारायचे याचं ‘ताळतंत्र’ न राहिल्याने आपण सर्वार्थाने ‘परतंत्र’होत जातोय याचे भान आपण हरवून बसलो आहोत. विकासात लपून बसलेला विनाशही आपण आपल्याच नकळत  कवटाळतो आहोत.

‘ताळतंत्र ‘म्हणजे जीवन शैलीतल्या असंख्य घटकांच्या अचूकतेचे मंत्र’अशीही मांडणी करता येईल. जीवनपद्धतीतल्या पहाटे उठणे, मुखमार्जन, व्यायाम, खेळ, लेखन-वाचन, आपला पेहराव, आहारपद्धती,  संवाद,आदरातिथ्य, स्वयंपाक, पूजाअर्चा, विश्रांती, झोप अशा असंख्य घटकांबाबतचे कृतीनियम म्हणजेच हे मंत्र! त्यांच्या विविध पद्धती काळाच्या कसोटीवर खऱ्या उतरलेल्या असल्यामुळे त्या जाणीवपूर्वक नियमित, काटेकोर पद्धतीने पाळण्याचा प्रयत्न सर्वांनीच करायला हवा खरंतर. पण हेच ताळतंत्र न राहिल्याने निर्माण होणारे आरोग्य, स्वास्थ्य, मन:शांती समाधान, शरीर आणि मनाच्या क्षमता अशा अनेक बाबतीतले जटिल प्रश्न आता नित्याचेच होत आहेत. याची पुसटशी जरी जाणिव झाली आणि आपल्या जीवनशैलीतील शिस्त, आत्मसंयमन, नियंत्रण, मर्यादा, सुसंगती, एकवाक्यता अशा अनेक ‘ताळ’ अर्थांचे अचूक भान आपल्याला आले तरच नकळतही ताळतंत्र कधीच सूटू न देण्याची अत्यावश्यक सजगता आपण दाखवू शकू अन्यथा…?

© श्री अरविंद लिमये 

सांगली

९७२३७३८२८८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गप्पांची एक मैफिल संपली ☆ श्री चंद्रकांत बर्वे

श्री चंद्रकांत बर्वे

 ☆ मनमंजुषेतून ☆ गप्पांची एक मैफिल संपली ☆ श्री चंद्रकांत बर्वे ☆ 

प्रसिद्ध पत्रकार, मुलाखतकार, लेखक, नाटककार आणि माझे मित्र अशोक शेवडे यांनी आता या जगातून एक्झिट घेतली आहे. पण त्याच्याबद्दल लिहिताना मी तसा इमोशनल नाही होणार, कारण त्याच्या आठवणी जर जागवल्या तर त्या सगळ्या आनंदी आहेत. त्याला कुणीही कधीही दुर्मुखलेल पाहिलं नसेल.

ही बातमी समजल्यावर मी जेव्हा त्याच्या मुलीला राखीला फोन केला तेव्हा ती म्हणाली आज पहाटे ते गेले पण काल रात्रीपर्यंत आम्ही बोलायचो तेव्हा ते कायम आनंदी असायचे.

मी १९८५ मध्ये आकाशवाणी मुंबईला आलो तेव्हा त्याचा आणि माझा प्रथम परिचय झाला. तो आकाशवाणी आणि दूरदर्शन मध्ये अनेक छोटेमोठे कार्यक्रम करायचा. कोणत्याही कामानिमित्त आला तर तो बाकी सर्व स्टाफशी देखील भेटणार गप्पागोष्टी करणार असा त्याचा स्वभाव आणि मी तर गप्पिष्टच त्यामुळे आमची मैत्री होणं अगदी स्वाभाविक होतं. आमचा चहा पिऊन झाल्यावर मी सिगारेट पीत असे, पण त्याने मात्र कधी सिगरेटला स्पर्श केला नाही. तो स्टेट बँकेत कॅशीअर होता आणि तरीही त्याचे वेगवेगळ्या पेपरमध्ये फिल्मी आणि ललित लिखाण वगैरे चालू होतंच. एकदा आल्या आल्या त्याने मला गंभीरपणे विचारले १०० रुपये आहेत का? मला वाटलं काही तरी त्याला अडचण असेल. मी लगेच त्याला एक नोट काढून दिली. त्याने लगेच मला हसत हसत एक रुपयाच्या १०० नोटांचे बंडल दिले. त्या काळात एकेक रुपया कायम छोट्या मोठ्या खरेदीला उपयोगी पडायच्या. त्यामुळे तो कधी ऑफिसात आला की बरेचजण त्याला एकच्या नोटांचे बंडल मागत. त्याला या सगळ्या गोष्टी जमतात कशा? तर त्यावर त्याचं उत्तर म्हणजे त्याचे पब्लिक रिलेशन्स. आमच्या आंबटगोड कार्यक्रमाचे रेकॉर्डिंगच्या दिवशी त्याचे स्क्रिप्ट वेळेवर त्याचा एक माणूस आणून द्यायचा. फोर्टात बँकेचे काम आणून देणारा माणूस जाता जाता आकाशवाणीत स्क्रिप्ट देऊन जायचा. त्याचा मित्र परिवार मोठा होता आणि वेगवेगळ्या शासकीय आणि निम शासकीय ऑफिसातून देखील होता. पत्रकार असल्यामुळे सगळे नाटकवाले आणि मराठी फिल्मी लोक त्याचे मित्र झाले होतेच. शिवाय मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे यांच्या सारखे बडे राजकीय नेते देखील.

नोकरी करून तो मला म्हणाला मी नोकरी सोडणार आहे पण पुढे फिल्मी डायलॉग मारला. ‘सही समय और सही मौका’ आनेपर. आणि पुढे त्याने त्याप्रमाणे नोकरी सोडली.

माझीही आकाशवाणीतून दूरदर्शन अहमदाबादला बदली झाली. पण आकाशवाणीच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांनी माझ्या नावे मी एक आकाशवाणीच्या निर्मात्यांसाठी जनरल वर्कशॉप घ्यावे असे पूर्वीच ठरवले होते आणि त्याप्रमाणे माझ्यावर एक आठवड्याचे वर्कशॉप ची जबाबदारी आली. मीच वेगवेगळ्या विषयातील जाणकारांना घेऊन ते अहमदाबाद आकाशवाणीत कंडक्ट करायचे होते. मी त्यातला ‘मुलाखतीचे तंत्र’ हा विषय अशोकला दिला. हां पण इतर राज्यातील निर्माते सहभागी होत असल्याने हिंदी किंवा इंग्रजीतून सोदाहरण लेक्चर अपेक्षित होतं. अशोकने हिंदीतून आपले आपले सादरीकरण सुरु केले. पहिल्या पाच मिनिटात भरपूर हशा मिळाला, आणि मग त्याने मुलाखतीच्या किंवा भाषणाच्या सुरुवातीला श्रोते हसतील किंवा उत्सुकतेने ऐकू लागतील हा पहिला मंत्र सांगितला. एकूण त्याच्या शिकवण्यावर सर्व निर्माते एकदम खुश झाले. मलाही हा अन्य भाषिक मंडळींना देखील इम्प्रेस करू शकतो हे समजलं.

पुढे काही वर्षांनी माझी मुंबई दूरदर्शनला बदली झाली. मी जरी ‘असिस्टंट स्टेशन डायरेक्टर’ म्हणून आलेलो असलो तरी मी केंद्रात नवीन होतो आणि अशोक तर बरेचदा येजा करायचा. त्यामुळे सुरुवातीला त्यानेच माझी बऱ्याच जणांशी ओळख करून दिली. केंद्रातील काहीजण तर मला अशोक शेवडेचा मित्र म्हणून ओळखत होते. पुढे मी एक फिल्मी कार्यक्रम करायला घेतला ‘चंदेरी सोनेरी’ अशोक म्हणजे मराठी फिल्म्सच्या माहितीचा एक्का असल्याने मुलाखतीची जबाबदारी त्याच्यावर. त्याने ती आनंदाने स्वीकारली. त्यासाठी आमच्या स्टुडिओ ची तारीख या फिल्मी लोकांची तारीख मिळवणे, त्यांना भेटून मुलाखतीची प्रश्नोत्तरे तयार करणे, अनुषंगिक कोणते फिल्मी कट्स लागतील त्याची उपलब्धता वगैरे बरीच कामे असतात पण त्यात त्याचे संपूर्ण सहकार्य मिळे, नव्हे ते तो आनंदाने करे. तो कोणालाही भेटीची वेळ घेतल्यावर जाताना स्वतः बुके घेऊन जायचा, तो वेळेत गेला नाही असे कधीही घडले नाही. त्याचे घर डोंबिवलीत आणि पावसाळ्याच्या दिवसात कधी गाड्यांचा खोळंबा होण्याची शक्यता असते, पण त्यामुळे कार्यक्रमात अडचण येऊ नये म्हणून शूटींगच्या आदल्या रात्री तो माहिमला आपल्या मुलीकडे राह्यला जायचा. टीव्हीवर कार्यक्रम ही त्याची नेहमी टॉप प्रायोरिटी असे. तो फिल्मी पत्रकार, आमचा कार्यक्रम फिल्मी त्यामुळे पार्टीची निमंत्रणे येत असत. त्यात मद्यपान असतेच असते. तो शेकडो पार्ट्याना गेला असेल पण त्याने कधीही एक पेगही घेतला नाही. तो मला म्हणायचा की मी साधारणतः मराठी सिनेमा बद्दल जे वाईट जाणवेल ते निर्मात्याला सांगतो पण तसे शक्यतो लिहित नाही कारण मराठी सिनेमांना प्रोत्साहित करावे असे मला वाटते. आमच्या चंदेरी सोनेरी कार्यक्रमाचे शंभर एक कार्यक्रम झाले.

त्याने पुढे स्वतः प्राची देवस्थळी बरोबर ‘चंदेरी सोनेरी’ हा स्टेजशो सुरु केला. त्याचेही शेकडो कार्यक्रम झाले. एका कार्यक्रमात मी पाहुणा म्हणून गेलो होतो त्यावेळेस माझा परिचय करून देताना अशोक म्हणाला की मी त्याला १०० कार्यक्रम करण्याची संधी दिली. मी त्याला लगेच उत्तर दिले.

मी तुला फक्त एक कार्यक्रम दिला होता, पुढले कार्यक्रम तुला तुझ्या चांगल्या कामामुळे मेरिटमुळे मिळाले.

©  श्री चंद्रकांत बर्वे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चादर… अंथरतांना आणि पांघरतांना ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

परिचय 

नाव – सुश्री गायत्री हेर्लेकर
शिक्षण – M.Com., M.Phil.
मुळची कोल्हापूरची, सध्या वास्तव्य पुणे
कॉमर्स कॉलेज कोल्हापुर – 30-32 वर्षे प्राध्यापिका.
वाचन लेखनाची आवड

☆ विविधा ☆ चादर… अंथरतांना आणि पांघरतांना ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

दार किलकिले करुन, …हळुच आत डोकावुन सुनेने सांगितले, “आई, बेडशीटस मळलेल्या दिसतात. बदलता का आज? मशीनला लावुन टाकेन.”

खरंच की. केंव्हा बदलल्या तेही आठवत नव्हते, खरं तर पुर्वी असे होत नसे. नियमीत बदलणे व्हायचे.

अधेमधेही, काहीतरी कारण काढुन घरातील यच्चयावत कॉटवरच्या चादरी बदलायची सवय,  आवड.. हौस किंवा सोसच होता, खुप वेळा त्यासाठी बोलुन पण घेत होते. पण हल्ली कंटाळा, आळस किंवा कोण येतंय माझ्या खोलीत बघायला … काहीतरी निमित्त काढुन चालढकल होते.

आता मात्र मोबाईल बाजुला ठेवुन, ताडकन… वयाला झेपेल इतपत… उठले. चादरी…. हो माझ्या भाषेत चादरीच.. काढाव्यात म्हणुन कपाट उघडले. बेडस्प्रेड, बेडकव्हर, बेडशीट, नाहीतर अगदी पलंगपोस काहीही म्हणा, मला मात्र “चादर”च जवळची वाटते.

चादरींचा हा ढीगच होता कपाटात.

रंग गेलेल्या थोड्याशा विटलेल्या पण जुन्या आठवणी आवडत्या म्हणुन ठेवलेल्या, काही २, ४वेळा धुऊनही खळ न गेलेल्या, टरटरीत वापरायला टाळाटाळ होणार्या, तर काही” “निमित्त्याने काढु”, “फारशी आवडली नाही, द्यायला होईल कुणालातरी ऐनवेळी” म्हणुन कोर्याकरकरीत लेबल ही न काढलेल्या, तर काही नेहमीच्या वापरातल्या. विविध प्रकारच्या रंगबेरंगी पानाफुलांच्या, जॉमेट्रिक डिझाईनच्या, बाटीक प्रिंट, वारली प्रिंट, पॅचवर्क,  दोरीवर्क, विणलेल्या, हौसेने पेंट केलेल्या, आणि हो काही अगदी प्लेन सौम्य रंगांच्या. राजस्थान, गुजराथ, सौराष्ट्र, बंगाल, आसाम, काश्मीर, दक्षिण भारत, मध्य प्रदेश,अशा आसेतु हिमाचलातील अनेक प्रांतातील वैशिष्टे असलेल्या, काही तर परदेशी जन्मस्थान, आणि काही अगदी ओसरी पडवीतल्या ईचलकरंजी, सोलापुरच्या सर्वजणी सुखाने नांदत होत्या माझ्या या संग्रहात.

ही कोलकत्ता ट्रीपमधली,तर ती मैत्रिणीने बडोद्याहुन पाठवलेली.

नवर्याने कधीनाही ते एका लग्नाच्या वाढदिवसाला आणलेली, आणि आईला चादरींची आवड म्हणुन लेकीने वेळोवेळी आणलेल्या. लग्न_मुंजीत मिळालेल्या, नॅपकिन टॉवेल आणायला गेल्यावर खुपच आवडल्या म्हणुन घेतलेल्या, अन् हो नातींनी online मागवून दिलेल्या. प्रत्येक चादरीची वेगवेगळी आठवण. डबल, सिंगल, दिवाणावरच्या, अंथरायच्या, पांघरायच्या… किती प्रकारच्या आहेत.

कुठली जोडी सॉरी सेट काढावा हे ठरवतांना विचाराच्या धाग्यांत गुंतत च गेले.

काय म्हणाली सून, “”बेडशीटस मळल्यात, “आपल्या भाषेत “चादर मळली आहे,” डोक्यात काहीतरी चमकले, मनात आले, आपल्या आयुष्याची चादरही मळायला लागली, नव्हे मळली च आहे. नकळत तोंडातुन शब्द बाहेर पडले,

“चदरिया झिनी रे झिनी

राम नाम रस भिनी रे..”

एक छान भजन. मला आवडणारे. संत कबीरदासांचे. संतमंडळींची जीवनाकडे बघायची दृष्टीच किती वेगळी असते ना? अशी भजने, कोणत्याही गायकाच्या आवाजात, कोणत्याही शैलीत, डोळे मिटून, शांतपणे ऐका. शब्द कानावर पडतात पण मन गुंतते ते शब्दाशब्दातुन प्रतित होणार्या भावार्थातच. शरीराला दिलेली चादरीची उपमा मनात कुठेतरी खोलवर जाऊन रुजते. कमलपुष्पाच्या चरख्यावर ९, १०महिने विणायला लागलेली ही चादर, आपल्याला मर्यादित काळापुरतीच, कबीराच्या भाषेत “दो दिन”च मिळालेली असते.

आपल्या कर्माने “मैली” होते. मग संतांना वाटते, अन् ते भगवंतांना विचारतात अशा अर्थाचे एक भजन,

“मैली चादर ओढ के कैसे

द्वार तिहारे आऊं?”

कारण त्यांनाच माहित असते की भगवंताच्या भक्तीने, नामस्मरणाने ती निर्मल करता येते. अनेक भक्तशिरोमणींनी असे केल्याचे दाखले आहेत.

चादर म्हणजे कापड, वस्त्र. गीतेत, भगवंतांनी मनुष्यदेहाला दिलेले वस्त्राचा रुपक सर्वपरिचित आहे. संदर्भ, दुसरा अध्याय, २२वा श्लोक, “वासांसि जीर्णानि”.

आपण सामान्य माणसेही, चादर आणि वस्त्राचा संबंध शरीराशीच जोडतो. ऊपयोग जाणतो तो संरक्षणाचा. शरीराला इजा पोहचू नये, दुखापत होऊ नये याच हेतूने वापर करतो. अंथरुणात आणि पांघरुण म्हणुन. ती मळु नये म्हणुन काळजी घेतो.तरीही मळतेच. मग पाणी, साबण वापरुन स्वच्छ करतो, या शरीररुपी चादरीबाबत तसे करता येणार नाही का?

भगवंतनामावर विश्वास आणि सत्विचार, सत्संगती, सत्कर्म ही त्रिसुत्री लक्षात ठेवली पाहिजे, चादर अंथरतांना आणि पांघरतांना.

 

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कोरोनाबरोबरचं वर्ष – २०२० -२०२१ ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ कोरोनाबरोबरचं वर्ष – २०२० -२०२१ ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

बरोबर एक वर्ष पूर्ण होतंय १२ मार्च २०२१ ला! मागील वर्षी 12 मार्चला आम्ही दुबई पुणे ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ने पुण्याला येण्यासाठी निघालो. त्याआधी तीन-चार दिवसच आम्हाला ‘कोरोना’ म्हणजे काय ते कळू लागले होते. नातवंडांना शाळेला सुट्ट्या दिल्या गेल्या. आमचं बाहेर फिरणं बंद झालं होतं. तिथल्या न्यूज पेपर ला येणाऱ्या बातम्यांवरून ब्राझील,इटली, इंग्लंड आणि युरोप मधील कोरोनासंबंधी ची माहिती थोडीफार कळली होती, पण  त्याची तीव्रता अजून जाणवली नव्हती. जावई दुबईला एमिरेट्स एअर्वेज मध्ये असल्याने त्यांना बदलती परिस्थिती लक्षात येत होती. दहा तारखेला त्यांनी आम्हाला भारतात जायचे असेल तर लवकर निघावे लागेल, कदाचित् फ्लाइट्स बंद होण्याच्या शक्यता आहेत आणि एकदा बंद झाल्या की पुन्हा कधी सुरू होतील याची शाश्वती नाही याची कल्पना आली, त्यामुळे आम्ही लगेच 12 तारखेला निघायचा निर्णय घेतला. एअरपोर्टवर आलो तेव्हा नेहमीचे आनंदी, उत्साही वातावरण नव्हते. सर्वजण एका भयाण शांततेत, गंभीर चेहऱ्याने मास्क वापरताना बघून आमच्याही मनावर दडपण आले. आम्हीही मास्क घेतले होतेच, बरोबर सॅनिटायझर ही होते पण या सगळ्याची इतकी काय गरज आहे, असंच वाटत होतं! पहाटे पुणे एअरपोर्ट ला पोहोचलो. तिथेही टेंपरेचर घेतले गेले, बाकी काही त्रास नाही ना, याची चौकशी झाली. आम्ही अगदी ‘ओके’असल्याने हे सर्व कशासाठी? अशीच भावना मनात होती. आम्हाला घेण्यासाठी मुलगा एअरपोर्ट वर आला होता, त्याच्या गाडीतून घरी जाताना त्याने आम्हाला परदेशातून आल्यामुळे लागण झालेले काही कोरोनाचे पेशंट पुण्यात आले आहेत हे सांगितले, त्यामुळे बऱ्याच लोकांना क्वाॅरंटाईन मध्ये ठेवल्याचे ही सांगितले.आम्ही तेव्हा मनानेच निर्णय घेतला की आपणच स्वतःला क्वाॅरंटाईन करून घ्यावे! त्याप्रमाणे घरात एकदा जे पाऊल टाकले ते जवळपास एक महिना बाहेर आलोच नाही! अर्थात मुलगा समोरच राहत असल्याने त्याचा पूर्ण सपोर्ट होता!

ते दिवस अक्षरशः स्थानबद्धतेचे  होते. पोलीस येऊन चौकशी झाली. कॉर्पोरेशन कडून लोक येऊन गेले. हातावर क्वाॅरंटाईनचा शिक्का मारला! शिवाय आसपासच्या लोकांच्या ‘हेच ते दुबई हून आलेले लोक’ असे दाखवणार्या नजरा, या सगळ्या गोष्टींचा नकळत मनावर परिणाम होत होता. त्यावेळचे ते दिवस आठवले की,  मला पूर्वीच्या काळी समाज बहिष्कृत लोकांना कसे वाटत असेल याची जाणीव सतत मनाला होत असे! त्यामुळे मन अधिकच अंतर्मुख झाले!त्रस्त असलेल्या मनाला व्यक्त होण्यासाठी शब्द सापडू लागले आणि नकळत अनेक लेख आणि कविता लिहिल्या गेल्या. तो एकांतवास एका दृष्टीने फारच फायदेशीर ठरला! स्वतःच्या मनाशी संवाद घडू लागला! मोबाईल वरून जवळच्या व्यक्तींशी बोलता येत होते एवढाच फक्त माणसांची संवाद!

त्या काळात कोरोनाचे पेशंट वाढले, मधेच लॉकडाउन चालू होता, दूध, भाजी, किराणा या गोष्टी वेळच्या वेळी मिळतील ना अशी साशंकता  सतत मनात असे!आयुष्यात कधी न पाहिलेले अशा प्रकारचे दिवस होते ते! जगात सगळीकडे कोरोनाचा प्रभाव दिसत होता. दुःखात सुख म्हणजे आम्ही परदेशातून स्वदेशात वेळीच आलो होतो! आम्ही आलो आणि दुसर्‍या दिवसापासूनच दुबईहून येणाऱ्या फ्लाईटस् बंद झाल्या. तिथे मुलगी,जावई यांच्या घरीच होतो, तरीसुद्धा आपला देश, आपलं घर हे वेगळेच असते! गेले पूर्ण वर्ष या कोरोनाच्या छायेतच चालले आहे, त्यामुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही द्रुष्टीने त्रासदायक च गेले.

अजूनही कोरानाचे संकट पूर्णपणे गेलेले नाही. कोरोनाच्या लसीचा एक डोस पार पडला आणि एका मोठ्या दिव्यातून बाहेर आल्या सारखं वाटले. अजून 28 दिवसांनी दुसरा डोस!’कोव्हिशिल्ड’ चे शिल्ड वापरून पुन्हा एकदा जीवनाला नव्याने सामोरे जायचेय! जगावर आलेल्या या संकटाला माणसाने धीराने तोंड दिले आहे. नकळत एक वर्ष डोळ्यासमोर उभे राहिले! कोरोनाच्या २०२० सालाने तसं माणूस बरेच काही शिकला! निसर्ग आणि माणसाने एकमेकाशी संलग्न राहिले पाहिजे हे कोरोनाने शिकवले! प्रगतीच्या नावाखाली माणसांकडून मानवी मूल्यांची जी घसरण चालली होती, ती थोपवण्याचे काम या कोरोनाने केले आहे एवढे मात्र नक्की!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

१० मार्च २०२१

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print