मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘सात’ – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ. ज्योत्स्ना तानवडे

☆ काव्यानंद ☆ ‘सात’ – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆

स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ 

रसग्रहण:

कविवर्य कुसुमाग्रज यांची ही अतिशय गाजलेली कविता; जिचे एक  जाज्वल्य स्फूर्तीगीत झाले. शिवकालीन इतिहासातील एक घटना शब्दबद्ध करणारी ही नितांत सुंदर अशी कविता आहे. कुसुमाग्रजांना तेजाचे, समर्पणाचे अतिशय आकर्षण आहे.या आकर्षणातून व्यक्त झालेल्या त्यांच्या सर्वच कविता जणू झळाळणाऱ्या शलाकांसारखी स्फूर्ती गीते ठरल्या. त्यातीलच ही अतिशय बलशाली कविता आहे.

कवितेची सुरुवात होते छत्रपती शिवाजीराजांच्या पत्राने.रणात पाठ फिरवून पळालेल्या आपल्या सेनापतींना महाराज उपरोधपूर्ण; पण त्यांच्या पराक्रमाला चेतविणारे पत्र लिहितात. ‘रण सोडून पळून आलात. भर दिवसा रात्र झाली असे वाटले.अरे ‘पळून येणे’ हे काय मराठी शील झाले ? आपली जात विसरलात काय ?’

या पत्रातील प्रत्येक अक्षराने प्रतापरावांच्या वर्मावरच घाव घातला. ते त्वेषाने पेटून उठले.  ‘काल रणात पाठ दाखविली. लढवय्या मराठी धर्म विसरलो. पण आज तळहाती शीर घेऊन शत्रू सैन्यावर तुटून पडतो ‘ असे म्हणत सहा सरदारांसह शत्रूवर तुटून पडले. ‘त्यांची भिवई चढणे’ ‘पटबंदाची गाठ तुटणे’ या शब्दातून वीररसाचा आविष्कार झाला आहे.

नाट्यात्मकता, दृश्यात्मकता हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कित्येक शतकांपूर्वीची ही घटना जणू आपण साक्षात अनुभवतो आहोत इतके नाट्य, इतकी वातावरण निर्मिती कविवर्य व्यक्त करतात. ही उत्कटता प्रत्येक कडव्या बरोबर वाढतच जाते.

‘खालून आग, वर आग,आग बाजूंनी’ या ओळींनी तिथल्या घनघोर युद्धाचे चित्र समोर उभे ठाकते आणि त्वेषाने लढता-लढता ‘खग सात जळाले अभिमानी वणव्यात’ ‘दगडावर दिसतील अजुनी तेथल्या टाचा | ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा’

या ओळी त्यांच्या पौरूषाचा आवेग केवढा प्रचंड होता याची साक्ष देतात. राजनिष्ठा, ध्येयनिष्ठा, वचनपूर्ती यासाठी त्यांनी केलेले हे समर्पण आहे. त्यांच्या झुंजार,पराक्रमी बलिदानाची ही गाथा. पण इथे पराभवाने सुद्धा विजयाची उंची गाठली आहे. अतिशय भावनिक,आवेशपूर्ण आणि लयबद्ध अशी ही कविता आहे. पुन्हा पुन्हा वाचावी अशी आहे. कुसुमाग्रजांनी या ऐतिहासिक घटनेचे हे काव्यशिल्प अजरामर केले आहे.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – रंगमंच ☆ नाटकावर बोलू काही: आनंद – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ रंगमंच ☆ नाटकावर बोलू काही: आनंद – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

‘नटसम्राट’ या नाटकाचे लेखक आणि या नाटकासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले वि. वा. शिरवाडकर यांची ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘आनंद’, दूसरा पेशवा, ‘कौंतेय’, विदूषक,  अशी आणखीही अनेक उत्तम नाटके आहेत. ही सारी नाटके बघू जाता, त्यांना नाट्यलेखनाचे सम्राटच म्हणायला हवं. ‘आनंद’ हे असंच एक उत्तम नाटक. या नाटकाचा पहिला प्रयोग, नाट्यसंपदा मुंबई या संस्थेद्वारे १८ ऑक्टोबर १९७५ रोजी साहित्य संघ मंदिर मुंबई इथे सायंकाळी ७ वाजता सादर करण्यात आला. पुढे या नाटकाचे किती प्रयोग झाले माहीत नाही. नाटकापेक्षा यावरचा चित्रपट अधीक गाजला पण एखादी कलाकृती किती वाजली-गाजली यावर काही त्या कलाकृतिचे मोल ठरत नाही.

‘आनंद’ नाटकाचे मूळ श्री हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ चित्रपटातलेच आहे. मरण समोर उभे असताना, एक मनुष्य, हसत-खेळत, प्रत्येक परिचितात स्वत:ला गुंतवून घेत, भोवतालच्या जीवनात सुखाच्या लहरी निर्माण करीत आपला अस्तकाल एका बेहोष धुंधीत व्यतीत करतो, ही कल्पना मला अतिशय हृद्य वाटली.’ असं सुरूवातीला, श्री हृषिकेश मुखर्जी यांचे आभार मानताना वि. वा. शिरवाडकर यांनी म्हंटले आहे. ‘कथासूत्र मूळ चित्राचेच असले, तरी त्याला नाट्यरूप देताना मी मला इष्ट वाटले, ते बदल त्यात केले आहेत. त्यामुळे पडद्यावरचेच सारे काही आपण नाटकात पाहात आहोत, असे प्रेक्षकांना अथवा वाचकांना वाटणार नाही, असा मला विश्वास वाटतो,’ असेही त्यांनी पुढे म्हंटले आहे.

‘आनंद’ नाटकात लेखकाने आनंद ही अफलातून व्यक्तिरेखा निर्माण केली आहे. नाटकातील डॉ. संजय सांगतो त्याप्रमाणे तो थोडा कवी आहे. थोडा नट आहे. थोडा विदूषकही आहे. कवी असल्यामुळे तो खूपसा कल्पनेत रमणारा आहे. क्वीकल्पनानेकदा सत्याच्या अधीक जवळ जाते.  आनंदचे बोलणेही तसेच आहे.

नाटकाचं थोडक्यात कथानक असं – डॉ. संजय आणि डॉ. उमेश मित्र आहेत. त्यांचा तिसरा मित्र डॉ. शिवराज नागपूरला आहे. तो आपला मित्र आनंद याला त्यांच्याकडे पाठवतो. आनंद हा खरं तर जगन्मित्र. त्याला लिफोसारकोमा  इंटेस्टाईन हा दुर्धर आजार आहे. तो संजयकडे येतो. संजय, उमेशचा मित्र बनतो. मेट्रन डिसूझाचा मुलगा जोसेफ बनतो. मुरारीलाल किंवा महम्मदभाईचा, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड बनतो. संजायच्या बायकोचा भाऊ आणि उमेशच्या प्रेयसीचा राजलक्ष्मीचा दीर बनतो. मुरारीलाल्ला तो सरकारी कोट्यातून चित्रपट निर्माण करण्यासाठी कर्ज मिळवून देतो. डॉ. उमेशचं अबोल प्रेम मुखरीत करतो. आनंदची प्रेयसी मधुराणी नाटकात ३-४ वेळा आपल्याला भेटते. ३ वेळा त्याचा आठवणीतून आणि अगदी शेवटी वास्तवात. आनंदला आपल्या आजाराची कल्पना आहे, म्हणूनच त्याने तिला प्रत्यक्षात दूर सारलय पण मानाने ती त्याला बिलगूनच आहे.

आनंदचा स्वत:चा प्रयत्न आपलं दुर्धर आजारपण विसरण्याचा आहे पण त्याच्या जवळीकीच्या माणसांच्या डोळ्यात त्याच्या मृत्यूचा भय तरळताना त्याला दिसतय, त्यामुळे तो कासावीस होतोय. नाटकाची अखेर त्याच्या मृत्यूनेच होते पण त्यापूर्वी नाटकाचा एक भाग म्हणून केलेले स्वागत आणि शेवटी टेपवर म्हंटलेलं तेच स्वागत, अप्रतिम!

आनंद क्वीमानाचा आहे. त्यामुळे नाटकात अनेक सुंदर कवितांचा वापर झालेला आहे. इतकंच नव्हे, तर यातले गद्य संवादही काव्याचा बाज घेऊन येतात. ‘काही बोलायाचे पण बोलणार नाही,’ हे लोकप्रिय गाणं आणि

‘प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं

प्रम म्हणजे जंगल हून जळत राहणं

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं

मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोचलेलं’

ही प्रसिद्ध आणि रसिकप्रिय कविता यातलीच.

नाटकाचं सूत्रगीत आहे,

माझ्या आनंदलोकात चंद्र मावळत नाही

दर्या अथांग प्रेमाचा कधी वादळत नाही.

माझ्या आनंदलोकात केले वसंताने घर

आंब्या आंब्याच्या फांदीला फुटे कोकिळेचा स्वर

सात रंगांची मैफल वाहे इथे हवेतून

इथे मारणही नाचे मोरपिसारा लेउन

 नाटकाची भाषा भर्जरी वैभव मिरणारी, तिचा तलम, मुलायम, कोमल, हळवा पोत, या सार्‍यावर अत्तरासारखा विनोदाचा शिडकावा आणि मुख्य म्हणजे त्यातून व्यक्त झालेलं आनंदचं तत्वज्ञान, ’ उद्या येणार्‍या पाहुण्याच्या ( मृत्यूच्या) फिकिरीत माझी जिंदगी आज मी जाळून टाकणार नाही. मी असा जगेन की माझा जगणं क्षणाक्षणाला तुम्हाला जाणवत राहील. आषाढातल्या मुसळधार पावसासारखं…’ किती किती म्हणून या नाटकाची वैशिष्ट्ये सांगावीत!

एखाद्या नाट्यसंस्थेने नव्याने हे नाटक रंगांमंचावर आणायला हवं.वाचकांनी हे नाटक  एकदा तरी वाचायला हवं आणि त्याचा सारा ‘आनंद’ आपल्यात सामावून घ्यायला हवा.

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर  

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416  ईमेल  – [email protected] मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – रंगमंच ☆ नाट्यउतारा: आनंद – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ 

श्रीमती उज्ज्वला केळकर

 ☆ रंगमंच ☆ नाट्यउतारा: आनंद – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर’ ☆ 

आनंद

(आनंद नाटकातील आनंद आणि डॉ. उमेश म्हणजेच आनंदचा बाबूमोशाय, यांच्यातील एक संवाद)

आनंद: (रुद्ध स्वरात)  बाबूमोशाय, कितीदा कितीदा मला आठवण करून देशील- की तुझं आयुष्य आता संपलं आहे. – शेवटाची सुरुवात झाली आहे.  बाबूमोशाय, चांदयापासूंच नव्हे, तर माझ्या मरणापासूनही मी दूर आलो होतो. वाटलं होतं, तुम्हा लोकांच्या जीवनाच्या बहरलेल्या ताटव्यातून हिंडताना माझी आयुष्याची लहानशी कणिकाही डोंगरासारखी मोठी होईल. थेंबाला क्षणभर समुद्र झाल्यासारखा वाटेल. पण- नाही- बाबांनो- मरणाला मारता येत नाही. आपल्या मनातून काढलं तर समोरच्या डोळ्यात ते तरंगायला लागतं-तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात मी माझं मरण पाहतो आहे- पण बाबूमोशाय,  तू म्हणतोस, ते खरं आहे. मी क्षमा मागतो तुझी – तुम्हा सर्वांची- इथं येऊन तुमच्या आयुष्यात असा धुडगूस घालण्याचा मला काहीही अधिकार नव्हता. – मी चुकलो- मी- मी – उद्या चांदयाला परत जाईन बाबूमोशाय-

उमेश: (उठून त्याचे खांदे धरून ओरडतो ) तू जाऊ शकत नाहीस, आनंद – माझ्या लाडक्या- तू आता कुठंही जाऊ शकत नाहीस- तू मरणार असशील तर इथे – माझ्या घरात – माझ्या बाहुपाशात मरणार आहेस-

आनंद: (हसतो.) भाबी घरात आल्यावर तुझे बाहुपाश मोकळे सापडले पाहिजेत मात्र –

ओ.के. बाबूमोशाय, ती – कविता- मैं टेप शुरू करता हूं.

उमेश: कोणती कविता ?

आनंद: शर्त 

उमेश: एका अटीवर

आनंद: कोणत्या?

उमेश: नंतर तूही काही तरी म्हंटलं पाहिजेस. आपले दोघांचे आवाज एकत्र टेप करायचे.  कबूल?

आनंद: कबूल. कर सुरुवात (टेप चालू करतो.)

उमेश: (कविता म्हणतो.)

एकच शर्त की

तुटताना धागे

वळोनिया मागे

पाहायचे नाही

वेगळ्या वाटेची

लाभता पायकी

असते नसते

म्हणायचे नाही.

वांझोटया स्वप्नांचा

उबवीत दर्प

काळजात सर्प

पाळायचा नाही

दिवा हातातील

कोणासाठी कधी

काळोखाच्या डोही

फेकायचा नाही.

उमेश: आता तू-

आनंद: पण मी काय म्हणू?

उमेश: काहीही. चल, मी रेकॉर्ड करतो.

आनंद: पण- (हसतो) हं, आठवलं. पण असं नाही- थांब – हं-

(उमेश टेप चालू करतो. आनंद युवराजाचा पवित्रा घेऊन उभा राहतो. तेवढ्यात काही लक्षात येते. तसाच मागे जाऊन एक चादर काढतो, डोक्याला गुंडाळतो आणि फुलदाणीतील फूल हातात घेतो. टेप चालूच असते. नंतर:)

आनंद: (नाटकी स्वरात ) बाबूमोशाय, बाबूमोशाय, – उद्या मी नसेन, पण आज आहे आणि आज इतका आहे अब्बाहुजूर, की उद्या मी असेन की नसेन याची मला चिंता वाटत नाही. उद्या येणार्‍या पाहुण्याच्या फिकिरीत माझी जिंदगी आज मी जाळून टाकणार नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत जगेन जहापनाह आणि असा जगेन की माझं जगणं तुम्हाला क्षणाक्षणाला जाणवत राहील. आषाढातल्या मुसळधार पावसासारखं. मरणावर मात करण्याचा हाच रास्ता आहे, हुजूर, ते येईपर्यंत जगत राहणं. मी जीवंत आहे तोपर्यंत तुम्हीच काय, जगातली कोणतीही सत्ता मला मारू शकत नाही. हा: हा: हा:!

(आनंद उमेशला मिठी मारतो. दोघेही गळ्यात गळा घालून खळखळून हसतात.)

वि. वा.शिरवाडकर यांच्या आनंद नाटकातील  एक उतारा

– स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मराठी भाषा दिन ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

 ☆ विविधा ☆ मराठी भाषा दिन ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

“मराठी भाषा दिन” ?

मंडळी, नमस्कार ??

‘मराठी भाषा दिन’ अर्थातच विष्णू वामन शिरवाडकर जन्मदिवसाचे  निमित्य साधून  एका शाळेत घडलेल्या  एका कार्यक्रमाबद्दल तुम्ही आता वाचणार आहात

२७ फेब्रुवारीला जरी हा दिवस असला  तरी शाळेने काही दिवस आधीच हा कार्यक्रम साजरा केला. शाळेत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भगवे ध्वज, पताका  यांनी शाळा सुशोभित करण्यात आली होती. शाळेच्या प्रवेश द्वारावरच  ‘ सुस्वागतम  ‘ असे छान फुलांच्या नक्षीकामात  लिहिले होते.  अनेकांना हा शब्द  नवीन होता. लागलीच  गुगल भाषांतराद्वारे  अनेकांनी त्याचा अर्थ ‘ वेल कम ‘ असा आहे हे जाणून घेतले. शाळेत आज राष्ट्रगीत  झाल्यांनतर  ज्ञानेश्वर गुरुजींनी पहिला तास सुरु केला. आज आपण  मराठी भाषा रुजेल यासाठी  काय करावे ? यावर चर्चा करू असे म्हणाले. प्रत्येकाने आपले मत सांगा  ( कृपया  आज तरी  मराठीतच )  असे सांगताच  एकेक जण बोलू लागले. त्यातील काही विचार

१) सकल मराठी जनांनी कमीत कमी एकमेकांशी मराठीत बोलावे.

२)महाराष्ट्रात आम्हाला

‘मराठी भाषा दिन’ साजरा करावा लागतोय…..हे आमचेच दुर्दैव…अशा दिनाच्या शुभेच्छा द्यावं लागण म्हणजे तर अजूनच. वाईट…

तरीही मी आजच्या दिवशी अशी सदिच्छा व्यक्त करतो की…निदान ह्या निमित्ताने तरी समस्त मराठी लोक एकमेकांशी मराठी बोलतील, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत देतील. आणी हे करताना अजिबात लाज वाटणार नाही

जय मराठी ?

वर्गातील सर्वात हुशार  विद्यार्थ्यानेे अशी  ☝?प्रतिक्रिया देताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला ????

यानंतर शाळेपासून शाळेच्या खेळाच्या मैदानापर्यत ‘मराठी अनुदिनी दिंडी’ निघाली, शाळेभोवतीच्या सहा गल्ल्यातून जाऊन  मैदानावर तिचा शेवट होणार होता. वेगवेगळ्या मराठी संकेतस्थळांचा चित्र रथ  यावेळी मुलांनी सादर केला. यात प्रामुख्याने भाव खाऊन गेलेले संकेतस्थळ ठरले

माझे टुकार ई-चार   ?

(या अनुदिनीचा पत्ता तर सगळ्यांना अगदी तोंडपाठ होता)

शाळेच्या मैदानावर तंत्रशिक्षण खात्यातर्फे प्रत्येकाच्या भ्रमणध्वनीवर  ‘ मराठी टंकलेखन ‘ बसवून देण्यात होते.  तेथेच स्वयंसेवक  मराठीत  ॐ, क्ष, ज्ञ, त्र. श्र, इ  व्यंजन कशी टाकायची याचे प्रात्यक्षिक देत  होते

आजच्या  दिवसाचे औचित्य साधून  शाळेत मुलांसाठी ‘ पंगती  जेवण ‘ हा विशेष कार्यक्रम ठरवला होता. काय अप्पा वरचा विनोद ‘ पूर्वी लोक एकाजागी  बसायचे आणि वाढपी सगळीकडे फिरत जेवण वाढायचे ‘  याचा अनुभव सगळ्यांनी घेतला आणि पुरणपोळीच्या जेवणाचा आस्वाद घेतला ?

जेवणानंतर वर्गातील आणखी एका हुशार मुलाने  खूप पूर्वीच्या  दूरदर्शन वर होऊन गेलेल्या ‘ प्रतिभा आणि प्रतिमा ‘  या कार्यक्रमाचे संकलन सादर केले. हाही कार्यक्रम विशेष भाव खाऊन गेला.

यानंतर एकत्रित  ‘ मराठी वृत्तपत्र ‘   वाचन हा कार्यक्रम पार पडला. तरुण भारत, नवसंदेश, केसरी,  पुण्य नगरी  यांच्या काही जुन्या आवृत्या  मुलांना वाचावयास दिल्या. चित्रपटाच्या जहिराती, क्रीडा विश्व, मनोरंजन, कोडी,  राजकारणाविषयी बातम्या  हे सगळे ‘ काय अप्पा ‘ पूर्वी ही अस्तित्वात  होते  हे पाहून मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

सगळ्यात मजा मुलांना आली ती म्हणजे पहिल्या पानावरची बातमी संपताना खालील कंसात लिहिलेले  अधिक वृत्त पान  ५ वर. आणी मग पुढचा वृत्तांत परत ५ वर जाऊन वाचणे.. तसेच काहीही क्रमशः  लेख ही त्यांनी पाहिले, एकंदर हे सदर ही खूप छान  रंगले.

एवढ्यातच ‘wake up wake up, its brand new day’ असा मोबाईल मधे गजर झाला आणि सनी झोपेतून उठला. शाळेत वेळेवर जाण्यासाठी तो लगेच आवरु लागला.

पण आज पडलेले हे ‘ मराठीचे स्वप्न ‘ त्याला खूप आवडले होते

(संग्रहित)  अमोल ?

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मराठी भाषा ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ विविधा ☆ मराठी भाषा ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

कवीवर्य कुसुमाग्रज म्हणजे वि. वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना नितांत सुंदर अशीच आहे.. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने युनेस्कोच्या पुढाकाराने जगातील सर्व भाषांना एकाच पातळीवरून सन्मान देण्यासाठी सन २००० पासून २१ फेब्रुवारी हा ” आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन ” साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला. या दोन्ही सुदिनाचे औचित्य साधून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा मायबोली मराठी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. हे दोन्ही दिवस आपल्या मायबोलीच्या सन्मानाचे आहेत.

माझ्या मराठी मातीचा

लावा ललटास टिळा

तिच्या संगाने जागल्या

द-याखो-यातील शिळा

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या अवघ्या चार ओळीतून मराठी भाषेचा स्वाभिमान उगवत्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान झाला आहे… भारतभरात आपापल्या संस्कृतीप्रमाणे आणि जातीधर्मा प्रमाणे भाषा बोलल्या जात असल्या तरी देखील माझ्या मराठी भाषेत जो गोडवा सामावलेला आहे त्याची सर इतर कुठल्याही भाषेला नाही…काना, मात्रा, वेलांटी, आकार, ऊकार या सर्वांचा साज लेऊन मराठी पुढे येते त्यावेळी तिचे सौंदर्य काय वर्णावे ?

मराठी भाषा परिपूर्ण माधुर्याने शब्दविलासाने नटलेली, विविध बोलींचे लेणे घेऊन आलेली, साहित्यिकांच्या लेखणीने समृद्ध केलेली मराठी भाषा आपल्या सर्वांचाच मानबिंदू आहे. मराठी भाषेला जो लहेजा आहे तो अन्य कुठल्या भाषेला आहे?  मराठी भाषा वळवावी तशी वळते…एवढा लवचिकपणा कोणत्या भाषेत आहे. आपल्या मराठी भाषेला बोलीभाषांचे ऐश्वर्य लाभलेले आहे. एक ना अनेक अशी कितीतरी वैशिष्ट्ये आपल्या मराठी भाषेची आहेत…

मराठी असे आमुची मायबोली… म्हणजे मराठी भाषा हि आपल्या साठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार, प्रेमळ, असतात आणि प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्द हि बोलू शकते तशीच हि आपली मराठी आहे. हळुवार, गोड़, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनी कठीण शब्दाने वार करणारी जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात,कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही. अशी हि माझी मायबोली माझी मराठी.

मराठी भाषा एक अमूल्य अशी देणगी आहे. सौंदर्य, माधुर्य आणि विविधतेने/ विविधता यांनी नटलेली..

मराठी भाषा म्हणजे काय ? असा जर कुणी प्रश्न विचारला तर माझे उत्तर असेल… मराठी म्हणजे ज्ञानोबांची ओवी, तुकोबांची वाणी, छत्रपतींची तलवार आणि चक्रधरांचे भाषण धारदार…

मराठी म्हणजे एकनाथांचे भारूड, नवनाथांचे गारुड,, संताजी- धनाजींची स्फूर्ती, सावरकरांची किर्ती, मराठी महन्मंगलम मूर्ती शारदेची…साहित्यिकांनी मराठी भाषेला नटवून- थटवून सुंदर केलं. आचार विचारांच्या परंपरांनी संस्कृतीची जडणघडण ही केली.

स्वर्गे अमृताची गोडी

चाखून पहा थोडी

वाटे फुलांची परडी

माझी माय ही मराठी

मराठी राजभाषा दिन साजरा करताना मराठी भाषेचे संवर्धन आणि जोपासनेची धुरा अभिमानाने पुढे नेऊया..

सन्मान मराठीचा

अभिमान महाराष्ट्राचा

मराठी भाषा ही खूप श्रीमंत भाषा आहे. तिला साहित्य आणि इतिहासाची किनार आहे. ती संतांच्या किर्तने भजन भारूडांनी सजली आहे. आपली मराठी भाषेची सुंदरता आणि संपत्ती ही समजून घ्यावी लागेल आणि समजून द्यावीही लागेल…

मराठीचा ” म” या अक्षरात मी, माझी मराठी, मायबोली अश्या सर्व ” म” कारात मी, माझे, महान, मानसन्मान असे सर्व  ” म” सामावलेले आहेत. म्हणूनच आम्ही बोलतो मराठी असे आमुची मायबोली..

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नटसम्राट… ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆विविधा ☆ नटसम्राट… ☆ सौ ज्योती विलास जोशी

भावनेत अडकलेला नात्यांचा गुंता सुसंवादानं सोडवणं सोपं जातं त्यासाठी सुसंवादाची सुगंधित कुपी नात्यांवर सांडली पाहिजे. नाही तर नातं धुसर आणि पुसट होत जातं अगदी वृद्धापकाळातल्या नजरे सारखं…..

आई वडील आणि मुलगा सून यांच्या नातेसंबंधावरचा विषय तसा चावून चोथा झालेला, पण पुन्हा पुन्हा उफाळून येतो आणि नव्याने विचार करायला लावतो याचं कारण दररोज घडणाऱ्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना अन् मनाला चटका लावून जाणारे प्रसंग !….नाईलाजावर इलाज नाही असं म्हणून हताश झालेली आईवडिलांची मनं विचारांच्या गर्तेत बुडन जातात……

‘आमच्या प्रेमाच्या ओलाव्याने ही बीजे अंकुरली बहरली ना? त्यांना पंखही आम्हीच दिलेत ना ?त्यात बळही आम्हीच भरले ना ? तशात अपेक्षांचं ओझं कधीही त्यांच्यावर लादलं नाही. अर्थात आई वडील म्हणून या नात्यामधून माफक अपेक्षा केली तर आमचं काय चुकलं? रक्ताची नाती मतलबी का झाली? ती इतकी संवेदनाशून्य का झाली? आम्ही कुठे कमी पडलो? आणखी काय करायला हवं होतं आम्ही? आपल्याच पोटचीच पोरं…..तीही इतकी भावनाशून्य?’ विचारांचं मोहोळ उठत, पण विचारांचा गुंता सुटत नाही.

पंख फुटलेली लेकरं उडून जातात. त्यांच्या प्रगतीत आई-वडिलांचं सुख असत.थोडे दिवस एकांत मिळतो. याच एकांताच एकटेपणात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही.

मुलांसोबत राहणाऱ्या आई-वडिलांच्या जीवनातील एकटेपणाचा हाच अर्थ आहे. भावना आणि व्यवहारात फरक जाणवू लागतो आपलंच सगळं परकं वाटू लागतं

आणि…….

अचानक आठवते ती कावेरी ! नाट्यसम्राट वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘नटसम्राट’ मधली कावेरी आणि तिने त्याकाळी म्हटलेलं एक शाश्वत वाक्य ‘जेवायचे ताट द्यावे पण बसायचा पाट देऊ नये’

चूक नसतानाही, केवळ वाद टाळावा म्हणून सतत माघार घेऊन संयम राखणारं एका वृद्ध जोडप्याची करूणरस प्रधान अशी शोकांतिका म्हणजे ‘नटसम्राट’! ते एक क्षोभनाट्य आहे.

काळ लोटला आहे. या शोकांतिकेतली पात्रं बदलली आहेत,परंतु या नाटकातील विषयाचं गांभीर्य अधिक गडद होत चाललं आहे.

इथून पुढच्या काळात एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व वाढेल का? की ते एक स्मरणरंजन राहील? एकत्र कुटुंब पद्धतीची दुर्दशाच आपण नटसम्राटमध्ये पाहतो म्हणून याबद्दल आपण साशंक होत चाललो आहोत.

‘बी प्रॅक्टिकल’ चा गोषवारा सध्या फार आहे. या व्यवहारी जगात संवेदना भावना यांची किंमत कमी होत चालली आहे.अशा परिस्थितीत ‘परावलंबी वृद्धत्व’ हा एक यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. पर्यायाने वृद्धाश्रम हा व्यवसाय झाला आहे.

‘नटसम्राट’ मधलं हे जोडपं, कलावंत मन असलेलं जोडपं आहे. त्याच्यासारखंच आयुष्य व्यतीत करणारी समाजातली असंख्य वृद्ध जोडपी असंच मूक भाष्य करत आहेत. विदेशी संस्कृतीचा आणि तिच्या संस्कारांचा प्रसार आपल्या इथेही होतोय. ती वाळवी इकडे जोमात पसरते आहे.तिला आवर घालणं हे संवेदनशील मनाचं काम आहे.

गेली कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी ही कलाकृती आणि त्यात वि. वा. शिरवाडकर यांनी आपल्या लेखणीने पेरलेली स्वगतेही अनन्यसाधारण!…

आपल्या समाजात आपण अप्पासाहेब बेलवलकरां सारखी दुर्दैवी परिस्थिती ओढवलेल्या व्यक्तीला ‘त्याचा नटसम्राट झाला’ असे बोलीभाषेत म्हणून ‘नटसम्राट’ हे विशेषण देतो.ह्यातच कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या या नाटकाचं श्रेष्ठत्व आहे.

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तिळगुळ घ्या, गोड बोला ☆ श्रीमती सुधा भोगले

☆ मनमंजुषेतून ☆ तिळगुळ घ्या, गोड बोला ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

तिळगुळ घ्या, गोड बोला, संक्रांतीच्या सणाला तिळगुळ एकमेकांना देताना म्हणायचे गोड गोड शब्द!  वर्षभरातील कटू आठवणींना विसरून जाऊन एकमेकात गोडी निर्माण करणारा सण!  नवीन लग्न झालेल्या लेकीचा संक्रांतसण करण्यास मातेची केवढी धावपळ. जामातांना सणाला बोलवून त्यांना संक्रांतीचे दान करणे यात परंपरेचा भाग आलाच. बालगोपाळांचा बोरनहाण हा केलेला संस्कार, परंपरेचा व हौसेने करायचा सोहळा! उत्सवप्रियतेमुळे चारजणांनी एकत्र जमावे हेच खरे त्यामागील उद्दिष्ट.

असे आपले अनेक सण. त्यामागील संस्कार, काहीवेळा पौराणिक कथा आणि बहुतांशी आपल्या थोर भारतीय संकृतीतील विचार, आचार आणि परंपरा यांचा सुरेख संगम म्हणजे संक्रांतीसारखे सण होय. सणांनी आपले जीवन इतके व्यापून टाकलयं की त्यांची आपण आतुरतेने वाट पहात असतो. सणामुळे आपल्या जीवनात उत्साह, आनंद आणि क्रियाशीलता येते.

प्रत्येक सणामागे आणि धार्मिक कृत्यात दानाची अजोड अशी कल्पना असते. आपली संस्कृती त्यावरच आधारित असल्याने आपल्याजवळचे जे चांगले आहे, उत्तम आहे ते योग्य ठिकाणी देणे, यातून दात्यास सात्विक समाधान लाभते.

मकर संक्रणापासून देवांची रात्र संपून दिवस सुरु होतो. दिवस म्हणजे प्रकाश. इतके दिवस असलेली रात्र सरून सूर्यदेवाची स्वच्छ किरणे पृथ्वीतलावर आल्याने सर्वकडे तेजाचे वातावरण निर्माण होते. पौराणिक कालापासून देव व राक्षस असे दोन परस्पर विरुद्ध पक्ष आपण पाहतो. देवांचे ते ते आचरणीय, चांगले, राक्षस म्हणजे क्रूर, कुटील, कारस्थानी अशी माणसे, प्रवृत्ती! म्हणून अंधाराचा काळ म्हणजे वाईट प्र्रुवृतीचा काळ. तो मागे पडून स्वच्छ प्रकाशाचा काळ येतो आहे. त्यालाच संक्रमण म्हणतात. अनिष्टातून चांगल्या सुष्ट विचारांकडे वळणे म्हणजे संक्रमण, बदल! ते विचारांचे,  आचारांचे आणि कृतीचेही हवे.

कालचक्रानुसार सूर्याची दोन आयने मानली जातात. १) दक्षिणायन २) उतारायण. मकरसंक्रमण म्हणजे दक्षिणायनाचा अस्त आणि उत्तरायणाचा उदय.

संक्रातीला तिळाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्राचीन काळापासून तिळ आपल्या स्निग्ध गुणांमुळे, आपल्या आहारात महत्वाचे स्थान व्यापून आहे.

महर्षे गोत्र संभूता:काश्यपस्य तिलामृता:

तस्मादेषां प्रदानेन मम पाप व्यतोहतु||

महर्षी कश्यपांच्या कुळातील तीळ अमृत मानला गेला आहे. म्हणून तिळाला काश्यपहि म्हणतात. अशा अमृतमय तिळाच्या दानाने माझ्या पापांचा नाश होवो.

प्राचीन काळापासून तीळ हे, दोन्ही कर्मासाठी म्हणजे देवनाकृत व पितृकृत्य यासाठी शास्त्रकारांनी शुद्ध मानले आहे. विधीपूर्वक जर, होम,  दान, तिलमिश्रित उदक, तिलाक्षता अर्पण केल्या, तर त्याचे फळ दात्यास प्राप्त होते. तिळाचा गुणधर्म उष्ण असल्याने त्याच्या सेवनाने आपल्या शरीरात उष्णता निर्माण होऊन शक्ती वाढते.

तिलस्नायी, तीलोद्वती, तिलहोमी,  तिलोदकी|

तीलभूक तिलदात्रीच षटतिला:पापनाशका||

तिळाच्या स्नानाने, तीळयुक्त उदक घेतल्याने तिळाच्या सेवनाने व तिळाच्या दानाने पापांचा नाश होतो. म्हणजेच दक्षिणायनात घडलेल्या चुकांचे, पापांचे परिमार्जन तिलसेवनाने होऊ दे. आपल्या पुर्वज्यांनी निसर्ग आणि अनुरूप असा आहार, यांची सांगड घालून जनसामान्यांना आहारविहाराचे महत्व पटवून दिले आहे.

या सणाला सुवासिनी सुगडाचे दान करतात. सुगड मृतिकेचे असते. त्यात शेतात पिकलेले धान्य, ऊस गाजर, हरभरा आदी घालून ऐकमेकींना दान करतात. या दानाला सुवर्णदानाचे महत्व आहे. सुवर्णाचा पिवळा रंग आणि त्याचे स्थान दुसरा धातू घेऊ शकत नाही. पृथ्वीतलावर पिकलेले हे काळ्यामातीतील सोने सुवर्णाइतकेच, किंबहुना त्याहून अधिक मोलाचेच आहे. या भूमीतील सोन्यामुळेच तर आपले भरण पोषण होते. पृथ्वीतलावरील जीवन त्याविना अशक्यप्राय आहे. म्हणून मृत्तीकेचे सुगड. हे भूमीचे द्योतक,  तर धान्य हे त्यातून निर्माण झालले सोने,  म्हणजे सुवर्णच! मृत्तिका आपली माता.

पूर्वजांनी पुजिलेल्या अशा अनेक उच्चतम कल्पनांना आजच्या आधुनिक काळात कितपत महत्वाचे स्थान उरलयं ही शंका आहे. त्यागाचा असलेला महान संस्कृतीचा पाया आत्मकेंद्री, स्वार्थी विचारांनी डळमळा यला  लागला आहे. माझे स्थान, मी आणि मीच मला शोधत फिरतो आहे. या वृत्तीमुळे आपण एकमेकांना दुरावत आहोत. तंत्रज्ञानामुळे जग क्षणाच्या अंतरावर आले आहे. पण पूर्वीचा स्नेहभाव, आपुलकी या गुणांना या नव संस्कृतीने दूर लोटले आहे. सहनशीलता आणि त्यागीवृती आपल्यापासून दूर पळते आहे.  पाश्चीमात्यांचा भोगवाद आपण अंगिकारला आहे त्यामुळे तिळातिळाने गोड बोलण्यापेक्षा तिळा-तिळाने कटू बोलणे आणि तिळा-तिळाने एकमेकात वैमनस्य वाढत आहे.  तिळाच्या उष्ण प्रव्रुतीमुळे व पौष्टीक्तेमुळे आपले बल वर्धन होते आपण शरीराने व मनानेही बलवर्धक होऊन या अनिष्ट काळाचा नाश करण्यास सज्ज होणे उचित आहे. धन गेले तर कोणतेही नुकसान नाही आरोग्य बिघडले थोडे नुकसान होते,  परंतु चारित्र्य बिघडले तर सर्वस्वाचाच नाश होतो. शुद्ध आचरण हेच या संक्रांतीच्या काळाचा नेम करूया म्हणून या संक्रमणाच्या कार्यास सर्वांनी हातभार लावूया.  जुन्या नव्याची सांगड घालून नवं विचारांची,  आचारांची वाट अनुसरणे हेच आधुनिक काळात उचित उत्तरायण होईल.

एक दुजांना तिळगुळ देऊ

गोड बोलण्या शप्पथ घेऊ

 भांडण-तंटा विसरून जाऊ

 आपण सारे स्नेह वाढवू !

 

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणींच्या साठवणी….☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

0 ☆ विविधा ☆ आठवणींच्या साठवणी…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

आयुष्याचा सारीपाट मांडून आपल्याला खेळवणारी नियती काही मजेचे, काही कठीण, खडतर,खेळ मांडून सारखी खेळवत असते. जोजवत  असते, वाढवत असते, घडवत असते. अचानकपणे ती बदलून जाते. चकीत करते. गुपचुपपणे लुटायला एकांतातील अत्यानंद देते. खूप मजा वाटते तो लुटताना. लोकाना वरून काहीच कळत नाही. पण भोगणा-याच्या काळजात लुटलेला व भोगलेला आनंद मावता मावत नाही. ही दिशाभुलीची मजा दिर्घकाळ टिकणारा आठवणींचा नयनमनोहर तलावच बनून जाते. मग त्या तळ्याकाठी वाढलेल्या गर्दसावलीच्या डेरेदार झाडाखाली किती काळ कसा फुलपाखरा सारखा निघून व हरवून जातो तेच कळत नाही. प्रतेक आठवण एक नवासरंजाम घेवून येते. आकंठ आनंदात न्हाऊ घालते. उनपावसातल्या श्रावण धारांचा लपाछपीचा खेळ मांडून आपल्यातच गुंतवून ठेवते. म्हणूनच आठवण कायमची आठवणीत रहाते. कधी बगल देवून निघून गेली तर परतून लगट करायला हटकून येते. अशा आठवणींचा तजेलदारपणा‌ कधीच शेळपटत नाही. ती आठवण आठवणारालाही कायम आपलेसे करून टाकते.

अशा आठवणींच्या साठवणीनाच जीवनाचे चैतन्यमय न संपणारे कोठार समजायला काय हरकत आहे.

हे कोठर कुलूप लाउन कधीच बंद करून ठेवता येत नाही. हवे तेव्हा खाडकन उघडून हव्या त्या आठवणींची मजा मनसोक्त लुटता येते. किंवा तिच्यातील कटूता आठवून एकलेपणातील आक्रोश मांडून आपल्याच अश्रूं सोबत वाहून ही जाता येते. वास्तवाशी सांगड घालून एखादी नवीन समस्या सहजतेने सोडवता येते. हेच आठवणींचे खरे सामर्थ्य आहे. म्हणूनच आठवणींचे मोल सर्वाधिक आहे. त्या आपल्या सोबत कायम असतात. कधीच हरवत नाहीत. सढळ हातानी वापरून सरतही नाहीत. त्याचा साठा कायम वाढतच जातो.

आठवणींचा समृद्ध साठा ज्यांच्याकडे आहे तो जगातील खराखुरा सर्वात गर्मश्रीमंत असे मी समजतो. तुमचे या बाबतचे मत काय? हे विचारण्याचा आगवूपणा मी नक्कीच करणार नाही. किंवा तुमची एखादी खाजगीतली आठवण सांगा असा. आग्रह ही धरणार नाही.पण तुमच्या आठवपाखराना  मनाच्या कैदखान्यात नका ठेऊ डांबून. त्यांना  मुक्तता द्या, मुक्तपणे वावरायला, संचार करायला. कारण त्याच तुमच खरं ऐश्र्वर्य चिवचिवाट करून जगाला सांगतील. तुम्हालाही आत्मिक

समाधान देतील. आठवणी वाटचाल करणा-या आयुष्याच्या वाटाड्या असतात. अस्वस्थ मनाला रिझवायला आठवणीसारखा दुसरा खेळगडी नाही. जपा त्यांना आपले मार्गदर्शक म्हणून.

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १०-३) – राग~मारवा, पूरिया ~सोहोनी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगीत राग गायन (भाग १०-३) – राग~मारवा, पूरिया ~सोहोनी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

सोहोनी

सोहोनी म्हणजे पूरियाचीच प्रतिकृति,फरक इतकाच की पूरिया पूर्वांगात तर सोहोनी उत्तरांगात रमणारा राग. तार षड् ज हे सोहोनीचे विश्रांतीस्थान. मध्यसप्तकांतील सुरांकडे येऊन तो पुन्हा तार षड् जाकडे धांव घेतो. उत्तरांगातील धैवत आणि पूर्वांगांतील  गंधार हे याचे अनुक्रमे वादी/संवादी स्वर म्हणजे मुख्य स्वर.

मारवापूरियासोहोनी, सगळ्यांचे स्वर तेच म्हणजे रिषभ कोमल आणि मध्यम तीव्र.

सा ग (म)ध नी सां/सां (रें)सां,नी ध ग,(म)ध,(म)ग (रे)सा असे याचे आरोह अवरोह.कंठाच्या सोयीसाठी आरोही रचनेत रिषभ वर्ज्य केला जातो. सांनी ध, ग (म)ध नी सां ही रागाची मुख्य सुरावट त्याचे स्वरूप स्पष्ट करते. पंचम वर्ज्य असल्याचे वरील स्वर समूहावरून वाचकांच्या लक्षात येईलच. वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

मारवा कुटुंबांतील हे कनिष्ठ भावंड अतिशय उच्छृंखल, चंचल प्रवृत्तीचे असल्याचे लक्षांत येते.

मारव्यांत कोमल रिषभाला प्राधान्य तर सोहोनीत रिषभाचा वापर अत्यंत अल्प स्वरूपात त्यामुळे मारव्याची कातरता, व्याकूळता यांत नाही.

सोहोनीचा जीव तसा लहानच. त्यामुळे जास्त आलापी यांत दिसून येत नाही. अवखळ स्वरूपाचा हा राग मुरक्या, खटका, लयकारी यांत अधिक रमतो. नृत्यातल्या पद  रचना, एकल तबल्याचा लेहेरा अशा ठिकाणी सोहोनी चपखल बसतो. पट्टीचा कलावंत मात्र हा अल्पजीवी राग मैफिलीत असा काही रंग भरतो, की तो त्याला एका विशिष्ठ ऊंचीवर नेऊन ठेवतो, आणि त्यानंतर दुसरा राग सादर करणे अवघड होऊन बसते.

सुप्रसिद्ध अभिनेत्या भारती आचरेकर यांनी एकदां त्यांच्या मातोश्री कै. माणिकबाई वर्मा यांची आठवण सांगतांना एक किस्सा सांगितला होता. माणिक वर्मांनी एका मैफिलीत “काहे अब तुम आये हो” ही सोहोनीतील बंदीश पेश केली होती. रात्र सरत आल्यावर घरी परत आलेला तो, त्याच्याविषयीचा राग, मनाची तडफड पण त्याच क्षणी त्याच्याविषयी वाटणारी ओढ हा सगळा भावनाविष्कार त्या बंदीशीतून अगदी सहज साकार झाला होता. श्रोत्यांमध्ये पू.ल. देशपांडे बसले होते. ते सहज उद्गारले, “मी यापुढे कित्येक दिवस दुसरा सोहोनी ऐकूच शकणार नाही.”

राधा~कृष्णाच्या रासक्रीडेवर आधारित सोहोनीच्या अनेक बंदीशी आहेत. “रंग ना डारो श्यामजी गोरीपे” ही कुमारांची बंदीश प्रसिद्धच आहे.”अरज सुनो मेरी कान्हा जाने अब। पनिया भरन जात बीच रोकत बाट।” ह्या बंदीशीतही गोपींची छेड काढणारा नंदलाल आपल्याला दिसतो.

भक्तीरसाचा परिपोष सोहोनीच्या सुरावटीतून किती सहज दिसून येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे पं.जितेंद्र अभिषेकीबुवांनी गायिलेला “हरीभजनावीण काळ घालवू नको रे” हा अभंग!

सिनेसंगीतात ह्या रागावर आधारित बरीच गाणी आढळतात. स्वर्ण सुंदरी मधील अजरामर गीत “कुहू कुहू बोले कोयलीया” यांत दुसरे अनेक राग असले तरी मुखडा सोहोनीचाच आहे. “जीवन ज्योत जले” हे आशा भोसले यांनी गायीलेले गाणे जुने असले तरी परिचित आहे. मुगले आझम

मधील “प्रेम जोगन बन” हे गीत सोहोनीलच! बडे गुलामअली खाॅं यांची “प्रेमकी मार कट्यार” ही ठुमरी काळजाचा ठाव घेणारी~ संगीतकार भास्कर चंदावरकरांनी सामना या सिनेमांत “सख्या रे घायाळ मी हरिणी” हे सोहोनीच्या स्वरांतच निबद्ध केलेले आहे.

सोहोनीबहार,सोहोनीपंचम, कुमार गंधर्वांचा सोहोनी~भटियार असे काही सोहोनीबरोबर केलेले जोड रागही रसिक वर्गांत मान्यता पावलेले आहेत.

चिरस्मरणीय असा हा सोहोनी भावदर्शी आणि चित्रदर्शी आहे.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घोरणे…काही गंमती ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

 ☆ विविधा ☆ घोरणे…काही गंमती ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆ 

 

झोपेत आपला आवाज आपल्याला येत नाही, पण आपल्या आवाजाने दुसऱ्याला जाग येणे,  झोप न लागणे, त्रास होणे ह्या गोष्टी होऊ शकतात….ह्यालाच घोरणे म्हणतात. ? हे सर्वांनाच ठाऊक आहे…हो न?

काही पाहिलेले अनुभव, तर काही ऐकलेल्या गोष्टीवरून लेखन प्रपंच….. कारण ह्यावर एकदा लिहायचंच होत!

घोरण्याचे प्रकार तरी किती पहा…..

काही लोक तोंड बंद ठेऊन नाकाने आवाज काढतात म्हणजे आवाज येतो. इतक्या जोरात ही प्रक्रिया सुरू असते की एखादा डास किंवा कोणताही कीटक सहज नाकात जाऊ शकतो.

काही लोक तोंडाने जोरजोरात आवाज काढतात आणि तेही वेगवेगळ्या सुरात!

काही जण तर चक्क फूसss फूसsss असा आवाज काढतात…. जणू आजूबाजूला खरच फणा काढलेला नाग आहे की काय अस वाटू शकतं.

काही लोकांचा तर नुसता घशातून आवाज येतो. जग इकडचे तिकडे झाले तरी चालेल पण एक लिंक लागलेली असते ती बदलत नाहीत. एक सूर…एक ताल

काही लोक तर घोरतात आणि झोपेत मधूनच बोलतातही!

काही लोकांच्या घोरण्याचा आवाज अगदीच वेगळा असतो… कधीही न ऐकलेला!

उताणे झोपलं की जास्त घोरलं जातं असे लोक म्हणतात… मग अशा घोरणाऱ्या व्यक्तीला एका अंगावर झोपण्याची सूचना दिली जाते.मग त्यावेळी तर घोरण्याचे सगळे सूर बदलतात, काही वेळा स्वतःपुरतेच राहतात.

काही वेळा एक अंगावर करूनही घोरणे बंद नाही झाले तर एखादी चापट मारली जाते, मग नवरा बायकोला किंवा बायको नवऱ्याला. काही वेळा तर चक्क गदागदा हलवलं जात!पण घोरणारी स्वारी स्वतःच्या ‘अंतरीच्या आनंदातच’ असते.

काही लोकांना तर घोरलेलं अजीबात सहन होत नाही. बायको घोरते म्हणून नवरोबा कानात कापसाचे बोळे घालतात, तरीही घोरणे ऐकू येत.. मग कानावर हात ठेवणे, त्यावर उशी ठेवणे… असे विविध प्रकार एका घोरण्यामुळे होत असतात.

कित्येक नवरा बायकोमध्ये घोरण्यावरून भांडणेही होतात. नवरा बायकोला म्हणतो मी घोरतच नाही कधी, तूच घोरतेस. पण नवऱ्याचा अनेकदा गोड गैरसमज असतो की आपण घोरतच नाही. किंवा काही वेळेस उलट परिस्थितीही असते. नवरा घोरतो, बायको नाही. घोरणे जास्त झाले की चिडून, चिमटा काढणे, हलकेच ढकलणे असेही होत….

अनेक वेळा आपण घोरतच नाही असे म्हणणाऱ्यांचे घोरण्याचा रेकॉर्डिंग ही केलेलं मी ऐकलंय! कमालच वाटली.

घरी जेष्ठ नागरिक असतील तर खूप वेळा ते ही घोरतात, पण त्यांना कस काय बोलायचं? म्हणून सहन करणंच भाग असत.

अनेक लहान मुलंही घोरतात…. अगदी मोठ्यांसारखं! मग खेळून दमला असेल म्हणून घोरतोय अस समर्थन केले जात.

काही वेळेस घरातील सगळेच घोरतात, पण कुणाला कुणाचाही त्रास वाटत नाही… कारण सगळेच शांतपणे पण घोरत झोपलेले असतात.

एकूण काय घोरणे ह्याच वैज्ञानिक कारण काहीही असो पण काही निरीक्षणांवरून त्याच्या गमती जमती लिहाव्या वाटल्या…

आणि ‘घोरणे’ हा ही लेखनाचा विषय होऊ शकतो असे वाटल नक्कीच?

© सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print