मराठी साहित्य – विविधा ☆ बालपण देगा देवा – भाग 2 ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

 ☆ विविधा ☆ बालपण देगा देवा – भाग 2 ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

माझी तिच्याच एवढी आणखी एक चिमुकली मैत्रीण!… तिचा जास्तीत जास्त मुक्काम आमच्या बागेत असतो. सकाळी- सकाळी हातात एक कुंडा घेऊन आमच्या बागेत बकुळीची फुलं वेचायला जेव्हा ती येते तेव्हा तिला स्वेटर घालण्यासाठी परत पाठवावं लागतं. थंडीने नुसती कुडकुडत असते बिचारी. मला जेव्हा रिकामा वेळ मिळतो तेव्हा बकुळीच्या फुलांचे गजरे  करणं हे आमचं आवडतं काम असतं.काही झाडांच्या मोठ्या पानांना काड्या टोचून पत्रावळी, द्रोण बनवणं तिला खूप आवडतं….तिच्याआजीकडून ती शिकलीय ते करायला…. मग खोटी खोटी देवपूजा आणि पाठोपाठ पत्रावळीवर नैवेद्य ठेवणं हे तर आलंच.

ती परी कल्पनात मग्न असते. परिकथा तिला फार आवडतात.खूप घेराचा छानसा फ्रॉक घातलेली ,मोकळ्या कुरळ्या केसांवर  फुला फुलांचा हेअर बँड लावलेली ,बागेत फुलं, पानं निरखत कल्पनेतल्या फुलपाखरांबरोबर ,पक्षांबरोबरहितगुज करणारी ही वनकन्यका खूपच लोभस दिसते.

“तू मोठेपणी कोण होणार?” ” परीराणी” तिचं उत्तर असतं. तर इतर दोघींची उत्तरं असतात, “मी तिचल होनाल, “मी आई होनाल. असाच एक माझा छोटा मित्र, तो जरा याबाबतीत कन्फ्युज्डच असतो. “मी बार्बर होणार ..नाही नाही मी मेकॅनिक…नाहीतर प्लंबरच होणार.” तो सांगतो. उच्चारात बोबडे पणा नाही, स्पष्ट साफ आवाजात तो आपल्या भावी करिअरचा प्लॅन सांगतो….. अजाणतेपणाने!

.. त्याला राजा राणीच्या गोष्टी नाही आवडत.चिऊ-काऊच्या गोष्टीची तो वाट लावून टाकतो.”शेण म्हणजे काय?मेण म्हणजे काय?म्हातारीआजी भोपळ्यात कशी मावेल?” असे त्याचे प्रश्न असतात. पक्षी, प्राणी, जनावरे बोलतात,यावर त्याचा विश्वास नाहीय. त्यामुळे  इसापाच्या नीतिकथा फेल! त्याला अगदी व्यावहारिक म्हणजे फुगेवाला,ट्रॅफिक पोलीस,रस्त्यावर भटकणारा कुत्रा अशा कुणाचीही जुळवून रंजक केलेली गोष्ट आवडते.

त्याचे सगळे खेळ मैदानी असतात. त्याच्या बरोबर मला फुटबॉल,बास्केटबॉल, क्रिकेट असले खेळ खेळावे लागतात… आणि कायम त्याला जिंकुनही द्यावे लागते. मुद्दामच थकल्याचं नाटक करत मी खाली बसले की “तुझे पाय चेपून देतो” म्हणत पाय चेपता चेपता हळूहळू माझ्या मांडीवर डोके ठेवून तो झोपी जातो. त्याचा चेहरा पाहताना सुख सुख म्हणजे दुसरे काय? ते हेच असा विचार मनात येऊन मला आनंद वाटतो.

छोट्या मुलांना माझ्याबरोबर खेळायला आवडते आणि मलाही त्यांच्याबरोबर खेळायला. ते आपल्या भावविश्वात मला घेऊन जातात .त्यांची सुखदुःखे माझ्याबरोबर शेअर करतात आणि त्यांच्या सहवासात मी माझी प्रापंचिक शारीरिक-मानसिक दुःखं विसरून जाते.

वयाने सत्तरी ओलांडलेली मी मनाने लहान होऊन जाते. कधी वास्तवाची जाणीव झाली की माझं म्हातारपण मला डिवचू लागतं. पण त्याला न जुमानता देवाजवळ मी हेच मागणे मागते, ‘देवा मनानं का होईना मला बालपणातच ठेव. मला बालपण उपभोगू दे. ते सुख तू माझ्यापासून कधीही हिरावून  घेऊ नकोस.’

समाप्त

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-१८) – ‘मान अन्‌  भान’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

 ☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-१८) – ‘मान अन्‌  भान’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

मागच्या लेखात आपण तामिळनाडू प्रांतात प्रचलित असलेल्या अंत्ययात्रेतील जोशपूर्ण तालवाद्यवादनाच्या प्रथेची कारणमीमांसा केली. अर्थातच आज सुशिक्षित समाज ही प्रथा पाळताना दिसत नाही, त्याचं कारणही संयुक्तिक आहेच. आज वैद्यकशात्र प्रचंड विकसित पावलेलं आहे. ईसीजी मशीनमुळं ह्या प्रथेमागचा उद्देशच सफल होत असताना ह्या प्रथेची गरज नाही हे त्यांना समजलं असावं. मात्र तळागाळातले लोक ही प्रथा धर्मिक समजून श्रद्धेनं/अंधश्रद्धेनं अजूनही पाळत असावेत… पण त्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे हे तरी समजलं. ज्याला आपण परंपरा म्हणतो त्या गोष्टी का आणि कशा अस्तित्वात येत असाव्यात हे तरी माहीत होऊन आपला ह्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक व्हायलाही नक्कीच मदत होते. शिवाय ही गोष्ट त्यातल्या उपयुक्ततेसोबत त्याकाळच्या समाजव्यवस्थेचाही भाग असावी असंही वाटून गेलं. वाद्यवादनात पारंगत असणाऱ्या कलाकारांना पोटापाण्यासाठीची ही एक व्यावसायिक संधी म्हणायला हरकत नाही. इतर सांस्कृतिक समारंभांमधे मांगल्यदायी वातावरणनिर्मिती करणे आणि अशा दु:खद क्षणी त्या कलेची ताकद मृत्यूच्या खात्रीसाठी वापरणे ह्या उपयुक्तता झाल्या आणि दोन्ही प्रसंगी कलाकाराला आपलं कसब पणाला लावून अर्थार्जनाची संधी ही झाली समाजव्यवस्था!

मला दक्षिणेकडच्याच केरळ राज्यातील चेंडामेलम्‌  हा प्रकार आठवला.  चेंडामेलम्‌  म्हणजे चेंडा ह्या वाद्याचे अनेक वादकांनी एकत्र येऊन केलेलं समूहवादन म्हणता येईल. आज ही गोष्ट केरळची भावाभिव्यक्ती आणि संस्कृतीचं प्रतीक मानलं जात असलं आणि केरळमधील सर्व सांस्कृतिक उत्सवांमधे चेंडावादन अपरिहार्य असल्याचं सांगितलं जात असलं तरी अचानक वाटून गेलं कि जंगली भाग असलेल्या केरळमधे पूर्वीच्या काळी माणूसप्राणी समूहानं एकत्र येऊन काही धार्मिक उत्सव किंवा काही सणसमारंभ साजरा करत असताना जंगली श्वापदांना दूर ठेवण्याचा हा उत्तम मार्ग असावा. इतक्या धडामधुड आवाजाकडे कोणतंही जंगली श्वापद फिरकण्याची शक्यताच नसल्याने निश्चिंत मनानं माणसाला उत्सव पार पाडता येत असेल ही उपयुक्तता आणि कलाकारासाठी रोजगारनिर्मिती हा समाजव्यवस्थेचा एक भाग! मनात आलं कि अशा उपयुक्ततेच्या कसोटीवर पारखून घेतलेल्या, समाजव्यवस्था भक्कम ठेवणाऱ्या, मात्र सर्वसामान्य माणसासाठी धार्मिक, सांस्कृतिक परंपरेच्या आवरणात सजवून ठेवलेल्या कित्येक गोष्टी आपल्या सर्वार्थाने वैविध्यपूर्ण देशात असतील. आपल्या देशाचा सर्वांगीण विकास होताना प्रत्येक नागरिक सुशिक्षित, सुजाण व्हावा, जातीपातींचे निकष संपावेत, मात्र परंपरा जाणीवपूर्वक जपल्या जाव्यात… कला-संस्कृतीचं जतन, मान आणि समाजव्यवस्थेचं भान म्हणून म्हणूनही!

आपल्या मूळ विषयाकडं वळताना आणखी एक प्रथा आठवते. आपल्याकडं बहुधा लिंगायत समाजात (कदाचित इतरही काही समाजात असू शकेल) टाळ-मृदंगाच्या साथीत लोक अंत्ययात्रेत भक्तीपदं म्हणतात… अशी एक अंत्ययात्रा थोडी अंधुकशी माझ्या लहानपणच्या आठवणींच्या कुपीत आहे… आम्ही घरातले कोणत्यातरी कार्यक्रमाहून घरी परतत होतो. अचानक समोरून एक अंत्ययात्रा येऊ लागली. मला आठवतंय अगदी पालखी नव्हे पण साधारण त्याप्रकारचा आकार असलेल्य़ा एका डोलाऱ्यात शव ठेवलं होतं. अर्थातच काही लोकांनी त्या डोलाऱ्याला खांदा दिला होता. अंत्ययात्रेच्या पुढच्या भागात एखाददुसरा आणि मागच्या बाजूला काही लोकांनी दोन तीन छोटे कंदील धरले होते आणि लक्षात राहिलेली मुख्य गोष्ट म्हणजे अगदी नाजूक अशा टाळ आणि मृदंगाच्याही हलक्या आवाजात काहीजण भक्तीपद गात होते. साहजिकच त्या गायन-वादन दोन्हींतही खूप जोश नव्हता. म्हणजे इकडं दक्षिण प्रांतात पाहिलेल्या प्रकाराचा उद्देश काही तिथं लागू होत नाही.

आज ह्या गोष्टीचा विचार करताना वाटतं कि ह्या सर्वोच्च गंभीर क्षणी जीवनाचं सार, सत्य सांगणाऱ्या भक्तिरचना मनाला आधार देत असाव्या. केवळ जगन्नियंत्याच्या हाती असणारी आपल्या आयुष्याची सूत्रं, आपलं फक्त निमित्तमात्र असणं, आयुष्याचं क्षणभंगुरत्व ह्या गोष्टींची मनाला जाणीव करून ह्या क्षणापेक्षा योग्य क्षण कोणता असेल!? ते मंद सूर दु:खी मनावर थोडीशी फुंकर घालत असतील, त्या रचनेच्या शब्दांतून होणारी ‘सगळं ‘त्याच्या’ हाती, आपल्या हाती काही नाही’ ही जाणीव ते दु:ख सहन करायची ताकद देत असेल, शिवाय आपल्या जगण्यात षड्रिपूंमधे आपण किती गुंतून पडायचं ह्या विचाराला चालना देत असेल! विचार करता एकूण सुदृढ समाजमन घडवण्यासाठी अशा गोष्टी केवढी मोलाची भूमिका बजावत असतील!!

‘श्रीराम जयराम जय जय राम’ किंवा ‘राम नाम सत्य है’ चा गंभीर सुरांतला लयबद्ध जप तर अंत्ययात्रेत बहुतेक ठिकाणी केलेला दिसून येतो. अशाक्षणीच्या अतीव दु:खानं गेलेल्यांच्या आप्तेष्टांचं पिळवटणारं काळीज त्या लयबद्धतेत नकळत गुंगून जात असेल आणि मन शांतावायला त्याची मदत होत असेल. मन आणि मेंदूवर होणारा संगीताचा परिणाम प्रत्येकवेळी प्रत्येकाला जाणवतोच असं नाही, मात्र तो होतो नक्कीच! म्हणून अशा छोट्याछोट्या प्रथांमधला तर्कशुद्ध आणि सूक्ष्म विचार पाहिला कि आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेपुढं नतमस्तक व्हावसं वाटतं!!

मध्यंतरी एक इंग्रजी लेख वाचनात आला ज्यात चीनमधील ‘कुसांग्रेन’ म्हणवल्या जाणाऱ्या स्त्रियांविषयी माहिती होती. ह्या स्त्रिया म्हणजे ज्यांना अंत्येष्टीच्या आधी साग्रसंगीत वाद्यवृंदासह गायन-नर्तन करायला बोलावलं जातं. अर्थातच अशावेळची गीतंही विशिष्ट प्रकारचीच असणार जी ऐकताना गेलेल्या व्यक्तीच्या आप्तेष्टांच्या भावना उफाळून येत त्यांना भरपूर रडू येऊन त्यांच्या दु:खी भावनांचा निचरा व्हायला मदत होईल. काहीवेळा अशा अघटिताच्या धक्क्यानं एखादी कुणी व्यक्ती स्तब्ध होऊन जाते आणि तिला रडायलाही येत नाही. मात्र संगीताच्या प्रभावच असा असतो कि अशी व्यक्तीही धक्क्यातून बाहेर पडून तिच्या भावना प्रवाही होत रडू लागते!

ह्या प्रथेविषयी वाचताना मला आपल्या देशातल्या राजस्थान प्रांतातली रुदाली आठवली! प्राचीन रोम, ग्रीस, युरोप, अफ्रिका, एशियामधे अनेक ठिकाणी अशा प्रथा आहेत. प्र्त्येक ठिकाणच्या प्रथेत काही ना काही फरक असणार, मात्र उद्देश एकच असावा कि संगीतासारख्या अत्यंत प्रभावी गोष्टीचा वापर करून दु:खी भावनांचा निचरा व्हायला मदत करणं! आणि… अर्थातच पुन्हा समाजव्यवस्था हा भागही आलाच!

प्रथांचा गैरफायदा घेतला जाऊन काही व्यक्तींचं होणारं शोषण हा वेगळा मुद्दा आहे! मात्र मला असं प्रामाणिकपणे वाटतं कि कोणत्याही प्रथेमागचा मूळ उद्देश हा वाईट नसावा. शेवटी काही ना काही काम मिळून प्रत्येकाच्या पोटपाण्याची व्यवस्था होणं हा उदात्त विचारच त्या ठिकाणी असावा! मात्र हे करत असताना ‘संगीत’ हे ‘अत्यंत प्रभावी’ माध्यम प्रत्येक ठिकाणी वापरण्याची चतुराई मात्र फारच कौतुकास्पद वाटते! संगीतकलेचा, तिच्या आपल्या जाणिवांशी असलेल्या नात्याचा वापर मानवी आयुष्यातल्या जन्मापासून अंतिम क्षणापर्यंत प्रत्येकक्षणी केला गेलेला पाहाताना अक्षरश: थक्क व्हायला होतं.

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बालपण देगा देवा – भाग 1 ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

 ☆ विविधा ☆ बालपण देगा देवा – भाग 1 ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

“लाजू दंगा नको कलू… आनि त्या गुबूगुबू बालाला धक्का का देतोछ…पलेल ना तो” काही वर्षांपूर्वी आमच्या घरात या आणि अशा पूर्ण बोबड्या वाक्यांची तोफ झाडली जायची. वर्गातल्या बाई… एक ओढणी ची साडी नेसलेल्या…. म्हणजेच माझी चार वर्षाची चिमुरडी मैत्रीण शाळा शाळा खेळत असायची. हॉलच्या मध्यभागी वर्तमानपत्रा सोबत येणाऱ्या वीस-बावीस पुरवण्या उभ्या आडव्या रांगेत व्यवस्थित लावून वर्ग सजलेला असायचा. एकीकडे कोपर्‍यात देवघरातील घंटा आणि एक-दोन वह्या पण ठेवलेल्या असायच्या.ज्या पुरवणीवर जे चित्र असेल ते त्या मुलाचे किंवा मुलीचे नाव.मी सुद्धा त्या वर्गातील एक विद्यार्थिनी असायचे.पण माझे स्टेटस जरा वेगळे.. त्यामुळे मला सोफ्यावर बसणे अलाऊड  असायचे आणि मधून मधून इकडे तिकडे जाणे पण!

घंटा वाजायची.. शाळा सुरू व्हायची. नंतर “छुनिता तू छगल्यांना प्लालथना छांग.” बाईंची ऑर्डर यायची. प्रार्थनेनंतर मग आमच्या बाई हजेरी घ्यायच्या

“व्यायाम कलनाला मुलगा.. झोपाल्यावल बछलेली मुलगी…. छोतं गुबुगुबू बाल… छोनाली.. लाजू…..” अन् सगळ्यात शेवटी “छुनीता गदले!”

सर्वांची मी हजर- हजर म्हणत प्रॉक्सी हजेरी लावायचे.

सकाळची ऑफिस, कॉलेज वाल्यांची गडबड संपलेली असायची आणि मी निर्धास्तपणे मोबाईल मध्ये गर्क व्हायचे. इकडे बाईंचा बोबड्या बोलात अभ्यास, बडबड गीते असं रुटीन चालू असायचं. पण मध्येच

“छुनीता, नो मोबाईल.. अभ्याछ कल अभ्याछ..! पलिच्छा तोंदावल आलीय.” असा ओरडा पण मला खावा लागायचा.

मग मधली सुट्टी व्हायची. डबा खात बसलेल्या मुलांच्या डब्यातील पदार्थ चेक करताना बाईंच्या तोंडाचा पट्टा चालू असायचा. “लोज छांगते ना, पोली भाजी आना.. छक्ती देनाले पदाल्थ आना म्हनून!… हे कुलकुले, मॅगी अछले जंकफूद आनू नका… उद्यापाछून मी तुमाला छिक्छाच कलनाले.”

कधी शाळा लवकर सुटायची. तर कधी दोन -तीन तास चालायची. बाईंची गुंजणारी अधिकारवाणी ऐकू न आल्यामुळे जरा हॉल मध्ये डोकावून पाहिलं तर बाई आपली साडी सोडून त्याचे पांघरूण करून सोफ्यावर आरामात झोपून गेलेल्या असायच्या. आता ती मैत्रिण मोठी झाली आणि आमच्या मैत्रीत अंतर पडले.

माझी एक दुसरी बाल मैत्रिण कायम स्वयंपाक घरातच घुटमळते. नेहमी आजी जवळ राहते. शनिवारी-रविवारी आई-बाबांकडे! तिचे खेळ वेगळेच असतात. ती कधी भाजीवाली… कधी हॉटेल वाली.. कधी इस्त्री वाली.. कधी धुणीभांडी करणारी मावशी… तर कधी आई -बाबां- बाळ खेळातलीआई ! तासन् तास ती या खेळात रमते. कधी माझ्या ऑर्डर प्रमाणे साउथ इंडियन.. चायनीज.. इटालियन.. पंजाबी जेवणाचे पार्सल मला पाठवून देते. मोजून पैसे घेते. कधी माझं संबोधन आजी, कधी काकू, तर कधी वहिनी, मॅम…. वगैरे वगैरे… ते तिच्या व्यवसायाप्रमाणे बदलत असते. अगदी बोबड-कांदा  नाहीये, पण र, ट, ठ,ड वगैरे कठिण अक्षर जरा वर्जच!

“वयनी लादी पुसते.पण आज कपले नाही धुनाल.आज माझं अंग थनकतंय… घली जाऊन औषध घेऊन झोपनाल… काल माझ्या नवल्यानं मला माललं बघा…उगीचच… आमतीत मीथ कमी पललं तल मालतात काअशं?”… तिच्या चेहऱ्यावरचे भाव,शब्दातून प्रकट होणारं व्यथित मन, मला फार काही सांगून जात असतं. ती वठवणाऱ्या सगळ्याच भूमिकेतील तिचा अभिनय, कल्पनाशक्ती खरंच दाद देण्यासारखीच असते. मोठेपणी ती छान अभिनेत्री बनेल असा मला विश्वास वाटतो.

पण तिच्या आईला केवढं टेन्शन!”काकू हिला कधी कळणार हो. एक दिवशी तिनं आपलं रडगाणं सुरू केलं. “हिला कित्ती पोएम, बडबड गीतं मी शिकवलीत. नको तेव्हा म्हणते. पण आमच्या दोघांच्या ऑफिसातले सहकारी.. चार-पाच जण.. आले होते. हिला पोएम म्हणण्यासाठी किती आग्रह झाला. पण ही पठ्ठी त्यांच्यासमोर चक्क झाडू- फरशी करायला लागली. खेडवळ भाषेत बोलायला लागली.आम्हाला इतकं लाजल्यासारखं झालं. दोन्ही घरात ढिगानं खेळणी आहेत. पण ही त्यांना हात पण लावत नाही.

“मग तिनं काय करायला हवंअशी तुझी अपेक्षा आहे?

अगं या लॉक डाऊनमुळं तिनं अजून शाळेचे तोंड सुद्धा पाहिलेले नाही.तिला मित्र-मैत्रिणी नाहीएत. आजी कडं मजेने राहते.कधी हट्ट नाही कि रडणं नाही आणि सगळीच मुलं आपण गाणं म्हण म्हटलं की म्हणतातच असं नाही. नाही तिला निर्जीव खेळण्यात इंटरेस्ट. पण तू तिची स्मरण शक्ती, तिचा अभिनय पाहिला नाहीस का? समोर जी माणसे दिसतात,जसे वागतात,त्याला कल्पनाशक्तीची जोड देऊन.. त्या भूमिकेत शिरणं ही साधीसुधी गोष्ट नाही. तिचा हा गुण तुला कधी जाणवला नाही? हे असं कायम नाही राहणार. चिंता करू नको. मोठी झाली की ती आणखी वेगळ्या वेगळ्या भूमिकेत वावरु लागलेली दिसेल. तिच्या कलागुणांना प्रोत्साहन दे. आणि तिला सायकॉलॉजिस्टकडं घेऊन जाऊन कौन्सलिंग करुन घेण्याचा वेडा विचार सोडून दे. तू स्वतःचं बालपण आठव आणि आईच्या भूमिकेत शिरुन तिला समजून घे.”माझं

बोलणं बहुतेक तिला पटल्या  सारखं वाटलं.

            … क्रमशः

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-5 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-5 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आता आमच्या ट्रिपचा शेवटचा टप्पा होता. सकाळी साॅ मिल बघायला गेलो. जंगलातील सांगवान सारखे पालव लाकूड तोडून त्याच्या फळ्या समुद्रावरील जहाजातून इंग्लंडला  नेण्याच्या दृष्टीने ब्रिटिशांनी ही मिल उभारली होती.तिथे रेल्वे मार्ग ही ब्रिटिशांनी केला होता. अजूनही ती मिल चालू आहे. पाल्लव लाकूड खूप टिकाऊ आणि वाळवी न लागणारे असल्याने त्याला खूप किंमत आहे. आम्ही मिल पाहिली आणि बाहेर असलेल्या लाकडी वस्तूंच्या दुकानात थोडीफार खरेदी केली. आत्तापर्यंतचा प्रवास समुद्रावर झाला होता.इतका समुद्रप्रवास मी तर प्रथमच केला होता. मन सतत समुद्रावर तरंगतच होतं जणू! प्रसन्न हवा होती, त्यामुळे फिरणे कंटाळवाणे वाटले नाही.

परतीच्या प्रवासात पाॅंडेचरी बीचवर राहायला मिळाले. तेथेही पोंगल सणाच्या सुट्टी मुळे माणसांचा समुद्र च होता! उत्साही तरुणाई येथे एन्जॉय करत होती.. ऑरोव्हिलाची छोटीशी ट्रीप करून आम्ही चेन्नई ला जाण्यासाठी निघालो.

वाटेत महाबलीपुरम चे मंदिर आणि इतर मंदिराचे भग्नावशेष पाहून भारतीय संस्कृती किती प्राचीन आहे हे दिसून येत होते. तिथून चेन्नई ला आलो. एक दिवस चेन्नई मुक्काम होता.

या दहा-बारा दिवसात समुद्राची किती रुपे डोळ्यासमोर येत होती!  कॅमेरात स्वतःला बंदिस्त करून त्या प्रत्येक ठिकाणाची साक्ष आम्ही इथे आल्यावर पाहू शकत होतो.

अंदमानच्या ट्रीपचे ध्येय जरी ‘सावरकरांचा सेल्युलर जेल’ बघण्याचे असले तरी निसर्गाचा हा समुद्रावरचा नजारा बघणे हे सुद्धा अवर्णनीय सुख होते. रोज बघितलेल्या त्या समुद्राच्या  लाटा माझ्या मनात विचारांच्या असंख्य लाटा उमटवत असत! त्या लाटा मनाच्या किनार्या वर आपल्या पाऊलखुणा उमटवत होत्या, त्यांना थोडं कोरीव रुप देण्याचा हा माझा प्रयत्न!

समाप्त

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नाते- इंद्रधनुष्यी बंध ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ. ज्योत्स्ना तानवडे

 ☆ मनमंजुषेतून ☆ नाते- इंद्रधनुष्यी बंध ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ 

जे मनामनाला जोडते ते नाते

जे चराचराला जोडते ते नाते !!

असंख्य वेगवेगळी नाती जन्मापासून आपल्याला अवघ्या विश्वाशी बांधून टाकतात. या प्रत्येक नात्याचे

रूप वेगळे,भाव वेगळा,

रीत वेगळी प्रीत वेगळी !

आपण आयुष्यात असंख्य नात्यांनी एकमेकांशी बांधले गेलेलो असतो. या प्रत्येक नात्याचे स्थान, त्याचे महत्व, त्याची गरज, त्याचे निभावणे हे वेगवेगळे असते.

सर्वात प्रथम आपण ईश्वरीतत्त्वाशी बांधले गेलेलो असतो. त्यानंतर आयुष्यात महत्त्वाचे असते ते आई-वडिलांचे श्रेष्ठ आणि पवित्र नाते.

 माय-बाप असती

 सर्वस्व या जन्माचे

 त्यांच्यामुळेच होई

 सार्थक या जीवनाचे !!

आई-वडील आपल्याला उत्तम आरोग्य, उत्तम संस्कार, उत्तम विचार, उत्तम शिक्षण यांची मौल्यवान शिदोरी देऊन या विश्वाच्या प्रवासाला सोडतात. त्यामधे आपल्या आयुष्याची भावनिक बाजू ही आईने तर व्यावहारिक बाजू वडिलांनी व्यापलेली असते. व्यवहार म्हटले की रूक्षपणा आलाच. पण सर्वच गोष्टी नुसत्या भावनेवर चालत नाहीत तर व्यवहार हा पहायलाच लागतो. त्यामुळेच वडील थोडे कठोर वाटतात. पण नारळातले पाणी किंवा फणसातल्या गऱ्यांप्रमाणे त्यांचे मन असते.

‘दुधावरची साय’ म्हणजे तर संसाराचे संचित असते. नातवंडे ही आजी-आजोबांचे सुख निधान असतात, तर नातवंडांना आजी-आजोबा अतिशय प्रिय असतात. आजच्या बदलत्या वातावरणात नातवंडे पाळणाघरात तर आजोबा वृद्धाश्रमात हे दुर्दैवी वास्तव आहे.तरीही दोघांना एकमेकांची ओढ असते म्हणूनच ते एकमेकांना भेटायची कारणेही हुडकत असतात.

आपल्या आयुष्यातले आणखी एक लोभस नाते आहे मैत्रीचे. मैत्री अखंड विश्वासाची साथ देते, कायम मदतीचा आधाराचा हात देते, निरपेक्ष प्रेम देते. असे मैत्र  ज्यांना लाभते ते खरच भाग्यवंत असतात. मैत्रिणीने,’ मी आहे ना? काळजी करू नको,’ असे नुसते म्हटले तरी हे शब्द आपल्याला संजीवनी सारखेच वाटतात.

आपल्या वाटचालीत आपल्या मदतीला येते ती आपली कामवाली सखी. अनेक वर्षांच्या सहवासाने आपणही तिच्याशी एखाद्या मैत्रिणी सारखे वागू लागतो.तिच्याजवळ मन मोकळे करू लागतो. ती पण स्वत:ची सुखदुःखे आपल्याशी वाटून घेते आणि कामाबरोबरच जीवाला विसावा शोधत रहाते.

अशी असंख्य नाती आपण रोजच्या जगण्यात निभावत असतो.

निसर्गाशी आपले नाते हे तर जिवाभावाचे असते. निसर्ग आपला माय बापच आहे. तो आपले पालनपोषण करतो, रक्षण करतो. त्यामुळे त्याचेही संवर्धन, रक्षण करणे हे आपले महत्त्वाचे  कर्तव्य ठरते.

आपण अशा रीतीने आपल्या आयुष्यात घरातल्या, घराबाहेरच्या,निसर्गातल्या घटकांशी वेगवेगळ्या नात्यांनी बांधले गेलेले असतो. या प्रत्येक नात्याचा रंग वेगळा, गंध वेगळा, प्रत्येकाची नजाकत वेगळी आणि त्यामुळेच त्यातून मिळणारी अनुभूती पण वेगळीच असते.

“पैशाने श्रीमंत होणे खूप सोपे असते.

नात्यांनी समृद्ध होणे तितकेच कठीण असते.”

म्हणूनच आपल्याला लाभलेल्या नात्यांची समृद्धी आपण जपली पाहिजे. एकमेकांना वेळ देणे, एकमेकांचे ऐकून घेणे, मदत करणे, एकमेकांचे विचार नाही पटले तर सोडून देणे, माफ करणे अशा अनेक गोष्टींनी ही नाती जपणे शक्य आहे. असे म्हणतात ज्यांना आयुष्यात शांती हवी असेल  त्यांनी वादविवादात एक पाऊल मागे घ्यावे. पण इतरांकडून ती अपेक्षा करू नये. त्यामुळे आपण नात्यांचा आनंद घेऊ शकतो आणि इतरांच्याही आनंदात भर घालू शकतो.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘रथसप्तमी’ धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी

डॉ. व्यंकटेश जंबगी

संक्षिप्त परिचय

शिक्षा – बी.ए.एम्.एस्. एम्.ए.(संस्कृत), आयुर्वेदाचार्य, पी.जी.डी.एच्.ए., निवृत्त प्राध्यापक

प्रकाशित साहित्य –
पावसाचं वय..काव्यसंग्रह, तुझं घर माझं घर..कथासंग्रह, व्रात्यकथा….विनोदी कथासंग्रह, पाच प्रयोगक्षम एकांकिका, बालमंच..बाल एकांकिका, विषय विविधा(निबंध), बीसीजीपासून इसीजीपर्यंत…आरोग्य लेखसंग्रह.

पुरस्कार – 1. उत्कृष्ट वाड्मय निर्मिती..महाराष्ट्र शासन 2018. 2. बाल साहित्य परिषद,कोल्हापूर. 3. उत्कृष्ट एकांकिका लेखन..नाट्यदर्पण,मुंबई. 4. उत्कृष्ट नाट्यछटा लेखन.. नाट्यसंस्कार,पुणे. 5 . आरोग्य लेख..शतायुषी,पुणे. 6. कविभूषण..फ्रेंडस् सर्कल,पुणे. 7. जीवन गौरव..ज्येष्ठ नागरिक वाचनालय,जयसिंगपुरस्कार

अन्य – 
माजी अध्यक्ष..चंद्रकिरण काव्यमंडळ,तळेगाव दाभाडे / माजी अध्यक्ष..संस्कार भारती,सांगली
शिवाजी विद्यापीठ युवक महोत्सवात एकांकिका स्पर्धा परिक्षक / आकाशवाणी, सांगली, विविध साहित्यिक सादरीकरण.

 ☆ विविधा ☆ ‘रथसप्तमी’ धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी ☆ 

* धार्मिक महत्त्व *

“यद्यज्जन्यकृतं पापं मया सप्तसु जन्मसु ।
तन्मे रोगं च शोक॑ च मा करी हन्तु सप्तमी ।।”

अर्थात “गेल्या सात जन्मात मी जे काही पाप केले असेल, त्याचे फळ (परिणाम) म्हणून रोग, दुःख इत्यादि काहीही होऊ नये, माझ्या पापाचा नाश व्हावा” अशी सूर्याला
प्रार्थना करतात, तो दिवस म्हणजे माघ शु. सप्तमी म्हणजेच ‘रथसप्तमी’ !

मकरसंक्रांतीनंतर उत्तरायण सुरु होते. सूर्य आपल्या सात घोडे जोडलेल्या रथाने ‘अरुण’ या सारथ्यासह उत्तरेकडे प्रयाण करु लागतो. हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. आदिती आणि काश्यप ऋषी यांचा पुत्र असलेला हा सूर्य …. याचा जन्मदिवस म्हणजे रथसप्तमी ! या दिवशी सूर्याला अर्ध्य देतात. सूर्योदयापूर्वी उठून फुले, चंदन, कापूर इ. अर्पण करतात. कोणी सूर्याची प्रतिमा रथात ठेवतात. कोणी सूर्याच्या रथाची रांगोळीकाढतात. पूजा करुन खिरीचा नैवेद्य दाखवितात. मकरसंक्रांतीपासून सुरु झालेले कार्यक्रम हळदी कुंकू, लुटणे इ. रथसप्तमीला समाप्त होतात. रथसप्तमी दिवशी व्रत म्हणून काहीजण उपवासही करतात. सूर्य ही तेज, उर्जा देणारी देवता आहे. सूर्यदेवता
वर्षमर आपल्याला प्रकाश देते. वनस्पती, अन्नधान्य, फुले, फळे उत्पन्न करण्यास सहायभूत ठरते. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. ”गायत्री मंत्र” हा सूर्याला उद्देशून असलेला प्रार्थनास्वरुप मंत्र आहे. बुध्दीला प्रेरणा देण्याची त्यात प्रार्थना आहे.

* वैज्ञानिक महत्व *

‘आरोग्य’ हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वैज्ञानिकदृष्ट्या आहे. कारण सूर्याची सकाळची कोवळी उन्हे (Ultraviolet rays) ‘ड’ (D) जीवनसत्व देणारी आहेत. हे सर्वपरिचित आहे. उत्तरायणात सूर्यापासून निघणारी लंबरुप किरणे हवेतील व मातीतील जंतूंचा नाश करतात. वनस्पतीमध्ये जी कर्बग्रहण (Photosynthesis) ही अन्न निर्माण करण्याची क्रिया असते. त्यामध्ये सूर्याची मदत मोठ्या प्रमाणात होते. सर्व ग्रह परप्रकाशी असून त्याना प्रकाश देणारा सूर्यच आहे. आजकाल ‘सोलर’ सिस्टीम भरपूर प्रमाणात वापरली जाते. ती उर्जा सूर्याचीच ! आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सूर्याचेच स्थान अग्रगण्य आहे. एका संस्कृत सुभाषितकाराने म्हटले आहे –

“आदित्यस्य नमस्कारान्‌ ये कुर्वन्ति दिने दिने ।
जन्मान्तरसहस्रेशु दारिद्र्यं नोऽपजायते ।।”   

अर्थ – “जो नित्यनेमाने रोज सूर्यनमस्कार घालतो त्याला सहस्र जन्मापर्य॑त दारिद्र्य येत नाही.” याचा मतितार्थ असा की सूर्यनमस्काराने बुध्दी, बल, क्रीयाशक्ती (Stamina) वाढतात. मग अर्थातच मनुष्य कष्ट करतो .. मग तो दरिद्रि कसा राहील ? थोडक्यात वैज्ञानिकदृष्ट्या सूर्य ही जीवसृष्टीची उर्जा आहे. सूर्य प्रकाश देतो. (पण कघीही ‘लाईट
बिल’ पाठवीत नाही.) त्याला कृतज्ञता म्हणून रथसप्तमी साजरी करावी. कोणी नुसता चहा पाजला तरी आपण Thanks म्हणतो.. हा सूर्यनारायण वर्षभर इतके काही करतो
मग एक दिवस कृतज्ञता व्यक्त करायला नको ? म्हणून रथसप्तमीलाच “आरोग्यसप्तमी” असेही म्हणतात.

जाता जाता भगिनींसाठी एक ‘टीप’ देतो. जर रथसप्तमीदिवशी नवी साडी मिळली, तर सात साड्या मिळतात म्हणे … !

© डॉ. व्यंकटेश जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-4 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-4 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

या ट्रीप मधील पुढील आकर्षण राॅस आयलंड हे होते. तिथे अनुराधा राव मॅडम ना भेटायचे होते. निसर्गाच्या सान्निध्यात पशू-पक्षी आणि प्राण्यांबरोबर संवाद साधून जीवन आनंदात व्यतीत करणारी अनुराधा कशी असेल ते बघण्याची उत्सुकता होती. या आयलंडवर ब्रिटिशांनी उभारलेल्या बऱ्याच इमारतींचे भग्नावशेष पहायला मिळाले. बेकरी, प्रिंटिंग प्रेस,पाॅवर हाऊस, चर्च, बरॅक्स अशा विविध इमारती होत्या.

युध्दाच्या  काळात त्यातील काही  नामशेष झाल्या तर काही त्सुनामी, वादळे यामुळे नाश पावल्या.  हे आयलँड बरेच खचल्यासारखे झाले आहे. तिथे फारसे लोक राहात नाहीत. मोर, हरणे, ससे, खारी या सुद्धा अनुराधा मॅडमच्या हाकेला ओ देतात ही गोष्ट विशेष वाटली. त्या प्राण्यांना खाऊ घालण्यासाठी मोठ्या पिशवीत खाऊ घेऊन फिरत असतात. खरं निसर्गप्रेम त्यांच्यामध्ये दिसून येते.अनुराधा मॅडम नी आम्हाला तेथील खूप छान माहिती दिली. तिथे आम्ही भरपूर फोटो काढले.

पोर्ट ब्लेअर सोडण्यापूर्वी आम्ही एक संध्याकाळ वांडूर बीचवर गेलो होतो. येथील किनारा खूप मोठा, शुभ्र पांढरी वाळू असलेला होता.आम्ही शंख, शिंपले वेचत फिरलो. खुप फोटो काढले. समुद्रकिनारी उंच उंच झाडे होती.

समुद्रावर गेलं की सूर्यास्त होईपर्यंत हलायचंच नाही हे ठरलेले असे.

तो सूर्याचा गोळा अस्ताला गेला की परतायचं ! बीच वर शहाळ्याचे पाणी, खोबरे याचा मनसोक्त आस्वाद घेतला!

                      क्रमशः….

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ रिडेव्हलेपमेंट.. ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

सौ. गौरी सुभाष गाडेकर

 ☆ क्षण सृजनचा ☆ रिडेव्हलेपमेंट.. ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

गेल्या काही वर्षांपासून मुंबईत इमारतींच्या रिडेव्हलपमेंटची लाट आली आहे.

जुन्या इमारती बिल्डर ताब्यात घेतात. त्या पाडून त्याजागी उंच इमारती  बांधतात. जुन्या रहिवाशांना पूर्वीपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा फ्लॅट दिला जातो. उरलेले फ्लॅट बाहेरच्या माणसांना विकतात.

इमारत तयार होईपर्यंत तीन-चार वर्षं तरी जातात. तेवढ्या अवधीतील तात्पुरत्या निवासासाठी, जुन्या रहिवाशांना भाड्याची रक्कम दिली जाते.

आमच्या जवळची एक इमारत रिडेव्हलपमेंटला गेली. जुने रहिवासी मिळाला तो फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे राहू लागले. नवीन इमारत तयार होण्याची वाट बघत.

इमारत पाडली. नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. आणि अचानक बांधकाम बंद  पडलं. कोर्टकचेऱ्या, स्टे वगैरेंच्या भोवऱ्यात सापडून सगळं काही ठप्प झालं. हळूहळू बिल्डरकडून भाड्याचे चेक मिळणंही बंद झालं.

आठ-दहा वर्षं अशीच गेली. भाड्याच्या फ्लॅटचं नूतनीकरणही कठीण  होऊ लागलं. एकाच फ्लॅटमध्ये दोन-तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहायला द्यायला फ्लॅटचे मालक का-कू करू लागले. मग पुन्हा नवीन फ्लॅट शोधणं, सामानाची हलवाहलव वगैरे  व्याप.

या सर्व घडामोडींवरून मला ही गझल सुचली. एका स्ट्रक्चरल विषयावरील कविता स्ट्रक्चर्ड फॉर्म असलेल्या गझलमध्ये सुचावी, हा एक योगायोग.

कविता सुचली अशी :

 ☆ रिडेव्हलपमेंट ☆

एक होती कॉलनी ती, नांदती तेथे घरे

लिंबलोणही झुलत होता,गात होती पाखरे

 

दाखवी आमिष कोणी, खैरातली आश्वासने

कित्येक होते फायदे, फसवे किती काही खरे

 

झाला विरोधही तिडकीने संख्याच जिंके शेवटी

लोकशाहीचा नियम हा सत्य ते नेहमी हरे

 

गुंडाळूनी संसार सारे घेतले पाठीवरी

पांगले दाही दिशांना,सोडून गेले आसरे

 

कोण जाणे काय झाले ठप्प झाले बांधणे

गगन चुंबाया निघाले -स्वप्न होई  लत्करे

 

भोवताली पूर्ण झाली गगनचुंबी ती घरे

भोग भाळी आमुच्या का, का प्रतीक्षा सांग रे

 

लोटली कित्येक वर्षे फक्त सांगाडा उभा

एक सांगाडा उभा अन सोबतीला चौथरे

 

लागला डोळा दिसू अंत आता जीवनाचा

श्वास सरू दे ‘त्या’ घरी हीच आता आस रे

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ काय हरकत आहे…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

 ☆ विविधा ☆ काय हरकत आहे…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

विश्वविधात्याने विश्वाच्या पसा-यातील अनुरेणू एवढा नगन्य तुकडा आपल्या हाती सुपूर्द करून आपल्याला या धरेवर जीवन व्यथीत करायला या मोहमयी धरेवर धाडले आहे. याची आपणास जाणीव असायलाच हवी. इथे धाडतानाही त्याने आपल्याला रिक्त हातानेच पाठवले आणि इथून निघताना ही रिक्त हातानेच परतण्याची सक्त ताकीद देऊन ठेवली आहे. ती मोडण्याचे धाडस आपण करूच शकत नाही. कारण त्याने आपल्या आयुष्याची दोरी त्याच्या हातातच ठेवली आहे. इथे येतानाही विधात्याने आपल्याकडून आयुष्याच्या मर्यादेचा करार करून परतीची आपणास माहीत नसणारी तारीख  नोंदवून ठेवली आहे. तिचेही आपण उल्लघण करू शकत नाही. आपण इतके दुबळे आहोत हे माहिती असूनही माणूस किती तोरा मिरवतो यांचा आपल्या सहीत सर्वांचं अनुभव आहे.आध्यामवाद्यानी याचीअनेक वेळा जाणीव करून देवून ही कोणीच फारसा जागा होताना दिसत नाही. करण माणूस हा शेवटी माणूस च आहे. चतूर आहे. कर्तृत्व संपन्न आहे.सगळे मान्यकरूनही तो आपणच आपली तयार केलेली “प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे” ही म्हण विसरायला तयार नाही. कारण तो सातत्याने प्रयत्नवादीच राहीला आहे.पुढेही अनेक पिढ्या तो तसाच रहाणार आहे.त्याला माहीत आहे.आपल्या हाती ” काळ थोडा आणि सौंगे फार” आहेत. सामर्थ्याची दारू ठासून भरलेल्या शिवाय आयुष्याच्या रणांगणावर कर्तव्याच्या तोफा विजयी उन्मादाने धडाडत नाहीत.

इवल्याशा कर्तव्याचा साकव बांधून संकटाचा महासागर पार करायला निघालेलो आम्ही लोक आहोत.सामना महाबलीशी आहे.जिंकण्याची आशा तर

मूळीच नाही.पण जन्मताच मरण पदराशी बांधून घेतल्याने विजय पराजयाची तमा बाळगून लढण्याने काय हाशील होणार आहे.मग आहे ते कर्तव्य सोडून कशाला पळ काढायचा? लढा,कटा,मरा.  निदान त्या मुळे तरी संघर्ष करणा-यांच्या यादीत तुमचे नाव नोंदवले जाईल.तुमची पुढची पिढी ठरवेल ते योग्य की आरोग्य ते.फक्त एक लक्षात ठेवा तुमची लढाई लोक कल्याणासाठीच असायला हवी.देह तुमचाच आहे.तो असातसा खर्ची पडणारच आहे.पण जाता जाता काळाने दिलेली भेट स्विकारताना आनंदी व्हायला आणि समाधानाने जयला काय हरकत आहे.

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-3 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

☆ विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-3 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

छोट्या बोटीतून जाताना आम्हाला भीती वाटत होती,पण त्या बोटीवर काम करणारे लोक मात्र लीलया या होडीतून त्या होडीत जा -ये करत होते.

दूरवर दिसणारी छोटी छोटी बेटं हिरवीगार दिसत होती. त्या हिरवाईचे प्रतिबिंबच जणू पाण्यात दिसत होते! या बीच वर काचेच्या बोटीतून समुद्रात खोलवर घेऊन जातात, तेव्हा पायाशी असलेल्या काचेतून समुद्राच्या तळाशी असलेले तर्हेतर्‍हेचे रंगीबेरंगी मासे, कोरल्स, कासवं आणि खूप रंगीत रंगाचे दगड-गोटे आणि काय काय पहात होतो ते सांगता येत नाही. त्या बोटीतून बाहेर पडल्यावर आम्ही तिथे स्नाॅर्केलिंगही केले. समुद्राच्या तळातील दौलत बघता-बघता चार पाच तास कसे गेले कळलंच नाही.

या नंतर पोर्टब्लेअर चा मुक्काम संपवून आम्ही दुसऱ्या दिवशी राॅस आयलंड बघण्यासाठी निघालो.

क्रमशः…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print