मराठी साहित्य – विविधा ☆ ऊंच माझा झोका ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

☆  विविधा ☆ ऊंच माझा झोका ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

सरस्वती आमच्या साक्षरता वर्गात रोज यायची.

ऊंच, सडसडीत, अनवाणी, विस्कटलेले केस, ठिकठिकाणी जोड लावून शिवलेलं मळकट लुगडं. पण डोळ्यात विलक्षण चमक. काम करून करून घट्टे पडलेले हात पण ओंजळीत ओली स्वप्नं!!

तांबापुरा झोपडपट्टीत राहण्यार्‍या, मोलमजुरी करणार्‍या महिलांना, कित्येकवेळा आमच्या वर्गात येण्यासाठी, विनवण्या कराव्या लागायच्या.. शिकाल तर वाचाल.. हे जीव तोडून पटवून द्यावं लागायचं..

त्यांची न येण्याची कारणंही खूप होती. दारु पिण्यार्‍या नवर्‍याचा धाक, मारझोड. वस्तीतल्याच लोकांकडून मिळणारे टोमणे… संशय… एक ना अनेक.

पण सरस्वती मात्र या सगळ्यांवर मात करून, धावत पळत आमच्या क्लासला यायची…. पाटीवर छान अक्षरं गिरवायची… धडे वाचायची.. कविता म्हणायची.

समजलं नाही तर प्रश्न विचारायची… तिची जिद्द पाहून मीही थक्क व्हायचे…  लहान असतानाच एका बिजवराशी तिचं लग्न लावलं गेलं… सुख म्हणजे काय असतं हे कधी कळलंच नाही… ना माहेरी ना सासरी.. जीवन म्हणजे नुसता चिखल….

एक दिवस ती मला म्हणाली, “ताई मला यातून सुटायचंय्.. मला माझ्या जगण्याचा अधिकार मिळवायचाय्… मला तर एक चांगलं आयुष्य जगायचच आहे आणि जमेल तेव्हढं माझ्यासारख्यांनाही मला बरोबर घेऊन चालायच्ंय्….”

आमच्या साक्षरता वर्गातून तिच्या स्वप्नांना एक पायरी मिळाली फक्त.. पण तिचा प्रवास खूप लांबचा होता. खाचखळग्यांचा दगड गोट्यांचा होता… पण तिची पावलं घट्टं होती… मधून मधून ती मला भेटायला यायची…

ग्राम पंचायतची निवडणुक तिने लढवली… ती जिंकली… सरपंच झाली. महिला सरपंचाचा मान तिला मिळाला… तिने हे सरपंचपद नाकारावं म्हणून तिला अनेक धमक्यांना सामोरं जावं लागलं… पण ती ढळली नाही…. तिने अत्याचारित महिलांसाठी अल्पबचत गट तयार केले… बँकांकडून सहाय्य मिळवलं…  अनेकांच्या गुणांचं संकलन करून या माध्यमातून तिने त्यांना सक्षम बनवण्याचा विडा ऊचलला… अंगणवाडीतही तिचा महत्वपूर्ण सहभाग  होता…

बघता बघता सरस्वतीच्या स्वप्नांचा आलेख ऊंच ऊंच होत गेला…. आता ती सरस्वती बाई झाली होती…

ती एका गळीत समाजाची आधारभूत बनली होती…. “माय” माऊली संबोधली जाऊ लागली….. मी टीव्ही लावला…. ऊंच माझा झोका या कार्यक्रमात तिचा सत्कार होणार होता…. पुरस्कार चिह्न हातात घेऊन आपलं मनोगत व्यक्त करणार्‍या  सरस्वतीच्या डोळ्यात आजही तीच चमक होती….. मी ऐकत नव्हतेच एक ऊंच गेलेला झोका पाहत होते…. फक्त…. पाहता पाहता डोळे भरले… या झोक्याला मी फक्त एक हलका धक्का दिला होता……!!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

१९/०१/२०२१

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-2 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆  मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-2 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

बाबा हरहुन्नरी होते. ते चांगले लेखकही होते. त्यांची पत्रे वाचणे हा माझा एक हळवा अनुभव असायचा. कविताही करायचे. विशेष म्हणजे त्यांच्या कविता छंदोबद्ध,  शार्दूलविक्रीडित वृत्तात असायच्या. अप्रतिम अक्षर, मराठी आणि इंग्लिश पण. घोटीव, मोत्यासारखे. बघत रहावे असे. घडलेले प्रसंग, आयुष्यातला एखादा ह्दयस्पर्शी प्रसंग इतका छान वर्णन करून सांगायचे की आम्ही गुंग होऊन ऐकत रहायचो. ते एक उत्तम नाट्यकर्मी होते. त्याकाळी केशवराव भोसले नाट्यगृहात देवमाणूस,  तुझे आहे तुजपाशी,  सारं कसं शांत शांत अशा अनेक नाटकातून त्यांनी कामे करून प्रचंड टाळ्यांचा कडकडाट घेतला आहे. ते एक उत्तम हार्मोनियम वादक होते. तसेच नाट्यसंगीत ही त्यातल्या ताना आणि आलापांसह म्हणायचे. एकदा बाबा एक नाट्यगीत बाहेरच्या खोलीत म्हणत होते,  आतून आईला वाटले, रेडिओवर लागलंय, म्हणून आई म्हणाली “अहो, रेडिओ जरा मोठा करा..”

चित्रकला हा त्यांचा आणखी एक गुण. त्यांनी कोळशानी रेखाटलेलं रविंद्रनाथ टागोरांचे रेखाचित्र इतके हुबेहूब आहे कि टागोरांच्या चित्राच्या डोळ्यांतून व्यक्त होणारे वात्सल्यपूर्ण भाव अजूनही,  इतक्या वर्षांनी सुद्धा तसेच जाणवतात. राजूनं ते रेखाचित्र जपून ठेवले आहे.

आमची आजी, म्हणजे बाबांची आई गेली, तेव्हा सगळ्यांत लहान आत्या 2 वर्षाची होती. ती एकसारखी आई आई म्हणून रडत होती. तिला आई दाखवावी म्हणून या भावानं, आजीचा अंगठ्याच्या वरच्या पेराएवढा लहान फोटो होता,  त्यावरून पेन्सिलीने फोटो म्हणजे आजीचं चित्र काढलं. आईचं इतकं खरं आणि तंतोतंत रूप बघून सगळीच भावंडे आईला बघून रडू लागली. ही आठवण एकदा बाबांनीच सांगितली आहे. आजीचा तो एकच फोटो आमच्या घरात कोल्हापूर ला उज्वलनं, माझ्या भावानं जपून ठेवलाय.

क्रमशः…

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ते” होते म्हणून – “निवेदिता” भाग-3☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

☆ विविधा ☆ “ते” होते म्हणून – “निवेदिता” भाग-3 ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे 

सिंध प्रांतात जन्मलेले पाकिस्तानी नागरिक पण मनानं, विचारानं पक्के भारतीय असणारे “तारिक फतेह” यांची मुलाखत बघत होते. एके ठिकाणी ते म्हणाले, “आपली संस्कृती केवढी महान आहे याची जाणीव भारतीयांनाच नसेल, तर दुसरा कुणी काय इलाज करणार यावर?”

हे ऐकून मला भगिनी निवेदितांची आठवण आली. मूळच्या आयरिश, पण इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या नोबल कुटुंबातील मुलगी “मार्गारेट नोबल” विवेकानंदांची व्याख्यानं ऐकून त्यांच्या कार्यात सहभागी व्हायला भारतात आली आणि “भगिनी निवेदिता” झाली हे बहुधा सगळ्यांना माहीत असतं. पण त्यांच्या कार्याची व्याप्ती इतिहासाचं पाठ्यपुस्तक आपल्याला सांगत नाही. निवेदता मुळात एका शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या त्यामुळे भारतात त्यांनी विवेकानंदांच्या सांगण्यावरून प्रथम मुलींसाठी शाळा सुरू केली. स्त्रीशिक्षणाचं हे कार्य अवघडच होतं आणि निराशा पदरात टाकणारं. पण त्यांनी ते मोठ्या उत्साहाने केले.. वाढवले. कलकत्त्यात प्लेगची साथ आली तेव्हा त्यांनी “Do’s” and “Don’t s” चे पोस्टर्स बंगालीत ठिकठिकाणी लावले. घरोघरी जाऊन, रस्त्यावर स्वतः स्वच्छता केली, औषधफवारणी केली. वाड्यावस्त्यांमधून हिंडून लोकांची शुश्रुषा केली.

सशस्त्र क्रांतीकारकांच्या त्या आश्रयस्थान होत्या; ज्या क्रांतीकारकांमधे विवेकानंदांचे भाऊही होते. त्या काळी नुकत्याच सुरू झालेल्या “रामकृष्ण मिशन” ला सरकारचा रोष ओढवून घेणं परवडणारं नव्हतं कारण कार्य थांबून चालणार नव्हतं. म्हणून रामकृष्ण मिशन ने अधिकृतपणे निवेदितांचा मिशनशी काही संबंध नाही असं पत्रक काढलं. पण मिशनच्या संन्यस्त कार्यकर्त्यांनी त्यांना व्यक्तिगत आयुष्यात सदैव साथच दिली आणि निवेदितांनी विवेकानंदांच्या आईला अखेरपर्यंत सांभाळले.

त्यांना चित्रकलेची उत्तम जाण होती. अनेक नामवंत चित्रकार त्यांना मानत. निवेदितांचा सदैव आग्रह असे, की भारतीय कलाकारांनी आपलं भारतीयत्व सोडू नये. मग ती कला चित्रकला असो, संगीत असो, साहित्य असो…. या सर्व क्षेत्रात भारतीय संस्कृती इतकी समृद्ध आणि विविधतेने नटलेली आहे, की इतरांचं अनुकरण करण्याची भारतीयांना गरज नाही. फक्त कलाकारांनी नव्हे, तर एकूणच भारतीयांनी आपली संस्कृती सोडू नये. पाश्चिमात्यांचं आंधळं अनुकरण करू नये हा त्यांचा आग्रह होता. चित्रकलेच्या क्षेत्रातलं त्यांचं योगदान मोठं होतं. (प्रत्यक्ष चित्रांच्या स्वरुपात नाही.. तर अनेक नामवंत चित्रकारांना केलेल्या मार्गदर्शनाच्या स्वरूपात)

इंग्लंडच्या पार्लमेंटमधे भारताबद्दल माहिती देऊन इंग्रजांकडून त्याच्यावर अन्याय होतोय हे निवेदितांच्या व्याख्यानांमुळंच लोकांना कळलं.

आयुष्याच्या संध्याकाळी त्या काहीशा एकट्या पडलेल्या होत्या. अंतकाळचे त्यांचे शब्द होते, “बोट बुडतेय.. पण मला सूर्योदय होताना दिसतोय”

भारताला स्वातंत्र्य मिळालं.. पण भारतीयांमध्ये स्वत:च्या संस्कृतीबद्दल अभिमान असावा हे त्यांचं पोटतिडकीने सांगणं कितपत यशस्वी झालं…. कुणास ठाऊक!

कारण संस्कृती म्हणजे फक्त नऊवारी साडी आणि नथ किंवा धोतर नव्हे.. देवदेवतांसाठी किंवा महापुरुषांसाठी, सणवारांच्या निमित्ताने काढलेल्या उन्मादी रॅल्या नव्हेत.. जी पिढ्यानपिढ्या रक्तातून सळसळते आणि विचार, विवेकाच्या काठांमधून वाहते ती संस्कृती निवेदितांना अभिप्रेत होती.

काही वर्षांपूर्वी कोलकत्याला गेले, तेव्हा पूर्ण शहरात निवेदितांच्या खुणा शोधण्याचा निष्फळ प्रयत्न केला. कालौघात हे शहर, हा देश त्यांना विसरणं स्वाभाविकच आहे… हे समजून घेतोच की आपण! मीही घेतलं.

© सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

मो – 7499729209

(लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मत आहेत.)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 13 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 13 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

प्रात्यक्षिक परीक्षेची माझी तयारी जोमाने सुरु होती.  माझी त्या  बद्दलची मनातली भीती ही पूर्ण निघून गेली. केव्हा एकदा परीक्षक येतात आणि माझी परीक्षा घेतात याची मला उत्सुकता लागून राहिली.

मनामध्ये लेखी परीक्षेची मात्र धाकधूक होतीच. आत्तापर्यंत पूर्ण दृष्टी गेल्यानंतर चौथी ते बीए पर्यंतच्या सगळ्या परीक्षा मी खालच्या वर्गातील लेखनिक अर्थात रायटरच्या मदतीने यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. आता मात्र एम ए या परीक्षेसाठी असणारा अभ्यास, हा वरच्या पातळीवरचा होता. त्यासाठी मला संदर्भग्रंथ ही वाचून घ्यावे लागणार होते. त्यासाठी रोज दुपारी गोखले काकून बरोबर तीन ते साडेचार पर्यंत जोरदार वाचन सुरू झाले होते. आमची खरी कसरत होती ती तत्त्वज्ञानाचे गाढे, जाडजूड पुस्तक वाचताना आणि ऐकताना. त्यामधली गूढ तत्वे, अवघड विचार बोजड नावे आणि त्यातल्या संकल्पना मधली जटिलता डोक्यात लवकर शिरू शकत नव्हती. आम्हाला हे जड जाते,  लवकर लक्षात येत नाही हे समजल्यावर आम्हा दोघींनाही हसू येत होते. पण नेटाने वाचन मात्र आम्ही सुरुच ठेवले. हा किचकट अभ्यास सुरू असताना अधेमधे कधी आई,  तर कधी बाबा आम्हाला वेलची घातलेला चहा, आल घातलेलं थंडगार लिंबू सरबत देऊन आम्हाला उत्साही करत असत. गोखले काकू जेव्हा वाचन करत असत, त्यावेळी मी माझ्या टेप रेकॉर्ड वर त्याच्या कॅसेट्स बनवून घेत असे आणि मला वेळ मिळाल्यावर ते ऐकून माझ्या मेंदूमध्ये मी सेव्ह करून ठेवत होते. असा सगळ्या विषयांचा माझा अभ्यास वेग घेत होता.

टी म वी म्हणजे ज्या विद्यापीठाचे परीक्षा देत होते त्यांचेही सहकार्य मला खूप लाभले होते. पेपर मध्ये प्रश्नांचा अंदाज येण्यासाठी, मी फोन करून आधीच्या परीक्षांचे पेपर्स मागवून घेत असे.  ते हि ते लगेच पाठवून देत. थोड्या वेळ झाला तरी माझा फोन लगेच गेलाच म्हणून समजा. त्यांनाही माझा आवाज ओळखीचा झाला होता. मी पूर्ण अंध असूनही स्वतः फोन करते याचे कौतुक वाटून ते मला त्वरित मदत करत असत.

प्रत्यक्ष परीक्षा देण्याकरता, मला रायटर ची जुळवाजुळव आधीच करून ठेवावी लागणार होती. मला लेखनिक असा हवा होता की त्याचे अक्षर चांगले असेल, जो मी  सांगितल्या सांगितल्या त्याच वेगाने भरभर लिहून काढेल. तो किंवा ती माझ्यापेक्षा वयाने आणि शिक्षणाने लहान असेल. परमेश्वर कृपेने श्रद्धा म्हस्कर नावाची मुलगी मला भेटली, माझी मैत्रीण झाली आणि तिने माझे पेपर्स, माझ्या मनाप्रमाणे उत्तम तऱ्हेने लिहून काढले. लेखी परीक्षा अशी कडक होती ज्यामध्ये मी आणि श्रद्धा हॉलमध्ये दोघीच असू आणि परीक्षक आमच्या मागेच बसलेले असत. मी सांगते ती प्रत्येक ओळ न् ओळ, शब्दन शब्द श्रद्धा लिहिते ना,  आणखी दुसरे काही वाचत तर नाही ना,  यावर त्यांची कडक नजर असे. अशा तऱ्हेने माझी.  प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा उत्तम रित्या पार पडली.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆  दुध हळद ते गोल्डन मिल्क ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

☆ विविधा ☆  दुध हळद ते गोल्डन मिल्क ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

हळदीचा उल्लेख चारशे वर्षा पुर्वी वेदिक काळात मसाला  म्हणून केला गेला आहे .धार्मिक कार्यात व विवाह सोहळ्यात ही मांगल्या चे प्रतिक म्हणून हळदीचा वापर केला जातो.हळदीचा भारतीय केशर किव्हा दैवी वनस्पती म्हणून ओळखले जाते. शुश्रुत संहिता चरक संहिताअशा विविध आयुर्वेदिक ग्रंथात हळदीच्या उपयुक्ततेचा उल्लेख आहे. हळदीला आयुर्वेदा मध्ये हरिद्रा म्हणतात व जयंती मांगल्य वर्णदात्री इंडियन सॅफरॉन ह्या नावांनीही ओळखले जाते. इंग्रजीत हळदीला टर्मरिक म्हणतात व त्याचे पारिवारिक नाव झिंजिबर आहे.

भारत हा हळद उत्पादन करणारा जगातील सर्वांत मोठा देश आहे. जगाच्या एकूण उत्पादनाच्या सु. ८०% उत्पादन एकट्या भारतात होते. आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचे पीक आहे. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जगाच्या ८० टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठया प्रमाणावर केला जातो. सामाजिक कार्यातही हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

हळद भारतीय वनस्पति आहे.ही आल्या च्या प्रजाति ची ५-६ फुट वाढणारा रोप आहे. याच्या मूळ्यांच्या गाठीत हळद मिलते. भारतामध्ये हळदीच्या मुख्यतः दोन जातींची लागवड करतात. त्यांपैकी एका जातीची हळकुंडे (कुरकुमा लोंगा), कठीण व भडक पिवळ्या रंगाची असून तिचा रंगासाठी उपयोग करतात. ती ‘लोखंडी हळद’ म्हणून महाराष्ट्रात ओळखलीजाते. दुसऱ्या जातीची हळकुंडे जरा मोठी (कुरकुमा लोंगा), कमी कठीण व सौम्यपिवळ्या रंगाची असतात. त्यांचा उपयोग मुख्यतः मसाल्याचा पदार्थम्हणून होतो. तिसरी जाती रानहळद (कुरकुमा. ॲरोमॅटिका) असून भारतातती जंगली अवस्थेत वाढताना आढळते. चौथी जाती आंबेहळद (कुरकुमा आमडा) असून तिच्या हळकुंडांना आंब्याच्या कैरीसारखा वास असतो. पश्चिम बंगाल, तमिळनाडू व कोकण या ठिकाणी जंगलीअवस्थेत (wild variety) ती आढळते. पाचवी जाती पूर्व भारतीय हळद (कुरकुमा. अंगुस्तीफोलिया) असून तिची हळकुंडे बारीक व पांढरट रंगाची असतात.

हळदी ला आयुर्वेदात प्राचीन काळापासून ही एक चमत्कारिक द्रव्य च्या रूपात मान्यता मिळाली आहे.

हळदी मध्ये ओलेओरेसींन, करक्यूमिन नावाचा एक घटक आढळतो. करक्यूमिन मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म आहेत. हळदी मध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोदके, तंतू, क्याल्शिअम, फॉस्फोरोस, पोटॅशियम, सोडियम,  लोह,  अ, बी , बी २ जीवनसत्वे, नियासिन, ऍस्कॉर्बिक ऍसिड व तैल सुगंधी हे घटक असतात.

संशोधनानुसार आपल्या आहारात एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश केला तर आजार होण्याची शक्यता कमी होते. काही संशोधनानुसार या घटकामुळे ताण तणावाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. हळदीतील जंतूनाशक गुणधर्मा मुळे प्राचीन काळापासून त्याचा औषधांमध्ये वापर केला जातो. हळदीमुळे  एखादी जखम देखील लवकर भरते. हळदीचे पाणी प्यायल्यास स्नायूंना मजबुती मिळते. ज्यामुळे सांधेदुखी आणि आर्थरायटिस यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून देखील आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते. हळदीतील पोषण तत्त्वांमुळे खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी होते. हळदीचा उपयोग खाद्य पदार्थ व सौन्दर्य प्रसाधनात मध्ये ही खूप प्रमाणात केला जातो.

पी हळद हो गोरी ते वि को टरमेरिक आयुर्वेदिक क्रीम ते गोल्डेन मिल्क असा हळदीचा प्रवास.

त्याचे स्वरूप जरी बदलले असले तरी त्याच्या उपयुक्ततेत  किंतू ही बदल झाला नाही .किंबहुना त्याचा वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

संपर्क –साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी,  पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शेती भाती ☆ सौ. सावित्री जगदाळे

सौ. सावित्री जगदाळे

 ☆ मनमंजुषेतून ☆ शेती भाती ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆ 

आईचं वय झाले आहे. आता शेतीतील कामे होत नव्हती. गुडघे दुखत होतेच. तरी तिचे माळवे लावायचे वेड कमी होत नव्हते. गवार भेंडी, पावटा, मिरच्या, असं लावायची. माळवं निघायला लागले की सुनेच्या मागे पिरपिर , “तेवढ्या गवारीच्या शेंगा तोडून दे पोरांना.”

सुनेने बाकीची कामे सोडून गवारी तोडाव्यात. नाहीतर रोजाच्या बाईला घेऊन माळवं तोडून तालुक्याच्या गावाला पाठवावे. तिथं मुलं शिकायला एक कुटुंब ठेवलेले. शेती करणारा भाऊ म्हणायचा, ” होत नाहीतर कशाला अबदा करून घेतीस? त्यांना पावशेर शेंगा विकत घेणं होईना काय…”

रोजाची बाई लावून भाज्या तोडून पाठवणे त्याला पटत नव्हते आणि परवडत ही नव्हते. पण एवढी मोठी शेती आणि पोरांनी विकतच्या भाज्या खायचे हे आईला पटत नव्हते. ती कोंबड्या पाळायची. अंडी लागतात पोरांना म्हणून. स्वतःच्या गळ्यात माळ असली तरी गावात मटण पडले की घ्यायला लावायची. पाठवून द्यायची.शहरात काहीच चांगले मिळत नाही हा तिचा समज. दूधवाला तर एक ठरवूनच टाकलेला. घरचे दूध रोज पोरांकडे पोच व्हायचे.

कोवळी गवार लोखंडी तव्यावर परतलेली पाहून तिला लेकिंची आठवण यायची. चुलीत भाजलेली वांगी पाहून तिचे डोळे भरायचे. भाजलेली, उकडलेली मक्याची   कण सं पाहून जीव तीळ तीळ तुटायचा. हे सगळं पोरांना पोच व्हायलाच पाहिजे हा तिचा अट्टाहास असायचा.

मातीशी असलेलं हे नातं तिच्या आरपार रुजलेले आहे. बाई शेतीशी कशी एकरूप, एकजीव होते हे तिच्या वागण्या बोलण्यातून जाणवत राहते. तिला कुठल्याही पाटाचे पाणी पवित्र वाटते. तहान लागली की ती ते पाणी पिते. साचलेले असले तरी. ” त्याला काय व्हत?” हेच तिचे पालुपद. आणि तिला खरेच पाणी बादले आहे असं झाले नाही. ही तिची अतूट श्रद्धा,  वावरा शिवाराची एक ताणता जाणवत राहते. पायात चप्पल न घालता शेताच्या सरीतून, बांधातून फिरायचे काटा मोडण्याचे भय तिला कधीच वाटले नाही. शेतातून फिरणारे साप तिला राखणदार वाटतात. त्यांचीही भीती कधी वाटली नाही.

आता नुसतीच मोठी पिकं घेतात. जवसाची मुठ, तिळाची मुठ कुणी पेरत नाही म्हणून ती हळहळत असते. तिळाची पेंढी असली की तेवढीच बडवून, पाखडून गाडग्या  मडक्यात भरून ठेवायची.

कधीही माहेरी गेली की ती धडधाकट होती तेव्हा रानात कामे करायची, घरी राहायला लागल्यावर सतत काही तरी निवडणे, पाखडणे चालूच असायचे. कुठल्या ना कुठल्या मडक्यात महत्वाचे ठेवलेले काढून द्यायची. ती उतरंड च आता गायब आहे.

असेच कितीतरी बदल होत राहतील. काळा बरोबर हे होतच राहणार… रानाशिवाराशी एकजीव झालेलं हे जुनं खोड बदल न्याहाळीत राहते. नजर कमकुवत झाली आहे तेही बरेच आहे.

© सौ. सावित्री जगदाळे

१७/२/१९

संपर्क – १००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – १४) – ‘ भावाभिव्यक्ती’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – १४) – ‘भावाभिव्यक्ती’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

मागच्या भागात यमन रागाचं पूर्वीचं नांव ‘एमन’ आणि त्याच्या सुरांतून सहजी प्रकट होणाऱ्या मानवी मनाच्या कोणत्याही भावाभिव्यक्तीशी जोडला गेलेला ह्या नावाचा अर्थ आपण पाहिला. कोणत्याही मनोवस्थेतील भाव चपखलतेने प्रकट करणारा म्हणून जणू आपल्याच मनाशी संवाद साधणारा ह्या अर्थाने ‘ए मन’ असं दिलं गेलेलं नांव म्हणजे मानवानं त्याच्याकडच्या शब्दसंपत्तीचा केलेला चपखल वापर असं म्हणावं लागेल. मात्र काही संशोधकांच्या मते मानवाच्या आयुष्यात शब्दांची भाषा येण्यापूर्वीही संगीत काही प्रमाणात अस्तित्वात होतं. ह्याचाच अर्थ संगीताचा उगम हा आदिमानवासोबतच झाला असं म्हणायला हरकत नाही. पुढं जसजसा मानव उत्क्रांत होत गेला तसतसं संगीतही विकसित होत गेलं असावं.

विचार करता लक्षात येईल कि पूर्वीचा रानटी अवस्थेतील मानव हा निसर्गाच्या सान्निध्यात राहाणारा होता. आपल्या गरजा भागवण्याचे आणि सुख मिळवण्याचे मार्ग त्याने निसर्गातूनच शोधून काढले. अत्यंत बुद्धिमान, कल्पक व प्रगल्भ मेंदू लाभलेल्या मानवाला अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्रमुख गरजांसोबतच ‘कोणकोणत्या गोष्टींतून आपल्याला सुख मिळतं’ हे लक्षात येत गेलं असावं आणि संगीत हा प्रत्येकच माणसाला सुखी करणाऱ्या सर्वोच्च मार्गांपैकी एक आहे हेही जाणवलं असावं. कारण संगीताचा संबंध थेट मनाशी आहे.

मागे ‘सप्तककथा’ ह्या लेखात आपण पाहिलं होतं कि काही विचारवंतांचं आणि शास्त्रज्ञांचंही मत आहे कि संगीत ही मानवाकडून उत्स्फूर्तपणे निर्माण झालेली गोष्ट आहे, ती माणसाची सहजनिर्मिती आहे. माणूस जसं हसणं, रडणं, बोलणं, चालणं-फिरणं आपोआप शिकतो तसंच मनातले भाव व्यक्त करायलाही आपोआपच शिकतो की! किंबहुना तो शिकतो म्हणण्यापेक्षा ते प्रत्येक माणसाकडून सहजपणेच घडतं. संगीताच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्याचं सहज गुणगुणणं हा त्याच्याकडून होत असलेल्या संगीताच्या सहजनिर्मितीचा भरभक्कम पुरावा आहे! म्हणजे संगीत ही एक स्वाभाविक क्रिया आहे.

आदिमानव अन्न ही गरज भागविण्यासाठी जंगलात हिंडून प्राण्यांची शिकार करत असे. त्यावेळी कानांवर पडलेल्या पशु-पक्षांच्या आवाजाची नक्कल करण्याचा तो प्रयत्न करी. हळूहळू त्यानं आत्मसात केलेल्या ह्या नादांचा वापर तो आपल्या मनातील भावना उघडपणे व्यक्त करताना करू लागला असावा आणि हाच संगीताच्या उत्पत्तीचा पहिला अविष्कार असल्याचं मानलं जातं. सप्तककथेमधेच ‘पशु-पक्षांच्या आवाजातून झालेली सप्तकनिर्मिती’ हाही भाग आपण पाहिला. सप्तकनिर्मिती ही संगीतशास्त्र प्रगत होण्याच्या प्रक्रियेतील महत्वाचा भाग आहेच, मात्र त्याचं उगमस्थान हे मानवानं सहजपणे त्या आवाजांची नक्कल करण्याच्या प्रयत्नात दडलेलं आहे असं म्हणाता येईल.
अर्थात ती नक्कल ह्याला संगीत म्हणता येईल का? किंवा संगीत म्हणून मानवाने तो अविष्कार केला असेल का? ह्याचं उत्तर ‘नाही’ असंच येईल. परंतू निसर्गातील ह्या आवाजाची नक्कल करण्याचं उत्क्रांत स्वरूप आदिवासी संगीतात आढळतं. आपण ऐकलेलं एखादं आदिवासी गीत आणि त्यांतल्या हुंकारयुक्त नादांचा अविष्कार आठवून पाहिलात तर ह्या वाक्याचा अर्थ सहजी लक्षात येईल.

खरंतर अवघं चराचर नादमय आहे. अवघ्या निसर्गात लयदार संगीत भरून राहिलेलं आहे. निर्झरांतलं संगीत, धबधब्यांचं ओसंडणं, लाटांचा खळाळ, पक्षांची किलबिल, प्राण्यांचे आवाज, वाऱ्याची झुळूक किंवा घोंघावणंही, पानांची सळसळ हे सगळं निसर्गाचं संगीतच आहे. ह्या सृष्टीचा निर्माता असलेल्या ब्रम्हदेवानं संगीतकलेची निर्मिती केली, त्यांनी ही कला भगवान शंकरांना दिली, शंकरांनी मग ही कला सरस्वती देवीला दिली. पुढं देवी सरस्वतीनं ही कला देवर्षी नारदांना सुपूर्द केली आणि नारदांनी संगीतकलेचं ज्ञान स्वर्गातील गंधर्व (गायन करणारे), किन्नर (वादन करणारे) व अप्सरा (नर्तिका) यांना दिलं. त्यानंतर संगीतकलेत पारंगत झालेले ऋषी नारद, भरत, हनुमान हे भूलोकी ह्या कलेचा प्रसार करण्यासाठी आले, हा संगीतकलेचा इतिहास सर्वज्ञात आहे.

मात्र ह्या सृष्टीचा एक घटक असलेल्या आणि निसर्गाला आपला मित्र मानणाऱ्या किंबहुना आपल्या संस्कृतीचं देणं म्हणून निसर्गाचा अत्यादर करणाऱ्या मानवानं निसर्गात असलेलं हे संगीत कसं शोधून काढलं? सृष्टीनिर्मात्यानं त्याला दिलेल्या बुद्धीचा वापर करून ह्या सहजनिर्मित प्रक्रियेला ज्ञान, विद्या ह्या संज्ञेपर्यंत नेत पुढं संगीतशास्त्र म्हणण्याइतका त्याचा विकास कसा केला? हे जाणून घेताना त्यातला पहिला टप्पा वरती सांगितल्यानुसार निसर्गातील नादांची नक्कल करून पाहाणे हा येतो. पुढं ह्या निरनिराळ्या नादांतून आपल्या विविध भावनांचं प्रकटीकरण होऊ शकतं हे त्याच्या लक्षात आलं… इथं मानवी जीवनाशी संगीताचा थेट संबंध जोडला गेला.

पुढं मानवाला भाषिक ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, तो शब्दसंपत्तीचा धनी झाल्यानंतर शब्द आणि नाद/स्वर ह्या दोहोंचा वापर तो भावनांच्या व्यक्ततेसाठी करू लागला आणि ज्याला आपण आज लोकसंगीत म्हणतो ते असं शब्द-सुरांच्या संगमातून निर्माण झालं… जे मानवी जीवनातील जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर त्याच्या भावाभिव्यक्तीला पोषक ठरत राहिलं आहे आणि सृष्टीच्या अंतापर्यंत कायम राहील.

पुढील काही लेखांमधे मानवाने निसर्गातून शोधलेलं हे संगीत मानवी जीवनाशी कसं एकरूप होत गेलं ह्याचा म्हणजे लोकसंगीताचा संक्षिप्त धांडोळा आपण घेणार आहोत.

लोकसंगीतावर लिहिण्याची कल्पना मला सुचविल्याबद्दल उज्वलाताईंचे मन:पूर्वक आभार! त्यानिमित्ताने माझ्या कुवतीनुसार आजवर केलेल्या अल्प अभ्यासाचा नेमकेपणी मागोवा घेत त्यावर चिंतन करण्याची सुवर्णसंधी आपोआप मिळेल ह्यात शंका नाही.

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तमसो मा ज्योतिर्गमय… ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆विविधा ☆ तमसो मा ज्योतिर्गमय… ☆ सौ ज्योती विलास जोशी

तमसो मा ज्योतिर्गमय

ज्योत दिव्याची मंद तेवते

देवघरातील देवापाशी.

सात्विक ज्योतीचं हे आल्हाददायक असं रूप! दीप हे त्यातल्या ज्योतीसह अग्निचं एक मोहक असं रूप आहे. तितकच ते सुबकही आहे. तृप्ती देणारं आहे.

नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गेला तेजोमय करण्याचं पावित्र्य या ज्योतीत आहे. इंद्रधनुषी रंगाने काढलेल्या रांगोळ्या अधिक प्रकाशमय होतात ते त्यावर ठेवलेल्या पणत्या आणि त्यातील ज्योतीने !हा त्या पणती सह ज्योतीचा सन्मान आहे.

सर्वांना एकाच धाग्यात बांधून ठेवणारा दीपोत्सव अशा असंख्य ज्योतीने प्रकाशमय होतो.हा दीपोत्सव हातात जणू उद्दिष्टांचे दिवे घेऊन येतो आणि सर्वांना स्वप्नपूर्तीचा ध्यास देतो.

लक्ष्मीपूजनादिवशी असंख्य दीपज्योतीनी लक्ष्मीदेवीची अर्चना होते .असं म्हणतात की जिथे ज्योती तिथे लक्ष्मी!

आज झाले मी बिजली ,

घरे मंदिरे लखलखली!

असंच जणू ही दिव्याची ज्योत सांगते.

कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी, मंगल प्रसंगी दीपप्रज्वलन हे गृहीतच आहे. कौटुंबिक आनंदाच्या प्रसंगी औक्षण ओघानं आलंच. ज्योतीचं अस्तित्व सर्व प्रसंग उजळून टाकतात.

मंत्र, अभंग, ओव्या, भारुडं ,निरूपणं यांचे दीपही या ज्योतीने उजळले आहेत आणि भक्तीचे तेज पसरवलं आहे. ही ज्योती ज्वाला होऊ शकते.फुंकरीने विझवू पाहणाऱ्यांसाठी ती आव्हान देखील आहे.

शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या सावित्रीबाई यांना ‘क्रांतीज्योती’हा बहुमान दिला आहे. या क्रांतीज्योतीने ज्ञानाची ज्योत तेवत ठेवली.

शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मशालीची ज्योत पेटवून वीरश्री मिळवली.

आज घरोघरी हंड्या, झुंबरे एलईडी बल्बने सुशोभित झाली आहेत.हा काळाचा महिमा आहे, टेक्नॉलॉजी चा चमत्कार आहे.कालाय तस्मै नमः!

ज्योतीचे हे दिव्य स्वरूप आज स्वतःची परंपरा टिकवून आहे. दिवाळीच्या या निमित्ताने आपणही हा अनमोल दुवा राखायचा प्रयत्न करूया. हा परंपरेचा एक नाजूक धागा संभाळून ठेवूया.दिवटी पासून ते पंचारती ,निरंजन , समई , कंदील ,पलीते ,पणती या सर्वातून ती आपल्या भेटीला आली. तेजःपुंज ज्योत बनून राहिली.

औक्षण करताना तेजाळणारा भावाचा चेहरा, जसा काही ‘ज्योतीने तेजाची आरती’ म्हणावा असाच! सुवासिनींचे औक्षण करताना सौभाग्य कुमकुमाचा रक्तवर्ण जसा लक्ष्मीच्या पाऊलखुणा!! लक्ष्मीची अनेक रूपे जशी धान्यलक्ष्मी विद्यालक्ष्मी गृहलक्ष्मी राजलक्ष्मी वीरलक्ष्मी …..या सर्वांचं औक्षण या ज्योतीने होते. या सर्व लक्ष्मीची प्रसन्नता ही मानवाला सुख-समृद्धी देणारी आहे.धन्वंतरीची ज्योतीने आरती उत्तमआरोग्यधनसंपदा देते.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याजागी दिवा ठेवतात.आत्म्याचे प्रतीक, आत्मज्योत म्हणून पणती मधे ती ज्योत दहा दिवस तेवत ठेवतात, कारण दहा दिवस आत्मा घराबाहेरच्या अश्म्यावर असतो आणि दहा दिवसा नंतरच त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. आत्म्याला पुढील वाट दाखवावी असंही या ज्योतीचे उद्दिष्ट असतं असं म्हणतात.

ज्योत से ज्योत जगाते चलो

प्रेम की गंगा बहाते चलो

इवलुश्या मिणमिणत्या ज्योतीच्या केवढ्या विधायक संदेश देणाऱ्या या ओळी!! ज्योतीचा महिमा सुंदर आनंदी आणि तृप्ती देणारा आहे. त्याचा अर्थ आत्मसात करूया .तेव्हाच या आत्ताच्या बेचैन आणि अस्वस्थ परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल…..

गतिमान काळात अंधारक्षण येणारच! म्हणूनच तर ही तेजस्विनी सांभाळायची…..समाज बांधणीची समाज उभारणीची एकात्मतेची ज्योत तेवत ठेवायची. कारण ही ज्योत मानवाचे भविष्य तेजाळणारी आहे.

ही ज्योती नक्कीच एक तेजस्वी साफल्य आपल्या हाती पडण्यास मदत करेल असा विश्वास बाळगूया.

ज्योतीचा महिमा इतका सुरेख आणि आनंदी की तिच्या पुढे नतमस्तक होऊन म्हणावेसे वाटते,

दीपज्योती नमोस्तुते!

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हाय क्लास ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

 ☆ विविधा ☆ हाय क्लास ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

काय आल डोळ्यासमोर ??

पांढरा शुभ्र सदरा, काळी पँट, दोन्हीही कडक इस्त्री मधे, वरती टाय आणि कडक सुट बूट घातलेले रूबाबदार व्यक्तिमत्व? बरोबर आहे ना? मोठ्या कंपनी मधे मोठ्या पोस्ट वर असलेली, सो कॉल्ड उच्चभ्रू वर्ग मधे प्रचंड मान सन्मान, प्रचंड पैसा असलेली,  थोडक्यात वजनदार व्यक्ति.

आपल्या समाजात अश्या व्यक्तिंना खूप मान सन्मान दिला जातो, खूप महत्व दिल जात विनाकारण, आणि त्यामुळे खरच ही माणस स्वतःला खूप वजनदार समजू लागतात. खूप पैसा जमवलेला असतो, मग तो कश्या तर्‍हेने हे महत्वाचे नसतेच मुळात. पैसा, सत्ता, नोकर चाकर जी हुजूर करायला, आणि हाताखाली गडी माणस, मुजरा करायला. आणि ऑर्डर सोडली की त्यांचा प्रतेक शब्द झेलायला.

थोडक्यात गुर्मी, मस्ती आणि पैसा हे हातात हात घालून असतात ह्यांच्या जवळ. बुद्धी असेलच असे नाही. ह्यांचा असा मग एक वेगळा क्लास तयार होतो आणि त्यांच्यातच मग सुरू होते चढाओढ आणि आपल्याकडे किती पैसा आहे हे दाखवण्यासाठी, ठेवल्या जातात जंगी पार्टी. अन्नाची नासाडी आणि पैश्यांची  उधळपट्टी एवढाच ध्येय. आणि मी तुझ्यापेक्षा किती मोठा हे दाखवण्याची चुरस.

एरवीसुद्धा ही लोक कुठे गेली आणि त्यांना कोणी कप भर चहा दिला तरी त्यातला निम्मा वगळतात जस्ट फॉर स्टेटस सिम्बॉल.

पण हाय क्लास म्हणले, की माझ्या डोळ्यासमोर मात्र येतात त्या सुधा मूर्ती. अतिशय नम्र, बुद्धिमान आणि मान सन्मान असलेल्या. आता सुधा मूर्ती म्हणले की त्यांच्या बरोबर लंडन विमानतळावर घडलेली घटना आपल्याला आठवतेच, नाही का?  त्यांच्या पेहेराव्या वरुन त्यांचा क्लास ठरवण्यात आला होता आणि कॅटल क्लासची उपमा देण्यात आली होती. त्यांना हे ही सांगण्यात आले होते की ही विमानाची ओळ बिझनेस क्लास साठी आहे आणि ह्याचे भाडे इकॉनॉमिक क्लास पेक्षा तिप्पट आहे. आणि चुकून त्या इथे उभ्या असतिल अस समजून त्यांना इकॉनॉमिक क्लासची ओळही दाखवण्यात आली होती. हे सगळ कश्या वरुन ठरवण्यात आले? तर फक्त त्यांच्या साध्या पेहेरावा वरून. त्या दिवशी त्यांनी साधी सुती साडी परिधान केली होती आणि त्या आपल्या मातृभाषेत बोलत होत्या म्हणून?

दुसरे उदाहरण म्हणजे बाबा आमटे. आपल सर्व आयुष्य वाहिले त्यांनी कुष्ट रोग्यांसाठी. तसच बाबासाहेब आंबेडकर हे अजून एक असे व्यक्तिमत्त्व आहे ज्यानी आपले आयुष्य देशासाठी वाहिले. ही आहेत खरी क्लासी माणसे.

एखाद्या माणसाचा क्लास त्याच्या पेहरावावरुन त्याच्या साधेपणा वरुन कसा काय ठरू शकतो??खरतर माणसाचा क्लास ठरतो तो त्याच्या विचारांवरुन  कर्तुत्वा वरुन.  केवळ पैसा आहे म्हणुन तो उडवणे हा  त्यांचा ध्येय कधीच नसतो . त्यांचा ध्येय आपल्या बरोबर आपल्या समाजाला समृद्ध बनवणे, तसच गरजवंताला मदत करणे असतो. ह्याला म्हणायचे क्लासी माणस आणि ह्यांच्या मुळे बनतो हाय क्लास.

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लस कशी तयार झाली ☆ संग्राहक – विमल माळी

 ☆ इंद्रधनुष्य ☆ लस कशी तयार झाली ☆ संग्राहक – विमल माळी ☆ 

१७८८ सालची एका तरुणाची ही गोष्ट. इंग्लंडमधल्या ग्लुस्टरशायरला एका साथीनं घेरलं. ती साथ आली की माणसं त्यावेळी मृत्युपत्राची वगैरे भाषा सुरू करायची. सगळे दु:खात, फक्त एक जमात गवळी. त्या तरुणाच्या घरी जो गवळी यायचा, त्याला या आजाराची कसलीही चिंता वाटत नव्हती. त्या तरुणाला आश्चर्य वाटलं. तो त्या गवळ्याकडे गेला. त्याचं घर आणि गोठा बघायला. यांना ही बाधा का होत नसावी. तिथं त्याला थेट उत्तर काही मिळालं नाही. पण शक्यता दिसली. त्या गवळ्याच्या गाईंना तोच आजार झाला होता. अंगावर फोड. ते पिकणं. पू वगैरे सगळं माणसांसारखंच.

त्या तरुणाला लक्षात आलं. या गाईंना झालेल्या रोगाच्या संपर्कात आल्यामुळे गवळ्यांच्या शरीरांत या रोगाबाबत प्रतिकारशक्ती तयार होत असावी. पण हे सिद्ध करायचं म्हणजे गाईंच्या अंगावरच्या फोडांचे जंतु माणसांच्या अंगात सोडायचे. त्यासाठी तयार कोण होणार?अखेर बऱ्याच परिश्रमांनंतर १४ मे १७९६ या दिवशी अशी एक संधी त्याच्यापुढे चालून आली. त्याच्या गावचा एक शेतकरी तयार झाला. सारा या त्याच्या गवळ्याच्या तरुण मुलीच्या अंगावर त्याच्या गाईप्रमाणे फोड आलेले होते. आणि त्यातले काही पिकलेही होते. तो तरुण तिच्याकडे गेला. लाकडाची एक छोटी ढलपी घेतली. तिच्या अंगावरचे पिकलेले फोड उकरून त्यातला पू त्यानं त्यावर गोळा केला. तिचा भाऊ जेम्स याच्या पायावर धारदार चाकूनं छोटीशी जखम त्यानं केली. रक्त आल्यावर साराच्या जखमेतला पू त्याच्या जखमेत भरला आणि वरनं मलमपट्टी केली. शेतकऱ्याला बजावलं. याच्यावर लक्ष ठेव. काही झालं तर मला सांगायला ये.

दोनच दिवसांनी शेतकरी त्याच्याकडे आला. मुलाच्या अंगात ताप होता. तो तरुण खुश झाला. सुरुवात तरी त्याच्या मनासारखी झाली. आणखी दोन दिवसांनी जेम्सच्या तोंडाची चव गेली. खूप अशक्तपणा जाणवायला लागला. पण पुढच्या दोन दिवसांत ही सर्व लक्षणं दूर झाली आणि जेम्स बरा झाला.

त्या तरुणाच्या प्रयोगाचा महत्त्वाचा टप्पा आता सुरू झाला. आता त्याला जेम्सच्या शरीरात खरेखुरे आजार जंतू सोडायचे होते. हा प्रयोग यशस्वी झाला तर तुझा मुलगाच काय सारी मानवजातच या साथीच्या विळख्यातून सुटेल. शेतकऱ्यानं विचारलं, ‘आणि अपयश आलं तर?’ तो तरुण शांतपणे म्हणाला, ‘खुनाच्या आरोपाखाली मला शिक्षा होईल.’

त्या तरुणानं मरणासन्न रुग्णाच्या फोडांमधला पू तशाच पद्धतीनं जेम्सच्या शरीरात घुसवला. पुढचे आठवडाभर तो आणि शेतकरी त्या पोरावर डोळ्यात लक्ष ठेवून होते. दोन दिवसांनी त्याला परत ताप आला. अंगावर पुरळ आलं. काळजी वाढली. पण दोन दिवसांनी तापात उतार पडला. त्या तरुणाच्या लक्षात आलं की अशा पद्धतीनं या आजाराबाबत लोकांच्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार करता येते.

आपल्या या प्रयोगाचे निष्कर्ष त्यानं रॉयल सोसायटीला कळवले. त्यांनी लक्षच दिलं नाही सुरुवातीला. पण तो तरुण प्रयोग करत राहीला. आणखी २३ जणांवर त्यानं याच पद्धतीनं प्रयोग केले. सगळ्यांचे निष्कर्ष असेच होते. एका बाजूला तो हे सगळं रॉयल सोसायटीला कळवत गेला. पण दुसरीकडे त्यानं स्वत: हे सगळं छापायचं ठरवलं. लॅटिन भाषेत गाईच्या त्या आजाराचं नाव वॅक्सिनिया. त्यानं नवा शब्द तयार केला “वॅक्सिन” म्हणजे लस.

नंतर तो तरुण आयुष्यभर लसींसाठीच जगला. पैसे नाही फार कमावले त्यानं. पण नाव मात्र मिळवलं. घर बांधलं. अंगणात स्वतसाठी एक झोपडं उभारलं. नाव दिलं लसगृह. तिथं गरीबांना तो मोफत लस टोचायचा. पुढे त्याच्या या तंत्राचा लौकिक लवकरच सर्वदूर पसरला. अनेक ठिकाणी युरोपात लोकं स्वत:मधे जिवंत विषाणू टोचून घ्यायला लागले. १८०० साली त्यानं ही सगळी माहिती आणि सोबत एक लशीचा नमुना आपले मित्र प्रा. बेंजामीन वॉटरहाउस यांना पाठवला. प्रा. बेंजामीन अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात भौतिकशास्त्र शिकवायचे. त्यांनी हे तंत्र आपल्या न्यू इंग्लंड परगण्यात वापरून बघितलं. न्यूयॉर्कच्या जवळ असलेल्या या परगण्यात ती साथ होती. हे तंत्र तिथं कामी आलं. प्रा. बेंजामीन यांनी आख्ख्या कुटुंबाला या तंत्रानं वाचवलं.

हे जमतंय असं लक्षात आल्यावर त्यांनी याची माहिती दिली थेट थॉमस जेफर्सन यांना. हे जेफर्सन म्हणजे अमेरिकेचे नंतर अध्यक्ष झाले ते. त्यांनी कसलाही विचार न करता आपल्या मुलाबाळांसकट सगळ्यांवर हा प्रयोग करून पाहिला. तो अर्थातच यशस्वी झाला. तेव्हा त्याचं महत्त्व जाणणाऱ्या या द्रष्टय़ा नेत्यानं त्या तरुणाला अत्यंत उत्कट पत्र लिहिलं. इथे या भूतलावर हा असाध्य रोग होता, तो तुझ्या प्रयत्नामुळे हद्दपार झाला. पुढच्या पिढय़ा तुझ्या ऋणी राहतील. जेफर्सन यांचे शब्द खरे झाले. त्यांच्या पत्रानंतर साधारण दोन शतकांनी, १९८० साली पृथ्वीवरनं या आजाराचं  पूर्ण उच्चाटन झालं.

हा आजार म्हणजे देवी. आणि त्या तरुणाचं नाव एडवर्ड जेन्नर.

आत्ता त्याची ही गोष्ट आठवायचं काही एक कारण आहे. ते म्हणजे ऑक्सफर्ड इथल्या एडवर्ड जेन्नर संशोधन केंद्रात सध्या जगाला ग्रासून राहिलेल्या करोना आजारावरच्या संभाव्य लशीच्या मानवी चाचण्या सुरू होतायत. आजच तिथे पहिल्यांदा कोणी तरी आपल्या शरीरात कोविड-१९ चा विषाणू टोचून घेईल. त्यातून लस तयार होईलही.

हे श्रेय त्या एडवर्ड जेन्नर याच असेल.

संग्राहक – विमल माळी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print