मराठी साहित्य – सूर संगत ☆सूर संगीत राग गायन (भाग ६) – राग बिहाग ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ६) – राग बिहाग ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

” तेरे सूर और मेरे गीत दोनो मिलकर बनेगी प्रीत” गूंज उठी शहनाई या चित्रपटांतील श्री वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले,१९५०चा उत्तरार्ध व १९६०च्या दशकाची सुरवात या कालावधीत अत्यंत लोकप्रिय झालेले हे गीत म्हणजेच राग बिहाग! “बीती ना बिताये रैना हेही परिचय सिनेमांतील गाणे बिहागचेच उदाहरण म्हणून घेता येईल. बाल गंधर्वांच्या नाट्य संगीताने भारावलेला मराठी रसिकवर्ग म्हणेल की संगीत स्वयंवरांतील रुख्मिणीच्या तोंडचे “मम आत्मा गमला”हे पद म्हणजेच बिहाग किंवा सुवर्णतुला नाटकांतील अंगणी पारिजात फुलला हे सत्यभामेचे गीत म्हणजे बिहाग! कितीही वेळा ही गाणी ऐकली तरी प्रत्येकवेळी नवीनच वाटावी अशी ही कर्णमधूर स्वररचना!

“कोमल मध्यम तीवर सब चढत री ध त्याग

ग नि वादी संवादी ते जानत राग बिहाग”

राग चंद्रिकासार या पुस्तकांत बिहाग रागाचे असे वर्णन केलेले आढळते.

या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे ती म्हणजे हे वर्णन पलुस्करी पद्धतीने केले आहे. शास्त्रीय संगीतात भातखंडे आणि पलुस्कर या दोन सांगितिक भाषा ग्राह्य आहेत.ज्याला  भातखंडे तीव्र म म्हणतात त्याला पलुस्कर कोमल म अशी संज्ञा देतात तर भातखंड्यांच्या शुद्ध स्वरांना पलुस्कर तीव्र स्वर म्हणतात.

बिलावल थाटजन्य असा हा राग, ओडव~ संपूर्ण जातीचा.(आरोहांत पांच स्वर आणि अवरोहांत सात स्वर) शास्त्रानुसार रात्रीच्या दुसर्‍या प्रहरी गायचा हा राग. सा ग म प नी सां/ सां नी धप म ग रेसा असे आरोह ~ अवरोह असलेल्या या रागांत तीव्र मध्यम अतिशय अल्प प्रमाणात घेतला जातो तसेच अवरोही स्वररचनेत रिषभ व धैवत अतिशय दुर्बल स्वरूपांत वावरतांना दिसतात. अल्प तीव्र मध्यमाचा उपयोग अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने केला जातो. विशेषतः अवरोहांत पंचम लावताना व पंचमावरून खाली येतांना तीव्र मध्यम घेण्याची प्रथा आहे. जसे “सां नी ध म(तीव्र)प म(तीव्र) ग म ग” —— राग ओळखण्याची ही महत्वाची खूण आहे. युवतीने तिच्या लांबसडक केसांत  एखादेच मोहक गुलाबाचे फूल खोचावे व आकर्षकता वाढवावी तसा बिहागमधील हा तीव्र मध्यम राग आकर्षक करतो. या रागाची प्रकृती एकंदरीत गंभीर परंतु लोभस! त्याचा लालित्यपूर्ण स्वरविलास आनंददायी आणि नैराश्य दूर करणारा आहे. “लट उलझी सुलझा जा बालम” ही बंदीश ऐकली की त्यातल्या सुरांचा हळुवारपणा जाणवतो. बिहागच्या स्वरांचा प्रेमळ स्पर्ष अनुभविण्यास मिळतो, तो किशोरी अमोणकर, अश्विनी भिडे यांनी गायिलेल्या “बाजे री मोरी पायल झनन” या विलंबित तीनताल बंदिशितून.

अंतर्‍याचे गमपनीसां हे सूर ऐकले की सासरी निघालेल्या भावविवश मुलीचा चेहेरा  नजरेसमोर येतो नि मग आठवण येते ती कविवर्य भा.रा.तांबे यांच्या “नववधू प्रिया मी बावरते” या कवितेची.

कवी राजा बढे यांनी बिहागाच्या स्वभावाचे वर्णन कसे केले आहे बघा……. ते  म्हणतात,

“लाविलेस तू पिसे मुळी न बोलता

राहू दे असेच मुके मुळी न बोलता

ओठ हे अबोलके तरीही बोलती मुके

बोललो कितीतरी मुळी न बोलता”

बिहागचं देखणं रूप म्हणजेच मारूबिहाग. ह्यांत तीव्र मध्यम म्हणजे ह्याचा प्राण स्वर! “रसिया हो न जावो” ही बडा ख्याल बंदीश आणि ” जागू मै सारी रैना” ही मध्यलय बंदीश अनेक मैफिलींतून गाईली जाते व दोन्ही फार लोकप्रिय आहेत.

उपशास्त्रीय व सुगम संगीत या प्रकारात मारूबिहागला अधिक मानाचे स्थान आहे.सजणा का धरिला परदेस हे ,हे बंध रेशमाचे  या नाटकातील पद ,मारूबिहागातील, बकूळ पंडीत यांनी अजरामर करून ठेवले आहे.

छाया बिहाग, चांदनी बिहाग, नट बिहाग, पट बिहाग, हेम बिहाग, मंजरी बिहाग असे बिहागचे बरेच प्रकार आहेत. एकूणच बिहागचा पसारा विस्तीर्ण आहे.

क्रमशः….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 81 – लेखनाने मला काय दिले …. ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 81 ☆

☆ लेखनाने मला काय दिले …. ☆

(मैं निःशब्द हूँ और आपका आभारी भी हूँ ।  ई-अभिव्यक्ति मंच को मराठी साहित्य में एक स्थान दिलाने में  आपका साहित्यिक सहयोग अविस्मरणीय है।आज इस श्रृंखला में यह आपकी गौरवपूर्ण  81वीं रचना है। हम आपसे ऐसे ही साहित्यिक सहयोग की अपेक्षा करते हैं । आपकी लेखनी को सादर नमन ??)

आपण ब-यापैकी लिहितो हे मला शाळेत असतानाच समजले, आठवीत असताना मी वर्गाच्या हस्तलिखीतासाठी पहिल्यांदा एक हिंदी कविता आणि मराठी कथा लिहिली होती, नंतर अकरावीत असताना माझ्या हिंदी निबंधाचं बाईंनी खुप कौतुक केलं!

शाळेत असतानाच हिंदी कविता प्रकाशित झाल्या, रेडिओ लिसनर्स क्लबच्या रेडिओ पत्रिकांमधून! त्या कविता आवडल्याची झुमरी तलैय्या, राजबिराज (नेपाल) अशी कुठून कुठून पत्रं आली होती.

छापील प्रसिद्धी मला खुप लवकर मिळाली, कथा/कविता आवडल्याची पूर्वी पत्रे येत नंतर टेलिफोन – मोबाईल वर लोक आवर्जून कौतुक करतात. खुप छान वाटतं, युवा सकाळ, प्रभात,  चिंतन आदेश या साप्ताहिकातून सदरे लिहिली त्या लेखनाने खुप आनंद दिला, आकाशवाणी वरच्या श्रुतिका लेखनाने प्रसिद्धीआणि पैसा दोन्ही मिळालं, स्वराज्य मधल्या कवितेचं ऐंशी साली दहा रूपये मानधन मिळालं (ते आयुष्यातलं पहिलं मानधन) तेव्हा खुप आनंद झाला होता.

लेखनाने मला आयुष्यात बरेच मोठे समाधान दिले आहे, मान मिळाला, अल्प स्वल्प का होईना मानधन मिळाले, स्वतःची ओळख निर्माण करता आली. मुख्य म्हणजे  अनेक संस्थांनी लेखिका, कवयित्री, गजलकार म्हणून नोंद घेऊन पुरस्कारही दिले!

सध्या ई अभिव्यक्ती वरचे लेखनही खुप समाधान देत आहे, मला ही संधी दिल्याबद्दल हेमंतजींचे आभार!

खरोखर लेखणी ने आयुष्याचे सार्थक केले, मी ज्या सामाजिक गटातून आले आहे तिथे इथवर येणं खुप मुश्किल होतं, त्या काळात बाईचं अस्तित्व चार भिंतीत बंदिस्त होतं आणि मी ते स्विकारलं होतं, अपेक्षा नसताना,फार आटापिटा न करता हातून लेखन झाले ही नियतीची कृपा!

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वृद्धत्व … ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆  विविधा ☆ वृद्धत्व … ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

 

‘जगाच्या पाठीवर’ सिनेमातील ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे…’ गाणं ऐकलं की मनुष्याच्या तीन अंकी जीवन नाटयाचा पडदा अलगद डोळ्या समोर उलगडत जातो. बालपणातील निरागसता, तारुण्यात आल्यावर रंगीबेरंगी आयुष्याचा उपभोग घेते आणि तीच वृद्धत्वाकडे झुकू लागली की, आपल्या जीवनाची गत साले उलगडू लागते.मागे वळून पाहताना….. या सदरात पन्नाशी पासूनचा माणूस सतत डोकावू लागतो भूतकाळात!

बालपण, तरुणपण आणि वृद्धत्व या माणसाच्या जीवनातील तीन अवस्था गदिमांनी त्यांच्या काव्यात किती सहजतेने दाखवून दिल्या आहेत!

गदिमांचे अर्थपूर्ण काव्य मनाला भावते. .आज सत्तरीला आलेला मनुष्य ही  बरेच सुखाचे आयुष्य उपभोगतोय, पण  काही दशकांपूर्वी हे वृद्धत्व इतके सुखाचे नव्हते.मोठा कुटुंबकबिला, आर्थिक अडचणी, आजारांवर फारसे उपचार नाहीत अशा काळात हे वृद्धत्व अतिशय त्रासदायक होत असेल बहुतेक! सध्या माझ्या डोळ्यासमोर माझी आई 92 वर्षाची आहे तिचा जीवनपट येतो, कारण त्यांच्या पिढीने देशाचे पारतंत्र्य, स्वातंत्र्य अनुभवले तसेच कुटुंबासाठी खूप खस्ता खाऊन आता चांगले आयुष्यही उपभोगले, मुले  नातवंडे च काय पण पंतवडे बघण्याचे भाग्य ही तिला मिळाले. खरोखरच पिकल्या पानासारखे आयुष्य आहे तिचे आता,पण अजूनही तिच्या चेहऱ्यावर तोच जगण्याचा उत्साह बघते तेव्हा खूप आश्चर्य वाटते ही जगण्याची उमेदच त्यांचे आयुष्य वाढवत असेल! आताच्या काळात छोट्या छोट्या गोष्टींनी ढासळणारी मने आणि आणि त्यामुळे होणाऱ्या आत्महत्या पाहिल्या की  वाटते किती कमकुवत झाली आहेत माणसं!

निसर्गाचे एक संकट आलं की आपण कोसळून जातो. मग ते वादळ असो की पूर असो की करोना असो. प्रत्येक संकटाचा मनाला बाऊ वाटतो. त्यातून वर्तमानपत्र, टीव्ही यामुळे तर आपण जगालाच घरात निमंत्रित करून घेतले आहे की ज्यामुळे आपण आपली मनःशांती च घालवतो. काहीवेळा वाटतं अज्ञानात सुख असतं म्हणतात तेच खरं! पूर्वी पंचक्रोशीतील एखादी चांगली वाईट गोष्ट  कळायला सुद्धा तीन-चार तास लागत असत आणि आता आपण लांब अंतरावर चा प्रत्येक क्षण सुद्धा त्या क्षणी पाहू शकतो, चांगला किंवा वाईट!राम मंदिराच्या पायाभरणी समारंभ नरेंद्र मोदीजीं चा हस्ते कसा घडत होता ते दृश्य आपण टीव्हीसमोर बसून पाहू शकलो आणि काही काळ आपण आपले काम बाजूला ठेवून राम राज्याची स्वप्ने पाहिली. हे राम मंदिर आपण लवकरच पाहू असा विश्वास वाटला.

वृद्धत्व काहीवेळा मनाचेच जास्त असते. काही अवयव नसलेली माणसे आपल्या आयुष्यात जिद्दीने उभी रहाताना पाहिली की वाटते आपल्याला परमेश्वराने सर्व काही दिले असतानाही आपण मनानेच वृद्ध होतं जातो त्याउलट हात-पाय नसणारी तर कुणी मुकी बहिरी माणसे परमेश्वराला आव्हान देतात आणि स्वतःला काम करायला उद्युक्त करतात.97 वर्षाचे बाबासाहेब पुरंदरे नव्वद वर्षाच्या लतादीदींना म्हणतात की तुमची शंभरी पहायला, तो सोहळा अनुभवायला मी असेन तेव्हा खरोखरच त्यांच्या जिद्दीला आणि आशावादाला सलाम करावा वाटतो!या वयात गड चढणारे मनाने तरुण बाबासाहेब त्यांना वृद्धत्वाचा स्पर्शच झालेला नसतो.!

नकारात्मक  किँवा काही प्रमाणात पॅसिव्ह वृत्ती असणाऱ्या व्यक्तींना वृद्धत्व लवकर जाणवायला लागते असे मला वाटते. Positive विचाराचा माणूस जीवनाकडे नेहमी आशावादी वृत्तीने बघतो म्हणूनच तो अधिक उत्साहाने आयुष्य  उपभोगतो हेच खरे! निसर्गाचा आपण एक भाग आहोत त्यामुळे निसर्ग क्रमानुसार उत्पत्ती स्थिती लय हे आपल्या साठी आहे च! त्याची जाणीव असावी पण सतत आपण काय जाणारच आहोत या भावनेचे वृद्धत्व मनात ठेवू नये. निसर्गात बी रुजते,रोप येते, त्याचेच पुढे झाड बनते. फुले फळे येतात. हळूहळू पाने पिवळी पडू लागतात आणि गळतात कालांतराने ज्याचे जेवढे आयुष्य त्याप्रमाणे झाडाचे आयुष्य संपते आणि मातीत विलीन होते. तसेच आहे आपलं आयुष्य! वृद्धावस्था ही बिकट असली तरी मनाने तिचा स्वीकार करून आहे ते आयुष्य आनंदात घालवण्याची किमया ज्याला जमली तो वृद्धत्व चांगल्या तर्हेने घालवू शकेल! मागच्या पिढीतील बऱ्याच वृद्धांकडे पहाताना मी अधिक डोळसपणे विचार करते आणि यापुढील आयुष्याचा स्वीकार करण्यासाठी मनाला तयार करते! आई कडील आठ-पंधरा दिवसाच्या या वास्तव्यात त्या लहान झालेल्या देहाच्या कुडीतील ही ऊर्जा पाहून माझ्या मनात वृद्ध त्वाचे असंख्य विचार उमटले त्यातून लिहिलेले हे विचार स्पंदन!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाई… भाग -2☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ भाई… भाग -2☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

“कटाप्पाने बाहुबली को क्यू मारा?”

या शेवटच्या वाक्यात ‘बाहुबली भाग- २ ची बीजे रोवली होती आणी भाग- २ येणार हे नक्की होते.

*”भाई”  वरचा लेख व्हायरल झाल्याचे लक्षात आल्यावर* टुकार लेखकाचे कौतुक करायला अनेकजण पुढे आले.  टुकार लेखकाच्या लक्षात आले की भाई- भाग २ ची बीजे पहिल्या लेखात आहेतच की,  मग काय .

लिहायचे निमित्य बाकी काही नाही. (नाहीतर लिहायची हिंम्मत तरी झाली असती का? , आता या टुकार लेखकाला कसे समजवायचे की भाग- १ चीच हवा जास्त होते. २,३ वगैरे कामाचे नसतात. असो ).

तर पहिल्या भागात, भाईं सुनिताबाईंना सांगत होते की बरं झालं अत्रे ढाराढूर झोपले होते नाहीतर सकाळी आपल्याला विडंबन रुपी  गाण्याचा ‘झेंडूच्या फुलांचा’ हार  मिळाला असता.

मंडळी, अत्रे अजिबात झोपले नव्हते बरं का.   त्या दोघांचे बोलणे आचार्यनी सगळे ऐकले.  भाई आणि सुनिताबाईं पुण्याला गेल्यावर “फाॅर अ चेंज” अत्रे भाईंच्या खुर्चीत बसले आणि त्यांनी झेंडूच्या फुलांचा हार विणायला घेतला.

चाल:  बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला)

भाई भाई,  व्यक्ती वल्लीचा कसा सिनेमा घडला.
भाई भाई ….

चिमणा गटणे, साहेब रावा
चिमण्या थेटरात, “म्हैस” थांबवा
चिमणी पोर , घेऊन गाडी
हेल्मेट घालते, आपल्या नव-याला
चिमणं चिमणं “सिंबा” थांबवलं ,त्याही थेटरला

भाई भाई,  व्यक्ती वल्लीचा कसा सिनेमा घडला.
भाई भाई ..

शिलेदार ‘महाराष्ट्र भूषण’ माझा, थोर असा साहित्याचा राजा
भोळा भोळा जीव माझा जडला त्याच्या कलेला .

‘आहे मनोहर तरी’ पसारा, खेळ पाहुनी जीव रंगला
गोजिरवाणी  जुगलबंदी, वाजवितो भाई पेटी गाण्याला
येडं यडं मन येडं झालं पाहून “भाईला”

भाई भाई,  व्यक्ती वल्लीचा कसा सिनेमा घडला.
भाई भाई ..

आज सकाळी पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावर क्र-१ वरुन सुटणा-या “दख्खनच्या राणीने” आपल्या नियोजीत वेळेत एक शिट्टी जोरात मारून मुंबई कडे झेप घेतली. आज तिला माहित होते की गाडीत अख्या मराठी सृजनांचे लाडके “भाई आणि सुनिता बाई ” विराजमान आहेत. तळेगावत ते लोणावळा धुकं जास्त असल्याने राणीला मुंबईला पोहोचायला थोडा उशीरच झाला पण मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर ‘धावपट्टीच्या’ कामासाठी मेगा-ब्लाॅग घेतल्याने भाईंचे पुष्पक थोडे उशिराच सुटणार होतं त्यामुळे काळजीचे काम नव्हतं.

इकडे आचार्य झेंडूच्या फुलांचा हार हातात घेऊन स्वर्गाच्या प्रवेशद्वारावर दोघांच्या स्वागतासाठी  ‘ भाई’ अजून कसे आले नाहीत म्हणून येरझा-या घालत आहेत.

*पु. ल देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्य,  लाडक्या भाईंना टुकार लेखकाकडून ही लेखनांजली समर्पित* ?

©  श्री अमोल अनंत केळकर

५/१/१९
शनी अमावस्या

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कांदेपोह ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते

☆ विविधा ☆ कांदेपोह ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

संध्याकाळची वेळ होती. टेरेवर वनिता फेऱ्या मारत होती. आपण किती चाललो हे पाहण्यासाठी सोबत मोबाईल ही होता. आवडती गाणी ऐकत शांत फिरण्यातील मौज काही औरच होती.तो आनंद घेत असताना मोबाईलची रिंग वाजली. बघते तर भाचीचा होता.ही प्राची पुण्यात जाॅब करते.” हं… बोल प्राचू,काय म्हणतेस?”

“अगं… अतू आज ना… मी मुलगा बघायला गेले होते. त्यांची माझी भेट झाली.”

“तूला कसा वाटला तो? काय करतो? कसा दिसतो? कुठे असतो?”

“अगं किती प्रश्न ते? हे बघ त्याचा फोटो आणि त्यांचे सगळे डिटेल्स मी तुला सेंट केले आहे.  मग मला कळव. तुला कसा वाटला तो? या बाबत तूच माझी गुरू आहेस बरं. बरं फोन ठेवते, मला एक काॅल येतोय रात्री निवांत बोलू,बाय..बाय..आय लव्ह यू.”

फोन कट झाला.

मनात आले. ही पिढी किती प्रक्टिकल आहे. बरोबर चूक हा भाग पुढचा. ही पिढी उगाच गुंतून पडत नाही. त्रास करून घेत नाही.भाऊ माहिती पाठवतो. मग प्राची पुण्यात नोकरी सांभाळत मुलांना बघते. ते ही एका हाॅटेल मध्ये एकटी जाते. बोलते. विचारांची देवाण घेवाण होते.हे सारं किती सुटसुटीत छान आहे. एका क्षणात माझे मन भूतकाळात गेले. आमच्या वेळी पस्तीस, चाळीस वर्षा पूर्वी घरात मुलगी बघायला पाहुणे येणार म्हणजे किती गडबड, किती लोकांची ऊठबस, किती तयारी, किती दमणूक होत असे.

घर स्वच्छ करा, बैठकीची खोली सजवा, ठेवणीतल्या कपबश्या काढा स्वच्छ करून ठेवा, कांद्यापोह्यानची तयारी करा, कांदेपोहे सुधा एकदम स्पेशल. त्यात शेंगदाणे हवेत, बटाटा हवा, खोबरंकोथिंबीर हव, लिंबू,बारीक शेव हवी. किती मिजास असे पोह्यांची. असे गरमागरम पोहे समोर आले की सगळं विसरायला होत असे. एवढ करून ही मुलाला बिधास्त बघता येत नसे. बघण्यांची चोरी. कुठेन तरी लांबून, एखाद्या फटीतून चोरुन बघाच आणि मग अंदाज करत बसायचं यातला नेमका नवरदेव कोण? मुलीला बघताना मुले आपल्या सोबत तीन चार मित्रांना हमखास घेऊन येत, साडी सांभाळत खाली मान घालून बसायचं, चोरट्या नजरेने बघायचं, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना हळू आवाजात उत्तरे द्याची. आपली इच्छा असली तरी मुलाला प्रश्न विचारण्यांची हिंमत नसायची. घरातल्या वडिलधाऱ्या बायकांनी आधी दटावून ठेवलेले असायचे तुझा शहाणपणा तुझ्या जवळ ठेव. तिथं वर तोंड करून काही बोलून आपली अक्कल पाजळू नकोस. खर तर परक्या माणसा समोर जाताना आधी मनात भिती असायची, चारचौघात बोलण्यांची सवय नसायची, मग  काय बऱ्याच वेळा ततपप व्हायच. अश्या वेंधळा मुली लगेच पसंतीला उतयाच्या. पुढे ही मुलगी घरात निमुट वागेल असा अंदाज बांधला जायचा. खर तर बऱ्याच मुलीच्या मनाचा तिथे चोळामोळा होत असे. तिच्या विचारांना फारशी किंमत नसे.ती मिळवती असली तरी ही. घराण्यांची अब्रु जायला नको म्हणून बोलायचे नाही. चांगल्या वळणाची, सुसंस्कृत, शिवणटीपन करणारी, स्वयंपाकपाणी करणारी अशी किती तरी लेबलं चिटकवली जायची. ती मुलगी मात्र मुक. घरच्या पुढे चालत नसे. बऱ्याच वेळा मुलींची फसगत होत असे. दोघांनी भेटून मन समजून घेणे खुप पुढची गोष्ट. पुन्हा एकदा बघण्यांची पध्दत नव्हती, लग्न नंतर समजे तिला आवडलेला मुलगा नेमका मुलाचा मित्र होता. मग काय आलीया भोगाशी असावे सादर. हसतमुख राहून संसार नेटका करावा लागे.

माझ्या बाबतीत तर अजून वेगळे आम्ही पाच भावंडे.दोन बहिणी मोठ्या तर एक छोटी. भाऊ माझ्या पाठीवर.मोठ्या बहिणीना बघायला येणार त्याना त्रास नको म्हणून प्रत्येक वेळी घर आवरण्या पासून पोहे करे पर्यंत सगळं कामे मी करत असे. पोहे इतके बनवले की डोळे बांधून ही आज  बनवेन. पण माझ्या वेळी मात्र घरी कोणीच नव्हते. मीच घर आवरायचे, बैठकीची खोली सजवायचे, पोहे करायचे, साडी नेसून पाटावर बसायचे. किती वेळा पाहुण्याना पत्र व्यवहार ही मीच करे. मी यात एकदम तंज्ञ झाले.

प्राचीमुळे आज इतक्या वर्षांनी आठवणींना उजाळा मिळाला. आज काल अशी झंझटे नाहीत. हाॅटेल मध्ये सगळं तयार असतं, कसली आवरा आवर नाही, सजावट नाही, कांदेपोहे नाहीत, मनावर दडपण नाही, सगळ कस मस्त मोकळं. मुलामुलीना आपलं मत मांडता येते, एकमेकांना जाणून घेता येते. अडचणी मांडता येतात, हे सारं चांगले आहे. याचा पुरस्कार व्हायला हवा. मुलीनां ही एक व्यक्ती म्हणून वागणूक दिली जात आहे दिली गेली पाहिजे. लग्न ठरवताना मुला मुलीचा बाजार होता कामा नये.

आजवर कांदेपोह्यांनी अनेक संसार उभारले, जीवनात आनंद पेरला, आज संकल्पना बदलत आहे. मुलामुलीची बघण्यांची ठिकाण बदलत आहेत. खाण्यांचे पदार्थ बदलत आहेत पण लग्न जुळवण्याचा विषय आला की कांदेपोहे समोर येतातच त्यांचे लग्न जमवण्यात अतूट नाते आहे. आता फेऱ्या मारताना माझ्या समोर हा भूतकाळाचा का उभा राहावा? काही झालं तरी एकमेकांना समजून घेण्यासाठी, नातं दृढय करण्यासाठी काही तरी निमित्त हवं असतं ते निमित्त आजवर समाजाने त्या कांदेपोहे यात शोधले यात त्यांचा काय दोष?

 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाई… भाग -1☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ भाई… भाग -1☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

भाई, चला आवरलंय माझं. उशीर होईल  नाहीतर खेळाला पोचायला.

आग सुनिता, थांब एवढ  शेवटचं पान लिहितोय, पण कुठला खेळ ?

काय हे भाई, “भाई” सिनेमाचा पहिला शो.

सुनीता अग या हिंदुस्थानात भाईचा सिनेमा फक्त ईदला येतो. मार्गशिर्ष कृष्ण १४ ला अमावस्येच्या पूर्वसंध्येला  येणारा हा कुठला ‘भाई’ ?

भाई, बास झालं हा माझी फिरकी घेणे.  ज्याने आयुष्यात अनेक अमावस्यां सोसून  मराठी सारस्वताच्या दुनियेत ‘पोर्णीमा’ खुलवली त्या भाईचा म्हणजे तू अर्थात “पुरुषोत्तम  लक्ष्मण   देशपांडे” यांच्या वरचा ‘भाई ‘ सिनेमा.

बरं  बरं. त्या उबेराला  विचार राफेल तयार आहे का?

काय?  भाई कालच्या संसदेतील चर्चा  फारच मनावर घेतलीयस तू? त्या रंभेला सांगून  २०१९  लोकसभा होई पर्यत केबल बंद करायला सांगते.

त्या कुबेराला पुष्पक विमान तयार आहे का असं म्हणायचंय का तूला?

हो. हो  तसेच

भाई, त्यांनी आधीच सांगितले आहे  पुष्पक तयार आहे  तुम्हाला मुंबईकर, नागपूरकर का पुणेकर म्हणून जायचंय?

बघ सुनीता, त्या नागपूर मधील  उणे तापमानातील थंडी काही आपल्याला सहन व्हायची नाही,  १२ अंश तापमानाला गिरगावकर, पार्लेकर, डोबिवलीकराना जणू इकडे काश्मीर, महाबळेश्वर अवतरलं असे वाटत असलं तरी तिकडे मराठी सिनेमा कुठे लागला आहे हे हुडकण्यात आपला वेळ जाईल

*तेव्हा आपले पुणेच बरे*

माझ्या मनातलं बोललात भाई

अग  सुनीता तो बघितलास का अंतू बर्वा, ‘ बटाट्याच्या चाळीत ‘  कुठली स्कीम घेऊन गेलाय. ‘असामी असामी’  व ‘अपूर्वाई’ पुस्तक घेतल्यास  ‘भाई’  सिनेमाचे एक तिकीट  मोफत असं ओरडत सुटलाय

अमॅझीग  ना भाई?

नाही सुनीता कलियुगात त्याला ‘अमेझॉन’ का काय म्हणतात ?

घ्या आता  हेच बघायचे राहिले होते मी म्हणतच होतो ‘सखाराम गटनेने’ अजून ‘व्हाट्सअप वर’ चारोळी कशी पाठवली नाही ते. बघ काय म्हणतोय तो :-

हेल्मेट सक्तीने पुण्यात

सगळ्यांना आली ‘फिट’

अन ‘भाई’  ऐन हिवाळ्यात

एकदम होणार ‘हिट’

आपलाच  – सखाराम गटणे

चितळे मास्तरांनी तर आज शाळेच्या मुलांना सहलीला नेतो म्हणून ‘भाई’ दाखवायचं ठरवलं आहे, बरं का सुनीता

भाई  किती प्रेम आहे तुझे तुझ्या या पात्रांवर आणि त्यांचे तुझ्यावर. आता फक्त एवढे सांगू नकोस की ती  रत्नागिरी  – मुबंई बसच्या वाटेत हातखंब्याला आडवी आलेली

“म्हैस”  कोथरूडला सिटीप्राईडचा प्रागंणात रवंथ करत लाडक्या ‘भाईची’ वाट बघतेय आणि  तिने दिलेल्या शेणाच्या  गोण्यांची शेकोटी करून ‘नाथा कामत’, नंदा प्रधान, अण्णा वडगावकर, नामू परीट, गजा खोत, रावसाहेब तिकीटाच्या रांगेत उभे आहेत.

?

अगदी बरोबर सुनीता, आणि तो नारायण  तिकीटाच्या रांगेत स्वतःच्या नावाचा दगड ठेऊन, सगळ्यासाठी पॉपकॉर्न रूपी लाह्या फुटाणे आणायला पळालाय.

किती चेष्टा करशील  सुनीता तू माझी, हे काय वय आहे का? आपण स्वर्गात आलोय आपण आता पुण्यात नाही आहोत. काल रात्री झोपेत काय गाणं बडबडत होतीस माहीत आहे?

‘भाई भाई, व्यक्ती वल्लीचा, कसा सिनेमा घडला, बाई बाई’

नशीब ‘आचार्य अत्रे’ बाजूला ढाराढुर झोपले होते नाहीतर आज काळी पूर्ण गाण्यांसह

‘झेंडूच्या फुलांचा’ हार गळ्यात पडला असता आपल्या

भाई, ते जाऊ दे. चला ना जरा लवकर निघून मस्त  पर्वतीवर जाऊन सारसबागेतील गणपतीचं दर्शन घेऊ.

मी तर म्हणतो सुनीता  एक दिवसाची रजा टाकू स्वर्गात. तू म्हणतीस तसे पर्वतीवर जाऊ, सारसबागेत जाऊन स्वेटर घातलेल्या बाप्पाचे दर्शन घेऊ, सिनेमा बघू, आणि हो  तुझ्या मनातले

तुळशीबागेत संध्याकाळी जाऊ, सर्व देव -गणांसाठी  चितळ्यांची अंबा बर्फी आणि बाकरवडी घेऊ  आणि *सगळ्यात महत्वाचे* रात्री मुक्कामाला डेक्कनला  “मालती – माधव” मधै जाऊन  त्या चोराने पुस्तकाचा घातलेला पसारा आवरु  अन सकाळच्या

आपल्या लाडक्या  ‘दक्खनच्या राणीने’ मुंबई पर्यत जाऊ.

परतीचे  पुष्पक विमान  मुंबई हुन  सोडण्याची विनंती करायला भाई  चित्रगुप्तां कडे गेले. पाठमो-या भाईंकडे पाहताना सुनीता ताईंना त्यांचे गुणगुणे  ऐकू आले

हृदयांबुजी लीन लोभी अली हा !

मकरंद ठेवा लुटण्यासी आला  !

बाधी जीवाला सुखाशा मनी !!

*मर्म बंधातली ठेव ही* !!!

*भाई, खूप खूप शुभेच्छा*

 

©  श्री अमोल अनंत केळकर

३/१/१९

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 11 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 11 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

माझा भरत नाट्यम् च्या नृत्यातील एम.ए. चा अभ्यास सुरु झाला. ताईनी मला नृत्यातील एक एक धडे द्यायला सुरवात केली. एम. ए.. करताना मला ज्या ज्या अडचणी आल्या.,  त्याचे वर्णन करताना.,  त्या आठवताना माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो आणि आधीच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आल्या त्याचे काहीच वाटेनासे होते. कारण एम.ए. सारखी उच्चपदवी मिळविण्यासाठी अखंड परिश्रम.,  मेहनत आणि मुख्य म्हणजे एकाग्रता यांची अत्यंत गरज असते. त्यावेळी माझा हा अवघड अभ्यास सुरु असताना माझ्या आई बाबांच्या वृद्धापकाळामुळे.,  वयोमाना प्रमाणे खालावणारी प्रकृति.,  त्यांच्या तब्येतीत होणारे चढउतार यामुने मी खूप अस्वस्थ आणि अस्थिर होऊन गेले होते.

त्यावेळी माझ्या भावाने मिरज – सांगलीच्या मध्यावर असणाऱ्या विजयनगर या भागामध्ये घर बांधले होते. त्याचवेळी माझ्या आईच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे आम्हा तिघांनाही तो तिकडे घेऊन गेला होता. पण माझा नृत्याचा क्लास मिरजेत असल्यामुळे मला तिकडून ये- जा करावी लागत असे. शक्यतो माझा भाऊ मला कार मधून सोडत असे पण ज्यावेळी कामामध्ये तो व्यस्त असे त्यावेळी बाबा वडाप रिक्षाने मला सोडत असत. नेमका त्याच वेळी बाबांचा पार्किसन्स चा विकार विकोपाला गेला होता. पण मी एम.ए. करावे ही त्यांची जबरदस्त इच्छा होती. त्यामुळे कोणत्याही अडचणीना आम्ही कोणीच दाद देत नव्हतो.

वडाप रिक्षाची वाट पाहात आम्ही जेव्हा उभे असू त्यावेळी आम्हाला बरेचदा रहदारीचा रस्ता क्रॉस करून जावे लागत असे.त्या रस्त्यावरून दोन्ही बाजूंनी भरधाव धावणाऱ्या गाड्या सुसाट धावत असत.त्यामुळे आम्ही ही जीव एकवटून रस्ता ओलांडत असू.त्यावेळी मला बाबांच्या हाताची थरथर जाणवत होती आणि चालताना ही त्यांना होणारे परिश्रम समजून येत होते.पण ते कोणतीही तक्रार न करता माझ्यासाठी भर दुपारी येत होते.त्यांच्या जिद्दीचे पाठबळ होते म्हणूनच तर सगळे जमू शकले.

नृत्याच्या प्रात्यक्षिकाचे मार्गदर्शन सुरू झाले होते.पण आता प्रश्न होता तो थिअरी चा.एम ए च्या अभ्यासासाठी., भारतीय नृत्यांच्या अभ्यासाबरोबर तत्त्वज्ञान या सारखा किचकट विषय होता.अशा एकूण प्रत्येक वर्षी चार पेपर्स चा अभ्यास मला करायचा होता.आता मोठा प्रश्न होता तो वाचनाचा.मला., मी अंदमानला जाऊन आल्यावर., ज्यांनी माझी मुलाखत घेतली होती., त्या सौ अंजली  ताई गोखले यांची आठवण झाली.आणि मी त्यांना  फोन केला.त्यांनी मला वाचून दाखवायला सहज आनंदाने होकार दिला.अशारितीने माझा तोही प्रश्न सुटला.ताईंनी त्यांच्या एमएच्या काही नोट्स मला वाचण्यासाठी दिल्या होत्या.त्याव्यतिरिक्त खरे मंदिर वाचनालय यामधून संदर्भग्रंथ आम्ही मिळवले होते.अशा तऱ्हेने एम एच या अभ्यासाचे रुटीन छान बसले.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वप्न ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ विविधा ☆ स्वप्न ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

स्वप्न हे माणसाला मिळालेलं वरदान आहे. ते जागेपणी बघितलं तर ते एखाद्या चित्रासारखं, रांगोळी सारखं माणूस  त्याला हवं तसं रेखाटू शकतो. त्यांत मनासारखे  रंग भरु शकतो. क्षणभरासाठी का होईना कृतकृत्य  होतो.

एखादी अल्लड तरुणी परीकथेतील राजकुमारला साद घालून स्वप्नात बोलावते. किंवा एखादा जेमतेम सुमार असलेला तरुण त्याच्या  समोर राहणारी सुंदर तरुणी आपली जीवनसाथी झाल्याचे स्वप्न  रेखाटतो.एखादा देवानंद आपल्या प्रेयसी बरोबर संसाराचे स्वप्न रंगवतो. ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है….

एखादं नवदांपत्य, त्याना नुकतीच बाळाची चाहूल लागते.मग त्यांचा स्वप्नाचा चलत् चित्रपट चालू.आपल्याला मुलगा होणार का मुलगी, मग त्या बाळाचे नाव काय ठेवायचं इथपर्यंत ठीक आहे.मग त्याला/तिला कोण बनवायचे? वडिलांचे एक मत तर आईचे दुसरेच मत.मग त्यावर गोड वादविवाद. मग ती मुलगी झाली तर तिला शिकवायचे,लाडाकोडात वाढवायची आणि दुस-याला द्यायची. ह्या कल्पनेनेच आताच डोळ्यांत पाणी.म्हणजे स्वप्न बघायला आणि ते किती काळापर्यंत त्याला मर्यादा नसते.

“मला ना सिनेमा, नाटकात काम करायची लहानपणापासून खूप इच्छा होती. पण आमचे आजीआजोबा  जुन्या वळणाचे त्याना पटलं नसतं म्हणून माझंअपुरं लिहिलेलं स्वप्न आता मी माझ्या मुलीकरवी पूर्ण करणार”. मग त्या मुलीला त्याची आवड आहे का? तिचा कल तिची,कुवत आहे का? ह्याचा विचार

न करता आईचं स्वप्न पूर्ण मुलीच्या करवी करायच्या अट्टाहासापायी त्या मुलीवर लादायचे. त्या मुलीच्या स्वतःच्य स्वप्नाची राखरांगोळी होते.तिला काही ध्येय रहात नाही.हे लक्षात घ्यायचे नाही.फक्त आपली स्वप्नपूर्ती. अशा कित्येक मुलांना हेच सहन करावं लागतं. मनाविरुद्ध कोणत्याही स्पर्धेत धावावं लागतं केवळ आईवडिलांची स्वप्नपूर्ती. जी ते त्यांच्या वेळी करु शकले नाहीत.एखाद्याचे भाषेवर प्रभुत्व असते.आवड असते. पण आई,वडील डाॅक्टरी पेशात म्हणून त्याला विज्ञान शाखेला जायची सक्ती. मग काय डाॅक्टर तर दूरच पण कम्पौडरच्या पण लायकीचा न रहाता गटांगळ्या खाऊन नैराश्याच्या गर्तेत पडतो.

काही माणसे एखादं स्वप्न बघतात आणि मग ते सत्यात उतरवायला पाठपुरावा करतात.यशस्वी होतात.म्हणून स्वप्न नेहमी मोठी बघावी.आणि ती पूर्ण करण्यासाठी झटावं.हीच यशस्वी जीवनाची किल्ली आहे.

रात्रीची स्वप्न मात्र बेभरवंशाची.कधी आपल्या मर्जीची,कधी मनाविरुद्ध. कधी मनाला पटणारी,हवीहवीशी वाटणारी, संपूच नये कोणी झोपेतून उठवू नये.असं वाटणारी.तर कधी भयानक,कल्पना शक्ती च्या बाहेरची घाबरवणारी. घाम फुटवणारी, जाग आल्यावर ‘चला स्वप्न होते, सुटलो म्हणून आनंदी करणारी.

काही स्वप्न इतकी छानच असतात कि देवाघरी गेलेले आपले आईवडील, किंवा अन्य कोणी परत आपल्याला कधीच भेटू शकत नाही,बोलू  शकत नाही ते स्वप्नात येऊन खूप वेळ आपल्याशी पूर्वीसारख्या च गप्पा मारतात. आताशा व्हिडिओ काॅल करुन दूर अंतरावर  असलेल्या आपल्या मुलाला आईवडील पाहू शकतात बोलू शकतात. पण पूर्वी ही सोय नसल्याने स्वप्नात आलेल्या मुलाला बघून समाधान मानायचे.कधी जागेपणी  आपल्या पसंतीच्या मुलीबरोबर त्याच्या विवाहाचे स्वप्न रंगवायचे.कधी हे स्वप्न पूर्ण ह्वायचे  तर कधी तो परस्पर ठरवून नमस्काराला येऊन ह्यांचे स्वप्नभंग करायचा.

कलियुगात माणूस  आपल्या स्वप्नाचा सोईस्कर नेहमीप्रमाणे  अर्थ लावतो. सोडून देतो.पण त्रेतायुगात स्वप्नात दिलेल्या वचनाला जागण्यासाठी सत्यवादी हरीश्चंद्राने स्वतःच्या, पत्नीच्या, मुलाच्या जिवाचीही पर्वा केली नाही.

आपण सारखा जो विचार करतो त्याचच झोपल्यावर स्वप्न पडते. कधी त्यामुळे  इच्छापूर्ती होते,कधी विरस होतो.

स्वप्न कोणी कसलेही बघावं म्हणजे तो बघू शकतो त्याच्या मर्जीनुसार.त्याला पैसा लागत नाही.स्थळ,काळ,वेळाचं बंधन नसतं.कोण व्यक्ती आपल्या स्वप्नात यावी, कोण नको हे पण स्वातंत्र्य असते.एखादा कंगाल माणूस स्वप्नात स्वर्गात रंभा,उर्वशी बरोबर विहार करतो तर एखादा क्रिकेटवीर गावस्कर, तेंडुलकर बरोबर स्वप्नांत खेळू शकतो.एखाद्या देवभोळ्या माणसाला विठू भेटतो.

! मनी वसे ते स्वप्नी दिसे !

 

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – १२) – भावविभोर भटियार ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – १२) – भावविभोर भटियार ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

संगीत जय जय गौरीशंकर नाटकातील विद्याधर गोखल्यांच्या ‘निराकार ओंकार साकार झाला, तये विश्वसंचार हा रंगविला’ ह्या शब्दांतला साकार होणारा ओंकार म्हणजे वसंत देसाईंनी त्यासाठी योजलेली भटियार रागाची धून! ह्या रागाचं रुपडं ‘पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा’ ह्या शब्दांतही नेमकं जाणवेल. पूर्वी डीडी-नॅशनलवर ‘राष्ट्रीय साक्षरता मिशन’ अधोरेखित करणारं हे सुरेख गीत लागलं कि त्या बालवयातही कान टवकारले जात हातातला उद्योग सोडून डोळे टीव्हीकडं वळायचे ते त्यातील मनाला अक्षरश: खेचून घेणाऱ्या सुरावटीमुळं! पूर्वेला क्षितिजावर साकार होणारं तेजबिंब पियुष पांडेंच्या ह्या शब्दांत उमटलेलं पाहाताना संगीतकार अशोक पत्कींना ते सुरांत सजवताना भटियारची सुरावट आठवावी हे आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताचं सामर्थ्य! ह्या रागाची शास्त्रनिर्धारित गाण्याची वेळ ही सूर्याचा पहिला किरण पृथीवर पडतानाचीच आहे.

आपण मागच्या भागात पाहिलेल्या संध्याकाळच्या संधिप्रकाशी रागांतल्या सर्वपरिचित मारवा रागाची छटा ह्या सकाळच्या संधिप्रकाशाच्या सीमारेषेवरच्या रागातही शुद्ध धैवत, शुद्ध निषाद व कोमल रिषभाच्या स्वरसंबंधांतून दिसून येतेच… अर्थात भटियारची उत्पत्तीही मारवा थाटातूनच झालेली आहे. मात्र पुढे षड्जावरून वादी असलेल्या शुद्ध मध्यमावरची तेजस्वी झेप व शुद्ध मध्यमावरून पंचमाच्या कुशीत शिरून विसावणं ही गोष्ट आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. पंचमावरून परतताना गंधारवरचा क्षणभर थांबा आणि त्यानंतर पंचमावरून कोमल रिषभावर ओघळणारी मींड म्हणजे झेप घेताना विहंगम होत चंचलतेकडे झुकणाऱ्या मनाला पुन्हा गांभीर्याने स्थिरावायला मदत करणारं साधन!

‘जगाच्या पाठीवर’ ह्या चित्रपटातील ‘जग हे बंदिशाला, कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला’ किंवा संगीत मत्स्यगंधा नाटकामधील वसंत कानेटकरांचं ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ अशा वरकरणी थोड्याशा हताश, उदास शब्दांनाही ह्या रागाचा रंग शोभून दिसतोच. कारण कुठंतरी अशा हताश क्षणांत होणारे साक्षात्कारच काळरात्र दूर सारत नव्यानं (उगवून)  उभरून, तेजाळून येण्याची चाहूल आणि चेतना घेऊन येतात… म्हणूनच कि काय भटियारमधल्या चैतन्यमय धैवताची ऊर्जा इथेही किमया घडवते.

भटियार रागातील बंदिशी ते रागधूनीवर आधारित सुगम संगीतातील बहुतांशी रचनांमधे उठून दिसणारा शुद्ध धैवत हा मला आजोबांनी नेटकी व साजिरी, देखणी देवपूजा केल्यानंतर समईच्या प्रकाशात उठून दिसणाऱ्या प्रत्येक देवमूर्तीच्या कपाळावरील मधोमध कुंकवाचा ठिपका ल्यायलेल्या नीटस व रेखीव चंदनी टिळ्याची आठवण करून देतो. भटियार रागाची ओळख सांगणाऱ्या जागांपैकी पधनीपधमप हा हिंदोळ फार लडिवाळ आहे… आपल्या मनाला एक सुखदायी झोका देणारा!

आशाबाईंच्या भावगर्भ सुराने सखोल अर्थासहित आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या, वसंत प्रभूंचा स्वरसाज असलेल्या ‘हरी उच्चारणीं अनंत पापराशी, जातील लयासी क्षणमात्रे’ ह्या ज्ञानोबारायांच्या रचनेचं सार्थस्मरणही ‘भटियार’निमित्तानेच! भक्तिभावाने केलेली ‘सुर’संगत किंवा ‘सूर’संगत दोन्हींतूनही हे साधत असावे.

किशोरीताई आमोणकरांनी केलेला ‘बोलाला विठ्ठल’ अभंगाच्या स्वररचनेच्या धृवपदातील भटियारचा प्रयोग आपल्या मनाला भक्तिरसात चिंब भिजवणारा आहे.  पुढे अंतऱ्यांसाठी मात्र त्यांनी वेगळ्या अनोख्या वाटा धुंडाळल्या आहेत. अर्थातच एखादी स्वरधून ही जेव्हा ‘राग’ म्हणून सादर होत नाही त्यावेळी तिला रागाच्या नियमांचे काही बंधन नसते. ‘राग’ म्हणून गाताना वर्ज्य व विवादी असलेले सूर नजाकतीनं रागाच्याच सुरावटीसोबत वापरून तयार झालेल्या कित्येक रोमांचक स्वररचना आपण उपशास्त्रीय व सुगम संगीतात पाहातो. परंतू एकूणच उपशास्त्रीय व सुगम संगीतातील रचनांकडे स्वतंत्र दृष्टिकोनातून पाहायला हवे. एखाद्या रचनेला अमुक एक ‘रागाधारित’ असं आपण म्हणतो कारण ती सुरावट आपल्याला त्या विशिष्ट रागाची आठवण करून देते म्हणून! मात्र केवळ त्या आठवणीपायी त्या रचनांसारखा तो राग आहे असे म्हणणे मात्र संयुक्तिक होणार नाही.

हा विचार मनात ठेवता हिंदी चित्रपटसंगीताला नवे आयाम देणारा संगीतकार ए. आर. रहमानचे ‘वॉटर’ ह्या चित्रपटातील ‘नैना नीर बहाए’ हे गीत आठवल्याशिवाय राहात नाही. पहिली ओळ अगदी भटियारचं चलन घेऊन आलेली, मात्र दुसऱ्या ओळीतली राग ललतची छटा ही अगदीच चपखल आणि सुखद धक्का देणारी! म्हणून सुगम रचनांमधे केलेले रागांचे प्रयोग पाहायला मजा जरूर येते, मात्र शास्त्रदृष्ट्या रागाची व्याख्या पूर्ण वेगळी असते.

प्रभाकर जोगांनी ‘भटियार’वरच बेतलेले यशवंत देवांचे ‘कोटि कोटि रूपे तुझी’ हे शब्द रागाच्या बाबतीतही खरे ठरावेत. एकच सुरावट कुणाला कशी दिसते, कशी उमजते, कशी सजवावीशी वाटते ही गोष्ट ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’इतकी विविधता दर्शविणारी आहे आणि एकाच आरोह-अवरोहाच्या परिघात मुक्त संचार करत खरोखरी श्रेष्ठ अशा विविध संगीतसाधकांनी उभी केलेली एकाच रागाची अनंत रूपं ही किमया म्हणजे ‘त्याची’च विविध रूपं नाहीतर काय म्हणावं!!!

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझे फराळ प्रयोग ☆ श्री विनय माधव गोखले

☆  विविधा ☆ माझे फराळ प्रयोग ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

यंदा दिवाळीत बायकोला for a change फ़राळ ‘खाण्यासाठी’ नव्हे तर ‘बनवण्यासाठी’ मदत करावी असे ठरवले होते. खार्‍या शंकरपाळ्याला मदत कर असे बायकोने सुचवले. ह्याचे कारण असे सांगण्यात आले की ह्या पदार्थाला शक्ती जास्त आणि कौशल्य कमी लागते. ह्या निकषावर माझी निवड होणे थोडे मानहानिकारक असले तरी त्यामुळे हिरमुसून न जाता अब्राहम लिंकनने एका रस्ता झाडणार्‍या कर्मचार्‍याला सांगितलेले वाक्य मी मनामध्ये स्मरले. लिंकन साहेब त्याला म्हणाले होते की “रस्ता पण असा स्वच्छ कर की पाहणार्‍याने म्हणावे, “वा, रस्ता काय छान झाडलाय!”

उत्साहाने पोळपाट-लाटणे घेऊन अस्मादिक फ़रशीवर ठाण मांडून बसले. मैदा मळून त्याचा गोळा मला सुपूर्द करण्यात आला. पहिल्यांदाच मैदा लाटत असल्याने एक छोटा गोळा बाजूला काढून दोन्ही हाताने मळून चकती करून लाटायला घेतला. कणकेपेक्षा मैद्याला थोडा जास्त जोर लागतोय असे जाणवले. एकदम परफ़ेक्ट गोल लाटून बायकोला चकित करावे असा माझा प्लान होता. त्यामुळे थोडा हलक्या हात वापरत होतो. पण गोल हा एकमेव आकार सोडून इतरच भलतेसलते आकार त्यामधून उदयास येऊ लागले, उदा. अमीबा, पॅरॅमॅशियम, हत्ती, डायनासॉर, भारताचा नकाशा इ.इ. एकदा तर चीनी ड्रॅगन मला वाकुल्या दाखवू लागला. ह्यावर मात्र माझे देशप्रेम उफ़ाळून आले आणि मी ताबडतोब ती पोळी त्वेषाने गोळामोळा करून पुन्हा लाटायला घेतली. पहिली पोळी लाटून बायकोला दाखवल्यावर ती म्हणाली “अरे किती जाड लाटलीस, जास्तीत जास्त पातळ लाट ना!” असे म्हणून थांबली नाही तर तीच पोळी स्वत: ५० टक्क्याने वाढवून दाखवली. “तुला शिकवण्यापेक्षा ना, मीच लाटले तर काम लवकर होईल!” असे कुणीतरी पुटपुटले परंतु हे वाक्य मी ऐकून न ऐकल्यासारखे केले.

नंतर कातण्याने त्यावर पटापट उभ्या-आडव्या रेषा मारायला शिकलो. हे मात्र काम सोपे आणि मजेशीर वाटले. पण इथे उलटी समज मिळाली की हलक्या हाताने कातण फ़िरवावे म्हणजे पोळपाटापासून विलग करायला त्रास पडत नाही. बायकोने मी काढून दिलेले शंकरपाळे तळायला घेतले. आसमंतात छान सुवास दरवळायला लागला. सुरवातीच्या चुकांनंतर जरा वेग पकडता आला आणि साधारण दीड तासानंतर सर्व शंकरपाळे तयार झाले.

दिवाळीत पाहुण्यांना फ़राळ देताना बायकोने माझ्या नावाचा कवतिकाने उल्लेख केल्यामुळे अस्मादिक धन्य-धन्य जाहले!!?

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print