मराठी साहित्य – विविधा ☆ अपार.. अपरंपार… ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ अपार.. अपरंपार… ☆ श्री अरविंद लिमये ☆

क्षण क्षणकाळासाठी येतो. क्षणात विरुनही जातो. सर्वसामान्य माणसं येईल, होईल ते स्विकारत जगत असतात. कालपटलावर अशा सर्वसामान्यांची नावे पुसटशीही उमटलेली नसतात. एखादे स्वप्न, एखादं ध्येय उराशी बाळगून, त्यासाठी सर्वस्वाची आहुती देत झपाटल्यासारखी जगणारी माणसे मात्र त्यांच्या पश्चातही कधीच न पुसणारा अमीट ठसा कालपटलावर उमटवून जातात आणि म्हणूनच दीर्घकाळानंतरही जनमानसावर अधिराज्य गाजवत स्मृतिरुपात अमर रहातात. प्रत्येक क्षेत्राचा आढावा घेतला, तर त्या त्या क्षेत्रातल्या किर्तीरुपाने उरलेल्या अशा अनेक महान व्यक्तिंचा महिमा आदर्शरुपात पुढील पिढ्यांना जगण्याची दिशा दाखवणारा दीपस्तंभ बनलेला

आपल्याला दिसून येईल. इथे प्रत्येक क्षेत्रातल्या वानगीदाखल कांही नावांचा  उल्लेख करायचा ठरवलं, तरी त्या त्या क्षेत्रातील अनेक महान व्यक्तींची असंख्य नावे मनात गर्दी करु लागतील आणि यातली कांही मोजकी नावे निवडणे म्हणजे इतरांवर अन्याय केल्याची रुखरुख मनाला लागून राहील. चित्रपटक्षेत्र, नाट्यक्षेत्र,  गायन, वादन, नृत्यादी कला, लेखन, वक्तृत्त्व, शिक्षण, क्रिडा समाजसेवा… कोणतंच क्षेत्र याला अपवाद नाही. झोकून देऊन काम केलेल्या आणि दर्जाच्या बाबतीत कधीच कसली तडजोड न करता आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्या या क्षेत्रांतील असंख्य व्यक्तिंचा महिमा कालातीत आहे हीच त्यांची महानता..!

राजकारण हे क्षेत्र तसं दलदलीचं. भल्याभल्यानाही लोकानुनयासाठी तडजोडी करीतच इथे श्वास घेता येतो यावर विश्वास ठेवायला भाग पाडणारं हे क्षेत्र..! पण याही क्षेत्रात वीर सावरकर, म.गांधी, बाबासाहेब आंबेडकर, सी. डी. देशमुख, लालबहादूर शास्त्री अशी मोजकी का होईना चटकन् आठवणारी नावे आहेतच. क्षेत्र कोणतेही असो महानतेच्या निकषावर खरी उतरतात ती तत्त्वनिष्ठ, प्रामाणिक, ध्येयाने पछाडलेली चांगल्या अर्थाने ‘वेडी’ माणसे..! आणि त्यांचाच महिमा निर्विवाद महान ठरतो.

अर्थात हा सगळा व्यक्तिगत महिमा लौकिकार्थाने, रुढार्थाने दखल घ्यावी असाच आहे.  पण माझ्यामते खरा ‘अपार’ महिमा काळाचाच..! अल्पकाळ, प्रदीर्घकाळ या अनेक काळरुपांच्या पलिकडचा हा ‘काळ’..! ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ म्हणतात त्यातला ‘काळ’नव्हे, तर ‘काळासारखं दुसरं औषध नाही’ म्हणतात ना, तो ‘काळ’..!

क्षण क्षणकाळासाठी येतो. क्षण क्षणात विरुन जातो. या विरुन गेलेल्या अविरत क्षणांचा बनतो तो हाच ‘काळ’..! दु:ख वियोगाचं असो, कांहीतरी निसटल्याचं, हरवून गेल्याचं असो, असह्य असो वा न विसरता येणारं असो, सगळ्या दु:खांवरचं काळ हेच एकमेव रामबाण औषध..! क्लेशकारक, दु:खदायी आठवणींची तिव्रता जसा हा काळ कमी करतो, तसंच सुखद, समृध्द आठवणी आपल्या कूपीत अलगद जपून ठेवत त्या आठवणींचा सुगंध वृध्दींगत करत असतो तोही हाच काळ..! एरवी महान वाटणार्या व्यक्तिंच्या कार्यकर्तृत्वाचा कस घासून पहातो

तो हा काळच आणि त्याच्या निकषावरच खरा महिमा, खरी महानता टिकून तरी रहाते किंवा विरुन तरी जाते. कोण चूक कोण बरोबर याचं उत्तर काळाच्याच उदरात दडलेलं असतं. काळाचा महिमा अपार, अपरंपार म्हणतात ते यासाठीच..!

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रकाश ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ मनमंजुषेतून ☆ प्रकाश ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

प्रकाश हा अखंड उर्जास्त्रोत आहे. चैतन्याचा झरा आहे. ज्ञानाचा दीपक आहे. आपल्या सभोवतीचा प्रकाश हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो. त्यामुळे त्याचे वेगळे अस्तित्व जाणवतही नाही.

आपल्याला सहसा अंधाराचा सामना करायची वेळच येत नाही. त्यामुळे संध्याकाळी प्रकाश कमी झाला की आपण उदास होतो. ती वेळ ‘कातरवेळ’ असते. तसेच ढगाने सूर्य झाकला गेला की अंधारते. आपण बेचैन होतो. मळभ दाटून आले म्हणतो. त्यामुळे पूर्ण अंधाराची आपण कल्पनाच करू शकत नाही.

आम्ही दोघे पती-पत्नी १३-१४ वर्षे एका नेत्रपेढीसाठी ‘नेत्रमित्र’ म्हणून काम करत होतो. त्यावेळी अंधत्वाचे विविध पैलू लक्षात आले. दृष्टिदान संकल्पने विषयी अज्ञान, गैरसमज, अपुरी माहिती या गोष्टी विशेषत्वाने लक्षात आल्या. पण प्रकाशाचे महत्त्व जास्ती लक्षात आले ते एका खास कार्यक्रमात‌.

एका वर्षी जागतिक दृष्टिदान दिवसाच्या निमित्ताने नेत्रदानातून दृष्टीलाभ झालेल्या तीन जणांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली.

त्यांना समक्ष भेटल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरील आनंदच त्यांच्या भावना सांगत होता. एक वीस-बावीस वर्षांची विवाहित मुलगी स्वतःच्या मुलाला डोळ्यांनी प्रत्यक्ष बघता येते हीच सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे हे सांगताना रडू आवरू शकत नव्हती. एक पन्नाशीच्या बाई आणि ६५ वर्षांचे आजोबा हे खूप भारावले होते. घरातली स्वतःची कामे स्वतः करणे, स्वयंपाक करणे, एकटे फिरायला जाणे, बाजारहाट, बँकेतली कामं या सर्व गरजेच्या गोष्टी स्वतः करताना मिळणारा आनंद शब्दांबरोबर त्यांच्या चेहर्‍यावरून ओसंडत होता. आपल्या दृष्टीने किती क्षुल्लक कामे, पण त्यासाठी त्यांना परावलंबित्व आले होते. थोडक्यात निरुपयोगीपणाची अगतिक भावना त्यांच्या मनातून आता दूर झाली होती.

त्यांच्याबरोबर आम्हा सर्वांना पण समाधानाचा आनंद मिळाला होता आणि मन वेगळ्याच प्रकाशाने भरून गेले होते. आम्ही आमच्या कुटुंबातील पाच जणांचे नेत्रदान करवून त्यांच्या जगण्याची सफल सांगता करताना या कार्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे आणि अमूल्य समाधानाचे वाटेकरी झालो आहोत.

आपले आयुष्य आनंदात घालवल्यानंतर आपल्या पश्चात आयुष्याचे  सार्थक करण्याचा नेत्रदान हा अतिशय महत्त्वाचा सोपा उपाय आहे. त्यामुळे दोन अंधांची आयुष्य प्रकाशमान होतात. त्यासाठी नेत्रदाना बाबत जागरूक असायला हवे. आपण तर नेत्रदानाचा संकल्प करायचाच पण जवळपास, ओळखीत कुणाचा मृत्यू झाला तर अगदी शांतपणे त्यांच्या जवळच्या व्यक्तींना नेत्रदाना विषयी सुचवायचे. कारण दु:खामुळे त्या व्यक्तींच्या लक्षात ही गोष्ट येईलच असे नाही. तेव्हा अशी जागृती करीत प्रत्येक जण नेत्रमित्र बनू शकतो.

आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. त्याचा आनंदाने उपभोग घेतला. आपल्या पश्चात या छोट्या कृतीने आपण आनंद वाटू शकतो. मग काय हरकत आहे. हीच आपल्या माणुसपणाची जाणीव जागृती आहे.

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सरले वर्ष ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

☆  विविधा ☆ सरले वर्ष ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

जे ऊगवते ते मावळतेच हा निसर्गाचा नियमच!!

पण मावळतानाही पाऊलांचे ठसे ऊमटून जातात..

२०२० हे वर्षही आता मावळतीवर टेकलंय्…

कसं गेलं हे वर्ष?  फार नकारात्मक गेलं…या वर्षीच्या आठवणी जरुर राहतील  पण त्या भेदक,  भयावह,  भकास असणार आहेत….

म्हणावं तर सूक्ष्म, डोळ्यांना न दिसणारा पण आक्राळविक्राळ अस्तित्व बजावणार्‍या या विषाणुने सर्‍या जगाला विळखा घातला… त्याची ऊत्पत्ती कशी झाली, त्याचं ऊगमस्थान कोणतं हे वैज्ञानिक दृष्ट्या महत्वाचं असलं तरी ज्या पद्धतीनं त्याने समस्त मानवी जीवनालाच वेठीला धरलं ते अनुभवत असताना, नेमकी आपली भूमिका काय याचे आत्मसंशोधन अधिक महत्वाचे वाटते…… करोडो लोक बाधित झाले आणि लाखो बळी पडले…. आणि या सालाबरोबरचा हा थरारक संहार नव्या सालाचे ही बोट पकडूनच ठेवणार का हाही प्रश्न आहेच….

तशा जगात अनेक गोष्टी घडल्या…

जाॅर्ज फ्लाॅईड या कृष्णवर्णीय नेत्याचा मिनीआपाॅलीस अमेरिका या शहरात, अमानुष पोलीस कारवाईत मृत्यु झाला…

धर्मद्वेषाचे अघोर परिणाम सोसूनही पुन्हा पुन्हा तेच घडावे याचेच वैषम्य वाटते..

अमेरिकेत ट्रंप यांची सत्ता गेली. बायडेन नवे राष्ट्रपती म्हणून निवडून आले…भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांची ऊपराष्ट्रपती म्हणून निवड झाली….

आपल्या देशातही ठिकठिकाणी निवडणुका झाल्या..

घोडेबाजार झाले ..पक्षांची,  नेत्यांची अदलाबदल झाली.. देशहितापेक्षा मतलबी राजकारणाचेच वारे वाहिले.

बळीराजाचे बळी गेले .. निसर्गानेही झोडपले आणि राजकारणानेही पीडले…अंदोलने चालूच आहेत…

हाथरस सारख्या घटना घडतच आहेत…

कोरोनाच्या हकालपट्टीसाठी, दिवे लावले, टाळ्या वाजवल्या, थाळ्या बडवल्या, घंटानाद केले…

सीमेवर जवान शहीद झाले…श्रद्धांजल्या वाहिल्या….

पण या सगळ्या गदारोळात आर.के. लक्ष्मणचा, मानवजातीचा प्रतिनिधी मात्र होरपळून निघालाय…. पण २०२० या सरत्या सालाचा लेखनप्रपंच मांडताना केवळ घटनांचाच ऊहापोह करणे इतकाच हेतु नाही.

भल्याबुर्‍या घटना अव्याहत घडतच असतात.. पण या वर्षी  एका विषाणुने दिलेला भयावह, थरारक अनुभव हा केवळ न भूतो न भविष्यती..!!

जीवन स्तब्ध झाले! बंदीस्त झाले…भयाण डोहात बुडाले….तांडवी मंथनात घुसळून गेले… कलीयुगाचा हा अंतीम काळ… जगबुडीच ही.. महाप्रलय म्हणतात तो हाच… शंकराने तिसरा डोळाच ऊघडला…महेशाचं हे संहार सत्रच… मग इथे येउन मन थबकतं…संपलं नाही सारं.  संपणारही नाही .. हा सृष्टीचा नियमच नाही….बंदीस्ततेत, स्तब्धतेतही एक दार ऊघडतं.. अगदी आत, मनातलं..आणि अनादी काळाच्या पळापळीत खूप हरवलेलं पुन्हा गवसतं….

हरवलेली संसकृती, नीती, वाढलेला हव्यास, तुटलेली नाती, संवाद, गोडवे, माणूसपण, विनाकारण वाढलेल्या गरजा… या सर्वांचा नव्याने विचार करावासा वाटतो.

एक विषाणु येतो आणि विश्वाला संदेश देतो”

“घरात बसा… सुरक्षित रहा.”

नकारात्मक पार्श्वभूमीवर २०२० सालाने जर काही दिलं असेल तर आत्मसंशोधनाचं आवाहन…

म्हणून नव्या वर्षाचं स्वागत करताना मनाची मरगळ नको.

सृष्टीनं अंजन घातलंय् ..या संजीवन दृष्टीने नववर्षाला सामोरे जाऊ…

मानव कधीच निसर्गाहून श्रेष्ठ नाही .पण मानवाने निसर्गाची अनेक रौद्र रुपे पचवली आहेत… लढाऊ, अहंकारी वृत्तीने नव्हे तर शरणागत होऊन निसर्गाची पूजा बांधूया आणि येणार्‍या नव्या वर्षाचे स्वागत करुया…..!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆सूर संगीत राग गायन (भाग ४) – उपशास्त्रीय गायन~ नाट्यसंगीत ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  राग गायन ( भाग ३ )  – उपशास्त्रीय गायन~ नाट्यसंगीत ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

उपशास्त्रीय गायनांत नाट्य~संगीत हा एक स्वतंत्र आणि अतिशय महत्वाचा विषय मानावा लागेल. मराठी माणूस हा संगीत नाटकवेडा! ह्या संगीत नाट्य क्षेत्रांत अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे नांव फार मोठे आहे.त्यांनी पुण्यांत १८८० साली पारसी नाटके पाहीली आणि त्यांना मराठीत नाटके रचण्याची स्फूर्ती मिळाली. त्यांतूनच संगीत शाकुंतल या नाटकाचा जन्म झाला.”पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीश आधी नमितो” ह्या मंगलाचरणाने नाटकास सुरवात झाली. संगीत शाकुंतलच्या पहिल्या प्रयोगाने मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकाचे युग सुरू झाले. त्यावेळचे मंगलाचरण किंवा नमनाचे पद्य हे नंतर नांदी म्हणून ओळखले जावूृ लागले. आजही शाकुंतलातील या नांदीने नाट्यसंगीताच्या मैफीलींना सुरवात होतांना आपण ऐकतोच. १८८२ मध्ये सौभद्र हे दुसरे संगीत नाटक किर्लोस्कर नाटक मंडळींनी रंगभूमीवर आणले. १८८२ ते ९० हा आठ वर्षांचा काळ किर्लोस्कर संगीताचा काळ गणला जातो. त्यांच्या ह्या नाटकांत पदांची रेलचेल होती.

नाटकाच्या अर्थाला आणि कथानकाच्या अनुषंगाने पोषक अशी पदे साकी,दिंडी,कामदा अशा जातिवृत्तांत त्यांनी रचली व सादर केली.त्यावेळच्या लोकप्रिय गीतांच्या आधारावर नाट्यपदांना चाली लावल्या व ती पदे श्रोत्यांच्या विलक्षण लोकप्रियतेस उतरली.सौभद्रांतील नाट्यसंगीत आजतागायत टिकून राहिले ते त्यांतील संगीताचा ताजेपणा,अण्णासाहेबांची सरस,प्रासादिक आणि सुबोध पद्यरचना ह्यामुळेच.सामान्य प्रेक्षकांच्या तोंडी ही गाणी सहज बसली व ती महाराष्ट्रांतील घराघरांत पोहोचली. “नच सुंदरी करू कोपा”, पांडूनृपती जनक जया” यासारख्या पदांच्या चाली मूळ कानडी पदांवरून घेतल्या आहेत.खाडिलकरांच्या मानापमान या नाटकांतील”दे हाता या शरणागता” या पदाची चालही मूळ कानडी पदाचीच! यमन, भूप, ललत, जोगीया, पिलू, आसावरी, भैरवी यासारखे लोकप्रिय राग तर अण्णासाहेबांनी वापरलेच परंतु “वद जाऊ कुणाला शरण ग” किंवा “बलसागर तुम्ही वीरशिरोमणी” अशा पदांना लावणीची चाल देउन लावणीला मराठी कुटुंबांत प्रतीष्ठा मिळवून दिली.

१९०५ साली नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बाल गंधर्व ह्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळींत प्रवेश केला आणि सतत पन्नास वर्ष्ये त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. गोविंदराव टेंबे त्यांच्याविषयी लिहितात, “जवारीदार सुरेल आवाज,अत्यंत लवचिक गळा, ताल व लय यांचा उपजत पक्केपणा, एकंदरीत गाण्यातील संथपणा आणि संयम त्यांच्याइतका क्वचितच पहावयास मिळेल.” गातांना सर्वसामान्य रागांतील पदांत ते एखादा विसंवादी, अशास्त्रीय स्वर असा काही लावायचे की त्यामुळे त्या रागाला नाही पण चालीला काही नवीनच शोभा येत असे.

गंधर्वांच्या संगीताचा परिपक्व आविष्कार गंधर्व नाटक मंडळीत रसिकांना पहायला मिळाला.बाल गंधर्वांनी कृ.प्र.खाडिलकरांच्या मानापमान नाटकाला यथार्थ न्याय दिला आणि मराठी रंगभूमीवर संगीत नाटकाचे एक नवे युग निर्माण केले.

स्वयंवर नाटकांतील पदांनी उच्चांक गाठला.रागदारी संगीतावर आधारलेली ही पदे गायक नटांसाठी आव्हानच होते. नाट्य संगीताचा दर्जा उंचावला आणि संगीत नाटकाला

नाट्यसंगीताच्या बैठकीचे स्वरूप येऊ लागले.

प्रेक्षकांचे ones more घेतां घेतां रात्रभर नाटके रंगू लागली. भास्कर बुवा बखले आणि वझेबुवा यांच्यासारखे स्वर रचनाकार नाट्यकलेला लाभल्यामुळे महाराष्ट्रीय समाजाला उच्च शास्त्रीय संगीताची ओळख झाली. देसी, खोकर,बरवा असे अनवट राग प्रथमच महाराष्ट्रांत अवतरले.

आजच्या पीढीला बाल गंधर्व अंगाचे गाणे ऐकावयास मिळते ते श्री आनंद भाटे(आनंद गंधर्व) आणि सौ मंजूषा पाटील कुळकर्णी यांच्याकडून.

एक अनोख्या पद्धतीचे नाट्य गायन रंगभूमीवर आणले ते मो.ग.रांगणेकर यांच्या नाट्य निकेतन या संस्थेने. ज्योत्स्नाबाई भोळे यांच्या सुमधूर गळ्यांतून “क्षण आला भाग्याचा”,”मनरमणा मधुसूदना” ही पदे ऐकतांना मन लुब्ध होते.मा.कृष्णरावांच्या या चाली अवीट गोडीच्या आहेत.

साधारण १९६०च्या दशकापासून गंधर्व ढंगांतील गाण्यांत बदल दिसू लागला. छोटा गंधर्व यांनी स्वरबद्ध केलेली”अंगणी पारिजात फुलला”,”रतिहुनी सुंदर मदनमंजीरी,”राम मराठ्यांची “जयोस्तुते उषादेवते,” किंवा “सोsहम् हर डमरू बाजे,”वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली”नयन तुझे जादुगार,””नारायणा रमा रमणा,” पं.जितेंद्र अभिषेकींची “नको विसरू संकेत मीलनाचा,” “तव भास अंतरा व्हावा,” “तेजोनिधी लोहगोल,” “घेई छंद मकरंद” ही नाट्यपदे ह्या बदलाची उदाहरणे देता येतील.

शास्त्रीय रागांवरील हे नाट्यसंगीत नाटकांतील प्रसंगानुरूप असल्यामुळे अतिशय भावपूर्णही आहे आणि ते श्रोत्यांच्या पूर्ण पसंतीस उतरले आहे.

क्रमशः….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वासुदेव…☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ वासुदेव… ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

जरा विसावू या वळणावर

मंडळी नमस्कार, इंग्रजी वर्ष २०२० चा हा शेवटचा मंगळवार म्हणजेच यावर्षी साठीचा हा शेवटचा स्तंभ लेख. अजून २ दिवसात हे वर्ष संपेल. केंव्हा एकदा हे वर्ष संपतय असं सगळ्यानाच वाटतयं, याची कारणे सांगण्याची गरजच नाही, ती प्रत्येकाला माहिती आहेतच. अर्थात १ जानेवारी २०२१ पासून लगेच काही चांगले घडेल असे नाही. किंबहुना नवीन नवीन बातम्या येत असताना परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता जास्त दिसते आहे.

काही खास दिवस असतात ज्या दिवसांपासून आपण नवीन सुरवात करु, झालेल्या चूका टाळू, नव्या जोमाने कामाला लागू, जास्त प्रयत्न करु असे वाटते त्यातील एक दिवस म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस.

अनेक जण नवनवीन ठराव/ नियम ( दरवर्षी प्रमाणे)  ठरवतील, अनेक जण पूर्णत्वास नेतील. आमच्यासारख्या काहीजणांचा वेळ दरवर्षी प्रमाणे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुढील वर्षात काय करता येईल (नवीन) हे चाचपण्यातच जाईल. तरी देखील यामागची भावना महत्वाची ठरेल.

मोठ्याला कंपन्या आपला ताळेबंद मार्च एन्डींग झाल्यावर मांडतात. १ एप्रिल पासून त्यांचे नवीन फायनान्शीअल वर्ष सुरु होते. अनेक व्यापारी दिवाळीत ( पाडवा) नवीन चोपडी घेऊन नववर्षाची सुरवात करतात. सामान्य जण एक तर वाढदिवस किंवा बहुतेक वेळा नवीन वर्ष हे आपल्या इव्हाॅल्यूएशन साठी धरतात. १ तारीख आली नवीन वर्ष कसे जाईल यासाठी जोतिषांकडे ही अनेकांची विचारणा होते.

म्हणूनच हे वळण मला महत्वाचे वाटते आणि प्रत्येकाने  ‘भले बुरे जे घडून गेले’ ते विसरून नव्या वळणावर नव्या उर्मीने तयारीत राहिले पाहिजे.

मंडळी यावर्षी मी काय नवीन गोष्ट शिकलो सांगू?  तर यावर्षी मी आत्तापर्यंत कधीही न खेळलेला मोबाईल गेम ‘ कॅन्डी क्रॅश ‘ खेळलो. एकदम भारी. मस्त गेम आहे. दिलेली टास्क  सुटून पुढच्या लेवलला गेलं की भारी वाटायचं. सध्या १५१ च्या पुढं असेन. पण सुरवातीच्या सोप्या लेवल नंतर एक एक लेवल सुटायला २-२ दिवस लागू लागले. कधी कधी हरतोय असं वाटत असतानाच अचानक शेवटच्या क्षणी लेवल सुटायची. मग त्या येणाऱ्या स्माईली वगैरे वगैरे. किंवा मग out of moves, level failed, you did not reach the goal हे तर ठरलेले. मग परत पहिल्यापासून ती लेवल यात पण एकच लेवल ठराविक वेळा खेळून ही सुटली नाही की हा खेळ एक टाइम लिमीट देतो. १० मिनिटांन पासून ते ३० मिनिटांपर्यत तुम्हाला हा खेळ खेळताच येत नाही. तोवर तुम्ही कदाचित इतर काही कराल पण हा खेळ खेळू शकणार नाही. त्या टाईम लिमीट नंतर परत सुरवात करायची खेळाला.

काही येतंय लक्षात ☝?. अशी लेवल म्हणजे जीवनात येणाऱ्या अडचणी. सुटत नसतील तर थोडं थांबायचे. चक्क दुर्लक्ष करुन दुस-या गोष्टीत मन रमवायचं आणि ‘जरा विसावू या वळणावर’ नंतर नव्या जोमाने कामाला लागायचं. पटतयं का सांगा.

आणि थोड्या कालावधी नंतर जिवनातील अवघड गणित/ त्रासदायक काळ /परिस्थिती  सुटायला लागली  की आपणच आपणाला शाबासकी द्यायची आणि म्हणायचं

wonderful, level completed

मंडळी आजची , टवाळखोरी आवरती घेता घेता, आज श्रीदत्त जयंती निमित्य दत्तमहाराजांच्या कृपेने येणारे नवीन वर्षे  सर्वांना सुखाचे ( ब्रह्मा), समाधानाचे( विष्णू) आणि चांगल्या आरोग्याचे( महेश्वर)  जावो या सदिच्छा

( शुभेच्छूक)  अमोल+

©  श्री अमोल अनंत केळकर

२०/७/१८

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ || देवत्व || ☆ सुश्री मनीषा कुलकर्णी

☆ मनमंजुषेतून ☆ || देवत्व || ☆ सुश्री मनीषा कुलकर्णी ☆ 

? || देवत्व || ?

 दिव्यत्वाची जेथ प्रचिती | तेथे कर माझे जुळती ||

१९४७ मधली गोष्ट..! डाॅ .आर्. एच्. कुलकर्णी नामक २२ वर्षाच्या तरूणाला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या चंदगढ़ गावी दवाखान्यात नोकरी मिळाली. दवाखान्यात तुरळक पेशंटस् असायचे…!

तो जुलै महिना होता. रात्री तुफान पाऊस पडत होता. डॉक्टरांचा दरवाजा कोणीतरी जोरजोराने वाजवत होतं. बाहेर दोन गाड्या घोंगडी पांघरलेली, हातात लाठ्या-काठ्या घेतलेली सात-आठ माणसं उभी होती.. काही कळायच्या आतच त्यांना गाडीत ढकलण्यात आलं. सुमारे दीड एक तासाच्या प्रवासानंतर गाडी थांबली. काळाकुट्ट अंधार..! लाठीधार्‍यांनी डाॅक्टरना एका खोलीत ढकललं. खोलीत एक चिमणी मिणमिणत होती. खाटेवर एक तरुण मुलगी.. बाजूला एक म्हातारी स्त्री बसली होती…!

डाॅक्टरांना तिचं बाळंतपण करण्यासाठी फर्मावण्यात आलं. ती मुलगी म्हणाली, “डाॅक्टर.. मला जगायचं नाही. माझे पिताजी खूप श्रीमंत जमिनदार आहेत. मी मुलगी असल्यामुळे मला शाळेत पाठवलं नाही. घरी शिकवायला एक शिक्षक ठेवला. मला या नरकात ढकलून तो पळून गेला. गावाच्या बाहेर या घरात या दाईबरोबर मला गुपचूप ठेवण्यात आलं आहे.. त्या मुलीनं एका कन्येला जन्म दिला पण बाळ रडलं नाही. ती म्हणाली, “मुलगीच आहे नां.. मरू दे तिला माझ्यासारखे भोग तीच्या नशिबी येतील…!”

डाॅक्टरांनी आपल्या ज्ञानाचा व कौशल्याचा वापर करून बाळाला रडायला लावले. डाॅक्टर बाहेर येताच त्यांना १००रु. देण्यात आले.. त्याकाळी ही रक्कम मोठी होती. आपलं सामान घेण्याच्या निमित्ताने डाॅक्टर खोलीत आले.. त्या मुलीच्या हातावर शंभराची नोट ठेवत म्हणाले, ” आक्का.. आपल्या किंवा मुलीच्या जीवाचं बरंवाईट करून घेऊ नको. संधि मिळेल तेव्हा पुण्याच्या नर्सिंग काॅलेजला जा. आपटे नावाच्या माझ्या मित्राला डाॅ. आर्. एच्. कुलकर्णींनी पाठवलंय असं सांग.. ते तुला नक्की मदत करतील. ही भावाची विनंती समज…! ”

पुढे डॉक्टरांनी स्त्री-प्रसूती विषयात विशेष प्राविण्य मिळवले. अनेक वर्षांनंतर औरंगाबादला एका काँन्फरन्स्ला ते गेले असता अत्यंत उत्साही आणि तडफदार अशा डाॅ.चंद्राच्या भाषणानी ते खूप प्रभावित झाले.. डाॅक्टर चंद्राशी बोलत असताना कोणीतरी त्यांना अदबीने ” डाॅ.आर्.एच्.कुलकर्णी सर.. “अशी हाक मारली.. हे ऐकताच डाॅ. चंद्रानं चमकून डॉक्टरांकडे पाहिलं आणि म्हणाली, “सर.. तुम्ही कधी चंदगढ़ला होता कां..?” “हो.. पण बरीच वर्ष झाली या गोष्टीला बेटा..”

डोळ्यांत टचकन् पाणी आलं.. स्वतःला सावरत ती म्हणाली, ” तर मग तुम्हाला माझ्या घरी यावंच लागेल…!”

” डाॅ.चंद्रा.. मी तुला आज पहिल्यांदाच बघतोय.. तुझं भाषण खूप आवडलं म्हणून तुझं कौतुक करायला भेटलो.. असं अचानक घरी यायचं म्हणजे..” “सर please…” “आई.. बघितलंस काम कोण आलंय ते..?”

डाॅ. चंद्राच्या आईने क्षणभरंच पाहिलं आणि डाॅक्टरांचे पायच धरले.. ” डॉक्टर.. तुमच्या सांगण्यावरून मी पुण्याला गेले.. आपटेंना भेटले.. स्टाफ नर्स झाले.. माझ्या मुलीला मी खूप शिकवलं.. तुमचा आदर्श ठेवून तीला स्त्री विशेषज्ञ डाॅक्टर बनवलं…! ”

आता आश्चर्यचकित व्हायची वेळ डाॅक्टरांची होती. ” चंद्रा.. बेटा तू मला कसं ओळखलंस..? ”

“तुमच्या नावामुळे.. सतत जप चाललेला असतो आईचा..” ” तुमचं नाव रामचंद्र म्हणून हिचं नाव चंद्रा ठेवलं..  तुम्हीच आम्हाला जीवदान दिलंय.. तुमचाच आदर्श ठेवून चंद्रा गरीब स्त्रियांना निःशुल्क तपासते…!”

डाॅ. आर्. एच्. कुलकर्णी म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या.. सुप्रसिद्ध लेखिका.. इन्फोसिसच्या सर्वेसर्वा. असलेल्या सुधा मूर्तींचे वडील…!

तुझ्यामाझ्या जड देही …| देव भरोनिया राही … || 

© सुश्री मनीषा कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कवतिक ☆ श्री विनय माधव गोखले

 ☆  विविधा ☆ कवतिक ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

“स्तुति: कस्य न प्रिय:?” असे कुणीतरी थोर व्यक्तीने म्हणून ठेवले आहे. किती सार्थ आहे हे! आपण एखादे प्रशंसनीय, अभिमानास्पद काम करावे आणि त्याची दखल आपल्या आजूबाजूच्या कुणी तरी घ्यावी ह्याइतकी सुखद दुसरी जाणीव कोणतीच नसावी, नाही का? त्यातही कवतिकाचे बोल ऐकवणारी व्यक्ती जर आपल्या जवळची, प्रियजनांपैकी असेल तर काय मग “सोने पे सुहागा!”?

दुसर्‍या कोणीतरी आपले कवतिक करावे, स्तुती करावी, प्रशंसा करावी ही प्रत्येक मानवाची सुप्त आंतरिक इच्छा असतेच. उदा. प्रेक्षकांनी आपल्या अभिनयाची प्रशंसा करावी ही अभिनेत्यांची, श्रोत्यांनी-परीक्षकांनी तोंडभरून दाद द्यावी ही गायकाची, गुरुजींनी शाबासकी द्यावी अशी विद्यार्थ्याची, मालकाने ‘अर्थ’पूर्ण कवतिक करावे, ही नोकरदाराची इच्छा असते वगैरे वगैरे. अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण द्यायचे झाल्यास, एखादा चांगला Whatsapp मेसेज/फोटो/व्हिडिओ पाठवला तर ग्रुपमधील इतरांनी त्याची ‘निदान दखल तरी घ्यावी’ अशी पाठवणार्‍याची अपेक्षा असते. पण ही मूलभूत अपेक्षा जर कुठल्या कारणाने पूर्ण नाही झाली तर आपला अपेक्षाभंग होणार हे निश्चित! आणि अपेक्षाभंगचे दु:ख हे मोठे असते. म्हणूनच “कुठल्याही फळाची अपेक्षा न धरता कार्य करीत रहा!” हा महत्वाचा संदेश भगवदगीतेमध्ये श्रीकृष्णाने दिलेला आहे. म्हणजेच ‘चांगल्या कामगिरीबद्दल दुसर्‍याचे मनापासून व निरपेक्षपणे कवतिक करणे’ हे देखील आपले कर्तव्यच बनते, नाही का?

कवतिकाचे महत्व फार मोठे आहे. कवतिक हे एखाद्या दुधारी तलवारीप्रमाणे काम करते. ‘निखळ प्रशंसा’ ही एखाद्याच्या शिडात वारा भरून त्या व्यक्तीस चांगले काम करीत राहण्यास सतत उद्युक्त करते. उभारी देणारा एखादा शब्दही माणसाचे आयुष्य बदलण्यास पुरेसा ठरतो! अशी उदाहरणे जगाच्या इतिहासात आपण पहिली आहेत. इतकीच नव्हे तर आपल्या गणगोतांमध्येही आढळतात. दुसर्‍याची स्तुती ही तुम्हाला कधीच कनिष्ठपणा देत नसते. दुसर्‍याला प्रोत्साहित करणार्‍या व्यक्ती इतरांशी खेळीमेळीचे नाते लगेच प्रस्थापित करू शकतात. ह्याउलट तटस्थ राहणार्‍या व्यक्तींबद्दल इतरांचे मत तितकेसे अनुकूल बनत नाही.

अर्थात, काही पथ्य पाळणे मात्र महत्वाचे आहे… प्रशंसा ही अगदी मनापासून वाटत असेल तरच आणि आणि दुसरे महत्वाचे म्हणजे योग्य प्रमाणातच करा! कारण ‘अती तिथे माती’ हा नियम इथेही लागू आहे. शिवाय अवाजवी, अवास्तव, निराधार, विनाकारण केलेलं कवतिक हे ‘चापलुसगिरी’च्या / ‘गूळ लावणे‘ च्या हद्दीत मोडते. तुमच्या शब्दांत जरादेखील खोटेपणा असेल, आपमतलबीपणा असेल, तर तुमचे पितळ आज न उद्या उघडे पडल्यावाचून राहणार नाही. इतकेच नव्हे, तर त्या व्यक्तीला तुमच्या हेतूबद्दल शंका येऊन तुमच्याशी असलेले संबंध कायमचे बिघडूही शकतात.

अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की दुसर्‍यांच्या कवतिका सोबतच स्वत:चे रास्त कवतिक करणेही तितकेच महत्वाचे आहे. पुष्कळांना ‘स्वकवतिक’ / ‘स्वप्रशंसा’ करणे मुळातच पसंत नसते, एकदम दुसरे टोक, अगदी प्रसिद्धीपरायणच म्हणा ना! अशा व्यक्ती दुसर्‍याने केलेले त्यांचे कवतिक स्वीकारू शकत नाहीत. त्यात कमीपणा वाटतो म्हणा, आत्मविश्वास कमी पडतो म्हणा किंवा भिडस्त स्वभाव नडतो म्हणा. पण ही माणसे दुसर्‍याचे रास्त कवतिक करण्यातही मागे पडण्याचा धोका असतो. सरळ आहे, जी व्यक्ती स्वत:च्या पाठीवर सुध्दा “शाब्बास!” म्हणून थाप मारू शकत नाही, ती दुसर्‍याला काय थाप मारणार (म्हणजे चांगल्या अर्थाने बरं का…J)??

पुष्कळ जण असेही असतात की ज्यांना स्वत:च्या छोट्यामोठ्या सर्वच गोष्टीचा ढिंढोरा पिटण्याची सवय असते. “मी यंव आहे, मी त्यंव आहे, मी हे केले, मी ते केले” हे सांगण्यातच अशा “अहं, आवाम, वयं” वर्तुळात फिरणार्‍या व्यक्तींचे आयुष्य अकारण वाया जात असते. खरे म्हणजे ‘स्वत: बद्दल बढाया मारणे’ हे श्रेष्ठ गुरू समर्थ रामदासस्वामींनी ‘मूर्ख लक्षण’ म्हणून ‘दासबोधा’त अधोरेखीत केले आहे. परिणामत: अशा व्यक्ती समाजात अप्रिय ठरतात ह्यात नवल ते काय? अर्थातच ‘कवतिका’ बद्दल समर्थांनी कवतिकानेच लिहिले आहे.

थोडक्यात म्हणजे काय, तर ‘कवतिक’ हा विषय हलकाफुलका समजू नका, औप्शनला तर मुळीच टाकू नका. भरपूर अभ्यास करा, प्रॅक्टिकलचा सराव करा आणि त्यात कुठेही कमी पडू नका. चांगले गुण मिळवून पास व्हा, म्हणजे सर्व जण तुमचे ‘कवतिक’ केल्यावाचून राहणार नाहीत! ??

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ मावळण ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ मावळण ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

1953-54 ची ऐकिवात आठवण.  वडील वयस्क आणि आई देवाघरी गेलेली. पाठोपाठची 11 भावंडे. सगळ्यात धाकटी 2 वर्षाची . बाकी सगळी 2-3 वर्षांनी मोठी, एकमेकांच्यात. जमीन जुमला फक्त नावावर. मोठ्ठे घर असले तरी या कुटुंबाला एक कोपरा. अशा परिस्थितीत खायचे वांधे, तिथे मुलांचे लाड ते कसले?

परिस्थितीनं मुलांना वयापेक्षा खूप मोठ्ठं केलं होतं. सगळीचजणं समंजस.  कसला हट्ट नाही,  कसलेही मागणे नाही.  जे असेल त्यात आनंद मानणे.

दिवस सरत होते.  सणवार येत आणि जात. ही सगळी भावंडे दिवाळी ला गोडधोड,  फराळ, फटाके याची इच्छा न धरता, आनंदाने दिवाळी साजरी करायचे. कशी? तर सुंदर सुंदर रांगोळ्या काढून..त्यातच इतके मग्न होत कि, दुस-या कशाचेच भान नसे. देवानं कलेचं वरदान दिलं होतं प्रत्येकाला.

काळ पुढे सरकला. परिस्थिती ही हळूहळू सुधारली. शिक्षणं चालू होती. 1955- 1960, त्या काळी मॅट्रीक पास हे शिक्षणाचं लिमिट होतं मुलींसाठी. ते झालं की लग्न.

कोल्हापूर सोडून सासरी जाणे..अशाप्रकारे चौघीजणी सासरी पुण्यात पोचल्या. सासरी गेलेली, दुधात साखर विरघळावी तशी सासरी माणसांत मिसळून जायची.  आणि तसंच झालं पाहिजे,  हा अलिखित नियम आणि हेच संस्कार.

ही पण अगदी लवकर संसारात रमली. घरी सासू सासरे, दीर असं एकत्र कुटुंब. नंतर तेही वाढत गेलं. जावा आल्या.  मुलं झाली. मिस्टर एकटेच कमावते. पण ही झाशीची राणी.  घर सांभाळून अंगी असलेल्या कलागुणांची मदत घेत कलावस्तु करून विकणे,  गरजूंना जेवणाचे डबे देणे, अशा मार्गांनी आर्थिक बाजू पण उचलून धरत होती. तेही अगदी आनंदाने. सास-यांना तिचं खूप कौतुक वाटत होतं.

संसारवेलीवर चार गुलाब एकापाठोपाठ एक फुलले.जणु रघुवंशाचे चार सुपुत्र.

आर्थिक परिस्थिती गडगंज नसली तरी समाधानकारक झाली. ती पण कष्ट घेत होती.  कष्ट करणा-याचे हलाखीचे दिवस जास्त टिकत नाहीत.  पण एका शब्दानं माहेरी चुगली केली नाही.

ती माझी आत्या.  आम्ही आते-मामे भावंडे कधी सुट्टीत एकत्र खेळायचो.  हळूहळू अभ्यासात मग्न झालो,  जाणं येणं कमी झालं. त्यावेळी मोबाइल सोडाच, साने फोनही घरोघरी नव्हते.त्यामुळे संपर्क नव्हता.

माझ्या लग्नाच्या दिवशी आली होती,  माझी तिची भेट झाली नाही. नंतर खूप दिवसांनी फोटो बघितल्यावर कळलं.

जवळजवळ 38-40 वर्षांनी तिला भेटायचा योग आला. तिला नुकतंच 90वं वर्ष लागलं होतं. मुलं छान शिकून मोठ्या पदावर काम करत होती. सुना आल्या. नातवंडे झाली.  मागच्या वर्षी नातवाचं लग्न झालं. काकांना जाऊनही बरीच वर्षे झाली.

मी येते असं फोनवर सांगितल्यावर बाल्कनीत वाट  बघत होती.  मी गेल्यावर   तिला नमस्कार केला.  तिनं मला घट्ट मिठीत घेतलं. खरंतर माझा जन्म झाला तेव्हा ती लग्न होऊन सासरी गेली होती.  नंतर तीनचार वेळाच भेटलो असू. आज तिच्या मिठीत खूपकाही हरवलेलं सापडलं होतं.  दोघींचंही बालपण आणि माहेरपण.

खूप गप्पा मारल्या.  नव्वदाव्या वर्षी स्वतः केलेल्या थालिपीठ आणि चहाचा आग्रह करत होती.  भेटून पोट भरलं होतं.  चहाचा घोटन् घोट तिच्या काळजातल्या प्रेमानं गोड गोड लागत होता.

बोलता बोलता मुलांच्या प्रगतीचा अभिमान तिच्या शब्दाशब्दांमधून  जाणवत होता. सुना कशा छान आहेत, नातवंडांचं कौतुक करताना मोहरून गेली होती.

माझी निघण्याची वेळ झाली.  थांब थांब म्हणत अर्धा तास गेला. पुढच्या वेळी रहायला येते असं सांगून    जड अंतःकरणाने निघाले. मनाशी ठरंवलं पुढच्या वेळी नक्की दोन दिवस तिच्या बरोबरच रहायचं. तीनच महिने झाले तिला भेटून.

एका दुपारी तिच्या मुलाचा फोन आला. ” आई गेली”.

मन सुन्न झालं.  तो दिवस चैत्र शुद्ध तृतीयेचा. 13 वर्षांपूर्वी माझे बाबा याच दिवशी गेले.त्यांच्या पाठची ही बहीण.  त्याच तिथीला गेली. योगायोग…….

रात्री मी आतेभावाला फोन केला.  इतक्या दुरून मी फक्त शब्दानीच धीर देऊ शकत होते.

बोलताना तो म्हणाला, ” आता कसं करायचं बघू, कारण आईनं तिची इच्छा सांगितली होती की मी गेल्यावर माझ्या अस्थी कोल्हापूर ला पंचगंगेत विसर्जित करा, म्हणून. “मला हुंदका आवरेना.

आमच्या कोल्हापूर भागात माहेरवाशिणीला ” मावळण” म्हणतात. लग्न होऊन सासरी नांदणा-या लेकी, बहिणी जेव्हा गौरीच्या सणाला, सुट्टीला माहेरी येतात तेव्हा”मावळण केव्हा आली? कशी हाईस पोरी? म्हणून प्रेमानं, आपुलकीने आणि मानानं विचारपूस करतात.

आत्यानं मनाशी ठरंवलंच होतं की काय , इथून आता निघायचं ते माहेरी जायचं.

 

अशी ही मावळण.

आयुष्य भर संसारासाठी

पुण्यभूमित राहिली..

चैत्र गौरीच्या तीजेला

परत निघाली…

जणु भेटण्या माहेरा

आतुर मावळण

पंचगंगी समर्पित झाली……

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चहा ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ ते मोरपंखी बालपण ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

चहा हवा आहे का कोणाला असा शब्द जरी कानी पडला, अगदी मध्य रात्री बारा वाजता तरी नकळत सगळ्यांचेच कान कसे टवकारतात . जणू काही तो चहा आपल्यालाच बोलवत आहे.

काय आहे असे त्या चहात?

तो मस्त सुगंध दरवळायला लागला की कशी, तो न पिताच तरतरी येते मनाला.

कट्ट्यावर रमलेल्या गप्पांमधेच जर गरम चहाचा कप आला तर मग काय सोने पे सुहागाच.

लहान मुलांच्या कंपूत असो, नाही तर मित्रांच्या घोळक्यात, नातेवाईकांच्या गर्दीत असो नाही तर आपल्या सहकार्यां बरोबर तो सगळ्यानाच आपलसं करून सोडतो.

संध्याकाळी दमून जर एखादी स्त्री घरी आली असेल आणि तिच्या हातात कोणी ऐता गरम चहा आणून ठेवला तर तिचे निम्मे अधिक श्रम, तो प्यायच्या आधीच पळून जातात.

मित्रां बरोबरचा तो टपरी वरचा चहा आणि गरम भजी यांची मैफिल तर खूप रंगतदार असते.

पहाटेच्या रम्य वेळी, मस्त आलं आणि गवतीचहा घातलेला चहा आणि वर बाहेर पडणारा धोधो पाऊस जणू स्वर्ग सुखच.

चहाची मजा तरी पहा तो आपण केव्हांही घेऊ शकतो.

कोण सकाळी लवकर जाग आली म्हणून घेतो, तर कोण रात्री झोप लागली नाही म्हणून, कोण मनाचा थकवा घालवण्यासाठी, तर कोण आनंद साजरा करण्यासाठी, कोणाला त्यात दुःख लपवायचे असते तर कोणी असाच घेत असतो वेळ जात नाही म्हणुन.

नाना रंगांनी, अनेक ढंगानी असा नटलेला हा चहा आहे मग तो टपरीवरचा असो, किंवा कॉलेज कॅन्टीन मधला, घरचा असो किंवा हॉटेलचा, मसाला असो किंवा ग्रीन टी तो कसा ही घेतला तरी सगळ्यांना खुश करून जातो, मनातली मरगळ दूर करून जातो.

शेवटी एवढंच म्हणेन की

 

चहा तर चहाच असतो

तो ह्याचा किंवा त्याचा नसतो

तो एकच प्याला सुखाचा असतो

जणू दुःखावर घातलेली फुंकर असतो

अरे चहा तर चहाच असतो

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

03.10.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उडणारी म्हातारी ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते

☆ मनमंजुषेतून ☆ उडणारी म्हातारी ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते☆

बाबांची बाहेर जाण्यांची तयारी सुरू झाली. तसा सार्थक त्यांच्या मागे लागला ‘मी पण येणार…..मी पण येणार’ त्याचा हट्ट बघून बाबा म्हणाले ‘मला आता वेळ नाही. मी संध्याकाळी तुला बाहेर घेऊन जातो’. आता आपली इथं डाळ शिजत नाही म्हटल्यावर सार्थकने रडायला सुरुवात केली. शेवटी वैतागून बाबा म्हणाले ‘चल गाडीवरून एक फेरी मारून आणतो.’ हाताते डोळे पुसतच म्हणाला ‘मोठी….फेरी पाहिजे.’

‘बरं…चल. ‘म्हणत बाबांनी बुट घातले… ते गेले. सार्थकने अंगात शर्ट अडकवला, चड्डी खाली ओढली, हाताने केस सारखे केले धावत बाहेर आला. धावत येताना दरवाजा जोरात धडकला त्यानं लक्ष दिले नाही. नाही तर एरवी या कारणासाठी तासभर रडला असता. बाबांनी गाडी सुरू केली होती. नेहमी प्रमाणे बाबांच्या पाठीला पाठ लावून गाडीवर उलटा बसला. आता समोरून येणाऱ्या गाड्या, सायकली, माणसे सगळं, सगळं दिसणार होत. धावणारी प्रत्येक गोष्ट त्याला आवडे. गाडीने वेग घेताच यांच्या हाताची गाडी सुरू झाली. तोंडाने पी….प….पी..प..आवाज काढत मजा बघत होता. मधूनच दुस-याना बाय बाय करता होता. त्याची हलचाल झाली की बाबा म्हणत ‘ नीट बैस. हलू नकोस.’तेवढ्या पुरत शाहाणा होई. पुन्हा चळवळ सुरू.

समोरून येणारी हवेत उडणारी पांढरी शुभ्र मोठी म्हातारी त्याला दिसली. तिचा तो मुलायम स्पर्श त्याला खुप आवडे‌. आता त्याचा समोर ती होती. वाऱ्यावर झोके घेत ती जवळ येत होती. ती जशी जवळ येऊ लागली तशी आपण तिला कसे पकडावे यांचा तो अंदाज घेवू लागला. एकदा उजव्या बाजूला झाला, एकदा डाव्या बाजूला झाला. हलला तो.

‘नीट बैस. नाही तर.. उतर खाली जा चालत घरी.’

‘साॅरी बाबा. नीट बसतो’ एवढ्यात ती म्हातारी गुंगारा देऊन कुठे तरी पसार झाली होती. आज हातात आली असती जरा हात पुढे करायला पाहिजे होता. तो चुडपुटला. त्या दिवसा सारखी आज ही… म्हातारी हातातून निसटून गेली. क्षणात तो प्रसंग आठवला.

मधल्या सुट्टीत आम्ही खेळत होतो. खेळ रंगात आला होता. एक पांढरी शुभ्र म्हातारी उडत आली आणि  विन्याच्या खांद्यावर टेकली. माझे लक्ष गेले मी तिला पकडणार तेवढ्यात उडाली आम्ही सगळेजण खेळ सोडून तिच्या मागे धावलो, ती हसत हसत वरवर जात होती. जणू आम्हाला चिडवत होती… असेल हिंमत तर पकडा मला. प्रत्येकजण पकडण्यासाठी धडपडत होता. मला काही क्लिक झाले. मी धावत वरच्या मजल्यावर गेलो. ती म्हातारी खालून वर येत होती. आता कुठे जाईल? समोर होती ती जरा हात पुढे करून पकडण्याचा प्रयत्न केला.पण हातात येईना. तेव्हा कठड्यावर चढलो, पाय उंच केले, दोन्ही हात उंचावले,म्हातारीचा हलका स्पर्श झाला. मी पुढे झुकलो….. आता मी पकडणार एवढ्यातच मधली सुट्टी संपल्याची घंटा झाली. मी दचकलो. मी पडणार. मुलांनी आरडाओरड केली. मी घाबरलो मी पडणार…. एवढ्यात एका भक्कम हातानी मला धरले, मागे ओढले. माझे पाय लटपटत होते. पुढे पाटील सर उभे होते. भितीने माझी गाळण उडाली होती. आता सर ओरडणार, मारणार म्हणून मी अंगचोरून उभा होतो. छडी घेण्यासाठी हात पुढे केला. पण सरांनी मला जवळ घेतले ‘बाळा पुन्हा असे धाडस करू नकोस. पळ वर्गात. ‘मी सरांनकडे बघत राहिलो.त्यानी‌ डोळ्यांनी खुण केली जा म्हणून. मी तिथून पळालो. माझ नशिब मी वाचलो. पण ती पांढरी शुभ्र म्हातारी पळाली होती.

गाडीच्या ब्रेक बरोबर मी भानावर आलो. गाडी थांबली. घरात गेलो. पण मनातून ती उडणारी पांढरी शुभ्र म्हातारी जात नव्हती.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print