मराठी साहित्य – विविधा ☆ मिरजेत मुद्रीत झाली जगातील पहिली भगवद्गीता ☆ श्री मानसिंगराव कुमठेकर

श्री मानसिंगराव कुमठेकर

 ☆ विविधा ☆ मिरजेत मुद्रीत झाली जगातील पहिली भगवद्गीता ☆ श्री मानसिंगराव कुमठेकर ☆ 

२१५ वर्षांपूर्वी झाले मुद्रण,

एकमेव प्रत मिरजेत,

 अमूल्य राष्ट्रीय ठेवा

जगभरात ज्या भगवद्गीतेतील विचारांचा अभ्यास केला जातो, ती भगवद्गीता पहिल्यांदा मिरजेत 1805 साली मुद्रीत झाली. 215 वर्षांपूर्वी देशात मुद्रीत झालेल्या पहिल्या भगवद्गीतेची एकमेव प्रत सध्या मिरज इतिहास संशोधन मंडळाचे संस्थापक मानसिंगराव कुमठेकर यांच्या संग्रहात आहे. भारतीय मुद्रण कलेचा तो एक अमूल्य ठेवा आहे.

शेकडो वर्षांपासून भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांच्या दृष्टीने भगवद्गीता हा महत्त्वाचा ग्रंथ मानला गेला आहे. कुरूक्षेत्रावर  कौरव-पांडवांमध्ये झालेल्या युध्दावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं तत्त्वज्ञान या गीतेमध्ये आहे.  त्यामुळे शेकडो वर्षे भगवद्गीता हा ग्रंथ भारतीय संस्कृतीचा अविभाज्य अंग बनला आहे.

मुद्रणपूर्व काळात याच्या अनेक हस्तलिखीत प्रती तयार झाल्या.  मात्र, ही गीता सर्वसामान्यांना सहजप्राप्य नव्हती.

पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या परकीय राजकर्त्यांच्या आगमनानंतर देशात मुद्रणकलेला प्रारंभ झाला. सुरूवातीला हे मुद्रण मराठी भाषेत पण, रोमन लिपीत असे. 1805 च्या सुमारास बंगालमध्ये श्रीरामपूर येथे विल्यम कॅरे याने देशातील पहिले देवनागरी मुद्रण करीत ‘ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज’ प्रसिध्द केले. त्यानंतर काही वर्षातच अनेक देवनागरी ग्रंथ मुद्रीत झाले. पण, त्यामध्ये भगवद्गीतेचा समावेश नव्हता.

याच काळात पूणे येथे सवाई माधवरावाच्या दरबारात असणाऱ्या इंग्रज वकील चार्लस् मॅलेट याने नाना फडणवीसाचे सहकार्य घेऊन देवनागरी छपाईचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र, नाना फडणवीसाच्या मृत्यूनंतर तो प्रयत्न अयशस्वी झाला. मात्र, मॅलेट याने ज्या तांबट करागीराला तांब्याच्या पत्र्यावर मुद्रण करण्यास शिकविले होते. त्याला मिरजेचे तत्कालीन संस्थानिक गंगाधरराव पटवर्धन उर्फ पहिले बाळासाहेब यांनी मिरजेत बोलावून घेतले. त्याच्याकडून तांब्याच्या पत्र्यावर भगवद्गीता कोरून घेतली. आणि तिच्या काही प्रती मुद्रीत करून घेतल्या. त्या ब्राम्हणांना दान देण्यात आल्या. सन 1805 साली मिरजेत भगवद्गीतेचे हे पहिले मुद्रण झाले. तोपर्यंत जगात कुठेही भगवद्गीता छापील स्वरूपात उपलब्ध नव्हती.  त्यामुळे भगवद्गीतेच्या छपाईबरोबरच देवनागरी मुद्रणाचा हा प्रयोग देशाच्या मुद्रण क्षेत्रात क्रांती घडविणारा ठरला.

मिरजेत 215 वर्षांपूर्वी मुद्रीत झालेल्या देशातील या पहिल्या भगवद्गीता ग्रंथाची एकमेव प्रत सध्या मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या मानसिंगराव कुमठेकर संग्रहात आहे.  एकूण 166 पृष्ठांच्या या गीतेच्या शेवटी मुद्रणाच्या स्थळ काळाला उल्लेख केला आहे. मिरजेचा उल्लेख ‘मार्कंडेय मुनीक्षेत्रे’ असा केला असून ‘शके १७२७, क्रोधननाम संवत्सरे’ असा कालोल्लेख आहे. शके १७२७ म्हणजे इसवी सन १८०५  होते. देशातील पहिले देवनागरी मुद्रण असलेली ही प्रत पाहण्यासाठी देश-विदेशातून काही अभ्यासकांनी मिरज इतिहास संशोधन मंडळाला भेट देऊन त्याची माहिती घेतली आहे.

215 वर्षांपूर्वी मिरजेत मुद्रीत झालेल्या देशातील पहिल्या भगवद्गीतेची माहिती रोचक आहे. देशात मुद्रीत झालेल्या या पहिल्या भगवद्गीतेची एकमेव प्रत मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात असून तो अमूल्य असा राष्ट्रीय ठेवा आहे.

 

© मानसिंगराव कुमठेकर, ( मोबाईल क्रमांक ९४०५०६६०६५)

© श्री मानसिंगराव कुमठेकर

मिरज

मोबाईल क्रमांक ९४०५०६६०६५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ओंजळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆  विविधा ☆ ओंजळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

रोज सकाळी उठताना ‘कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती..’ म्हणत दोन्ही हातांची ओंजळ सर्वप्रथम डोळ्यासमोर येते आणि ‘प्रभाते कर दर्शनम्..’ म्हणत रोजचा दिवस दाखवणाऱ्या परमेश्वराला त्याच हातांनी आपण नमस्कार करतो!

‘ओंजळ’ म्हंटली की डोळ्यासमोर येतो तो कर्ण!

सकाळच्या वेळी गंगेच्या पाण्यात उभा राहून सूर्याला अर्ध्य देताना केलेल्या ओंजळीतून पाणी देत असलेला! दानशूर कर्णाची ओंजळ कधी रिती राहात नव्हती! गंगास्नाना नंतर तो हा दान यज्ञ करीत असे ओंजळीने! त्याची भरली ओंजळ ज्याला जे पाहिजे ते  देण्यात व्यस्त असे. त्यामुळे कर्णा कडून कोणाला काही पाहिजे असेल तर ते सूर्योदयाला दानाच्या वेळी भेटले तर मिळत असे. इंद्राने त्याची कवचकुंडले ही अशाच वेळी मिळवली!  ओंजळ हे दातृत्वाचे प्रतीकच आहे जणू!

दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जुळवून ओंजळ तयार होते. तहानलेल्या माणसाला ओंजळीत पाणी ओतत असताना प्याले की पोटभर पाणी प्याल्यासारखे वाटते! तसेच ओंजळभर धान्य एखाद्याच्या झोळीत टाकले की झोळी भरल्यासारखे वाटते. ओंजळ ही नेहमी भरलेली असावी. दाना साठी हाताचे महत्व आपण सांगतो, तसेच ओंजळ ही नेहमी दोन हातांनी काही देण्यासाठी असते!

फुलांनी भरलेली हाताची ओंजळ डोळ्यासमोर आली की मन प्रसन्न होते! सकाळच्या वेळी कोणी जर सुवासिक जाई ,जुई, प्राजक्त ,मोगरा,बकुळी या सारखी फुले ओंजळ भरून दिली तर अगदी श्रीमंत असल्यासारखेच वाटते मला! त्या फुलांचा वास भरभरून मनाच्या गाभार्‍यापर्यंत पोहोचतो आणि तीच फुले देवाच्या देव्हार्‍यात सजलेली पहाताना ते फुलांनी सजलेले रूप पाहून मन भरून येते!

ओंजळ हे छोटेसे प्रतीक आहे जीवनाचे! आकाशात भरून आलेला पाऊस हत्तीच्या सोंडेने जरी धरतीवर कोसळत असला तरी त्या धारेची साठवण आपण हाताच्या ओंजळीत करतो तेव्हा ती सीमित असते! ओंजळ आपल्याला तृप्त राहायला शिकवते असे मला वाटते!

भुकेच्या वेळी मिळालेले ओंजळभर अन्न किंवा तृषार्त असताना मिळालेलं ओंजळभर पाणी याचे महत्व माणसाला खूपच असते! अशावेळी तृप्तीचे आसू आणि हसू आल्याशिवाय राहात नाही! जे मिळते ते समाधानाने घ्यावे त्यातच जीवनाचे सार सामावलेले असते!

ओंजळ भरुन लाहया जेव्हा पती-पत्नी लाजाहोमात घालत असतात तेव्हा हीच त्यागाची भावना एकमेकांसाठी मनात भरून घेतात. जीवनाच्या वेदीवर पाऊल टाकताना नवरा बायको लाह्यांची ओंजळ समर्पण करून एकमेकांसाठी आपण आयुष्यभरासाठी जोडलेले आहोत ही जाणीव एकमेकांना देत असतात तर कन्यादानाच्या वेळी मुलीचे आई-वडील आणि नववधू- वर हाताच्या ओंजळीत पाणी  घेतात, जणूं आई-वडिलांकडून कन्येचे दान या ओंजळीतून होत असते!

‘ओंजळभर धान्य’ या संकल्पनेतून घराघरातून धान्य जमा करून एका सेवाभावी संस्थेत देत असलेले ऐकले आहे. त्या ठिकाणी प्रत्येक घरातून आलेल्या ओंजळभर धान्याचे  रूपांतर एका खूप मोठ्या धान्य साठ्यात होते. देणाऱ्यांना एक ओंजळभर धान्य देताना फारसा त्रास वाटत नाही पण अशा  असंख्य ओंजळीच्या एकत्रीकरणातून नकळत खूप मोठी समाजसेवा घडत असते.

गोंदवलेकर महाराज म्हणत असत की दारी आलेल्या भुकेलेल्या माणसाला कधी हाकलून देऊ नये, त्यांना फारतर पैसे  देऊ नयेत पण ओंजळभर धान्याची भिक्षा द्यावी! त्या काळी अन्नदानाचे पुण्य  मोठे वाटत असे आणि त्या अन्नाचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळत असे.

आपण  लक्ष्मीचे चित्र बघतो तेव्हा ती ओंजळीने नाणी ओतत आहे आणि तिची ओंजळ सतत भरभरून वहात आहे असे असते! अशा लक्ष्मीची कृपा आपल्यावर सतत राहू दे असंच मनात येतं!यावरून सहज आठवली ती व्ही. शांताराम यांच्या चित्रपटात सुरुवातीला दाखवली जाणारी कमनीय स्त्री, जी ओंजळीतून फुले उधळीत असते! त्या कमनीय देहाचे सौंदर्य त्या ओतणाऱ्या ओंजळीतून इतके प्रमाणबद्ध रेखाटले आहे की ते चित्र नक्कीच सर्वांच्या स्मरणात असेल!

आपल्या दोन हातांवरील रेषा आपले भविष्य दाखवतात असे आपण म्हणतो! जेव्हा हे दोन हात एकत्र येतात आणि जी ओंजळ बनते ती आपल्याला काम करण्यास प्रवृत्त करते!

अशी ही ‘ओंजळ’ शब्दबद्ध करताना माझी शब्दांची ओंजळ अपुरी पडतेय असं मला वाटतंय! पण भावपूर्ण शब्दांच्या या ओंजळी ला सतत ओतत रहाण्यासाठी सरस्वती मला साथ देऊ दे, असंच या छोट्या ओंजळी साठी मला वाटतंय!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – १०) – राग व समयचक्र ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – १०) – राग व समयचक्र ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

मी काम करते त्या कॉलेजमधले माझे एक वयस्कर कलीग त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगतात. बेंगलोरजवळच्या एका खेडेगावी एक प्रसिद्धीपरान्मुख गायक होते. गुरूंवर नितांत श्रद्धा आणि त्यांनी सांगितल्याबरहुकूम सूरसाधना इतकंच त्यांनी आयुष्यभर केलं. ते अविवाहित असल्यानं कधी गावातलेच कुणीतरी त्यांना पोटाला दोन घास घालायचं. त्यांच्याकडं शिकणाऱ्या शिष्यांकडून मिळालेल्या तुटपुंज्या दक्षिणेतून बाहेर काहीतरी किरकोळ खाऊन ते पोट भरायचे. एकूण परिस्थिती अगदी हालाखीचीच होती.

एके ठिकाणी त्यांना कार्यक्रमाचं आमंत्रण आलं. तिथं गेल्यावर कुणीतरी त्यांना काही अनवट राग गायला सांगितले, जे त्या वेळेनुसार गाण्यायोग्य नव्हते. मात्र काहीजणांना ते राग ऐकून शिकायचे होते कारण बाकी कुणाला ते येते नव्हते. मात्र ‘मी रागसमयाचा भंग करून गाणार नाही. तो माझ्या गुरूंचा अवमान होईल’ असं निक्षून सांगत ते बुजूर्ग गायक स्टेजवरून उठू लागले. तेव्हां काही लोकांनी त्यांना ‘जास्त पैसे देऊ, जेवण देऊ’ असं आमीष दाखवलं तर ते गायक म्हणाले कि, ‘टपरीवर दहा पैशात मिळणाऱ्या चहा-सामोशामधे मी खुश आहे. पैशाची हाव धरून मी असलं पापकृत्य कधीच करणार नाही.’

आजच्या काळानुसार ह्या गोष्टीचा विचार करताना असंख्य प्रश्नचिन्हं मनात उभी राहातात. अलीकडे खूपदा ‘प्रत्येक राग हा निश्चित समयीच गायला जावा’ ह्या परंपरागत प्रघाताविषयी  दुमत असणारे विचार ऐकू येतात आणि ‘थोडीफार लिबर्टी/ कॉन्सेप्च्युअल कॉन्सर्ट्स’ वगैरे लेबलखाली बरीच ‘लिबर्टी’ घेतलीही जाते. आजच्या प्रचंड गतिमान जीवनशैलीत फक्त सुट्टीच्या दिवशी लोकांना मैफिलीला जायला थोडासा वेळ असतो. पूर्वीसारखी चार, सहा तासांच्या मैफिलीची आणि मध्यरात्र, पहाट, सकाळ, दुपार अशी कोणत्याही वेळेची चैन आता परवडण्यासारखी नाही. त्यामुळं क्वचित काही अपवाद वगळता ठराविक वेळांमधेच बहुतांशी मैफिलींचं आयोजन होतं. मग साधारणत: फक्त संध्याकाळी सहा ते आठ ह्या वेळेतलेच राग कलाकाराला गायला/वाजवायला आणि श्रोत्यांना ऐकायला मिळणार का? बाकीचे राग मग कधी गायला/ऐकायला मिळणार? असे प्रश्न निर्माण होतात.

शिवाय दिवसांच्या वेगवेगळ्या प्रहरांमधे वातावरणात आणि माणसाच्या मनोवस्थेत खरंच काही बदल होतात का? त्यानुसार भावणारे राग वेगळे असण्यात खरंच काही तथ्य आहे का? असे सगळेच प्रश्न आजच्या काळाशी सुसंगत जरूर वाटतात, मात्र त्यामागचं कारण आज निसर्गावर अत्याचार केल्याने त्याच्यासोबतच्या जगण्याला वंचित झालेलं आणि बहुतांशी कालावधीसाठी ‘एअर कंडिशन्ड’ असणारं माणसाचं जगणं आहे हे निश्चित… ‘कंडिशन्ड’ मोडमधे निसर्गचक्रानुसार आपसूक बदलत जाणारे वातावरणातील सांगावे आणि त्यानुसार बदलत जाणाऱ्या जिवंत जाणिवा उमजणार कशा!? असं मनात आल्याशिवाय राहात नाही.

ज्या काळी मानवाचं जगणं हे निसर्गाच्या सान्निध्यात, निसर्गाशीच जोडलं गेलेलं, निसर्गाशी अत्यंत जवळीक साधणारं, निसर्गाचा आदर राखणारं होतं त्या काळात एखादी वट, स्वरधून ही एका विशिष्ट वेळेला जास्त प्रभावी वाटते, काळजात जास्त खोलवर रुतते ह्या मानवाच्याच जाणिवेच्या आधारावर प्रत्येक राग गाण्याची वेळ (रागाचा गानसमय) निश्चित केली गेली. सोप्या भाषेत आपण असं म्हणू कि, ‘निसर्गातील बदलाचा मानवी मनावर होणारा परिणाम आणि नेमका तसाच परिणाम साधणारे/गडद करणारे स्वरसमूह’ ह्या परस्परसंबंधातील सूक्ष्म अभ्यासकांच्या मतानुसार ‘काही ठराविक सुरांचं कॉम्बिनेशन हे अमुक एखाद्या वेळी जास्त परिणामकारक ठरतं’ असा विचार पुढं आला आणि त्यावरून रागसंगीतात ‘समयचक्राचा विचार’ (टाईम थिअरी) हे शास्त्र होऊन गेलं.

आपल्या सर्वांच्याच परिचयाची ‘अष्टौप्रहर’ ही संकल्पना आपल्या संस्कृतीशी जोडली गेली आहे. ह्याच आठ प्रहरांचा विचार रागसंगीताबाबतही केला गेला आणि त्यातूनच ‘रागसमय’ संकल्पना मांडली गेली. दिवसाचे एकूण चोवीस तास आणि तीन तासांचा एक प्रहर, त्यामुळे अर्थातच एकूण प्रहर आठ झाले. सकाळी ७ ते १०, सकाळी १० ते दुपारी १, दुपारी एक ते दुपारी चार, दुपारी ४ ते संध्याकाळी ७ याप्रकारे दिवसाचा अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा व चवथा प्रहर मानला गेला आणि ह्याच पद्धतीने संध्याकाळी ७ ते रात्री १०, रात्री १० ते मध्यरात्री १, मध्यरात्री १ ते पहाटे ४ आणि पहाटे ४ ते सकाळी ७ याप्रकारे रात्रीचा अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा व चवथा प्रहर मानला गेला.

थोडक्यात दिवसाचे, दिवस आणि रात्र असे दोन भाग केले गेले (जे नैसर्गिकरीत्याच होतात) आणि त्या प्रत्येक भागाचे चार-चार प्रहर! आता ह्या प्रत्येक भागातील चार प्रहरांपैकी चवथा प्रहर हा ‘संधिप्रकाश’ म्हणून ओळखला जातो. संपूर्ण चोवीस तासांत संधिप्रकाश आपण दोनदा अनुभवतो. दिवस संपून रात्र सुरू होताना आणि रात्र संपून दिवस सुरू होताना… पहाट आणि संध्याकाळ! ही वेळा म्हणजे धड दिवसही नाही आणि रात्रही नाही… हा कालावधीत दिवस व रात्रीचा संधी(व्याकरणीय) होतो. त्यामुळे काहीजण ह्यावेळेत गायल्या जाणऱ्या रागांच्या वेळेचा उल्लेख करताना ‘दिवसाचा/रात्रीचा चवथा प्रहर’ असा करतात. मात्र बहुतांशी लोक एखाद्या रागगायनाची वेळ ‘सकाळचा/संध्याकाळचा संधिप्रकाश’ असे सांगतात व ह्या कालावधीत गायल्या जाणाऱ्या रागांचा ‘संधिप्रकाशी राग’ असाही उल्लेख केला जातो.

दुसरं एक मत असं आहे कि, प्रत्येक राग हा विशिष्ट वेळेतच गायला/वाजवला जावा ह्या नियमाला काहीही अर्थ नाही. उत्तमप्रकारे लावलेले सूर हे कोणत्याही वेळी परिणामकारकच असणार. एका जुन्या ग्रंथात असाही उल्लेख आहे कि, पूर्वीच्या काळी मोठमोठ्या राजांच्या प्रासादांत प्रत्येक प्रहरी गायनाचा/वाद्ये वाजवण्याचा प्रघात होता. मग ‘आता पुढच्या प्रहरी काय गावे/वाजवावे?’ ह्या सततच्या प्रश्नाचे सोपे उत्तर शोधण्यासाठी चतुर संगीत व्यावसायिकांनी एकेका वेळेला एकेक राग/थाट ठरवला आणि पुढे त्यानुसार ‘रागसमय’ निश्चित करण्याची प्रथा पडत गेली असावी.

ही मी माझ्या वाचनात आलेली गोष्ट सांगितली. मात्र संगीतातील ‘टाईम थिअरी’चा नीट अभ्यास केला तर त्यात एक सुसूत्रता, प्रहरानुसार स्वरसमूहांत कसे बदल होत जातात त्याचे काही विशिष्ट नियम स्पष्टपणे जाणवतात. त्यामुळे ते अभ्यांसांती मांडले गेले आहेत म्हणण्यालाच जास्त वाव आहे. फक्त वरती म्हटल्याप्रमाणे आत्ताच्या काळातलं जीवनमान पाहाता समय-मनोवस्था-सूर ह्यातला सूक्ष्म संबंध जाणवण्याइतके भाग्यवान आपण नाही. निसर्गावर कुरघोडी करताकरता आपण आपल्याच जाणिवा हरवून बसल्याचं हे मोठं उदाहरण आहे.

पंडिता किशोरीताई अमोणकरांसारख्या खऱ्या अर्थाने ‘जिनिअस’ व्यक्तीने एका मुलाखतीत म्हटल्याचं आठवतं कि, ‘भरतमुनींनी जे काही लिहिलं असेल ते सहज मनाला आलं म्हणून नक्कीच लिहिलं नसेल. त्यामागं कित्येक प्रयोग, केवढा अभ्यास केला गेला असेल. त्यामुळं मी ते मत मानते. सगळ्यांनीच ते मानावं असंही नाही. मात्र मानायचं नसेल तर ते मत चूक आहे हे कोणत्यातरी ‘कॉंक्रिट’ गोष्टीच्या आधारे अभ्यासांती आधी सिद्ध करून दाखवता आलं पाहिजे. तरच मग ते डावलण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल.’ किशोरीताईंचा असल्याने हा विचार निश्चितच महत्वाचा, अनमोल आणि आपल्या विचारांना चालना देणारा आहे.

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ मनमंजुषेतून ☆ गणितातील किमयागार रामानुजन – भाग 5 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  गणितातील किमयागार रामानुजन – भाग 5 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

आयुष्य किती जगला ‘ यापेक्षा कसं जगला हे वाक्य तंतोतत सिद्ध करणारे होते रामानुजन यांचे आयुष्य ! अवघ्या 33 व्या कर्तृत्वाच्या वर्षी जग सोडून जावे लागणे आणि तेही एका कर्तृत्ववान तरुणाला यासारखे दुर्दैव नाही.

आपल्या Discovery of India या पुस्तकात रामानुजन यांच्याविषयी पं. नेहरु लिहितात,” अलौकिक रामानुजन चे छोटेसे आयुष्य आणि तरुणपणी आलेला दुर्दैवी मृत्यू आपल्या देशातील गंभीर परिस्थितीची ओळख करून देतो. कुपोषणामुळे अक्षरशहा लाखो मुलं बळी पडली. हे आपल्या देशाचे दुर्दैवच आहे. ”

स्वतः स्वतःचा गुरु बनलेले रामानुजन हे परंपरागत शिक्षण पद्धतीत बसत नव्हते. त्यामुळे प्रो.हार्डी यांना रामानुजन यांना काही शिकवावे लागले. पण त्या शिकवण्याच्या बाबतीत ते म्हणतात,”मी थोडाफार त्याला शिकू शकलो,पण मीच त्याच्याकडून पुष्कळ गोष्टी शिकलो.गणित विषय त्याचा जीव की प्राण होता.धर्मावर त्यांची अढळ श्रद्धा होती तरी सर्व धर्म सारखेच असे तो मानत असे.तो पूर्ण शाकाहारी होता.मात्र त्याच्या हट्टापायी त्याचे खूप नुकसान झाले.रोज स्वतः गार पाण्याने अंघोळ करून स्वतःचे अन्न शिजवणे त्यांनी सोडले नाही.कमालीची थंडी आणि हे कट्टर वागणे त्याच्या शरीराला मानवले नाही.आणि गणिताचे विश्व एका फार मोठ्या बुद्धीमान हिऱ्याला मुकले.”

रामानुजन यांच्या गणितातील तत्त्वज्ञानाचा व्यवहारात वापर होण्याकरता काही काळ गेला. त्यांच्या तत्वज्ञानाचा उपयोग पुढे फार मोठ्या भट्टीतील उष्णतामान मोजण्याकरिता, स्फोटकांच्या भट्ट्या बांधण्याकरता करण्यात आला. भारतातील प्रसिद्ध अनुषक्ती आयोग, Atomic Energy commission आणि टाटा मूलगामी संशोधन संस्था,  Tata institute of fundamental research यांच्या आजच्या प्रगती करीता रामानुजन यांचे ऋण मानतात.

रामानुजन यांनी लहान वयामध्ये गणितातील गवत संशोधन करून देशाचे नाव उज्ज्वल केले पण मृत्यूला सामोरे जावे लागल्यामुळे वडलांना दुःखाच्या सागरात द्यावे लागले. रामानुजन यांची पत्नी जानकी हिला तर आपल्या नवऱ्याची पुरती ओळखही झाली नव्हती. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दहाव्या वर्षीच लग्न होऊन ती सासरी आली होती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सासूला मदत करीत राहणं इतकच तिला माहित होतं. परदेशी गेले ला नवरा आला पण आला तोच मुळी अंथरूणाला खिळून राहिला. त्यामुळे संसार सुख तिला बिचारीला काहीच मिळाले नाही. मात्र रामानुजन यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडू सरकारने तिला एक बंगला घेऊन दिला. त्या धीराच्या स्त्रीने काही वर्षांनी एका मुलाला दत्तक घेतले आणि त्याला खूप शिकविले. खरोखर भारतीय संस्कारांमध्येमोठी होऊन चे संस्कार जपलेल्या जानकी ला सुद्धा आपण मानले पाहिजे.

गणित हाच ज्यांचा जीव की प्राण होता,गणित हा ज्यांचा श्वास होता,ध्यास होता त्या रामानुजन यांचे आपण स्मरण केले पाहिजे. त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांच्या लांबीने छोट्या, पण कर्तुत्वाची  खोल खोली असलेल्या जीवन पटाचे ओळख असल्या तरुण पिढीला करून दिली पाहिजे. नुसते पैशाच्या मागे न लागता त्यांच्यासारखे ध्येयवादी बनले पाहिजे. आपल्या देशातील खरे आदर्श रामानुजन आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून भारताचे नाव पुन्हा एकदा जगामध्ये दुममायला पाहिजे. तरच सानेगुरुजींचे    “बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो” हे स्वप्न नक्कीच साकार होईल.

अशा या गणित तज्ञाला,भारताच्या बुद्धिवान सुपुत्राला शतशः प्रणाम.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जयंती ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले

 विविधा ☆ गीता जयंती ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले ☆

आज आहे मार्गशीर्ष शुद्ध एकादशी.

आज एक विशेष जन्मदिवस आहे मंडळी…तो आहे व्यक्ती घडवणार्‍या विचारांचा. हा भगवद्गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी याच दिवशी युद्धभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला गीता सांगितली, तो हा दिवस ‘गीता जयंती’ म्हणून ओळखला जातो.

गीता म्हणते कर्म करा..काम करा.. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ ही मनोवृत्ती गीतेला मान्य नाही.

कर्म म्हणजे स्वधर्म आचरण करा…

स्वधर्म म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आपापल्या स्वभावानुसार, क्षमतांनुसार, कौटुंबिक- सामाजिक परिस्थितीनुसार, योग्य कर्तव्यकर्म ईश्वरास साक्षी ठेवून किंबहुना ईश्वरास आपल्याबरोबर ठेवून करणे.

ईश्वरास साक्षी ठेवल्याने आपसूक चुकीचे काम हातून होतच नाही.

गीता म्हणते कर्मावर तुझा अधिकार आहे पण कर्माच्या फळावर नाही.

कर्मावर आपला अधिकार आहे म्हणजेच ते आपल्या स्वाधीन आहे. आपण कर्म कोणते करावे हे निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे.जे काम करायचे ते आपल्या स्वभावानुसार,क्षमतेनुसार निवडावे असे गीता सांगते. असे   काम सहज व आनंददायी होते.

असे  कर्म करतानाचाच आनंद एवढा असतो की त्यापासून फळ काय मिळेल याचा विचार माणसाच्या मनातच येत नाही.

‘दैनंदिन जीवनात गीता’ या पुस्तकात डॉ. वि.य.कुलकर्णी म्हणतात- मुलगा खेळण्याच्या आनंदासाठी खेळतो. त्यामुळे व्यायामाचे फळ त्याला सहजच मिळते. परंतु त्या फळासाठी म्हणून तो खेळत नाही. खेळणं हे कर्म करतानाचा आनंद तो घेत असतो..फळाकडे त्याचे लक्ष नसते. त्याचा सर्व आनंद त्या खेळात असतो.

कधीकधी आयुष्यात न आवडणारे कामही करावे लागते…तेव्हा काय करावे?

एक गोष्ट आहे.. दोन व्यक्ती होत्या. त्यांची नावे धोंडू आणि महादू ..दोघांनाही एका कुठल्यातरी गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली. पाच किलो वजन डोक्यावर घेऊन  डोंगर चढून जायचे होते. धोंडू ने पाच किलो वजनाचा दगड डोक्यावर घेतला आणि तो डोंगर चढून गेला. थकून गेला बिचारा.. दुसरा महादू विचारी होता. त्याच्या मनात आले शिक्षा भोगायची आहे.. पाच किलो वजन न्यायचे आहे, ठीक आहे, नेऊया .. पण काय न्यायचे हे कुठे सांगितले आहे ?त्याने काय केलं ? भाजीभाकरी, दह्याचा लोटा, पाण्याचा तांब्या असे सारे पाच किलो वजनाचे घेतले. डोंगर चढून गेला. तोही थकला पण नंतर खाली बसून त्यांने मजेत भाजी भाकरी वर ताव मारला. शिक्षा दोघांनीही भोगली पण एकाला शिक्षा झाली आणि दुसऱ्याने त्या शिक्षेचा ही आनंद घेतला.

शिक्षा म्हणून काम करू लागलो तर ते शरीराला आणि मनाला थकवा देते पण तेच विचारपूर्वक आणि मजेने स्वीकारलं तर त्या कर्मात ही आनंद  मिळतो. म्हणून आपलं कर्तव्य , काम याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलायला हवा.

कर्मा फळा कडे पाहू नये ही गीतेची दृष्टी आहे.

एक गोष्ट सांगतात-  एका छोट्या मुलाने ऐंशी वर्षाच्या एका म्हाताऱ्याला आंब्याचे झाड लावताना पाहिले. तेव्हा तो हसला. म्हणाला-  “आजोबा, या झाडाचे आंबे तुम्हाला खायला मिळतील का?” तेव्हा म्हातारा हसून म्हणाला,” बाळ, ज्या आंब्याची फळे मी खाल्ली ते आंबे तरी मी कुठे लावले होते ? कोणीतरी माझ्या पूर्वजांनी जे पुण्यकर्म केले त्याचे फळ मी खातो, म्हणून माझ्या हातून मी झाडं  लावतोय , ते पुण्यकर्म होत आहे ..त्याच्या फळाचा मी कशाला विचार करू ?त्याचे फळ पुढील पिढ्यांसाठी.. मी त्याची अपेक्षा करत नाही.” ही गोष्ट आपण लक्षात ठेवली तर भगवंताने गीतेत फळाची अपेक्षा ठेवू नये असे का सांगितले आहे याची कल्पना येते..

तर अशी ही जीवनाचे शिक्षण देणारी गीता..विनोबा भावे तिला आई , गीताई म्हणतात..

स्वाध्याय परिवाराचे जनक पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात – गीता केवळ हिंदूंचा धर्मग्रंथ नाही, हा विश्व धर्मग्रंथ आहे.

गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले. जीवनाचा पुरुषार्थ दाखविला. आपण सामान्य माणसे जीवनात वेगवेगळ्या प्रसंगी गोंधळून जातो..कसे वागावे,काय करावे उमजत नाही.. भगवंतांनी गोंधळलेल्या अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवन सोपेपणाने जगण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे…आपण ते समजाऊन घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे..

ख्रिस्ती काय, हिंदू काय किंवा मुस्लिम काय…सर्व धर्म शेवटी सारखेच.. वेगवेगळ्या नद्या जशा वेगवेगळ्या ठिकाणाहून वहात येऊन  एकाच समुद्राला येऊन मिळतात त्याप्रमाणे एकाच ईश्वराकडे नेणाऱे हे वेगवेगळे मार्ग..

आजच्या ख्रिसमस व गीता जयंती निमित्त प्रभु येशू आणि गीताकार भगवान श्रीकृष्ण या दोन्ही विभूतींना तेवढ्याच प्रेमाने वंदन करूया..

 

© सुश्री स्नेहा विनायक दामले

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ मनमंजुषेतून ☆ गणितातील किमयागार रामानुजन – भाग 4 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  गणितातील किमयागार रामानुजन – भाग 4 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

रामानुजन.  ज्यांनी भारताचे नाव गणिताच्या नकाशावर आणले.  ज्यांनी गणिताचे तत्वज्ञान साऱ्या जगाला सांगितले.  गणिताच्या क्षितिजावर तळपणारा हा तेजस्वी तारा क्षयरोगाशी झुंजत मायदेशी परत आला.  ज्या उमेदीनं, ज्या उत्साहाने ते परदेशी गेले होते, तो उत्साह मनामध्ये, डोक्यामध्ये टिकून होता.  पण शरीर पोखरून गेले होते.  खूप अशक्तपणा आला होता.  श्वास घ्यायला त्रास होत होता.  आई वडिलांचा लाडका लेक परत आला होता, वाट बघून बघून थकलेल्या पत्नीचा पती परत आला होता’, पण फार वेगळ्या वाटेवर जाण्यासाठी.

असाध्य दुखणे घेऊन रामानुजन १९१९ साली भारतात परत आले आणि पुढच्याच वर्षी क्षयरोगाचे बळी ठरले.  भारताचे नाव उगवत्या सूर्या प्रमाणे आसमंतात पसरवणारा अनमोल गणितीतज्ञ अखेर 26 एप्रिल १९२० साली अनंतात विलीन झाला..  प्रो. हार्डी यांचा लाडका शिष्य त्यांना सोडून गेला.  आपल्या मातापित्यांना, तरुण पत्नीला दुःख सागरामध्ये लोटून स्वतःचे अस्तित्व जाडजूड व ह्यांमध्ये ठेवून गेला. ऐन तारुण्यात उमेदीच्या काळात वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

रामानुजन गेल्यानंतर सात वर्षांनी प्रो. हार्डी यांनी रामानुजन यांचे शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यांच्या शोधनिबंध आवर अभ्यास करून ते प्रकाशित करण्यामध्ये काही लोकांनी आपली वीस वर्षे खर्ची घातली आहेत. नवी दिल्ली आणि तामिळनाडू येथील सरकारी ऑफिसमध्ये रामानुजन यांची खूप पत्रे, शोध निबंध सर्वांना पाहायला, वाचायला विशेषतः भारतीयांना मिळतील अशी सोय प्रो. हार्डी यांनी करून ठेवली आहे इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी यांच्या जर्नल’मध्ये त्यांचे बारा निबंध प्रसिद्ध झाले.

भारतामध्ये बेंगलोर येथे रामानुजन मॅथेमॅटिकल रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन केले. तामिळनाडूमध्ये 22 डिसेंबर हा दिवस रामानुजन यांची आठवण म्हणून त्यांचा गौरव करण्यासाठी State I.  T.  Day म्हणून साजरा करतात. आय आय टी चेन्नई येथे दरवर्षी रामानुजन यांचे गणितातील योगदान आणि त्यांचे जीवन कार्य यासाठी 22 डिसेंबर रोजी फक्त गणित विषयावरील चर्चासत्र आयोजित केले जाते. हा दिवस भारतातील आणि परदेशातील गणितज्ञांना बोलावून साजरा करतात.

दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये येथे SASI RA -.  Shanmagha Arts and Science Technology and Research Academy या संस्थेनेरामानुजन यांच्या नावे,तरुण हुशार गणितज्ञांना शोधून त्यांना बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. अर्थात तो विद्यार्थी 32 वर्षाच्या आतील असला पाहिजे. त्याला दहा हजारांची स्कॉलरशिप देण्याचे ठरवले आहे. त्यांनी रामानुजन यांच्यासारखे गणितामध्ये अद्वितीय काम केले असले पाहिजे. जे अजून कोणाला मिळाले नाही.

PBS series Nova यांनी आकाशवाणीवरून रामानुजन यांचा जीवनपट”अंक आवडणारा माणूस”यावर नऊ कार्यक्रम प्रक्षेपित केले.

बीबीसी ने सुद्धा “गणितातील अवलिया” नावाने फिल्म काढली आहे.

प्रो. हार्डी यांच्यामध्ये रामानुजन यांची नैसर्गिक बुद्धिमत्ता त्यापूर्वीच ओळखली गेली असते तर ते आणखी मोठे गणिततज्ञ झाले असते.

गणित हाच ज्यांचा जीव की प्राण होता,गणित हा ज्यांचा श्वास होता, ध्यास होता त्या रामानुजन यांचे आपण स्मरण केले पाहिजे.. त्यांच्या लांबीने छोट्या, पण कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या जीवन पटा ची ओळख तरुण पिढीला झालीच पाहिजे.आपल्या देशातील खरे आदर्श रामानुजन आहेत..

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिनविशेष – २४-२५ डिसेंबर २०२० – नाताळ…. ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले

☆ विविधा ☆ दिनविशेष – २४-२५ डिसेंबर २०२० – ??नाताळ…. ??☆ सुश्री स्नेहा विनायक दामले ☆ 

उद्या २५ डिसेंबर, ख्रिसमस म्हणजे नाताळचा सण. ख्रिश्चन समुदायाचा हा सर्वात मोठा सण आहे.  प्रभू येशुंचा  जन्मदिवस म्हणून हा सण साजरा केला जातो.२४ डिसेंबर च्या संध्याकाळी चर्चमधे इव्हिनिंग मास म्हणजे प्रार्थना होतात. २४ च्या मध्यरात्री मिडनाइट मास सुद्धा होतात,मेरीने मध्यरात्री येशू बाळाला जन्म दिला म्हणून.. ख्रिसमस म्हटलं की केक, सजवलेला ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजची भेटवस्तू, गिफ्ट या गोष्टी आठवतात. सांता क्लॉजचे गिफ्ट ही लहान मुलांच्या दृष्टीने या सणातील अगदी आनंददायी गोष्ट..

लाल रंगाचा डगला, लाल रंगाची गोंडेदार टोपी, पांढरीशुभ्र दाढी असं सांताचं  रूप .

कोण बरे हा सांताक्लॉज?

आजपासून दीडहजार वर्षांपूर्वी जन्मलेले सेंट निकोलस यांना खरा सांता आणि सांताचे जनक मानले जाते. सेंट निकोलस म्हणजेच सांता, परंतु सेंट निकोलस आणि येशुंच्या जन्माचा काही संबंध नाही.

सेंट निकोलसचा जन्म तिसर्‍या शतकात, येशुंच्या मृत्युनंतर 280 वर्षांनंतर मायरा येथे झाला. ते एका श्रीमंत कुटुंबात जन्मले होते. ते लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. लहानपणापासूनच त्यांची प्रभू येशुंवर नितांत श्रद्धा होती. मोठे झाल्यानंतर ते ख्रिश्चन धर्माचे पादरी (पुजारी) आणि नंतर बिशप बनले. गरजूंना आणि लहान मुलांना भेटवस्तू देण्याची त्यांना आवड होती. या सर्व भेटवस्तू ते मध्यरात्रीच देत असत, कारण  देताना कोणी आपल्याला पाहू नये अशी त्यांची इच्छा होती. स्वतःची ओळख ते कोणासमोरही आणू इच्छित नव्हते.

कुणालाही मदत करताना ती शक्यतो झाकल्या मुठीनं करावी उगीच त्याचा गाजावाजा करू नये हा किती छान विचार आहे नाही यात..

बायबलमधली गुड सामारिटनची गोष्ट खूप प्रसिद्ध आहे.. सामारिटन म्हणजे सामारिया प्रांतातले लोक. यांचे आणि ज्यू लोकांचे वैर होते. ज्यू लोक सामारिटनना खालच्या दर्जाचे मानत.. जेरुसलेम आणि जेरिको या दोन शहरा दरम्यान घडलेली ही गोष्ट. एकदा एका ज्यू प्रवाशाला या वाटेमध्ये लुटारूंनी लुटलं. त्याला  बेदम मारहाण केली अगदी अर्धमेलं करून सोडलं. तो बिचारा विव्हळत रस्त्यावर पडला होता. थोड्या वेळाने त्या रस्त्यावरून एक ज्यू धर्मगुरू गेला. त्याने त्याच्याकडे पाहिलं. हळहळ व्यक्त करत तो आपल्या कामाला पुढे निघून गेला. नंतर अजून एक माणूस त्या रस्त्यावरून  गेला. त्यानेही या विव्हळणाऱ्या प्रवाशाकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर तिथे एक सामारिटन आला. त्या विव्हळणाऱ्या माणसाला पाहून तो अगदी कळवळला. तो त्या माणसाजवळ गेला, त्याने त्याच्या जखमा स्वच्छ केल्या.त्यावर थोडी आपल्याजवळची वाईन लावली आणि त्याला आपल्या घोड्यावर टाकून जवळच्या उपचार केंद्रात घेऊन गेला. एवढं करूनच तो माणूस थांबला नाही त्याने दुसऱ्या दिवशी त्या उपचार केंद्रातल्या माणसाजवळ काही पैसे देऊन ठेवले आणि त्यातून या माणसाचा उपचार पूर्णपणे करून त्याला बरे करण्यास विनंती केली.. ख्रिस्ताने याला गुड सामारिटन म्हटले..

‘Love thy neighbour’ हा ख्रिस्ताचा करूणेचा संदेश देणारी ही गोष्ट, अडचणीत, संकटात असलेल्या माणसाला, अगदी शत्रू असला तरी, मदत करावी असे सांगते.

यावरूनच निस्वार्थपणे लोकांच्या मदतीला धावून जाणार्‍या माणसास गुड सामारिटन म्हणण्याची प्रथा पडली आहे.

© सुश्री स्नेहा विनायक दामले

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ मनमंजुषेतून ☆ गणितातील किमयागार रामानुजन – भाग 3 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  गणितातील किमयागार रामानुजन – भाग 3 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

भारतामध्ये तामीळनाडू मध्ये भयंकर उकाडा तर इकडे इंग्लंडमध्ये मरणाची थंडी .. बाहेर बर्फ आणि कुडकुडायला लावणारी थंडी .. शिवाय खाण्यापिण्यातही बदल .. इथे आईच्या हातचे गरमगरम खाणे नाही ,  गार पाण्याची अंघोळ झाल्यावर, देवाची पूजा झाल्यावर, आणि स्वतः च्या हाताने जे जमेल ते खाणे .. त्यामुळे आधीच नाजूक तब्येतीच्या रामाजुनना सर्व कठीणच जात होते .. पण प्रो. हार्डीचा सहवास, त्यांचे मार्गदर्शन आणि मनासारखा करायला मिळणारा अभ्यास अन् संशोधन यामुळे रामानुजन खूष होते …

प्रो. हार्डी आपल्या या लाडक्या विद्यार्थ्याची खूप काळजी घेत .. त्याच्या खाण्यापिण्याची चवकशी करत .. रामानुजन ना बजावत,” जेवणा कडे,  खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष्य करू नको .. इथल्या थंडीत रुममध्ये सुद्धा भरपूर कपडे घालावे लागतात .. Rama , your brain is strange and strong .. follow your Bal Gangadhar Tilak .. Do you follow me ?

प्रो. हार्डी कडून भारतातील टिळकांचे नाव आणि त्यांचे अचूक वैशिष्ठ्य ऐकून रामानुजन आश्चर्य चकित झाले ..

प्रो. हार्डी नी चांगले जाणले होते की आपल्या या विद्यार्थ्याची गणिता मधल्या प्रतिभेची गरुडझेप आहे .. हा पाण्यात शिरला की, खोल समुद्रातच जाणार. हा भिडणार तो सूर्यालाच ..पाश्चिमात्यांमध्ये रामानुजन यांच्यासारखा गणिती क्रिया करणारा आणि लोकविलक्षण स्मरणशक्तीचा माणूस प्रोफेसर हार्डी यांनी पाहिला नव्हता ..इतर गणित तज्ञां पेक्षा कितीतरी जास्त काम रामानुजन करीत असत ..चिकाटी,जलद गणित क्रिया करण्याची कुवत आणि दांडगी स्मरणशक्ती या गुणांमुळे त्यांनी मिळवलेल्या संख्यांमधील संबंध एखाद्या िशिष्ट तर्‍हेच्या सूत्राने बद्ध करण्याकडे त्यांचा कल असे.मोठमोठाली वर्गमुळे त्यामधील उपवर्ग मुळे आणि ती भयंकर आकडेमोड एक रामानुजन च ती सोडवू जाणे आणि वाचू जाणे.

प्रो.हार्डी यांनी आपल्या व्यक्तिगत मताप्रमाणे गणितातील तज्ञांची वर्गवारी केली ..त्यामध्ये त्यांनी स्वतःला 25%,लिटिल वुड यांना 30%, हि ल्बर्ट,  यांना 80%,आणि आपला लाडका शिष्य रामानुजन यांना शंभर टक्के  गुण दिले ..एका गुरूकडून आपल्या शिष्याचा याहून मोठा गौरव तो कोणता होणार?यावरून रामानुजन यांची श्रेष्ठता दिसून येते.

रामानुजन यांच्या वह्या वाचायच्या म्हणजे सुद्धा फार मोठे अवघड काम होते .. त्यांच्या जाडजुड ग्रंथां प्रमाणे वह्या होत्या .. त्या

वह्या संशोधनात्मक गणिताच्या क्लिष्ट काथ्याकुट आकडे मोडीनी भरलेल्या होत्या .. स्वतः प्रो हार्डी, वॅटसन, क्लिसन या गणित तज्ञांनी या वह्यांचा उपयोग करून घेतला ..

रामानुजन अतिशय अवघड गणिते अतिशय सोप्या पद्धतीने सोडवून दाखवत आणि गणिता सारखा क्लिष्ट विषय मनोरंजनात्मक करत ..

क्षय रोगाची लागण झाल्यामुळे रामानुजन ना अनेकदा अॅडमिट व्हावे लागे .. प्रो. हार्डी त्यांना भेटायला जात .. त्यावेळी सुद्धा रामानुजन गणितातील गमती जमती सांगून त्यांना थक्क करत .. डॉक्टरांनी प्रो हार्डीना कटूसत्य सांगून पेशंटला त्यानीच सांगण्याची जबाबदारी सोपवली होती .. रामानुजन यांचे दुखणे विकोपाला गेले आहे आणि दोन वर्षापेक्षा जास्त त्यांना आयुष्य लाभणार नाही ‘ हे ते विदारक, कटूसत्य होते ..

अशा या गणितातल्या महान तपस्वीला कधीही बरं न होणारं दुखणं झाल्यामुळे भारतात परत यावं लागलं ..भारतातल्या आपल्या मायभूमीच्‍या हवेमध्ये मोकळा श्वास घेता येऊन तब्येत सुधारेल अशी वेडी आशा प्रो.हार्डी यांना वाटत होती ..आपल्या घरच्या लोकांच्या सहवासात घरचे सकस अन्न खाऊन उत्तर पडेल ही वेडी आशा फोल ठरत होती ..असाध्य दुखणे घेऊन 1919 आली रामानुजन भारतात परत आले ..

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆सूर संगीत राग गायन ( भाग ३ ) – उपशास्त्रीय गायन~ ठुमरी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  राग गायन ( भाग ३ )  – उपशास्त्रीय गायन~ ठुमरी ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

उपशास्त्रीय गायनात मुख्यत्वे करून ठुमरी/नाट्य संगीत आणि अभंग/भजन हे तीन प्रकार दिसून येतात.  हे गायन तानसेनांपासून कानसेनांपर्यंत सर्वच वर्गांत लोकप्रिय आहे.  कोणत्याही शास्त्रीय संगीताच्या बैठकीत श्रोत्यांची आता एखादी ठुमरी होऊ द्यावी किंवा नाट्य पद सादर करावे अथवा एखादा अभंग होऊन जावा अशी फरमाईश असतेच!

आजच्या लेखांत म्हणूनच ठुमरीविषयी थोडेसे!

ठुमरी, कजरी, होरी, चैती असे बरेच प्रकार या वर्गांत येतात. भरताच्या नाट्यशास्त्रात उल्लेखिलेल्या धृवगीताशी ठुमरीचे नाते जोडतां येते. त्याचप्रमाणे महाकवी कालिदास यांच्या मालविकाग्नीमित्र या नाटकांतील नायिकेने गायिलेल्या चतुष्पदी या चार पदांच्या गीतात ठुमरीचे मूळ दिसून येते. देवळांत गायल्या जाणार्‍या होरी~धमारांतही ठुमरीची बीजे आढळतात.  औरंगजेबकालीन रागदर्पण या ग्रंथातही ठुमरीचा उल्लेख आहे. यावरून ठुमरी हा गानप्रकार प्राचीनच आहे, परंतु ठुमरी लोकप्रिय झाली एकोणीसाव्या शतकांत!

ठुमक या शब्दावरून ठुमरी हा शब्द आला असावा कारण ठुमरीचे स्वरूप म्हणजे लय आणि भाव हे साज चढवून ठुमकत ठुमकत चालणारी ती ठुमरी! नृत्यगीत, शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत या सर्वांशी ठुमरीचे अजोड नाते आहे.

ठुमरी गायनांत आकारान्त आलाप आणि तानबाजीची अपेक्षा नसते.  गायन अधिक भावपूर्ण होण्यासाठी शब्दोच्चारांना विशेष महत्व आहे तसेच ठुमरीचे बोल घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या आलापाने रंग भरला जातो. “सैंय्या बिन घर सूना” म्हणतांना ही एकच ओळ इतक्या प्रकारे आळविली जाईल की त्या नायिकेचे सूनेपण,  एकटेपणा श्रोत्यांना जाणविल्याशिवाय रहाणार नाही व याच टप्प्यावर कलावंताला ‘वाहवा’ अशी दाद मिळेल.

या शैलीत राग नियम पाळण्याचे मुळीच बंधन नसते.  मूळ पहाडीतील ठुमरी गातां गातां तो अगदी सहजपणे कोमल रिषभ, धैवत घेऊन जोगिया, भैरवीचे रसिकांना दर्शन घडवून पुन्हा मूळ रागांत गायन सुरू करील.  कलावंताचे सुरावरचे हे नियंत्रण जितके पक्के तितके त्याचे गायन प्रभावी.

ठुमरीचा अंतरा गाऊन झाला की ताल बदलून, द्रुत लय घेऊन साधारणतः केरवा तालात ठुमरीचा पुन्हा मुखडा गाण्याची पद्धत आहे, ह्या प्रकाराला गायक व तब्बलजी यांची लग्गी लागणे असे म्हणतात. लग्गी लागतांना श्रोत्यांचे खास मनोरंजन होऊन ते माना डोलवायला लागतातच.

लग्गीमध्येही कलावंत निरनाराळ्या ढंगाने गाऊन आपले कसब दाखवतो आणि तिहाई घेऊन पुन्हा मूळ तालांत व लयीत एकदां मुखडा गाऊन ठुमरी गायन समाप्त होते.

खमाज तिलंग, काफी, मांड, पिलु, देस, तिलककामोद, पहाडी,  झिंझोटी, जोगिया भैरवी, सिंधभैरवी हे ठुमरीचे प्रमूख राग आहेत. कारण हे राग लोकधुनांवर आधारित आहेत. दीपचंदी, दादरा, सूलताल, मत्तताल इत्यादी तालांत प्रामुख्याने ठुमरी निबद्ध असते.

सासू~नणंदेची गार्‍हाणी, प्रियकराची वाट पहाणारी प्रेयसी, सवती सोबत रमलेला पति हे ठुमरीचे विषय.  अष्टनायिकांचे दर्शन, स्त्रीचे समाजांतील उपेक्षित स्थान,

पुरूषप्रधान संस्कृतीने तिच्याकडे भोग्य वस्तू म्हणून पाहिले, त्या काळाचे समाजाचे प्रतिबिंब ठुमरीच्या आशयांत दिसून येते.  राधा कृष्णाचे प्रेम हा ठुमरीचा अगदी लाडका विषय. ” कौन गली गयो श्याम”,  राधे बिन लागे ना मोरा जिया” ह्या गिरिजादेवींच्या ठुमर्‍या प्रसिद्ध आहेत.  ठुमरीच्याच झूला, होरी या प्रकारांमध्ये कृष्ण~गोपी यांच्या क्रीडेची विविध रूपे दिसतात. “झूला धीरेसे झुलावो बनवारी रे सांवरियाॅं”, “झूला झूले नंदकिशोर” हे पारंपारिक झूले आहेत. “छैलवा ना डारो गुलाल”, “बिरजमे होरी कैसे खेलू”, “होरी खेलत है गिरिधारी” ही कवने होरीची उदाहरणे देता येतील.  “पिया तो मानत नाही” ही काफी रागांतील भीमसेनजींची ठुमरी न ऐकलेले रसिक अपवादात्मकच!”का करू सजनी आये ना बालम” ही देस रागांतील प्रसिद्ध ठुमरी बरेच गायक/गायिका गातात.  यावरून लक्षांत येते की ठुमरी म्हणजे शृंगार रसाचा परिपोष; परंतु त्याचबरोबर ठुमरीत भक्ति आणि अध्यात्मही असते हे लक्षात असू द्यावे.  संत कबीराच्या निर्गूण पदावर तिलककामोद रागात असलेल्या ठुमरीचा हा एक नमूना!

“चिलम भरत मोरी जर गयी चुटकिया सैय्या निरमोहीके राज रे”— अर्थात ह्या ऐहिक जीवनात मी होरपळलोय,  मला मोहपाषांतून सोडव. सूरदासांची, मीराबाईंची पदे अनेक सिद्धहस्त गायकांनी ठुमरी शैलीत गायली आहेत.

“सोच समझ नादान” हे पिलू ठुमरीत भीमसेनजींनी गायलेले कबीर भजन किंवा “सांझ भई घर आवो नंदलाल” ही सिद्धेश्वरी देवींनी गायिलेली ठुमरी. या सुरांना अध्यात्मिकतेचा स्पर्ष आहे. ” सांझ भई” म्हणजे माझ्या आयुष्याची संध्याकाळ झाली, तेव्हा हे भगवंता आता तरी मला दर्शन दे असा ह्या ठुमरीचा पारमार्थिक अर्थ सांगितला जातो.

कजरी हा ठुमरीचाच एक प्रकार. श्रावण महिना, वर्षा ऋतु व विरहावस्था हे कजरीचे विषय. ” सावनकी ऋतु आयी रे सजनिया प्रीतम घर नही आये” ही शोभा गुर्टूंची कजरी गाजलेली आहे.

चैती म्हणजे ज्या ठुमरीत चैत्र महिन्याचे वर्णन असते. उदा~अंबूवाके डारीपे कूजे री कोयलिया.

राम जन्माचा सोहळा चैतीत वर्णन केलेला दिसतो.

टप्पा हा गानप्रकार ठुमरीहून थोडा वेगळा आहे.  पंजाबमधील लोकसंगीत हे टप्प्याचे उगमस्थान. तिकडचे उंट हांकणारे सारवान हे गात असत म्हणून ह्या शैलीला टप्पा असे नांव पडले. पंजाबी, अवध, भोजपूरी, व्रज या भाषेत टप्पे लिहिलेले आढळतात. ग्वाल्हेर घराण्याचे गायक टप्पा गायल्याशिवाय आपल्या मैफिलीची सांगता करीत नाहीत.

क्रमशः….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘स्मृती’ आठवणींचं ब्रम्हांड..!☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ ‘स्मृती’ आठवणींचं ब्रम्हांड..!☆ श्री अरविंद लिमये ☆

‘स्मृति’ हा संस्कृत शब्द.एक धर्मग्रंथ.

‘श्रृति, स्मृति, पुराणोक्तफलप्राप्त्यर्थं…’

या फलश्रृतित उल्लेख असलेला तो हाच धर्मग्रंथ..!

स्मृती शब्द मराठीत वापरला जातो तेव्हा ‘ति’ दीर्घ होते , तसा त्याचा अर्थही मर्यादित रुपात रुढ होत असावा. स्मृती हा शब्द आपण आठवण या अर्थाने सर्रास वापरतो.पण मला आपल़ं उगीचच वाटतं(उगीचच एवढ्याचसाठी कि त्याच्या पृष्ठ्यर्थ संदर्भ मला मिळालेला नाहीय)की आठवणी स्मृतींमधे साठवल्या जातात असं आपण म्हणतो, तर स्मृती म्हणजे आठवणी नव्हे तर त्या साठवल्या जातात ती जागा. माणूस दिवंगत झाल्यानंतरही तो स्वत:च्या कर्मांसोबत तो साठा बरोबर नेत असतो.पूर्वजन्मीच्या आठवणी म्हणतात त्या याच.

नवीन जन्मानंतर आपल्या पूर्वजन्मातील आठवणी पुसल्या जातात. त्या पुसल्या गेल्या नसत्या तर आपण त्या आठवणींसकट नवं आयुष्य नीट जगूच शकलो नसतो. म्हणूनच निसर्गयोजनेनुसार पुनर्जन्मापूर्वी जाणिवांवरील आठवणींचे ठसे पुसले जातात. मात्र कांही ठसे इतके खोलवर कोरले गेलेले असतात किं ते पुसले न गेल्याची शक्यता असते. नवजात अर्भक नजर स्थिर होईपर्यंत स्वत:शीच अस्फुटसं हसत असतं किंवा मधेच अचानक रडतही असतं ते पूर्वजन्मातल्या आठवणींभोवती त्याचं मन घोटाळत असल्यामुळेचअसं म्हणतात, त्यात म्हणूनच तथ्य असावे असे वाटते. नजर स्थिर झाल्यानंतर मात्र ते नव्या जन्मात खर्या अर्थाने स्थिर होते. त्या आठवणींपासून विलग होऊनसुध्दा या जन्मातही  काहीजणाना ‌वयाच्या ३-४ वर्षांपर्यंत त्यांचे गेल्या जन्मातले आईवडिल, जवळचे नातेवाईक सर्व संदर्भांसह आठवत असल्याच्या घटनाही कपोलकल्पित  नसल्याचे प्रत्ययास आलेले आहे. अर्थात ४-५वर्षांनंतर मात्र त्या आठवणी पुसट होत नाहीशा होतात.

कांहीवेळा एखाद्या माणसाला प्रथमच भेटत असूनही तो पूर्वी कधीतरी भेटला असल्याची  भावना मनात येते न् मन अस्वस्थ होते. कधी एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यानंतर, आपण इथे आधी कधीतरी येऊन गेल्याची भावना आपल्या मनात निर्माण झाल्याचा अनुभवही अनेकाना आला असेल.

या सर्वांवर सखोल संशोधन सुरु असले तरी मला स्वत:ला मात्र त्याचा थांग लागूच नये असे वाटते. नाहीतर आपल्या जगण्यातली सगळी मजाच निघून जाईल. पाटीवरची अक्षरे पुसली तरी त्या अक्षरांचा अर्थ मात्र मन:पटलावरुन पुसला जात नाही. तशाच या पूर्णत:पुसल्या न गेलेल्या पूर्वजन्मातल्या आठवणी..!!

आठवणी रम्य असतात तशा क्लेशकारकही.गोडअसतात तशा कडवटही.फुललेल्या असतात तशा रुतलेल्याही. त्या कशाही असल्या तरी त्यांचा गुंता होऊ न द्यायची काळजी आपण घ्यायला हवी. तरच हव्याहव्याशा आठवणी सोबत करतील आणि नकोशा आठवणींवर नियंत्रणही ठेवतील.

कटू आठवणी विसरता आल्या नाहीत तरी कधीच विसरु नयेत अशा आठवणी निर्माण करणं मात्र आपल्याच हातात असतं. कारण वर्तमानातलं आपलं वागणं, बोलणं, नव्हे जगण्यतला प्रत्येक क्षणच पुढे आठवणींमधे रुपांतरीत होणार असतो. त्या चांगल्या कि वाईट हे असं आपल्यावरच तर अवलंबून असतं. त्या आठवणी चांगल्या हव्या असतील तर आपलं जगणंही चांगलं असायला हवं हे ओघाने आलंच. चांगलं म्हणजे कसं, तर आठवत रहावं असं…!!

आपल्या स्मृतीत साठवल्या जाणार्या आठवणी या पुढील जन्मासाठीचं आपलं ‘संचित’असणार आहे एवढं भान जरी जगताना ठेवलं, तरी उद्या काय होईल याचं दडपण निर्माण होण्यापूर्वीच विरुन गेलेलं असेल.

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares
image_print