मराठी साहित्य – ☆ मनमंजुषेतून ☆ गणितातील किमयागार रामानुजन – भाग 2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  गणितातील किमयागार रामानुजन – भाग 2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

नोकरी मिळण्यापूर्वी रामानुजन यांची दिवाण बहादुर नावाच्या गणिताच्या शौकीन कलेक्टर साहेबांची गाठ पडली होती. रामानुजन यांच्या वह्या पाहून, त्यांनी संशोधन केलेले निष्कर्ष पाहून कलेक्टर साहेब थक्क झाले. त्यांनी रामानुजन यांचे गणितावरील प्रभुत्व,चेन्नई इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काम करणाऱ्या ग्रिफिथ नावाच्या सरांच्या कानावर घातली. ग्रिफिथ आणि पोर्ट ट्रस्ट चे अध्यक्ष सर फ्रान्सिस स्प्रिंग यांची ओळख होती. त्यामुळे रामानुजन यांना गणिताच्या अभ्यासासाठी,संशोधनासाठी पुरेसा वेळ मिळू लागला. रामानुजन यांनी कार यांच्या पुस्तकावरून एक फॉर्म्युला तयार करण्यासाठी 1903 ते 1914 पर्यंत तीन मोठ्या वह्या भरवल्या.

नोकरी व्यतिरिक्त उरलेला सर्व वेळ रामानुजन गणितातील काथ्याकूट सोडण्या मध्ये,घालवत असत. कलेक्टर साहेब,रामानुजन यांचे मित्र यांना आपल्या बुद्धिमान मित्रांचा खूप अभिमान होता.  फक्त कारकुनी करत त्याने आपले आयुष्य काढू नये,त्यांची बुद्धी कुजू नये असे त्यांना मनापासून वाटत होते. त्यांचे एक मित्र शेषू अच्यर यांनी रामानुजन यांना आपल्या संशोधनाविषयी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजचे ख्यातनाम सदस्य प्रोफेसर हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार करावा असे सुचवले. 25 वर्षीय रामानुजन यांनी ब्रिटिश गणितज्ञ प्रोफेसर हार्डी यांना 16 जानेवारी 1913 रोजी पहिले पत्र पाठवले. तेच पत्र, तोच क्षण रामानुजन यांना केंब्रिजला जायला कारणीभूत ठरला. अतिशय लीनतेने रामानुजन यांनी जे पत्र लिहिले ते वाचून प्रोफेसर हार्डी भारावून गेले. पत्रासोबत 120 प्रमेय, निष्कर्ष होते. प्रोफेसर हार्डी नी ते पत्र 4 -5 दा वाचले. पत्रातील साधी सरळ सोपी भाषा त्यांच्या हृदयाला भिडली. विद्यापिठाची पदवी न घेऊ शकलेल्या रामानुजन यांनी गणितातील प्रमेय, उदाहरणे आणि गुंतागुंतीचे क्लिष्ट प्रश्न लि ल या सोडविले होते. ते पाहून गणित विषयाचा गाढा अभ्यासू हे लिहू शकेल इतरांना जमणे शक्यच नाही, कोणी कॉपी करणे सुद्धा शक्य नाही. म्हणजेच हा पहिल्या दर्जाचा प्रामाणिक गणितज्ञ आहे यात वाद नाही ही हार्डी यांची खात्री पटली. त्यांना कधी एकदा या भारतातील गणित तज्ञाला इंग्लंडला आणीन असे झाले होते. त्यांनी रामानुजन ना इंग्लंड ला आणण्याचे पक्के केले. तसे पत्रही रामानुजन यांना पाठवले. त्यांना शिष्यवृत्ती देऊ केली.

मात्र आपल्या मुलाने समुद्रपर्यटन करावे हे त्यांच्या घरी कोणासही रुचेना.  सोवळ्या ओवळ्याचे  कर्म ठ विचार,फक्त शाकाहारी खाणे अशा अडचणी निर्माण झाल्या. रामानुजन यांचा काका भयानक संतापला. अखेर रामानुजन च्या आईनेच तो मांसाहार करणार नाही,इतर वावगे पेय पिणार नाहीअशी शपथ घेतली आणि मगच रामानुजन यांना केंब्रिज येथे जाण्याची परवानगी मिळाली.

मद्रास सरकारकडून त्यांना 250 पौंडाची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यातील पन्नास पाऊंड त्यांच्या कुटुंबाला भारतात मिळणार होते. ट्रिनिटी कॉलेज कडून त्यांना आणखी साठ पौंडाची शिष्यवृत्ती जाहीर झाली आणि रामानुजन यांचे केंब्रिजला जाणे नक्की झाले.

आई-वडिलांचा, पत्नीचा, मित्रमंडळींचा निरोप घेऊन बोटीने रामानुजन यांचा प्रवास सुरू झाला. प्रोफेसर हार्डी नीअतिशय मनापासून आपल्या या तरुण संशोधकाचे स्वागत केले. रामानुजन यांच्या प्रगल्भ मेंदूला इंग्लंड मध्ये भरपूर खाद्य मिळत होते. पण कडाक्याची थंडी आणि गार पाण्याची अंघोळ, स्वतःच्या हाताने बनवलेले जेवण खायचे ह्या अट्टाहासामुळे त्यांची तब्येत बिघडू लागली. तरी गणिताचा अभ्यास सुरू होता. प्रोफेसर हार्डीच्या मार्गदर्शनामुळे इंग्लिश आणि इतर नियतकालिकांमध्ये त्यांचे निबंध प्रसिद्ध झाले. इंग्लंड मधील पाच वर्षाच्या वास्तव्यात त्यांचे 21 निबंध प्रसिद्ध झाले.  Indian Mathematical सोसाइटी या जर्नल’ मध्ये बारा निबंध प्रसिद्ध झाले. पहिल्या दोन वर्षांमध्ये त्यांनी काढलेल्या निष्कर्षाची सत्यता गणिती जगाला पटली होती. त्यामुळे त्यांना रॉयल जगाचे सदस्यत्व बहाल करण्यात आले होते. कोणत्याही विद्यापीठाची पदवी नसताना बादशाही समाजाचे सभासद होणारे ते पहिले भारतीय होते. हा वैयक्तिक त्यांचा आणि भारताचाही फार मोठा गौरव होता. त्यांच्या नावापुढे आता F. R. S.ही अक्षरे झळकणार होती. त्याचवेळी त्यांना त्रिनिटी फेलोशिपही मिळाली. हा फार मोठा गौरव लहान वयामध्ये रामानुजन यांना मिळाला.

मात्र तब्येत साथ देत नव्हती. सतत सर्दी, ताप यामुळे अशक्तपणा वाढू लागला. त्यांना क्षयरोगाची बाधा झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जादूचा चौरस (Magic Square) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ जादूचा चौरस (Magic Square) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

आज 22 डिसेंबर. भारतातील थोर गणितज्ञ कै.श्रीनिवास रामानुजान यांची आज 133वी जयंती. अवघं 33 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं पण एवढ्या अल्प काळात त्यांनी गणितातील जी सूत्रे शोधून काढली, जे सिद्धात मांडले, ते बघून अवघं जग विशेषत: युरोपातले गणितज्ञ दिपून गेले. त्यांच्याबद्दलची माहिती क्रमश: उद्यापासून अंजली गोखले देत आहेत. आजच्या दिवशी त्यांच्या गणिती प्रतिभेला अभिवादन करत त्यांचा एक जादूचा चौरस इथे सादर केला आहे. आपल्या माहितीसाठी आणि आपल्या मनोरंजनासाठीसुद्धा.

रामानुजान यांनी तयार केलेला जादूचा चौरस (Magic Square)

चौरस क्र. 1

चौरस – क्र. 2

रामानुजन यांची जन्मतारीख घालून त्यांनी तयार केलेल्या सूत्रांनुसार चौरस तयार करू. 

DD – Date of birth – 22 , MM- Month of birth – 12

CC- Century of birth – 18, YY – Year of birth – 87

त्यामुळे –

YY+1= 88 , CC-1 = 17,  MM-3 = 9,  DD+3 = 25

MM-2 = 10, DD+2 = 24, YY+2 = 89, CC-2 = 16

CC+1 = 19,  YY-1 = 86,  DD+1 = 23, MM-1 = 11

 

चौरस –क्र. 3

 

आता सूत्राप्रमाणे –आडव्या ओळी- संख्यांची बेरीज

1.ली ओळ – 22+12+18 + 87 = 139,  2.री ओळ – 88 + 17 + 9 + 25 = 139,

3.री ओळ – 10+24+89 +16 = 139,   4.थी ओळ – 19 + 86 + 23 +11= 139,

 

आता सूत्राप्रमाणे उभे रकाने – संख्यांची बेरीज

रकाना1 – 22 + 88 + 10 + 19 = 139  रकाना2 – 12 + 17 + 24 + 86 = 139

रकाना3 – 18 + 9 + 89 + 23  = 139  रकाना4 – 87 + 25 + 16 + 11 = 139

 

आता चौरस –क्र. 2 मधील आकड्यांच्या जागी चौरस –क्र. 3 मधील संख्या घ्या आणि खालीलप्रमाणे बेरीज करून बघा.

 

1+2+5+6 = 3+4+7+8 = 9+10+13+ 14 = 11+12+15+16 = 6+7+10+11 = 139

त्याचप्रमाणे a. 1+6+11+16 म्हणजेच 22+17+89+11= 139

तसेच         b. 4+7+10+13 म्हणजेच 87+9+24+ 19 = 139

                 c. 2+3+14 +15 = 1+ 4 + 13 +16 = 139

(c. मध्ये सूत्रातल्या प्रमाणे संख्या घालाव्या.)

याप्रमाणे आणखी अनेक पर्म्युटेशन्स- कॉम्बिनेशन्स करून बघता येतील. जसे

                d. 5+8+9+12 = 139

(d. मध्ये सूत्रातल्या प्रमाणे संख्या घालून)

 

याप्रमाणे जादूच्या चौरसात वाचकांनी आपल्या वयाचे आकडे घालावे आणि वर सांगितल्याप्रमाणे ती बेरीज समान येते का बघावे किती येते, तेही कळवावे.

(आता या वयात पुन्हा एकदा गृहपाठाचा अनुभव)

 

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ मनमंजुषेतून ☆  गणितातील किमयागार रामानुजन – भाग 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  गणितातील किमयागार रामानुजन – भाग 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

“मेरा भारत महान” असे आपण खूपदा वाचतो. तो महान होण्यासाठी अनेक जणांनी कितीतरी प्रयत्न केलेले असतात. आपण यांची ओळख करून घेतले पाहिजे. नवीन पिढीला ओळख करून दिली पाहिजे.

आपल्या भारत देशामध्ये भास्कराचार्या नंतर जागतिक कीर्ती मिळवणारे आणि भारताला जागतिक किर्ती मिळवून देणारे गणित तज्ञ होऊन गेले,ते म्हणजे रामानुजन.त्यांचे संपूर्ण नाव श्रीनिवास रामानुजन अय्यंगार.आपल्या विलक्षण बुद्धी सामर्थ्याने गणिती जगाला त्यांनी अक्षरशः थक्क करून सोडले.

भारताच्या तामिळनाडू प्रांतांमध्ये तंजावर जिल्ह्यामध्ये रामानुजन चा जन्म एका गरीब ब्राह्मण कुटुंबात 22 डिसेंबर 1887 ला झाला. वडील एका कापडाच्या दुकानामध्ये कारकून होते. आई कोमलतामल देवीची भक्त , कर्मठ आणि कडक सोवळे ओवळे पाळणारी शाकाहारी प्रेमळ स्त्री होती.  काळ्या सावळ्या रामानुजनच्या डोळ्यामध्ये बुद्धिची चमक होती.  लहानपणा पासून त्यांची तब्येतही नाजूकच !

शाळेमध्ये पहिल्यापासूनच हुशार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची स्मरणशक्ती तीव्र होती. एकदा सांगितलेले त्यांना पटकन समजत असे. कुतूहला मुळे एकदा काही शिक्षक आणि पालक रामानुजन च्या घरी आईला भेटायला आले. रामा इतका हुशार आहे तुम्ही त्याला मुद्दाम काय खायला देताअसे विचारले. आई म्हणाली,” अयो, आमच्या कडे पावसाळ्यात छतातून पाणी गळते आणि उन्हाळ्यात झळा येतात.  आमी काय वेगळे देणार? सगळी आमच्या देवीची कृपा “.

शाळेत असल्यापासूनच रामानुजन यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांचे वाचन राजा राणीची गोष्ट,जादू ची चटई असलं नव्हतं बर का!वाचनही ते गणिताचे च करत. त्याची ही गणिताबद्दलची जिज्ञासा आणि आवड पाहून त्याच्या वडिलांच्या मित्रांनी त्याला सरकारी कॉलेजच्या ग्रंथालयातून CARRनावाच्या गणितज्ञाचे भले मोठे पुस्तक आणून दिले. पुस्तक होते – सि नॉप्सिस फॉर प्युअर  मॅथेमॅटिक्स. आश्चर्य म्हणजे कॉलेजच्या मुलांसाठी असलेला हा संदर्भग्रंथ एवढ्याश्या मुलाने कोणाचीही मदत न घेता वाचून काढला आणि त्यातील क्लिष्ट विषय समजावून घेतला. हे पुस्तक वाचता वाचता रामानुजन यांच्या विचारांना चांगलीच धार आली.

पूर्ण संख्या घेऊन त्यांचे जादूचे चौरस करण्यात रामानुजन पटाईत झाले होते आता चौरसाच्या क्षेत्रफळ एवढे वर्तुळ कसे काढायचे या प्रश्नावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. त्यांनी लहान वयातच पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या लांबी किती असावे याविषयीचे गणित केले आणि त्यांनी काढलेल्या या परिघाची लांबी इतकी बरोबर होती की त्यात केवळ काही फुटाची कमी होती.

वयाच्या सोळाव्या वर्षी शालांत परीक्षा पास झाल्यावर त्यांना “जूनियर सुब्रम्हण्यम शिष्यवृत्ती” मिळाली. सरकारी कॉलेजमध्ये ऍडमिशन ही मिळाली.पण गणित हाच विषय त्यांच्या नसानसात भिनला होता.त्यामुळे इतर विषयांकडे त्यांचे दुर्लक्ष होत होते.त्याचा परिणाम असा झाला की एकदा नाही तर सलग दोनदा वार्षिक परीक्षा ते उत्तीर्ण झाले नाहीत.आणि त्या शिक्षणाविषयी त्यांची गोडी निघून गेली  आणि त्यांनी कॉलेजचे शिक्षणच सोडून दिले.

पण आपल्या आवडत्या गणिताचा अभ्यास मात्र त्यांनी सोडला नाही. त्या काळच्या प्रथेनुसार रामानुजन यांचा विवाह करून देण्यात आला. त्यांची पत्नी दहा वर्षाची होती. दोघांचे पोट भरण्यासाठी नोकरी करणे आवश्यक होते. त्यामुळे ते चेन्नई ला आले. खूप खटपट करून एका गोदीमध्ये त्यांना कारकुनाची नोकरी मिळाली आणि पोटापाण्याचा प्रश्न थोडातरी सुटला.

गणिताच्या अभ्यासाची मात्र रामानुजन यांनी अजिबात हेळसांड केली नाही. तो अव्याहत सुरूच होता. 1911 च्या”जर्नल ऑफ इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी”या नियतकालिकात त्यांचा पहिला संशोधन लेख छापून आला.तो लेख” बेर्नुली संख्यांचे गुणधर्म”या विषयावर होता पाठोपाठ आणखी दोन संशोधन लेख याच नियतकालिकात प्रसिद्ध झाले. त्यामुळे रामानुजन यांच्या बद्दल सर्वसामान्य लोकांनाही जिज्ञासा निर्माण झाली. आपल्या लेखामध्ये त्यांनी सर्वसामान्य माणसांना कूट प्रश्नही विचारले   होते.

गणित हाच त्यांचा श्वास होता – ध्यास होता.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जो उस्ताद तोच वस्ताद…☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ जो उस्ताद तोच वस्ताद ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

?????

जंगलातील   रोजच्या रुटीनला कंटाळून  आनंदी वातावरण निर्माण  करण्यासाठी सुरु झालेला ‘बिग टास्क’ हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला होता.  आज  या कार्यक्रमाचा विजेता (/ विजेती) ठरणार  होता. विजेत्या स्पर्धकाला  ‘जंगलं पर्व’ या व्हाटसप ग्रुप चे ऍडमीन पद द्यायची घोषणा  ‘राजाने’ आधीच केली होती. या महा अंतिम फायनललाही  खास परीक्षक आले होते

छोटा  भीम – बेळगाव जवळील  दांडेली अरण्यातून

मोगली – पुण्या  जवळच्या अरण्येश्वर येथून

आणि चीन मधील एका जंगलातून खास डोरेमॅन आपल्या अद्भुत गॅजेटसह उपस्थिती होता.

मराठी इव्हेंट मधला कुठलाही शो हा

‘थूकरटवाडी’ जंगलातील प्राण्यांशिवाय संपन्न होऊच शकत नाही तेंव्हा निलू गाय आपल्या संपूर्ण टिम सह (भाऊ करकोचा, कुशल गेंडा, सागर मासा , श्रेया कोंबडी) सह हजर होता. उपस्थितांचे मनोरंजन करत होता.

जे या कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत ते तुमच्या आमच्यासारखे ‘गाढव’ झुंडीने हा कार्यक्रम बोरिवलीच्या नॅशनल पार्क मधे लावलेल्या मोठ्या स्किनवर वर पहात होते. कात्रजच्या उद्यानात हा कार्यक्रम न दाखवल्याचा निषेध म्हणून पुणेकर गाढवांनी उद्या लोणावळ्याच्या भूशी जंगलात जिथे हा शो होतो तिथे निषेध मोर्चा न्यायचे ठरवले होते. आनायचे पावसाळी पिकनिक कुटुंबासह करता येईल असा विचार या हुषार गाढवांच्या डोक्यात होता हे वेगळे सांगायला नको

(जे यातलं काहीच करु शकत नव्हते ते हा टुकार लेख वाचत होते)

तर

शेवटच्या फेरी पर्यत

शिल्लक राहिलेले स्पर्धक होते  पुष्कर – लांडगा , अस्ताद, -अस्वल (उर्फ वकील),

सई, – लांडोर , मेघा, – मेंढी , शर्मिष्ठा –  वासरु , स्मिता – कोकिळा

सुरवातीला खास परिक्षकांनी वेगवेगळे टास्क देऊन स्पर्धकांना गोंधळात टाकले. यात कोकिळेला मलिष्काचे एक गाणे म्हणावयास सांगणे, लांडोरीला जंगलात तयार झालेल्या खड्ड्यात पाय न टाकता ‘मोर डान्स’ करायला सांगणे,  अस्वलाला भक्ती गीत म्हणायला लावणे, लांडग्याला १ मिनिटात शंभर वेळा पक्ष बदलणे,  इ इ. टास्क होते. सर्वांना हे करताना घाम फुटलस

त्यानंतर  सर्व प्राण्यांचा लाडक्या ‘ रिंग मिनिस्टर ‘ नागेश ने उपस्थित राहून सर्वाना एक एक आदेश दिेला. हा कार्यक्रम ही रंगला आणी उपस्थितांनी

‘जय जंगलराज’ अशा घोषणा दिल्या.

शेवटी मुख्य गोष्ट स्पर्धकांना करावयाला सांगितली ती म्हणजे मतांसाठी ( SMS) भिक मागणे. कारण मिळालेली मते आणी परिक्षकांचे गुण यावरच विजेता ठरणार होता.

सुरवात कोकिळेने केली मी जर ग्रुप ‌अॅडमीन झाले तर ग्रुपवर येणारे पुणेकरांवरचे विनोंद बँन करीन. पुणेकर please.please. मत द्या ?

लांडगा – नो नियम. पुश करो( forward करो) खुष रहो. देतायना मला मत

अस्वल ( वकील) – A to z मेसेज टाका फक्त B ग्रेड नको. आणि नवीन नियमाचा बाऊ नको. मी स्वतः तुमच्या ग्रुप मधे आहे तो “भालू पोलिस” कसा येतो तेच बघतो.  मला मत द्यायचे की नाही तुमचा प्रश्ण

वासरु- माझ्या सारखा आपला ग्रुप ही खेळकर राहिल. मलाच विजयी कराल ना?

लांडोर – तुम्ही माझा आत्तापर्यत चा प्रवास जाणता. आत्ता जो आपला ग्रुप आहे त्याला और ‘अच्छे दिन’ आणेन. विश्वास दर्शक मत नक्की द्या

मेंढी- काही पण भेंडी बोलून राहिले हे.  पोकळ आश्वासन देतायत सगळे.  मी काही नियम ठेवणार नाही आणी पाळणार नाही. श्रावण पण नाही. मला जर निवडून दिले ते माझ्याकडून सर्वाना गटारी पार्टी

तर शेपटी नसलेल्या प्राण्यांनो

.. हो हो तुम्हीच  कुणाला देताय मत?

आणी निकाल काय लागलाय ?

लवकरच.

वाचत रहा..

माझे टुकार ई-चार

(* सर्व लेखन काल्पनिक,  वस्तुस्थितीशी काही संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा)

©  श्री अमोल अनंत केळकर

२०/७/१८

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शिशीर ☆ सौ. राधिका भांडारकर

☆  विविधा ☆ शिशीर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

माझ्या मते ऋतुचक्रातला शेवटचा, ऋतु म्हणजे शिशिर ऋतु!!

या वर्षी २१ डीसेंबरच्या मध्यरात्री पासून सुरु होऊन १७ फेब्रुवारी पर्यंत ढोबळ मानाने शिशीर ऋतुचा काल आहे.. थोडेसे या ऋतूविषयी…

असं मानलं जातं की,वसंत,ग्रीष्म आणि वर्षा हे देवींचे ऋतु तर शरद ,हेमंत,शिशीर हे पितरांचे ऋतु.काडाक्याची थंडी, कधी घनदाट धुके,धवल दिशा आणि ऊज्वल धरती हेच शिशीराचे रुप! जणु पृथ्वी आणि आकाश यांचे एकतत्व!!

भरपूर ऊर्जा देणारा ऋतु म्हणजे शिशीर ऋतु!! या कालात सूर्यकिरणांत अमृततत्व असते. आणि वनस्पती,फळं, भाज्या,या सर्वांमधे याच तत्वांचा समावेश झाल्यामुळे त्या अधिक स्वस्थ्यवर्धक बनतात.

शिशिर ऋतु म्हणजेच शीतऋतु. हलक्या गुलाबी थंडीचा हेमंत सरतो  आणि कडक थंडीच्या शिशिराची चाहुल लागते.या दिवसात गोड आणि स्निग्ध पदार्थांचा आहार योग्य मानला जातो. त्यामुळे या काळात येणारे सण, विशेषत: माघी गणेश जयंती, सोमवती अमावस्या, मकर संक्रांत साजरी करत असताना तीळ आणि गुळाचे सेवन हे फार महत्वाचे ठरते.

माघ आणि पौष महिन्यात तिळ—गुळाचे दान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. खरं म्हणजे आपले ऋतु आणि आपले सर्वच सण यांच्या केंद्रस्थानी धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचेच अधिष्ठान असते. शिवाय या संकेताच्या माध्यमातून संस्कृती,परंपरा जपण्याबरोबरच परस्परांमधले प्रेम,आपुलकी, जिव्हाळा, नात्यांची जपणूक, याचाही पाठपुरावा असतो.

“तिळगूळ घ्या अन् गोड बोला..” हा प्रेमाचा, वैरभाव दूर करण्याचा, एक महान संदेश शिशिर ऋतु देत असतो!!

खरं सांगायचं, म्हणजे सृष्टी आणि मानवी जीवन हे एकात्म आहेत. सृष्टी ,निसर्ग हा मानवाचा महान गुरु आहे. बदलते ऋतुचक्र हे मूळातच जीवन कसं असावं, जगण्याचे नियम कोणते याचीच शिकवण देते. ही शिकवण शरीराबरोबर मनही घडवत असते.मनावरच्या संस्कारासाठी हवा फक्त निसर्गाशी जाणीवपूर्वक संवाद!! जगतानाची डोळस दृष्टी!

शिशिर ऋतुला पतझड अथवा पानगळीचा ऋतु असेही संबोधिले जाते. कारण या ऋतूत शुष्कता वाढलेली असते.झाडांवरची पानं पिवळी पडुन ती गळून जातात .. म्हणून पानगळ!! पण यामागचा निसर्गाचा नियम समजून घेण्यासारखा आहे.पानाद्वारे जे पाण्याचे शोषण होते त्याला अवरोध करण्यासाठी ही पानगळ असते. धरतीचं यौवन राखण्याची ती धडपड… परिपूर्ण आयुष्यन जगल्यानंतर आनंदाने गळून जाणं आणि मातीत मिसळणं, आणि  नव्या पालवीला बहरु देणं हा सृष्टीचा नियम!!नियम पाळण्याची ही तटस्थता निसर्गाकडुनच शिकायला मिळते!

किती सुंदर संदेश! रात्रीच्या गर्भात उद्याचा उष:काल!!

जुनं जाऊद्या मरणालागुनी…।

विरक्ती म्हणजे निष्क्रियता नव्हे. निर्विकारताही नाही. आसक्तीविरहीत जगणं आणि मरणं म्हणजेच विरक्ती. या खर्‍या विरक्तीचं दर्शन शिशिर ऋतुतील ,सूर्याच्या ऊत्तरायण काळातल्या पानगळीच्या रुपानं होतं…. स्थित्यंतर हा निसर्गाचा स्थायी भाव!  आणि त्याची सकारात्मक स्वीकृती हा सृष्टीचा नियम!!थंडी, वारा, ऊन, पाऊस, आर्द्रता, शुष्कता , तेज,तम ही सारीच निसर्गाची रुपे! जी मानवाच्या जीवनाशी निगडीत आहेत… सहा ऋतुंची सहा रुपे! शिशिरात या ऋतुचक्राची समाप्ती होऊन नवा वसंत येतो! नवे चक्र. नवा बहर. मिटणं, गळणं तितकच महत्वाचं जितकं ऊमलणं, बहरणं.

अनुभवांची शिदोरी मागे ठेऊन एखाद्या वृद्धासारखा आनंदाने निरोप घेणारा, हा पानगळीचा शिशिर ऋतु मला वंदनीयच वाटतो!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – ९) – बिलासखानी तोडी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – ९) – बिलासखानी तोडी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

एखाद्या रागाबाबत अनभिज्ञ असताना त्यातली एखादी रचना आपल्याला माहीत असलेल्या दुसऱ्या एखाद्या रागाशी अगदी मिळतीजुळती वाटत असेल तर आपण बिनधास्त ती रचना  माहीत असलेल्या रागातली मानून टाकतो. मी लहान असताना माझ्याबाबतीत हेच झालं होतं. अगदी लहान म्हणजे चवथी-पाचवी इतपतच वय असताना कुठंतरी थोडावेळ गायचं असेल त्यावेळी अभंग, भावगीतं, भक्तिगीतं गायली जायची. राग स्वतंत्रपणे गाण्याएवढं शिक्षण, समज काहीच तेव्हां नव्हतं. मात्र कार्यक्रमाच्या शेवटी भैरवी गायची हे माहीत असल्यानं भैरवीतल्या काही रचना हमखास शिकून तयार केलेल्या असायच्या. त्यापैकी तेव्हांची एक आवडती रचना म्हणजे ‘रामा रघुनंदना’!

कितीतरी वेळा ही रचना मी भैरवी म्हणून अशा माझ्या छोट्याशा कार्यक्रमाच्या शेवटी म्हटली होती. नंतर मग रचनांचा किंचित विस्तार जमायला लागला तसे दुसरे अभंग भैरवी म्हणुन गात आळवणं आवडायला लागलं आणि ही रचना मागं पडली. परंतू, पुढं कधीतरी कळलं कि, ही रचना भैरवीतली नसून राग बिलासखानी तोडीवर आधारित आहे. मग मला ती भैरवीच का वाटली? तर भैरवी रागातीलच सुरांचा वापर ह्या रागात आहे. फरक इतकाच कि आरोहात सा (रे) (ग) प (ध) सां आणि अवरोह (रें) (नि) (ध) म (ग) (रे) सा. त्यामुळं जोवर बिलासखानी तोडी माहीत नसतो तोवर त्यातल्या रचना ह्या भैरवीवर आधारीत वाटूच शकतात.

बिलासखानी तोडी ह्या रागामागे आणि त्याच्या नावामागे एक कथा आहे. नावांत बिलासखानी येण्याचे कारण म्हणजे हा राग बिलासखॉं ह्यांनी निर्मिला असं मानलं जातं म्हणून ‘बिलासखानी’! हे बिलासखॉं म्हणजे कलासक्त अकबराच्या नवरत्नांपैकी एक, ज्यांच्या सुराला खुद्द निसर्गही प्रतिसाद द्यायचा, ज्यांनी मल्हार गायला कि वरुणराज प्रसन्न होऊन पाऊस कोसळायचा आणि दीपक गायला तर अग्निदेवता प्रसन्न होऊन दीप प्रज्वलित व्हायचे अशा कथा आपण ऐकतो त्या प्रतिभावंत, प्रभावी गायक तानसेन ह्यांचे सुपुत्र!

तानसेन निवर्तले त्यावेळी बिलासखॉं त्यांच्याजवळ नव्हते. ते घरी पोहोचल्यावर आपल्या पित्याचे पार्थिव पाहून त्यांना शोक अनावर झाला आणि काळीज पिळवटलेल्या त्या अवस्थेत ते गाऊ लागले. त्यांचे ते गायन इतके प्रभावी होते कि काही क्षणांसाठी तानसेन जागृतावस्थेत आले आणि पिता-पुत्रांची भेट घडल्यावर त्यांनी परत प्राण सोडले.

ह्या सर्वच कथा आपल्याला ‘फॅंटसी’ किंवा ‘जादूच्या कथा’ वाटू शकतात. पण त्या पूर्णपणे नाकारणार तरी कशा? कारण सूर हाही साधनमार्ग आहेच कि! फक्त देवता प्रसन्न व्हाव्यात अशी साधना करणाऱ्यालाच सुरांचं सामर्थ्य, शक्ती, प्रभावीपणाची प्रत्यक्ष अनुभूती मिळणार! तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला हे कसं साधावं!?

ह्या रागाच्या आरोह-अवरोहाची तुलना भैरवी रागाच्या आरोह-अवरोहाशी केल्यावर लक्षात येतं कि सगळे सूर तेच असतील तरी भैरवी हा संपूर्ण जातीचा राग आहे आणि बिलासखानी तोडी हा ओडव-षाडव जातीचा राग आहे. जाती म्हणजे काय? तर ही फक्त राग वर्गीकरणाची एक पद्धत आहे. रागाच्या आरोह-अवरोहातील स्वरसंख्येवरून त्या-त्या रागाची जाती ठरते. मागे आपण रागात किमान पाच सूर असावे लागतात हा नियम पाहिला आणि सप्तकातील एकूण सूरसंख्या सात आहे. (सुराचं व्हेरिएशन/विकृत स्वर हा जातीपद्धतीत वेगळा सूर मानला जात नाही) त्यानुसार रागात किंबहुना आरोह-अवरोहात पाच किंवा सहा किंवा सात सूर असणार हे निश्चित!

ज्या रागांमधे म्हणजे आरोह-अवरोह दोन्हींत पाच सूर असतात तो ओडव जातीचा राग असतो, ज्याच्या आरोह-अवरोह दोन्हींत सहा सूर असतात तो षाडव जातीचा राग असतो आणि ज्याच्या आरोह-अवरोह दोन्हींत सात सूर असतात तो संपूर्ण जातीचा राग असतो. परंतू कोणत्याही  रागाच्या आरोह व अवरोहातील स्वरसंख्या सारखीच असते असं नाही आणि तसा नियमही नाही. म्हणून तर बिलासखानी तोडी आणि भैरवी हे दोन वेगळे राग निर्माण झाले!?

ज्या रागांमधे आरोह व अवरोहातील स्वरसंख्या वेगळी आहे त्या रागाची जाती लिहिताना आधी आरोहातील स्वरसंख्येनुसार ओडव, षाडव किंवा संपूर्ण असे लिहून मग त्यापुढं एक छोटी आडवी रेघ काढून अवरोहातील स्वरसंख्येनुसार ओडव, षाडव किंवा संपूर्ण असे लिहायचे. ह्याचप्रकारे ‘सा (रे) (ग) प (ध)  सां’ असे पाच सूर म्हणून ओडव व अवरोहात (रें) (नि) (ध) म (ग) (रे) सा असे सहा सूर म्हणून षाडव, ह्यानुसार बिलासखानी तोडीची जाती ‘ओडव-षाडव’ झाली. आणखी एक गोष्ट म्हणजे आपण आरोह लिहिताना सा ते वरचा सा पर्यंतचे रागातील सूर आणि अवरोहात वरच्या सा पासून खाली येतानाचे सूर असं लिहितो. त्यामुळे सा किंवा कोणताच सूर वेगळ्या सप्तकातील असेल तरी ते दोन सूर वेगळे मोजण्याची आवश्यकता नाही. उदा. सुरुवातीचा(मध्य सप्तकातला) सा आणि वरचा(तार सप्तकातला) सां हे सूर वेगळे मोजायचे नाहीत.

ह्या रागाबाबतची गंमत म्हणजे नावात तोडी आहे तरी ह्याचा थाट तोडी नसून भैरवी आहे. म्हणजे रे, ग, ध कोमल असले तरी म आणि नि हे सूर तोडी थाटाप्रमाणे अनुक्रमे तीव्र व शुद्ध नाहीत तर भैरवी थाटाप्रमाणे अनुक्रमे शुद्ध आणि कोमल आहेत.(मागे बिभास रागाच्या दुसऱ्या भागात आपण सर्व थाटांविषयी माहिती घेतली आहे.) मग नावात तोडी कशी आली? तर, तोडीची काही ठळक वैशिष्ट्ये घेऊनच हा राग गायला जातो, मात्र सुरांनुसार थाट आहे भैरवी! शांत व गंभीर प्रकृतीचा हा राग दिवसाच्या दुसऱ्या प्रहरी हा राग गायला जातो. लेकिन ह्या चित्रपटातल्या ‘झूठे नैना बोले सांचि बतियॉं’ ह्या रचनेला पं. हृदयनाथ मंगेशकरांनी बिलासखानीचा साज चढवून फार देखणं केलं आहे!

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्टील लाईफ – स्टील …. लाईफ इज देअर ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ विविधा ☆ स्टील लाईफ – स्टील …. लाईफ इज देअर ☆ डॉ मेधा फणसळकर 

रोज सकाळी त्या रस्त्यावर लगबग चालू असायची. सकाळी पाच वाजताच मॉर्निंग वॉक घेणाऱ्यांची गडबड! हातातल्या काठ्यांनी रस्ता बडवत आणि तोंडाने  राजकारणावर चर्चा करत  जाणारे ज्येष्ठ नागरिक! मॅरेथॉन मध्ये भाग घेतल्यासारखे उत्साहाने धावणारे तरुण! पहिल्या एस. टी. साठी जाणाऱ्यांची तुरळक वर्दळ! “आयेगा आनेवाला$$$ आयेगा$$ “किंवा कधीतरी अचानक सकाळीच,” एक, दो, तीन ,चार…..” लावून माधुरीला आपल्या खिशातील मोबाईलमध्ये नाचवत जाणारे एक आजोबा! आपल्या घरातील कुत्र्यांना फिरवून आणण्यासाठी आणि त्या निमित्ताने स्वतःचा व्यायाम होईल या उद्देशाने फिरणारी मालक मंडळी! लांबूनच त्या कॉलनीतील गच्चीवरुन येणारा ओंकाराचा सामूहिक नाद! वर्तमानपत्र विक्रेत्यांची आलेले गठ्ठे वेगळे करण्यासाठी चाललेली धडपड!

नुकत्याच उघडलेल्या पेट्रोल पंपावर आलेले एखादे चुकार वाहन! आणि दूध, वर्तमानपत्रे टाकणाऱ्या त्या मुलाची वाजणारी सायकलची घंटी! तेवढ्यात येणारी स्कुलबस आणि उत्साहाने लवकर उठून तयारी करुन आलेले, आई- बाबांना टाटा करुन मित्र- मैत्रिणींच्या गराड्यात सामील होणारे ते युनिफॉर्ममधील चिमुरडे!  रस्त्यावरचे  येणाऱ्या – जाणाऱ्या नवीन वाटसरुना आपल्या हद्दीची जाणीव करुन देण्यासाठी गुरगुरु लागणारे श्वानपथक!   एखादा घाबरुन त्यांचा अंदाज घेत चालू लागणारा, तर एखादा मोठा आवाज काढून त्यांना हटकणारा!  तेव्हा शेपूट घालून माघारी वळणारे हेच पथक!

रोजचे जिवंतपणा आणणारे हे दृश्य हल्ली मात्र एकदम स्थिर झाल्यासारखे झाले आहे. ‛कोरोना’ संपूर्ण जगाला विळखा घालत या रस्त्यापर्यंत पोहोचला आहे.  त्यामुळेच एकाकी झालेला रस्ता रोजच्या वाटसरूंची वाट बघत थकतो आहे. सूर्य रोजच्यासारखाच पूर्वदिशेला रंगांची उधळण करत माथ्यावर येतो. पक्षी रोजचाच  किलबिलाट करतात. एखादा चुकार हॉर्नबील शेजारच्या नाल्यात  काहीतरी ढवळू लागतो. गाई- म्हशी रानात चरत असतात.  झाडांची सळसळ आपल्या जिवंतपणाची साक्ष देतात.  पण… पण आज त्या रस्त्याला जाग आणणारे मानवी जग मात्र काही काळासाठी गोठून गेले आहे. मानवाचा अव्याहत चालणाऱ्या गतीला आज एका सूक्ष्म जीवाने रोखले आहे. कुठूनशी येणारी वाऱ्याची मंद झुळूक पण आज या रस्त्यावरुन जाताना चाचपडत आहे. वाहनांच्या गजबजाटाने अव्याहत धुरळा उडवणारी धूळ आज जणू काही नतमस्तक होऊन रस्त्यावर सुस्त होऊन पडली आहे. वाऱ्याने उडणारा पाचोळा सतत टाळ्या वाजवून रस्त्याला जागे करण्याचा प्रयत्न करत आहे.ही भयाण शांतता मानवाच्या मर्यादेची जाणीव करुन देत आहे. जणू काही त्याला प्रश्न विचारत आहे,“ आज हरलास ना? हतबल झालास ना? किती गोष्टींवर तू जय मिळवला आहेस? तुला गर्व झाला होता ना की मी काहीही करु शकतो! आज उपग्रहसुद्धा माझ्या ताब्यात आहेत. मी अनेक तंत्र विकसित करुन मला हवे तसे सुख मिळवले आहे. मला फक्त पुढे जायचे आहे. नाती- गोती, भावभावना नगण्य आहेत त्याच्यापुढे! मला फक्त विकास आणि त्याने प्राप्त होणारे धन हवे आहे. मिळाले तुला पाहिजे ते? आज तुझ्या डोळ्यालाही न दिसणाऱ्या एका सूक्ष्म जीवाने तुझ्यावर मात केली आहे. तुला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आहे. तुझी गती काही काळासाठी गोठवून ठेवली आहे. आता तरी जागा हो. या संकटातून जगशील – वाचशील तेव्हा नव्याने आयुष्य सुरु कर. लहानपणी वाल्या कोळ्याची गोष्ट ऐकली होतीस ना ? ‛तुझ्या पापाचा धनी फक्त तू एकटाच आहेस.’ हे लक्षात आल्यावर वाल्याचा वाल्मिकी व्हायला वेळ लागला नाही. त्यासाठी त्याला रामनामाचा जप करत अंतर्मनात डोकावावे लागले. तुला तेच करावे लागेल. आत्मपरीक्षण! असे सांगतात की पूर्वी खूप मोठा प्रलय झाला आणि सर्व जीवसृष्टी नष्ट झाली. त्यावेळी फक्त ‘मनू’ जिवंत राहिला आणि त्याचेच वंशज आम्ही मानव आहोत. आता गोष्ट खरी- खोटी हे जाणून घेण्यात मला स्वारस्य नाही. पण त्यातील आशय जास्त महत्वाचा! प्रलय प्रलय म्हणजे तरी काय? आत्ता जो हाहाकार माजला आहे ते त्याचेच रुप आहे. तुला त्यातून तरुन जायचे आहे, नव्याने घडी बसवायची आहे. त्यासाठीच आहे ही स्थानबद्धता! जागा हो!विचार कर आणि तुझ्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे हे कायम लक्षात ठेव. तरच ही गती पुन्हा सुरु होईल.”

माझ्या मनात कोरलेले हे चित्र ! अजूनही तिथेच गोठून राहिलेले… स्थिर चित्र… स्टीललाईफ…. बट स्टील देअर इज लाईफ….

 

 

©️ डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ गोवा मुक्तीचे लढवय्ये कै. दत्तात्रय देशपांडे – भाग 2 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ गोवा मुक्तीचे लढवय्ये कै. दत्तात्रय देशपांडे – भाग 2 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

कुठल्याही देशप्रेमी भारतीयाला अभिमान वाटावा, असे त्यांचे भाषण होते.अशा स्पष्ट आणि परखड वक्तव्यामुळे त्यांना अतोनात त्रास सहन करावा लागला. शारिरीक आणि मानसिक दोन्ही प्रकारे,  हातापायात बेड्या, साखळदंड पडले. दुस-याच्या मदतीशिवाय काहीच करता येत नव्हतं. तुरुंगात ” गीता ” व ” बायबल” हे दोन ग्रंथ जवळ बाळगण्यावरून खूप त्रास सहन करावा लागला. त्यासाठी आमरण उपोषण केले. अफवा उठली होती की देशपांडे या उपोषणामुळे मरण पावले.घरचे सगळे हादरून गेले. पण देवाच्या कृपेने ती अफवाच ठरली. सोळा दिवसानंतर सरकार शरण आले, व ग्रंथ त्यांना परत देण्यात आले. देशपांडेना दुस-या तुरूंगात हलवण्यात आले. ते शांतपणाने शिक्षा भोगणा-यातले नव्हते. बंडखोर वृत्ती आणि अन्यायाची चीड   त्यांना गप्प बसू देत नव्हती. त्यामुळे पोर्तुगीज सरकारने त्यांना 1954 मध्ये पोर्तुगाल मधील लिस्बनच्या तुरूंगात रवाना केले.तेथे त्यांना मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. केवळ छळ करायचा म्हणून.  ते मनोरुग्ण नाहीत, हे डाॅक्टर्स व इतर स्टाफला माहीत होतं. त्यामुळे त्यांना चांगली वागणूक मिळत होती. इतर मनोरुग्णांच्या त्रासापासून दूर ठेवले जाई. 19 डिसेंबर 1960 ला गोवा स्वतंत्र झाल्यावर 1962 साली त्यांची सुटका झाली व ते भारतात परत आले.

सर्व परिवारा समवेत ते वास्को येथे राहू लागले. Indian National Trade Union Congress ( INTUC) च्या गोवा ब्रॅचची स्थापना त्यांनी केली. व INTUC चे गोव्यातील पहिले अध्यक्ष झाले. गोवा डाॅक लेबर युनियन, टॅक्सी युनियनचे ते नेता होते. प्राथमिक शिक्षकांच्या युनियन चे ते अध्यक्ष होते. जात-पात, धर्म,  भाषा यांच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांचा नेता म्हणून लोकांच्या विविध प्रश्नांना, तक्रारींना न्याय मिळवून देण्याचे व्रत त्यांनी घेतले.जेव्हा जेव्हा सामाजिक प्रश्न किंवा गुंतागुंत सोडविण्यास सरकार असमर्थ ठरले, तेव्हा तेव्हा स्वतः त्रास सोसून लोकांसाठी उभे ठाकण्यास आणि   लढण्यास ते सज्ज झाले आणि यशस्वी झाले.माणूस मोठा धडाडीचा. त्यांच्या प्रत्येक शब्दात आंतरिक तळमळ होती. प्रत्येक कृतीत परिपूर्णता होती. प्रेमळ स्वभाव, उदार अंतःकरण,  सहानुभूती,  कुटुंबाबद्दल जिव्हाळा, सगळंच उधाणलेलं होतं. असं अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व..

19 डिसेंबर 1960 ते 2020, साठ वर्षे झाली गोवा स्वातंत्र्य लढ्याच्या यशस्वी घटनेला. त्या निमित्ताने सर्व  स्वातंत्र्य सैनिकांना आणि माझे मोठे दीर कै. दत्तात्रय देशपांडे यांच्या स्मृतीला नम्र

अभिवादन! ??

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मन ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ मन ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

जे जे मनात भावे| ते ते इथे उतरावे|

मनमोकळे करून घ्यावे|आपले निसंकोच |

असं म्हणून मी पहिल्यांदा माझं मन कधी मारलं हे आठवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्ट अट्टाहासाने पूर्ण करून घ्यायचा स्वभाव त्यामुळे हौस फिटेल हौस भागेल असं काहीसं करून मन भरून घेतल्याचा आठवलं.

असं केल्याने आज मन तृप्त आहे का? की हूरहूर आहे? हे शोधायचा प्रयत्न केला आणि कबीरांचा दोहा आठवला

गेली कामना चिंता सरली मनमुक्त असे सैराट |

ज्याला काहीच नको असतो तोच खरा सम्राट |

माझ्यासारख्या पामराला कुठेतरी माझ्यातला सम्राट जागा करायचा होता म्हणून सतत मनाची कामना पूर्ती कशी होईल हा अट्टाहास कमी व्हायला हवा हे जाणवलं आणि मन मारायची सवय लावायची असं ठरवलं.

माझ्या मनाचा ठाव घेऊ लागले.मी मनाच्या आरशात पाहू लागले. माझे विचार मांडायची ती जागाच आहे ना? मला त्यात माझं प्रतिबिंब दिसलं. माझं मन आरशासारखं चकचकीत कधी होईल? असा प्रश्न मी त्या प्रतिबिंबाला विचारला. त्याचे उत्तर मार्मिक होतं बाह्य कर्म हा मनाचा आरसा आहे. त्यासाठी सदैव प्रसन्नचित्त असले पाहिजे.

थोडक्यात काय….

मन करा रे प्रसन्न| सर्व सिद्धीचे कारण|

केवढा खजिना सापडला होता आज मला!!

मनाला लागली दूषणे मला त्याचा शोध घ्यायला भाग पाडू लागली ‘प्रसन्न’ या शब्दाचा गर्भितार्थ शोधण्यासाठी मी माझ्या मनाला भेटायचं ठरवलं……

आपुलाची वाद आपणासी या व्यवस्थेत असताना अचानक मी माझ्या मनात शिरले ती एका चोर वाटेने. थोडी आडवळणी असली तरी तिने मला दिशा दाखवली. थोडी गुंतागुंतीची असली तरी तिने माझ स्वागत केले. आणि मग माझं मन किती अवाढव्य आहे याचा मला अंदाज लागला.

उगाच नाही बहिणाबाईंनी मनाची व्याप्ती वर्णन करताना म्हटलयं ‘मन वढाय वढाय’

‘असं कसं मन असं कसं रे घडलं?

कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं?

अशी साशंकता त्यांनी वक्त केल्यावर मात्र मी माझ्या मनाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला.

मन हे बंद बाटलीतल्या राक्षसासारखा आहे. अफाट शक्ती असलेलं आणि बुद्धीवर ताबा नसलेलं! बुद्धीचा वापर करून ते बाटलीच्या बाहेर आलं तर ठीक… नाहीतर विस्फोट ठरलेला. बुद्धीचं तारतम्य असलेलं मन विधायक काम करत.

मन अनाकलनीय, गूढ, विविधरंगी, विविधढंगी असं आहे. हवी ती उपाधी त्याला द्यावी ते तसं दिसू लागतं. क्षणात हळवं क्षणात चौफेर उधळणारं, क्षणात एकटं, क्षणात क्रूर, क्षणात कपटी, क्षणात पवित्र…..

मन राजासारखा आहे म्हटलं तर ते तसंच रुबाबदार आणि बलदंड वाटू लागतं. मनस्वी आहे असं म्हटलं तर ते मस्तवाल वाटू लागतं. उन्मत्त आहे असं म्हटलं तर खरच ते कुणाचेही ऐकत नाही. प्रेमानं सांगितलेली गोष्ट ते साशंकतेने घेतं कोणीही कोणताही उपदेश केला तरी ते वळत नाही.

मनाचा वेगही अचाट! ते कधी तळ्यात तर कधी मळ्यात.

अचपळ मन माझे, नावरे आवरीता |

तुझं विण शिण होतो, धावरे धाव आता|

मनाचा वारू आवरायला भगवंताला पाचारण करावे लागले.

मन लोभी मन लालची मन लंपट मन चोर

मन के मतनाचे पलक पलक मनोर

असंही मनाला दूषण दिलेलं आहे.

मनाचं अस्तित्व हे माझ्या देहापासून वेगळं नाही. अशरीर असं मन अस्तित्वातच नाही त्याचा चेहरामोहरा मी पाहिलेला नसला तरीदेखील माझ्या अस्तित्वाचा धनी तोच आहे मला तो गूढ अनोळखी वाटत असला तरी माझा चेहरा हा माझ्या मनाचा आरसा आहे माझ्या जीवनात घडणाऱ्या मानसिक घटनांची मालिका म्हणजे माझं मन आहे.

माझ्या मनाचा लगाम माझ्याच हाती हवा.

कधी कधी मनाची मनमानी चालते तो मालक बनू पाहतो त्याच्यासारखे नाही वागले तर रुसत. आंधळ्या मनाबरोबर चालत राहील तर खड्डे अटळ आहे आपल्या मनाला डोळस केलं पाहिजे आपण त्यांचे गुलाम होऊन चालणार नाही कबीरांनी पुढे आपल्या दोह्यात म्हटलंच आहे.

मन के मते मत चलिये |मन जिया तिया ले जाये\

मन को ऐसा मारिये |मन टुकडा टुकडा हो जाये\

तात्पर्य काय तर माझ्या मनावर माझं नियंत्रण हवं नाहीतर माझी अवस्था अशी होईल की माझी न मी राहिले………

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ गोवा मुक्तीचे लढवय्ये कै. दत्तात्रय देशपांडे – भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ गोवा मुक्तीचे लढवय्ये कै. दत्तात्रय देशपांडे – भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

15 ऑगस्ट 1947c  … इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य लढ्यात अगणित बलिदाने देऊन भारत स्वतंत्र झाला. मोकळ्या हवेत श्वास घेऊ लागला.

त्यावेळी गोवा ह्या छोट्याशा प्रदेशावर पोर्तुगीजांचे राज्य होते. भारत स्वतंत्र झाला तरी सीमेलगतचा गोवा प्रदेश अजून परकीयांच्या त्रासात पिचत पडला होता.  सालाझार या पोर्तुगीज अधिका-याने. हैदोस घातला होता. स्वातंत्र्य पूर्व काळी भारतीयांवर जे अत्याचार चालले होते,  तेच गोमंतकीयांवर पोर्तुगीजांकडून चालू होते. अशा वेळी भारतीय संग्रामाच्या वारे गोव्याकडे आले नसतं, तरंच नवल.

1946, डाॅ. राम मनोहर लोहियांच्या सत्याग्रहापासून गोव्यात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले.

अॅड. विश्वनाथ लवंदे, श्री प्रभाकर सिनारी यांच्या बरोबर श्री दत्तात्रय देशपांडे हे गोवा स्वातंत्र्य संग्रामात स्थापन केलेल्या आझाद गोमंत दलाचे founder member.

श्री.  देशपांडे हे निपाणी जवळील रामपूर गावचे. बालपण सुखवस्तू परिस्थितीत गेलं तरी मालमत्तेच्या,  जमिनीच्या वादावरून हे कुटुंब त्रासात पडलं. रामपूर हे इतकं खेडं होतं की शाळेचीही सोय नव्हती. त्यांना तीन तीन मैल चालत जावं लागे. आपल्या बुद्धिची चमक त्यांनी दाखवली आणि ते मॅट्रीक उत्कृष्ट रित्या पास झाले. विद्यार्थी  जीवनापासून त्यांचे वाचन अफाट होते. ते एकपाठी होते.  लेखनाचीही आवड होती.

जेव्हा SSC  च्या पुढचे शिक्षण शक्य नाही असे समजले तेव्हा त्यांनी मिलिटरीत जाण्याचा विचार केला. घरच्यांची परवानगी न घेताच ते बेळगावला गेले आणि सैन्यात भरती झाले सुद्धा. सिकंदराबाद, जबलपूर येथे त्यांना पाठविण्यात आले. इराक व इराण ला सुद्धा ते गेले होते. तिथे सरकार विरोधी कारवाया केल्याने त्यांना कोर्टाला सामोरे जावे लागले.  नंतर त्यांना कोलकाता येथे पाठवले. तिथेच त्यांनी मिलिटरी सोडली व 1944 मध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत प्रवेश केला. जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित होऊन ते Forward Block मध्ये गेले. तेव्हा ब्रिटिश सरकार विरुद्ध लढ्याच्या हालचाली जोरात सुरू होत्या. ब्रिटिश पोलीस त्यांना पकडण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी तिथून निघून  देशपांडे गोव्यात दाखल झाले. 1945 साली वास्को मध्ये त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. 1946 साली गोवा मुक्तीसाठी लढा सुरू झाला. हजारोंच्या संख्येने लोक ह्यात सामील झाले होते. 1947 साली अशाच कारवायांच्या संदर्भात देशपांडे ना अटक करण्यात आली. व कोर्टात हजर रहावे लागले. त्यांनी तिथे सडेतोडपणे व परखडपणे सांगितलं की,  गोवा हा भारताचाच भाग असून त्याच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणे हा गुन्हा ठरत नाही. आणि जर गुन्हा सिद्ध झाला तर कुठलीही शिक्षा भोगण्यास मी तयार आहे. कोर्टात त्यांनी सादर केलेले स्टेटमेंट त्यांच्या तल्लख बुध्दीमत्तेचं, साहसी वृत्तीचं आणि कडव्या देशभक्तीचं प्रतीक आहे. या त्यांच्या स्फोटक व जाज्वल्यपूर्ण स्टेटमेंटमुळे त्यांना 28 वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली गेली.

क्रमशः….

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print