मराठी साहित्य – इंद्रधनुष्य  ☆ स्थलांतर – भाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ इंद्रधनुष्य  ☆ स्थलांतरभाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

जेव्हा मोठ्या प्रमाणात प्राणी एका ठिकाणाहून दुसर्‍या  ठिकाणी जातात, तेव्हा आपण म्हणतो, ते स्थलांतर करतात आणि त्या प्रवासाला स्थलांतर असे म्हणतात. आपली मूळची जागा सोडून ते काही काळापुरते दुसर्‍या या ठिकाणी जातात. काहींच्या बाबतीत स्थलांतर हा खूप लांबचा प्रवास असतो, तर काहींच्या बाबतीत तो जवळचा असतो.

स्थलांतर कशा प्रकारचं?

काही प्राणी एकाच मार्गाने, एक रेशीय स्थलांतर करतात. इतर काही वर्तुळाकार प्रवास करतात. म्हणजे ते स्थलांतर करतात आणि काही काळानंतर पुन्हा आपल्या पहिल्या घरी परत येतात. काही प्राणी स्थलांतर करतात. तिथे आपल्या छोट्या बाळांना जन्म देतात आणि मरतात. नंतर त्यांची आपत्यं, त्यांच्या मूळ जागी एकटीच परततात.

कोणत्या प्रकारचे प्राणी कुठे कुठे स्थलांतर करतात

प्राणी विविध प्रकारांनी स्थलांतर करतात. बेडूक अंडी घालायच्या वेळी नद्या, तळी वगैरे पाण्याचे स्त्रोत असलेल्या जागी स्थलांतर करतात. रॉबीन उत्तरेकडून दक्षिणेकडे येतात. सालमन समुद्राच्या पाण्यातून पोहत पोहत नदीच्या गोड्या पाण्यात येतात. विशिष्ट प्रकारच्या फुलपाखरांचा थवा वर्षातील विशिष्ट काळात ठरावीक ठिकाणी जातो.

प्राणी स्थलांतर का करतात?

एकाच ठिकाणी न राहता प्राणी स्थलांतर का करतात?  प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांनी त्याची अनेक कारणे शोधून काढली आहेत.

१. थंड हवेपासून दूर जाण्यासाठी

२. काही प्राणी दुसर्‍या जोडीदाराबरोबर एकत्र येऊन नवीन आपत्यांना जन्म देण्यासाठी

३ .काही जण आपल्या अन्नाच्या शोधात

४. काही जण आपल्या घरात गर्दी होऊ नये म्हणून.

स्थलांतर कसं, केव्हा करायचं हे प्राण्यांना कसं कळतं?

आपण काळ आणि वेळ बघण्यासाठी कॅलेंडर आणि घड्याळाचा उपयोग करतो. पण प्राण्यांना कसं कळतं, की आता स्थलांतराची वेळ झाली आहे? शास्त्रज्ञांना असं वाटतं, की दिवसाचा काळ,  हे प्राण्यांचे कॅलेंडर असावे. दिवसाचा प्रकाश कमी जास्त होणं,  ही त्यांच्यासाठी खूण असावी. काहींसाठी तापमानातला फरक ही खूण असावी.

स्थलांतर कुठे, कसं करायचं, हे प्राण्यांना कसं माहीत होतं?

स्थलांतर करताना पक्षी आपल्या प्रवासात काही परिचित खुणांकडे लक्ष ठेवतात. उदा. नद्या किंवा समुद्र किनारे. सूर्य, तारे यांचाही मार्गदर्शक म्हणून ते उपयोग करतात पण इतर प्राण्यांचं काय?  ती कशाचा उपयोग करतात? आपल्याला माहीत नाही, पण स्थलांतर ही त्यांच्या आयुष्यातली आश्चर्यकारक आणि अद्भुत अशी गोष्ट आहे.

मोनार्क जातीच्या फुलपाखरांचं स्थलांतर

काही प्रकारची स्थलांतरे सहजपणे लक्षात येतात. पानगळीच्या सुरुवातीच्या काळात आपल्याला मोनार्क  जातीच्या फुलपाखरांच्या लांबच लांब ओळी दिसतात. दक्षिणेकडे ती उडत जातात. त्यांच्यापैकी काही तर ३२०० कि. मीचा प्रवास करतात. ते त्यांचा हिवाळा कॅलिफोर्निया किंवा मेक्सिकोच्या गल्फच्या भागात व्यतीत करतात. ते विशिष्ट झाडांच्या फांद्यांवर गोळा होतात. फूटभरच्या अंतरात शंभर शंभर फुलपाखरे बसलेली शास्त्रज्ञांना आढळली आहेत. इतक्या मोठ्या संख्येने एकत्र गोळा झालेली फुलपाखरे बघितल्यावर त्या झाडाला जसा फुलपाखरांचाच बहर आल्यासारखे दिसते.

वसंत ऋतू आला, की मोनार्क फुलपाखरे आपला उत्तरेकडचा परतीचा प्रवास चालू करतात. वाटेत फुलपाखरांच्या माद्या अंडी घालतात आणि मरून जातात. जेव्हा अंडी फुटतात, तेव्हा नवजात फुलपाखरे आपला उत्तरेकडचा प्रवास चालू करतात. पुढच्या पानगळीच्या काळात आपल्या आई -वडलांप्रमाणे ती पुन्हा दक्षिणेकडे येतात. आई-वडील ज्या झाडावर बसले होते, त्याच झाडावर तीही बसतात.

क्रमश:…

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 9 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 9 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

अंदमानला जायला मिळण हा माझ्यासाठी सोनेरी क्षण होता. या सगळ्या स्मृती मी अजूनही जपून ठेवल्या आहेत.

अंदमान ला जायचं म्हणून मी जय्यत तयारी केली होती. माझ्या बाबांच्या मदतीनं सावरकरांच्या ‘जन्मठेप’ या पुस्तकाचं प्र. के अत्रे यांनी केलेलं संक्षिप्त रूप ऐकलं. त्यामुळे माझ्या मनाचे भूमिका तयार झाली. आपण नुसतं प्रवासाला जाणार नाही तर एका महान क्रांतिकारकांच्या स्पर्शानं पावन झालेल्या भूमीला मानवंदना देण्यासाठी जाणार आहोत हे पक्कं ठरवलं आणि तसा अनुभवही घेतला. आम्ही एकूण 128 सावरकर प्रेमी सावरकरांबद्दल आदर असणारे तिथे गेलो होतो. महाराष्ट्र,कर्नाटक,दिल्ली अशा विविध भागांमधून एकत्र जमलेलो होतो. जणूकाही अनेक आतून एकता निर्माण झाली होती. आम्ही सगळेजण हरिप्रिया ने पहिल्यांदा तिरुपतीला गेलो. बेळगाव स्टेशनवर सर्वांचे जंगी स्वागत झाले. सावरकरांच्या फोटोला हार घातला. छोटेसे भाषण हि झाले.घोषणांनी बेळगाव स्टेशन दुमदुमून गेले होते.. तो अनुभव सुद्धा रोमहर्षक होता.. आम्ही चेन्नई ला उतरलो. चेन्नई ते अंदमान आमचे, ‘किंग फिशर’विमान होते. माझ्याबरोबरकायम माझी बहीण होतीच. पण इतर सर्वांनी मला खूप सांभाळून घेतले. एअर होस्टेस ने पण छान मदत केली. त्या माझ्याशी हिंदीतून बोलत होत्या. विमानामध्ये पट्टा बांधला ही त्यांनी मदत केली. या प्रवासामुळे आयुष्यातली खरी मोठी उंची गाठली. विमानाचा प्रवास झाला आणि सावरकरांना त्यांच्या कैदेत असलेल्या खोलीमध्ये नमस्कार करण्याची संधी मिळाली.

अंदमानमध्ये आम्ही उतरल्यावर आम्हा सगळ्या सावरकर प्रेमींना पुन्हा एकदा सावरकर युगच अवतरले असे वाटले. आम्ही सगळ्यांनी तीन दिवस कार्यक्रम तयार केले होते. अंदमानमध्ये चिन्मय मिशन चा एक मोठा हॉल आहे. तिथे बाकी सगळ्यांचे कार्यक्रम झाले. पहिल्या दिवशी बेळगावच्या विवेक नावाचा मुलगा होता. त्याची उंची अगदी सावरकरां एवढी, तसाच बारीक. त्याच्या पायात फुलांच्या माळा, हातात माळा घालून जेल पर्यंत आम्ही मिरवणूक काढली. सावरकरांना जो ध्वज अपेक्षित होता तसा केशरी ध्वज आणि त्यावर कुंडली करून  नेला होता. तो ध्वज घेऊन सगळ्या लोकांनी मोठ्या आदराने प्रेमाने सावरकरांच्या त्या खोलीपर्यंत जाऊन त्यांना मानवंदना दिली. त्या जेलमधून फिरताना आतून हलायला होते. तो मोठा जेल, तो मोठा व्हरांडा, फाशीचा फंद, पटके देण्याची जागा, सगळे ऐकूनही मी थरारून गेले. सावरकरांना घालत असलेल्या  कोलूलामी हात लावून पाहिला तर माझ्या अंगावर काटा आला. आपल्या भारत मातेसाठी त्यांनी किती हाल सोसले, कष्ट केले, किती यातना भोगल्या, ते आठवलं तरी शहा रायला होतं. त्यांच्या त्यागाची आम्ही काय किंमत करतो असंच वाटतं.

आमच्याबरोबर दिल्लीचे श्रीवास्तव म्हणून होते. त्यांचे त्यावेळी 75 वय होते. आश्चर्य म्हणजे त्यांच्या वयाच्या बावन्न वर्षापर्यंत त्यांना सावरकर कोण हे माहिती नव्हते. त्यांचं कार्य काय हेसुद्धा ठाऊक नव्हते. पण पण एकदा त्यांच्या कार्याची व्याप्ती, खोली त्यांना समजली आणि ते इतके प्रभावित झाले की त्यांनी सावरकरांच्या कार्यावर पीएचडी मिळवली.

श्रीवास्तव आजोबांनी आम्हाला जेलच्या त्या  व्हरांड्यामध्ये सावरकरांच्या खूप आठवणी सांगितल्या. त्यातली एक सांगते. आपल्या एका तरुण क्रांतिकारकांना दुसऱ्या दिवशी फाशी द्यायची होती. बारीने त्याला विचारले, “तुझी शेवटची इच्छा काय आहे?” त्यांनी सांगितले, “मला उगवता सूर्य दाखवा.” दूर बारी छद्मीपणे हसून म्हणाला, “तुमच्या साम्राज्याचा सूर्य मीच आहे.” त्यात थेट क्रांतिकारकांनी ताठपणे सांगितले, “तुम्ही असताना चाललेला सूर्य आहात. मला उगवता सूर्य दाखवा. मला सावरकरांना पाहायचे आहे.” धन्य ते क्रांतिकारक..

तेथील हॉलमध्ये कोल्हापूरच्या पूजा जोशी ने, “सागरा प्राण तळमळला” हे गीत सादर केले. रत्नागिरीच्या लोकांनी सावरकर आणि येसूवहिनी यांच्या मधला संवाद सादर केला. म्हणून म्हटलं ना तिथं पुन्हा एकदा सावरकर युग अवतरलं होतं.

आपल्या मातृभूमीच्या पारतंत्र्याच्या बेड्या तोडून काढण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी किती हालअपेष्टा सहन केल्या, ते आजच्या मुलांनाही समजायलाच हव्यात. त्याच साठी आपल्या सांगलीतल्या सावरकर प्रतिष्ठान चे लोक अजूनही नवीन नवीन उपक्रम राबवत आहेत.

सर्वांनी सावरकरांचे, “माझी जन्मठेप” जरूर जरूर वाचावे अशी मी कळकळीने विनंती करते.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझी रेसिपी मला परत…☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ माझी रेसिपी मला परत… ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

रविवारची ‘टवाळखोरी’ ?

माझी रेसीपी मलाच फाॅर्वर्ड झालीय..

मंडळी नमस्कार ?

तुमच्या पैकी अनेकांनी वरचे वाक्य असलेली जहिरात पाहिली असेल.

आपण  लिहून पाठवलेली एक रेसिपी व्हायरल होऊन परत आपल्याला कडे येते, हे जिला सर्वप्रथम ही रेसिपी पाठवली तिला सांगताना काकूंना होणारा आनंद अगदी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय.

असा अनुभव आज अगदी कुणालाही येऊ शकतो. सध्याच्या ‘सोशल युगात’ तत्पर फिडबॅक मिळण्याचा एक नवीन प्रकार आहे हा असं मला वाटते.

आज एखादी नवीन माहिती,  नविन विचार, विनोद, मिम्स,राजकीय विश्लेषण, संदर्भ, कला, लेख, एखादे गाणे  सोशल मिडीयावर शेअर केले जाते. त्यातील आवडलेली माहिती/ पोस्ट  पुढे ढकलली जाते ( कधी मुळ कर्त्याचे नाव ठेऊन/ काढून/बदलून).  आणि अशाप्रकारे आपण त्या पोस्ट कर्त्याचे एक प्रकारे कौतुकच करतो.

पूर्वी लेखन हे प्रामुख्याने पुस्तक/ कादंबरी रुपात वाचायला मिळायचे. वाचनालय ही हक्काची ठिकाणे असायची. दिवाळी अंक/ पाक्षिक / मासिक यातून ही अनेक लेखक भेटायचे. त्यानंतर अनेकजण  रविवारच्या वृत्तपत्र  पुरवण्यातून भेटावयास येऊ लागले. इंटरनेट माध्यमातून मात्र लेखक/ वाचक यांच्यातील अंतर कमी झाले. प्रत्यक्ष भेटून अभिप्राय देता नाही आला तरी विविध संकेतस्थळे, त्यांचे ब्लाॅग, यूट्यूब चँनेल्स आणि आता व्हाटसप/फेसबुक पेज इ माध्यमातून हे सगळे कलाकार प्रत्येकाच्या अगदी खूप जवळ आलेत. त्यांना प्रतिक्रिया देणे ही सोपे झाले आहे.

याच माध्यमामुळे अनेक वेगवेगळे लेखक/ कलाकारांची माहिती झाली. छापील माध्यमातून पेक्षा  आँनलाईन लेखक म्हणून अनेकांना ओळख मिळाली, अनेकजण प्रसिद्ध झाले.  आणि जेंव्हा अशी त्यांची निर्मिती / रेसिपी  जेंव्हा त्यांची त्यांनाच परत फॅर्वर्ड होऊन परत येऊ लागली ती त्यांच्या त्या लेखनाची यशाची पावतीच म्हणावी लागेल.

माणूस जसं प्रारब्ध घेऊन येतो तसे काही लेख/ कथा / विनोद/ मीम्स / कलाकृती या ही प्रारब्ध घेऊन येतात. कुणाच्या नशिबात केंव्हा ‘व्हायरल’ व्हायचा योग येईल हे त्या कर्त्याला ही सांगता येणार नाही.

माझ्या सुदैवाने गेल्या १०-१२ वर्षात काही लेख याबाबतीत सुदैवी ठरले मग तो ‘भाईं’ वरचा लेख असेल किंवा संकष्टीच्या आधी ‘ साबुदाणा भिजवण्याचा ‘ निरोप असेल किंवा मग ‘ शेपटीवाल्या प्राण्यांचे ‘ विडंबन गीत असेल.

अगदी त्या काकूंना झालेला आनंद प्रत्यक्ष अनुभवलाय. मीच नाही तर अगदी अनेकांनी.

तेंव्हा ‘रेसिपी’ बनवत रहा.

मंडळी थोडंसं तत्वज्ञान सांगून माझी टवाळखोरी थांबवतोय.

” माझी रेसीपी म्हणजे माझे कर्म ( नेहमी)  मलाच फाॅर्वर्ड होत असते ”

समझनेवालों को….

 

©  श्री अमोल अनंत केळकर

०६/१२/२०२०

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – ८) – पाऊलखुणा ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर वाईकर

☆ सूर संगत (भाग – ८) – पाऊलखुणा ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

आपण एखाद्या गोष्टीचा अनुभव घेत असताना आपलं भान हरपतं, भवताल विसरलं जातं, वाऱ्याच्या लहरीवर तरंगत जात असल्यासारखं मन हलकं होऊन जात अक्षरश: एका भारलेल्या अवस्थेत आपण जातो. निर्गुण-निराकारत्वाची खूण पटवणाऱ्या, ‘त्याच्या’ अस्तित्वाची साक्ष देणाऱ्या, त्या सर्वोच्च शक्तीनं वेढलेल्या अवस्थेतले क्षण हे खरंतर जाणिवेच्या पलीकडले असेच म्हणावे लागतील. मात्र ही अवस्था लोप पावल्यानंतरही तिचा प्रभाव टिकून राहातो, ते क्षण मनात रेंगाळत राहातात. ह्या रेंगाळत्या क्षणांमधेच आपण खरोखरी काही चैतन्यदायी, निखळ आनंद देणारे क्षण अनुभवले हे जाणवतं… मनावर उमटलेल्या त्या अनुभूतीच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसतात! अशाच प्रकारच्या एकाच वेळी तेजस्वी आणि हळव्याही पाऊलखुणा भैरवी कायमच मनावर उमटवत राहाते असं मला वाटतं.

मागच्या लेखात भैरवीला शब्दमर्यादेत मुडपून कसंबसं बसवलं असं माझं मलाच वाटत राहिलं. मन भरलं नाही, ते पुरेसं कागदावर उतरलंच नाही असं अधुरेपण जाणवत राहिलं. किंबहुना, भैरवीविषयी लिहिल्यावरही तिच्या पाऊलखुणा अजून मनात रेंगाळत राहिल्या आहेत म्हणायला हरकत नाही. बारा सुरांपैकी सगळे कोमल सूर भैरवीत आहेत म्हणूनच कि काय आपल्या मनालाही तीच कोमल अवस्था प्राप्त होत कुणी एखादा शब्द आपल्याशी बोललं तरी त्या ध्वनिलहरींच्या हलक्याशा धक्क्यानंही जिभेवर पिठीसाखर विरघळावी तितक्या सहजी आपलं अस्तित्वच विरघळून जाईलसं वाटत राहातं. म्हणूनच अशा अनुभवानंतर प्रत्येकच संवेदनशील व्यक्ती नि:शब्द होत मनावरचा भैरवीच्या रुतल्या पाऊलखुणांचा रेंगाळ ओलसर डोळ्यांनी जपत राहाते.

निरीक्षण केलं तर लक्षात येईल कि, कुठल्याही उत्तम रंगलेल्या मैफिलीतील भैरवीनंतर वातावरणात एक आल्हाददायक शांतता भरून राहिलेली असते, प्रत्येक श्रोत्याच्या मनात भैरवी आणखी ठळकपणे पाऊलखुणा उमटवत जात असते. श्रोते त्या परमानंदावस्थेत नुसते एकमेकांकडे पाहताना डोळ्यांतूनच ‘अहाहा… क्या बात है!’ असं गायकाविषयीचं कौतुक एकमेकांपर्यंत पोहोचवत असतात. त्या भारलेल्या अवस्थेला आपल्या शब्दानं धक्का लागू नये ह्याची काळजीच जणू प्रत्येकजण घेत असतो. भैरवीनं श्रोत्याला आनंदात न्हाऊ-माखू घालण्याचं कसब गायक-वादक कलाकाराचं हे वादातीत! त्यानं संगीतसाधनेतून कमावलेली शक्तीच इतक्या सगळ्या श्रोत्यांचं बोट धरून त्यांना वेगळ्या विश्वात घेऊन जाण्याची किमया घडवून आणू शकते. मात्र भैरवीच्या बाबतीत थोडंसं झुकतं माप त्या सुरांना जातं असं माझं वैयक्तिक मत!

मागच्या भागात आपण भैरवीवर आधारित काही मराठी रचनांचा उल्लेख केला होता. हिंदी रचनांविषयी बोलायचं झाल्यासही अक्षरश:  लांबलचक यादी तयार होईल. पण पटकन आठवते ती रचना म्हणजे भारतरत्न पं. भीमसेन जोशीजी, पं. बालमुरलीकृष्णनजी, लताबाई ह्यांचे सूर आणि दर्शनासोबत भारतातील इतरही प्रांतांमधील अनेक गुणी व्यक्तींचं दर्शन घडवणारी, अनेक भाषांत सजलेली पूर्वी दूरदर्शनवर लागणारी ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ ही संपन्न रचना! मागच्या लेखात उल्लेखिल्याप्रमाणे कोणतीही मैफिल ‘भैरवी’ने संपन्न करण्याची प्रथा उत्तर भारतीय संगीत पद्धतीत रूढ आहे. ही रचना मात्र भैरवीमुळे जास्त संपन्न झालीये असं मनात येतं. ह्या संपन्नतेचं लक्षण म्हणजे ही रचना पाहाताना डोळे पाणावतातच, देशभक्ती उरात दाटून येतेच, अनेकविध प्रांतांमधील आपल्या देशबांधवांविषयी आस्था, एकात्मतेची भावना मनात जागतेच, सगळ्याच अर्थांनी दुजाभावाच्या कल्पना लोप पावत एक उदात्त, संपन्न जाणीव मनात जागतेच जागते. कितीही वेळा ही रचना ऐकली तरी प्रत्येकवेळी अशीच अनुभूती येते! पुन्हा म्हणेन, मनात जागणारी ही अनोखी जाणीव ‘भैरवी’नं गडद केली आहे!

हिंदी चित्रपट संगीतातल्याही किती रचना सांगाव्या! लताबाईंचं ‘माता सरस्वती शारदा’ अंगावर रोमांच उभं करतं, ‘बाबूल मोरा नैहर छूटो जाए’ हळवंहळवं करून टाकतं, ‘दिल का खिलौना हाए टूट गया’, ‘मीठे बोल बोले’, ‘फुल गेंदवा ना मारो’, ‘कैसे समझाऊ बडे नासमझ हो’ अशा कितीतरी रचना मनात रुंजी घालू लागतात. ‘कर चले हम फिदा जान-ओ-तन साथियों, अब तुम्हारे हवालें वतन साथियों’ ह्या ओळी ऐकताना काळजाला घरं पडतात, अंतऱ्यात मात्र वेगळे सूर वेगळा नूर घेऊन येत उरांत अभिमान जागवतात आणि पुन्हा ध्रुवपदाशी आल्यावर भैरवी काळजाचं पाणीपाणी करते. बेगम अख्तर, शोभा गुर्टू  ‘हमरी अटरिया पे आजा रे सावरिया’ गातात तेव्हां त्यातली विरहवेदना जीव जाळत जाते.

खरंतर अशा अजून कितीतरी रचना आहेत ज्या मुख्यत्वे भैरवीची आठवण करून देतात, मात्र इतर स्वरांच्या वापरामुळे वेगळ्या ढंगानं पुढं जातात. मग तिथे भैरवीतल्या सुरांमध्ये एखाद- दुसऱ्या सुराचा फरक केल्यावर जे राग निर्माण होतात त्यांची आठवण जास्त गडद होत जाते. म्हणूनच अशा कित्येक रचनांचा उल्लेख मुद्दाम टाळतेय. सुगम रचनांबाबत हेच महत्त्वाचं आहे. रागनियम हा भागच तिथे लागू नसल्याने एखाद्या रचनेवर धडमकन एखाद्या रागाचं लेबल लावायला मन धजावत नाही, ते संयुक्तिकही नाही. एक मात्र खरं की, कोणताही संगीतप्रकार असो, त्यातली भैरवीची प्रत्येक सुरावट ही काळजावर पाऊलखुणा उमटवत जाते हे नि:संशय!

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शब्दांच्या पलीकडले ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆ विविधा ☆ शब्दांच्या पलीकडले ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

सुरेल आवाजाची निसर्गदत्त देणगी असलेल्या सुमन कल्याणपुर यांचे ‘शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी ‘हे गाणं माझं अगदी फेवरेट! ते ऐकताना गाण्यातला एक विषण्ण भाव त्या नाजूक सुरातून माझ्या मनात डोकावला. अर्थातच माझं मन माझ्याशी हितगूज करायला लागलं. या गाण्यातील शब्दांना म्हणजे त्या बकुळीच्या नाजूक फुलांना कुठे साठवू कसे जपू असं झालं मला……

कुठेतरी असही वाटलं की या शब्दांची सुंदर लेणी तयार झाली तर ती डोळ्यात साठवता येतील. या शब्द रुपी कमळाच्या भावविश्वात माझ्या मनाचा भुंगा रुंजी घालू लागला आणि मकरंद चाखू लागला. माझं शब्दांवर प्रेम जडलं. मी शब्द वेचू लागले.

शब्दांचे बुडबुडे माझ्या भावविश्वात तरंगायला लागले आणि माझ्या विचाराच्या लोलकातून परावर्तित होऊन माझ्याच कोऱ्या मनावर एक इंद्रधनुष्य उमटलं अर्थातच माझा मन मोर पिसारा फुलवून नाचू लागला

अडीच अध्याक्षरा पासून तयार झालेला हा शब्द! याचं वर्णन शब्दातीत आहे!! शब्द शब्द जोडून त्याचे वाक्य, वाक्यांच्या सरी गुंफून लेख, अनेक लेख एकत्र येऊन ग्रंथ, ग्रंथांच्या भांडारामुळे ज्ञान आणि ज्ञान हाच आपला खरा श्वास! श्वास हेच जीवन ,जीवन हेच अस्तित्व आणि अस्तित्व हाच सन्मान म्हणून शब्दाचा सन्मान केलाच पाहिजे.

संत तुकाराम महाराजांचा आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने हा भीमसेन जोशी यांनी गायलेला अभंग शब्दरूप रत्नांचा सन्मान करतो.

शब्दाचा ध्वनी कानात शिरला की भावविश्वात भावतरंग निर्माण होतात आणि मन डोलायला लागतं. सुंदर शब्द पेरलेली गाणी हे त्याचे जिवंत उदाहरण….

शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना

आवरू किती गडे मी या लोचना

शब्द सौंदर्यानेच तर अशा कविता सजतात आणि पदन्यास घालतात.

शब्द हे एक प्रकारचं रसना चाळवणारं भोजन आहे .ते कसं वाढायचं हे सुगरणीच्या हातात असतं. जेवणात खडा आला की कसं अन्नावरची वासना जाते ना तसंच काहीसं संवादात काटेरी शब्द मन दुखावतात. गोड जेवण जसे मन तृप्त करते तसेच चार गोड शब्द हे खारीच्या पाठीवरून प्रेमाने फिरवलेल्या हाताच्या बोटा सारखे हळुवार असतात.

शब्दांना एक गंध असतो सुवासिक फुलांसारखा !लेखकाच्या लेखणीतून श्वासागणिक एकेक शब्द कागदावर उतरतो जसा काही फुलांचा सडा… वेगवेगळ्या रंगरूपात त्यांचं साहित्य फुलतं अगदी सुरेख सुवासिक फुलांसारखं आणि आपलं मन त्यांच्या भोवती रुंजी घालत.

शब्द इतिहास घडवतो.पेशवाईत आनंदीबाईनी ध चा मा केला हे सर्वश्रुतच आहे.’ लक्ष्मण रेषा’ या शब्दाने रामायण घडले. गैरसमजाच्या साथीचा रोग या शब्दांनीच पसरवलाय असे म्हणावे लागेल. राजकारणातही रोज एक नवीन गैरसमज ही शब्दांचीच खेळी करते आहे.घडलयं बिघडलयं हे आवर्तन सतत शब्द घडवतात.

मुद्राराक्षसाचे विनोद शब्दांच्या फेरफारीने घडतात. उदाहरणार्थ वृत्तपत्रांमध्ये पत्रकारांना असे छापायचे होते की, मंत्री महोदयांना बरे नसल्यामुळे ते गाढ झोपले होते परंतु मुद्राराक्षसामुळे झालेला विनोद असा की मंत्रिमहोदयांना बरे नसल्यामुळे ते गाढव झोपले होते. दोन शब्दात आलेल्या व या शब्दाने अर्थाचा अनर्थ केला.

शब्दांच्या काना मात्रा यामधील मधील फरकामुळे मारू चे मरू असे होते आणि वाक्याचे अर्थ बदलतात शिर आणि शीर या शब्दांचेही असेच…… दोन वेगवेगळ्या शब्दांमध्ये एक शब्द आला तरी अर्थ बदलतो उदाहरणार्थ.. बायको आणि प्रियकर या दोन शब्दांमध्ये चा हा शब्द आला तर बायकोचा प्रियकर असा अनर्थ ओढवतो.

एकाच अर्थाचे दोन शब्द एकमेकांशेजारी आल्यासही गम्मत घडते .हाडांचा अस्थिपिंजरा, पिवळ पितांबर, काळी चंद्रकळा वगैरे वगैरे

शब्दालाही पाण्यासारखा रंग आहे तो ज्या प्रकारच्या लेखनामध्ये वावरतो त्या प्रकारचं सौंदर्य त्याला मिळतं .पाण्या तुझा रंग कसा असा प्रश्न जसा आपण पाण्याला विचारतो तसेच शब्दाला विचारला तरी त्याचे हेच उत्तर मिळेल.

शब्द जादूगार आहेत म्हणूनच अनाकलनीय असे साहित्य, गाणी जन्माला येतात. शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले या ओळीत अभिप्रेत असलेल्या शब्दांच्या पलीकडे हे शब्द घेऊन जातात. आणि मौनाचे भाषांतर होते.

शब्दाने शब्द वाढतो. त्याचे पर्यावसान गैरसमज आणि भांडण्यात होते. मनं दुखावली जातात पण गंमत अशी आहे की पुन:मैत्रीचे आव्हानही शब्द स्वीकारतात अशा वेळी शब्द एखाद्या कुलुपाच्या किल्ली सारखे काम करतात किल्ली सुलटी फिरवून मनं मोकळी करतात आणि किल्ली उलटी फिरवून गप, चूप, कट, पुरे असे शब्द तोंड बंद ही करतात. प्रेमळ शब्दांचे दोन थेंब कलह रुपी पोलिओ नष्ट करतात.

अहंकार, अबोला ही शब्दवस्त्रे उतरवून आपुलकी, आनंद ही शब्द वस्त्रे ल्याली तर परमानंद होतो तो निराळाच!

शब्दाचा शोध घेतला तर अनेक अर्थ निघतात.शब्द झेलणे, शब्द जोडणे, शब्दाबाहेर नसणे, शब्द पडू न देणे ,शब्द देणे, शब्दाचं पक्कं असणे ,शब्दाचा बाण ,शब्द संस्कार या आणि अशा अनेक वाक्प्रयोगातून ते शोधता येतात.

शब्दांच्या मोत्यांचा सर संवादाचा हार बनतो. त्या हाराचे पावित्र्य पुन्हा शब्दांचा सन्मान करतात.

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी

शब्द जुळवुनी घट्ट करू नात्यांच्या गाठी

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सौभाग्यवती भव ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ विविधा ☆ सौभाग्यवती भव ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

आज सकाळी सकाळी शिल्पाचा फोन आला. “काकू, ई अभिव्यक्ति वरचे माझे लिखाण वाचून एका आजींचा फोन आला होता. त्यांच्या आवाजावरून, बोलण्याच्या स्टाईल वरून आजी वाटल्या मला त्या. माझ्या लिखाणाचे कौतुक केले त्यांनी. आवडले म्हणाल्या.”

“अरे वा! छानच आहे मग. अभिनंदन, तुझा लढा पटतोय ना खूप जणांना”. मी म्हणाले.

“पण फोन ठेवताना मला आशिर्वाद देत म्हणाल्या, ” असेच सांगत जा आम्हाला. खूप मोठी हो. सौभाग्यवती हो!”. शिल्पा म्हणाली.

“चांगले आहे ना. छान आशीर्वाद मिळाला. उत्साह वाढेल तुझा.”

“काकू,!लग्न झालेल्यांना भाग्यवती म्हणतात ना आपल्याकडे. मग मी कशी काय?” जरा पडेल आवाजात शिल्पा म्हणाली.

“अगं, तसंच काही नाही. ती एक प्रथा आहे. तुला त्या आजी तसं म्हणाल्या कारण ई  अभिव्यक्तिवर व्यक्त होण्याचे भाग्य तुला लाभलेआहेच. ते सौ पटीने वाढू दे, असा आशीर्वाद दिला त्यांनी तुला. शिल्पा, खरे सौभाग्य म्हणजे ज्याला जे येतं, आवडतं ते करायला मिळणं म्हणजे खरं भाग्य! आणखी एक सांगते, आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी माता आहेत, ज्यांनी आपल्या एकटीच्या बळावर मुलांना मोठं केलं. सुसंस्कारित केलं. चांगले शिकून आपल्या पायावर उभं केलं.त्या सगळ्या माऊली सौभाग्यवती!सौभाग्यवती हे आदराने मान झुक विण्यासाठी म्हटलं जातं .तो एक मान आहे असं समज .त्या आजींनी एक प्रकारे तुझा गौरवच केलाय. तुझ्या साहित्याला केलेला मुजराच आहे. तुझ्या ज्ञानाचा,लिखाणाचा गौरवच आहे.”

खरोखर शिल्पा, अशा ग्रुपमध्ये तुझे विचार मांडायला मिळत आहेत हे खरंच तुझं भाग्य आहे. माझ्याही सदिच्छा सतत तुझ्या बरोबर आहेत. शिल्पा, तू सौभाग्यवती आहेसच. अशीच खूप खूप मोठी हो!तुझ्या ज्ञानाच्या प्रकाशाने सर्वांना दिपवून टाक.काव्य गंधाने सर्वांना मुग्ध कर. तुला तुझ्या मनातले विचार व्यक्त मिळोत. तुझे घुंगरा चे पदन्यास पहायला सर्वांना ते भाग्य लाभो. तुझ्या वक्तृत्वाची धार सर्वांना ऐकायला मिळो आणि तुझे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे “जयोस्तुते” पहाण्याचे महद भाग्य सर्व वाचकांना, श्रोत्यांना आणि ईअभिव्यक्तीच्या संयोजकांना लाभो. खास या सर्वांसाठी आपण एक कार्यक्रम आयोजित करू.कोरोना चे संकट, सावट दूर झाले  की खरंच आपण “शिल्पोत्सव” साजरा करू.

 

© सौ.अंजली दिलिप गोखले

मिरज

फोन नंबर ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हत्ती आणि पाच आंधळे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ हत्ती आणि पाच आंधळे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆ 

एखादा पुतळा रस्त्याच्या मधोमध उभारावा, तसा एक हत्ती एका रस्त्याच्या मधोमध उभा असतो. त्याच रस्त्याने चाललेले पाच आंधळे त्या हत्तीला धडकतात.  काय आहे हे ? प्रत्येक जण चाचपडून बघायला लागतो.. एकाच्या हाताला शेपटी लागते, त्याला वाटतं ती दोरी आहे. एकाच्या हाताला पाय लागतो, त्याला वाटतं ते झाड आहे.

एकाचा हात  दातावर आपटतो, त्याला वाटतं तो भाला असेल. एकाच्या हातात सोंड येते, आणि साप समजून तो झटकन सोडून देतो. एकाचा हात हत्तीच्या पोटावर पडतो. हात पोहोचेल तिथपर्यंत तो चाचपून पहातो, पण त्याला नक्की अंदाजच बांधता येत नाही. त्यांचे भांबावून चाचपडणे पाहून, तिथून चाललेला एक सद्गृहस्थ त्यांच्याजवळ जाऊन तो हत्ती असल्याचे त्यांना सांगतो आणि त्यांना प्रत्यक्ष हत्ती पाहिल्यासारखाच  आनंद होतो.

ही गोष्ट म्हणजे एक सुंदर रूपक-कथा असावी असे प्रकर्षाने वाटते. —— हत्ती म्हणजे अनाकलनीय असणारे परब्रह्म. आणि पाच आंधळे म्हणजे माणसाची पाच ज्ञानेंद्रिये —- डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा —-रूप, गंध,  नाद,  रस, स्पर्श —- यासारख्या सृष्टीतल्या महत्वाच्या अस्तित्व-गुणांची  जाणीव जाणवून देणारी पाच साधने. या प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे कार्यक्षेत्र वेगवेगळे, ज्ञानग्रहणक्षमतेमध्येही विविधता आणि स्वतःची अशी एक मर्यादाही —ज्यावरून माणसाच्या शरीरक्षमतेचीही एक मर्यादा ठरते. पण तरीही इतर सर्व योनींपेक्षा मनुष्य-योनी श्रेष्ठ का मानली जाते? चौऱ्याऐंशी लक्ष  योनी पार केल्यानंतर मानवजन्म मिळतो असे म्हणतात  आणि त्याचे वैशिष्ट्य हेच असते की,  या जन्मात,  या ज्ञानेंद्रियांमार्फत मानव या चराचर सृष्टीचे, इतर प्राण्यांपेक्षा खूपच जास्त ज्ञान मिळवू शकतो.  इतकेच नाही तर परब्रह्माचे,  म्हणजेच अंशरूपाने प्रत्येक सजीवात असणाऱ्या त्या सर्वोच्च प्राणशक्तीचेही ज्ञान मिळवू शकतो.  त्यात कायमचे विलीन होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू शकतो.  त्यासाठी या ज्ञानेंद्रियांचा एकत्रित उपयोग करण्याची क्षमता त्याला मिळालेली असते.  “ मानवी मन “ हे सहावे अतिशय प्रभावी पण अदृश्य असे माध्यम आहे,  त्याला या कामासाठी जुंपणे,  हे मात्र माणसाला प्रयत्नपूर्वकच साधावे लागते. अर्थात परब्रह्म हे हत्तीसारखे सहजपणे आकलन होण्यासारखे नसतेच— एका मानवजन्मात तर नाहीच नाही  पण या ज्ञानेंद्रियांच्या मदतीने त्याच्या एका अंशाचा तरी अनुभव एका जन्मात घेता यावा, यासाठी मात्र माणूस सतर्कपणे प्रयत्न करु शकतो. उत्तम ऐकणे,  उत्तम बघणे-वाचणे, उत्तम आणि विचारपूर्वक योग्य बोलणे,  अस्पृश्य विचारांना चुकूनही स्पर्श न करणे,  दुष्ट- अनैतिक विचारांचा वासही नाकाला न लागू देणे —-अशासारख्या सदगोष्टी जाणीवपूर्वक करण्याचे ठरवले, तर माणसाचे मन त्याच्या बुद्धीच्या मदतीने, या इंद्रियांच्या वेगवेगळ्या कामांचा एकत्रित उपयोग करून त्या शाश्वत सत्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्न नक्कीच करायला लागू शकते. मग त्या एकमेव शाश्वत सत्याची — परब्रह्माची विशालता — सर्वव्यापकता समजण्यासाठी काय करावे याची दिशा तरी या जन्मात नक्की सापडू शकेल. शेपटी – पाय- दात – सोंड – पोट  हे  एकाच हत्तीचे अवयव आहेत,  हे जसे गोष्टीतल्या आंधळ्यांना समजते  आणि हत्ती नेमका कसा दिसतो  हे त्यांच्या बंद डोळ्यांआड असलेले वास्तव ते त्यांच्या परीने अनुभवतात,  तद्वतच,  या चराचर सृष्टीतली प्रत्येक सजीव,  चेतनामय गोष्ट त्या सर्वव्यापक परमचैतन्याचाच एक अंश आहे,  इतके तरी मानवजन्म मिळालेल्या प्रत्येकाने, या ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करायलाच हवा आणि हो,  हत्तीची ओळख पटवून देण्यासाठी एक सद्गृहस्थ पुरेसा असला, तरी त्या परमचैतन्याची ओळख पटवून देण्यासाठी मात्र सद्गुरू -कृपा लाभणे अनिवार्यच असते.

ही गोष्ट सांगण्यामागे हाच हेतू असावा असे मला वाटते.

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लाखेचे उपयोग (भाग ४) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ लाखेचे उपयोग (भाग ४) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

लाखेचे उपयोग एवढे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत की थक्क व्हायला होतं. हैद्राबादच्या प्रसिद्ध लाखेच्या बांगड्या या समस्त स्त्री वर्गाच्या आकर्षणाचा विषय आहेत. याच बरोबर दागिने, पेन, खेळणी बनवण्याकरता लाख वापरतात.

परंतु, लाखेचा उपयोग मुख्यत्वे सील करण्यासाठी होतो. मोठं मोठ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सीलबंद करुन परीक्षाकेंद्रांवर पाठवल्या जातात. सरकारी कागदपत्रं, तिजोर्‍या या ही सीलबंद केलेल्या असतात. सरकारी लखोट्यांवर जो लाल शेंदरी रंगाचा मोठा ठिपक्या सारखा आकार दिसतो, तो दुसरं तिसरं काही नसून लाखच असते.

लाख विद्युत निरोधक म्हणूनही वापरतात.

मुद्रणाची शाई तयार करण्यासाठी लाखेचा उपयोग होतो.

लाकडाचं पॉलिश, व्हार्निश करण्यासाठी लाख उपयोगी आहे.

चामडे आणि जोडे यांच्यावरील  संस्करण लाखेनं केलं जाते.

लाकूड, धातू, आणि अन्य पृष्ठभागावरील नक्षीकाम  करण्यासाठी हिचा वापर तर सर्वपरिचित आहे.

इ.स.१९५० पर्यंत शेलॅकचा वापर ग्रामोफोनच्या तबकड्या बनवण्याकरता होत असे.

पातळ व टिकाऊ थर बनू शकेल अशी  जलीय व्हार्निशे तयार करण्यासाठी लाख वापरली जाते.

फर्निचर, वाद्यं, क्रिडासाहित्य आणि खेळणी यांच्या पृष्ठभागावर लावण्यासाठी तसेच धातूच्या आणि लाकडाच्या पृष्ठभागावरील चिरा आणि फटी बुजवण्यासाठी स्पिरिट व्हार्निशांचा उपयोग करतात.

कागद आणि धातूंची भांडी, पोटात घ्यायच्या औषधी गोळ्या यांच्यावर थर देण्यासाठी देखील स्पिरीट व्हार्निश वापरतात.

मानवशास्त्रीय तसेच प्राणीवैज्ञानिक नमुने यांना संरक्षक लेप देण्यासाठीही स्पिरीट व्हार्निश वापरलं जातं.

रबरी कापड, मेण कापड इतकच नाही तर आपल्या घरातील फ्लोअर आकर्षक करण्यासाठी अंथरले जाणारं लिनोनियम यांच्या अंत्यरुपणासाठी स्पिरीट व्हार्निशच वापरतात.

डोक्यावर ठेवण्यात येणारी साहेबी थाटाची हॅट कडक बनवणं, मातीच्या भांड्यांना ती

भाजण्यापूर्वी लेप देणं यासाठी लाखच लागते .

रुपांतरीत शेलॅकवर आधारित, चांगली लवचिकता आणि रसायनांना प्रतिरोधक असलेले पॉलियुरेथिन लेपही विकसित करण्यांत आले आहेत.

तुमच्या घरातील शिशवी पलंगाचे पाय, आजोबांची काठी, दिव्यांचे स्टॅंड लाखेच्या करामती  मुळेच आकर्षक बनतात.

सील तयार करण्यासाठी राळ, केओलिन, रंगद्रव्य इत्यादींचे शेलॅक( झाडांच्या फांद्यांवरील लाख गोळा करून धुतल्या नंतर मिळणाऱ्या लाखेला शेलॅक म्हणतात.) बरोबर  मिश्रण  करतात.

उच्च विद्युत रोध, उच्च विद्युत दाबाचे विसर्जन झाल्यास संवाहक मार्गाचे प्रसारण होणे, इतर पदार्थांना चिकटणे या गुणधर्मांमुळे शेलॅकचे विद्युत उद्योगात अनेक  उपयोग आहेत.

विद्युत निरोधक, लाइटचे स्वीचेस, त्यांचे फलक, मुठी, विद्युत ठिणगी संरक्षक आवरणे ही यादी मारुतीच्या शेपटी सारखीच लांबलचक आहे.

रेडिओतील निर्वात नलिका, विद्युत दिव्यांच्या टोप्या यासाठी सुद्धा लाखच लाखमोलाची.

याशिवाय  धातू आणि  काच परस्परांना चिकटवण्यास बंधक द्रव्य म्हणून  लाखेचीच बात.

भारतात  सोन्या चांदीच्या  पोकळ दागिने भरण्यासाठी, बांगड्या बनवण्याकरता लाखच भरली जाते आणि तो  दागिना शब्दशः  लाखमोलाचा  बनतो.

आयुर्वेद म्हणजे  सध्या  लोकमान्यता  मिळालेले देशी वैद्यक शास्त्रात काडी लाख  पोटात घेण्याचं  औषध  म्हणून  देतात.

आहे  ना लाख मोलाची गोष्ट ! पण बरं का, समस्त  भारतीयांसाठी ही लाख केवळ लाख मोलाची नाही तर;  अत्यंत  अभिमानाची लाखातील बात अशी  की ;  या बहुउपयोगी लाखेचे जगाच्या  ऐंशी टक्के  उत्पादन  आपल्या  भारतात  होते . त्यामुळं  भारताला परदेशी  चलन मिळते. काय, झाली ना मान ताठ? मग करा बरं प्रतिज्ञा  भारतातील वनसंपदा टिकवण्याची, वृद्धिंगत  करण्याची!!

जय हिंद!!

संकलन व लेखन

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆सूर संगीत  राग गायन ( भाग १ ) ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  राग गायन ( भाग १ )  ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

मागील पांच सहा भागांत काही रागांविषयी लिहिल्यानंतर मनांत आले की वाचकांना राग गायनाच्या विविध ढंगांविषयी थोडी माहिती प्रस्तूत करावी.

पंधरा/सोळाव्या शतकांत अकबर बादशहाच्या नवरत्न दरबारांत संगीत क्षेत्रांतील मिया तानसेन हे एक रत्न होते, हे बहुतेक सर्वांनाच ज्ञात आहे. ह्या तानसेनाची रागदारी संगीत पेश करण्याची जी पद्धत होती तिचा उल्लेख धृपद गायन असा केलेला आढळतो. तानसेनांनाही धृपदिया या विशेषणाने संबोधिले जात असे.हीच गायकी त्या काळांत प्रचलित होऊन अनेक धृपदिये प्रसिद्ध झाले. तत्पूर्वी मंदिरांतून ईशस्तूति करण्यासाठी ही धृपद गायन पद्धति होती, परंतु तानसेन आणि त्याचबरोबर राजा मानसिंग या दोघांनी हे गायन देवळांतून राजदरबारी नेले.

ह्या गायकीची खास वैशिष्ठ्येः

गीत रचना चार टप्प्यांमध्ये असते.

१) अस्ताई ~ पुर्वार्ध

२) अंतरा ~ उत्तरार्ध

३) संचारी ~ दुसरा अंतरा

४) आभोग ~ तिसरा अंतरा

गायन सादर करतांना प्रथम रागांतील स्वरांचे तालमुक्त आलाप गातात,आलापीच्या शेवटच्या टप्प्यांत गमकयुक्त ताना घेतल्या जातात. विविध प्रकारची लयकारी आणि बोलताना हे धृपद गायकीचे खास वैशिष्ठ्य आहे. अनिबद्ध आलाप गायन हा धृपदाचा मन लुब्ध करणारा भाग आहे. यांतून रागाचे स्पष्ट स्वरूप श्रोत्यांना दिसून येते.

सरगम गाण्याची प्रथा या ठिकाणी अपेक्षित नाही.आलापीनंतर गीत सादर करतांना पखवाज किंवा मृदुंग हे तालवाद्य साथीला असते. धृपद गायन अत्यंत जोरकस व मर्दानी आवाजात असते त्यामुळे धृपद गायकीत स्री कलावंत आढळत नाहीत. गीतांतील काव्य वीर, शृंगार आणि भक्तिरसाला पोषक असे आहे. ईश्वरस्तुती,संगीत शास्रांच्या नियमांचे वर्णन,निसर्ग सौंदर्य,बादशहाच्या दरबाराचे वर्णन हे प्रामुख्याने गीतांचे विषय.धृपदांत चार प्रकार आढळतात.

गौबरहार बानी,खंडारबानी,डागुरबानी आणि नौहारबानी. मिया तानसेनाची गौबरहारबानी, जी अत्यंत प्रासादिक व शांत रसाचा परिपोष करणारी होती.अकबराच्याच कारकिर्दीतील समोखसिंह नामक बीनकाराच्या खंडहार या निवासस्थानावरून त्याच्या धृपदास खंडारबानी हे नाव पडले. गातांना सरळ स्वर न घेता खंडित स्वराविष्कार करणे ही ह्याची खासियत!व्रजचंद नावाचा धृपदिया डागूर या गावचा,त्यावरून त्याची धृपद गायकी डागूरबानी या नावाने ओळखिली जाऊ लागली.वैचित्र्यपूर्ण व रहस्यमय भाव प्रकट करणे हे याचे गायन कौशल्य! धृपद गायक श्रीचंद रजपूत नौहरगांवचा. त्याची वाणी ती नौहरबानी अशी ओळख!एका स्वरावरून पुढल्या स्वरावर जातांना मधले एखाद दोन स्वर वगळणे ही ह्याची शैली!

चौताल,रुद्रताल,ब्रम्हताल,सूलताल,मत्तताल या तालांमध्ये बहुतेक धृपदांच्या गीतरचना केलेल्या आढळतात.

तानसेनाचे गुरू हरीदास यांनी धृपदांत बर्‍याच रचना केल्या. नमून्यादाखल चौतालात निबद्ध असलेली ही रचना पहावी.

” हरी हरी छाॅंडके फिरहु न आवे तोरे

एक एक घरी तोहे करोरन कीजात है ~ अस्ताई

घरी पल दिन सोये फिरहु न आवे तोरे

छिन भंग देहताको मरन जैसी घात है ~अंतरा

प्रभू को संभार प्यारे तजके अमृत बिष

काहेको खात है~ संचारी

कहे हरीदास यह साॅंसको बिश्वास कहाॅं

एक एक छिनमे वो तो निकस निकस जावत है ~

आभोग.

धृपदाच्या बरोबरीनेच धमार गायन प्रचारांत आले. यांतील रचना चौदा मात्रांच्या धमार याच तालांतील असतात आणि बहुतांशी शृंगार रसप्रधान असतात. होळी रंगपंचमी हे या गीतांचे प्रमूख विषय.

आजकाल धृपद गायकी विशेष प्रचारांत नसली तरी डागर बंधू, गुंडेचा बंधू आणि अगदी आजचे धृपद गायक पं.उल्हास कशाळकर ही नावे या क्षेत्रांत प्रसिद्ध आहेत.

अठराव्या शतकाच्या सुरवातीला धृपद गायकी मागे पडून ख्याल गायकी पुढे आली.

क्रमशः….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लाखेच्या  किड्याचे जीवनचक्र (भाग ३) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ लाखेच्या  किड्याचे जीवनचक्र (भाग २) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

लाखेच्या अळीची कोष्ठावरणात वाढ होतच असते. कोष्ठावरण म्हणजे लाखेच्या अळीने स्वत:चा स्त्राव स्त्रवून स्वत: भोवती तयार केलेलं आवरण. ती मोठी  होईल  तसतसे कोष्ठाचे आकारमान वाढत जाते. प्रौढ दशा येईपर्यंत  अळी तीन वेळा  कात टाकते. अळी अवस्थेतील या तीन अवस्थांचा  काळ हा तापमान, आद्रता तसेच आश्रयी वनस्पती यांवर  अवलंबून  असतो. या काळात  किड्याचे लिंगही ओळखता  येते. हा लिंगभेद  पहिली कात टाकल्यावर  जास्त  ठळकपणे  दिसतो.

नर अळीचा लाक्षाकोष्ठ सपाता किंवा  खडावा  सारखा  असतो. दुसर्‍यांदा  कात  टाकल्यावर  लगेचच  मागच्या टोकाला  झाकणासारखी वाढ दिसू  लागते. यामुळे मागील टोक चादरीसारख्या आच्छादनाने झाकले जाते. पहिली कात टाकण्यापूर्वीची अवस्था  म्हणजे  पूर्व कोशावस्था आणि  दुसरी  कात  टाकण्यापूर्वीची अवस्था  म्हणजे  कोशावस्था.या अवस्थांमध्ये अळी काही  खात  नाही. कोशावस्था पूर्ण  झाल्यावर पंखहीन अथवा सपंख नर बाहेर  पडतात. मागील टोकाकडील चादरी सारखं आवरण बाजूला  रेटून  त्या बाहेर  येतात. यात पंखहीन नर संख्येने जास्त  असतात. नर लाख किड्याचे आयुष्य  केवळ  बासष्ट ते ब्याण्णव  तासच असते.

मादी  डिंभ फुगीर ; नासपतीच्या फळासारखा किंवा  गोल पिशवी  सारख्या  आकाराचा असतो. तिसर्‍यांदा  कात टाकल्यावर  मादी  लैंगिकदृष्ट्या प्रौढ  बनते. अशा मागील टोकाकडील चादरी सारखं आवरण बाजूला सारून बाहेर  पडलेल्या  मादीचा नराशी संयोग होतो.यासाठी  नर लाख  किडा  मादी  लाख  किड्याच्या कोष्ठात  शिरतो  आणि  मादीच्या  शरीरात  शुक्राणू सोडतो. मात्र  लाख स्त्रवण्याची क्रिया मादी  अजूनही  चालूच  ठेवते. किड्याच्या आकारमानाबरोबरच लाक्षाकोष्ठही झपाट्यानं  वाढत जातो. मादीचा लाक्षाकोष्ठ नराच्या  लाक्षाकोष्ठापेक्षा अनेक  पटींनी  मोठा  असतो. अंडी  घालून  होईपर्यंत  मादी  लाख स्त्रवत असते. अफलित मादीसुध्दा फलित मादी सारखीच  लाख स्त्रवते तसेच  जननक्षम  प्रजा  देखील  निर्माण  करु शकते.

अंडी  अजून  मादीच्या  अंडाशयात  असतानाच  त्यांची  वाढ होऊ लागते. ही अंडी मादी लाक्षाकोष्ठातील विशिष्ट  कप्प्यांत घातली  जातात. या कप्प्यांमध्येच अंडी  ऊबवली जातात. अंडी  ऊबवल्यानंतर अंड्यातून  अळी  बाहेर  पडते. याच अळीला डिंभ म्हणूनही  ओळखतात. डिंभ झाडाच्या  कोवळ्या  फांद्याकडं कूच करतात.तिथं  आपली  सोंड  आत खुपसून  स्थिरावतात  आणि  पुढील  जीवनचक्र  सुरु राहते.

 

संकलन व लेखन

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print