मराठी साहित्य – विविधा ☆ दिवाळी अंकांची न्यारी सफर ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ दिवाळी अंकांची न्यारी सफर ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

दिवाळी अंकांची न्यारी सफर

“टाटा टाटांच्या टाटानगरीत

किमया करती हजार हात

लोखंडाची बघा कोंबडी

घालितसे सोन्याची अंडी “

ही चारोळी आहे  एका  बालदिवाळी अंकातली. गळ्याशप्पथ !! अभिनव पध्दतीनं चारोळ्यांचा वापर मुळाक्षरांची ओळख लहान मुलांना करुन देण्यासाठी मराठी दिवाळी अंकात केला गेला. आहे ना मजेशीर माहिती ! आनंद,छावा,छात्रप्रबोधन अशा  अंकांनी बालविश्व समृद्ध केलं दिवाळी आली की माझं मन पुस्तकांच्या दुनियेत जातं. दिवाळी अंकांच्या सफरीवर जातं

माझ्यातला वाचक, चातकपक्षी जसा पावसाची वाट बघतो, तसा दिवाळीआधी पासूनच दिवाळी अंकांची वाट बघत असतो. रंगीबेरंगी मुखपृष्ठांची प्रावरणे ल्यायलेले ते दिवाळी अंक पुस्तकांच्या स्टॉलवर असे काही मांडून ठेवले जातात की कपड्यांच्या भव्य शोरुम्सही लाजतील. पणत्या, आकाशदिवे यांच्याही आधीपासून दिवाळी अंक दिवाळीची चाहूल देत असतात. माझ्या पहिल्या बालवाचनाचा सवंगडी होता चांदोबा….  विक्रम वेताळ मधील वेताळ माझा सल्लागार होता. सावकाराचा लबाडपणा, राजाराणी, इसापनीतीमधील  नायक , गुलामांच्या कथा, यांनी बालवयातच एक मनोधारणा निर्माण केली. अजूनही स्मरणात आहेत  ती त्यातील चित्रं. दाट जंगल, दिमाखदार राजवाडे, पुष्करिणी (या शब्दाचा नेमका अर्थ कळण्यासाठी चांदोबा मासिक वाचायलाच हव.), लांब, जाडजूड शेपटा घातलेल्या मुख्य कथा नायिका, सावकाराच्या चेहर्‍यावरील हावरा भाव, अगतिक, फसलेला मित्र, लांडगे, कोल्हे असे प्राणी अशी कितीतरी चित्रं मन:पटलावर कोरली गेली आहेत.

किशोर मासिकानंही माझं किशोर वय अलगदसं त्याच्या पानापनातून सांभाळलं. कविता, कथा, कोडी, विज्ञानाची अभूतपूर्व दुनिया, शब्दकोडी, घरबसल्या करता येतील असे अनेक उपक्रम…. पानोपानी उलगडत जाणारं हे अक्षरधन म्हणजे हिरे माणकांपेक्षाही अनमोल खजिनाच जणू. त्यातील गोष्टी, त्यांचा आशय, तो वास, कागदाचा  तो गुळगुळीत स्पर्श, आणि त्या मासिकाचं डौलदार रुप मनात कसं घर करुन बसलयं. या अक्षरमोत्यांनी नकळत आम्हांला संस्कारक्षम केलं.

वय वाढत गेलं, शहाणं समजुतदार होत गेलं … खेळातून, उनाडक्या करण्यातून बाहेर  आलं.. पण.. वाचनात मात्र रमलेलच राहिलं.. याचं श्रेयही या नटून  थटून येणाऱ्या दिवाळी अंकानाच द्यायला हवं, हो ना? खमंग चकली खावी तशी या अंकांची चव मनाला खमंग, खुमासदार बनवायची. अलगद जिभेवर विरघळणारा सुग्रास लाडू जसा रसना तृप्त करुन बळ ही देतो तसे हे अंक वाचकांची मनं सुदृढ करत असत. कुरकुरीत पोहे, खरपूस खोबरं, तळलेले दाणे, डाळे, काजू यांनी नटलेल्या चिवड्यासारख मनातील भावना  देखील नटून चुरचुरीत होत असत. शंकरपाळीचा खुसखुशीतपणा जास्त चांगला की तिच्यामुळं तोंडभर पसरलेली  माधुरी जास्त अवीट असा प्रश्न पडतो ना? (ऊत्तरही या प्रश्नातच दडलय ना?) तसाच अगदी तसाच बुध्दीला, मनाला, डोळयांना या दिवाळी अंकांनी पौष्टिक  खुराक दिला आहे.

कधी यातल्या कवितांनी भावनांच्या सतारींची तार छेडली तर कधी व्यंगचित्रांनी गालावर हलकेच स्मितरेषा उमटवली. कधीकधी तर एकमेकांना टाळ्या देऊन अख्खं कुटुंब मोठ्या हास्यलाटेवर स्वार होत असे. (जत्रा, आवाज) वहिनी, गृहलक्ष्मी, स्त्री, मानिनी या अंकांनी अवघ्या स्त्री जातीवर अधिराज्य गाजवलं. त्यांचं हळवं, नाजूक भावविश्व तरल बनवलं. त्यातील काही विचारांनी त्या सजग, प्रगल्भ, कणखर, स्वावलंबी झाल्या. आत्मभान जागृत करण्यांतही हे दिवाळी अंक सहभागी आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

थोडासा प्रौढ, बुध्दीजीवी वाचक वर्ग किर्लोस्कर, अक्षर, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, ललीत, यांची वाट बघे. सामना, साधना केसरी, मनोहर सारख्या मासिकांना त्यांचा त्यांचा खास वाचकवर्ग असे. निदान दोन चार दिवाळी अंक घरात आल्याशिवाय सण साजरा होतच नसे.

मराठीतील पहिला दिवाळी अंक कै. काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी १९०९ साली संपादित केला.अनेक साहित्यिक निर्माण केले. तेंव्हापासून आजपर्यंत अक्षरसाहित्यानं समाजप्रबोधनाचा हाती घेतलेला वसा आजतागायत सुरु आहे.

साहस, महत्त्वाकांक्षा, स्वावलंबन या बरोबरच समाजाच वैचारिक परिवर्तन करुन सांस्कृतिक  जडणघडण  रुंदावून, सामाजिक आणि औद्योगिक सुधारणा घडविण्यात या मासिकांचा महत्त्वपूर्ण  सहभाग आहे. याच अंकांनी वाड्.मय कला विषयीची अभिरुची निर्माण केली आणि तिला एक उंची दिली. अजूनही दर्जेदार दिवाळीअंकात लिहिण्याचं आमंत्रण मिळणं हा लेखकांच्या अभिमानाचा विषय आहे. केवळ याचमुळं साहित्यकृती मार्फत होत असणार्‍या या दिवाळी अंकांच्या गाथेनं महाराष्ट्राचा सांस्कृतिक विकास कसा केला हे सांगणारी ही दोन उदाहरणं देण्याचा मोह मला टाळता येत नाहीय.

१९०९ सालच्या दिवाळी अंकात लक्ष्मीबाई टिळकांनी मोदकावर एक कविता लिहिलि होती. ती वाचून एका स्त्रीने त्यांना कवितेतूनच प्रश्न  विचारला होता ….

“मोदक बहु गोड असे, आकारही सुबक साधला असे.

तव भार्त्याचे ह्याला साह्य नसे का, कथी मला ताई?”

या प्रश्नाच्या उत्तरासाठी १९१० च्या अंकात लक्ष्मीबाई टिळकांनी पति-पत्नी ही कविता  लिहिली. आईकडून मुलीला मिळणार्‍या शिकवणुकीपासून संसारात रमलेल्या स्त्री पर्यंतचे वर्णन या कवितेत दिसत. तत्कालीन पतिपत्नींच्या संबंधांचं स्वरुपही त्यातून लक्षात येतं.

“लग्न नव्हे ते प्रेम केले, एकीकरण जीवांचे

त्या ऐक्याचे वर्णन करणे शक्य न आपुल्या वाचे

असे न जेथे संसाराचा केवळ तेथे शीण

पत्नी वाचून पती पांगळा, ती ही तशी पतिवीण”

असा समजावणीचा सूरही त्यातून  उमटतो.

संपादक रॉय किणीकर यांनी ‘चिमुकली दिवाळी’ नावाचा दिवाळी अंक लहान मुलांसाठी काढला होता. या अंकाचं मुखपृष्ठ जणू एक स्लेटपाटीच होती! त्यावर पेन्सिलनं लिहिता येऊ शकत होतं!! बालमनाचा विचार करुन त्यांना वाचनसंस्कृतीत सामील करुन घेण्याचं हे एक कौशल्यच आहे ना?

भाषा आणि संस्कृती एकमेकींच्या हातात हात घालून वाटचाल करतात. संस्कृतीच्या खुणा आणि प्रतिक म्हणून जुनं जपणं, वृध्दिंगत करणं हे आपलं कर्तव्य आहे. शतकाहून अधिक काळ दिवाळी अंक हे काम चोखपणानं करत आहेत. चारशेहून अधिक  दिवाळी अंक मराठीची पालखी खांद्यावर मिरवत आहेत. मराठीचा मराठमोळा बाणा, शहरी औपचारिकता, ग्रामीण तोरा, भाषेची नजाकत, यांच्या दिंड्या पताका उभारून मराठी मनाची मशागत करत आहेत.

नवीन अंकांचं कात टाकून समोर आलेलं डिजिटल  आधुनिक रुप तर जगभर पसरलेल्या मराठी मनातील काळ्या मायमातीची ओढ लावायला समर्थ आहे. हे ‘ई’ रुप हळवे मराठी भावबंध साखळदंडासारखे मजबूत  बनवतील आणि मराठीचा डंका सातासमुद्रापार निनादत ठेवतील यात शंका नाही.

असे हे दिवाळी अंक, त्यांच्या नाना कळा (कला), नाना गुण!

हे नसतील तर. . . . .

गत:प्रभ झणी होतील ना मनअंगणे

तेजलुप्त ते होतील ना शब्दचांदणे

असं म्हणावसं वाटतं.

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं:    ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

मंदिराच्या परिसरात जाताच मला देवभूमीवर उभी असल्याचा भास झाला. नखशिखान्त आतून एक शक्ती लहर माझ्यात भिनल्यासारखे वाटले. सकाळी अकराची वेळ होती. सूर्य बराच वर आला होता. थंडीत त्याच्या उबदार किरणांची शाल अंगावर घेत दर्शनाच्या रांगेत सामील झालो. हळूहळू पुढे सरकत सरकत मंदिरात प्रवेश करते झालो. आत शिरताच दोन्ही बाजूंनी भिंतीवर विठ्ठल रखुमाई,  मंदिराबद्दल माहिती,  तिथे साजरे होणारे उत्सव, आषाढी कार्तिकी च्या वारीची आणि वारक-यांची माहिती,  रिंगण, इंद्रायणी चे महत्व,  अनेक संतांची चित्रे, अभंग, ओव्या,  ज्ञानेश्वर माऊली,  तुकाराम महाराज इत्यादींची सुचवेन, असा संत- खजिना बघायला मिळाला. सर्वात शेवटी श्री ज्ञानेश्वरांचे पसायदान होते. आमच्या मागे खानदेशातून आलेल्या भक्तांचा ग्रुप होता. ते सर्व जण  त्यांच्या भाषेतील विठ्ठलाचे अभंग सामुदायिक गात होते.ऐकायला खूप छान वाटत होतं, पण माझं लक्ष विठ्ठलाकडेच लागलं होतं.  मूर्ती अजून किती दूर आहे हे बघत होते. पुढे चालता चालता जरासं उजवीकडे वळून समोर पहाते तो……

‘सावळे सुंदर रूप मनोहर’, मकरकुंडले ल्यालेला,  कमरेवर हात ठेवून उभा होता.  मुखावर मंद हास्य, अतिशय सुंदर,  देखणा पंढरीचा राणा.

त्याच्या नजरेतून वहाणारे वात्सल्याचा झरा माझ्या डोळ्यात भरून आला.दृष्टी न हलवता पुढे जात होते. जवळ पोचताच भान हरखून मूर्ती बघतच राहिले. भटजी म्हणाले, आधी पायावर डोकं ठेवायचं, मुख दर्शन नंतर घ्या. मी विट्ठलाचे पाय धरून माथा टेकला.

रांगेत असल्याने पुढे सरकावेच लागते. मला तर विठ्ठलाच्या जवळून दूर व्हावेसेच वाटत नव्हतं. माहेराहून सासरी येताना प्रत्येक वेळी आई दारात दिसे पर्यंत मान मागे वळून वळून आईला बघत रहायचे आणि ती दिसेनाशी होईपर्यंत डोळे डबडबलेले असायचे. आत्ता तीच अवस्था माझी झाली.  हो! ही सुद्धा विठू माऊली च ना!

परत मागे येऊन किंचित अंतरावर, मूर्ती पहाण्याची संधी मला मिळाली. बांधेसूद शरीरयष्टी, चेह-यावर सात्विक भाव, गळ्यात तुळशीहार, गुलाबी वस्र ल्यालेल्या विठोबा चं ते देखणं रूप डोळ्यात साठवून घेतलं. “राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशशिकळा लोपियेल्या” अशा देखणेपणातून मला त्याची आश्वासक कृपाद्रुष्टी जाणवली. जणु काही मला सांगत होता, “मी असताना तुला कसली चिंता?”

गर्दी असल्याने तिथे जास्त वेळ थांबता नाही आले. पण त्या पाच मिनिटात सगळे विचार, सगळ्या चिंता, काळज्या, काळ-वेळ, सगळ्या सगळ्याचा विसर पडला. फक्त विठू माऊली आणि मी. दुसरं काहीच नाही.

“अवघा रंग एक झाला

रंगी रंगला श्रीरंग

मी तू पण गेले वाया

पहाता पंढरीचा राया”

अगदी अशीच मी एकरूप झाले. आयुष्यात पहिल्यांदाच मन इतकं शांत झालं. ही सुखद अनुभूती मी प्रथमच घेत होते.

क्रमशः …

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कुठे थांबायचे ? ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी

श्री एस्.एन्. कुलकर्णी 

☆ विविधा ☆ कुठे थांबायचे ? ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी ☆ 

कुठे थांबायचे हे समजले पाहीजे”

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कुठे थांबायचे हे समजले पाहीजे. हे जीवन जगण्याचे तत्वच आहे. हे कुठेही लागु होते.बर्‍याच जणांना समजत नाही म्हणा किंवा बर्‍याच जणांच्या लक्षांत येत नाही कुठे थांबायचे ते. ज्यावेळी लक्षांत येते त्यावेळी खुप ऊशिर झालेला असतो आणि नुकसानही खुप झालेले असते. तेंव्हा कुठे थांबायचे हे तत्व आपण सर्वांनी अंगिकारले पाहीजे.

आता पर्यावरणाचाच प्रश्र्न घ्या. आपण निसर्गावर अत्याचार करीत आलेलो आहे.त्याचा परिणाम पर्यावरणाचा  र्‍हास होण्यात झालेला आहे. खरी जंगले न वाढवता आपण सिमेंटची जंगले वाढवित गेलो. दिल्लीसारख्या ठिकाणी तर लोकांना श्र्वास घेणे अवघड होत चाललेले आहे.ही परिस्थिती बहुतेक सर्व मोठ्या शहरांमधुन आहे. विकास करीत असताना योग्य ठिकाणी न थांबल्यामुळे ही परिस्थिती ऊदभवली.

कांहीवेळा आपल्याला प्रचंड राग येतो. रागाच्या भरात आपण खुप बोलतो असे नाही तर कांहीही बोलतो. आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी नेहमी म्हणायची की राग आला की १ ते १० अंक मोजायचे. हेतु हा की अंक मोजेपर्यंत राग थोडा तरी शांत होतो. रागाच्या भरात बोलताना कुठे थांबायचे हे आपल्याला समजत नाही. आपण बोलत सुटतो. अद्वातद्वा बोलतो. माणसे दुखावली जातात, दुरावली जातात. हे टाळले पाहीजे. राग आला की योग्य ठिकाणी थांबता आले पाहीजे. म्हणजे पुढील अनर्थ टळतील.

अलिकडे असे लक्षांत आले आहे की तरूणपिढी व्यायाम, जीम याकडे अधिक लक्ष देत आहे. पण हे करीत असताना कुठे थांबायचे हे या तरूणपिढीला समजत नाही. अशा बातम्या वाचनात आल्या आहेत की व्यायाम करीत असताना कांही मुले अति व्यायामामुळे दगावली आहेत. तेंव्हा तरूण पिढीने व्यायाम करताना कुठे थांबायचे हे लक्षांत घेतले पाहीजे.

सध्या सर्वांकडे स्मार्ट फोनस आहेत. कंपन्याचे तीन तीन महीन्यांचे पॅकेजेस असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी बोलण्याचे चार्जेस पडत नाहीत. अनेकजण त्यामुळे फोनवर बोलायला लागले की थांबतच नाहीत. तासन तास बोलत राहतात. या कालावधीत एखाद्याला यांचेशी संपर्क साधावयाचा असेल तर यांचा फोन बिझी. त्यामुळे फोनवर बोलताना कुठे थांबायचे हे समजलेच पाहीजे.

अलिकडे सर्वांना “व्हाटसअॅप” हा फार मोठा विरूंगळा आहे. आपल्या भावना, आपले विचार व्यक्त करण्याचे एक चांगले माध्यम आहे.आपल्याकडील माहीतीसुध्दा आपण शेअर करू शकतो. पण कांहीजण याचा दुरूपयोग करतात. आला मेसेज की कर फॉरवर्ड. कांहीवेळा मेसेज वाचायचेसुध्दा कष्ट घेत नाहीत. एकाचवेळी वीस वीस तीस तीस फोटो, ६०/७० एमबीचे व्हीडीओज पाठविणे कितपत योग्य आहे. याचा विचार अतिशय आवश्यक आहे. पण तो होताना दिसत नाही. व्हाटसअॅपवरती मेसेजस पाठविताना कुठे थांबायचे हे समजले पाहीजे नाहीतर मेसेजेस डीलीट करण्याचे कामच होऊन जाते.

पुर्वी लग्नसभारंभात जेवणाच्या पंक्ति ऊठायच्या. आपुलकीचे,जिव्हाळ्याचे प्रदर्शन व्हायचे. जेवताना पाहुणेमंडळीना प्रचंड आग्रह केला जायचा. अन्नाची नासाडी व्हायची. आग्रह करण्याला “कुठे थांबयचे” हे न समजल्यामुळे असे घडायचे. आता थोडी पध्दत बदलली आहे. पंक्तिच्याऐवजी बूफे पध्दत आली. तरीसुध्दा अन्न वाढुन घेताना काय काय घ्यायचे काती किती घ्यायचे हे न समजल्यामुळे अन्नाची नासाडी ही होतेच. फक्त प्रमाण थोडे कमी.

थोडक्यात काय कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. म्हणतात ना अति तेथे माती. या लेखाचे सार हेच की कुठे थांबायचे हे आपल्याला समजले पाहीजे आणि हे समजले तर आपले सर्व नातेसंबंध नॉर्मल राहतील, सुधारतील.

मैत्रीत, नातेसंबंधात बर्‍याच वेळा चेष्टा केली जाते. जोपर्यंत मजेत चालले आहे तोपर्यंत ठीक वाटते. पण चेष्टेचा अतिरेक झाला की नातेसंबंध बिघडतात. ह्या गोष्टी टाळल्या पाहीजेत.

©  श्री एस्. एन्. कुलकर्णी

वारजे, पुणे-४११०५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 6 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –6 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

कॉलेज ची धमाल करता करता परीक्षा कधी संपली समजलेच नाही. काही दिवसांनी रिझल्ट लागला आणि मी मराठी घेऊन बीए चांगल्या मार्कांनी पास झाले. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. सगळ्यांनी माझे कौतुक केले आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला.

पण आता पुढे काय हे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहीले. कोणी म्हणाले आता एम ए करून घे. कोणी म्हणाले त्यापेक्षा आवाज चांगला आहे गाणं शिक…

लहानपणापासून मला नृत्याबद्दल,नाचा बद्दल खुपच ओढ होती. मला ना,चवथीपर्यंत चांगलं दिसत होतं. म्हणजे जन्मतः जरी मला मोतीबिंदू असले, तरी ऑपरेशन करून थोडं दिसायला लागलं होतं. पण फार लहानपणी मोतीबिंदू झाल्यामुळे काचबिंदू वाढत गेला आणि चौथीनंतर दृष्टी कमी कमी होत गेली. पुढे बीए झाल्यावर वयाच्या एकविसाव्या वर्षी भरतनाट्यम शिकायला मी सुरुवात केली. तेच का हे सुद्धा मला चांगलं आठवतंय. माझे बाबा विद्या मंदिर प्रशाला मिरज, इथं शिक्षक होते. त्यावेळी दिल्लीमध्ये झालेल्या एका कोर्समध्ये त्यांना प्रोजेक्टर, स्लाईड्स बक्षीस मिळाले होत्या. त्यामध्ये भारतातील प्राचीन मंदिरे, भारतीय नृत्य याची सखोल माहिती होती. परमेश्वर कृपेने त्यावेळी मला दिसत होते आणि तो नाच, तो सुंदर पोशाख,छान छान दागिने माझ्या मनामध्ये इतके पक्के बिंबले होते की माझी नजर नंतर गेली पण मनावरचे ते दृश्य नाहीसे झाले नाही. ते मला सारखे साद घालत होते म्हणतात ना, चांगले बी पेरले ही पोषक वातावरणात ते उगवते, फुलते. माझेही तसेच झाले. अर्थात हे सगळे माझ्या नृत्यातल्या गुरु मुळेच घडू शकले. माझ्या नृत्यातल्या गुरु म्हणजेमिरजेतील सौ धनश्री आपटे.

माझ्या नृत्यातल्या, माझ्या विचारांच्या जडण-घडणीतल्या, माझ्या व्यक्तिमत्व विकासाला उमलू देणाऱ्या, फु लू देणाऱ्या, मला माझ्या आयुष्यातला आनंद मिळवून देणाऱ्या आणि एक प्रकारे माझे जीवन उजळून टाकणाऱ्या या माझ्या ताई म्हणजे सौ धनश्री ताई या माझ्या गुरुच आहेत.

अशा गुरू मला केवळ माझे नशीब,माझ्या आई बाबांचे आशीर्वाद,परमेश्वराची कृपा आणि  ताईचा मोठेपणा यामुळेच मला प्राप्त झाल्या.

मी बी ए झाल्यानंतर माझ्या मनातले नृत्य शिकण्याचे गुपित आई बाबांना सांगितले. माझ्या बाबांनी ते मनावर घेतले आणि मला नृत्य.  कोण शिकवू शकेल याचा शोध घ्यायला सुरुवात केली. धनश्री ताई बद्दल समजल्यावर माझे बाबा मला त्यांच्याकडे घेऊन गेले. तो पहिला दिवस मला अजूनही चांगला आठवतोय. बाबांनी माझी ओळख करून दिली आणि हिला तुमच्याकडे नृत्य शिकायचे आहे आहे असे सांगितले. माझ्या चालण्या वरून, वावरण्यावरून ताईंना मी पूर्ण दृष्टिहीन आहे असे वाटले नाही. पण ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की एका आंधळ्या मुलीला नृत्य शिकवायचा विडा आपल्याला उचलायचा आहे, तेव्हा क्षणभर त्याही गोंधळल्या. त्यांना हे अनपेक्षित होतं. थोडा विचार करून म्हणाल्या मी दोन दिवसांनी सांगते. आणि त्यांचा आलेला होकार माझ्यासाठी खूप मोलाचा ठरला. माझ्या आयुष्याला प्रकाश देणारा ठरला.

फक्त मला एकटीला शिकवण्यासाठी ताईंनी माझ्यासाठी बुधवार आणि शुक्रवार राखून ठेवले होते. एकदा तरी त्यांना जमणार नव्हते,म्हणून मला घरी सांगायला आल्या, आज येऊ नको म्हणून. त्यावेळी. मी एकटी जाऊ शकत नव्हते ना,कोणीतरी माझ्याबरोबर सोडायला आणायला लागायचे. आमची खेप वाचावी म्हणून त्या स्वतः आल्या. त्यांच्यातला तो साधेपणा, खरेपणा इतकी वर्ष झाली, तरी अजून तसाच आहे .

ताईंनी मला नृत्यामधल्या हाताच्या,पायाच्या विशिष्ट हालचाली, हावभाव, चेहऱ्यावरचे भाव कसे आले पाहिजेत ते मला समजून समजावून,शिकवलं. हाताच्या मुद्रा त्या तोंडी सांगायच्या. अंगठा आणि पहिले बोट यांची टोके जुळवून गोल कर, बाकीची तीनही बोटं तशीच राहू दे. पायाच्या हालचाली सांगताना त्या या खाली बसून माझे पाय तसे करून घ्यायच्या,एकदा मला कळलं की त्यांना पाहिजे तसं जमेपर्यंत प्रॅक्टिस करून घ्यायच्या . माझ्या एमएच्या अभ्यासाचं सांगते, धीर गंभीर अशा श्लोकांच्या स्वरांमध्येमला दशावतार करायचे होते. अक्षरश: नाच करत दहा अवतार सादर करायचे होते. कलकी या अवतारामध्ये मी खरंच घोड्यावर बसून करते आहे असेच मला वाटले. मला त्या सगळ्या अभ्यासाची मजा लुटता आली,आनंद घेता आला.

गाण्यांचे विशिष्ट बोल, त्याचा अर्थ, त्यानुसार हावभाव हे सगळं प्रॅक्टिस न जमत गेलं. सुरुवाती सुरुवातीला काय व्हायचं मी नुसती शरीरानं म्हणजे फिजिकली नाचत होते. घरी येऊनही त्याचा सराव करत होते. एकदा त्यांच्या लक्षात आलं  की नाचून नाचूनमाझे पाय सुजले आहेत तेव्हा त्या म्हणाल्या, “नृत्य नुसतं शरीरांन करायचं नसतं. मी काय सांगते ते मनानं, बुद्धीने समजून घे, तसं मनात  उतरु दे.” त्यासाठी त्या मला शंभर गोष्टी सांगायच्या, त्यातल्या मला कशातरी पन्नास समजायच्या. माझं त्यांनी इतकं पक्क करून घेतलं की मी अजून सुद्धा झोपेतही ते विसरणार नाही. त्यांनी नृत्यातल्या सगळ्या अवघड गोष्टीसोप्या करून सांगितल्या. मनापासून कसं करायचं याची ट्रिक सांगितली. मला वेगळच समाधान मिळालं. आपल्यातलं काहीतरी सुप्त असलेलं, मला लागले याची जाणीव झाली.  नृत्या तला आनंद मिळाला.

मी भरतनाट्यम ची विद्यार्थ्यांनी आहे. पूर्ण शिकून झालं असं मी म्हणणार नाही. पण पण गांधर्व महाविद्यालयाच्या सलग सात वर्ष परीक्षा दिल्या मी . शेवटची परीक्षा नृत्य विशारद ची होती.

असाध्य ते साध्य कसं करावं ते मी माझ्या ताई कडूनच शिकले. माझ्या आई बाबांच्या खालोखाल, माझ्यासाठी माझ्या ताईंचं स्थान आहे. त्यांनी मला खूप, माझ्या आयुष्यात त्यांना अनन्यसाधारण स्थान आहे. शिष्याचे प्रगती गुरु कसा भेटतो यावर अवलंबून असते. माझे गुरु प्रगल्भ अध्यात्मिक पाया असणारे, उच्च स्तरावरील विचारांचे आणि खूप प्रेमळ आहेत. ताईंनी मला जवळजवळ वीस वर्ष शिकवले आहे म्हणून मी मी अनुभवान एवढं बोलू शकते.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 3 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 3☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

मी केवढी भाग्यवान कि,  प्राध्यापक श्री पां.ना. कुलकर्णी हे स्वतः ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक,  विवेचक, प्रवचनकार,  मला हा विषय शिकवत होते. त्या वर्षी मराठी विषयाची मी एकटीच विद्यार्थिनी होते.  अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन,रसाळ वाणी, आणि ओघवतं वक्तृत्व अशा मार्गदर्शनात मी अभ्यास करत होते. वेगवेगळ्या असंख्य नोट्स लिहून तयार करत होते. सरांच्या कडून तपासून घेत होते.

वर्ष संपत आलं होतं.  परीक्षेची वेळ आली. मी विट्ठलाचीच प्रार्थना्थ करत होते, ” मला पेपर लिहिताना सगळं आठवू दे आणि लिहायला येऊ दे.” परीक्षा झाली. आणि सरांनी मला सांगितलं, ‘ तुमच्या सर्व नोट्स मला आणून द्या’. मी सगळ्या व्यवस्थित एकत्र केल्या आणि दिल्या. त्यांनी त्या शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या विभागात संदर्भ वाचन आणि अभ्यासासाठी दिल्या. मला खूप खूप खूप  आनंद झाला. विद्यापीठाते आपलं लेखन संदर्भा साठी असणं ही किती अभिमानाची गोष्ट.  असं असेल,हे  कधी माझ्या  स्वप्नातही  वाटलं नव्हतं. तेव्हा पटलं, संपूर्णं वर्षभर विठ्ठलच तर माझ्या कडून लिहून घेत नसेल?

तेव्हा पासून मला सतत वाटायचं, पंढरपूर ला विठ्ठलाच्या दर्शनाला मला कधी जायला मिळेल? ही 1978 सालची गोष्ट. लगेचच प्रपंचात पडले. नशिबात पुढे काय वाढून ठेवलेले असते, काही कळत नाही. सुखदुःख, त्रास,  अडचणी यांच्याशी दोन हात करता करता 40 वर्षे गेली. वयाची साठी ओलांडली. दरवर्षी आषाढी,  कार्तिकी एकादशीला उपवास करण्याइतकाच विठ्ठलाशी संबंध उरला होता.

आणि….अचानक ओळखीच्या मित्र मैत्रिणींचा अक्कलकोट, तुळजापूर, कोल्हापूरला जायचा बेत ठरला. डिसेंबर 2019,  आम्ही प्रवास सुरू केला. अक्कलकोट ला श्री स्वामी समर्थांचे दर्शन,  महाप्रसाद घेऊन दुसरे दिवशी सकाळी मार्गस्थ झालो. वाटेत तुळजापूर च्या आधी पंढरपूर ला जाऊ असे ठरले. आणि दोन तासात पंढरपूर ला पोचलो सुद्धा.

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सादर करतो कला गजमुखा ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ सादर करतो कला गजमुखा ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

आज ब-याच दिवसांनी लिहायचा योग आलाय. बेलवडीतील तुकोबांच्या पालखीच गोल रिंगण लाईव्ह पाहता पाहता विषय ही जरा वेगळा सुचलाय.

आपल्याकडचे भक्ती संगीताची (मराठी) मोठी परंपरा आहे. यातही ‘विठ्ठलाची भक्ती गीते’ ही  साधारण पणे सर्वाना माहीत असतात, आणि जास्त प्रसिध्दही असतात. आळंदी , देहू वरून पालख्या निघाल्या अन जसजशी आषाढी एकादशी जवळ येऊ लागते तसतसं  वातावरण एकदम भक्तीमय होऊन जाते. आजकालची न्यूज चॅनेलही वारीचा वृतांत दाखवताना मागे एखाद भक्ती गीत लावतात. हे सगळं सांगायचे  कारण म्हणजे   नुकतेच मला   माझे   सगळ्यात  आवडते गाणे / भक्ती गीत ‘इंद्रायणी काठी’ ऐकायला मिळाले. पंडित भीमसेन जोशींनी गायलेले हे गाणे केंव्हाही ऐकले की मला ब्रह्मानंदी टाळी वाजल्याचा आनंद मिळतो. ‘गुळाचा गणपती’ या सिनेमात पु. लं. नी ही हे गाणं अतिशय सुरेख  घेतले आहे.

मंडळी  या गाण्याबद्दल आणखी एक विशेष अशी माझी आठवण आहे.  पूर्वीच्या काळी कलाकार मंडळी उदा गायक, वादक आपली कला हे देवासमोर सादर कारायचे. देवळात जाऊन कुठलीही बिदागी/ मानधन न घेता आपली कला सादर करण्यामागे कृतज्ञताा व्यक्त करणे हा हेतू होता. एखाद्या कलेत प्राविण्य मिळाल्यावर  देवाचा आशिर्वाद घेऊन  पुढे जायचे ही भावना त्यामागे असायची.

पण आजकाल  sms सारख्या माध्यमातून मतांची भीक मागून सेलिब्रीटी बनलेल्या आणि अशाप्रकारे ‘अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या’ कलाकारांना ही माहितीतरी आहे का? असं वाटण्या इतपत परिस्थिती सध्याआहे. गणेशोत्सव मंडळ, महोत्सव, अॅवार्ड कार्यक्रमातील लाखाची बिदागी घेणारे कुठे आणी एकेकाळी देवासमोर कुठलेही मानधन न घेता ‘कला’ सादर करणारे कुठे?

अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच असे कलाकार आता शिल्लक असतील असे खेदाने म्हणावेसे वाटते.

एकदा सांगलीत मी  गणपतीच्या मंदिरात गेलो असतानाचा एक प्रसंग यानिमित्ताने सांगावासा वाटतो. १५-२० वर्षे झाली असतील या घटनेला. वेळ साधारण ११ची. मंदिरात काहीच गर्दी नव्हती. दर्शन घेऊन, प्रदक्षिणा मारुन सभामंडपात बसे पर्यत एक गायक आपली पेटी काढून सूर लावण्यात मग्न होते. बरोबर साथीला एक तब्ब्लजी होते. ते ही हातोड्याने तबला, डग्गा सेट करण्यात मग्न. मग मी जरा थांबलो. विचार केला. एखादं गाणं तरी ऐकून जाऊ. थोड्यावेळानी त्यांनी जे गाणं ‘गणपती समोर सादर केलं ते  गाणं होत ‘इंद्रायणी काठी’ शब्द कमी पडतील तो अनुभव सांगण्यासाठी. एखाद गाणं ऐकून अंगावर रोमांच उभे राहणे म्हणजे काय हे त्यावेळी मी अनुभवले. मूळ २-३ मिनीटाचे असलेले हे गाणे बुवांनी  वेगवेगळे आलाप वगैरे घेऊन चागलं १० मिनिट  रंगवल. काही खास जागा घेताना तब्ब्लजी कडे पाहून   आणि त्यानंतर तब्ब्लजीकडून ही योग्य अभिप्राय मिळताच पुढे जात जात हा १० मिनिटाचा सोहळा असा काही रंगला की बस.  गाणं संपलं. आता पुढचं गाणं ऐकून मगच निघायचे अशी मनाची तयारी झाली  होती पण क्षणार्धात पेटी, तबला डग्गा गुंडाळून दोघेही मार्गस्थ झाले. पण ते गाणे मात्र माझ्या मनात कायमचे घर करुन गेले. जेंव्हा जेंव्हा हे गाणं ऐकतो तेंव्हा नकळत मी सांगलीच्या गणपती मंदिरात पोचलेलो असतो.

मंडळी आपण ही असे अनेक कलाकार देवळात आपली कला सादर करताना पाहिले असतीलच छान वाटतं ना असं काही पाहिलं की!

आपल्या पैकी आज अनेकजण वेगवेगळ्या कलेत निपुण आहेत. यानिमित्याने कलाकार मंडळींना अशी विनंती करावीशी वाटते की तुम्ही कलाकार म्हणून खूप मोठे व्हा पण मोठे झाल्यावर या कलेच्या अधिपती जो गणपती आहे (६४ कलांचा अधिपती) त्याचा विसर न करता जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्ह्या विनामोबदला आपली कला शक्यतो गणपतीच्या देवळात, गणेशा चरणी (किंवा इतर कुठल्याही देवळात) अर्पण करा आणि त्याचा आशीर्वाद घेऊन पुढे चला.

पाश्च्यात्य विचार सरणीत यालाच Grattitude व्यक्त करणे असं काही तरी म्हणतात

मंडळी मी तर टुकार लेखक पडलो. लेखनाचे मानधन मिळणे वगैरे या गोष्टी तर केव्हाच इतिहासजमा झाल्यात. तरीपण  जे काही थोडेबहुत लिहायला सुचले ते गणेश कृपेनेच.

‘सादर करतो कला गजमुखा’ या न्यायाने हे लेखन आज त्याच्याच चरणी आणी बुध्दीचा कारक ग्रह ‘बुध’ यालाही अर्पण करुन सध्या इथंच थांबतोय.

सादर करतो कला गजमुखा

रिध्दी सिद्धीच्या वरा

शुभारंभीया करितो तुजला

वंदन हे गजवरा

 

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 2 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 2 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

तो काळ महाराष्ट्रासाठी फार कठीण होता. यवनांचा धुडगूस माजला होता. परकीयांच्या आक्रमणापेक्षा जनजीवन उध्वस्त झाले होते. बायका मुली पळवल्या जात होत्या. मंदिरांची तोडफोड करून मूर्ती भंग केली जात असे. पांडुरंगा ची मूर्ती यवनांनी पळवून कर्नाटक प्रांतात नेऊन टाकली. अशा वेळी सर्व संतांनी आपापल्या परीने घाबरलेल्या जनतेला एकत्र आणण्याची जबाबदारी घेतली. भगवी पताका, भागवत धर्म,  आणि वारकरी संप्रदाय या त्रयींच्या आधारे जनतेला एक सुरक्षा कवच दिले. श्री संत भानुदास म्हणजे एकनाथ महाराजांचे वडील, यांनी पांडुरंगाची मूर्ती कर्नाटकातून आणून पंढरपूरात स्थापन केली. कर्नाटकातून आला म्हणून “कानडा राजा पंढरीचा”.

संत रामदास स्वामी, संत तुकाराम,  संत एकनाथ इत्यादिनी हिंदुधर्म,  हिंदु दैवते, यांचे महत्व पटवून देऊन साध्या भोळ्या शेतकरी, कामकरी वर्गाचे जगणे सुसह्य कसे होईल याची ग्वाही दिली. त्याच काळात शिवाजी राजे दिल्लीच्या पातशाहीशी टक्कर देत होते. स्वराज्य आणि सुराज्य स्थापनेसाठी त्यांची पराकाष्टेची शिकस्त चालू होती. त्यांना समर्थ रामदास व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे पाठीशी राहून उत्तेजन देत होते. मार्गदर्शन करत होते. महाराजांना तुळजाभवानीचा वरदहस्त होता. अवघा महाराष्ट्र संक्रमणाच्या कठिण परिस्थितीतून जात होता. रयतेला, जनतेला एकत्र आणून त्यांच्या वृत्ती,  त्याचे आचार,  त्यांचे विचार , हे विठ्ठलाच्या रूपात असलेल्या परम शक्ती कडे वळवण्याचे महत्कार्य सर्व संतांनी केले आहे.  त्यातूनच भागवत धर्माची गुढी रोवली गेली. भगवी पताका अस्तित्वात आली. वारकरी,  माळकरी संप्रदाय उदयास आला.

भोळी भाबडी रयत विठ्ठलाच्या वात्सल्यपूर्ण कृपेच्या आश्रयाला आली.

अभ्यास करताना माझ्या मनात परत परत विचार यायचे, कि खरंच विठ्ठल भक्तांच्या मदतीसाठी धावून आला असेल का? मग कळलं, ज्याचा त्यावर विश्वास नाही,  किंवा मनात संदेह आहे, त्यांना तो दिसत नाही,  जाणवत नाही. पण ज्यानं विश्वास ठेवला, त्याला तो प्रत्यक्ष दिसतो, मदत करतो, संकटातून बाहेर काढतो. कुठल्याही गोष्टीत विश्वास आणि श्रद्धा महत्वाची. जनाबाईंच्या अभंगातला विठू लेकुरवाळा असतो.  सगळे भक्त विठ्ठल नामाच्या गजरात नाचतात, गातात, धावतात,  उड्या मारतात. स्वतःला विसरून पांडुरंगाच्या पायाशी लोळण घेतात.  पावसापाण्याची, उन्हातान्हाची  कदर न करता पायी पंढरीची वारी करतात. त्यांच्या भक्तीने,  त्यांच्या सेवेने वेडा झालेला विठू सुद्धा आषाढी कार्तिकी एकादशीला त्यांची वाट बघत असतो. असं हे देवाचं आणि भक्ताचं नातं. ‘ देव भावाचा भुकेला ‘ . त्याला फक्त भक्तांच्या ह्रदयीचा खरा भक्ती भाव अपेक्षित आहे. भक्तांची आर्ततेने आलेली ” विठ्ठला, विठुराया, पांडुरंगा ” अशी हाक त्याच्यापर्यंत क्षणार्धात पोचते, आणि तो भक्तांजवळ हजर होतो. हा अनुभव भक्तांचा.

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

संत वाङमय, आणि संत साहित्य, भागवत धर्म, वारकरी संप्रदाय, संत चरित्रे या सर्वांचा अभ्यास करण्याचा योग मला माझ्या महाविद्यालयीन काळात आला. त्या अनुषंगाने ज्ञानेश्वरी,  अमृतानुभव,तुकाराम गाथा, शेकडो अभंग, ओव्या, भारूडे, लोकगीते यांची ओळखंच नाही तर पक्की दोस्ती झाली .

दरवर्षी आषाढी एकादशी,  कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठल रखुमाई च्या दर्शनाला जातात.

कपाळी बुक्का,गळा तुळशीची माळ,  खांद्यावर भगवी पताका, हाती मृदंग टाळ आणि ‘ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ‘ च्या तालावर पडणारी पावले. विठ्ठलाच्या प्रेमात सारं वातावरण भारून गेलेलं असतं. सगळ्यांची वाट एक, नेम एक, ध्यास एक – विठ्ठलाला भेटणे. संत साहित्य वाचताना एक गोष्ट सातत्याने आणि प्रकर्षाने जाणवत होती, ती म्हणजे,  ” जगत्जेठी विठ्ठल दोन्ही हात कमरेवर ठेऊन विटेवर उभा आहे,  त्याचं दर्शन झाले की आयुष्यातल्या सगळ्या व्यथा, दुःख,  कष्ट, त्रास  नाहिसे होतात आणि मनात रहातं फक्त त्याचं साजिरं गोजिरं रूप. एकदा त्याच्या पायावर डोकं ठेवलं की पुढं वर्षभर कसलीच काळजी नाही.आपली सगळी दुःख,  संकटं तोच निवारण करतो हा प्रचंड विश्वास. पंढरपूर ला जाताना दर्शनासाठी आसुसलेली मने येताना शांत होतात. असं काय असेल त्या विठ्ठलाकडे?

लहानपणी विठोबा रखुमाई च्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी वाचल्या, ऐकल्या.  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर,  निवृत्ती,  सोपान,  मुक्ताई,  तुकाराम,  एकनाथ,  नामदेव, पुंडलिक,  गोरा कुंभार,  चोखामेळा,  जनाबाई, कान्होपात्रा, सावता माळी अशा अनेक संतांची विट्ठलाचे गुणवर्णन करणारी,  ईश्वरानुभूतिचे अनुभव सांगणारी चरित्रे वाचली आहेत. अभंग,  ओव्या ऐकल्या आहेत.  एक एक अभंग म्हणजे विठुरायाच्या गळ्यातील  तुळशीचे  एक एक  दळच जणु. इतके पवित्र आणि आर्त.

पंढरपुरात विठोबा जरी विटेवर  युगे अठ्ठावीस उभा असला तरी भक्तांची श्रद्धा इतकी दृढ की आपले नित्याचे काम करताना मुखावाटे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा जप केला तर कष्ट जाणवल्याविना त्यांचे काम पार पडत असे.

( परीक्षेत पेपर्स लिहायला विठू मदत करेल का? असा प्रश्न मनात आला होता)

विठ्ठल, पांडुरंगा, म्हटलं की दिवसभराचे सर्व क्लेश, कष्ट शरीरातून निघून जाई, आणि रात्री पाठ टेकल्या टेकल्या भक्तांना गाढ झोप लागत असे. तुकोबारायांची अभंगगाथा समाजकंटकानी इंद्रायणीत बुडवली, नंतर ती जशीच्या तशी पाण्यातून वर आली.गोरा कुंभाराचा चिलया बाळ परत जिवंत झाला.अशा अनेक अलौकिक कथा आहेत.

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ तहान या कथेविषयी ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ तहान या कथेविषयी ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

मी डी.एड. कॉलेजला होते, तेव्हाची गोष्ट. मला बर्‍याचदा ‘समाजसेवा’ हा विषय शिकवायला असे. या विषयांतर्गत एक उपक्रम होता, समाजसेवी संस्थांना भेटी. यात अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रिमांड होम, मूक-बधीर मुलांची शाळा, गतिमंद मुलांची शाळा आशा अनेक संस्था असत. एका वर्षी मला कळलं, कॉलेजपासून पायी वीस मिनिटांच्या अंतरावर एक चर्च आहे. त्या चर्चने एक क्रेश चालवलं आहे. क्रेश म्हणजे संगोपन गृह. या क्रेशची माहिती घेण्यासाठी मी माझ्या विद्यार्थिनींना घेऊन तिथे गेले.

क्रेशला आर्थिक मदत जर्मन मिशनची होती. इथे आस-पासच्या वस्तीतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍यांची मुले येत. सकाळी ८ वाजता मुले येत. तिथे त्यांना दूध, नाश्ता दिला जाई. शिक्षण, दुपारचे जेवण, पुन्हा शिक्षण, खेळ , गाणी, चित्रे काढणे, सगळं तिथे करायला मिळे. दुपारी बिस्किटे, फळे वगैरे दिली जात. संध्याकाळी ६ वाजता मुले आपआपल्या घरी जात.

तिथल्या मदतनीस क्रेशबद्दलची माहिती संगत होत्या. इतक्यात तिथे एक ८-९ महिन्याची एक मुलगी रंगत आली. माहिती सांगणार्‍या बाईंनी तिला प्रेमाने उचलून कडेवर घेतले आणि म्हणाल्या, ‘ही आमची पहिली दत्तक मुलगी. आता हळू हळू आम्ही काही अनाथ मुलांना इथे कायम स्वरूपी आसरा देणार आहोत.’ मुलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, एका लेप्रसी झालेल्या भिकारी दांपत्याकडून ही मुलगी आम्ही घेतली. एखाद्या आईने आपल्या मुलीच्या भवितव्याबद्दल बोलावे, तशा स्वप्नाळूपाणे त्या म्हणाल्या, ‘आम्ही तिला डॉक्टर करायचं ठरवलय.. नंतर जर्मनीला पाठवू.’

’तिचा आई-वडलांचा काय?’ मी विचारलं. ’सगळी जबाबदारी आम्हाला घेणं शक्य नाही या परिसरात खूप भिकारी आहेत. आम्ही त्यांना म्हंटलं, ’तुमची मुलगी आम्ही दत्तक घेतो. तिला शिकवतो. तिच्या आयुष्याचं कल्याण करतो. तुमच्यासारखं भीक मागत तिला फिरावं लागणार नाही पण आमची एक अट आहे. तुम्ही तिला तुमची आई-वडील म्हणून ओळख द्यायची नाही.’ त्यांनी ते मान्य केलं.

ही सगळी माहिती ऐकल्यावर माझ्या डोक्यात एक लख्ख वीज चमकली. त्या विजेच्या प्रकाशात ती ८-९ महिन्याची मुलगी एकदम तरुणी दिसू लागली. तेजस्वी, बुद्धीमान, गोड, नम्र, मनमिळाऊ. या तरुणीची कथा मी घरी जाईपर्यंत मनातल्या मनात तयार झाली.

त्या मुलीला मी नाव दिलं जस्मीन. मोहक सुगंधाने सर्वांना हवीशी वाटणारी जस्मीन. त्या क्रेशचही मी बारसं केलं, ‘ममता निकेतन’ आणि कथेतल्या आणि पात्रांनाही मी माझी नावे दिली. मुख्य फादर फिलीप. ‘ममता निकेतन’ची व्यवस्था पाहणार्‍या मिस रेमंड.

त्या विजेच्या प्रकाशात मला दिसलं, जस्मीन बारावीची परीक्षा उत्तम गुणांनी पास होऊन आता पुढचं मेडीकलचं शिक्षण घेण्यासाठी जर्मनीला निघालीय. ‘ममता निकेतन’च्या हॉलमध्ये तिला निरोप देण्यासाठी सगळे जमलेत. तिचं गुणवर्णन चाललय. तिचा आदर्श सगळ्यांनी डोळ्यापुढे ठेवावा वगैरे… वगैरे…

जस्मीनच्या डोळ्यापुढून मात्र तिचा भूतकाळ सरकतोय. ती जसजशी मोठी होत गेली, तसतशी तिला आपली जीवन कहाणी, कुणाकुणाच्या बोलण्यातून तुकड्या तुकड्याने कळली. लेप्रसी झालेल्या भिकारी जोडप्याची आपण मुलगी, हेही तिला कळले. पण नक्की कोण आपले आई-वडील हे मात्र तिला माहीत नाही. ते विचारायचे धाडसही तिला कधी झाले नाही.

निरोप समारंभाच्या वेळी आपलं मनोगत व्यक्त करताना ती म्हणते, ‘ ‘लेप्रसी’ विषयाचा विशेष अभ्यास करून, त्यावर संशोधन करण्याची आणि ‘ममता निकेतन’च्या परिसरातील रुग्णांवर उपचार करण्याची तिची इच्छा आहे. त्यासाठी सुसज्ज हॉस्पिटल बांधण्याचं तिचं ध्येय आहे.’

जस्मीन बोलतेय. होलामधल्या तिच्या समोरच्या भिंतीवर एक भलं मोठं डिजिटल पोस्टर लावलेलं आहे. त्यामध्ये प्रभू येशू एका महिलेच्या हातावर पाणी घालतोय आणि ती महिला ओंजळीने पाणी पितेय, असे चित्र आहे. चित्राखाली लिहिले होते, ‘त्याने दिलेल्या पाण्याने जो तहान भागावतो, त्याला पुन्हा तहान लागत नाही.’ हे पाणी अर्थात आध्यात्मिक आहे. प्रभू येशूचा उपदेश म्हणजेच हे पाणी आहे. (हे चित्र मी मिरज मिशन होस्पिटलच्या दर्शनी भागात लावलेले पाहिले होते.)

बोलता बोलता जस्मीनचं लक्ष त्या पोस्टरकडे जातं. तिला वाटतं, आपण अगदी समजायला लागल्यापासून हे पाणी पितोय. पण आज आपल्याला अतिशय तहान लागलीय. त्या तहानेने आपले प्राण कासावीस झालेत. आपले आई-वडील कोण, हे जाणून घेण्याची तहान. त्यांना बघण्याची तहान.

जस्मीन निघण्याची वेळ होते. ती टॅक्सीत बसताना शेवटची नजर त्या भिकार्‍यांकडे टाकते. मनोमनी म्हणते, ‘माझ्या अज्ञात माता-पित्यानो मला आशीर्वाद द्या.’ टॅक्सी निघून जाते. चार विझू विझू झालेले क्षीण डोळे टॅक्सीचा पाठलाग करतात.

(उद्यापासून  ‘तहान ’ कथा क्रमश:……)

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – ५) – सप्तक कथा ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – ५) – सप्तक कथा ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆   

सप्तक हे नावच त्याची ‘सात’ ह्या संख्येशी बांधिलकी सांगते! संगीतातही ‘सात’ स्वर आहेत, त्या सात स्वरांचा समूह म्हणजे ‘सप्तक’! आपल्याला माहीत असलेले ‘सा, रे, ग, म, प, ध, नि’ हे सुरांच्या नावाचे ‘शॉर्ट फॉर्म्स’ म्हणायला हरकत नाही आणि गाताना अर्थाचच तेच सोयीचे पडतात. ह्या सात स्वरांची पूर्ण नावं आहेत, सा – षड्ज, रे – रिषभ, ग – गंधार, म – मध्यम, प – पंचम, ध – धैवत, नि – निषाद!

गंमत अशी कि हे सात स्वर कसे अस्तित्वात आले ह्याविषयी अनेक सुरम्य कहाण्या वेगवेगळ्या जुन्या ग्रंथांमधे सापडतात. ‘संगीत दर्पण’ ह्या प्राचीन ग्रंथाचे लेखक दामोदर पंडित ह्यांच्यामते काही प्राणी व पक्ष्यांचा आवाजातून ह्या स्वरांची निर्मिती झाली आहे. मोराची केका ‘षड्ज’ जननी, चातकाचा आवाज ‘रिषभ’ जनक, बकऱ्याच्या आवाजात ‘गंधार’ सापडला, ज्ञानोबारायांना शकुन सांगणाऱ्या काऊ(कावळा) ची कावकाव ही ‘मध्यम’निर्माती ठरली, कोकिळ पक्ष्याचं मधुर कुहूकुहू ‘पंचमाचं’ उत्पत्तीस्थान ठरलं, बेडकाच्या ‘डरावडराव’मधून ‘धैवत’ जन्मला आणि हत्तीच्या चित्कारातून ‘निषाद’ उत्पन्न झाला.

ह्याचा सोपा अर्थ लावायचा झाला तर असं म्हणता येईल कि, पूर्वी सगळ्याच अर्थाने ‘प्रदूषण’ विरहित अशा निसर्गाच्या सान्निध्यातच जगणाऱ्या माणसाच्या जाणिवा अत्यंत तरल असाव्या. त्यामुळं निसर्गातून ऐकू येणाऱ्या वेगवेगळ्या आवाजांतल्या ‘फ़्रिक्वेन्सी’ मधला सूक्ष्म फरकही त्याच्या कानांना सहजी जाणवत असावा. हळूहळू कोणत्या सुरापेक्षा कोणता सूर चढा आहे हे जाणवलं तसे हे सात सूर अस्तित्वात आले असतील. अर्थातच नंतर शास्त्रीय दृष्टिकोनातून ह्या सर्वच गोष्टींवर काळानुसार अनेक प्रयोग, बदल होत राहिले.

एका फारसी संगीतज्ञाच्या नोंदणीनुसार, प्राचीन मुस्लीम संत हजरत मूसा हे पहाडी भागांतून फिरत असताना आकाशवाणी झाली कि, ‘हे मूसा हकीकी, तू तुझ्या हातातल्या दंडाने तुझ्या समोरच्या दगडावर प्रहार कर!’ त्याबरहुकूम हजरत मूसांनी हातातल्या दंडाचा(छोटी काठी) समोरच्या दगडावर जोरात प्रहार केला तेव्हां त्या दगडाचे सात तुकडे झाले आणि त्या प्रत्येक तुकड्यातून पाण्याची धार/झरा/निर्झर वाहू लागली. मात्र पाण्याच्या त्या प्रत्येक धारेचा ‘आवाज’ वेगवेगळा होता, म्हणजे त्यातून ऐकू येणारा ‘सूर’ वेगळा होता. हजरत मूसांच्या तरल जाणिवांना तो ‘आवाजां’ मधला फरक उमजला आणि  कानाला जाणवणाऱ्या त्या प्रत्येक ‘फ्रिक्वेन्सीनुसार’ त्यांनी एकेक सूर निर्माण केला आणि ते सूर चढत्या पट्टीत योजत ‘सप्तक’ निर्मिले असेल.

आणखी एका फारसीच संगीतज्ञांच्या मतानुसार पहाडी भागांत ‘मूसीकार’ नावाचा जो पक्षी सापडतो, त्याची चोच खूप लांब असते. बासरीला जशी सात भोकं असतात तशी त्याच्या चोचीलाही सात भोकं असतात. हा पक्षी आवाज करतो तेव्हां त्या सात भोकांमधून वेगवेगळा ‘आवाज’ येतो. त्या वेगवेगळ्या सात आवाजांतूनच सात सुरांची निर्मिती झाली आहे.

ह्या सगळ्या प्रचलित कथांचा विचार केला असता वाटते कि, तेव्हां भले तंत्रज्ञान अस्तित्वात नसेल, पण तरीही कानांवर पडणाऱ्या आवाजाशी सूर जुळवून पाहाणे वगैरे बाबींमधे नकळत का होईना, प्रयोगात्मक, संशोधनात्मक दृष्टिकोन सामावलेला आहे. मात्र मुळात माणसाचं संगीताशी नातं कसं जोडलं गेलं असावं? तर फ्राईड ह्या एका पाश्चात्य विचारवंताच्या मते, संगीत ही माणसाकडून झालेली सहजनिर्मिती आहे! ते म्हणतात कि, माणूस आधी बोलायला शिकला, मग चालणं-फिरणं शिकला आणि हळूहळू तो जास्त क्रियाशील झाला तशी त्याच्याकडून आपोआप संगीताची निर्मिती झाली.

फ्राईड ह्यांच्या विधानावर विचार करत असताना मनात आलं कि, ‘खरंच आहे, आपण स्वत:कडे आणि आपल्या आजूबाजूलाही जाणीवपूर्वक पाहिलं तरी लक्षात येतं कि एखादवेळी आपसूक ‘गुणगुणावंसं’ वाटणं हीच संगीतनिर्मितीची पहिली पायरी असावी. असं ‘गुणगुणणं’ ही सहजप्रक्रियाच आहे, त्यासाठी संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं असणं हे आवश्यक नाहीच. माणसाच्या मनात कोणताही एखादा भाव प्रचंड प्रमाणात निर्माण झाला कि त्याच्या व्यक्ततेपायी ‘गुणगुणण्यातून’ त्याच्याकडून सूरनिर्मिती, संगीतनिर्मिती होत राहिली असेल आणि हळूहळू त्याला एक छान आकार प्राप्त होत ‘संगीतशास्त्र’ निर्माण होण्याएवढी मानवाने प्रगती केली.

खरंतर संपूर्ण सात सूर एकाचवेळी अस्तित्वात आले असं नाही. आपल्याकडचे मंत्र म्हणून पाहिले कि लक्षात येते कि, ते दोन किंवा तीन स्वरांतच बांधलेले आहेत. काही स्त्रोत्रांमधे मग चार सूर दिसून येतात. ह्याचा अर्थ हळूहळू सूरसंख्या वाढत गेली. सप्तकाची एक जन्मकथा अशी वाचल्याची स्मरते कि, वैदिक काळात जे सामगायन होत असे ते सुरुवातीला तीन अणि नंतर चार सुरांत होऊ लागले. सार्वजनिक ठिकाणी सामुदायिक पद्धतीने हे गायन होत असताना गाणाऱ्यांचे पुरुषगायक व स्त्रीगायक असे दोन गट असायचे. पुरुषगायकांनी गायलेली वेदऋचांची चाल(स्वररचना) पाठोपाठ स्त्रीगायक गात असत. मात्र नैसर्गिकरीत्या सर्वसाधारणपणे स्त्रियांचा आवाज उंच पट्टीचा असतो, त्यामुळे त्यांना पुरुषांच्या पट्टीत गाणे कठीण जायचे. मग तीच स्वरसंगती स्त्रिया त्यांच्या पट्टीत गात असत तेव्हां ते सूर अस्तित्वात असणाऱ्या सुरांपेक्षा भिन्न स्थानांवर असल्याचे लक्षात येत गेले आणि अणखी सूर अस्तित्वात आले. दुसऱ्या भागात आपण गणितीय पद्धतीने स्वरांमधील अंतरे पाहिली आहेत. तर, ‘सा ते म’ आणि ‘प ते वरचा सा’ ह्या स्वरांमधील अंतरे पाहिली तर ती अगदी समान असल्याचे दिसून येते. ती कदाचित ह्या सामगायनाची देणगी असावी, अशी सप्तकाच्या जन्माची ‘वन ऑफ द थिअरी’ म्हणता येईल.

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print