मराठी साहित्य – विविधा ☆ सार्थक ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ विविधा ☆ सार्थक ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर 

‘अगं आई, बास कर आता… काय बारीकबारीक पाकळ्या वेचतीहेस… चांगली फुलं पण निघालीत भरपूर.. दे आता पिशवी.. बाकी कचरा टाकून देते’ असं माझं जरा वैतागलं वाक्य! मागं एकदा आई माझ्याकडं आली असताना फुलांच्या छोट्या पिशवीतून देवपूजेसाठी फुलं काढत होती. बरीच फुलं पारच बावली आहेत असं लक्षात आल्यावर म्हटलं, ‘संध्याकाळी नवी फुलं आणूया. आज आता चांगली सगळी घेऊन टाक पुजेला आणि खराब झालेली टाकून देते. फार कुजली तर वास येत राहातो फ्रिजमधेही!’ ‘हो, तसंच करते’ म्हणत ती फुलं निवडू लागली. मी माझ्या उद्योगातून मधेच स्वयंपाकघरातून बाहेर आले तरी ही अजून अगदी शेवंतीच्या फुलांच्या गळलेल्या अतीबारीक पाकळ्यांतूनही चांगल्या पाकळ्या निवडतच होती. मुळात चार-सहा देव आणि चार-सहा फोटो इतकंच काय ते देवघर! बाजूला निघालेल्या चांगल्या फुलांचा बऱ्यापैकी ढीगच देवांच्या मानानं खूप होता आणि आई उगीच जीव का शिणवतेय ह्या विचारानं मी वैतागून तिला ‘बास कर’ म्हटलं. त्यावर ती मानही वरती न करता शांतपणे पाकळ्या निवडत स्निग्धपणे म्हणाली, ‘त्यांचा पण जन्म वाया जाऊ नये गं! अगदी बावलेलं काही वाहाता येणार नाही देवाला, पण ज्या पाकळ्या अजून जरा टवटवीत आहेत त्या तरी वाहाते.’ ‘जाऊदे, आपल्याला कुठं काय तोशीस आहे, करुदे काहीतरी’ असं मनाशी म्हणत मी परत स्वयंपाकघराकडं वळले… मात्र नंतर कधीतरी असे आपल्याही नकळत रुजलेले क्षण तरारून उगवून येतात अचानक!

तसंही काही गोष्टी ह्या आपल्याकडं अपरिहार्य असतातच… अगदी रट्टे देऊन गळी उतरवलेल्या! पान इतकं स्वच्छ असलं पाहिजे कि माणूस त्यात जेवलं आहे कि नाही कळू नये, भांडी घासायला टाकताना ती स्वच्छ निपटलीच पाहिजेच… अन्नाशी मस्ती करायची नाही म्हणजे पर्यायाने अन्नाच्या एकेका कणाचा जन्म सार्थकी लागला पाहिजे. साडी जुनी झाली कि पूर्वी त्याची गोधडी व्हायची, फाटलेल्या कपड्यांच्या पिशव्या व्हायच्या… धाग्याचा जन्म पूर्णपणे सार्थकी लागायचा.  वहीतल्या उरलेल्या कोऱ्या कागदांची दाभण-दोऱ्यानं विणून वरती छान कोरा कागद चिकटवून त्यावर नक्षी रेखून दिमाखदार होममेड वही व्हायची. त्यातही कोरे कागद प्रत्येकी चार भागांत कापून गृहपाठ उतरवून घ्यायला केलेली पिटुकली वही तर काळजाच्या फारफार जवळची असायची. आज पाच ते पंचवीस ते शंभर रुपयांपर्यंत किमान दर्जापासून बऱ्या, मध्यम ते उत्तम दर्जापर्यंत वह्या सहजी बाजारात मिळतात… पण मला त्या भावत नाहीत. कागदाचा पर्यायानं वृक्षराजाच्या काळजाचा एकेक कण सार्थकी लावताना त्याचे जे नकळत आशीष लाभायचे ते ह्या वह्यांमध्ये कुठून यायचे आणि त्याशिवाय आपलं काळीज त्याच्याशी कसं जोडलं जायचं!?

गतिमानतेची अपरिहार्यता, त्यातून बंद झालेली मनाची कवाडं, अती बरकतीसोबत येणारा अहंकार, कोडगेपणा आणि कोरडेपणा, काळजाची गुंतवणूक हरवलेली स्पंदनं.. ह्या सगळ्यातून जुन्या सोन्यांतलं झळाळलेपण मागं पडत गेलं, आपणं अंतर कोरडंठक्क झालंय, स्वत: किती दर्जेदार जगतोय असा विचारही मनात येत नाही तर हळवे धागे गुंफत दुसऱ्याचा जन्म सार्थकी लावण्याचा विचार फारच दूर! त्यातून भाळी येणारं नैराश्य, वैफल्य, एकाकीपणही आपण सोसत होतो्च… मात्र वेगानं फिरणाऱ्या जगण्याच्या ‘मेरी गो राऊंड’ला थोपवायचं कसं हाही प्रश्न होताच. काही ओढवून घेतलेली आणि काही काळानुरूप स्वीकारावी लागलेली अपरिहार्यता कळसावर पोहोचून खदाखदा हसून आपला अंत पाहात होती आणि एका क्षणी अनपेक्षितपणे हे ‘मेरी गो राऊंड’ थांबलं… थोड्याश्या भयशंकांमधेही जगणं किंचित स्वस्थावलं आणि काही अवधीनं जेव्हां चक्र उलट दिशेनं फिरू लागलं तेव्हां अंतरी नकळत रुजलेल्या जाणिवांना पालवी फुटू लागली. स्वस्थावलेपण विरत जात कुठंतरी क्षणांचा जन्म सार्थकी लागतोय असं मनात आलं आणि आईच्या वाक्याची आठवण झाली.

ज्या मृगजळामागे वेड्यासारखे धावत होतो ते अख्खं मृगजळ अचानक लुप्त झालं, धावणं थांबलं तरी जगणं थांबलं नाही, उलट ते मोहरू लागलं… जन्म सार्थकी लागल्या क्षणांचे भरभरून आशीर्वाद मिळूनच कदाचित तृप्तावलं, शांतावलं, सुखावलं. पुरवूनपुरवून वापरताना अन्नाच्या एकेका कणाला जपलं जाऊ लागलंय, घरट्याच्या कानाकोपऱ्याला गोंजारलं जाऊ लागलंय, बेदरकारपणे टाकाऊ म्हणून फेकल्या जाणाऱ्या गोष्टींतलं सौंदर्य टिपायला नजर सरावतेय आणि त्यातून सृजनाचे रंग उधळले जाताहेत, माळ्यावरच्या अडगळीतली अनमोल हिरे-माणकं खाली येत त्यांना पैलू पाडून कोंदणात सजवण्याचा नाद लागला आहे, देवघरातली बेगडी माळ दूर सारली जात सांजवात उजळू लागलीये, शुभंकरोतीच्या सुरांनी तिन्हीसांज सजू लागलीये. दूरस्थ नात्यांशी संवाद घडू लागलेत… सर्वांना सुखी ठेव म्हणताना त्यांच्यासाठी आठवणीनं हात जोडले जाऊ लागलेत. सोय असूनसुद्धा आता व्हिडिओ कॉल नको वाटू लागलाय, लवकरात लवकर एकदा ग्रहण सुटून जिवाशिवाच्या भेटीचीच जीव वाट पाहू लागलाय. बहुधा काळजचं रितेपण, संवेदनांचं शुष्कपण जाऊन घराचं घरपण, जगण्यातलं जिवंतपण परत येऊ लागलंय!

खरंतर हे सगळंसगळं अस्तित्वात होतंच.. मात्र त्याचं अस्तित्व जाणवून घ्यायला ना आपल्याकडे वेळ होता, ना मनाच्या बंद कवाडांना त्याची चाहूलही लागत होती. सुरेश भटसाहेबांच्या, उरले उरांत काही आभास चांदण्याचे आकाश तारकांचे उचलून रात्र गेली…. ह्या ओळींप्रमाणं आज आपण जेव्हां रिते झालो आहोत…. त्यावेळी मनाच्या कप्प्यात खोलवर रुजलेल्या ह्या गोष्टी आपल्यासाठी चांदण्यांचे आभास होऊन सामोऱ्या आल्यात. आज त्यातल्या तारकांची आभा आपल्याला जाणवायला लागली आहे. आता हे जपायला हवं असं कुठंतरी आत जाणवू लागलं तशी मी प्रहार ह्या अप्रतिम हिंदी सिनेमातल्या मंगेश कुलकर्णींच्या अप्रतिमच शब्दांशी पोहोचले…

हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा

कभी ना ढले जो, वो ही सितारा, दिशा जिससे पहचाने संसार सारा

वाटलं, हाती येऊ लागलेलं आकाश आता मुठीत घट्ट पकडून ठेवायला हवं. त्यातल्या आपल्याच जिवाला लुभावणाऱ्या चांदण्या, तारका, नक्षत्रही हातून निसटता कामा नये. नैराश्याचा झाकोळ दूर करणारी ही रत्नमाला जपायला हवी. त्यातून संवेदना जिवंत होताहोता जगण्याला भान येईल… जे आजूबाजूलाही संवेदनशील डोळसपणे पाहायला शिकवेल… ज्यातून ज्ञानोबारायांच्या,

हे विश्वची माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर ।

किंबहुना चराचर । आपणची जाहला ॥…. ह्या शब्दरत्नांच्या तेजार्थाचीही कदाचित अनुभूती मिळेल.

 

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर

चेन्नई

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मंगळसुत्र ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ मनमंजुषेतून ☆ मंगळसुत्र ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

लग्नात सप्तपदी चालून सातजन्म एकमेकांची साथ देण्याचे वचन घेतात दोघेजण, तेव्हा खोलवर मनात रुजते ती आपुलकीची, प्रेमाची, आणि त्याच बरोबर जबाबदारीची जाणीव. एकमेकांची सुख, दुःख,आता दोघांची होऊन जातातआणि नकळत माझे, तुझे हे आपले होऊन जाते. कोणते ही संकट आले, तर त्याला दोघांनी मिळून सामोरे जाऊन त्या संकटाशी दोन हात करायचे आहेत ह्याची जाणीव होते.

काळ्या मण्यांचा सुरेख दागिना जेव्हा आपला जोडीदार आपल्या गळ्यात बांधतो तेव्हा पावित्र्याची, कर्तव्याची, प्रेमाची जाणीव होते. सगळ्या दागिन्यात हा उठून दिसत असतो. मुहूर्तावर बांधलेला तो मुहूर्त मणी सगळ्या अलंकाराना मागे टाकतो आणि सौभाग्याचे लेणे म्हणून दिमाखात सजतो.

त्याचे पावित्र्य घेऊन जेव्हा नववधू घरचा उंबरठा ओलांडते तेव्हा ती घरची लक्ष्मी म्हणून गृह प्रवेश करते. तांदुळाने भरलेले मापटे जेव्हा ती ओलांडून आत येते तेव्हा माझे हे घर आनंदाने समृद्धीने सुखशांतीने भरून जाऊदे हीच मनोकामना करत असते.

ती ह्या नवीन घरात रूळायचा मनोमन प्रयत्न करत असते. फक्त हे करत असताना तिला साथ हवी असते ती आपल्या जोडीदाराची. त्याने समजून घेण्याची. ज्याच्या विश्वासावर ती आपली सारी माणसे, आपले माहेर मागे सोडून आलेली असते. नवीन घरात नवीन माणसांचे स्वभाव आवडीनिवडी समजून घेण्यासाठी तिला साथ हवी असते आता आपल्या मित्राची. म्हणजेच आपल्या नवर्‍याची.माझ्या मते जर आपला जोडीदार उत्तम मित्र बनू शकला तरच उत्तम जोडीदार बनू शकतो. नाही तर तिथे पुरुषी अहंकार डोकावतो.

एका गाडीची आता आपण दोन चाक आहोत आणि आपल्याला आता बरोबरीनं जायचे आहे हे जर त्याला उमगले तर खरच सुखी संसार होण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही. पण हे त्याला खरच उमगत असते का? का फक्त मणी गळ्यात बांधले म्हणजे आता ती आपल्या मालकीची झाली, आता तिने त्याच्या होला हो म्हणून फक्त चालत रहायचे त्याच्या बरोबर त्याची साथ नसतानाही?

त्या काळ्या मण्यांनां खरा अर्थ तेव्हा मिळतो जेव्हा नवरा आपल्या बायकोला आपल्या बरोबरीचा दर्जा देतो, मान देतो.मान देणे म्हणजे तिच्या प्रतेक म्हणण्याला होला हो करणे नव्हे, पण तिच्याही मनाचा, मतांचा आदर करणे, तिलाही भावनां आहेत ह्याची जाणीव ठेवणे .खांद्याला खांदा लावून जेव्हा दोघ संसाराचा गाडा ओढतात तेव्हा होतो खरा सुखी संसार.

आता नेहमी मला प्रश्न असा पडतो की ह्याची जाणीव खरच नवऱ्याला असते का?का असूनही तो डोळेझाक करतो सोईस्कर रित्या? कित्येक घरं अजूनही अशी आहेत जिथे अजुनी पुरुष प्रधान संस्कृती आहे. मी म्हणीन तेच आणि तसेच, जिथे बायकोच्या भावनांना शुन्य किंमत असते. की एकदा काळे मणी बांधले गळ्यात की तिच्यावर हक्क गाजवायला मोकळा होतो तो ?आपण जे सांगू ते तिने करायचे,तिच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून?

जो हे गळ्यात बांधतो त्याला हीआपली सहचारिणी, अर्धांगिनी आहे ह्याची जाणीव असते का? आता तीची सुख दुःख ही आपली आहेत ह्याची कल्पना असते का?तिच्या भावनांची कदर खरच केली जाते का?

मंगळसूत्र नुसते काळे मणी नसून शक्ति असते तिची. दागिना नसून सौभाग्य असते तिचे. तिचा अभिमान असतो. ज्याच्या जिवावर ती आपले घर, आई, वडील सगळे सोडून आलेली असते ते फक्त त्याच्या विश्वासाच्या आधारावर. हा विश्वास टिकून द्यायचा की नाही हे सर्वस्वी जोडीदाराच्या हातात असते. तस झाल नाही तर तो नुसताच एक दागिना म्हणून गळ्यात राहतो.

एक सामान्य दागिना. फक्त काढता येत नाही म्हणून गळ्यात अडकवलेला.

सहज मनाच्या कोपऱ्यातून? 

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

(19.8.2020)

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ।।श्री।। नवरात्र…..☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा.सौ. सुमती पवार

☆ विविधा ☆ ।।श्री।। नवरात्र….. ☆ प्रा. सौ. सुमती पवार’☆

चला मंडळी मी तुम्हाला आता माझ्या माहेरीच घेऊन जाते, नवरात्राच्या … पुजे साठी…! हो पण मी आता ९/१० वर्षांची मुलगी आहे बरं का .. तुम्ही ही थोडे लहान व्हाच माझ्या बरोबर ..म्हणजे कशी मजा येईल नाही का..?

तेंव्हा फारसे कळत नव्हते याचे आता वाईट वाटते .. आई राबायची . काही काम सांगायची नाही. दसरा यायच्या आधी १५ दिवस तिची लगबग सुरू व्हायची.

आता ते लहानपणी पाहिलेले सारे.. डोळ्यांसमोर लख्ख दिसते मला . हो .. खेड्यातले घर .. मातीच्या भिंती, चूल नवरात्र सुरू होतांना घट बसवायच्या आधी सारी साफसफाई झाली पाहिजे . रोजच्या कामांचा धबडगा त्यात घराला पोतेरे करणे, चुनखडीची पांढरी माती आणवून पूर्ण घर ती लख्ख करायची, सर्व घर शेणाने सारवून घ्यायची, नि मग बाकीची तयारी सुरू व्हायची .

गहू ओले करणे. हो सांजोऱ्या पुऱ्यांचा नैवेद्य लागतो ना ? मग गहू ओलणे, ते बांधून ठेवणे ते स्वत: जात्यावर दळणे, त्याची रवा पिठी वेगळी करणे … ही…..कामांची झुंबड  उडायची विचारू नका .. म्हणून आता आठवले की, डोळे भरून येतात .. काहीच का उपयोगी पडलो नाही आपण आईच्या ? का तिने कामाला लावले नाही मला …? ह्या आया  असतातच अशा …स्वःताच झिजतात …

मग दारावर कुंभारीण डोक्यावर मडक्यांचा मोठा हारा घेऊन यायची  . हो तेव्हा गावचे १२ बलुतेदार गावची  सेवा करायचे नि दाम रोख न मागता सुगीत खळ्यावर येऊन धान्याच्या रूपात मोबदला न्यायचे . कुंभारीण दारात ऐसपैस बसायची नि आई तिच्या पसंतीची मडकी निवडून घ्यायची घटा साठी ! एक मोठे व दोन छोटी .. त्याला लोटा म्हणायचे आमच्याकडे खानदेशात .. तरी आई तिला भाजी भाकरी, गहू बाजरी द्यायची . कुंभारीण खूष होऊन जायची . मी तिथेच आई जवळ 11लुडबुड करत असायची . मग आई त्या कोऱ्या मडक्याला धुण्यासाठी त्यात पाणी ओतायची नि मस्त खरपूस वास सुटून हलकीशी वाफ त्यातून निघत सुर सुर असा आवाज येत ते मडके पाणी शोषून घ्यायचे कारण ते भट्टीतून भाजून काढलेले असायचे ना ?

मग प्रथमेला एका विशिष्ट जागी जिथे फारशी वर्दळ नाही अशा खोलीत देव्हारा लख्ख करून त्याच्या समोर जमिनीवर गहू बाजरी गोल अंथरून पाण्याने भरलेला घट त्याच्यावर बसे व त्याच्यावर तो छोटा घट -ठेवला जाऊन दोन्ही घटांना फुलमाळा लटकत .

अहो त्या काळी ६० वर्षांपूर्वी फुले कसली खेड्यात …? तर शेतात असणाऱ्या रुई च्या झाडांची फुले सालदार गडी शेतातून येतांना घेऊन यायचा नि त्यांची माळ बनायची ..ती माळ दोरीने वर पर्यंत टांगलेली असायची . आणि हो .. एक मोठा पावशेर तेल मावेल असा दगडाचा खोल दिवा ती घासून पुसून ठेवायची निमोऽऽऽऽठी वात करून त्यात भरपूर तेल ओतून पेटवायची ..किती प्रसन्न नि छान वातावरण निर्माण व्हायचे ! घरोघर घट बसायचे . त्याच चर्चा व्हायच्या .. आई रात्री १० दिवस घटा जवळच गोधडी टाकून झोपायची .. हो, दिवा १० दिवस अखंड तेवत ठेवायचा ना … ! म्हणून रात्रीतून चार वेळा उठायची .. वात सारखी करायला … हे सारे आठवले म्हणजे त्यांच्या निष्ठेचे कौतुक वाटते.

१० व्या दिवशी काय मज्जा ! किती पदार्थ बनवायची .. आताही मला जाळीदार स्टॅण्डला तो टांगलेला फराळ दिसतो आहे .. टम्म सांजोऱ्या . गरगरीत पुऱ्या .. अहा बघूनच मन तृप्त होत असे .. मी तेव्हा किती काय खाल्ले आठवत नाही पण तो टांगलेला फराळ कायमचा स्मृतीत दडलेला आहे …. तो नजरे समोरून हटत नाही ..देव्हाऱ्याजवळ मुटकुळ करून झोपलेली आई दिसते … आणि हो या दहा दिवसात घटा खालच्या गहू बाजरीला भरगच्च हिरवेगार धान जवळपास ९/१० इंचापर्यंत वाढून सुंदर दिसायचे …! रोज फुलमाळा बदलल्या जायच्या… पवित्र नि मंगल वातावरणाने घर भरून जायचे …!

आता मी नवरात्रीचा विचार करता … असे वाटते की …काळानुसार स्वरूप बदलले आहे ..  उत्साह मात्र प्रचंड आहे ..घराघरातूनअंगणातून गर्बा आता खुल्या मैदानात आला आहे.. तरूणाई थिरकते आहे, आनंद लुटते आहे . अबालवृद्ध मोठ्या चवीने गरबा बघतात आनंद लुटतात .. रस्तो रस्ती चैतन्य सळसळतांना दिसते ..नवरात्र ते दिवाळी आनंदाला नुसते उधाण येते ..

नवरात्रात घरोघरी बसलेल्या घटा खाली उमललेले हिरवे धान हे…. हे देवीच्या  ……. सृजनशीलतेचे प्रतिक आहे ..घरोघर तिची पूजा अर्चा होते, गणेश चतुर्थी पासून सुरू झालेल्या सणांची दिवाळी नंतर सांगता होऊन  हे उत्साहाचे पर्व समाप्त होते … ते हिवाळ्याच्या दुलईत गुडूप होऊन शांत होते…

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

दि . २३/०९/२०२० वेळ : रात्री ११:२५

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भोंडल्याची सोळा गाणी ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ भोंडल्याची सोळा गाणी ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

‘सूर नवा ध्यास नवा ‘ या कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी किमान दोन वर्षापूर्वी प्रश्ण विचारला होता पण त्यानिमित्याने सुरु झालेला  ‘भोंडल्याची१६ गाणी’ चा प्रवास अजूनही सुरु आहे आणि मुख्य म्हणजे तो खूप सुखावह आहे. अनेक जण बालपणीच्या आठवणीत दुनियेत रमत आहेत

तर जरा यात बदल म्हणून

‘दिवस नवा, टवाळखोरी पून्हा ‘ या आमच्याच एकतर्फी कार्यक्रमात ही ‘अमल्याची काही गाणी’ ?

(टीप : मनोरंजन हा हेतू)

 

करोना करोना, इथे तिथे देवा

ऑनलाईन खेळूनच, यंदा तुझी सेवा

झूम आयडी ठरला  दुपारच्या पारी,

पासवर्ड धाडला व्हाटसपवरी

मेसेज वाचल्याचा पाहिला टिक्का

आमच्या ग्रुपच्या हुश्शार बायका

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

एक मास्क घेऊ बाई, दोन मास्क घेऊ

दोन मास्क घेऊ बाई तीन मास्क घेऊ

रंगीत मास्क घेऊ बाई,डिझाईन पाहू

आठवड्या भराचा साठा

भारी फोटो स्टेटसला टाका

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

अक्कल बातमी, बक्कळ बातमी,रिपोर्ट तो खणावा

अस्सा रिपोर्ट सुरेख बाई,ट्विट ते रोवावं

अस्सं ट्विट सुरेख बाई, चर्चा ती करावी

अश्शी चर्चा सुरेख बाई, चॅनेल ते बघावं

अस्सं चॅनेल सुरेख बाई, पैशाचं जमावं

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

दिल्लीत जाऊ, मुंबईत जाऊ तिथेच होता बत्ता

लोकशाहीला लेक झाला, नाव ठेवा सत्ता

 

दिल्लीत जाऊ, मुंबईत जाऊ तिथेच होती भाकर

भक्त असो वा चमचे सगळेच आपले चाकर

 

दिल्लीत जाऊ, मुंबईत जाऊ तिथेच होता पाटा

पाच वर्षात निवडणूक आली, आश्वासनं परत वाटा

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

‘कार्डशेडचा’  वेल लाव गं सुने, लाव गं सुने

मग जा आपुल्या माहेरा माहेरा

कार्डशेडचा’  वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा

 

‘काढ्याचा’  डोस वाढू दे गं सुने, वाढू दे गं सुने

मग जा तू  आपुल्या माहेरा माहेरा

‘काढ्याचा’  डोस वाढला हो सासुबाई वाढला हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा

 

‘पार्ल्याचे’ बिस्कीट खा गं सुने, खा गं सुने

मग जा तू  आपुल्या माहेरा माहेरा

‘पार्ल्याचे बिस्कीट’ खाल्ले हो सासुबाई खाल्ले  हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा

 

‘आरेची’ दृष्टं काढ ग सुने, काढ ग सुने

मग जा तू आपल्या माहेरा माहेरा

‘आरेची दृष्ट काढली हो सासुबाई काढली हो सासुबाई

आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा

आणा जेसीबी,वापरा जेसीबी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

वाच बाई वाचुनी

वाचुन पुढे ढकलुनी

‘टवाळखोर’ नशीब दमला

टुकार भोंडला  संपला ?

 

टीप:  निवडक गाणी ☝️

 

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

मैफिल ग्रुप सदस्य

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘दिवनाली’ कवितेचं रसग्रहण ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆ काव्यानंद ☆ ‘दिवनाली’ कवितेचं रसग्रहण ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

रसग्रहण:

व्यक्तीच्या स्वभावाच्या, आचारविचारांच्या साधेपणाचे उत्कृष्ट प्रतीक जर दाखवायचे तर ते म्हणजे, कवयित्री इंदिरा संत. खरंतर त्यांचा फोटो बघितल्यावर जाणवतं की,  यांचं आडनाव फक्त आणि फक्त ” संत” च योग्य आहे. त्यांच्या कविता म्हणजे अतिशय साध्या सोप्या शब्दात गुंफलेला उत्कट भावनांचा रम्य आविष्कार.

इंदिरा संत आणि त्यांचे पती, दोघेही कवी मनाचे .

आयुष्यात अवेळी अचानक कोसळलेल्या पतिनिधनाच्या आघातामुळे त्यांची कविता नेहमीच वेदना, विरह, स्मृति यांतून गुंतून राहिली. आणिे  स्वाभाविक होते.

पण ” दिवनाली ” ही कविता बहुतेक त्यांच्या संसाराच्या सुरवातीच्या काळातली असावी.

नव्या नवतीच्या विवाहोत्तर काळात सगळं जग त्याच्याच ठिकाणी एकवटलेलं असतं.केंद्र बिंदू तोच.त्यानं सतत जवळ असावं, प्रेमानं त्याच्याकडे काही मागावं, आणि त्यानंही ते भरभरून द्यावं , ही स्त्री सुलभ चिरंतन भावना.

शब्द इतके साधे, सोपे की वाचू लागताच अर्थ उमलू लागतो. वाचक इतका समरस होतो की ही कविता आपल्यासाठीच आहे असे वाटू लागते. तीच तल्लीनतेची तद्रूपतेची भावना व्यक्त करणारी कविता “दिवनाली”.

तू नेहमी जवळ असावास किंवा तू जवळ असल्याचा भास व्हावा म्हणून तुझ्याकडे एकच फूल मागितले,  म्हणजे त्याच्या सुगंधी दरवळाने तू जवळ असल्यासारखे वाटेल, तर तू…….माझ्या अंगणातले हिरवेगार वृक्षच तिन्ही त्रिकाळ बहरत ठेवलेस !

कानात कायम तुझा आवाज गुंजत रहावा म्हणून मी एक शब्द हवा म्हटले , तर तू……समुद्राच्या लाटांची फेसाळ थेंबांची कर्णफुले माझ्या कानांवर गुंफलीस !

तुझा स्पर्श,  तुझा रोमांचित करणारा स्पर्श मला हवा म्हणून मी मान जरा उंचावून धरली तुझ्यासमोर,  तर तू……स्पर्शाने अशी लाली पसरवलीस की कपाळावर ज्योतशी उमटली.

अशा तुझ्याकडून भरभरून मिळालेल्या सुखाने मी इतकी सुखावले, आणि भारावून गेले की नखशिखांत उजळून निघाले. जणू काही निरंतर तेवणारी दिवनाली झाले. प्रकाशमयी समई झाले.

तिनं इतकंसं मागावं, त्यानं भरभरून द्यावं. ह्या सगळ्या सुखात न्हाऊन, प्रेमरंगात रंगून ती ज्योती प्रमाणेच तेजाळली. स्वतःच ज्योत झाली. ज्योतीची दिवनाली झाली.

पती-पत्नीच्या प्रेमाचं इतकं उत्कट, इतकं ऐश्वर्यी रूप दैवी अलौकिक आहे.

नवीन लग्न झालेल्या मुलीच्या प्रेमभावना इतक्या साध्या सोप्या शब्दात पण अतिशय समर्पकतेने व्यक्त करणं हेच इंदिरा संतांच्या कवितांचे वैशिष्ट्य आहे. अतिशय स्वाभाविक,  जे हवे ते मागून घ्यायचं, आणि त्यानं उधळलेलं सुख तन मन भरून आणि भारून व्यक्त व्हायचं,  हा कवितेचा साधा सरळ अर्थ. शब्द कसे? तर थेट इच्छा प्रकट करणारे.लपवाछपवी नाही कि लाजरेबुजरेपणा नाही. पण तरीही कुठेच उथळपणा नाही.  उच्छृंखलता नाही. जे व्यक्त करायचे ते अगदी हळुवारपणे, ओंजळीतून फुले हलकेच ठेवावीत तसे.

कवयित्रीला जे सांगायचं आहे, जे मनातले भाव पोचवायचे आहेत ते अगदी अलवारपणे ह्रुदयापर्यंत पोचतात, कुठेही तोल न ढळता.

कविता वाचताना सुरवातीपासून एक अव्यक्तअर्थ डोकावत रहातो. देवघरातील देव आणि तेवत असणारी समई यांचं अजोड नातं आहे.  समईचं प्रकाशणं हे देवाचं देणं, आणि त्या ज्योतीप्रकाशात देवांचं तेज उजळून दिसतं, हा तन्मयतेचा भाव  आहेच. स्त्रीच्या स्थानी एका समईची कल्पना केली तर, उत्कटता तीच आहे. समईचं  निरंतर तेवणं आणि ईश्वराने भरभरून वरदान देणं.  दिवनालीच्या ज्योतीची तेवत राहणारी, ईश्वरी प्रचीतीच्या अपरूपात रंगून नित्य तेवणारी दीपशिखा,  तीच दिवनाली.

असा दुहेरी गोफ उलगडून दाखवणारी आणि मनात कायम रुंजी घालणारी कविता  ” दिवनाली “ .

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पु. ल.देशपांडे ☆ डाॅ.मेधा फणसळकर

डॉ. मेधा फणसळकर

☆ विविधा ☆  पु. ल.देशपांडे ☆ डाॅ. मेधा फणसळकर ☆

स्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु. ल. देशपांडे)

“क्रियापदाचे मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेले कर्म किती मोठे आहे त्याच्यावर अवलंबून असते.”

हे वाक्य ज्या कर्तृत्ववान कर्त्याने उच्चारले त्याचे स्वतःचेच कर्तृत्व इतके महान आहे की अवघ्या काही मिनिटात त्याच्यातील व्यक्तीचीच काय पण वल्लीचाही परिचय करुन देणे म्हणजे ‛नस्ती उठाठेव’ करण्यासारखे आहे.

पु. ल., पी.एल्. किंवा भाई या संबोधनाने जी व्यक्ती ओळखली जाते ती म्हणजे महाराष्ट्राचे कोट्याधीश ‛पु. ल. देशपांडे.’! त्यांची जन्मशताब्दी या वर्षात आपण साजरी करत आहोत.

कोट्याधीश या उपाधीबद्दल एकदा पुलना विचारले असता ते म्हणाले,“विनोद हा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. माझ्या बाबतीत म्हणाल तर मला अत्यंत गंभीर प्रसंगी देखील नेमकी एखादी विसंगती दिसते आणि विनोदनिर्मिती होते.” याच विसंगतीतून त्यांनी विनोदी लेखन, नाटके, चित्रपटांसाठी पटकथा – संवादलेखन अशा विविध साहित्यप्रकारांची ‛पुरचुंडी’ आपल्या गाठीशी बांधली.

अंमलदार, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, ती फुलराणी, विठ्ठल तो आला आला सारखी नाटके, अपूर्वाई-पूर्वरंग सारखी प्रवासवर्णने, असा मी असामी, बटाट्याची चाळ, हासवणूक, मराठी वाङ्मयाचा ( गाळीव) इतिहास अशी ‛अघळपघळ’ लेखननिर्मिती केली.

१९५६-५७ या कालखंडात त्यांनी नभोवाणी- आकाशवाणीसाठीसुद्धा काम केले. १९७२ मध्ये दूरदर्शनमध्ये नोकरी केली.

आता ‛उरलंसुरलं’ क्षेत्र म्हणजे संगीत! त्याची तर भाईंना आधीच उत्तम जाण आणि ज्ञान असल्याने संगीतकार म्हणूनही त्यांनी अनेक चित्रपटगीतांना संगीत दिले . ‛देवबाप्पा’ चित्रपटातील ‘ नाच रे मोरा’ हे गाणे आजही अनेकांच्या बालपणातील स्मृती चाळवते. ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटाचे तर भाई सबकुछ होते.कथा-पटकथा-संवाद-संगीत आणि अभिनयसुद्धा!

आयुष्यातील विसंगतीची ‛खिल्ली’ उडवतानाच समाजातील विसंगती नष्ट करण्याचा त्यांनी अंशतः प्रयत्न केला.सक्रिय शक्य नसले तरी अनिल अवचट यांच्या ‛ मुक्तांगण’ व वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन करणाऱ्या ‛निहार’ या संस्थेला भरभरुन आर्थिक सहकार्य दिले. हे ‛गणगोत’ मात्र त्यांनी काळजापासून जपले. म्हणूनच मैत्रीची व्याख्या करताना ते म्हणतात-

“ रोज आठवण यावी असं काही नाही

रोज भेट व्हावी असंही काही नाही

पण मी तुला विसरणार नाही

ही झाली खात्री

आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री

शेवटी काय हो,

भेटी झाल्या नाहीत तरी

गाठी बसणं महत्वाचं !”

हीच गाठ भाई तुम्ही आम्हा रसिकजनांच्या हृदयात इतकी घट्ट मारली आहेत की ‛ काय वाट्टेल ते होईल’ पण ‘पु.ल.- एक साठवण’ ची आठवण पिढ्यान् पिढ्या कायम राहील.

 

©  डाॅ. मेधा फणसळकर

9423019961

≈  ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नमस्कार मंडळी ☆ श्रीमती माया सुरेश महाजन

श्रीमती माया सुरेश महाजन

☆ मनमंजुषेतून ☆ नमस्कार मंडळी ☆ श्रीमती माया सुरेश महाजन 

वाल्याकोळ्याची गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. त्याने अयोग्य जीवनप्रणाली अंगिकारिली होती. परंतु जेव्हा त्याला त्याची जाणीव झाली तेव्हां त्याने प्रायश्चित्त घेतले. परिणामतः वाल्याचा एक महान ॠषि वाल्मिकी झाला. ही गोष्ट परत-परत ऐकताना एका गोष्टीची मला तीव्रतेने जाणीव झाली.   ‘प्रायश्चित्त’! हे एव्हडे सोपे होते का? कि पाप करायचे-प्रायश्चित्त घ्यायचे आणि परत पुण्यवान् व्हायचे!नाही मंडळी!यात खरी विचार करण्याची आणि घेण्याची गोष्ट आहे ती म्हणजे- ‘चुकीची जाणीव होणे- पश्चात्ताप होणे आणि प्रायश्चित्त घेणे; म्हणजेच सुधारणा करणे. चुकीची पुनरावृत्ती न होऊ देणे-हेच खरे प्रायश्चित्त आहे.

आज या कोरोनाच्या धांदलीत ही गोष्ट आणि त्यातील स्व-सुधारणेची गोष्ट परत-परत डोके वर काढत आहे. तुम्ही म्हणाल काय संबंध? तर विचार करता असे लक्षात येते की चूक-जाणीव- पश्चात्ताप-प्रायश्चित्त -ही साखळीच माणसाला सुधारण्याच्या मार्गावर नेते आणि त्यायोगे प्रगती साधली जाते.

कोरोना भारतात प्रवेशला ही काही आपली चूक नाही.  परंतु त्याचा फैलाव इतक्या वेगाने झाला , होतो आहे ही मात्र नक्कीच आपली चूक आहे. कारण आपल्यात स्वयंशिस्त, स्व-अनुशासन या गोष्टींची कमालीची कमतरता आहे. साध्या-साध्या गोष्टींतूनही ही कमतरता जाणवते. फक्त प्रशासनाला दोष देऊन काय ऊपयोग? प्रशासनाने काळजीपूर्वक आखलेल्या योजना कागदावर किती छान वाटतात !पण मग त्यांचे अपेक्षित परिणाम का दिसत नाहीत? तर ऊत्तर परत तेच आहे-स्वयंशिस्त नाही. शिस्त आपण तर पाळायलाच हवी, परंतु इतरांनाही पाळायला लावायला हवी.  आज तर ‘ माझ्यापुरतेच ‘ पहाण्याचा अलिखीत नियमच झाला आहे जणूं!वेगाने पसरणार्या या महामारीचा आवेग एकट्या-दुकट्याला आवरणारा नाही. समूह-संसर्गाला समूहशक्तिच आटोक्यात आणु शकते. विलगीकरण हाच जर उपाय आहे तर तो तितक्याच प्रखरतेने पाळायलाच हवा. विलगीकरण हे आपले प्रायश्चित्त आहे. ते जितक्या काटेकोरपणे पाळले जाईल तितक्या लवकर वाल्याकोळ्याचे पाप नाहीसे होईल. प्रायश्चित्तातील कठोरताच शांत जीवनाचे  फळ देईल.

म्हणूनच स्वयंशिस्तीचा झेंडा फडकवायला हवा.  स्वयंशिस्त हीकाही आताचीच गरज आहे असेही नाही. सदा  सर्वदा सदाचारी समाज घडविण्याची ती एक गुरूकिल्ली आहे किंवा व्यवहारी भाषेत बोलायचे यर असे म्हणता येइल की काही दिल्याशिवाय काही मिळत नसते. म्हणूनच स्वयंशिस्त पाळा, म्हणजेच स्व-संतुलन राखा तरच प्रगती होइल. प्रत्येक गोष्ट जशी मला हवी तशीच ती दुसर्यालाही हवी हे ध्यानात घेतले पाहिजे. माझे सुख मिळवण्यासाठी मी इतरांच्या सुखाला पायदळी तुडवू नये.  ‘स्व’ ला अनुशासित ठेवा तरच निरोगी , सभ्य, स्वच्छ, सदाचारी समाज निर्माण होईल.

©  सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘वेळ झाली भर माध्यान्ह’ कवितेचं  रसग्रहण ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆  काव्यानंद ☆ ‘वेळ झाली भर माध्यान्ह’ कवितेचं  रसग्रहण ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

ख्यातनाम कवी अनिल यांनी शब्दबद्ध केलेले आणि यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत आपल्या धारदार आणि नाविन्यपूर्ण आवाजाने उषाताई मंगेशकर यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.

एरवी सकाळ आणि संध्याकाळ यांचं अप्रूप असणाऱ्या कवींनी उपेक्षिलेली अशी ही माध्यान्ह! यशवंत देवांनी हीच माध्यान टिपून   या गाण्यात पेरली आहे. माध्यान हा शब्द या गीताची लय छान संभाळतो.‘प्रीतीच्या फुला’ या शब्दांवर समेची टाळी येते.

मथळ्यावरुन हे गाणे प्रियकराला उद्देशून असावे असे वाटणारे हे गीत एका कामगार स्त्रीने आपल्या लेकराला उद्देशून म्हटले आहे त्यामुळे हे प्रेम गीत आर्त गीत झाले आहे.

कवी गीतामध्ये ज्या माध्यानीचे वर्णन करतात ती ग्रीष्म ऋतूतील तळपणारी, सर्वांगाची लाहीलाही करून टाकणारी अशी आहे. सूर्य माथ्यावर आल्याने त्याची किरणे जास्ती दाहक आहेत, त्यामुळे तिचे बाळ अर्थात तिचे प्रीतीचे फुल कोमेजून जाईल अशी तिला काळजी वाटते.

उन्हाची तीव्रता दाखवण्यासाठी कवीने ‘तप्त दिशा झाल्या चारी,भाजतसे तसेच सृष्टी सारी’अशा ओळी लिहिल्या आहेत.

निसर्गापुढे मानव हतबल असतो हे तिला गृहीत आहे. म्हणून ती मुलाबरोबर परिस्थितीशी मिळतंजुळतं घ्यायचा आग्रह धरते आहे. ‘कसा तरी जीव धरी’ या ओळीतून ते लक्षात येते.

वारे उष्मा वाहतात आणि बाळाच्या नाजूक देहाला पोळतात. त्यामुळे ती बेचैन आहे.

तिची अगतिकता कवीने फार अचूक शब्दात दर्शवली आहे. तिच्याच पायात पडणारी तिची सावली तिच्या बाळाचे पांघरूण होऊ शकत नाही तसेच तिच्या डोळ्यातील अश्रू हे डोळ्यातच आटतात त्यामुळे ती बाळाची तृषा ही भागवू शकत नाही.‘दाटे दोन्ही डोळा पाणी आटेनयनातच सुकुनी’ या ओळीतून ते दाखवले आहे.

या परिस्थितीत आशेचा एकही किरण तिला दिसत नाही त्यामुळे ती चिंताक्रांत आहे या नीरभ्र आकाशाखाली तिला एक मृगजळ दिसतयं तेही फसव!

तिची खूप तगमग होते आहे पण आयुष्याशी तडजोड करायला हवी म्हणून ती आपल्या बाळाला आपल्या सोबत आनंदाचं एखादं गाणं गुणगुणायला प्रवृत्त करते ‘चल रंगू सारंगात’ या ओळी तो अर्थ देतात

सारंग हा माध्यानी गाण्याचा राग आहे म्हणून या रागाचा उल्लेख कवीने केला आहे.

माध्यान या शब्दावर उषा ताईंचा ठहराव आणि उन शब्दाची मिंड घेऊन गायकी सगळं काही कमाल!…..

कवी अनिल संगीतकार यशवंत देव आणि उषाताई या त्रिकुटाचा हे एक अजरामर गीत!

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

[email protected]

9822553857

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आरसा……  ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ आरसा…… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

आरसा! प्रत्येक गोष्टीचे प्रतिबिंब दाखवणारा आरसा 6000 वर्षापूर्वी इजिप्शियन लोक polished copper आरसा म्हणून वापरत होते .साधारणपणे एकोणिसाव्या शतकात आपण वापरतो तो आरसा अस्तित्वात आला

प्राचीन काळातील शिल्प पहाताना, अजंठा वेरूळ येथील मूर्ती पाहाताना मनात प्रश्न पडे की तेव्हा आरसा कुठे होता पण त्यासंबंधी वाचन केल्यावर असे लक्षात आले की तेव्हा आरसा म्हणून सोने ,चांदी किंवा तांबे अशा धातूंचे चकचकीत सपा ट पृषठभाग आरसा म्हणून वापरले जात असत!

पौराणिक गोष्टींमध्ये पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाला आरसा म्हणून वापरले जाई. पंचतंत्राच्या गोष्टीत पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाला दुसरा सिंह समजून डरकाळ्या मारणारा सिंह आपण पाहिला !थोडक्यात काय आपलं तोंड पहाणे म्हणजे आरशात तोंड बघणे होते.

‘डोळ्यात वाच माझ्या तू गीत भाव ना चे…. ‘हे गाणे ऐकताना असे हे प्रतिबिंब आपण दुसऱ्याच्या डोळ्यात पाहतो. दुसऱ्याला एखाद्या गोष्टीविषयी काय वाटतं ते त्याच्या चेहऱ्यावरून व डोळ्यावरून ही कळते .चेहरा हा मनाचा आरसा आहे म्हणतो ते यासाठीच! एखादी व्यक्ती आवडत नसते तरी समोर आल्यावर हसरा चेहरा ठेवून आपण तिचे स्वागत करतो, मनातलं चेहऱ्यावर उ म टू देत नाही. अशावेळी आरशामागे ज्याप्रमाणे मुलामा लावलेला असतो त्याप्रमाणे आपण मनाला आतून बंद करून घेतो आणि  समोरून दिसणारा भाग मात्र आरशाप्रमाणे  चकचकीत दिसतो.

आरसा वरून मला चितोडची राणी पद्मिनी ची गोष्ट आठवली. तिची अभिलाषा धरणाऱ्या

अल्लाउद्दीन खिलजी ला राणा प्रतापने पद्मिनी चे आरशातील प्रतिबिंब दाखवून बरोबर उत्तर दिले .आरशात जर ती इत की सुंदर  दिसते तर प्रत्यक्षात ती किती सुंदर असेल या कल्पनेने खिल् जी भारावून गेला आणि चितोड वर स्वारी केली पण सौंदर्याबरोबरच स्वाभिमान असणाऱ्या पद्मिनी ने जोहार करून आपले सौंदर्य अजरामर केले!

आपण वापरतो तो आरसा आपल्या देशात साधारणपणे एकोणिसाव्या शतकात आला आणि स्त्रियांच्या सौंदर्य प्रसाधनात आरशाची भर पडली. त्याकाळी स्त्रियांकडे एक आरसा पेटी असे. खोपा आंबाडा घालताना केस विंचरणे ,भांग पाडणे हे खाली बसून आरशात बघून केले जाई. माझ्या आजीची अशी फणी क रंड्या ची  लाकडी पेटी होती त्या पेटीवर छान नक्षी होती. पेटी उघडली की समोर आरसा आणि पेटीत काजळ कुंकवाचा करंडा आणि फणी ठेवण्यासाठी छान मखमली जागा होती. तिच्याकडे एक हस्तिदंती फणी पण होती. या सर्व गोष्टींची मला गंमत वाटत असे .आजी वेणी घालताना मी तिच्यासमोर बसून सर्व निरीक्षण करीत असे.

पुढे गोदरेज ची किंवा मोठा आरसा असणारी लोखंडी कपाटे बाजारात आली आणि लोक अशी कपाटे  खरेदी करू लागले. पाच वारी साडी बरोबरच संपूर्ण साजशृंगार त्यात बघता येई.

असा हा आरसा जीवनात महत्वाची जागा व्यापू लागला. इतका की ऑफिसला जाताना छोट्याशा पावडरच्या डबीतही हा आरसा सामावला गेला!

आरशाचे विविध प्रकार आपल्याला म्युझियम मध्ये बघायला मिळतात. एखाद्या आरशात आपण जाड बुटके दिसतो तर एखाद्या आरशात अा पन एकदम बारीक आणि उंच दि स तो. एखादा आरसा आपल्या प्रत्येक हास्या गणिक  वेगवेगळे रूप दाखवतो की ते बघूनच आपल्याला हसू येते

पूर्वी बेल्जियम काचेचे आरसे प्रसिद्ध होते .त्याची काचही चांगली असे आणि त्यावर बाजूने नक्षीकाम ही केलेले असे. मोठे मोठे आरसे लावून राजे महाराजांचे दिवाणखाने ही सजत असत. काही सिनेमातूनही अशा

आरशांचा उपयोग केला गेला. प्यार किया तो डरना क्या? गाण्याच्या नृत्यावर असंख्य चेहरे प्रतिबिंबित होणारा मोठा सेट तेव्हा उभारला गेला होता.

आरशासारखे स्वच्छ निर्मळ मन असावे किंवा एखाद्याचा स्वभाव आरशासारखा निर्मळ आहे असे म्हंटले जाते . अशा सुभाषितवजा वाक्यातून ही आरशा बद्दलची संकल्पना साकार होते. मनात असलेले वाईट विचार ,द्वेष ,रा ग यांची मनाचा आरशावर आलेली  काजळी प्रयत्नपूर्वक पुसावी लागते. मूल लहान असते तेव्हा त्याचे हास्य  आरशासारखे स्वच्छ व निर्मळ असते. तो मनाचा आरसा नितळ असतो ,त्यावर चरे ओरखडे उमटलेले नसतात. जसजसे मोठे होत जाते तसे त्याचे बालपण जाऊन विकार वाढू लागतात आणि मनाच्या आरशाची स्वच्छ प्रतिमा धुरकट होत जाते ही क्रिया नकळत घडत असते!एकदा का आरशाला तडा गेला की कितीही सांधले तरी तो तडा पूर्ण नाही सा होत नाही !

त्याप्रमाणेच हा मनाचा आरसा जपावा लागतो. तडा जाऊ न देता स्वच्छ प्रतिमेसह!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ≈  ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चूल…. ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ विविधा ☆ चूल….. ☆ श्रीमती अनुराधा फाटक  ☆ 

जिच्यामध्ये अग्नी प्रज्वलित केला जातो ती जागा म्हणजे चूल.चूल ही सामान्यतः स्वयंपाकघरात असते.तिच्यावर कुटुंबाचा स्वयंपाक केला जातो म्हणून चुलीला देवत्व प्राप्त झाले आहे त्यासाठीच चुलीला पाय लावीत नाहीत.पूर्वी चूल सारवून तिच्यावर रांगोळी घातली जात असे.अग्नीकुंडाचे एक स्वरुप म्हणून चूल ओळखली जाते.

चूल हा मानवाच्या सांस्कृतिक विकासाचा महत्वाचा टप्पा दाखवते.प्रारंभी माणसे विस्तवात अन्न भाजून खात असत.त्यानंतर तीन दगडांची चूल आली.बलुतेदारीची पध्दत अस्तित्वात आल्यावर कुंभार मातीच्या चुली बनवू लागले.नंतर लोखंडाची,लोखंडी बादलीतील चूल आली.फिरस्तीचे लोक हलविता येणारी ती चूल वापरू लागले.आता गॅसच्या शेगड्या सर्वत् वापरात असून विद्युत चूल आणि त्या पाठोपाठ सौर चूल आली.

कितीही गरीबी असली तरी चूल अडवता येत नाही .काही ना काही शिजवावेच लागते.कधी कधी मात्र चुलीला वाटाण्याच्या अक्षदाही द्याव्या लागतात

म्हणजे उपाशी रहावे लागते.याला चुलीला विरजण पडणे असेही म्हणतात.अत्यंत दारिद्र्यावस्था येण्याला चुलीत मांजरे व्यालेली अवस्थाही म्हटले जाते.दारिद्र्यात भर पडणे म्हणजे चूलजाळ आणि पोटजाळ एक होणे !

काही वेळा माणसाची बुध्दी नको ते काम करते त्यामुळे नुकसान होते अशावेळी तुझी अक्कल चुलीत गेली होती कां?असे विचारले जाते.

चूल आणि स्त्री यांचे नाते अतूट असल्याने बऱ्याचवेळा स्त्रिया आपले विचार चुलीत सारतात म्हणजे गप्प बसतात, चुलीत डोके खुपसून स्वयंपाक करतात.

आता मात्र स्त्री बाहेर पडल्याने चुलीत डोके खुपसण्याइतकेच तिचे जगणे मर्यादित राहिले नाही.

जोपर्यंत मानवी जीवन आहे तोपर्यंत चूलीचे अस्तित्व असणार आहे.

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print