मराठी साहित्य – विविधा ☆ पु. ल.देशपांडे ☆ डाॅ.मेधा फणसळकर

डॉ. मेधा फणसळकर

☆ विविधा ☆  पु. ल.देशपांडे ☆ डाॅ. मेधा फणसळकर ☆

स्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु. ल. देशपांडे)

“क्रियापदाचे मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेले कर्म किती मोठे आहे त्याच्यावर अवलंबून असते.”

हे वाक्य ज्या कर्तृत्ववान कर्त्याने उच्चारले त्याचे स्वतःचेच कर्तृत्व इतके महान आहे की अवघ्या काही मिनिटात त्याच्यातील व्यक्तीचीच काय पण वल्लीचाही परिचय करुन देणे म्हणजे ‛नस्ती उठाठेव’ करण्यासारखे आहे.

पु. ल., पी.एल्. किंवा भाई या संबोधनाने जी व्यक्ती ओळखली जाते ती म्हणजे महाराष्ट्राचे कोट्याधीश ‛पु. ल. देशपांडे.’! त्यांची जन्मशताब्दी या वर्षात आपण साजरी करत आहोत.

कोट्याधीश या उपाधीबद्दल एकदा पुलना विचारले असता ते म्हणाले,“विनोद हा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. माझ्या बाबतीत म्हणाल तर मला अत्यंत गंभीर प्रसंगी देखील नेमकी एखादी विसंगती दिसते आणि विनोदनिर्मिती होते.” याच विसंगतीतून त्यांनी विनोदी लेखन, नाटके, चित्रपटांसाठी पटकथा – संवादलेखन अशा विविध साहित्यप्रकारांची ‛पुरचुंडी’ आपल्या गाठीशी बांधली.

अंमलदार, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, ती फुलराणी, विठ्ठल तो आला आला सारखी नाटके, अपूर्वाई-पूर्वरंग सारखी प्रवासवर्णने, असा मी असामी, बटाट्याची चाळ, हासवणूक, मराठी वाङ्मयाचा ( गाळीव) इतिहास अशी ‛अघळपघळ’ लेखननिर्मिती केली.

१९५६-५७ या कालखंडात त्यांनी नभोवाणी- आकाशवाणीसाठीसुद्धा काम केले. १९७२ मध्ये दूरदर्शनमध्ये नोकरी केली.

आता ‛उरलंसुरलं’ क्षेत्र म्हणजे संगीत! त्याची तर भाईंना आधीच उत्तम जाण आणि ज्ञान असल्याने संगीतकार म्हणूनही त्यांनी अनेक चित्रपटगीतांना संगीत दिले . ‛देवबाप्पा’ चित्रपटातील ‘ नाच रे मोरा’ हे गाणे आजही अनेकांच्या बालपणातील स्मृती चाळवते. ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटाचे तर भाई सबकुछ होते.कथा-पटकथा-संवाद-संगीत आणि अभिनयसुद्धा!

आयुष्यातील विसंगतीची ‛खिल्ली’ उडवतानाच समाजातील विसंगती नष्ट करण्याचा त्यांनी अंशतः प्रयत्न केला.सक्रिय शक्य नसले तरी अनिल अवचट यांच्या ‛ मुक्तांगण’ व वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन करणाऱ्या ‛निहार’ या संस्थेला भरभरुन आर्थिक सहकार्य दिले. हे ‛गणगोत’ मात्र त्यांनी काळजापासून जपले. म्हणूनच मैत्रीची व्याख्या करताना ते म्हणतात-

“ रोज आठवण यावी असं काही नाही

रोज भेट व्हावी असंही काही नाही

पण मी तुला विसरणार नाही

ही झाली खात्री

आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री

शेवटी काय हो,

भेटी झाल्या नाहीत तरी

गाठी बसणं महत्वाचं !”

हीच गाठ भाई तुम्ही आम्हा रसिकजनांच्या हृदयात इतकी घट्ट मारली आहेत की ‛ काय वाट्टेल ते होईल’ पण ‘पु.ल.- एक साठवण’ ची आठवण पिढ्यान् पिढ्या कायम राहील.

 

©  डाॅ. मेधा फणसळकर

9423019961

≈  ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नमस्कार मंडळी ☆ श्रीमती माया सुरेश महाजन

श्रीमती माया सुरेश महाजन

☆ मनमंजुषेतून ☆ नमस्कार मंडळी ☆ श्रीमती माया सुरेश महाजन 

वाल्याकोळ्याची गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. त्याने अयोग्य जीवनप्रणाली अंगिकारिली होती. परंतु जेव्हा त्याला त्याची जाणीव झाली तेव्हां त्याने प्रायश्चित्त घेतले. परिणामतः वाल्याचा एक महान ॠषि वाल्मिकी झाला. ही गोष्ट परत-परत ऐकताना एका गोष्टीची मला तीव्रतेने जाणीव झाली.   ‘प्रायश्चित्त’! हे एव्हडे सोपे होते का? कि पाप करायचे-प्रायश्चित्त घ्यायचे आणि परत पुण्यवान् व्हायचे!नाही मंडळी!यात खरी विचार करण्याची आणि घेण्याची गोष्ट आहे ती म्हणजे- ‘चुकीची जाणीव होणे- पश्चात्ताप होणे आणि प्रायश्चित्त घेणे; म्हणजेच सुधारणा करणे. चुकीची पुनरावृत्ती न होऊ देणे-हेच खरे प्रायश्चित्त आहे.

आज या कोरोनाच्या धांदलीत ही गोष्ट आणि त्यातील स्व-सुधारणेची गोष्ट परत-परत डोके वर काढत आहे. तुम्ही म्हणाल काय संबंध? तर विचार करता असे लक्षात येते की चूक-जाणीव- पश्चात्ताप-प्रायश्चित्त -ही साखळीच माणसाला सुधारण्याच्या मार्गावर नेते आणि त्यायोगे प्रगती साधली जाते.

कोरोना भारतात प्रवेशला ही काही आपली चूक नाही.  परंतु त्याचा फैलाव इतक्या वेगाने झाला , होतो आहे ही मात्र नक्कीच आपली चूक आहे. कारण आपल्यात स्वयंशिस्त, स्व-अनुशासन या गोष्टींची कमालीची कमतरता आहे. साध्या-साध्या गोष्टींतूनही ही कमतरता जाणवते. फक्त प्रशासनाला दोष देऊन काय ऊपयोग? प्रशासनाने काळजीपूर्वक आखलेल्या योजना कागदावर किती छान वाटतात !पण मग त्यांचे अपेक्षित परिणाम का दिसत नाहीत? तर ऊत्तर परत तेच आहे-स्वयंशिस्त नाही. शिस्त आपण तर पाळायलाच हवी, परंतु इतरांनाही पाळायला लावायला हवी.  आज तर ‘ माझ्यापुरतेच ‘ पहाण्याचा अलिखीत नियमच झाला आहे जणूं!वेगाने पसरणार्या या महामारीचा आवेग एकट्या-दुकट्याला आवरणारा नाही. समूह-संसर्गाला समूहशक्तिच आटोक्यात आणु शकते. विलगीकरण हाच जर उपाय आहे तर तो तितक्याच प्रखरतेने पाळायलाच हवा. विलगीकरण हे आपले प्रायश्चित्त आहे. ते जितक्या काटेकोरपणे पाळले जाईल तितक्या लवकर वाल्याकोळ्याचे पाप नाहीसे होईल. प्रायश्चित्तातील कठोरताच शांत जीवनाचे  फळ देईल.

म्हणूनच स्वयंशिस्तीचा झेंडा फडकवायला हवा.  स्वयंशिस्त हीकाही आताचीच गरज आहे असेही नाही. सदा  सर्वदा सदाचारी समाज घडविण्याची ती एक गुरूकिल्ली आहे किंवा व्यवहारी भाषेत बोलायचे यर असे म्हणता येइल की काही दिल्याशिवाय काही मिळत नसते. म्हणूनच स्वयंशिस्त पाळा, म्हणजेच स्व-संतुलन राखा तरच प्रगती होइल. प्रत्येक गोष्ट जशी मला हवी तशीच ती दुसर्यालाही हवी हे ध्यानात घेतले पाहिजे. माझे सुख मिळवण्यासाठी मी इतरांच्या सुखाला पायदळी तुडवू नये.  ‘स्व’ ला अनुशासित ठेवा तरच निरोगी , सभ्य, स्वच्छ, सदाचारी समाज निर्माण होईल.

©  सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘वेळ झाली भर माध्यान्ह’ कवितेचं  रसग्रहण ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆  काव्यानंद ☆ ‘वेळ झाली भर माध्यान्ह’ कवितेचं  रसग्रहण ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

ख्यातनाम कवी अनिल यांनी शब्दबद्ध केलेले आणि यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत आपल्या धारदार आणि नाविन्यपूर्ण आवाजाने उषाताई मंगेशकर यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.

एरवी सकाळ आणि संध्याकाळ यांचं अप्रूप असणाऱ्या कवींनी उपेक्षिलेली अशी ही माध्यान्ह! यशवंत देवांनी हीच माध्यान टिपून   या गाण्यात पेरली आहे. माध्यान हा शब्द या गीताची लय छान संभाळतो.‘प्रीतीच्या फुला’ या शब्दांवर समेची टाळी येते.

मथळ्यावरुन हे गाणे प्रियकराला उद्देशून असावे असे वाटणारे हे गीत एका कामगार स्त्रीने आपल्या लेकराला उद्देशून म्हटले आहे त्यामुळे हे प्रेम गीत आर्त गीत झाले आहे.

कवी गीतामध्ये ज्या माध्यानीचे वर्णन करतात ती ग्रीष्म ऋतूतील तळपणारी, सर्वांगाची लाहीलाही करून टाकणारी अशी आहे. सूर्य माथ्यावर आल्याने त्याची किरणे जास्ती दाहक आहेत, त्यामुळे तिचे बाळ अर्थात तिचे प्रीतीचे फुल कोमेजून जाईल अशी तिला काळजी वाटते.

उन्हाची तीव्रता दाखवण्यासाठी कवीने ‘तप्त दिशा झाल्या चारी,भाजतसे तसेच सृष्टी सारी’अशा ओळी लिहिल्या आहेत.

निसर्गापुढे मानव हतबल असतो हे तिला गृहीत आहे. म्हणून ती मुलाबरोबर परिस्थितीशी मिळतंजुळतं घ्यायचा आग्रह धरते आहे. ‘कसा तरी जीव धरी’ या ओळीतून ते लक्षात येते.

वारे उष्मा वाहतात आणि बाळाच्या नाजूक देहाला पोळतात. त्यामुळे ती बेचैन आहे.

तिची अगतिकता कवीने फार अचूक शब्दात दर्शवली आहे. तिच्याच पायात पडणारी तिची सावली तिच्या बाळाचे पांघरूण होऊ शकत नाही तसेच तिच्या डोळ्यातील अश्रू हे डोळ्यातच आटतात त्यामुळे ती बाळाची तृषा ही भागवू शकत नाही.‘दाटे दोन्ही डोळा पाणी आटेनयनातच सुकुनी’ या ओळीतून ते दाखवले आहे.

या परिस्थितीत आशेचा एकही किरण तिला दिसत नाही त्यामुळे ती चिंताक्रांत आहे या नीरभ्र आकाशाखाली तिला एक मृगजळ दिसतयं तेही फसव!

तिची खूप तगमग होते आहे पण आयुष्याशी तडजोड करायला हवी म्हणून ती आपल्या बाळाला आपल्या सोबत आनंदाचं एखादं गाणं गुणगुणायला प्रवृत्त करते ‘चल रंगू सारंगात’ या ओळी तो अर्थ देतात

सारंग हा माध्यानी गाण्याचा राग आहे म्हणून या रागाचा उल्लेख कवीने केला आहे.

माध्यान या शब्दावर उषा ताईंचा ठहराव आणि उन शब्दाची मिंड घेऊन गायकी सगळं काही कमाल!…..

कवी अनिल संगीतकार यशवंत देव आणि उषाताई या त्रिकुटाचा हे एक अजरामर गीत!

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

[email protected]

9822553857

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आरसा……  ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ आरसा…… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

आरसा! प्रत्येक गोष्टीचे प्रतिबिंब दाखवणारा आरसा 6000 वर्षापूर्वी इजिप्शियन लोक polished copper आरसा म्हणून वापरत होते .साधारणपणे एकोणिसाव्या शतकात आपण वापरतो तो आरसा अस्तित्वात आला

प्राचीन काळातील शिल्प पहाताना, अजंठा वेरूळ येथील मूर्ती पाहाताना मनात प्रश्न पडे की तेव्हा आरसा कुठे होता पण त्यासंबंधी वाचन केल्यावर असे लक्षात आले की तेव्हा आरसा म्हणून सोने ,चांदी किंवा तांबे अशा धातूंचे चकचकीत सपा ट पृषठभाग आरसा म्हणून वापरले जात असत!

पौराणिक गोष्टींमध्ये पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाला आरसा म्हणून वापरले जाई. पंचतंत्राच्या गोष्टीत पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाला दुसरा सिंह समजून डरकाळ्या मारणारा सिंह आपण पाहिला !थोडक्यात काय आपलं तोंड पहाणे म्हणजे आरशात तोंड बघणे होते.

‘डोळ्यात वाच माझ्या तू गीत भाव ना चे…. ‘हे गाणे ऐकताना असे हे प्रतिबिंब आपण दुसऱ्याच्या डोळ्यात पाहतो. दुसऱ्याला एखाद्या गोष्टीविषयी काय वाटतं ते त्याच्या चेहऱ्यावरून व डोळ्यावरून ही कळते .चेहरा हा मनाचा आरसा आहे म्हणतो ते यासाठीच! एखादी व्यक्ती आवडत नसते तरी समोर आल्यावर हसरा चेहरा ठेवून आपण तिचे स्वागत करतो, मनातलं चेहऱ्यावर उ म टू देत नाही. अशावेळी आरशामागे ज्याप्रमाणे मुलामा लावलेला असतो त्याप्रमाणे आपण मनाला आतून बंद करून घेतो आणि  समोरून दिसणारा भाग मात्र आरशाप्रमाणे  चकचकीत दिसतो.

आरसा वरून मला चितोडची राणी पद्मिनी ची गोष्ट आठवली. तिची अभिलाषा धरणाऱ्या

अल्लाउद्दीन खिलजी ला राणा प्रतापने पद्मिनी चे आरशातील प्रतिबिंब दाखवून बरोबर उत्तर दिले .आरशात जर ती इत की सुंदर  दिसते तर प्रत्यक्षात ती किती सुंदर असेल या कल्पनेने खिल् जी भारावून गेला आणि चितोड वर स्वारी केली पण सौंदर्याबरोबरच स्वाभिमान असणाऱ्या पद्मिनी ने जोहार करून आपले सौंदर्य अजरामर केले!

आपण वापरतो तो आरसा आपल्या देशात साधारणपणे एकोणिसाव्या शतकात आला आणि स्त्रियांच्या सौंदर्य प्रसाधनात आरशाची भर पडली. त्याकाळी स्त्रियांकडे एक आरसा पेटी असे. खोपा आंबाडा घालताना केस विंचरणे ,भांग पाडणे हे खाली बसून आरशात बघून केले जाई. माझ्या आजीची अशी फणी क रंड्या ची  लाकडी पेटी होती त्या पेटीवर छान नक्षी होती. पेटी उघडली की समोर आरसा आणि पेटीत काजळ कुंकवाचा करंडा आणि फणी ठेवण्यासाठी छान मखमली जागा होती. तिच्याकडे एक हस्तिदंती फणी पण होती. या सर्व गोष्टींची मला गंमत वाटत असे .आजी वेणी घालताना मी तिच्यासमोर बसून सर्व निरीक्षण करीत असे.

पुढे गोदरेज ची किंवा मोठा आरसा असणारी लोखंडी कपाटे बाजारात आली आणि लोक अशी कपाटे  खरेदी करू लागले. पाच वारी साडी बरोबरच संपूर्ण साजशृंगार त्यात बघता येई.

असा हा आरसा जीवनात महत्वाची जागा व्यापू लागला. इतका की ऑफिसला जाताना छोट्याशा पावडरच्या डबीतही हा आरसा सामावला गेला!

आरशाचे विविध प्रकार आपल्याला म्युझियम मध्ये बघायला मिळतात. एखाद्या आरशात आपण जाड बुटके दिसतो तर एखाद्या आरशात अा पन एकदम बारीक आणि उंच दि स तो. एखादा आरसा आपल्या प्रत्येक हास्या गणिक  वेगवेगळे रूप दाखवतो की ते बघूनच आपल्याला हसू येते

पूर्वी बेल्जियम काचेचे आरसे प्रसिद्ध होते .त्याची काचही चांगली असे आणि त्यावर बाजूने नक्षीकाम ही केलेले असे. मोठे मोठे आरसे लावून राजे महाराजांचे दिवाणखाने ही सजत असत. काही सिनेमातूनही अशा

आरशांचा उपयोग केला गेला. प्यार किया तो डरना क्या? गाण्याच्या नृत्यावर असंख्य चेहरे प्रतिबिंबित होणारा मोठा सेट तेव्हा उभारला गेला होता.

आरशासारखे स्वच्छ निर्मळ मन असावे किंवा एखाद्याचा स्वभाव आरशासारखा निर्मळ आहे असे म्हंटले जाते . अशा सुभाषितवजा वाक्यातून ही आरशा बद्दलची संकल्पना साकार होते. मनात असलेले वाईट विचार ,द्वेष ,रा ग यांची मनाचा आरशावर आलेली  काजळी प्रयत्नपूर्वक पुसावी लागते. मूल लहान असते तेव्हा त्याचे हास्य  आरशासारखे स्वच्छ व निर्मळ असते. तो मनाचा आरसा नितळ असतो ,त्यावर चरे ओरखडे उमटलेले नसतात. जसजसे मोठे होत जाते तसे त्याचे बालपण जाऊन विकार वाढू लागतात आणि मनाच्या आरशाची स्वच्छ प्रतिमा धुरकट होत जाते ही क्रिया नकळत घडत असते!एकदा का आरशाला तडा गेला की कितीही सांधले तरी तो तडा पूर्ण नाही सा होत नाही !

त्याप्रमाणेच हा मनाचा आरसा जपावा लागतो. तडा जाऊ न देता स्वच्छ प्रतिमेसह!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ≈  ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चूल…. ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ विविधा ☆ चूल….. ☆ श्रीमती अनुराधा फाटक  ☆ 

जिच्यामध्ये अग्नी प्रज्वलित केला जातो ती जागा म्हणजे चूल.चूल ही सामान्यतः स्वयंपाकघरात असते.तिच्यावर कुटुंबाचा स्वयंपाक केला जातो म्हणून चुलीला देवत्व प्राप्त झाले आहे त्यासाठीच चुलीला पाय लावीत नाहीत.पूर्वी चूल सारवून तिच्यावर रांगोळी घातली जात असे.अग्नीकुंडाचे एक स्वरुप म्हणून चूल ओळखली जाते.

चूल हा मानवाच्या सांस्कृतिक विकासाचा महत्वाचा टप्पा दाखवते.प्रारंभी माणसे विस्तवात अन्न भाजून खात असत.त्यानंतर तीन दगडांची चूल आली.बलुतेदारीची पध्दत अस्तित्वात आल्यावर कुंभार मातीच्या चुली बनवू लागले.नंतर लोखंडाची,लोखंडी बादलीतील चूल आली.फिरस्तीचे लोक हलविता येणारी ती चूल वापरू लागले.आता गॅसच्या शेगड्या सर्वत् वापरात असून विद्युत चूल आणि त्या पाठोपाठ सौर चूल आली.

कितीही गरीबी असली तरी चूल अडवता येत नाही .काही ना काही शिजवावेच लागते.कधी कधी मात्र चुलीला वाटाण्याच्या अक्षदाही द्याव्या लागतात

म्हणजे उपाशी रहावे लागते.याला चुलीला विरजण पडणे असेही म्हणतात.अत्यंत दारिद्र्यावस्था येण्याला चुलीत मांजरे व्यालेली अवस्थाही म्हटले जाते.दारिद्र्यात भर पडणे म्हणजे चूलजाळ आणि पोटजाळ एक होणे !

काही वेळा माणसाची बुध्दी नको ते काम करते त्यामुळे नुकसान होते अशावेळी तुझी अक्कल चुलीत गेली होती कां?असे विचारले जाते.

चूल आणि स्त्री यांचे नाते अतूट असल्याने बऱ्याचवेळा स्त्रिया आपले विचार चुलीत सारतात म्हणजे गप्प बसतात, चुलीत डोके खुपसून स्वयंपाक करतात.

आता मात्र स्त्री बाहेर पडल्याने चुलीत डोके खुपसण्याइतकेच तिचे जगणे मर्यादित राहिले नाही.

जोपर्यंत मानवी जीवन आहे तोपर्यंत चूलीचे अस्तित्व असणार आहे.

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ हवंच सारं सोसायला’ या कविते विषयी…. ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ क्षण सृजनाचा ☆ हवंच सारं सोसायला’ या कविते विषयी…. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 


परवा भाजी आणायला गेले होते.
मागून आवाज आला,‘बाई.. बाई… ओ बाई.. मी चमकून मागे बघितलं. बाई नमस्कार. मी सिद्दीकी … ओळखलत का?’

अगं किती बदललात तुम्ही! कशा ओळखणार?’ असं म्हणता म्हणता एकदम ओळखलं तिला. आमच्या कॉलेजची ७७- ७८ सालची विद्यार्थीनी. मोठी विनयशील मुलगी. सोशल डिस्टनिंग होतं म्हणून दुरून हात जोडून नमस्कार. एरवी भर रस्त्यातसुद्धा पायावर डोकं ठेवायला संकोचली नसती.

इथेच असतेस का?’

नाही ढालगावला. सहा महिन्यापूर्वी रिटायर्ड झाले. मुलगा इथे आय. सी. आय. सी. आय. बँकेत असतो. गेल्या वर्षीच बदलून आलाय. सी.ए. केलाय त्याने आनंद, सुख, तृप्ती तिच्या देहावरून निथळत होती जशी. तिच्याबरोबर तिचा चार-साडे चार वर्षाचा गोंडस नातू होता.

रईस, ये मेरी मॅम है. आपल्या नातवाला माझी ओळख करून देत ती म्हणाली. से गुडमॉर्निग… इतरांना शिकवणार्‍या आपल्या आजीलाही शिकवणार्‍या कुणी मॅम आहेत, या विचाराने काहीसा गोंधळून, विस्फारीत नेत्रांनी माझ्याकडे पहात तो गुडमॉर्निग म्हणतो.

हा माझ्या पहिल्या मुलाचा मुबारकचा मुलगा॰ कॉलेजमध्ये असताना डिलिव्हरी नव्हती का झाली!

त्यानंतर ख्याली -खुशाली विचारणं झालं. फोन नंबरची देवाण-घेवाण झाली. बाई, घरी या ना! ती आग्रहाने म्हणाली. मुलाला गाडी पाठवाया सांगते. बघू. कधी जमतय. मी फोन करते. मी म्हंटलं. त्यानंतर खूप काही बोलून आम्ही दोघी आपआपल्या वाटेने निघालो. परतताना तिचेच विचार मनात रेंगाळत होते.

सिद्दीकी आमच्या डी. एड. कॉलेजची ७७-७८ च्या बॅचची विद्यार्थिनी. मोठी विनयशील. ती भेटली आणि कॉलेजचे ते दिवस पुन्हा आठवले. विशेषत: तो दिवस आणि तो प्रसंग.त्या प्रसंगाने माझ्या एका कवितेला जन्म दिला होता.

सिद्दीकी नुकतीच बाळंतपणाची राजा संपवून कॉलेजमध्ये येऊ लागली होती. कॉलेजमध्ये सकाळच्या सत्रात अध्यापन होई आणि दुपारी विद्यार्थिनींचे सराव पाठ होत. त्यांच्या पाठ-सरावासाठी नगरपालिकेच्या वागवेगळया शाळा घेतल्या जात. एका वर्गात 3-4 जणींचे पाठ असत. प्रत्येक वर्गावर एकेक अध्यापक पाठ निरीक्षणाचे काम करीव नंतर पाठाबद्दल चर्चा होई.

नगर पालिकांच्या अनेक शाळांची स्थिती त्या काळात बरीच दयनीय होती. अनेक ठिकाणी वर्ग खोल्यात फरशीही नसे. शेणाने सारवलेली जमीन असे. बर्‍याचदा ती उखणलेली असे. विद्यार्थीच अधून मधून ती सारवत.

त्या दिवशी अशाच एका शाळेत मी पाठ निरीक्षणाला गेले होते.पाचवीच्या वर्गावर पहिलाच मराठीचा पाठ सिद्दीकीचा होता. ती काही बोलत होती. मुलं न ऐकता दंगा करत होती. पाठाचा तास म्हणजे एक प्रकारे मुलांना दंगा करण्यासाठी मिळालेली सनदच असे. वर्ग शिक्षिकास्टाफरूम मध्ये आरामात बसून गप्पा मारत. वर्गात मुले काही न ऐकता दंगा करत. त्या वर्गातल्या फळ्यावरही लिहिलेलं नीट उठत नव्हतं. कसा-बसा तिचा पाठ झाला. मग ती माझ्याजवळ येऊन म्हणाली,‘बाई मी घरी जाऊ?‘ त्या काळात आम्ही अजून बाईच होतो. मॅडम झालो नव्हतो. मी म्हंटलं का ग? निरीक्षण नाही करणार?’

बाई बाळाला ताप आलाय. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. मी तिच्या आठीवरून हात फिरवत तिला धीर दिला आणि घरी जायची परवानगी दिली. ती घरी गेली, पण तिच्या आईपानाके विचार माझ्या मनातून काही जाईनात. इतर पाठ बघता बघता तिच्या आईपणानेच मन-विचारांचा ताबा घेतला आणि एक कविता सुचत गेली. घरी जाईपर्यंत ती पूर्णसुद्धा झाली. शीर्षक दिलं- हवच सारं सोसायला

अबोल फळा संस्कारशून्य

मख्ख भिंती , पोपडे उडालेल्या

उखणलेली जमीन

झाली आहे सारवायला

( घरचीही पण … वेळ मिळेल तेव्हा… )

निर्विकार निरीक्षक

काक दृष्टीचे

चष्म्याच्या भिंगातून

वर्मावर बोट ठेवणारे

( सासुबाईंसारखे…खोचक…बोचक बोलणारे )

केकाटणारी कारटी,

बसली आहेत, पाय पसरून

फळ्याकडे पाठ फिरवून

ओरडत किंचाळत

एकमेकांना मारत पिटत

( वाटतं आहे एक द्यावी ठेवून )

पण आवाजाला उसने मधाचे बोट लावीत

प्रेमळ स्वरात ( शक्य तितक्या )

सांगते आहे, विनवते आहे

दंगा करू नका म्हणून

तुमच्या घरातली आवडती व्यक्ती

सांग बरं बाळ…

हे सारं आवश्यकच आहे

प्रस्तावना अन् हेतूकथन,

मुलांशी प्रेमळ वर्तन

‘-बपासून +ब पर्यन्त मजल मारण्यासाठी

( कारण तेवढेच आहे औदार्य बाईंचे)

आज आपण आईची थोरवी पाहू या.

आईचा त्याग… आईची माया …

म्हणेल का बाळ मोठा झाल्यावर

आई आवडते म्हणून

रोजच त्याला येते रडवून

आता उठला असेल कदाचीत्

विसावला असेल

कुणा हिच्या तिच्या कुशीत

बोलणं विचूक होतय

बाईंच्या नजरेत अंगार फुलतोय.

वाटतय, सारं सारं सोडून

घरी जावं निघून

प्रतिपादन अन् मूल्यमापन

बाळाकडे … बाळासाठी ..

पण… पण…

सारं सारं सोसायला हवं

मन आवरायला हवं

आणखी काही दिवस तरी

पुढल्या वर्षीच्या

मिळू घातलेल्या नोकरीसाठी

आणि काहीशे रुपयांसाठी.

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 68 – जननी – जनक ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 68 ☆

☆ जननी – जनक ☆

माझ्या आईचा मी विचार करते तेव्हा मला खुपच चकीत व्हायला होतं, त्याकाळात सगळ्याच बायका गृहकृत्यदक्ष वगैरे असायच्या, माझी आई सुशिक्षित कुटुंबातली तिची आई सामाजिक कार्यकर्ती, वडील कोऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर होते, निवृत्त झाल्या वर शेती करत होते ते कोकणातले आमराई ,भातशेती वगैरे ! खुप मोठा बंगला, आईचं लग्न घाटावरच्या भरपूर शेतीवाडी असलेल्या घरात झालेलं! पण ती आम्हा सख्या चुलत सहा भावंडांना घेऊन शहरात बि-हाड करून आमच्या  शिक्षणासाठी राहिली. आजोबा त्या काळात त्या भागातले मोठे बागाईतदार, त्यामुळे आईच्या हाताखाली कायम दोन तीन बायका असायच्या पण स्वयंपाक मात्र ती स्वतः करायची ! तिनं आम्हा बहिणींना कधीच घरातली कामं करायला लावली नाहीत, ती भरतकाम, विणकाम, खुपच सुंदर करायची, हौस म्हणून मशीनवर कपडे शिवायची, सुंदर  स्वेटर विणायची! स्वयंपाकात सुगरण होती, या कुठल्याच कला तिने मला शिकवल्या नाहीत किंवा मी शिकले नाही. पण तिला वाचनाची आवड होती तिची वाचनाची आवड आमच्यात उतरली, आणि पुढील काळात मी लेखन करू लागले, फार जाणीवपूर्वक तिनं काही आमची जडणघडण केली नाही, पण आरामशीर आयुष्य तिच्यामुळे मी जगत होते हातात काॅफीचा कप, आणि जेवायला ताट ही कामवाली देत असे. आई सतत आजारी असायची तरी  तिचा कामाचा झपाटा मोठा होता.

मी स्वयंपाक लग्नानंतर करायला शिकले, लग्नाच्या आधी आजीने भाकरी करायला शिकवली होती, कधीतरी चपात्या ही करत होते….. पण तिच्या सारखं प्रत्येक पदार्थ निगुतीनं करणं मला कधी जमलं नाही पण तिच्या हाताची चव मात्र माझ्या हातात उतरली आहे. भरतकाम, विणकाम, शिवण मी ही केलंय पण तिच्या इतकं सुबक नसे….. तरीही नूतन शेटे च्या ओळीप्रमाणे आज म्हणावंसं वाटतं अस्तित्व आज माझे….त्या तूच एक कारण….आपलं अस्तित्व हे आपल्या आईवडिलामुळेच! माझं हस्ताक्षर वडिलासारखं सुंदर आहे. कुरळे केस वडिलांसारखे आहेत, वडिलांची तब्येत एकदम चांगली होती, आखाडा गाजवलेले पहिलवान होते ते!

मधुमेह, संधीवात हे आजार अनुवंशाने आईकडून आलेले, आणि आता जाणवतं हे आजार तिने कसे सहन केले असतील??

आरामशीर, सुखवस्तू आयुष्य आईवडीलांमुळे जगता आलं ही कृतज्ञता आहेच! पण मला लहानपणी आईवडीलांचा नेहमीच धाक आणि दराराच होता.

 

आई बाप असतात

फक्त जन्माचे धनी

आयुष्याचे गणित

सोडवायचे ज्याचे त्यानी

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मनातले महासागर ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ मनातले महासागर ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

मनाच्या महासागरात जेव्हा फिरून आले तेव्हा अनेक रंगांनी नटलेल्या लाटांची भेट झाली. काही ना खूप जगण्याची उमेद होती तर काही अगदी दमून गेल्या होत्या. काही निराश तर काही उत्साहाने सळसळत होत्या.

काही स्वपनात हरवल्या होत्या तर काही वास्तव्याशी चार हात करत होत्या.

काहीना हासरा मुखवटा घालता येत होता. पण काहीना खूप प्रयत्न करून ही ते जमत नव्हते.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अश्या अनेक लाटा येतात. काही सुखावून जातात तर काही आवाज न करता सगळ विस्कटून जातात. मागचा पसारा आपल्याला आवरायला सोडून जातात.

अश्या अनेक रंगांनी नटलेल्या लाटा प्रत्येकाच्या मनात दडलेल्या आहेत फक्त काहींच्या रंगबिरंगी तर काहींच्या बेरंग आहेत.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘नवलाख तळपती दीप…कुसुमाग्रज’ कवितेचं रसग्रहण☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆  काव्यानंद ☆ ‘नवलाख तळपती दीप…कुसुमाग्रज’ कवितेचं  रसग्रहण ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

विरह आणि प्रेम ही भावना एखाद्या व्यक्तीपुरतीच मर्यादीत असत नाही. एखादा प्रसंग, एखादे ठिकाण, एखादी आठवण ही सुद्धा मनात अशी घर  करून बसलेली असते की मनाला थोडासा धक्का द्यायचा अवकाश, त्या उफाळून वर येतात. घडून गेलेल्या प्रसंगाची,  सहवासाची, आवडत्या ठिकाणाची आठवण आल्याशिवाय रहात नाही. आपले मन किती संवेदनशील आहे, आपल्यावर कोणते संस्कार झाले आहेत आणि आपण ते किती टिकवून ठेवले आहेत यावरच ही प्रेमाची, विरहातून निर्माण होणार्या आर्ततेच्या भावनेची तीव्रता अवलंबून असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कविवर्य कुसुमाग्रजांची ‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ’ ही कविता.

जीवनाविषयी अखंड आशावादी असणारा, तार्यांशी करार करणारा, क्रांतीचा जयजयकार करणारा हा कवी जेव्हा स्वतःच्या वैयक्तिक सुखदुःखाशी समरस होतो, अंतर्मुख होतो तेव्हा …

परस्पर विरोधी परिस्थितीचे नेमके वर्णन कवीने या कवितेत केले आहे. प्रलोभन आणि संयम यात होणारे द्वंद्व  कवितेत सहजपणे दिसून येते. नेमक्या शब्दांच्या वापरामुळे कवी मोजक्या शब्दात खूप काही सांगून जातो. विजेच्या दीपांना तारकादळे म्हटल्यामुळे त्यांची संख्या, व्याप्ती सहजपणे डोळ्यासमोर येते. श्रीमान इमारतींचा थाट हे शब्द वाचल्यावर मरिन ड्राइव्ह सारखा सागर किनारा आठवत नाही का ? लालस विलासापेक्षा करूण विलासच मन आकृष्ट करून घेतो.

लयबद्ध, प्रवाही अशी ही कविता वाचून झाल्यावर आपण त्यातून लगेच बाहेर पडू शकत नाही. आपण ती कविता पुन्हा वाचतो आणि मनात विचारांचे तरंग उठू लागतात. आपल्यालाही काहीतरी आठवते. हे आठवायला लावणं, विचार करायला लावणं हेच कवितेचं यश आहे.

जाता जाता आठवण होते ती आणखी एका कवितेची. स्वा. सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या कवितेची. ‘नभी नक्षत्रे’ किंवा ‘प्रासाद इथे……आईची झोपडी प्यारी’ या सारख्या ओळी सहज आठवतात. किंवा गदिमा यांच्या “धुंद येथ मी” या गीतातील शब्दही मनात गुणगुणले जातात. एक चांगली कविता वाचताना दुसर्या एक दोन चांगल्या कविता आठवाव्यात आणि आपला काव्यानंद वाढत जावा ही कविच्या कलाकृतीची यशस्विता नाही काय ?

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ लघुकथा संग्रह “संवेदना” अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

निवेदन –

आपण अनेक पुस्तके वाचतो. त्यातील काही पुस्तकं आपल्याला आवडतात. त्यावर बोलावं, इतरांना सांगावं, असं आपल्याला वाटतं.  कित्येकदा आपल्या पुस्तकाबद्दल इतरांशी बोलावं, आपली त्यामागची भूमिका मांडावी, असंही काही वेळा  वाटत. या वाटण्याला शब्द देण्यासाठी एक नवीन सादर सुरू करत आहोत,पुस्तकांवर बोलू काही.’  आज त्यातील पहिला लेख  सुश्री संगीता कुलकर्णी यांचा.

संपादक मंडळ – ई – अभिव्यक्ती 

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ लघुकथा संग्रह “संवेदना” अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

अनुवादित पुस्तक – संवेदना

मूळ हिंदी लेखक – डाॅ. कमल चोपडा

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

समकालीन हिंदी प्रस्थापित लेखकांमध्ये  डॉ कमल चोपडा हे एक महत्वाचं नाव. त्यांच्या हिंदीतील निवडक लघुत्तम कथांचा अनुवाद  संवेदना या नावाने श्रीमती उज्ज्वला केळकर यांनी केला आहे..

आपल्या सभोवतालचं जीवन त्यातील सहजता, गंभीरता, तर कधी कधी भयावहताही ते सहजतेने पाहतात व अनुभवतात. तसेच आपल्या भोवती घडणारे घटना- प्रसंग, ते घडवणा-या विविध व्यक्ती, त्यांचे विचार, विकार, वर्तमानात जाणवणारी सुसंगती- विसंगती, स्वार्थ, त्याग, सांमजस्य ताठरता यांचे ते सूक्ष्म निरीक्षण करतात.

श्रीमती उज्ज्वला केळकर

या त्यांच्या पुस्तकातील कथांत लक्षणीय विविधता आहे. कौटुंबिक नातेसंबंध, सामाजिक व्यवहार, सांप्रदायिक दंगे, राजकारण अशा विविध क्षेत्रांतील अनेक पैलू या कथांमध्ये आहेत. कौटुंबिक नात्यातील अनेक प्रकारचे भावबंध त्यांनी उलगडलेले आहेत. मुलं, त्यांचे आई-वडील भावंड, सासवा- सूना या नात्यातील आत्मियता, प्रेम, जिव्हाळा त्यांच्यातील ताण-तणाव त्यातून प्रगट झालेले भाव- भावनांचे कल्लोळ या सा-याला चिटकून राहिलेले दारिद्रयाचे अस्तर त्यातूनच झरणारी आत्मीयतेची माणुसकीची जाण हे सर्व या कथांमधून प्रगट होते.

सासू-सुनेचे संबंध तर जगजाहीर… पण इथे मुलगा आणि सून यांच्यातील बेबनाव दूर करणारी सासू आहे. “ओठांत उमटले हसू– मूळ कथा छिपा हुआ दर्द ” या कथेत तर गावाहून सासू-सास-यांना भेटायला आल्यावर घरात फक्त मक्याचचं पीठ शिल्लक आहे बाकी काही नाही हे कळल्यावर…आम्ही फक्त तुमच्याच हातच्या मक्याच्या रोट्या खायला आलो आहोत पण त्या सोबत दूध, लोणी, तूप, साखर असं काहीही घालू नका. डाॅक्टरांनी आम्हाला खाऊ नका म्हणून सांगितलयं…असं म्हणत सासूचा आत्मसन्मान जपणारी समंजस सून आहे.

पतीचा अन्याय सहन करणारी स्त्री हे चित्र तर आपल्याला जागोजागी दिसतं. ” पती परमेश्वर–मूळ कथा- पालतू ” या कथेत तर दुस-या बाईकडे जाण्यासाठी बायकोकडे पन्नास रुपये मागणा-या नव-याचे पाय सुपारी देऊन गुंडाकडून निकामी करणारी व नंतर त्याला औषधोपचार करून भाजीच्या गाडीवर बसवून त्याला कामाला लावणारी व माझा पती ” पती परमेश्वर ” असेही म्हणणारी विरळा बायको भेटते…. दारूडा नवरा मेल्यानंतर आठ दहा वर्षांचा मुलाला सोडून दुसरा घरोबा करणा-या आईचं दुःख समजून घेणारा..आपल्याला सोडून गेल्यावरही आपल्यात कटुता येऊ न देणारा ” असेल तिथे सुखी असो– मुळ कथा– जहाँ रहे सुखी रहे ” अशी इच्छा बाळगणारा मुलगाही येथे आपल्याला भेटतो..

सांप्रदायिक दंग्याच्या पार्श्वभूमीवरच्या अनेक कथांही यात आहेत. पण प्रत्येक कथेचा रंग वेगळा सांगण वेगळ…” विष-बिज ” मूळ कथा विष-बिज मधील म्हातारी म्हणते लूटमार, आगं लावणं यामुळे तुमच्या धर्माची प्रतिष्ठा कशी वाढेल? उलट अशा प्रत्येक घटनेतून तुमच्या शत्रूंची संख्याच वाढत जाईल आणि मग ही आग तुमच्या घरापर्यंत, तुमच्या मुलांबाळांपर्यंत पोचेल….

तर “तपास–मूळ कथा- शिनाख्त ” या कथेत पोलिसांची कुत्री त्या भागातला एक कुख्यात गुंड एक आमदार एक गुन्हेगार यांच्यापर्यंत पोचतात. इन्स्पेक्टर आझाद आपल्या अधिका-याला अहवाल सादर करतो. खरे गुन्हेगार कोण? हे कळल्यावर तो अधिकारी म्हणतो तुला ‘ तपास ‘ नाही ‘ तपासाच नाटक ‘ करायला सांगितलं होतं. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतो माझा तपास पूर्ण झालाच नव्हता. चौथ्या गुन्हेगारापर्यंत मी पोचलोच नव्हतो. चौथा गुन्हेगार पोलिस म्हणजे आपण..

आजारी मुलाच्या औषधपाण्यासाठी पैसे हवे असलेला एक सामान्य माणूस..पैशासाठी बस मध्ये बाँम्ब ठेवायला तयार होतो. उतरता उतरता त्याला एका लहान मुलाचं रडणं ऐकू येतं. त्याला ते आपल्याच मुलाचं वाटतं व तो बस मध्ये बाँम्ब आहे हे सगळ्यांना सांगून खाली उतरायला लावतो. लहान मुलाचे रडण्या- हसण्याचे आवाज आपल्याच मुलासारखे कसे वाटतात? मग ते कुठल्या का धर्माचे असेनात…कथा– ‘धर्म– मूळ कथा– धरम ‘

‘सफरचंद– मूळ कथा– फल’ व ” पैसा आणि परमेश्वर — मूळ कथा–पैसा और भगवान ” या कथांत तर मुलांचे मन, त्यांना पडणारे गमतीदार प्रश्न मांडले आहेत. ” पैसा व परमेश्वर ” या कथेत तर देवाला पैसे टाकताना पाहून ‘ देव भिकारी आहे का? ‘ त्याला पैसे टाकून त्याच्याकडे भिका-यासारखं काही का मागतात? त्याला जर पैसे हवे असतील तर तो आपल्या जादूने पैशाचा ढिग निर्माण करणार नाही का? असं विचारणारा व विचार करायला लावणारा निरागस पिंकू इथे आहे…

अशा अनेकविध कथांतून सांप्रदायिक कट्टरतेच्या दरम्यान सद्भभावना आणि मानवी मूल्यांच्या जपणुकीचा आशय अतिशय सुंदररित्या मांडलाय..विविध पातळ्यांवर विविध अंगाने होणा-या शोषणाचे अनेक रूपरंग त्यांच्या या कथांतून प्रगट झाले आहेत..

डाॅ. कमल चोपडा यांच्या कथा जीवनातील, लोक व्यवहारातील, आचार-विचारातील विसंगतीवर नेमकं बोट ठेवते व मोजक्याच शब्दांतून त्यांचं मार्मिक दर्शनही घडवतं..

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

ठाणे

मो 9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print