मराठी साहित्य – विविधा ☆ वृक्षसखी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

संक्षिप्त परिचय

शिक्षण- बी. एस सी. (जियोलॉजी)

साहित्य – ‘अकल्पित’ कथासंग्रह आणि ‘श्रावणसर’ कविता संग्रह प्रकाशित.

विजयन्त, विपुलश्री,दै.केसरी, सत्यवेध, उत्तमकथा, ऋतुपर्ण, आभाळमाया यासारख्या मासिके, दिवाळी अंकात,पेपरमधून कथा, कविता, विविध लेख प्रसिद्ध झाले आहेत. राष्ट्र सेविका समितीच्या हस्तलिखितात ६-७ वर्षे कथा , कविता लेखन समाविष्ट. अनेक आनलाईन संमेलनात कविता वाचन केले.

सांगली आकाशवाणी वरून अनेक कार्यक्रमांचे लेखन व सादरीकरण.

‘ओवी ते अंगाई’ या सांस्कृतिक कार्यक्रमास लेखन सहाय्य व सादरीकरण.अंदाजे ७५ प्रयोग केले.

satsangdhara.net  या आध्यत्मिक साईटसाठी श्रीमत भागवत पुराण आणि श्रीदेवी भागवत या ग्रंथाचे भावार्थ वाचन केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात(सांगली) कविता सादरीकरण आणि संमेलनाच्या कथासंग्रहात कथा प्रकाशित.

साहित्य भूषण (कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक), साहित्य भूषण(नाशिक) चा ‘गोदामाता’ पुरस्कार’ , कथालेखन,कथावाचन, चारोळी पुरस्कार.

विविधा: वृक्षसखी – सौ.ज्योत्स्ना तानवडे ?

“वसुधा, खूप छान वाटलं बघ तुला अशी पारावर निवांत बसलेली पाहून.अशीच आनंदात रहा. अग,तुझ्यामुळेच माझे आजचे हे रूप आहे. वसुधाने चमकून वर पाहिले. तिच्या डोक्यावरचा गुलमोहर बोलत होता.

“अगदी खरे आहे हे वसुधा,” शेजारचा बहावा बोलला.वसुधा त्याला निरखू लागली. पिवळ्या घोसांनी पूर्ण लगडला होता.ती नाजूक झुंबरे वाऱ्यावर डोलत होती.

तो म्हणत होता,”आमच्या दोघांचे सुरवातीचे रूप आठवते ना? मोठ्या धुमधडाक्यात या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण झाले. या दोन खड्ड्यात माझी आणि या गुलमोहराची स्थापना झाली. हार-तुरे- फोटो- भाषणे- गर्दी सगळे सोपस्कार झाले.पण पुढे काय? पुढे कोणी आमच्याकडे फिरकले सुध्दा नाही.आमच्या बाजूच्या रोपांनी सुकून माना टाकल्या. अधून-मधून पडणाऱ्या पावसाने आम्ही कशीबशी तग धरून होतो. तेव्हा तू आमच्या मदतीला धावलीस. आमची किती काळजी घेतलीस. म्हणूनच आज आम्हाला दोघांनाही हे देखणे रूप प्राप्त झाले आहे.”

वसुधाला सर्व आठवत होते. मुळातच वसुधा म्हणजे झाडाझुडपांची, फळाफुलांची प्रचंड आवड असणारी एक निसर्ग वेडी होती. तिने आपल्या बंगल्याच्या दारापुढची बाग लहान मुलाला जपावे तशी सांभाळलेली होती. वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे,फळझाडे नीट आखणी करून लावली होती. योग्य खत-पाणी, वेळच्यावेळी छाटणी करून त्यांना छान आकार दिला होता. ती बागेला खूप जपत असे. त्यातच वृक्षारोपणात गेटजवळ लावलेल्या दोन रोपांनी तिचे लक्ष वेधून घेतले. त्यांची परवड बघून तिला खूप वाईट वाटले.ती त्या रोपांची पण आता नीट काळजी घेऊ लागली. हळूहळू जोम धरून त्यांनाही बाळसे येऊ लागले.

वसुधाने घरावरील छतावर पडून वाहणारे पावसाचे पाणी एका मोठ्या टाकीत साठवायला सुरुवात केली.त्यातून वाहणारे जास्तीचे पाणी बोअर जवळ पाझरखड्डा  करून त्यात  सोडले.बागेच्या पाण्याची सोय झाली. बागेच्या एका कोपर्‍यात खड्डा काढून त्यात घरातला ओला कचरा, बागेतले गवत, पालापाचोळा टाकायला सुरुवात केली. छान खत तयार होऊ लागले. घरचे खतपाणी मिळाल्याने झाडे फुलाफळांनी लगडली. दारापुढची गुलमोहर बहवा जोडी सुद्धा लाल पिवळ्या फुलांनी बहरून रंगांची उधळण करू लागली. वसुधाने या दोन्ही झाडांना छोटे-छोटे पार बांधले. येणारे-जाणारे त्यावर विसावू लागले.वसुधाच्या बागेत वेगवेगळे पक्षी, फुलपाखरे भिरभिरू लागली.

वसुधाला निसर्गाची खूप ओढ होती.त्यामुळे वायु प्रदूषण, जल प्रदूषण, वृक्षतोड, लागणारे वणवे यांच्या बातम्यांनी तिला खूप वाईट वाटे. निसर्ग आपल्याला किती भरभरून देतो मग आपण त्याची तितकीच जपणूक केली पाहिजे. प्रत्येकाने घराबरोबरच  घराबाहेरचा परिसर स्वच्छ राखला पाहिजे. आपल्या मुला-बाळां प्रमाणेच झाडांची, नदी-नाल्यांची, प्राणिमात्रांची काळजी घेतली पाहिजे. ते सुद्धा आपले जिवलग आहेत अशी तिची भावना होती. तिच्या घरा पुढील रस्ता वृक्षतोडीमुळे उघडा बोडका रूक्ष झाला होता.त्यामुळेच तिच्या घरापुढची सुंदर फुललेली बाग एखाद्या ‘ओअॅसिस’ सारखी होती. येणाऱ्या-जाणाऱ्याचे पाय आपोआप तिथे रेंगाळत. कौतुकाने बाग न्याहाळत. लाल-पिवळ्या वैभवाने बहरलेली दारापुढची जोडगोळी तर रस्त्याचे आकर्षण बनून गेली होती.

अशी ही वृक्षवेडी वसुधा.बागेत छान रमायची. आपले प्रत्येक सुखदुःख त्या झाडांशी बोलायची. त्यांचा सहवास तिला मोठी सोबत वाटायची.’ वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हे प्रत्यक्षात जगणाऱ्या वसुधाचा ध्यास प्रत्येकाला लागायला हवा. आता तर पाऊसही पडतो आहे. ओली माती नवीन रोपांच्या प्रतीक्षेत आहे. मग काय मंडळी,  कामाला लागू या ना !

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भक्तीसंगम ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆  मनमंजुषेतून : भक्तीसंगम ☆ श्री अमोल अनंत केळकर

मंडळी नमस्कार ??

आषाढ महिना संपत आला की धरण क्षेत्रातील पावसाने वाढलेल्या पाण्याच्या बातम्या लक्ष वेधून घेतात. अमुक पूल पाण्याखाली गेला, अमुक धरणं  क्षमतेच्या इतकी भरली , तमुक गावाचा संपर्क तुटला , या धरणातून अमुक तमुक क्षमतेचा विसर्ग चालू , हा बंधारा भरून वाहू लागला  इ इ.

अशावेळी  अनेक ठिकाणी  एक अपूर्व  दृश्य पहावयास मिळते.  यात प्रामुख्याने उल्लेख करता येईल तो म्हणजे नरसोबावाडीच्या  (जिल्हा. कोल्हापूर ) ” दक्षिणद्वार ” सोहळ्याचा कृष्णा आणि पंचगंगा  यांच्या संगमावर असलेले नरसोबावाडी हे एक पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र. कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसाने पंचगंगा ( जणू  पाच भगिनी) दुथडी भरून वाहू लागते. त्याचवेळी सातारा, सांगली  जिल्ह्यातील पावसाने  महाबळेश्वर, कोयना पाणलोट क्षेत्र, कोयना धरणातील पाण्याचा उत्सर्ग, चांदोली धरणातील उत्सर्ग  यामुळे  कृष्णा, कोयना, वारणा या नद्या आनंदाने फुलून जाऊन पात्राच्या बाहेर पडून दक्षिण दिशेकडून नरसोबावाडीला  येतात आणि एका अनोख्या भेटीसाठी  ‘सप्त कन्या’ आणि त्यांची ‘कृष्णा माई’ सज्ज होतात.

या मिळून सा-याजणींची  “परब्रह्म भेटीलागी ”  अशी अवस्था होऊन जाते आणि मग या सगळ्याजणी  सरळ पोचतात ते  श्री नरसिह सरस्वती यांच्या ‘ मनोहर पादुकांवर ‘ जलाभिषेक करण्यासाठी “शक्ती आणि भक्ती  यांचा हा  अनोखा संगम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चा जयघोष करत मग इतर भाविक  या भक्ती संगमाचा “याची देही ” अनुभव घेऊन भक्तीरसात चिंब होऊन जातात.

असा हा विलक्षण  दक्षिणद्वार सोहळा, दरवर्षी पावसाळ्यात दोन – तीन वेळा तरी अनुभवास येतो.

नरसोबावाडीस पोहोचण्यापुर्वी  या सगळ्या नद्या वाटेत अनेक ठिकाणी   अनेक गावातील  घाटांवरच्या देवळातील ‘ चैतन्याला ‘  स्पर्श करून आलेल्या असतात. काही उदाहरणे द्यायची झाल्यास कृष्णेने  वाईच्या ढोल्या  गणपतीच्या गाभा-यात जाऊन घेतलेले दर्शन किंवा कृष्णेचेच  औदूंबरला दत्त गुरु चरणी घातलेले लोटांगण सांगता येतील.

अगदी असंच त्र्यंबकेश्वरहून उगम पावणारी ‘गोदा’ त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन नाशिकला  ‘प्रभू श्री रामचंद्रा ‘ चरणी लीन  झालेली पहावयास मिळते.  माऊलीच्या भेटीसाठी आसुसलेली ‘इंद्रायणी’ हे आणखी एक उदाहरण. अशी अनेक उदाहरणे आपणसा  इतरत्रही पहावयास मिळतात.

नद्यांना या ” परब्रह्म भेटीच्या ओढीचे”  मूळ  माझ्यामते  फार पूर्वी पासून आहे. जेंव्हा श्रावण कृष्ण अष्टमीला  छोट्या गोविंदाला घेऊन ‘ कंसा ‘ पासून सुरक्षीत स्थळी  नेण्यासाठी जेंव्हा वासुदेव निघाले होते. ‘यमुनेला’ ही वाटलंच की  या देवकी पुत्राच्या छोट्या पावलांना स्पर्श करावा असं.  सोमवती अमावस्येला  ओंकारेश्वराच्या दर्शनाहून परत बोटीतून येताना ‘श्री गजानन महाराजांच्या’ बोटीला खालच्या बाजूने छिद्र पडले. नावेत पाणी  जाऊ लागले. इतर भक्त मंडळी घाबरली पण इथे ही ‘नर्मदा’ “राजाधीराज योगीराज परब्रह्म गजानन महाराजांचे” चरण स्पर्श करण्यासाठी आली होती.

आषाढ महिन्यात पांडूरंगाच्या भेटीसाठी तहान भूक विसरून निघालेले वारकरी  आणि याच आषाढ – श्रावणात परब्रह्ममाच्या भेटी साठी निघालेल्या या नद्या  यात मला तरी काही फरक वाटत नाही .  हे कालचक्र, जीवन असेच प्रवाहित राहील जोपर्यत ‘भेटीची ही आस ‘ निरंतर राहील आणि  एकदा का ही भेट झाली की मग फक्त जाणवेल.

तुझा श्वास माझा ध्यास नुरे दुजे काही

तुझी भक्ती माझी मुक्ती भरे दिशा दाही

विश्व् आत्मरुपी  अवघे एकरूप झाले

परब्रह्म भेटी लागी धरेवरी आले

सूर सूर चैत्यनाचा रोमरोम झाले

???

देवा तुझ्या द्वारी आलो

 

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पंख ☆ सुश्री श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ पंख ☆ सुश्री श्रेया सुनील दिवेकर ☆

माझ्या मनात एक विचार आला असे वाटले की आज मला जर पंख असते तर?? मी छान नभाची सैर करून आले असते. तोडल्या असत्या ह्या सगळया साखळ्या आणि उंच भरारी घेतली असती आकाशात.

ह्या माझ्या विचारांना खिजवायला की काय कोण जाणे माझ्या समोरून एक मस्त फुलपाखरू उडत गेल, आपल्याच दुनियेत जणू हरवले होते . रंगबिरंगी त्यांचे रंगीत पंख बघून अगदी हेवाच वाटला मला त्यांचा. असे वाटू लागते की आपल्याला पण हवे होते असे नाजूक सुंदर पंख. मग आपण ही जाऊ शकलो असतो कुठे ही क्षणभरात. मस्त फुलांच्या परागांवर बसुन मध चाखला असता आणि मनसोक्त बागडलो ही असतो हा विचार मनातून जात नाही तोवर,

पक्ष्यांचा थवा उंच नभात उडताना पहिला. अगदी छान आपल्याच धुंदीत मस्त उडत होते सारे. मग मला वाटले जर आपण पक्षी झालो असतो तर कित्ती छान झाले असते. आसमंतात निळ्या आकाशात उंच भरारी घेतली असती. वरती जाऊन हिरव्यागार शालू मधे, नटलेली धरती पहिली असती. मस्त डोंगरावर बसुन वाऱ्याशी हितगुज केले असते.छान झाडाच्या फांदी वर बसुन उंच झोके घेतले असते.

मनानी झोके घेतच होते की तो वर एकदम जोरात आवाज ऐकू आला, वर पाहिले तर भव्य वीमान दिसले. ते तर जवळ जवळ गगनाला भिडले होते. अस वाटले की हातच लावते आहे आकाशाला.

मग काय माझ्या मनात आले, आपण विमानच झालो असतो तर?? मनात येईल तेव्हा रात्रीच्या वेळी चंद्र चांदण्यांनांची भेट घेता येईल.

आता मात्र स्वतः वरच हसू आले असे वाटले की पंख नसताना पण आपले मन किती ठिकाणी उंच भरारी घेऊन आले.

फुलपाखरू होऊन फुलांमधला मध चाखला, तर पक्षी बनुन झाडावर बसुन उंच झोके घेतले, विमान बनून आकाशातले तारे ही तोडले.

आता मला सांगा नक्की उंच भरारी घेतली तरी कोणी??

फुलपाखरांनी, पक्ष्यांनी, विमानांनी, की माणसाच्या मनानी.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सुश्री श्रेया सुनील दिवेकर 

मो – 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवनदान ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

☆ विविधा ☆ जीवनदान ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

कुठून आली, कशी आली आहे कोण जाणे, पण एक चांगली मोठी झालेली मांजरी घरात आली.सगळ्यांच्या मागे मागे करायला लागली.जणू काय ते आमच्याच घरातली आहे की काय असे वाटावे.रुपाने अगदी सुंदर.वा वा म्हणण्यासारखी.पिवळा, पांढरा, काळा सगळे रंग तिच्यामध्ये आलेले होते.तिचं नामकरण झालं “सुंदरी”.

आता ती आमच्या घरातली झाली.आठ-दहा दिवसात तिचं पोट मोठे दिसायला लागलं.आता हिला पिल्लू होणार याची खात्री झाली.यथावकाश एके सकाळी माळ्यावरील अडगळीतून खाली आली.पोट दिसत नव्हते.वरती धुळीत पिल्ले असणार हे पक्क.सुंदरी साठी एक मोठ्या खोक्यात अगदी मऊ अंथरूण तयार केले.अडचणीतून अलगत पिल्लांना उचलून खोक्यात ठेवून तो खोका आमच्या बेडरूम मध्ये अगदी सुरक्षित ठेवला.सुंदरीची तिन्ही पिल्ले वेगवेगळ्या रंगाची नाजूक आणि छान होती.सुंदरीला खोके पसंत पडले.त्यामुळे पिलांसह त्यात ती छान राहत होती.तिच्यासाठी खोलीचे दार किलकिले ठेवत होतो.दहा दिवसांनी पिल्लांचे डोळे उघडायला लागले.आता त्यांचं रुपडं आणखीनच गोजिरवाणा दिसायला लागलं.एके दिवशी सकाळी उठून पहातो तो पिल्ले आणि सुंदरी सगळेच गायब!खोकं मोकळं पाहून धस्स झालं.दुपारी खाण्यासाठी घरात आली.परत जाताना कोठे जाते लक्ष ठेवलं.जवळच असलेल्या हॉस्पिटलच्या गॅलरी च्या बाहेर अडचणीत ती पिलांना घेऊन गेली होती.एक पिल्लू पत्र्याच्या खोल अडचणीत अडकले होते.ते अखंड ओरडत होते.आणि सुंदरी पावसात पत्र्यावर बसून आक्रोश करत होती.बाकी दोन दोन पिल्लांकडे पुन्हा पुन्हा ही जात होती.खाण्यासाठी घरी येत होती.तिच्या पत्र्या कडच्या काकुळतीच्या येरझाऱ्या आता मात्र पहावत नव्हत्या.अडकलेल्या पिलासाठी ती कासावीस झाली होती.पिल्लु ही भुकेने व्याकुळ झाली होते.राहुल आणि स्वप्नील दोघेही  पत्र्यावर चढले.खूप प्रयत्न केला पण पिलापर्यंत हात पोचत नव्हता.सुंदरीची घालमेल बघवत नव्हती डोळ्याने ती काकुळतीला येऊन जणू सांगत होती “माझ्या बाळाला लवकर काढा रेss”.रायगडावरून बाळासाठी जीव टाकलेल्या हिरकणीची ची आठवण झाली.काय करावे ते काही सुचत नव्हते संध्याकाळ व्हायला लागली.रात्र झाली तर अंधारात काहीच करता येणार नव्हते.पिलाला लवकर काढले तर ठीक नाहीतर ते मरणार असे वाटायला लागले.गडबड केली.पत्रा काढण्यासाठी डॉक्टरांची ची परवानगी घेतली.नट बोल्ट काढून पत्रा सरकवला पिल्लू बारीक झाले होते.जणू नजरेने काकुळतीने “मला माझ्या आई कडे पोचवा” म्हणत होते. सुंदरीची त्याला भेटण्याची गडबड चालू झाली.पिलाला घरात आणले.तिला आपल्या पिलाला किती चाटू आणि किती नको असे झाले होते.भुकेला जीव आईला चुपूचुपू प्यायला लागलि.एक जीव वाचवला याचा सर्वांना आनंद झाला.जीवदान मिळाले पिलाला बाकी दोन पिल्लांनाही घरात आणले.

तीनही पिल्ले सुंदरी सह मजेत आनंदात रहायला लागली.त्यांचे खेळ अगदी बघत रहावेत असे.कुस्तीचे सर्व प्रकारचे डाव जणू! दोन पिल्ले अगदी जड मनाने चांगल्या घरी दिली.जीवदान मिळालेले पिल्लू तिचे निरर्थक नाव ‘टिल्ली’.ते मात्र आमच्याच घरात सुंदरी बरोबर आणि आमच्या दोन कुत्र्यांबरोबर खेळण्यात दंग असते.मजेत आणि खुषीत आहे.त्याच्याकडे पाहताना त्याला जीवदान दिल्याचे समाधान आणि आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही.सुंदरी आणि टिल्ली दोघांचेही ही चेहरे आणि डोळे आमच्याशी बोलतात “गॉड ब्लेस यु”.

 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावर रे…! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

संक्षिप परिचय 

युनियन बॅंक ऑफ़ इंडिया मधून चीफ मॅनेजर पदावरुन निवृत्त. लेखन हा मनापासून जोपासलेला व्यासंग. कथा, नाट्य ललित लेखन. स्वत:च्या कथांचे कथाकथन.

तीन कथासंग्रह प्रकाशित.अनेक कथा कन्नडमधे भाषांतरीत.कथांना अनेक लेखनपुरस्कार.विविध एकांकिका,नाटकांना नाट्यलेखन पुरस्कार व प्रयोगाना वैयक्तिक व सांघिक पुरस्कार.

☆ विविधा ☆ सावर रे…! ☆ श्री अरविंद लिमये ☆

सावर रे…!  अधीरता ही एक मनोवस्था.

तान्हया वयात ऐकण्यापाहण्यातून बाळ शिकत असते.सगळं शिकायची,हाताळून पहायची,परिणामांचा अंदाजच नसल्याने तेजाळ ज्योतीलाही बोट लावून पहाण्याची अस़ोशी

हे सगळं या अधीरतेपोटीच निर्माण झालेलं असतं.ती अधीरता आतुर,उत्सुक,उत्कंठित,अशा सकारात्मक अर्थछटा ल्यालेली असल्याने घरच्या मोठ्यांच्या कौतुकाचाच विषय असते.

त्या वयातले अधीरतेपोटी केले जाणारे हट्टही बालहट्ट म्हणून हौसेने पुरवले जात असतात. तसेच या अधीरतेमुळे बाळाला इजा होऊ नये म्हणून एरवी लाड करणारी घरची वडिलधारी माणसे बाळाची निगराणीही करीत असतात.

वय वाढत जातं तसं ही निगराणी स्वत:च स्वत: करणे अपेक्षित असते. कारण अधीरता ही  या वयातही एक मनोवस्था असली, तरी तिच्या अर्थछटा बदललेल्या असतात. पूर्वीची उत्सुकता आता उतावीळणा ठरायची शक्यता असते. बेचैनी,तहानलेला,भुकेला अशा अर्थछटाही त्यात मिसळलेल्या असतात.अशावेळी केवळ उत्सुकता, उतावीळपणाने घेतलेले निर्णय अडचणीत आणायला निमित्त ठरु शकतात.अधीरतेतला अविचारी उतावीळपणा कमी करण्यासाठी समतोल विचारच बालपणातल्या घरच्या मोठ्यानी केलेल्या निगराणीची जबाबदारी तेवढयाच आत्मियतेने स्विकारणारा एकमेव पर्याय असतात.एवढा समंजसपणा असेल तर मात्र मनातली अधीरता वैचारीकतेचं अधिष्ठान लाभल्यामुळे भरकटणारी नसते.हुरहूर,उत्सुकता,क्षणिक अस्वस्थता,ओढ,या सगळ्या अधीरतेच्या सावल्या मग मनाला काळवंडून टाकणार्या अंधार्या सावल्या नव्हे तर त्या त्या क्षणी हळूवार मायेने सावरणार्या सांजसावल्या होऊन सोबत करतात.अविचारी उतावीळ अधीरतेने घेतलेले निर्णय संकटांच्या गर्तेत लोटून अख्खं आयुष्य उध्वस्त करणारे ठरल्याची असंख्य उदाहरणं जशी आजुबाजूला आपण पहातो,तशीच जीवघेण्या संकटातही खंबीर राहून प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणारी धीरोदात्त माणसंही आपल्या बघण्यात असतात.

अधीरतेच्या लाटेत वहावत जायचं की अधीरतेला संयमाने भरकटण्यापासून रोखायचं हे ज्याच्या त्याच्या वैचारीक परिपक्वतेवर अवलंबून असते हे ओघाने आलेच.

© श्री अरविंद लिमये

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी कडून आम्ही कडे… ☆ प्रा.सौ. सुमती पवार

प्रा.सौ. सुमती पवार

☆ मनमंजुषेतून : मी कडून आम्ही कडे… ☆ प्रा.सौ.सुमती पवार ☆

सुशिला ताई आज सकाळ पासूनच हिरमुसल्या होत्या .चेहरा पडला होता. दुखावल्या सारख्या वाटत होत्या. ….

श्रीपतराव म्हणाले , काय ग ? काय झालं ? चेहरा का पडला तुझा ….?

खोदून खोदून विचारल्यावर म्हणाल्या,अहो , “आज काल घरात काही किंमतच राहिली नाही आपल्याला …? अगदी अडगळीत पडल्या सारखे वाटते पहा … कां ? काय झाले …श्रीपतराव म्हणाले… अहो, हल्ली घरात काय चालले आहे कळतच नाही…कोणी सांगत नाही की विचारत नाही…

श्रीपतरावांना हसू आले ..अस्सं होय …! ते म्हणाले , लग्न होऊन तू इथे शहरात आलीस नि …लगेचच तू स्वतंत्र झालीस , तेंव्हा तू विचारलेस का कोणाला काही .? मग मात्र त्या गप्प बसल्या …!

अगं .. स्वातंत्र्य सर्वांनाच हवं असतं नि आता आपला संसार तो कितीसा राहिला आहे..? काही कमी आहे का तुला कशाची ..? मग रहा ना सुखात ? का दु:ख्ख शोधतेस..?

खरं आहे …माणूस दु:ख्ख शोधतो. मी…मी…मी …मी….आणि फक्त मीच …!

मला विचारलं नाही … मला सांगितलं नाही

हा …”मी “ च आपल्याला संघर्षाकडे , सर्व-नाशाकडे घेऊन जातो. मी मोठा , मी प्रमुख , मी नेता ,मी कारभारी,राम ..राम राम..राम.. किती धुडगुस घालतो हा मी ?

माझे घर , माझी इस्टेट ,माझी बायको, माझी मुले… हा अहं इतका सुखावतो या शब्दांनी…की विचारू नका ….! पण आपण त्या मुळे किती दु:ख्ख मागून घेतो याची कल्पना

नसते आपल्याला …! पुराणात इतिहासांत खूप दाखले आहेत याचे…..! जग जिंकलेला सिकंदर त्या मुळे वयाच्या अवघ्या ३७ साव्या वर्षी सुख न भोगताच मरण पावला …!

काय मिळवले जग जिंकून त्याने …! घरा पासून जगा पर्यंत सर्वत्र हा मी आहे ….! आणि त्या मुळे संघर्ष वाढतो .मी आक्रमण करणार .. मी सत्ता गाजवणार ..जगभर या मी चा प्रताप आपल्याला दिसतो …

“म्हणून या मी चा आम्ही झाला पाहिजे”

अगदी बाल पणापासून या मी ची एवढी प्रचंड वाढ झालेली दिसते की , माझे खेळणे ,माझे दप्तर ,…मी देणार नाही …हा मी एवढा फोफावतो की,शेजारी राहून आपण एकमेकांचे शत्रू बनतो. सर्वत्र हेच चित्रं दिसतं.भिकाऱ्या पासून सम्राटा पर्यंत हा रोग पसरलेला आहे.आपण त्याचे दुष्परिणामही भोगत आहोत .

पण तरी ही या “मी” चे प्रस्थ कमी न होता दिवसेंदिवस वाढतंच चालले आहे.जगात कुठेही जा ..मी चा फणा उभारलेलाच असतो.

माझा धर्म , माझा देव ,माझे राष्ट्र ,माझे माझे आणि माझे… अत्यंत आत्मकेंद्री ,स्वार्थी असा हा मी हा अत्यंत घातक रोग आहे… हा मी सतत माणसाला पोखरत असतो. दुसऱ्याशी तुलना करायला भाग पाडतो.

आपल्या जवळ जे जे आहे त्याचा उपभोग न घेऊ देता हा मी सतत मागणी करत रहातो. हा मी… स्वत: ही जळतो व दुसऱ्यालाही जाळतो.

म्हणून तो आधी मनातून व जनातून हद्दपार झाला पाहिजे …ही आम्ही ची भाषा आपण घरातूनच निर्माण केली पाहिजे .आपले घर आपला समाज , आपले राष्ट्र ,आपले जग अशी भाषा जाणिवपूर्वक जन्माला घातली पाहिजे .. कारण नाती टिकली तर समाज टिकतो व समाज टिकला तरच एकराष्ट्र उभे राहते…

एका बेटा पेक्षा मुठीची ताकद फार मोठी असते. मग त्या वज्रमुठी पुढे एकसंघ भावने पुढे कुणाचे काही चालत नाही .. तर घरा पासूनच  या मी ला घालवून आमचा समाज निर्माण होईल आणि आमचा देश, आमचे राष्ट्र निर्माण होईल त्या दिशेने आपण प्रयत्न करू या …व आमचा देश , मग आमचे विश्व असा अभिमान बाळगू या ..सौहार्दाचा हात पुढे केल्यास काही ही अशक्य नाही..फक्त सुरूवात व्हायला हवी ती आपण करू …

वंदे मातरंम् कडून राष्ट्रागीता कडे व मग विश्व बधुत्वाकडे वाटचाल करू या …..

।।जय विश्व बंधुत्व ।।

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझं वेड…. ☆ सौ. मानसी काणे

☆ विविधा ☆ माझं वेड…. ☆ सौ. मानसी काणे 

मी त्याच्यासाठी वेडी झाले होते,  वेडी आहे आणि राहीन. त्याला मी प्रथम पाहिल तेंव्हा तो मुक्या माणसाच्या भूमिकेत होता पण त्याचे डोळे माझ्याशी बोलले. मग ‘‘देखा न हाय रे सोचा न हाय रे’’अस म्हणत आपले उंचच उंच पाय त्यान नाचवले आणि त्याचा खट्याळपणा मला फार भावला. मग वेगवेगळ्या रुपात ‘‘विजय’’या एकाच नावान तो मला सतत भेटत राहिला. डोळ्यात अंगार पेटवून त्वेषान ‘‘है कोई माईका लाल ’’अस त्यान विचारताच माझही रक्त उसळल.‘‘ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बापका घर नहीं’ ’अस म्हणत त्यानं खूर्ची उलटवून टाकली तेंव्हा त्याची तडफ पाहून मी सुखावले.‘‘मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता’’ अस त्यान ठणकावल तेंव्हा त्याचा स्वाभिमान पाहून मी भारावले.आपल्या हातावर गोंदलेल्या ‘‘मेरा बाप चोर है’’या गोंदणाकड त्यान करूण नजरेन पाहिल तेंव्हा माझा गळा दाटून आला.‘‘मैं बहुत थक गया हूं माँ’’अस म्हणून त्यान आईच्या मांडीवर हताशपणे डोक टेकवल तेंव्हा माझाही शक्तीपात झाल्यासारख वाटल.तो अन्यायाविरुद्ध नेहमी पेटून उठायचा.सगळ्या जगाशी लढायचा.शर्टाच्या दोन्ही टोकांची गाठ मारून एक खांदा झुकवून डायनामाईट लावून तो धुरातून मोठ्या डौलात बाहेर यायचा पण तोपर्यंत इकडे माझ्या नाडीचे ठोके थांबलेले असायचे. कधीकधी तो प्रेमान ‘‘मै अपने बच्चे के लिए पालना लाया हूं सुधा’’ अस म्हणायचा तेंव्हा त्याच्या नजरेत मला कोवळा बाप दिसायचा .‘‘तुझे थामे कई हाथों से, मिलूंगा मदभरी रातों से ’’अस म्हणत कधी तो प्रियकर प्रेमळ पती व्हायचा. कधी प्रेयसीला ‘‘हे सखी’’ अशी साद घालायचा. त्याच हे प्रेम करणं मला त्याच्या पेटून उठण्याइतकच वेड  लावायच. त्यानं ‘‘इंतहा हो गई इंतजार की’’ अस म्हटल तेंव्हा त्याच्याबरोबरच मीही जिवाच्या आकांतानं वाट पाहिली .‘‘इसके आगे की अब दास्ताँ मुझसे सुन सुनके तेरी नजर डबडबा जाएगी ’’अस तो म्हणाला आणि खरच माझे डोळे भरून आले. ‘‘डॉक्तरानीजी बेहोश मत कीजिए मुझे. मैं होश में दर्द सहना जानता हूं’’ अस म्हणत आपला जखमी हात टाके घालण्यासाठी त्यान पुढ केला तेंव्हा त्याच्या मनातल वादळ माझ्याही मनात उसळल. माऊथ ऑर्गनच्या करूण स्वरातून त्यान आपल विधवेवरच अबोल प्रेम व्यक्त केल. आपल्याला डाकूंच्या हाती सोपवणार्‍या कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी बापाकडं त्यान निश्चयानं पाठ फिरवली. त्याच्या प्रेमभंगाची आणि दु:खाची झळ मला पोहोचली.‘‘कल अगर न रोशनी के काफिले हुए?’’ या प्रेयसीच्या प्रश्नावर ‘‘प्यार के हजार दीप है जले हुए ’’अस म्हणत हात पसरून उभ्या असलेल्या त्यान मलाही एक आधाराच आश्वासन दिल. कधीतरी कोणी ‘‘मोहब्बत बडे कामकी चीज है’’ अस म्हटल्यावर ‘‘ये बेकार बेदाम की चीज है’’ अस तो तोडून  टाकायचा. पण मी मात्र ‘‘सब कहते है तूने मेरा दिल लिया, मैं कहती हूं मैंने तुझको दिल दिया’ अशी दीवानी झाले होते. शेकडो माणस आजूबाजूला वावरत असूनही पडदाभर फक्त तो आणि तोच असायचा. पहाणार्‍याची नजर त्याच्यावरून जराही इकडतिकड होऊच शकायची नाही. त्याच प्रेम, त्याची हाणामारी, त्याचा राग ,त्याचा त्वेष या सगळ्यासाठी, त्याच्या आवाजासाठी, त्याच्या डोळ्यातल्या अनामिक आकर्षणासाठी मी खरच वेडी होते आणि आहे. ‘‘भाईयों और बहनों, देवियों और सज्जनों हम और आप खेलने जा रहे है यह अदभुत खेल कौन बनेगा करोडपती’’ परत तोच रुबाब, तोच धीर गंभीर आवाज ,प्रौढत्वाला न्याय देणारा अप्रतीम रंगसंगतीचा पोषाख ,सर्वाना समजून घेणारे डोळे आणि तेच भारावून टाकणं. साठी उलटून घेली तरी माझ त्याच्याबद्दलच वेड काही कमी होत नाही. येस आय अ‍ॅम क्रेझी फॉर माय अँग्री यंग मॅन!

© सौ. मानसी काणे

– श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साक्षात्कार … ☆ श्री रवींद्र पां. कानिटकर

☆ मनमंजुषेतून : साक्षात्कार… ☆  श्री रवींद्र पां. कानिटकर 

आमच्या घराच्या बागेत आंबा, पेरु, नारळ, सिताफळ अशी अनेक फळझाडे आहेत. जास्वंदी,जाई, जुई,मोगरा, अबोली, गोकर्ण, गौरी अशी मनमोहक फुलझाडे बहरलेली असतात. फुलझाडांना येणाऱ्या कळ्या, हळुवार उमलणारी फुले, अंगणात दरवळणारा सुगंध तासनतास राहतो. सुगंधाने मन उल्हसित होतेच त्याबरोबर निसर्गाचे अनाकलनीय चमत्कार ही अनुभवायास येतात.

दरवर्षी मे महिन्यात अतिशय चविष्ट, मोठमोठाले भरपूर आंबे येतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला भरपूर पेरु, पावसाळ्यात सिताफळे, बारमाही नारळ अशा अनेक फळांची आमचे येथे रेलचेल असते. उन्हाळ्यात आंबे पाडाला आले की ते अलगदपणे काढून घरातच अढी घालण्याचा आमचेकडे जणू एक कार्यक्रमच असतो. त्यातल्या त्यात कच्च्या आंब्यांचे पन्हे,चटणी, चैत्रातील आंबा घालून केलेली हरभराडाळीची कोशिंबीर यांची चव जीभेवर बराच कळ रेंगाळते. हळूहळू, आंब्याच्या आंबट गोड वासिने घर भरून जाते. आंबे पिकत आले की ते आमच्या मित्रांना, गल्लीतील ओळखिच्या लोकांना तसेच गावातील नातेवाईकांना देण्याचा दरवर्षीचा आमचा रिवाज आहे. कुणाला आंबे द्यायचे चुकून विसरलेच तर ते स्वतः आवर्जून, अगदी हक्काने आंबे घेऊन जातात. आम्हालाही त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला आवडते.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आंब्याच्या झाडातून मोहोर हळुहळू डोकावू लागला. शिवरात्रीला शंकराला आंब्याचा मोहोर वाहून भरपूर आंबे येवोत अशी प्रार्थना केली जाते. वाऱ्याच्या झुळुकेबरोबर मोहराचा मंद सुवास संध्याकाळी घर भारून टाकतो.

परराज्यात राहणाऱ्या आमच्या मुलीने फारच हट्ट केल्याने व तिलाही एकटीला थोडी सोबत व्हावी या उद्देशाने आम्ही उभयता मार्च 2020 च्या पहिल्या आठवड्यात तिच्याकडे गेलो. माझी पत्नी थोडे जास्त दिवस तिथे राहणार होती. मी मात्र 15-20 दिवसांनी, म्हणजे मार्च 2020 अखेरीस घरी, सांगलीला परत यायचे असे नियोजन केले. परंतु, अचानक करोनाचे संकट सर्व जगभर पसरले. आपल्या भारतातही मग लॉकडाउन -1,  2,  3 असे करत लॉकडाउनची कालमर्यादा वाढतच गेली. तिकडे आंब्याचा हंगाम सुरु झाला. दरवर्षीचे घरच्या झाडाचे आंबे क्षणोक्षणी डोळ्यासमोर येऊ लागले. माझ्या 2-3 मित्रांना मी फोन केले. त्यांनी थोड्या थोड्या दिवसांनी, गेटवरुन चढून जाऊन, जमेल तसे आंबे काढून त्यांचा आस्वाद घेतला. काही मित्रांनी आंब्याचे लोणचे, चटणी, मुरांबा, साखरांबा असे अनेकविध पदार्थ केले आणि त्यांचे फोटो आम्हाला वॉटस्अप वर शेअर देखिल केले. आमचे घरी कुलुप असल्याने दरवर्षीची आंब्याची अढी यावर्षी नव्हती. आमच्या मित्रांनी काढलेले आंबे, आमच्या शेजाऱ्यांना, आमच्या नातेवाईकांना दिले. आंब्याची अप्रतिम चव व जिभेवर रेंगाळणाऱ्या अविट गोडीच्या रसभरीत वर्णनाचे फोनही आम्हाला आले.

करोनाची परिस्थिती थोडीशी आटोक्यात आल्यावर, कोव्हीड -19 स्पेशल ट्रेन सुरु झाल्यावर, सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन, जून अखेरीस, म्हणजे, तब्बल साडेतीन महिन्यांनंतर, आम्ही एकदाचे आमचे घरी, सांगलीला परतलो. एक दोन उन्हाळी व यावर्षी उशीरा सुरु झालेल्या  पावसामुळे अंगणातील फुलझाडे तरारली होती. जाई, जुई, मोगरा आदी फुलांच्या भरगच्च ताटव्यांनी व मंदधुंद सुगंधाने त्यांनी पहाटे आमचे गेटमध्येच स्वागत करून आमच्या प्रवासाचा शीण क्षणात घालवला.

थोडी विश्रांती घेतली. सकाळी उठल्यावर झाडांभोवतीचा पालापाचोळा गोळा केला,  नारळाच्या पडलेल्या झावळ्यांची आवराआवर केली. झाडांवर मायेने हात फिरवत, पाणी घातले. “घरचे चविष्ट आंबे यावर्षी आम्हाला चाखायला देऊ शकलो नाही” अशा अपराधी भावनेने आंब्याचे झाड, मान खाली घालून, जणू उदासवाणे आमचेकडे पहात असल्याचा भास झाला.

दरवर्षी पानापानात लपून बसणारे हिरवे, अर्धे पिवळसर आणि हळूवारपणे गडद पिवळे होणारे आंबे आठवले. दरवर्षीचे आंब्यानी लगडलेले झाडाचे मोबाइल मधील फोटो व आत्ता मात्र आंबेरहित झाडाचे काढलेले फोटो पाहताना मन हेलावून गेले.

गच्चीवरून आत्ता असेच काढलेले फोटो सहजच झूम करून पाहताना, पानाआड लपून बसलेला एक आंबा दिसला. अलगद हाताने त्याला खाली काढले आणि त्याचाही फोटो काढला.

फोटोत दिसणारा आंबा व आंब्याचे झाड याकडे पाहताना, आंब्याचे झाड आमच्याकडे पाहून गालातल्या गालात थोडे स्मित हास्य करत असल्याचा जणू भास झाला.

महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत बाजीप्रभूने पावनखिंड जशी एका हाती लढवली तशीच आमच्या आंब्याच्या झाडाने आम्ही परगावातून परत येइपर्यंत, तो एकमेव आंबा, जवळजवळ साडेतीन महिने ऊन, वारा, पाऊस या सर्वांशी प्राणपणाने झुंज देऊन, इतर सर्वांपासून, पानात जणू लपवून ठेवला होता.

तेवढ्यात, वाऱ्याची एक झुळुक आल्याने, फांद्या हलवून, पानांच्या सळसळीने, आंब्याचे झाड, आमच्या पुनर्भेटीने, त्याला झालेला आनंदच जणू व्यक्त करीत असल्याचा साक्षात्कार आम्हाला झाला.

© श्री रवींद्र पां. कानिटकर

– श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुखाचा मंत्र… ☆ सौ. राजलक्ष्मी देशपांडे

☆ इंद्रधनुष्य : सुखाचा मंत्र… ☆ सौ. राजलक्ष्मी देशपांडे

अंगणात एक छानसा पक्षी आला होता. मी पक्ष्यांसाठी ठेवलेल्या पाण्याच्या कुंड्यात त्यानं चक्क आंघोळ उरकली. शेजारी ठेवलेले दाणे खाल्ले. पाणी प्यायला. थोडावेळ नाचला..चिवचिवला..उडून गेला. माझी सकाळ प्रसन्न झाली.मी पुन्हा कामाला लागले.

मनात सहज विचार आला..सुंदरच होता तो पक्षी. आवाजही गोड. पण ना मी त्याला पिंजऱ्यात ठेवलं, ना त्यानं माझ्याचकडे राहावं असा हट्ट धरला. ना त्यानं मी ठेवलेल्या दाण्यापाण्याबद्दल आभार मानले. खरं तर तो त्याच्या त्याच्या जगात स्वतंत्र जगत होता. योगायोगानं माझ्या अंगणात आला काही क्षण राहिला आणि उडून गेला. मला त्याच्या सहवासात आनंद झाला कारण मला त्याला बांधून ठेवायचं नव्हतं. त्याच्याकडून कसलीच अपेक्षा नव्हती माझी. मुळात मी त्याच्यात गुंतले नव्हते.

माणसांच्या बाबतीतही असाच विचार केला तर…म्हणजे अगदीच न गुंतणं शक्य नाही. विशेषत: जवळच्या नात्यात गुंततोच आपण. पण हे गुंततानाही थोडं भान ठेवलं, की हा माणूस एक स्वतंत्र जीव आहे आणि तो त्याचं आयुष्य जगायला या जगात आला आहे.आपण त्याला देऊ केलेल्या ऐहिक वस्तू(दाणा पाणी) प्रेम, संस्कार, विचार, मैत्री, मदत हे सगळं आपण आपल्या आनंदासाठी त्याला दिलं. आता ते घेऊन त्यानं उडून जायचं की आपल्या अंगणात खेळत राहायचं हा त्यांचा प्रश्न आहे ना…या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करून दखल घ्यायची की नाही हा त्याचा प्रश्र्न आहे. आपल्याला त्याच्या सहवासाचा जो आनंद मिळाला, आपले काही क्षण आनंदात गेले, तेच पुरेसं नाही का?गीतेत भगवंतांनी अनपेक्ष असलेला भक्त मला आवडतो असं म्हटलंय. यालाच निष्काम कर्मयोग म्हणत असतील. अल्बर्ट एलिस सारखा मानसशास्त्रज्ञ सांगतात, की कुणीतरी मला चांगलं म्हणावं ही अपेक्षाच चुकीची आहे. मी सुखी होणार की नाही, हे दुसऱ्यानं माझ्याशी कसं वागावं यावर अवलंबून असेल तर आपण कधीच सुखी होणार नाही.

मग मला साहीरच्या ओळी आठवल्या…

“जो भी जितना साथ दे एहसान है…”

मी त्या बदलून मनातच अशाही केल्या,

“जो भी जैसा साथ दे, एहसान है…”

आणि सुखाचा एक मंत्र मला सापडला.

 

© सौ. राजलक्ष्मी देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फुलपाखरू… ☆ सौ ज्योती विलास जोशी

☆ मनमंजुषेतून : फुलपाखरू… ☆ सौ ज्योती विलास जोशी

फुलपाखराचं  वेलींवर, फुलांवर बागडणं पाहणं हे नयन सुखकारक आहेच; पण त्याहीपेक्षा त्यांच्या पंखांवरची रंगांची पखरण न्याहाळण्यात मी जास्त रमून जाते.

लहानपणी फुलपाखरांच्या मागे धावून त्यांना पकडण्याचा माझा छंद आता मला खूप खटकतो.    कदाचित इतरांचे अनुकरण करण्याचा शिरस्ता मी मोडत नसेन इतकेच!

खूप छोटी छोटी झुंडीनं येणारी आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच तोच दूर निघून जाणाऱ्या फुलपाखरांचं मला आकर्षण कधी नव्हतच. तेच जर एखादे मोठे फुलपाखरू फुलावर स्थिरावलं की मी हळूच बोटाच्या चिमटीत पकडत असेआणि बोटाच्या तळव्यावर उमटलेलं मीनाकाम तासन तास बघत बसे. फुलपाखरू केव्हाच स्वच्छंदी होऊन जायचं!!

काल सकाळी नेहमीप्रमाणे गणपती साठी जास्वंदीची फुले आणावीत म्हणून गच्चीवर गेले आणि माझं लक्ष वेधलं ते एका सुरेख अशा फुलपाखराने!! बऱ्याच दिवसानंतर फुलपाखरू दिसले आणि मी मोहरले.

जांभळा, पारवा,निळा, आकाशी,गडद निळा अशा निळ्या रंगांच्या विविध छटा आणि त्यात कोरलेली सुरेख नक्षी, तीही एक सारखी, दोन्ही पंखांवर मोजून मापून काढल्यासारखी जणू फ्रीहँड ड्रॉईंग! कमाल वाटली त्या विधात्याची!!

पिन ड्रॉप सायलेन्स म्हणतात ना इतकी निरव शांतता ठेवून मी पायरीवर स्थिरावले आणि फुलपाखराला न्याहाळू लागले मधु घटातील मध चोखता चोखता परागीभवनाचे काम नकळत सुरू होतं. जसं काही स्वार्था बरोबर परमार्थ!!!

उशीर झाला तसा मला खालून घरातून बोलावणे यायला सुरुवात झाली. मांजरीच्या पावलाने खाली उतरून “मी योगा करते आहे. मी ध्यान लावून बसले आहे. मला दहा मिनिटे त्रास देऊ नका.”अशी सर्वांना तंबी देऊन पुन्हा गच्चीवर आले.फुलपाखरू गोड हसत होतं…..

फुलपाखराला टेलीपथी झाली की काय? दहा मिनिटांनी ते उडून गेलं. ते पुन्हा येईल या आशेने तिथेच घुटमळले. पण व्यर्थ….

सकाळच्या कामाची लगबग सुरू होती.जास्वंद देवाला अर्पून मी स्वयंपाकाला लागले.अहो आश्चर्यम्! तेच फुलपाखरू माझ्या स्वयंपाक घरातील मनी प्लॅन्ट वर बसलेलं मला दिसलं.लगबगीने मी आरुषला म्हणजे माझ्या नातवाला बोलावून दाखवले. तोही बराच वेळ फुलपाखरू पाहण्यात रमला. नंतर ते सवयीप्रमाणे उडून गेले. पुन्हा दिसले म्हणून मीही भरून पावले.

दिवसभर त्याच्या निळ्या जांभळ्या पारव्या रंगाचा विचार घोळत होता. डोळ्यांनी तर ते रंग साठवूनच  घेतले होते. मिक्सिंगच्या टाक्याने अगदी डिट्टो फुलपाखरू विणायचा संकल्पही झाला मनोमन!..

संध्याकाळच्या चहासाठी स्वयंपाक घरात आले आणि एकदम दचकले! फुलपाखरू माझ्या हातावरच बसलेलं दिसलं मला. त्याचा अलवार स्पर्श जाणवला ही नाही. आरुष माझ्या पाशी उभा होता.त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती अशा संमिश्र भावना होत्या.

जरासा हात हलला आणि ते उडून गच्चीच्या कठड्यावर जाऊन बसलं. डोळ्याची पापणीही न लवू देता आरुष एकटक त्याकडे बघत होता. माझ्यासारखाच तोही भावूक रात्री झोपेपर्यंत त्याच्या आणि माझ्यात फुलपाखरू सोडून कोणताही विषय नव्हता. आपल्या रंग पेटीतले सगळे निळे जांभळे रंग काढून तो फुलपाखरू आठवत होता.

माझ्यासारखाच फुलपाखरू चितारण्याचा संकल्प त्याने मनोमन केला असावा.

रात्री झोपतानाही आजी फुलपाखराची गोष्ट सांग असा हट्ट त्याने धरला.

“बाळा, मी तुला फुलपाखराचं छान गाणं म्हणून दाखवू का?”असे म्हणून मी ‘छान किती दिसते फुलपाखरू’ म्हणायला सुरुवात केली. ऐकता ऐकताच माझ्या पाखराच्या पापण्या मिटल्या……

सकाळी उठल्यावर मी गॅलरीचे दार उघडलं आणि खाली पडलेलं फुलपाखरू मला दिसलं. जवळचच कुणीतरी गेल्याच दुःख मला झालं. मी पटकन कुणी उठायच्या आत त्याची विल्हेवाट लावायचं पुण्यकर्म करून टाकलं.

मी विचार करू लागले की एरवी माणसांना घाबरणारा हा जीव आज माझ्या हातावर कसा काय येऊन बसला? मरणासन्न झालेलं ते माझ्या आश्रयाला आलं होतं. माझी मदत मागत होतं. मरण जवळ आलं आणि ते अगतिक झालं होतं. माझ्यावर इतका कसा त्याचा विश्वास? माझं मन त्याला उमगलं असेल का? माझ्या भावना त्याच्या पर्यंत पोहोचल्या असतील का? म्हणून तर त्याने इतक्या विश्वासाने माझ्या हाताचे चुंबन घेतलं असेल का? एक ना दोन हजार प्रश्नांचे काहूर माजले माझ्या मनात!

आरुष उठला, “आजी आज पण ते फुलपाखरू येईल ना ग?”

“हो,येईल ना! तू सगळं दूध पटापट पिऊन होमवर्क कम्प्लीट केलस तर येईल नक्की!!”

निरागस हा ही आणि निरागस ते ही…..

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

[email protected]

Mob.No. 9822553857

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print