मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काहीतरी हरवलेले… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆

सौ. अर्चना गादीकर निकारंगे

??

☆ काहीतरी हरवलेले… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

हल्ली आपल्या आजूबाजूला सध्या बर्‍याच ठिकाणी जुन्या चाळी, जुन्या को- आँप. सोसायट्या रिडेवलपमेंटला जाऊन नवीन नवीन टॉवर होताना दिसताहेत. नुकतीच कानावर अशीच बातमी आमच्या मागच्या ३५ ते ४० वर्षांपूर्वीच्या सोसायटीबद्दल पण ऐकीवात आली. आज दुपारी सहजच खिडकीजवळ उभी राहून पाऊस बघताना ही गोष्ट मनात आली. म्हटले, ” अरे, हो खरच की ! आता या सोसायटीतील लोक पण इथून वेगवेगळ्या ठिकाणी पांगतील. एवढे वर्ष त्यांना पाहत असताना काही चेहर्‍याने, तर काही आणखीन जास्त परिचित होते. सहजच एका घराकडे लक्ष वेधले गेले. आताशा ते घर मुकं झाल्यासारखे वाटत होते. त्या घरात एक १७-१८ वर्षांची मुलगी पाहिल्याचे आठवले. शाळकरी असताना वडीलांचा हात पकडून जाताना तिला बरेच वेळा पाहिले होते. त्यानंतरसुद्धा तिला अधूनमधून मैत्रिणींच्या घोळक्यात पाहिल्याचे आठवते. शैशवावस्थेतून यौवनावस्थेत शिरताना तिच्यात पण खूप बदल झालेला दिसला होता. हळूहळू त्या खिडकीखाली उभे राहून तिला हाका मारणारे आवाज थांबत चालले होते. वाढदिवसाला ऐकू येणारा तो मुलांचा कलकलाट पण थांबलेला दिसत होता. वाढदिवसाच्या छोटेखानी पार्ट्यांना पूर्णविराम मिळाला होता.

एक सळसळतं जिवंतपण आटत होतं हे ध्यानातच येत नव्हतं. बर्‍याच वर्षांचा काळ मागे पडला असावा. नंतर जाऊन कळले की त्या मुलीचे लग्न पण झाले. आता तर त्या खिडकीत शांतता जाणवत होती. तिच्या जाण्याने जणू ते घर एक बडबड आणि एक उत्साह हरवून बसले होते.

दिवसाच्या प्रकाशात ते थोडं हर्षभरीत जाणवत असलं तरी पण नंतर सहजच दिवेलागणीच्या वेळेस त्याकडे लक्ष गेले असता दिव्यांच्या कृत्रिम झगमगाटात ते हरवल्याप्रमाणे वाटत होते. पुढे जाऊन टाॅवरमध्ये नवीन रुपडे लाभले तरी त्याचे ते हरवलेपण त्याला गवसेल का ? हा प्रश्न शेवटी मनामध्ये अनुत्तरीतच राहीला.

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “विवेकाचा दिवा हृदयात जपून ठेवा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

??

☆ “विवेकाचा दिवा हृदयात जपून ठेवा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

विवेकाचा दिवा हृदयात जपून ठेवा – हाच या दिवाळीचा सांगावा.

 

हजारो वर्षापासून मेंदूवर चढलेली अज्ञानाची काजळी खरडून काढण्याचा प्रयत्न ज्यांनी केला 

त्यांनाच या अंधाऱ्या संस्कृतीने संपवून टाकले आहे. त्यांनी दिलेला विचार गिळंकृत करून 

समाजाला मोडून-तोडून सांगितला जात आहे. विज्ञान तंत्रज्ञानात जगाने अभूतपूर्व मुसंडी मारलेली असताना 

भारतात आताच्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी धर्मग्रंथांची पाने चाळली जात आहेत.

 

डार्विन, न्यूटन, आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग या सगळ्यांना वेड्यांच्या पंक्तीत बसविण्याची सत्तेला घाई झाली आहे. शास्त्रज्ञ म्हणवून घेणारे सोवळे परिधान करून मंदिरात घंटा बडवत बसले आहेत.

राफेल सारख्या अत्याधुनिक फायटर विमानांवर निंबू-मिरची उतरवल्या जात आहेत. गाय, गोमुत्र आणि गोपालनाला राष्ट्रीय स्वरूप आले आहे….. अशा काळात अज्ञानाची काजळी अधिक घट्ट होताना दिसत आहे. विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन यांना शत्रुस्थानी मानले जावून नवे अभ्यासक्रम तयार केले जात आहेत.

 

विवेकाचा एक मंद दीप घेवून मूठभर व्यक्ती चार्वाकाच्या काळापासून चालत आहेत, पण त्यांना ध्येय गाठता आले नाही. कारण अविवेक आजही प्रभावीच आहे… परंतु विवेकाने पराभव अजून पत्करला नाही.

 

तुमचाही विवेक धडका देतोय.. मेंदुतील अंधश्रद्धांच्या पोलादी तटबंदींना…

.. त्याला बघा एकदा मोकळे करून…

.. विवेकाचा दीप पेटवून तर बघा.. हृदयाच्या एखाद्या कोनाड्यात…

…. मग बघा सारं विश्व कसं प्रकाशमान होतेय ते… !

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अ लॉंग वे फ्रॉम होम…” लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “अ लॉंग वे फ्रॉम होम…” लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

ते १९८०चे दशक होते. तेंव्हाही तरुण पिढीवर पाश्चिमात्य संगीताचा प्रभाव होताच. उलट तो नव्यानेच पडू लागलेला असल्याने संख्येने थोड्या लोकांवर असला तरी फार खोलवर उमटत होता. त्यातच निग्रो लोकांचा (हो, तेंव्हा ‘निग्रो’ हा शब्द निषिद्ध नव्हता!) एक संगीत ग्रुप होता- बोनी ‘एम’ ! त्या चार जणाच्या ग्रुपने एके काळी जगभर धूम करून टाकली होती. अगदी ताजेतवाने संगीत, मनाला भुरळ घालणारे सूर आणि त्यावेळच्या संथ नाचांना सोयीचा ठरणारा ठेका असलेली ही गाणी फार लोकप्रिय झाली होती. शिवाय गाण्याच्या संथ गतीमुळे त्यातील कविता समजणेही सोपे जाई. आणि खरे सांगायचे तर फॅशनला कसले आलेय लॉजिक? तेंव्हा ही गाणी अचानक फॅशनमध्ये आली होती, बस्स ! ‘आमचे’ आहे, ‘आमच्या पिढीचे’ आहे म्हणूनच ते मस्त आहे, अशी हट्टी श्रद्धा कशाबद्दलही बाळगू शकणारे ते निरागस वय ! त्यात या ग्रुपच्या गाण्यांनी आम्हाला चांगलेच पकडले होते. बोनी’एम’ची सगळीच गाणी खूप लोकप्रिय होत गेली. चटकन लक्षात येण्यासाठी ‘डॅडी, डॅडी कुल’ हे गाणे आठवले तरी पुरे ! तोच बोनी ’एम’ ग्रुप ! जगभर त्यांच्या लॉंगप्ले तबकड्या मिळू लागल्या.

घरात लॉंग प्ले रेकॉर्ड प्लेयर असणे हे खानदानी श्रीमंतीचे लक्षण समजले जाई. ज्यांच्याकडे तो नव्हता त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये अशा तबकड्या लावल्या जात आणि फक्त कपावर कप चहा पीत बसलो तरी मुंबई पुण्यातील इराणी हॉटेल्स आणि इतरत्र गावाबाहेरची धाबेवजा हॉटेल्स मुलांना कितीही वेळ अशी गाणी, गझला, अगदी ‘शोले’ आणि ‘दिवार’चे डायलॉग्ज ऐकत बसू देत. तिथेच तरुणाईच्या सगळ्या ‘कहाण्या’ घडत. त्या हळव्या कहाण्यांच्या पुढच्या एपिसोडची ‘स्क्रिप्ट’ कधीकधी अगदी जवळच्या मित्र-मैत्रीणीत सामुहिकपणे सुद्धा लिहिली जाई. नंतर अगदी आतून हुरहूर लावणारे क्षण कधीकधी डोळ्यासमोर घडत तर कधी घडून गेलेल्या हुरहूर लावणा-या क्षणाची श्राद्धेही साजरी होत असत. असो, अजून काही काही घडत राही…!

बोनी ’एम’ ग्रुपच्या एका गाण्याने मला खूप खोल आणि खूप हळवी जखम करून ठेवली होती. अजूनही अनेकदा ‘युट्युब’वर हे गाणे ऐकून मी जुन्या ‘दाग’ चित्रपटातील तलत महेमूदने गायलेल्या गाण्याप्रमाणे ‘जख्म फिर से हरा’ करून घेतो. लीझ मिशेलने गायलेल्या या गाण्यात फक्त चार-पाच ओळीच होत्या. पण त्यांचा आशय मात्र अमेरिकेतील निग्रो लोकांचे काही शतकांचे दु:ख पोटात सामावण्याइतका सखोल होता.

“समटाईम्स आय फील,

लाईक अ मदरलेस चाईल्ड”

हे धृवपद गाण्यात वारंवार येई आणि लीझ मिशेलच्या को-या, धारदार पण मुग्धमधुर आवाजात ‘ऑन्ट दिनाज सॉंग’चे ते करूण शब्द काळीज चिरत जात. ‘कधीकधी मला आपण आई नसलेले मुल आहोत असे वाटते’ हे भाषांतर त्या कवितेतली आर्तता मराठीत आणूच शकत नव्हते. या गाण्यातली वेदना ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ मधली होती. तिचे भाषांतर शक्यच नव्हते. अलीकडे सहज या गाण्याबद्दल पुन्हा वाचले आणि मन अनेकदा भरून आले. अमेरिकेत हे गाणे पहिल्यांदा १४७ वर्षांपूर्वी म्हणजे १८७० साली गायले गेले. ते गाणा-या ग्रुपचे नाव होते ‘फिस्क जुबिली सिंगर्स. ’ पुढे या ‘ऑन्ट दिनाज सॉंग’च्या अनेक आवृत्या निघाल्या. मूळ कवितेतही बरेच बदल झाले, पण कृष्णवर्णीयांच्या गुलामीच्या वेदनातील तीव्रता त्यातून नेहमीच व्यक्त होत राहिली.

तब्बल २४५ वर्षे अमेरिकेसारख्या देशात माणसांची खरेदीविक्री जनावरांप्रमाणे केली जाई हे आज कुणाला खरेही वाटणार नाही. त्यावेळी निग्रोंची विक्री करताना जर एखादी निग्रो बाई लेकुरवाळी असेल तर गुलाम विकत घेणारा गोरा माणूस कधी फक्त काळे मुलच खरेदी करी. मग त्या मुलाला आईच्या कडेवरून खेचून काढले जाई आणि नव्या मालकाच्या स्वाधीन केले जाई. कोवळे लुसलुशीत मास खायला चटावलेल्या खाटीकाने गाईपासून तिचे पाडस ओढून काढावे तसे ! मग आफ्रिकेतील जंगलातून आणलेले ते काळे घाबरलेले रडणारे मूल गुलामांनी गच्च भरलेल्या जहाजातून श्रीमंत अमेरिकन जमीनदाराच्या शेतात आणले जाई. तिथे त्याच्यातून दिवसरात्र काम करणारा गुलाम घडविला जाई. खरे तर एक मूक पशूच. कारण त्याला मालकाची भाषा येत नसे. त्याची भाषा बोलणारे कुणी आसपास नसे. थोडी चूक झाली तर चामड्याच्या चाबकाचा कळवळून टाकणारा फटका ! संपले त्याचे माणूस म्हणून असलेले जीवन ! त्याच्या आफ्रिकेतील कुटुंबाची आणि त्याची परत कधीही भेट होऊ शकत नसे. मरेपर्यंत आपल्या गरीब काळ्या आईचे रडवेले डोळे आठवत, तिच्या वत्सल स्पर्शासाठी तडफडणारे ते मूल आयुष्यभर झुरत राही आणि जनावरांसारखे काबाडकष्ट करताना एक्कलकोंडे आयुष्य कंठून एक दिवस मरून जाई.

निग्रोंच्या या सार्वत्रिक सत्यकथेवर हे गाणे बेतलेले होते. त्यातील शब्द होते,

‘समटाईम्स आय फील

लाईक अ मदरलेस चाईल्ड,

अ लॉंग, लॉंग वे,

वे फ्रॉम माय होम.’

ध्रुवपदापाठोपाठ हे शब्द वारंवार येत तेंव्हा आमच्यापैकी प्रत्येकाच्या मनाच्या पडद्यावर त्या काळ्या निग्रो आईच्या हातातून तिचे मूल ओढून काढणारे क्रूर गोरे शिपाई दिसत राहत, तिचा मूक आक्रोश जणू आम्हाला ऐकू येत असे. आमचे भाबडे डोळे ओलावत. नंतर मग उगाच आमचे गाव, गावाकडचे कायमचे सुटलेले घर, मागे राहून गेलेले बालपण, देवाघरी गेलेले आईवडील, नोकरीसाठी सुटलेला देश, असे काही काही आठवत राही. त्यात लीझ मिशेलचे काळजात धारदार पाते घुसविणारे शब्द पुन्हा कानावर येत…

‘नो वे, नो, नो, नो वे, टू गेट होम.’… आता घर पुन्हा कधीच दिसणार नाही ही जीवघेणी जाणीव लीझ हृदयाला छिद्र पाडून आत खुपसते आहे असेच वाटे. अस्वस्थ करणारा अनुभव होता तो ! आशाताईनी गायलेले –

‘जिवलगा, राहिले दूर घर माझे,

पाउल थकले, माथ्यावरचे

जड झाले ओझे’

… हे जसे अगदी खोल आत शिरून अस्वस्थ करत राहते तसे या गाण्याने होई.

वय वाढते तसे हळूहळू माणूस आतूनही राठ होत जातो. आपण हळवे नाही असे मानणे आणि विशेषत: तसे दाखविणे मर्दपणाचे किंवा परिपक्वपणाचे लक्षण मानले जाऊ लागते. आपण दुस-याच्या दु:खाने अस्वस्थ होणे, त्याच्या वेदनेने आपल्याला रडू येणे, दुर्बलपणाचे मानू लागतो. निबरपणाच्या प्रवासात नंतर त्याहीपुढे जावून स्वत:च्या दु:खानेही डोळ्यात पाण्याचा थेंब न येऊ देणे हे मोठेपणाचे लक्षण मानले जाऊ लागते. हे असे आतले माणूसपण सुकविणे, डोळ्यातून थेंबच सांडू नयेत म्हणून मनातली 

‘ रिलेटिव्ह ह्युमिडीटी ’ संपविणे म्हणजे समर्थ होणे ठरू लागले आहे.

खरे तर साता समुद्रापलीकडे – अमेरिकेत ज्यांचे आई -वडील शतकांपूर्वी गुलामीचे जिणे जगले त्यांचे अडीचशे-तीनशे वर्षापूर्वीचे दु:ख आठवून स्वत: अस्वस्थ होणे हा आपल्या माणूसपणाचा पुरावा असतो. संत पौलाने म्हटलेले माणसाच्या आत असणारे ‘देवाचे घर’ शाबूत असल्याची ती खूण असते. जर काहीतरी सिद्ध करण्याच्या भरात ती वेदना जाणवत नसेल तर आपण देवाच्या घरापासून किती दूर आलोय, नाही? कदाचित आता घरी परत जाणे कधीच शक्य नाही !

“अ लॉंग वे….

नो, नो, नो वे 

टू गेट होम !’…

*******

लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे

 72086 33003

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वयंशिस्तीचे महत्व… ☆ सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले ☆

सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले

? विविधा ?

☆ स्वयंशिस्तीचे महत्व… ☆ सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले  

स्वतःहून स्वतःवर लागू केलेल्या नियमांना ‘स्वयंशिस्त’ म्हणतात. दैनंदिन व्यवहारात स्वयंशिस्तीची अनेक उदाहरणे आपण बघतो. आपण स्वयंशिस्त किंवा अनुशासन असेही म्हणू शकतो. जवळचे उदाहरण मुंग्यांचे सांगता येईल. मुंग्या नेहमी एक रांगेत चालतात, एखादी मुंगी चुकून रांगेच्या बाहेर गेली तरी बाकीच्या मुंग्या कधीच रांग सोडत नाहीत आणि रांग चुकलेल्या मुंगीला परत रांगेत सामावून घेतात.

आपण घडून गेलेल्या काही घटना पाहू……

  • परवा मला सुट्टी होती, मामाच्या गावाला जायचे म्हणून मी अलिबागच्या एस टी आगारात गेले होते. सहज दोनतीन दृश्य माझ्या डोळ्यासमोर आली. एक एस. टी. बस फलाटाला लागत होती. पण बरीच लोकं ती बस फलाटाला लागण्याआधीच, त्या बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत होते. बसच्या दरवाजाचे आकारमान लक्षात घेतल्यास आपल्या लक्षात येईल की एकाच वेळी एकच माणूस आत शिरू शकतो. ही स्थिती जवळजवळ सर्वच बसच्या बाबतीत सारखीच होती.
  • आणिक एक दृश्य माझ्या मनात घर करून राहिले आहे. अलिबागला नुकतीच स्वयंचलित वाहतूक नियंत्रण संरचना कार्यान्वित झाली होती. पोलिस त्या रचनेची कार्यवाही सुरळीत व्हावी म्हणून प्रयत्नशील होते आणि काही लोकं बिनदिक्कतपणे नियम मोडून वाहने चालवीत होते. माझ्यासमोर एक अपघात होता होता राहिला.
  • सुमारे दहा वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो लोकांचा बळी गेला.
  • अगदी अलीकडील घटना म्हणजे पंजाबमधील अमृतसर येथे दसऱ्याच्या दिवशी रावणदहन कार्यक्रम काही लोकं रेल्वे रुळावर उभे राहून पहात होती. त्यांच्या अंगावरून रेल्वे गेली आणि जवळजवळ पन्नास लोकांना जीव गमवावा लागला.

वरील सर्व घटना जरी वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असल्या, प्रत्येक घटना जरी वेगळी असली, प्रत्येक घटनेचा आर्थिक/ सामाजिक परिणाम जरी भिन्न असला तरी आपल्या सर्वांच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल ती म्हणजे या सर्वाला एकच मूलभूत कारण आहे. आपली उत्सुकता न ताणता मी ते कारण सांगतो, ‘स्वयंशिस्तीचा अभाव’.

बिरबलाची एक गोष्ट आहे. भाकरी का करपली? घोडा का अडला ? आणि पाने का नासली ? असे तीन प्रश्न आहेत. या सर्वांचे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे फिरवले नाही म्हणून. आज आपल्या देशात असलेल्या आणि उद्या निर्माण होणाऱ्या बऱ्याच प्रश्नांचे एकमेव उत्तर आहे किंवा असेल ते म्हणजे 

‘‘स्वयंशिस्तीचा अभाव’’

आपण स्वयंशिस्तीच्या दुष्परिणामांची काही उदाहरणे बघितली. त्यामुळे स्वयंशिस्त का पाळावी हे आपल्या लक्षात आले असेल. स्वयंशिस्त अंगिकारल्यामुळे मोठी झालेली अनेक राष्ट्रे आपल्याला सांगता येतील. यातील अग्रक्रमाने ज्यांचा उल्लेख करता येईल. त्यामध्ये ज्यांनी आपल्यावर दिडशे वर्षे राज्य केले ते ब्रिटिश आणि अणुस्फोटाचे विदारक दुष्परिणाम भोगून, चटके खाऊन स्वयंशिस्त पाळून, अथक मेहनत करून आणि प्रखर राष्ट्रभक्तीच्या जोरावर जगातील प्रमुख झालेले एक राष्ट्र म्हणजे जपान. ही दोन उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत असे मला वाटते.

आज आम्ही शालेय विद्यार्थी आहोत. बरीच मोठी माणसे असे म्हणतात की आम्ही उद्याचे नागरिक आहोत, पण मला उद्याचे नागरिक म्हटलेले आवडतही नाही पटतही नाही. आदर्श नागरिक म्हणून असलेली कर्तव्ये आम्ही आजपासून च पार पाडायला सुरुवात केली तर ती आमच्या अंगवळणी पडतील, आमच्या अंगात मुरतील आणि आयुष्यभर आम्ही ती आचरणात आणू शकू. यात खासकरून स्वयंशिस्त अंगी बाणली गेली तर आमचे जीवन अधिक सुंदर आणि समृद्ध होईल असे मला वाटते.

आता बालमित्रांनो, तुम्ही म्हणाल की प्रास्ताविक पुरेसे झाले. स्वयंशिस्त म्हणजे काय ते आम्हाला कळले, स्वयंशिस्तीचे दुष्परिणाम कळले आणि फायदेही कळले. पण आम्ही नक्की काय करायचे हे कधी सांगणार.

आपण त्याची घरापासून सुरुवात करूया. आपण सकाळी झोपून उठलो की किमान आपल्या पांघरुणाची घडी आपली आपण घालूया. काल पर्यंत आपण काय करीत होतो ते सोडून देऊ, पण आजपासून मात्र आपण या गोष्टी पाळूया. हात धुतल्याशिवाय आपण कोणताही पदार्थ खाणार नाही. हात पुसायला आपल्याकडे रुमाल असेल. सकाळी उठण्याची आपली वेळ पक्की असेल, ती आपण काटेकोरपणे पाळू. शाळेप्रमाणे आपापल्या घरी सुद्धा आपले एक वेळापत्रक असेल. घरी वह्या-पुस्तके ठेवण्यासाठी विशिष्ठ जागा असेल. शाळेतून घरी गेल्यावर आपण आपले दप्तर योग्य ठिकाणी ठेऊ, त्यातील डबा, पाण्याची बाटली धुऊन ठेऊ. संध्याकाळी शुभंकरोती, काही देवांची स्तोत्रे म्हणू, वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवू. शाळेतून दिलेला गृहपाठ आपला नेहमी पूर्ण झालेला असेल. शाळेत आपण वेळेत पोहचू. शाळेतील सर्व सूचनांचे, नियमाचे आपण पूर्णपणे पालन करू. रस्त्याने चालताना, प्रवास करताना आपण वाहतुकीचे नियम समजून घेऊ नी त्यांचे पालन करू. अयोग्य ठिकाणी थुंकणार नाही. लोकांनी अयोग्य ठिकाणी थुंकायाचे पन्नास टक्के कमी केले तर आपले सामाजिक आरोग्य पन्नास टक्के तरी नक्कीच सुधारेल. आपल्याला रांगेचे महत्व जरी कळले तरी आपली प्रगती किमान १०% नी वाढेल असा विश्वास वाटतो. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. आपण सर्व सूज्ञ श्रोते आहात, आपापल्या अभ्यासाने यात अनेक गोष्टींची भर घालू शकाल.

एका मोठ्या वक्त्याने आपल्या भाषणांत सांगितले होते की आपल्या देशातील सर्वांनी दिलेली वेळ पाळली तर आपला GDP किमान चार टक्क्यांनी वाढेल. आपण सर्वांनी यावर चिंतन आणि त्यानुरूप कृती करण्याची गरज आहे, आपण प्रयत्न करू. देशाने, आपल्याला अनेक गोष्टी दिल्या आहेत, याची आपल्याला नित्य जाणीव असण्याची गरज आहे, आपण सर्व तसा प्रयत्न करीत असालच, पण समजा त्यात काही त्रुटी रहात असेल तर आजचे माझे मनोगत ऐकून आपण त्यात योग्य ती सुधारणा नक्कीच कराल या विश्वासाने माझे मनोगतास पूर्णविराम देते.

देश हमे देता है सबकुछ।

हम भी तो कुछ देना सीखे ।।

भारत माता की जय।

© सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले 

थळ, अलिबाग.

मो 9028438769

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पैठणीवरचं नक्षीदार नातं… भाग – 2 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

 

? मनमंजुषेतून ?

पैठणीवरचं नक्षीदार नातं… भाग – 2 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

(बहिणीने मला बजावून ठेवलं. दोन तीन महिने इकडं यायचं नाव काढू नकोस. तिचा राग शांत झाला की मग ये. पण माझं धाडसच होत नव्हतं.) – इथून पुढे —-

तीन महिने होऊन गेले. वहिनीने एकही फोन केला नाही. माझं नाव काढलं तरी ती तिथून उठून जायची. तिचा राग शांत होण्याची लक्षणे दिसत नव्हती. आणि त्यातच आमच्या मोठ्या आत्तीच्या मुलीचे म्हणजे सोनालीचं लग्न ठरलं. वहिनीला घाबरून मी लग्नाला न जाण्याचा निर्णय घेतला. पण सोनालीने स्वतः फोन करून सांगितलं तू मला लग्नात हवा आहेस काहीही करून ये. मी ही मनात ठरवलं. काय व्हायचं ते होऊ दे. असं वहिनीपासून तोंड लपवून कुठवर राहायचं. एकदाच काय असेल ते होऊ दे राडा. जीव तर घेणार नाही ना ती. आणि मी लग्नाच्या दिवशीच डायरेक्ट मंडपात हजर व्हायचं. लग्न करून तिथूनच माघारी यायचं असा निर्णय घेतला.

तो दिवस उगवला. मनात धाकधूक घेऊनच प्रवास केला. आज आपल्याला तुडवलं जाणार आहे. हे मनाशी पक्के ठरवूनच मी तिकीट काढलं होतं. मी विवाहस्थळी पोहचलो. लांब थांबून अंदाज घेतला. तोंडाला रुमाल बांधला होता. नवरदेवाला घोड्यावरून नाचवत मंडपात नेलं जात होतं. मंडप गच्च भरला होता. मी लांबून बघत होतो. आई, बहिणी अण्णा चुलते चुलत्या सगळ्याजणी दिसत होत्या. आणि माझी नजर शोधत होती ती फक्त सुनितावहिनीला. तिला पाहण्यासाठी. तिच्या जवळ जाऊन लहान लेकरू होऊन हट्ट करण्यासाठी कायम आसुसलेला मी. आज वहिनी नजरेला दिसूच नये असं वाटत होतं.

अक्षता वाटप सुरू झालं. नवरा आणि नवरीला आत कुठेतरी नटवत होते. मी तोंडाला रुमाल बांधूनच दबकत दबकत मंडपाजवळ गेलो. दोन्ही बाजूला खुर्च्या अगदी व्यवस्थित लावल्या होत्या. मंडप गच्च भरला होता. लग्नात सगळे नातेवाईक खूप दिवसांनी एकमेकांना भेटत असतात. सगळेजण गप्पा मारत बसले होते. मी आल्याचं कुणालाच कळलं नव्हतं. मी मागेच अक्षता हातात धरून उभा राहिलो. आणि तेवढ्यात माझी चुलत बहीण स्नेहा अचानक माझ्या जवळून जात असताना तिने मला ओळखलं. तिने माझ्या तोंडावरून रुमाल ओढला आणि जोरात ओरडली. “नितीनदादा आलाय इथं”. माझ्या पोटात कळ आली. पण मी पळून जायचं नाही असं ठरवूनच आलो होतो. आणि स्नेहल पळतच ‘आला आला आला ‘ असं करत धावत नवरीच्या रूमकडे गेली.

सुनितावहिनी सोनालीला म्हणजे त्या नवरीला तयार करत होती. आणि तिच्याजवळ ही बातमी गेलीच. “एका दमात सात आठ जणींनी तिला सांगितलं “आलाय बघ तुझा नितीनभावजी” वहिनीने सगळं हातातलं काम सोडलं. ती त्याच वेगाने तिथून बाहेर आली. इतर सगळ्या बायका तिच्या मागे. आणि ती माझ्या नजरेसमोर दिसू लागली. दोघी तिघी जणींनी तिला धरायचा प्रयत्न केला. लग्नात भांडू नकोस म्हणून समजावू लागल्या तशी वहिनी जोरात ओरडली “जे कुणी मध्ये येतील त्यांनाही मी सोडणार नाही. ” तिचा तो अवतार पाहून सगळेजण जागेवर शांत उभे राहिले. साउंड सिस्टम बंद झाली. तसं सगळयांना माहीत होतच मी वहिनीसोबत काय केलेल होतं ते. त्यामुळे मला धडा मिळायला हवा अशी तमाम लोकांची इच्छा होतीच. पण यात गंमत अशी झाली होती. जे नवऱ्याकडचे नवे वऱ्हाडी पाहुणे होते त्यांना यातलं काहीच माहीत नव्हतं. ते माझ्याकडे एखादा पाकीटमार असल्यागत एकटक बघत होते.

दोन्ही बाजूला लोक उभे होते. मी या टोकाला तर वहिनी त्या टोकावरून चालत यायला लागली. तिची एकटक रागीट नजर माझ्यावर रोखलेली. माझ्या पोटात कळ दाटून येत होती. समोरून वहिनी नाही तर तीन महिन्यांपासून आपली बरी न झालेली जखम सांभाळणारी जखमी वाघीणच येत होती. असंच मला वाटत होतं. वहिनी अगदी जवळ आली. मी मान खाली घातली तशी वहिनीने उजव्या हाताने माझ्या डाव्या गालावर खनकन मुस्काडीत वढली. तिच्या हातातल्या दोन तीन बांगड्या फुटून खाली पडल्या. परत दुसऱ्या हाताने दुसऱ्या गालावर वढली. तेव्हाही बांगड्या फुटल्या. मी अडवायला हात वरती केला तर हातावर तिच्या मनगटाचा मोठा दणका बसला. आणि एका बांगडीची काच माझ्या हातात घुसली. एक तुकडा तिच्या मनगटात रुतला. वहिनीने जोरात हाणायला सुरवात केली. मी शांत उभा होतो. समोरचं काहीच दिसत नव्हतं. डोळ्यावर अंधारी यायला लागली. वहिनीने वेग वाढवला. मला वेदना सहन होत नव्हत्या. मी खाली बसलो. कपाळाच्या डाव्या बाजूला वर एक काच घुसली होती. तिथून रक्त येत होतं. डोळा मोठा झाला होता. ओठांवर काही दणके बसले होते त्यामुळे दात ओठात रुतल्यामुळे तिथून ही रक्त येत होतं. वहिनीचा राग शांत होत नव्हता. मी खाली बसलो. तर बाजूची खुर्ची तिने उचलली आणि मला मारण्यासाठी दोन्ही हाताने वर उचलली. पण काय झालं कुणास ठाऊक. तिने खुर्ची बाजूला जोरात आपटली. तिचे दोन्ही पाय तुटले.

अण्णा जवळ आले. “वहिनीला म्हणाले आता बास झालं. जा तू आत. “वहिनी शांत झाली आणि आत निघून गेली. मी तसाच तिथंच बाजूच्या खुर्चीत बसून राहिलो. सगळेजण माझ्याकडे केविलवाणे बघत होते. लग्नात आलेल्या नव्या पोरी बघण्याची लै हौस असायची मला. पण आज मानच वर होत नव्हती.

त्याच अवस्थेत अक्षता टाकल्या. सोनालीचं लग्न झालं. आणि सगळेजण जेवायला गर्दी करू लागले. मला भूक लागली होती. पण कोणत्या तोंडाने जेवायचं हेच कळत नव्हतं. नवऱ्याला आणि नवरीला भेटून जावं म्हणून स्टेजवर गेलो तर सगळेजण बाजूला झाले. सोनालीजवळ जाऊन फक्त दहा सेकंद उभा राहिलो. कुणीच माझ्याशी बोललं नाही. आई आणि अण्णा जवळ आले. आई म्हणाली “जेवण करून घे चल. “मी हुंदके देत मान हलवली. आणि मी पुण्याला चाललोय परत असं म्हणून तिथून काढता पाय घेतला. पावलं टाकत मंडपाच्या बाहेर आलो.

जेवढी मस्करी वहिनीची केली होती त्याहून जास्त अपमान झाला होता. पण वहिनीला एका शब्दाने बोललो नाही. तिने एका खोलीत नेऊन हवं तेवढं मारलं असतं तरी चाललं असतं. असं काहीतरी विचार करून मी रुमालाने तोंड पुसत होतो. जेवणाचा वास दरवळत होता. पण जेवायचं तरी कुठं आणि कसं?नकोच म्हटलं, बाहेर जाऊन खाऊ अस म्हणून निघायला लागलो.

तेवढ्यात सुनितावहिनीने मागून येऊन मानेवर अजून एक फटका हाणला. मी दात ओठ खात रागाने मागे बघितलं तर सुनितावहिनीचे दोन्ही डोळे गच्च भरले होते. माझे ही डोळे गच्च भरून आले. मी हात जोडले आणि म्हणलं “वहिनी माफ कर. माझं चुकलं. अजून काय मारायचं बाकी राहिलं असेल तर सांग घे मार मला. सगळा राग शांत करून टाक”. वहिनी काहीच बोलली नाही. मी तसंच हात जोडून म्हणलं “निघतो वहिनी. एकाच दिवसाची सुट्टी काढून आलो होतो. उशीर होईल जायला गाडी मिळणार नाही” असं म्हणून निरोप घेऊन पाठ तिच्याकडे केली आणि चालायला लागलो तेवढ्यात, माझं मनगट वहिनीने हातात घट्ट धरलं आणि आणि हात जोरात मुरगाळात वहिनी म्हणली. “मला उपाशी ठेवून जाऊच कसं वाटतय भावजी तुम्हाला”. खळकन डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. मागे फिरलो, आणि वहिनीच्या गळ्यात पडलो. तिच्यापेक्षा माझी उंची वाढली होती. हुंदके बाहेर पडू लागले. वहिनीही रडू लागली. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

सुनितावहिनी पदराने माझं तोंड पुसत होती. आणि एका हाताने मला धरून जिकडे जेवणाची पंगत बसली होती तिकडे घेऊन चालली होती. आणि मला हळूच म्हणत होती “ओय भावजी ती बघा ती हिरव्या ड्रेसमध्ये जी उभी आहे ना ती लै तुमच्याकडे बघतेय बर का लावा जरा सेटिंग” मला हसूही येत होतं आणि रडूही येत होतं. आणि आमच्या घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उगवताना दिसत होतं.

वहिनीने एका ताटात वाढून घेतलं. दादा एका बाजूला आणि वहिनी एका बाजूला बसली दोघांच्या मध्ये मी. दादाने एक गुलाबजाम माझ्या तोंडात त्याने स्वतःच्या हाताने कोंबला. इकडून वहिनीने भाताचा घास माझ्या ओठाजवळ केला. आणि फोटू वाल्याला आमची सुनिता वहिनी म्हणत होती “अरे ये फोटूवाल्या काढ की आमचा बी एक फोटू”

कॅमेरावाल्याने क्लीक केलं आणि मंडपात गाणं वाजू लागलं.

“पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा

संसारातून वेळ काढूनी खेळ खेळूया नवा

होम मिनिस्टर… होम मिनिस्टर.. होम मिनिस्टर

वहिनी बांदेकर पैठणी घेऊन आला.. ”

आणि डोळ्यातली आसवं पुसत पुसत सुनितावहिनी मला घास भरवू लागली.

अशा कित्येक सुनीतावहिनी प्रत्येकाच्या घरात आहेत. ज्यांच्यापर्यंत पैठणी पोहचलीच नाही. त्या वहिनीपर्यंत आमच्या नक्षीदार नात्याची पैठणी मात्र पोहचती करा.

— समाप्त —

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-७ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-७ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

आई जोगेश्वरीची सेवा…

आईने नानांच्या पिठाला मीठ जोडण्यासाठी केलेल्या अनेक उद्योगांपैकी आणखी एक उद्योग म्हणजे पाळणाघर. शेजारच्या दोन मुली आणि रुबी हॉस्पिटलला एक सिस्टर होत्या, योगेशच्याआई म्हणतो आम्ही त्यांना. त्यांची दोन मुलं आणखी एक शेजारचे तान्हे बाळ पण होते. योगेशच्या आईंची शिप्ट ड्युटी असायची. त्यांच्या वेळेप्रमाणे आईने मुलं अगदी नातवंडा सारखी सांभाळली. आई अगदी बांधली गेली होती. ही बाळं मोठी झाली त्यांनाही बाळं झाली, तरी त्या मुलांनी आणि त्यांच्या आयांनी जाणीव ठेवली. जोगेश्वरीचे दर्शन घेऊन त्या आमच्याकडे यायच्या आणि म्हणायच्या, “माजगावकर काकू जोगेश्वरी नंतर दर्शनाचा मान तुमचा आहे. देवी नंतर दर्शन घ्यावं तर ते तुमचचं. “ज्योत से ज्योत जलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो, ” हे आई चं ब्रीदवाक्य होत. सेवा भावी वृत्तीमुळे तिने माणसं जोडली, ती म्हणायची कात्री सारखी माणसं तोडू नका, ‘ सुई’ होऊन माणसे जोडा. पै न पै वाचऊन खूप कष्ट करून सुखाचा संसार केला तिने. आईची बँक मजेशीर होती. नाणी जमवून ती एका डब्यात हळदीकुंकू वाहून पूजा करून देव्हाऱ्यात ठेवायची. आईचं रोज लक्ष्मीपूजन व्हायच. आम्ही म्हणायचो “आई तुझी रोजच दिवाळी असते का गं ? रोज लक्ष्मीपूजन करतेस मग रोज लाडू कां नाही गं करत दिवाळीतल्या सारखे?आता कळतंय कशी करणार होती आई लाडू? रेशनची साखर रोजच्यालाच पुरत नव्हती. गुरुविण बाई आईला नेहमी त्यांच्या घरी बोलवायच्या. त्यावेळी देवीपुढे नाणी खूप जमायची, इतकी की नाणी वेगवेगळी करण्यासाठी खूप वेळ जायचा, मान पाठ एक व्हायची. पण देवीची सेवा म्हणून आई ते पण काम करायची. गुरव श्री. भाऊ बेंद्रे हुशार होते त्यांनी रविवार पेठेतून बोहरी आळीतून तीन-चार मोठ्या भोकाच्या चाळण्या आणल्या. आईचं बरचसं काम सोप्प झाल. भोकं बरोब्बर त्या त्या नाण्यांच्या आकाराची असायची त्यामुळे पाच, दहा, 25 पैसे, अशी नाणी त्या चाळणी तून खाली पडायची. घरी पैसे वाचवणारी आई देवी पुढची ती नाणी मोजताना अगदी निरपेक्ष प्रामाणिक असायची. गरिबी फार फार वाईट असते. गुरुविण बाई आईकडे सुरुवातीला लक्ष ठेऊन असायच्या. विश्वासाने आईने त्यांच मन जिंकल. दहा पैसे सुद्धा तिने इकडचे तिकडे केले नाही. चाळून झाल्यानंतर पैसे मोजणी व्हायची वेगवेगळी गाठोडी करून आकडा कागदावर लिहून त्या गाठोड्याची गाठ पक्की व्हायची. देवळातल्या मिळकतीचा आणि त्या गाठोड्यातील पैशांचा गुरव बाईंना अभिमान होता. त्या श्रीमंत होत्या. तितक्याच लहरी पण होत्या. पण आईने त्यांची मर्जी संभाळली. मूड असला तर त्या सोबत म्हणून आईला सिनेमाला घेऊन जायच्या. आणि कधी कधी मुठी मुठीने नाणी पण द्यायच्या. जोगेश्वरी पुढे साड्यांचा ढीग पडायचा. मनात आलं तर त्या नारळ पेढे, तांदूळ, फुटाणे आणि साडीची घडी आईच्या हातात ठेवायच्या. देवीचा प्रसाद म्हणून अपार श्रद्धेने आई ती साडी घ्यायची, आणि दुसऱ्या दिवशी नेसायची तेव्हा आई आम्हाला साक्षात जोगेश्वरीचं भासायची. कधीकधी गुरवबाई भरभरून एकत्र झालेले देवी पुढचे तांदूळ गहू पण आम्हाला द्यायच्या. आई त्याची सुरेख धिरडी करायची. तिची चटणी आणि बटाट्याची भाजी इतकी लाजवाब असायची की समोरच्या उडपी हॉटेलचा मसाला डोसा पण त्याच्यापुढे फिक्का पडायचा. हा जेवणातला सुरेख बदल आणि चविष्टपणा चाखून माझे वडील आईला गंमतीने म्हणायचे, “इंदिराबाई मनात आलं तर देऊळ सुद्धा गुरवीण बाई तुमच्या नावावर करून देतील. ” “काहीतरीच तुमचं! “असं म्हणून आई गालांतल्या गालांत हंसायची. आई नानांच्या गरीबीच्या संसाराला विनोदाची अशी फोडणी असायची. खिडकीतून दिसणाऱ्या जोगेश्वरीच्या कळसाला हात जोडून आई म्हणायची, ” आई जगदंबे देऊळ नको मला, आई अंबे तू मात्र आमच्या जवळ हवीस. आईने मनापासून केलेली प्रार्थना फळाला आली आणि रोड वाइंडिंग मध्ये आमची जागा गेल्याने आम्हाला तिथेच (पोटभरे) पेशवेकालीन मोरोबा दादांच्या वाड्यात आम्हाला जागा मिळाली तेही दिवस आमचे मजेत गेले. धन्यवाद त्या मोरोबा दादांच्या वाड्याला आणि तुम्हालापण..

आई जोगेश्वरी माते तुला त्रिवार वंदन .

– क्रमशः भाग सातवा

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “अरुणोदय…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “अरुणोदय…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

 झाडांच्या सावल्या नि कोवळ्या उन्हाचे कवडसे एकमेकांशी छापा पाणी खेळत राहीले तडागाच्या काठावर… वारा हलकासा मंद मंद पणे झाडांच्या फांद्या पानाआडून लपून बसून त्यांचा खेळ शांत चित्ताने बघत राहिला… मातृवात्सल्याने ओतप्रोत भरलेल्या तडागाचे जल त्यांचा हा खेळ चालेला पाहून आनंदाने उमटणारी हास्याची लकेर लहरी लहरीने त्याच्या गालावर पसरून राहिली… निशब्द झालेला परिसर महान तपस्वी प्रमाणे भास्कराच्या आगमानाला पूर्वदिशा लक्षून आपल्या ओंजळीने अर्ध्य देते झाले… पहाटेच्या दवबिंदूच्या शिडकाव्याच्या सिंचनाने सारी कोवळी हिरवीगार तृणपाती सचैल सुस्नात होऊन टवटवीत होऊन गेली… त्यांच्या अग्रा-अग्रावर हट्टी बालकाप्रमाणे पित्याच्या अंगाखांद्यावर बसावे तसे दवाचा नाजूक थेंब मला इथचं बसायच असा हट्ट धरून बसले.. भास्कराची सोनसळी खाली उतरून त्या तृणपातींच्या उबदार गुदगुल्या करून जाताना त्या अग्रावर च्या दव बिंदूला मोत्याप्रमाणे चमचमवीत राहिले… विजयाचा झळाळता शिरपेच मस्तकावर धारण केल्यासारखे ते प्रत्येक तृणपाती वरील दवबिंदू विजयाची मिरवणूक निघावी तसे जयजयकार करत आपापली मस्तके उंचावत राहिली… राज मार्गाच्या दुतर्फा वर सामान्य रयतेने दाटीवाटीने उभे राहून या विजयी सोहळ्याचं विहंगम दृश्य पाहत उभे राहावे तसे झाडाझुडपांची लता-वेलींची फांद्या पाने फुले नि फळे देखिल मानवंदना देण्यासाठी माना लवलवून झुकते राहिले… आणि आणि हळूहळू त्या मार्गावरून अरूणाने आपल्या शुभ्र धवल सप्त अश्वांचा रथ मार्गस्थ केला…. तेव्हा घरट्यातले किलबिल करणारे पक्षी त्या तांबड्या, पिवळ्या रंगीत आकाशाच्या मंडपात मुक्त विचरते झाले… आकाशीचा चंडोल निघाला अरुणाचा दूत होऊन अरुणाची आगमनाची वार्ता घेऊन… चरचरात चैतन्य फुलले… नि वसुंधरेचे कपोल रक्तिमेसारखे लालीने मोहरले…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- सुजाता असं काही करणं शक्यच नाही. मी माझ्या मनाला बजावून सांगितलं. पण तरीही ते साडेआठशे रुपये गेले कुठं हा प्रश्न मात्र माझं मन जाळत राहिला. ) 

“आता प्रॉब्लेम मिटलाय सर. पैसेही वसूल झालेत”

सुहास गर्देनी सांगितलं आणि मी दचकून बघतच राहिलो क्षणभर.

“प्रॉब्लेम मिटलाय? पैसे वसूल झालेत? कसे?कुणी भरले?”

“मी ‘लिटिल् फ्लॉवर’ ला त्याच दिवशी संध्याकाळी फोन करून सांगितलं सर. त्यांनी लगेच पैसे पाठवले. “

ऐकून मला धक्काच बसला. काय बोलावं मला समजेचना. मिस् डिसोझांना फोन करण्यासाठी रिसिव्हर उचलला खरा पण हात थरथरू लागला. फोन न करताच मी रिसीव्हर ठेवून दिला. माझ्या अपरोक्ष नको ते नको त्या पद्धतीने घडून गेलं होतं. सुहास गर्देनं बाहेर जाऊन स्वतःचं काम सुरू केलं पण जाताना त्याच्याही नकळत त्यानं मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभ केलंय असंच वाटू लागलं. माझ्यासमोर उभं राहून मिस् डिसोझा संशयीत नजरेनं माझ्याकडेच पहात आहेत असा मला भास झाला आणि मी भानावर आलो. खुर्ची मागे सरकवून ताडकन् उठलो. माझ्या अस्वस्थ मनात अचानक अंधूक प्रकाश दाखवू पहाणारा एक विचार चमकून गेला आणि केबिनचं दार ढकलून मी बाहेर आलो. )

“सुजाता, त्यादिवशी निघताना मी ‘लिटिल् फ्लाॅवर’ची कॅश तुला दिली तेव्हाच ‘ती मोजून घे’ असं सांगितलं होतं. हो ना?” तिने चमकून माझ्याकडं पाहिलं. ” ते पैसे मी स्वतः मोजून घेतले होते. एखादी नोटही कमी असणं शक्यच नाही. खात्री आहे मला. ती तशी असती तरीही मी एकवेळ समजू शकलो असतो. पण पन्नास रुपयांच्या चक्क १७ नोटा? नाही.. हे शक्यच नाही. कांहीतरी गफलत आहे. “

भेदरलेल्या सुजाताचे डोळे भरून आले. माझा चढलेला आवाज ऐकून सर्व स्टाफ मेंबर्स चमकून माझ्याकडे पहात राहिले. सुहास गर्देंची बसल्या जागी चुळबूळ चालू झाल्याचं मला जाणवलं.

“सुहास, कॅश शॉर्ट आहे हे तुमच्या केव्हा लक्षात आलं होतं?”

“टोटल कॅश रिसीट टॅली करताना सुजाताच्याच ते लक्षात आलं होतं सर. ” 

“पण म्हणून फरक ‘लिटिल् फ्लॉवर’च्या कॅशमधेच कसा ? इतर रिसीटस् मधे असणार नाही कशावरून?”

सुजातानं घाबरुन सुहासकडं पाहिलं.

“सर, तिच्या काउंटरला शनिवारी खूप गर्दी होती. त्यामुळे तुम्ही दिलेली कॅश आणि स्लीपबुक दोन्ही सुजातानं न मोजता बाजूला सरकवून ठेवलं होतं. गर्दी कमी झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तिनं ती कॅश मोजली तेव्हा त्यात पन्नास रुपयांच्या १७ नोटा कमी असल्याचं तिच्या लक्षात आलं. “

“आणि म्हणून तुम्ही लगेच मिस् डिसोझांना फोन केलात. “

“हो सर”

आता यापुढे त्यांच्यासमोर डोकं आपटून घेण्यात काही अर्थच नव्हता. मिस् डिसोझांना मी तातडीने फोन करणं गरजेचं होतं पण माझं धाडस होईना. स्वतःच एखादा भयंकर गुन्हा केलेला असावा तसं मलाच अपराधी वाटत राहिलं. त्याना फोन करण्यापेक्षा समक्ष जाऊन भेटणंच योग्य होतं. तेही आत्ता, या क्षणीच. पण जाऊन सांगणार तरी काय? रिक्त हस्ताने जाणं पण योग्य वाटेना. त्यासाठीआठशे पन्नास रुपये अक्कलखाती खर्च टाकून स्वत:च ती झळ सोसण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. त्याकाळी ८५० रुपये ही कांही फार लहान रक्कम नव्हती. आपल्या खात्यांत तेवढा बॅलन्स तरी असेल का? मला प्रश्न पडला. मी आमचं स्टाफ लेजर खसकन् पुढं ओढलं. माझ्या सेविंग्ज खात्याचा फोलिओ ओपन केला. पाहिलं तर नेमका ८५५/- रुपये बॅलन्स होता!

त्याकाळी मिनिमम बॅलन्स पाच रुपये ठेवायला लागायचा. मागचा पुढचा विचार न करता मी विथड्राॅल स्लीप भरून ८५०/- रुपये काढले. पैसे घेतले आणि थेट बाहेरचा रस्ता धरला.

“मे आय कम इन मॅडम?”

मिस् डिसोझांनी मान वर करून पाहिलं. त्यांच्या कपाळावर सूक्ष्मशी आठी दिसली. चेहऱ्यावरचं नेहमीचं स्मितहास्य विरुन गेलं. एरवीची शांत नजर गढूळ झाली.

त्यांनी समोर बसण्याची खूण केली.

“येस.. ?”त्यांनी त्रासिकपणे विचारलं.

“मी मीटिंगसाठी कोल्हापूरला गेलो होतो मॅडम. आज पहाटे आलो. सकाळी ब्रॅंचमधे गेलो तेव्हा सगळं समजलं. माय स्टाफ शुड नॉट हॅव रिकव्हर्ड दॅट अमाऊंट फ्रॉम यू. आय एॅम रिअली सॉरी फॉर दॅट”

त्यांच्या कपाळावरच्या आठ्या अधिकच वाढल्या.

“सोs? व्हॉट मोअर यू एक्सपेक्ट नाऊ फ्रॉम अस?”त्यांनी चिडून विचारलं.

मी कांही न बोलता शांतपणे माझ्या खिशातले ८५० रुपये काढले. ते अलगद त्यांच्यापुढे ठेवले.

“व्हाॅट इज धिस?”

“त्यांनी तुम्हाला फोन करून तुमच्याकडून ते पैसे रिकव्हर करायला नको होते. आय नो. बट दे वेअर इनोसंट. प्लीज फरगीव्ह देम. त्यांची चूक रेक्टिफाय करण्यासाठीच मी आलोय. तुमच्याकडून पैसे मोजून मी माझ्या ताब्यात घेतले त्या क्षणीच आपल्यातला व्यवहार पूर्ण झालेला होता. त्यामुळे पुढची जबाबदारी अर्थातच माझी होती. ती मीच स्वीकारला हवी. सोs.. प्लिज एक्सेप्ट इट‌. “

“बट व्हॉट अबाउट दॅट शाॅर्टेज? समबडी मस्ट हॅव प्लेड अ मिसचिफ. “

“नाॅट नेसिसरीली. ती एखादी साधीशी चूकही असू शकेल कदाचित. आय डोन्ट नो. त्याचा शोध घ्यायला हवा आणि मी तो घेईन”

“दॅट मीन्स यू आर पेईंग धिस अमाऊंट आऊट ऑफ युवर ओन पॉकेट. इजण्ट इट?”

“येस. आय हॅव टू. “

त्या नि:शब्दपणे क्षणभर माझ्याकडे पहात राहिल्या. त्याच्या कपाळावरच्या आठ्या अलगद विरून गेल्या. गढूळ नजर स्वच्छ झाली. त्यांच्या चेहऱ्यावरचं नेहमीचं प्रसन्न स्मितहास्य पाहून मी समाधानानं उठलो. त्यांचा निरोप घेऊन जाण्यासाठी वळणार तेवढ्यात त्यांनी मला थांबवलं.

“सी मिस्टर लिमये. फॉर मी, हा प्रश्न फक्त पैशाचा कधीच नव्हता. हिअर इज ह्यूज अमाऊंट ऑफ इनफ्लो ऑफ फंडस् फ्रॉम अॅब्राॅड रेगुलरली. सो एट फिफ्टी रुपीज इज अ व्हेरी मिगर अकाऊंट फाॅर अस. पण प्रश्न प्रिन्सिपलचा होता. ते इंम्पाॅर्टंट होतं. तरीही विथ एक्स्ट्रीम डिससॅटीस्फॅक्शन त्या दिवशी मी त्यांना त्यांच्या मागणीनुसार ८५० रुपये पाठवून दिले. कारण त्याक्षणी आय डिडन्ट वाॅन्ट टू मेक इट अॅन बिग इश्यू. इट्स नाईस यू केम हिअर परसनली टू मीट मी. सो नाऊ द मॅटर इज ओव्हर फाॅर मी. आय रिक्वेस्ट यू… प्लीज हे पैसे घ्यायचा मला आग्रह नका करू. तुम्ही ते मला ऑफर केलेत तेव्हाच ते माझ्यापर्यंत पोचले असं समजा आणि पैसे परत घ्या. यू डोन्ट वरी फॉर माय लॉस. आय ॲम शुअर माय गॉड विल गिव्ह इट टू मी इन वन वे आॅर अदर”

त्या अगदी मनापासून बोलल्या. त्यात मला न पटण्यासारखं कांही नव्हतंच. पण पटलं तरी मला ते स्वीकारता मात्र येईना.

“मॅडम प्लीज. मलाही असाच ठाम विश्वास आहे मॅडम. माय गाॅड ऑल्सो वील स्क्वेअर अप माय लाॅस इन हिज ओन वे. मी आत्ता हे पैसे स्वतः देतो आहे ते केवळ कर्तव्यभावनेने आणि फक्त माझ्या स्वतःच्या समाधानासाठी. प्लीज एक्सेप्ट इट मॅडम. प्लीज. फाॅर माय सेक. “

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बहीण… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ बहीण… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

 

आईनंतर सर्वात जवळचे नाते कोणते असेल तर ते बहिणीचे. बहीण लहान असावी की मोठी यावर वाद होऊ शकतो पण बहीण असावीच असे प्रत्येकाचे मत असेल असे खात्रीने वाटते. ताई आणि माई. – घरात मोठी मुलगी असेल तर घराला आपसूक वळण लागते असे माझे मत आहे. जे आपण आई किंवा बाबांना सांगू शकत नाही ते आपण आपल्या बहिणीला नक्की सांगू शकतो. मन मोकळं करण्यासाठी सर्वात खात्रीचे, जवळचे कोण असेल तर बहीण, कारण तिच्यात आणि आपल्यातील वयाचे अंतर फार नसते त्यामुळे ती आपली मनःस्थिती अधिक सजगतेने समजून घेऊ शकते. कधी ती आपली ‘ढाल’ बनते तर कधी ‘तलवार’!!

बहीण लग्न होऊन प्रथम सासरी जायला निघते तो क्षण भावाच्या आयुष्यातील सर्वात कसोटीचा !! जरी ती सासरी गेली तरी तिची नजर कायम आपल्या भावंडांवर असते. पुढे कालांतराने आई वडील नसले तरी बहिणीमुळे भावाला एकाकीपण येत नाही. ती आपल्या आयुष्यात सावलीसारखी असते. ती शीतल छाया जरुर देते पण आपल्या आयुष्यात अडसर बनत नाही. द्रौपदीने हरीला चिंधी बांधली आणि तिच्या आयुष्याचे ‘सोने’ झाले. *’बहिण अथवा भावासाठी आपल्या आयुष्याची ‘चिंधी’ करणाऱ्या अनेक बहिणी या जगात आहेत. आज आपण त्यांना वंदन करू.

सर्वांस पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा!!!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पैठणीवरचं नक्षीदार नातं… भाग – 1 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

 

? मनमंजुषेतून ?

पैठणीवरचं नक्षीदार नातं… भाग – 1 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

झी मराठीवर होममिनिस्टर हा कार्यक्रम सुरू झालेला होता. रोज संध्याकाळी हा कार्यक्रम बघण्यात आमचं कुटुंब एकत्र बसलेलं असायचं. आणि आमच्या वहिनीला इथंच स्वप्नं पडायला सुरुवात झाली. की, होम मिनिस्टर माझ्याही घरी यावा. मलाही पैठणी मिळावी. आणि आपणही टीव्ही वर दिसावं. आणि वहिनी कार्यक्रम संपल्यानंतर आदेश भावजी जो नंबर सांगायचे त्यावर ती रोज मेसेज करू लागली. मी म्हणायचो तिला, “अगं वहिनी ते कशाला येतील आपल्या घरी एवढ्या दूर, ते फक्त पुणे मुंबईतल्याच घरी जात असतात. तू हा नाद सोडून दे. ” त्यावर वहिनी म्हणायची, “नितीन भावजी, बघा एक ना एक दिवस आपल्या घरी होममिनिस्टर येणारच असं म्हणून ती तिच्या कामात व्यस्त व्हायची. आणि मी त्यावर थोबाड बघावं आपलं आरशात” असं बोलून पळून जायचो. त्यावर ती मागून ओरडायची. ” या गिळायला मग बघते कोण देतंय ताट वाढून असं चिडून बोलायची. “आणि घरातले सगळेच खळखळून हसायचे. पण वहिनी अगदी पार त्यात गुंतून गेलेली असायची. प्रत्येक कार्यक्रम तो जवळ बसून बघायची. एकटीच उगाचच हसायची, मोठ्याने खिदळायची. मला गम्मतच वाटायची.

माझी बारावी झाली. आणि मी पुण्यात आलो. काम करून शिकायला लागलो. अधून मधून फोनवर दादाशी आणि वहिणीशी बोलणं व्हायचं. तिला कधी करमत नसलं की ती मला फोन करायची. मला करमत नसलं की मी तिला फोन करायचो. कारण तिच्याच मायेच्या पदराखाली मी मोठा झालो. सुनिता वहिनी माझ्यासाठी आई होती, मोठी बहीण होती, आणि मनातलं सगळं मनमोकळेपणाने बोलण्यासाठी हक्काची जागा होती.

मला तो दिवस आठवतोय. मी कंपनीमध्ये बसलो होतो. आणि समोर लँडलाईन फोन होता. चला म्हणलं वहिनीची जरा गंमत करूया. असं म्हणून मी रुमाल तोंडाला लावला आणि वहिनीला फोन केला, हा लँडलाईन चा नंबर बघून तिने तो कट केला. मी परत लावला मग तिने उचलला. मी जरा मोठ्या आवाजात रुमाल तोंडाला लावून अगदी शुद्ध पुणेरी भाषेत बोललो, “हॅलो, नमस्कार सुनिता चंदनशिवे यांच्याशी आम्ही बोलतोय का?”वहिनी घाबरत होय म्हणाली, मी लगेच पुढचं वाक्य बोललो, “ह आम्ही झी मराठी मधून होम मिनिस्टर या कार्यक्रमामधून बोलतोय आणि आम्ही उद्याच तुमच्या घरी कवठेमहांकाळ ला म्हणजे सांगलीला येतोय. आपली परवानगी आहे असे आम्ही समजावे का?” त्यावर वहिनी मोठ्याने तीन वेळा ” या या या” असं म्हणली. बाकीचं जरा इकडंच तिकडचं बोललो, आणि “उद्या संध्याकाळी आम्ही बरोबर पाच वाजता आपल्या घरी येत आहोत” असं म्हणून मी फोन कट केला. नंतर मी कामात व्यस्त होऊन गेलो. वहिनीला फसवलं याचा मनात आनंद झालेला होता. पण आनंदाने उड्या मारण्याचं माझं वय आता निघून गेलेलं होतं.

गावी मात्र सुनिता वहिनीने सगळीकडे बोंबलत ही बातमी आनंदाने पसरवली. भावाला कामावरून सुट्टी काढून बोलावून घेतलं. तिचा आनंद बघून सगळेच आनंदी झाले. साफसफाई सुरू झाली. नव्या दोन साड्या आणल्या. ही बातमी बायकांच्या जवळची असल्यामुळे आपोआप सगळ्या गावभर झाली. आणि सुनिता वहिनी एकदम सेलिब्रिटी झाली. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. वहिनीने तिच्या तीन बहिणी, तिचे दोन भाऊ, माहेरची सगळी माणसं आई वडील, तिच्या मावशी, सगळ्यांना ताबडतोब गाडीला बसायला सांगितलं. बघता बघता बातमी ग्रामपंचायतपर्यंत पोहचली. आपलं गाव टीव्ही वर दिसणार म्हणून सरपंच, उपसरपंच इतर सदस्य आणि विरोधी पक्षातले पण सगळ्यांची मिटिंगसुद्धा बसली. आणि बघता बघता आमचं घर आणि आमच्या सुनिता वहिनीची चर्चा वाऱ्यागत पसरत राहिली. सेलिब्रिटी असल्यागत आमची वहिनी वागू लागली. अचानक तिचं ग्रामीण बोलणं अगदी शुद्ध झालं. तिचं चालणं तिचं बोलणं सगळं बदलून गेलं. आमचा दादाही तिच्या आनंदात हरवून गेला. आणि लग्नात सुद्धा एवढं मेकअपचं सामान आणलं नव्हतं त्याहून कितीतरी जास्त आणि महाग सामान दादाने तिला आणून दिलं. दोन तासात त्याने आणि त्याच्या मित्रानी घर ही रंगवून काढलं. आणि सगळ्या गावात होमिनिस्टरचं वातावरण तयार झालं. बिश्या फोडून आमच्या घरातल्या सगळयांना नवीन कपडे घेतले गेले. मला यातलं एक टक्काही काही माहीत नव्हतं. मी माझ्याच नादात इकडं रमून गेलो. आणि आपण वहिनीला होममिनीस्टर बोलतोय म्हणून फोन केला होता हे ही विसरून गेलो. कारण अशा गमती जमती करणं हा माझा रिकामा उद्योगच होता.

त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच तिच्या माहेरहून वीस पंचवीस माणसं लहान लेकरं वेगळीच. अस सगळं गणगोत गोळा झालं. आणि फार मोठा उत्सव असल्यागत वातावरण झालं. नुसतं आमच्या घरातच नाही तर गल्लीतसुद्धा सगळ्यांच्या तोंडात एकच चर्चा एकच विषय आणि तो म्हणजे होममिनिस्टर आणि सुनिता. आणि आमच्या सुनिता वहिनीचा रुबाब म्हणजे काय सांगावं. तिच्यासमोर इतर बायका म्हणजे चिल्लरच. एकटीचीच बडबड, सगळ्यांना आदेश सोडत होती. ये असं करायचं, तसं करायचं कुणी दंगा करायचा नाही. मध्ये मध्ये बोलायचं नाही. आणि सगळेजण तिचा आदेश नम्रपणे ऐकून घेत होते. आणि सुनिता वहिनी एका वेगळ्याच दुनियेत हरवून गेली होती.

सायंकाळचे चार वाजून गेले. घरासमोर गर्दी झाली. सुनिता वहिनी बघावं आणि बघतच राहावं अशी नटली होती. सगळे नातेवाईक नटून थटून बसलेले होते. अजून कसं कुणी आलं नाही म्हणून हळूहळू वातावरण काळजीचं होऊ लागलं. दादाने तिच्या मोबाईलवर आलेल्या म्हणजे मी केलेल्या नंबरवर परत परत फोन करायला सुरुवात केली. पण फोन काही कुणी उचलत नव्हतं. कारण रविवार होता आणि ऑफिस बंद होतं. मी रूमवर झोपलो होतो. काय झालं कुणास ठाऊक, वडिलांना शंका आली आणि त्यांनी मला फोन केला. मी वडिलांचा नंबर फादर म्हणून सेव्ह केला होता. मी फोन उचलला तसे वडील म्हणाले, ” हे बघ मी तुझा बाप आहे, मी जे विचारीन त्याचं एकाच शब्दात उत्तर द्यायचं आणि खरं द्यायचं. “मी घाबरलो, अण्णा असं का बोलतायत म्हणून मी उठुनच बसलो. फोन कानाला आवळून धरला. आणि वडील म्हणाले, ” ते कोण टीव्ही वाले येणारयत म्हणून सुनिताला काल तूच फोन केला होता का?”मी गप्प झालो, वडिलांनी आवाज वाढवून पुन्हा विचारलं आधीच धमकी दिली होती मी पटकन म्हणलं ” होय अण्णा मीच काल आवाज बदलून वहिनीला फोन केला होता. “त्यावर अण्णांनी असल्या शिव्या दिल्या मला की बस्स. आपोआप डोळ्यातून पाणी यायला लागलं. मी फोन कट केला. आणि माझ्या बहिणीला फोन केला, म्हणलं “तायडे, काय सुरुय ग घरी, ?'” त्यावर माझी बहिण इतक्या आनंदाने तिथल्या वातावरणाबद्दल सांगत होती. आणि माझ्या छातीत चमकत चाललं होतं. आणि डोळ्यासमोर हातात हिरव्यागार बांगड्या, तळहातावर मेहंदी काढलेली, आणि नटलेली सुनिता वहिनी दिसू लागली. मी फोन कट केला. आणि मला दम लागला.

तिकडे वडिलांनी सुनिता वहिनीला आणि इतर लोकांना कसं सांगितलं माहीत नाही. पण सुनिता वहिनी मात्र हे सगळं नितीन भावजीने केलं आहे. आपली इतकी मोठी फसवणूक झालीय या धक्क्याने गपकन खालीच बसली होती. ती रडत ही नव्हती कुणाशी बोलत ही नव्हती. एकटक ती दातात ओठ पकडून भिंतीकडे बघत बसली होती. सगळं वातावरण काही काळ शांत झालं होतं. सुनिता वहिनीला हा फार मोठा धक्का बसला होता. आणि सगळ्यांच्या तोंडात एकाच नावाने शिव्या सुरू झाल्या होत्या आणि तो ग्रेट माणूस नितीन चंदनशिवे म्हणजे मी होतो. तिच्या माहेरून आलेल्या तिच्या बहिणी तर वाट्टेल तसं बोलत होत्या. सगळेजण सुनिता वहिणीला एकच वाक्य बोलत होते

” घे तुझा लाडाचा नितीन भावजी. लै बोंबलत होतीस माझा नितीन भावजी माझा नितीन भावजी. कर अजून लाड त्याचा. बस ताटात घेऊन त्यालाच. चांगलं पांग फेडलं बघ तुझ्या भावजीने. ” … समोर भिंतीच्या फळीवर माझा फोटो मी एका काचेच्या फ्रेममध्ये बनवून ठेवला होता. वहिनी अचानक उठली आणि तिने तो फोटो जोरात फरशीवर आपटला. सगळ्या घरात काचा झाल्या. कुणीच काही बोललं नाही.

माझ्या मोबाईलवर सगळ्यांचे फोन यायला सुरुवात झाली. मी उचलायचो कानाला लावायचो आणि शिव्या खायचो. तोंडातून आवाज निघत नव्हता. वहिनीची केलेली मस्करी चांगलीच महागात पडली होती. आनंदाने उत्साहाने भरलेलं घर एका क्षणात शांत झालं. सगळेजण आपल्या आपल्या गावी निघून गेले. आणि सुनिता वहिनी आजारी पडली. चार दिवस घराच्या बाहेर आली नाही. तिने टीव्ही लावला नाही. कुणाशीच बोलली नाही. आईने आणि बहिणीने मला बजावून ठेवलं. दोन तीन महिने इकडं यायचं नाव काढू नकोस. तिचा राग शांत झाला की मग ये. पण माझं धाडसच होत नव्हतं.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares