मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दामकृपा मंडळाचं सभासदत्व… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? मनमंजुषेतून ?

☆ दामकृपा मंडळाचं सभासदत्व… ☆  श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

दामकृपा मंडळाचं सभासदत्व – – 

२५ जानेवारीची संध्याकाळ. आधीच शनिवार-रविवार आणि त्यात पुन्हा राष्ट्रीय सुट्टी आलेली. आजूबाजूची सगळी शोरुम्स आणि मॉल्स गर्दीनं खचाखच भरून वाहत होते. कुणाला तरी भेटायला गेलो होतो आणि तिथं आम्हाला बराच वेळ लागला, म्हणून जवळच्या एका मॉलमध्ये आम्ही पोट भरण्यासाठी गेलो. पण तिथल्या कॅफेटेरियाचे दर बघून आमचे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली. पंधरा-वीस स्टॉल्स होते खरे. पण किंमती अवाढव्य होत्या. ८० रुपयांची पाणीपुरी, २०० रुपयांचं सँडविच, १८० रुपयांपासून पुढे सुरू होणारी चाट हे खिशापेक्षा मनालाच परवडत नव्हतं.

मी त्यांना म्हटलं, “जाऊ द्या. आपण टपरीवर चहा घेऊ. ” 

ते म्हणाले, “जीबीएस कसा भडकला आहे, बघतोयस ना? उघड्यावरचं काही नको रे बाबा. ” आम्ही पंधरा वीस मिनिटं तिथं होतो आणि शेवटी काहीही न खाता पिता तिथून निघालो. पण त्या मॉल मध्ये जे दृश्य होतं, ते बघून मला धक्काच बसला.

तरुण मुलामुलींची तर गर्दी होतीच, शिवाय शेकड्यांनी परिवारसुद्धा होते. तिथं पाणीसुद्धा विकत घेऊन प्यावं लागत होतं. चार-पाच जणांचं बिल एक हजाराच्या वर सहजच जात असेल. कितीतरी लहान लहान मुलं त्या कॅफेटेरिया मध्ये जंक फूड मनसोक्त खात होती. कॉलेजवयीन मुलामुलींच्या जोड्या होत्या. ५०० रुपयांचं सिझलर घेऊन टेबलावर गप्पा मारत बसलेलं एक युगुल दहा मिनिटांनी ती डिश तिथंच तशीच टाकून उठून निघून गेलं. कितीतरी लोक खाणं अर्धवट टाकून उठून निघून जात होते. छोले भटुरे मागवलेल्या एका ग्रुपनं तर निम्मे भटुरे तसेच टाकले. विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा अर्धवट टाकून निघून गेलेले लोक मी बघत होतो.

बरं, असला “टाकून माजण्याचा” मस्तवालपणा करणारी जी जनता होती, ती काही मर्सिडीज क्लास नव्हती. सगळेच्या सगळे मध्यमवर्गीयच होते. “पेट्रोल २५ पैशांनी महागले अन् जनतेचे कंबरडे मोडले” किंवा “कोथिंबीर कडाडली, लोकांनी खायचं काय?” असले मथळे लिहिणाऱ्यांनी मॉलमधले हे मध्यमवर्गीय बघितलेले असतात का? असा प्रश्न मला पडला.

मेसचे डबे लावून जेवणाऱ्या मुलांचं आणि मुलींचं मी अनेकदा निरीक्षण केलंय. आठवड्यातून तीनदा तरी डब्यातलं अन्न जसंच्या तसं कचऱ्यात गेलेलं असतं. घराघरांतून गोळा केला जाणारा ओला कचरा तुम्ही अवश्य पाहा. चांगल्या प्रतीचं ब्रँडेड अन्न कचऱ्यात फेकून दिलेलं तुम्हाला दिसेल. हॉटेलमध्ये सँडविचच्या डिशमध्ये कोबी किसून डेकोरेट करून सर्व्ह करतात. तो कच्चा कोबी कितीजण खातात? मोठमोठ्या कॉफी शॉप्स मध्ये मी पाहतो, मला फार वाईट वाटतं. पाचशे-सातशे रुपये किंमतीची कॉफी अर्धवट टाकून लोक निघून जातात. पाचशे रुपयांतले तीनशे रुपये आपण कचऱ्यात ओतले, याचं त्यांना भानही नसतं आणि त्याचं त्यांना वाईटही वाटत नाही.

एकदा सोलापूरहून पुण्याला येत असताना एका प्रसिद्ध हॉटेल मध्ये आम्ही ब्रेक घेतला. शेजारच्या टेबलावर सात आठ जण बसले होते. आठ जणांनी आठ वेगवेगळ्या भाज्या मागवल्या. इतके स्टार्टर्स, इतक्या डिशेस. . टेबल अख्खं भरलं होतं. पण खाल्लं किती? जितकं मागवलं होतं त्यातलं निम्मंसुद्धा नाही. . ! बिल भरून माणसं निघूनही गेली.

याला आपण नेमकं काय नाव द्यावं? ‘महागाई किती वाढलीय’ असं ओरडणारी अगदी साधी साधी माणसंसुद्धा वडापाव घेताना पाच सात मिरच्या घेतात आणि त्यातली एखादीच खाऊन बाकीच्या चक्क कचऱ्यात टाकतात. . ! पराक्रम दाखवण्याच्या नादात एक्स्ट्रा तिखट मिसळ मागवतात आणि चार घासांतच त्यांचा धीर गळून पडतो. अन्न वाया. . ! सँडविचची हिरवी चटणी जास्तीची घेतात आणि टाकून देतात. . ! एखाद्या सँडविचवाल्याची किलोभर हिरवी चटणी दररोज सहजच उकिरड्यावर जात असेल. .

गुरुवारी – शनिवारी देवळाबाहेर हात पसरून बसलेली माणसं सुद्धा आता रुपया-दोन रुपयांचं नाणं, पार्ले बिस्कीट पुडा, एखादा वडापाव असलं काही दिलं तरी तोंड वेंगाडतात. त्यांना दहा रुपयांचं नाणं हवं असतं. ताजी पोळी-भाजी दिली तरी टाकून देणारे सुद्धा भिकारी मी पाहिलेत. मग भीक मागण्यामागची त्यांची नेमकी भावना तरी काय? आपल्याला आपल्या पात्रतेनुसार किंवा पात्रतेपेक्षा कितीतरी अधिक पटींनी मिळतंय, याची जाणीव इथेही दिसत नाही.

न कमावणारे, कमी कमावणारे, भरपूर कमावणारे, आपकमाईवाले, बापकमाईवाले सगळे सगळे या एकाच बोटीत बसलेले आहेत. काहीजणांची ही वृत्तीच आहे आणि काहीजणांना आपलं काहीतरी चुकतंय याची लांबलांबपर्यंत जाणीवच नाही. आणि दुसरं कुणी ह्यांना ही जाणीव करून द्यायला तयार नाही.

महिन्यातले पंधरा दिवस मेसचा अख्खा डबा कचऱ्यात टाकणारे विद्यार्थी आणि मुलांच्या हट्टापायी भारंभार पदार्थ मागवून त्यातलं निम्म्याहून जास्त अन्न टाकणारे सुशिक्षित पालक दोघेही समाजाचे दोषी नाहीत का ? 

महागाई वाढल्याचं ढोंग करणारी माणसं त्यांची जीवनशैली जराही बदलायला तयार नाहीत. बापकमाईवर घेतलेला ब्रँडेड कपडा जास्तीत जास्त चार पाच वेळा घालून कपाटात कोंबणारे अन् पुढच्या महिन्यात पुन्हा नवे कपडे घेणारे विद्यार्थी त्यांच्या आयुष्याचा नेमका कसा विचार करत असतील? त्यांचे आईवडील त्यांना दर महिन्याला पैसै पाठवताना काय विचार करत असतील? कॉलेजच्या ऑफिसात फी माफीचे अर्ज करून घेणारी मुलं मला जेव्हा त्यांच्या परमप्रिय मैत्रिणीसोबत फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये दीडशे रुपयांचा उत्तप्पा खाताना दिसतात, तेव्हां त्यांची गरिबी नेमकी कोणती? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण कॉलेजची फी खोटं कारण दाखवून माफ करून घेऊन हॉटेलात एकावेळी पाचशे रुपयांची नोट खर्च करणं हे प्रामाणिक माणसाचं लक्षण नाही.

आमच्या आजूबाजूच्या परिसरात रात्री बारा वाजता पंधरा वीस बुलेट बाइक्स मोठाला आवाज करत गेल्या आणि अर्धा तास हवेत तीन चार हजार रुपयांची फटाक्यांची आतषबाजी होत राहिली की, आपण ओळखावं – आज कुठल्यातरी बेरोजगार दिवट्याचा वाढदिवस आहे आणि चार घरी धुणीभांडी करून घराचा गाडा ओढणाऱ्या आपल्या आईच्या कमाईवर फुकट मजा मारणारं पोरगं आज एक वर्षानं मोठं झालं आहे. . ! रेशनचं अन्न आणून जगणाऱ्या घरच्या पोरांचे वाढदिवस रात्री बारा वाजता भर रस्त्यावर दोन-दोन केक आणून कसे होतात? सर्वच स्तरांमध्ये माणसांच्या जगण्याच्या व्याख्या बदलतायत आणि त्या अमिबासारख्या आकार उकार बदलत चालल्या आहेत, हे स्पष्ट दिसतं. याचा विचार कुणी एकट्यानं नव्हे तर, संपूर्ण समाजव्यवस्थेनं केला पाहिजे आणि तो अत्यंत गंभीरपणे केला पाहिजे.

लोकांच्या खिशात पैसा उदंड झालाय? जास्तीचे पर्याय सहज उपलब्ध झालेत? मोकळीक अन् स्वातंत्र्य वाढलंय? की माणसाला कशाचीच किंमत राहिली नाहीय? जाणिवांचं श्राद्ध घालून कुठल्याशा पोकळ धुंदीत वागण्याची ही रीत समाजातल्या सर्वच स्तरांमध्ये जाणवण्याइतपत वाढतेय, हे प्रगतीचं अन् शहाणपणाचं लक्षण मानणाऱ्यांपैकी मी तरी नाही.

खरोखरचं सुजाण पालकत्व आणि आपण सुजाण पालक होण्यासाठी करत असलेला अनाठायी खर्च या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत का? संवेदनाशून्य सजीवांच्या फौजा निर्माण करून आपण काय मिळवतो आहोत, याचा हिशोब कधीतरी कुणीतरी लावला पाहिजे की नको? 

नादारीचा मुखवटा घालून आतून काजू-बदामांवर ताव मारणं हे माणसांच्या खोटारडेपणाचं स्वच्छ लक्षण आहे. हा दुर्गुण माणसांचं, त्यांच्या कुटुंबांचं नुकसान तर करेलच, पण पर्यायानं समाजाचंही नुकसान करेल.

हे दामकृपा मंडळ मुळात वाईट. त्याचं सभासदत्व घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे, ते समाजात सगळीकडं चांगलंच जोर धरायला लागलंय.

मंडळी हो, वेळीच शहाणे व्हा आणि ह्या दामकृपा मंडळाचं सभासदत्व ताबडतोब सोडा. . . !

😯 😖😏 ☹️

© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ,

 संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आजची दुर्गा वैष्णवी अशोक खरे ”… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “आजची दुर्गा वैष्णवी अशोक खरे ”… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

आजची दुर्गा – वैष्णवी अशोक खरे

. . . कम से कम एक साल देश के नाम

– इयत्ता तिसरी पर्यंत साताऱ्यात शिकलेली. चवथीत पुण्यात आल्यावर स्कॉलरशिप मिळवणारी

– दहावी बारावी अव्वल मार्क(96 %) मिळवून मेरिटवर Cummins college मध्ये कॉम्प्युटर सायन्स ला एडमिशन मिळवणारी.

– त्याचवेळेला समिती, कीर्तन, मल्लखांब शिकणारी 

– मल्लखांब मध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवणारी

इथेच ओळख संपत नाही

– आईबाबांची एकुलती एक लाडकी, कॅम्पस प्लेसमेंट मध्येच दहा लाखाची(सात आकडी) नोकरी मिळवणारी. दोन वर्षात पॅकेज सोळा लाख मिळवणारी

– आता प्रमोशन झाले तर वीस लाखाच्या पुढे जाऊ शकणारी,

– पण

मोहात पडण्याची शक्यता पण नको म्हणून लगेच नोकरी सोडून देव, देश, धर्म यांच्या कामासाठी समितीची प्रचारिका म्हणून बाहेर पडणारी, महाराष्ट्र, पंजाब राज्यात समिती सांगेल ते खडतर काम करणारी.

– कम से कम एक साल देश के नाम हे प्रत्यक्ष आचरणारी 

– देशाच्या तरुण पिढीतील आश्वासक दुर्गा. . . .

या वैष्णवीचा जन्म सातारचा. लहानपणापासून वैष्णवीला वडिलांकडून संघ विचारांचे संस्कार मिळाले. तिचे वडील संघाचे कार्यकर्ते तर आई समितीची कार्यकर्ती. वैष्णवीची सातवीत समितीच्या शाखेशी ओळख झाली, तेंव्हापासून समिती हा वैष्णवीच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला. लहानपणी वैष्णवी बाबांचे संघ काम बघत होती, घरी येणारे संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते, त्यांचे समर्पण, त्यांचे विचार बघत ती मोठी झाली. चांगले लौकिक शिक्षण घेऊन खोऱ्याने पैसे कमवायचे सोडून लोक पूर्ण वेळ संघाचे काम करतात हे तिच्या मनावर कोरले गेले. त्याचाच परिणाम स्वरूप आज गलेलठ्ठ पगाराची नोकरी सहजपणे सोडून ती पूर्णवेळ विस्तारिका म्हणून बाहेर पडली.

सहा वेळा राष्ट्रीय स्तरावर मल्लखांब खेळात सहभागी झालेली वैष्णवी सातत्याने चांगले गुण मिळवत संगणक अभियंता झाली. अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात असताना Baxter नावाच्या अमेरिकन कंपनीने R & D मध्ये काम करण्यासाठी तिची निवड झाली. गेली दोन वर्षे तिने Baxter मध्ये software Enginner म्हणून काम केले. या दोन वर्षात ऑफिसमध्ये तिने स्वतःची ओळख तयार केली. या छोट्या कालावधीत तिने rewards, recognition आणि प्रमोशन देखील मिळवले. तिने नोकरी सोडून जाऊ नये यासाठी तिच्या ऑफिसने तिला बरेच समजावून सांगतिले, परंतु वैष्णवी तिच्या विचारांवर कायमच ठाम असते.

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्ग, साधना आणि सामर्थ्य… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ निसर्ग, साधना आणि सामर्थ्य… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

एखादी कल्पना सुद्धा कल्पकतेनेच कागदावर मांडताना वास्तवाच्या घटनेची गती वेगळ्या वळणाने वास्तवाचा हात न सोडता ज्याला अंतीम नैसर्गिक सत्यापर्यंत लिलया पोहोचवता येते तोच खरा साहित्यिक बनतो.

पाळलेले कबूतर अवकाशात उंच उंच गिरक्या मारताना नाविन्याचा शोध घेत नाही. किंवा कुठल्याही लक्षाचा वेध घेत नाही. कारण त्याला माहीत असतं आपल्या दाण्यापाण्यची व्यवस्था आपल्या मालकाने आपल्या खुराड्या जवळच करून ठेवली आहे.

पण गरूडाला गगनभरारी घेतच आपलं लक्ष निश्चित करून त्यावर झडप टाकून ते मिळवावं लागत. कारण त्याला पुन्हा निसर्गाच्या कुशीतच परतायच असतं आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी म्हणूनच गरूड कबुतर, चिमणी वास्तवतेच्या वेगळ्या साच्यात आपला जीवनक्रम व्यतीत करताना आपापला प्रवर्ग वेगळा वेगळा आहे. हे ओळखून असतात त्यानी आपल्या वेगळ्या वेगळ्या तपसाधनेने वेगळी वेगळी सिद्धी साध्य केलेली असते. विधात्याने ही त्यांना तसेच घडवलेले असते.

हे नैसर्गिक सामर्थ्य आजपावेतो निसर्गाने कठोर साधना करणारानाच स्वखुशीने बहाल केले आहे. म्हणून साधना महत्वाची केवळ उसनवारी करून यातले काही साधता येत नाही. ऊर्जाश्रोत मुळात नैसर्गिक आहे. तो मिळवायला माणसाला निसर्गालाच शरण जावे लागते. स्तुतीचे भाडोत्री डोलारे भाडे थकताच पोबारा करतात आणि आपण उघडे पडलो आहोत याची जाणीव होते. म्हणून निसर्ग दत्त सामर्थ्य हेच अखेरचे वास्तदर्शी सत्य असते. 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चौकट… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ चौकट… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

आज निराच्या घराची चौकट उभी करण्याचा मुहूर्त होता. नुकताच नीराने- माझ्या मैत्रिणीने एक प्लॉट घेतला होता. त्यावर घर बांधायचे ठरवले होते. आर्किटेक्ट कडून प्लॅन काढून घेऊन त्याची मान्यता आहे मिळाली होती त्यामुळे नीरा आणि तिचे पती नीरज यांनी घर बांधण्याच्या कामाला सुरुवात केली होती. पाया, चौथर्‍यापर्यंत बांधकाम आल्यावर आज प्रमुख चौकट बसवायची होती. चौकट म्हणजे घराच्या मुख्य दरवाजासाठी असलेला भक्कम आधार! त्यानंतर बाकीच्या दारांच्या, खिडक्यांच्या चौकटी बसवायचे काम सोयी सोयीने होत राहते पण मुख्य चौकट महत्वाची! त्यामुळे आम्ही दोघेही तिच्या या चौकटीच्या मुहूर्ताला आवर्जून गेलो. तिथे कॉन्ट्रॅक्टर, कामगार लोक आलेले होतेच. तसेच तिचे जवळचे नातेवाईक “गारवा”घेऊन आले होते. अजूनही लहान गावातून घरासंबंधी कामे करताना नातेवाईकांकडून म्हणजे माहेरून, नणंदे कडून किंवा इतर बहिणी यांच्याकडून गारवा आणण्याची पद्धत आहे. ‘ गारवा’ म्हणजे जेवण घेऊन येणे. खेड्यातून हे जेवण एका टोपलीतून, बुट्टीतून घेऊन येतात. त्यामध्ये पुरणपोळ्या, पुऱ्या, गावरान भाज्या, भाकरी, ठेचा, दहीभात, वेगवेगळ्या चटण्या वगैरे जेवणाचे पदार्थ घर बांधणाऱ्यांसाठी घेऊन येतात..

कदाचित घर बांधत असलेल्या माणसाला सर्वांचे करण्याची तसदी पडू नये म्हणून हे सर्व कार्यक्रमासाठी घेऊन यायची प्रथा पडली असेल! तो ‘गारवा’ शेजारीपाजारी तसेच सर्वांना वाटला जायचा आणि ‘चौकट’ उभारण्याचा सोहळा व्हायचा.

अशा या प्रथांमुळे नवीन शेजाऱ्यांची ओळख आणि माणसे जोडण्याची एक प्रक्रिया सुरू होत असे. चौकट हे घराचा मुख्य आधार त्यामुळे घर बांधायच्या पद्धतीची जी चौकट किंवा रुढी रूढ असेल त्याप्रमाणे

ही प्रथा चालू असते. अलीकडे एकत्र कुटुंबाच्या चौकटी बऱ्याच प्रमाणात निखळून पडल्या आणि विभक्त छोटी छोटी कुटुंबे आपल्याच चौकटीत राहू लागली. त्याचे काही फायदे आणि काही तोटे आपण पाहत आहोतच!

चौकट समारंभ उरकून घरी आले आणि माझ्या मनात विविध प्रकारच्या चौकटी उभ्या राहू लागल्या. मुख्य म्हणजे वागण्याची चौकट! समाजात राहताना आपण विशिष्ट चौकटीत राहत असतो. काही नीती नियम समाजाने आखलेले असतात. कोणीही उठावे आणि काहीही करावे ही सुसंस्कृत समाजाची चौकट नसते. उदा.

कारण नसताना घरात, घराबाहेर मोठमोठ्या आवाजाने बोलणे, स्पीकर लावणे, भांडणे करणे हे असभ्यपणाचे लक्षण समजले जाते. नीती नियमांची चौकट ही नेहमी लिखितच असते असे नाही, पण ती एक समाज पद्धती असते. रस्त्यातून जाताना जोरजोरात खिदळणं, मोठ्या आवाजात बोलणं, भांडणं हे चौकटी बाहेरच असतं! त्यासाठी कायद्याची चौकट असतेच, पण त्या चौकटीचा वापर अगदी आवश्यक असेल तेव्हाच केला जातो.

काही वेळा आपल्याला असे लक्षात येते की प्रत्येक कुटुंबाची एक विशिष्ट चौकट असते. काही कुटुंबात जुन्या पद्धतीचे संस्कार असतात म्हणजे कपडे वापरण्याची पद्धत, सणवार, व्रतवैकल्य करण्याची आवड, साधी राहणी, कोणत्याही प्रकारचा भपका न दाखवणारी अशी साधी माणसे असतात. अशा घरात जर एकदम मॉडर्न वागणारी सून आली तर ती बरेचदा चौकटी बाहेरची वाटते. तिचे वागणे, केसांच्या स्टाईल्स, कपडे हे सर्व जर त्या घराच्या चौकटीत नसेल तर ते इतरांच्या दृष्टीनेही वेगळे वाटते- विसंगत वाटते! म्हणून तर आपण घराला अनुरूप अशी मुलगी घरात आणण्याचा प्रयत्न करतो किंवा आपली मुलगी देतानाही दुसऱ्या घराच्या संस्कृतीचा विचार करतो.

ही चौकटीची व्याप्ती केवळ कुटुंबापुरतीच असते असे नाही तर त्या चौकटीची व्याप्ती आपण जेवढी वाढवू तेवढी वाढते! प्रथम आपल्या कुटुंबाची चौकट, तिचा आपण विचार करतो. मग समाजाची, राज्याची, राष्ट्राची आणि सर्व व्यापक जगाची! आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा हे थोडं फार लक्षात येतं.. चुकून कोणी आपल्यासारख्या राहणीचे दिसले किंवा मराठी बोलताना आढळले की लगेच हा महाराष्ट्रीयन आहे हे लक्षात येते आणि तो ‘आपला’ वाटतो. त्यावरून आठवले की, आम्ही प्रथम जेव्हा दुबईला मुलीकडे गेलो होतो, तेव्हा एका मोठ्या मॉलमध्ये फिरताना एक बाळ रडत होते आणि त्याचे आजी- आजोबा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. बाळाची आई काही खरेदीसाठी मॉलमध्ये गेली होती, त्यामुळे बाळाला रडू येत होते. त्यांच्यातील संवाद सहज कानावर पडला तो मराठीत! त्यामुळे आम्ही थबकलो. त्यांनाही आमच्याकडे बघून आम्ही भारतीय आणि मराठी माणसे आहोत हे लक्षात आले. आम्ही आपोआपच एकमेकांशी बोलायला उत्सुक झालो आणि बोललो. तेव्हा कळले की ते दोघेही महाराष्ट्रीयन असून आमच्याच भागातील होते. आपोआपच जात, भाषा, प्रांत, देश सर्व भिंतीच्या चौकटी गळून पडल्या आणि आम्ही एकमेकांशी गप्पा मारू लागलो !बाळाला खाऊ देऊन शांत केले आणि नंतर तिथून निघालो. हेच जर चौकट सोडून आपण बोललो नसतो तर तो जिव्हाळा आम्हाला लाभला नसता!

अशीच दुसऱ्या एका कुटुंबाची आमची एका बागेत भेट झाली. ते एक मुंबईचे आजी- आजोबा ह त्यांच्या नातवाबरोबर बागेत आलेले आणि आम्हीही आमच्या लेक आणि नातवाबरोबर बागेत आलो होतो. ते मराठी भाषिक आहेत हे लक्षात आल्यावर आम्ही एकमेकांशी बोललो आणि आता त्यांची आणि माझ्या मुलीच्या कुटुंबाची घट्ट मैत्री आहे!

‘मी कशाला बोलू?’ अशा विचाराने जर एकमेकांशी बोललंच नाही तर संबंध कसे जोडले जाणार? चौकटीच्या विचारा बाहेर पडले की मैत्रीची व्याप्ती अधिक वाढते हे मात्र खरे!

आपल्याकडे पूर्वीपासून जातीपातीच्या चौकटीत फार घट्ट होत्या. त्यामुळे एक प्रकारचा दुरावा कायमच असे. कोणाची जात उच्च, कोणाची खालची, यामध्ये भली मोठी दरी असे. काळाबरोबरच आता हे दुरावे थोडे कमी झाले आहेत. शिक्षणामुळे जातीची चौकट मोडली नसली तरी ढिली झाली आहे एवढे मात्र निश्चित!

परदेशात राहताना तर अशा वेगवेगळ्या चौकटी च्या नियमांनी माणूस बांधला गेलेला असतो. कायद्याचीही एक अशी चौकट असते. कायद्याच्या चौकटीनेही मनुष्य बांधला गेलेला असतो. परदेशात तर कायद्याच्या विरोधी वागले तर शिक्षा होऊ शकते..

चौकट ही अशी माणसाच्या रोजच्या जीवनाला ही व्यापून असते. काही कुटुंब चौकटीत राहतात, असं विधान करतो तेव्हा एखाद्या कुटुंबाच्या एकमेकांसोबत राहण्याच्या पद्धतीचा उल्लेख होतो. असे लोक चटकन बाहेर मिसळत नाहीत. ट्रीप ला गेले तरी ते आपल्या चौकटीतच राहतात. कोणाला सामावून घेत नाहीत आणि कुणामध्ये जात नाहीत. पु. ल. देशपांडे यांचा एक प्रसिद्ध लेख आहे त्यात त्यांनी अशा चौकोनी कुटुंबाचा उल्लेख केला आहे. नवरा, बायको, एक मुलगा, एक मुलगी असे ते चौकोनी कुटुंब! ज्यांचे वागणे आखीव – रेखीव, सुंदर, चित्रासारखे अगदी इस्त्रीचे परीट घडीचे कपडे, सौम्य वागणे, मोठ्याने न बोलणे, न हसणे, अशा अती व्यवस्थित कुटुंबातही आपला जीव गुदमरतो! अशावेळी वाटते की चौकट असावी पण ती इतकी घट्ट नसावी की, तिचा सर्वांना ताण वाटावा, सुटसुटीत, लवचिक चौकटीत माणसाने जगावे. सतत घडयाळाच्या काट्यावर राहणारी जर चौकट असेल तर त्यांना मुक्त जीवन म्हणजे काय ते कळणारच नाही!

 महाराष्ट्रीयन परंपरांचे एक चौकट असली तरी आपला पूर्ण भारत देश विविधतेत एकता अनुभवतो आपल्या देशाच्या सर्व राज्यातील लोकांमध्ये एक प्रकारची सुसूत्रता आढळते. सणवार, रिती भाती वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या असतील तरीही आपली कुटुंब पद्धती, प्रदेशानुसार खाण्यापिण्याच्या पद्धती, इतरांबरोबर सन्मानाने आचरण करण्याची पद्धती हे सर्व थोड्याफार फरकाने सगळीकडे सारखेच आहे. आत्ता बनारसच्या कुंभमेळ्याला संपूर्ण भारतभरातून लोक एका श्रद्धेने येत आहेत. गंगेत स्नान करत आहेत. देवतांची पूजा करत आहेत. तेव्हा जाणवते की ही एक मोठी संस्कृती चौकट आहे! त्या चौकटीत आपली हिंदू संस्कृती वसलेली आहे तिचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.

 निराच्या घराच्या चौकट कार्यक्रमाचा विचार करता करता माझ्या मनातील विचार खूप दूरवर गेले! माणसाच्या मूलभूत गरजा आणि आवडी या साधारणपणे समान असतात. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांबरोबरच माणसाला एकत्र समाज करून राहणे, नीती नियमांच्या चौकटीत आणि आचार विचारांच्या चौकटीत राहणे हे आवडते. आपल्या भारत देशाची चौकट माझ्या डोळ्यासमोर आली. तिचा आणखी विस्तार केला तर जगभरातील माणसांची जी विविधतेने नटलेली चौकट आहे तिचाही आपण स्वीकार केला पाहिजे. या सर्व मानव जातीच्या चौकटीचा मनाने स्वीकार केला तरच ‘हे विश्वचि माझे घर’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने पूर्ण होईल….

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पाण्यावर तरंगणारी मूर्ती…” – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “पाण्यावर तरंगणारी मूर्ती”  – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

भगवान विष्णूची शेषशय्येवर, विश्रांती घेत असलेली मूर्ती… 

  • आता येणारी आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी होय. विष्णु समुद्रात शेष शय्येवर चार महिने चातुर्मास विश्रांती घेतात.
  • गेली १३०० वर्षे पाण्यावर तरंगत असलेली ही श्री भगवान विष्णूंची १४ फुटी दगडी मूर्ती.
  • काठमांडूपासून ९ कि. मी. अंतरावर असलेल्या ‘बुद्धनिकंध’ या गावी हे देऊळ आहे.
  • एवढी मोठी एकसंध दगडी मूर्ती गेली १३०० वर्षे पाण्यावर तरंगते आहे, हा ईश्वरी चमत्कारच !

माहिती प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ठकी – कायमची हरवलेली जुनी लाकडी बाहुली… लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलभा तेरणीकर☆

सुश्री सुलभा तेरणीकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ठकी – कायमची हरवलेली जुनी लाकडी बाहुली… लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलभा तेरणीकर 

“ठकी”- कायमची हरवलेली जुनी लाकडी बाहुली !

पूर्वी लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळत असत. भातुक या शब्दाचा अर्थ खाऊ असा आहे ! भगवान श्रीकृष्णाच्या बालपणातील विटी दांडू आणि चेंडू, सुमारे ५००० वर्षांपूर्वी मोहेंजोदारो मध्ये सापडलेली मातीची खेळणी, एका इटालियन बेटावर ४००० वर्षांपूर्वी सापडलेली दगडी बाहुली, ग्रीस – चीन – रोममध्ये सापडलेली खेळणी ही माणसाच्या या अशा क्रीडा प्रेमाचे विश्वरूप दर्शन घडवितात.

आपल्याकडे पूर्वी प्रत्येक घरातील स्वयंपाक या विभागाचे प्रमुखपद हे नात्याने, वयाने ज्येष्ठ असलेल्या स्त्रीकडे आपोआपच यायचे. शालेय शिक्षणाचा प्रसार कमी होता. पुढच्या पिढीला पारंपरिक ज्ञान हे घरातूनच मिळायचे. मुलींना ते घरातील स्त्रियांबरोबर वावरतांना मिळत असे. खेळामध्ये मातीची भांडी, लाकडी बोळकी – बुडकुली असायची. या खेळण्यांच्या साहाय्याने घरातील मोठ्या स्त्रिया जशा वागतात तसे वागण्याचा प्रयत्न म्हणजे पूर्वीचा भातुकलीचा खेळ ! आपल्याकडे पूर्वी घरोघरी ठकी नावाची, लाकडाची एक ओबडधोबड बाहुली असायची. एका लाकडाच्या त्रिकोणी ठोकळ्यातून ही ठकी कोरली जात असे. अनेकदा ही ठकी ठसठशीत कुंकू लावलेली, लुगडे नेसलेली, नाकात नथ व डोक्यात फुलांची वेणी घातलेली असे. तरीही या बाहुलीला अंघोळ घालणे, कपडे घालणे, दूध पाजणे, भरविणे, झोपविणे हा त्यावेळच्या मुलींच्या खेळण्याचा भाग असे. कांही ठिकाणी ही ठकी रंगविलेली असायची. ठकी, ठेंगणी – ठुसकी, ठकूताई, ठमाबाई, ठेंगाबाई अशी मराठीतील ठ वरून सुरु होणारी नावे आणि विशेषणे या बाहुलीसाठी कायमची राखीव असत. ठकी ही फारशी स्मार्ट वगैरे न वाटता कांहीशी गावंढळ, मंद, ढ वाटत असे. त्या काळात शिक्षणामध्ये फारशी गती नसलेल्या मुलींचे लग्न लवकर उरकून टाकत असत. सर्वात महत्वाचे म्हणजे अस्सल मराठी बाहुलीचे रुप ल्यालेली ही ठकी बाहुली अशा मुलींचे एक प्रतीक ठरले होते. पुलंचे चितळे मास्तर हे त्यांच्या वर्गातल्या गोदी गुळवणीला गोदाक्का म्हणून हाक मारीत असत. तिचे वर्णन या ठकीला साजेलसे आहे. अशा ठक्या संसार मात्र चांगला करीत असत. ठकीची घराघरातील एकच बाहुली ही अनेक वर्षे लहान मुलींना खेळायला पुरत असे. पण ती फारच तुटकी फुटकी झाली तर तिचा उपयोग जात्याचा खुंटा ठोकणे, कुणाला तरी फेकून मारणे असल्या हलक्यासलक्या कामांसाठी केला जात असे. परंपरांच्या चाकोरीतच अडकलेल्या स्त्रीचे प्रतीक म्हणून ठकीचे छायाचित्र अनेक पुस्तकांमध्ये, मुखपृष्ठांवर पाहायला मिळते. दूरदर्शनवरील वृत्त निवेदिका आणि विविध कार्यक्रम सादर करणाऱ्या सौ. दिपाली केळकर यांनी ठकी, भातुकली, भातुकलीची विविध छोटी भांडी, खेळणी इत्यादींवर आधारित, ” खेळ मांडीयेला ” हे एक सुंदर पुस्तक लिहिले आहे.

भातुकली या खेळात केव्हांतरी एकदा बाहुला बाहुलीच्या लग्नाचा कार्यक्रम होत असे. फक्त मुलींच्या या खेळात मग अशा वेळी भटजी, वऱ्हाडी म्हणून मुलगेही सामील होत असत. या ठकीला नवरा म्हणून मग एक तितकाच ओबडधोबड बाहुला असायचा. त्याचे नावही देवजी घासाड्या, ठोंब्या, ठक्या असे काहीतरी असायचे.

आपली आई, आजी, आत्या, मावशी या दिसायला रूपवान असणे कधीच अपेक्षित नसते. तसेच या ठकीचे सुद्धा होते. ती भलेही सुंदर नसेल पण तिचे अस्तित्वच खूप सुंदर होते, भावपूर्ण होते. अनेक मुलींना तिने मोठे होताना पाहिलेले होते. ठकी ही केवळ एक बाहुली नसून ती अनेक पिढ्या, मुलींशी गुजगोष्टी केलेली एक संस्कृती होती.

अशा या ठकीची गरज आणि अस्तित्व जगभर होते, असे दिसते. भारतातच अनेक प्रांतांमध्ये अशा त्रिकोनी आकारात साकारलेल्या अनेक बाहुल्या आढळतात. (सोबतचे फोटो अवश्य पाहा). पण ठकीच्या तुलनेत त्या सौंदर्यवती दिसतात. रशियन बाहुली मातृष्का या नावाने ओळखली जाते. तर ९ मार्च १९५९ रोजी जन्माला आलेली अमेरिकन सुंदर बार्बी बाहुली आता ६७ वर्षांची होईल.

अशा सुंदर, रूपवान, फॅशनेबल आधुनिक बाहुल्यांपेक्षा ठकी म्हणजे मायेच्या आई, आजी, आत्या, मावशी यांच्यासारखी वाटते. पण तिची कायमची रवानगी आता पुरातन वस्तू संग्रहालयात झाली आहे.

लेखक : श्री मकरंद करंदीकर

प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर 

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… भाग – ७ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ गीता जशी समजली तशी… भाग – ७  – गीता — श्रीकृष्णाची वाङ्मय मूर्ती ☆ सौ शालिनी जोशी

मूर्ती ही एखाद्या व्यक्तीची प्रतिमा असते. तिला रंग, रूप, आकार असतो. त्यावरून त्या व्यक्तीचे बाह्य रूप समजू शकते. ती निर्जीव असते. आचार, विचार कळू शकत नाहीत. तेव्हा एखाद्या व्यक्तीने तिच्या वाणीने म्हणजे तिच्या शब्दांत सांगितलेले विचार म्हणजे त्या व्यक्तीची वाणीरूप मूर्ती. म्हणजे संत महात्म्यानी केलेला उपदेश, त्यांचे विचार ते गेले तरी ग्रंथ रूपाने लोकांपर्यंत पोहोचतात. म्हणून त्यांच्या ग्रंथांना त्यांची वाङ्मय मूर्ती म्हणतात. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांची, आत्माराम- दासबोध समर्थांची आणि गाथा ही तुकारामांची वाङ्मम मूर्ती होय. म्हणून समर्थ रामदास शिष्यांना सांगतात, ‘ आत्माराम दासबोधl माझे स्वरूप स्वतः सिद्धll असता न करावा खेदl भक्तजनीll’ तर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीच्या शेवटी म्हणतात, ‘ पुढती पुढती पुढतीl इया ग्रंथ पुण्य संपत्तीll सर्व सुखी सर्व भूतीl संपूर्ण होईजोll’ (ज्ञा. १८/१८०९)

तशीच गीता ही श्रीकृष्णाची वाङ्मयमूर्ती. त्याविषयी सांगण्याचा हा प्रयत्न.

श्रीकृष्ण कौरव पांडवांच्या युद्ध प्रसंगी अर्जुनाचा सारथी म्हणून रणांगणावरती उतरले. युद्धात भाग घेणार नाही अशी प्रतिज्ञा. पण पांडवांच्या बाजूने त्यांनीच प्रथम पांचजन्य शंख फुंकला. आणि ते ऋषिकेश (इंद्रीयांचा स्वामी, ऋषिक- इंद्रिय) अर्जुनाच्या इंद्रियांचा स्वामी झाले. रणांगणावर नातेवाईकांना व गुरुना पाहून अर्जुनाला त्यांच्याविषयीच्या मोहाने ग्रासले. पापा पासूनचे विचार धर्मनाशापर्यंत पोहोचले. तरीही श्रीकृष्ण शांत होते. त्यांनी अर्जुनाचे म्हणणे ऐकून घेतले. अर्जुनाच्या हातातील धनुष्य गळून पडले. तो संन्यासाची भाषा बोलू लागला आणि शेवटी श्रीकृष्णाचे शिष्यत्व पत्करले. तेव्हा श्रीकृष्णानी आपले प्रयत्न सुरू केले. अर्जुनाची वीरश्री जागृत करायचा प्रयत्न केला. पण अर्जुन मोहरूपी चिखलात अधिकच रुतत आहे असे पाहून, असा मोहरुप रोग त्याला कधीच होऊ नये या दृष्टीने उपदेशाला सुरुवात केली. विचार केला, आचरण केले आणि मग सांगितले असा हा उपदेश.

आत्म्याचे अविनाशित्व, देहाची क्षणभंगूरता, स्वधर्माची अपरिहार्यता, क्षत्रियांचे कर्तव्य व जबाबदारी, निष्कामकर्माची महती अशा वरच्या वरच्या श्रेणीत उपदेश सुरू केला. लोकसंग्रहाचा विचार, यज्ञाच्या व संन्याशाच्या जुन्या कल्पनात बदल, ज्येष्ठांचे आचरण, निष्काम कर्म सांगून मी स्वतः असे आचरण करतो, दृष्टांच्या नाशासाठी व सज्जनांच्या रक्षणासाठी अवतार घेतो. असे सांगून आपला आदर्श त्याच्या पुढे ठेवला. हळूहळू आपल्या भगवंत रूपाची जाणीव करून दिली. निर्गुण निराकार असून जगाची उत्पत्ती, स्थिती, लय करणारा, भक्तांचा योगक्षेम चालविणारा, सृष्टीचे चक्र चालवणारा, सर्वांचे गंतव्य स्थान मीच आहे. सर्व व्यापकत्व स्पष्ट केले. विश्वरुप दाखवले. दैवी गुणांचे श्रेष्ठत्व पटवून दिले. स्थितप्रज्ञ, जीवनमुक्त, ज्ञानी भक्त यांचे आदर्श त्याच्या समोर ठेवले. त्यामुळे मोहाच्या पलीकडे जाऊन अर्जुन युद्धाला तयार झाला. तशी कबुली त्याने दिली. गीतोपदेशाचे सार्थक झाले. सर्वांसाठी सर्वकाळी अमर असा हा उपदेश, युद्धभूमीवर केवळ ४० मिनिटात श्रीकृष्णाने अर्जुनाला केला. आणि ‘यथेच्छसि तथा कुरु’ असे स्वातंत्र्य ही त्याला दिले.

आपल्याही जीवनात असे मोहाचे प्रसंग येत असतात खरं पाहता आपण सारे अर्जुन आहोत. तेव्हा प्रत्यक्ष श्रीकृष्ण आपल्यासमोर नसले तरी हृदयात आहेत, मार्ग दाखवण्यास सज्ज आहेत, त्यांची गीता समोर आहे. तिचा आधार घेऊन जीवनाचे सूत्र त्या श्रीकृष्णाच्या हाती देवून संकट मुक्त व्हावे. अशी ही गीता म्हणून भगवंतांची वाङ्मय मूर्ती होते. साधकाने जीवन कसे जगावे सांगणारी जीवन गीता.

शंकराचार्य गीता महात्म्यात म्हणतात, ‘ सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन:l पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्ll उपनिषद या गायी, श्रीकृष्ण हा दोहन करणारा गवळी, अर्जुन गीतामृत पिणारे वासरू. हा दृष्टांतच गीता ही श्रीकृष्णाची वाङ्मयमूर्ती आहे सांगायला पुरेसा आहे. गीता ही श्रीविष्णूच्या मुखकमलातून निघालेले शास्त्र आहे. त्यामुळे इतर शास्त्रांच्या अभ्यासाची गरज नाही. हेच सर्व शास्त्रांचे शास्त्र. खचलेल्या मनाला उभारणी देणारं, मन बुद्धीचा समन्वय साधणार मानसशास्त्र आहे. योग्य सात्विक आहार व त्याचे फायदे सांगणार आहारशास्त्र आहे. युक्त आहार, विहार, झोप आणि जागृती यांचे फायदे सांगणारे आचरण शास्त्र आहे. नेत्यांची जबाबदारी आणि समाजातील सर्व घटकांना त्यांची कर्तव्य सांगणारं, सर्व जाती, धर्म, स्त्रिया यांना समान लेखणारं समाजशास्त्र आहे. पंचभूतात्मक सृष्टीचे ज्ञान करून देणारे विज्ञान शास्त्र, ‘उतिष्ठ, युद्धस्व’ सांगून प्रसंगाला धैर्याने तोंड देण्यास सांगणारे विवेक शास्त्र आहे. तसेच सर्वाभूती ईश्वर सांगणारे समत्व शास्त्र आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे आत्मज्ञान करून देणारं आत्मशास्त्र आहे. सर्व योगही कर्म, ज्ञान, भक्ती येथे एकोप्याने नांदतात. कारण व परिणाम सूत्र पद्धतीने मांडले आहेत. कोणतीही सक्ती नाही. अंधश्रद्धा नाही. पण शास्त्राप्रमाणे कर्तव्य करायचा आग्रह आहे. अर्जुनाचे दोष सांगण्याचा स्पष्टपणा आहे आणि स्वतःचे कर्तव्य ही सांगितले आहे. स्वतः केले, आचारले मग सांगितले असा हा उपदेश. अर्जुनाच्या मनात कधीही परत संभ्रम होऊ नये असा रामबाण उपाय. सर्व द्वंद्वातून मुक्त करून नराचा नारायण करणारा हा संवाद. वरवर प्रासंगिक वाटला तरी तसा नाही. सर्वकाली, सर्व जगाच्या कल्याणाचा आहे. श्रीकृष्ण योगेश्वर अर्जुनाचे निमित्त्य करून सर्व जगाचे साकडे फेडतात. कर्म बंधनात न अडकता कर्म करण्याची वेगळी दृष्टी जगाला देतात. कर्म हीच पूजा झाली. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीत म्हणतात, ‘म्हणौनि मज काहीl समर्थनी आता विषो नाही l गीता जाणा हे वाङ्मयीl श्रीमूर्ति प्रभूचीll (ज्ञा. १८/१६८४)

अशी ही गीता ५००० वर्षे झाली तरी तिचे महत्त्व कमी झाले नाही. सर्व काळी सर्व लोकांना ती मार्गदर्शक आहे. सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. मानवाच्या आयुष्यातील कसोटीच्या वेळी योग्य मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ म्हणजे भारताची वैचारिक संपत्तीच आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य, धैर्य देणारी गीता हातात घेऊन अनेक क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान केले. यशाची प्रेरणा देणारी तीच आहे. म्हणून अनेक खेळाडूही यशाचे कारण गीता सांगतात. कितीतरी विद्वान, तत्वज्ञानी, शास्त्रज्ञ गीतेचा अभ्यास करतात व केला आहे. देशी-परदेशी विद्वानांवर तिचा प्रभाव आहे. विविध भाषेत भाषांतर होत आहे. झाली आहेत. असे हे अध्यात्म प्रधान, नीतिशास्त्र भारताचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. अभिमानाने गीता ग्रंथ आपण परदेशी पाहुण्यांना भेट देतो. पंतप्रधान मोदींनी ही पद्धत सुरू केली. कारण गीता ही प्रत्यक्ष भगवंताची वाङ्मयमूर्ती!

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हुरड्याचे दिवस… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ हुरड्याचे दिवस… ☆ सुश्री शीला पतकी 

साधारणपणे डिसेंबरच्या नाताळापासून आमच्या लहानपणी शाळेला सुट्ट्या लागत त्याला नाताळाची सुट्टी नाही तर हुरड्याची सुट्टी असंच नाव असे. त्यामुळे दहा दिवसाची सुट्टी असे सुट्टी लागली रे लागली की गावाकडे जायचं. 25 किलोमीटर अंतरावर गाव, पण अक्कलकोटवरून बसमधून उतरून दुसरी बस करून जावे लागे. एसटी आमच्या शेतातच थांबत असे. गाव लहान दोन अडीच हजार संख्येचा! पाच मिनिटाच्या अंतरावर घर…   गाडीतून उतरल्यापासून गावाचे अगत्य सुरू होई..  म्हाताऱ्या बायका ‘भगवानरावन मगळू’…   म्हणून आला बला काढित. कुणी हातातलं सामान घेई आणि मग आमची वरात घरी येत असे.

घरी काका काकू अतिशय हसतमुखाने स्वागत करीत. मोठं घर वाटच पाहत असे..  आमची चुलत भावंडं आणि आम्ही दंगा करायला मोकळे. घर मोठं होतं..  समोर मोठी ओसरी, ओसरीच्या पुढे मोठे अंगण..  अंगणाच्या थोडसं पुढे गोठा..  त्यात दोन-तीन दुभती जनावरं..  गोठ्याच्या बाजूला लावलेल्या शिडीवरून माळावर जायला जिन्यासारखा भाग. अंगणात पहिल्या ओसरीवर किंचित वर तुळशी वृंदावन..  तिथेच हनुमानाच्या आणि पांडुरंगाच्या मूर्ती. बाजूला मोठी पडवी..  पडवीच्या बाजूला बंद बाथरूम. ओसरीच्या थोडसं वर पत्र्यात असलेली दुसरी ओसरी त्याच्यावर दगडाने बांधलेला मोठा भाग..  तिथे झोपाळा लावलेला असे. त्याच्या बाजूला चार खोल्या, एक मोठं देवघर, सामानाची खोली आणि दोन बेडरूम. खालच्या ओसरीला लागून भलं थोरलं स्वयंपाकघर..  ज्यामध्ये जेवणाला बसण्याची सोय..  कपाट..  त्या कपाटात दही दूध ताक ठेवण्यासाठी बांधून घेतलेले कट्टे..  तिथे बरोबर ती ती भांडी बसत असत. सरपण ठेवायला एक मोठी खोली आहे. शेगडी चूल वैल आणि त्याचा धूर बाहेर जाण्यासाठी वरच्या बाजूला धुराडे ! स्वयंपाकघर शेणानी सारवून लख्ख असे. आत उतरायला दोन मोठ्या आयताकृती पायऱ्या असत. हातपाय धुऊन स्वयंपाक घरात गेलं..  थोडं खाऊन पिऊन झालं की मग शेताकडे रवाना. त्या दिवशी नुसती शेताकडे भ्रमंती व्हायची..  किरकोळ बोर डहाळा शेंगा…   !

दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र उठल्याबरोबर तोंड धुतलं की कप घेऊन आम्ही गोठ्यात बसत असू. काका म्हशीची धार काढून आमच्या तोंडावरही ते सोडत असत. आमच्या कपात दुधाच्या धारा यायच्या की त्याचा फेस व्हायचा आणि मग तसा गच्च फेस भरलेला कप आम्ही तोंडाला लावायचा. त्या नीरशा दुधाची गोडी काही और असायची. दूध पिऊन झाले की चटणी मीठ इत्यादीचे डबे घेऊन आम्ही शेताकडे कुच करायचे. आमच्या आधी आमचा वाटेकरी निंगप्पा तिथे हजर असायचा. निंगप्पाची शिस्त भारी..  बंद गळ्याचा शर्ट धोतर..  झुबकेदार मिशा..  डोक्याला लाल मुंडासे..  कानामध्ये आता मुलं घालतात तशा बाळ्या किंवा रिंगा ! तो शेत इतकं उत्तम करायचा..  त्यांनी पाडलेल्या शेतातल्या सरी अगदी मापात असायच्या ! एकदा राजेसाहेब अक्कलकोट येथून शिकारीला आले होते..  सशाच्या. त्यांनी सरीतून बरोबर बाण सोडून मारले ती सरी इतकी सरळ होती त्याबद्दल राजेसाहेबांनी त्याला पारितोषिकही दिले होते..  असा तो पारितोषिक विजेता आमचा वाटेकरी निंगप्पा..  आम्हा मुलांना पाय झटकून पाय पुसून घोंगड्या वरती येऊ द्यायचा…   अगटी पेटवलेली असायची, तिच्या धुरावर मग आम्ही त्याने आणून टाकलेला डहाळा भाजून घेत असू. आगटीमधून बाहेर पडणारा त्या ज्वाला..  तो धूर..  त्या दुधाचा विशिष्ट वास…   एक वेगळेच वातावरण निर्माण करायचा ! धूर कमी होऊन फक्त ज्वाला शिल्लक राहायचे, हळूहळू त्या शांत व्हायच्या आणि मग अगदी फक्त आर उरायचा त्याला सर्व बाजूने राखेने लपेटून.

निंगप्पा कौशल्याने त्यात काढून आणलेली सुंदर कोवळी कणसे खोचायचा..  त्याच्याच थोडे बाजूबाजूने मोठी मोठी वांगी भाजायला टाकायचा. एरंडाची पानं धुवून पुसून तयार असायची. आम्ही अगटीच्या भोवती बसलो की मग प्रत्येकाला एक पान दिले जायचे. त्या पानावर मस्त दाण्याची चटणी, गुळाचे खडे, राजा राणी थोडासा फरसाण, किंवा चिवडा खास आमच्या काकांनी बनवलेले मीठ, त्यात जिरे हिंग वगैरे पदार्थ असायचे. या सगळ्यांच्यासह हुरड्याची पूर्वतयारी व्हायची. मग तो लीलया एकेक कणीस अंदाज घेत अगटीतून बाहेर काढायचा..  एका छकाटीने ते झटकायचा..  फुंकर मारायचा आणि हातावर चोळायचा…   कोवळे कोवळे लुसलुशीत हिरवे गार भाजलेले दाणे कणसातून बाहेर येत..  काळीशार घोंगडी वरती हिरवे कोवळे दाणे..  त्यांचं रूप देखणं दिसायचं ! मग सगळे तो गरम गरम हुरडा खाण्यासाठी तुटून पडायचे. शेजारी बसलेल्या माणसाच्या हातावर आपल्या हातातले कोवळे जाणे अलगद निंगप्पा ठेवत असे ! निंगप्पाच्या हातून आपल्या हातावर हुरडा येणे हे खूप भारी समजले जायचे…   आम्ही या शेताचे मालक आहोत याची जाणीव आम्हाला व्हायची…   काही म्हणा मालक असण्यात रुबाब असतो ! मग एकापाठोपाठ एक कणसं चोळून दाणे काढून तो आम्हाला देत असे ! मीठ लसणीची चटणी – शेंगाची चटणी – गूळ – भाजलेले शेंगदाणे, नुकतंच आगटीतनं काढलेले भाजलेले वांगे – याची चव अहाहा – कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेलमधल्या पदार्थाला नाही, न कॉन्टिनेन्टल पदार्थाला आहे..  जगातले ते सगळे ऐश्वर्य भारतीय शेतकऱ्याजवळ आहे !!!

पोटभर हुरडा खाऊन झाला की मग हुरड्याच्या धाटाखालील जाड उसाचा फडशा पडत असे. कारण आम्हाला असं सांगितलं जायचं की हुरड्यानंतर तो धाटाचा ऊस खाल्ला की हुरडा पचतो. आमची पंगत संपेस्तोवर मोठी माणसे हुरड्याला येत असत. वडील असले की दोन-तीन पाहुणे बरोबर असायचे. काकू आणि आई मात्र घरी स्वयंपाक करण्यात मग्न असायच्या. पाहुण्यांची सरबराई होई आणि मोठ्या माणसाचा हुरडा खाऊन होईपर्यंत आम्ही शेतात हुंदडायला मोकळे…   मग शेतातून हिंडताना उभ्या ज्वारीच्या धाटाखाली पाथरीची भाजी, करडीची भाजी अशा रानभाज्या..  लाल भडक टोमॅटो…   कोवळ्या काकडीच्या वेलाला लागलेल्या काकड्या…   एखाद दुसरे पिकलेले शेंदाडे..  तुरीच्या कोवळ्या शेंगा..  असा ऐवज गोळा करून आम्ही झाडाखाली ठेवलेल्या किटलीतून भरपूर ताक पिऊन घरी पळत असू ! 

घरी हे सगळं सामान टाकलं की अगदी घराच्या समोर नदी..  कपडे घेऊन नदीत डुंबायला जायचं..  तिथेच काकू आणि आई धुणं धुवत असायच्या. त्यांना कपडे वाळत घालण्यासाठी मदत करायची. नदी इतकी स्वच्छ होती की खालची वाळू स्पष्ट दिसत असे. पाण्याला फार ओढ नव्हती. बोरी नदी पण हान्नूरला तिचा आकार हरिणासारखा होत असे म्हणून त्या नदीला हरणा नदी असं म्हणत ! नदीत बराच वेळ डुंबून आणि एकमेकांच्या अंगावर पाणी उडवीत पाण्याचा मुबलक आनंद घेत आम्ही घरी परतत असू ! नदीवरून पाणी आणायचे असल्याने काकू आणि आई एक एक घागर घेऊन पुढे जात आणि आम्ही धुणे डोक्यावर घेऊन येत असू..  अर्थात कपडे वाळल्यामुळे तेव्हा ते हलकेच असायचे पण त्या दोघींना मात्र जवळजवळ अर्धा किलोमीटर पाणी घेऊन यावे लागे. बाकी पाणी भरायला गडी माणसं असत पण स्वयंपाकाचे आणि पिण्याचे पाणी मात्र घरच्या लोकांना भरावे लागे.

आमच्या आठ दिवसाच्या मुक्कामात दोन-तीन दिवस गावातल्या सरपंच पाटील इत्यादी लोकांकडून आम्हाला शिधा येत असे. त्यात हरभऱ्याची डाळ, गुळ, कणिक, भाजीपाला, आणि दूध यांचा समावेश एका मोठ्या परातीत केलेला असायचा आणि ती परात घरी यायची..  मग त्या दिवशी पुरणपोळीचा बेत केला जायचा आणि दुपारी बारा वाजता त्या घरचा माणूस येऊन ती परत घेऊन जात असे. त्यात तीन-चार पुरणाच्या पोळ्या, कटाची आमटी आणि भात भाजी त्यांच्या घरी पोहोचती केली जायची. बामणाच्या घरचा प्रसाद म्हणून ते श्रद्धेने खात असत ! 

गावातली सगळीच माणसं फार प्रेमळ होती..  मग कुणाकडे उसाचा गुऱ्हाळ असेल तर गुऱ्हाळावर निमंत्रण असायचे. इतरांच्या शेतावर हुरडा खायला निमंत्रण… 

संध्याकाळी कधीकधी काका आम्हाला नदीपलीकडच्या माळावर नेत असत. तिथे बोरीची खूप झाड होती. त्याच्याखाली एक चादर अंथरुन त्याखाली आम्ही मुले बसत असू आणि काका झाड हलवत असत आमचे बोरन्हाण व्हायचे..  अगदी खऱ्या अर्थाने….    मग ते बोराचे भले थोरले गाठोडे बांधून आम्ही घरी येत असू..  संध्याकाळी अंगणामध्ये पाटीमध्ये अगटी पेटवून काकू आणि आईसाठी स्पेशल हुरडा व्हायचा. आम्ही शेंगाचे वेल भाजून घेत असू. ओल्या हरभऱ्याचा हावळा व्हायचा म्हणजे…   वर येणाऱ्या ज्वालावर तो हरभरा भाजून घ्यायचा फार सुंदर लागायचं !आठ दिवस काका काकूंच्या प्रेमळ पाहुणचारात कसे निघून जायचे कळायचं नाही.

रात्री एका खोलीमध्ये आम्ही सगळी भावंड झोपत असू आणि मग तिथे भुतांच्या गोष्टी रंगत ! बाहेर मस्त थंडी..  पोट गच्च भरलेले..  आणि उबदार खोली..  गाढ झोप लागायची ! अस्सल मातीतले अन्न..  वाहत्या नदीचे पाणी..  शुद्ध हवा..  शेतीतला मन प्रफुल्ल करणारा आनंद ठेवा…   यांनी ते आठ दिवस कसे जायचे कळायचंच नाही. आता पाचशे रुपयांचा..  सहाशे रुपयांचा हुरडा मिळतो. पण तो आनंद पुडीत बांधून विकत घेतला तसा प्रकार आहे. हन्नूरवरून सोलापूरला येताना फार वाईट वाटायचं. येताना सामान प्रचंड वाढलेल असायचे. हरभऱ्याची भाजी, उसाच्या कांड्या, बोरं, वाळलेला हुरडा, शेंगाची चटणी, मसाले, अगदी राखुंडी सुद्धा आई बनवून घेत असे. हे सगळं भरभरून देताना काका काकूंना आनंदच व्हायचा..  साधी गरीब शेतकरी माणसं पण अतिशय प्रेमळ ! 

माझ्या शाळेतल्या शिक्षिका, कॉलेजातले प्रोफेसर, शेजार पाजार, मित्र-मैत्रिणी अशा अनेकानी आमच्या शेताचा आनंद घेतला आहे आणि त्यांना तिथे घेऊन जाण्यात आम्हालाही खूप आनंद व्हायचा. एखाद दिवसाची ती त्यांची ट्रीप त्यांच्याही आयुष्यभर लक्षात राहिलीय..  काका काकू आम्हाला स्टॅन्डपर्यंत पोचवायला यायचे. काकू आणि आईच्या डोळ्यात निघताना पाणी असायचे. आमची चुलत भावंडंही आमच्यावर तितकेच प्रेम करणारी होती. त्यामुळे हन्नूरची ओढ आजही आहे.

आता ते तितके मोठे घर, त्यात राहणारी माणसं, सारे हळूहळू वजा झाले..  शेतामधली पीकं पण संपली..  उसाचे गवत शेतात उभे राहिले..  कारण गावाला धरण झाले. सगळे गावच बदलून गेले…..     

तो गाव कुठे हरवला माहित नाही, पण मातीची ओढ मात्र कायम आहे आणि असणार…   !

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “महान विचारवंतांचे ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलचे विचार…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “महान विचारवंतांचे ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलचे विचार…☆ संकलन व प्रस्तुती : जगदीश काबरे ☆

महान विचारवंतांचे ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलचे विचार –

1) प्रसिद्ध दिवंगत शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग म्हणतात, “ईशनिंदेबाबत मी देवाला घाबरत नाही (कारण तो नाहीच हे मला माहितीये) मी त्याच्या भक्तांना मात्र घाबरतो. विश्वात कोणी सिद्ध केलं, की देव आहे, तर मी स्वतःचं सर्वस्व त्याला देऊन टाकीन”.

2) तत्त्वज्ञ सॉक्रेटिस म्हणतात, “ईश्वर हे केवळ शोषणाचं साधन आहे”.

3) तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्सच्या मते ईश्वराचा जन्मच मुळात आपले वर्चस्व राखण्यासाठी हितसंबंधीयांनी केलेला आहे.

4) ”जो देव देवळात उजेड पाडू शकत नाही, तो तुमच्या जीवनात काय पाडणार?” अशा शब्दांत संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनांतून लोकांना खडसावतात.

5) शहीद भगतसिंग म्हणतात, “या देशातले आस्तिक तरुण माझ्या नजरेत नामर्द आहेत. “

6) प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या मते, “नास्तिक माणसाचा स्वतःवर विश्वास असतो आणि तो इतरांवर प्रेम करतो”.

7) डॉ. श्रीराम लागू यांनी तर ‘देवाला रिटायर करा!’ अशी हाळी दिली.

8) बिल गेट भारतीय लोकांविषयी म्हणतात, ”या देशातल्या मंदीरं आणि मस्जीदमध्ये जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल. “

9) स्वामी विवेकानंद म्हणतात, ”माझा देश बिनडोक्याचा बाजार आहे. इथे चटणी कोरडी खातील, अन् तेल दगडावर ओततील!” 

10) “देव दगडात नसून माणसांत आहे. देव-देवळं आणि देवाधर्माच्या नावानं चाललेली कर्मकांडं ही पुरोहितांची रोजगार हमी योजना आहे. देवळात आपलं शोषण होतं, हेच भक्तांना कळत नाही. देव असलाच तर भटांच्या पोटात आहे, मंदीरात नाही…   ” हे प्रबोधनकार ठाकरे सर्वसामान्यांच्या मनावर ठसवत आले.

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “संगीतोपचार…” – लेखिका : सरस्वती ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “संगीतोपचार…” – लेखिका : सरस्वती ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

काही महिन्यांपूर्वी माझी पुण्यामध्ये संगीत उपचार करणाऱ्या एका ट्रेनरसोबत ओळख झाली. ते Music Therapy वर रिसर्च करतात आणि लेक्चर्स देतात. संगीत उपचारने आपण बऱ्याच त्रासांवर मात करू शकतो किंवा ते कमी करू शकतो. वेगवेगळ्या लोकांच्या वर सध्या पुण्यात खूप ठिकाणी असे उपचार चालू आहेत आणि याचे रिझल्ट्स खूप आश्चर्यकारक आहेत. बऱ्याच लोकांना फरक पडत आहेत. पूर्वी लोकं ग्रामोफोनवर असे बरेच राग ऐकत असत. त्यामुळे त्यांचे आरोग्यही उत्तम राहत असे.

खाली दिलेले सर्व राग तुम्हाला YouTube वर मिळतील.

जात्याच संगीताची आवड असणारी मी, एक प्रयोग म्हणून 30 दिवस दररोज 45 मिनिटे हेडफोन लावून शांत ठिकाणी यातील काही राग ऐकले. आणि मलाही आश्चर्यकारक फरक जाणवले. संगीतावर माझा शास्त्रीय अभ्यास नाही; पण संगीत आणि गाणी हा माझा खूप आवडता छंद आहे.

राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ:

 १. राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा.

 २. राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा.

 ३. राग देस – उत्थान व संतुलन साधणारा.

 ४. राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा.

 ५. राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणीव करून देणारा राग.

 ६. राग शाम कल्याण – मूलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा.

 ७. राग हमीर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि ऊर्जा निर्माण करणारा.

 ८. राग केदार – स्वकर्तृत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारा, भरपूर उर्जा निर्माण करणारा, तसेच मूलाधार उत्तेजित करणारा.

 ९. राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा.

 १०. राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा, प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा.

 ११. राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा, भावनाप्रधान राग, सर्व सदिच्छा पूर्ण करून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग.

 १२. राग मालकंस – अतिशय शांत – मधुर राग. प्रेमभाव निर्माण करणारा व सांसारिक सुख वृध्दिंगत करणारा.

 १३. राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग. हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जागृत करणारा असा आहे.

 १४. राग जयजयवंती – सुख समृद्धि देणारा राग असून यशदायक आहे. विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो.

 १५. राग भीमपलासी – संसार सुख व प्रेम देणारा.

 १६. राग सारंग – कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो. आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग.

 १७. राग गौरी – शुध्द इच्छा, मर्यादाशीलता, प्रेम, समाधान, उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहीशा करणारा.

 विशेष सूचना:-

डॉक्टरांचे उपचार घेत असताना हे संगीतोपचारही घ्यावेत, पण डॉक्टरांचे उपचार मात्र थांबवू नयेत.

#हृदयरोग

राग दरबारी व राग सारंग

१) झनक झनक तोरी बाजे पायलिया( मेरे हुजूर )

२) तोरा मन दर्पण कहलाए ( काजल )

३) बहुत प्यार करते है, तुमको सनम ( साजन )

४) जादूगर संय्या छोडो मेरी ( नागिन).

 #विस्मरण

लक्षात रहात नाही त्यांनी शिवरंजनी राग ऐकावा

१) मेरे नयना सावन भादों (मेहबूबा)

२) ओ मेरे सनम (संगम)

३) दिल के झरोखे मे तुझको बिठाकर(ब्रह्मचारी )

४) जाने कहा गये वो दिन(मेरा नाम जोकर )

#मानसिक_ताण_अस्वस्थता

ज्यांना मानसिक ताण भरपूर प्रमाणात असेल त्यांनी राग बिहाग आणि राग मधुवंती वर आधारित गाणी ऐकावीत.

१) पिया बावरी ( खूबसूरत )

२) मेरे सूर और तेरे गीत (गूँज उठी शहनाई )

३) मतवारी नार ठुमक ठुमक चली(आम्रपाली)

४) तेरे प्यार में दिलदार ( मेरे मेहबूब )

  #रक्तदाब

हाय ब्लड प्रेशर साठी हळू ( धीमी गती ) चालीची, तर लो ब्लड प्रेशर साठी जलद चालीची गाणी फायदेशीर ठरतात.

  #उच्च_रक्तदाब

१) चल उड़ जा रे पंछी ( भाभी )

२) चलो दिलदार चलो ( पाकीजा )

३) नीले गगन के तले( हमराज )

४) ज्योती कलश छलके ( भाभी की चूड़ियाँ )

 #कमी_रक्तदाब

१) जहाँ डाल डाल पर ( सिकंदरे आज़म )

२) पंख होती तो उड़ आती रे ( सेहरा )

३) ओ निंद ना मुझको आये ( पोस्ट बॉक्स नं. ९०)

 #रक्तक्षय_ऍनिमिया

अशा वेळी राग पिलू वर आधारलेली गाणी ऐकावी.

१) खाली शाम हाथ आई है ( इजाजत )

२) आज सोचा तो आँसू भर आये ( हँसते जख्म )

३) नदियाँ किनारे ( अभिमान )

४) मैने रंग ली आज चुनरिया ( दुल्हन एक रात की)

#अशक्तपणा

शक्ती ताकद कमी झालेली वाटतेय, उत्साहाचा अभाव काही करण्याचा कंटाळा येतो अशा वेळी राग जयजयवंतीवर आधारित गाणी ऐकावीत.

१) मोहब्बत की राहों मे चलना संभलके ( उड़न खटोला )

२) मनमोहना बड़े झूठे ( सीमा )

३) साज हो तुम आवाज हूँ मै ( चंद्रगुप्त )

 #पित्तविकार_ॲसिसिटी

ॲसिसिटीवर उपाय म्हणून राग खमाज वर आधारित असलेली गाणी ऐकावीत.

१) छूकर मेरे मन को ( याराना )

२) तुम कमसीन हो नादां हो ( आई मिलन की बेला )

३) आयो कहाँ से घनश्याम ( बुढ्ढा मील गया )

४) तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये ( सेहरा )

राग केदार:

१) हमको मन की शक्ती देना ( गुड्डी)

२) आपकी नजरो में (घर)

३) पल दो पल के ( द बर्निंग ट्रेन)

४) दर्शन दो घनश्याम नाथ मोरी

राग भैरवी:

१) तुमही हो माता पिता तुमही हो

२) ये गलिया ये चौबरा ( प्रेमरोग)

३) दिल दिया हैं जान भी देंगे ( कर्मा)

४) दुनिया बनाने वाले क्या तेरे मन मे (तीसरी कसम)

राग यमन:

१) धुंदी कळ्यांना ( धाकटी बहीण)

२) जिथे सागरा धरणी मिळते (पुत्र व्हावा ऐसा)

३) इक प्यार का नगमा है( शोर)

४) नाम गुम जायेगा ( किनारा)

राग मालकंस:

१) आधा है चंद्रमा रात आधी ( नवरंग)

२) पग घुंगरू बांध मिरा नाचे( नमक हलाल)

३) दिल पुकारे आरे आरे (jewel thief)

४) ये मालिक तेरे बंधे हम ( दो आंखे बाराह हाथ)

राग अहिरभैरव:

१) तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल

२) अलबेला सजन आयो रे ( हे गाणे हम दिल दे चुके सनम मधले न ऐकता बाजीराव मस्तानी ह्या सिनेमातले ऐकावे)

३) सोला बरस की बाली उमर को सलाम ( एक दुजे के लिये)

४) कोमल काया विमोह माया ( नटरंग)

राग हंसध्वनी:

१) अखेरचा हा तुला दंडवत( मराठा तितुका मिळवावा)

२) अग नाच नाच राधे उडवूया रंग ( गोंधळात गोंधळ)

राग भूप:

१) इन आंखो की मस्ती के ( उमराव जान)

२) देखा एक ख्वाब तो सिलसिले हुये (सिलसिला)

३) कांची रे कांची ( हरे राम हरे कृष्ण)

४) सायोनारा ( लव इन टोकियो)

राग आसावरी:

१) इक राधा इक मीरा ( राम तेरी गंगा मैली)

२) मेरे महबूब कयामत होगी ( Mr. X in Bombay)

३) हम तेरे बिन अब रह नही सकते (आशिकी)

४) कौन तुझे यू प्यार करेगा (MS Dhoni)

राग दुर्गा:

१) सावन का महिना, पवन करे शोर ( मिलन)

२) तू इस तरह से मेरे जिंदगी में शामील है ( आप तो ऐसे ना थे)

राग देस:

१) वंदे मातरम्

२) प्यार हुआ छुपके से ( 1942 love story)

३) अजी रुठकर कर के कहा जाईएगा ( आरजू)

४) चदरिया झिनी रे झिनी ( जुदाई)

राग बिलावल:

१) लग जा गले ( वो कौन थी)

२) जय जय संतोषी माता ( जय संतोषी माता)

३) जण गण मन अधिनायक

४) ओम जय जगदीश हरे

राग श्यामकल्याण:

१) शूरा मी वंदिले

राग भीमपलासी:

१) तू चीज बडी है मस्त मस्त ( मोहरा)

२) ये अजनबी तू भी कभी ( दिल से)

३) तू मिले दिल खिले ( Criminal)

४) नैनो में बदरा सावन (मेरा साया)

रागाची चव कळावी म्हणून मी ही सर्वपरिचित चित्रपटगीते दिली आहेत. जेव्हा केव्हा मी माझी काही favourite गाणी ऐकत असते तेव्हा ती कोणत्या रागावर आधारित आहे हे आवर्जून पाहत असते. अजूनही तुम्हाला वरील रागावर YouTube वर खूप गाणी मिळतील.

पण मी म्हणेन प्रत्यक्ष राग- सर्वांगाने सजवलेला- ऐकणे अधिक लाभदायक ठरेल.

लेखिका : श्रीमती सरस्वती

प्रस्तुती : श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares