मराठी साहित्य – विविधा ☆ “जागतिक पटलावर गांधीजी…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “जागतिक पटलावर गांधीजी☆ श्री जगदीश काबरे ☆

✅ १९०९ सालापासून प्रख्यात रशियन लेखक लिओ टॉलेस्टॉय गांधीजींना ओळखत होते. कारण त्यांचा गांधीजींशी पत्रव्यवहार होता.

✅ १९२० सालापासून हो चि मिन्ह यांच्यावर गांधींचा प्रभाव होता. भारताची तुलना त्यावेळच्या व्हिएतनाममधील परिस्थितीशी करताना ते एकदा म्हणाले होते, “तिकडे तुमचे एक महात्मा गांधी आहेत, इकडे मी महात्मा गांधी आहे. ” आणखी एकदा, “मी आणि इतर काहीजण क्रांतिकारी आहोत, पण तरीही आम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे महात्मा गांधींचे शिष्य आहोत, ” असेही ते म्हणाले होते.

✅ १९३१ साली जगप्रख्यात टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर गांधी झळकले होते.

✅ १९३१ साली अल्बर्ट आईन्स्टाईनने गांधींना पत्र लिहिले. त्यात आईनस्टाईन गांधींना उद्देशून म्हणाले होते: “येणाऱ्या पिढ्या क्वचितच विश्वास ठेवतील की, खरोखरच हाडामांसाचा असा मनुष्य (गांधी) कधी प्रत्यक्ष या पृथ्वीतलावर वावरला होता. “

✅ १९३१ साली महान जागतिक कलाकार चार्ली चॅप्लिन यांनी गांधींची भेट घेतली होती.

✅ १९४० साली नेल्सन मंडेला यांना गांधींच्या अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढा लढता येतो हे समजलं. त्याने प्रभावित होऊन त्यांनी गांधींचा सत्याग्रही मार्ग दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी चोखाळला म्हणून नेल्सन मंडेलांना दक्षिण आफ्रिकेचे गांधीजी म्हटले जाते.

✅ १९४० सालीचा मानव अधिकार कार्यकर्ते मार्टिन ल्युथर किंग यांना गांधीपासून प्रेरणा मिळाली आणि ते वर्णद्वेषाच्या विरोधात लढा उभारला. त्यांना अमेरिकेचे गांधी असे संबोधले जाते.

✅ १९४२ साली लुई फिश्चरने गांधींची भेट घेतली होती आणि त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन १९६२ साली त्यांनी गांधी चरित्र लिहिले.

✅  १९४८ साली एका माथेफिरू हिंदू दहशतवाद्याने गांधीहत्या केली. त्याची दखल जगभरातील सर्व महत्वाच्या वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर घेणारी बातमी प्रसिद्ध केली होती.

✅  १९८२ साली बेन किंग्जले निर्मित आणि रिचर्ड ॲटनबरो दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हा ॲटनबरोला प्रश्न विचारण्यात आला होता की, ‘तुमच्यासमोर जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन, विन्स्टन चर्चिल, माओत्से तुंग, हिटलर असे जागतिक स्तरावरील नेते होते तरीही तुम्ही चित्रपटासाठी गांधींचीच निवड का केली?’ त्यावर त्यांनी दिलेले उत्तर आजही विचार करण्यासारखे आहे. ते म्हणाले, ‘जगातील इतर सगळ्या नेत्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी हातात तलवार घेतली होती. फक्त हा एकच असा माणूस आहे जगात की, ज्याने नि:शस्त्र लढा देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. ‘

✅ जगात गांधीजींवर येशू ख्रिस्ताच्या खालोखाल मोठ्या प्रमाणात पुस्तके लिहिली गेलेली आहेत. एवढेच काय पण जगातील बहुसंख्य देशात गांधीजींचे पुतळे उभारले गेलेले आहेत आणि टपाल तिकिटे काढलेली आहेत. जगात अनेक विद्यापीठात गांधींचे विचार शिकवले जात आहेत.

✅ गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी ‘महात्मा’ अशी उपाधी दिली आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘राष्ट्रपिता’ म्हणून त्यांना संबोधत त्यांना मानाची सलामी दिली.

✅ १५ ऑगस्ट १९४७ जेव्हा अख्खा देश स्वातंत्र्य दिनाचा आनंद उपभोगत होता त्याच वेळेला दंगलग्रस्त नौखालीमध्ये गांधीजी निधड्या छातीने एकटे फिरत होते आणि दंगली शमविण्याचा प्रयत्न करत होते. त्यात ते यशस्वीही झाले. म्हणून माउंटबॅटन यांनी त्यांना कौतुकाने ‘वन मॅन आर्मी’ असे म्हटले.

✅ थोडक्यात मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी, उर्फ राष्ट्रपिता, उर्फ आधुनिक भारताचे शिल्पकार, उर्फ अहिंसेचे पुजारी, उर्फ सत्याग्रहाचे जनक किती मोठे होते हे जगाला माहित आहे.

 ❎ तरीही आज बापूजींचा तिरस्कार करणारे कृतघ्नपणे बापूजींच्या चित्रावर पुन:पुन्हा गोळ्या झाडत आहेत.

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दुनिया फक्त विश्वासावर चालते…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ “दुनिया फक्त विश्वासावर चालते” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

आळेफाटा ते करमाळा प्रवास करत असताना माझ्या बाजूला एक मॅडम बसल्या होत्या. चार तासांचा प्रवास होता.

लेडीज बाजूला असल्यानंतर जरा अवघडल्यागत होतंच. दोन तास होऊन गेले. छोट्या छोट्या स्टँडवर गाडी थांबत होती. प्रवासी उतरत होते, चढत होते. आणि मला तहान लागली होती. गाडी मिरजगाव स्टँडला थांबली. एक वडापाव विकणारा माणूस खिडकीजवळ येऊन ओरडायला लागला.. ”गरमा गरम वडापाव. ” मला पाणी हवं होतं पण त्याच्याकडे फक्त वडापाव होते. मी त्याला म्हणलं “पाण्याची बाटली नाहीय का दादा?” त्यावर तो बोलला “नाहीय भाऊ. पैसे द्या मी आणून देतो लगेच. ” मी पटकन त्याला वीस रुपये दिले. आणि तो वीस रुपये घेऊन गर्दीतून वाट काढत बाटली आणायला निघून गेला.

माझ्या बाजूला बसलेल्या त्या मॅडम मोठ्याने हसल्या आणि म्हणाल्या, “गेले तुमचे वीस रुपये. ” आणि त्या पुन्हा हसायला लागल्या. मी म्हणलं, “तो पाणी घेऊन येईल. ” त्या पुन्हा हसत म्हणाल्या “तो येणारच नाही. त्यावर मी त्यांना म्हणलं, ” मॅडम तो येईल कारण, दिवसभर घसा ताणून ओरडुन एक एक रूपया कमवणारा तो माणूस आहे. त्याला वीस रुपयाचे महत्त्व माहित आहे. ही कष्टावर प्रेम करणारी माणसं आहेत. आणि ही दुनिया विश्वासावर चालते. यावर माझा विश्वास आहे. ” त्या मॅडम पुन्हा म्हणाल्या “बरं बघूया काय होतंय पुढे. ?”

गाडी सुरू झाली. कंडक्टरने दार ओढून घेतलं आणि बेल वाजवली. तशा मॅडम पुन्हा माझ्याकडे पाहून हसल्या. त्यांनी त्यांच्याजवळची पाण्याची बाटली बाहेर काढली व मला म्हणाल्या “घ्या प्या पाणी. आणि इतकाही विश्वास ठेवून जगणे बंद करा जरा.. ” त्यांचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटत होतं.

गाडी सुरू होऊन स्टॅण्डच्या गेटवर आली आणि ड्रायव्हरने कचकन गाडीला ब्रेक मारला. आणि माझ्या खिडकीजवळ उभा होता तो वडापाव वाला. धावत पळत येऊन त्याने आवाज देऊन गाडी थांबवली होती. त्याने माझ्या हातात बाटली दिली. बाटली देताना तो म्हणाला. ,

“भाऊ दुनिया फक्त विश्वासावर चालते. ” माझा डायलॉग त्याने सेम मारला होता. गाडी पुढं निघाली. आणि माझी मान ताठ झाली.

त्या मॅडमची बाटली मी त्यांना परत दिली. आणि विश्वासाने हातात आलेली पाण्याची बाटली मी ओठाला लावत म्हणालो, “मॅडम भुकेची वेदना ओंजळीत लपवून जगण्याचा अभंग गाणारी माणसं या जगात आहेत…फसवणाऱ्या लोकांची संख्या कितीही वाढलेली असली तरीही, ही दुनिया विश्वास ठेवणाऱ्या आणि विश्वास जपणाऱ्या लोकांमुळे टिकून आहे.. म्हणूनच दुनिया फक्त विश्वासावर चालते यावर माझा विश्वास आहे.

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “Admit झालेली नाती !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

“Admit झालेली नाती ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

 

आई मरावी पण ही जगावी असं महत्त्व प्राप्त झालेलं नातं म्हणजे मावशी! आणि बहिणीवर असलेलं प्रेम आपल्या म्हणजे भाचरांच्या माध्यमातून व्यक्त करणारा आपल्या आईचा भाऊ म्हणजे मामा! दोन्ही नात्यांच्या संबोधनांचा आरंभ ‘मा’ या अक्षराने होतो.. मा म्हणजे… माया, मार्दव आणि मातृत्व!

रुग्णालयांत डॉक्टर्स, नर्सेस (सिस्टर्स) यांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णसेवा करणाऱ्या महिलेला मावशी आणि पुरुषाला मामा असे संबोधण्याची सुरुवात आपल्याकडे अगदी नकळत झालेली असावी! यामागे योगायोग नाही… रुग्ण कोणत्याही वयाचा असो… त्याने मामा, मावशी यांचे थोडे का असेना प्रेम आयुष्यात कधी ना कधी अनुभवलेले असतेच. या अनुभवामुळे केवळ असे संबोधन असलेल्या व्यक्ती सुश्रुषा करीत असतील तरी सकारात्मक परिणाम होत असावा!

रुग्णाची प्रत्यक्ष शारीरिक स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांत हे मामा, मावशी अग्रभागी असतात, असे दिसते. रुग्णालयातील सिस्टर्स, वॉर्ड बॉईज, ब्रदर्स यांच्याप्रमाणे मामा, मावशी प्रशिक्षित नसतात… हे सेवक कित्येक वर्षांच्या अनुभवातून पारंगत होत जातात… त्यांच्या कामात आपसूक सफाईदारपणा येत जातो. किंबहुना एखाद्या रुग्णालयाच्या आरोग्यसेवेचा बराचसा भार ही वैयक्तिक पण आता सार्वजनिक पातळीवर रूढ झालेली नाती पेलत असतात, असे वाटते!

डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज यांनी आपापले व्यवसाय स्वतः निवडलेले असतात… पण मामा, मावशी गरजेतून उदयाला येतात! रुग्णाला धीराचे चार शब्द सांगण्याचा, एखादा सल्ला देण्याचा अधिकार यांना वयपरत्वे प्राप्त होत जातो… आणि बरे होऊन घरी निघालेल्या रुग्णाच्या नातेवाईक मंडळी कडून बक्षिसी मिळवण्याचा हक्कही (काही) मामा – मावशींनी स्वयंप्रेरणेने पदरात पाडून घेतलेला आढळून येतो!

छोट्या रुग्णांना हे न टोचणारे लोक भावत असावेत. कुणी काहीही म्हटले तरी शरीर धर्म चुकत नाही आणि त्याची घाण तर असतेच. या वासाची तमा न बाळगता, घृणा न करता मामा, मावशी रुग्णसेवा करीत राहतात… या कामाची कितीही सवय असली तरी हे काम सोपे नाही हे मान्य करावेच लागेल!

अर्थात, वेगवेगळ्या रुग्णालयांत रुग्णांना या नात्यांकडून येणारे अनुभव निरनिराळे असू शकतात. पण ही सुद्धा अखेर माणसेच आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी यांनी स्वीकारलेले काम अंती मानवसेवेचे ठरते, हेही खरेच !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पोटीस…  लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ पोटीस…  लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

 

मनाच्या पेटा-यात कुठली आठवण कोणत्या व्यक्तीला किंवा वस्तूला बिलगून बसलेली असते, ते सांगता येत नाही.. परवा फेसबुकवरच्या एका खाद्यसमूहावर एक फोटो अचानक पहाण्यात आला.. लांब दांड्याच्या लोखंडी काळ्याभोर पळीचा तो फोटो पाहून अंगावर सर्रकन् काटा आला.. नि ती पळी आठवणींचं बोट धरून थेट लहानपणात घेऊन गेली..

आमचं बालपण अगदी साधसुधं.. मोकळंढाकळं, अवखळ, खोडकर नि गरीबडं. आजच्यासारखा ना तेंव्हा टीव्ही होता, ना मोबाईल ना व्हिडिओ गेम्स.. शाळेतले काही तास नि घरातला जेवणा-अभ्यासाचा वेळ सोडला तर इतर वेळी नुसता धांगडधिंगा, खेळ नि हुंदडणं.. साहजिकच पडणं.. झडणं..

बोटाची ठेच, गुडघ्यावरचं खरचटणं, जखम.. कधीतरी डोक्याची खोकसुद्धा.. बटाटा सोलावा तसं सोलवटलेलं कातडं, त्यातून डोकावणारं लाल-गुलाबी मांस, भसकन् बाहेर पडलेल्या रक्ताच्या काळ्याभोर गुठळ्या… नि यांना बिलगून बसलेली अंगणातली नाहीतर मैदानातली माती.. रक्ता-मासाच्या ओढीनं घोंगावणा-या चार-दोन माशा नाहीतर चिलटांचा ढग.. नि थेट मस्तकापर्यंत पोहोचणारं ते चरचरणं.. !!

पण यातलं काहीही खेळापासून जरासुद्धा ढळू न देणारं.. पडल्यावर “टाईमप्लीज” म्हणत तळव्याच्या मागच्या बाजूच्या अगदी मध्यावर थुंकी लावणं, दोन-चार मिनिटं डोळे मिटून वेदनेचा अंदाज घेणं नि वीज चमकावी तसं झटक्यात उठून जखमेवर हातानं झटकणं नि पुन्हा खेळात सामील होऊन “घेतला वसा न सोडणं !” 

घरात डझनावर असणारी पोरबाळं नि रोजच्या होणा-या जखमा.. कधी चप्पल चावून होणारे फोड, उन्हाळ्यात हावरटपणानं रिचवलेल्या आंब्यानं होणारी गळवं, हाता-पायांवर होणारी केस्तुटं.. आई -बाप कुणाकडं नि कशा कशाकडं पहाणार ? म्हणतात नां.. “रोज मरे त्याला कोण रडे ?”

“पोरं म्हटल्यावर पडायचीच.. जखमा व्हायच्याच.. “, “पडे झडे माल वाढे” असल्या रांगड्या विचारसरणीचे ते दिवस नि आमचे माय-बाप होते.. “जा ती जखम पाण्यानं धू” म्हणत पाठीत एक धपाटा पडायचा.. फार तर जखमेवर हळदीची पूड नाहीतर तत्क्षणी होळी साजरी करायला लावणारं “आयोडीन” नावाचं क्रूर नि जहाल जांभळं द्रावणं ओतलं जायचं.. !!

धूळ, रक्ताच्या गुठळ्या, माती, माशा, चिलटं… यातल्या कशालाही न जुमानता एके दिवशी ती जखम खपलीनामक काळ्या कवचाखाली दिसेनाशी व्हायची नि त्या जखमनामक विषयाची इतिश्री व्हायची…

“बाळा, खूप लागलय कारे ? हॅंडिप्लास्ट लावूया हं.. डॉक्टरकाकांकडं जाऊ या का ? आता स्ट्रिक्ट रेस्ट घ्यायची बरं का ! फार तर झोपून मोबाईलवर गेम खेळ.. ” अशी आजच्या मुलांसारखी कौतुकं वाट्याला येणं आमच्या कमनशिबात नव्हतंच !!

जखमेपासून खपलीपर्यंतचा प्रवास मुकेपणानं पार पडायचा.. बारकसं गळू थोडसं मोठं होऊन कधी फुटलं ते कळायचं नाही.. केस्तुटातला केस थोरला भाऊ निर्दयपणानं ओढायचा नि थोडासा पू बाहेर येऊन ते होत्याचं नव्हतं होऊन जायचं.. पण प्रत्येकवेळी हा प्रवास इतका सुलभ असायचाच असं नाही.. रोगजंतू जखमेत शिरकाव करायचे, त्यांच्याशी लढताना लक्षावधी पेशी धारातीर्थी पडायच्या नि त्या “पू” नामक पिवळसर द्रव्याच्या रूपातून जखमेत भरून रहायच्या.. रोगजंतूंनी रक्तात प्रवेश केलेला असायचा.. ठणकत्या जखमेबरोबर ताप भरायचा.. लाल बारकसं गळू कधी मोठं होत जायचं नि त्या पिवळ्याजर्द गळवाची वेदना सोसण्यापलीकडे जायची.. अवघड जागी झालं असेल तर हे गळू “दे माय धरणी ठाय” अशा स्थितीला न्यायचं..

कुठं दुर्लक्ष करायचं नि कुठली गोष्ट गंभीरपणे घ्यायची हे अचूक समजणा-या आमच्या माऊलीच्या कपाळावर ही वाढती जखम, पू नि तापणारं अंग पाहून चिंतेची आठी उमटायची.. पण लगेच हातपाय गाळून डॉक्टरांकडे आपल्या पोराला नेणा-या त्या काळच्या आया नव्हत्या.. स्वत:च्या वैद्यकीय ज्ञानावर (तुटपुंज्या का असेना) विश्वास असणा-या नि म्हणूनच पोरांच्या आजाराशी स्वत: लढणा-या त्या झाशीच्या राण्या होत्या. (अर्थात डॉक्टरांकडे नेण्यासाठी लागणा-या छनछनीची बारा महिने असणारी कडकी.. हेही एक ठोस कारण होतच म्हणा !)

तिन्हीसांजेची वेळ.. दिवस सरेल तसा ठणका अजूनच वाढलेला.. पोराच्या रडण्यानं सारं घर कातरलेलं..

“या गादीवर आता झोपून रहायचं, आजिबात उठायचं, चालायचं, खेळायचं नाही. ” म्हणत ती माऊली लेकराला स्वत:च्या हातानं झोपवायची. गरमागरम कॉफी पाजायची. मऊ भाताचे चार घास भरवायची.. एव्हाना रात्रीनं बस्तान बसवलेलं असायचं..

“आई खूप दुखतय”….

” हो.. थोडं थांब हं… ” 

आई घरातल्यांची जेवणखाणं उरकायची..

पेशंट पोराच्या भोवती भावंडं गोल करून बसलेली…

“मने, समोरच्या कोनाड्यात पानं ठेवलीय, *ती घेऊन ये आणि फडताळातलं माझं पांढरं जुनं पातळ आण” 

आता त्या पोराला नि भावंडांनाही अंदाज आलेला असायचा.. ती एका खास प्रोसिजरची तयारी असायची..

पोटीसची…. !!

“आई नको.. आई पोटीस नको… ” ते पोर बेंबीच्या देठापासून ओरडायचं.. भोवतालच्या भावंडाना “सुपातले हसतात” हे एका बाजूला असलेलं फीलींग नि दुस-या बाजूला काळजात अजून चर्र करणारा स्वत:च्या वेळचा चटका… अशा संमिश्र भावनांनी व्यापलेलं असायचं !

मनीनं पिंपळाची, गुलबक्षीची अशी पानं भावासमोर ठेवलेली.. आईच्या पांढ-या सुती पातळातून लांबशी पट्टी काढून एका बाजूला मधोमध फाडून थोड्याशा भागाला विभागलेलं..

स्वयंपाकघरातून “चर्र” असा आवाज..

आईनं लांब दांड्याच्या तापलेल्या लोखंडी पळीत कणीक, हळद, थोडं पाणी नि थोडं तेल घातलेलं.. पिठल्यासारखा झालेला लगदा.. नि त्यामुळे गरमागरम पळीतून निघणा-या वाफा नि आसमंतात घुमणारा तो जोरदार “चर्र” आवाज.. पेशंट पोराला अजूनच घाबरवून सोडणारा… “बळीच्या बक-याच्या” चेह-यावरचे नि याच्या थोबाडावरचे भाव तंतोतत जुळणारे.. !

आईचं त्या पोटीसाच्या पळीसहित आगमन…

“मला नको.. मी नाही लावून घेणार.. पोटीस नको.. ” म्हणत भेदरलेल्या पोराचा पळण्याचा प्रयत्न… नि त्याला भावंडांनी घट्ट पकडून ठेवणं.. आईचं चमच्याने पानाच्या सपाट भागावर पोटीसाचं भयंकर गरम पीठ घालणं..

नि…

नि…

पाऊस पोराच्या पाठीवर बरसणारा.. भावंडांचीही तीच गत.. नि त्या माऊलीच्या कुशीत गाढ झोपी गेलेलं तिचं लेकरू !!

शेजारच्या खोलीतल्या दाराआडून हा सोहळा पाहणारे भेदरलेले त्याचे बाबा.. दगडाच्या त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालेलं..

नि… घाबरट समजत असलेल्या बायकोच्या करारीपणाच्या साक्षात्कारानं दिपलेले त्यांचे डोळे…. !!

पुढचे दोन दिवस हा पोटीसाचा रणसंग्राम… तिस-या दिवशी सकाळी पोटीसाला घाबरून जखमेचं पलायन.. वेदना आणि तापाचाही रामराम…

नंतर शिल्लक राहणारा फक्त व्रण…. आईच्या कणखरपणाची, वात्सल्याची नि पोटीसाची जन्मभर आठवण करून देणारा…. !!

आजही म्हणूनच पळीचा फोटो पाहिला नि पोटीसाच्या आणि माझ्या माऊलीच्या आठवणीनं जीव चिंब चिंब झाला… !!

उष्णतेनं जखमेभोवतीचा रक्तप्रवाह वाढवणारं नि जखम बरी होण्यास मदत करणारं…. हळदीमुळे जखमेतल्या रोगजंतुंना मारणारं पोटीस…. आज वापरणं तर सोडाच पण कुणाला माहीतही नाही..

काळाच्या प्रवाहाबरोबर वाहून गेलेल्या अनेक मौल्यवान गोष्टींपैकी ते एक.. !. शास्त्राने अनेक औषधे आणली. प्रभावशाली अॅंटिबायोटिके जखमांना ताबडतोब आटोक्यात आणतातही.. गोळी घेतली की काम संपून जातं.. पोटीसासारखं झंझट नाही.. म्हणूनच पोटीस नामशेष झालं..

कबूल आहे..

पण सा-या कुटुंबाला एकत्र आणणा-या, माऊलीच्या वात्सल्याच्या वर्षावाला कारणीभूत ठरणा-या त्या पोटीसनामक सोहळ्याला मात्र आपण मुकलो !! 

लेखिका : © नीला महाबळ गोडबोले, सोलापूर.

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Mesponsible… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

MESPONSIBLE – लेखक  : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

माझ्या आईला अनेक दिवस झोप येत नव्हती. तिला दमल्यासारखं वाटे. ती चिडखोर, चिडचिडी झाली होती.

…आणि एक दिवस अचानक ती बदलली…

त्या दिवशी माझे वडील तिला म्हणाले:

 – मी तीन महिन्यांपासून नोकरी शोधत आहे आणि मला नोकरी मिळाली नाही… मी निराश आहे, आज मित्रांसह बिअर घेणार आहे.

माझ्या आईने उत्तर दिले:

 -ठीक आहे… बिअरच्या बिलाचे तुम्हीच पाहा आणि रात्री उशीर झाल्यास मित्राकडेच झोपा..

माझा भाऊ तिला म्हणाला:

 – आई, मी विद्यापीठात सर्व विषयांमध्ये मागे आहे.. मला माहीत नाही, माझा निकाल कसा असेल..

माझ्या आईने उत्तर दिले:

 – ठीक आहे, तू अभ्यास केलास तर नक्कीच पास होशील. आणि जर तू तसे केले नाहीस तर, सेमिस्टरची पुनरावृत्ती करशीलच. पण शिकवणीची फी तुझी तूच द्यायची..

माझी बहीण तिला म्हणाली:

 – आई, मी कार ठोकली..

माझ्या आईने उत्तर दिले:

 – ठीक आहे बेटा, गॅरेजमध्ये घेऊन जा. आणि पैसे कसे द्यायचे, ते बघ. आणि गाडी दुरुस्त होईपर्यंत बस किंवा रेल्वेने फिर..

तिची सून तिला म्हणाली:

 – आई, मी तुमच्याकडे काही महिने राहायला येते आहे.

 माझ्या आईने उत्तर दिले:

 – ठीक आहे. लिव्हिंग रूमच्या पलंगावर सोय बघ आणि स्वतःसाठीचे ब्लँकेट शोध..

आईकडून येणाऱ्या या प्रतिक्रिया पाहून आम्ही सर्वजण काळजीत पडलो.

आम्हाला शंका आली, की ती डॉक्टरकडे गेली होती… कदाचित तिला त्या गोळ्यांचा ओव्हरडोस झाला असेल… त्यानंतर आम्ही आईसोबत बोलण्याचे ठरविले..

पण नंतर… तिने आम्हाला तिच्याभोवती गोळा केले आणि स्पष्ट केले:

प्रत्येक व्यक्ती तिच्या आयुष्यासाठी जबाबदार आहे, हे समजायला मला बराच काळ लागला. माझी व्यथा, चिंता, माझे नैराश्य, माझे धैर्य, माझा निद्रानाश आणि माझा ताण, तुमच्या समस्या सोडवत नाहीत, तर माझ्या समस्या वाढवतात, हे कळायला मला अनेक वर्षे लागली.

कोणाच्याही कृतीसाठी मी जबाबदार नाही, परंतु मी त्यावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांसाठी मी जबाबदार आहे.

म्हणून, मी या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे, की माझे स्वतःचे कर्तव्य आहे की शांत राहणे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला तुमच्याशी संबंधित असलेल्या गोष्टी सोडवायला लावणे..

मी योग, ध्यान, चमत्कार, मानवी विकास, मानसिक स्वास्थ्य आणि न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंगचे अभ्यासक्रम घेतले आहेत आणि त्या सर्वांमध्ये मला एक समान धागा आढळला…

मी फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवू शकते. तुमच्या स्वतःच्या समस्या कितीही कठीण असल्या, तरी त्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक संसाधने आहेत. माझे काम तुमच्यासाठी प्रार्थना करणे, तुमच्यावर प्रेम करणे, तुम्हाला प्रोत्साहन देणे हे आहे. परंतु तुमच्या समस्या सोडवणे आणि तुमचा आनंद शोधणे हे तुमच्यावर अवलंबून आहे.

तुम्ही मला विचारले, तरच मी तुम्हाला माझा सल्ला देईन आणि तो पाळायचा की नाही, हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या निर्णयांचे चांगले किंवा वाईट परिणाम असतील आणि ते तुमचे तुम्हालाच भोगावे लागतील.

म्हणून आतापासून मी तुमच्या जबाबदाऱ्यांचे ग्रहण, तुमच्या अपराधाची पोती, तुमच्या पश्चात्तापाची धुलाई, तुमच्या चुकांची वकिली, तुमच्या विलापांची भिंत, तुमच्या कर्तव्याची निक्षेपी सोडून देत आहे…

आतापासून, मी तुम्हाला स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण प्रौढ घोषित करत आहे.

माझ्या घरी सगळेच अवाक् झाले होते.

त्या दिवसापासून, कुटुंब अधिक चांगले कार्य करू लागले. कारण घरातील प्रत्येकाला माहीत होते की त्यांना नेमके काय करणे आवश्यक आहे.

आपल्यापैकी काहींसाठी हे कठीण आहे. कारण आपण काळजीवाहू म्हणून मोठे झालो आहोत. आपण इतरांसाठी जबाबदार असतो. आई आणि पत्नी म्हणून आम्ही सर्व गोष्टींपासून दूर राहतो. आपल्या प्रियजनांनी कठीण प्रसंगातून जावे किंवा संघर्ष करावा, असे आपल्याला कधीच वाटत नाही. प्रत्येकाने आनंदी व्हावे अशी आपली इच्छा असते.

परंतु, जितक्या लवकर आपण ती जबाबदारी आपल्या खांद्यावरून काढून त्या प्रिय व्यक्तीवर टाकू, तितके चांगले. आपण त्यांना ‘MESPONSIBLE’ होण्यासाठी तयार करू…

प्रत्येकासाठी सर्व काही बनण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही… स्वतःवर जबाबदार्‍यांचा दबाव आणणे थांबवा…………

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दार आणि खिडकी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ दार आणि खिडकी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

व्यवहाराच्या पायावर उभारलेल्या संसाराच्या इमारतीची आखणी कितीही योग्य तऱ्हेने केली तरी काही त्रुटी राहतातच असं दिसतं ! घराच्या भिंती सभोवतालच्या समाजाने बंदिस्त केलेल्या असतात, तर परमेश्वरी कृपेचे छप्पर सर्वांनाच नेहमी सावली आणि आधार देतं! दार- खिडकी हे घराचे आवश्यक, अपरिहार्य भाग! जसे घरातील नवरा बायको !कधी कधी वाटतं चुकांचे कंगोरे आपले आपणच बुजवून घ्यायचे असतात! खिडकी आणि दार यांचे प्रपोर्शन योग्य असेल तर ते चांगले दिसते.. खिडकीने जर दाराएवढं बनायचं ठरवलं तर घराचे रूप बिघडते! अर्थात हे माझं मत आहे!

दार ही राजवाट आहे जिथून प्रवेश होतो, त्याचे मोठेपण मानले तर आपोआपच बाकीचे भाग योग्य रीतीने घर सांभाळतात. खिडकी वाऱ्यासारखी प्रेमाची झुळूक देणारी असली की घरातील हवा नेहमी हसती, खेळती, फुलवणारी राहते. ही खिडकी बंद ठेवली तर चालत नाही, कारण तिची घुसमट वाढते! प्रकाशाचा किरण तिला मिळत नाही. एकेकाळी स्त्रीच्या मनाच्या खिडक्या अशा बंद केलेल्या होत्या! शैक्षणिक प्रगतीच्या सूर्याचे किरण झिरपू लागल्यावर तीच खिडकी आपलं अस्तित्व दाखवू लागली.

बाहेरचे कवडसे तिला- तिच्या मनाला -उजळवून टाकू लागले, पण म्हणून खिडकीचे अस्तित्वच मोठं मोठं करत दाराएवढं बनलं किंवा त्याहून मोठं झालं तर…. इमारतीच्या आतील सौंदर्य कदाचित विस्कटून जाईल! येणाऱ्या वाऱ्या वादळाचा धक्का खिडकी पेलू शकणार नाही.. तिला दाराचा आधार असेल तर जास्त चांगलं असेल!

सहज मनात आलं, ब्रिटिश कालीन इमारतींना दारं आणि खिडक्या दोन्ही मोठीच असत. !जणू काही तेथील स्त्री आणि पुरुष यांचा अस्तित्व फार काळापासून समानतेच्या दिशेने वाटचाल करू लागले, त्या उलट आपल्याकडे वाडा संस्कृतीत दार खूप मोठे असले तरी त्याला एक छोटं खिडकीवजा दार असे, ज्याला दिंडी दरवाजा म्हणत.. त्यातून नेहमी प्रवेश केला जाई! उदा. शनिवार वाड्याचे प्रवेशद्वार जरी मोठे असले तरी आत प्रवेश करण्यासाठी छोटा दिंडी दरवाजा आहेच..

जुन्या काळी स्वयंपाक घरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बाहेरच्याना दुस्तर होता. तसेच भक्कम पुरुषप्रधान दार ओलांडून किंवा डावलून, चौकट तोडून बाहेर पडणे स्त्रीलाही कठीण होते.

साधारणपणे ४०/५० वर्षांपूर्वी स्त्रीवर कठीण प्रसंग आला तर तिची अवघड परिस्थिती होत असे. शिक्षण नाही आणि आर्थिक स्वातंत्र्य कमी असल्यामुळे संसाराचा गाडा ओढण्याची एकटीवर वेळ आली तर हातात पोळपाट लाटणे घेण्याशिवाय पर्याय नसे.

मागील शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांची परिस्थिती काहीशी अशीच होती. त्यामुळे स्त्री शिक्षण हे महत्त्वाचं ठरलं! शिक्षणामुळे आत्मविश्वास मिळाला, नोकरीमधील संधी वाढल्या..

पण हळूहळू कौटुंबिक वातावरण ही बदलत गेलं. घरातील पुरुष माणसांबरोबरच स्त्रीचं अस्तित्वही समान दर्जाचे होऊ लागले. अर्थातच हे चांगले होते, परंतु काही वेळा स्त्री स्वातंत्र्याचाही अतिरेक होऊ लागतो आणि घराची सगळी चौकट बिघडून जाते.

अशा वेळी वाटते की एक प्रकारचे उंबरठ्याचे बंधन होते ते बरे होते का? अलीकडे संसार मोडणे, घटस्फोट घेणे या गोष्टी इतक्या अधिक दिसतात की दाराचे बंधन तोडून खिडकीने आपलेच अस्तित्व मोठे केले आहे की काय असे वाटावे!

दार आणि खिडकी एकमेकांना पूरक असावे. दाराला इतकं उघड, मोकळं टाकू नये की, त्याने कसेही वागावे आणि खिडकी इतपतच उघडी असावी की हवा, प्रकाश तर खेळता रहावा आणि चौकट सांभाळावी!

संसाराच्या इमारतीचा हा जो बॅलन्स आहे, त्यात दोघांचेही असणारे रोल दाराने आणि खिडकीने सांभाळावे नाहीतर या चौकटी खिळखिळ्या होऊन संसाररूपी इमारतीची वाताहात होण्यास वेळ लागणार नाही……

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – १३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – १३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

आम्ही पाच – २

एका मुक्त, मोकळ्या, स्वतंत्र वातावरणात आम्ही पाच जणी वाढत होतो, घडत होतो. मुक्त, मोकळे वातावरण म्हणजे आम्ही स्वैर होतो, बेशिस्त होतो, मोकाट होतो असे मात्र नाही. आम्हा पाचही बहिणीत एकमेकात आणि घरात आई वडील, आजी यांच्याशी एक सुसंवाद होता. आम्ही मोकळेपणाने बोलू शकत होतो, प्रश्न विचारू शकत होतो, बालवयातल्या आणि नंतर समज येऊ लागल्यानंतरच्याही कितीतरी शंकांना, अडचणींना, हवं नको वाटणाऱ्या अनेक बाबींना आम्ही बिनधास्त मांडू शकत होतो आणि मुख्य म्हणजे, “अजून तू लहान आहेस, तुला काही कळत नाही” अशी असमाधानकारक अधांतरी उत्तरं आम्हाला कधीच मिळाली नाहीत.

मागे वळून पाहताना आज मला एक प्रकर्षाने जाणवते की मनातली वादळं, शंकांचं निरसन, जर घरातच आपल्या प्रिय आणि मोठ्या व्यक्तींकडून झालं तर ती व्यक्ती सक्षम आणि निर्भय बनते. स्वतःच्या चुकांची कबूली देण्याचंही बळ तिला मिळतं. निर्णय शक्तीची एक सर्वसाधारण प्रक्रिया तिच्या व्यक्तिमत्त्वात सहजपणे घडत जाते आणि किंकर्तव्यमूढतेपासून ती व्यक्ती आयुष्यभर दूर राहते. आम्हा पाचही बहिणींच्या बाबतीत हे निश्चितपणे घडलं.

घर लहान की मोठं हा प्रश्नच नसतो. आनंदाच्या क्षणी जिथे आख्ख घर नाचतं, गोंधळलेल्या मानसिक अवस्थेत जे घर कुशीत घेतं, छोट्या-मोठ्या मन मोडून टाकणाऱ्या भावनांना जे घर पदरात घेतं तेच खरं सुरक्षित घर. अशा एका सुरक्षित घरात आम्ही वाढलो. “मुलीच्या जातीला हे शोभत नाही बरं का ?” अशी फट्टू वाक्यं आम्ही आमच्या घरात कधीच ऐकली नाहीत.
“तुला हेच करायचं आहे का ? कर मग. समोर येणाऱ्या अडचणींना तुझं तुलाच सामोरे जायचं आहे हे मात्र लक्षात ठेव. यथाशक्ती आम्ही तुझ्या पाठीशी राहूच. ” असं प्रेरणा देणारही, सावध करणारही आणि आधार देणारं सामर्थ्य आम्हाला अशा शब्दांतून नक्कीच लाभलं.

एक आठवण मला सांगावीशी वाटते. ज्या सुंदर, मोठ्या, डोळ्यांमुळे हरवलेली छुंदा सापडू शकली तशाच माझ्या मोठ्या डोळ्यांनी मात्र मला एका वाईट क्षणी न्यूनगंड प्राप्त करून दिला. आमच्या गल्लीत एक कोंबड्या पाळून अंडी विकणारी मुस्लिम वयस्कर बाई राहायची. तिला आम्ही बटूबाई म्हणायचो. ती एकटीच राहायची. तिच्या आयुष्याविषयी फारशी कुणाला माहिती नव्हती पण अंडी विकण्याच्या निमित्ताने तिचा घरोघर संचार असायचा. ती काहीशी फटकळ आणि कर्कश्यही होती पण वाईट नव्हती. बरी होती. खेळता खेळता कधी कोणाला तहान लागली तर ती पटकन पाणीही प्यायला द्यायची पण त्या दिवशी मात्र मला तिचा अत्यंत राग आला. रविवार असावा. आमचा बालचमुचा लगोरीचा खेळ मस्त रंगात आला होता आणि त्याचवेळी माझ्याकडे बघून ती म्हणाली, “ए बटारे ! जरा इकडे ये तर.. ”
मोठ्या डोळ्यांची म्हणून हीने मला “बटारी” म्हणावे ? प्रचंड राग आणि प्रचंड दुखावल्यामुळे मी ताडताड जिना चढून घरी आले आणि खिडकीतूनच तिला जोरात म्हणाले, ”मला बटारी म्हणतेस तू कोंबडी चोर आहेस. ” आणि जिजीच्या कुशीत शिरून मी बेफाम रडले.

माझं बालमन विदीर्ण झालं होतं. माझ्या आईचा माझ्या पाठीवर मायेचा हात होता आणि माझ्या चारही बहिणी माझ्या भोवती कडकडून भेदरल्यासारख्या उभ्या होत्या. त्यांच्याही डोळ्यात मला रडताना पाहून अश्रू जमले होते. एरवी आम्ही एकमेकींशी कितीही भांडत असू पण आमच्यापैकी कोणालाही बाहेरच्या कुणा व्यक्तीने दुखावलं तर मुळीच खपवून घेतलं जायचं नाही. अशा अनेक क्षणांनी त्यावेळी आम्हा पाचही जणींना ही एक जाणीव दिली होती की आमची पाच जणींची एक वज्रमूठ आहे. सगळ्या मतभेदांना, विचारांना, निराळ्या स्वभाव छटांना डावलूनही ही घट्ट मूठ कधीही सैल झाली नाही हे विशेष.

आता उषा—निशाही मोठ्या होत चालल्या होत्या. त्यांच्या जाणिवा बहरत होत्या. त्या जुळ्या असूनही त्यांच्यात काहीच साम्य नव्हतं. दिसण्यात, वागण्यात, स्वभावात, संपूर्णपणे त्या एकमेकींपासून भिन्न होत्या. काही ना काही किरकोळ कारणांनी सतत भांडायच्या. उषा जास्त आक्रमक होती. निशा मजबूत, दांडगी असली तरी ती तितकीच समंजसही होती. ”जाऊ दे !” वाली होती.
“चल आता ! शाळेत जायला उशीर होतोय आपल्याला” म्हणून भांडता भांडताच त्या एकमेकींचा हात घट्ट धरून शाळेला निघायच्या. त्यांच्या मागे दोन लांब, घट्ट वेण्या उडवत, ठुमकत छुंदा निघायची कारण त्या तिघींची शाळा आणि शाळेची वेळ एकच होती आणि या तिघींना असे एकत्र बघत असताना मला मी यांची मोठी बहीण अशी एक बलशील भावना स्पर्शून जायची. कधी ती सुखद असायची तर कधी थोडीशी त्रासदायक होई.

एखादे वेळेस मला उगीच वाटून जायचं की घरातली सगळी कठीण, अंग मेहनतीची, क्लिष्ट कामं मलाच करावी लागतात. रोज आईला पाट्यावर वाटण वाटून देणे, कधी घराच्या कोपऱ्या कोपऱ्यातून कचरा काढणं, उंच दोरीवर काठीने कपडे वाळत घालणे, रात्री गाद्या घालणे, आंब्याच्या सीझनमध्ये पातेलं भरून आंब्याचा रस काढणे, शिवाय जीजीचे तर फारच उद्योग असायचे. अनारशासाठीचे ओलसर तांदूळ जात्यावर दळताना तिच्या जात्याच्या खुंट्याला फिरवू लागणे, पावसाळ्यात पप्पा टोपली भरून “करंदी” आणायचे ती बारीक “करंदी” (हा एक कोलंबीचाच प्रकार) सोलत बसणे, शाळेला सुट्टी लागली, मे महिना आला की आमचं घर म्हणजे एक वर्कशॉपच होऊन जायचं. आजच्यासारखी मुलांसाठी भरणारी, व्यक्तिमत्व विकास घडवणारी शिबिरं वगैरे तेव्हा नव्हती. सुट्टीत घर हेच शिबीर व्हायचं. विविध उपक्रम राबवले जायचे या शिबीरात.

मे महिना म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यातली वाळवणं सुरू व्हायची. पोह्याचे पापड, उडदाचे पापड, साबुदाण्याच्या चिकवड्या, तांदळाच्या कुरडया, कमळाची देठं दह्यात भिजवून, गोल गोल चिरून वाळत घालणं, गवारीच्या शेंगा मीठ लिंबू तिखट लावून वाळवून त्याची भिशी करायची, ताकातल्या सांडगी मिरच्या असायच्याच. एक सारखं कुटणं, लाटणं, वाळत घालणं आणि संध्याकाळी परत आवरणं. या साऱ्याभोवती आमचं आख्ख घर गुंतलेलं असायचं आणि खास अलिबागहून मागवलेले कितीतरी शेर कडवेवाल निवडायचे. त्यातले चाडे दाणे वेगळे करायचे. वर्षभर लागणारा अत्यंत आवडता पदार्थ म्हणजे वालाचं बिरडं ! मग त्याची उस्तवावर नको का करायला ? शिवाय हे स्वत:च्या घरापुरतंच मर्यादित नसायचं. गल्लीत एकमेकांकडे पापड लाटायला जाण्याचीही एक वेगळीच मजा असायची. प्रत्येकाच्या सोयी, सवलतीप्रमाणे “पापडदिन” ठरायचा. संध्याकाळी घरी परतताना त्याच पापडांचा वानवळा असायचा. उषा—निशा यथाशक्ती आणि गंमत म्हणूनही आवडीने या कामात सहभागी असायच्या. आमच्या बहिणींमध्ये छुंदा ही अत्यंत हुशार आणि अभ्यासू. सतत कुठल्या ना कुठल्या परीक्षाच देत असायची. त्यामुळे सहजच तिला या घरगुती कामांपासून रजा मिळत असे. उषाचे वेगळेच, तिचे तिचेही उपक्रम असायचे. कोऱ्या कागदावर चित्रं काढायचा तिला फार नाद होता. तसे तिचे अनेक उद्योग असायचे आणि घरभर पसारा असायचा आणि तो सगळा पसारा निशा आणि आई सतत आवरत असायच्या. ताई आजोबांकडेच राहायची पण आमच्यात असली की मात्र अगदी सारं काही नीटनेटकेपणाने करायची. आजोबांच्या निरनिराळ्या गंमती सांगायची. अखंड बडबड असायची तिची. पण ती एक वेगळीच एन्टरटेनमेंट होती.

मे महिन्याच्या सुट्टीत आई भरतकाम, विणकाम, शिवणकामही आम्हा मुलींना शिकवायची. त्यात माझी प्रगती शून्य असली तरी ताईचा मात्र अव्वल नंबर लागायचा.
निशा लहान असली तरी तिला या साऱ्या कामांची आवड होती की नाही हे माहीत नाही पण ती अत्यंत मेहनती होती. तिला लहानपणापासूनच प्रचंड उरक होता. उपजतच तिच्यात एक व्यवस्थापनेचा गुण होता. तिचाही घरकामातला वाटा आणि सहभाग मोठाच असायचा. शिवाय मी तिला माझी काही कामे पासऑन करायची. माझ्या बॉसिंग करण्याच्या पद्धतीनुसार.. पण तिने कधीही आदळआपट केली नाही. पप्पा ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी त्यांची बॅग तर तीच भरायची आणि पपा तिलाच विचारायचे, “ निशू आज तू बॅगेत नॅपकिन ठेवायला विसरलीस. ”त्यावेळी मला पपांचा रागही यायचा. निशा बिचारी वाटायची. ईवलीशी तर होती ती !

पण अख्खा दिवस काम करून थकलेल्या आईचे पाय मात्र उषाच दाबून द्यायची. पप्पांचं डोकंही दाबून द्यायची. त्यांना झोप लागावी म्हणून म्हणायची, “थांबा तुम्हाला मी एक छान गोष्ट सांगते, ” मग तिची गोष्ट सुरू व्हायची.
“एक होता निजाम.. ”
अशीच तिच्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात असायची आणि हा तिचा निजाम मुक्तपणे पृथ्वीपासून चंद्रापर्यंत प्रवास करायचा. तो कधी शाळेतही जायचा. कधी शिक्षक असायचा तर कधी विद्यार्थी. कधी चार पट्ट्यांचा मार खायचा तर कधी दहा पट्ट्यांचा मार कुणाला द्यायचा पण तिचा निजाम शूर होता, लढवय्या होता, पराक्रमी होता आणि तितकाच हळवा आणि स्वप्नाळू होता. उषाच्या कथेतला हा असा बहुरूपी, बहुरंगी, बहुढंगी निजाम आज उषा या जगात नसली तरी आमच्या मनात मात्र अमर राहिला आहे.

असो ! अजून खूप बाकी आहे. मन अनंत आठवणींनी तुडुंब भरलेलं आहे. या गाठोड्यात आयुष्यभराचा पसारा बांधून ठेवलाय. एकदा का ते उघडलं की त्यात कसं हरवून जायला होतं….

क्रमश: भाग तेरावा 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘‘ध्वज सोन्याचा झळकत सुंदर…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘‘ध्वज सोन्याचा झळकत सुंदर…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

भारतरत्न लतादीदींनंतर जर भारतीय संगीतात कोणाचं नाव अगदी सहज ओठांवर येत असेल, ते म्हणजे आशाताई भोसले यांचं! दोघीही ‘संगीतसूर्य’ मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्यका! तो सोनेरी झळकता सूर दोघींमध्ये तेजाळला नाही तरच नवल! आशाताईंना गळा आणि बुद्धीचंही वरदान मिळालंय. त्यांनी अनेक भाषांमध्ये विविध प्रकारची हजारो गाणी गाऊन विक्रमच केला आहे. संसारातील धावपळ, आणि मुलाबाळांचं करून, आशाताईंनी त्या कठीण काळात, इतकी गाणी कधी आणि कशी रेकॉर्ड केली असतील, याचं मला नेहमीच आश्चर्य आणि अप्रूप वाटतं!

त्याकाळी गाणी रेकॉर्ड करणं हे एक आव्हानच होतं. त्यांच्या समकालीन अनेक गायक गायिकांमध्ये वेगळं आणि उठून दिसण्यासाठी त्यांनी अमाप कष्ट घेतले, रियाज केला, मेहनत केली. रेल्वेचा प्रवास करून, धुळीत – गर्मीत उभं राहून, प्रत्यक्ष सर्व वादकांबरोबर थेट लाइव्ह गाणं आणि तेही उत्कृष्टरित्या सलग एका टेकमध्ये साकार करणं, ही सोपी गोष्ट नव्हती. मी गायला लागले, तेव्हा सुद्धा माझी ९० ते ९५ टक्के गाणी मी दिग्गज वादक समोर असताना, सलग एका टेकमध्ये Live रेकॉर्ड केली असल्याने, मी यातील आव्हान आणि याचं महत्त्व निश्चितपणे जाणते. ‘वेस्टर्न आऊटडोर’ हा आशिया खंडातील सर्वोत्तम रेकॉर्डिंग स्टुडिओज् पैकी एक समजला जातो. त्या स्टुडिओतील अत्यंत बुद्धिमान साऊंड इंजिनीअर श्री. अविनाश ओक यांनी लतादीदी, आशाताई, जगजित सिंह यांची अनेक गाणी इथे रेकॉर्ड केलीत. माझेही जवळपास सर्व आल्बम अविनाशजींनी इथेच रेकॉर्ड केले, हे मी माझं भाग्य समजते. त्यांच्या मते, ‘लाईव्हमधे काही मिनिटांसाठी वादकांसह गायकाच्या, म्हणजे सर्वांच्याच ऊर्जा एकवटलेल्या असतात. प्रत्येक जण आपलं काम जीव ओतून अचूक करतो. एक गूढ, दैवी शक्ती त्या गाण्यात प्राण फुंकते. म्हणून अशा गाण्यांचा आत्मा अमरच असतो. त्यामुळेच ही गाणी ‘कालातीत’ होतात.’ 

आजकाल, डिजिटल रेकॉर्डिंग ही व्यवस्था गायकांसाठी खूप सोपी आहे. परंतु भावपूर्णतेसाठी सर्व वादकांसोबत गाणं हीच पद्धत योग्य होती, असं मलाही वाटतं. आशाताईंची शेकडो गाणी मला आवडतात. पण त्यातलं पंडित हृदयनाथजींनी स्वरबद्ध केलेलं ‘धर्मकन्या’ चित्रपटातलं ‘नंदलाला रे’ हे गाणं म्हणजे ‘मुकुटमणी’ आहे! 

‘नंदलाला.. ’ ही भैरवी. एकदा या गाण्याबद्दल बोलताना हृदयनाथजी मला म्हणाले की, उस्ताद सलामत – नजाकतजींच्या भैरवीनं त्यांना झपाटलं आणि ही स्वर्गीय रचना अवतरली. मला तर नेहमी वाटतं, कोणीही दुसऱ्याकडून कोणतीही रचना उचलताना त्यातून नेमकी काय दर्जेदार गोष्ट घेतो, हे त्या – त्या माणसाच्या बुद्धीच्या आकलनाच्या क्षमतेवर अवलंबून असतं. त्यात हृदयनाथजींनी एक से एक अशा कमाल जागा बांधल्या आहेत की, ही स्वरांची अभूतपूर्व सौंदर्यस्थळं आपल्याला आनंदाने स्तिमित करतात. आणि आशाताईंनी ती अशा काही भन्नाट ऊर्जेनं एकेका दीर्घ श्वासात गायली आहेत की एखादा शास्त्रीय संगीतातला गायकही ते ‘आ’ वासून पाहत राहील.

तसंच १९८३-८४ नंतर धर्मकन्या’मधली ‘पैठणी बिलगून म्हणते मला.. ’ सारखी अद्वितीय गाणी मला हृदयनाथजींसोबत भारतभर झालेल्या ‘भावसरगम’ कार्यक्रमात, त्यांच्या शेजारी स्टेजवर बसून सादर करण्याचं भाग्य लाभलं. तेव्हा ही सगळी गाणी किती अफाट सुंदर आणि आव्हानात्मक आहेत, याचा प्रत्यय घेत मी ते आव्हान स्वीकारून आनंदाने गात असे. त्याच वेळी आशाताईंची महती अधिक जाणवत असे. या गाण्यातली ‘शिरी’ या शब्दांवरची सट्कन येणारी गोलाकार मींड गाताना तर मला, दिवाळीच्या फटाक्यातलं आकाशात झेपावणारं रॉकेटच दिसतं, ज्याचं नोटेशन काढणं खरंच कठीण आहे. ती जागा अपूर्व आहे.

‘पूर्व दिशेला अरूण रथावर’ हे गाणं ऐकताना समोर ‘ध्वज सोन्याचा झळकत सुंदर’ चित्ररूपाने डोळ्यांपुढे साकार होतो. या शब्दावरील भूप रागातून नट रागातील मध्यमावर हरकत घेऊन विसावतो, त्या हरकतीच्या जागेचे टायमिंग म्हणजे कळसच! अशा अनेकविध भाषांमधील त्यांचा ‘आशा टच’ हा काही विरळाच!

आशाताईंचं संगीत क्षेत्रात उच्चतम नाव असलं तरी आमच्या भेटीत, त्या किती साधेपणानं बोलतात, वागतात याची आठवण झाली तरी मला गंमतच वाटते.

एकदा पार्ल्याच्या दीनानाथ सभागृहात दिवाळी पहाट कार्यक्रमात लतादीदी सोडून सगळी मंगेशकर भावंडं स्टेजवर हजर होती.. “तुमच्याकडे मंगेशकर भगिनी सोडून आणखीन कोण कोण गायलंय?” हा प्रश्न निवेदकाने पंडित हृदयनाथजींना विचारला. त्यावर माझे गुरू हृदयनाथजींनी माझं तोंडभरून कौतुक केलं आणि म्हणाले, “माझ्याकडे पद्मजा ‘निवडुंग’ चित्रपटासाठी ‘केव्हातरी पहाटे’ व ‘लवलव करी पातं’ आणि इतर गाणीही फार सुंदर गायली आहे!”

आशाताई, उषाताई, मीनाताई, अशा बहिणींसमोर या दिग्गज कलाकार भावाने माझं कौतुक केल्यावर, नंतर त्या माझ्याशी कशा वागतील, काय बोलतील, अशी मला धाकधूक होती. परंतु मध्यंतरात आशाताईंसारख्या महान गायिकेने मला जवळ बोलावून, माझ्या गाण्याचं, तसंच साडीचं, दागिन्यांचं, (अशा स्त्रीसुलभ गोष्टींचंही) कौतुक केलं, हे पाहून मला अचंबाच वाटला. मीही त्यांच्या साडीचं कौतुक केल्यावर, “ही साडी मी तुम्हाला देऊ का?” असंही त्यांनी मला विचारलं. अर्थात, मी फार संकोचले आणि मनोमन आनंदलेही!

एकदा दादर येथील नुकतंच नूतनीकरण झालेल्या, ‘महात्मा गांधी जलतरण तलावा’चं उद्घाटन होतं. त्यानिमित्ताने तिथे माझ्या गाण्याचा कार्यक्रम होता. योगायोगाने हाही दिवाळी पहाटचाच कार्यक्रम होता.

दुसर्‍या दिवशी इंदौरला ‘सानंद’तर्फे दिवाळी पहाट कार्यक्रम असल्याने मला या कार्यक्रमानंतर त्वरित निघून इंदौरचं विमान गाठणं आवश्यक होतं. परंतु आयोजक श्री. प्रसाद महाडकर मला म्हणाले, “पद्मजाताई, थोडं थांबाल का अजून? आशाताईंनी ‘मला पद्मजाला आज भेटायचंच आहे!’ असा निरोप पाठवला आहे. आशाताईंना भेटायची मलाही तीव्र इच्छा होतीच. परंतु विमान गाठायचं म्हणून वेळेअभावी निघावं लागेल, असा त्यांना फोनवर निरोप दिल्यावरही आशाताईंनी, ‘पद्मजाला थांबवूनच ठेवा’ असा परत निरोप दिला.

काही वेळ मनाची उत्सुकता, आणि घालमेल चालू असताना आशाताई सुहास्यवदने आल्या आणि त्यांनी माझ्या ओंजळीत सोनचाफ्याची काही घमघमीत फुलं आनंदाने दिली. माझ्या आयुष्यात अनेकदा असे अविश्वसनीय आणि आनंदाचे सोनेरी क्षण आले, त्यापैकी हा एक! त्या ओंजळभर सुगंधी फुलांचा घमघमाट मला आजवर आनंद देत आला आहे..

परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो !

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुके अभंग, मुक्या ओव्या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ मुके अभंग, मुक्या ओव्या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

आमच्या नवरा बायकोत कधी कधी भांडण व्हायचं. भांडण उंबऱ्याच्या बाहेर जाणार अशी शक्यता निर्माण झाली की, माझी आजी आम्हा दोघांना मायेने जवळ घ्यायची. समोर बसवायची. आमचे दोघांचेही हात हातात घेऊन बोलायची..

ती म्हणायची, “ लेकरांनो, असं करून कसं चालेल? अजून लै लांब जायचंय तुम्हाला.. बाळांनो, दोघं बी विस्तू झाला तर विझायचं कसं? कुणीतरी एकाने पटकन पाणी व्हावं आणि विस्तवावर सांडून जावं.. म्हणजे आग लागणार न्हाय.. अन् जर एकदा का आग लागली तर मग सगळं जळून राख हुईल.. ” तिच्या या वाक्याने आमच्या दोघांचं पाणी होऊन जायचं. आणि नकळतपणे आम्ही आजीचा हात धरलेला असायचा.

आजी पदर डोळ्याला लावून डोळ्यातून आलेलं पाणी पुसत बोलू लागायची. आजोबांच्या आठवणीत हरवून जायची. वादळातल्या, पावसातल्या आणि उन्हाने करपलेल्या पण त्यातून ही फुलवलेल्या तिच्या संसाराची गोष्ट सांगून झाली की, डोळे पुन्हा पदराने पुसत हळूच म्हणायची, “ आता या म्हातारीला घोटभर चहा मिळेल का बाबांनो?” त्यावर घरातले सगळे हसायचे.

आमचं भांडण मिटलेलं असायचं आणि आजी चहा पीत बसलेली असायची. आकाशातला एक जुना निखळलेला तारा त्याच्या अनुभवाचे असंख्य ऋतू माझ्या ओंजळीत ठेवतोय, असा भास मला नेहमी व्हायचा.. आणि आजही होतो..

आता माझी आजी नाहीय. ती गेली तिच्या प्रवासाला निघून कायमची. पण जाताना विस्तव आणि पाणी नावाचं समीकरण आमच्या अंत:करणाला देऊन गेली. अधूनमधून होतात आमची भांडणे, पण आग लागायच्या आधीच आम्ही पाणी होऊन विस्तु विझवलेला असतो. तिच्या जवळ बसून आम्ही त्यावेळी तिचं ऐकलं, म्हणून आज आम्हाला वाहत्या पाण्यासारखं जगता येतं..

तुम्हाला एक खरं सांगू.. ?

हे ओंजळीत अनुभवांचे ऋतू देणारे निखळलेले तारे आहेत. पण त्यांचं ऐकून घेणारी पिढी राहिलेली नाहीय. त्यामुळे आता आजी- आजोबा मुके झालेत.

परिणामी घटस्फोटासाठी आज वकिलांच्या ऑफिसमध्ये गर्दी मावत नाहीय. त्यांचं ऐकूनच घ्यायला आपण तयार नाहीयत. आज ते पिकलेलं पान, जुनं झालेलं झाड अशा यादीत त्यांना टाकून आपण मोकळे झालो आहोत.  

आणखी एक, घरातलं लहान बाळ रडायला लागलं की आधी त्याच्यासाठी हक्काची जागा आजीची मांडी असायची. आता बाळ रडत नाही कारण बाळाच्या मांडीवर आपण फोन देऊन मोकळे झालो आहोत आणि आजीची मांडी रिकामी झालीय. त्या म्हाताऱ्यानी नव्हे नव्हे त्या महान – ताऱ्यांनी आता हताश होऊन बोलणं बंद केलं आहे. परतीच्या प्रवासाचं तिकीट त्यांनी केव्हाच काढून ठेवलेलं आहे. घराच्या एका कोपऱ्यात मानेखाली उशी धरून चिमणीच्या पिलांसारखी चिव चिव करत वरच्या छताकडे एकटक नजर लावून ती पडलेली आहेत. ज्येष्ठ नागरिक संघात नाही मन रमले रे त्यांचे. त्यांना नातवंडे हवी असतात. पण नातवंडे मोबाईलवर नाहीतर करिअरच्या नादात बिझी झालीयत. आजीची आणि आजोबांची दुनिया आता मुकी झाली आहे. त्या पिढीला या पिढीशी खूप बोलायचं होतं; पण बोलताच आलं नाही. कारण ऐकायला कुणी नाही.

नेहमीप्रमाणे आजही या लेखाचा शेवट आशावादी असावा, असं मनाला वाटत आहे. परंतु, भूतकाळ गतप्राण आणि वर्तमान आंधळा झालेला असताना आदरणीय सुरेश भट यांच्या गझलेच्या ओळी माझा हुंदका वाढवत आहेत. त्या ओळी अशा…

“जरी या वर्तमानाला

कळे ना आमुची भाषा

विजा घेऊन येणाऱ्या

पिढ्यांशी बोलतो आम्ही”

मला नम्रपणे इतकंच सांगायचं आहे की, “भट साहेब, तुम्ही म्हणाला अगदी तसंच या पिढ्या विजा घेऊनच जन्माला आल्या. पण कान गमावून बसल्या. ठार…ठार…ठार.. बहिऱ्या झाल्या. फाईव्ह जीच्या आणि रिल्सच्या धूमधडाक्यात आजीच्या ओव्या मुक्या झाल्या.. मुक्या झालेल्या ओवीत आजोबांचे अभंग पुसले गेले. शेवटचा श्वास घेऊन आजी-आजोबा निघून जातील. पिकलेली पाने गळून पडतील आणि या पिढीला व्हॉटसअपच्या स्टेटससाठी एक जिव्हाळ्याचा विषय मिळेल. आणि विस्तवावर पाणी होऊन कुणाला सांडता येणार नाही. परिणामी सगळी राख झालेली असेल.

बस.. इतकाच हुंदका होता अडकून राहिलेला तो फक्त बाहेर काढला..

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ स्वत्व… – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? काव्यानंद ?

☆ स्वत्व… – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

राधिका भांडारकर हे नाव माझ्या मते आपणा सर्वांनाच माहित आहे, कारण त्या स्वतः या अभिव्यक्ती ई दैनिकांसोबत जोडलेल्या आहेत आणि सातत्याने त्यांचे गद्य /पद्य लेखन चालू असते.

रसग्रहणासाठी ही कविता मला खास निवडावीशी वाटली याचे कारण म्हणजे, मनस्पर्शी साहित्य परिवार या समूहातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या एका काव्य स्पर्धेत राधिका ताईंच्या या कवितेला उत्कृष्ट कविता असे मानांकन मिळाले आहे. अभिव्यक्तीनेसुद्धा ही खबर वाचकांपर्यंत पोहोचवली होतीच.

 सर्वप्रथम आपण ही कविता पाहूया.

सौ राधिका भांडारकर

☆  स्वत्व ☆

*

नकोच वाटते मला दया माया

आहेत वाटा कितीतरी अजून

चालेन त्यावर जरी एकटी मी

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

सारे मुखवटे भासतात मजला

का घ्यावे दान मी त्यांच्याकडून?

कशाला व्हावे मिंधे कुणाचे

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

नको लाचारी वा हाजी हाजी

प्रतिमाच माझी ठेवेन टिकवून

मन्यात आहे सळसळता प्रवाह

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

खोट्यापुढे का तुकवायची मान

मुलाम्याला का जायचे मोहून 

स्वत्वचा राखेन प्रश्नाला भिडून

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

आक्रमण माझ्या जर अस्तित्वावरी 

केले कुणी तर त्यांना डावलून

सिद्ध करेन मी माझ्या स्त्रीत्वाला

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

ही संपूर्ण कविता वाचल्यावर पटकन आपल्यासमोर उभी राहते ती या कवितेतील मी म्हणजे एक अत्यंत कर्तुत्ववान, करारी, स्वाभिमानी, असत्याची चीड असणारी आणि प्रचंड आत्मविश्वासाने समाजात वावरणारी कणखर निडर अशी स्त्री ! या स्त्रीमध्ये मला माझी आजीच दिसली आणि त्यामुळेच ही कविता मला अत्यंत जवळची वाटली.

नकोच वाटते मला दया माया

आहेत वाटा कितीतरी अजून 

चालेन त्यावरी जरी एकटी मी

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

या पहिल्याच कडव्यात कवितेतील नायिका म्हणते की तिला उगीचच कोणाची दया माया नको आहे. कितीही अडचणींनी तिला व्यापले असले, तिचे रोजचे रस्ते बंद झाले असले तरी आणखी कितीतरी वाटा तिच्यापुढे मोकळ्या आहेत. ती एकटीने त्या वाटांवरून चालण्यास समर्थ आहे. सहानुभूतीची तिला गरज नाही कारण तिचा स्वाभिमान अजूनही जाज्वल्य आहे.

सारे मुखवटे भासतात मजला

का घ्यावे मी दान त्यांच्याकडून

कशाला व्हावे मिंधे कुणाचे

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

तिला आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसे भेटली. अनेकांनी तिला मदतीचे हात देण्याचा प्रयत्न केला, परंतु खरे आणि खोटे चेहरे कसे ओळखावे हा मोठा प्रश्न तिच्यापुढे आहे. ती अत्यंत सतर्क आणि सजग अशी स्त्री आहे. त्यामुळे मुखवट्या मागचा चेहरा तिला दिसत असावा बहुदा. मायावी कांचन- मृगापाठी पळणारी ती स्त्री नाही, आणि म्हणूनच तिच्या आयुष्यात येणारे अनेक जण तिला वरवरचे मुखवटेच वाटतात. तिला असंही वाटतं की स्वतः सक्षम असताना उगीच कुणाचे उपकार घेऊन मिंधे का व्हावे? ती पुढे म्हणते,

नको लाचारी वा हाजी हाजी

प्रतिमाच माझी ठेवेन टिकवून

धमन्यात आहे सळसळता प्रवाह

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

कितीही अडचणी आल्या, संकटांना सामोरे जावे लागले, तरी तिला तिच्या कर्तुत्वाने समाजात मिळविलेली तिची प्रतिमा कायम ठेवायची आहे. यासाठीच तिला कोणाची लाचारी नको, कोणाची हाजी हाजी नको.

खोट्यापुढे का तुकवायची मान

मुलाम्याला का जायचे मोहून

स्वतःच राखेन प्रश्नाला भिडून

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

हे जग, ही माणसं म्हणजे वरवरचा मुलामा आहे. या मुलाम्याला मोहून मी खोट्याची साथ देणार नाही, त्यापुढे माझी मान तुकवणार नाही. स्वत्वाला सांभाळून मी खोटं पितळ उघडं पाडीन. केवढा हा आत्मविश्वास आणि कणखरपणा!

आक्रमण माझ्या जर अस्तित्वावरी

केले कुणी तर त्यांना डावलून

सिद्ध करेन मी माझ्या स्त्रीत्वाला

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

या शेवटच्या कडव्यात ती समाजातील पुरुषांना आव्हान देते की मी स्त्री आहे म्हणून मला कोणी कमी समजू नका. माझ्या अस्तित्वावर जर तुम्ही हल्ला केलात तर याद राखा. मी माझं स्त्रीत्व सिद्ध करेन.

या ठिकाणी मला सीतेच्या अग्नी दिव्याची प्रकर्षाने आठवण आली. आजची स्त्री ही खरंतर कोणत्याही क्षेत्रात तसूभरही मागे नाही. मात्र असे असून सुद्धा कितीतरी निर्भया आपण पाहतोच.

राधिका ताईंची ही कविता अशा विकृतींना शह देणारी आहे. ही कविता वाचताना आपल्याही नसानसातून रक्त खवळते. या मनोविकृतींचा अगदी संताप संताप होतो, हेच या कवितेचे यश आहे.

वीर रसाची एक सकारात्मक दृष्टिकोन असलेली ही कविता आहे.

यात तसे कोणतेही काव्यमय शब्द नाहीत, परंतु साध्या शब्दातूनही अंगार फुलणारे असे हे काव्य आहे.

दिंडी वृत्तातील ही कविता. प्रत्येक चरणात ९+१० अशा मात्रांचे बंधन असूनही चरणातील कोणताही शब्द मात्रा जुळविण्यासाठी वापरला आहे असे मुळीच वाटत नाही

‘धमन्यात आहे सळसळता प्रवाह ‘ – – मात्राबद्ध असूनही किती चपखल बसले आहेत पहा हे शब्द! वृत्तबद्ध काव्य करताना हीच तर कवीची खरी कसोटी आहे. राधिकाताई या कसोटीला पूर्ण उतरल्या आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

त्यांनी अशाच विविध विषयांवर प्रकाश टाकणाऱ्या, आणि समाज प्रबोधन करणाऱ्या कविता लिहाव्या आणि वाचकांचे मनोरंजनही करावे. त्यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी मी त्यांना सुयश चिंतीते.

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares