मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मोक्षपट’ — माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

‘मोक्षपट‘ —  माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

संत ज्ञानेश्वरांचे विचार आणि तत्त्वज्ञान जसे कालातीत आहेत, तसे त्यांनी लावलेला एक शोधही अजरामर आहे, तो म्हणजे सापशिडीचा खेळ ! या खेळाची निर्मिती संत ज्ञानेश्वरमाऊली यांनी केली आहे, असे सांगितल्यास विश्वास बसणार नाही; पण हे सत्य आहे. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या या खेळाविषयी जाणून घेऊया.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सापशिडीचे गुपित ‘डेन्मार्क’चे जेकॉब आणि पुणे येथील ज्येष्ठ संशोधक वा. ल. मंजुळ यांनी उलगडले..

संत ज्ञानेश्वर महाराजांनीच सापशिडीचा शोध लावला, याचे स्पष्ट पुरावे मिळत नव्हते; पण ‘डेन्मार्क’ देशातील जेकॉब यांच्या साहाय्याने काही वर्षांपूर्वी हे गुपित उलगडले गेले. ‘इंडियन कल्चरल ट्रॅडिशन’ या संकल्पनेच्या अंतर्गत डेन्मार्क येथील ‘डॅनिश रॉयल सेंटर’चे संचालक डॉ. एरिक सँड यांचे विद्यार्थी असलेल्या जेकॉब यांनी ‘मध्ययुगीन काळात भारतात खेळले जाणारे खेळ’, हा विषय संशोधनासाठी निवडला. या संशोधनाच्या वेळी त्यांच्या असे लक्षात आले की, १३ व्या शतकातील संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सापशिडीचा शोध लावलेला असू शकतो.

जेकॉब यांनी अनेक जुने सापशिडीचे पट त्यांनी मिळवले; परंतु योग्य संदर्भ मिळत नव्हते. संत ज्ञानेश्वरांच्या चरित्रातही याविषयी कुठे उल्लेख नव्हता. अखेर संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक वा. ल. मंजुळ यांच्याकडे त्यांनी विचारणा केली. मंजुळ यांनी पुणे येथील डेक्कन महाविद्यालयामध्ये तशा प्रकारचा संदर्भ असल्याचे सांगितले आणि ‘मोक्षपट’ उलगडा गेला.

मनुष्याने आयुष्य कसे जगावे, याचे तत्त्वज्ञान सांगणारा सापशिडी खेळ!

‘मोक्षपट’ हा पहिला सापशिडीपट होता, असे सांगितले जाते. संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ भिक्षा मागण्यासाठी गावात जात असत. घरात एकट्या असलेल्या संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांचे मन रमावे; म्हणून संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ यांनी या खेळाचा शोध लावला, असे सांगितले जाते. लहान मुलांना खेळाच्या माध्यमातून चांगले संस्कार मिळावेत, असा, यामागील उद्देश होता.

मोक्षपटाचे दोन्ही पट २० X २० इंच आकाराचे असून त्यात ५० चौकोनी घरे आहेत. पहिले घर जन्माचे, तर शेवटचे घर मोक्षाचे आहे. माणसाच्या जन्मापासून त्याला मोक्ष मिळेपर्यंतचा प्रवास या पटामधून मांडण्यात आला आहे. ‘मोक्षपट’ खेळण्यासाठी सापशिडीप्रमाणेच ६ कवड्यांचा वापर करावा लागतो. ६ कवड्या पूर्ण पालथ्या पडल्या, तर दान मिळते. सापशिडीच्या खेळाप्रमाणेच यातही साप आहेत. त्यांना काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षडरिपूंची नावे देण्यात आली आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगती करण्यासाठी शिडी आहे. तिला सत्संग, दया, सद्बुद्धी अशी नावे देण्यात आली आहेत. माणसाने आयुष्य कशा प्रकारे जगावे, याचे तत्त्वज्ञान या खेळातून सांगण्यात आले आहे.

जेकॉब यांना डेक्कन महाविद्यालयामध्ये रा. चिं. ढेरे यांच्या हस्तलिखित संग्रहातून दोन ‘मोक्षपट’ मिळाले.

मोक्षपटाच्या हस्तलिखितावर लिहिलेल्या ओव्यांमध्ये आयुष्य कसे जगावे ? कोणती कवडी पडली की, काय करावे ? याचे मार्गदर्शन अगदी सहजपणे सांगण्यात आले आहे. सापशिडी जरी अधुनिक असली, तरी गर्भितार्थ तोच राहील, यात काही शंका नाही.

इंग्रजांनी सापशिडी हा खेळ नेऊन त्याचे ‘स्नेक अँड लॅडर’ असे नामकरण करणे ‘व्हिज्युअल फॅक्टफाईंडर-हिस्ट्री टाइमलाईन’ या पुस्तकात वर्ष ११९९ ते १२०९ या कालखंडातील जगातील महत्त्वाच्या घडामोडींविषयी माहिती दिली आहे. ‘उल्लेखनीय गोष्ट’ या शीर्षकाखाली ‘१३ व्या शतकातील भारतीय कवी संत ज्ञानदेव यांनी कवड्या आणि फासे यांचा उपयोग करून एक खेळ सिद्ध केला. यात खेळाडू शिडीचा उपयोग करून वर चढणार आणि सापाच्या तोंडी आल्यावर खाली उतरणार. शिडीच्या साहाय्याने वर चढणे हे चांगले समजले जाई, तर सर्पदंश ही अनिष्ट गोष्ट समजली जात असे. हा खेळ ‘सापशिडी’ या नावाने अद्यापही लोकप्रिय आहे’, असा उल्लेख सापडतो.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई ही सर्व भावंडे हा खेळ खेळत असत. पुढे भारतभर या खेळाचा प्रसार झाला. इंग्रज भारतात आल्यावर त्यांना हा खेळ प्रचंड आवडला. बुद्धीबळ, ल्युडोप्रमाणे ते हा खेळही इंग्लंडमध्ये घेऊन गेले, असे म्हटले जाते. व्हिक्टोरिया राणीच्या म्हणण्याप्रमाणे त्यात काही पालट करण्यात आले आणि त्याचे ‘स्नेक अँड लॅडर’ असे नव्याने नामकरण करण्यात आले. सध्या आपण त्यांच्या पद्धतीने सापशिडी खेळत असलो, तरी त्याची मूळ संकल्पना भारतीय आहे आणि संत ज्ञानेश्वरमाऊली हेच या खेळाचे जनक आहेत. ’

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझा श्रावण.. ! ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?  विविधा ?

माझा श्रावण.. ! ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

आषाढातल्या ‘नभ मेघांनी आक्रमिले ‘ झालं की, श्रावणातलं देखणं रूप घेऊन पाऊस येतो त्याच्या म्हणजे श्रावणांच्या स्वागताची दिव्याच्या अमावस्येला दीप पूजनाने सुरुवात होते अन आषाढाची सांगताही सगळ्यां घराला प्रकाशमान करून मनंही प्रकाशमान झालेलं असतं या प्रकाशातच वाळ्यांचा रुणुझुणु नाद करीत श्रावण नाचत, लाजत, बागडत, असा प्रथम आपल्या मनात घरात रिमझिमत येतो श्रावणंधारांनी!… मनं प्रसन्न होऊन जात. जाई जुईचे झेले सुवासाने दरवळतात आणि तसा तो एकटा येत नाही तर, प्रत्येक दिवसाचे धार्मिक अधिष्ठान असलेल्या सणावारांची संगत -पंगत घेऊन या ढगाळ ओल्या दिवसांना उत्साहाची रंगत देत असतो. मग सुरू होतो ऊन -पावसाचा खेळ लप्पा छप्पीच ती जणू ! 

 — हळदुल्या उन्हाच्या या 

पावसात येरझारा |..

 ऊन पावसाचा खेळ 

असा श्रावण साजरा |..

या खेळातच आजही मंगळागौरीचे रंगलेले खेळ, दारातल्या निंबोणीला टांगलेल्या दोरखंडाच्या झोक्यांवर मैत्रिणींबरोबर घेतलेले झोके – मनाचा झुला उंच उंच नेतात. नागपंचमीला माईच्या म्हणजे आईच्या हातची, गरम-गरम पुरणाची दिंडी, वर घरी कढवलेल्या तुपाची धार, जेवताना आम्ही भावंडांनी लावलेली जास्तीत जास्त दिंडी खाण्याची लावलेली पैज, मेहंदीने रंगलेले हात, मोरपंखी रंगाच्या सोनेरी वरखाच्या बांगड्यांची किणकिण, नवकोर जरीच परकर पोलक, अन् नंतर साडी, हाताने बनवलेले गोविंद विडे, रात्री जागून माई बरोबर केलेल्या केवड्याच्या वेण्यां केसात माळल्यावर घरभर पसरलेला केवड्याचा सुगंधी दरवळ, नागपंचमीचे गाणे म्हणत धरलेला फेर, फुगडी, झिम्मा असे मनसोक्त खेळलेले खेळ ! 

माझ्या माहेरी वालचंदनगरला फार मोठी बाग म्हणजे फुलझाडे दारात लावलेली नव्हती. रंगीबेरंगी तेरडा, आघाडा, दुर्वा, गणेश वेल, जाई ही मात्र श्रावणांत असायची. निळ्या, पांढऱ्या गोकर्णाचे वेल, प्राजक्त अंगणात होता. श्रावणी सोमवारी श्री महादेवाला लक्ष-फुले वाहण्यासाठी मग लवकर उठून फुलं वेचायची आणि सगळ्या भावंडांनी आपापल्या भांड्यातला फुलांचा वाटा मोजून माईला द्यायचा. मग बाकीच्या फुलांचे हार, गजरे करायचे. थोडी फुले शेजारी द्यायची आणि त्यांच्याकडून कर्दळीची, सोनचाफ्याची फुलं आणायची. श्रावणांत उपवासाची पण एक मालिकाच असते. सोमवारचा शंकराचा, शुक्रवारचा जिवतीचा उपवास आम्ही माईबरोबर सगळेच करायचो. दादांबरोबर शनिवार आणि गुरुवार. ! हे उपास तसे आमचे जेवण करून फक्त खिचडी, भगर, शेंगादाण्याची आमटी आवडते म्हणून खाण्यासाठीच बरेच वेळा असायचे. वालचंदनगरला गोकुळाष्टमीला देवळात श्रीकृष्ण जन्म साजरा व्हायचा. भजन, कीर्तन, प्रसाद असायचा. तसं तर श्रावणात रोज कुठल्या ना कुठल्या गल्लीमध्ये भजन कीर्तन असायचं. पहायला ऐकायला आम्हाला आवडायचं. देवळाच्या प्रांगणात दहीहंडी व्हायची.

सकाळी सकाळी पत्री गोळा करून आणताना मैत्रिणींचा ग्रुप असायचा. शाळेत जाण्यापूर्वी हे एक महत्त्वाचं काम असायचं. नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, असे एकामागून एक येणारे सण खाण्याची अन् श्रावणांची रंगत वाढवायचे.

– डोंगरावर वसलेलं शिखर शिंगणापूर हे माझं माहेरचं मूळगाव. तेथील महादेवाचं मंदिर प्रसिद्ध आहे. माझी आत्या शिंगणापूरला असायची. एकदा नागपंचमीला मी तिथे होते. डोंगर माळावर असंख्य वारुळे आहेत. तिथे पूजेला घरातील स्त्रिया व मैत्रिणींबरोबर मी गेले होते. नागचौकिला म्हणजे नागोबाच्या उपवासाच्या दिवशी तिथे गिरीला जाण्याची पद्धत आहे. म्हणजे-महादेवाच्या डोंगराला सबंध प्रदक्षिणा घालून कडे कपारीत असलेल्या शिवपार्वतीच्या पिंडींच- शाळुंकांचं दर्शन घेतलं होतं.. तिथून निघालेल्या झऱ्यासारख्या झुळूझुळू वाहणाऱ्या भागीरथीचं दर्शन घेतलं होतं. तिथेच बसून फराळ केला होता. उपवासाच्या फराळाची ती अंगतपंगत मस्त जमली होती.

या गिरी भ्रमणाचा रस्ता म्हणजे एक खडतर मार्ग आहे. तरी बरोबरीच्या मैत्रिणी, काही बायका, मुले यांच्यामुळे, शंकर पार्वती, राम सीता यांची गाणी म्हणत पायाखालची डोंगरवाट ऊनं उताराला लागल्यावर संपली. पाय दुखतात हे जाणवलेच नाही. श्रावणांतला तो एक खूप सुंदर दिवस किंवा योग पुन्हा आला नाही याचे मात्र वाईट वाटते. अन् – – आता तर तो दिवस स्वप्नवत वाटतो. नातवंडांना सांगायला ही छानशी गोष्ट आहे एवढंच !

असा – – आठवांच्या शिंपल्यात..

 झुले माहेरचा झुला..

 त्या आनंद क्षणांचा..

 असे श्रावणं आगळा||

श्रावण म्हटलं की श्री सत्यनारायण पूजा, फुले, पत्री, दूर्वा, बेल अन् सुगंधी केवड्याशी नकळत छानसे बंध जुळून गेलेले आहेत. आज कुंडीतली थोडीशी फुले असली तरी फुलपुडा पत्री घेताना आठवते, लग्नानंतर दौंडला आमच्या रेल्वे कॉर्टरच्या प्रशस्त अंगणात आम्ही दोघांनी दारासमोर फुलवलेली बाग ! 

जाई, जुई, कृष्ण कमळाचे वेल विविध रंगी तेरडा आणि विविध रंगांची गंधांची फुलंझाडे ही सगळी हिरवाई श्रावणांत अगदी फुलून यायची. मग मंगळागौर, सत्यनारायण पूजेला दोन ओंजळी भरून फुलं, पत्री कर्दळीचे खुंट, शेजारीपाजारी देताना एक आगळाच आनंद असायचा. दारी फुललेल्या फुलांचे भरगच्च गजरे, लांब सडक केसांच्या दोन वेण्यांवर माळून, फुलराणीच्या दिमाखात मिरवणारे आमची सोनुली लेक.. !

असा माझ्या मनातला श्रावण पिंगा घालू लागला की, आठवांच्या सरीवर सरी डोळ्यांतल्या श्रावणसरीं बरोबर गालांवर रिमझिमतात.

 -गावाकडचा रानातला श्रावण तर खूप विलोभनीय. सोनेरी किरणांनी चमचमणारी हिरवाई, पावसाच्या सरींची नादबद्ध रिमझिम, निसर्गाने आभाळभर कोरलेलं इंद्रधनुष्य, आनंदाने कलकलाट करत येणारी सूर्याची किरणे, पाऊस अंगावर घेत स्वैरपणे उडणारी पाखरं …. ही सगळी अपूर्वाई रम्य काव्यमयच. ! दिवसभर रानात कष्ट करून दमलेल्या बायका रात्रीच्या वेळी नागोबाची, राम सीतेची गाणी म्हणून खूप छान फेर धरतात, उखाणे घेतात. ते पाहताना ऐकताना व अनुभवतांना मला आमच्या गावचा निसर्गाच्या सान्निध्यातला श्रावणही मनाला खूप आनंद देऊन जायचा.

आपलं वयं वाढत जातं तसं पावसात भिजणं आपण कमी करतो. तरी श्रावणातल्या रेशीमधारात, एक तरी गिरकी घ्यावी… वयाबरोबर आपल्या वाढलेल्या मनाला पुन्हा टवटवीत करण्यासाठी… जगण्यातला आनंद पुन्हा पुन्हा घेण्यासाठी…

अशा माझ्या श्रावणांत…

 चाफा सुगंध उधळे..

 मोर फुलवी पिसारा 

 ओल्या श्रावणाचा झुले 

 माझ्या मनी फुलोरा.. ! 

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – १० ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – १० ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

डोळे

काही गोष्टी सहजच घडतात पण बालपण सरलं तरी ती आठवण आणि त्यातली गंमत मात्र जात नाही. कधी विषय निघाला आणि पुन्हा ती आठवण सहजपणे मनाच्या कोपऱ्यातून वाट काढत वर आली की नकळत हसू फुटतेच.

आमच्या पप्पांच्या व्यक्तिमत्वातली ठळक आणि आकर्षक बाब म्हणजे त्यांचे तेजस्वी, मोठे, पाणीदार डोळे. आम्हा पाचही बहिणींचे काहीसे मोठे डोळे म्हणजे पप्पांकडून आलेला वारसाच असे म्हणायला हरकत नाही.

तर त्या डोळ्यांचीच गोष्ट आज मला लिहिता लिहिता आठवली. गल्ली मधला आमचा सवंगड्यांचा चमू तसा फारच विस्तारित होता आणि कळत नकळत वयाच्या थोड्याफार फरकांमुळे असेल पण वेगवेगळे समूह सहजपणे बनले गेले होते. लहान गट, मध्यम गट, मोठा गट अशा प्रकारचे. गटागटातले खेळही वेगळे असायचे. एक मात्र होतं की हे ‘मुलींचे खेळ” हे “मुलांचे खेळ’ असा फरक नाही केला जायचा. विटी दांडू, गोट्या, पतंग उडवणे, हुतुतु (कबड्डी), क्रिकेट या खेळातही मुलींचा तितकाच दांडगा सहभाग असायचा. लहान गटातल्या मुलांचा मोठ्या गटातल्या मुलांशी खेळण्याचा खूपच हट्ट असायचा आणि ती पण कुणाकुणाची भावंडे असायची, त्यामुळे त्यांना खेळायला घ्यावंच लागायचं पण तत्पूर्वी त्यांना एक लेबल मिळायचं कच्चा लिंबू आणि या कच्च्या लिंबाला मात्र बऱ्याच सवलती असायच्या.

खेळातल्या नियमांची माफी असायची पण माझी धाकटी बहीण छुंदा हिला मात्र ‘कच्चा लिंबू” म्हटलेलं अजिबात आवडायचं नाही. तिला तो ‘रडीचा डाव” वाटायचा. ‘रडीचा डाव खडी’ वगैरे तिला कोणी बोललं की तिला फारच राग यायचा. शिवाय तिचे स्वतःचेच तिने ठरवलेले नाही रे ही बरेच असायचे. ती नेहमीच काहीशी शिष्ट, भिडस्त आणि ‘मला नाही आवडत हे’ या पठडीतली होती पण गल्लीतल्या मोरया आणि शेखरशी तिचे मस्त जुळायचे. हे तिघेही तसे बरोबरीचेच होते आणि म्हणून असेल पण छुंदा, मोरया आणि शेखर यांची मात्र घट्ट मैत्री होती आणि या मैत्रीतली आणखी एक गंमत म्हणजे छुंदाला लहानपणापासून मुलांसारखे शर्ट— पॅन्ट घालायला आवडायचे आणि माझी आई, कधी आजीही तिच्यासाठी अगदी हौसेने तिच्या मापाचे शर्ट— पॅन्ट घरीच शिवत. त्यावेळी रेडीमेड कपड्यांची दुकाने फारशी नव्हती. कपडे शिवून देणारे शिंपी असायचे पण आमचे गणवेशापासून, रोजचे, घरातले, बाहेरचे सगळेच कपडे आई अतिशय सुंदर शिवायची.

तर विषय असा होता की शेखर, मोरया आणि ही मुलांच्या वेषातली बॉयकट असलेली मुलगी छुंदा. मस्त त्रिकूट. ते नेहमी तिघंच खेळायचे. खेळ नसला तर आमच्या घराच्या लाकडी जिन्यावर बसून गप्पा मारायचे. मोरया जरासा गोंडस आणि दांडगट होता. शेखर तसा मवाळ होता पण नैसर्गिकपणे असेल कदाचित ती दोघं छुंदाचं मात्र ऐकायचे. तिला त्यांनी कधी दुखवलं नाही. भांडणं झाली तरी परत दोघेही तिला हाक मारून खेळायला घेऊन जायचे.

आज हे लिहीत असतानाही मला ती एकाच उंचीची, एकाच वयाची, निरागस तीन मुलं जशीच्या तशी दिसत आहेत. खरं सांगू गद्र्यांचा नवसाचा मोरया, मोहिलेंचा शेखर… गद्रे, मोहिले आमचे टेनंट्स, त्यांच्याशी असलेली स्वाभाविक बनती बिघडती नाती पण या साऱ्यांचा छुंदा— मोरया— शेखर यांच्या मैत्रीवर काहीच परिणाम कधीच झाला नाही. बाल्य किती निष्पाप असते ! छुंदा त्यांच्या घरातही सगळ्यांची फार आवडती होती.

सर्वसाधारणपणे आम्ही सारीच मुलं गल्लीतच खेळायचो. गल्लीच्या बाहेर खेळायला जायची फारशी वेळ यायचीच नाही आणि जायचंच असलं तर घरून परवानगी घेतल्याशिवाय तर नाहीच. शिवाय संध्याकाळचं दिवेलागणीच्या वेळेचं शुभंकरोति, परवचा, गृहपाठ हे कधी चुकायचं नाही पण त्या दिवशी खेळता खेळता.. मला वाटतं मुल्हेरकरांच्या दिलीपच्या लक्षात आलं की हे त्रिकूट कुठे दिसत नाही.

गेलं कुठे ?

घराघरात, पायऱ्या पायऱ्यांवर, जिन्यात, सगळीकडे शोधाशोध झाली. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. एव्हाना खात्री पटली “हे तिघे हरवले. ”

यांना स्वतःची नावं, घराचा पत्ता तरी सांगता येईल का ?

कुठे गेले असतील ?

तसं त्यावेळेस ठाणे एक लहानसं गावच होतं आणि हे गावही अनेक गल्ल्यागल्ल्यातूनच वसलेलं होतं. कुणीतरी म्हणालं, “ठाण्यात मुलं पळवण्याची टोळी आलेली आहे. ”

बापरे !

आई, पप्पा, जीजी आणि आम्ही सारेच पार हादरून गेलो.

संध्याकाळ होत आली. घरोघरी दिवे लागले. तोंडचं पाणी पळालं तरी या तिघांचा पत्ता नाही. शोध मोहीमही असफल ठरली. आता शेवटचा मार्ग— पोलीस चौकी. मागच्या गल्लीतली, त्या पलीकडची, इकडची, तिकडची बरीच माणसं गोळा झाली.

मुलं हरवली.

कुणी म्हणालं, ”पण अशी कशी हरवली ?”

दिलीप तापट. आधीच बेचैन झालेला. तो ताडकन म्हणाला, “कशी हरवली माहीत असतं तर सापडली नसती का ? काय विचारता काका तुम्ही…?”

आणि हा सगळा गोंधळ चालू असताना एकाएकी त्या लहानशा गल्लीत पांढरी, मोठी, अँम्बॅसॅडर गाडी हाॅर्न वाजवत शिरली. घोळक्यापाशी थांबली आणि गाडीतून ठाण्यातील मान्यवर आणि प्रसिद्ध समाजसेविका मा. विमल रांगणेकर आणि त्यांच्या समवेत ही तीन मुलं उतरली. विस्कटलेली, भेदरलेली, रडून रडून डोळे सुजलेली, प्रचंड भ्यायलेली… छुंदाने तर धावत जाऊन जीजीला मिठी मारली. आता त्या मुलांच्या मनात भीती होती.. घरच्यांचा मार बसणार की काय याची.

विमलताई म्हणजे प्रसन्न व्यक्तीमत्व. उंच, गोऱ्या, मोहक शांत चर्या. सुप्रसिद्ध क्रिकेटर खंडू रांगणेकर यांच्या त्या पत्नी. यांना कुठे सापडली ही मुलं आणि या स्वतः मुलांना घेऊन आल्या? घंटाळी रोडवरच्या कोपऱ्यावर खंडू रांगणेकरांचा प्रशस्त बंगला होता. आजही आहे. ही तिघं मुलं गप्पांच्या नादात चालता चालता रस्ता चुकले असावेत. रांगणेकरांच्या बंगल्यासमोर कोपऱ्यात बावरलेल्या, रडवेल्या स्थितीतल्या या मुलांना विमलताईंनी पाहिले आणि त्यांनी चौकशी केली.

त्या सांगत होत्या, ”या मुलांना काहीही धड सांगता येत नव्हतं. नावं सांगितली. तीही पूर्ण नाही. कुठे राहतात, घराचा पत्ता त्यांना काहीही सांगता येत नव्हतं. खूप घाबरलेली होती म्हणूनही असेल. मी निरखत होते या मुलांना आणि त्यापैकी एकाच्या डोळ्यात मला ओळखीची चमक दिसली. मनात म्हटलं हे तर ढग्यांचे डोळे पण ढग्यांना तर मुलगा नाही. तरी मी याला विचारलं, ‘तू ढगे का ?’

हा म्हणाला, ”हो”

“तूच ढग्यांचा मुलगा आहेस का ? पण… ”तेव्हा तडफदार उत्तर आलं,

“नाही. मी मुलगी आहे. ”

मग सारा उलगडा झाला.

खंडू रांगणेकर आणि पप्पा दोस्तच होते. त्यांना आमचं घर माहीतच होतं.

हरवलेली मुलं सापडली.

तर असा हा गमतीदार किस्सा.

आजही, वेळप्रसंगी गल्लीतली ती माणसं कशी आपुलकीनं जोडलेली होती याची जाणीव झाली की मन भरून येतं. आता जग बदललं.

पण खरी ही गोष्ट डोळ्यांची.

गोष्ट मोठ्या डोळ्यांची. आयुष्यभर पपांनी आम्हाला स्वतःचे संरक्षण स्वतःच कसे समर्थपणे करावे याचे भरपूर धडे दिले पण या पप्पांसारख्याच असलेल्या डोळ्यांमुळे माझ्या धाकट्या, लाडक्या बहिणीचे असे रक्षण झाले, याला काय म्हणावे ?

आज हे आठवत असताना सहज ओठातून ओळी येतात..

या डोळ्यांची दोन पाखरे

फिरतील तुमच्या भवती

पाठलागही सदैव करतील

असा कुठेही जगती…

वंश, कुल, जात, गोत्र, नाव याची परंपरा भले तुटली असेल पण आम्हा बहिणींच्या परिवारात या डोळ्यांची परंपरा अखंड वाहत आहे आणि या डोळ्यातच ढग्यांची प्रतिमा आजही टिकून आहे. आता थांबते. भावूक होत आहे माझी लेखणी..

 – क्रमशः भाग दहावा

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सात खड्यांच्या गौरी ”… लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “सात खड्यांच्या गौरी ”… लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

(कोकणस्थ ब्राह्मणांच्या गौरी ७ खड्यांच्या का?)

गणपती बाप्पा आले, म्हणजे त्यांची आई गौरीही येणार. या प्रथम पूजनीय गणपतीनंतर त्याच्या आईचा म्हणजे गौरींचा मान ! हा गौरींचा उत्सव तसेच पूजा, विविध नैवेद्य या सर्व गोष्टी या वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातात. हा सृजनाचा उत्सव असल्याने तो साहजिकच स्त्रियांच्या अधिकारात येतो. विविध ठिकाणी ज्येष्ठा कनिष्ठा गौरी या मुखवटे, उभ्या मूर्ती, भिंतीवरील चित्र, तेरड्याच्या रोपट्याला देवीचे चित्र लावून, कलश इत्यादी स्वरूपात पुजल्या जातात.

कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये मात्र देवीचे प्रतीकात्मक रूप म्हणून ७ खडे आणून पुजले जातात. या संबंधात केले जाणारे विविध विनोदही ऐकायला मिळतात. पण याची थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊ या. कोकणामध्ये पावसाचे प्रमाण खूप असते. सगळीकडचे जलसाठे तुडुंब भरलेले असतात. हे जलसाठे पावसाळ्यानंतरच्या काळात सर्वाधिक धोकादायक असतात. फोफावलेल्या वनस्पती, वेली, निसरडी जमीन, सर्वत्र चिखल यामुळे अपघात आणि मृत्यूची भीती असते. अपरिचित जलसाठ्यांच्या ठिकाणी, तिन्ही सांजेला उजेड कमी होताना, खूप झाडीच्या ठिकाणी कांहींचा अनपेक्षित अपमृत्यु ओढवतो. अत्यंत पुढारलेल्या अशा आजच्या काळातही पावसाळ्यात नदीत, ओढ्यात, धबधब्यात, समुद्रात बुडून मरण्याचे प्रमाण वाढते. मग यातून भीतीची, दंतकथांची परंपरा सुरु होते. कांही कथा तर खूपच भीतीदायक आहेत. अशा ठिकाणी पूर्वी अपघातात मरण पावलेल्या कांही स्त्रियांची पिशाच्चे येथे वास करतात असे मानले गेल्याने आणखीनच भीतीदायक पार्श्वभूमी लाभते. त्यांच्या कहाण्या, कथा अनेक पिढ्यांपर्यंत सांगितल्या जात राहतात. त्यामुळे विविध प्रकारचे विधी, तोडगे हे भक्तिभावाऐवजी भीतीमुळे केले जातात.

मोक्षदायी अशी सप्त तीर्थे, सप्त मातृका, सात पवित्र नद्या तशी आपल्याकडे सप्त देवतांची कल्पना मांडलेली आणि मानलेली आहे. विहिरी, तळी, सरोवर, पाणवठे अशा ठिकाणी सात देवतांचे वास्तव्य मानलेले आहे. त्यांना सात जल योगिनी, जलदेवता, अप्सरा म्हणतात. त्याचे साती आसरा, सती आसरा असे अपभ्रंशही झाले. कांहीं समाजात त्यांना गुरुकन्या मानले जाते. मत्सी, कूर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमपा, मकरी अशी त्यांची नावे आहेत. ही सर्व नावे जलचरांची आहेत. त्यांना त्रास दिल्यामुळे, नीट सेवा न केल्यामुळे त्यांचा कोप होतो. म्हणून त्या माणसांना ओढून पाण्यामध्ये नेतात अशी लोकांची श्रद्धा आहे. तसा कोप होऊ नये म्हणून प्रतीकात्मक ७ खडे आणून त्यांची पूजा केली जाते. हे खडे जल साठ्याजवळून, वाहत्या पाण्यातून, पवित्र वृक्षतळ अशा ठिकाणांहून आणले जातात. त्यांना समृद्धी देणाऱ्या, रक्षणकर्त्या सप्त देवता मानून त्यांची भक्तिभावाने सेवा केली जाते. गौरींच्या परंपरागत कहाणीमध्ये, दारिद्र्यामुळे तळ्यात जीव द्यायला निघालेल्या गरीब ब्राह्मणाला, वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेल्या गौरी देवीने वाचविले व त्याला समृद्धी दिली, असे वर्णन आहे.

कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये या सप्त देवतांचे, ७ खड्यांच्या रूपात पूजन करण्याचे व्रत पाळले जाते. कोकणातील अन्य ब्राह्मण पोट जाती तसेच अन्य जातींमध्ये सुद्धा खड्यांच्या गौरी आणण्याची पद्धत आहे. कोकणात अनेक सुप्रसिद्ध मंदिरातील देवता या सप्त शिळांच्या रूपात आढळतात. त्यामुळे सप्त शिळांचे महत्व केवळ ब्राह्मणच नाही तर अन्य अनेक समाजांमध्ये आहे. त्यांच्या त्या कुलदेवताही आहेत.

“ज्येष्ठे, श्रेष्ठे, तपोनिष्ठे, धर्मीष्ठे, सत्यवाहिनी, समुद्रवसने देवी, ज्येष्ठा गौरी नमोस्तुते.” असा श्लोक खड्याच्या गौरी आणताना म्हणतात. ही सात खड्यांच्या सात देवींची नावे नसून, एकाच जेष्ठा गौरीची ही सर्व विशेषणे आहेत.

आनंदाच्या सणासुदीच्या काळात (म्हणजे सध्याच्या पावसाळ्यात) माणसाने आपण देवापेक्षाही (निसर्गापेक्षाही) शक्तिवान, बुद्धिवान आहोत असे समजून आपला जीव घालविण्यापेक्षा, त्याचा सन्मान राखावा हेच या ७ खड्यांच्या गौरींच्या कहाणीचे फलित आहे.

लेखक : श्री मकरंद करंदीकर

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जातीचं काय घेऊन बसलात राव ? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ जातीचं काय घेऊन बसलात राव? – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

जातीचं काय घेऊन बसलात राव.. अरे जात म्हणजे काय ? … माहित तरी आहे का.. ?

अरे कपडे शिवणारा शिंपी, ! तेल काढणारा तेली, !

केस कापणारा न्हावी. ! लाकुड़ तोडणारा सुतार. !

दूध टाकणारा गवळी. ! गावोगावी भटकणारा बंजारा. ! 

भांडी बनविणारा कासार, दागिने बनविणारा सोनार, मूर्ती- मातीची भांडी बनविणारा कुंभार, रानात मेंढी-

बकरी वळणारा धनगर.. !

पुजा-अर्चा, पौरोहित्य करणारा ब्राह्मण. !

बूट चप्पल शिवणारा चांभार, बागायती शेती करणारा-वृक्ष लावणारा माळी. !

आणि लढाई लढणारा क्षत्रिय. !

आलं का काही डोस्क्यात.. ?

आरं काम म्हणजे जात.

आणि सर्वात महत्त्वाचे वरीलप्रमाणे कामे आता कुठल्याही एका जातीचीच व जातीसाठी राहिली नाहीत.

आता शिक्षणाने व्यवसाय प्रत्येकाचे बदलले आहेत.

आता भांडत बसण्यापेक्षा जाती बदला……

आता इंजीनीयर ही नवी जात.

कॉम्प्युटर, केमिकल ही पोटजात.

“सी. ए” ही पण जात,

तर 

“एम. बी. ए” ही नवी जात.

डॉक्टर ही पण जात 

तर वकीलही जातच 

तर “शिक्षण” व “माणुसकी” हाच खरा धर्म.

बदला की राव कवाचं तेच धरुन बसलात!

घरीच दाढी करता नवं? … तेव्हा तुम्ही न्हावी होता 

बुटाला पालीश करता नव्हं?…. तेव्हा तुम्ही चांभार होता 

गैलरी टेरेसवर झाडे लावता ना ! बगीचा करता …. तेव्हा तुम्ही माळी होता 

घरच्या घरीच पुजा-अर्चा करता नव्ह?.. , , तेव्हा ब्राम्हण पण होताच की ?

आरं कामानं मोठं व्हा जातीनं न्हाय !

आरं तुम्ही ह्या जातीत जन्माला आला, हा काय तुमचा पराक्रम हाय व्हय?

मंग कशाला उगीचच बोंभाटा करता राव ?

तुम्ही शहरात/खेडेगावात राहत असाल.. तुम्ही आजारी पडल्यावर/अडीअडचणीला मदतीला सगळ्यात आधी धावून येतो तो तुमचा शेजारी/मित्र आणि तो तुमच्या वरीलप्रमाणे जुन्या जातीचा नसतोच हे मान्य कराल की नाही?

सगळ्याला आता आधुनिक पद्धतीने काम हाय !

सगळ्याला शिक्षण खुले हाय !

खूप शिकायचं काम करायचे ! 

माता पित्याचे- -गावाचे- जिल्हय़ाचे- राज्याचे- देशाचे नावलौकिक करायचे.

कधीतरी लक्षात घ्या की… ” जात फक्त राजकारणी लोकांनी स्वार्थासाठी जिवंत ठेवली आहे “

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माणुसकीचा ठाव नसे… कवी – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ माणुसकीचा ठाव नसे… कवी – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

☆ माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे ☆

जिव्हा चटावली बाजारा कोपऱ्यात चूल रुसे

पंगती आग्रह भरपेटी भुकेल्या तोंडी घास नसे

सुधारलेल्या या देशी संस्कृती ना कोणी पुसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

पेले फेसाळले मदीरा स्तन आटले ओठ सुके

दूध रस्त्यावरी ओतता बालकांची क्षुधा सुके

आंसू आटलेले मातृत्वाची मान झुके

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

माय अपुली बहिण तरी गर्भातच लेक खुडे

समाजा ना घोर कुठे कुणाचे काय अडे

मी माझे हे खरे समाजाचे तर भान नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

उत्तुंग इमले धनिका दीनदुबळ्यांना वास नसे

दारी गाड्यांची रांग असे कोण नेसाया साडी नसे

निर्दयी कठोर धरती गगनालाही कणव नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

मंचकी लावणी रंगली सुवासिनीचा अश्रू सुके

बैठकी खणखण पडती विद्येसाठी मोल थके

विभ्रमे मन भरे दूरदृष्टीचा अभाव दिसे 

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

आता कसली आशा नाही स्वप्न ही ना पहायची

मनात आतल्या आत जळून ती गुदमरायची

हाची का समाज हेचि असेच का जगायचे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

☆ रसग्रहण :  माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे ☆

जिव्हा चटावली बाजारा कोपऱ्यात चूल रुसे

पंगती आग्रह भरपेटी भुकेल्या तोंडी घास नसे

सुधारलेल्या या देशी संस्कृती ना कोणी पुसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

माणूस स्वतः हरवला आहे यातील गर्भितार्थ मनाला भिडतो. तो माणुसकीला ही विसरला. त्याला याविषयी काहीही घेणेदेणे नाही.

“जिव्हा चटावली म्हणताना भुकेविषयीचा सात्विक भाव नाहीसा झाला आहे हे अधोरेखित केले आहे.. “चटावली” शब्दांतून परिस्थितीचे गांभीर्य व तीव्रता नेमकेपणाने ध्यानात येते. बदलत्या परिस्थितीमुळे घरातील चूल रुसली आहे अशी कल्पना करून उत्तम चेतनगुणोक्ती अलंकार योजिला आहे. “कोपऱ्यात” या शब्दातून होत असलेले दुर्लक्ष कळते. पंगतीत पोट भरलेल्या लोकांना आग्रह केला जातो. पण भुकेल्या माणसाला घासही मिळत नाही याची जाणीव व पाश्चिमात्य देशांचे अंधानुकरण करताना देश स्वतःच्या संस्कृतीला विसरतो आहे. “अतिथी देवो भव” ही भारतीय संस्कृतीतील भावना दुर्लक्षित होते आहे.

पेले फेसाळले मदीरा स्तन आटले ओठ सुके

दूध रस्त्यावरी ओतता बालकांची क्षुधा सुके

आंसू आटलेले मातृत्वाची मान झुके

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

वर्तणुकीचे व हरवलेल्या माणुसकीचे वर्णन केल्यानंतर समाजाचे बदलते भान आणि वर्तन विशद केले आहे.. मदिरापानाची अवाजवी व गैरवाजवी प्रतिष्ठा देताना तिचे पेले फेसाळताना दिसतात. पण लहान बालकांना पूर्णान्न ठरणारे आईचे दूध मात्र आटत चाललेले आहे. माया व लहान मुलांना स्तनपान न देण्याकडे स्त्रियांचा वाढता कल लक्षात येतो. लहान मुलांचे ओठ सुकून गेले आहेत. त्यांची तहान भूक भागत नाही. मूलभूत गरजांविषयी माणुसकी जपली जात नाही. नात्याने पाहिले जात नाही हे सूचित केले आहे. अपेक्षित भाव न मिळाल्याने दूधाचा नाश झाला तरी बालकांची क्षुधा नजरेआड होते. ती भूकही सुकून जाते असे म्हणून अतिशयोक्ती अलंकाराचा समर्पक वापर केल्याने परिस्थितीची तीव्रता समजते.. असे असूनही कुणालाही दुःख होत नाही. या अर्थी आंसू, अश्रू आटून गेलेले आहेत. मातृत्वाच्या भावनेला प्रामाणिक न राहणारी ही भावना फैलावल्यामुळे मातृत्वाची मान ही झुकली आहे असे म्हणताना “मातृत्वाची मान झुकणे” यातून मांडलेला गर्भितार्थ अतिशय भेदक आहे. मातृत्वही शरमून गेले आहे. चेतनागुणोक्ती कवितेच्या आशयाला उंची व खोली प्रदान करतो.

माय अपुली बहिण तरी गर्भातच लेक खुडे

समाजा ना घोर कुठे कुणाचे काय अडे

मी माझे हे खरे समाजाचे तर भान नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

प्रत्येक माणूस हा स्त्रीच्या पोटी जन्म घेतो. स्त्रीच्या रूपात माय, बहिण व लेक ही मिळते. या सत्याकडे दुर्लक्ष करून स्त्री गर्भ मात्र खुडला जातो. “खुडे” या शब्दातून “कळी खुडणे” या अर्थाने कळी व तिचा विकास अशा जीवन क्रमाशी स्त्री गर्भाचा मेळ साधला आहे. समाजाची मूल्ये वर्धन करणारी, संस्कार करणारी स्त्रीचे अस्तित्व आवश्यक आहे. हा व्यापक विचार करण्यात समाज भावनिक दृष्ट्या कमी पडत आह. मी आणि माझेच खरे व स्वतः पुरते आत्मकेंद्री जगणे हा जणू आयुष्याचा नियम झाला आहे. अपवाद म्हणूनही समाजाचे भान ठेवण्याचे भान जपले जात नाही.

उत्तुंग इमले धनिका दीनदुबळ्यांना वास नसे

दारी गाड्यांची रंग असे कोण नेसाया साडी नसे

निर्दयी कठोर धरती गगनालाही कणव नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

भूक तहान या नंतर या निवारा अर्थात घर याविषयी कवी सांगतो कि श्रीमंतांना व श्रीमंतांची उत्तुंग मोठी घरे असतात. परंतु दीनदुबळ्यांना मात्र “वास नसे” म्हणताना त्यांना घर, अधिवास नसणे हा भाव मांडला आहे. गरजेपेक्षाही जास्त असणे व गरजेपुरते ही नसणे हा विरोधाभास, विषमता लक्षात येते. श्रीमंतांच्या घरी गाड्यांची रांग लावताना पैशाचा अपव्यय दिसून येतो. त्याच वेळेस स्त्रियांसाठी लज्जा रक्षणार्थ वस्त्रही उपलब्ध नसते. धरतीवरील निर्दयी कठोरवृत्ती प्रकर्षाने मांडली आहे. “निर्दयी कठोर धरती” मधील श्लेषात्मक अर्थ ही अतिशय उच्च प्रतीचा आहे. पृथ्वीतलावर वास करणारे लोक निर्दयी व अन्न वस्त्र निवारा या गोष्टींची गरज भागवणारी धरती ही निर्दयी बनलेली आहे. गगनालाही कणव नसे म्हणताना वरुणराजाची कृपा नसल्याने लक्षात येते.. देव गगनात वास करतो असा समज आहे. त्या दृष्टीनेही त्याला कणव येत नाही असा श्लेषात्मक अर्थ आशयाला पूरक ठरतो. संपूर्णपणे विपरीत परिस्थिती मांडून माणुसकी कशी हरवत चालली आहे हे प्रत्येक कडव्या गणिक उदाहरणे देत स्पष्ट केले आहे.

मंचकी लावणी रंगली सुवासिनीचा अश्रू सुके

बैठकी खणखण पडती विद्येसाठी मोल थके

विभ्रमे मन भरे दूरदृष्टीचा अभाव दिसे 

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

समाजाचे अध:पतन दाखवताना माणुसकीप्रमाणे त्याचे नैतिक पतनही कसे होत आहे सांगितले आहे. लावणी पाहताना दंग झालेले लोक त्या नादामध्ये स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष करतात. घरातील सुवासिनीचा, स्त्रीचा अश्रूही सुकून गेला आहे याचे भानही पुरुषजात ठेवत नाही. “अश्रू सुके “असे म्हणताना दुर्लक्षित परिस्थितीचा सामना दीर्घकाळ चाललेला कळतो आहे. लावणीच्या बैठकीत पैशाची उधळण होते. मुलांच्या विद्याप्राप्तीसाठी पैसा उपलब्ध होत नाही. व शैक्षणिक फीया थकून जातात, बाकी राहतात. विभ्रमांनी मन रमवून काळाचा व पैशाचा अपव्यय केला जातो. क्षणिक सुखात दूरदृष्टीचा अभाव दिसतो.. संपूर्ण घराघराचा ऱ्हास, विध्वंस होऊ शकतो याकडे तीळमात्र लक्ष दिले जात नाही. आर्थिक, मानसिक शारीरिक व नैतिक पातळीवरील चांगला समाज चांगला देश निर्माण करू शकतो. परिपूर्ण समाजाची आस न ठेवल्यामुळे एकूणच माणूस म्हणून जगण्याच्या विविध भागांवर कवीने प्रकाश टाकला आहे. व माणुसकीच्या लोप पावण्याने अंध:कारमय परिस्थितीची जाणीव करून दिली आहे.

आता कसली आशा नाही स्वप्न ही ना पहायची

मनात आतल्या आत जळून ती गुदमरायची

हाची का समाज हेचि असेच का जगायचे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

विविध पातळ्यांवर हरवलेली, लोपलेली माणुसकी कवीने उदाहरणे देत शब्दांकित केली आहे. विपरीत वातावरणात विकल, हतबल, उदास मनाला आता कसलीही आशा नाही. काही बदल, सुधारणा होईल असे स्वप्न पहायचीही आशा उरली नाही. ” स्वप्न ही ना पहायची ” यातील श्लेषात्मक अर्थ अत्यंत अर्थपूर्ण. स्वप्न पाहायची नाहीत म्हणजे ती सत्यात उतरणार नाहीत याची जाणीव असल्याने ती पाहायची नाहीत व परिस्थितीमुळे स्वप्न पहायची आशा उरली नाही हा दुसरा अर्थ. ही गोष्ट सत्यात उतरेल याची शाश्वती मनाला उरलेली नाही. विस्तवासम दाहक वास्तवाने आशा मनातल्या मनात जळून जाणार, गुदमरून जाणार. “गुदमरणे” या शब्दातून तगमग, कळकळ, जीवाची काहिली लक्षात येते. हा समाज आता असाच राहणार का, यालाच समाज म्हणायचे का आणि इथे असेच जगायचे का असे विविध प्रश्न कवीच्या सजग व खिन्न मनाला पडलेले आहेत. या प्रश्नातूनच त्याचे नकारात्मक उत्तरही अध्याहृतपणे दिलेले आहे.

संपूर्ण कवितेत यमक, अनुप्रास या बरोबरच साहित्यिक अलंकारांची योजना केल्याने नादमयता व अर्थपूर्णता दिसून येते.

डोळ्यांत अंजन घालून वास्तवाची प्रखर जाणीव करून देणारी, विचार करायला प्रवृत्त करणारी ही कविता ! अत्यंत हृदयस्पर्शी तर आहेच तिचे सामाजिक मोलही अनमोल आहे. समाजभान असणारे लोक प्रयत्नशील असतात. स्वतःचा व्यावसायिक पेशा समर्थपणे व यथार्थपणे सांभाळून, सामाजिक भान सजगपणे साहित्यातून सक्षमपणे व भाषेचे सौंदर्य जपून मांडण्याचे अनमोल कार्य डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांनी नेहमीच केलेले आहे.

© सुश्री नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निर्मळ उदकाचं तळं… सुवर्णाची कमळं… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ निर्मळ उदकाचं तळं… सुवर्णाची कमळं… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर 

शहरातल्या मुलींचा पंचमीचा सण फांद्यांवर बांधलेल्या हिंदोळ्याविना सुना-सुना जातो, तसा आमचाही गेला खरा; पण ती उणीव भरून निघाली श्रावणातल्या श्रवणीय कहाण्यांनी, श्रावणातल्या एकेक दिवसाला संस्मरणीय करण्याच्या घरातल्या श्रध्दामय संस्कृतीनं, स्वरातल्या हृदय कारुण्यानं !

‘पहिल्या आदितवारी मौनानं उठावं, सचैल स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी… ‘

आजीनं कहाणी वाचायला बसवल्यानंतर मी ती एका सपाट्यात वाचून काढत असे; पण त्यातलं काही समजत नसे. मात्र, पुढे ऐकताना व स्वतः वाचताना त्या आवडू लागल्या. त्या सर्व कळेपर्यंत श्रावण संपून जाई; मग पुन्हा पुढच्या वर्षी श्रावणाच्या कहाण्यांना सुरुवात होई.

दिव्याच्या अवसेच्या कहाणीतले दिवे अदृश्यपणे झाडांवर येऊन बसत. एकमेकांत बोलत. शुक्रवारच्या कहाणीतली बहीण दागिन्यांना जेवू घालत असे. पाटमधावराणी, चिमादेवीरांणी, सोमा परटीण, गरिबांना मदत करणारे शंकर-पार्वती जवळचे वाटत. घावनघाटल्याचा, खीर-पोळीचा, लाडवांचा नैवेद्य… साठा उत्तरांची कहाणी सुफळ संपूर्ण करण्याचं आश्वासन, हे सर्व फार आवडे. कहाणी ऐकणं, सांगणं, त्यातली उत्कंठा, चित्रमयता, ओघवत्या भाषेचा डौल, लय, छोट्या तात्पर्यातलं जीवनसूत्र… माझ्या गोष्टीवेल्हाळ मनाला रिझवून जात असे. कहाणी संपल्यावर हुरहूर वाटे.

आता तर कहाण्या सरल्या. त्याबद्दल वाटणारं सुनेपणही उरलं नाही. खूप खोलवर हृदयात मात्र कहाण्यांचे शब्द नांदतात. निर्मळ उदकाचं तळ, सुवर्णाची कमळं कधीतरी थरथरतात. त्यांना कहाणी सांगून मीच जोजवलं आहे. नागचवथीनंतर पंचमी, शिळा सप्तमी, नारळी पौर्णिमा, जन्माष्टमी, श्रावणी सोमवार, जिवतीचे शुक्रवार… श्रावणातले एकेक दिवस भराभर येत आणि जात; पण घरातल्या माहेरवाशिणींच्या, नव्या सुनांच्या पहिल्या मंगळागौरीचा आठव येतो, तेव्हा श्रावण घमघमतो. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातला आनंद ओसंडून वाहत असे. पूजेचं साहित्य, फुलपात्री, फराळाची तयारी, मुलींची बोलावणी… याची घाई उडत असे. त्यांचे लग्नातले शालू सळसळत असत. समवयस्क नवविवाहित मैत्रिणींचे हास्यविनोद, दबत्या आवाजातलं काही बोलणं… दोन-चार वर्षांपूर्वी निरोप दिलेल्या शाळेच्या आठवणी… पूजेची सामग्री सावरण्याची घाई… आरती, फराळ, जागरण, खेळ… माझ्या डोळ्यांवर झोप अनावर होई… त्यांच्या सौख्याचा गंध प्राजक्ताच्या फुलांतून, केवड्यातून ओसंडत असे. पतीचं नाव घेताना झक्क लाजणाऱ्या मुलींचे चेहरे घेऊन आलेला श्रावण आता लोपला. मंगळागौर पूजणाऱ्या त्या स्त्रियांचे संसार… त्यातले चढ-उतार पाहिले. त्यांनी धीरानं सोसलेली दुःखंही पाहिली… जीवनकहाणी सुफळ संपूर्ण होण्यासाठी त्यांनी मंगळागौरीला मागितलेलं वरदान किती खरं ठरलं… बालकवींच्या ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ कवितेतल्या श्रावण महिन्याचं गीत ज्यांच्या चेहऱ्यावरून वाचून घ्यावं, अशा ‘ललना’ मी पाहिलेल्या आहेत… माझ्याच घरातल्या स्त्रियांनी श्रावणमासाचं सुरेल गाणं मला ऐकवलं आहे.

चित्रपटगीतांचा, भावगीतांचा पाऊस बरसत राहिला अन मी त्यातला श्रावण अलगद झेलला.

सावन-भादोची लयलूट असे गाण्यांतून. प्रियकरावाचून श्रावण म्हणजे भर पावसात जणू अग्नी तापतो आहे, श्रावणझडीसारखे डोळे झरत आहेत… अशा अर्थाच्या गीतांनी बहरलेल्या चित्रसृष्टीच्या गाण्यांतून माझ्या हाती पडलेल्या एक-दोन गाण्यांनी माझा श्रावण सजलेला आहे. सैगलच्या ‘देवदास’ मधल्या अजरामर गाण्यातली एक ओळ मला भिडते अन् त्यातल्या कारुण्यानं श्रावण भिजवून जाते……

 ‘सावन आया तुम ना आये… ‘

आजवर ऐकलेल्या श्रावणातल्या विरहगीतांतूनही ओळ नेमकी ओंजळीत येते.

‘बालम आये बसो मोरे मनमें ‘

या गीतातून सहा-सात दशकांचं अंतर पार होतं. ते जणू माझं सांत्वन करण्यासाठीच घडतं.

‘बंदिनी’तल्या शैलेंद्रच्या गाण्यातूनही मी श्रावण ऐकते.

‘अब के बरस भेज, भैय्या को बाबुल,

सावन में ली जो बुलाय के… ‘

लखनौकडे गायल्या जाणाऱ्या पारंपरिक चालीत बांधलेल्या गाण्यात आशाचा स्वर एका ओळीत रुद्ध होतो.

‘बैरन जवानीने छीने खिलौने

और मेरी गुडिया चुरायी

बाबुलजी मैं तेरे नाजोंकी पाली,

फिर क्यों हुई मैं परायी… ‘

सासर-माहेरमध्ये झुलणाऱ्या स्त्रीमनासाठी हिंदोळा नकोच. डोळे भिजायला पंचमीचा सण तरी कशाला हवा ! भातुकलीचा खेळ संपून खरा-खरा डाव हाती आला तरी ही हुरहूर का?

‘ क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे… ‘

… सारखा हा लपंडाव कशासाठी? श्रावण महिन्याची गीतं वाचायला ही आयुष्यं समजायला हवीत— की ती समजण्यासाठी श्रावण अनुभवायला हवा? मरगळलेल्या मनाला मात्र आता दूर रानात न्यायला हवं — बगळ्यांची माळ उडताना पाहायची आहे ना !

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘गण ‘पती‘☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ शिक्षक दिन ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

आज शिक्षक दिन… सर्वप्रथम माझ्या सर्व शिक्षकांना माझा सादर प्रणाम !!!

मनुष्य उपजल्यापासून मरेपर्यंत काहीना काही शिकत असतो, ज्ञान प्राप्त करीत असतो. ते ‘ज्ञान’ का ? कसे ? कोणासाठी ? व कधी आचरणात आणायचे हे ‘विवेका’ने ठरवावे लागते असे अनेक ‘महाजनां’नी आपल्या आचरणातून दाखवून दिले आहे. हा ‘विवेक’ अंगी बाणवण्यासाठी अनेक जण आपल्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत करीत असतात मार्गदर्शन करीत असतात. ही सर्व मंडळी लौकिक अर्थाने किंवा पेशाने शिक्षक असतातच असे नव्हे!!

आद्यगुरू आई आणि बाबा. त्यांना माझा साष्टांग नमस्कार. पूर्व सुकृत चांगले असावे आणि भगवंताची कृपा झाली असावी, म्हणून मला उत्तम आईबाप लाभले.

सर्ग हा आपला एक उत्तम शिक्षक आहे. या सृष्टीत अनेक प्रकारचे जीव, जंतू, वनस्पती, प्राणी, पक्षी आहेत, ते आपापले जीवन जगत आहेत, परंतु त्यांच्यात वैर नाही, दुजाभाव नाही, मत्सर नाही, द्वेष नाही, स्पर्धा नाही…

यातील एक गोष्ट जरी आत्मसात करता आली तरी मनुष्याचे जीवन अधिक सुखरूप होईल, नाही का ? एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की जो मनुष्य आपल्याशी वाईट वागतो, (खरे तर तो त्याच्या स्वभावानुसार वागत असतो, त्यात चांगल वाईट काही नसते) तोच आपला उत्तम गुरू असतो. “चांगल वागणारी माणसे कसे वागावं हे शिकवतात आणि वाईट माणसे कसे वागू नये ते शिकवतात’. थोडक्यात सर्वजण आपल्यासाठी *गुरू*ची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे या सर्वांप्रति आपण कृतज्ञ राहायला हवे.

आजपर्यंत, मला असे अनेक ‘शिक्षक’ लाभले. त्यांच्यामुळे माझे जीवन समृद्ध होत आले आहे. ‘शिक्षकदिना’चे औचित्य साधून मी या सर्व ज्ञातअज्ञात ‘शिक्षकां’ना वंदन करीत आहे. परमेश्वर कृपेने मला लाभलेला हा अमूल्य वारसा पुढील पिढीला देण्याचा मी प्रयत्न करेन.

सर्व ज्ञात-अज्ञात शिक्षकांना ही शब्द सुमनांजली सादर समर्पण !!!

भारतमाता की जय!!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मनाची पिशवी…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “मनाची पिशवी…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

 (शिक्षकदिनाचे औचित्य साधून..) 

आई आपली आद्य गुरू हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नंतर वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळ्या समुहात वेगवेगळ्या क्षेत्रात आपले गुरू बदलत जातात. अर्थात कितीही गुरू बदलले तरी त्या सगळ्यांनी दिलेल्या ज्ञानामुळेच केलेल्या मार्गदर्शनामुळेच आपण घडलेलो असतो. म्हणून त्या सगळ्यांचे स्मरण आज होणे गरजेचे आहे. त्या सगळ्यांना आदरपूर्वक वंदन 🙏🙏

पण या सगळ्यामधे लोक म्हणतात अनुभव हा गुरू मोठा आहे तर कोणी म्हणतात निसर्ग हा गुरू मोठा आहे. किती छान वाटते ऐकायला. हो आहेतच हे गुरू. पण या गुरुंबद्दलचे ज्ञान आपल्याला आपले मन देत असते. त्यामुळे मन हा मोठा गुरू आहे.

अनुभव जेव्हा आपल्याला येतो तेव्हा ती परिस्थिती काय चांगले काय वाईट याचा सारासार विचार करायला आपली बुद्धी आपले मन हे कार्यरत झालेले असते. ते मन आपल्याला त्या अनुभवांची तारतम्यता सांगत असते आणि ते तारतम्य देणारे मन हे अतिशय महत्वाचे असल्याने मन हा एक मोठा गुरू आहे.

निसर्ग हा पण गुरू आहे म्हटले तरी निसर्गातील प्रत्येक गोष्टीत काही चांगले आणि काही वाईट गुण हे असतातच. पण फक्त चांगल्या गुणांकडे बघायला आपले मन आपल्याला शिकवते म्हणून निसर्गातील एखादी गोष्ट आपल्याला आवडते. म्हणून ते शिकवणारे ते जाणणारे मन हा अतिशय मोठा गुरू आहे.

बघा ना फुलावर भिरभिरणारे फुलपाखरू पाहून आनंद नाही झाला असा माणूस विरळाच असेल. पण अशावेळी फुलपाखरू आधी सुरवंट होते किंवा याचे आयुष्य अवघ्या दीड दिवसाचे आहे हे माहित असले तरी त्याकडे कानाडोळा करायला त्या क्षणी त्या फुलपाखराचे स्वछंदी बागडणे बेधुंद होत मधु प्राशन करणे आपले रंगीबेरंगी पंखांनी उघडझाप करत लोकांच्या काळजाच्या फुलावरही अलगद बसणे याचा आनंद घ्यायला मनच शिकवत असते.

मन हा असा गुरू आहे की तो आपल्याला दिसत नाही पण एक क्षणही तो आपल्याला सोडत नाही. म्हणून आपल्या अंतर्मनाचा आवाज त्याची शिकवण जो नित्यनेमाने जपतो त्याला विजयाच्या शिखरावर जाता येते.

तसेच आपल्या हिताचा सर्वात जास्त विचार आपला गुरू करत असतो. मग या वेगवेगळ्या गुरुंपेक्षाही जास्त आपले हित आपले मनच प्रार्थित असतो. म्हणून आज शिक्षकदिनाच्या निमित्ताने माझ्या सगळ्या ज्ञात अज्ञात गुरुंबरोबरच माझ्या मनाच्या गुरूलाही साष्टांग नमस्कार 🙏

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सर.. माघारी या ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सर… माघारी या ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

 

हाताशी आलेला एकुलता एक मुलगा अकाली दगावला आणि कमल जीत सिंग उर्फ केजे सर सैरभैर झाले! ज्याच्यासाठी कमवायचं तोच आता या जगात नाही तर मग नोकरी करायची तरी कशाला? असा प्रश्न साहजिकच उभा राहिला!

भारतीय वायुसेनेत Warrant Officer म्हणून केलेली कित्येक वर्षांची सेवा अशी तडकाफडकी संपुष्टात आणायचा निर्णय त्यांनी काळजावर दगड ठेवून घेतला आणि वरिष्ठांना तसं कळवून टाकले!

केजे सरांशिवाय नव्या रंगरुटांचे (Recruits) पाय हलेनात! त्यांची passing out parade अगदी तोंडावर आलेली होती. पंचेचाळीस मुला- मुलींची बॅच होती. परेड काही कुणाच्या मनासारखी होईना. नवे instructor आले होते, मात्र पोरा पोरींना केजे पापाजींचा लळा लागला होता. खरं केजे म्हणजे प्रशिक्षणार्थी वायूसैनिकांचा कर्दनकाळ म्हणून कुप्रसिद्ध होते. मैदानात असा रगडा देत की आईचे दूध आठवावे. पण त्यांचे काळीज आईचे होते. जितके उत्तम प्रशिक्षण तेवढी उत्तम कारकीर्द यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे पद कवायत, व्यायाम, पथ संचलन यात जराही चूक त्यांना खपत नसे. तुम्ही भले नंतर माझ्यापेक्षा वरच्या पदावर जाल पण आता तुम्ही माझ्या आज्ञेत आहात.. मी सांगेन तीच पूर्व! असा त्यांचा खाक्या होता. मी तुम्हाला तुम्ही ऑफिसर झाल्यावर कडक salute ठोकेन की… असंही ते सैनिकांना सांगायचे. कुणाला दुखापत झाली, कुणी मनाने खचला की मग मात्र केजे काळजीवाहू आई होत. त्यांच्या तालमीत तयार झालेले अधिकारी याची साक्ष देत असत!

आता के जे सर शिकवायला येणार नाहीत हे समजल्यावर recruits मनातून खट्टू झाले. त्यांनी के जे सरांना एक पत्र धाडले..

प्रिय सर,

सत् श्री अकाल!

तुमच्या विना परेड नीट होत नाहीये. पासिंग आऊट जवळ आली आहे. तुमच्या पोरांची परेड वाईट झालेली तुम्हाला चालेल?

तुमचा एक मुलगा देवाघरी गेला… पण आम्ही पंचेचाळीस जण तुमची मुलेच आहोत की!

सर… please come back… soon!

पत्र वाचून के जे ढसाढसा रडले. आणि तडक परेड मैदानावर हजर झाले. नेहमीच्या पहाडी आवाजात पोरांना order दिली…. आज पोरांची पावलं नेहमीपेक्षा जास्त शिस्तबध्द पडत होती… सबंध संघ डौलात march करू लागला होता!

त्याचवेळी के जे सिंग सरांनी ठरवलं.. पुढील सर्व नोकरी या आपल्या लेकरांसाठी द्यायची… देवाने एक पोरगा हिरावून घेतला पण ही शेकडो पोरं पदरात घातली.. यांना पंखाखाली घेतलं तर त्यांना पंख फुटतील… ते उंच भरारी घेतील… देशाच्या सेवेसाठी सज्ज होतील. एका शिक्षकाला आणखी काय पाहिजे असतं?

(हैद्राबाद येथील भारतीय वायू सेना प्रशिक्षण केंद्रात warrant officer म्हणून कार्यरत असणाऱ्या कमलजीत सिंग यांची ही कहाणी.. आजच्या शिक्षक दिनानिमित्त. ) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares