मराठी साहित्य – विविधा ☆ प्रतिमा-भंजन ::: एक छंद – लेखक : श्री विश्वंभर चौधरी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे  ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

☆ प्रतिमा-भंजन ::: एक छंद – लेखक : श्री विश्वंभर चौधरी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे 

नेमका बाबासाहेबांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी 13 एप्रिलला व्हाट्सअप युनिवर्सिटी आणि फेसबुकवर मेसेज येतो की घटनासमितीत शेकडो लोक होते मग घटनेचे शिल्पकार फक्त बाबासाहेब कसे? 

2 ऑक्टोबर तर सगळ्यांनी मुक्तपणे गांधीजींना शिव्या देण्याचा दिवस, गांधी कसे आणि कुठे चुकले यावर भरभरून लेख येतात.

14 नोव्हेंबर म्हणजे तर सगळ्यात मोठा शिमगा! नेहरूंवर खोटेनाटे आरोप लावण्याचा हक्काचा दिवस! नेहरू हे यात सगळ्यात दुर्दैवी. 

1 ऑगस्ट आला की ‘भटमान्य’ टिळक कसे सनातनी होते, फक्त ब्राह्मणांचे नेते होते… 

आता पहिल्या पिढीचा उद्धार करून संपल्यावर आपली तरुणाई दुसर्या पिढीला सुरूवात करत आहे. साने गुरुजींना काल फटका बसलाच.  पुन्हा, मी मीमवर बोलत नाही, प्रतिक्रियांवर बोलतोय. 

आणि मी सराईत ट्रोलाबद्दल म्हणजे अजेंडे घेऊन आणि त्या अजेंड्यासाठीचा पगार घेऊन लिहीणारांबद्दल बोलत नसून कोरी पाटी घेऊन सोशल मिडीयात आलेल्या आजच्या सर्वसामान्य तरुण पिढीबद्दल बोलत आहे. 

सगळेच तसे नाहीत पण बहुतांश तरूण हे फशी पडत आहेत. राष्ट्रीय नेत्यांबद्दल फेसबुकवरून मत बनवत आहेत. आणि तशा काॅमेंट धडाधड टाकत आहेत जे योग्य नाही.

माझ्या वाॅलवर सेक्युलॅरिझमला पाठिंबा देणारा एखादा तरूण दुसर्या कुठल्यातरी वाॅलवर कट्टर जातीयवादी प्रतिक्रिया लिहितांना मला आढळतो तेव्हा खरंच विश्वास बसत नाही की हा खरा की तो खरा? 

फेसबुकचा सगळ्यात वाईट भाग असा आहे की इथं प्रत्येक राष्ट्रीय नेत्याचं फक्त वैगुण्य शोधलं जातं आणि ते तिखट मीठ लावून सांगितलं जातं. 

रात्रीच्या अंधारात एखाद्या राष्ट्रपुरूषाच्या पुतळ्याची विटंबना करणारा आणि दिवसाच्या उजेडात फेसबुकवर राष्ट्रीय नेत्याचं प्रतिमाभंजन करणारा- कसा फरक करायचा दोघात? 

फक्त प्रतिमाभंजन. विधायक काहीच नाही. जणू काही या माणसांना देशानं आत्तापर्यंत डोक्यावर घेतलं ते केवळ  अज्ञानापोटी आणि या नव्या संशोधकांनी फेसबुकवर संशोधन केल्यामुळेच जगाला सत्यस्वरूप कळलं अन्यथा सगळं जग अंधारात होतं.

राष्ट्रीय नेत्यांची चिकित्सा व्हावीच. चिकित्सेला विरोध नाही. 

उद्या बाबासाहेबांच्या ‘प्राॅब्लेम ऑफ रूपी’ या प्रबंधात एखादं गृहीतक कसं चुकलं हे कोणी सप्रमाण मांडलं किंवा महात्मा फुलेंचा शेतीविषयक आर्थिक विचार कोणी खोडून दाखवला किंवा गांधीजींच्या सत्याग्रहातल्या उणीवा दाखवल्या किंवा नेहरूंच्या परराष्ट्र नीतीत चुका काढल्या किंवा टिळकांच्या गीतारहस्यामध्ये त्यांचं गीतेचं आकलनच मुळात कसं चुकलं हे मांडलत तर स्वागत आहे! मराठी समाज बौद्धिकदृष्ट्या जिवंत असल्याचं ते लक्षण असेल. पण भलतीच समीक्षा होतांना दिसतेय.    

काळाच्या मर्यादेत  त्यांनी शक्य तितके बदल घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कामाची चर्चा करा. त्यांच्या योगदानाची चर्चा केली तर आपणही काही करावं असं वाटेल. त्यांचे फक्त तथाकथित दोष चघळत बसलो तर गावच्या पारावर वर्षानुवर्ष त्याच गप्पा मारत बसलेल्यांसारखी तुमची अवस्था होईल. ज्यांच्यावर तुम्ही टीका करता ते कधीच वर गेले. तुमच्या भविष्यात जर कशाचा उपयोग करता येईल तर तो त्यांच्या कामाचा. त्यांच्या चुकांचा काय उपयोग? 

प्रतिमाभंजनाच्या खेळातून बाहेर या, विधायक काम बघा. शक्य झालं तर ते पुढे न्या.   

मी सरसकटीकरण करत नाही. विधायक विचार करणारे पण आहेत पण संख्या अगदी नगण्य. आणि तरूण म्हणून तुमची प्रत्येक अभिव्यक्ती मला मान्य आहे, अभिव्यक्तीच पिढीगणिक बदललेलं वेगळेपणही मान्य आहे. फक्त अभिव्यक्ती हे साध्य नसून साधन आहे एवढंच सांगायचंय.

माझा कदाचित राग येईल तुम्हाला. येऊ द्या. मी कधीच गोड गोड उपदेशासाठी प्रसिद्ध नव्हतो. तुमची उमेदीची वर्ष, अभ्यासाची वर्ष या टिंगलटवाळीत वाया जाऊ नयेत. 

गांधी सनातनी होते, बाबासाहेब अहंकारी होते, नेहरू चारित्र्यहीन होते, टिळक फक्त भटमान्य होते या सगळ्या अफवा आहेत. अभ्यास वाढवला की डोक्यात प्रकाश पडेल.

या सगळ्यांच्या कामाचा अभ्यास करा, सोशल मिडीयानं आकसानं त्यांच्यावर लादलेल्या कथित दुर्गुणांचा अभ्यास करून काय होणार?

स्वातंत्र्यानंतरच्या दोन-तीन पिढ्यांनी चांगलं ते समोर ठेवलं. नव्या पिढीनं फक्त वाईटाचा शोध लावून ते झाकाळून टाकू नये.  ज्ञानात भर पडावी, अज्ञानापुढे ज्ञान संपून जाऊ नये. 

द्वेष हा फक्त राजकीय अजेंडा असतो, अभ्यासात द्वेषाला जागा नाही. द्वेष की अभ्यास यावर एकदा व्यक्तिगत निर्णय करायचा आहे.

लेखक :  विश्वंभर चौधरी

प्रस्तुती : सुनील देशपांडे 

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘मेतकूट भात –’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘मेतकूट भात ’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

…आयुष्याच  गणित सोप्प करणारी माणसं धकाधकीच्या जीवनात आपल्याला जीवनाचं ‘सार ‘ सांगून जातात. 

लग्नानंतर ग्रॅज्युएशन सर्टिफिकीट हातात पडलं आणि आमचं विमान हवेत तरंगायला लागल. त्यातून हरबऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या  मैत्रिणींची  चढाओढ चालू होती , ” ए बाकी कमाल आहे हं तुझी! कसं गं जमलं तुला.? लग्नानंतर सगळा व्याप सांभाळून कसा केलास गं एवढा अभ्यास ? हरबऱ्याच्या झाडाचा डेरा वाढतच होता. आणि मी वर वर चढतच होते.अहो हो ना! मी म्हणजे खूप शहाणी,संसारातल्या तत्त्वज्ञानात तर एकदम तरबेज.अशी ‘ ग ‘ ची बाधा झाली होती मला. ‘आशाच’ कामवालीच साधसुध  समीकरण ऐकून चक्क खालीच पडले  की हॊ मी!.माझं गर्वाच विमान  दणकन जमिनीवरच आपटल. नुसत्या पदव्या असून काय उपयोग?   व्यवहारी  जगातल्या तत्वज्ञानाच् पारडचं वरचढ ठरत . काय झालं माहिती आहे का  साधी सरळ, भाबडी, अशिक्षित अशी माणसं माझ्या आयुष्यात आली. आनंदी क्षणाचं, सकारात्मक विचा्रांच सोनं करणारी माणस मला भेटली. पांडित्यालाही लाजवेल असं संसाराच साध, सोप्प, गणित त्यांनी माझ्यापुढे मांडलं. आणि ते ऐकून मी अवाक झाले.

 निक्कम्या मारकुट्या नवऱ्याला पोसत,आपल्या अपंग मुलाला सांभाळून कष्टाशी हात मिळवणी करून ,हाता तोंडाशी गांठ  घालणारी खम्बिर ‘आशा ‘ मला भेटली. आशा  म्हणजे आमची कामवाली  हॊ!. माझ्याकडे ती रोज कामाला यायची.एकदा मुलांवरून विषय निघाला. सहज तिच्या बोलण्यात आलं.  “माझ्या मुलाला वरण भात , मेतकूट भात  खूप  खूप आवडतो. पण रोज कसं परवडणार ?  तुम्हीच सांगा  वहिनीबाई  काही वेळेला इतका हटून  बसतो कीं,मलाच  लई वाईट वाटतंया   साधा  भात  तो काय ! हा साधा हट्ट पण मी पुरवू शकत नव्हते त्याचा.आणि मग हा त्याचा  हट्ट पुरवन्यासाठी मी इठुरायाच्या मंदिरात  गेले.” नवल वाटून मी विचारलं. ” काय गं ? विठोबाला साकडं घातलस की काय? परिस्थिती बदलावी म्हणून? “नाही हॊ वहिनीबाय ! त्याला किती संकटात टाकू ?  अंधार झाल्यावर तोच प्रकाश दाखवणार आहे ना मला. दुकानातले महागडे तांदूळ परवडणार नाहीत म्हणून मी गेले पुजारी बाबां कडे त्यांना विनवून म्हणाले,”पुजारी बाबा. देवा पुढ लोकांनी टाकलेले तांदूळ प्रसाद म्हणून द्याल का मला “? ते म्हणाले, ”अगं ने की असेच  घेऊन जा.जाडे भरडे , हलके, भारी, बरेच तांदुळ पडतात ह्या टोपलीत . आमची पोरं नाकं  मुरडतात,अशा सरमिसळ तांदुळाचा भात खायला. तू बेलाशक घेऊन जा ” आशा पुढे सांगत होती “पण असं फुकटचं देवापुढंच  घेनं बरं वाटतं का ? मग मी इचार केला. आपण देवा पुढे पैसे नाही टाकू शकत मग अशा रूपाने पैसे देऊन तांदूळ घेऊन,पुण्य मिळवायला काय हरकत आहे “? मी पुजारी बाबांना विनंती केली, “पुजारी बाबा थोडं तरी पैसे घ्या आणि थोडं तरी पुण्य माझ्या पदरात टाका .नाही म्हणू नका.”अशा प्रकारे  देवा पुढचे प्रसादाचे तांदूळ आणून,भात  कधीतरी व्हायचा तिच्याकडे.   रोज जवळजवळ नाहीच  म्हंटल तरी चालेल.मला कसतरीच झाल. मोठ्या मुदीच्या वरण भातावर साजूक तुपाची धार रोज लागायची माझ्या मुलांना . पोट भरलं तर माजोऱ्या सारखी पानं उष्टावून पळायची मुलं खेळायला . आणि तिच्या मुलाला साधा मेतकूट भात पण मिळत नव्हता.फारच  अपूर्वाई वाटायची त्याला भाताची .. नवरात्राचे दिवस होते,. मी संकल्प केला.आणि  एका मंगळवारी  तिची घसघशित तांदुळाने ओटी भरली. ताज्या,घरगुती मेतकूटाचा डबा तिच्या हातात ठेवला. महिनाभर पुरतील असे आंबे मोहोर तांदूळ,मी तिच्या जीर्ण पदराच्या ओटीत घातले. ती रास बघून तिचे डोळे भरून आले. दोन मुठी  तांदूळ परत तिने माझ्या थाळीत टाकले.तिला थांबवत मी म्हणाले, “अगं अगं ! हे काय? परत काय देतेस ?” ठसठशित कुंकवाची ती सवाष्ण उत्तरली “नाही ताई ही प्रेमाची, बरकतीची परतफेड आहे. तुमचं प्रेमाचं वाण  नाकारून मी उतले नाही की मातले नाही.  अहो दुसऱ्याला दानधर्म देताना तुमची थाळी अशी रिकामी नसते ठेवायची. तुम्ही मला मुठी मुठी ने  धान्य दिलेत. तुमची थाळी रीती नको ठेवायला,म्हणून मी चिमटीभर परत केलं.  अन्नपूर्णेच्या मान असतो हा.डब्यात टाका हे तुमच्या.कायम बरकत  राहील,माझ्या वहिनी बायकडे.तिचं ते तत्त्वज्ञान ऐकून माझ्यातली वहिनी बाई अवाक झाली.आणि कौतुकाने तिला न्याहाळू लागली. एका हाताने घेतांना दुसऱ्या हाताने द्यावे. हे आयुष्याचे तत्वज्ञान त्या अशिक्षित बाईकडून मला समजलं. साधी असणारी ही माणसं  काहीतरी वेगळच ज्ञान आपल्याला सहज  जाता जाता देऊन जातात. त्याकरता त्यांना कुठल्याही शाळेत किंवा कॉलेजमध्ये जायची जरुरी नसते. आणि असे धडे घेतच संसाराच्या कॉलेजमध्ये ग्रॅज्युएट व्हायचं असतं. तेच खरं ग्रॅज्युएशन असं म्हणायला काय हरकत आहे ? तुम्हालाही पटतय ना हे!मनांत असलेली भक्ति,आणि  अगदी गात्रा गात्रातून भरभरून वहाणारी शक्ती घेऊन  ती, सावलीला विसावली. मिटल्या डोळयांपुढे सावळा विठ्ठल नाचत होता.” 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक  !” भाग – २ —लेखक : श्री पार्थ बावसकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

(२३ जुलै १८५६ – १ अगस्त १९२०)

☆ “इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक  !” भाग –२ —लेखक : श्री पार्थ बावसकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

(“आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा ! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक!”) – इथून पुढे 

धुवाँधार बरसणाऱ्या पावसामुळे लोक ओलेचिंब झाले होते. रस्त्यावर चिखल झाला होता. माणसांची पांढरी धोतरे चिखलाने माखून काळीठिक्कर पडली होती. मुंबईच्या पारशी व्यापाऱ्यांनी विशेष व्यवस्था म्हणून चंदनाची चिता तयार केली होती. त्यावर टिळकांचे कलेवर ठेवण्यात आले, तोच त्या समुद्रकिनाऱ्यावरील लोकसागराला अचानक भरती आली. साखळ्या तोडून लोक टिळकांच्या चितेकडे धावत सुटले.

लोकमान्यांना अग्निडाग दिला आणि एका मुसलमान तरुणाचा धीरच सुटला. लोकमान्य गेले, आता आपण तरी जगून काय करायचे, असे म्हणून त्याने हंबरडा फोडला आणि त्याने चितेमध्ये उडीच घेतली. तो होरपळला गडगडत बाहेर फेकला गेला. त्याला दवाखान्यात नेले, पण काही दिवसांनी तोही लोकमान्यांच्याच वाटेवर निघून गेला.

संध्याकाळचे ७ वाजले तरीही त्याची शुद्ध कुणाला नव्हती. टिळकांच्या महानिर्वाणाचे हे दृश्य ‘याचि डोळा’

अनुभवणारे नाना कुलकर्णी लिहितात, “आम्ही त्या रात्री १० वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पायावर उभेच होतो. अखेर शेवटचा घाला झाला. मन सुन्न झाले. हृदयात काय होत होते, हे सांगताही येईना. पावसाच्या धारा कोणत्या आणि अश्रूच्या धारा कोणत्या, हे समजेना, अग्निसंस्कार झाला, पण चौपाटीवरून पायच निघेना.”

जगभरातल्या अनेक वर्तमानपत्रांनी टिळकांना आदरांजली अर्पण केली. मृत्युलेख लिहिले, पण अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी लिहिलेला अग्रलेख त्यातला सर्वोत्तम. खरे तर टिळक जाण्यापूर्वी त्यांचे आणि टिळकांचे भांडण होते, तरीही टिळकांबद्दल असलेले अपार प्रेम संदेशकारांना अस्वस्थ करत होते. त्यांच्या लेखणीला शब्दांचा महापूर आला होता. या महापुरात ते फक्त टिळकांना शोधत होते आणि म्हणत होते,

” लोकमान्य, तुम्हाला आता कुठे पाहू? तुमची सावळी मूर्ती कुठे अवलोकन करू? तुम्हाला कुठे शोधू? तुम्हाला कुठे धुंडाळू? आमचा जीव तुमच्या जीवाशी गोठलेला होता. आमचा प्राण तुमच्या पंचप्राणांचा भाग होता. आमचे अस्तित्व तुमच्या अस्तित्वात गुरफटून गेले होते. आमचे जीवन तुमच्या जीवनात गुंतलेले होते. लोकमान्य! आता तुम्ही आम्हाला कुठे सापडाल? कुठे दिसाल? तुम्ही जात असताना आमच्या जीवनाला ओढणी लागलेली आहे. आमच्या प्राणांना क्लेष पडत आहेत. काट्याच्या जाळ्यावरून ज्याप्रमाणे रेशमी वस्त्राला फराफरा ओढावे, त्याप्रमाणे आमच्या हृदयाच्या चिरफाळ्या झालेल्या आहेत. लोकमान्य, आमचे प्राण तुमच्या स्वाधीन ! आमचे मन तुमच्या स्वाधीन ! आमचे जीवन तुमच्या स्वाधीन ! “

“ लोकमान्य, आम्ही, तुमचे तुम्ही आमचे आहात ! बोला, काय वाटेल ते सांगा, वाटेल ती आज्ञा करा, वाटेल तो हुकूम फर्मावा, आणि बोला, तुम्हाला कुठे शोधू? लोकमान्य, आम्ही तुम्हाला कुठे शोधू? आमचा वीर, हा आमचा हिरो, हा आमचा प्राण, हा आमचा लोकमान्य ! इतका सर्वव्यापी होता की, त्याने या महाराष्ट्रातील चर आणि अचर, सजीव आणि अजीव, सचेतन आणि अचेतन, इतकेच काय पण या महाराष्ट्रातील मानव, देव, किन्नर, विभूती या महाराष्ट्रातील साधू, संत, योगी, तपस्वी या महाराष्ट्रातील जल, स्थल, पाषाण, तरु, लता, उद्यान, पुरेपूर व्यापून टाकले होते. आमच्या लोकमान्या, लोकांच्या लोकमान्या, महाराष्ट्राच्या लोकमान्या, तुझ्याशिवाय जीवाला ओढणी का रे लागते। लोकमान्या, तुझ्याशिवाय जीव तुटतो रे।”

“ ४० वर्षांपर्यंत इथल्या जनतेला वेड लावणाऱ्या जादुगारा, लोकमान्या, यावेळी आम्हाला सोडून चाललास? जनतेच्या जनतानंदा या शोकसागरात आम्हाला लोटलेस? लोकांच्या प्रेमातील लोकमान्या, अश्रूच्या दर्यात आम्हाला टाकून दिलेस? देशबांधवांच्या कैवल्या, आम्हा सर्वांना विलाप करायला ठेवलेस? भारत देशाच्या कुलदीपक तिलका. आम्हास असाहय्य दीन, अनाथ केलेस? बोला, लोकमान्य बोला! राग टाकून बोला, पूर्वप्रेमाच्या सर्व स्मृतींनी बोला की, तुमच्या विरहावस्थेत या तुमच्या महाराष्ट्राने काळ कंठावा तरी कसा?…

कारण लोकमान्या, तू गेलास आज तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा शिवाजी गेला आहे! तू गेलास, तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा अर्जुन गेला आहे! लोकमान्य बाळ गंगाधर, तुम्ही गेलात ते तुमच्याबरोबर महाराष्ट्राची ज्ञानेश्वरी, महाराष्ट्राचे महाभारत, महाराष्ट्राचे रामायण, लुप्त होऊन गेलेले आहे! आम्ही हजारो प्राणी तुमच्या जागी नेण्यास योग्य होतो. पण, तुमचीच निवड करताना परमेश्वराने महाराष्ट्राचे कोणते हित पाहिले? “

त्या रात्री गर्दी ओसरल्यावर अनेकजण पुन्हा टिळकांच्या चितेजवळ गेले. त्यापैकी अनेकांनी टिळकांची ती राख एका पुडीत घेतली. ती पुडी हृदयाशी लावली. काहींनी चांदीच्या, सोन्याच्या डबीत तिला जन्मभर जपून ठेवले. टिळकांवर अंत्यसंस्कार जरी मुंबईत झाले, तरीसुद्धा पुढचे क्रियाकर्माचे संस्कार मात्र पुण्यातच पार पडले. १२ जुलै रोजी टिळक पुण्याहून मुंबईला निघाले होते, ते स्वतःच्या पायावर चालत. पण, आता ३ ऑगस्ट रोजी त्यांच्या अस्थी पुण्यात आणल्या जात होत्या स्पेशल ट्रेनने, फुलांच्या माळांनी सजवलेल्या चंदनाच्या पेटीत, एका चारचाकी रथात टिळकांच्या अस्थी पुण्यात आणल्या गेल्या.

केळकर लिहितात,

” जाताना ते आपल्या साडेतीन हात देहाने बाहेर पडले, पण येताना ते अंगुष्ठमात्र देहाने आले. जाताना त्यांनी अंगात नेहमीचा पोशाख घातला होता, येताना त्यांनी चिताभस्माचे रूप धारण केले होते. जाताना ते आपल्या पायांनी गेले, येताना ते एका वितभर चांदीच्या पेटीत निजून आपल्या परिचारकांच्या खांद्यावर बसून आले. जाताना त्यांचा सर्व ऐहिक व्याप त्यांच्या डोक्यात घोळत होता, येताना त्या सर्व व्यापांचा त्यांनी त्याग केलेला होता. जाताना ते वासनापूर्ण होते, येताना त्यांनी सर्व वासना टाकून दिल्या होत्या. जाताना ते लोकांविषयी बोलत होते, येताना त्यांनी स्वतः शाश्वत मौनव्रत स्वीकारले असून सर्व लोक मात्र त्यांच्याविषयी बोलत होते. जाता जाता त्यांनी टिळकपूर्ण असे पुणे सोडले, येताना त्यांनी टिळकशून्य अशा पुण्यात प्रवेश केला.”

ज्या दिवशी लोकमान्यांना तिलांजली देण्याचा विधी झाला, त्या दिवशी लोकमान्यांच्या पिंडाला कावळा लवकर स्पर्श करेना. पण, यात वेगळे काहीच नाही, असे म्हणत यावर अच्युत बळवंत लिहितात,

” टिळकांच्या पिंडाला स्पर्श कसा होणार? लोकमान्यांनी केलेल्या एवढ्या मोठ्या संकल्पात कोणकोणत्या इच्छा भरलेल्या होत्या? कोणकोणते बेत गूढ स्वरूपात होते? कोणकोणत्या योजना परत राहिलेल्या होत्या व कोणकोणत्या महत्त्वाकांक्षा अपुऱ्या राहिलेल्या होत्या, त्याचा शोध आता कसा लागणार? असा कोणता पराक्रमी पुरुष आहे की ज्याच्या सगळ्या इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील? श्री शिवाजी महाराजांच्या सर्व इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील काय? नर्मदातीरी वारलेल्या बाजीरावांच्या इच्छा परिपूर्ण झाल्या असतील का? सिकंदर किंवा पिटर दि ग्रेट इच्छा परिपूर्ण होऊन मेला असेल काय? आहो, पराक्रमी पुरुषांचे लक्षणच हे आहे की, त्यांच्या इच्छा कधीही पूर्ण झालेल्या नसतात. पराक्रमी लोकांच्या इच्छा भरधाव दौडीने धावत असल्याकारणाने त्या इच्छा परिपूर्ण करणे, हे एका आयुष्याला अशक्यच आहे! एका आयुष्यात इच्छा परिपूर्ण होतील तो कदाचित शहाणा असेल, पण पराक्रमी कधीही असणार नाही. आपल्या राष्ट्राचे अपरिमित वैभव इच्छिणारे जे लोकमान्यांसारखे पराक्रमी पुरुष असतात, त्यांच्या इच्छा अपरिमित असणे हेच त्यांना भूषण! आणि इच्छा अपरिमित असल्या की त्याची तृप्ती कुठून होणार? लोकमान्यांच्या पिंडाला काकस्पर्श लवकर झाला नाही, तो याच कारणामुळे होय.”

” टिळकांवर लोकांचे खरे प्रेम असेल तर ‘लोकमान्य’ ही पदवी त्यांनी अनंत काळापर्यंत अनन्यसामान्यच ठेवली पाहिजे. ‘लोकमान्य’ या शब्दाने यापुढील हिंदुस्तानच्या इतिहासात कोणाही कितीही मोठ्या व्यक्तीचा उल्लेख होता कामा नये.” 

केळकरांनी ही अपेक्षा व्यक्त करून १०० वर्ष झाले. टिळक जाऊन १०० वर्ष झाले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केलेली ती सिंहगर्जना त्यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने पुन्हा एकवार आठवावी, आळवावी या हेतूने केलेले हे टिळकांच्या सिंहगर्जनेचे सिंहावलोकन !

लोकमान्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक हे समीकरण इथून पुढेही जोवर मराठी भाषा जिवंत असेल, तोवर टिकून राहो, लोकमान्यांच्या विचारांना कृतिशीलतेची पावले लाभोत आणि टिळकांचे विचार चिरंजीव होवोत, या चिमण्या प्रार्थनेसह ‘सिंहगर्जनेचे सिंहावलोकन’ इथेच पुरे करतो… 

– समाप्त –

लेखक : श्री पार्थ बावसकर 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गुंडाळी पोळी… – लेखक : श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ गुंडाळी पोळी… – लेखक : श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

शनिवारची शाळा म्हणजे अफाट आनंद. सकाळची शाळा, तीही अर्धा दिवस. दुसऱ्या दिवशी रविवार म्हणजे अमर्याद सुख. शाळेतून परत येताना नुसता धुडगूस. बेस्ट च्या १७१ क्रमांकाच्या दुमजली बसच्या वरच्या मजल्यावर, एकदम पुढच्या आसनावर,  खिडकीसमोर बसून वारा खात केलेला भन्नाट प्रवास. काहीतरी वेगळंच वाटत राहायचं. शनिवार रविवारची ही महती अगदी आजतागायत तशीच, काळ गोठल्यागत.

शनिवारचा मधल्या सुट्टीचा डबा म्हणजे पण काहीतरी वेगळाच अनुभव. कधी पोळीचा लाडू, कधी sandwich, कधी पोह्याचा चिवडा, कधी सुकी भेळ. तेव्हाचा तो quick bite. हा खाऊ पट्कन गिळून शाळेच्या प्रशस्त मैदानावर खेळण्यासाठी जाण्याची प्रचंड घाई. कधीकधी  पैसे मिळायचे खाऊसाठी, पण मर्यादित. आमच्या शाळेचं कॅन्टीन फार  भारी होतं. हॉट डॉग या प्रकाराशी तिथेच पहिल्यांदा ओळख झाली.

तो प्रकार मात्र आम्ही लांबूनच बघायचो. आमची झेप वडापाव नाहीतर इडली चटणी, इथपर्यंतच मर्यादित. काही सुखवस्तू घरातली, इंग्रजी माध्यमातली मुलं चवीपरीने तो पदार्थ खाताना आम्ही बघायचो आणि कोण हेवा वाटायचा त्या पदार्थाचा आणि तो खाणाऱ्या त्या मुलांचा सुद्धा!

पोरांच्या अलोट  गर्दीत प्रचंड लोटालोट करून हस्तगत केलेला वडा पाव  म्हणजे अगदी दिग्विजय . तो तिखटजाळ वडापाव खाऊन झाल्यावर,  नळाखाली ओंजळ धरून पाणी पिण्यात कोणालाच काही वावगं वाटायचं नाही. आज असं नळाचं पाणी पिणं म्हणजे महापाप. पोरांना बाटलीबंद  किंवा अति शुद्ध केलेल्या पाण्याची सवय. ती किती योग्य, किती अयोग्य यावर भाष्य करणे कठीण, पण आम्ही असं नळाचं पाणी पितच वाढलो, हे मात्र निर्विवाद सत्य.

कधीतरी अवचित, डब्यात गुंडाळी पोळी असायची. गुंडाळी पोळीत बहुतेक वेळा साजूक तुपाचा नाजूक लेप आणि त्यावर पिठी साखरेची पखरण असायची. पोळी गुंडाळून त्याचे दोन तुकडे केले जायचे आणि असे चार पाच तुकडे म्हणजे अगदी भारी काम असायचं. कधी पोळीवर साखरांबा नाहीतर गुळाम्बा पण लेपन होऊन यायचा. तेव्हा बाटलीबंद जॅम चा जमाना सुरू नव्हता झाला आणि हा घरगुती जॅम म्हणजेच परमोच्च बिंदू असायचा चवीचा, आईच्या किंवा आजीच्या मायेचा स्पर्श लाभलेला. जेव्हा wrap संस्कृती अस्तित्वात आलेली नव्हती, तेव्हा आईच्या हातचा हा मायेचा wrap मनाला आणि जिभेला सुख देऊन जायचा.

आजही या  गुंडाळी पोळीचा आस्वाद घेतच असतो मी वेळोवेळी. गरमागरम पोळीवर कधी तूप साखर,  तर कधी लसणीच्या कुटलेल्या तिखटाचा लेप लेऊन किंवा आंब्याच्या लोणच्याचा खार सोबत घेऊन जेव्हा हा साधासुधा पदार्थ समोर येतो तेव्हा चाळवलेल्या भुकेचं शमन तर होतंच पण  विस्मृतीत जाऊ पहात असलेल्या सुखकारक आठवणी पण सुखद समाधान देऊन जातात. तो काळ आणि रम्य भूतकाळ आज समोर येताना अतीव सुखाचं निधानच घेऊन येतो हे मात्र नक्की.

 

लेखक : श्री पराग गोडबोले

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “लाडकी बायको…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “लाडकी बायको…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

.. वसुधा  पुस बरं ते डोळे.. तुला असं रडताना पाहून मला खूप यातना होतात गं…खरंच मला खूप वाईट वाटतयं मी तुझ्याशी लग्न केल्यापासून नीट वागायला हवं होतं.. सतत तुला मी रागावत होतो, चिडत होतो..माझं तुला कधीच काहीही पटत नव्हतचं… त्यात तुझे माहेरचे ते सगळे दिड शहाणे माझ्यापासून काडीमोड घे म्हणून सांगत होते.. मी एव्हढा मानसिक त्रास देत असताना.. तरीही तू मला सोबत राहिलीस.. जे मी मिळवून आणत होतो त्यात तूच समाधानी राहत होतीस नि मला अर्धपोटी ठेवत होतीस.. काटकसरीचा संसाराचे धडे मला गिरवायला दिलेस पण तू मात्र ऐषआरामी दिवस काढलेस.. मला सारं दिसत होतं, कळत होतं.. पण मी त्यावरून तुला साधं काही न विचारता भांडण तंटा, वादविवाद करत राहिलो तुझ्याशी… तुम्ही माझी हौसमौज भागविणार नाही तर मग शेजारचे जोशी, मराठे येणार काय मला हवं नको विचारायला असं जेव्हा तू डोळयात पाणी आणून विचारत असायचीस तेव्हा माझी तळपायाची आग मस्तकात जायची… असं असूनही तुझं माझ्यावर खरं प्रेम करत राहिलीस?.. आणि मी शंका घेत घेत खंगत गेलो… अशक्त झालो.. माझ्या सेवा करण्याच्या नावाखाली तुझा चंगळवाद अधिकच फुलून येत होता… मी तुला एकदा चांगलेच धारेवर धरले देखिल.. पैसै काही झाडाला लागत नसतात गं.. निदान मिळकत पाहून तरी खर्च, उधळपट्टी करत जा म्हणून त्यावर तू फणकाऱ्यानं म्हणालीस.. तुमच्या पैश्याची मला आता गरजच नाही  माझ्या खात्यात आता दरमहा  1500/रुपये लाडकी बहीण योजनेमार्फत जमा होत आहेत, शिवाय एस. टी. चं अर्ध तिकिटात माहेराला जाता येतेयं, शिलाई मशीन आता फुकटात घरी येणार आहे, मुलींच्या शाळेची फी माफ झाली आहे… वेळ पडलीच तर मी ब्युटी पार्लर चा छोटा व्यवसाय महिला स्टार्टअप मधून सुरू करेन.. आता नवऱ्याच्या मिजाशीवर जगण्याचे दिवस कधीच संपले.. तेव्हा तुम्ही आता तुमचं तेव्हढं बघा…. तुझ्या त्या सरकारला बरी या लाडक्या बहिणीची त्या बदमाष भावाची काळजी घेता आली.. आणि आम्ही नवऱ्यानं काय घोडं मारलं होतं त्या सरकारचं… आमच्याच पगारातून तो प्रोफेशनल टॅक्स, इन्कम टॅक्स, भरमसाठ कापून घेऊन, आयजीच्या जीवावर बायजी उदार झाल्याचा सरकार आव आणतयं अशी सरकारी योजना पाहून माझा संताप संताप झाला आहे… आता मी देखील सरकारनं लाडकी बायको हि योजना कधी आणतील याचीच वाट बघून राहिलो आहे… ती योजना आली कि मग मी पण तुझ्या मिजाशीवर, तालावर नाचायला पळभरही थांबणार नाही… मग बसं तू तुझ्या माहेरीच सगळ्या लाडक्या योजनांच्या राशीत लोळत… आणि मी आणि सरकारी योजनेतील लाडकी बायको घरी आणून  तिच्या बरोबर सुखाने संसार सुरू करतो… 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आईच्या बोलण्यातही तथ्य आहेच हे मला नाकारता येईना.खरंच.देवापुढे हात जोडून मनोमन संकल्प सोडताना माझ्या ध्यानीमनीही नव्हते की हा आपला बँकेतला जॉब आहे. तो ट्रान्सफरेबल आहे. कुठेही कधीही बदली होऊ शकेल. तेव्हा काय करायचं? बारा वर्षांचा दीर्घकाळ आपण याच परिसरात थोडेच रहाणार आहोत? पुढे नाही जमलं तर?’

या जर-तरच्या गुंत्यात मी फार काळ अडकून पडलो नाही. तरीही ही संकल्पसिद्धी सहज सोपी नाहीय याची प्रचिती मात्र पुढे प्रत्येक पावलावर मला येणार होतीच.)

पुढे चार-पाच महिने काहीच अडसर आला नाही. प्रत्येकवेळी पौर्णिमेला कधी पहाटे लवकर तर कधी ते जमलं नाही तर कितीही उशीर झाला तरी बँकेतली कामं आवरुन संध्याकाळनंतर उशिरा बँकेतून परस्पर नृ.वाडीला जायचं हे ठरुनच गेलं होतं.बसला पौर्णिमेदिवशी गर्दी असल्याने जातायेताचे दोन्ही प्रवास उभं राहूनच करावे लागायचे.पण त्या धावपळीचा कधी त्रास जाणवला नाही.तरीही मी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठून आंघोळ-पूजा आवरायला लागल्याचे पाहून सुरुवातीला आईच मला समजवायची. म्हणायची,

“हे बघ,अगदी पौर्णिमेलाच जायला हवं हा अट्टाहास कशासाठी? पंचमीपर्यंत गेलं तरी चालतं. विनाकारण ओढ नको करत जाऊस.जे करशील ते तब्येत सांभाळून कर.ते महत्त्वाचं”

ती सांगायची त्यात तथ्य होतंच.पण अगदी जमणारच नसेल तर गोष्ट वेगळी असं मला वाटायचं.नाहीच जमलं तर पंचमीच्या आत जायचं आहेच की. पण ते अगदी अपरिहार्य असेल तेव्हाच.तो आपला हुकमाचा एक्का.जरुर पडली तरच वापरायचा. शक्यतो नाहीच.आपल्या सोयीसाठी म्हणून तर नाहीच नाही.’दर पौर्णिमेला मी दर्शनाला येईन’ असा संकल्प केलाय तर शक्यतो पौर्णिमेलाच जायचं हे मी ठरवूनच टाकलं होतं.शेवटी हातून सेवा घडवून घ्यायची की नाही ही ‘त्या’ची इच्छा हाच विचार मनात ठाम होता!

सगळं व्यवस्थित सुरु झालं होतं. पण…? जूनच्या पौर्णिमेचं दत्तदर्शन झालं आणि ध्यानीमनी नसताना १जुलैला अगदी अचानक मला ‘Designated post’ आॅफर करणारी,माझं ‘ब्रॅंच मॅनेजर’ म्हणून महाबळेश्वर ब्रॅंचला पोस्टींग झाल्याची आॅर्डर आली.तीही ताबडतोब रिलीव्ह होऊन ४ जुलैच्या आत  महाबळेश्वर  ब्रॅंचला हजर होण्याचा आदेश देणारी!

वरवर पहाता खूप आनंदाने साजरी करावी अशी ही घटना होती. राष्ट्रीयकृत बँकांच्या नियमानुसार यापुढील प्रमोशन्ससाठी किमान एक टर्म रुलर ब्रॅंचला काम करणं अपरिहार्य होतंच.अनेकजण अतिशय गैरसोयीच्या खेडेगावी पोस्टिंग झाल्याने सर्वार्थाने खचून गेल्यामुळे जाॅब सॅटीस्फेक्शन अभावी नैराश्याने ग्रासलेले असायचे. या पार्श्वभूमीवर मला रुलर पोस्टिंग मिळालं होतं ते महाबळेश्वरसारख्या हिल स्टेशनवरच्या ब्रॅंचमधलं! हे आॅफीसमधे सर्वांच्याच कौतुकाचा विषयही ठरलं होतंच. पण ते आनंददायी असलं तरी त्या क्षणापर्यंतचं माझं शिस्तबध्दपणे सुरु असलेलं एकमार्गी रुटीन मात्र या घटनेने पूर्णत: ढवळून निघालं. कारण ही आकस्मिक घटना त्या क्षणापुरतीतरी माझ्यासाठी असंख्य प्रश्न निर्माण करणारीच ठरली होती. मनात गर्दी करुन राहिलेल्या त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात पुढचे दोन तीन दिवस कापरासारखे उडून गेले.

माझा मुलगा सलिल तेव्हा चार वर्षांचा होता.तो बालवाडीत जायला लागल्याने आरतीने, माझ्या पत्नीने,एम.ए.नंतर लगेच करता न आलेलं, खूप दिवस मनात असलेलं बी.एड्. करण्यासाठी काॅलेजला अॅडमिशन घेतलेली होती.प्रश्न एक वर्षाचाच होता पण त्यात ही ट्रान्स्फर आॅर्डर आलेली.तिच्या मनातली अस्वस्थता पाहून कांहीतरी ठाम निर्णय मलाच घ्यावा लागणार होता.

“हे बघ,तुला मेरीटवर गव्हर्मेंट काॅलेजमधे अॅडमिशन मिळालीय ना?मग तात्पुरत्या अडचणींचा विचार करुन माघार घेऊ नको.वर्षभर मी तिकडे एकटा राहीन.इथलं सगळं योग्य नियोजन करुन कसं निभवायचं ते शांतपणे विचार करुन ठरवूया.”

तिला दिलासा द्यायला माझे शब्द पुरेसे होते.पण तरीही..

” तिथं तुमच्या जेवणाचं काय ?तब्येतीची हेळसांड होईल ती वेगळीच.नकोच ते.”

“माझं काय करायचं ते तिथं गेल्यानंतर परिस्थिती पाहून ठरवता येईल.आणि तसंही तिथल्या धुवांधार पावसाचा विचार करता पावसाळा संपेपर्यंत तरी आपल्याला कोल्हापूरहून शिफ्टिंग करता येणार नाहीच. तोवर तुझी पहिली टर्म पूर्ण होत आलेली असेल.मग दुसऱ्या टर्मपुरताच तर प्रश्न राहील.थोडा त्रास होईल पण निभेल सगळं.”   

ठामपणे निर्णय घेतला खरा पण तो निभवायचा कसा हा यक्षप्रश्न माझ्यापुढे ‘आ’ वासून उभा होताच.हेच उलटसुलट विचार मनात घेऊन ४ जुलैला जुजबी सामान सोबत घेऊन मी पहाटेच्या महाबळेश्वर बसमधे चढलो.बस सुरु झाली,घराबरोबर गावही मागं पडलं.तेच एकटेपण मनात घेऊन श्रांतपणे मान मागे टेकवून अलगद डोळे मिटणार तेवढ्यात कंडक्टर तिकिटासाठी आलाच.मी खिशातून पाकीट काढून पैसे दिले.त्यानं दिलेलं तिकीट न् सुटे पैसे पाकीटात ठेवत असतानाच आत निगुतीने ठेवलेला,बाबांनी मला कधीकाळी दिलेला ‘तो’ दत्ताचा फोटो मला दिसला न् मी दचकून भानावर आलो.गेले दोन -तीन दिवस मला गुंतवून ठेवणाऱ्या सगळ्या व्यवधानांत मी माझ्या दर पौर्णिमेला दत्तदर्शनासाठी नृ.वाडीला जायच्या संकल्पाचा विचार कुठंतरी हरवूनच बसलो होतो याची आठवण त्या फोटोनेच करुन दिली आणि त्याच संकल्पाचा विचार एक प्रश्न बनून मनाला टोचणी देत राहीला. खरंतर हा प्रश्न तातडीचा नव्हता. जुलैमधल्या पौर्णिमेला अजून किमान तीन आठवडे बाकी होते.पण तरीही..? हे दर महिन्याला नित्यनेमाने तिथून नृ.वाडीला येणं आपल्याला जमेल? मनातले इतर सगळे प्रश्न,सगळ्या विवंचना,नवीन ब्रॅंच कशी असेल,तिथला स्टाफ कसा असेल या विचारांचं उत्सुकतेत लपलेलं दडपण हे सगळं दूर सारत पौर्णिमेच्या नित्यनेमाबद्दलचा ‘हे निर्विघ्नपणे पार पडेल?’ हाच प्रश्न मनात ठाण मांडून बसला.मग पूर्ण प्रवासभर मनात त्यासंबंधीचेच विचार.

महाबळेश्वरपासून नृ.वाडी पर्यंतचं अंतर (त्याकाळी) साधारण सात-साडेसात तासांचं होतं.जातायेताचे पंधरा तास लागणार असतील,तर  पौर्णिमेलाच जायचा अट्टाहास चालणार कसा? पौर्णिमा कांही रविवारीच नसणाराय.मग? असू  दे.जमेल तितके दिवस यायचंच हे पक्कं ठरवूनच टाकलं.त्याच क्षणी ते कसं जमवायचं याचे विचार सुरु झाले.त्यासाठी ‘जे जे करावं लागेल ते ते कर्तव्य न् जबाबदाऱ्या यांच्याबाबतीत कोणतीही तडजोड न करता करायचं ‘ हा निर्धार पक्का झाला.ते कसं करायचं ते पुढचं पुढं.अशा मगळ्या उलटसुलट विचारांच्या गुंत्यात महाबळेश्वर स्टॅन्ड कधी आलं ते मलाच समजलं नाही. सगळं सामान कसंबसं एका हातात घेऊन आणि दुसऱ्या हातात लहान बॅगेसोबतच जमेल तशी छत्री धरायचा प्रयत्न करीत मी बसच्या पायऱ्या उतरू लागणार तेवढ्यात तिथेच थबकलो.कारण समोर माझ्या स्वागतालाच आल्यासारखा प्रपाताप्रमाणे  कोसळणारा अखंड पाऊस माझ्याकडे पाहून जणू विकट हास्य करीत माझी वाट अडवून ओसंडत होता. माझ्याइतकीच हतबल झालेली सोबतची छत्री न् सामान कसंबसं सावरत मी त्या भयावह धुवांधार प्रपाताला सामोरा गेलो ते  मनातल्या ‘त्या’च्या विचाराचं बोट घट्ट धरुनच!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बाप आहे म्हणून…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ “बाप आहे म्हणून” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

काही दिवसापूर्वी मी पुण्यात असताना एका महत्वाच्या मिटिंग बसलो होतो. माझ्या सोबत चारजण क्लासवन दर्जाचे अधिकारी बसलेले होते. तर काही उद्योजक आणि समाजसेवक ही होते. एका मोठ्या कार्यक्रमाच्या संदर्भात आमचं बोलण सुरु झालेलंच होतं. आणि तेवढ्यात माझा फोन व्हायब्रेट व्हायला लागला. फोन समोरच असल्यामुळे माझं लक्ष स्क्रिनवर गेलं. फोन माझ्या वडिलांचा होता. मी सर्वाना चेहऱ्याने खूणवून विनंती केली आणि फोन उचलला.

आणि मी एकदम मोठ्या आवाजात म्हणलं “बोला अण्णा काय म्हणताय..”तर पलीकडून अण्णा म्हणले “कुठ हाईस..? “ मी म्हणलं,पुण्यात आहे अण्णा जरा मीटिंग मध्ये आहे.अण्णा म्हणाले “ते असू दे, काय खाल्लास का बाबा का पोटाला..?  मी होय म्हणलं.. अण्णांनी फोन ठेवला..आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं.. आणि लगेच पाच मिनिटांनी पुन्हा अण्णांचा फोन आला..मी पुन्हा सगळ्यांना थांबवलं आणि फोन घेतला…पलीकडून आण्णा म्हणाले “ हे बघ येताना किलोभर बोंबील आणि सुकट घेऊन ये. तुझ्या त्या खडकीच्या दोस्ताकडणं ..मी बर अण्णा म्हणलं…परत फोन ठेवला…मीटिंग सुरू झाली..आणि परत लगेच दोन मिनिटांनी अण्णांचा परत फोन आला..मी शांतपणे पुन्हा फोन घेतला..पलीकडून अण्णा म्हणाले, “आर टिव्हीचा रिचार्ज संपलाय तेवढं बॅलन्स मार त्यावर लगेच…” मी होय आण्णा म्हणून फोन ठेवला आणि ताबडतोब बॅलन्स टाकला..

तर लगेच परत फोन आला..अण्णा परत म्हणले “ हम्म आलाय आलाय बॅलन्स चालू झालं..” मी बर अण्णा म्हणून फोन ठेवला..सगळ्यांना सॉरी म्हणून मी बोलायला सुरू होणार तेवढ्यात परत फोन आला…मी परत फोन घेतला आणि अण्णांनी विचारलं “ आरं ती भारताची मॅच कवा हाय..साऊथ आफ्रिका सोबत हाय नव्हं आता..त्यावेळी वल्डकप सुरू होता..अण्णांना क्रिकेटचा जरा नाद आहे.मी बाजूच्या एकाला विचारलं, “सर कधी आहे ओ साऊथ आफ्रिकेसोबत आपली मॅच..??? त्याने तर तोंडावरचा राग लपवत सांगितलं की उद्या आहे मॅच म्हणून….मी तसंच अण्णांना सांगितलं…मग अण्णांनी परत फोन कट केला…

चार पाच वेळा एका दमात फोन झाल्याशिवाय आण्णा शांत बसत नाहीत ही सवय मला माहित होती.आता दोन तास तरी त्यांचा फोन येणार नाही याची खात्री मला झाली आणि मी पुन्हा सर्वांना बोललो सर आता करा सुरू…  माझ्या त्या फोनमुळे वातावरण जरा बदलले होते याची जाणीव मला झाली होती..पण मी काय लै लोड घेतला न्हाय..मीटिंग संपली..

मीटिंग संपल्यावर नाष्टा आला..नाष्टा करताना सगळेजण त्यांच्या फोनवर आलेले मिसकॉल पाहत होते.आणि मला ते समजावे म्हणून एकमेकांना कॉल आलेले दाखवत होते.माझ्या ही फोनवर सात ते आठ अनोळखी नंबर वरून आलेले मिस कॉल दिसत होते…मी मात्र त्याकडे दुर्लक्ष करून नाष्टा पोटात ढकलू पाहत होतो..

त्यातला एकजण मला म्हणाला, दादा एक बोलू का? रागावू नका पण मीटिंग सुरू असताना फोनवर लै बोलला तुम्ही..आणि वडिलांचाच तर फोन होता आणि एवढं काय महत्वाचं ही नव्हतं.. तुम्ही मिटिंग संपल्यावर ही बोलू शकला असता त्यांना.? त्याच्या सुरात सगळ्यांनी सुर मिसळला आणि शांतपणे ते सर्वजण माझ्यावर राग व्यक्त करू लागले.

त्या सगळ्यांचं बोलण झाल्यावर मी फक्त इतकंच म्हणलं…

आज बापाचा आपल्याला दिवसातून हजारवेळा कॉल येतोय यासारखी सुंदर गोष्ट जगात दूसरी कुठलीच नाही साहेब …आणि साहेब मी जर फोन उचलला नसता ना तर किमान दोन तास तरी माझा बाप माझ्या काळजीत तडफडला असता..साहेब आज बापाचा फोन येतोय उद्या भविष्यात बाप निघून गेल्यावर या नंबर वरून कॉल येणार नाही..हा काळजी असणारा आवाज कानावर पडणार नाही.. आणि साहेब मिटिंग,कार्यक्रम वैगेरे होतच राहतील…माझं बोलणं सुरू होतंच तेवढ्यात अण्णांचा परत फोन आला…मी पटकन उचलला आणि स्पिकरवर टाकला…अण्णा जोरात बोलत म्हणाले,

“आर बोंबील घेताना खारा मासाबी जर चांगला भेटला तर किलोभर घेऊन ये..तोंडाला चव येईना लका…मी शांतपणे होय म्हणाल्यावर फोन ठेवला…

त्यावेळी अचानक समोरच्या खुर्चीत बसलेले परांजपे सर एकदम लहान मुलासारखे रडू लागले..सगळेजण शांत झाले…डोळे पुसत ते म्हणाले, चंदनशिवे खरं आहे तुमचं…मी आयुष्यात काय गमावून बसलोय याची आज तुम्ही मला जाणीव करून दिली.पण आता वेळ निघून गेली ओ.. आता नाही येत फोन माझ्या वडिलांचा. कारण वडीलच गेले ओ निघून पार पार दूर निघून गेले. रेंजच्या बाहेर गेले.सगळ्याचे डोळे पाणावले. आणि गंमत म्हणजे ज्यांचे वडील रेंज मध्ये आहेत त्यांनी त्यांनी आपापल्या वडिलांना फोन करायला सुरवात केली. का कुणास ठाऊक पण सर्वजण अगदी लहान मुलासारखे बापाशी बोलू लागले. मात्र परांजपे सरांचा हंबरडा आतल्या आत हंबरत राहिला.

आम्ही बाहेर पडलो.सगळेजण त्यांच्या त्यांच्या गाडीतून निघून गेले. आणि मी माझ्या खडकीच्या मित्राला म्हंजे रुपेशला फोन केला..पलीकडून रूप्या शिवी देतच म्हणाला काय रे नालायक माणसा आज आठवण आली का तुला??. मी पण तसाच शब्द फिरवत म्हणलं, नालायका कोथरूडला ये ना बोंबील, सुकट आणि खारा मासा घेऊन.. आण्णाने घेऊन यायला लावलं आहे. तसा रुप्या हसत म्हणाला मी तुला फोन करणारच होतो कारण अण्णांचा मला फोन आला होता मघाशीच.. येतो घेऊन थांब तिथंच…तासाभराने रुप्या सगळं घेऊन आला.मी मात्र त्या बोंबलाच्या दरवळनाऱ्या वासात अण्णांचा हसरा चेहरा शोधू लागलो..

मित्रहो, बापाचा फोन येतोय ना.. येतोय ना..तर दुनिया गेली उडत..बापाचा फोन उचलायचा आधी..तुमची मिटिंग, तुमचं ऑफिस कुठेही पळून जाणार नाहीय. दुनिया जिथं आहे तिथंच असणार आहे.पण केव्हा ना केव्हा तरी बाप जाणार आहे रेंजच्या बाहेर. तिथून बाप फोन करू शकणार नाहीय. त्यावेळी कितीही तडफडून वाट बघितली तरी स्क्रिनवर हा नंबर येणार नाहीय. म्हणून दोस्ता दुनियेला जरा वाळत घालायचं आणि बापाच्या प्रेमात ओलं होऊन जायचं. बस्स इतकंच सांगायचं होतं.वाचून झालं असेल तर पहा वडिलांचा मिस कॉल पडलाय का? चला लावा बरं फोन आपल्या बापाला वाट पाहतोय ना तो तुमच्या फोनची…

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक  !” भाग –१ —लेखक : श्री पार्थ बावसकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

(२३ जुलै १८५६ – १ अगस्त १९२०)

☆ “इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक  !” भाग –१ —लेखक : श्री पार्थ बावसकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

कुणी चितेजवळ रडत होतं, कुणी राख छातीशी घेत होतं : टिळक गेले त्या वेळची गोष्ट…

“आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिळक!”

“हजारो लोक मुंबईच्या सरदारगृहापुढे रस्त्यावर उभे होते. अखेर मध्यरात्र उलटली. १२ वाजून गेले. १ ऑगस्ट १९२०चा दिवस सुरु झाला आणि थोड्या वेळानेच लोकमान्यांचे देहावसान झाल्याची बातमी कोणीतरी लोकांना सांगितली. त्या क्षणी त्या प्रचंड जनसमुदायाच्या तोंडून शोकाचे आणि दुःखाचे विदारक उद्गार बाहेर पडले. त्याचे स्मरण झाले की, अजूनही अंगावर कंप उठतो. काही लोक तर धाय मोकलून रडले. ज्यांचे डोळे पाण्याने भरुन आले नाहीत, असा एकही माणूस त्या जनसमुदायात आढळला नसता. लोकमान्यांच्या मृत्यूची बातमी एखाद्या वाऱ्याप्रमाणे मुंबई शहरात ताबडतोब पसरली, मग रात्री झोप कोणाला येणार? लोकमान्यांची आठवण करून सारी मुंबईनगरी त्या रात्री अक्षरशः ढळाढळा रडली, असे म्हटले तर त्यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती होऊ नये.”

टिळक गेल्यानंतरचे हे उद्गार आहेत आचार्य अत्रेचे!

ते स्वतः त्या गर्दीचा एक भाग होते.

टिळक गेल्याचे समजले आणि गर्दी आणखीन वाढली.

त्याच रात्री मुंबईत गडकऱ्यांच्या ‘भावबंधन’ नाटकाचा प्रयोग सुरु होता. बाराशे रुपयांची तिकीट विक्री होऊन प्रयोग हाऊसफुल्ल झालेला. चौथा अंक सुरू झाला आणि आत काहीशी गडबड ऐकू आली. मंचावर घनश्यामच्या भूमिकेतले चिंतामणराव कोल्हटकर थांबले. तेवढ्यात तात्यासाहेब परांजपेंनी विंगेत येऊन टिळक गेल्याची वार्ता सगळ्या जनसमुदायाला सांगितली.

खेळ आपसूकच बंद झाला. ज्यांना तिकिटाचे पैसे परत हवे, त्यांना ते मिळतील, अशी सूचना देण्यात आली आणि पैसे परत करण्यासाठी एक माणूस तिकीटबारीवर जाऊन थांबला… .. पण, पैसे मागायला कुणी येईचना, सुमारे हजाराचा तो रसिकवर्ग एकाएकी उठला सरदारगृहाच्या दिशेने टिळकांना अखेरचे बघण्यासाठी निघाला. टाचणी पडली तरी भलामोठा आवाज यावा, असा सन्नाटा थिएटरभर पसरला होता.

या प्रसंगाचे साक्षी असलेले चिंतामणराव कोल्हटकर लिहितात,

“पायांचे आवाजसुद्धा ऐकू येऊ नयेत इतक्या शांततेत लोक बाहेर पडले. जमिनीला कान लावून ऐकणाऱ्यालासुद्धा ऐकू आले असते ते फक्त दुःखाचे निश्वास आणि रडण्याचे उसासे!”

रडण्याचे कढ हळूहळू वाढतच चालले होते. लोकमान्यांचे दर्शन घेण्यासाठी सरदारगृहाचे दार तोडण्यापर्यंत गर्दीची मजल गेली होती. शेवटी लोकांच्या दर्शनार्थ पहिल्या मजल्याच्या बाल्कनीत टिळकांचा देह आणून ठेवला, हा प्रसंग जसाच्या तसा लिहून ठेवणारे पुंडलिकजी तिथे उपस्थित होते.

ते सांगतात,

“प्रत्येक माणूस धडपडत टिळकांच्या दर्शनाला येई. टिळकांना बघितल्यावर त्याला भडभडून येत असे. एक माणूस म्हणाला, एका माणसाने त्या शवापुढे येताच आपल्या तोंडावर हातच मारून घेतला. एक म्हातारा मनुष्य म्हणाला, बाबा आता हिंदुस्थानला इंग्रजांच्या तावडीतून कोण सोडवणार रे?” असे म्हणून मोठ्याने किंकाळी फोडून तो रडूच लागला.

“श्री शिवाजी महाराजांचा मृत्यू, राजारामाचे अकाली मरण, पानिपतचा रणसंग्राम, नारायणराव पेशव्यांचा वध, सवाई माधवरावांची आत्महत्या अथवा नाना फडणवीस यांचा स्वर्गवास, या महाराष्ट्राच्या इतिहासातील ज्या भयंकर विपत्ती, त्यांच्याहून अणूमात्रही कमी नसलेली भयंकर वेळ आज महाराष्ट्रावर आलेली असून, तिने महाराष्ट्रातून आज बाळ गंगाधर टिळक यांना ओढून नेलेले आहे,” अशा शब्दांत या महानिर्वाणाचे वर्णन केले अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी।

टिळकांच्या पुण्यात ही बातमी समजली आणि पुणेकरांची मनेच हादरली. रडू आवरत कसेबसे लोक मुंबईला जायला निघाले. नेहमीच्या दोन रेल्वे कमी पडल्या. सरकारला ज्यादा गाड्यांची व्यवस्था करावी लागली.

टिळकांचे अंत्यसंस्कार पुण्यात व्हावे, अशी केळकरांची आणि सगळ्या पुणेकरांची इच्छा होती; इच्छा कसली त्यांचा हट्टच होता, नव्हे नव्हे हक्कही होता त्यांचा. कारण, पुणे ही टिळकांची कर्मभूमी! पण, मुंबईकरही हट्टाला पेटले होते. त्यांचेही म्हणणे बरोबरच होते, टिळकांची कर्मभूमी पुणे असली तरी ते आता एकट्या पुण्याचे राहिले नसून अवघ्या महाराष्ट्राचे ‘लोकमान्य’ झालेले होते.

तात्यासाहेब केळकर निघाले. पुण्याला आले. त्यांना ‘ केसरी ‘चा पुढचा अंक काढण्याची खटपट करावी लागणार होती. याच ‘केसरी’च्या आधीच्या अंकातून लोकांना सांगण्यात आले होते, लोकमान्यांची प्रकृती मलेरियाच्या तापाने थोडी बिघडली आहे, पण काळजी करण्याचं काही कारण नाही. लोकमान्य लवकरच ठणठणीत होतील..

आधीच्या अंकात ही बातमी वाचणाऱ्या वाचकांना हे कुठे माहिती होतं की, पुढच्या ‘केसरी’च्या अंकात टिळकांच्या मृत्यूची काळीज करपून सोडणारी बातमी आपल्याला वाचावी लागणार म्हणून ! ‘केसरी ‘चा हा अंक महाराष्ट्रातल्या घराघराला एक अकल्पित वज्राघातच वाटला.

ही बातमी अंदमानात सावरकरांना समजली त्यांनी आणि अंदमानातल्या सगळ्याच् कैद्यांनी एक दिवस अन्नपाणी घेतले नाही. टिळकांना आदरांजली म्हणून उपवास पाळला.

आणि इकडे मुंबईत, अफाट लोकसमुदायाबरोबर टिळकांची महानिर्वाणयात्रा दुपारी दीड वाजता सुरू झाली. दोन लाखांच्यावर लोकांची गर्दी यापूर्वी एखाद्या अंत्ययात्रेला कधीही झालेली नव्हती. स्त्रिया, पुरुष, म्हातारे, हजारो गिरणी कामगार, हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, जैन, हरेक भारतीय टिळकांचा जयजयकार करत चालला होता.

आकाशाची शिवण उसवावी, आभाळ फाटावे असा पाऊस त्यादिवशी पडत होता. टिळकांच्या चितेला अग्नी दिलाच जाऊ नये, अशी त्या वरुणाचीही इच्छा असावी बहुतेक. त्या पावसाच्या घनगंभीर अशा मेघगर्जनेपेक्षा टिळकांच्या महानिर्वाणयात्रेतील लोकगर्जना अवघा महाराष्ट्र हलवून सोडत होती, ती गर्जना होती, ‘टिळक महाराज की जय!’ लोक घराच्या खिडकीतून अंत्ययात्रा पाहत होते. टिळकांना अखेरचा नमस्कार करत होते. घराच्या गच्चीवरून पुष्पवृष्टी होत होती. माणसांच्या गर्दीत मुंगीलाही उभे राहता येत नव्हते. खापर्डे, गांधी हेही लोकांच्या जथ्थ्यात हेलकावे खात इकडून तिकडे ढकलले जात होते.

या महानिर्वाणयात्रेत ३५-४० वर्षांचा एक ख्रिस्ती तरुण साठीच्या पलीकडे झुकलेल्या आपल्या म्हाताऱ्या आईला घेऊन तेथे आला होता. लोकमान्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी ती ख्रिस्ती म्हातारी हेलकावे खात होती. तिचा जर्जर देह इकडून तिकडे फेकला जातो की काय, अशी अवस्था होती. हे पाहून तिचा मुलगा म्हणाला,

आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा ! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक!”

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री पार्थ बावसकर 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मुरलेला हात” – लेखक : श्री शिवप्रसाद मेढे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “मुरलेला हात” – लेखक : श्री शिवप्रसाद मेढे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

‘समोरची बंगाल्याची बायको स्वयंपाकात अजून मुरायची आहे. पदार्थ परतताना कढईचा केवढा आवाज करते!’ हे वाक्य मी लिहिलं आणि माझं मलाच हसू आलं.

करू दे ना तिला हवा तसा स्वयंपाक! ती तिच्या पद्धतीने करतीये. मी का वैतागावं?

पण तसं नाहीये. स्वयंपाक ही एक कला आहे. तसंच स्वयंपाकघरात वावरणं ही पण एक कला आहे.

महिलांचा आणि क्वचित काही पुरुषांचा दिवसभरातला खूपसा वेळ स्वयंपाकघरात जात असतो.

असे म्हणतात, स्वयंपाक घरावरून त्या संपूर्ण घराची ओळख पटते. हे नीटनेटकं, देखणं स्वयंपाकघर चालवायला गरज असते ती मुरलेल्या हातांची.

आपल्या भारतात स्वयंपाक करायच्या खूप पारंपारिक पद्धती आहेत. प्रत्येक प्रांतात, राज्यात, जातीत, धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने चवदार, चमचमीत, चविष्ट जेवण तयार करण्यात येतं. जेवण बनवण्याच्या परंपरा पूर्वापार चालत आल्या आहेत. काही काही पदार्थ तर पिढ्यानुपिढ्या पारंपारिक पद्धतीने जसेच्या तसे अजूनही बनत आहेत. पंचपक्वान्न (श्रीखंड, बासुंदी, रसगुल्ले), काही चमचमीत भाज्या (भरली वांगी, रस्से) उसळी, छोले भटुरे, मांसाहारी पदार्थ, (शाकुती), इडली डोसा असे अनेक पदार्थ. (यादी खूप मोठी आहे, हे केवळ उदाहरणादाखल पदार्थ.)

आपली खाद्य परंपरा ही आपल्या देशाची खासियत आहे. ती परंपरा टिकवून ठेवणे ही अजून एक खासियत! मला असं वाटतं, भारत सोडल्यास, जगातील इतर देशात अगदी चमचमीत असे जेवण – खाद्यपदार्थ क्वचितच बनत असतील.

ही परंपरा टिकवण्यामागे किंवा टिकण्यामागे एक खास कारण म्हणजे मुरलेला हात!

ओला – सुका मसाला बनवण्याची मक्तेदारी या मुरलेल्या हातांची.

वर्षभर टिकणारी लोणची ही ह्या मुरलेल्या हातानेच घालावीत.

चमचमीत पदार्थ करावेत मुरलेल्या हातानेच.

मुरलेल्या हाताला कधीही तवा, कुकर, कढईचा चटका बसत नाही किंवा चटक्याचे काळे डाग हातावर उमटत नाहीत.

वाफ कधीच तोंडावर येत नाही, की उकळतं पाणी अंगावर सांडत नाही.

मुरलेला हात स्वयंपाक करताना कधीच ढणढण भांड्यांचा आवाज करत नाही. कढईतला पदार्थ कसा हळूच कापसासारखा हलवला जाईल.

रवीने दही घुसळताना एक लयबद्ध आवाज येत राहील.

भात कधी चिकट होणार नाही किंवा ताटात तांदूळ वाजणार नाही.

आमटी फुळुक पाणी होणार नाही किंवा चटण्या, कोशिंबिरी, भाज्या वाहून जाणार नाहीत.

पोळ्यांचा आकार गोलाकार असेल.

लोणचं करताना मुरलेले हात, आधी ज्याचं लोणचं घालायचं तो जिन्नस (कैरी, लिंबू, मिरची, फ्लॉवर, गाजर, वगैरे, वगैरे) व्यवस्थित निवडून घेणार. मग ते देठ काढून, धुऊन, पुसून थोडा वेळ वाळत ठेवणार. त्याच्या जोडीला चिरायची विळी, ज्या काचेच्या बरणीत लोणचं घालायचं ती बरणी, ताटसुद्धा व्यवस्थित धुऊन, पुसून स्वच्छ कोरडे करणार. अजूनही पाणी राहण्याची शक्यता नको, म्हणून हलकेच पेटत्या गॅसवर सुकवून घेणार. मगच चिरून मसाला घालून लोणचे तयार करणार. मसाला पण घरीच बनवणार. तिखट, हळद, मीठ सुद्धा हलकेच तव्यावर गरम करून घेणार. सगळं कसं निर्जल करणार. काय बिशाद, लोणचे खराब होईल!

ती बरणी ठेवायची पण विशिष्ट पद्धत. खाली तळाशी मीठ पसरून, वरती लोणचं घालून, सर्वात वरती मिठाचा पुन्हा हलकासा थर. मग त्या बरणीच्या उघड्या तोंडावर स्वच्छ धुतलेला पांढरा कपडा, त्याचीच कड, एका बाजूला फाडून व्यवस्थित बांधणार आणि मग झाकण लावणारा हा मुरलेला हातच असतो.

मसाला करताना प्रत्येक घटक व्यवस्थित निवडून, साफ करून निरनिराळे  भाजून, एकत्र करून मगच मिक्सरमध्ये बारीक करून ठेवणार. तेव्हाच तो मसाला खमंग होणार.

मुरलेल्या हाताला वयाचं बंधन नसतं. अनुभवाचं शहाणपण, आत्मविश्वास आणि स्वयंपाकाची आवड असेल तर पुरे!

मुरलेल्या हाताचा स्वयंपाक झटपट आणि चविष्ट होणारच.

पाच माणसांचा स्वयंपाक एका तासाच्या आत करावा तर मुरलेल्या हातानेच.

त्या हाताची आपली अशी पद्धत आहे. कुठच्या वेळी काय करायचं हे त्या हाताला पक्क माहीत असतं.

आता बघा. या पद्धतीने पायर्‍या पायर्‍यांनी स्वयंपाक केला तर काय बिशाद स्वयंपाकात जास्त वेळ जाईल.

कणीक भिजवून बाजूला ठेवली. डाळ-तांदूळ धुवून कुकर लावला. कुकरची शिट्टी होईपर्यंत भाजी चिरून घेतली. शिट्ट्या झाल्यावर गॅस बारीक ठेवून दुसर्‍या गॅसवर भाजीला फोडणी टाकून शिजायला ठेवली. तोपर्यंत कुकरची मंद गॅसवर ठेवायची वेळ संपलेली. कूकर उतरवून त्यावर पोळ्यांसाठी तवा ! तवा तापेपर्यंत पोळपाट लाटणे, फुलके असतील तर चिमटा, पीठ, तेल यांची जमवाजमव. पोळ्यांना सुरुवात करण्यापूर्वी, भाजी ढवळून मीठ, खोबरे, इतर वाटण, चिंचेचा कोळ घालून शिजेपर्यंत मंद आचेवर ठेवलं की तोपर्यंत तवा तापून तयार! पोळ्यांना सुरुवात केली की सलग दहा पंधरा मिनिटात पोळ्या होतात. एका पोळीला जास्तीत जास्त दोन मिनिटं लागणार. पोळ्या झाल्या की कढईतील भाजी एका छानशा पातेल्यात काढून डायनिंग टेबलवर झाकून ठेवायची . त्याच कढईत आमटी करण्यासाठी तवा उतरवून आमटी टाकता येते. जी काही डाळ, उसळ असेल तिला फोडणी टाकली; मिरच्या, कोथिंबीर मसाला इतर गोष्टी टाकून आमटी तयार! पोळ्या झाल्यावर त्याच गरम तव्यावर आमटीचा मसाला, इतर वाटण परतून घेता येईल.

आमटी उकळेपर्यंत ओटा आवरून पोळ्यांची परात, पोळपाट लाटणे धुवून जागेवर ठेवता येईल. उकळलेल्या आमटीवर झाकण ठेवलं की काम फत्ते. जेवायच्या वेळी फक्त गॅस पेटवला, गरमगरम आमटी खायला तयार! कितीसा वेळ लागला?

आहे न मुरलेल्या हाताची कमाल?

ह्या मुरलेल्या हाताची मोजमापं पण कशी तर, चिमुटभर, मुठभर, ओंजळभर. सगळा कारभार अंदाजपंचे.

ह्या मुरलेल्या हाताचा अंदाज इतका पक्का की पदार्थ कधी खारट, तिखट, आंबट, कडू होणार नाही. समतोल चवीचा रुचकर पदार्थ करावा तर मुरलेल्या हातानेच!

पदार्थ शिजला की नाही हे त्या मुरलेल्या हाताला बघूनच समजणार. वासावरून काय घातलं, राहिलं ते कळणार.

हे मुरलेले हात टीव्ही बघताना कधीच वेळ वाया घालवणार नाहीत. भाजी निवडणे, लोणी काढणे, डाळी,  कडधान्यं निवडून ठेवणं ही काम लगेच टीव्ही बघता बघता करून टाकतात.

उन्हाळ्याची कामं (सांडगे, पापड वगैरे) भल्या पहाटे उठून नाश्त्याच्या वेळेपर्यंत उरकून टाकणारे मुरलेले हातच !

पुन्हा सगळी रोजची कामे वेळच्यावेळी करण्यासाठी.

अशा सर्व मुरलेल्या हातांना माझ्याकडून नमस्कार.

लेखक :श्री शिवप्रसाद मेढे

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पाच पैशांचे पाणी ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

पाच पैशांचे पाणी ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

१९१० मध्ये शेगांवी श्री गजानन महाराज समाधिस्त झाले आणि तिथे आता काही उरले नाही असे लोकांना वाटू लागले..आणि ते स्वाभाविक होते !

पण देह लौकिक अर्थाने विलुप्त झाला तरी चैतन्य मागे राहतेच. आणि याचा पडताळा पुढे येऊ लागला आणि अगदी आजही तो येतच असतो.

साधारणतः १९३० मधील ही घटना आहे. शेगाव पासून तशा बऱ्याच दूर वर राहणारा एक पोलिस कर्मचारी कचेरीच्या कामासाठी शेगावकडे येण्यास निघाला. त्यावेळी एकतर वाहनाची सोय नव्हती. आणि या माणसाकडे गाडी भाड्याला पुरेसे पैसेही नव्हते. त्यामुळे स्वारी पैदलच निघाली होती. उन्हाळ्याचे दिवस आणि त्यात विदर्भ. सूर्य डोईवर आलेला आणि घसा कोरडा पडत चाललेला होता. रस्त्याने एक दोन ठिकाणी पाणी मिळू शकेल असे या पोलिस कर्मचाऱ्यास वाटले होते. पण कुठे पाणी काही नजरेस पडेना. वस्ती अतिशय विरळ त्यामुळे वाट वाकडी करून कुणाच्या घरी,मळ्यात जावे म्हटले तरी ते शक्य दिसेना. अजून बराच वेळ लागणार होता. पायी जायचे म्हणून मुख्य सडकेपेक्षा रानातून थोडे अधून मधून चालले होते. आता तहान खूपच जोर धरू लागली !

त्यांना वाटेवर त्यांच्यापुढे एक वयस्कर गृहस्थ चालताना दिसले. पोलिसाने त्यांना मागून हाक दिली..” बावाजी, पियाले पाणी भेटेन का कुठे? “

त्या गृहस्थाने मागे वळून पाहिले. “ तुला इथे कुठे पाणी दिसते तरी का? पण मी तुला देऊ शकतो पाणी तहान भागवण्याइतपत…पण तुझ्याकडे मला देण्यासाठी काही आहे?”

“ काही नाही,बावजी! “

“ अरे,बघ..असेल काही तरी .. “

पोलिसाने खिसा चाचपला…पाच पैशाचं नाणं हाती लागलं. ते त्यांनी त्या गृहस्थाच्या हाती ठेवलं. गृहस्थ हसले! त्यांनी ते नाणं तळहातांवर मध्ये ठेवलं आणि जोरजोरात दोन्ही हातांच्या तळव्यांत घासायला आरंभ केला….काही क्षणात तळहातातून पाण्याची धार पडू लागली !

हा चमत्कार होता याचं तहानेने भान हरपलेल्या त्या माणसाने दोन ओंजळी भरून पाणी घशाखाली उतरवले…डोळे मिटून! तहान निवू लागली होती!

डोळे उघडले तर समोर, आगे मागे कुणी दिसेना. हात मात्र ओलेच होते. खिशात पाच पैसे नव्हते…मात्र त्या पाच पैशांच्या पाण्याने देहाची तहान भागली तर होतीच पण मन ही ओलेचिंब झाले होते!

पोलिस समाधी मंदिरात पोहोचले..दर्शन घेतले! मुर्तीमधील गजानन माऊली जणू काही झालेच नाही अशा आविर्भावात मुद्रा शांत ठेवून बसली होती! 

काहीच वेळापूर्वी घशाखाली गेलेलं पाणी..त्यातील काही थेंब आता या पोलिसाच्या नेत्रांतून खाली ओघळून आले! गजानन महाराज कुठेही गेलेले नव्हते..याची त्यांना खात्री पटली होती !

गण गण गणात बोते…हे भजन म्हणतच ते पोलिस गृहस्थ आपल्या कचेरीकडे निघून गेले! पाच पैशांत यापेक्षा आणखी काय ठेवा मिळू शकतो गरीबाला? मनाने अतिश्रीमंत होऊन ते कृतकृत्य झाले होते!

– – – नुकत्याच झालेल्या शेगाव भेटीत एका पोलिस कर्मचाऱ्याच्या तोंडून त्यांच्या आजोबांना आलेला अनुभव समजला आणि तो जसाच्या तसा वर्णन केला आहे! सामान्य माणसांनी देव पाहिला नाही..पण देवापर्यंत पोहोचवू शकणारे परोपकारी संत मात्र पाहिले…याबाबत महाराष्ट्र सुदैवी आहे !जय गजानन !) – 

– – –  भाविकांसाठी लिहिले आहे. ‌प्रश्न भावनेचा आणि उत्तर भक्तीचे असते ! दर्शनासाठी आलेल्या एका शिक्षिकेला प्रसाद देताना कुणा एका सेवकाने तुमची बढती निश्चित आहे,असे सांगितल्याचा भास झाला ! बढती होण्याची कोणतीही शक्यता नसतानाही त्यांना मुख्याध्यापिका पदी बढती मिळाली..

– – – ही वस्तुस्थिती आहे ! या गोष्टींवर अविश्वास दाखवण्याचे काहीही कारण दिसत नाही. अर्थात विवेक तर आहेच प्रत्येकाजवळ!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares