मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सापाचा दंश – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ सापाचा दंश – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(यावेळी एका सुटकेसमध्ये वरखाली भेटजींचे सदरे, पंचे ठेवून मध्ये शेठजींचे पार्सल होते. शेठजीनी भटजीना दहा हजार दिले. नेहेमीप्रमाणे भिवा स्टॅन्डवर त्याना गाडीत बसवून गेला. ) – इथून पुढे 

यावेळी गाडीत गर्दी नव्हती. गाडी सुटल्यावर बाकी प्रवासी डुलक्या घेऊ लागले, तसे भटजीनी सोबतच्या किल्लीने बॅग उघडली… आपले कपडे बाहेर घेतल्यावर त्याना भले मोठे पुडके दिसलें.. त्यानी ते हळूहळू उघडले तर आत नोटांची बंडले होती. भटजीचे हात थरथरू लागले… त्यानी परत ते पुडके बांधले.. एव्हडीमोठी रक्कम आपल्या ताब्यात.. आणि काय झाले तर? कोणी चोरले तर? कुणी इनकमटॅक्सवाल्याला तक्रार दिली तर?

रात्रभर भटजी झोपले नाहीत.. टक्क जागे होते..

सकाळी उतरताच ते बहिणीकडे गेले आणि अर्ध्यातासात भुलेश्वरला पोचले आणि त्यानी ती रक्कम शेटजीच्या साडूकडे दिली… साडू खूष झाले, त्यानी पाच हजार भटजींच्या खिशात ठेवले.

परत येताना साडूनी दिलेले पार्सल त्यानी ब्यागेत ठेवले आणि ते एसटीत बसले… त्याना कुतूहल होत, साडू काय पाठवतात शेठजीना… त्यानी गाडी सुरु असताना हळूच उघडले, आत कसलीतरी पावडर होती. कसली पावडर असावी ही.. त्यानी हुंगून पाहिली.. त्यानी कुठेतरी वाचले होते, ते आठवले.. ही नशा देणाऱी पावडर असावी. त्यान्च्या लक्षात येईना.. शेठजीची आहे सोन्याची पेढी, त्यान्च्या साडूची पण.. मग ही नशापावडर? म्हणजे शेठजी आणि साडू, सोन्याच्या आडून हा गुपचूप धंदा करत असणार… आपल्याला हे समजले हे कुणाला कळवायचे नाही.

भटजी परत नेहेमीप्रमाणे पूजा करू लागले परंतु त्याना स्वास्थ मिळेना. एकतर त्यान्च्या कन्येचे तिच्या आतेशी जमेना. दुसरे त्यान्च्या कन्येचे गुरु बनारसला गेले त्यामुळे तिचे शिक्षण अर्धवट राहिले, त्यामुळे ती गावी आली. आपल्या कन्येचे संगीतशिक्षण हे अंतूभटजीचे आशा स्थान होते, पण त्यालाच हादरा बसला होता.

अंतूभटजीना अलीकडे वाटू लागले होते, आपले या गावात तरी काय आहे? ना जमीन ना नातेवाईक ना सगेसोयरे.. या पेक्षा सरळ बनारसला जावे… गंगाकिनारी रहावे.. काशीविश्वेश्वराची पूजा करावी, पण कसे?

बनारसला त्यान्च्या कन्येचे गुरु पण रहात होते, त्यान्च्या आश्रमात निवासी पद्धतीने संगीताचे शिक्षण दिले जायचे. तिची पण इच्छा होती, बनारसला जाऊन गुरूंच्या आश्रमात राहून संगीत विद्या शिकायची.

शेटजीच्या पार्सलात काय असते हे कळल्यापासून भटजी मुंबईत जायचे नाव काढत होते, तशात एका सिनेमानटाच्या मुलाच्या खिशात गांजा सापडला, त्याला पोलिसांनी अटक करून तुरुंगात घातल्याची बातमी त्यानी ऐकली होती. परदेशातून आलेली चरस NCB (नार्कोतिक सेंट्रल ब्युरो)च्या अधिकाऱ्यांनी पकडली आणि एका उद्योगपतीला दहा वर्षे खडी फोडायला पाठविले, हे त्यानी वाचले होते. त्यामुळे अशी पावडर आपल्यकडे सापडली तर शेठजी लांब रहातील पण आपण तुरुंगात सडून मरू आणि आपली मुलगी उघड्यावर येईल, हे त्याना माहित होते.

पण एकदिवस शेठजीचे बोलावणे आलेच..

“गुरुजी, एक काम होत तुमच्याकडे.

आमच्या साडूंना बॅग पोचवायची होती.

“नको सावकार, मला नाही जमणार.. दुसऱ्या कुणाला तरी सांगा..

“का? इतक्या वेळा गेला की घेऊन.. आणि आता काय? वीस हजार देतो की..

“नाही जमायचे, तुम्ही पैशाची बंडले देता बहुतेक माझ्याबरोबर.. मला माझ्या जीवाची भीती वाटते… मला कुणी हटकले तर.. चोरले तर पैसे? 

“कुणी चोरत नाही तुमची पिशवी.. आम्हाला तुमची खात्री आहे.. तुम्ही सोमवारी निघा..

“नाही जमायचे शेठजी..

शेठजीचा संताप अनावर झाला, त्याना कुणी नकार दिलेला चालत नसे. त्यानी “भिवा ‘म्हणून हाक मारली, तसा भिवा त्याचेंसमोर हजर झाला.

“भिवा, हे गुरुजी मुंबईतला जायचे नाही म्हणत्यात..

भिवाने डोळे लाल केले.

“भटा, शेटजीस्नी न्हाई म्हणत्यास, तुजी पोरगी हाय न्हवं.. कधी तिला उचलीन कळायचं बी नाय.. गुमान पिशवी घेऊन जायचं..

आपल्या मुलीचा विषय निघाल्याने भटजी गप्प झाले, घाबरले.. आपले काही झाले तरी चालेल, आपल्या मुलीला काही होता कामा नये..

आणि हा तर भिवा भिल्ल.. काय करील कोण जाणे?

अंतूभटजीनी मान खाली घातली आणि “बर शेटजी, सोमवारी जातो मी.. बॅग तयार ठेवा ‘असं म्हणून घरी गेले.

अंतूभटजी मनातून अस्वस्थ झाले.. या शेटजीना आयतें आपण सापडलो.. सुरवातीला वाटले नुसते खाऊ असेल म्हणूंन.. पण यांचे काळे धंदे… ही माणसाला नासवणारी आणि बरबाद करणारी पावडर.. त्यात अमाप पैसा.. सोन्याच्या वीसपट.. पैशासाठी हे असले चोरटे धंदे.. त्यात त्यांचा साडू मोठा भिडू असणार. दोघेही चोर. काय करावे? याच्यातून मान कशी सोडवावी.

शनिवारी अंतूभटजीची मुलगी मुंबईला गेली. सोमवारी सायंकाळी भटजी शेटजीकडे गेले. शेटजीनी भली मोठी बॅग तयार ठेवली होती, त्यात भटजीचे कपडे वरखाली घातले, बॅगेला कुलूप लावले आणि किल्ली भटजीकडे दिली.

नेहेमी जायचे त्या बसमध्ये भटजी बसले. भिवा गाडी सुटल्यावर लांब झाला. प्रवासात भटजी टक्क जागे होते.

दुसऱ्या दिवशी भटजी बॅग घेऊन उतरले. बहिणीकडे बॅग ठेवली आणि फोर्ट मधील NCB कार्यालयात शेटजीचे साडू आणि शेटजी, हे चरस, गांजा स्टॉक करतात, असा रिपोर्ट दिला.

एका तासात भुलेश्वरला आणि शेटजीच्या घरी, गोडाऊन मध्ये NCB चे अधिकारी पोलीसफाटा घेऊन पोचले. चरसचा स्टॉक पकडला आणि शेटजी, त्त्यांचा मुलगा, भुलेश्वरचे साडू, त्त्यांचा मुलगा यांना पोलिसांनी अटक केली..

सगळीकडे खळबल माजली.. सोन्याचा मोठा धंदा करणारे व्यापारी ड्रुग्सच्या धंद्यात..

टीव्हीवर मोठंमोठ्याने बातम्या दिल्या जात होत्या.. सायंकाळ पेपरनी पहिल्यापानावर बातमी छापली होती, त्याचवेळी.. त्याचवेळी 

 अंतूभटजी आपल्या कन्येसह बनारसच्या रेल्वेत बसले होते… काल शेठजीनी दिलेली पन्नास लाखाची बॅग सांभाळत.

 आता या पैशानी त्याना भविष्याची काळजी नव्हती.. शेपटीवर पाय पडल्याबरोबर नागाने दंश केला होता.

— समाप्त 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सापाचा दंश – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ सापाचा दंश – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

अंतूभटजी शेठजीच्या बंगल्याच्या पायऱ्या चढून हॉलसमोरील देवखोलीकडे गेले. देवचंदशेठजी तिथेच खुर्चीवर बसुन त्त्यांची वाट पहात होते. त्यानी भटजीकडे पाहून स्मित केले. अंतूभटजी देवघरात गेले आणि नेहेमीप्रमाणे देवांना स्नान घालून, फुले अत्तर चढवून स्तोत्रे म्हणू लागले. रामरक्षा, श्रीसूक्त, अथर्वशिष्य वगैरे. शेटजी रोजच त्त्यांची पूजा मनापासून डोळे बंद करून ऐकत मग मान हलवत. पूजा संपली की भटजीना मसालादूध आणि फळे दिली जात. मग शेटजी न्याहारी करत आणि आपल्या पेढीवर जात.

देवचन्दशेठजीची त्या परिसरातील सर्वात मोठी सोन्याची पेढी होती, त्यान्च्याकडून त्या जिल्ह्यातील सोनार सोने खरेदी करत शिवाय शेठजीची तयार दागिने विकण्याचा शोरूम पण होता, त्या ठिकाणी त्त्यांचा मुलगा बसे. दिवसभर त्या शोरूममध्ये गिर्हाईकांची गर्दी असे.

अंतूभटजी घरातून बाहेर पडतापडता शेठजीना म्हणाले 

“शेठजी, चार दिवसाची रजा हवी होती..

“कुठे जाताय?

“मुलगी असते मुंबईला.. गाणे शिकते, माझ्या बहिणीकडे रहाते.. तिला पाहून यावं म्हणतो..

“बर, घरी कोण असत तुमच्या?

“मी एकटाच, मंडळी गेली दहावर्षांपूर्वी.. ही एक मुलगी पाठी ठेऊन.

शेटजीना काहीतरी आठवले.. त्यानी विचारले 

“बहीण कोठे रहाते तुमची मुंबईत?

“गिरगांवात, काळाराम मंदिराच्या बाजूला.. चाळीत.

“बरे, माझे एक काम करा.. जाताना एक पिशवी देतो ती आमचे साडू आहेत भुलेश्वरला… त्त्यांची मोठी पेढी आहे. त्याना द्या आणि तुम्ही येताना परत त्याचेकडे जा आणि ते एक पिशवी देतील, ती घेऊन या..

“बरे, परवा जाईन म्हणतो.. पिशवी तयार ठेवा.

“हो, एसटीने जाणारं ना? आमचा भिवा घेऊन येईल स्टॅन्डपर्यंत..

“बरे.. येतो..

अंतूभटजी अजून काही पूजा होत्या, त्या घरी गेले.

जायच्या दिवशी भटजीनी आपण आज मुंबईला निघणार असे शेटजीना सांगितले.. शेटजीनी त्याना पेढीकडे यायला सांगितले.

सायंकाळी भटजी शेठजीच्या पेढीकडे गेले. शेठजी त्त्यांची वाटच पहात होते. एक पुडक त्यान्च्या पिशवीत भिवाने ठेवले. अंतूभटजी बाहेर पडले तसे भिवा पण त्याचेंसमवेत चालू लागला, त्याला सोबत पाहून भटजी म्हणाले 

“अरे तू का सोबत? मला काय स्टॅन्ड माहित नाही?

“तुमास्नी सार मायती हाय, पर शेठजी बोल्ले, त्यसानी गाडीत बशीव आणि मग परत फिर..

भटजी काही बोलले नाहीत पण भिवा हा शेठजीनी पोसलेला गुंड त्याना आवडत नसे. काही न करता तो पेढीवर बसलेला असे कदाचित कुणाची हाडे मऊ करायची असतील, तर ते काम ते करत असावा.

अंतूभटजी गाडीत बसले.. दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईत पोहोचले.

गिरगांवात बहिणीकडे जाऊन त्यानी मुलीला पाहिले आणि दुपारी भुलेश्वरला शेठजीच्या साडूकडे गेले आणि शेठजीची पिशवी त्यानी त्यान्च्या हातात दिली. साडू खूष झाले.. त्यानी थंडगार पियुष भटजीसाठी मागवलं. मग मोडक्या तोडक्या मराठीत बोलू लागले..

“तुमच्या देवचंदशेठजीनचा फोन अल्ला व्हता.. बर हाय.. परत कवा जनार गावला?

“सोमवारी.

“बर हाय.. शेटजीसाठी एक थैल्ली देतो, ती घेऊन जयचं.. तयार ठेवतो.

“बर.. म्हणत अंतूभटजी उठले आणि बहिणीच्या घरी गेले.

यावेळी भटजी आपल्या मुलीला गावी नेणार होते, त्यामुळे सोमवारी ते मुलीसह पेढीवर गेले आणि शेटजीच्या साडूनी दिलेली पिशवी घेउंन एसटीत बसले.

दुसऱ्या दिवशी सकाळी भटजी एसटीतुन उतरले आणि सरळ शेटजीच्या बंगल्यावर गेले आणि त्यानी साडूनी दिलेली पिशवी त्यान्च्या हातात दिली.. पिशवी पाहून शेठजी खूष झाले.. त्यानी त्याच्यासाठी आणि त्याच्या मुलींसाठी मसाला दूध मागविले आणि खिशातून पाचशेच्या दोन नोटा भटजीच्या हातात कोंबल्या.

“अरे काय हे, कशाला.. कशाला हे पैसे?

“अरे असू दे ना.. आणि ही कोण तुमची छोकरी काय?”

“होय.. गाणे शिकते मुंबईत.. उत्तरेकडील बनारसचे गुरु आहेत तिचे.. “

“अरे व्वा.. छान छान..

“काही लागलं तर सांगा आणि उद्यापासून पूजा सुरु करा..

“हो हो.. म्हणत भटजी बाहेर पडले.. एवढ्याश्या कामासाठी एक हजार मिळाल्याने ते खूष झाले.

आठ दिवसांनी भटजीना कन्येला मुंबईला पोहोचवायचं होत, यावेळी पुन्हा शेठजीनी मागीलवेळेपेक्षा मोठे पार्सल दिले आणि पिशवीत ते पार्सल खाली आणि त्यावर भटजींचे पंचे, बंडी वगैरे स्वतः शेठजीनी ठेवले. मागील वेळा सारखा भिवा स्टॅन्डपर्यत पोचवायला आला आणि गाडी सुटल्यावरच मागे फिरला. मुंबईला पोचल्यानंतर भटजी भुलेश्वरला गेले.. ते पार्सल त्यानी शेठजीच्या साडूकडे दिले.. साडूनी त्यान्च्यासाठी पियुष मागवून दिले आणि दोन हजार खिशात ठेवले. परत येताना शेटजीसाठी पार्सल दिले, ते त्यानी शेठजीना दिले.. शेठजी खूष झाले.. त्यानी पाचशेच्या दोन नोटा भटजीच्या खिशात कोंबल्या.

अंतूभटजी विचार करू लागले.. मुंबईत दोन हजार मिळाले आणि इथे एक हजार.. एवढे पैसे का देतात आपल्याला? काय असावे त्या पुडक्यात? नुसते खाऊ असल्यास, एवढे पैसे?काही तरी गडबड आहे निश्चित.

भटजींच्या मुलीचे कार्ड आले -क्लासची पंधराहजार फी भरायची आहे चार दिवसात.. अंतूभटजी घाबरले.. एवढे पैसे उभे करायचे, ते पण चार दिवसात.. त्याचेकडे शेठजीनी दिलेले पाच हजार होते, मग अजून दहा हजार..

भटजीनी धीर करून शेठजीकडे दहाहजरांची मागणी केली.

“देऊ.. दहा हजार कर्ज नव्हे, तुम्हाला देऊ.. फक्त आमचे एक पार्सल भुलेश्वरला पोहोचवा..

भटजी घाबरले.. पण पैसे तर हवे होते, धीर करून म्हणाले 

“काय असत त्या पार्सलात..

“त्याची चिंता तुम्हाला नको… तुम्ही फक्त तुमच्यासोबत न्यायचे.

“पण काही अघटित..

“काही होत नाही.. तुमच्या कपड्याकडे पाहून कोणी तपासत नाही.. काळजी करू नये..

शेवटी भटजी तयार झाले.. यावेळी एका सुटकेंसमध्ये वरखाली भटजींचे सदरे, पंचे ठेवून मध्ये शेठजींचे पार्सल होते. शेठजीनी भटजीना दहा हजार दिले. नेहेमीप्रमाणे भिवा स्टॅन्डवर त्याना गाडीत बसवून गेला.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सायकल… ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

 

? जीवनरंग ?

☆ सायकल… ☆ श्री दीपक तांबोळी

नवीकोरी सायकल घेऊन पार्वती रिक्षातून खाली उतरली तशी दुर खेळत असलेली सायली धावतच तिच्या जवळ आली. “माझी नवी सायकल, माझी नवी सायकल” सायकलवरुन हात फिरवता फिरवता सायली उद्गारली.

नवी सायकल पाहून तिचा छोटासा चेहरा आनंदाने एकदम फुलून आला होता. समोर जो दिसेल त्याला ती सायकल दाखवू लागली. पार्वती आपल्या लेकीकडे कौतुकाने पहात होती. लोकांची धुणीभांडी करुन साठवलेल्या रकमेतून तिनं लेकीचा हट्ट पुरवला होता. दोन वर्षांपूर्वी एका ट्रकवर क्लिनरचं काम करणारा तिचा नवरा अपघातात वारल्यानंतर मुलीसाठी तिनं काहीच केलं नव्हतं. सायलीनेही कधी हट्ट धरला नव्हता.

दुसऱ्या दिवसापासून पार्वती नाही नाही म्हणत असतांना सायली सायकल घेऊन शाळेत गेली. अर्थात सायकल घरी ठेवूनही तिचा काहीच उपयोग नव्हता. सात दिवस सगळं व्यवस्थित सुरु होतं. आठव्या दिवशी सायली रडत रडत घरी आली. पार्वतीने विचारल्यावर तिनं सायकल चोरीला गेल्याचं सागितलं. पार्वतीच्या काळजात धस्स झालं. पोटाला चिमटे देऊन साठवलेल्या पैशातून घेतलेल्या सायकलचं असं व्हावं या कल्पनेने तिला रडू कोसळलं. शेजारच्या मुलांना घेऊन तिनं शाळेत आणि इतरत्रही तिचा शोध घेतला पण सायकल काही मिळाली नाही.

कुणीतरी तिला सुचवलं म्हणून अखेरीस ती शेजारच्या बाईला सोबत घेऊन पोलिस स्टेशनमध्ये गेली. “साहेब सायकल चोरीला गेली त्याची कंम्प्लेंट द्यायची होती” ड्युटीवरच्या पोलिसासमोर उभं राहून भितभितच ती बोलली. त्याने एकदा खालपासून वरपर्यंत तिला पाहीलं आणि जोरात खेकसून तो म्हणाला “कशाची चोरी झालीये?”

त्याच्या खेकसण्याने सोबत असलेली सायली आईला बिलगली आणि मुळूमुळू रडू लागली.

“सायकल साहेब. सायकलची चोरी झाली”

“खरेदीची पावती आहे का?”

तिनं पावती दिली. त्याने एक रजिस्टर काढलं. “व्यवस्थित शोधली का सगळीकडे? खोटी कंप्लेंट चालणार नाही” त्याने दरडावून विचारलं.

“हो साहेब. सगळीकडे शोधली. पण नाही सापडली”

“ठिक आहे. सांगा आता. “

पार्वतीनं सायकलीचं आणि कधी, कुठून ती चोरीला गेली याचं सविस्तर वर्णन त्याला सागितलं. त्यानं लिहून घेतलं. तिचा पत्ता, मोबाईल नंबर घेतला. सही घेतली.

“जा आता घरी. सायकल मिळाली की कळवू तुम्हाला” तो म्हणाला आणि हातात तंबाखू घेऊन चोळू लागला.

त्याचा रुक्षपणा पाहून पार्वती स्तब्ध झाली. तीच्यासोबत आलेली बाई तिच्या कानात कुजबुजली. “ताई आपण साहेबांना भेटू. हा मेला काहीच करणार नाही. ” 

पार्वतीलाही ते पटलं. धीर धरुन ती त्या पोलिसाला म्हणाली, “साहेब आम्हांला मोठ्या साहेबाला भेटायचंय. “

त्यानं एकदम डोळे मोठे केले. जोराने ओरडून तो म्हणाला, “ए चल. निघ इथून. साहेबाला भेटायचं म्हणे. साहेब भेटणार नाही. साहेब बिझी आहेत. लिहीली ना कंप्लेंट? जा आता घरी. ” 

तेवढ्यात एक रुबाबदार तरुण पोलिस बाहेर आला. बहूतेक तोच साहेब असावा. “काय आरडाओरड चालवलीय पाटील. काय झालं?” 

“साहेब ते…. ” पाटील तंबाखू लपवू लागला. तेवढ्यात साहेबाची नजर पार्वती आणि सायलीवर पडली. तो काय समजायचं ते समजला असावा. “या बाई तुम्ही आतमध्ये. ” तिघीही भितभित चेंबरमध्ये शिरल्या.

“हं, सांगा आता काय झालं ते!”

पार्वती परत एकदा सांगू लागली. तेवढ्यात साहेबाचा फोन वाजला. फोनवर बोलता बोलता साहेब पार्वती आणि सायलीकडे बघत होता. सायलीच्या डोळ्यातून अजूनही अश्रू येतच होते. फोनवर बोलणं झाल्यावर त्यानं पार्वतीकडे पाहून विचारलं. “तुम्ही काय करता?”

“साहेब मी लोकांची धुणीभांडी करते. त्यातुन मिळालेल्या पैशातूनच ती सायकल घेतली होती.. “

“आणि तू गं मुली? तू शाळेत जातेस का?” पार्वतीचं बोलणं पुर्ण होऊ न देताच साहेबाने सायलीला विचारलं.

सायलीने मान हलवली.

“कितवीत आहेस?”

“पाचवीत “हलक्या आवाजात तिनं सांगितलं. तेवढ्यात फोन वाजला आणि साहेब परत बोलण्यात गढून गेला. पार्वतीला आता उभं राहून अवघडल्यासारखं होऊ लागलं. बराच वेळाने साहेबाचं बोलणं संपलं. त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला. “ठिक आहे. या तुम्ही. मी बघतो काय करायचं ते. “

“पण साहेब…. ” ती काही बोलण्याच्या आतच दोन तीन माणसं चेंबरमध्ये घुसली आणि काही न बोलता तिला बाहेर यावं लागलं. इथं येण्याचा काहीच उपयोग झाला नाही हे तिच्या लक्षात आलं आणि दुःखाने तिचं मन भरुन आलं.

घरी येऊन ती सायलीला जवळ घेऊन खुप रडली. एकुलती एक पोर. खुप समजदार होती. आपण गरीब आहोत आणि आपल्याला वडिल नाहीत याची तिला पक्की जाण होती. तिनं कधी हट्ट केला नाही पण तिच्या मैत्रिणीने सायकल घेतली म्हणून तीही आईच्या मागे लागली होती. पार्वतीचं ती सर्वस्व होती त्यामुळे परिस्थिती नसतांनाही तिनं पोरीचं मन राखण्यासाठी सायकल घेतली होती.

दुसऱ्या दिवशी पोरीला शाळेत परत एकदा पायी जातांना बघून पार्वती च्या काळजाला असंख्य भोकं पडली. चार हजाराची सायकल तर गेलीच होती पण आनंदी झालेली पोरगी परत दुःखी झाली होती याचं पार्वतीला मनोमन वाईट वाटत होतं. पुन्हा पैसे साठवून सायकल विकत घ्यायला वर्ष दोन वर्ष सहज लागणार होती. आणि त्याच विचारांनी पार्वतीचे डोळे वारंवार भरुन येत होते.

पोलिस कंप्लेंट करुन एक आठवडा उलटला पण सायकलचा तपास काही लागला नाही. पार्वती जो भेटेल त्याला सायकलचं वर्णन सांगून शोध घेण्याची विनंती करत होती पण बाईक आणि कारच्या जमान्यात तिच्या सायकलचं कुणालाही सोयरसुतक नव्हतं. ती दोनतीन वेळा शाळेत जाऊन हेडमास्तरांनाही भेटून आली. शाळेच्या सायकल स्टँडवर आपली सायकल दिसतेय का याचाही तिने शोध घेतला. पण सायकल कुठेच सापडत नव्हती.

पोलिस तक्रार करुन पंधरा दिवसही उलटूनही जेव्हा काहीच झालं नाही तेव्हा पार्वती समजून चुकली की आता सायकल मिळणं शक्य नाही. आजुबाजुचे शेजारीही तिला तेच समजावत होते. पण मन मोठं वेडं असतं. कधीतरी कुणीतरी येईल आणि म्हणेल, “ताई तुमची सायकल सापडली” असं तिला वाटत रहायचं.

विसाव्या दिवशी तिच्या खोलीचं दार वाजलं. तिनं उघडलं. बाहेर एक पोलिस उभा होता. “पार्वताबाई तुम्हीच का?”

“हो. “

“या बाहेर. ” 

तिचं ह्रदय जोरजोरात धडधडू लागलं. बाहेर पोलिसांची व्हँन उभी होती. व्हँन पाहून शेजारपाजारचे जमा झाले. पोलिस व्हॅनमध्ये शिरला आणि एक नवी कोरी सायकल घेऊन बाहेर आला.

“ही घ्या तुमची सायकल. “

“साहेब पण ही आमची सायकल नाही. “

“ते मला माहीत नाही. साहेबांनी पाठवलीये. तुम्ही साहेबांना भेटा. त्यांनी बोलावलंय तुम्हाला. “

व्हॅन निघून गेली. पार्वतीभोवती गर्दी जमा झाली. ही सायकल तिच्या चोरी गेलेल्या सायकलीपेक्षा सुंदर आणि आधुनिक दिसत होती. सात-आठ हजाराची असावी. बरेच जण तिच्याकडे असूयेने बघत होते. सायलीची तर नजर हटत नव्हती. ती सारखी सायकलवरुन हात फिरवत होती. “आई, ही सायकल आपल्याला दिली?”

“बेटा आपली सायकल नाहीये ती. उद्या जाऊन साहेबाला विचारु आपण. “

जमलेल्या बायका वेगवेगळे तर्क लढवत होत्या. एका बाईने तर हद्द केली. पार्वतीवर साहेबाची वाईट नजर असेल म्हणून तर त्याने एवढी महागडी सायकल पाठवली असेल म्हणे. ती सायकल साहेबाला परत करावी असं बऱ्याच जणींचं म्हणणं पडलं. ते ऐकून पार्वती अस्वस्थ झाली. सायकल आणि सायलीला घेऊन ती खोलीत शिरली. रात्रभर तिला साहेब तिची छेड काढतोय अशी स्वप्नं पडत होती.

दुसऱ्या दिवशी ती कामं आटोपून सायलीला घेऊन पोलिस स्टेशनला गेली. नशिबाने साहेब एकटाच चेंबरमध्ये फुरसतीत बसला होता. “या ताई, बसा” मनमोकळेपणाने हसत त्याने पार्वतीचं स्वागत केलं. त्याच्या ताई म्हणण्याने तिच्या मनातलं किल्मिश बरंच कमी झालं.

“साहेब तुम्ही जी सायकल पाठवलीत ती आमची नाहीये. ” तिनं विषयाला हात घातला.

“हो. बरोबर. मला कल्पना आहे. तुमच्या सायकलचा आम्ही बराच शोध घेतला, पण ती मिळाली नाही. आणि ती मिळणारही नव्हती. चोरणाऱ्याने तिचे पार्ट्स वेगवेगळे करुन एका तासात विकूनही टाकले असतील. “

“पण मग साहेब, ही नवी सायकल….. “

“कळलं मला तुम्हाला काय म्हणायचं ते! पोलिसांना काय गरज पडलीये चोरी झालेल्या सायकलच्या बदल्यात नवी सायकल द्यायची? असंच ना? ही सायकल मी माझ्यातर्फे दिलीय. आणि ती का दिली आहे ते पण सांगतो. ” 

टेबलावरची बेल वाजवून त्याने शिपायाला बोलावलं, “या ताईंकरीता एक चहा आणि या मुलीकरता एक कॅडबरी घेऊन ये. तर ताई त्या दिवशी तुम्ही आलात. तुमच्या मुलीला पाहून मला माझ्या भाचीची आठवण आली. ती माझ्यामागे सायकल घेऊन देण्याकरीता हट्ट करायची, पण तिचं घर हायवे जवळ असल्याने रिस्क नको म्हणून मी तिला टाळत होतो. दुर्दैव बघा, ज्या रिक्षातून ती घरी येत होती त्या रिक्षालाच अपघात झाला आणि त्यातच तिचा मृत्यु झाला. सायकल वापरली असती तर कदाचित ती वाचली असती, कदाचित नाही. पण तिच्या मृत्युनंतर मी स्वतःला अपराधी मानू लागलो.

तुमची केस ऐकली आणि मला माझ्या भाचीची आठवण झाली. तुम्हांला मदत केली तर या अपराधातून माझी सुटका होईल असं वाटलं. भाचीची इच्छा पुर्ण करु नाही शकलो. कमीतकमी तुमच्या मुलीची सायकल मिळवून द्यावी या हेतूने मी हे सगळं केलं. खुप मोकळं वाटतंय आता. ” 

एक श्वास सोडून त्याने सायलीला जवळ बोलावलं. तिला जवळ घेऊन म्हणाला, “बेटा, ती सायकल माझ्याकडून तुला गिफ्ट. आणि हो, कधी काही अडचण आली तर या मामाला सांगायचं बरं का!”

“साहेब तुमचे आभार…. “

“नाही ताई, आभार नका मानू. मीही गरीबीतूनच वर आलोय. गरीबाचं नुकसान काय असतं ते मी चांगलं समजू शकतो. माझ्या आईनं मोलमजूरी करुनच मला मोठं केलंय. तुम्हीही तुमच्या मुलीला खुप शिकवा. मोठं करा. “

पार्वतीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अन्न तारी.. अन् अन्न मारीही… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ अन्न तारी.. अन् अन्न मारीही… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(“निरु, माझं ऐक. आता तू खरोखर छान दिसते आहेस. आजपासून रात्री थोडं जेवायला सुरवात कर बाळा. अगदी चार घास तुला आवडेल ते खायला लाग. मी तुला मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या देते त्या घ्यायला लाग. म्हणजे तू हेल्दीही रहाशील. एक महिन्याने हिला घेऊन या केतन.”) – इथून पुढे.

अनुराधा तिची आतुरतेने वाट बघू लागल्या. , न राहवून त्यांनी मधेच केतनला फोन केला.

केतन म्हणाला, “ डॉक्टर, तिने तुमचं काहीही ऐकलं नाहीये. बळजबरी केली तर ती अन्न ओकून टाकते. तिला घेऊन मी आजच येतो तुमच्याकडे. ”

केतन निरुपमाला घेऊन आला. वजनाच्या काट्यावर तिला उभं केलं. काटा तिचं वजन 42 किलो दाखवत होता. ही बाब फार गंभीर होती. ताबडतोब अनुराधाने निरुपमाला चांगल्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं. तिला सलाईन लावलं. त्यात सर्व शक्तिवर्धक औषधे घातली. तिला सकाळी ब्रेडची स्लाईस आणि दूध दिलं. तिने ते खाल्लं आणि लगेच उलटी करून ते काढून टाकलं.

अनुराधा म्हणाल्या, “ याला ब्युलिमिया म्हणतात. आपलं वजन वाढू नये म्हणून असले अघोरी उपाय करणारे लोक अमेरिकेत मी बघितले आहेत. केतन, निरु नीट ऐका. मी एका हॉस्पिटलला भेट दिली. तिथे असल्या मुली होत्या. भडक मेकप केलेला, पार खंगलेल्या, हाता पायाच्या अक्षरश:काड्या झालेल्या. आई त्या मुलीला व्हीलचेअरवर बसवून ढकलतेय. मुलीचं वजन झालं होतं पंचवीस किलो. सगळ्या व्हायटल सिस्टिम्स निकामी झालेल्या. ओव्हरी गर्भाशय पूर्ण आक्रसलेले. ही मुलगी आता कशी नॉर्मल होणार? अजूनही तिचं शरीर अन्न नाकारतच आहे. असे मुलगे मुली मी बघितले आणि त्यांचे हताश आईवडील. निरुपमा, तुला असं जगायचं आहे का? नाही ना, मग मरायचं आहे का? असं होत राहिलं तर तू त्याच दिशेने जाताना मला स्पष्ट दिसते आहेस. अजून वेळ गेलेली नाहीये. या उपर तू आणि तुझं नशीब. ”

डॉ. तिथून निघून गेल्या. त्या पंधरा दिवसात निरुपमाचं वजन दोन किलो वाढलं. तिला मऊ भात खीर पचायला लागलं. हॉस्पिटल मधून जयाताईंनी निरुला त्यांच्या घरी नेलं.

निरुपमा आता थोडं थोडं खायला लागली. तिच्या अंगावर जरा तुकतुकी आली. आई तिला अगदी थोडं थोडं नवनवीन करून खायला घालायला लागली. निरु आता केतनच्या घरी गेली.

आता निरुपमाचं वजन नीट वाढायला लागलं. तिला अन्न पचायला लागलं. तिचं 42 किलो वजन हळूहळू करत 60 किलो पर्यंत आलं. निरुपमा पूर्वीसारखीच हसती खेळती आणि तेजस्वी दिसायला लागली.

या गोष्टीलाही सहज चार वर्षे झाली. डॉ. अनुराधांनी दवाखान्याचा व्याप कमी करत आणला.

त्या आता बऱ्याच वेळा परदेशात आपल्या मुलाकडे असत.

त्यादिवशी त्या अमेरिकेहून परत आल्या आणि कारची वाट बघत बाहेर थांबल्या होत्या. त्यांचा ड्रायव्हर कार घेऊन आला आणि त्यांची कार फूड मॉल जवळ थांबली. अनुराधा फ्रेश होऊन आल्या आणि एका टेबल जवळ बसून कॉफी पीत होत्या. समोरूनच एक मध्यमवयीन मुलगा आणि त्याच्या बरोबर एक मध्यम वयाची मुलगी त्यांच्याच दिशेने येताना त्यांना दिसले.

“ हॅलो डॉ अनुराधा. मला ओळखलं का? “

डॉक्टर जरा विचारात पडल्या आणि मग म्हणाल्या, “तुम्ही केतन मराठे का? ” 

प्रश्नार्थक नजरेने त्यांनी केतनबरोबरच्या मुलीकडे बघितलं.

केतन म्हणाला, “ हो. मी केतनच. बाई, तुम्ही डिस्पेन्सरीत कधी येणार आहात? मला तुम्हाला भेटायचं आहे.

हे माझं कार्ड बाई. डिस्पेनसरीत आलात की नक्की नक्की फोन करा. खूप काही बोलायचं आहे मला तुमच्याशी. ” 

बाई पुण्याच्या दिशेने निघून गेल्या आणि केतन मुंबईच्या.

जरा प्रवासाचा थकवा कमी झाल्यावर अनुराधा दवाखान्यात आल्या.

दुसऱ्या दिवशी त्यांनी केतनला फोन केला.

“ बाई, मी भेटायला उद्या येऊ का? ” त्याने विचारलं.

“ या की. या उद्या संध्याकाळी. ”

दुसऱ्या दिवशी केतन त्यांना भेटायला आला.

“ बाई, तुमच्याशी खूप बोलायचं होतं. पण समजलं तुम्ही इथे नाही. परदेशात गेला आहात. पण परवा अचानक भेट झाली आपली. मी काही कामासाठी मुंबईला गेलो होतो म्हणून तर अचानकच आपली भेट झाली” केतन म्हणाला.

“ ते जाऊ दे. निरुपमा कशी आहे? ठीक आहे ना सगळं? ”

केतन गप्प झाला. ”तेच सांगायचं आहे डॉक्टर तुम्हाला. आपण सगळ्यांनी अथक प्रयत्न केले, तुम्ही तिला त्या एक प्रकारच्या मानसिक आजारातून बाहेर काढले. नंतरचे काही महिने खूप छान गेले आमचे. निरु पुन्हा चांगली झाली, छान रहायला लागली. पुन्हा तिचा स्वतःवरचा कंट्रोल सुटला आणि वजन झालं 80 किलो. पुनः ती त्या वजन कमी करण्याच्या दुष्ट चक्रात सापडली. यावेळी तिने खाणेपिणे सोडले आणि ब्यूलीमियाने तिच्या मनाचा ताबा घेतला. मला तिची अवस्था बघवेना. तिला आम्ही अनेक वेळा ऍडमिट केले, पण तिची परिस्थिती गंभीरच होती. तिचं वजन तर आता 30 किलो झालं. उठता बसता येईना. हाता पायांच्या काड्या. सर्व रिपोर्ट्स अगदी वाईट होते हो तिचे. खूप प्रयत्न करूनही डॉक्टरांना तिला जगवता आलेच नाही. शेवटी म्हणायची, ‘ माझ्या हाताने मी माझा नाश करून घेतला. मला जगायचंय केतन. मला वाचवा. मला मरायचं नाहीये. ’ 

तीस हे कोणाचं मरायचं वय असू शकतं का हो डॉक्टर? बघवत नव्हती निरुपमा शेवटी. सगळे केस गळले, डोळे बाहेर वटारल्यासारखे दिसत. व्हील चेअर वर बसून असायची ती. खाणे तर जवळ येऊ सुद्धा द्यायची नाही. शेवटी मी तिला घरी आणलं. मग तर पाणीही पचेना तिला. हाल हाल होऊन मग गेली निरुपमा. आम्हा सगळ्याना अतिशय वाईट होते ते दिवस. तरणीताठी सून व्हील चेअरला खिळलेली. वाटेल ते बोलायची ती आम्हाला. ‘ मी इथे मरतेय आणि तुम्ही सगळे जेवा पोटभर. काहीही वाटत कसं नाही माझ्या समोर बसून हे खाताना? माझ्या पोटात अन्नाचा कण नाही. ’ बरं ती समजावून सांगण्याच्या पलीकडे गेली होती आता. काय वाटेल ते बोलायची ती. माझ्या आईवडिलांना, तिच्या आईला. ती गेली तेव्हा वाटलं, ती आणि आम्हीही सुटलो यातून. डॉक्टर, मीही तरुण आहे. फार फार सोसलं मी आणि आमच्या कुटुंबाने सुद्धा. तिच्या मृत्यूनंतर सैरभैर झालो मी. पण मग मला ही निकिता भेटली. तिनं सावरलं मला.

फार चांगली आहे निकिता. मी लग्न केलं तिच्याशी. परवा बघितलीत तुम्ही तिला. दिसायला ती निरु इतकी सुंदर नाही पण मला आता नकोच हो ते सौंदर्य आणि ती फिगर. मी सुखात आहे अगदी. हे सगळं सांगून मला खूप बरं वाटलं डॉक्टर. तिच्या आजाराच्या तुम्ही साक्षीदार आहात. “

अनुराधाने केतनच्या पाठीवर थोपटले. “ केतन, उत्तम केलंत तुम्ही लग्न केलंत. निरुपमासाठी आपण शक्य होतं ते सर्व केलं. पण हे लोक त्यातून फार कमी वेळा बाहेर पडतात. त्याच त्याच चक्रात पुन्हा पुन्हा अडकतात. निरुपमाचं तसंच झालं. ठीक आहे. तिचं आयुष्य तेवढंच होतं म्हणू या. ” 

… केतन त्यांचा निरोप घेऊन गेला आणि डॉ अनुराधाला हकनाक आयुष्याला मुकलेल्या निरुपमाबद्दल अतिशय वाईट वाटलं.

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अन्न तारी.. अन् अन्न मारीही… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ अन्न तारी.. अन् अन्न मारीही… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

कालच अगदी उत्साहाने जयाताई अनुराधाच्या दवाखान्यात शिरल्या. बरोबर त्यांची मुलगी निरुपमा होती.

“बाई हे घ्या पेढे. आमची निरु आता एमबीए झाली बरं. तिच्या इच्छेप्रमाणे केलं पूर्ण हो तिने एमबीए. आता मनासारखी नोकरी मिळाली की गंगेत घोडं न्हायलं एकदाचं. ” जयाताई हसून सांगत होत्या.

जयाताई अनुराधाच्या फार पूर्वी पासूनच्या पेशंट. त्या, त्यांच्या मुली, सगळं कुटुंब येत असे डॉ अनुराधाकडे. ती त्यांची फॅमिली डॉक्टरच होती.

“ वावा. निरुपमा, खूप खूप अभिनंदन हं. ” पेढा तोंडात टाकत अनुराधाने निरुपमाचं कौतुक केलं.

“ थँक्स ताई. मला बहुतेक मिळेल नोकरी. आलेत काही ठिकाणाहून इंटरव्ह्यू साठी कॉल. ”

…. निरुपमा जयाताईंची मोठी मुलगी. दिसायला छान, हुशार आणि अगदी साधी मुलगी.

सहाच महिन्यांनी जयाताई पुन्हा दवाखान्यात आल्या.

“ डॉक्टरीणबाई, आमच्या निरुचं भाग्यच उजळलं हो. अहो, तिच्या कंपनीतल्याच केतन मराठेला ही फार आवडली आणि मागणीच घातली बघा त्याने. नाव ठेवायला जागा नाही हो या स्थळात. बघा ना, देवाच्या मनात असलं की किती सरळ होतात ना गोष्टी. ”

जयाताई अगदी आनंदून गेल्या अनुराधालाही खूप आनंद झाला. निरुपमा होतीच गरीब स्वभावाची आणि समंजस शांत. कोणतीही तोशीस न पडता खरोखरच दारात जावई चालत आला आणि निरुपमाचं भाग्यच उजळलं. सोन्याच्या पावलांनी निरुपमाने केतनच्या घरात पाऊल ठेवलं.

मराठ्यांच्या घरी सगळे लोक अगदी सडसडीत. फिटनेस फ्रीक. अगदी निरुच्या सासूबाई सुद्धा रोज योगासनाच्या क्लासला जायच्या. सासरे टेनिस खेळायला जायचे. केतनही उत्तम टेनिसपटू होता. त्या मानाने निरुपमा चांगली भरलेली होती पण सुरेख होती तिची फिगर.

…. निरुपमा अगदी रुळून गेली सासरी. सासरी माहेरी लाड करून घेत आणि वर्षसण, दिवाळसण करत मस्त मजेत होती निरु केतनची जोडी. निरुपमाची नोकरीही चालू होती आणि सासरी नोकरचाकराना काही कमी नव्हतं.

मध्यंतरी डॉ अनुराधा त्यांच्या मुलाकडे अमेरिकेला चार महिने गेल्या होत्या. लेकाकडे जाऊन, जमेल तेवढी अमेरिका बघून अनुराधा चार महिन्यांनी दवाखान्यात आल्या.

दवाखाना उघडा दिसताच त्यांचे नेहमीचे पेशंट्स आलेच भेटायला. अनुराधाने आठवणीने आणलेली तिकडची चॉकलेट्स येतील त्यांच्या हातावर ठेवली. तिचा नेहमीचा दवाखाना सुरू झाला. जवळजवळ सहा महिन्यांनी निरुपमा त्यांना भेटायला आली. तिला बघून आश्चर्यचकित झाल्या अनुराधा.

…. चवळीच्या शेंगेसारखी सडसडीत निरु केवढी जाड म्हणजे लठ्ठच झालेली दिसत होती. मान रुतली होती जणू खांद्यात.

निरुपमाने खुर्चीत बसकण मारली. , ” डॉक्टरबाई, हादरलात ना मला बघून? अहो गेल्या वर्षभरात माझं अतिशय वजन वाढलंय. काय करू काही समजत नाहीये. ब्लड रिपोर्ट्स सगळे नॉर्मल आहेत. मी डाएट केलं, जिम लावला, टेकडी चढायला जाते. थोडं कमी होतं की पुन्हा आहे तिथेच येतो काटा. ” अगदी निराश होऊन निरुपमा सांगत होती. “ आता मात्र मला काळजीच वाटायला लागलीय माझी. या लठ्ठपणामुळे माझा पिरियड वेळेवर येत नाही. अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. काय करू मी? ” निरुपमाच्या डोळ्यात पाणी होतं.

अनुराधाने नीट चौकशी केली. निरुपमा आणि केतनची लाईफ स्टाईल याला कारणीभूत होती.

पण मुळात केतनची शरीर प्रवृत्ती लठ्ठ होण्याकडे नसल्याने त्याचे वजन काहीही खाल्ले तरी अजिबात वाढत नसे. समाजातले तीस टक्के लोक या सुदैवी गटात मोडतात. पण निरुपमाचं वजन मात्र झपाट्याने वाढलं ते वाढतच गेलं.

केतन तिला बजावू लागला. ” निरु, जरा मनावर घे आता डाएट करायचं. तुला बरोबर घेऊन जायची आता लाज वाटायला लागलीय मला. “

…. निरुपमाला हे ऐकून अतिशय राग यायचा आणि मग त्याचं भांडणात रूपांतर व्हायचं. असं झालं की निरुपमा डबे उघडून ते सगळं फ्रस्ट्रेशन खाण्यावर काढायची. परिणामी महिन्याला आणखी दोन किलो वजनाची भर.

…. एक दिवस तिची जिवलग मैत्रीण तारा तिच्या घरी भेटायला आली. तारा तिचं लग्न झाल्यावर अमेरिकेला कायमचीच गेली होती. ताराने निरुला बघितलं आणि म्हणाली, ” अग काय हे. दुप्पट वजन वाढलं आहे तुझं. किती अफाट लठ्ठ आणि बेढब झाली आहेस निरु. कुठे पूर्वीची सुंदरी निरु आणि आत्ताची वारेमाप अस्ताव्यस्त वाढलेली निरु. ”

निरुपमा रडायला लागली. “ तूच शिल्लक होतीस आता हे म्हणायची. काय करू मी? ”

तारा म्हणाली. “ मी करते तसं करशील का? महिन्यातले आठ दिवस फक्त वॉटर डाएट करायचं. नंतर सुद्धा फक्त एकदा दुपारी जेवायचं. रात्री एक फळ खायचं. बघ करून.”

निरुपमाला हे सोपे वाटले. तिने निश्चय केला. त्या पूर्ण आठ दिवसात ती फक्त गरम पाणी पीत राहिली.

वजनाचा काटा चक्क तीन किलोने खाली आलेला दिसला. निरुला आनंदाश्चर्याचा धक्काच बसला.

अरे. आठ दिवस आपण फक्त पाणी पिऊन राहू शकतो? म्हणजे निश्चय केला तर हे सहज शक्य आहे तर.

निरुपमाने आता मनावर कंट्रोल करायचं ठरवलं. त्या दिवसापासून ती फक्त गरम पाणी पिऊन रहायला लागली.

सगळे जेवायला बसले की निरुपमा म्हणायची ‘ मला आत्ता भूक नाहीये. मी नंतर जेवते. ’

निरुपमाने रात्रीही जेवण सोडलं. त्या महिन्यात तिचं एकंदर सात किलो वजन कमी झालं.

केतनने कौतुक केलं. “ निरु, छान दिसायला लागलीस ग. काय करतेस हल्ली? नीट जेवतेस ना? अति डाएट करू नकोस हं. वाईट परिणाम होतात त्याचे. ”

“ नाही रे. मी अगदी नीट जेवते. तू काळजी करू नकोस. ” निरुपमाने केतनला खोटं सांगितलं.

एकदा सासूबाई म्हणाल्या, ”आज तू आमच्या बरोबरच जेवायला बसायचं आहेस. ये. आम्ही तुझी जेवणाच्या टेबलवर वाट बघतोय. ”

निरुपमाचा नाईलाज झाला. ती त्यांच्याबरोबर जेवायला बसली खरी. पण गेले दोन महिने तिच्या पोटात फक्त पाण्याशिवाय काहीही नव्हते. ते अन्न बघून तिला मळमळू लागलं आणि न जेवता ती उठून बाथरूम मध्ये जाऊन भडभडून ओकली. सासूबाई हे बघून अत्यंत घाबरून गेल्या. त्यांनी हा प्रकार केतनच्या कानावर घातला. केतनने निरुपमाला बळजबरीने भात खायला लावला.

“ नको रे, माझं वजन पुन्हा वाढेल “.. असं म्हणत निरुपमा बेसिन वर गेली आणि तिने तो ओकून टाकला.

आठ महिने झाले आणि 75 किलो वजन असलेली निरुपमा 50 किलो वर आली. निरुपमाला आता अन्नच नकोसे झाले. तिचं शरीर अन्न नाकारुच लागलं. केतन निरुपमाला घेऊन डॉ अनुराधांच्या डिस्पेनसरीत आला.

डॉ अनुराधा निरुला बघून हादरल्याच. खोल गेलेले डोळे, भकास चेहरा, अंगात अजिबात ताकद नाही. लटपटत होती ती चालताना. अनुराधाने केतनला बाहेर थांबायला सांगितलं.

“ निरु, आता नीट आणि सगळं खरं खरं सांग. या आठ दहा महिन्यात आरशात बघितलं आहेस का कधी? काय दशा करून घेतली आहेस अग? असा करतात का कोणी वेट लॉस? मूर्ख मुलगी. सांग बघू तू काय खातेस सकाळपासून सगळं सांग. ”

निरुपमा हसायला लागली. “ डॉक्टर, मी फक्त गरम पाणी पिते. गेले आठ महिने हेच अन्न आहे माझं. बघा. कोण म्हणेल आता मला जाड? दिसतेय ना मी पूर्वीची चवळीची शेंग?”

… अनुराधाला इतका संताप आला की या मूर्ख मुलीच्या दोन थोबाडीत ठेवून द्याव्यात. त्यांनी मुश्किलीने आपल्या रागावर ताबा ठेवला.

“ निरु, माझं ऐक. आता तू खरोखर छान दिसते आहेस. आजपासून रात्री थोडं जेवायला सुरवात कर बाळा. अगदी चार घास तुला आवडेल ते खायला लाग. मी तुला मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या देते त्या घ्यायला लाग. म्हणजे तू हेल्दीही रहाशील. एक महिन्याने हिला घेऊन या केतन.”

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुहास… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ सुहास… ☆ श्री सुनील शिरवाडकर

“अगं माझा गॉगल सापडत नाहीये.. बघितला का कुठे”

सुहासची नेहमीची चिडचिड चालू झाली. त्याला सगळ्या गोष्टी जागच्या जागी हव्या असायच्या.. कपडे, शुज, गॉगल.. आणि ते तसं असायचं ही.. पण मग एखादे वेळी त्याच्याच हातुन कुठे काही ठेवलं जायचं.. मग ते सापडायचं नाही.. आणि मग ही चिडचिड.

दिपानं टिव्हीवर ठेवलेला ब्राऊन कलरचा बॉक्स त्याच्या हातात ठेवला.. सुहासनं तो उघडला.. आतुन हिरव्यागार काचेचा रे बॉनचा गॉगल डोळ्यांवर ठेवला.. आरशासमोर उभा राहिला.

मस्तच.. स्वतः वरच तो खुश झाला.. बाकी काही असो.. त्यांची पर्सनलीटी.. टापटीपपण मात्र वाखाणण्याजोगा होता.. लिवाईस जीन्स.. पीटर इंग्लंडचा शर्ट.. ब्रॅण्डेड शुज.. डोळ्यांवर रे बॉनचा गॉगल.. कपाटातून त्याने पार्क ॲव्हेन्युचा परफ्यूम काढला.. हात वर करुन.. इकडे तिकडे फुसफुस केला.. आणि बाहेर पडला.. अशा थाटात की, जणु काही ऑफिसलाच निघाला..

सुहास नेहमीच रिक्षाने फिरायचा.. आजही तो रोडवर आला.. रिक्षा दिसतीये का ते पहात होता.. एकमेव रिक्षा स्टँडवर उभी होती..

सुहासला रिक्षाच्या, ट्रकच्या मागे लिहिलेली वाक्ये वाचण्याचा छंद होता.. आज त्याने जी रिक्षा केली.. त्या रिक्षाच्या मागे एक वाक्य लिहिलं होतं..

समय से पहेले भाग्य से अधिक 

किसीको कुछ मिलता नहीं

क्या बात है.. सुहास मनही मन खुश झाला.. खरंच.. आज अपना समय आनेवाला है.. आज आपलं भाग्य उजाडणार आहे हे नक्की.. तो थेट रिक्षात जाऊन बसला.. किती पैसे घेणार वगैरे काही विचारलं नाही..

पुढच्या चौकात रिक्षा एका मेडिकल स्टोअर समोर त्यानं सोडून दिली.. हे त्याच्या मित्राचं दुकान होतं.. काऊंटरवरची फळी उचलुन तो आत गेला..

“गजा.. फोनपे आहे ना तुझ्याकडे?लग्गेच पंचवीस हजार ट्रान्स्फर कर बरं”

गजाला हे सवयीचं झालं होतं.. प्रत्येक वेळी सुहास येणार.. काही पैसे मागणार.. तो थोडे आढेवेढे घेणार.. हजार मागितले की पाचशे देणार.. पण आज एकदम पंचवीस हजार?

“अरे यार.. मागचे किती बाकी आहे माहीतीय का?”

“अरे यार गजा.. तु भी क्या.. सारखं पैसा पैसा करत असतोस.. आत्ता संध्याकाळी तुला पन्नास हजार देऊन टाकतो.. “

“नेहमीच तु असं काही काही सांगतोस.. आणि गेला की तिकडेच जातो. “

हो.. ना करता करता गजानं पैसे दिले.. थॅंक्यु थॅंक्यु करत सुहास बाहेर पडला.. दुसरी रिक्षा केली.. आणि एका बकाल वस्तीच्या कोपऱ्यावर सोडून दिली.. तेथे त्याचा मित्र शाम्या त्याची वाटच पहात होता.

सुहास आज पहिल्यांदाच मटक्याच्या अड्ड्यावर जाणार होता.. नेहमी तो‌ लॉटरी खेळायचा.. अलीकडे ऑनलाईन गेम्स मध्ये पण पैसे घालवायचा..

हो.. त्याला कधी जिंकणं माहीत नव्हतंच.. चार वेळा पैसे घालवायचा.. आणि एखादं वेळी जिंकायचा.. सुहासला दुसरा कामधंदा नव्हताच.. बायको बॅंकेत नोकरी करायची.. घर चालवायची.. आणि हा तिच्या जीवावर लॉटरी खेळायचा.. सगळे सांगून थकले.. पण त्याच्यावर परीणाम ढिम्म.

गयावया करून बायको कडून पैसे घ्यायचे.. आणि जुगारात उडवायचे हेच त्याचं आयुष्य झालं होतं.. कधीतरी मग एखादे वेळी लॉटरी लागायची.. मग.. पोरावर ते पैसे खर्च करायचे.. त्याला भारीतले कपडे, शुज आणायचे.. ते लहान मुल त्याला भुलायचं.. त्यामुळे झालं होतं काय.. पोराचं आणि बापाचं चांगलं पटायचं..

अशातच एकदा त्याची ओळख शाम्याशी झाली.. तोही जुगारीच.. त्यानं सांगितलं.. हे लॉटरी बिटरी सोड रे.. माझ्याबरोबर एकदा अड्ड्यावर चल..

कुठला अड्डा?तर मटक्याचा अड्डा. सुहास तिथं कधी गेला नव्हता.. आज शाम्याबरोबर पहिल्यांदा जाणार होता.. त्याला खुप उत्सुकता होती.. आजवर फक्त ऐकून होता तो मटक्याबद्दल..

“कुठे जायचं आपल्याला नक्की?”

“ते काय.. त्या गल्लीत”

“अरे तिकडे तर कचरा कुंडी दिसतेय”

“तु चल फक्त माझ्या मागुन. “

नाक मुठीत धरुनच सुहास शाम्याच्या मागुन निघाला.. थोड्या अंतरावर एक पडकं घर दिसलं.. दरवाज्याला एक कळकटलेला पडदा लावला होता.. तो बाजूला करून दोघे आत शिरले.. आत गेल्यावर एक वेगळीच दुनिया त्याला तिथे दिसली.. एका भिंतीवर फळा टांगला होता.. त्यावर खडुने खुप आकडेमोड केली होती.. मुंबई.. कल्याण असंही काही लिहीलं होतं.. चार पाच जण उभ्या उभ्या हातात असलेल्या छोट्या बुकमध्ये काही लिहीत होते.

“हे बघ.. ओपनचं बुकिंग सुरु आहे.. किती लावायचे? आणि कुठली फिगर?”

“मला त्यातलं काही माहीत नाही.. पंचवीस हजार रुपये आहे माझ्याकडे.. कसे लावायचे.. कुठे लावायचे तुच सांग मला “

मग अर्धे अर्धे असे दोन ठिकाणी लावायचे ठरवले. तो जो बुकी होता, शाम्याने त्याच्या जवळ पैसे दिले.. पट्टा लाव.. जोड लाव.. असं त्या बुकीला शाम्या काहीतरी सांगत होता.

बसच्या तिकीटापेक्षाही लहान पातळ गुलाबी कागदावर त्या बुकीनं काहीतरी लिहीलं.. दोन चिठ्ठ्या बनवल्या.. त्या सुहास कडे देऊन त्यानं सांगितलं..

“दुपारी चार वाजता आकडा फुटेल.. आपण येऊ त्यावेळी.. या चिठ्ठ्या मात्र जपुन ठेव.. माझा अंदाज आहेच आज अठ्ठा येणार आहे.. वळण घ्यायला येऊ आपण चार वाजता. “

“वळण?ते काय असतं?”

“अरे वळण म्हणजे पेमेंट.. कुठला तरी एक आकडा नक्की लागणारच आहे.. लिहून ठेव. “

सुहासनं मोबाईलचं कव्हर काढलं.. आत ती चिठ्ठी ठेवली.. पुन्हा कव्हर घातलं.. पडदा बाजुला करुन त्या अड्ड्यावरुन बाहेर पडला.. रिक्षा केली ती थेट घरापर्यंत.. घरी येऊन जेवण करून त्याने मस्तपैकी ताणून दिली.

चार वाजता उठून.. मस्त आवरुन अड्ड्यावर हजर.. आज त्याला खुप हुरहुर लागली होती.. शाम्या म्हणतो तसा आकडा लागला तर लाखांमध्ये पैसे मिळणार होते.. पुन्हा एकदा नाक मुठीत धरून तो अड्ड्यावर आला.. शाम्या तिथं होताच.

“काय रे.. काय झालं.. आला का आकडा आपण लावलेला?”

“थांब जरा वेळ.. पंधरा वीस मिनिटात येईलच “

पंधरा मिनिटांनी जरा हलचल झाली.. एक जण स्टुलवर चढला.. हातातल्या खडुने त्यानं टांगलेल्या फळ्यावर काही आकडे लिहिले.. ते आकडे पाहुन अनेक जण तिथुन निराश होऊन निघून गेले..

“चल रे.. “

“का? काय झालं.. आपला आकडा आला?”

“नाही.. तु इथुन चल.. आपण उद्या परत येऊ.. उद्या नक्की येईल.. तु पैसे घेऊन ये”

सुहासच्या लक्षात आलं.. आपले पैसे गेले.. खुपच नर्व्हसनेस आला त्याला.. खरंतर त्याला हे असं हरण्याची सवय होतीच.. पण आज कसं? मोठी रक्कम गेली होती ना त्याची!

हताश होऊन तो बाहेर रस्त्यावर आला.. रिक्षा शोधु लागला.. एक रिक्षा त्याला मिळालीही.. आत जाऊन तो बसला.. घराचा पत्ता सांगितला..

आज मात्र त्या रिक्षाच्या मागे लिहीलेलं वाक्य वाचायचं तो विसरला होता.. त्या रिक्षावर लिहीलं होतं..

‘समय से पहेले भाग्य से अधिक..

मेहनत करनेसेही सबकुछ मिलता है

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ती रक्त चंदनाची पहाट… ☆ श्री संदीप काळे ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

?जीवनरंग ?

☆ ती रक्त चंदनाची पहाट… ☆ श्री संदीप काळे ☆

मी विदर्भाच्या दौऱ्यावर होतो. उन्हाळा जोरात सुरू झाला होता. सकाळी आठ वाजता जोराने ऊन लागत होते. रस्त्याच्या कडेला पळसाच्या झाडावर लालभडक असलेली फुलं लक्ष वेधून घेत होती. एक व्यक्ती धोतर कमरेला खोवून पळसाच्या झाडावर चढून फुले तोडत होती. त्या व्यक्तीला पाहून मला राहवलं नाही. मी रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि त्या वर चढलेल्या व्यक्तीला म्हणालो, “दादा जरा दोन-चार फुले मला द्या ना. “

माझा आवाज ऐकून त्या व्यक्तीने हातामध्ये असलेली फुले माझ्या दिशेने खाली फेकली. मी त्या फुलांचा झेल घेण्याचा प्रयत्न केला, त्यातून अर्धी फुले हातात राहिली आणि आर्धी फुले खाली पडली. असे वाटत होते, त्या फुलांच्या स्पर्शाने धरणीमाता ही आनंदून गेली असेल. हातात पडलेली ती फुले मी तशीच छातीला घेऊन कवटाळली. त्या फुलांमुळे वसंत ऋतू एवढ्या उन्हामध्ये किती प्रसन्नतेने आपलं स्वागत करत आहे, असेच मनोमनी वाटत होते.

मी ती फुले घेऊन आता निघणार, तितक्यात माझे लक्ष त्या फुले तोडणाऱ्या व्यक्तीकडे गेले. तो इतक्या गडबडीने एवढी फुले का तोडत असेल, असा मला प्रश्न पडला होता. तो फुले तोडायचा आणि त्या रिकाम्या थैलीमध्ये टाकायचा. त्या व्यक्तीची थैली आता भरत आली होती. मी थोडे जवळ जाऊन त्या व्यक्तीला विचारले, “एवढी फुले कशाला हवी आहेत?”

तो म्हणाला, “रंग करायला. “

मला माझे बालपण आठवले, मी लहानपणी होळीला याच फुलांचा रंग करायचो. मी त्या व्यक्तीला म्हणालो, “तुम्ही फार हौशी दिसताय. या काळातही ह्या फुलांचा रंग करताय म्हणजे कमाल आहे तुमची. “

तो म्हणाला, “साहेब मुलींसाठी करतोय, त्यांना या मुलांचा रंग फार आवडायचा. त्यांच्या आठवणीत मी आणि माझी बायको दोघेजण दर वर्षी रंगपंचमीला त्यांच्या समाधीला या फुलांच्या रंगाची अंघोळ घालतोय. “

मला त्या वडिलांची असलेली भावना पाहून आश्चर्य वाटलं. मी काही न बोलता तिथेच थांबलो. तो माणूस खाली आला. कमरेला खोवलेले धोतर त्याने सोडले. त्याच धोतराने त्याने डोक्यावर आलेला घाम पुसला.

मी म्हणालो, “काय झाले होते मुलीला. “

तो म्हणाला, “काय सांगावे, साहेब, खूप मोठी कहाणी आहे. जाऊ द्या. काळाने माझ्या दोन्ही मुली माझ्यापासून हिरावून घेतल्या. ” तो त्या पुढे काहीही न बोलता पुढे जात होता आणि मी त्याच्या मागे. आमचे बोलणे सुरू असताना तो व्यक्ती मधेच म्हणाला, “साहेब वाट छोटी आहे. त्यात आजूबाजूने इर्षेतून भावकीने काटे टाकले आहेत. “

 मी म्हणालो, “भावकीने अर्जुनालाही सोडले नाही, आपण कोण?”

 माझे बोलणे एकूण तो व्यक्तीही हसला. आता तो माझ्याशी बोलण्यात हळू हळू खुलत होता. आमचे बोलणे सुरू असताना, दुरून एका महिलेने आवाज दिला, “अहो काय करून राहिले, चला ना लवकर, किती वेळ आहे अजून, मला उन्हाच्या अगोदर घरी पोहचायचे आहे. ”

मला त्या व्यक्तीच्या मागे पाहून त्या बाईच्या आवाजाचा सूर थोडा कमी झाला. आम्ही आंब्याच्या झाडाखाली असलेल्या लाकडी पलंगावर बसलो. बाजूला पाण्याचा माठ भरला होता. त्या माठातले पाणी थंड राहावे यासाठी त्यावर ओले करून फडके टाकले होते. ती व्यक्ती त्यांच्या बायकोला माझी ओळख करून देत म्हणाली, “साहेब मुंबईचे आहेत. यवतमाळला जात आहेत. राजश्री आणि विजयश्री विषयी त्यांना मी सांगितले, त्यांना फार वाईट वाटले. बोलत बोलत आले माझ्यासोबत. “

त्या माऊलीने मान हलवत मला पाणी दिले. मी ती व्यक्ती आणि त्यांची पत्नी आम्ही बोलत बसलो. कुणाच्याही वाट्याला एवढे दुःख येऊ नये, एवढे दुःख या दोघांच्या वाट्याला आले होते. जगावे तर का? आणि मरावे तर का? असा प्रश्न त्या दोघांच्या समोर निर्माण झाला होता.

शेतकरी मोठा असो की छोटा, सततची नापिकी, पिकले तर चांगला भाव नाही, हे सर्व शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेले. शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था कोणी विचारू नये आणि कुणी सांगूही नये अशीच होती आणि आहेही.

मी ज्यांच्याशी बोलत होतो ते त्रंबक जाधव आणि त्यांची पत्नी देवकी जाधव यवतमाळ पासून जवळच एका खेडेगावात राहतात. त्यांच्याकडे वडिलोपार्जित २७ एकर जमीन होती. त्यातून विकून विकून त्यांच्याकडे आता तीन एकर जमीन आहे. त्यांच्या राजश्री आणि विजयश्री या दोन मुलींनी दोन वर्षांपूर्वी स्वतःचे आयुष्य संपवले.

राजश्री आणि विजयश्री या दोघींच्या लग्नाची घरात चर्चा सुरू होती. पाहुणे यायचे, पसंत करायचे आणि हुंड्यासाठी आग्रह धरायचे, मोठे लग्न करून द्या म्हणून आग्रह धरायचे. खूप मागणीमुळे लग्न काही जमेना. त्रंबक आणि त्यांची पत्नी देवकी यांची काळजी दिवसेंदिवस वाढत होती.

आई वडिलांना होणारा त्रास दोन्ही मुलींना पाहवत नव्हता. त्याच काळात हुंड्यासाठी, कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बातम्या सतत कानावर पडत होत्या. त्रंबक म्हणाले, “माझ्या दोन्ही मुली मरणाच्या आठ दिवस अगोदर रात्री एक झोपायची एक जागी राहायची. आम्हा नवरा-बायकोला हे का होत होते हे कळाले नाही. आम्ही जेव्हा खोलीमध्ये जाऊन माहिती घेतली तर कळाले. मी काही टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या वगैरे तर करणार नाही, याची काळजी त्या त्या दोघींना वाटायची, म्हणून त्या रात्री जागी राहायच्या, माझ्या मागे मागे शेतात यायच्या. मरणाच्या आदल्या रात्री आम्ही खूप गप्पा मारल्या, दोन्ही पोरी खूप मोठ्या झाल्यासारख्या आमच्याशी बोलत होत्या. आमच्या दोघांचे पाय दाबत होत्या. ‘बाबा तुम्हाला कशाचेही टेन्शन येणार नाही, तुम्ही नका काळजी करू. पुढच्या जन्मी आम्ही दोघीही मुले म्हणून तुमच्या पोटाला जन्माला येऊ. ‘

चंदनाचा लेप उगाळताना मुलींच्या गप्पा सुरू होत्या. राजश्री म्हणाली, ‘बाबा मी पळसाची फुले रंगासाठी भिजवली आहेत, या वर्षी तुम्हीही आमच्यासोबत रंग खेळाल ना? आम्ही दोघी कुठेही असो, बाबा आम्हाला दर रंगपंचमीसाठी याच फुलांचा रंग पाहिजे हा?’ त्रंबक म्हणाले, ‘हो बेटा, नक्की मिळेल, का नाही. ?”

असे आम्ही दोघे बोलताना मध्येच देवकी म्हणाल्या, “दोन्ही मुली अशा का बोलतात याचे मला खूप आश्चर्य वाटले, “

त्रंबक म्हणाले, “का कुणास ठाऊक, त्या रात्री सकाळी सकाळी काहीतरी वाईट घडणार आहे, असं मला मनोमनी वाटत होते. त्या दिवशी सकाळी सकाळी घरात दोन मांजरांच्या भांडणात डब्बे खाली पडले आणि आम्हाला जाग आली. आमची दोघांची नजर मुलींच्या अंथरुणाकडे गेली, तिथे मुली नव्हत्या. आमच्या पोटात एकदम धस्स झाले. अशा मुली न सांगता कुठेही गेल्या नाहीत, एकदम गेल्या कुठे असे आम्ही एकमेकांना विचारत होतो. तेव्हढ्यात माझ्या भावाचा मुलगा पळत घरी आला आणि म्हणाला, ‘मोठे बाबा शेताकडे चला, दोन्ही पोरींनी फाशी घेतली. ‘

आम्ही रडत पडत शेतात गेलो, तेव्हढ्या सकाळी अवघे गाव आमच्या शेतात जमले होते. आम्ही रात्री झोपलो होतो, पण मुलींनी झोपल्याचे सोंग घेतले होते. आम्ही झोपल्यावर मुली घरातला मोठा दोर घेऊन कधी शेतात गेल्या आम्हाला कळाले नाही. सकाळी आम्ही शेतात जाऊन पाहिले तर काय दोन्ही मुलींनी गळ्याला फास लावून आत्महत्या केली होती. त्या झाडाला लटकत्या मुली पाहून आम्ही दोघेही बेशुद्ध पडलो.

आम्हाला जाग आली तेव्हा दोन्ही मुली स्मशानात होत्या. आम्हीही तिथे पोहचलो. रडण्यासाठी शरीरात ताकत नव्हती. रात्री जे चंदन मुलींनी उगाळून काढले होते, ते चंदन पहाटे रक्त चंदन होऊन येईल असे कधी वाटले नव्हते. ” ते दोघेही मुलींची आत्महत्यांची कहाणी सांगून हामसू हामसून रडत होते.

त्या दोघांची समजूत काढण्याची माझी हिंमत होत नव्हती. शेवटी रडून रडून रडणार तरी किती? ते दोघेही उठले, स्वतःला सावरत त्यांनी त्या पळसाच्या फुलांचा रंग केला. ज्या ठिकाणी त्या दोन्ही मुलींची समाधी होती, तिथे तो रंग टाकला. एकीकडे त्या पळसाच्या फुलांचा अभिषेक त्या मुलींच्या समाधीवर होत होता, तर दुसरीकडे अभिषेक करणाऱ्या आई बाबांच्या डोळ्यातील अश्रूही त्या रंगात मिसळत होते. ते सारे दृश्य पाहून माझ्यासारख्या हळव्या मनाच्या माणसाचे अश्रू डोळ्यांतून बाहेर येत होते.

त्यांना थोडीबहुत मदत करून, मी त्या दोघांचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. शेती करणाऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे, याचे देणे घेणे कुणालाही नाही. त्रंबक जाधव आणि त्यांची पत्नी देवकी जाधव यांच्यासारखे हतबल शेतकरी कुटुंब आपल्या अवतीभवती तुम्हाला भेटतील, त्यांना नक्की मदत करा, त्यांना आधार द्या. बरोबर ना.

© श्री संदीप काळे

९८९००९८८६८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘अफलातून अभिनंदन…’ ☆ श्रीमती समीक्षा तैलंग ☆

श्रीमती समीक्षा तैलंग

?जीवनरंग ?

☆ ‘अफलातून अभिनंदन…’ ☆ श्रीमती समीक्षा तैलंग  ☆

आज सकाळी-सकाळी गणेशाचे नांव घेऊन घराच्या बाहेर पडले. अहो! पडले म्हणजे पडले नाही बरं का! म्हणजे सकाळी वॉक करायला निघाले. पडून राहणे किंवा पडणे हे दोन्हीच टाळायला ह्या वयात वॉक करणे गरजेचे आहे की नाही!

रस्त्यावर चालताना मागून ओळखीचा आवाज कानाच्या पडद्यावर पडताच जोराने कंपन व्हायला लागले. एवढ्या जोराने हाक मारायला काय झालं? जणू ट्रेनची हॉर्नच मागून सोडली असावी. रेलगाडी पण उगाच हॉर्न वाजवत येते. लोकं घरून उशिरा निघतील पण प्लेटफॉर्म क्रॉस करायला गाडीच्या रुळाचाच वापर करतील. अहो त्यांचा सिद्ध अधिकार आहे! तसेच रुळाच्या कडेला ढुंगण उंच करून बसणारे सुद्धा तसेच राहणार. रेल्वेने कितीही स्वच्छता मोहिमी चालवल्या तरीही त्यांच्या बुद्धीत प्रकाश पडणे शक्यच नाही. तिथे असलेल्या शेणाची सफाई कोण करणार!

“बाब्या काय रे कशाला ओरडून घसा कोरडा करतोयेस! हे पुण आहे. विसरला कां? सायकलीची हवा काढणारे बेशिस्त म्हणायला सोडणार नाही बरं का!”

“काकू तुला बधाई द्यायला आलो. ‘हॅपी हिंदी डे’. ”

“थैंक्यू रे! पण बाब्या तुला कसे माहीत की आज हिंदी दिवस आहेत? तुझा तर काहीच संबंध नाही हिंदीशी. खरं तर गोड तेल खाणाऱ्यांना कडू तेलाचा स्वाद कसा कळणार?”

“काकू सोशल मिडिया झिंदाबाद! जिकडे डोळे फिरवा तिकडे हिंदीच दिसतेय. आता हिंदी नस्ती भाषा राहिली कां? ब्रॅण्ड झालाये काकू! ब्रॅण्ड! माझ्या मित्राने आत्मनिर्भर भारतात नवा धंदा सुरू केला आहे. माहितीये काय नांव ठेवलंय त्याने! ‘जल’ हे त्याच्या कंपनीचे नांव आहे. त्याला कुठे हिंदी विंदी येते. सगळी कामे इंग्रजीत करतो पण ठसका पाहा त्याचा! एकदम बत्तीस कॅरेट सारखा चमकतोय त्याचा ब्रॅण्ड”.

“काय विकतो रे! पाणी?”

“अगं हे असले काम तो काय करणार! चाळीत टोळ्या राहतो न तोच आपल्या खडखड्या डंपर मधे पाणी आणतो. सद्याला हेच सगळं करायचं असतं तर एवढं शिकला कशाला असता? शिक्षणात केवढा पैसा इन्वेष्ट केलाय त्यानं! पाण्या सारखा वेष्ट करणार कां?”

“हो खरंय! मोफत मिळालेल्या वस्तुंना किंमत नसतेच. पाणी वायफळ घालवू शकतो. पैसा कसा घालवणार?”

“अगं काकू! सद्या वॉटर स्पोर्ट्स करवतो. त्या शिवाय शोकीनांना क्रूज, बोटी सगळं भाड्यावर देतो. मोठमोठे फिल्मस्टार पण येतात. हे सगळं ‘जल’ मुळे होतये. नावामुळे कष्टंबर मिळतात. मी पण असेच काही एडवेंचर करायला बघतोयं. पण करणार हिंदीतच. सध्याच्या काळाचा फॅशन आणि डिमांड आहे हिंदी!”

“मग शीक खरं!”

“शिकून काय करणार काकू! कष्टंबर हिंदीत कुठे बोलतात! आणि थोडी फार तर मला पण येतेच. आपल्या बिझनेसचे नांव मी हिंदीतच ठेवणार हे खरंय”.

“खरंय बाब्या! हिंदी गाजणार नाही पण तुम्हाला चमकावणार”.

“काकू तू परदेशात होती. तेथे फराटेदार इंग्रजी चालते न?”

“तेथे इंग्रजी खरच चालते. आपल्याकडे एक्स्प्रेसच्या स्पीडने धावते. किती माणसं तुटक बोलतात पण कोणी खाली पाहायला नाही दाखवत. तेथे अभिमानाची भाषा नाहीये ही. नुस्त ब्रिजचे काम करते. दोन माणसांना जोडते. आपल्या कडे उलट आहे. बाराखडी येत असे नसे पण अल्फाबेटस् सगळ्यांना येतात. नशीब पाहावे की बुलेट ट्रेन नसून आपल्या कडे त्या स्पीडने इंग्रजी धावते. आपलं सोडून पाळत्याच्या माघे धावणं हीच परंपरा आहे आपली. आपल्या कडे इंग्रेजी हाईक्लास आणि हिंदी विदाउट क्लास आहे”.

“काकू पुढं वाढायचं असेल तर इंग्रजी कम्पलसरी आहे”.

“माझा भाचा जपानला गेला तर तेथे त्याला जापानी शिकावी लागली. जेवढे वर्ष तेथे होता इंग्रजी घश्याबाहेर पडली नाही. तिची फास लागली नाही. तेंव्हाच मी समजले की भाषा मुळे आपले विचार आणि संस्कृती बदलते. इंग्रजी बोलता बोलता आपण त्यांचे संस्कार पण घेतलेच न”.

“तू एकदम बरोब्बर म्हणतेयेस काकू! चल आता मी निघतो. इंग्रजीच्या ट्यूशनाला जायची वेळ झाली आहे. बॉय!!”

© श्रीमती समीक्षा तैलंग 

(ग्वाल्हेर, सध्या पुणे)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘प्रेमळ आदेश…’ – भाग- २ –  मूळ हिन्दी लेखक – अनामिक ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘प्रेमळ आदेश…’ – भाग- २ –  मूळ हिन्दी लेखक – अनामिक ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

(आता मला त्यांना चिडवायला आणि छेडायला खूपच मजा येत होती. अशा स्थितीत काकूंनीही हसत हसत मला पूर्ण साथ दिली.) – इथून पुढे —- 

आम्ही संध्याकाळी ऑफिसमधून परतलो की काकू चविष्ट नाश्ता बनवून आमची वाट पाहत असायच्या. आता सकाळ संध्याकाळ भाज्या चिरून, कोशिंबीर आणि विविध प्रकारच्या चटण्या तयार करून ठेवतात. त्या अनेकदा पीठही मळून ठेवायच्या. हे सर्व पाहून दिवसभरात त्या क्षणभरही बसत नसतील असे वाटले.

आता घरातील प्रत्येक वस्तू आपापल्या जागी नीटनेटकी ठेवली असते, ज्या आधी वेळेअभावी वापरानंतर इकडे तिकडे पडायच्या.

एका सुट्टीच्या दिवशी आम्ही काकूंना मॉलमध्ये फिरायला घेऊन जात होतो. वाटेत एका ठिकाणी त्यांनी गाडी थांबवायला सांगितल्यावर आम्हाला आश्चर्य वाटले. तरीही राकेशने ताबडतोब गाडी थांबवली तेव्हा काकू लगेच खाली उतरल्या आणि जवळच्या एटीएमच्या दिशेने निघाल्या. अवघ्या दोन मिनिटांत त्या नोटा हातात घेऊन परत आल्या.

आमच्या चेहऱ्यावर आश्चर्य बघून त्या म्हणाल्या, “आश्चर्यचकित होऊ नका. ” माझी परिस्थिती लक्षात घेऊन मी हे कार्ड हॉस्पिटलच्या सामानासोबत ठेवले होते. दवाखान्यात पैशाची गरज तर होतीच ना? पण मला माहित नव्हते की माझी अवस्था इतकी वाईट होईल की मला माझ्या शेजाऱ्याला सांगून फोन करून तुला बोलवावे लागेल. “

“ते ठीक आहे काकू, पण आता आम्ही आहोत ना. पैसे काढण्याची काय गरज होती? खरं तर, माफ करा, तुम्ही येऊन इतके दिवस झाले आहेत, याचा आम्ही विचारही केला नाही. आम्ही तुम्हाला तुमच्या गरजा विचारायला हव्या होत्या, ” राकेश लाजत म्हणाला.

“नाही नाही बेटा, मला पैशाचे काय काम? पण मी माझा मुलगा आणि सुनेसोबत पहिल्यांदाच बाजारात जात आहे, त्यामुळे पैसे माझ्याकडे असले पाहिजेत. चला, उशीर होत आहे, ” काकू उत्साहाने म्हणाल्या.

मॉलमध्ये पोहोचताच काकू तयार कपड्यांच्या दालनात गेल्या. आम्हाला वाटले की त्या आजारपणामुळे इतक्या घाईत दवाखान्यात आल्या आहेत की त्यांना त्यांच्यासोबत अनेक गोष्टी आणता आल्या नसतील. त्यांना कपड्यांविना त्रास होत असावा, म्हणूनच त्या तिथे गेल्या असाव्यात.

पण त्या रेडीमेड शर्ट आणि जीन्सच्या काउंटरवर गेल्या आणि राकेशला कपडे खरेदी करण्यास सांगू लागल्या. राकेशने खूप नकार दिला पण त्यांनी ऐकले नाही.

राकेश जीन्स घालून पहात असताना त्या मला म्हणाल्या, “आजकाल सगळ्या मुली जीन्स घालतात. ते सोयीचे असल्याचे कामावर जाणाऱ्यांचे म्हणणे आहे. सूनबाई, तू जीन्स वापरत नाहीस का?

त्यांचं हे बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटले. जुन्या पिढीतल्या असूनही त्या असं का बोलल्या?

“नाही नाही काकू, मी पण… ” म्हणत मी थांबले. असं बोलत असताना त्या माझी परिक्षा तर घेत नाही ना असं मला वाटत होतं.

“तू घालतोस पण माझ्यामुळे तू रोज साडी आणि सूटच्या बंधनात अडकतेस. पण मी तर कधीच काही बोलले नाही, ” काकू अगदी निरागसपणे म्हणाल्या.

“सून, तू पण तुझ्यासाठी काही जीन्स आणि एक छान टॉप खरेदी कर. माझी सून या कपड्यांमध्ये कशी दिसते ते मलाही पाहू दे, ” असे म्हणत त्यांनी माझ्यासाठी कपडे निवडण्यास सुरुवात केली. मी आश्चर्याने त्यांच्याकडे बघत उभी राहिले. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता, पण हे सर्व खरे होते आणि स्वप्न नव्हते.

कपडे खरेदी होताच काकू म्हणाल्या, “बेटा, मला खूप भूक लागली आहे. ” असंही मी आजारातून बरी झाल्याबद्दल एखादी मेजवानी तर व्हायलाच हवी. ”

आम्ही नकार देऊनही काकूंनी रेस्टॉरंटमध्ये आईस्क्रीमसह अनेक गोष्टी मागवल्या. नंतर राकेश पैसे द्यायला लागले तेव्हा किकूंनी लगेचच ती नोट त्याच्या हातात दिली आणि म्हणाल्या, “हे घे, हे दिल्याने काय फरक पडतो? ” हे ऐकून आम्ही हसलो, बिल घेऊन आलेल्या वेटरलाही हसू आवरले नाही.

घरी आल्यावर राकेश काकूंना म्हणाले की “तूम्ही इतके पैसे खर्च करायला नको होते”. त्यावर त्या म्हणाल्या, “तुझ्या काकांच्या पश्चात आता मला पेन्शन मिळते. मी एकटी असताना या वयात मी स्वतःवर असा किती खर्च करू? “

त्या बऱ्या झाल्यापासून त्या अनेकदा संध्याकाळी फिरायला जातात. येतांना फळे, भाज्या, दूध, मिठाई आणि इतर अनेक गोष्टी घेऊन येतात. कधीही रिकाम्या हाताने येत नाहीत.

सकाळी आम्ही ऑफिससाठी तयार होत असताना त्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, “राकेश बेटा, मी आता पूर्णपणे बरी झाली आहे. आता मला परतीचे तिकीट काढून दे. “

हे ऐकून आम्ही दोघेही अवाक झालो. “काय झालं काकू, तुम्हाला इथे काही अडचण आहे का?”

“नाही नाही बेटा, काय अडचण असणार आहे तुझ्या घरात? तरीही मला परतले पाहिजे. दोन महिने झाले, मी तुमच्यावर… ”

हे ऐकताच मी अस्वस्थ झाले, “काकू, आम्ही तुम्हाला खूप नको म्हणतो, तरीही तुम्ही दिवसभर स्वतःच्या मर्जीने का होईना कामात मग्न राहता. “

“नाही नाही सीमा, मी कामाबद्दल बोलत नाहीये. हे काय काम आहे का. बटण दाबले आणि कपडे धुतले. बटण दाबलं, चटणी, मसाला तयार झाला. घराची साफसफाई आणि भांडीकुंडी ची कामे मोलकरीण करते. एका दिवसात असं किती काम असतं? पण बेटा, दोन महिने झाले, किती दिवस मी तुमच्यावर ओझे बनून राहणार? “

ओझे हा शब्द ऐकताच माझे डोळे भरून आले. मी त्यांना मिठी मारली. प्रेमाची अशी प्रतिमा ओझे कसं असू शकते? माझ्या सासूबाईंबद्दल किती चुकीचे विचार होते माझे. माझी काकूंच्या येथे रहाण्याबद्दल काहीच तक्रार नाही. आधी जेव्हा राकेश त्यांच्या इथे राहण्याबद्दल बोलला होता तेव्हा मला खूपच काळजी वाटली होती. पण आता मी त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पनाच करू शकत नाही. त्यांच्या प्रेम, आशीर्वाद आणि उपस्थितीशिवाय आपण आणि आपलं कुटुंब किती अपूर्ण असेल. रोज संध्याकाळी आमची घरी येण्याची कोण वाट पाहणार? आम्हाला भूक लागली नाही तरी कोण खायला घालणार? एवढ्या बिनशर्त प्रेमाचा वर्षाव कोण आपल्यावर कोणत्याही स्वार्थाशिवाय करेल?

आम्ही दोघांनीही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की त्या आता कुठेही जाणार नाहीत. आता या वयात त्यांनी एकटं राहायचं नाही. आता त्यांनी मथुरेतील घराला कुलूप लावायचे की भाड्याने द्यायचे ही त्यांची मर्जी आहे. त्या आमची जिद्द आणि आमच्या प्रेमाचा अव्हेर करू शकल्या नाहीत.

काकू थोडा विचार करून बोलल्या, ‘‘तुम्ही म्हणता तर तुमच्या जवळच राहीन, पण माझी एक अट आहे. ’’

काकूंना काय म्हणायचं आहे ते मी समजले. मी लगेच म्हणाले, ‘‘तुम्ही एकदा मथुरेला जा, तुमचे काही कपडे, काही आवश्यक सामान घेऊन या. यात अटीची काय गरज आहे. पुढील आठवड्याच्या शेवटी आम्ही दोघं तुम्हाला मथुरेला घेऊन जाऊ. ’’

“ते तर जाईनच, पण तरीही माझी एक अट आहे. “

काकूंनी हे सांगताच मी जरा काळजीत पडले. विचार केला, माहीत नाही त्या काय अट ठेवतील.

मग राकेश म्हणाले, “काकू, अट कशाला, तुम्ही फक्त आदेश करा, तुम्हाला काय हवे आहे?”

आमचे काळजीत पडलेले चेहरे पाहून काकू हसल्या. त्या हसत म्हणाल्या, “हो, ही अट नाहीये, मी इथेच राहावं असं वाटत असेल तर मला लवकर एक नातू द्यावा लागेल, असा माझा आदेश आहे. तुमच्या लग्नाला दोन वर्ष झाली, किती दिवस असेच सडाफटींग रहाणार? “

हे ऐकून आम्हा दोघंही लाजलो. ज्या प्रेमाने आणि अधिकाराने काकूंनी हे सांगितले, त्याबद्दल विचार करावा असे काहीच नाही. काकूंनी आमच्या आयुष्याला नवा अर्थ दिला आहे. मला तर हे कळत नाही की ही ममतेची मूर्ती इतकी वर्षे निपुत्रिक कशी राहिली असेल? आजारपणाच्या निमित्ताने का होईना, ती आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आमच्याकडे आली आहे.

– समाप्त –

 मूळ हिंदी कथालेखक : अनामिक

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘प्रेमळ आदेश…’ – भाग- १ –  मूळ हिन्दी लेखक – अनामिक ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘प्रेमळ आदेश…’ – भाग- १ –  मूळ हिन्दी लेखक – अनामिक ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

रात्रीचे साधारण ८ वाजले होते. ऑफिसमधून परत आल्यानंतर मी जेवण बनवत होते आणि राकेश अजूनही त्याच्या लॅपटॉपवर ऑफिसच्या कामात व्यस्त होता. तेवढ्यात फोन वाजला. हा कोणाचा फोन आहे याची उत्सुकता मला किचनमधून खेचत होती. फोनवर बोलताना राकेशला खूप अस्वस्थ होताना मी पाहिलं.

‘कृपया, त्यांना दवाखान्यात घेऊन जा. मी ताबडतोब निघतो आहे, तरी मला पोहोचायला २-३ तास लागतील, ‘ असं म्हणत त्यांनी फोन ठेवला. मी काही विचारण्याआधीच त्यांनी घाईघाईने मला सगळा प्रकार सांगितला आणि त्यांचे काही कपडे आणि महत्त्वाच्या गोष्टी बॅगेत ठेवायला सुरुवात केली.

मथुरा येथे राहणारी राकेशची काकू अचानक खूप आजारी पडली होती. त्यांची अवस्था पाहून शेजाऱ्याने आम्हाला फोन केला. आमच्याशिवाय या जगात काकूंचं कोण आहे? त्यांना स्वतःचे मूलबाळ नाही आणि काही वर्षांपूर्वी काकांचे निधन झाले आहे.

आमच्या लग्नात काकूने माझ्या सासूबाईंचे सर्व विधी पार पाडले. राकेशच्या आई-वडिलांचा फार पूर्वी कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यावेळी राकेशची बहीण गरिमा शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात होती, मात्र राकेश शाळेत शिकत होता, जो त्याच्या बहिणीपेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. त्यानंतर काका-काकूंनी बहिणीचे लग्न लावून दिले आणि पुढील शिक्षणासाठी राकेशला शाळेनंतर वसतिगृहात पाठवले. राकेशने मला या दोन वर्षात अनेक वेळा सांगितले आहे की माझ्या काका आणि काकूंनी दीदी आणि माझ्यावर त्यांच्या मुलांसारखे प्रेम केले आहे.

पूर्वी संपूर्ण कुटुंब एकत्र राहायचे पण राकेश चौथीत शिकत असताना त्याच्या काकांची मथुरेला बदली झाली. यानंतर त्यांची इतर अनेक शहरांमध्ये बदली झाली पण त्यांनी मथुरेत घर बनवले होते, त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर आत्या मथुरेत आल्या. नाही तर त्या कुठे गेल्या असत्या?

मला काकूंबद्दल फारशी माहिती नव्हती. आमच्या लग्नाच्या वेळी त्या आमच्याकडे फक्त ५-६ दिवस राहिल्या होत्या. खरे तर आम्हा दोघांना लग्नानंतर बँकॉक ला जायचे होते, म्हणून त्या मथुरेला परतल्या. मी काय काय विचार करू लागले होते. राकेशच्या आवाजाने मला पुन्हा वर्तमानात आणले. ते म्हणत होते, बघ मी घाईत काही ठेवायला विसरलो तर नाही ना?

बॅग भरून झाल्यावर राकेश काकूला एकटं कसं सांभाळतील असा विचार करत मी पण सोबत येण्याबद्दल विचारले तर ते म्हणाले की आधी जाऊन परिस्थिती बघायला हवी, गरज पडली तर तुला फोन करेन. त्यानंतर ते मथुरेला रवाना झाले.

लग्नानंतर ही पहिलीच वेळ होती की मी रात्री घरी एकटी होते. एक विचित्र भीती आणि अस्वस्थता मला झोपू देत नव्हती. रात्री दोनच्या सुमारास मी राकेशशी बोलले. काकू बेशुद्ध असल्याचे कळले. अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या जात होत्या, आत्ताच काही सांगता येणार नाही असे डॉक्टर म्हणाले होते. राकेश खूप काळजीत दिसत होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता राकेशने फोन केला की काकूंच्या उपचार आणि डॉक्टरांवर ते समाधानी नाहीत. काकूंसोबत ते दिल्लीला येत आहेत. दिल्लीतील रुग्णालयाशी चर्चा सुरू आहे.

संध्याकाळपर्यंत ते काकूंना सोबत घेऊन दिल्लीला पोहोचले. काकू बेशुद्ध अवस्थेत खूप अशक्त दिसत होत्या. रंगही पिवळा पडला होता. ते दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच मी तिथे पोहोचले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले.

काकूंना ५ दिवसांनी दवाखान्यातून घरी सोडण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी औषधोपचारासह विश्रांती घेण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. आम्ही त्यांना घरी आणले. हा आजार काही विशेष नव्हता. वाढते वय, एकटेपणा, चिंता, कामाचा थकवा, वेळेवर नीट न खाणे ही या आजाराची कारणे होती.

आम्हा दोघांना आणखी सुटी घेणे शक्य नव्हते. आम्ही त्यांच्यासाठी नोकर किंवा नर्सची शोधले पण मिळाले नाही, म्हणून आम्ही घरी काम करणाऱ्या मोलकरणीला दिवसातून २-३ फेऱ्या मारून त्यांना दूध, चहा, नाश्ता वगैरे देण्यास सांगितले आणि ऑफिसला जाऊ लागलो. पण हो, आम्ही दिवसातून अनेक वेळा काकूंशी फोनवर बोलायचो. त्यांची चौकशी करीत असू. काही अडचण तर नाही ना? विचारत राहिलो.

राकेश बद्दल माहित नाही, पण माझा त्रास जरा वाढला होता. जे घर आत्तापर्यंत फक्त आमचं होतं ते अचानक माझ्या सासरच्या घरासारखं वाटू लागलं. आता उठणे, बसणे आणि कपडे घालणे यात काही बंधने जाणवू लागली. आंटी याविषयी कधीच काही बोलल्या नसल्या तरी घरात त्यांची उपस्थिती माझ्यासाठी पुरेशी होती.

पण मी हे सर्व पूर्ण उत्साहाने करत होते, कारण काकू अपेक्षेपेक्षा लवकर बऱ्या होत होत्या. अवघ्या एका आठवड्यानंतर त्यांना मोलकरणीची गरज उरली नाही. त्या स्वतः उठून त्यांची छोटी-मोठी कामे करू लागल्या. त्या लवकरच बऱ्या होऊन मथुरेला परततील याचा मला आनंद झाला. आणखी काही दिवसांची तर गोष्ट होती.

एक दिवस राकेश म्हणाला कि ‘आता आपण काकूंना परत जाऊ द्यायचं नाही. त्या आता आपल्या सोबतच राहणार आहेत. आता या वयात त्यांना एकटे राहणे कठीण होणार आहे. पुन्हा आजारी पडल्या तर? मग त्यांच्याप्रती आपलेही काही कर्तव्य आहे. त्यांनी आमच्यासाठी खूप काही केले आहे. ‘ राकेश काही चुकीचं बोलले नव्हते पण माझं मन अस्वस्थ झालं.

मला आठवतं, जेव्हा राकेशचं स्थळ माझ्यासाठी आलं तेव्हा माझ्या आई-वडिलांनी माझं मत विचारलं. राकेश कसा दिसतो? किती शिक्षित आहेत? ते किती कमावतात? मला हे सर्व जाणून घेण्याची गरज वाटली नाही कारण मला वाटले की माझ्या आई-वडिलांनी आणि काकांनी हे स्थळ पाहिले आहे तर सर्व काही ठीकच असणार. ते माझ्यासाठी चांगलेच अ तील. मला त्यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायचे होते. विचारले असता माझे सासरी मुलाला आई वडील नसल्याचे कळले. एकच मोठी बहीण आहे, तिचेही लग्न झाले आहे. एवढेच जाणून घेणे माझ्यासाठी पुरेसे होते कारण माझ्या मनात सासूची प्रतिमा अशी होती की सून नेहमीच दबावाखाली असते. काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या माझी मैत्रिण जया हिच्याशी मी जेव्हा कधी बोलायचे तेव्हा ती तिच्या नवऱ्यापेक्षा तिच्या सासूबद्दलच जास्त बोलायची. ती नेहमी काळजीतच असायची.

शिवाय, माझी बहीण जेव्हा कधी तिच्या माहेरी आई-वडिलांच्या घरी यायची तेव्हा ती बरेच दिवस परत जातच नाही. आई नेहमी तीला समजावून परत पाठवायची. तिच्या पती किंवा दिराविषयी नव्हे तर सासूंविषयी अनेक तक्रारी होत्या.

पण राकेशची काकू आता आमच्या घरीच राहणार होती. सासू-सासऱ्यांचे एकवेळ ठीक आहे, पण काकूचे बोलणे, टोमणे, टोमणे कुणी व का ऐकावे? असा विचार करणं खूप चुकीचं असलं तरी हा स्वार्थी विचार होता, आणि त्याचा मला खूप त्रास होऊ लागला होता.

एके दिवशी संध्याकाळी मी ऑफिस वरून घरी पोहोचले तेव्हा मी पाहिले की काकूने वाशींगमशीन लावली होती आणि घरातील सर्व मळालेले कपडे जमा करून धुतले होते. मी फक्त रविवारी मशीन वापरते आणि आठवड्याभराचे कपडे धुते. नुकतेच काकूंच्या आजारपणामुळे हे काम राहिले होते. इतके कपडे एकदम धुतलेले पाहून मला आश्चर्य वाटले, “हे काय काकू, तुम्ही एवढं काम का केले? आता तुम्ही आराम करा. ”

“सीमा, मी दिवसभर आरामच तर करते, मग आजकाल मशीनमध्ये कपडे धुणे हे काय काम आहे का? ” असे बोलून काकू हसल्या.

आता जेवणाच्या वेळी गप्पांचा ओघ सुरू झाला. काकू राकेशच्या लहानपणीच्या सवयी आणि खोडकरपणाविषयी सांगायच्या. माझ्या सासरच्या घराबाबतही त्यांनी मला अशा अनेक गोष्टी सांगितल्या, ज्या मला सांगायला कुणीच नव्हतं. मलाही राकेशचा चिडचिडा स्वभाव आणि आवडी-निवडी माहीत होतं होत्या. आता मला त्यांना चिडवायला आणि छेडायला खूपच मजा येत होती. अशा स्थितीत काकूंनीही हसत हसत मला पूर्ण साथ दिली.

— क्रमशः भाग पहिला 

मूळ हिंदी कथालेखक : अनामिक

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares