मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भैरूची गोष्ट… लेखक – श्री मिलिंद पाध्ये ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ भैरुची गोष्ट !… लेखक – श्री मिलिंद पाध्ये ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

पहाट झाली. भैरू उठला. 

बैल सोडले. औत जोडले. 

शेतात गेला. शेत नांगरले. 

दुपार झाली. औत सोडले. 

बैलांना वैरण घातली. जवळ ओढा होता. बैलांना पाणी पाजले. आपली भाकरी सोडली. 

चटणी, भाकरी, कैरीचे लोणचे. 

झाडाखाली बसला. आवडीने जेवला.

पन्नासेक वर्षांपूर्वी शाळेच्या पाठ्यपुस्तकातून भेटणारा हा जुना भैरू. काळाच्या ओघात तो भेटेनासा झाला. त्याची जागा आता नव्या भैरूनं घेतली. तो भैरू शेतकरी होता. हा भैरू कुठल्यातरी ऑफिसमधील सेवानिवृत्त कारकून आहे. हा भैरूही त्या भैरू सारखाच पहाटे उठतो…

पहाट झाली. भैरू उठला…

नाईटलॅम्पच्या अंधुक उजेडात उशापाशी ठेवलेला चष्मा त्याने चाचपडत शोधला आणि मोबाईल हातात घेतला – “गुड मॉर्निंग … सुप्रभात” चे मेसेजेस पाठवायला. कॅलेंडरकडे नजर टाकून त्याने वार बघितला. “आज शनिवार, म्हणजे “जय हनुमान, जय बजरंगबली” चे मेसेजेस टाकायला हवेत, भैरूच्या मनात आलं. शाळा-कॉलेजमधल्या मित्रांचे ग्रुप्स, सोसायटीचा ग्रुप, बँकेतल्या रिटायर्ड मंडळींचा ग्रुप, नातेवाईकांचे ग्रुप्स, सगळीकडे “गुड मॉर्निंग…सुप्रभात” चे मेसेजेस टाकल्यावर एक काम हातावेगळं केल्याचं समाधान भैरूला वाटलं. “आता या सगळ्यांची मॉर्निंग गुड जावो की बॅड, आपल्याला काय त्याचं” या भावनेनं तो पुन्हा बेडवर आडवा झाला. आता तास-दीड तासाने उठल्यावर तो पुढच्या कामाला लागणार होता.

चहा-नाश्ता संपवून भैरूनं मोबाईल पुन्हा हातात घेतला. या ग्रुप मधले मेसेजेस त्या ग्रुपमध्ये टाकायचं काम आता त्याला करायचं होतं. इकडची “बाबाजींची प्रवचनं” तिकडे, तिकडचं “रोज सकाळी एक गाणे” इकडे, अमुक ग्रुप मधलं “दिनविशेष” तमुक ग्रुप मध्ये, तमुक ग्रुपमधल्या “हेल्थ टिप्स” अमुक ग्रुपमध्ये… एक तासानंतर इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे करून झाल्यावर एक मोठं काम झाल्याचा सुस्कारा भैरूनं सोडला. “हे सगळं आपण स्वतः वाचत बसत नाही हे किती बरंय”, आंघोळीला जाताजाता भैरुच्या मनात आलं.

आंघोळ, त्यानंतर देवपूजा घाईघाईनं उरकून त्याहूनही अधिक घाईघाईनं भैरूनं पुन्हा मोबाईल हातात घेतला. बँकेच्या ग्रुपमध्ये कुणाचातरी वाढदिवस होता. या बर्थडे बॉयशी आपली तोंडओळखही नाही, भैरुच्या लक्षात आलं आणि पाठोपाठ “आपण विश केलं नाही तर बरं दिसणार नाही. लोक काय म्हणतील” असं मनात आलं. लगोलग त्यानं त्याच्या स्टॉकमधल्या केकचा फोटो टाकून त्याला शुभेच्छा दिल्या आणि पाठोपाठ दुसऱ्या एका ग्रुपमध्ये कुणीतरी गचकल्याच्या पोस्टवर RIP लिहून गेलेल्याच्या आत्म्याला शांतीही मिळवून दिली. मोबाईल खाली ठेवायच्या आधी भैरूनं सकाळपासून आलेल्या सगळ्या गाण्यांना, अभंगांना “वा छान”, “मस्तच” अशी दाद देऊन टाकली आणि मग ती गाणी, ते अभंग डिलीटही करून टाकले. “दाद देण्यासाठी हे सगळं ऐकलंच पाहिजे असं अजिबात नाही” असं भैरूचं मत होतं.

कुणाची वामकुक्षी संपलेली असो वा नसो, आपण आपलं काम उरकून मोकळं व्हावं या भावनेनं दुपारी दोनच्या सुमारासच भैरूनं झाडून साऱ्या ग्रुप्सना, व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट्सना चहा-बिस्किटांचे फोटो असलेले “गुड आफ्टरनून” चे मेसेजेस टाकून दिले. मग सोसायटीच्या ग्रुपमध्ये एका मेंबरने “सोसायटीची रिडेव्हलपमेंट लवकरात लवकर करावी” अशी पोस्ट टाकली होती त्याला सहमतीचा अंगठा दाखवला आणि त्याच्याच खाली चार पोस्ट नंतर आलेल्या, “रिडेव्हलपमेंटची तूर्तास गरज नाही’ या पोस्टलाही पाठिंबा दर्शवणारा अंगठा दाखवला. “सर्व-पोस्ट-समभाव” आपल्या अंगी आहे याचा अभिमान भैरूला पुन्हा एकदा वाटला. भैरूनं मग काही ग्रुप्समध्ये “युती”च्या बाजूने आलेली पोस्ट फॉरवर्ड केली तर काही ग्रुप्समध्ये “आघाडी” च्या बाजूनं आलेली. “कुणी का येईना सत्तेवर, आपलं काम पोस्ट्स फॉरवर्ड करायचं,” भैरुच्या मनात आलं.

“डॉलरच्या तुलनेत रुपया” या सकाळीच फॉरवर्ड केलेल्या पोस्टवर एका ग्रुपमध्ये दोन-चार जणांनी शंका उपस्थित केल्या होत्या तर दुसऱ्या एका ग्रुपमध्ये एक-दोन जणांनी प्रतिप्रश्न केले होते. “आपल्याला यातलं XX काही समजत नाही” हे पक्कं माहीत असल्याने “पुढचे दोन दिवस या दोन्ही ग्रुप्सवर फिरकायचं नाही अशी खूणगाठ बांधत भैरू एका तिसऱ्याच ग्रुपकडे वळला तर तिथे त्यानं फॉरवर्ड केलेल्या “ऐका मालकंसची गाणी” वर हा “मालकंस नाही, कलावती आहे” अशी टिप्पणी कुणीतरी केली होती. त्यावर शेक्सपिअरच्या थाटात “नांवात काय आहे?” असं उत्तर देऊन भैरूनं विषय संपवला. 

“काय मागवू रे तुझ्यासाठी – पिझ्झा की बर्गर?” या सौ च्या प्रश्नाला, “दोन्ही” असं थोडक्यात उत्तर देऊन भैरू “जंकफूड – एक शाप” ही पोस्ट फॉरवर्ड करण्यात बिझी झाला. 

रात्रीचे नऊ वाजल्याचे बघून भैरूनं त्याच्या पोतडीतून चंद्र-चांदण्यांची चित्र असलेले “गुड नाईट – शुभरात्री” चे मेसेजेस बाहेर काढले, पाठवलेही. आता मोबाईल बंद करणार तोच त्याच्या शाळासोबत्यानं पाठवलेलं “मालवून टाक दीप….” गाणं त्याच्या व्हॉट्सअपवर दिसू लागलं. “मालवून टाक दीप….” चे पुढचे शब्द “चेतवून अंग-अंग! राजसा किती दिसांत लाभला निवांत संग!” हे आहेत हे ध्यानीमनीही नसलेल्या भैरूनं ते “गुड नाईट… स्वीट ड्रीम्स” अशी जोड देत शेजारच्या आजोबांना तत्परतेनं फॉरवर्ड केलं आणि मोबाईल बंद करून तो झोपायच्या तयारीला लागला…. उद्या पहाटे त्याला उठायचं होतं… उद्या रविवार म्हणजे “सूर्याचे फोटो असलेले गुड मॉर्निंगचे मेसेजेस पाठवायचे होते… मग प्रवचनं, गाणी… इकडचं तिकडे अन् तिकडचं इकडे. 

तो भैरू पहाटे उठून कष्ट करून शेतमळा फुलवत असे. हा भैरू पहाटे उठून बिनकष्टाचा वायफळाचा मळा फुलवतो.

लिहिलेलं बायकोला वाचून दाखवल्यावर, “मी ओळखते बरं का या भैरूला” असं ती आपल्याकडे बघत डोळे मिचकावत मिश्किलपणे का म्हणाली हे न उमगल्यानं बुचकळ्यात पडलेला मिलिंद.

— समाप्त —

लेखक :  मिलिंद पाध्ये, ठाणे 

प्रस्तुती : सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पायगुण – भाग- 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ पायगुण – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(तो भेटल्याशिवाय कोणताही उलगडा होणार नाही. मी योगेश भेटला की लगेच तुम्हाला सांगेन काय झालं ते! उगीच नको रडत बसू आई.”) – इथून पुढे 

अजिता हॉस्पिटलमध्ये गेली पण तिलाही चैन पडेना.हे काय झालं आणि यातून आता पुढे काय होणार याची तिलाही काळजी वाटायला लागली.लग्न ठरवून सहा महिने झाले,आपण दोघे सर्वस्वीअनुरूप आहोत, आपले स्वभाव जुळतातआवडीनिवडीसारख्याआहेत.आता हे काय  विघ्न मधेच?अजिताने दुपारी योगेशला फोन करायचे ठरवले.  शांतपणे ती आपल्या कामात गुंतून गेली.दुपारी योगेशचा तिला  फोनआला.  तिला म्हणाला, जरा बाहेर जाऊया जेवायला !अजिताला तो कारने न्यायला आला.हॉटेलमध्ये ऑर्डर देऊन झाल्यावर म्हणाला,’अजिता!माझी आई तुमच्या घरी आली होती आणि काय काय बोलली ते तिनंच सांगितलं मला.

मला तर हे अनपेक्षितच आहे सगळं! माझ्या असं कधी मनात तरी येईल का?मला तू खूप आवडतेस आणि मी  मला भाग्यवान समजतो की अशी हुशार गुणी मुलगी मला मिळतेय.आईचं सोड तू!मी कधीही हे होऊ देणारनाही.आपलं लग्न होणार म्हणजे होणार.तुझ्यासारखी मुलगी टाकून दुसरी बघत बसायला मी मूर्ख नाही.तू क्षमा कर मला.तुम्हाला सगळ्याना खूप त्रास झाला असेल ना?माफ कर अजू मला!

योगेशच्या डोळ्यात पाणी आलं. शरमेने त्याचा चेहरा लाल झाला.

अजिता शांतपणे म्हणाली, “ थँक्स योगेश. आपण या सहा महिन्यात एकमेकांत खूप गुंतलो आहोत.हो ना?तू जर साथ देणारअसलास तर आपलं लग्न कसं मोडेल?शांत राहूया आपण.मला खूप धीर आला रे तुला भेटून.किती शहाणा आहेस तू. थँक्स योगेश.पण एक सांग, तुझ्या आईचा तू एकुलता एक मुलगा आहेस.त्यांच्या मनाविरुद्ध मी तुमच्या घरात आले तर माझं स्वागत कसं होणार? मला सतत जाणवत रहाणार की मी यांना नको असतानाही इथे आलेय!अजिता रडायला लागली.’मला काही सुचत नाही योगेश .मला तुला तुझ्या आईपासून तोडायचं नाहीये आणि तुला गमवायचंही नाहीये.” 

योगेश विचारात पडला. ‘ अजिता,आपण जरा वाट बघूया. आपली साथ घट्ट असणार हे कायम लक्षात ठेव. मीआणि तू कधीही वेगळे होणार नाही’. योगेश अजिताला  हॉस्पिटलला सोडून घरी गेला. अजिताने हे आईबाबांना सांगितलं. त्यांनाही आता हायसं वाटलं.

पण तरीही मनात धाकधूक होतीच की हे जे सुषमा बाई बोलल्या ते ठीक नाही झालं.

असा किंतु मनातअसताना आपल्या मुलीला तिथे सुख लाभेल का?काय कमी आहे अजितामधे?आता होईल ते बघत बसण्याशिवाय त्यांच्याही हातात काही नव्हते. अनपेक्षितपणे संध्याकाळी योगेशचे आजीआजोबा आणि बाबा अजिताच्या घरी आले.तिचे आईबाबा गडबडूनच गेले यांना असं अचानक बघून!या ना,म्हणत त्यांचे स्वागत केले दोघांनी. आजी म्हणाल्या’,मी पहिल्यांदा बोलते हं.हे बघा कुंटे, काल सुषमा तुमच्या घरी आली आणि जे बोलली ते आम्हाला अजिबात माहीत नव्हतं. आम्हाला तिचे विचार मान्य नाहीत.अहो, कसला पायगुण आणि कसले शुभ अशुभ हो? याच मुलीनं योगेशचे बाबा हॉस्पिटल मध्ये असताना रात्रंदिवस कष्ट घेऊन त्यांची सेवा केलेली आम्ही बघितली नाही का?उलट कौतुकच वाटले तिचे आम्हाला.ती या हॉस्पिटलमध्ये आहे म्हणूनच सगळ्या गोष्टी किती सुलभ झाल्या आम्हाला. ही अशी गुणी मुलगी आम्ही नाकारणे म्हणजे दारी आलेली लक्ष्मी नाकारण्यासारखे होईल.

“ कुंटे,तुम्ही आता हे लग्न लवकरात लवकर करून टाका.कशाला उगीच लांबवायचं ?योगेश आणि अजिता एकमेकांना अनुरूप  अनुगुणीही आहेत आणि त्यांचं प्रेमही जडलंय एकमेकांवर.तर लवकरचा मुहूर्त बघून आपण हे लग्न पार  पाडूया.अगदी हौसेने !”  अजिताच्या आईवडिलांना अतिशय आनंद झाला हे ऐकून.पण मग जरा  संकोचून बाबांनी विचारलं,पण सुषमाबाईना काय वाटेल?’

“ त्यांचं काय? ते  योगेश बघून घेईल.’आजोबा म्हणाले, लग्नानंतर योगेश आणि अजिता इथे आमच्याजवळ बंगल्यात रहाणार नाहीत. आमचा दुसरा मोठा फ्लॅट आहे,तिकडे ते राहिलेले उत्तम! म्हणजे कोणालाच कानकोंडे होणार नाही. नवीन लग्न होऊन येणाऱ्या अजिताला कोणाच्या मनाविरुद्ध आपण घरात आलोय, असं वाटता कामा नये. आणि हीही सूचना योगेशची आहे. हुशार आहे हो आमचा नातू.”  

आता योगेशचे बाबा म्हणाले, ‘ सुषमा जरा मागासलेल्या विचारांची आहे . आमचे आईबाबाच किती पुढारलेल्या विचारांचे आहेत तिच्यापुढे तुम्ही बघता आहातच. खरं सांगायचं तर तिला एवढी शिकलेली डॉक्टर सून नकोच होती. तिच्या मैत्रिणीची मुलगी फार मनात होती तिच्या सून म्हणून .पण योगेशने ठाम नकार दिला.मी माझ्याच व्यवसायातली मुलगीच माझी बायको म्हणून पसंत करणार हे त्याचे निश्चित होते.आम्हालाही ते मान्यच होते.पण घटना अशा घडल्या की बिचारी अजिता घरात येऊ घातली आणि दुर्दैवाने हे दोन अपघात म्हणा, प्रसंग घडले. मग तर सीमा आणि सुषमा हे लग्न नकोच व्हायला या निर्णयावर आल्या. त्या मायलेकी स्वभावाने अगदी सारख्या आहेत. पण माझा योगेश फार  गुणी आणि  मॅच्युअर्ड आहे .सुषमा तुमच्या घरी येईल आणि हे असं सगळं बोलेल हे आम्हाला कोणालाच माहीत नव्हते. तुम्ही प्लीज हे मनावर घेऊ नका.आम्हाला अजिता अतिशय आवडली आहे. मुख्य म्हणजे योगेश तिच्यावर मनापासून प्रेम करतो.  आपण मुलांची मनं नको का जाणून घ्यायला?काय कमी आहेतुमच्या अजितामध्ये?आम्ही तिलाआदराने  आणि प्रेमाने आमच्या घरी सन्मानाने आणणार सून म्हणून ! ‘ योगेशचे वडील  म्हणाले. अजिता आणि तिच्या आई बाबांच्या डोळ्यात पाणी आले.आईबाबांची खात्रीच पटली,आपली अजिता योगेशच्या घरी सुखी होईलच.या मंडळींचं मनापासून कौतुक वाटलं  अजिताच्या आईबाबांना. अजिता तर थक्क झाली आजी आजोबांचे आधुनिक विचार बघून.  इतक्यात योगेशही आला अजिताच्या घरी.  झाली का मीटिंग आणि चाय पे चर्चा?आमच्या माँ साहेब नाही का आल्या?’ 

‘नाही बाबा ! त्यांना न सांगताच ही सभा भरलीय. काय करणार बाबा?आम्हाला तुमचं लग्न लावून द्यायचंय. त्यात बाधा नाही आणायचीय.’ 

योगेश म्हणाला, ‘आजी होईल ग सगळं  नीट. अजिता घेईल सगळं  सांभाळून.इतके पेशंट लीलया जिंकून घेणाऱ्या अजिताला आपल्या आईला आपलंसं करायला नक्की जमेल.थोडा वेळ देऊ या आपण सगळ्यांना. मला खात्री आहे,अजिता लाडकी सून होईल आपल्या आईची !’ कौतुकाने अजिताकडे बघत योगेश म्हणाला.  सगळी मंडळी गेल्यावर आईबाबांनी कौतुकच केले आपटे लोकांचे.आपली मुलगी चांगल्या कुटुंबात आणि मुख्य म्हणजे  अतिशय चांगल्या मुलाच्या हातात पडलीय  याची खात्री  पटली सगळ्यांना.आणि खूप  उत्साहाने अजिताचे आईवडील लाडक्या लेकीच्या लग्नाच्या तयारीला लागले.

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पायगुण – भाग- 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ पायगुण – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

पावसाची झुम्मड लागली होती.अजिता अगदी पूर्ण भिजून गेली.घरून निघताना अजिबात चिन्हनव्हतेपावसाचे आणि अचानकच कोसळायलाच लागला अजिता पूर्ण भिजून गेली. जवळच्या दुकानात शिरली आणि  मग तिला आठवलं, बऱ्याच गोष्टी  संपल्या आहेत की आपल्या. तिने दुकानातून बरीच खरेदी केली. तोपर्यंत पाऊस थांबला आणि अजिता आता हॉस्पिटल मध्ये न जाता तिच्या  क्वार्टर्स वरच गेली. पारुबाईने सांगितलेलेसामान तिने ओट्यावर ठेवले आणि छान चहा करून घ्यावा म्हणून गॅस  जवळ गेली.तेवढ्यात शेजारची मीता आली. अजिता,मला पण टाक हं आल्याचा चहा.कॉटवर बसत मितानेफर्मावले.थांब मी माझ्या रूम मधून चिवडा घेऊन येते.कालच आईने मामा बरोबर पाठवला.मीता चिवडा आणि बर्फी घेऊन आली आणि तिने अजिताच्या कॉटवर बैठक मारली.मस्त झालाय ग चहा अजिता.  चिवडा खा ना!,आईनं तुझ्यासाठी पण  दिलाय. उद्या काय लागलंय ग तुझं शेड्यूल? मला उद्यापासून पूर्ण आठ दिवस  नाईट  इमर्जन्सी आहे.

कठीण आहे रे बाबा.त्या डॉ अभय समोर बोलायची सोय नसते.त्यांनी लावल्या ड्यूट्या की करायच्या. अजिता म्हणाली मला तशी खूप ड्यूटी नाहीये पण मी ऑन कॉल आहे.म्हणजे आलं की नाही इथेच बसणं?चांगली जाणार होते ती बाबांकडे तर आता कुठलं जमायला?कुठून ही  डॉक्टरकी हौसेने पदरात घेतली असं होतं बघ काही वेळा. बघ की,आपल्या वर्गातल्या मुली बीएस्सी एमेस्सी झाल्या आणि मस्त कपडे घालतात, लग्न मुंजी सिनेमे एन्जॉय करतात आणि आपण!

बसलोय  बाळंतपण नाही तर कसल्या कसल्या सर्जऱ्या करत शिकत, सिनियर ची बोलणी खात!’

अजिता वैतागून म्हणाली.मीता हसली आणि म्हणाली,अजू, खरंच असं वाटतंतुला?’अजिता म्हणाली, नाही ग मीता!पण काहीवेळा अति काम पडलं की होते चिडचिड!

मला तर अभिमान आहेच की एवढी  धडपड करून मरमर करून झालोय डॉक्टर,ते काय उगीच? आता हे एमडी धड पदरात पडलं की सुटलो बघ. कालच बघ ना, रात्रभर उभीच्या उभी होते मी! सगळ्या अवघड केसेस!वर त्या  डॉ अभयला  फॉरसेप्स लावताना बोलावलं तर म्हणाले”,एमडी होणार ना?दर वेळी लोकाला बोलावणार का स्वतःच्या हॉस्पिटल मध्ये? लावा बघू!मी आहे मागे उभा.पोरी  बाकी बावळट आणि घाबरटच.’इतका राग आला होता ना!पण शिकवलं मस्त बाकी!किती हुशार रजिस्टार आहे ग तो! मला नाही वाटत तो इथेच थांबेल.नक्की जाणार बघ कुठल्या कुठे!’तोंड मात्र आहे   फाटकं.   कद्धीही चांगलं म्हणत नाही की शाबासकी देत नाही!’दोघी हसल्या आणि मीता गेली.  अजिताची लास्ट टर्म होती एमडी ची. मीता आणि अजिता  अगदी घट्ट मैत्रिणी. दोघीही  डॉक्टर झाल्या आणि सुदैवाने एमडीलाही ऍडमिशन मिळाली ती एकाच हॉस्पिटल मध्ये. मीता म्हणाली मी  नाशिकला जाणार आणि तिकडे माझ्या मावशीच्या हॉस्पिटलला अनुभव घेईन.तिचं मोठं  हॉस्पिटल आहे आणि खूप गर्दी असते .मला खूप मिळेल तिकडे शिकायला’ अजिता म्हणाली,माझं काहीच नक्की नाही.आमच्या घरात डॉक्टरची बॅक ग्राउंड पण नाही.आधी मी कुठेतरी नोकरी करीन, मग बघूया .एमडी झाल्याबरोबर अजिताला लगेच मोठ्या हॉस्पिटल मध्ये नोकरीही मिळाली आणि तिचं पॅकेज सुद्धा छान होतं. अजिता, आता लग्नाचं बघूयाना?घालूया ना नाव एखाद्या चांगल्या संस्थेत? आई नं अजिताला विचारलं.’हो आईमाझी हरकत नाही ,पण शक्यतो डॉक्टरच बघितला तर ते पूरक होतं एकमेकांना.’ आई नं अजिताचं नाव एका चांगल्या विवाह मंडळात घातलं. थोड्याच दिवसात अजिताला बघायला योगेश  आपटे आला.  छान होता मुलगा. मंडळाकडूनच स्थळ सुचवलं गेलं होतं आणि पत्रिकाही चांगली जुळत होती. योगेश   फिजिशियन होता आणिचांगला जम बसला होता त्याचा. दोघांना एकमेक पसंत पडले आणि अजिताचं योगेशशी लग्न ठरलं.आई बाबांनी छान साखरपुडा करून दिला .सगळे खूष होते अगदी. साखरपुडा झाल्यावर पंधरा दिवसात योगेशच्या वडिलांना  हार्ट अटॅक आला.अजिताने आणि योगेशने धावपळ करून त्यांना ऍडमिट केले आणि अजिता तर त्याच हॉस्पिटल मध्ये नोकरी करत असल्याने तिने खूप  काळजी घेतली  त्यांची. त्यांची बायपास यशस्वी पार पडली आणि ते सुखरूप घरी आले.सगळ्याना  हायसं झालं. योगेशची धाकटी बहीण सीमा दिल्लीला होती.

तिला नुकतेच दिवस गेले होते.त्यातच योगेशचं लग्न  खूप आनंद झाला होता.अचानकच दिल्लीहून फोन आला,सीमाला अचानकच रक्तस्त्राव सुरू झाला आणि तो गर्भ टिकू शकला नाही.  सगळ्याना वाईट वाटलं.

 एक दिवस, योगेशच्याआई सुषमा बाई अजिताच्या घरी अचानकच आल्या.इकडंच तिकडंच बोलून झालं.अजिताच्या आईनं विचारलं,’आता लग्नाची तयारी सुरू करायला हवी ना?आपण कार्यालय कोणते बघायला जाऊया?तुमचा काय विचार आहे?मी इतक्यात तुम्हाला फोन करणारच होते.’ 

योगेशच्या आई म्हणाल्या,’हे बघा ! हे लग्न करू नये असं वाटतं आम्हाला. साखरपुडा झाला आणि लगेचच दोन वाईट घटना घडल्या आमच्या घरात! तुमचा विश्वास नसेल, पण माझा आहे.अजिताचा पायगुण म्हणा हवं तर पण हे घडलं खरं , हो ना?तर आता आणखी नको विषाची परीक्षा घ्यायला.आपण इथंच  थांबवू हे सगळं!  “

अजिताच्या आईला हे ऐकून तर शॉकच बसला.  “ अहो हे काय बोलता? असं कुठं असतं का?होणाऱ्या गोष्टी होत असतात अहो ! इतकी शिकलेली मुलं आपली.त्यांचा तरी विश्वास बसेल का असल्या शकुन अपशकुन आणि  पायगुण असल्या गोष्टीवर?योगेशला विचारलंय का तुम्ही? 

“ नाही ! त्या मुलांना काय समजतंय.पण मलाच आता नको वाटतंय हे लग्न !” त्या निघूनच गेल्या आणि अजिताच्या आईवडिलांच्या डोक्यात प्रश्नाचं  मोहोळ उठलं. आता काय करावं हा यक्षप्रश्न त्यांना पडला आणि अजिता हे सगळं कसं घेईल हे त्यांना समजत नव्हते.रात्रीउशिराअजिता हॉस्पिटल मधून घरीआली.सकाळी बघू  काय ते असं म्हणत आईबाबा झोपायला गेले. सकाळी हा विषय अजिताजवळ त्यांनी काढला.’ हो का?मला हे काहीच माहीत नाही.मला योगेश भेटलाय कुठं दोन दिवसात?आम्ही खूप बिझी आहोत ग आमच्या कामात!पण आज भेटूआम्ही!आई,तू उगीच पॅनिक नको होऊ! बघूया तरी काय होतं ते. तो भेटल्याशिवाय कोणताही उलगडा होणार नाही.मी योगेश भेटला की लगेच तुम्हाला सांगेन काय झालं ते!,उगीच नको रडत बसू आई.” 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ व्हॅलेंटाईन डे आणि वासुदेवाची गीता… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ व्हॅलेंटाईन डे आणि वासुदेवाची गीताश्री मकरंद पिंपुटकर

तारीख १४ फेब्रुवारी. संध्याकाळचे सहा वाजत होते आणि त्याला, त्याच्या प्राथमिक शाळेच्या (त्याला तेव्हा शिकवायला असलेल्या) मुख्याध्यापिका बाईंचा फोन आला. 

“काय रे, मोकळा आहेस का ?” बाईंचा प्रश्न. 

“म्हणजे काय ? अहो बाई, तुमचा फोन आला की बाकी सर्व कामं बाजूलाच ठेवणार की. बोला, आज कशी आठवण काढलीत ?” तो.

“नाही रे, आज तुमचा व्हॅलेंटाईन डे आहे ना ! मग ? आम्हा म्हाताऱ्यांची लुडबुड नको, म्हणून विचारलं हो.” बाई साळसूदपणे पृच्छा करत होत्या. 

बाई आणि त्यांचे विद्यार्थी – विद्यार्थिनी हे एक अजब रसायन आणि त्याहून गजब समीकरण होतं. आज कदाचित तो स्वतःच्या आईसमोर, त्याची स्वत:ची पन्नाशी उलटून गेली होती तरी, “व्हॅलेंटाईन डे” असा शब्दही उच्चारायला धजला नसता, पण बाईंशी बोलताना असले काही विधिनिषेध नसत.

“अहो बाई, लग्नाला पंचवीस वर्षे होत आली माझ्या. आता कसला व्हॅलेंटाईन डे ? आज रात्री जेवायला भाकरी, भोपळ्याचं भरीत आणि सकाळची उरलेली वांग्याची भाजी आहे. व्हॅलेंटाईन डे कसला कप्पाळ !” तो काहीसा उदास होऊन आणि वैतागून म्हणाला.

“कसले रे तुम्ही असे रडे ?” बाईंनी त्याला फैलावर घेतलं. असंही बाई आपल्या विद्यार्थ्यांच्या बायका आणि विद्यार्थिनींचे नवरे यांना “माझ्या लेकी आणि लेक आहेत ते” असं म्हणत जास्त झुकतं माप द्यायच्या. (“हो, आणि आम्ही भाकरीच्या तुकड्याच्या मोलावर विकत घेतलेले” असं बाईंचे विद्यार्थी कृतककोपाने म्हणायचे.)

“व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय फक्त गुलाब अन् चॉकलेटं, इतकंच का ? लग्नाला दोन पाच वर्षे उलटली म्हणजे संपतं कसं रे तुमचं प्रेम ?  हॉटेलात जाऊन वारेमाप पैसे उधळले म्हणजेच तुमचं प्रेम सिद्ध होतं का आणि त्याहीपलीकडे जाऊन, प्रेम म्हणजे फक्त नवरा बायकोचंच का ? आणि एवढ्या तेवढ्याश्या गोष्टींनी कसले रे तुम्ही लगेच ढेपाळता आणि उदास होता ?”

बाईंनी सरबत्ती सुरू केली आणि तो निरुत्तरही झाला आणि अंतर्मुखही.

बाई निवृत्त होऊन दहा वर्षे होऊन गेली होती. इतक्या वर्षांत नखातही रोग नसणाऱ्या बाईंना गेल्या वर्षी अचानक कर्करोगाचे निदान झालं होतं. पण बाई त्या सगळ्याच अनुभवाला – त्या केमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि लांबसडक केसांच्या त्या गळण्याला – या सगळ्यालाच असामान्य धीराने आणि हसतमुखाने सामोऱ्या गेल्या होत्या. ना कपाळावर एकही आठी, ना माझ्याच नशिबात हे का म्हणत नशिबाला दोष देणं. 

“अरे, माझ्यावर जगावेगळं प्रेम केलं ते माझ्या नवऱ्यानं,” हा इकडे भूतकाळात हरवलेला, आणि बाई तिकडे बोलत होत्या, “लग्न झाले तेव्हा मी फक्त अकरावीपर्यंत शिकले होते. त्या काळात, माझ्या नवऱ्यानं, मी शिकावं म्हणून जिद्द धरली नसती – हट्ट धरला नसता, इथून तिथून पैसे उभे करून माझ्या शिक्षणाच्या फीया भरल्या नसत्या,  तर मी शिक्षिकाच झाले नसते. आणि पुढचं हे सगळं इतकं छान घडलंच नसतं. 

आपली सून शिकलेली आहे आणि शिक्षिका आहे म्हणून माझ्या सासूनं माझ्यावर निर्व्याज प्रेम केलं. कधी गावातल्या घरात जमीन सारवू दिली नाही, की धुणीभांडी करू दिली नाही. ‘तू चार बुकं शिकलेली आहेस, तू न्हायी अशी कामं करायची’ सासूबाई म्हणायच्या.”

आणि खरंच होतं ते. 

त्याला आठवू लागलं. ‘माणसं जोडा रे’ हे अगदी बाईंचं ब्रीदवाक्य होतं. त्या बोलून दाखवायच्या नाहीत असं कधी, त्यांच्या कृतीतून पदोपदी दिसायचं ते.

आणि म्हणूनच मग प्राथमिक शाळेतले एवढुस्से विद्यार्थीही प्रचंड विश्वासाने आपल्या अडीअडचणी बाईंना सांगायचे आणि जबाबदाऱ्यांचे ओझे खांद्यावर बाळगणारे पालकही त्यांच्या समस्या सोडवून घेण्यासाठी विश्वासाने बाईंकडे यायचे. 

याच प्रेमाने एखाद्या विद्यार्थ्याची आई तिच्या दोन भावजयींसह आणि त्या तिघींच्या चार पाच मुलांसह, दिवाळीच्या सुट्टीत, खुशाल बाईंच्या पुण्यातल्या घरी दोन दिवस राहायला यायच्या आणि ऐन थंडीत, संध्याकाळच्या वेळी आलेल्या, बायकोच्या या विद्यार्थ्याच्या आई, काकू आणि मुलांना थंडी बाधू नये म्हणून हातपाय धुण्यासाठी बाईंचे यजमान पाणी तापवून द्यायचे. 

आजही बाईंच्या मुलाचा मित्र अगदी हक्काने बाई, त्यांचे यजमान, बाईंची मुलगी या सगळ्यांना गाडीत घालून आपल्या घरी घेऊन जातो आणि भरपेट जेवण झाल्याशिवाय आणि त्याहूनही भरपेट गप्पा झाल्याशिवाय त्यांना सोडत नाही. 

आज बाईंचे विद्यार्थी वयाने – मानाने मोठे झालेत, पण अजूनही बाईंचा वाढदिवस असला की बाईंच्याच मुलीला विश्वासात घेत, त्यांना थांगपत्ता न लागू देता, त्यांच्याच घरी कार्यक्रम आयोजित करतात आणि बाईंना मोठ्ठं सरप्राईज देतात. 

बाईंच्या आजारपणात, त्यांच्या डॉक्टर – हॉस्पिटलच्या वाऱ्यांत शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांची बाईंना सोबत करण्यासाठी, त्यांना नेण्या – आणण्यासाठी चढाओढ लागलेली असे. 

बाईंची प्रकृती सुधारावी म्हणून बाईंच्या विद्यार्थ्यांनी, शेजाऱ्यापाजाऱ्यांनी नवस बोलले होते, अनुष्ठानं केली होती, आणि  बाई बऱ्या झाल्यावर, नवस फेडण्यासाठी बाईंची ठाण्याची विद्यार्थिनी अश्विनी तर  पार ठाण्याहून प्रभादेवीच्या सिद्धीविनायकापर्यंत ३५ किलोमीटर अंतर चालत आली होती. 

“प्रेम म्हणजे नुसती शारीरिक भावना, धांगडधिंगा आणि महागाच्या भेटवस्तू असं नसतं रे. परवाचीच गोष्ट. दिवसभराचं रहाटगाडगं आटोपलेलं, मी आपली स्वामी समर्थांना नमस्कार करून झोपायच्या खोलीत आले, तर आमचे हे टक्क जागे, झोप येत नाही म्हणाले.

मग काय, त्या रात्री अडीच वाजेपर्यंत आमच्या गप्पा चालल्या. लग्न झालं तेव्हा अक्षरश: भांडीकुंडीही नव्हती रे, कागदाच्या पुड्यांमध्ये डाळ तांदूळ बांधून ठेवायचे, तिथपासून संसाराची सुरुवात झाली, एकमेकांना सांभाळून घेत मस्त संसार झाला. परवा त्या सगळ्या प्रवासाची मस्त उजळणी झाली. 

व्हॅलेंटाईन डे म्हणजे काही फार जगावेगळं नसतं रे. ते तुमच्या कॉलेजमध्ये NSS राष्ट्रीय सेवा योजनेचे घोषवाक्य आहे ना – ‘not me, but you’ ते म्हणजेच प्रेम, नाही का? 

स्वतःच्या आवडीनिवडींपेक्षा तुमच्या विद्यार्थ्याला, त्याच्या पालकांना, शेजाऱ्यांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, आईवडिलांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जोडीदाराला काय हवं आहे याचा विचार आधी करणं, आणि त्याप्रमाणे वागणं, म्हणजेच प्रेम, नाही का ? 

आणि एकदा हा विचार रुजला की मग भाजी भाकरीही गोड लागते, ती एन्जॉय करायची. याहून बेश्ट व्हॅलेंटाईन तो काय वेगळा असणार आहे ?”

बाईंनी नेहमीप्रमाणे संदर्भासहित स्पष्टीकरण देत निरगाठ उकल तंत्राने विषय सोप्पा करून सांगितला. 

“बाई, कमाल आहे हां तुमची. प्रेम या विषयात मास्टरी आहे अगदी !” तो.

“आहे म्हणजे काय, असलीच पाहिजे. अरे, माहेरचं नावच मुळी प्रेमा आहे माझं !” बाईंनी हसत हसत फोन ठेवला.

आजही त्यांनी पाडगावकरांसारखं ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ असं स्पष्ट सांगितलं नव्हतं, पण नेहमीप्रमाणे आपल्या उदाहरणांतून – आपल्या कृतीने समोरच्याला पटवून दिलं होतं. 

तो छान हसला, मगाचची त्याची मरगळ केव्हाच दूर पळाली होती. तो उठला, आणि त्याच्या ‘व्हॅलेंटाईन’बरोबर भाजी भाकरी एन्जॉय करण्यासाठी स्वयंपाकघराकडे वळला.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नणंद माझी लाडाची… ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ नणंद माझी लाडाची ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

वऱ्हाड कार्यालयात आलं.. शारदा इकडून तिकडे नुसती धावत होती. कितीतरी कामांची, मोठी सून म्हणून तिच्यावर जबाबदारी होती. कारण तिच्या लाडक्या नणंदेचं समीराचं लग्न होत नां! सहज समीराच्या खोलीमध्ये ती डोकावली, तर हे काय! ती हमसून हमसून रडत होती. तिला जवळ घेत शारदा म्हणाली. “समीरा नको ग रडूस. सासरी परक्या घरी जातांना अशीचं स्थिती होते, प्रत्येक मुलीला वाईट हे वाटतंच. आणि साहजिकच आहे गं तें!एका जागेवरून उपटलेल रोपंट दुसऱ्या जागी लावतांना त्रास हा होणारच. मी नाहीं का माझ माहेर सोडून तुमच्याघरी आले. आणि आतां सासर हेच माहेर असं समजून तुमच्या घरात रुळले पण. सासरच्या अनोळखी माणसांच्या प्रेमाची ओळख मला पटली. आणि तुझ्यासारखी जिवलग, नणंदेच्या रूपांतली मैत्रिणी पण मला मिळाली. हे बघ,. आई आण्णा व ह्या घराची काळजी अजिबात करायची नाही. अग मी आहे नां !. तुझ्या सारखीच काळजी घेईन हॊ मी त्यांची. समीराचे डोळे आपल्या पदरानें पुसत शारदा पूढे म्हणाली “ए समीरा हास ना गं!आतां फक्त एकच गाणं गुणगुणायचं. ‘ ” “साजणी बाई येणार साजण माझा “. आणि हो ! घोड्यावरून येणाऱ्या सागरच रुप आठवतंच मस्त स्वप्ननगरीत जायच. काय?

समीरा गालात हसली आणि खुदकन् लाजली, सागरच्या आठवणीने. तशी शारदा पुढच्या कामासाठी चटकन् उठायला लागली. तर.. तिचा पदर ओढत समीरा म्हणाली. जरा- थांब ना वहिनी. मला तुला काही सांगायचय. “हसतंच शारदेने चिडवलं ” पूरे हं समीरा. आतां मला नाही,. जे काय सांगायच तें सागर रावानाच. सांगायच. चल बाई उठू दे मला “.. “प्लिज थांब ना वहिनी, “ काकुळतीला येऊन समीरा परत मुसमुसायला लागली. थरथर कांपतच होती ती.. शारदाने तिला जवळ घेतल्यावर ती घडाघडा बोलायला लागली.

” वहिनी सागर मला मनापासून आवडलेत. पण. – पण हे लग्न सुखरूपपणे पार पडेल की नाहीं ? ह्या भितीने जीव घाबरा होतोय ग माझा !”

तिला प्रेमानें गोंजारून शारदा म्हणाली “समीरा काही झालय का ? अगदी मोकळे पणी सांग any Problem? ” 

थरथर कापतच समीरा पूढे सांगु लागली. : “ कसं सांगु वहिनी तुला? एक गोष्ट लपवलीय मी तुमच्यापासून.. प्रकरण. तसं गंभीरच आहे “. हे ऐकल्यावर. आता मात्र थरकांपच उडाला शारदाचा. काय सांगणार आहे ही? काही भानगड, प्रेम प्रकरण? की बलात्कार ? असा कांही अत्याचार झालाय का हिच्यावर ?

‘ नाहीं नाहीं माझ्या सासरच्या अब्रुचा प्रश्न आहे हा!’. असंख्य प्रश्नाच्या विचाराने घशाला कोरड पडली कसबसं स्वतःला सावरून ती म्हणाली ”समीरा बोलना ! सांग लौकर. काय झालयं ?सांग गं! पटकन सांग.

“ऐक नां वहिनी. गेले कित्येक दिवस एक मवाली, गुंड मुलगा माझ्या मागे लागलाय. सुरुवातीला, लाडीगोडीनें अघळ पघळ बोलून त्याने मला खूप विनवलं, आमिषे दाखवली. पण मी बधले नाही. कारण माझं त्याच्यावर प्रेमच नव्हतं. तसं सांगूनही त्यानी माझा पिच्छा सोडला नाही. उलट त्याचा मवाली पणा जास्तच वाढला. खूप त्रास व्हायचा मला त्याचा. कधीकधी भिती वाटायची. हां हात टाकेल की काय माझ्यावर? अतिप्रसंग करेल कां ?या विचाराने घराबाहेर पण पडायची नाही मी. आणि शेवटी त्यानी मला धमकी दिली. ” माझ्याशी लग्न केल नाहीस तर मी दुसऱ्या कुणाशीही तुझ लग्न होऊ देणार नाही. मग सुखाचा संसार तर दूरच राहिला. गुंड आणून पळवीन मी तुला “. मला खूप भिती वाटतेय ग वहिनी. तो लग्नात काही विघ्न तर नाहीं ना आणणार ? तसं झाल तर… तर सगळाच डाव उधळेल. माझ्या स्वप्नांचा, आणि माझ्या आयुष्याचा… आई अण्णांच काय होईल गं ? आणि माझा दादा? केवढया मोठया आजारातून उठलाय तो नुकताच. तुझ्यामूळे तो लौकर बरा झालाय त्याच B. P. वाढून त्याला काही त्रास झाला तर. ?वहिनी रात्र रात्र जागून काढतेय गं मी, हया सगळ्या विचारांनी झोपच उडालीय माझी० आणि काय सांगू वहिनी. काल तो आपल्या घराभोवती घिरट्या घालत होता. आणि कहर म्हणजे खिडकीतून त्याने ही चिठ्ठी फेकलीय. हे बघ यांत त्यांनी लिहीलय –” उद्या बघच तू. गुंड आणून तुझं लग्न मी मोडणारच. लग्न कसं होतयं बघतोच मी. ” 

शारदा क्षणभर गांगरली. पण दुसऱ्या क्षणी स्वतःला सावरत तिनें समीराचें घळघळ वहाणारे अश्रु पुसले.

तिला खूप किंव आली तिची. किती तरी दिवस मानसिक ताणाचं भलं मोठ्ठ ओझं उरावर बाळगून, आनंदाचे दिवस किती ताण तणावात गेले बिचारीचे. आपल्या आई वडिलांना दादाला त्रास होऊ नये म्हणून केविलवाणी धडपड चालली होती इतके दिवस समीराची. तिला आधार देत शारदा म्हणाली,

“घाबरू नकोस समीरा मी आहे तूझ्या पाठीशी. आपल्या घराची अब्रू अशी चव्हाट्यावर नाही येऊ देणार मी. तू निर्धास्त रहा. मी बघते काय करायच तें. “ तिचा आधार घेत समीरा म्हणाली “ पण — पण वहिनी दादा ! तो किती संतापी आहे रागाच्या भरात त्यांनी काही केले तर? आणि पण मग त्याला किती त्रास होईल माझ्यामुळे. मला काही काहीचं सुचत नाहीये, काय करू मी?” तिला शांत करुन ठामपणे शारदा म्हणाली, ” नाही समीरा ह्यातलं ह्यांना आई अण्णाना काहीच कळता कामा नये. नाहीतर परिस्थितीला वेगळंच वळण लागेल. तू शान्त रहा.. “

आणि मग खरोखरचं शारदाने आपल्या भावाला मदतीला घेऊन परिस्थितीशी लढा दिला. आणि तिचा पाठीराखा भाऊ अविनाश तिच्या पाठीशी उभा राह्यला.. पोलीसांच्या मदतीने बंदोबस्त करून रंगे हात त्या मवाल्याला पकडून त्याला शिक्षा झाली. आणि नंतर मग ‘.. झाले मोकळे आकाश. ‘….. कार्य निर्वीघ्नपणे पार पडलं होतं. अशी ही बाहेरची व घरांतली आघाडी सौ. शारदानें अविनाशच्या मदतीने खंबीरपणे सांभाळली होती.

 कु. समीरा, चि. सागरची अर्धांगिनी,… सौभाग्यवती समीरा सागर साने झाली.

सासरी निघताना सौ. समीराच्या डोक्यावरून हात फिरवीत शारदा म्हणाली, ” सागर एक गुणी, सुशील, भाबडी मुलगी आम्ही दिलीय तुम्हाला. सांभाळून घ्या हं तिला. ” गम्भीर वातावरण हसरं साजरं करीत सागर म्हणाला ” मंडळी समीराचं नांव आम्ही सरिता ठेवणार आहोत आणि हीं सरिता आता सागराला मिळालीय. तिच्या सुख दुःखात मी तिच्या पाठीशी आहेच… तुम्ही दिलेलं हे खणखणीत नाणं आम्ही केव्हाच पारखून घेतल आहे हं. माझे आई बाबा खूप चांगले आणि सुशिक्षित व समंजस आहेत. त्यांच्या छत्राखाली समीरा आणि मी सुरक्षित राहू. एकमेकांच्या विश्वासावरच आमचा संसार सुखाचा होईल. तेव्हा आता कुठलीही काळजी करायची नाही. आणि हो! आईचे, अण्णांचे आणि दादांचे तुमचेही आशीर्वाद आहेतच कि आमच्या पाठीशी. ” असं म्हणून ती लक्ष्मीनारायणाची जोडी थोरांच्या पायाशी वाकली. सगळं निर्विघ्नपणे पार पडलं होतं. कोपर्‍यात उभ्या राहयलेल्या भाऊरायाचे, अविनाशचे शारदेने नजरेनेच आभार मानले.. अगदी कृतज्ञतेने प्रेमळ नजरेने..

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काचेचा स्वर्ग… (अनुवादित कथा) – भाग-2 – डॉ अमिताभ चौधुरी ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

काचेचा स्वर्ग… (अनुवादित कथा) – भाग-2 – डॉ अमिताभ चौधुरी ☆ सौ. गौरी गाडेकर

(आणि तेच झालं. कित्येक महिने गेले. शंभुदयाल ना धरणीधरच्या घरी आला,ना त्याने पुन्हा फोन केला. धरणीनेही त्याचा नंबर सेव्ह केला नव्हता. त्यामुळे कॉलबॅकची  शक्यता नव्हती .दिवस-रात्री उलटत गेल्या. जग आपल्या चालीने चक्कर काटत राहिलं.) …इथून पुढे…..

विश्वविद्यालयाच्या समोरच्या लंकाच्या युनिव्हर्सल बुक डेपोमध्ये आदिवासींवर एक पुस्तक आलं होतं. धरणी काहीबाही लिहित असतो. तेव्हा त्याने फोनवर त्यांना विचारलं होतं. आज दुपारी तो तेच घेऊन परत येत होता. पण रेवडी तलावाच्या पुढे राजपुर्‍यात ट्रॅफिक एवढा ठप्प झाला होता, की वैतागून त्याला रिक्षातून खाली उतरावं लागलं. 

तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की तो कुंवरजींच्या हवेलीजवळ उभा आहे. ‘अरे!’  तो विचार करू लागला, ‘ शंभूने सांगितलं होतं,की इथेच त्याने एक घर विकत घेतलंय. आज वेळ आहे, तर त्याला भेटून का येऊ नये?’ 

डॉ अमिताभ चौधुरी 

पण फक्त नावावरून नक्की पत्ता कसा मिळणार? या बाबतीत काशीचे चहावाले,पानवाले इन्क्वायरी काउंटरचं काम चोख बजावतात. 

“भैया, शंभुदयालजीचं घर कुठे आहे,सांगू शकता?” 

“कोण शंभुदयालजी? जमुहरामध्ये काम करायचे ,ते? दोन-तीन वर्षांपूर्वी त्यांनी इथे वर्माजींचं घर खरेदी केलं.”

“हा.हा. तोच.”

मग दिशा दिग्दर्शन सुरू झालं, ‘बाजूच्या रस्त्याने जा. पुढे खांबाकडून एक गल्ली आत गेलीय. त्या गल्लीत शिरा.तीन-चार घरं सोडून डावीकडे त्यांचंच घर आहे. समोरची खिडकी हिरवी आहे. वगैरे वगैरे.कोणालाही विचारलं तर सांगेल.’ 

विचारायची गरजच पडली नाही. धरणीने बेल वाजवली. एका बाईने बाजूच्या खिडकीचं एक दार उघडून विचारलं,”कोण आहे?” 

“नमस्कार. मी धरणीधर.शंभुदयालचा बालमित्र. त्याला सांगा,मी भेटायला आलोय.”   

आतमध्ये काहीतरी बोलणं झालं. मग दरवाजा उघडला,”या.”

हावभाव आणि बोलण्यावरून अंदाज करणं सोपं होतं, की ती शंभुदयालची बायको होती. धरणीला एका खुर्चीवर बसवून ती आत गेली. थोड्याच वेळात तिने नवर्‍याला आधार देत  बाहेर आणलं.

धरणीधर उठून उभा राहिला,” अरे शंभू, बच्चू! ही काय अवस्था करून घेतलीयस?”

साठी ओलांडलेले दोन्ही मित्र एकमेकांना बघत होते. बहुधा मनात विचार करत असावेत – ‘पंधरा-सोळाव्या वर्षी जेव्हा शेवटचं बघितलं होतं, तेव्हा हा कसा दिसत होता?’

शंभूने तोंड उघडलं,” आता एवढे आजार….त्या दिवशी सांगितलं होतं ना तुला?” 

“अरे,वहिनींशी ओळख तर करून दे.”

“हो,हो. देतो ना. हा धरणीधर. आम्ही दोघं प्रायमरीपासून एका वर्गात होतो. आता काय सांगू? तीन वर्षांपूर्वी मला पॅरॅलिसिस झाला. डाव्या बाजूला. तीन महिने बिछान्यात होतो.हळूहळू बरा झालो. आताही व्यायाम करावे लागतात.हीच करून घेते.”

“मग मुलाकडे का जात नाहीस? तो तर डॉक्टर आहे. आम्ही आपसात बोलत असतो, तुझे दोन्ही मुलगे चांगले निघाले.”

“काय   म्हणता, भाईसाहेब?” ती एवढ्या धारदार आवाजात बोलली,की धरणी नजर उचलून सरळ तिच्याकडे पाहायला लागला. “कोण डॉक्टर? आमचा मुलगा?” 

“अगं,कमला,इतक्या दिवसांनी मित्र घरी आलाय,त्याला चहा-बिहा नाही पाजणार?” शंभुदयाल गोंधळून गेला. जणू त्याच्या रहस्यावरचा पडदा बाजूला झाला होता. तो स्वतःच कसातरी उठून उभा राहिला. पण वादळात सापडलेल्या झाडासारखं त्याचं शरीर थरथरू लागलं. त्याचा डावा पाय आणि हाततर कमजोर होतेच. तो त्या पायावर नीट उभासुद्धा राहू शकत नव्हता. त्याचा उजवा हात हवा कापत होता. त्याचं तोंड एका बाजूला मिटलं गेलं होतं.  “अरे यार, बस ना. एवढ्या दिवसांनी भेटलो आहोत! “

कमला काहीतरी बडबडत आत निघून गेली,” हं. मुलगे! त्यांच्यापेक्षा परके बरे.”  

“काय झालं?” धरणीधरलाही संकोच वाटू लागला.संवादाच्या धाग्याचं कोणतं टोक पकडावं,हेच त्याला कळेना.

“तूच सांगितलंस ना? की तुझा मोठा मुलगा इंजिनिअर आहे आणि धाकटा डॉक्टर?  खरं सांगायचं,तर आम्हाला थोडीशी असूयाच वाटायला लागली होती -साल्याचं नशीब किती जोरावर आहे!” 

“देवाच्या मनात होतं,तसंच सगळं झालं. ते लोक आपआपला संसार सांभाळताहेत. आम्ही दोघं कोंबडा-कोंबडी इकडे बसून कुकूचकू  करतोय. हे घर घेतलं. आयुष्यभर जमवलेल्यातली अर्धी पुंजी या घरातच गेली.” 

‘ठक’…. कमला कधी खोलीत आली,कळलंच नाही. चहाचा कप टेबलावर ठेवून ती बोलायला लागली,” आणि आता तेच मुलगे सांगताहेत – हे घर विकून आम्हाला अर्धा-अर्धा हिस्सा देऊन टाका.”

“म्हणजे?” धरणीधर चकित झाला. 

“जाऊ दे गं. आपल्या मुलांनी काही मागितलं,तर काय झालं?”

” इंजिनिअर आणि डॉक्टर तर स्वतःच एवढं कमावतात,की…”धरणी बोलताना अडखळला.

” कुठचा इंजिनिअर आणि कुठचा डॉक्टर?” कमला तिरमिरीत बोलली, “मोठ्याला ह्यांनी टेम्पो विकत घेऊन दिला होता. तो त्याला धड चालवायला जमलं नाही. विकून टाकला. पिऊन पडलेला असतो आता. धाकटा कुठच्यातरी प्रॉपर्टी डीलरकडे काम करतो. जमिनीच्या खरेदी-विक्रीत काय घपला केला,कोणास ठाऊक.त्याला ते शहर सोडून दुसरीकडे पळून जावं लागलं.आता दोघेही बापाचा गळा दाबून सांगताहेत – घर विकून आम्हाला अर्धेअर्धे पैसे द्या.”

“अरे!” बस्स.धरणी फक्त एवढंच बोलू शकला. काही न बोलता ,तो आपल्या बालमित्राकडे बघत राहिला. त्याला खूप राग आला होता. एवढं मोठं खोटं! एवढं धडधडीत असत्य! आणि कशासाठी?  फक्त लोकांसमोर मोठेपणा मिरवण्यासाठी?

शंभुदयालच्या चेहर्‍यावर विचित्र उदासी तरंगत होती. डोळ्यांत अश्रू नव्हते. पण त्याच्या रक्तातून एक प्रकारचा पश्चात्ताप चेहर्‍यावर झिरपत होता. त्याने हसण्याचा प्रयत्न केला,”धरणी, कोण जाणे मेंदूत हे वेड कसं शिरलं? माझी मुलं जसजशी उद्दाम बनत गेली, तसतसा  मी जुन्या मित्रांना फोन करून-करून मुलांविषयीच्या स्वप्नांची बहार सजवत गेलो. कित्येकांच्या मुलांना, अगदी मुलींनासुद्धा चांगलं शिकून,एमबीए करून चांगल्या नोकर्‍या मिळाल्या. कोणी बॅंकेत नोकरीला लागले. पण माझी मुलं?” 

शंभुदयाल गप्प झाला. खोलीत भरलेल्या शांततेत विष तरंगत असल्यासारखं वाटत होतं आणि तो ते हळूहळू गिळत होता.  “जेव्हा माझ्या कानावर यायचं – कोणाचा मुलगा स्पर्धापरीक्षेत पास झाला, कोणाच्या मुलीला नोकरी लागली, आता तिच्या लग्नाचं बघताहेत,तेव्हा माझ्या छातीत विचित्र जळफळाट व्हायचा. डोक्याचा दाह व्हायचा. देवा,मी काय पाप केलं, म्हणून माझ्या नशिबात असली मुलं आली?”

शंभुदयालला धाप लागली.

मित्राला बघून धरणीधरच्या जिभेला जणू अर्धांगाचा झटका आला. काय सांगणार होता तो मित्राला? कसं करणार होता त्याचं सांत्वन? एका बापाने नकळत आपल्या आकांक्षांचा एक काचमहाल उभा केला होता. आणि आज तो फुटून विखुरला होता. शंभूदयाल हळूहळू बोलायला लागला,”आणि नंतर तर पॅरॅलिसिस झाला. त्यातून सावरल्यावर रोज कोणा ना कोणाला फोन करून हेच सगळं सांगत राहिलो, की माझा मोठा मुलगा इंजिनिअर आहे आणि धाकटा डॉक्टर . का कोणास ठाऊक, पण त्यामुळे मला एक विचित्र शांती मिळायची. मला माहीत आहे, सगळ्यांना वाटायचं की या साल्याने तर बाजी मारली!” 

धरणीधर आ वासून आपल्या मित्राकडे पाहत होता. माणूस स्वप्न व वास्तवाचा हा कुठचा साप-शिडीचा खेळ खेळू लागतो? 

त्याला चहाचा कप उचलण्यासाठी हात पुढे करावासा वाटला. पण त्याच्या हाताचा जणू दगड झाला होता. तो उठून उभा राहिला,”चल,यार.निघतो.येईन पुन्हा कधीतरी.”

मागून शंभूचा आवाज आला,” अरे,निदान चहा तरी पिऊन जा.”  

कमला काहीच बोलली नाही. ती गुपचूप उभी होती. दरवाजाजवळ भिंतीला टेकून. 

– समाप्त – 

मूळ लेखक :डॉ. अमिताभ शंकर रॉय चौधुरी 

मूळ हिंदी कथा :  कांच की जन्नत

मराठी अनुवाद :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काचेचा स्वर्ग… (अनुवादित कथा) – भाग-1 – डॉ अमिताभ चौधुरी ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

काचेचा स्वर्ग… (अनुवादित कथा) – भाग-1 – डॉ अमिताभ चौधुरी ☆ सौ. गौरी गाडेकर

पौषातली दुपार निरोप घ्यायच्या तयारीत होती. थंड वारा  सुटला  होता. धरणीधरची धाकटी मावशी आणि तिचे पती आले होते.  धरणीधर- मुग्धा हे पती-पत्नी  उतरत्या उन्हाची  दुलई  ओढून त्यांच्यासोबत गप्पा मारत होते. 

“चहा कधी करणार?” धरणीधरने हातावर हात चोळत विचारलं,” काय काका! एक-एक कप गरम चहा मिळाला,तर रक्त गोठण्यापासून आपली सुटका होईल ना!” 

मुग्धा हसतहसत उठून उभी राहिली.”जरा कुठे मावशींबरोबर बोलत होते,तर मध्येच…”

डॉ अमिताभ चौधुरी 

“सॉरी मॅम, पण मोठमोठ्या लोकांचं बोलणं एका खेपेत थोडंच आटोपतं? बोलणी तर चालूच राहतात. आता हिंदुस्थान-पाकिस्तानच्या बोलण्यांचं ,वाटाघाटींचं बघा ना. चहा करून आण. मग गप्पांचा दुसरा एपिसोड चालू करू या.”

मुग्धा स्वयंपाकघरात  गेली,तोच टेबलावरचा धरणीधरचा फोन वाजायला लागला.

मुग्धाने हाक मारली,”अहो, तुमचा फोन वाजतोय.” 

“यावेळी कोणाचा फोन?” धरणीधरला खुर्ची सोडून उठावंच लागलं. नाव धरणीधर,पण  मोबाईलचं ओझंपण त्याला पेलवत नाही. तो भार,तो पत्नीवरच सोपवतो. 

“हॅल्लो!” पलीकडून आवाज आला. पण रस्त्यावरच्या कलकलाटाने ते शब्द स्वाहा केले. 

“कोण बोलतंय?” 

“अरे,धरणी. मी शंभुदयाल बोलतोय. ओळखलंस?” एक अस्पष्ट आवाज स्मृतीच्या सागरापलीकडून हलक्या हाताने टकटक करत होता. 

“अरे यार! कसा आहेस? किती दिवसांनी! ” 

“दिवस नाही.वर्षं म्हण.बस्स! अडतीस वर्षं नोकरी करून आता रिटायर झालोय. बसल्याबसल्या जुन्या मित्रांना फोन करतोय.”

“वा! पण माझा नंबर कसा मिळाला?”

“अरे,मोहनकडून मुरलीचा, मुरलीकडून मोतीलालचा..असं करत करत मिळाला.” 

“काय म्हणतोयस? रिटायरमेंटनंतर मुक्काम कुठे?” 

“परत आलो बनारसला. सर्वांहून सरस,आमची काशी-बनारस. जमुहरा बाजारात ढीगभर लोकांनी घरं बांधली.रिटायर होत गेले आणि तिथेच फॅक्टरीपासून लांब जमीन विकत घेऊन घरं बांधत गेले.तीन-चार एकर जमिनीत लोक घर बांधतात. तेवढ्या पैशात बनारसमध्ये कबुतरांच्या कॉलनीतलं एखादं खुराडंपण मिळणार नाही.”  

“आणि मुलं? ती काय करतात?”

थोडा वेळ शंभुदयालचा आवाजच बंद झाला.

नंतर ” मला दोन मुलगे आहेत. दोघेही सेटल  झालेत. मोठा बंगलुरूच्या सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर आहे.  धाकटा भोपाळच्या एका पॉलिक्लिनिकशी अटॅच्ड आहे.”

“वा,बच्चू! मला वाटतं,तू एकदा फोनवर बोलला होतास,मोठा मुलगा इंजिनिअर आणि धाकटा डॉक्टर. म्हणजे  लक्ष्मी तुझ्या घरी पाणी भरतेय, म्हणायची.”

“तुझ्या मुलीचं लग्न झालं ना? ती ऑस्ट्रेलियात असते म्हणे.”

“हो.”

“आणि तुझा मुलगा टाटा सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये पीएचडी करतोय ना?” 

“अरे! तू तर सीआयडीसारखी  सगळी इन्फॉर्मेशन गोळा केलीयस.”

” हा हा! माझं काय? दिवसभर बसून असतो. प्रायमरीपासून कॉलेजपर्यंतच्या जुन्या मित्रांना – ज्यांचे नंबर आहेत माझ्याकडे, त्यांना फोन करत राहतो. कोणाला तुझ्याविषयी विचारतो.मग तुझ्याकडून दुसर्‍या कोणाचीतरी माहिती काढीन. बस्स. इन्फॉर्मेशन कम्प्लिट.” 

हायस्कूलमधल्या दोन मित्रांच्या गप्पा अशाच चालू राहिल्या. 

“जगन्नाथ तुझा जिवलग मित्र होता. तो कसा आहे,ठाऊक आहे का तुला?” शंभुदयालने विचारलं,” काही वर्षांपूर्वी मालाची डिलिव्हरी घ्यायला आसनसोलला गेलो होतो, तेव्हा मला भेटला होता.”

“काय सांगू तुला? तो अगदी एकटा पडलाय आता,” धरणीचा आवाज उदास झाला,”मुलगी चेन्नईला नोकरी करते. आणि मुलगा भुवनेश्वरला. मला वाटतं,त्याचं शिक्षण अजून पुरं नाही झालं.”

“चांगलंच आहे की! पण एकटा पडलाय म्हणजे?”

” त्याच्या बायकोला कॅन्सर झाला होता. तेव्हा बिचारा मुंबईला टाटा मेमोरिअल हॉस्पिटल आणि कुठे कुठे धावाधाव करत होता. पण कॅन्सर म्हणजे असला रोग ,साक्षात यमराजाशी गाठ. त्यानंतर कधी भेटला नाही तुला तो?”

“नाही. माझ्याकडे त्याचा नंबर नाही. तुझ्याकडे कधी येईन,तेव्हा त्याचा नंबर घेईन. आणि बोलेन त्याच्याशी.”

“नक्की ये. या म्हातारपणात बालपणीच्या गप्पा होतील.”

” बरोबर बोललास. काय सांगू? त्रेसष्ट वर्षांचा होता होता सहाशे तीस रोग लागले माझ्यामागे.”

” चल. नंतर  गप्पा मारू या. शिवीगाळ करू या. भेटायला आलास,की चहा पाजीन आणि इरसाल बनारसी शिव्यांनी तुझं आदरातिथ्य करीन. आता मावशी आणि काका आले आहेत.”

“ठीक आहे. भेटू या कधीतरी.”

“नक्की ये. अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही. पण एक फोन कर. नाहीतर तू यायचास आणि नेमकं त्याच वेळी आम्ही दोघं दहा मिनिटांसाठी बाहेर जायचो. ओ.के.”

फोन ठेवून धरणीधर मावशी-काकांकडे आला. 

“पहिलीपासून आम्ही एका वर्गात होतो. हायस्कूलपर्यंत बरोबर होतो. मग दोघांचे सब्जेक्ट वेगवेगळे झाले. मी वेगळ्या कॉलेजमधून इंटर केलं.”

” पहिल्या इयत्तेतला मित्र! अरे वा!” मावशीचा चेहरा खुलला. 

“हो. त्याच्याकडे हजार-बाराशे फोन नंबर आहेत,म्हणत होता. सगळ्यांना फोन करत असतो. काय  बडबडतो देवाला ठाऊक! आमच्या जमान्यात वर्गात मेंढरांसारखी मुलं भरलेली असायची. पण सत्तर-ऐंशीपेक्षा जास्त थोडीच असणार! आणि हायस्कूलमध्ये पोहोचेपर्यंत त्यापैकी काही मुलं रिसर्च स्कॉलर बनली. मग उरली किती?….नंतर त्याच्या ऑफिसात किंवा आयआयटीमध्ये असून असून किती मित्र असणार! फार तर पन्नास -शंभर . का कोणास ठाऊक! तोंडाला येईल ,ते बडबडत होता.” 

चहा आला. घोट घेताघेता धरणीधरचं स्मृतिमंथन चाललं होतं,” तसं तर,लहानपणीही थापा मारायची सवय होती त्याला. मला आठवतं, त्या दिवसांत सगळ्यांना शायरीची बाधा झाली होती. तर एक दिवस त्यानेपण स्वतःची शायरी ऐकवली,’बदल जाएं  अगर माली, चमन होता नहीं खाली, बहारें फिर भी आती हैं,बहारें फिर भी आएंगी’  ” 

“अरे,हे तर ‘बहारें फिर भी आती हैं’ या सिनेमातलं गाणं आहे!”

“बघा ना!”

“याआधी कधी बोलणं झालं होतं तुमचं?” आता काकांनाही मजा वाटत होती. 

“हो. दोन-तीनदा त्यानेच फोन केला होता. पहिल्यांदा जवळजवळ वीस-पंचवीस वर्षांपूर्वी. शेवटचा तीन-चार वर्षांपूर्वी. तेव्हा म्हणत होता,’आता रिटायर होणार,तेव्हा बनारसला येऊन जुन्या मित्रांना भेटू या.’ ” 

” जुन्या मित्रांशी तुझं बोलणं होतं?” मावशीने हसतच विचारलं.

” कुठून होणार? हं. दोघं-तिघं जणं बाजारात वगैरे भेटतात,तेव्हा थोडं बोलणं होतं. नाहीतर कोणाला हार्ट प्रॉब्लेम,तर कोणाला डायबिटीस, कोणाकोणाला तर दोन्ही रोगांचं वरदान. आता शंभू बोललाय,येतो म्हणून, पण येतो की नाही,ते बघू या.” 

आणि तेच झालं. कित्येक महिने गेले. शंभुदयाल ना धरणीधरच्या घरी आला,ना त्याने पुन्हा फोन केला. धरणीनेही त्याचा नंबर सेव्ह केला नव्हता. त्यामुळे कॉलबॅकची  शक्यता नव्हती .दिवस-रात्री उलटत गेल्या. जग आपल्या चालीने चक्कर काटत राहिलं…. 

—  (क्रमशः भाग पहिला )

मूळ लेखक :डॉ. अमिताभ शंकर रॉय चौधुरी 

मूळ हिंदी कथा :  कांच की जन्नत

मराठी अनुवाद :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रंगभूमी… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ रंगभूमी… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(हॉस्पिटलमध्ये मी फोन करून सांगितलंय, मी सोबत आहे. तुम्ही नाटक सुरु ठेवा, ही तुमची दोन माणसे गाडीत आहेत, ती त्याच्या सोबत राहतील .”) – इथून पुढे 

डॉक्टरांची गाडी अनिलला घेऊन गेली, आता परीक्षकांना पण देवव्रताची भूमिका केलेल्या नटाला हार्टअटॅक आला, ही बातमी समजली, ते पण स्पर्धक काय पुढे सांगतात, हे पहाण्यासाठी थांबले.

प्रेक्षकांना पण हळूहळू हे कळले, काही प्रेक्षक आत भेटायला आले.

आता त्यांची तब्येत बरी होईल म्हणाले ना डॉक्टर, मग दुसरा कलाकार घेऊन नाटक सुरु करा, आम्हाला नाटक पहायचे आहे, पुढील अंकातील गाणी ऐकायची आहेत.

काही प्रेक्षक बोंबाबोंब करत म्हणाले “आम्ही तिकीट काढलंय की राव,आमास्नी नाटक बघायचं हाय.”

काय करावे अजितला सुचेना. आता आयत्यावेळी देवव्रतासारखी महत्वाची भूमिका कोण करेल?

एव्हढ्यात सत्यवती झालेली तन्वी अजितकडे आली “अजित, सुदर्शन आलेला आहे ना, त्याने या वर्षी देवव्रताची भूमिका केली आहें, त्याला गळ घाल, तो नाही म्हणणार नाही.”

अजितच्या लक्षात आले, होय, सुदर्शन देवव्रत करू शकेल, तसं स्पर्धेच्या नियमात बसतं की नाही कोण जाणे, पण नाटक पुढे चालू राहील, प्रेक्षक नाराज होणार नाहीत. तेथेच बाजूला उभ्या असलेल्या सुदर्शनला अजित म्हणाला “सुदर्शन, नाटक रद्द करावे लागता कामा नये. कारण रंगभूमीचा आणि प्रेक्षकांचा तो अपमान होईल.”

“होय खरे आहे, पण आता काय करणार?”

“तूच करू शकतोस सुदर्शन, तूच करू शकतोस, तू येथून पुढील देवव्रताचा रोल करायचा, नाही म्हणू नकोस दोस्ता, स्पर्धेत पहिला दुसरा नंबर मिळवायचा म्हणून नव्हे, हे मायबाप प्रेक्षक तिकीट काढून आलेत, त्यांना पुढील नाटक पहायचे आहे म्हणून आणि आपल्या रंगभूमीसाठी.”

सुदर्शन भांबावला, असे कधी या आधी झाले नसेल, आपण ते करावे काय?

तो आपल्या सोबत्याकडे धावला. त्याना पण अजितचा प्रस्ताव आश्रयकारक वाटला आणि नटराज ग्रुप त्याचाही प्रतिस्पर्धी होता गेल्या कित्येक वर्षाचा. पण..ज्योती म्हणाली “सुदर्शन, तू आत्ता काम करावंसं, नाटक थांबता कामा नये, नटराज ग्रुप आपला नाटकातील दुश्मन असला तरी प्रेक्षक नाटक अर्धवट पाहून नाराज होऊन परत जाता कामा नयेत. तू हो म्हण .”

मग सर्वच सोबती नाटक करावं असं म्हणू लागले आणि सुदर्शन भूमिका करायला तयार झाला.

सुदर्शन देवव्रत म्हणजेच भीष्मचा पुढचा भाग करणार हे निश्चित झाल्यावर अजितने परीक्षकांना त्याची कल्पना दिली, ते म्हणाले “नाटक थांबवू नका, आम्ही सरकारला या नाटका दरम्यान घडलेली परिस्थिती आमच्या अहवालत कळविणार पण स्पर्धेसाठी नाटक पुरे होणे चांगले”.

तो पर्यत बऱ्याच प्रेक्षकांना दुसरा नट देवव्रताची भूमिका करणार हे कळले होते. जे नवखे होते, ते म्हणत होते, हा आयत्यावेळी काय करेल? प्राॅम्टींग वर बोलेल, धा मिनिट बघू नायतर सटकू..

पण काही नेहमी स्पर्धेची नाटके पाहणारे त्या शहरातील सुज्ञ प्रेक्षक होते, त्याना आपल्या प्रतिस्पर्धी ग्रुप मधील माणूस आयत्या वेळी नाटक रद्द होऊ नये म्हणून, भूमिका पुढे न्यायला तयार झाला याचे कौतुक वाटत होते, आता सुदर्शन या दुसऱ्या ग्रुप मध्ये कशी भूमिका करतो, याचे पण कुतूहल वाटत होते.

आत मध्ये सुदर्शन रंगायला बसला. मनातल्या मनात देवव्रताचे संवाद आठवू लागला. या ग्रुप मधील इतर साथीदार डोळ्यासमोर आणू लागला. आज आपली परीक्षा आहें हे त्याने जाणले. त्याने मनातल्या मनात आई वडिलांना नमस्कार केला, आज मला यश द्या, अस मनात म्हणत राहिला. .

सुदर्शनने देवव्रताची वेशभूषा केली आणि तो स्टेज वरील त्याच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांना भेटायला गेला, त्याचे जास्त संवाद तन्वी म्हणजेच सत्यवती सोबत आणि चंडोल झालेल्या मोहन सोबत होते. सर्वांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि तिसऱ्या अंकाची बेल दिली गेली आणि पडदा उघडला.

तिसऱ्या अंकातले सत्यवती आणि भिवरा मधील संवाद सुरु होते, तेंव्हा पाठीमागच्या विंगेत सुदर्शन आपल्या एन्ट्री साठी श्वास रोखून तयार होता. त्याचा सेनापती सत्यवतीला “राजपुत्र देवव्रत इकडेच येत आहेत,यावर भिवर काही म्हणणार एव्हड्यात देव व्रत प्रवेश करत म्हणतो, “देवव्रताच्या तोंडातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द म्हणजे देवव्रताचा निर्धार असतो”.

सत्यवतीची भूमिका करणाऱ्या तन्वीच्या शरीरावर हे धारदार वाक्य ऐकून शिरशिरी आली, अनिल या भूमिकेत असे वाक्य एवढ्या परिणामकरक कधीच म्हणत नसे.

आणि मग सुरु झाली देवव्रतची पल्लेदार वाक्ये. कानेटकरानी एवढी जबरदस्त वाक्ये देवव्रतला लिहिली आहेत, ती उच्चारणे येणे नटाचे काम नव्हे.

“देवी मी कुणाला जन्मालाच घातलं नाही म्हणजे या राज्यात वाटेकरी नसेल “.

“भीष्म हा स्वतः उदगारलेल्या प्रतिज्ञेचा बंदी आहें “.

“भीष्माचे वर्तन धर्माच्या चौकटीत बसत नसेल तर धर्माची चौकट बदलेल पण भीष्म बदलणार नाही “

एकापाठोपाठ एक शब्दसरी प्रेक्षकांच्या अंगावर कोसळत होत्या आणि प्रेक्षक ओलेचिंब होत होते. स्टेज वरील आणि विंगेत राहून पहाणारे इतर कलावंत सुदर्शनाच्या या अनोख्या भीष्म दर्शनाने आश्चर्यचकित झाले होते.

आज स्वतः सुदर्शन खूष होता, त्या दिवशी तो मूड मध्ये आला नव्हता पण जी मोठी जबाबदारी पडली, त्याने त्याच्यातल्या कलाकाराला चॅलेंज दिले होते. तो एका पाठोपाठ एक संवादाच्या फैरी झाडत होता.

शेवटी लावण्यवती अंबा, भीष्म तिचा स्विकार करत नाही म्हणून धिक्कार करते, आणि त्याचे त्याच्या आप्तेष्टांसमोर सैरावैरा धावताना मरण येईल असा शाप मागते आणि भीष्म तो देतो.

पडदा पडला, प्रेक्षक डोळे भरलेल्या अवस्थेत आत येऊन भेटत होते.

आज काहीतरी विलक्षण पाहिले असे प्रत्येक प्रेक्षकाला वाटले, आयत्या वेळी भूमिका स्वीकारून आणि एक अंक दुसऱ्या नटाने केला असताना, शेवटचा अंक या नटाने विलक्षण उंचीवर नेला, असे कदाचित नाटकाच्या इतिहासात प्रथमच घडले असेल.

नटराज नाट्यग्रुप चे सर्व कलाकार सुदर्शनला मिठी मारून रडत होते. आज शेवटी रंगभूमी जिकंली होती.

Show must go on म्हणजे काय ते आज नाट्यरासिकांना कळलं.

सुदर्शनचे नेहमीचे साथीदार पण नाटक पहात होते, आजची सुदर्शनची भीष्मची भूमिका पाहून ते पण भारावले होते. त्यांचे कंठ दाटून आले होते.

दुसऱ्या दिवशीच्या सर्व वर्तमानपत्रात कालच्या संगीत स्पर्धेत घडलेली घटना म्हणजे रंगभूमी वर पहिलीच, असा उल्लेख करून सुदर्शनने आपल्या स्पर्धक ग्रुप मध्ये नाटकाच्या शेवटच्या अंकात नाटक रद्द होऊ नये म्हणून भूमिका फारच उच्च अभिनीत केली, म्हणून कौतुक झाले.

नाटक मधेच सोडून हॉस्पिटल मध्ये भरती झालेल्या अनिलची एंजिओप्लास्टी झाली, हे सुदर्शनला समजले

आठ दिवसानंतर तो अनिलला भेटायला गेला, तेव्हा अनिल त्याचा हात पकडून सद्गदित स्वरात म्हणाला,

“दोस्ता, माझ्यासाठी जे केलंस ते अमूल्य आहे.”

त्याचा हात थोपटत सुदर्शन म्हणाला “दोस्ता, मी तुझ्यासाठी नाही केलं, केलं ते त्या रंगभूमीसाठी, ती आहे म्हणून आपण आहोत.”

“होय दोस्ता, रंगभूमी आहे म्हणूनच आपण आहोत “.

– समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रंगभूमी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ रंगभूमी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

( स्पर्धा नुकतीच सुरु झाल्याने प्रेक्षक सुद्धा कमी आले असतील. काही तरी कारण झाले, पण भीष्म मनासारखा उभा राहिला नाही, हे खरे.) इथून पुढे —-

ग्रुप आपल्या शहरात परत आला आणि आपापल्या कामात व्यस्त झाला.

पुन्हा नटराज नाट्य ग्रुपचा “मत्स्यगंधा “चा प्रयोग होणार होता, त्याला जायचे ठरले होते.

पुन्हा मंडळी जमा झाली आणि एक ट्रॅव्हलर घेऊन नटराज ग्रुपचा “मत्स्यगंधा” बघायला निघाली.

मनोज – अनिल देवव्रत कसा करतो बघू,पण सुदर्शन, तुझ्या जवळ पण जाणार नाही देवव्रत.

सुदर्शन – पण माझं पण त्या दिवशी काम बरं झालं नाही रे, मूडच आला नाही.

ज्योती – असं तुला उगाच वाटतं सुदर्शन, तू मस्त काम केलंस, भीष्मला केवढे मोठे आणि कठीण डायलॉग्ज लिहिलेत वसंतरावांनी. मास्तर दत्ताराम ही भूमिका करायचे म्हणे.

मनोज – हो, आणि मत्स्यगंधा आशालता. गाजवली तिने ही भूमिका आणि गाणी. गाणी काय सुरेख आहेत ना यातली.पंडीत अभिषेकींचे संगीत. खुप प्रयोग झाले या नाटकाचे.

ग्रुपची गाडी स्पर्धा चालू असलेल्या गावात पोचली, सर्व मंडळी एका हॉटेल मध्ये जाऊन फ्रेश झाली आणि नाटक सुरु होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजे साडेसहाला नाट्यगृहाजवळ पोचली.

सुदर्शन आणि बाकी ग्रुप मधील आत गेली, नटराज च्या ग्रुपला भेटायला. अनिल जो नाटकात देवव्रत म्हणजे भीष्म करणार होता, तो मेकअप करून तयार होता. त्याने सुदर्शन, ज्योती यांना पाहिले आणि जवळ येऊन सुदर्शनला मिठी मारली.

सुदर्शन-अन्या, जाडा झालास की रे,व्यायाम करत नाहीस काय?

अनिल – नाही रे, वेळच मिळत नाही, चालणं पण होत नाही.

ज्योती – अनिल, तुझी तब्येत बरी नाही की काय, धापा टाकतोस..

अनिल -हो ग, आज थकवा आलाय, प्रयोग झाला की उद्या डॉक्टरला तब्येत दाखवतो.

सुदर्शन -हो बाबा, रोज चालणं महत्वाचे आहेच आणि तपासून घे बऱ्या डॉक्टरकडून.

एव्हड्यात सत्यवतीची भूमिका करणारी तन्वी आणि बाकी कलाकार, लाईट करणारा उमेश जवळ आले. सर्वजण शेकहॅन्ड करत शुभेच्छा देत राहिले.

सर्वाना प्रयोगासाठी शुभेच्छा देऊन सुदर्शन आणि ग्रुपची लोकं बाहेर आली. तो पर्यत नाटकाची पहिली घंटा दिली होती.

दुसरी घंटा वाजली आणि सुदर्शन, ज्योती, मनोज, अरुणा आत जाऊन आपापल्या खुर्चीवर बसली. परीक्षक स्थानापन्न झाले, संगीत साथ करणारे, प्रकाश योजना करणारा आपआपल्या जागेवर बसले आणि तिसरी घंटा दिली गेली, मग पात्रपरिचय आणि नाटक सुरु झाले.

“संगीत नाट्यस्पर्धेतील आठवा दिवस “

आज आठव्या दिवशी नटराज नाट्यस्पर्धेचे नाटक “संगीत मत्स्यगंधा ‘ सुरु झाले. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी हेच नाटक दुसऱ्या नाट्य ग्रुप ने सादर केले होते. त्या दिवशी एवढी गर्दी नव्हती कारण स्पर्धा नुकतीच सुरु झाली होती, जसजशी स्पर्धा पुढे सरकत होती, तसतशी गर्दी वाढत होती. आणि आज शनिवार असल्यामुळे असेल, नाटकाला सातशे हुन जास्त प्रेक्षक हजर होते.

एवढे प्रेक्षक तिकीट घेऊन नाटकाला आले म्हणून नटराज ग्रुपची माणसे खूष होती.

नाटक सुरु झाले, सत्यवती झालेली तन्वी आणि भिवर यांचा प्रवेश सुरु झाला, मग पराशर आणि सत्यवती यांची सदाबहार गाणी, त्या गाण्यानी प्रेक्षक खूष झाले, वन्स मोअर मिळत गेले.

दुसऱ्या प्रवेशात राजा शंतनू आणि सत्यवती यांची भेट, शंतनू सत्यवतीच्या प्रेमात पडणं, तिच्यासाठी झुरणं, आणि मग प्रवेश झाला देवव्रताचा.

सुदर्शन आणि ग्रुप सरसाऊन बसला. देवव्रत स्टेज वर किती आत्मविश्वासाने बोलतो यावर नाटकाचा कस लागणार होता कारण वाचिक अभिनयाची, मोठया दर्जाची, तिथे गरज होती.

देवव्रताच्या भूमिकेत अनिलने प्रवेश केला, त्याचे पहिलेच वाक्य

“भिवरा, तूझ्या कन्येला नृपश्रेष्ठ शंतनू महाराजासाठी मागणी घालायला आलो आहे.”

खरे तर ते देवव्रतासाठी महत्वाचे वाक्य. पण अनिल ने मुळमुळीत म्हटले. संवाद सुरु होते, सत्यवती आणि देवव्रत यांची संवादाची आतिषबाजी व्हायला हवी होती पण अनिलची तब्येत बरी नसावी कदाचित, तो फिक्का पडत होता आणि तन्वी प्रभावी होत होती.

प्रेक्षकात बसलेली अरुणा सुदर्शनाच्या कानात म्हणाली “आज अन्या मूड मध्ये नाही, कमी पडतोय. तुझा देवव्रत किती तरी श्रेष्ठ होता.”

दुसरा अंक संपला आणि पडदा पडला. इकडे देवव्रत झालेला अनिल आत गेला तो घामाघूम झाला. त्याच्या पाठीतून कळा यायला लागल्या. डावा हात दुखू लागला. छाती जड झाली.

छाती धरून अनिल टेबलावर झोपला आणि कण्हू लागला. त्याच्याकडे सर्व मंडळी धावली. अजितच्या लक्षात आले, बहुतेक हार्ट अटॅक येतो आहें.

अजित धावत स्टेज वर गेला आणि प्रेक्षकात कोणी डॉक्टर असल्यास ताबडतोब आत येण्याची विनंती केली.

डॉ. विभुते त्यांच्या बायकोसह संगीत नाटक म्हणून आले होते. त्यांनी ही घोषणा ऐकली आणि ते त्वरित आत आले. त्यानी टेबलावर विव्हळणाऱ्या अनिलला पाहिले, त्याची नाडी पाहिली आणि त्यांच्या लक्षात आले, हार्ट अटॅक आला आहें, याला हॉस्पिटलमध्ये हलवण्याची गरज आहें.

डॉक्टरनी त्यांच्या पॉकेट मधील सोरबिट्रेटची गोळी अनिलच्या जिभेखाली ठेवली आणि धावत आपली गाडी आणायला गेले. तोपर्यत बाकी नाटक मंडळी त्याला वारा घालत होती. घाम पुसत होती. छातीवर बुक्के मारून प्रथमोपचार करत होती.

सुदर्शनने बाहेर स्टेजवरील डॉक्टरांचे बोलणे ऐकले आणि तो पण आत आला. अनिलची परिस्थिती त्याने पाहिली, त्याला आठवले, नाटक सुरु व्हायच्या आधी आपल्या आणि ज्योतीच्या लक्षात आले होते, आज अन्याची तब्येत बरी दिसत नाही, त्याला श्वास लागत होता, म्हणून.

डॉ.विभुते यांनी सोर्बीट्रेट ची गोळी जिभेखाली ठेवली असेल म्हणून कदाचित, अनिलच्या छातीत दुखणे थोडे कमी झाले, घाम थांबला.

डॉक्टरांनी दोघांच्या मदतीने अन्याला गाडीत घेतले आणि ते अजितला म्हणाले “आता काळजी करू नका, मी डॉ. भागवत हॉस्पिटल मध्ये त्याला ऍडमिट करतोय. हॉस्पिटलमध्ये मी फोन करून सांगितलंय, मी सोबत आहे. तुम्ही नाटक सुरु ठेवा, ही तुमची दोन माणसे गाडीत आहेत, ती त्याच्या सोबत राहतील .”

– क्रमशः भाग दुसरा 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रंगभूमी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ रंगभूमी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

साईनाथ नाट्य मंडळीची वार्षिक बैठक. ऑगस्ट महिन्यातील संध्याकाळ. बाहेर रिमझिम पाऊस सुरु होता. मंडळाच्या नाट्य ग्रुपचा दिग्दर्शक सुदर्शन हजर होता. शिवाय मनोज, अरुणा, ज्योती, उदय, वासंती बाई, सदानंद हजर होते. संस्था संगीत नाटकं करण्यात प्रसिद्ध होती. दरवर्षी शासनाच्या संगीत नाट्य स्पर्धेत भाग घेऊन मग त्याचे प्रयोग अनेक ठिकाणी होत. या आधी संस्थेने अनेक नाटके केली, बक्षीसे मिळविली.

यंदा कुठले संगीत नाटक करावे, यासाठी बैठक होती. सुदर्शनने मागच्या काही वर्षातील संस्थेने केलेल्या नाटकंचा आढावा घेतला, दरवर्षी आपली संस्था प्राथमिक स्पर्धेत पहिला किंवा दुसरा नंबर मिळविते, पण अंतिम स्पर्धेत आपण पहिला नंबर मिळवत नाही, ही सल सुदर्शनने मांडली.

या बाबत काही मेंबर्स नी आपली मते मांडली.

अरुणा – संगीत नाट्य स्पर्धा असल्याने आपण ज्यात संगीताला भरपूर वाव आहें, असे नाटक निवडावे. सुदैवाने या वर्षी ज्योती तिचं शिक्षण संपवून पुन्हा ग्रुपमध्ये आली आहे.

मनोज – आपले संगीत साथीदार बदलावे लागतील. कारण आपण स्पर्धेच्या वेळी पहातो, इतर ग्रुप्स दर्जेदार साथीदार घेऊन येतात.

अरुणा – हे खरे आहे, परीक्षक संगीत साथीकडं बारकाईने लक्ष ठेऊन असतात.

सुदर्शन – मग नाटक कुठलं निवडावं? ज्याला उत्तम लेखन आणि संगीत आहे? आणि आपण ते इतक्यात केलेलं नसावं?

मनोज – यंदा ज्योती सारखी देखणी आणि उत्तम गळा असलेली स्त्री कलावंत आहे, सुदर्शन सारखा दर्जेदार वाचिक कलावंत पण आहेच आणि मनोज पण उत्तम गातो, म्हणून आपण “संगीत मत्स्यगंधा” करावं, अस मला वाटतं.

सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. सुदर्शनला पटले. अरुणा, ज्योती यांनी पण मान हलवली. मनोजने पण हो म्हटलं.

यंदा स्पर्धेसाठी “संगीत मत्स्यगंधा” करायचे ठरले. सुदर्शन आणि अरुणा संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरींना भेटले. त्यांनी पण मान्यता दिली. नाटकासाठी खर्चाची तजवीज केली.

नाटकाचे दिग्दर्शन दरवर्षी प्रमाणे सुदर्शन करणार होता.

“मत्स्यगंधा ‘” नाटक करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या. सत्यवती च्या भूमिकेसाठी उत्तम गाणारी आणि देखणी कलाकार हवी होती, त्यामुळे ज्योती सत्यवती करणार हे निश्चित झाले. पराशर साठी पण चांगला गाणारा माणूस हवा होता, मनोज हा अनेक वर्षे काम केलेला आणि खडया आवाजाचा ग्रुप मेंबर होता, त्याला पराशर भूमिका मिळाली, देवव्रत च्या भूमिकेला मोठी मोठी वाक्ये होती, ती पेलणारा कलवंत हवा होता. सुदर्शन तसा होता. त्याचे पाठांतर उत्तम होते आणि शब्दफेक सुरेख होती. त्यालाच ही भूमिका मिळाली, अरुणला चंडोल ची भूमिका. याखेरीज इतर भूमिका इतर ग्रुप मेंबर्स मध्ये वाटल्या गेल्या आणि सुदर्शनने मुहूर्त करून तालमी सुरु केल्या.

स्पर्धेचा फॉर्म भरला. रोज सायंकाळी कलाकार जमू लागले, प्रथम गद्य तालीम सुरु झाली, वाक्ये तोंडात बसली, मग उभ्याने हालचाली दिग्दर्शकाने बांधल्या, मग संगीत साथ करणारे यायला लागले, गाण्याच्या तालमी सुरु झाल्या. हळूहळू प्रकाश योजना करणरा येऊ लागला. दृष्य परिणाम वाढविण्यासाठी त्याचा उपयोग सुरु झाला. नाटक हळूहळू बसू लागले. पाठांतरे झाली. गाणी व्यवस्थित बसली.

स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले. या ग्रुपचे नाटक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी होते आणि आश्चर्य म्हणजे या ग्रुपचा प्रमुख प्रतिस्पर्धी नटराज ग्रुप, जो दुसऱ्या शहरातील होता, त्यांनी पण यंदा “मत्स्यगंधा ” हेच नाटक स्पर्धेत उतरविले होते.

ही बातमी कळली मात्र ,सुदर्शन खवळला. तालमीच्या वेळी ग्रुप मंडळी भेटली, तेव्हा सर्वांचीच हीच चर्चा.

सुदर्शन – मला वाटते, नटराज ची मंडळी दरवर्षी असेच करतात, आपण हे नाटक बसवतोय, हे अनिलला कळले असेल, म्हणून मुद्दाम तो हे नाटक करतोय.

अरुणा – अरे गेली दोन वर्षे प्राथमिक ला आपण पहिले दुसरे असतो ना, म्हणून ते आपल्याला त्रास देतात, आणि ती तन्वी काही कमी नाही. तीच करत असणार सत्यवती. दुष्ट मेली..

ज्योती – अरे ते करेनात, आपण उत्तम प्रयोग करायचा, आपला प्रयोग तिसऱ्या दिवशी आहे ना, तो करू आणि अन्याचा केव्हा आहें, आठव्या दिवशी आहें ना, तो पहायला सर्वजण जाऊ.

ज्योतीच्या या बोलण्याने सर्व गप्प झाले. पण सुदर्शनला अन्याचा राग आला होता,”साला आपल्याशी स्पर्धा करतो, तरी बरं हा स्टेज वर फापलतो,देवव्रताची भूमिका म्हणजे काय खाऊ वाटला काय याला? मोठी मोठी वाक्ये आहेत, आणि हा अन्या जाडा किती झालाय, दारू मारत असणार आणि बिड्यापण ओढत असतो.

सुदर्शनने तीन रंगीत तालमी आयोजित केल्या. भूमिकेचे कपडे, मेकअप करून, नेपथ्य रचून आणि प्रकाश योजना व संगीत साथीसह तीन प्रयोग. त्याच्या ओळखीच्या आणि नाट्यशास्त्र जाणणाऱ्या लोकांना बोलावून त्यांची मते घेतली. चर्चा केल्या. काही सुधारणा केल्या.

तीन रंगीत तालमी झाल्यामुळे कलाकारांना विश्वास मिळाला. ज्योती आता उठताना,झोपताना, जेवताना, बोलताना सत्यवतीची भूमिका जगू लागली. सुदर्शन देवव्रताचे संवाद मोठया मोठ्याने आरशात पाहून म्हणू लागला. मनोज, अरुण यांच्या पण अंगात भूमिका शिरली होती.

स्पर्धा सुरु झाली आणि तिसऱ्या दिवशी ग्रुप बसने स्पर्धेच्या गावात पोहोचला. दुपार पासून स्टेज मांडणी, लाईट जोडणे, पेटी तबल्याचे सूर मिळविणे, मग मेकअप, कपडे.

परीक्षक आले, आत सर्वाना भेटून गेले. या वर्षीचे परीक्षक नाट्यकला जाणणारे, संगीत उत्तम समजणारे होते, त्यामुळे सुदर्शन खूष होता.

मित्रमंडळी ,अनेक ओळखीचे आत येऊन शुभेच्छा देत होते, नाटक वेळेत सुरु झाले. पहिला अंक संपला. पुन्हा बाहेरून मित्र परिवार आत आला, ज्योतीचे, मनोजचे कौतुक करून गेला.

दुसरा अंक संपता संपता देवव्रत स्टेज वर आला आणि नाटकाने स्पीड पकडला. मग तिसरा अंक देवव्रत आणि सत्यवती, अंबा यांचा.

नाटक संपलं, लोकांनी खूप कौतुक केलं.

परीक्षक सुद्धा आत येऊन भेटून गेले. दुसऱ्या दिवशीच्या सर्व पेपर मध्ये कौतुक केलं गेलं. विशेष करून ज्योती जिने सत्यवती साकारली होती, जिला खुप गाणी आणि संवाद होते. स्पर्धेतील प्रयोग उत्तम झाला पण सुदर्शन आपल्या अभिनयावर खूष नव्हता. आपण या पेक्षा कितीतरी चांगली भीष्माची भूमिका करायला हवी होती, असं त्याला वाटत होतं. भूमिका अत्यंत ताकदीने कानेटकरांनी लिहिली होती, पण आपल्याला सूर लागला नाही हे खरे.

कदाचित दिग्दर्शक असल्याने एका माणसावर खुप लोड पडतो, प्रत्येक गोष्टीत त्याला लक्ष घालावे लागते. त्यामुळे स्वतः च्या भूमिकेकडे म्हणावे तसे लक्ष देता येत नाही, हेही कारण असेल किंवा स्पर्धा नुकतीच सुरु झाल्याने प्रेक्षक सुद्धा कमी आले असतील. काही तरी कारण झाले, पण भीष्म मनासारखा उभा राहिला नाही, हे खरे.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈