मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकुलती -भाग पहिला ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ एकुलती -भाग पहिला ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

केतकीचं काय बिनसलं होतं, कोणास ठाऊक. सारखी भांडत असायची, भांडतच असायची कार्तिकबरोबर. पार डिव्होर्सपर्यंत पोहोचली होती मजल.

आताही रात्री घरी पोहोचायला उशीर झाला, तेव्हा कार्तिक खूप दमला होता. जेवण्याचंही त्राण नव्हतं त्याच्यात. पण मग “तू बाहेरून खाऊन आला आहेस.घरात बनवलेलं वाया जातं…..”वगैरे म्हणत केतकी भांडायला सुरुवात करणार, म्हणून तो जेवायला बसला.

“तू जेवलीस?” तोंडातून शब्द निघाल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपण घोडचूक केलीय.

“मी तुझ्यासाठी थांबायचं सोडून दिलंय हल्ली. तू काय? मनात आलं, तर बाहेरूनच खाऊन येणार. बायको थांबली असेल जेवायची……”

केतकीची बडबड चालूच होती.

शेवटी असह्य झालं, तेव्हा कार्तिकचंही तोंड उघडलं, ” पुरे आता. गप्प बस. दमून घरी यावं, तर…… “

“मग यायचं ना वेळेवर. उशिरापर्यंत बाहेर वेळ काढत बसलं की…..”

” बाहेर वेळ कसला काढणार? ऑफिसमध्ये चिक्कार काम असतं. त्यामुळे थांबण्याशिवाय गत्यंतरच नसतं. “

“मी घरबशी गृहिणी असल्यासारखं बोलू नकोस हं. सांगून ठेवते. मीही नोकरी करते…..”

“माहीत आहे तुझी नोकरी.”

“नीट बोल हं माझ्याशी. असलं ऐकायची सवय नाहीय मला.”

” हो, हो. कशी असणार? लाडावलेली मुलगी तू. एकुलती एक म्हणून डोक्यावर बसवून ठेवलंय आईवडिलांनी. “

“मला अगदी कंटाळा आलाय, तुझी कुजकट बोलणी ऐकायचा. केव्हा एकदा त्या डिव्होर्सच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लिट होतायत, असं झालंय.”

“पण तू तुझ्या आईबाबांना सांगितलंस का हे?”

“तू मला विचारत असतोस सारखा, ते तू तुझ्या घरच्यांना सांगितलंस का?”

“माझ्या घरच्यांना काय, नंतर सांगितलं तरी चालेल. इन फॅक्ट, एवढ्यात मी सांगणारच नाहीय त्यांना. तुझी गोष्ट वेगळी आहे. तुला माहेरी जाऊन राहायचं आहे. आणि तिथे राहायला जाण्यापूर्वी सगळ्या गोष्टी तुझ्या आईबाबांच्या कानावर घालणं आवश्यक आहे. पण तू तर टाळाटाळ करतेयस.”

“टाळाटाळ कशाला करणार?”

“मग का नाही सांगितलंस अजून? वरचेवर तर जात असतेस तिकडे.”

“या गोष्टी रागरंग बघून सांगायच्या असतात. कधी कोणी आलेलं असतं तिकडे, कधी बाबांची तब्येत बरी नसते, तर कधी आई नरमगरम असते.”

” हे तर चालूच राहणार ना. मला तर वाटतं, तुला रिकन्सिडर करायचं आहे. दॅट्स व्हाय यू आर बायिंग टाइम. “

“रिकन्सिडर माय फूट! उलट जेवढ्या लवकर तुझ्या कचाट्यातून सुटता येईल, तेवढं बरं. एक एक दिवस मोजतेय मी.”

“तेव्हा लग्नाच्या वेळीही मोजत होतीस एक एक दिवस.”

“माझ्यापेक्षा तुलाच जास्त घाई झाली होती तेव्हा.”

“मी मूर्ख होतो त्यावेळी.”

“होतो कशाला? अजूनही आहेस. अशा मूर्ख माणसाबरोबर आयुष्य नाही काढायचं मला. मध्ये ऍबॉर्शन झालं, तेव्हा खचून गेले होते मी. पण आता वाटतं, देव करतो, ते बऱ्यासाठी. उगीच त्या जिवाचीही परवड झाली असती.”

“…………..”

“उचकट ना आता तोंड. आता का गप्प बसलास?”

“मी क्रूर नाहीय तुझ्यासारखा, असल्या गोष्टीचा आनंद व्हायला.”

रोजच्यासारखं हे भांडण रात्री 2-2.30पर्यंत चाललं असतं. आणि मग कंटाळून कार्तिक गेस्टरूममध्ये झोपायला गेला असता. रोजच्यासारखाच.

पण आज अचानक केतकीच्या फोनची रिंग वाजली.

क्रमश:….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ साप…. भाग ४ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ साप…. भाग ४ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहीलं आई त्याला हलवून हलवून जागी करत होती. `बाहेर अजून थोडा अंधारच होता. तो उठला आणि तोंड धुवून खुळखुळून चुळा भरून खाटेवर बसला आणि रात्रीच स्वप्न आठवू लागला. आता पुढे -)

`अरे, याला सोडायला जंगलात जाणार आहेस ना!’ आईनं जशी आठवण करून दिली.

`जातो ना आई! इथून दोन फर्लांगावर तर जंगल आहे.’

`ते आहे रे! पण बिचारा रात्रभर मडक्यात बंद आहे. जितकी लवकर त्याला मुक्ती मिळेल, तेवढं बरं!

`ठीक आहे. पण काय ग आई, सकाळची स्वप्न खरी ठरतात नं?’

`हं! मीसुद्धा ऐकलं आहे तसं! पण बेटा, मी काही आजपर्यंत कुठलं असं स्वप्न पाहिलं नाही, की जे खरं झालं. झोपडीत रहाणार्‍यांची स्वप्नसुद्धा झोपडीछापच असतात नं?’

`मी सकाळी सकाळी एक स्वप्न पाहीलं आई, पण ते झोपडीछाप नव्हतं!’

`मग काय महालाचं स्वप्न बघितलंस तू?’

`आता मी परत आलो, की तुला सगळं स्वप्नच सांगेन.’

केर काढता काढता, रेवती आई आणि रमलूचा संवाद ऐकत एका कोपर्‍यात उभी होती. रमलूच्या तोंडून स्वप्नाबद्दल ऐकल्यावर तिचं तोंड हवेच्या झुळुकीमुळे फटकन उघडणार्‍या या दरवाजासारखं उघडंच राहीलं.

रमलूने मडकं उचललं आणि तो बाहेर पडला. थोड्याच वेळात तो रस्त्यावर आला. पहाट फटफटायची होती. रस्ता रिकामा आणि निरव, शांत होता. हा रस्ता म्हणजे शहराच्या बाहेर पडणारा बाय-पास आहे. चालत चालत तो रस्त्यावर लावलेल्या दिशा-दर्शकाच्या फलकापाशी पोचला. आणि मटका खाली ठेवून मध्यम प्रकाशात फलक वाचू लागला. फलकावर एका बाजूला लिहिलं होतं, `गुलमोहर कॉलनी मार्ग’ आणिदुसर्‍या बाजूला लिहिलं होतं, `रिझर्व फॉरेस्ट मार्ग.’ त्याने समोर पाहिलं. गुलमोहर कॉलनीचे शानदार बंगले अर्धवट अंधारातही स्पष्ट दिसत होते. क्षणार्धात रात्री पाहिलेलं स्वप्न त्याच्या डोळ्यापुढे तरंगू लागलं. त्याने मडकं उचललं आणि गुलमोहर कॉलनीच्या दिशेने चालता चालता विचार करू लागला, `आज माझ्याजवळ दहा-वीस साप असते तर…’

समाप्त

मूळ हिंदी  कथा – साप  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संघर्ष – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ संघर्ष – भाग-2 ☆ संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे 2

(नानाजींशी त्याचे न पटण्याचे कारणही तसेच होते. ) इथून पुढे —–

नानाजी स्वातंत्र्यसंग्राम सैनिक होते. एका आंदोलनात इंग्रजांनी त्यांना घोड्याने तुडविले होते. त्याच्या खुणा त्यांच्या पाठीवर होत्या. शंकरला वाटायचे नानाजींनी स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारी पेन्शन मिळवावी.  पण नानाजींचा त्याला विरोध होता— “ मी स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले ते माझे कर्तव्य होते.  त्याचे पैसे मी का म्हणून घ्यावे ? जर पैसे घेतले तर हा व्यवहार झाला. माझ्या कार्याचा मला अभिमान आहे. माझ्या पाठीवरील व्रण हेच माझे सर्टिफिकेट आहे, नि त्याचा आनंद मला मिळतो. मी कधीही माझ्या देशप्रेमाची किंमत घेणार नाही. “  हे त्यांचे ठाम मत होते. नेमके तेच शंकरला आवडत नव्हते. जर सरकार देण्यास तयार आहे तर का घेऊ नये, हे त्याचे मत होते. पण नानाजी आपल्या मतावर ठाम असायचे. दुकानात अनेकदा आमच्या वडलांसमोर हा शाब्दिक संघर्ष व्हायचा.  दोघेही आपली बाजू वडलांसमोर मांडायचे.  वडील शंकरला समजवायचे की,

‘त्यांच्या संमतीशिवाय काही होणार नाही. तेव्हा नानाजींना जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत शंकरने त्यांना त्याबद्दल आग्रह करू नये. ‘ शंकरला वाटायचे गुरुजींचे नानाजी ऐकतात.  तेव्हा गुरुजींनी त्यांना पेन्शनसाठी तयार करावे. पण आमचे वडील पक्के आदर्शवादी.  ते नानाजींना कधीच पेन्शनसाठी समजवायचे नाहीत. परिणाम असा झाला की शंकर नानाजीसोबत आमच्या वडलांचाही  विरोध करू लागला. आम्हाला मात्र शंकरचे पटायचे. पैशाची गरज काय असते ते आम्ही अनुभवले होते.  केवळ वडलांच्या तुटपुंज्या पगारावर आमचा मोठा परिवार चालवितांना आईची महिन्याच्या शेवटी होणारी ओढाताण आम्ही अनुभवत होतो. घरी शिकवणीला येणाऱ्या पोरांकडून फी घ्यावी असा तिचा आग्रह असायचा.  पण विद्यादानाचे पैसे घ्यायचे नाही हा आमच्या वडलांचा आदर्श. अनेकदा यावरून घरी झालेला संघर्ष आम्ही अनुभवला होता. त्यामुळे शंकर- नानाजींच्या संघर्षात आम्ही मनाने शंकरच्या बाजूला असायचो. तसे आमच्या विचारांना काहीच महत्व नव्हते, पण वाटायचे नानाजीनी पेंशन घ्यावी आणि घरचे,दुकानातील वातावरण आनंदी ठेवावे. पुढे पुढे नानाजीच्या दुकानातील वातावरण खूप तणावग्रस्त होत गेले. नानाजी आणि शंकर यांच्यात अबोला सुरू झाला. पुढे पुढे या तणावामुळे आमच्या वडलांचे नानाजींच्या  दुकानात जाणे कमी झाले. अचानक एक दिवस सकाळी शंकर आमच्या घरी येऊन धडकला.  त्याच्या हाती एक पोस्टाने आलेला लिफाफा होता, तो त्याने बाबांच्या हाती दिला. बाबांनी त्यातील पत्र काढून वाचायला सुरुवात केली.  कागदावरील अशोकस्तंभ खूण पाहून ते पत्र शासनाकडून आलेले आहे हे आम्हाला समजले. ते वर्ष महात्मा गांधीचे जन्मशताब्दीवर्ष होते, आणि शासनाने त्या निमित्ताने पेन्शन न घेणाऱ्या आदर्शवादी स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांच्या सत्काराचे आयोजन केले होते.  त्या यादीत नानाजींचे नाव होते, त्याचेच पत्र नानाजींना आले होते. पण नानाजी सत्काराला नाही म्हणत होते, त्यामुळे त्यांना समजवावे म्हणून शंकर आला होता. बाबांनी चौकशी केली, नकाराचे कारण विचारले–शंकर म्हणाला ‘ सत्कारासोबत अकरा हजार मिळणार आहेत  म्हणून ते नाही म्हणतात.’ आता मात्र बाबा गंभीर झाले.  विचार करून शंकरला म्हणाले,” तू जा. स्वीकारतील ते सत्कार “. दुपारी बाबा एकटेच नानाजीना भेटले. काय चर्चा झाली माहीत नाही, नानाजी तयार झाले. ठरलेल्या दिवशी बाबा, नानाजी, त्यांची पत्नी, व शंकर नागपूरला गेले.  तिथे नानाजींचा सपत्निक  सत्कार झाला.  ताम्रपत्र, खादीचे धोतर, बंगाली शाल, श्रीफळ व अकरा हजाराचा चेक नानाजीना,  व त्यांच्या पत्नीला नऊवारी पातळ- खण देऊन मंत्रीमहोदयाहस्ते सन्मानित केलं गेलं. सोबतच कार्यक्रमाच्या संचालकाने घोषणा केली. नानाजींनी मिळालेले अकरा हजार रुपये अनाथाश्रमाला देणगी म्हणून देऊन टाकले होते. केवळ ताम्रपत्र, चंदनाचा  हार,व खादीचे कपडे, शाल स्वीकारली. शंकरचा चेहरा उतरला.  पण वडलांनी त्याला समजावले, आश्वस्त केले –’ तुझा फायदा होईल.’- सारे चंद्रपूरला परत आले. आता मात्र शंकरचे बाबांकडे येणे वाढले. नानाजींना  मिळालेल्या ताम्रपत्रामुळे शंकरच्या मुलांना शिष्यवृत्ती सुरू झाली. दोन्ही पोरांना स्वातंत्र्यसैनिक कोट्यातून नोकऱ्या मिळाल्या.  शंकर जाम खुश झाला.आता मात्र नानाजी- शंकर अबोला संपला. पुन्हा बाबांचा दुकानातील वावर वाढला.  संघर्ष संपून आनंदोत्सव नांदू लागला.  पुन्हा बाबा- नानाजीचे कविता वाचन रंगू लागले. काही वर्षानंतर कळले की सत्कार होण्यासाठी नानाजींचे नाव आमदारांना सांगून बाबांनीच  शासनाला कळविले होते. आज नानाजीचे दुकान काळाचे ओघात नष्ट झाले.  तिथे नवीन दुकानांची इमारत उभी आहे.  पण आजही त्या रस्त्याने गेलो की नानाजीचे ते दुकान, तो संघर्ष डोळ्यासमोर  चलचित्रपटासारखा सरकत जातो.

समाप्त

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ साप…. भाग ३ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ साप…. भाग ३ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

( मागील भगत आपण पहिलं – `तो काळ वेगळा होता रमलू. त्यावेळी शाळेत प्रवेश मिळण्यासाठी पैसे द्यावे लागत नव्हते. आता काळ बदललाय. प्रत्येक गोष्टीसाठी पैसे द्यावे लागतात. ठेव. तुझ्या कामी येतील.’ आता इथून पुढे )

`नाही शेठजी! या कामाचं मी काही इनाम घेणार नाही. याएवजी मला पाच हजार रुपये अ‍ॅडव्हान्स द्या. मी दहा महिन्यात आपले पैसे परत करीन.’

अ‍ॅडव्हान्सच हवा असेल, तर उद्या तुला पैसे मिळतील. मी मुनीमांना आत्ताच सांगतो. … पण हे तुझ्या बहादुरीचं इनाम आहे. मला माहीत आहे, हे काम या पूर्वी तू कधीच केलं नाहीस. तुझ्या वडलांच्या निधनानंतर साप पकडणार्‍या  लोकांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलीय. या भागात हे काम करणारा आता कुणी राहिलाच नाही. हा आपला भाग म्हणजे जंगलचा हिस्साचआहे. इथे साप निघणरच. खरं तर आपण लोकच त्यांच्या क्षेत्रात येऊन वसलो आहोत. … आज मला या गोष्टीचा आनंद होतोय, की वेळा-काळासाठी एक पठ्ठा तयार झाला. ‘ शेठजींनी रमलूची पाठ थोपटत म्हंटलं.

`पण शेठजी या कामासाठी काही मेहेनताना घेतला जात नाही.’

`अरे बेटा, हा मेहेनताना नाही. लक्ष्मी आहे लक्ष्मी. ती स्वत: चालून तुझ्याकडे येतीय. तिचा अव्हेर करू नकोस. हीच गोष्ट तुम्हाला समजत नाही. लक्ष्मी याचकारणासाठी तुमच्यावर रुसून बसलेली असते. घे हे ठेवून दे.’ असं म्हणत शेठजींनी पाचशेच्या दोन नोटा रमलूच्या शर्टच्या खिशात घातल्या.

यावेळी रमलू काही बोलला नाही. तो माठ घेऊन मुकादमाच्या मागे मोटरसायकलवर बसला.

झोपडीत पोचताच रमलूच्या आईने रमलूकडून साप-पकड-अभियानाची सगळी हकिकत ऐकली. ते सगळं ऐकून ती एकीकडे भयभीत झाली, तर दुसरीकडे रोमांचितही. रमलूच्या पत्नीच्या रेवतीच्या डोळ्यातून मात्र अखंड अश्रूधारा वाहत होत्या. तिने शेंदुराची डबी आणून रमलूच्या हातात दिली. रमलूचे वडील होते, तेव्हा हे सर्व रमलूची आई करायची.

`तुम्ही हे काम करावं, असं मला वाटतनाही. ‘ डबी परत घेत ती हळूच म्हणाली.

`का?’

`का म्हणजे काय? जिवाशी खेळ आहे, हे काम म्हणजे. साप कधी तरी उलटतोसुद्धा! थोडीशी नजर चूक झाली…’

`वेडी आहेस का तू? बाबा म्हणत,`आपल्या लोकांना नागदेवतेपासून अभय मिळालय. जोपर्यंत आपण त्यांना मारत नाही, तोपर्यंत तो आपल्याला दंश करणार नाही.’ कळलं? आणि हे काम करणारा दुसरा कोण आहे या इलाख्यात?’

`मग आम्ही लोकांनी ठेका घेतला आहे का?’

`……’

`आता बाकीचं बोलणं राहू दे. याला जंगलात सोडून ये. घरात दोन-दोन लहान मुलं आहेत. हे संकट घरात फार वेळ ठेवणं बरं नव्हे.’

`पण आता अंधार पडलाय. बाबा म्हणायचे, सापाला अंधार झाल्यावर सोडता कामा नये. माठ आणि वरचं कापड दोन्हीही मजबूत आहे. मी उद्या पहाट होता-होताच त्याला सोडून येईन.’

रमलू अतिशय थकला होता. त्याने झोपडीसमोरचा हात पंप चालवून थंड पाण्याने आंघोळ केली आणि जेवण करून झोपून गेला. अर्ध्या रात्रीनंतर लघवीकरायला उठला. पण नंतर खाटेवर झोपायला जाण्यापूर्वी कोपर्‍यात ठेवलेल्या मडक्याकडे जाऊन पाहिले. त्यावर कापड अगदी जसंच्या तसं बांधलेलं होतं. मडक्याला स्पर्श करून मनातल्या मनात म्हंटलं, `बस, नागदेवता, आणखी दोन तास धीर धरा.’ तो खाटेवर जाऊन पुन्हा झोपला. तो झोपला खरा, पण आता त्याला पहिल्यासारखी गाढ झोप लागली नाही. खूपवेळपर्यंत तो कुशा बदलत राहिला. मग त्याला झोप लागली. झोपेत स्वप्न पडलं.

 स्वप्नात त्याला दिसलं, मुनीमजींच्या घरी साप निघालाय. रमलूला तिथेही साप पकडायला बोलावलं गेलय. मुनीमजींनीदेखील पाचशेच्या दोन नोटा रमलूच्या शर्टच्या खिशात घातल्याहेत. आता त्याने फार काही जोरात नको म्हंटलं नाही. मग शेजारच्या गुलमोहर कॉलनीत एकामागून एक साप निघू लागले. त्या कॉलनीत सगळे बंगले करोडपतींचेच. प्रत्येक ठिकाणी साप पकडायला त्यालाच बोलावलं जाऊ लागलं आणि प्रत्येक जण त्याला इनाम देऊ लागला. कुठे हजार. कुठे पाच हजार. मग तर त्याला शेजा-पाजारच्या गावातूनही बोलावणं येऊ लागलं. त्याने एक झकासपैकी जीप खरेदी केली. शेठजींच्या जीपपेक्षाही शानदार आणि तो जीप घेऊन साप पकडायला जाऊ लागला. दिवसेंदिवस त्याची ख्याती वाढू लागली. त्याने आपला कारभार संभाळण्यासाठी काही सहाय्यकही ठेवले. पुढे पुढे असं होऊ लागलं, की एखादा विशेष साप असेल, तरच तो धरायला जायचा. एरवी त्याने प्रशिक्षित केलेले सहाय्यकच सगळा कारभार संभाळायचे. त्याने बघितलं, त्याचा एक मोठा वाडा झालाय. त्यात त्याची आई शेठाणीसारखी बसलीय. रेवती नोकरा-चाकरांना हुकूम सोडतेय. त्याची दोनही मुले शिकण्यासाठी मोठ्या शहरात गेतील. त्यांना भेटण्यासाठी तो अधून मधून विमानातून जातो. आभाळात उडणारं विमान थोडं उलटं-पालटं होऊ लागलं, तेव्हा त्याची झोप उडाली. त्याची आई त्याला हलवून हलवून जागी करत होती. `बाहेर अजून थोडा अंधारच होता. तो उठला आणि तोंड धुवून खुळखुळून चुळा भरून खाटेवर बसला आणि रात्रीच स्वप्न आठवू लागला.                       

क्रमश:….

मूळ हिंदी  कथा – साप  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संघर्ष – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ संघर्ष – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

वडिलांसोबत सायंकाळी आम्ही  जेव्हा बाजारात जात असू तेव्हा नानाजी टेलर यांचे दुकान हा थांबा निश्चित ठरलेला असायचा.

नानाजी टेलर अतिशय  जिव्हाळ्याने व आदराने आमच्या वडिलांचे स्वागत करायचा, विचाराने दोघेही आदर्शवादी असल्याने दोघांचेही खूप जमायचे. बाबा शिक्षक असल्यामुळे वर्तमानपत्र वाचन हा त्यांचा दिनक्रम असायचा. वाचलेल्या बातम्या ते नानाजींना सांगायचे नी मग त्यावर चर्चा रंगायची. आम्हाला या चर्चेतील काही समजायचं नाही, पण नानाजीच्या दुकानात जाणे आम्हाला आवडायचे. नानाजी टेलरचे दुकान म्हणजे काही ऐसपैस नी सुशोभित शो रूम नव्हती. दहा बाय बाराची एक खोली.  तिला उत्तर दक्षिण असे दोन्हीकडे रस्ते. त्यामुळे दोन्हीकडे दरवाजे. त्यात दोन शिलाई मशीन, एक कापड कटाईचा लाकडी पाट, कपडे ठेवण्याची एक लाकडी अलमारी आणि बसण्यासाठी ऐक बेंच, असा या दुकानाचा पसारा होता. पण त्यात नानाजी खूश असायचे. आम्हालाही या दुकानात बदल व्हावा असे वाटत नसे. तसे या दुकानात बसणे आम्हाला आवडण्याची इतरही अनेक कारणे होती.  त्यातील प्रमुख कारण म्हणजे नानाजींच्या दुकानाला लागून प्रसिद्ध कोहपरे यांचे हॉटेल होते. त्यांचा भटारखाना दुकानातून दिसायचा. त्यांचे कारागीर पदार्थ बनवायचे ते पाहणे आनंददायी वाटायचे. पदार्थांचा सुवास दुकानापर्यंत जाणवायचा.

वडिलांच्या कडक शिस्तीमुळे हॉटेलात जाणे आमच्यासाठी निषिद्ध गोष्ट होती. त्यामुळेही कदाचित बनणारे पदार्थ आनंद देऊन जायचे. एक किरकोळ शरीरयष्टीचा नोकर सतत खलबत्यात काहीतरी कुटत असायचा. बहुदा हॉटेलला लागणारे मसाले, अद्रक लसूण जिरे तो कुटत असावा. पण याव्यतिरिक्त काही इतर कामे करतांना मी त्याला पाहिले नाही. नानाजींच्या दुकानासमोर खाजांची सावकाराची पेढी होती. अनेक गरजू कर्जदार लोक तिथे बसून असायचे. त्यांचे चिंताग्रस्त चेहरे आम्हाला तेव्हाही जाणवायचे. त्यांची अगतिकता ,लुबाडणूक होते याची जाणीव आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर दिसायची. त्यामुळे कदाचित मला सावकार सिनेमातील कन्हय्यालाल किंवा जीवन या अभिनेत्यासारखा वाटायचा. समोर एक सोनाराचे दुकान होते. त्याच्या दुकानासमोर असलेल्या नालीतील माती साफ करून त्यातून सोने मिळविण्याचा प्रयास करणाऱ्या विशिष्ट जमातीच्या महिला नेहमी दिसायच्या.  त्यांच्या कडेवर  लहान मुले असायची. दिवसभर आपल्या कोहपऱ्यासारख्या पात्रातून पाण्याच्या सहाय्याने त्या माती गाळून सोने काढायच्या. त्यांच्या कार्याचे निरीक्षण करणे हे आमचे आनंददायी कार्य होते.

नानाजीं च्या दुकानात आलमारीलगत एक मोठी पिशवी ठेवलेली असायची. त्यात कापडाच्या चिंध्या असायच्या.  त्यांचा उपयोग  कापडी बाहुल्या बनविण्यासाठी व्हायचा.  माझी बहीण सोबत असली की तिची नजर त्या पिशवीवर असायची.  ,नानाजींचा मूड चांगला असला की तिला परवानगी मिळायची, नि रंगबिरंगी कापडी चिंध्यांवर ती खजिना मिळाल्यागत तुटून पडायची. नानाजींना कविता ऐकण्याची आवड होती आणि बाबांना कविता करण्याची. दोघेही एकत्र आले की रंग जमायचा. बाबांचे कविता ऐकवणे आणि नानाजींचे त्यांना दाद देणे, यात किती वेळ जातो याचे दोघांनाही भान नसायचे. आम्ही मात्र कंटाळून जात असू, अनेकदा बाजार बंद व्हायचा तरी दोघांचे चर्चासत्र थांबत नसे. नानाजींच्या दुकानात त्यांच्यासोबत त्यांचा शंकर हा मुलगाही काम करायचा. शंकर विवाहित व दोन मुलांचा पिता होता. नानाजी आणि शंकर यांचे कधी फारसे पटत नसे. तो व्यवहारवादी होता. त्याचा कल अधिक पैसे मिळविण्याकडे असायचा. विनाकारण दुकानात येऊन बसणारे व नानाजींशी चर्चा करणारे त्याच्या नजरेत बिनकामाचे असायचे. तो तसे बोलत नसे, पण त्याच्या देहबोलीतून ते जाणवायचे. मात्र त्याने आमच्या वडिलांचा कधी अपमान केला नाही. नानाजींशी त्याचे न पटण्याचे कारणही तसेच होते. 

क्रमशः….

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ साप…. भाग २ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ साप…. भाग २ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात  आपण पहिलं – `नाग नाही, नागीण आहे. बहुतेक कात टाकणारे…त्यामुळेच तिची गती संथ झालीय. नाही तर आतापर्यंत सगळ्या वाड्यात फिरून आली असती. ‘ पहिल्या नोकराने विस्तृत माहिती दिली. आता इथून पुढे )

`मग तुम्ही लोकांनी तिला घेरून मारलं का नाही?’

`अरे बाबा, हे लोक सापाला मारत नाहीत ना! त्यांच्याकडे तर नागदेवतेची पूजा केली जाते.’

`मग तुम्ही लोक एवढ्या जाड जाड लाठ्या घेऊन का उभा राहिलाय?’ रमलूनेविचारले.

`शेठजीम्हणाले, त्यावर लक्ष ठेवा, नाही तर कुठे घुसेल, कुणासठाऊक!’

`मग आता कुठे आहे?’

`त्या कोपर्‍यात पुस्तकांच्या कपाटाखाली वेटोळं घालून बसलाय.’

रमलूला आपल्या वडलांची आठवण झाली. साप पकडण्याचं चांगलंच कसब त्यांच्याकडे होतं. अनेकदा त्यांच्या`साप-पकड- अभियानात रमलूदेखील सहभागी व्हायचा.

रमलूने डोळे मिटून भोळ्या शंकराचं स्मरण केलं. त्याचे वडील तसंच करायचे. मग म्हणाला, `एक मोठा माठ आणा आणि एक चांगलं मजबूत कापड. माठाच्या तोंडावर बांधण्यासाठी…. तुझा हा पंचासुद्धा चालेल.’ त्याने एका नोकराच्या खांद्यावरचा पंचा घेऊन आपल्या गळ्याभोवती लपेटला. मगत्याने ४-५ फूट लांबीची काठी घेतली आणि तो खोलीत शिरला. त्याने कपाटाला थोडासा धक्का देताच सापाने एक फुत्कार टाकला आणि तो सर्रकन बाहेर आला.

दरवाजाशी उभा असलेला एक नोकर ओरडला, `रमलू सावध राहा रे बाबा!’ दुसरा म्हणाला, लक्ष ठेव साप उसळी मारून, उलटा होऊनसुद्धा चावतो. ‘

रमलू अधीक सावध झाला. खोलीत लावलेल्या गुळगुळित टाईल्समुळे सापाला वेगाने सरकता येत नव्हतं. तो भिंतीच्या कडेने दरवाजाच्या दिशेने सरपटू लागला. रमलू सावधपणे पुढे झाला आणि लाठीचं टोक सापाच्या मानेपाशी पूर्ण ताकदीने दाबलं आणि उजव्या हाताने त्याची शेपटी मजबुतीने पकडून झटकन त्याला उलटं पकडलं. साप रमलूपेक्षा एखदा फूट जास्तच उंच होता. सापाला सावधपणे पकडून रमलू अंगणात आला. शेठजी आणि त्यांच्या कुटुंबियांनी साप पाहिला, तेव्हा त्यांचे डोळे विस्फारलेच. तर्‍हेतर्‍हेच्या चर्चा सुरू झाल्या. या दरम्यान रमलूच्या इशार्‍यानुसार नोकर मोठं मडकं घेऊन तिथे आला. रमलूने सापाला मडक्यात सोडलं आणि पापणी लवायच्या आतआपल्या गळ्यातला पंचा काढून मडक्याचं तोंड बांधून टाकलं. सापाच्या अस्वस्थपणामुळे हलणारं मडकदेखील वाड्यातील लोकांच्या मनात भीतीचे शहारे उठवायला पुरेसं होतं. इकडे रमलूचं सारं शरीर पानाप्रमाणे थरथर कापत होतं. घामाने न्हाऊन निघाला होता रमलू. त्याने कोणत्या खुबीने सापाला कैद केलं, त्यालाच कळलं नव्हतं. शरीराची थरथर थोडी कमी झाली, तेव्हा घामाने ओला चिंब झालेला आपला सदरा काढला. पिळला आणि त्याने आपला देह पुसू लागला. शेठजी हे सगळं बघत होते. ते पुढे झले आणि रमलूला म्हणाले, `आज तू अगदी तुझ्या वडलांप्रमाणे बहादुरीचं काम केलंस. मी त्यांना साप पकडताना पाहिलं होतं.’

रमलूची बोलतीच बंद झाली होती. मोठ्या मुश्किीलीने त्याच्या कंठातून शब्द फुटले, `शेठजी, आता मला निघायला हवं. अंधार होण्यापूर्वी याला जंगलात सोडायला हवं. मुकादमांना, मला झोपडीपर्यंत पोचवायला सांगा.’

`झोपडीत जाऊन काय करणार? मुकादम थेट जंगलापर्यंत तुला घेऊन जाईल.’

`झोपडीत जाऊन मटक्याला शेंदूर लावायला लागेल. आम्हीदेखील सापाची पूजा करतो. पूजा झाल्यावर जंगलात सोडून येईन.’

`तुझे वडीलसुद्धा असं सगळं करत होते?’

`हो!’

`ठीक आहे. तू म्हणशील, तिथे मुकादम तुला सोडून येईल.’ शेठजींनी हाक मारली. एका क्षणात तिथे मुकादम हजर झाला. रमलूने माठ उचलला आणि मोटारसायकलच्या दिशेने निघाला. शेठजींनी पाचशेच्या दोन नोटा काढून रमलूच्या खिशात ठेवत म्हंटलं, `हे तुझं इनाम’

`माफ करा शेठजी, या कामासाठी कोणतंही इनाम घेतलं जात नाही. माझ्या वडलांनी शेकडो साप पकडून लोकांची सुटका केली होती. पण कधी कुणाकडून एक पैसासुद्धा घेतला नाही.’

`तो काळ वेगळा होता रमलू. त्यावेळी शाळेत प्रवेश मिळण्यासाठी पैसे द्यावे लागत नव्हते. आता काळ बदललाय. प्रत्येक गोष्टीसाठी पैसे द्यावे लागतात. ठेव. तुझ्या कामी येतील.’

भाग 2 समाप्त

मूळ हिंदी  कथा – साप  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी…भाग 4 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी…भाग 4 ☆ डॉ अभिजीत सोनवणे☆

@doctorforbeggars

(आपल्याकडे काहीही नसणं आणि एके दिवशी खूप काही असणं या दोन टोकांमधलं अंतर जिद्दीने काटणे म्हणजे भरभराट…. ) इथून पुढे —-

चार वर्ष मी या कुटुंबासोबत आहे…. 

रस्त्यावरची निराधार भिक्षेकरी ते आताची सक्षम कष्टकरी असा हा तिचा प्रवास….  मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे…. नव्हे अनुभवलाय….

या सर्व प्रवासात तिने आणखी एका व्यक्तीला हात दिला होता…. याचंच मला अप्रूप  !

स्वतःला भूक लागते तेव्हा खाणं म्हणजे प्रकृती, दुसऱ्याचं ओढून घेऊन खाणं म्हणजे विकृती, पण स्वतःला भूक लागलेली असताना, आपल्या घासातला घास काढून दुसऱ्याला देणं ही झाली संस्कृती….!

ती शिकलेली नाही, तिची भाषा ओबड-धोबड आहे…. पण तरीही माझ्यासाठी ती सुसंस्कृतच आहे…! 

या दिवाळीत तिने मला पुन्हा शिव्या देऊन भाऊबीजेला घरी बोलावलं….

भाऊबीजेच्यादिवशी तिने तिच्या घरासमोर, फुटपाथवरच  एक चटई अंथरली…. 

तिथे तिने मला साग्रसंगीत ओवाळले…मी तिला ओवाळणी दिली.

तिने मला पेढा भरवला आणि पेढ्याचा बॉक्स माझ्या हाती दिला…. 

“पेढ्याच्या  बॉक्सवरच भागवते का म्हातारे… मला वाटलं जेवायला बोलवशील…”, मी हसत  म्हणालो.

“म्हातारी म्हणू नगो “, तिरक्या डोळ्यानं माझ्याकडे बघत, हातातलं ताट ठेवता ठेवता ती गुरगुरली. 

“दिसते तर म्हातारी आणि मला म्हणते ताई म्हण…” मुद्दाम मी तिला उचकवलं…. आता पुढं काय होणार हे मला  माहित होतं…

“म्हातारी कुणाला म्हणतो रे मुडद्या… “बी असं  म्हणत तिने पायातली चप्पल काढून माझी ओवाळणी केली होती….

एका भावाला प्रेमळ बहिणीच्या या मायेच्या चपलेपेक्षा आणखी जास्त काय हवं….?

माझ्या आईच्या वयाची ती बाई, आता तिचा आशीर्वाद घ्यावा आणि निघावं म्हणून उठलो. 

तिच्या पाया पडत म्हणालो, “ तुला म्हातारे म्हटलेलं आवडत नाही, तुला मी ताई म्हणावं अशी तुझी इच्छा आहे…. पण  खरं सांगू का,  ताई पेक्षा तुला मी आई म्हणणं जास्त योग्य आहे….!”

तिच्या भावूक झालेल्या चेहऱ्यावर आता प्रश्नचिन्ह होतं…

तिला म्हणालो, “ अगं तू स्वतः अपंग, त्यात तू स्वतः रस्त्यावर राहत होतीस. मात्र जेव्हा स्वतः सावरलीस, तेव्हा तू एका अपंग माणसाला वर्षभर सांभाळलंस.  हे सारंकाही एक आईच करू शकते….”

आता तिच्या डोळ्यात पाणी होतं…. ती म्हणाली, “ पाय नसत्यात तवा त्याचं दुःख काय आस्त हे मला म्हाईत हाय. रस्त्यावर कुत्र्यावानी निराधार म्हणून उनात पावसात पडणं म्हंजी काय आस्तंय,  हे सुदा मला म्हाईत हाय. मला तू आदार देऊन पायावर हुबी केलीस…. डोक्यावर छत टाकलंस…. पोटातली भूक भागवलीस….  तू माजा कुनीही नसताना माज्यासाटी तू हे केलंस… मी तुजी आई नसताना तू माजा पोरगा झालास….म्हणलं,  चला बिन बाळंतपनाचं या वयात आपल्यालाबी पोरगं झालंय…. तर संबळु या अपंग  पोराला…. आपुन बी या वयात आई हुन बगु…. मी आय झाले आन ह्यो बाप……”  तिने नवऱ्याकडे  बोट दाखवत म्हटले….!

आता डोळ्यात पाणी माझ्या होतं….!

म्हटलं, “ म्हातारे तू लय मोठी झालीस…. “

यावेळी ” म्हातारी ” म्हटल्यावर ती चिडली नाही, उलट गालातल्या गालात हसली…. 

हसत ती झोपडीत गेली आणि चार-पाच बोचकी उचकटली… त्यातून एक शर्ट काढला…. एक साडी घेतली आणि मला म्हणाली, “ दिवाळीला ह्यो शर्ट घालशील का ?  तू घिवून जा, नाय बसला तर सांग मला आणि मनीषाला ही साडी पन दे… तिला म्हणावं साडीतच ब्लाउज पीस पन हाय….”  

हा भरजरी पोशाख मी घेतला…. 

गाडीला किक मारली आणि तिला हात जोडून मनोमन नमस्कार करत म्हणालो, “ जातो मी माई…”. 

ती म्हणाली, “ ए मुडद्या, जातो म्हणू न्हायी…. येतो म्हणावं…. आनी हो…. माई आणि ताई म्हणायची थेरं करू नगंस. मला आपली म्हातारीच म्हन….मी तुजी म्हातारीच हाय….! “

मी माझ्या या म्हातारीला मनोमन नमस्कार करून शर्ट आणि साडी घेऊन निघालो…. 

आज जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मी होतो…. ! 

समाप्त 

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ साप…. भाग १ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ साप…. भाग १ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

`रमलू…ए रमलू… ऊठ.  वाड्यातून  मुकादम  बोलवायला  आलाय.

`झोपू दे ना आई! आज माझा सुट्टीचा दिवस आहे. सांग त्या मुकादमाला.’

`अरे, तो म्हणतोय, वाड्यात साप निघालाय. म्हणून  शेठजींनी तुला बोलावलय. जा. मुकादमाच्या सायकलवर बसून जा.’

`आज मी मुळीच जाणार नाही आई! काही का होईना तिकडे. यांना आम्ही  आमचा देव समजतो. पण या लोकांच्या दृष्टीने आमची  किंमत कौडीची. नोकरच आम्ही फक्त. साप निघू दे,  नाही तर आग लागू दे! आम्हाला काय त्याचं? रमलू उठून खाटल्यावर बसला. तो पुढेही भुणभुणत राहिला. `त्यांच्याकडे नोकरी करायला लागून दोन वर्षं झाली. आधी म्हणाले, ऑफीसमध्ये काम करावं लागेल. पण आता शेतात-मळ्यात मजूरी, ट्रॅक्टरवर हमाली, त्यांच्या मुला-बाळांचं हागणं-मुतणं सगळं करवून घेतात. बारा तास करा… नाही तर वीस तास करा. कधी पाच रुपये स्वतंत्र फेकणार नाहीत. ते तर झालंच, यांची सायकल पंक्चर झाली तरी पंक्चर दुरुस्तीचे पैसे पगारातून कापून घेणार. मोठे शेठ म्हणवतात स्साले….!

`असं नाही बोलायचं बेटा, कसं का असेना, ते आपले अन्नदाते आहेत. जा. मुकादम उभा आहे बाहेर.’

`आई, मी काल तुला सांगितलं नाही? काल पाच हजार रुपये मागितले होते. आपल्या मुनियाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी. मुनीम, शेठजी, मोठ्या सूनबाई, धाकट्या सुनबाई सगळ्यांची विनवणी केली. गयावया केलं. पायसुद्धा धरले. पण सगळ्यांनी तोंड फिरवलं. पैसे मागितले, तेसुद्धा दान म्हणून नाही. अ‍ॅडव्हान्स म्हणून. मी म्हंटलंसुद्धा… दर महिन्याच्या पगारातून पाचशे रुपये कापून घ्या, पण कुणाला पाझर फुटला नाही.’

`अरे, मोठ्या शेठजींना सांगायचंस ना! ते तुझ्या वडलांपासून आपल्याला ओळखतात.’

`त्या मुठल्ल्यालासुद्धा सांगितलं. काय म्हणाला माहीत आहे? ‘

`काय? ‘

`म्हणाला उगीचच पैसे फुकट घालवता तुम्ही लोक. म्युन्सिपालटीच्या शाळेत का प्रवेश घेत नाही? तुम्हा लोकांसाठी ती शाळाच ठीक आहे. ‘

`अरे बेटा, एकदा नाही म्हंटलं, म्हणजे प्रत्येक वेळी नाहीच म्हणतील, असं थोडंच आहे? त्यांचीही काही अडचण असेल. तुझे बाबा गेल्यानंतर त्यांनी तुला नोकरी दिली नसती, तर आज आपण कुठे असतो? आज त्यांच्यावर संकट आलय, आणि आपण घरात झोपून राहतो, हे काही ठीक नाही.’

एवढ्यात झोपडीसमोर एक मोटरसायकल उभी राहिली. त्यावरून मुनीम आले होते.

`चल बेटा रमलू, वाड्यावर भयंकर गोंधळ माजलाय!’

`पण मुनीमजी, मी येऊन काय करू? मला साप पकडता येत नाही.’

एव्हाना रमलू चुळा भरून उपरण्याला तोंड पुसत बाहेर आला होता.

`तुझे वडील साप पकडायचे. त्यांचा कुणी साथीदार असेल, तर त्याला घेऊन जाऊयात. शेठजींनी त्यासाठी मोटरसायकल पाठवलीय.’

`अरे, ते रम्मैया चाचा असतील. तुझ्या बाबांबरोबर ते पण साप पकडायला जायचे.’

मुनीम आणि रमलू रम्मैयाचाचाकडे गेले, पण तिथे कळलं, ते आपल्या मुलाकडे पुण्याला शिफ्ट झाले आहेत.

रमलू मुनीमजींबरोबर वाड्यावर पोचला. शेठ-शेठाणी आणि घरातील इतर सगळे सत्रा-अठरा लोक अंगणात, कुणा संकटमोचकाची प्रतीक्षा करत उभे होते. मुकादम वाड्यावर आधीच पोचला होता. त्याने रमलूचा हात धरला आणि ज्या खोलीत साप होता, तिथे त्याला ताबडतोब घेऊन गेले. खोलीच्या दरवाज्याशी डावी-उजवीकडे दोन नोकर हातात लाठी घेऊन उभे होते. त्यापैकी एक जण म्हणाला, `सहा-आठ फुटापेक्षा कमी नाहीये! सगळ्यात आधी मोठ्या सूनबार्इंना दिवाणखान्यात दिसला. त्या ओरडल्या. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत कोठीच्या खोलीतून इथे रश्मीतार्इंच्या खोलीत पोचला.’

`वाटतय, अस्सल नाग आहे.’ दुसरा नोकरम्हणाला.

`नाग नाही, नागीण आहे. बहुतेक कात टाकणारे…त्यामुळेच तिची गती संथ झालीय. नाही तर आतापर्यंत सगळ्या वाड्यात फिरून आली असती. ‘ पहिल्या नोकराने विस्तृत माहिती दिली.

भाग 1 समाप्त

मूळ हिंदी  कथा – साप  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी…भाग 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी…भाग 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे☆

@doctorforbeggars

(आणि म्हणून त्या दोघांनी काहीतरी व्यवसाय करावा अशी माझी इच्छा होती….) इथून पुढे —-

एकदा तिला म्हणालो, “ अशी भीक घेण्यापेक्षा ‘चार पैसे’ कमव… काहीतरी धंदा सुरू करू 

आपण..” 

ती म्हणाली होती, “ मुडद्या भांडवल काय माजा मेलेला बाप घाललं काय….? “ 

मी म्हणालो होतो, “ नाही ना, तुझा जिवंत असलेला भाऊ भांडवल  घालल…. “

यावर तिने पदराला पुसलेले डोळे मला अजून आठवतात…. 

यानंतर मी तिला पाच ते दहा विक्रीयोग्य वस्तू विकत आणून दिल्या आणि तिला म्हणालो,

“ बघ हळूहळू हा व्यवसाय सुरु कर.”

तिने माझं ऐकलं….  मी ज्या वस्तू दिल्या होत्या त्या वस्तू ओळीने तिने त्या फूटपाथवरच्या तिच्या घरात मांडून ठेवल्या…… व्हीलचेअर घेऊन ती आता घराबाहेर बसू लागली…. येणार्‍या-जाणार्‍या लोकांना वस्तू घेण्याचा आग्रह करू लागली…. 

व्यवसाय हळूहळू वाढत गेला

मी दिलेल्या पाच दहा वस्तूंची संख्या वाढवत तिने ती दोनशे-तीनशेच्या वर नेली. आता वस्तू ठेवायला घर पुरेना… हे कर्तुत्व तिचं होतं….!

तिला मी फक्त एक हात दिला होता, तिने या संधीचे सोनं केलं…. ती आकाशात  भरारी  घेत  होती….!

फुंकर मारल्याने दिवा विझतो….. अगरबत्ती नाही….!

जो दुसऱ्याला सुगंध  देतो तो कसा विझेल….?

कोणतंही काम करण्याच्या पलीकडे गेलेला एक अपंग माणूस रोज तिच्या दारावर यायचा…. या ताईने त्याला रोज दोन वेळचं जेवण द्यायला सुरुवात केली. 

स्वतःला जाणवते ती वेदना. पण जेव्हा दुसऱ्याची वेदना जाणवायला सुरुवात होते, ती म्हणजे संवेदना….!

तिने त्याची वेदना जाणून त्या अपंग व्यक्तीला हात दिला होता….

आपण उठून उभे राहिल्यावर दुसऱ्याला सुद्धा मदतीचा हात द्यावा….. कुठून आला असेल हा विचार तिच्या मनात…? 

मी तिला मनोमन नमस्कार करायचो.

ती मला नेहमी म्हणायची, “ एवढ्या लोकांचं करतोस, याचं पण पांग फेड बाबा, या अधू पोरासाठी पण कायतरी कर…. “ 

कालांतराने या व्यक्तीवर सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार केले. तो आता स्वतःच्या पायावर चालतो.  यानंतर त्याला एका आश्रमात नोकरी मिळवून दिली आहे. 

त्याचं सर्व छान झालं, या सर्व गोष्टींचा सर्वात जास्त आनंद कुणाला झाला असेल, तर तिला…!

दुसर्‍याच्या आनंदात आपलं सुख माणणं, म्हणजे खऱ्या अर्थाने मोठं होणं…. बाकी नुसतंच वय वाढण्यानं कुणी मोठा  होतं नसतो….!

मोठं होणं म्हणजे maturity येणं….!

किती कॅरेटचं सोनं घातलंय, यापेक्षा किती मूल्यांचं  कॅरेक्टर आहे हे समजणं म्हणजे maturity….!

विझलेल्या दिव्यांना सुद्धा किंमत द्यायची असते, कारण कालची रात्र त्यांनीच प्रकाश दिलेला असतो….

आज जरी आई बाप  म्हातारे आणि बिनकामाचे  दिसत  असले, तरी आपल्याला त्यांनीच उजळून टाकलंय….त्यांनाही किंमत द्यायची असते हे कळणं म्हणजे maturity….!

चुका शोधायला मेंदू लागतो…. पण माफ करायला हृदय…. हे समजणं म्हणजे maturity….!

…. अशाच एके दिवशी शिव्या देत फोन करत मला तिने घर बघायला बोलवलं…. तिथे तिने अनंत वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या, ते पाहून माझे डोळे दिपून गेले…. 

कृतज्ञतेने म्हणाली, “ ही भरभराट तुज्यामुळं झाली बाबा “. 

खरंच तिची भरभराट झाली होती…. पण केवळ वस्तूंची संख्या वाढली म्हणून तिला भरभराट म्हणायचं का ?  तर मुळीच नाही…..

काळ्याकुट्ट अंधारात मिणमिणता का होईना, पण दुसऱ्याच्या घरात एक दिवा लावणे म्हणजे भरभराट….

सर्व काही संपलेलं असतानासुद्धा उठून उभं राहण्याची इच्छा मनात बाळगणे म्हणजे भरभराट…

पाय नसतानाही आकाशात भरारी घ्यायचं वेड मनात बाळगणं म्हणजे भरभराट…

आपले डोळे पुसत असतांनाच, एक हात दुसऱ्यांचे डोळे पुसण्यासाठी पुढं जाणं म्हणजे भरभराट…

आपण पडलेले असतानासुद्धा, दुसऱ्याच्या आधारासाठी एक बोट आपोआप पुढं जाणं म्हणजे भरभराट….

आपल्याकडे काहीही नसणं आणि एके दिवशी खूप काही असणं– या दोन टोकामधलं अंतर जिद्दीने पार करणं म्हणजे भरभराट…. 

क्रमशः….

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वयोवृद्ध वटवृक्ष ☆ प्रस्तुती – सुश्री आनंदी केळकर

? जीवनरंग ?

☆ वयोवृद्ध वटवृक्ष ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆ 

सकाळचे साडेआठ वाजले होते. मोबाईल चाळत बसलो होतो.फेसबुकवर कोणाचे वाढदिवस आहेत का ते पाहून मेसेज करत होतो. बायकोला ऑफिसला जायचे होते, त्यामुळे तिची आवरा- आवर चालू होती.आई किचनमध्ये नाश्ता बनवत होती. अण्णा (माझे वडील) आणि रेवती (माझी सहा वर्षांची मुलगी) सकाळी सकाळी फिरायला सोसायटीच्या बागेमध्ये गेले होते.

“अरे आनंदा आंघोळ करून घे- पाणी तापलंय ” 

असा आईचा आवाज आला. तसा मी बोललो “ हो आलो पाच मिनिटात.” 

 “काय मेलं त्या मोबाईल मध्ये असतं– दिवसभर मोबाईल हातात धरून बसलेला असतो, “

आईची बडबड चालू होती. 

तेवढ्यात बाहेर रेवतीचा आवाज आला, ” पप्पा अण्णांनी बघा तिथं पडलेले आंबे उचलून आणलेत ” हे ऐकताच माझ्या कपाळावर आठ्या पडल्या.

दोन महिन्यांपूर्वीच मी स्वतःच्या फ्लॅटवर राहायला आलो होतो. त्याआधी अण्णा आणि आई गावी राहत होते. मी, रेवती आणि माझी बायको इथे पुण्यातच भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होतो. रेवतीने बाहेरून बेल दाबली आणि मी पटकन उठून दरवाजा उघडला.

अण्णा आणि रेवती आत आले आणि दरवाजा लावून घेतला. मी अण्णांकडे वळलो. अण्णांनी पंधरा ते वीस आंबे आणले होते.झाडावरून पडलेले असल्यामुळे त्यातले काही आंबे फुटले पण होते.

“अण्णा कळत नाही का तुम्हाला– पडलेले आंबे उचलून आणलेत.   “

‘अरे पोरा कोणी टाकून दिलेले आंबे नाहीत ते.  झाडाचेच खाली पडलेले आंबे आहेत. “ अण्णा म्हणाले.

” ते काही असू द्या.  आपण आता फ्लॅटमध्ये राहतो.  असल्या भिकार सवयी सोडा, नाहीतर रेवतीला पण त्या सवयी लागतील.” 

 अण्णा काही न बोलता पिशवीतून आंबे काढत होते.

” आणि हो आता इस्त्री केलेले कपडेच घालायचे.  चुरगळलेले कपडे घालायचे नाहीत.  “.

” ते भोकं पडलेलं बनियन आधी टाकून द्या.  दरिद्री पणाचे लक्षण सोडा, आणि जरा चांगले वागा. “

“ बरं बाबा.  आता तुझ्या घरात रहायचे म्हटल्यावर तुझंच ऐकावं लागेल. “ 

” अण्णा अहो तुम्ही तीस वर्षात कमावला नसेल एवढा पैसा मी एका वर्षात कमावतो. त्यामुळे ही असली फालतू काटकसर करू नका. आणि हो, अजून एक, तुम्ही सारखं सारखं खाली गेटवर वॉचमनशी गप्पा मारत बसत जाऊ नका.  सोसायटीतली माणसं तुमच्याकडे बघतात, बरं दिसत नाही ते. किती झालं तरी ते आपले नोकर. त्यांच्याशी एवढी सलगी ठेवायची नाही.” 

 माझा तोंडाचा पट्टा चालू होता.आणि अण्णा ते आणलेले आंबे आतमध्ये धुवायला घेऊन गेले. 

आई माझं सगळं बोललेलं  ऐकत होती, पण काही न बोलता तिचं काम चालू होतं.

  थोड्याच वेळात बायको ऑफिसला निघून गेली. आता घरात मी,आई,अण्णा आणि रेवती, आम्ही चौघेच होतो.अशाच गरमागरमीच्या वातावरणात दुपारचे दोन वाजले. जेवण वगैरे उरकल्यावर मी पुन्हा मोबाईल हातात घेऊन बसलो.आई पलीकडे चटईवर बसली होती. रेवती तिची खेळणी मांडून तिच्या बाहुलीसोबत खेळत होती.अण्णा खुर्चीतून उठले आणि सकाळी आणलेले आंबे घेऊन आले. त्यांनी सगळे आंबे एका पोत्यावर टाकले. मी आपलं बघून न बघितल्यासारखं केलं.  आंबे बघून रेवती अण्णांजवळ जवळ गेली. खरं तर तिला पण आंबा खायचा होता. पण मी रागवणार म्हणून गप्प बसली होती. अण्णांनी एक आंबा तिला दिला, तसा तिने आंबा खायला सुरुवात केली.

” वाव, किती गोड आंबे आहेत, ” रेवती बोलली आणि माझं लक्ष तिकडे गेलं.

“ खरंच एवढा गोड आहे का आंबा ? “ मी सहज बोललो.

” हो पप्पा. आपण मागच्या आठवड्यात आणलेल्या पेटीतल्या आंब्यापेक्षा गोड आहे. “

 मी तिचा आंबा खात असतानाचा फोटो मोबाईलवर काढायला लागलो, तसं मला अण्णांनी आवाज दिला– “ पोरा तुला पण लहानपणी पाडाचे आंबे फार आवडायचे,म्हणून तू शाळा सुटली की मुद्दाम पाटलाच्या आमराईतून घरी यायचास, आणि आमराईत पडलेले आंबे तुझ्या शाळेच्या दप्तरात भरून आणायचास. पडलेले आंबे उचलले तर पाटील पण कोणाला काही बोलत नसायचा. झाडाचे आंबे पाडले की मग मात्र पाटलाचं  नुकसान व्हायचं.”

 मी अण्णा बोलत असल्याचं पाहून मोबाईल बाजूला ठेवला.

“ तू लहानपणी आणलेल्या त्या आंब्यांना  माती लागलेली असायची, नाहीतर ते आंबे पाखरांनी खाल्लेले तरी असायचे.  तरीपण तुला ते आंबे आवडायचे. आता तुझ्याकडे  पैसे आलेत म्हणून तुला ते सगळं नकोसं वाटायला लागलंय. आमची चुरगळलेली फाटकी कापडं तुला नकोशी वाटायला लागलेत.  गावाला दुष्काळ पडला होता तेव्हा फक्त तीन टाईमच्या जेवणावर मार्केट यार्डात रात्रीच्या पाळीला वाचमेन होतो मी. रात्रीचं वाचमन काम आणि दिवसा हमाली केली त्या टायमाला. तुझ्या आईनी चार घरची धुणीभांडी केली.  पर कधी कुणासमोर हात पसरला नाही.अरे, आपल्या सोसायटीचा वॉचमन पण माणूसच आहे की. आणि त्याच्या पोरानी नशीब काढलं तर तुझ्यासारखा साहेब होईलच की. अरे माणसानं माणसासारखं राहिलं पाहिजे एवढंच कळतं बघ आम्हाला. म्हणून तर त्या वॉचमन बरोबर गप्पा मारत असतो. आणि  पहिल्यापासून असंच आहे आम्ही.

 पर एक मातुर छाती ठोकून सांगतो, तुला धरून सहा पोरं वाढवली.  पर कधी एक रुपयाची सुद्धा लबाडी केली नाही बघ. कालच्या वादळवाऱ्याच्या पावसात हे पिकलेले आंबे जसे गळून खाली पडले, तशी ही म्हातारी पाखरंसुद्धा तुमच्या आयुष्यातून उडून जातील.  आता आम्हा म्हातार्‍यांचे असे किती दिवस राहिलेत. “ 

मी मान खाली घालून सगळे ऐकत होतो.

मध्येच आईकडे लक्ष गेलं. ती पदराने डोळे पुसत होती.

माझ्या डोळ्यातही पाणी आलं,तसा मी आण्णांच्या पुढे हात केला आणि अण्णांना म्हणालो —

 “अण्णा, एक गोड बघून आंबा मला पण द्या की “–

अण्णांच्या चेहऱ्यावर हसू फुललं तसा सुरकुतलेला त्यांचा चेहरा टवटवीत दिसायला लागला.

प्रत्येकाच्या घरात असा वयोवृद्ध वटवृक्ष असतो. कुटुंबाची काळजी घेता घेता खंगून गेलेला असतो. घरातल्या अशा म्हाताऱ्या आजी आजोबा किंवा आई-वडिलांना थोडं त्यांच्या मनाप्रमाणे सुद्धा जगू द्या,कारण आयुष्यभर ते मन मारून जगलेले असतात– फक्त तुमच्यासाठी.

प्रस्तुती:-  संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares