मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्तव्य – भाग-2 ☆ संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ जीवनरंग ☆ कर्तव्य – भाग-2 ☆ संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

(“सगळं जमेल. मी आहे ना !” सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. गजूने खाली वाकून त्यांचे पाय धरले.) इथून पुढे —–

“सर खूप करताय माझ्यासाठी”—

“अरे ते माझं कर्तव्यच आहे !” त्याला उठवत ते म्हणाले. ” माझे बाकीचे विद्यार्थी परदेशात नोकऱ्या करताहेत. कोणी इथे मोठे अधिकारी आहेत. तूच एकटा मागे रहावा हे मला कसं पटावं?” गजूच्या डोळ्यात पाणी आलं.

दोन वर्षात गजू खुप पुढे गेला. फॅक्टरी वाढली. एकाची तीन दुकानं झाली. गजूचा गजानन शेठ झाला. झोपडपट्टीतून तो थ्री बी.एच.के. फ्लॅटमध्ये रहायला गेला. भाऊ बहिणी चांगल्या शाळा काँलेजमध्ये जाऊ लागले. दरम्यान त्याचे वडील वारले. वडील गेल्यावर एका वर्षाने त्याचं लग्न झालं. मुलगी पसंत करायला तो गायकवाड सरांनाच घेऊन गेला होता. काही दिवसांनी त्याची आई वारली.

इकडे गायकवाड सरांना निवृत्त होऊन पाच वर्षे झाली होती. सर आता थकले होते. त्यांच्या मुलाने इंग्लंडमध्येच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. मुलगी अगोदरच आँस्ट्रेलियात स्थायिक होती. त्यामुळे सर दुःखी होते. त्यात त्यांच्या पत्नीची तब्येतही आजकाल ठीक नसायची.

एक दिवस सरांची पत्नी गेल्याचा संदेश गजूला मिळाला. सर्व कामं सोडून तो त्यांच्या घरी धावला. सरांचा मुलगा, मुलगी वेळेवर पोहचू शकले नाहीत. ते येण्याअगोदरच अंत्यविधी पार पाडावा लागला. पण गजूने सरांना कोणतीच कमतरता तर जाणवू दिली नाहीच, शिवाय तेराव्या दिवसापर्यंतचा सगळा खर्चही त्यानेच केला.

सगळं आटोपल्यावर सरांच्या मुलाने त्यांना इंग्लंडला चलायचा खुप आग्रह केला, पण सरांनी मायदेश सोडायला साफ नकार दिला. सगळे निघून गेल्यावर सरांचं एकाकीपण सुरु झालं, आणि ते गजूला बघवत नव्हतं, पण त्याचाही नाईलाज होता…

एक दिवस बायकोला घेऊन तो सरांच्या घरी पोहचला. त्याला पाहून सरांना आश्चर्य वाटलं.

” सर तुमचे माझ्यावर खुप उपकार आहेत. आज मला अजून एक मदत कराल.?”

“अरे आता तुला मदतीची काय गरज? तू आता खुप मोठा झाला आहेस . बरं ठीक आहे, सांग तुला काय मदत हवी आहे?”

“सर माझे वडील व्हाल?”

सर स्तब्ध झाले. मग म्हणाले, “अरे वेड्या मी तर तुला कधीचंच आपला मुलगा मानलंय !”

“तर मग मला मुलाचं कर्तव्य करु द्या. मी तुम्हाला माझ्या घरी न्यायला आलोय. तुमचं उरलेलं आयुष्य तिथंच काढावं, अशी माझी तुम्हाला विनंती आहे !” गजू हात जोडत म्हणाला.

“अरे पण तुझ्या बायकोला विचारलं का?”

“सर तिला विचारुनच मी हा निर्णय घेतलाय. तिलाही वडील नाहीयेत. तुमच्यासारखे सासरे वडील म्हणून मिळाले तर तिलाही हवेच आहेत. शिवाय पुढे मुलं झाल्यावर त्यांनाही आजोबा हवेतच की! “

“बघ बुवा. म्हातारपण फार वाईट असतं. मी आजारी पडलो तर तुलाच सर्व करावं लागेल.”

“मुलगा म्हटलं की ते सगळं करणं आलंच. सर तो सारासार विचार करुनच मी आलोय !”

सर विचारात पडले. मग म्हणाले, “ठीक आहे, येतो मी.  पण माझी एक अट आहे. मला तू सर म्हणायचं नाही.”

“मी माझ्या वडिलांना अण्णा म्हणायचो, तुम्हालाही तेच म्हणेन !”

सर मोकळेपणाने हसले.

“अजून एक अट, तुझ्यासारखे अनेक गजू आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे. त्यांना गजानन शेठ व्हायला मला मदत करायची !”

गजूला गहिवरुन आलं. त्यानं सरांना मिठी मारली. दोघंही बराच वेळपर्यंत रडत होते…

समाप्त 

(सत्य घटनेवर आधारित—-शिक्षक हा असा असतो, आणि असाच असायला हवा.) 

– अज्ञात 

संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ ते तिघे…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

??

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆ ते तिघे…!!! ☆ 

(अति लघु व्यथा  (अलव्य) )

@doctorforbeggars

शनिवार… भिक्षेकरी तपासत एका स्पॉटवरून दुसऱ्या स्पॉटकडे जात असताना सहज फूटपाथ कडे लक्ष गेलं.

तिथं एक माणूस दयनीय अवस्थेत पडला होता, पडल्या पडल्या वारंवार गुडघ्याला हात लावून विव्हळत होता… रडत होता. 

मी नीट पाहिलं, अर्रे… हा तर तोच… पूर्वी वाढपी म्हणून एका ठिकाणी काम करायचा… कोविड काळात नोकरी गेली… रस्त्यावर आला…. अन्नपूर्णा प्रकल्पात याला डबे वाटण्याचं काम देऊन पगार सुरू केला होता. 

मागच्या वर्षी केवळ वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे अनेकांचे प्राण गेले होते. 

हा तसा धट्टाकट्टा…! — मी याला म्हटलं होतं, ‘समाज आपल्याला ‘भीक’ देऊन जगवत आहे—चल, आज समाजाला गरज आहे—- आपण समाजाला “रक्त” देऊन “दान” करू— समाजाला परतफेड करू…

हा चटकन तयार झाला होता. याने माझ्या शब्दावर तेव्हा रक्तदान केले होते.

कोरोनाने आजारी असलेले तीन अतिगंभीर रुग्ण, ज्यांना रक्ताची आत्यंतिक गरज होती, परंतु कुठेही रक्त उपलब्ध होत नव्हतं…. हे तीनही रुग्ण याने केलेल्या रक्तदानामुळे तेव्हा वाचले होते. 

मी गडबडीने उतरून त्याच्याजवळ गेलो. मला पाहून त्याने हंबरडा फोडला… मी गुडघा पाहिला… गुडघ्याचा आकार चित्रविचित्र झाला होता… गुडघ्याच्या हाडांचे तुकडे तुकडे झाले असणार, हे लगेच लक्षात आलं.

‘गाडीनं उडवलं सर, मी दोन दिवस इथेच पडून आहे, मला वाचवा सर… खूप दुखतंय हो , या दुखण्यातून मला मोकळं करा सर…’– त्याला भयानक यातना होत असणार…  त्याच्या ओरडण्यातून, रडण्यातून या सर्व वेदना प्रत्यक्ष दिसत होत्या…. कागदावर चित्र दिसते तसे !

त्याच्याकडे बघवत नव्हतं…. तो गुडघा पकडून रडत होता. मोठी माणसं रडताना खूप भेसूर दिसतात…. ! 

आपलं काही दुखत असतं.. आपण कळवळतो … तेव्हा होते ती “वेदना”…. परंतु दुसऱ्याचं दुखणं पाहून जेव्हा आपण कळवळतो ती “संवेदना”… ! 

आज जरी हा स्वतःच्या वेदनांनी तळमळत होता… तरी कधी एकेकाळी… दुसऱ्यांच्या वेदना समजून घेऊन, याने रक्तदान करत, तीन जणांना जीवदान देऊन “ संवेदना “ जपली होती…

आज याच्या वेदनेवर फुंकर मारणे हे माझं काम होतं… ! 

आणखी उशीर न करता, रिक्षात घालून त्याला मॉडर्न ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं .

उपचार सुरु झाल्यानंतर, काही वेळातच वेदना थांबल्या. पायाला प्लास्टर घातलं गेलं… आता त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. 

त्याला भेटायला गेलो… डोळ्यात पाणी… चेहर्‍यावर हसू…

दोन्ही हात जोडत म्हणाला, “ सर, तुम्ही मला वाचवलं… नाय तर मेलो असतो रस्त्यावर.  “

जोडलेले त्याचे दोन्ही हात हातात घेऊन त्याच्या कानाजवळ जात म्हणालो, “ तुला एक गंमत सांगू का ?  तुला मी वाचवलं नाही… तुला वाचवलं त्या तिघांनी… ज्यांना कधी काळी तू तुझं रक्त देऊन वाचवलं होतंस… ! “ 

त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत गेले…. जणू अविश्वासाने तो माझ्याकडे पाहत होता…

गालावर हळूच चापटी मारत त्याला म्हटलं, “ बघतोस काय असा येड्या माझ्याकडं ? दुसऱ्याला जगवणारा, स्वतः कधी मरत नसतो… ! “ 

त्याने शून्यात कुठेतरी पाहत पुन्हा हात जोडले—- हा नमस्कार  होता, त्या “तिघांना” !!!

२४ ऑक्टोबर २०२१

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कर्तव्य – भाग-1 ☆ संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ जीवनरंग ☆ कर्तव्य – भाग-1 ☆ संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

बाजारातल्या कोपऱ्यात बसून गजू आपलं नेहमीचं चपला-बुट शिवण्याचं काम करत होता. कुणाची तरी चाहूल लागली, म्हणून त्याने आपली मान वर केली. “अरे ही चप्पल शिवायची आहे ?” समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटली.

“तुम्ही गायकवाड सर ना?”

त्याने विचारलं.

“हो !  तू?”

“मी गजानन. गजानन लोखंडे. झेड.पी. च्या शाळेत दहावी ब च्या वर्गात होतो बघा. तुम्ही आम्हांला इंग्रजी आणि इतिहास शिकवायचे.”

“बरोबर. पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये !” गायकवाड सर त्याला निरखत म्हणाले.

“असू द्या सर. मी कुणी हुशार विद्यार्थी नव्हतो, की तुमच्या लक्षात राहीन !”

“पण तू हा व्यवसाय का…..?”

“सर हा आमचा पिढीजात व्यवसाय! आजोबा, वडील दोघंही हेच करायचे. दहावी सुटलो, तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाहीये. त्यामुळे शिक्षण सोडून गेली तीन वर्षे हेच करतोय.”

“काय झालं वडिलांना?

“सतत दारु पिऊन त्यांचं लिव्हर खराब झालंय. त्यामुळे ते नेहमी आजारीच असतात.”

“ओह! आणि तुझे भाऊ?”

“दोन भाऊ आणि एक बहीण तिघंही लहान आहेत. शिकताहेत. आई अशिक्षित.”

“अच्छा” गायकवाड सर विचारात गढून गेले. गजूनं त्यांची चप्पल शिवून दिल्यावर तो नाही नाही म्हणत असतांनाही, त्याच्या हातात दहा रुपये कोंबून निघून गेले.

काही दिवसांनी ते परत आले. गजूला म्हणाले “अरे माझ्या मापाचा एक बूट तयार करुन देशील?”

गजू तयार झाला. त्याने माप घेऊन दोन दिवसात बूट तयार करुन दिला. सरांना तो आवडला. त्यांनी गजू नाही म्हणत असतानाही पाचशे रुपये दिले. गजूला खूप आनंद झाला. इतके पैसे त्याला आजपर्यंत मिळाले नव्हते.

आता त्याच्याकडे नियमितपणे चपला बुट बनवण्यासाठी ग्राहक येऊ लागले. सगळे गायकवाड सरांनी पाठवलंय असं सांगायचे.

काही दिवसांनी सर आले. गजू त्यांना ग्राहक पाठविल्याबद्दल धन्यवाद देऊ लागला. त्यांनी त्याला थांबवलं. म्हणाले,  “गजू तुझ्या हातात कला आहे. तू असं का करत नाहीस, इथंच एक टपरी टाकून त्यात वेगवेगळ्या साईजचे डझनभर चपला बूट ठेवले तर गिऱ्हाईकाला थांबावं लागणार नाही.”

” सर कल्पना चांगली आहे, पण त्याला दहा पंधरा हजार लागतील. तेवढे पैसे नाहीयेत माझ्याजवळ!”

“हरकत नाही. मी देतो तुला. पण मला तू ते सहा महिन्यात परत करायचे. चालेल?”

गजू तयार झाला. आठवड्यातच तो बसायचा तिथं टपरी उभी राहिली. महिन्याभरातच गजूचे पंधरा हजार वसूल होऊन दहा हजार नफाही हातात पडला. गायकवाडसर आल्यावर त्याने त्यांना पंधरा हजार दिले. त्यांनी ते त्याला परत केले.

“मी तुला सहा महिन्यांची मुदत दिली होती. सहा महिन्यानंतरच मला परत कर. तोपर्यंत तुझा धंदा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग कर.”

गजूचा आता उत्साह वाढला. त्याने जास्त माल ठेवायला सुरवात केली. उत्तम दर्जा आणि कमी किमतीमुळे त्याच्या टपरीवर खुप गर्दी व्हायला लागली. आता त्याला वेळ पुरेनासा झाला.

सहा महिन्यांनी सर आले. गजूच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास फुलून आला होता.

“सर खूप चांगलं चाललंय. पण आता पुढं काय करायचं ?”

“गजू आता चांगल्या मार्केटमध्ये दुकान भाड्याने घ्यायचं. तिथे हे सगळं शिफ्ट करायचं. मी पाहून ठेवलंय दुकान. अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. आणि हो! स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी जे कर्ज मिळतं ते तुला मिळवून देतो. एम.आय.डी.सी. मध्ये फँक्टरी टाकून दे!!”

“काय? फॅक्टरी ?” गजू थरारला. “सर मला जमेल का?”

“सगळं जमेल. मी आहे ना !” सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले.

गजूने खाली वाकून त्यांचे पाय धरले.

क्रमशः ….

– अज्ञात 

संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देवदासी लक्ष्मीपूजन…भाग 3 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ देवदासी लक्ष्मीपूजन …भाग 3 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे 

(तुम्ही दोघी जो निर्णय घ्याल त्याला माझा होकार असेल. ” ) इथून पुढे—- 

दोन दिवस माझ्या मनात चलबिचल चालूच होती. जो निर्णय अजयने स्वतःने घ्यायला पाहिजे होता तो निर्णय त्याने त्याच्या आईवर का सोडला. त्याच्या आईने नाही सांगितले तरीही त्याचे माझ्यावर खरेच प्रेम असेल तर त्याने त्याच्या आईला समजावयाला पाहिजे. काळ बदलला आहे. काळानुसार जाती, रूढी ह्यांना मागे टाकत पुढे जायला पाहिजे असे त्याने आईला समजावून दिले पाहिजे. 

तो दिवस उगवला. लक्ष्मीपूजनाचा दिवस. ठरल्याप्रमाणे अजय मला भेटला आणि त्याने मला त्याच्या घरी नेले. त्याच्याकडच्या चावीने त्याने दरवाजा उघडला आणि मला हॉल मधल्या सोफ्यावर बसवत म्हणाला “आई …. बघ कोण आली आहे. आई सखी आली आहे. बाहेर ये. “

त्याची आई आतल्या स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि मी बघतच राहिली……आता सावरण्याची वेळ माझी होती. त्याची आई येणार म्हणून मी उभी राहिलेली माझ्या नकळत मी परत सोफ्यावर बसली गेली——त्याची आई तृतीयपंथी होती. 

—-” हो सखी. हीच माझी आई आहे. सखी मी अनाथ आहे. माझे खरे आई वडील कोण आहेत हे मला माहित नाहीत  आणि त्यांचा शोध घ्यावा असेही मला वाटत नाही. लक्ष्मीआई हिनेच माझा लहानपणीपासून सांभाळ केला आहे. लहानाचे मोठे मला हिनेच वाढवले आहे. प्रत्येक वेळी स्वतःच्या आधी ती माझा विचार करते. माझ्या आयुष्याच्या लढाईत, माझ्या नशिबी बाबा नावाची तलवार आणि आई नावाची ढाल सोबत नव्हती पण आयुष्याच्या माझ्या प्रत्येक संघर्षात लक्ष्मीआई माझ्यासाठी ढाल तलवार बनून उभी राहिली.  माझ्यावर चांगले विचार, आचार, संस्कार हे सगळे हिनेच केले आहे आणि जिला माझ्याशी नात जुळवायचे तिला माझ्यासकट माझ्या ह्या महान आईशीही नातं जुळवावे लागेल.”

आता अजयच्या आईने बोलायला सुरवात केली. ” ये सखी  ये. अग अजय रोज माझ्याकडे तुझ्याबद्दल बोलत असतो. त्याचे तुझ्यावर प्रेम आहे पण मी ही अशी असल्याने तो तुझ्याशी त्याबद्दल बोलू शकत नाही. त्याला तुझ्या देवदासी घराण्याची माहिती आहे आणि त्याला त्याबद्दल काही तक्रारही नाही किंवा त्यात काही खटकण्यासारखे वाटत नाही. त्याला भीती वाटते ती तू आमच्या नात्याचा स्विकार करशील की नाही त्याची. त्यामुळे आता तुला निर्णय घ्यायचा आहे. तू घाई घाईत निर्णय न घेता सावकाश विचार करून निर्णय सांग.”

मी भानावर आले. दोन दिवसांपूर्वी जसा अजय गप्प होता तशी आता मी एकटक अजय कडे बघत गप्प बसली होते. अजय आणि लक्ष्मीआई दोघेही माझ्याकडे बघून माझ्या उत्तराची, काहीतरी बोलण्याची उत्कंठपणे वाट बघत होते.  अचानक माझ्यातली देवदासी जागी झाली. मी उठली आणि चार पावले मागे गेली आणि त्या महान आईला जिने एका अनाथ मुलाचा नुसता सांभाळ न करता त्याला चांगल्या विचारांची बैठक बसवून दिली तिला माझ्या आईच्या जागी बघून, साष्टांग नमस्कार घातला. तिला माझी सासू असली तरी माझीही आई होण्याची विनंती करून तिला ह्या देवदासीला तुमच्यासारख्या देवीची दासी होण्याचा माझा मानस बोलून दाखवून मी आणि अजय  तिच्या उबदार अशा मायेच्या कुशीत शिरलो. 

नंतर अजयने त्याच्या दरवर्षीच्या प्रथेनुसार लक्ष्मीआईला एका टेबलावर बसवून तिचे पाय धुऊन यथासांग पूजा केली आणि आम्हां दोघांना लक्ष्मीआईनी आमच्या पुढील आयुष्यासाठी आशिर्वाद दिला. 

——अजयच्या घरात आज खरोखरचे एक आगळे वेगळे असे लक्ष्मीपूजन झाले.

समाप्त

क्रमशः….

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोतमीर ☆ मेहबूब जमादार

? मनमंजुषेतून ?

☆ कोतमीर ☆ मेहबूब जमादार

साधारण 1980 च्या आसपासचे दिवस होते.स्वस्ताई होती. मुबलक भाजीपाल्यांची उधळण होती. शेजारी शेजार धर्माला जागत होता. माणूसकीची जाण होती. दिवस अगदी सुखाचे होते.

नुकतीच सुगी आटपली होती. रानांतली ज्वारी, देशी भूईमूग काढला होता. कोतमीरीला धनं आलं होतं. ते भी पिक शेतक-यानीं काढलं होतं. सगळी रानं मोकळीच निपचीप पडली होती. नेहमीप्रमाणे कार्तिक महिन्यात हलकासा पाऊस पडला होता.

मी अन वसंता सहज ओढ्याकडे फिरायला गेलो. ओढयाला स्वच्छ पाणी वहात होतं. काटावरल्या झाडांची सावली पाण्यात पडली होती. आंम्ही ओढ्याकडे सिताफळ, मोराचे पीस गोळा करणेस नेहमी जात असू. आमच्यात तसा थोरला म्हणजे शंकर आबा होता. फिरतानां आमच्या एक गोष्ट लक्षात आली. आमच्या मळ्यात सगळीकडे पालेदार कोतमीर ऊगवली होती. ती पेरली नव्हती पण झडलेल्या धन्यांच्या बियांमूळे ती सा-या रानांत पेरल्यासारखी ऊगवून आली होती.हिरवीगार कोतमीर पहातानां डोळं ठरत नव्हतं.

त्याच दिवशी शंकरआबाला सांगितलं तसं तो म्हणाला,

“ऊद्याच सगळी कोतमीर उपटून गोळा करू.दहा पैशाला एक अशा पेंड्या बांधू.परवा गुरूवार आहे.येरवाळी जाऊ अन बाजारात विकून चैनी करू”

हे ऐकल्यावर आमचे चेहरे खुलले.बेत चांगला होता. त्याला खर्च कांहीच नव्हता. बरं कोतमीर घेवून जायला तिघांच्याही सायकली होत्या.

बुधवारी सायंकाळीच आंम्ही तिघानीं कोतमीर उपटली. त्यात कुठं तण आलं तर ते वेगळं केलं. पानमळ्यांतनं वाळलेल्या केळांच सोपट आणलं. त्याच्या पेंड्या बांधता येतील अशा बारीक वाद्या केल्या. राती जेवनांआधी त्या सगळ्या पेंड्या एकसारख्या बांधल्या. एका पोत्यावर पाणी मारून त्या बैजवार ठेवल्या. पेंड्या मोजल्या जवळ जवळ अडीचशे पेंड्या भरल्या.

दुसऱ्या दिवशीं येरवाळी ऊटून त्याच्या तीन वाटण्या केल्या. त्या सायकलच्या क्यरेजवर बैजवार बांधल्या. पडू नयेत म्हणून त्या दोरींन बांधल्या. तिघांची जेवनं एका पिशवीत घेतली. ऊजाडताच निघालो. कांहीवेळा चालत तर कांही वेळा सायकलवर बसून इस्लांमपूरची गणेश मंडई गाटली. खाली शंकरआबाची लुंगी अंथरली. त्याच्यावर सगळ्या पेंड्या ठेवल्या. आसपास सगळीकडं पाहीलं. सगळीकडं कोतमीर विकायला आली होती. मला तरं वाटलं अख्खा तालुका कोतमीर विकायला तिथं आला होता.

तास गेला. दोन तास गेले. पण कोतमीर ला गि-हाईक काय भेटनां. चार दोन यायची पण कोतमीर न घेताच हसत निघून जायची. हिच परिस्थिती सगळीकडे होती.

आंम्ही तिघं कोतमीरकडं मोठ्यां आशेनं बघत होतो. कोतमीर आमच्याकडं दिनदुबळ्या नजरेनं पहात होती.

आंम्ही कोतमीर जवळ बसून होतो. तोवर वाडीतला म्हादण्णा आला. आमच्याकडं बघून तो म्हणाला,

“गड्या,तुमची वेळ चूकली”

“कावं आण्णा?”

“आरं मी पानं विकायला बाजारातच असतु. तुम्ही हे कोतमीरीचं बोलला असता तर तुमचं याप तरी वाचलं असतं. एक सांगू आज कोतमीर ला कोण इचारत नाय. तरीभी बघा थोडं थांबून”

हे सारं ऐकून आंम्हाला दरदरून घाम फूटला.vकाल केलेल्या कामांवर पाणी पडणार होतं.बरं आम्ही काय सराईत बाजारकरी नव्हतो त्यामूळे कायच अंदाज नव्हता.

दुपारचे बारा वाजले. सकाळी नुसत्या चहावर आलो होतो. कोतमीरीचं चार पैसं मिळाल्यावर भाकरीबरोबर ताजी भजी घेवून जेवणार होतो. तरी बरं आंम्ही तिघानीं बरोबर जेवन आणलं होतं. पण कोतमीर विकल्याबिगर खायाचं कसं? म्हणून दम धरून होतो.

बाराचे एक झाले. दोन झाले. तरी एक पेंडीचा खप झाला नाय. सारा बाजार कोतमीरीवर रूसून होता. सगळ्यानीं शेतात अनावधानांन उगवलेली कोतमीर बाजारात आणली होती. सगळा बाजार कोतमीरनं भरला होता. त्यामूळे मालाला आजिबात उठाव नव्हता. पुढंपण काय सुधरलं असं काय दिसून येत नव्हतं.

दोन वाजल्यानंतर शंकरआबानं एक काम केलं, कोतमीरीच्या पेंड्याखाली टाकलेली लूंगी हळूवार काढून घेतली. त्यो आंम्हाला म्हणाला,

“चला लुंगी तरी घेवूया,नायतर ती भी जायाची.”

आंम्ही काय बोललो नाय. मूळात बोलण्यासारखे काय राहिलंच नव्हतं. गुमान सायकली घेतल्या अन पुढं चालू लागलो. कोतमीरीच्या पेंड्याकडं बघायचं धाडस झालं नाय. शंकरआबा अन वसंतानं सायकलवर केंव्हाच टांग मारलीवती. मी सायकलवर टांग मारण्याआधी कोतमीरीकडं बघितलं. एक गाय ती कोतमीर निवांतपणे खात ऊभी होती……!

© मेहबूब जमादार

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देवदासी लक्ष्मीपूजन…भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ देवदासी लक्ष्मीपूजन …भाग 2☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे 

(तोच धागा पकडून मी त्याच्याकडे माझ्या प्रेमाचा विषय काढायचे ठरविले.) इथून पुढे —

” मला तुला काहीतरी सांगायच आहे. तुला वेळ असेल तर बोलू का ” मी धिटाईने बोलायचे ठरविले. 

” बोल ना”

” तू आत्ता ज्या देवदासींबद्दल बोललास त्यांना मी खूप जवळून बघितले आहे. वयाच्या १० वर्ष्यांपर्यंत मी त्यांच्यां बरोबर राहिले आहे. माझी आई देवदासी होती. महाराष्ट्र कर्नाटकाच्या वेशीवरच आमचे गांव आहे. त्या गावात आमची देवदासी घराणी खूप आहेत. पाच वर्षांपूर्वीच तिने जगाचा निरोप घेतला. माझ्यासाठी ती खूप महान होती. नकारात्मक परिस्थितीमध्ये तिने माझ्यासाठी सगळ्या देवदाशींशी आणि समाजाशी लढा दिला आणि मला बाहेर काढून शिक्षण दिले. आज तुझ्यासमोर उभे राहून माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तू माझा स्विकार करशील का असे विचारण्याची हिम्मत ही माझ्या आईमुळेच होत आहे. अजय माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझे उत्तर पाहिजे आहे.”

अजय हादरला होता. अनपेक्षितपणे मी त्याच्यासमोर टाकलेल्या बॉम्बने तो बिथरला होता. तो फक्त माझ्याकडे  बघत होता. दोन मिनिट्स शांततेत गेली आणि अजय काही न बोलताच उठून निघायला लागला. 

” हे काय अजय. ” मी त्याच्या हाताला धरून त्याला परत बसविले. 

“अजय असं तू काही न बोलता जाऊ नकोस.  जे काही मनात असेल ते स्पष्ट सांग” माझ्या आवाजाचा स्तर बदलला होता. 

” अजय गेल्या वादविवाद स्पर्धेत तू मोठ्या रुबाबात ‘सामाजिक रूढी आणि बदल’ ह्या विषयावर तावातावाने मनापासून बोलला होतास ते सगळे खोट होते का ? आज जेंव्हा प्रत्यक्ष जीवनात निर्णय घ्यायची वेळ आली तर असा पळून का जातोयस. मला माहिती आहे तुलाही मी आवडते पण माझ्या घराण्याविषयी माझ्या आईविषयी सगळे ऐकल्यावर असा मागे का जातोस. माझ्या नशिबात माझ्या  आईचे प्रेम जास्त नव्हते. तुझ्या आईला माझी आई मानून तिच्या कुशीत विसावण्याची मी स्वप्न बघितली आहेत. अजय खरंच मी आपला संसार सुखाने करीन माझ्या प्रेमाचा स्विकार कर.” माझ्या मनातले कळवळीने मी अजयला सांगितले. 

अजय तसाच काहीतरी विचार करत एकटक माझ्याकडे बघत  होता. त्याच्या तोंडावाटे काहीच शब्द बाहेर पडत नसले तरी त्याच्या मनात खूप काही चालले आहे असे मला जाणवत होते. त्याला मी आवडत असले तरी माझे देवदासी घराणे त्याच्या घरच्यांना, त्याच्या आईला पटेल का असा कदाचित तो विचार करत असेल असे मला वाटत होते. त्याच्या मनातील द्वंद्व त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. परत अजय टेबलावरून उठला आणि जायला निघाला. माझ्या तोंडावाटे अचानक शब्द बाहेर पडले ” अजय, नको रे जाऊस मला सोडून ” अजय तसाच पुढे चालत राहिला. दहा पावले पुढे गेलेला अजय अचानक थांबला आणि मागे फिरून परत माझ्याजवळ आला आणि म्हणाला, ” आज पर्यंत मी तुला कधीच माझ्या घरच्या गोष्टींबद्दल बोललो नाही. माझ्या घरी माझी फक्त आई आहे. आज जो काही मी आहे, माझे विचार, माझे आचार हे सर्व तिने दिलेले आहेत. तिच्या शब्दाबाहेर मी नाही आणि म्हणूनच परवा लक्ष्मी पूजन आहे तेव्हा तू मला भेट, मी तुला माझ्या घरी घेऊन जाईन आणि आईच्या समोर उभी करीन. तुम्ही दोघी जो निर्णय घ्याल त्याला माझा होकार असेल. ” 

क्रमशः….

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देवदासी लक्ष्मीपूजन…भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ देवदासी लक्ष्मीपूजन …भाग 1☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे 

लॉ कॉलेजच्या पहिल्या वर्षीच्या वादविवाद स्पर्धेत त्याला मी पहिल्यांदा बघितले आणि मी बघतच राहिले. त्याच्या दिसण्याने नाही तर त्याच्या बोलण्यावर मी भाळली होते. त्या स्पर्धेत त्याच्या हुशारीची चमक, त्याच्या विचारांची  झेप तर दिसलीच पण जास्त जाणवले तो त्याचा शांत आणि विनम्र स्वभाव. त्या वर्षी स्पर्धेचे पहिले पारितोषिक त्यानेच मिळवले आणि माझ्यातल्या वेडीने ठरविले, नाही त्याची आजच ओळख करून घ्यायची आणि माझी पावले आपोआप त्याच्याकडे वळली. 

” हाय…. मी…..सखी… “. 

” हाय , मी अजय. “

” अभिनंदन…. छान मुद्दे मांडलेस.. तू… म्हणजे तुम्ही.”

त्याने माझा गोंधळ ओळखला होता. त्याने हसूनच आभार मानले आणि अजून काही बोलायच्या आत त्याला त्याच्या मित्रांनी बोलावले आणि तो गेला. मी हिरमुसले पण थोड्याच वेळेसाठी कारण त्याने माझ्याशी अजून काही बोलण्याएवढी आमची ओळख नव्हती. तो पूर्ण दिवस माझ्या मनात तोच  घुटमळत होता. मला जाणवले मी त्याच्या प्रेमात पडले होते.  हो खरंच, चक्क मी त्याच्या प्रेमात पडले होते पण त्यामुळेच मी घाबरली. मला प्रेमात पडायचा अधिकार आहे का ? आपल्या समाज व्यवस्थेमध्ये मला सामील करून घेतले जाईल का ? असे असंख्य प्रश्न माझ्या मनात नुसते उभे राहिले नाही तर त्या प्रश्नांनी माझ्या डोक्यात थैमान घातले. 

दुसऱ्या दिवशी मी भानावर आली कारण माझ्या अस्तित्वाची मला जाणीव झाली. मी एक देवदासी घराण्यातली मुलगी आणि माझी आई देवदासी होती. तिलाच मला त्या दलदलीतून बाहेर काढायचे होते म्हणून तिच्याच सांगण्यावरून मला मुंबईला शिक्षणासाठी पाठविले गेले. कला विभागातली पदवी घेऊन मी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मला माझ्या त्या अस्तित्वापासून लांब पळायचे नव्हते तर त्या माझ्या ओळखीनुसार स्विकारणार जोडीदार मला पाहिजे होता आणि तो …. अजय भेटला. त्याची माझी अजून ओळख नसली तरी मला तो मनोमनी खूप आवडला होता. मी एकतर्फी त्याच्या प्रेमात पडली होते. वादविवाद स्पर्धेच्या निमित्ताने ‘सामाजिक रूढी आणि बदल’ ह्या विषयावर त्यांनी मांडलेले त्याचे उच्च विचार मी ऐकले असल्याने त्याच्या कडून मी देवदासी घराण्याची असल्यामुळे विरोध होईल असे वाटत नव्हते. 

काहीही झाले तरी अजयशी दोस्ती वाढवायची मी ठरविले आणि त्याचा बहुतांश वेळ हा लायब्ररीत जातो हे समजल्याने मी ही लायब्ररीत जायला लागली. एका महिन्यातच आमची व्यवस्थित नाव लक्षात राहण्याएवढी ओळख झाली. ती ओळख दुसऱ्याच महिन्यांत कॉलेजच्या कँटीन मध्ये बसून कॉफी पिण्यापर्यंत पोहचली. त्याच्या स्वभावानुसार  त्याचे बोलणे कमी होते. दोन महिन्यांच्या आमच्या ओळखीत त्याने एकदाही मला माझ्या घरच्यांबद्दल कधी विचारले नाही आणि त्याने त्याच्याही घरचा विषय काढला नाही. माझ्या एकतर्फी प्रेमात मी हळूहळू सावधतेने एक एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते पण त्याच्याकडून तसे काहीच दिसत नव्हते. खरं सांगायचे झाले तर त्याच्या मनाचा अंदाज घेता येत नव्हता. त्याला माझ्या देवदासी घराण्याची माहिती असेल म्हणून तो प्रेमाच्या दिशेने पुढे पाऊल टाकत नसेल अशी मला शंकाही आली पण हे सगळे माझे मनाचे खेळ चालले होते. जसजसे दिवस जात होते तसतसे मला ह्या विचारांचा त्रास व्हायला लागला आणि मी एक दिवस ठरविले येत्या दिवाळीच्या आधी त्याला सगळे खरे सांगून  प्रपोज करायचे. 

कॉलेज कँटीनच्या आमच्या नेहमीच्या टेबलावर आम्ही बसलो होतो. तो एका कोणा ‘सिटाव्वा जोडट्टी’ ह्या  देवदासी बाईला पदमश्री अवार्ड मिळाल्या बद्दलची माहिती मला सांगत होता. पूर्वी त्याने वसंत राजस ह्यांनी लिहिलेले ‘देवदासी शोध आणि बोध’ हे पुस्तक वाचल्याचे ही मला सांगितले आणि तोच धागा पकडून मी त्याच्याकडे माझ्या प्रेमाचा विषय काढायचे ठरविले.

क्रमशः….

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भाजी मंडई – क्रमश: भाग ४ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ भाजी मंडई – भाग (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिले – चेहर्‍यावरची उत्तेजना, एखाद्या साहित्यिक समारंभाचा नाही, तर चौकातल्या टपोरींचा आभास निर्माण करत होती. उग्रता आणि संताप वाढत चालला होता.  सगळे हातघाईवर आले होते. आता इथून पुढे – )

जो इंचार्ज होता, त्याला सगळ्यांनी चारी बाजूने घेरलं होतं आणि तो मागे सरकला होता.  आपल्या हातातील प्रशस्तीपत्रकांचं बंडल इकडे-तिकडे विखुरताना तो बघत होता. मंचावर उभे असलेले मुख्य अतिथि आणि अध्यक्ष, काय चाललय काय, असा विचार करत इकडे बघू लागले होते. ज्याचं नाव पुकारलं गेलं होतं, तो सन्मान घेण्यासाठी मंचावर उभा होता, पण सन्मानपत्र तिथपर्यंत पोचलं नव्हतं. गर्दी अशी काही अस्ताव्यस्त झाली होती की भाजी मंडईची आठवण येत होती. ताज्या भाज्यांच्या जागी ताजे छापलेले सन्मानपत्र होते. स्वस्त-महाग भाज्यांप्रमाणे यांचेदेखील वेगवेगळे भाव होते. भेंडी आणि वांगी महाग होती. कांदे-बटाटे सगळ्यात स्वस्त होते. ज्यांना कांद्या-बटाट्यांप्रमाणे सन्मान मिळाला होता, ते सगळ्यात जास्त खूश होते. सध्याच्या काळात नुसतीच भाकरी खाणार्‍यांसाठी कांदे-बटाटे मिळणं हीही  काही कमी भाग्याची गोष्ट नव्हती.   

मोहिनीजींना घाम फुटला होता. कसला विचार केला होता आणि काय घडत होतं. घाबरत घाबरत त्या बॅक स्टेजला गेल्या. सगळ्यांना हात जोडून बसण्याची विनंती केली. स्वत: मंचावर जाऊन माईक सांभाळत अतिशय विनम्रतेने या अव्यवस्थेबद्दल त्यांनी माफी मागितली. परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली पण आत ठिणगी होतीच.  समारंभाच्या प्रमुख, प्रबुद्ध महिला आयोजकाच्या अनुनय-विनयाचा मान ठेवला गेला. दैवी शक्तिची कृपा झाली. लोकांनी संयम ठेवला आणि गप्प बसले. सगळ्यात चांगली गोष्ट आशी झाली की या गडबड-गोंधळाची बातमी बाहेर फुटली नाही कारण स्थानिक लोक खाऊन –पिऊन आधीच निघून गेले होते. कार्यक्रमाच्या चिंध्या उडता उडता राहिल्या.

आयोजकांनी सुटकेचा निश्वास टाकला. अशांतजीच्या डोळ्यातून आग उसळत होती, तर मोहिनीजींचे डोळे त्यावर पाणी टाकत होते. पूर्वी राजकीय पुढारीच फक्त घोडेबाजार करायचे. आज साहित्यिकांची फौजच्या फौज या बाजारात उतरली होती. ही फौज साहित्यात कमजोर होती पण लढण्या- लढवण्याच्या बाबतीत तगडी होती. साहित्याच्या नावावर, कांदाभाजीसुद्धा नाही, शिळी भाजी वाढून आपला अहंकार तुष्ट करत होती. आता खा, किंवा उलटी करा. त्यांना काही फरक पडत नव्हता. त्यांनी आपल्या हिश्याचं लिहून दिलं होतं. हे सगळे समारंभाचे शहेनशाह होते. छोटा-मोठा समारंभ नाही. विश्वस्तरीय समारंभ. देशा-विदेशातील साहित्यिक येत होते आणि आपल्या नावापुढे विदेशी पदवी लावून जात होते. संस्थेच्या इतिहासात नाव समाविष्ट होत होतं. त्याचबरोबार प्रशस्तीपत्रकांचा ढीग लागत होता. 

हे सन्मानधारी मग सोशल मीडियाची आणि वर्तमानपत्रांची शान बनत होते. सगळ्या गावात त्यांच्या नावाचा प्रकाश फाकत होता. आपल्या गावातल्या फलाण्या व्यक्तीला विदेशात सन्मान प्राप्त झालाय. भारतातल्या आणि स्थानिक वर्तमानपत्रांत जागोजागी लोकांना मिळालेल्या सन्मानाचे वर्णन असे. सोशल मीडियावर प्रत्येकाने आपल्या पोस्टबरोबर मोहिनीजींचा फोटो लावून त्यांना आदरपूर्वक धन्यवाद दिले होते. एक पोस्ट अनेक ठिकाणी शेअर केलेली होती. यत्र तत्र सर्वत्र या कार्यक्रमाचीच चर्चा होती. मोहिनीची शान आता वाढली होती. तिच्या व्यक्तिमत्वावर आता अनेक चंद्रांची आभा पसरली होती.

अकस्मात भाजी मंडईत कांदे-बटाट्यांचा भाव वाढला होता.

समाप्त

मूळ कथा – भिंडी बाजार    मूळ लेखिका – डॉ  हंसा दीप

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भाजी मंडई – क्रमश: भाग ३ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ भाजी मंडई – क्रमश: भाग ३ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिलं- ‘बघुयात तरी पडद्याच्या मागे काय गोंधळ चाललाय ते!’ भारतातून आलेल्या उन्मुक्तजींना रहावले नाही. ते घाईघाईने पडद्याच्या मागे काय चाललय, ते बघण्यासाठी गेले. आता इथून पुढे)

‘गोंधळ’ या शब्दामुळे अनेकांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह उमटले. या शब्दातील गूढता शोधून त्याच्या तळापर्यंत पोचण्यासाठी सगळे आतुर झाले. एक गेला. दूसरा गेला. हळू हळू बॅक स्टेजवर लाईनच लागली. अनेकांना वाटलं, बॅक स्टेजवरून वेगळे सन्मान दिले जाताहेत. जे जे मंचाच्या पुढे बसले होते, ते सारे ऊठ-ऊठून मागच्या बाजूला जाऊ लागले. सन्मानपत्र काढून मंचावर पोचवणारे लोक या गोंधळाने विचलित झाले. त्यांच्या सुनियोजित वितरण कार्यक्रमात गडबड झाली.

प्रश्नांचा पाऊस पडू लागला. ‘ बघा, बघा, माझं सन्मानपत्र  आहे की नाही? की मोहिनी मॅडम विसरून गेल्या.’

‘आपण शेवटून दुसर्‍या नंबरवर आहात.’    

“जरा वर सरकवा ना! आपण अगदी शेवटी टाकलं आहे. लोक निघून गेल्यावर आम्हाला मंचावर बोलावून काय फायदा?’

“नाही सर, प्लीज़, आम्ही मंचावर लिस्ट दिली आहे. सगळा कार्यक्रम बिघडून जाईल.’  

“आपण जरा बसून घ्या. आपलं नाव येईलच!’ मागच्या बाजूने आणखी एका वितरण सहाय्यकाने सांगितलं.   

आता हे महाशय ऐकणार्‍यातले कुठे होते? संतापून म्हणाले, ‘सर, जरा माझं ऐका. शेवटी आपण माझं नाव पुकारलंत, तर मला सन्मान घेताना बघणार कोण?’

“नाही तर काय? या भिंतीच बघतील ना, आम्हालाही सन्मान मिळालाय. आपण बाहेर जाण्याचा दरवाजा बंद करा. किंवा यादीत माझं नाव वर घ्या. अन्यथा मी आपल्याला एकही सर्टिफिकीट उचलू देणार नाही!’ आणखी एक आवाज आला. आपल्या बोलण्याला समर्थन मिळतय, हे बघताच महाशय हमरी-तुमरीवर आले. भुवया आधीपासून उंचावलेल्या होत्याच. आता अस्तन्या वर सरकल्या. आपला जुना कोट घातला होता त्यांनी. त्यामुळे कोपर्‍यावर सहज जाऊ शकला.

त्यांचा हा पवित्रा सहन करण्यापलीकडचा होता. ‘आपल्याला कल्पना आहे, आपण कुणाशी बोलताय. जरा सभ्यपणे बोला.’

“आम्हाला सभ्यता शिकवू नका. आम्ही या सन्मानासाठीचे पूर्ण पैसे दिलेत. आपण आमचं नाव वर करू शकत नसाल, तर आमचे पैसे परत करा.’ सन्मानासाठी आतुर झालेल्या व्यक्ती आता दोन हात करण्याच्या तयारीला लागल्या होत्या. 

‘ जा. आपण मोहिनीजींशी बोला. इथे गडबड-गोंधळ केला नाहीत, तर बरं होईल!’

‘गडबड-गोंधळ आता होईल आणि नक्कीच होईल. सगळी दुनिया बघेल, ऐकेल, इथे कोणती खिचडी शिजते आहे.’

आवाज तीव्र होत गेले. आपला आपला नंबर चेक करण्याची शर्यतच लागली जशी काही. मंचाच्या मागच्या बाजूला गर्दी वाढत चालली. अनेक लोक आपलं नाव पुकारण्याची वाट बघत मंचाच्या मागच्या बाजूला आले होते. सरकारी फाइल ज्या पद्धतीने पुढे सरकवली जाते, त्याच पद्धतीने सन्मानपत्रही पुढे सरकवायचं होतं. गर्दी लांडग्यांच्या पद्धतीने आपलं काम करत होती. चेहर्‍यावरची उत्तेजना, एखाद्या साहित्यिक समारंभाचा नाही, तर चौकातल्या टपोरींचा आभास निर्माण करत होती. उग्रता आणि संताप वाढत चालला होता.  सगळे हातघाईवर आले होते.

क्रमश:…….

मूळ कथा – भिंडी बाजार    मूळ लेखिका – डॉ  हंसा दीप

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भाजी मंडई – क्रमश: भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ भाजी मंडई – क्रमश: भाग (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिले, – दोन रमा होत्या. दोघी शर्मा होत्या. दोघींना एकच सन्मान दिला जाणार होता. त्यामुळे कुणीही मंचावर यावं, काही फरक पडणार नव्हता. आता इथून पुढे – )

समारंभ सुरू झाला. स्वागताचे भाषण झाल्यानंतर मुख्य अतिथि आणि अध्यक्षांचा परिचय,  स्वागत झाले. अशांत जी नावे अनाऊन्स करत होते. त्यांचे  चेले-चपेटे फोटो काढत होते. या दिवसात कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमात पन्नास लोक येतात आणि कमीत कमी पंचेचाळीस कॅमेरे ऑन असतात. सगळे फोटो शूट करत असतात. बघत कोणीच नाही. सगळे दाखवतच असतात. म्हणजे त्यांनी कॅमेर्‍यात जे कैद केलं, ते दाखवत सुटतात. इथे तर या क्षणांचं नातं आयुष्यभराशी जोडलं जाणार होतं. विदेशी भूमीवर सन्मान मिळण्याची संधी काही वारंवार येत नाही. प्रत्येक कॅमेरावाल्याला विनंती करण्यात येत होती की फोटो घेऊन जरूर पाठवा. अनेक फोटोंमधून सगळ्यात चांगला फोटो निवडून आपल्या संग्रहासाठी घेतला जाणार होता.

सन्मान विकले जातात. सन्मान खरीदले जातात. सन्मान परतही केले जातात. सन्मान परत करणार्‍यांचं नाव सगळ्यात जास्त होतं. मिळण्याचा प्रचार तर वेगळाच होतो. आपल्या योग्यतेचा गर्व होतो आणि अशी ठसकही की आम्हाला तुमच्या सन्मानाचं काही पडलेलं नाहीये. मिळाला तर होताच. परत केला. सन्मानाचं रक्षण करण्यासाठी घेतला होता. आता आत्मसन्मानाचं रक्षण करण्यासाठी परत केला. महानतेचा भाव, रक्षण करण्याचा भाव दोन्ही बाजूत होता. मोहिनीने उचललेलं हे पाऊल परिणामकारक होतं. जो कार्यक्रमात येईल, तो सन्मानित होईल. साहित्य गौरव, साहित्य शिल्पी,  साहित्य सृजक, साहित्य रत्न…. सगळ्यात खास  सर्वोच्च सन्मान- भारत रत्नप्रमाणे “प्रवासी भारत रत्न” हा होता.  

सन्मान करण्यासाठी देणार्‍या या पदव्यांसाठी, आयोजकांना खूप परीश्रम करावे लागले होते. जो साहित्याकार कार्यक्रम स्पॉन्सर करेल, त्याचं नाव लिस्टमध्ये पहिलं होतं. पण चांगल्या साहित्यिकांचा, त्यांना सन्मानित होण्यासाठी कुठलाही कार्यक्रम स्पॉन्सर करण्याची गरज वाटत नाही, असा पोकळ, कुचकामी विचार अडथळे आणत होता. बॅक स्टेजवर काम करणारे, मंचाच्या सक्रियतेवर टिपणी करत होते, ‘हा सगळा मूर्खपणा आहे. सन्मानासाठी साहित्याची काय गरज आहे?’

‘मित्रा, तू ईमानदारीची कदर करायला कधी शिकणार?’

’कसली ईमानदारी, ‘र ला र’ आणि ‘त ला त’ जोडला की त्याला तुम्ही कविता म्हणणार. एखादी घटना लिहिली की त्याला तुम्ही कथा म्हणणार. अशा दहा घटना एकत्र केल्या  की कादंबरी होईल. मी अशी रोज एक कादंबरी लिहीन.’

 “लेखन मनातल्या मनात नको. कागदावर दिसायला हवं. हे सारे हिंदीचे भक्तगण, हिंदीची सेवा करताहेत. सन्मानासाठी तर हिंदी सेवा. एरवी घरातही मुलांबरोबर बोलणं इंग्रजीतूनच होतं!”

“ठीक आहे. आपल्याला काय? आपला आपल्या कामाशी संबंध. सध्या आपण आपल्या सन्मानाच्या छापखान्याकडे लक्ष देऊ या.“ 

एकाएकी मोठी समस्या निर्माण झाली. जे आले नव्हते, त्यांचीही नावे छापली गेली. बहुतेक चुकीची यादी हातात पडली होती. मंचावरून नाव पुकारलं जात होतं पण तिथे कोणीच नव्हतं. जे होते, ते आपलं नाव येण्याची वाट बघत होते. त्यांचा धीर सुटत चालला होता. समोर बसलेल्यांमध्ये गडबड सुरू झाली.

‘केवढी अव्यवस्था आहे इथे!’

‘बघुयात तरी पडद्याच्या मागे काय गोंधळ चाललाय ते!’ भारतातून आलेल्या उन्मुक्तजींना रहावले नाही. ते घाईघाईने पडद्याच्या मागे काय चाललय, ते बघण्यासाठी गेले.

क्रमश:…….

मूळ कथा – भिंडी बाजार    मूळ लेखिका – डॉ  हंसा दीप

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares